Thursday, March 31, 2016

Shri Navnath BhaktiSar Adhyay 37 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सदतिसावा (३७ ) भाग २/२


Shri Navnath BhaktiSar Adhyay 37 
Nagnath came to know that Dattaguru is daily coming in the afternoon to Kolhapur for Bhiksha. So to meet him and found out him he started to feed all the people in Kolhapur and to those coming into Kolhapur. He was using Siddhi to do all this; So that anybody needs not to prepare food in the house at that place. He knew that Dattaguru would not accept Bhiksha of food that is prepared by using Siddhi. With this he succeeded in finding out his Guru, Who blessed him with Diksha and Brahmopadesh. Dattaguru imparted all the Astra-Shastra Vidya to Nagnath by taking him to Badrikedar. Then got done all the required practices from him and sent him for tirthyatra. Nagnath while on tirthyatra came to Vadval. He made many disciples and stayed there. One day Machchhindra came there and wished to meet Nagnath. However the disciples stopped him at the entrance of cave and asked to wait till their Guru allows him to enter. Then there was a war between Nagnath and Machchhindra at the end Machchhindra called his Dattaguru for his help. Then both knew that their Guru is the same. Then respectfully Nagnath took Machchhindra in the cave, where Machchhindra lived for three days. He told Nagnath that anybody who comes there with a wish to have his (Nagnath's) darshan must have a fee entry. In the next 38th Adhyay Dhundisut Malu from Narhari family will tell us about CharpatiNath.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सदतिसावा (३७ ) भाग २/२
मग अवश्य म्हणूनि नाथ प्रेमळ । वंदूनि श्रीगुरुचें पदकमळ ।
तीर्थें कराया उतावेळ । महीवरी संचरला ॥ १०१ ॥
अत्रिसुत गेला गिरनारपर्वतीं । येरीकडे नागनाथजती ।
तीर्थें करीत नाना क्षितीं । बालेघाटीं पातला ॥ १०२ ॥
तेथें पाहूनि शुद्ध कानन । वस्तीसी राहिला मनोधर्म । 
परी तो प्रतापी तपी सघन । गांवोगांवीं समजला ॥ १०३ ॥
मग अपार लोक येती दर्शना । दिवसानुदिवस वाढे महिमा ।
मग भक्तिपुरस्करांची वाढली महिमा । तुम्हीं येथेंचि वस्ती करावी ॥ १०४ ॥
मग अपार धर्म करुन । वस्तीसी राहिले अपार जन ।         
वडवाळ ऐसें ग्राम नाम । नागनाथें ठेविलें ॥ १०५ ॥
यावरी कोणे एके दिवशीं । मच्छिंद्र आला त्या ठायासी ।
सहज राहता झाला वडवाळासी । नाथकीर्ति ऐकिली ॥ १०६ ॥
म्हणोनि मच्छिंद्र दर्शना जात । तो मठद्वारीं येऊनि त्वरित ।
सदृढ चालतां द्वाराआंत । स्वशिष्यांनीं हटकिलें ॥ १०७ ॥
म्हणती नाथबोवा ऐका वचन । पुढें नका करुं गमन ।
श्रीनागनाथातें सांगून । तुम्हां नेऊं दर्शना ॥ १०८ ॥
तयांच्या परवानगीवांचून । होत नाहीं कोणाचें गमन ।
तस्मात् थांबावें एक क्षण । आम्ही विचारुन येतों कीं ॥ १०९ ॥
ऐसें मच्छिंद्रें ऐकतां वचन । कोपानळीं चढलें मन ।
चित्तीं म्हणे हा संतजन । कैंचा राववत (श्रीमंतासमान) दिसतसे ॥ ११० ॥
देवद्वार साधुद्वार । मुक्त असावें निरंतर । 
तरी कपटपणींचा संत वेव्हार । संग्रहातें न ठेविती ॥ १११ ॥
तरी येथें आहे बंड । जग भोंदावयाचें केलें प्रचंड ।
तरी शिक्षा आतां उदंड । दाखवावी या नरा ॥ ११२ ॥
ऐसें क्रोधें चित्तीं आणून । त्या शिष्यांसी केले ताडण ।
ताडण करितां बहुत जन । सप्तशत शिष्य धांवले ॥ ११३ ॥
तें पाहूनियां मच्छिंद्रनाथ । स्पर्शकळा त्वरें प्रेरित । 
तेणें झाले महीव्यक्त । सातशें शिष्य सकळिक ॥ ११४ ॥
महीव्यक्त सकळ होतां । नाथ मुखवटा ताडण करितां ।
तंव ते आरंबळती आक्रोशवंत । एकआरडा ऊठला ॥ ११५ ॥
तों येरीकडे मठांत । सदा ध्यानीं भरुनि नागनाथ ।
कोल्हाळ आरडा ऐकूनि प्राजळवंत । देहावरी पातला ॥ ११६ ॥
ध्यान भंगिलें कोल्हाळेंकरुन । तेणें कोपानळीं पेटलें मन ।
मग उपरीवरी शीघ्र जाऊन । निजदृष्टीं पहातसे ॥ ११७ ॥
तैं सातशे शिष्य महीव्यक्त । झाले ते चलनवलनरहित ।
एकटा तया गणीं नाथ । मुखावरी भेदीतसे ॥ ११८ ॥
ऐसें नागनाथें पाहून । अत्यंत कोपला कोपानळानें ।
म्हणे हा नाथदीक्षेसी येतो दिसोन । परी भ्रष्टबुद्धी आहे कीं ॥ ११९ ॥
शांती क्षमा दया पूर्ण । पाळिजे साधूचें हेंचि लक्षण ।
स्वप्नामाजी तीव्रपण । ठेवूं नये निजवृत्तीं ॥ १२० ॥
तरी हा यातें नाहीं योग्य नाथ । नाथपंथा लाविला डाग ।
कोणता साधू होता मांग । उपदेशिलें ऐशासी ॥ १२१ ॥
तरी यातें शिक्षा करुन । दीक्षा घ्यावी हिरोन ।
ऐसें कोपेंची जल्पून । धुनीभस्म कवळिलें ॥ १२२ ॥
प्रथम गरुडबंधनविद्या जल्पून । स्वर्गीं गरुडाचें केले बंधन ।
सकळ नुरे चलनवलन । स्वर्गीं व्यक्त केला असे ॥ १२३ ॥
मग विभक्तास्त्र जल्पून । शिष्य मुक्त केले महीकारण ।
मुक्त होतांचि सकळ जन । नाथपृष्ठीं दडाले ॥ १२४ ॥
तें पाहूनियां मच्छिंद्रनाथ । म्हणे चूर्ण करावे हे समस्त । 
मग जल्पूनि अस्त्रपर्वत । महानग निर्मिला ॥ १२५ ॥
तो पर्वत विशाळपणीं । येता झाला पंथगगनीं । 
तें नाथें पाहूनि  नयनीं । शक्रवज्र जल्पिलें ॥ १२६ ॥           
मग तो शीघ्र पाकशासन (इंद्र) । अंतराळीं वज्र देत सोडून २
तेणें पर्वत झाला चूर्ण । मच्छिंद्रनाथ पाहुनी कोपला ॥ १२७ ॥
मग जल्पूनि वाताकर्षण । शक्र पाडिला महीकारण । 
वज्रकाळीविद्या जल्पून । वज्रालागीं निवटिलें ॥ १२८ ॥
तें पाहूनियां नागनाथ । मनीं क्षोभला अति अद्भुत । 
मग वातप्रेरक विद्या त्वरित । वाताकर्षणावरी टाकिली ॥ १२९ ॥
तेणें शक्र सावध होऊन । पळूं लागला भयेंकरुन । 
म्हणे प्रतापी गहन दोघे जण । आपुलें काम नसे येथें ॥ १३० ॥
ऐसें म्हणोनि भयस्थित । शक्र स्थाना पळूनि जात ।
येरीकडे मच्छिंद्रनाथ । काय करितां पैं झाला ॥ १३१ ॥
मग वासवशक्ती अति दारुण । जल्पूनि मंत्रप्रयोगानें ।
सिद्ध करुनि दैदिप्यमान । नागेशभागा पाठविली ॥ १३२ ॥
परी ती शक्ति महादारुण । सहस्त्रमित्रतेजेंकरुन । 
प्रळयकाळींचा जैसा अग्न । शब्द करीत येतसे ॥ १३३ ॥
शब्द करितां कडकडाट । खचूनि पडती गिरिकपाट ।
धरा कांपे जळजळाट । द्विभाग होऊं पाहातसे ॥ १३४ ॥
श्र्वापदें पळती रानोरान । दिग्गजां न मिळे कोठें ठिकाण । 
पाताळभुवनीं शेष दचकून । मूर्धनीतें सरसावी ॥ १३५ ॥
एकचि झाला हलकल्लोळ । महींचे जीव चराचर सकळ । 
घाबरोनि झाली हडवळ । क्षमेंत स्थळ पाहती ॥ १३६ ॥
ऐसा पाहूनि महाआकांत । काय करी नागनाथ । 
सकळ दैवतें बंधनविद्येंत । जल्पता झाला महाराजा ॥ १३७ ॥
तेणें दैवतांचें बंधन समस्त । मग न धांवती स्फुरल्या विद्येंत ।
ऐसी केली गती कुंठित । सकळ अस्त्रशस्त्रांची ॥ १३८ ॥
मग हेमाद्रिपर्वत दारुण । अस्त्र योजिलें महादारुण । 
हेमाद्रि अस्त्र पावोन । नाथें वासवी शक्ती टाकिली ॥ १३९ ॥
तें पाहोनियां मच्छिंद्रनाथ । शक्रवज्रालागीं स्तवीत ।
वरी बंधन झालें सकळ दैवत । अस्त्रविद्या फळेना ॥ १४० ॥
मग नाना अस्त्रांचे प्रयोग युक्तीं । जपे परी ते सकळ व्यर्थ जाती । 
मग निःशक्त मच्छिंद्र होवोनि जगतीं । स्तब्धदृष्टीं पहातसे ॥ १४१ ॥
तों येरीकडे नागनाथ । नाना अस्त्रें जल्पोनि त्वरित ।
पर्वतासमान तक्षक तेथें । अस्त्रविद्येसी धांवले ॥ १४२ ॥
मग मच्छिंद्रातें दंशूं धांवती । शतानुशत नाहीं गणती ।
तें पाहोनि मच्छिंद्रजती । गरुडास्त्र तेव्हां जपतसे ॥ १४३ ॥
परी नागनाथें पूर्वकरणीं । केलें होतें गरुडबंधन ।
तेथें मच्छिंद्राचा योग पूर्ण । व्यर्थ झाला गरुडास्त्रीं ॥ १४४ ॥
मग ते सर्प उन्मत्त । येवोनि डंखिती ठायीं नाथ ।
तेणें मच्छिंद्र हडबडीत । प्राण सोडूं पाहातसे ॥ १४५ ॥
मग अंतकाळींचा समय जाणून । चित्त बुद्धि अंतःकरण ।
काया वाचा तन मन । गुरुचे चरण स्तवीतसे ॥ १४६ ॥          
स्तवीतसे परी कैशा रीती । ऊर्ध्वशब्द उद्भटगतीं ।
म्हणे महाराजा कृपा मूर्ती । अत्रिसुता धांव रे ॥ १४७ ॥
मी बाळक लडिवाळ जाण । वेष्टलों असें सर्पबंधनें ।
तरी माये तुजवांचून । कोण सोडवील मज आतां ॥ १४८ ॥
हे त्रयदेवअवतारखाणी । मज पाडसाची तूं हरिणी ।
व्याघ्र बैसला मम प्राणहरणीं । ये धांवोनि लगबगें ॥ १४९ ॥
परम संकटीं पडलो येथें । कैसी निद्रा लागली तूतें ।
सर्वसाक्षी असोनि जगातें । नेत्र झांकिले मजविषयीं ॥ १५० ॥
दत्त दत्त ऐसें म्हणोन । शब्द फोडिला अट्टहास्येंकरुन । 
नेत्र झाले श्र्वेतवर्ण । मुखीं हुंदका येतसे ॥ १५१ ॥
परी दत्तात्रेयनामेंकरुन । वाहे अट्टहास्यें वचन ।
ते नागनाथें शब्द ऐकून । साशंकित होतसे ॥ १५२ ॥
चित्तीं म्हणे मम गुरुचें । स्मरण हा करितो किमर्थ वाचे ।
तरी हा कोणाचा शिष्य याचें । नाम विचारुं जावोनी ॥ १५३ ॥
मग निकट येवोनि वटसिद्धनाथ । पुसता झाला स्नेहभरित ।
म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत । गुरु कोण तुमचा ॥ १५४ ॥
येरु म्हणे आदेश नाथा । नाम मच्छिंद्र तत्त्वतां ।
प्रसन्न करोनि अत्रिसुता । अनुग्रह घेतला ॥ १५५ ॥
तरी यासी नाथपंथ मूळ । मी प्रथमभागीं दत्ताचें बाळ ।
मजमागें जालिंदर सबळ । दत्तानुग्रहीं मिरवला ॥ १५६ ॥
तयामागें भर्तरीनाथ । दत्तशिष्य झाला जगविख्यात । 
जोंवरी अवनी तोंपर्यंत । चिरंजीव मिरवला ॥ १५७ ॥
तयामागें रेवणनाथ । दत्तानुग्रहीं प्रतापवंत । 
जेणें जिंकोनि देव समस्त । विप्रबाळें उठविलीं ॥ १५८ ॥
तरी महाराजा नाथपंथांत । मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सुत ।
ऐसें ऐकोनि वटसिद्धनाथ । मनामाजी कलवळला ॥ १५९ ॥
मग सुपर्णाचें सोडूनि बंधन । गरुडअस्त्र जपे वाचेकारण ।
ऐसें होतां तत्काळ सुपर्ण । महीवरी उतरला ॥ १६० ॥
उतरोनि नागकुळ समस्त । होवोनियां भयभीत ।
तत्काळ विष शोषूनि त्वरित । अदृश्यते पावले ॥ १६१ ॥
असो नागकुळ विष शोषून । अदृश्य झालिया भयेंकरुन ।
गरुडही उभयतां नमून । स्वर्गाप्रती तो गेला ॥ १६२ ॥
येरीकडे नागनाथ । मच्छिंद्रचरणीं माथा ठेवीत ।
म्हणे तातासमान वडील भ्रात । गुरु माझा तूं होसी ॥ १६३ ॥
मग नेवोनियां स्वस्थानासी । बैसविला आपणापाशीं ।
गौरवोनि उदार मानसीं । एक मास ठेविला ॥ १६४ ॥
यावरी मच्छिंद्र एके दिवशीं । बोलता झाला नागनाथासी । 
तुवां बंधन द्वारापाशीं । ठेविलें काय म्हणोनियां ॥ १६५ ॥
भाविक येती दर्शनातें । तव शिष्य येवों न देती त्यातें ।
तुज मज कळी याचि निमित्तें । झाली असे महाराजा ॥ १६६ ॥
यावरी बोले नागनाथ । मी असतों सदा ध्यानस्थ । 
जन हे येवोनि अपरिमित । ध्यान माझें भंगिती ॥ १६७ ॥
म्हणोनि द्वारीं ठेवितों रक्षण । उपरी बोले मच्छिंद्रनंदन ।
नाथ हें नव्हें चांगुलपण । भूषणिक आपणासी ॥ १६८ ॥
कोणी जन ते हीनदीन । व्हावया येती पवित्र पावन ।
तरी ते द्वार अटक पाहोन । विन्मुख मागें जाताती ॥ १६९ ॥
तरी मुक्तद्वार आतां येथून । ठेवीं जगाचें अकिंचनपण ।
हरोनियां मनोधर्म । रुढिमार्गा वाढवीं ॥ १७० ॥
ऐसें सांगोनि नागनाथासी । मच्छिंद्र जाती तीर्थासी ।
येरीकडे वडवाळगांवासी । काय करी नाथ तो ॥ १७१ ॥
मुक्तद्वार अगार टाकोन । मग दर्शना येती अपार जन ।
नाना जगाचें अकिंचनपण । फिटोनि मागें जाताती ॥ १७२ ॥
ऐसें असतां कोणे एके दिवशीं । चांगुणा संतशिष्य होता त्यासी ।
तयाची स्त्री पुण्यराशी । मृत्यु पावली मठांत ॥ १७३ ॥
तें पाहोनि वटसिद्धनाथ । उठविती तयाचे कांतेतें ।
तेणें बोभाट वडवाळ्यांत । घरोघरी संचरला ॥ १७४ ॥
मग जयाचें घरी होत मृत । आणूनि टाकिती मठा प्रेत ।
उठवूनि नागनाथ । सदना धाडी तयाच्या ॥ १७५ ॥
ऐसें होतां बहुत दिवस । संकट पडलें यमधर्मास । 
मग तो जाऊनि सत्यलोकास । विधीलागीं निवेदी ॥ १७६ ॥
मग तो मूर्तिमंत चतुरानन । वडवाळांत शीघ्र येवोन ।
श्रीनाथाचा स्तव करोन । राहविलें त्या कर्मा ॥ १७७ ॥
यापरी सहा शिष्य त्यातें । सिद्धकळा लाधली नवांतें ।
ते जगामाजी प्रसिद्धवंत । सिद्धनामीं मिरवले ॥ १७८ ॥
चांगुलसिद्ध धर्मसिद्ध । देवसिद्ध भोमसिद्ध ।
देवनसिद्ध भोमनसिद्ध । कोकिळ सुंदरचक्षू तो ॥ १७९ ॥
ऐशा नवसिद्धांमाझारी । विद्या ओपिली कवित्व साबरी ।
देव जिंकोनि सत्वरीं । विद्यावरु मिरवले ॥ १८० ॥
बावन्न वीरांचें करोनि बंधन । केल्या साबरी विद्या स्वाधीन ।
ते साबरी विद्या कवित्वरत्न । नवसिद्धांत मिरवती ॥ १८१ ॥
एक कोटी एक लक्ष । नागनाथाची विद्या प्रत्यक्ष । 
परोपकारी सौम्य दक्ष । पीडाकारक नव्हे ती ॥ १८२ ॥
धांवरें खांडूक उसण । टिके किरळ अहिरानैम ।
वृश्र्चिकसर्पविषहरण । ऐसी विद्या परोपकारी ॥ १८३ ॥
असो ऐसी विद्या साबरीं कवित । नवांनीं प्रकट केली जगांत ।
यापरी दिवस लोटले बहुत । कथा वर्तली विप्राची ॥ १८४ ॥
समाधियोग सरला शेवट । तैं उद्धरिला बहिरंभट । 
आणि रामजी भक्त सुभट । हेमकारक उद्धरिला ॥ १८५ ॥
तरी त्या कथा पूर्ण भागांत । वदलों भक्तिकथामृतग्रंथांत । 
याउपरी चरपटीनाथ । श्रवण करावें श्रोते हो ॥ १८६ ॥
धुंडीसुत नरहरिवंशीं । मालू संतकृपेंसीं ।
अवधान विद्ये सावकाशीं । श्रोते तुम्ही अवधारा ॥ १८७ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । सप्तत्रिंधत्तमाध्याय गोड हा ॥ १८८ ॥
श्रीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार सप्तत्रिंशत्तमाध्याय संपूर्ण ॥
Shri Navnath BhaktiSar Adhyay 37 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सदतिसावा (३७ ) 


Custom Search

Shri Navnath BhaktiSar Adhyay 37 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सदतिसावा (३७ ) भाग १/२


Shri Navnath BhaktiSar Adhyay 37 
Nagnath came to know that Dattaguru is daily coming in the afternoon to Kolhapur for Bhiksha. So to meet him and found out him he started to feed all the people in Kolhapur and to those coming into Kolhapur. He was using Siddhi to do all this; So that anybody needs not to prepare food in the house at that place. He knew that Dattaguru would not accept Bhiksha of food that is prepared by using Siddhi. With this he succeeded in finding out his Guru, Who blessed him with Diksha and Brahmopadesh. Dattaguru imparted all the Astra-Shastra Vidya to Nagnath by taking him to Badrikedar. Then got done all the required practices from him and sent him for tirthyatra. Nagnath while on tirthyatra came to Vadval. He made many disciples and stayed there. One day Machchhindra came there and wished to meet Nagnath. However the disciples stopped him at the entrance of cave and asked to wait till their Guru allows him to enter. Then there was a war between Nagnath and Machchhindra at the end Machchhindra called his Dattaguru for his help. Then both knew that their Guru is the same. Then respectfully Nagnath took Machchhindra in the cave, where Machchhindra lived for three days. He told Nagnath that anybody who comes there with a wish to have his (Nagnath's) darshan must have a fee entry. In the next 38th Adhyay Dhundisut Malu from Narhari family will tell us about CharpatiNath.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सदतिसावा (३७ ) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी पंकजाक्षा । आदिपुरुषा सर्वसाक्षा ।
अव्यक्तव्यक्ता सर्वपरीक्षा । महादक्षा रमावरा ॥ १ ॥
मागिले अध्यायीं कथन । करविलें वटसिद्धनागनाथजन्म ।
उपरी सिद्धकळा पावून । कोल्हापुरीं पातला ॥ २ ॥
तेथें राहूनि लक्ष्मीआलयांत । पुजारी करुनि हस्तगत ।
सर्व सामग्री ओवरींत । नेऊनियां दाखविली ॥ ३ ॥  
दाखवूनि म्हणे पुजार्‍यासी । सबळ पडल्या कनकराशी । 
तरी ह्या सरतील ज्या दिवशीं । तंववरी संतर्पण योजावें ॥ ४ ॥
योजावें तरी अन्यवर्ण । कांहींच धरुं नये भिन्न ।
सकळांलागीं करुनि पक्वान्न । पंगतींतें वाढावें ॥ ५ ॥
गांवामाजी सकळांकारणें । पेटूं न द्यावा पाकीं अग्न ।
द्विवेळा त्रिवेळा घालूनि भोजन । तुष्ट करावें सकळांतें ॥ ६ ॥
शेट सावकार राजा रंक । सकळांसी आणूनि ओपावा पाक ।
अंत्यजादि भूदेव लोक । तुष्ट करावें सर्वांसी ॥ ७ ॥
ऐसें सांगूनि पुजार्‍यातें । शीघ्र कामाठी आणवीत ।
कार्ययोगें अपरिमित । सकाम कामीं योजिलें ॥ ८ ॥
उत्तम तिथी नेम करुन । मांडव मंडप उभारुन । 
पाकालागीं सज्ज करुन । सर्व काम चालविलें ॥ ९ ॥
मग शिष्टाशिष्ट गृहीं धाडून । तयां दिधलें आमंत्रण ।
येरीकडे पाकनिर्माण । करावया लाविलें ॥ १० ॥
आणि ग्रामद्वारीं टिळा लावून । भोजनदवंडी ग्रामीं पिटून ।
सर्व सामग्री सज्ज करुन । काम चालीं चालविलें ॥ ११ ॥
शैव श्रावक आणि ब्राह्मण । भेद चौर्‍यायशीं देशांसमान । 
देवाग्नी विप्र ऋषि ब्राह्मण । पाक भिन्न भिन्न निर्मिती ॥ १२ ॥
पंच द्राविड देश मुलतानी । मारवाडी गुर्जर हिंदुस्तानी ।
हुसेनी पौंड्र मिळोनी । देशजाती मिळाल्या ॥ १३ ॥
असो भेदाभेद अन्यजाती । षड्मार्गांनीं पाकविती ।
खाज्या करंज्या कचुर मालती । शिरा बुंदी करिताती ॥ १४ ॥
पुरी पोळी क्षिप्रा (खीर) बहुत । चमचमीत भाज्या वरणभात । 
पंचमधु त्यांत अपार घृत । इच्छेसमान मिरवलें ॥ १५ ॥        
असो पाकाग्नि सिद्ध करुन । चालते पंक्तीं सेविती अन्न ।
पुन्हां क्षुधा लागल्या परतून । येऊनि अन्न सेविती ॥ १६ ॥
प्रथम पाक जातजाती । तेथें नसे कांहीं अरुती ।
कितीक वाढूनि गृहासी नेती । भोजन करुनि मन माने ॥ १७ ॥ 
कोणी कोरडेंचि उपटून नेती अन्न । नेऊनि भरिती आपुलें सदन ।
मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न । सर्व झालें गांवांत ॥ १८ ॥
राव रंक कुटुंबांसहित । अन्न सेवूनि होती तृप्त । 
मग वन्ही इतुका दीपानिमित्त । गृहोगृहीं मिरवला ॥ १९ ॥
असो यापरी एक मास । ग्राम सेवी सिद्ध अन्नास ।  
यावरी कथा अत्रिसुतास । कैसी वर्तली ती ऐका ॥ २० ॥
प्रथम दिनीं भिक्षेकारण । गांवांत संचरे अत्रिनंदन । 
कुश्र्चितरुपी विरुपवान । भिक्षा मागे गृहोगृहीं ॥ २१ ॥
तंव ते घरोघरींचे जन । म्हणती गांवांत प्रयोजन । 
होतें तेथें आम्हां जाणें । कुटुंबादि भोजना ॥ २२ ॥  
तरी तूं सत्वरगती । जाऊनि सारीं कां आपुली भुक्ती । 
व्यर्थ शीण कासयाप्रती । वाईट कदन्न इच्छूनी ॥ २३ ॥
उत्तम पक्व अन्न टाकूनी । व्यर्थ कां शिणसी दरिद्रवान । 
कामधेनूचे कांसे आनन । कांडणकोंडा  कां भक्षावा ॥ २४ ॥
कीं कल्पतरु बैसल्या ठायीं । इच्छेसमान पदार्थ देई ।
मग कां शिणावें धांवूनि पायीं । मेळवावया भुक्तीतें ॥ २५ ॥
परीस असतां गृहालागून । मग चाकरी कासया करावी हेमाकारण ।
रागें आतुडतां पीयूषपान । मग वल्लीरसायन कां इच्छावें ॥ २६ ॥
तेवीं तूं प्रकरण करिसी येथें । सोडूनि सुधारसअन्नातें ।
कदन्नाकरितां या गांवांत । हिंडतोसी मतिमंदा ॥ २७ ॥
येपरी असों आम्ही गृहासी । भोजना जातों आम्ही कुटुंबेसीं ।
पाक करावा कवणे अर्थेसीं । तुजलागीं ओपावया ॥ २८ ॥
ऐसीं घरोघरीं भाषणें । होती दत्तात्रेयाकारणें ।
मग मनांत म्हणे प्रयोजन । जाऊनि पाहूं निजदृष्टीं ॥ २९ ॥
ऐसें योजूनि स्वचित्तांत । तेथें पातला तपोनाथ । 
उभा राहूनि पाकशाळेंत । पाक लक्षांत आणीतसे ॥ ३० ॥
तंव तो महाराज योगकारण । देखतां ओळखी सिद्धिअन्न ।
थोडें करिता नगसमान । होय अपार न पचवितां ( न शिजवितां)  ॥ ३१ ॥
एक पोळी पडतांचि लागली । परी सहस्त्रही वाढियेली ।
ऐशा चिन्हें ओळखिली । सिद्धिकळा महाराजें ॥ ३२ ॥
मग तेथींच्या जनालागीं पुसत । हें प्रयोजन एवढें कोण करीत ।
येरु म्हणती महा समर्थ । वटसिद्धनागनाथ करितो कीं ॥ ३३ ॥
ऐसें ऐकूनि अत्रिसुत । खूण जाणली स्वचित्तांत । 
कीं म्यां मुलासी सिद्ध पदार्थ । काशीक्षेत्रीं ओपिले ॥ ३४ ॥
तरी त्याचें नांव होतें यथार्थ । वटसिद्धनागेश नागनाथ ।
तरी तोचि काय आहे येथ । मोठेपणा मिरवावया ॥ ३५ ॥
त्यासी वर्षें लोटलीं वीस । तरी झाला असेल स्थूळ देहास ।
तरुणपणीं महंतीस । वाढवावया टेंकला  ॥ ३६ ॥
टेंकला परी मजकारणीं । गोचर व्हावें ही इच्छा मनीं । 
या गांवींचें संधान धरुनी । संतर्पण मांडिले ॥ ३७ ॥
हें गांवींचें भिक्षास्थान । भ्रष्ट करावें सिद्धिअन्नें ।
सकळ गांवींचा पाक वर्जून । केला अर्थ मजकरितां ॥ ३८ ॥
तरी आतां असो कैसें । आजिचा दिन करुं उपवास ।
ऐसें योजूनि स्वचित्तास । स्वामी तेथूनि चालिला ॥ ३९ ॥
चालिला परी आणिक जन । पाचारिती बाळाकारण ।
आपण जावें भोजन करुन । तूं ऐसा कां जातोसी ॥ ४० ॥
ऐसें म्हणोनि हातीं धरिती । पुन्हां पाकशाळे आणिती ।
परी तो नायके योगपती । गांवामाजी संचरे ॥ ४१ ॥
मग कणधान्याची भिक्षा करीत । लोक पुसतां त्यांतें वदत ।
कीं आमुचा नेम भिक्षारहित । अन्न सेवीत नाहीं जी ॥ ४२ ॥ 
ऐसें वदूनि सकळ लोकांत । शुष्क अन्न मागूनि घेत ।'
काशीक्षेत्रीं जाऊनि त्वरित । भोजनातें सारीतसे ॥ ४३ ॥              
ऐसे रीतीं एक मास । लोटूनि गेला सहजस्थितीस ।
परी नागनाथ स्वचित्तास । विचार करिता पैं झाला ॥ ४४ ॥
म्हणे लोटला एक मास । स्वामी न दिसे  आम्हांस ।
मग बोलावूनि ग्रामस्थांस । पुसता झाला महाराजा ॥ ४५ ॥
म्हणे गांवांत कोणी येत । अतीत आहे भिक्षावंत । 
तंव ते म्हणती सिद्धनाथ । एक अतीत येतो कीं ॥ ४६ ॥ 
तो येथींचें तुमचे अन्न । न सेवी मागतो भिक्षाकदन्न ।
आम्हीं पुसतां म्हणतो नेम । माझा ऐसा आहे कीं ॥ ४७ ॥
आम्ही सारितों येथें भोजन । म्हणोनि न मिळे त्या पक्वान्न । 
यास्तव कोरडें मागूनि धान्य । नेत आहे महाराजा ॥ ४८ ॥
ऐसें बोलतां सकळ ग्रामस्थ । त्यांसी म्हणे नागनाथ ।
मागूं येतील जे गांवांत । करा श्रुत मजलागीं ॥ ४९ ॥
त्यांसी कांहीं न टाकून । श्रुत करावें मजकारण ।
मग मी जाऊनि ग्लानित वचनें । भोजन घालीन तयांसी ॥ ५० ॥
परी आणिक एक अर्थ । कोरडें अन्न न्या गृहांत । 
येरु येईल जंव भिक्षेतें । तेंचि अन्न वाढावें ॥ ५२ ॥
ऐसें पांच पन्नासांसी । नाथें सांगितलें भाविकांसी ।
जे कदाकाळीं कार्यासी । ढळणार नाहींत निश्र्चयें ॥ ५३ ॥
ऐेसें सांगूनि सिद्धिअन्न । त्यांतें दिधलें वस्त्रीं बांधून ।
मग आपुल्या गृहीं जाऊन । वाट पहात बैसले ॥ ५४ ॥
तों श्रीदत्तात्रेय अत्रिसुत । भिक्षेसी आले अकस्मात । 
तंव ते सिद्धिअन्न घेऊनि हातांत । सन्मुख येती घालावया ॥ ५५ ॥
म्हणती महाराजा आम्ही दीन । आमुचे गृहीं कैंचें अन्न ।
परी नागनाथ कृपाकरुन । देतो अन्न आम्हांसी ॥ ५६ ॥
तरी त्या भिक्षेंत भिक्षा चोज । तुम्हां वाढावें धर्मकाज ।
ऐसें बोलती ते सहज । श्रुत कराया दत्तासी ॥ ५७ ॥
परम चतुर विचक्षण । परीक्षा घेती श्रुत करुन ।
परी तो त्रैदेवांचा अंश हें ऐकून । भिक्षेलागीं आतळेना ॥ ५८ ॥
मागें पाऊल तत्काळ ठेवून । जाता होय अत्रिनंदन ।
मग ते आपुले गृहींचें अन्न । घेऊनियां धांवती ॥ ५९ ॥
म्हणती महाराजा नागनाथाचें अन्न । आपणां न वाटे चित्तीं प्रसन्न ।
तरी आमुचे कष्टा चित्त देऊन । विन्मुख होऊं नका जी ॥ ६० ॥
ऐसें सांगूनि भिक्षा देती । तो घेत नाहीं प्रांजळ चित्तीं । 
मग लगबगें हेर जाती । श्रुत करिती नाथासी ॥ ६१ ॥
नाथासी होतां श्रुत मात । शीघ्र  चपळत्वें येत धांवत । 
निकट येतां हस्तसंकेते । हेर दाविती तयासी ॥ ६२ ॥              
तोही हस्तसंकेतेखुणें । अत्रिसुताच्या निकट जाऊन । 
प्रथम करें कर कवळून । चरणीं माथा ठेवीतसे ॥ ६३ ॥
म्हणे महाराजा योगपती । माय तूं माउली दयाळ क्षितीं ।
तरी डावलूनि पाडसाप्रती । गुप्त कैसा विचरसी ॥ ६४ ॥
मज करुनियां निढळवान । दैन्यवंत बहुत काननीं । 
तेथें सांडूनि निष्ठुरपणीं । जासी कैसा वो माये ॥ ६५ ॥
मज बाळपणीं आपुलें चोज । दावूनियां तपोभोज । 
गेलासी टाकूनि महाराजा । मागें दृष्टी न करितां ॥ ६६ ॥
तरी मी सखया तुजवांचुनी । पडलों आहे घोर वनीं । 
मागें लक्षितां सूक्ष्मनयनीं । प्राण कंठी उरला असे ॥ ६७ ॥ 
जैसा चातक दृष्टीकरुन । वाट पाहे अंबुद सघन ।
कीं उखरीं हरिणीलागून । वाट पाहे पाडस ॥ ६८ ॥
वीस संवत्सर गेला काळ । परी चिंतावन्ही दाही तलमळ ।
तैं शांत करावया जळ । तुझें कांहीं दिसेना ॥ ६९ ॥ 
आपावेगळी आपमासोळी । तेवीं तव भेटी जीव तळमळी ।
परी माये त्वां हृदयगतकमळीं । निष्ठुर कैसें सांठविलें ॥ ७० ॥
ऐसें म्हणोनि आरंबळत । नेत्रअश्रूनीं पाद क्षालीत । 
म्हणे अंतर देऊनि मातें । गेलासी कैसा महाराजा ॥ ७१ ॥
ऐसी वदूनि ग्लानित वाणी । पूर लोटावी नेत्रजीवनीं । 
मग त्रयदेव परीक्षानयनीं । अंतरातें ओळखी ॥ ७२ ॥
चित्तीं म्हणे प्रांजलवंत । तापें तापला आहे नाथ । 
मग मस्तकाखालीं घालूनि हस्त । उठविलें महाराजें ॥ ७३ ॥
प्रेमस्नेहें कवळूनि पाणी । हृदयीं कवळिला प्रेमेंकरुनी ।
वामहस्तें कवळूनि मूर्ध्नी । नेत्रअश्रु पुसीतसे ॥ ७४ ॥
मग धरुनि शीघ्र हस्त । नेत स्वामी एकांतांत ।
कृपें मौळीं ठेवूनि हस्त । कर्णी मंत्र ओपिला ॥ ७५ ॥
देऊनि स्वमुखें आत्मखूण । केला ब्रह्मपरायण ।
अपरंपार अज्ञानपण । मुळाहून नाशिलें ॥ ७६ ॥
ऐसी होतां ब्रह्मस्थितकोटी । तत्काळ गुरुकृपें पडली दृष्टी ।
जैसें अभ्र वितुळतां शेवटीं । सुढाळ अर्क दिसतसे ॥ ७७ ॥
तेवीं पाहतां दत्तस्वरुप । मग उचंबळला आनंदकूप ।
अहा म्हणोनि बाप बाप । पदीं मौळी अर्पीतसे ॥ ७८ ॥
मग परम प्रिय अत्रिनंदनें । अंकी घेतला स्नेहेंकरुन ।
करें मुख कुरवाळून । मागील कथा निवेदी ॥ ७९ ॥
आविर्होत्र नारायण । आहेसी बा तूं महीकारण । 
उरगीकुशीं विधिवीर्यवान । जन्म तुझा होय बा ॥ ८० ॥
तरी ही ऐसी मूळकथा । मज आतुडली हृदयीं शोधितां ।
म्हणूनि बाळा तुझ्या हाता । सिद्धिकळा ओपिली ॥ ८१ ॥
तरी तुज भेटी द्यावयाकारण । इच्छीत होतें माझें मन ।
परी प्रारब्धयोगेंकरुन । आजि घडून आलें बा ॥ ८२ ॥
जें प्रकरण समयोचित । लोह-चुंबकां भेटी होत ।
कीं समुद्रक्षारऐक्यवंत । नगआवळीं होतसे ॥ ८३ ॥
तेवीं बापा तुज मज भेटी । झाली प्रारब्धयोगकांठीं ।
ऐसें म्हणोनि हृदयपुटीं । नाथालागीं धरीतसे ॥ ८४ ॥
मग उभय प्रतापवंत । निघतां सांडूनि ते एकान्त ।
ग्रामाबाहेर निघोनि त्वरित । काशीक्षेत्रीं चालिले ॥ ८५ ॥
चालिले परी ऐसे रीतीं । व्यानमंत्र प्रयोगी विभूतीं ।
नाथभाळीं चर्चूनि निगुतीं । गमन दोघे करिताती ॥ ८६ ॥
मग पवनवेगाचें गमन थकितां । वाटे ऐसे गमती उभयतां ।  
लवतां नेत्रपातियें पातां । काशीक्षेत्रीं पातले ॥ ८७ ॥
तेथें कांहींसे टेंकूनि क्षण । सारिला आपुला नित्यनेम । 
बद्रिकेदार चित्तीं धरुन । गमन करिती त्या मार्गें ॥ ८८ ॥
भाळीं प्रयोग दिव्य विभूती । व्यानरुपाची महाशक्ती ।
क्षणें बद्रिकाश्रमाप्रती । जाऊनियां पोंचले ॥ ८९ ॥
संचार करिती शिवालयांत । प्रत्यक्ष झाला उमाकांत । 
मग प्रेमआवडीं उभवूनि पर्वत । एकमेकां भेटती ॥ ९० ॥
यापरी तो उमाकांत । श्रीदत्तातें विचारीत ।
दुसरा कोण आहे भृत्य । मिळविला सेवेसी ॥ ९१ ॥
ऐसें बोलतां अनसूयासुत । म्हणे महाराजा नाम या नागनाथ ।
आविर्होत्र प्रतापवंत । नारायणअवतार ॥ ९२ ॥
ऐसें बोलतां उमारमण । दत्तासी म्हणे ऐक वचन ।
यातें सद्विद्या अभ्यासून । नाथपंथी मिळवावा कीं ॥ ९३ ॥
मग अवश्य म्हणोनि अत्रिसुत । राहता झाला षण्मास तेथ ।
सांगूनि सकळ अस्त्रविद्येप्रत । चवदा कळा चौसष्टी ॥ ९४ ॥ 
उपरी नागपत्रीं अश्र्वत्थीं नेऊन । केलें सकल सिद्धार्थसाधन । 
उपरी बद्रिकाश्रमीं जाऊन । तपालागीं बैसविलें ॥ ९५ ॥
नाथदीक्षा तत्काळ देऊनी । उन्मनी मुद्रा लेववी कानीं । 
शिंगी शैली सिद्ध करुनी । नाथालागीं ओपिली ॥ ९६ ॥ 
असो ऐशा दीक्षारुपें । द्वादश वर्षें केले तप । 
मग स्वर्गदेव मेळवूनि अमूप (भरपूर) । वरालागीं दीधलें ॥ ९७ ॥
मावदें करुनि दैदीप्यमान । तुष्ट करुनि स्वर्गींचे जन ।
बोळविले स्थानोस्थान । नाथा वर देऊनियां ॥ ९८ ॥
यावरी पुढें तो अत्रिसुत । नागनाथा बोळवीत । 
म्हणे बा रे महींचीं तीर्थें । सांगोपांग करीं कां ॥ ९९ ॥
तीर्थें अति मळीण । तयांचा मळ सांडिती संतजन ।
तस्मात् बा रे तीर्थाटन । संतमेळीं करीं कां ॥ १०० ॥
Shri Navnath BhaktiSar Adhyay 37  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सदतिसावा (३७ ) 



Custom Search

Tuesday, March 29, 2016

Shri Navanath Bhaktisar Adhyay 36 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय छत्तीसावा (३६) भाग २/२


Shri Navanath Bhaktisar Adhyay 36 
Revannath went to Swarga to bring back Prana of son of Saraswati Brahman. Yama told him that he had to follow orders from God Shiva. Hence Revannath went to Kailas. He had a war with God Shiva and hid disciples. After defeating God Shiva, God Vishnu told Revannath that he had Pranas of all seven Childs of Saraswati Brahmin who were died earlier. He gave them to Revanath. Revannath returned to Saraswati Brahmin's house and by chanting Sanjivani Mantra made alive all the Childs. Second story in this Adhyay 36 is that of Vatsidhanaganath. Vatsidhanaganath had taken birth in the comb of Padmini daughter of Takshak. Then he was brought up by Koshadharma and his wife Suradevi. At the age of 7-8 years Vatsidhanaganath was blessed by God Dattatreya. By use of the Siddhi Vatsidhanath can feed anybody with food whatever food he demands. Vatsiddhanath went to Kolhapur to meet God Dattatreya. What happens next will be told to us by Dhundisut Malu from Narahari family in the next 37th Adhyay. 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय छत्तीसावा (३६) भाग २/२
ऐसें म्हणोनि स्नेहभरित । बाळ उचलोनि हृदयीं लावीत ।
मग कोशधर्में सकल वृत्तान्त । निवेदिला कांतेतें ॥ १२१ ॥
सुरादेवीते सकळ कथन । सुरवरवाक्यासी ऐकोन ।
परम पावोनि समाधान । पालखा घालोनि हालवीत ॥ १२२ ॥
हृदयीं कवटाळितां बाळ । पयानें दाटलें कुचमंडळ ।
पान्हावोनि बाळमुखकमळ । पयोदहराग्रीं प्रेरीतसे ॥ १२३ ॥
मग तें बाळ घोंटीत क्षीर । जठराग्नीचा दाहक उबार ।
शांतवोनि शांतिपर । बाळ मिरवे देहस्थ ॥ १२४ ॥
अति लालनें स्नेहभरित । मार्जन न्हाणोनि पालखांत । 
नाम ठेविलें वटसिद्धनागनाथ । ओंव्या मंगलें गातसे ॥ १२५ ॥
मग दिवसेंदिवस रहणीं घन । सिंचन करी मोहसंजीवन ।
सुरादेवीचे पंचप्राण । निजांकुरीं लवलवती ॥ १२६ ॥
मग ती पल्लवाकार । फळ दावी भक्तिपर ।
परी तीक्ष्ण कटु व्यचहार । स्वप्नामाजी दिसेना ॥ १२७ ॥
जैसें तमारीचे गांवीं । नांदूं न शके तमाची पदवी । 
कीं कामधेनूचे कांसेठायीं । क्षुधानळें पीडिजेना ॥ १२८ ॥
तेवीं सुरादेवीचें अंतःकरण । कदा न दर्शवी भिन्न दर्शन ।
परम मोहें गेली वेष्टोन । पाषाण जेवीं शेवाळीं ॥ १२९ ॥
असो ऐसें सुखस्थित । बाळा लोटले दिवस बहुत । 
सप्तवरुषी कोशसुत । मौंजीबंधना मिरवला ॥ १३० ॥
या उपरांतिक एके दिवशीं । सोडोनियां क्षेत्र काशी । 
नागनाथ सहज खेळावयासी । भागीरथीतें पातला ॥ १३१ ॥
टळटळीत भरले दोन प्रहर । काशीविश्र्वेश्र्वराचे समोर ।
बाळ क्रीडतसे मनोहर । अर्क जेवीं दुसरा ॥ १३२ ॥
तों तेचि समयीं अकस्मात । येता झाला अत्रिसुत ।
येतांचि दृष्टी यथास्थित । बाळावरी गेलीसे ॥ १३३ ॥
तो बाळ तेजस्वी अर्कनीतीं । खेळताहे स्वस्थगतीं । 
बहु मुलें बैसवोनि पंगती । लटकेंचि अन्न वांटीतसे ॥ १३४ ॥
मुलें गड्या गड्या म्हणोन । धालों (समाधान पावलो) म्हणती सेवोनि अन्न ।
आतां पुढें वाढणें । वाढूं नको आम्हांसी ॥ १३५ ॥
परी तो तयांसी आग्रह करीत । घ्या घ्या म्हणोन वाचे वदत ।  
न घे त्यासी विनंति करीत । रसाळवाणी करुनियां ॥ १३६ ॥        
तें पाहोनियां अनसूयासुत । पाहोनि मनीं हास्य करीत ।
चित्तीं म्हणे लटक्या अन्नातें । मुलें धालों म्हणताती ॥ १३७ ॥                   
तरी आतां आपण संचरोन । मुलांलागीं द्यावें अन्न ।
मग प्रत्यक्ष बाळतनु धरोन । तयांमाजी संचरला ॥ १३८ ॥ 
बाळ अंगणी उभा राहोन । म्हणे अतीत (पाहुणा) आला तुम्हांकारणें ।
अन्न मागतो उदराकारणें । तृप्त त्यातें करावें ॥ १३९ ॥
तंव तीं मुलें तीव्रपणें । पाठी लागती वसवसोन ।
म्हणती आमुचे मंडळांत कोण । आला असे आतां खेळावया ॥ १४० ॥
कोणी दाटूनि पुढें येती । कोणी शेला उगारिती ।
कोणी पाषाण घेती हातीं । जातोसि कीं मारुं तुज ॥ १४१ ॥
ऐसीं मुलें दाविती चिन्ह । तें श्रीनागनाथें पाहोन ।
सकळ मुलांची इच्छा पाहोन । वारिता झाला स्वहस्तें ॥ १४२ ॥
म्हणे गडे हो ऐका वचन । आपण बैसलों सेवूं अन्न ।
त्यांत अतीत आला जाण । त्यांसी दवडूं नये कीं ॥ १४३ ॥
पहा आपुले घरीं सांगे पिता । विन्मुख कोणी न व्हा अतीता ।
तैसाचि आपण भिक्षुक मागता । आला आहे समयासी ॥ १४४ ॥
काढोनि अंगावरील चीर । अंग पुसीतसे आपुले करीं  ।
गंध लावी भाळावरी । शुष्कपूजा करीतसे ॥ १४५ ॥
तरी अतीताचें करुनि पूजन । पोटभरी घालावें अन्न ।
प्रत्यक्ष नाथ करीं धरोन । बाळें अंगणीं बैसविला ॥ १४६ ॥
लटकेंचि कल्पनेंचें करुन जीवन । तया अतीता घालितां स्नान ।
हस्तपादावरी फिरवून । करिती क्षालन अंगाचें ॥ १४७ ॥
लटकें मनाचें करुनि सुमन । हार गुंफिला कल्पनेकरुन ।
तो अतीताचे गळा घालोन । लटका धूप दाविती ॥ १४८ ॥       
भावपूर्वक लावोनि नयन । ऐक्य करिती पंच प्राण ।
परी सहजदृष्टीतें ज्ञानपण । आरती करिती अतीताची ॥ १४९ ॥
मग लटकेंचि पात्र पुढें ठेवून । कल्पूनि लटिकें आणूनि वाढिती अन्न ।
मग उभय हस्त जोडून । प्रार्थना करिती अतीताची ॥ १५० ॥
नम्र वाचा रसाळ वचन । म्हणती स्वामी सेवा अन्न । 
वारंवार नमस्कार करोन । आणीक वाढूं म्हणताती ॥ १५१ ॥
ऐसें आदराचें चांगुलपण । पाहूनियां अत्रिनंदन । 
चित्तीं म्हणे प्रज्ञावान । बाळ सुशीळ आहे हा ॥ १५२ ॥
उदारबुद्धीं तृप्ती करुन । वर्तताहे दातृत्वपणें । 
हें तों पूर्वींचे योगदृष्टीकरोन । योग्यावांचूनि घडेना ॥ १५३ ॥
सुशब्द आणि विवेकशांती । विचरे जयाचे देहाप्रती । 
तरी पूर्वींचा योगभ्रष्टगती । योग्यावांचूनि घडेना ॥ १५४ ॥
स्नान आणि हरणी स्थिती । याचक आर्तवान बहुत युक्ती । 
तरी पूर्वींची योगश्रेष्ठ गती । योग्यावांचूनि घडेना ॥ १५५ ॥
उदारबुद्धि धार्मिकस्थिती । विचार रसाळ सर्वांप्रती ।
दुःख न देणें परांप्रतीं । हें योग्यावांचूनि घडेना ॥ १५६ ॥
ऐसें चित्तीं अवगमून (समजून) । शोधी तयाचा पूर्वजन्म । 
तों आविर्होत्र नारायण । निजमानसीं भासला ॥ १५७ ॥     
मग कृपासिद्धि करुनि युक्तीं । देता झाला तयाचे हातीं ।
जे जे वदे वाणी निश्र्चितीं । ते ते पदार्थ मिरवावे ॥ १५८ ॥
मग परम होऊनि हर्षयुक्त । म्हणती हा एक उदेला महीनाथ ।
समीप बोलावोनि त्यातें । हस्त धरी तयाचा ॥ १५९ ॥
उपरी कर्णीं सांगे मात । भोजन घालीं सकळ मुलांतें ।
परी तूं न सेवीं सिद्धिअन्नातें । कदाकाळीं बाळका रे॥ १६० ॥
नाथ आग्रहें त्या वाढीत । तरी तें पात्र मिरवे अति अद्भुत । 
ज्या पदार्थाचें नाम वदत । तो पदार्थ मिरवे पात्रावरी ॥ १६१ ॥
मग तीं बाळें अज्ञानपणें । साचोकारीं करिती भोजन ।
ऐसे लोटले बहुत दिन । नित्य खेळ खेळताती ॥ १६२ ॥
स्वनाम सांगूनि अत्रिनंदन । चालता झाला पुसोनि नाम ।
येरीकडे पंक्ती बैसवोन । भोजनखेळी खेळती ॥ १६३ ॥
आपुलाले गृहीं जाऊन । सेविती कांहीं किंचित अन्न । 
ते चाटीबोटीकरुन । अन्न नासिती विखुरती ते ॥ १६४ ॥
येथें यथेष्ट इच्छेसमान । सर्व पदार्थ षड्रसान्न ।
मग तें गृहींचें कदन्न । तुच्छपणीं वाटलें त्यां ॥ १६५ ॥
जे ब्रह्मरुप रसातें धाले । आपपर सकळ विसरले । 
ते मायाद्वैतकांजीसी बैसले । लाळ घोंटीत सेवावया ॥ १६६ ॥
कीं हाटकतगट जडावासी । नवरत्नकोंदण त्या भूषणासी ।
ते काय करुनि काचमण्यासी । स्पर्शित होतील चित्तांत ॥ १६७ ॥
कीं सुरंगरंगीं धाममंचकीं । कुसुमगंधागरु सेवितां थोर कीं ।
तो त्यजूनि दुर्गंध लोकीं । गल्लीमाजीं पडेल कीं ॥ १६८ ॥
तन्नायें मुलें सकळ । सेविती षड्रसान्नातें अमळ । 
तयां गृहींचें कदन्न केवळ । मिष्ट कांहीं लागेना ॥ १६९ ॥
मग ते तयांचे तात मात । गृहीं मुलांसी पुसती यथार्थ । 
तेही वदती प्रांजलवंत । षड्रस खेळ अन्नाचा ॥ १७० ॥
म्हणती तुम्ही दरिद्रपणीं । सेवितां कदन्न कांजीपाणी ।
आम्ही नित्य सुरनदीवरी जाऊनी । षड्रस अन्न सेवितों ॥ १७१ ॥
तंव ते असत्य मानूनि चित्तीं । गुप्तवेषें दुरुनि पाहाती ।
सरितातीरीं बैसवोनि पंक्ती । नागनाथ वाढीतसे ॥ १७२ ॥
मग ती चर्चा सर्वांगृहीं । प्रकट झाली सर्वदेहीं । 
मग कोशधर्मासी सर्वही । सुचविती अर्थातें ॥ १७३ ॥
म्हणती विप्रा तव नंदन । स्वर्गसरिते नित्य जाऊन ।
अपार पंक्ती बैसवून । षड्रसान्न वाढीतसे ॥ १७४ ॥
आम्ही प्रत्यक्ष पाहूनि दृष्टीं । बोलतों तूतें वाग्वटीं ।
पात्रेंविण उभय करपुटीं । इच्छान्न वाढीतसे ॥ १७५ ॥
नेणो कैशी करितो गती । उगला हात ठेवितो क्षितीं ।
पदार्थविवरणा वाचेप्रती । होतां पदार्थ मिरवत ॥ १७६ ॥
ऐसें ऐकोनि कोशधर्म । आठवीं केलें सुरवरांचें वचन ।
कीं पुढें पावोनि सिद्धकर्म । सिद्धनामें मिरवेल हा ॥ १७७ ॥
ऐसी खूण जाणूनि चित्तीं । म्हणे आश्र्चर्य दावी लोकांप्रती ।
ऐंसें कोणासही या क्षितीं । घडूनि येत नसे कीं ॥ १७८ ॥
धिक्कार करुनि म्हणे तयांचा । बाळ विकारी असत्य वाचा ।
एके दिवशीं हस्त सुताचा । धरुनि बैसवी अंकासनीं ॥ १७९ ॥
घेऊनियां मुखचुंबन । आणि कुरवाळी हस्तें वदन ।
म्हणे बा रे मुलांकारणें । भोजन घालिसी कैसें तूं ॥ १८० ॥
ऐसें पुसतां कोडेंकरुन । तोही दाटला स्नेहेंकरुन ।
तातासी म्हणे भोजन । तैसेंचि घालितों आतां मी ॥ १८१ ॥
अंकींहूनि तत्काळ उठोन । क्षितीं हस्त ठेवी पात्र म्हणोन ।
तंव ते प्रत्यक्ष पात्रीं दिसे अन्न । कोशधर्म पहातसे ॥ १८२ ॥
उपरी बहुधा प्रत्यक्षपणीं । तंव ते पदार्थ दिसती नयनीं ।
खाद्यें उपजलीं हें पाहोनी । मनीं आश्र्चर्य मानिलें ॥ १८३ ॥
मग मान तुकवूनि कोशधर्म । म्हणे बाळा होतें कैसें कर्म ।
प्रसन्न झालें त्याचें नाम । मजलागीं सांगावें ॥ १८४ ॥
यावरी म्हणे ताता ऐक । आमुचे खेळीं आलें बालक ।
तेणें सांगितलें कौतुक । तें तुजप्रती सांगतो ॥ १८५ ॥
तेणें माझा हस्त धरोन । उगाचि कान फुंकोन ।
मौळीं हस्त ठेवोन । वाढावया लाविलें ॥ १८६ ॥
परी तें पोर आमुचे मेळीं । सहज रीतीं आलें खेळीं ।
परी त्या पोरीं करोनि रळी (भांडण) । वारिलें म्यां सकळांते ॥ १८७ ॥
उपरी मीं त्या मुलाकारणें । तोषविलें मोठ्या गौरवानें । 
जैसें तुम्ही अतीताकारणें । गौरवीतसां महाराजा ॥ १८८ ॥
लटकमटक स्नानभोजन । सारुनि तयाचे पूजिले चरण ।
नमस्कारुनि ते देखोन । बोळविला महाराजा ॥ १८९ ॥
ऐसें ऐकोन कोशधर्म । आल्या अतीता धरोनि नेम ।
बाळाहातीं अतीतपूजा करोन । तुष्टचित्तें बोळवी ॥ १९० ॥
ऐसा पाहोनि विप्रनेम । परम संतोषला दत्तात्रेयनाम ।
चित्तीं म्हणे मार्ग सुगम । बाळालागीं लाधला ॥ १९१ ॥
तेणेंकरुनि सकळ क्षेत्रांत । कीर्ति वाढली असंभावित ।
महासिद्ध नारायणनाथ । कितीकांनीं आराधिला ॥ १९२ ॥
मग शतानुशत सहस्त्र पंक्ती । षड्रस अन्नें सेवोनि जाती ।
बहुतांचीं कार्यें होती । कनक-धन-वसना पावती ते ॥ १९३ ॥
मग जिकडे तिकडे नागेशसिद्ध । कीर्ति वानिती जन प्रसिद्ध ।
पंचविषयां संतोषोनि सिद्ध । इच्छिले कामा फळतसे ॥ १९४ ॥
मग अंगी आलें शहाणपण । देहाचे गेलें अज्ञानपण ।
एके दिवशीं ब्रह्मनंदन । ताताजवळी बैसला ॥ १९५ ॥
तातासी म्हणे महाराज । मम हातें पुरे जगाची चोज ।
तरी कवणे अर्थीं जगाचे काज । कवण्या अर्थें फलतसे ॥ १९६ ॥
दत्तात्रेय नामें बाळवेष । बाळपणीं भेटला आम्हांस ।
तरी कोण महापुरुष । प्रतापी बळें आगळा ॥ १९७ ॥
तात म्हणे तो दत्तात्रेयमुनी । त्रयदेवांचा अवतार भुवनीं ।
सुफळ प्रारब्धें गेला भेटोनी । तुजलागीं पाडसा ॥ १९८ ॥
नागेश म्हणे आतां परतोन । कैसा भेटेल अत्रिनंदन ।
हें सांगें मजलागून । निवेदन करी महाराजा ॥ १९९ ॥
याउपरी बोले कोशधर्म । बाळा तयाची भेटी दुर्गम ।
तो एकें ठायीं नसे नेम । अनेक क्षेत्रीं हिंडतसे ॥ २०० ॥
कोल्हापुर पांचाळेश्र्वर । काशीक्षेत्र मातापुर ।
ऐसीं हिंडतां अनेक क्षेत्रें । कोठे पहासी पाडसा ॥ २०१ ॥
परी प्रारब्धयोगेंकरोनी । भेटतसे दत्तात्रेयमुनी ।
यत्न केल्या भेटीलागुनी । आतुडेना बाळका ॥ २०२ ॥
जैसा कल्पतरु चिंतामणी । निधीपरीस लावण्यखाणी ।
बा रे नातुडे यत्नेंकरोनी । अवचटपणीं मिळती ते ॥ २०३ ॥
तेचि रीतीं अत्रिनंदन । प्राप्त नव्हे यत्नेंकरुन । 
ऐसें सांगूनि कोशधर्म । बाहेर गेला कार्यासी ॥ २०४ ॥
येरीकडे नागनाथ । हृदयीं आपुले विचारीत ।
कीं ऐसा रवि सनाथवंत । निजदृष्टीनें पाहावा ॥ २०५ ॥
परी पांचाळेश्र्वरीं मातापुरीं । जाऊनि शोधावें कोल्हापुरीं ।
जेथें जेथे वास धरित्रीं । तेथें तेथें शोधावें ॥ २०६ ॥
मग पुसोनि मातेसी । निघता झाला मुनिशोधासी ।
मातापुरादि पांचाळेश्र्वरासी । पाहूं पातला कोल्हापुरीं ॥ २०७ ॥
क्षेत्र कोल्हापुरीं संचरोन । पुसता होय जनांकारणें ।
कीं येथें तो अत्रिनंदन । कोणे ठायीं रहातसे ॥ २०८ ॥
ऐसें ऐकोनि लोक हांसती । वेड लागलें तूतें म्हणती ।
अवधूत येतसे क्षेत्राप्रती । तो कोणा प्रकट नव्हे रे ॥ २०९ ॥
कोण्या स्वरुपीं येथें येऊनी । जात आहे भिक्षा मागोनी ।
ऐसें जनाचे बोल ऐकोनी । प्रत्युत्तर त्यां देतसे ॥ २१० ॥
म्हणे येथें भिक्षेकारणें । येत आहे अत्रिनंदन ।
तरी अन्य क्षेत्रीं भिक्षा मागणें । तया घडत नाहीं कीं ॥ २११ ॥
येर (इतर लोक) म्हणती त्यासी । भिक्षा मागावी कोल्हापुरासी । 
याव्यतिरिक्त अन्य क्षेत्रासी । अन्न न सेवी मागोनी ॥ २१२ ॥
अन्य क्षेत्रीं तया अन्न । चित्तीं न वाटे सुढाळपण ।
यासम कैसें ग्राम आन । पुण्यक्षेत्र हें असे ॥ २१३ ॥
ऐसें क्षेत्र पुण्यपावन । जरी या गांवीं न मिळे अन्न ।
तरी उपवास करी अत्रिनंदन । परी अन्य क्षेत्रीं सेवीना ॥ २१४ ॥   
अरे या गांवींचें शाकपात्र (भाजीचें पान) । मानीत आहे परम पवित्र । 
परी अन्य गांवींचें पक्वान्न स्वतंत्र । विटाळापरी मानीतसे ॥ २१५ ॥ 
जैसें एकपत्नी नरा । कुरुप असेल जरी दारा ।
तरी तीच भोगी व्यभिचारा । लावण्यलतिका आकळीना ॥ २१६ ॥          
कीं विप्रकरींचें कदन्न । सोडूनि शूद्राचें षड्रस अन्न ।
सेवील काय प्रसिद्ध ब्राह्मण । मनें देवता न वरीच ॥ २१७ ॥
तेवीं दत्त क्षेत्र हें सोडून । कदा न पाहे अन्य ग्राम । 
ऐसे त्या जनाचे बोल ऐकोन । विचार करी मग नाथ ॥ २१८ ॥
चित्तीं म्हणे करोनि पाकाग्नी । ग्रामांत पेटूं न द्यावा अग्नी ।
सकळ क्षेत्रा भोजन घालोनी । पाठवावें गृहीं गृहीं ॥ २१९ ॥
मग तो स्वामी येतां भिक्षेसी । कोठोनि अन्न वाढिती त्यासी । 
मग सहजचि स्वकीर्तिसी । आपणापासीं येईल कीं ॥ २२० ॥
येईल परी सिद्ध अन्न । घेणार नाहीं भिक्षेलागून ।
हेचि ओळखी जाणोनि खूण । पाय वंदावे तयाचे ॥ २२१ ॥
आणिक माझें विचारुनि नाम । गेला आहे योगद्रुम ।
तरी तोही भेटेल कृपेंकरोन । नामाभिधान ऐकोनी ॥ २२२ ॥
आणि मजही गेला सांगोनि जाण । कीं सेवूं नको सिद्धान्न ।
आणिकांतें घाली भोजन । तुष्ट करीं क्षुधार्थी ॥ २२३ ॥
ऐसी सांगूनि गेला मात । तो सेविणार नाहीं सिद्धान्नातें ।
ऐसा उपाय योजूनि चित्तांत । लक्ष्मीदेउळीं संचरला ॥ २२४ ॥
भेटूनि पुजारियासी । ओवरी एक रहावयासी । 
मागूनि घेत अति प्रीतीसीं । बंदोबस्तीं नेटकी ॥ २२५ ॥
परी तो पुजारी भक्तिवान । अतीतपूजा करीन । 
नित्य पंक्तीसी घेवोन । भोजनातें सारीतसे ॥ २२६ ॥
ऐसे लोटतां कांहीं दिवस । पाचारुनि पुजार्‍यास । 
म्हणे माझे आहे मनास । ग्रामभोजन घालावें ॥ २२७ ॥
परी तुम्हीं साह्य होवोनि मातें । खटपटीसह सारावें कृत्य ।
तंव तो हांसूनि बोले त्यातें । फार बरें आहे जी ॥ २२८ ॥
आम्ही खटपट करुं सघन (मोठी) । परी तुम्हांपासीं कोठें अन्न ।
उगेंचि कैसें ग्रामभोजन । सबळ सामर्थ्य असावें ॥ २२९ ॥
नाथ म्हणे ऐका वचन । सर्व सामग्री ठेविली करोन ।
परी खटपटीची आंगवण । करा कार्य सिद्ध हें ॥ २३० ॥
मग तो अवश्य म्हणोनि त्यातें । बोले आपुचें काय जातें ।
पुण्यासाठीं धर्मकृत्य । घडोनि येतें आम्हांसी ॥ २३१ ॥
ऐसें बोलोनि नाथातें । पुजारी गेला स्वकार्यातें ।
येरीकडे ओवरींत । काय करी महाराजा ॥ २३२ ॥
कोरडे अन्नाचें घेवोनि नाम । क्षितीसी ठेवी करपद्म ।
तों धान्यराशी पर्वतासमान । तया ठायीं बैसल्या ॥ २३३ ॥
ऐशापरी अपार राशी । निर्मिता झाला स्वकरेंसीं ।
घृतस्नेहादि सांठवणासी । ओवरीमाजी विराजवीत ॥ २३४ ॥
मग येवोनि पुजार्‍याचे सदनीं । आणिला करीं कवळोनी ।
ओवरीमाजी शीघ्रगती नेवोनी । सिद्धाश्रम दाविला ॥ २३५ ॥
यावरी आतां पुढें कथन । अन्नछत्रीं इच्छेसमान । 
श्रीनागेंद्र सिद्ध करोन । भेट घेईल दत्ताची ॥ २३६ ॥
तरी ती कथा सुधाकर । पुढें सेवा श्रवणद्वारें ।
धुंडीसुत मालू सुरस । हरिकृपें सांगेल कीं ॥ २३७ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । षट्त्रिंशतितमाध्याय गोड हा ॥ २३८ ॥
श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ 
॥ श्रीनवनाथभक्तिसार षट्त्रिंशतितमाध्याय संपूर्ण ॥ 
Shri Navanath Bhaktisar Adhyay 36 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय छत्तीसावा (३६) 



Custom Search