Friday, December 30, 2016

Samas Pachava Rajogun Lakshan समास पाचवा रजोगुण लक्षण


Dashak Dusara Samas Pachava Rajogun Lakshan 
Samas Pachava Rajogun Lakshan is in Marathi. Samarth Ramdas is telling us qualities of Rajogun. We all are having these qualities more or less in our nature and behaviour. We give importance to our body, name and live in the world of haves, wants and desires. These are because we have Rajogun in our nature. The Rajogun dominates our life and we rarely think beyond our material life.
समास पाचवा रजोगुण लक्षण
श्रीराम ॥
मुळीं देह त्रिगुणाचा । सत्वरजतमाचा ।
त्यामध्यें सत्वाचा । उत्तमगुण ॥ १ ॥
अर्थ 
१) आपला देह मुळांत सत्व, रज व तम या तीन गुणांचा बनला आहे,  त्यांत सत्व गुण हा उत्तम आहे.
सत्वगुणें भगवद्भक्ती । रजोगुणें पुनरावृत्ती ।
तमोगुणें अधोगती । पावती प्राणी ॥ २ ॥    
श्र्लोक 
ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः ।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥
श्र्लोकाचा अर्थ
सत्वप्रधान माणसे वरच्या गतीस जातात. रजोगुणप्रधान माणसे मध्येंच राहतात. तर 
तमोगुण प्रधान माणसे खाली-अधोगतीस जातात.  
२) सत्वगुणाने भगवंताची भक्ती होते. रजोगुण अंगी जास्त असेल तर पुनरपी जननं पुनरपी मरणं आणि तमोगुण अधिक असेल तर मनुष्यमात्रांची अधोगतीच होते.  
त्यांतहि शुद्ध आणी सबळ । तेहि बोलिजेति सकळ ।
शुद्ध तेंचि जें निर्मळ । सबळ बाधक जाणावें ॥ ३ ॥
३) गुणांमध्ये शुद्ध व शबल असा भेद आहे. तो सगळा सांगणारच आहे. जे जे निर्मळ ते ते शुद्ध असते. जे जे मिश्रित असते ते ते शबल म्हणतात. 
शुद्धसबळाचें लक्षण । सावध परिसा विचक्षण ।
शुद्ध तो परमार्थी जाण । सबळ तो सांसारिक ॥ ४ ॥
४) शुद्ध व शबल यांची लक्षणे विचारवंतानी सावधपणें ऐकावित. शुद्ध हा परमार्थी तर शबळ हा संसारिक असतो. 
तया संसारिकांची स्थिती । देहीं त्रिगुण वर्तती ।  
येक येतां दोनी जाती । निघोनियां ॥ ५ ॥
५) प्रापंचिक मनुष्याजवळ तीनही गुण असले तरी एक गुण प्रबळ झाला म्हणजे बाकी दोन मागे पडतात.
रज तम आणि सत्व । येणेंचि चाले जीवित्व ।
रजोगुणाचें कर्तुत्व । दाखऊं आतां ॥ ६ ॥    
६) माणसाचे जीवन सत्व, रज व तम या तीन गुणांवरच चालते. आता आपण रजोगुणाचे काम मानवी जीवनांत कसें चालते, ते बघू.  
रजोगुण येतां शरीरीं । वर्तणुक कैसी करी । 
सावध होऊनी चतुरीं । परिसावें ॥ ७ ॥
७) माणसाच्या शरीरांत रजोगुण प्रबल झाला की तो कसा वागतो, त्याची वर्तणुक कशी होते ? ते आता शहाण्यांनी लक्षपूर्वक ऐकावे.
माझें  घर माझा संसार । देव कैंचा आणिला थोर ।
ऐसा करी जो निर्धार । तो रजोगुण ॥ ८ ॥
८) हे घर माझे, हा संसार माझा मग येथे देव कोठून आला. असा ज्याचा विचार असतो, त्या ठिकाणी त्याच्याजवळ रजोगुण प्रबळ झालेला असतो.  
माता पिता आणि कांता । पुत्र सुना आणि दुहिता । 
इतुकियांची वाहे चिंता । तो रजोगुण ॥ ९ ॥
९) आपल्या कुटुंबांतील लोकांचीच म्हणजे आई, वडिल, पत्नी, मुल-मुली व सुना यांचीच जो काळजी घेतो तो रजोगुणी समजावा. 
बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें ।
दुसर्‍याचें अभिळाषावें । तो रजोगुण ॥ १० ॥
१०) आपण (व आपल्या कुटुंबांतील लोकांनी) चांगले खावे, चांगले प्यावे, चांगले अंगावर घ्यावे, चांगले नेसावे आणि दुसर्‍याच्या वस्तू आपल्याला कशा मिळतील असा विचार करावा तो रजोगुणी समजावा.     कैंचा धर्म कैंचे दान । कैंचा जप कैंचे ध्यान ।
विचारीना पापपुण्य । तो रजोगुण ॥ ११ ॥
११) धर्म कसला व दान कसले ; जप व ध्यान कसले तसेच ज्याच्याजवळ पाप-पुण्याचाही विचार नाही, तो रजोगुणी ओळखावा.
नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतीत अभ्यागत ।
अनाचारीं मनोगत । तो रजोगुण ॥ १२ ॥ 
१२) तीर्थ यात्रा करणे नाही, व्रत करणे नाही. अतिथि किंवा अभ्यागताबद्दल आदर नाही. मनाची ओढ अनाचाराकडे, असा तो रजोगुण समजावा.  
धनधान्याचें संचित । मन होये द्रव्यासक्त ।
अत्यंत कृपण जीवित्व । तो रजोगुण ॥ १३ ॥ 
१३) धन-धान्याची सांठवणूक करणे, मन अत्यंत द्रव्यासक्त आणि अत्यंत कंजुषीचे वर्तन असा तो रजोगुणी ओळखावा.
मी तरुण मी सुंदर । मी बलाढ्य मी चतुर ।
मी सकळांमध्यें थोर । म्हणे तो रजोगुण ॥ १४ ॥ 
१४) मी तरुण, मी सुंदर, मी बलिष्ठ, मी चतुर, मी सगळ्यामध्ये थोर असे जो म्हणतो तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.
माझा देश माझा गांव । माझा वाडा माझा ठाव ।
ऐसी मनीं धरी हांव । तो रजोगुण ॥ १५ ॥ 
१५) माझा देश, माझा गांव, माझा वाडा, माझे राहण्याचे ठिकाण ऐवढ्याचाच अभिमान याशिवाय बाकी कशालाच ओळखत नाही. तो रजोगुणी म्हणुन ओळखावा. 
दुसर्‍याचें सर्व जावें । माझेंचि बरें असावें । 
ऐसें आठवे स्वभावें । तो रजोगुण ॥ १६ ॥ 
दुसर्‍याचे सर्व जावे माझे मात्र चांगलेच असावे. असा विचार जो करतो, तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.  
कपट आणि मत्सर । उठे देहीं तिरस्कार ।
अथवा कामाचा विकार । तो रजोगुण ॥ १७ ॥ 
१७) मनांत कपट, मत्सरी विचार देहामध्यें कामुकता आणि दुसर्‍याचा तिरस्कार किंवा त्याच्याबद्दल तुच्छतेची भावना ज्याचे अंगी तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.    
बाळकावरी ममता । प्रीतीनें आवडे कांता ।
लोभ वाटे समस्तां । तो रजोगुण ॥ १८ ॥ 
१८) ज्याला मुलांबद्दल ममता असते, बायकोबद्दल प्रेम असते, सर्वांवर (कुटुंबियांवर) ज्याचा लोभ असतो. तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.  
जिवलगांची खंती । जेणे काळें वाटे चित्तीं ।
तेणें काळें सीघ्रगती । रजोगुण आला ॥ १९ ॥
१९) आपल्या नातेवाईकांबद्दल काळजी वाटते व दुःख होते. तेव्हां रजोगुण त्याच्या ठिकाणी प्रबळ झालेला असतो, तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.     
संसाराचे बहुत कष्ट । कैसा होईल सेवट ।
मनास आठवे संकट । तो रजोगुण ॥ २० ॥ 
२०) संसार करण्यांत, सांभाळण्यांत बरेच कष्ट आहेत. तो शेवटपर्यंत कसा निभावून नेऊ या विचारांनी मनांत चिंतारुपी संकट ओढवते. तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.  
कां मागें जें जें भोगिलें । तें तें मनीं आठवलें ।
दुःख अत्यंत वाटलें । तो रजोगुण ॥ २१ ॥ 
२१) आपल्या मागील काळांत जे चांगले सुखाचे भोग भोगले ते आठवून आता ते नाहीत म्हणून दुःख होऊ लागले की तो रजोगुणी म्हणुन ओळखावा. 
वैभव देखोन दृष्टी । आवडी उपजली पोटीं ।
आशागुणें हिंपुटी । करी तो रजोगुण ॥ २२ ॥
२२) वैभव बघितले आणि ते दुसर्‍याचे असले तरी आवडले आणि ते आपले व्हावे अशी इच्छा निर्माण झाली व ते मिळत नाही म्हणुन दुःखी होतो, तो रजोगुणी होय. 
जें जें दृष्टी पडिलें । तें तें मनें मागितलें ।
लभ्य नस्तां दुःख जालें । तो रजोगुण ॥ २३ ॥
२३) जें दिसले तें तें आपले व्हावे असे मनांत वाटले. परंतु ते लभ्य होणार नाही, म्हणून दुःखी होतो तो रजोगुणी ओळखावा.  
विनोदार्थी भरे मन । श्रृंघारिक करी गायेन ।
राग रंग तान मान । तो रजोगुण ॥ २४ ॥
२४) जो विनोदीवृत्तीने भरलेला असतो व ती व्यक्त करतो. जो शृगांरिक गाणी गातो. राग, रंग, ताना आणि हावभाव यांनी गायनां रंगून जातो. तो रजोगुणी समजावा.
टवाळी ढवाळी निंदा । सांगणें घडे वेवादा ।
हास्य विनोद करी सर्वदा । तो रजोगुण ॥ २५ ॥
२५) जो सदा दुसर्‍याची टवाळी, निंदा, चेष्टा करतो. बोलण्याने वादंग व वादविवाद निर्माण करतो. नेहमी हास्यविनोदांत मग्न असतो. तो रजोगुणी असतो.   
आळस उठे प्रबळ । कर्मणुकेचा नाना खेळ ।
कां उपभोगाचे गोंधळ । तो रजोगुण ॥ २६ ॥
२६) जो अतिशय आळशी असतो. नाना करमणुकीच्या खेळांत दंग असतो. व्यसनाधीनतेने गोंधळ घालतो. तो रजोगुणी समजावा. 
कळावंत बहुरुपी । नटावलोकी साक्षपी ।
नाना खेळी दान अर्पी । तो रजोगुण ॥ २७ ॥
२७) जो कलावंत असतो. निरनिराळी सोंगे वठवितो. नाटके करणे व पाहाणे याचा शौकीन असतो. नाना प्रकारच्या जुगारांत पैसा घालवितो. तो रजोगुणी समजावा.
उन्मत्त द्रव्यावरी अति प्रीती । ग्रामज्य आठवे चित्तीं ।
आवडे नीचाची संगती । तो रजोगुण ॥ २८ ॥
२८) जोअमली पदार्थांचा व्यसनी असतो. गांवगुंडगीरीचे सारखे चिंतन आणि ज्याला नीच माणसांची संगत आवडते. तो रजोगुणी ओळखावा. 
तश्करविद्या जीवीं उठे । परन्यून बोलावें वाटे ।
नित्य नेमास मन विटे । तो रजोगुण ॥ २९ ॥
२९) चौरविद्या शिकावी असे वाटते. दुसर्‍याचे दोष, कमीपण उघड करावेसे वाटते. नित्य नेमाने कांही चांगले करण्याचा कंटाळा येतो. तो रजोगुणी म्हणुन समजावा.   
देवकारणीं लाजाळु । उदरालागीं कष्टाळु । 
प्रपंची जो स्नेहाळु । तो रजोगुण ॥ ३० ॥
३०) देवादिकाचे काम करण्याचा कंटाळा असतो. परंतु पोटपूजेसाठी कष्ट करतो. संसारांत, प्रपंचात सदा गुंतलेला असतो, तो रजोगुणी जाणावा.
गोडग्रासी आळकेपण । अत्यादरें पिंडपोषण ।
रजोगुणें उपोषण । केलें न वचे ॥ ३१ ॥
३१) गोड खाण्याची अतिआवड असते. शरिराचे पोषण मोठ्या प्रेमाने करतो. रजोगुणी असल्याने कोठचेही उपवास करु शकत नाही. असा तो रजोगुणी ओळखावा.   
श्रृंगारिक तें आवडे । भक्ति वैराग्य नावडे ।
कळालाघवी पवाडे । तो रजोगुण ॥ ३२ ॥
३२) स्वाभाविकपणें शृंगारिक विषयांची आवड/ओढा असतो. भक्ति, वैराग्य हे आवडत नाही. कलेचे/कलावंतांचे मोठ्या आवडीने कौतुक करतो, तो रजोगुणी असतो.
नेणोनियां परमात्मा । सकळ पदार्थीं प्रेमा ।
बळात्कारें घाली जन्मा । तो रजोगुण ॥ ३३ ॥
३३) परमात्मा जाणत नाही. त्यावर प्रेम नसते. सर्व दृष्य वस्तुंवर मात्र प्रेम असते. परत जन्म नको वाटत असले तरी त्याच्याच बळजबरीने तो घ्यावा लागतो. तो रजोगुण ओळखावा.     
असो ऐसा रजोगुण । लोभें दावी जन्ममरण ।
प्रपंची तो सबळ जाण । दारुण दुःख भोगवी ॥ ३४ ॥
३४) तर रजोगुण हा असा आहे. मन आसक्तींत ठेवतो. परिणामी जन्ममरण भोगावयास लावतो. प्रपंचतांत बलवान असल्याने फार दुःख भोगावयास लावतो. 
आतां रजोगुण हा सुटेना । सांसारिक हें तुटेना ।
प्रपंची गुंतली वासना । यास उपाय कोण ॥ ३५ ॥
आतां हा रजोगुण कांही सुटत नाही. प्रपंचांतुन सुटका नाही. संसारसुखाचा मोह, वासना सुटत नाही. मग याला उपाय काय (जेणें करुन भगवंताच्या भक्तींत मन गुंतेल.)   
उपाये येक भगवद्भक्ती । जरी ठाकेना विरक्ती ।
तरी येथानुशक्ती । भजन करावें ॥ ३६ ॥
३६) याला उपाय भगवत्भक्ती करणे. प्रपंचांतुन विरक्ती साधत नसेल तरीही आपल्या शक्तीनुसार भजन करावे.
काया वाचा आणि मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें ।
ईश्र्वरीं अर्पूनियां मनें । सार्थक करावें ॥ ३७ ॥
३७) काया, वाचा आणि मनाने ; पान, फुल, पाणी, फळें ही भगवंताला अर्पण करुन त्याची अर्चना, पूजा करावी. व सार्थक करावे. 
येथानुशक्ती दानपुण्य । परी भगवंतीं अनन्य ।
सुखदुःखें परी चिंतन । देवाचेंचि करावें ॥ ३८ ॥
३८) आपल्या शक्तीनुसार दान, धर्म, पुण्य करुन ते गाठीस जोडावे. भगवंताशी अनन्य बुद्धिने राहून सांसारिक सुख-दुःखांत त्याचेच चिंतन करावे.   
आदिअंती येक देव । मध्येंचि लाविली माव ।
म्हणोनियां पूर्ण भाव । भगवंती असावा ॥ ३९ ॥
३९) या विश्र्वाच्या आधी व नंतर तो एकच भगवंत आहे. मध्येच माया भुरळ पाडते. म्हणून भगवंतावर पू्र्ण भाव ठेवावा. 
ऐसा सबळ रजोगुण । संक्षेपें केलें कथन ।
आतां शुद्ध तो तूं जाण । परमार्थिक ॥ ४० ॥
४०) असा हा सबळ असलेला रजोगुण संक्षेपाने सांगितला. आता शुद्ध पारमार्थिक नेणारा तो रजोगुण जाणून घे. 
त्याचे वोळखीचें चिन्ह । सत्वगुणीं असे जाण ।
तो रजोगुण परिपूर्ण । भजनमूळ ॥ ४१ ॥
४१) त्या शुद्ध रजोगुणाला ओळखण्याची खुण म्हणजे ती सत्वगुणांत सापडते. तोच संपूर्ण भगद्भक्तीचे मूळ आहे. 
ऐसा रजोगुण बोलिला । श्रोतीं मनें अनुमानिला ।
आतां पुढें परिसिला । पाहिजे तमोगुण ॥ ४२ ॥
४२) असा हा रजोगुण सांगितला. तो श्रोत्यांनी जाणून घेतला. आतां पुढे तमोगुण सांगितला पाहीजे.  

॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे रजोगुणलक्षणनाम समास पांचवा ॥
Samas Pachava Rajogun Lakshan
समास पाचवा रजोगुण लक्षण



Custom Search

Wednesday, December 28, 2016

Samas Chavatha Bhakti Nirupan समास चवथा भक्ति निरुपण


Dashak Dusara Samas Chavatha Bhakti Nirupan 
Samas Chavatha Bhakti Nirupan is in Marathi. Samarth Ramdas is telling about Bhakti in this Samas. How we can make best use of this body of the man, which we have received in this birth. It is not easy to get a man’s body. After many many births in the past; we have got it. We have to worship the God, visit holy places, give donations, to be in the good company, serve the guru, try to acquire as many good virtues as possible, avoid to be in the company of bad people and there are many such things described here, which really makes us a spiritual person.
समास चवथा भक्ति निरुपण  
श्रीराम ॥
नाना सुकृताचें फळ । तो हा नरदेह केवळ ।
त्याहि मधें भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे ॥ १ ॥
अर्थ
१) जन्मोजन्मी जी सत्कृत्यें केली त्यांचे फळ म्हणुन नरदेह मिळाला. त्यांतही भाग्य चांगले असेल तर माणुस सन्मार्गाला लागतो.
नरदेहीं विशेष ब्राह्मण । त्याहि वरी संध्यास्नान ।
सद्वासना भगवद्भजन । घडे पूर्वपुण्यें ॥ २ ॥
२) सर्वांत आधी नरदेह मिळाला. तोही स्नानसंध्या करणार्‍या सद्वासना असलेल्या ब्राह्मणाचा जो भगवंताचे भजन, भक्ती करणारा असा योग पूर्वपुण्यानेच घडतो. 
भगवद्भक्ति हे उत्तम । त्याहि वरी सत्समागम ।
काळ सार्थक हाचि परम । लाभ जाणावा ॥ ३ ॥
३) भगवंताची भक्ती करणे उत्तमच त्याबरोबर संतांचा, चांगल्या लोकांचा सहवास, यामुळे आयुष्याचे सार्थक होते. असा हा अलभ्य लाभच जाणावा.
प्रेमप्रीतीचा सद्भाव । आणी भक्तांचा समुदाव । 
हरिकथा मोहोत्साव । तेणें प्रेमा दुणावे ॥ ४ ॥
४) अंतरी भगवंतावर अनन्य प्रेम, भक्ती हा भाव आणि बाहेर भक्तांचा समुदाय यामुळे मोठमोठे भगवंताचे महोत्सव, हरिकथा वगैरे होऊन भगवंताविषयी प्रेमभाव वृद्धिंगत होतो.
नरदेहीं आलियां येक । कांही करावें सार्थक ।
जेणें पाविजे परलोक । परम दुल्लभ जो ॥ ५ ॥
५) आपल्याला नरदेह मिळाला आहे, म्हणून त्याचे सार्थक असे करुन घ्यावे की, ज्यामुळे अत्यंत दुर्लभ अशा परलोकाची प्राप्ती होईल.    
विधियुक्त ब्रह्मकर्म । अथवा दया दान धर्म ।
अथवा करणें सुगम । भजन भगवंताचें ॥ ६ ॥
६) यथासांग ब्रह्मकर्म करावे, किंवा दयाभावाने वागावे, दान,धर्म करावा. किंवा अतिशय सोपे असे भगवंताचे भजन भक्तीभावाने करावे.
अनुतापें करावा त्याग । अथवा करणें भक्तियोग ।
नाहीं तरी धरणें संग । साधुजनाचा ॥ ७ ॥  
७) पश्चातापाने (विरक्त होऊन) संसाराचा त्याग करावा. किंवा भक्तीपंथाचा मार्ग धरावा. किंवा मग संत, साधुजनांच्या सहवासांत रहावे.
नाना शास्त्रें धांडोळावीं । अथवा तीर्थे तरी करावीं ।
अथवा पुरश्र्चरणें बरवीं । पापक्षयाकारणें ॥ ८ ॥
८) नाना शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा. नाहीतर तीर्थयात्रा कराव्या. किंवा पुरश्चरणे करावीत. हे सर्व कशासाठी तर आपण जन्मोजन्मी केलेल्या पापांचा क्षय व्हावा म्हणुन करावे. 
अथवा कीजे परोपकार । अथवा ज्ञानाचा विचार ।
निरुपणीं सारासार । विवेक करणें ॥ ९ ॥
पाळावी वेदांची आज्ञा । कर्मकांड उपासना ।
जेणें होईजे ज्ञाना । अधिकारपात्र ॥ १० ॥
९-१०) परोपकार तरी करावा. किंवा ज्ञानमार्ग पकडावा. किंवा सत्पुरुषांकडून ऐकलेल्या प्रवचनांतील सारासार पहावें. वेदांची आज्ञा पाळावी, कर्मकाण्ड, उपासना करावी की, ज्यामुळे योग्य व उत्तम ज्ञान प्राप्त करुन घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. पात्रता वाढते. 
काया वाचा आणि मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें ।
कांहीं तरी एका भजनें । सार्थक करावें ॥ ११ ॥
११) परमेश्र्वराचे कायेने, वाचेने मनापासून पुष्प, पान,फळ, किंवा पाणी याने पूजन करावे आणि (जन्माचे) सार्थक करुन घ्यावे.   
जन्मा आलियाचें फळ । कांहीं करावें सफळ ।
ऐसें न करितां निर्फळ । भूमिभार होये ॥ १२ ॥
१२) जन्माला आलो आहो म्हणून काहींतरी चांगले (भजन, पूजन, किर्तन आदी) करुन पदरी पुण्य जमा करुन घ्यावें. असे केले नाहीतर जन्माला येऊन केवळ भूमिभार झालो असे होईल.
नरदेहाचें उचित । कांहीं करावें आत्महित । 
यथानुशक्त्या चित्तवित्त । सर्वोत्तमीं लावावें ॥ १३ ॥
१३) (दुर्लभ) नरदेहाचा काहींतरी उचीत उपयोग करुन घेऊन आत्महीत करुन घ्यावे. आणि आपल्या शक्तिनुसार चित्त, वित्त यांचा उपयोग सर्वोत्तम करण्याकडे करावा. ज्यायोगे स्वहीत (आत्महीत) साधेल.
हें कांहींच न धरी जो मनी । तो मृत्यप्राय वर्ते जनीं ।
जन्मा येऊन तेणें जननी । वायांच कष्टविली ॥ १४ ॥
१४) याचा मनांत काहींच विचार न करता, जो लोकांत जिवंत असूनही केवळ  मृतप्राय होऊनच वावरतो. त्याने जन्माला येऊन उगाचच आईला कष्टविले असे होते.
नाहीं संध्या नाहीं स्नान । नाहीं भजन देवतार्चन ।
नाहीं मंत्र जप ध्यान । मानसपूजा ॥ १५ ॥ 
नाहीं भक्ति नाहीं प्रेम । नाहीं निष्ठा नाहीं नेम ।
नाहीं देव नाहीं धर्म । अतीत अभ्यागत ॥ १६ ॥
नाहीं सद्बुद्धि नाहीं गुण । नाहीं कथा नाहीं श्रवण ।
नाहीं अध्यात्मनिरुपण । ऐकिलें कदा ॥ १७ ॥
नाहीं भल्यांची संगती । नाहीं शुद्ध चित्तवृत्ती ।
नाहीं कैवल्याची प्राप्ती । मिथ्यामदें ॥ १८ ॥
नाहीं नीति नाहीं न्याये । नाहीं पुण्याचा उपाये ।
नाहीं परत्रीची सोये । युक्तायुक्त क्रिया ॥ १९ ॥
नाहीं विद्या नाहीं वैभव । नाहीं चातुर्याचा भाव ।
नाहीं कळा नाहीं लाघव । रम्यसरस्वतीचें ॥ २० ॥  
शांती नाहीं क्ष्मा नाहीं । दीक्षा नाहीं मीत्रीं नाहीं ।
शुभाशुभ कांहींच नाहीं । साधनादिक ॥ २१ ॥
सुचि नाहीं स्वधर्म नाहीं । आचार नाहीं विचार नाहीं ।
आरत्र नाहीं परत्र नाहीं । मुक्त क्रिया मनाची ॥ २२ ॥
कर्म नाहीं उपासना नाहीं । ज्ञान नाहीं वैराग्य नाहीं ।
योग नाहीं धारिष्ट नाहीं । कांहींच नाहीं पाहातां ॥ २३ ॥ 
उपरती नाहीं त्याग नाहीं । समता नाहीं लक्षण नाहीं ।
आदर नाहीं प्रीति नाहीं । परमेश्र्वराची ॥ २४ ॥
परगुणाचा संतोष नाहीं । परोपकारें सुख नाहीं ।
हरिभक्तीचा लेश नाहीं । अंतर्यामीं ॥ २५ ॥
ऐसे प्रकारीचे पाहातां जन । ते जीतचि प्रेतासमान ।
त्यांसीं न करावें भाषण । पवित्र जनीं ॥ २६ ॥
पुण्यसामग्री पुरती । तयासीच घडे भगवद्भक्ती ।
जे जे जैसें करिती । ते पावती तैसेंचि ॥ २७ ॥
१५-२७) असा तो माणूस कसा तर- स्नान-संध्या नाही, भजन किंवा देव-पूजाही नाही. मंत्र, जप, ध्यान किंवा मानसपूजाही करत नाही. त्याच्याजवळ भक्ति किंवा प्रेमभावही नसतो. सद्बुद्धि नसल्याने चांगले गुणांचाही अभाव, भगवत् कथा, पुराण यांचे श्रवणही करत नाही. अध्यात्म निरुपणही कधिच ऐकत नाही. भल्या लोकांची संगत नसते. चित्तशुद्ध नसते. खोट्या दंभाने,  मोक्षप्राप्ती कशी होणार ? त्याला नीति-न्यायाची चाड नसते. काही पुण्याचे काम करत नाही. परलोकाची प्राप्ती करुन घेण्याचा काही उपाय करत नाही. विद्या नसते तसेच त्याच्याजवळ वैभवही नसते. चातुर्य, कला, सरस्वतीचा वाग्विलास यापैकी काहींच नसते. शांती, क्षमा, दया, दीक्षा, मैत्री, शुभाशुभाचा विवेक-विचार नाही. कोठचेही साधन करत नाही. 
शुद्धता, स्वधर्माप्रमाणे वागणे नाही. योग्य आचार-विचार यांचा अभाव असतो. मनांत येईल त्याप्रमाणे स्वच्छंद वर्तणुक असते. कर्म, उपासना, ज्ञान, वैराग्य, योग किंवा धारिष्ट यापैकी काहींच नसते. असल्या वागण्याची उपरतिही नसते. त्याग नसतो. समता, परमेश्र्वराबद्दल आदर, प्रेम काहींच नसते. दुसर्‍याचे गुण पाहून आनंद होत नाही. परोपकार करत नाही त्यामुळे त्याचे सुख नाही. भगवंताच्या भक्तिचा लेशसुद्धा अंतर्यामी नसतो. अशा प्रकारचे लोक म्हणजे जिवंतअसून मेल्यासारखेंच असतात. त्या लोकांशी पवित्र लोकांनी बोलूसुद्धा नये. ज्याच्याजवळ पूर्वपुण्याई आहे त्यालाच भगवत्भक्ति घडते. जे जे जसे जसे कर्म करतात त्यांना तसे तसेच फळ मिळते. 

॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भक्तिनिरुपणनाम समास चवथा ॥   
Samas Chavatha Bhakti Nirupan 
समास चवथा भक्ति निरुपण  


Custom Search

Monday, December 26, 2016

Samas Tisara Kuvidya Lakshan समास तिसरा कुविद्या लक्षण


Dashak Dusara Samas Tisara Kuvidya Lakshan 
Samas Tisara Kuvidya Lakshan is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us the Kuvidya Lakshan. These Kuvidya Lakshans are to be removed from our Nature if we are having in it. It is not possible for a person to follow a spiritual path if he is having them.
समास तिसरा कुविद्या लक्षण
श्रीराम ॥
ऐका कुविद्येचीं लक्षणें । अति हीने कुलक्षणें ।
त्यागार्थ बोलिलीं ते श्रवणें । त्याग घडे ॥ १ ॥
अर्थ 
१) आतां कुविद्येची लक्षणें ऐका. ती अति हीन आहेत. मनुष्याने त्यांचा त्याग करावा. ती ऐकली म्हणजे त्यांचा त्याग घडतो.
ऐका कुविद्येचा प्राणी । जन्मा येऊन केली हानी । 
सांगिजेल येहीं लक्षणीं । वोळखावा ॥ २ ॥
२) कुविद्येचा माणुस कसा असतो ते सांगतो. जन्माला येऊन तो स्वतःचे नुकसान करुन घेतो. येथे सांगितलेल्या लक्षणांवरुन तो ओळखू येईल. 
कुविद्येचा प्राणी असे । तो कठिण निरुपणें त्रासे ।
अवगुणाची समृद्धि असे । म्हणौनियां ॥ ३ ॥
३) कुविद्येचा माणुस अति अवगुणी असतो. ते जावेत म्हणून कोणी त्यास कांहीं सांगू लागला तर त्यामुळे कुविद्येचा माणुस त्रासतो.   
श्र्लोक ॥
दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥
काम क्रोध मद मत्सर । लोभ दंभ तिरस्कार ।
गर्व ताठा अहंकार । द्वेष विषाद विकल्पी ॥ ४ ॥
आशा ममता तृष्णा कल्पना । चिंता अहंता कामना भावना ।
असूया अविद्या ईषणा वासना । अतृप्ती लोलंगता ॥ ५ ॥
इछ्या वांछ्या चिकिछ्या निंदा । आनित्य ग्रामणी मस्ती सदा ।
जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा । दुर्वृत्ती दुर्वासना ॥ ६ ॥    
स्पर्धा खटपट आणी चटपट । तर्‍हे झटपट आणी वटवट ।
सदा खटखट आणी लटपट । परम वेथा कुविद्या ॥ ७ ॥
४-७) कामी, क्रोधी, मदाने, मत्सराने भरलेला, लोभी, दंभी, तिरस्कार करणारा, गर्विष्ठ, ताठा, अहंकारी, द्वेषी, विषादी, विकल्पी, आशा, ममता, तृष्णा, कल्पनांत रमणारा, चिंताग्रस्त, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, ईषणा, वासना, अतृप्ती, लोलंगता, इच्छा, वासना, चिकित्सा, निंदा, अनीति, गुंडगिरी, सदा मस्तवाल, अवज्ञा, विपत्ति, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट, तर्‍हेवाईकपणा, अस्वस्थता, घाईंत काम उकणारा, अस्वस्थ, वटवट्या, तक्रारखोर, या लक्षणांनी कुविद्या प्रगट होते.  
कुरुप आणि कुलक्षण । अशक्त आणी दुर्जन । 
दरिद्री आणि कृपण । आतिशयेंसीं ॥ ८ ॥
८) कुविद्येचा मनुष्य कुरुप, हीन लक्षणी, अशक्त, दुर्जन, दरिद्री आणि अतिशय कंजुष असतो. 
आळसी आणि खादाड । दुर्बळ आणी लाताड ।
तुटक आणी लाबाड । आतिशयेंसीं ॥ ९ ॥
९) तो अत्यंत आळशी, खादाड, दुर्बळ, लाथा मारणारा, अति लबाड व दुसर्‍यास तोडून बोणारा असतो. 
मूर्ख आणी तपीळ । वेडें आणी वाचाळ ।
लटिकें आणी तोंडाळ । आतिशयेंसीं ॥ १० ॥
१०) तो मूर्ख, तापट, वेडपट, वाचाळ, खोटारडा व फार तोंडाळ असतो.
नेणे आणी नायके । न ये आणी न सीके ।
न करी आणी न देखे । अभ्यासदृष्टी ॥ ११ ॥
११) कुविद्या ज्याच्या आंगी त्याला स्वतःला काही कळत नसूनही दुसर्‍याने सांगितलेलेही तो ऐकत नाही. काही येत नाही व दुसर्‍याकडून काही शिकतही नाही. स्वतः करत नाही व अभ्यासूपणे बघतही नाही.
अज्ञान आणी अविश्र्वासी । छळवादी आणी दोषी । 
अभक्त आणी भक्तांसी । देखों सकेना ॥ १२ ॥
१२) तो अज्ञानी व अविश्र्वासु असतो. छळवादी व ज्यांतत्यांत दोष काढणारा असतो. स्वतः भक्ती न करणारा व भक्ती करणाराचा द्वेष करणारा असतो.
पापी आणी निंदक । कष्टी आणी घातक । 
दुःखी आणी हिंसक । आतिशयेंसीं ॥ १३ ॥
१३) तो पापी असून सतत कोणाची तरी निंदा करत असतो. क्लेश भोगत असून  दुसर्‍यांचा घात करणारा, दुःखी व अति निर्दयी असतो. 
हीन आणी कृत्रिमी । रोगी आणी कुकर्मी ।
आचंगुल आणी अधर्मी । वासना रमे ॥ १४ ॥
१४) तो हीन व ढोंगी, रोगी व वाईट कामे करणारा, कृपण व अधार्मिक वासनेचा असतो.
हीन देह आणी ताठा । अप्रमाण आणी फांटा ।
बाष्कळ आणी करंटा । विवेक सांगे ॥ १५ ॥
१५) हीन देहाचा व अभिमानी, वाह्यात, फाटे फोडणारा, वायफळ बडबड करणारा, दुर्दैवी व लोकांना उपदेश करणारा असतो.
लंडी आणी उन्मत्त । निकामी आणी डुल्लत ।
भ्याड आणी बोलत । पराक्रमु ॥ १६ ॥
१६) तो भित्रा व उद्धट; बिनकामाचा व पोकळ बडेजाव मिरविणारा, भित्रा व आपल्या पराक्रमाच्या (खोट्या) गोष्टी सांगणारा असतो. 
कनिष्ठ आणी गर्विष्ठ । नुपरतें आणी नष्ट ।
द्वेषी आणी भ्रष्ट । आतिशयेंसीं ॥ १७ ॥
१७) तो कमी योग्यतेचा व गर्विष्ट; व्यसनी व विषयासक्त, लोकांचा द्वेष करणारा व अतिशय भ्रष्ट असतो.
अभिमानी आणी निसंगळ । वोडगस्त आणी खळ ।
दंभिक आणी अनर्गळ । आतिशयेंसीं ॥ १८ ॥
१८) अभिमानी व योग्य बंधन झुगारणारा, ओढग्रस्त परिस्थितीचा व दुष्ट, ढोंगी व अति उच्छृंखल असतो.
वोखटें आणी विकारी । खोटें आणी अनोपकारी ।
अवलक्षण आणी धिःकारी । प्राणीमात्रासी ॥ १९ ॥
१९) वाईट व विकाराधीन, खोटारडा व अनोपकारी, अवलक्षणी व दुसर्‍यांचा तिरस्कार करणारा असतो.
अल्पमती आणी वादक । दीनरुप आणी भेदक ।
सूक्ष्म आणी त्रासक । कुशब्देंकरुनि ॥ २० ॥
२०) कमी बुद्धीचा असुनही वाद घालणारा, भिकार्‍यासारखा असुनही दुसर्‍या टोचून बोलणारा, बारीकसारीक गोष्टींत दुसर्‍यास वाईट शब्दांनी बोलणारा असतो.
कठिणवचनी कर्कशवचनी । कापट्यवचनी संदेहवचनी ।
दुःखवचनी तीव्रवचनी । क्रूर निष्ठुर दुरात्मा ॥ २१ ॥
२१) कर्कश्य आवाजांत कठिण शब्दांनी दुसर्‍यास बोलणारा, कपटाने व संशयाने बोलणारा, दुःखदायक व बोचर्‍या शब्दांनी बोलणारा, क्रुर व निष्ठुर असा कुलक्षणी असतो.
न्यूनवचनी पैशून्यवचनी । अशुभवचनी आनित्यवचनी ।
द्वेषवचनी अनृत्यवचनी । बाष्कळवचनी धिःकारु ॥ २२ ॥
२२) कमतरता शोधून त्याबद्दल बोलणारा, (किंवा दुसर्‍याची चूक शोधुन त्यास बोलणारा); घातकाने बोलणारा, अशुभ बोलणारा, वायफळ बोलणारा, द्वेषाने बोलणारा, खोटे बोलणारा, सतत धिःकाराने बोलणारा असा असतो.   
कपटी कुटिळ गाट्याळ । कुर्टें कुचर नट्याळ ।   
कोपी कुधन टवाळ । आतिशयेंसीं ॥ २३ ॥  
२३) तो कपटी, वाईट बुद्धीचा, आतल्या गाठीचा, क्षुद्र बुद्धिचा, कामचुकार, नाठाळ, रागीट, पापी मार्गाने द्रव्य मिळविणारा आणि अतिशय टवाळखोर असतो.
तपीळ तामस अविचार । पापी अनर्थी अपस्मार ।
भूत समंधी संचार । आंगीं वसे ॥ २४ ॥
२४) तो कुलक्षणी तापट, तामसी, अविचारी, पापी, अनर्थ करणारा, अपस्मारी व अंगांत भूत, समंध यांचा संचार असलेला असा असतो.
आत्महत्यारा स्त्रीहत्यारा । गोहत्यारा ब्रह्महत्यारा ।
मातृहत्यारा पितृहत्यारा । माहापापी पतित ॥ २५ ॥
२५) तो आत्मघातकी, स्त्रीघातकी, गायीला मारणारा, ब्राह्मणास मारणारा, आई-वडिलांचा घात करणारा, असा महापापी, पतित असतो.
उणें कुपात्र कुतर्की । मित्रद्रोही विस्वासघातकी ।
कृतघ्न तल्पकी नारकी । अतित्याई जल्पक ॥ २६ ॥
२६) तो सर्व बाबतींत कनिष्ठ, अयोग्य, वाईट तर्क करणारा, मित्रा द्रोह करणारा, विश्वासघातकी, कोणी केलेले उपकार न जाणणारा, परस्त्रीशी रत होणारा, नरकांत जाण्यास योग्य असलेला, आततयी व बडबड्या असा असतो.
किंत भांडण झगडा कळ्हो । अधर्म अनराहाटी शोक संग्रहो ।
चाहाड वेसनी विग्रहो । निग्रहकर्ता ॥ २७ ॥
२७) तो संशयी, भांडखोर, झगडा करणारा, कलह घालणारा, अधर्मी, सदोदीत शोक करणारा, राहाटीप्रमाणे न राहणारा, चहाडखोर, व्यसनी, भेदाभेद करणारा व मोठा हट्टी असतो. 
द्वाड आपेसी वोंगळ । चाळक चुंबक लच्याळ । 
स्वार्थी अभिळासी वोडाळ । आद्दत्त झोड आदखणा ॥ २८ ॥
२८) तो खोडकर, अपयशी, घाणेरडा, चाळवणारा, कवडीचुंबक, लोचट, स्वार्थी, हावरा, स्वैर वर्तनी, अपरोपकारी (घट्ट मुठीचा), शिरजोर, दुसर्‍याचे चांगले झालेले बघु न शकणारा असा असतो.
शठ शुंभ कातरु । लंड तर्मुंड सिंतरु ।
बंड पाषांड तश्करु । अपहारकर्ता ॥ २९ ॥
२९) कुलक्षणी लबाड, मठ्ठ, प्रसंगी काचकुच करणारा, बेपर्वाईने वागणारा, लुडबुड करणारा, लफंगा, उद्धट, गाजावाजा करणारा, चोर व दुसर्‍याच्या वस्तु पळविणारा असतो.
धीट सैराट मोकाट । चाट चावट वाजट ।
थोट उद्धट लंपट । बटवाल कुबुद्धी ॥ ३० ॥
३०) तो कुलक्षणी धीट, स्वैराचारी, मोकाट, चटोर, चावट, गाजावाजा करणारा, थोतांड रचणारा, उद्धट, लंपट, भ्रष्ट व वाईट बुद्धीचा असतो.
मारेकरी वरपेकरी  । दरवडेकरी खाणोरी । 
मैंद भोंदु परद्वारी । भुररेकरी चेटकी ॥ ३१ ॥
३१) तो मारेकरी, लुटारु, दरवडेखोर, घरांना खणून धन शोधणारा, भोंदू, परद्वारी वास करणारा, भुल पाडणारा व चेटुक करणारा असतो.
निशंक निलाजिरा कळभंट । टौणपा लौंद धट उद्धट ।
ठस ठोंबस खट नट । जगभांड विकारी ॥ ३२ ॥
३२) तो कुलक्षणी निःशंक, निलाजरा, कळलाव्या, निरुद्योगी, पुष्ट, धटिंगण, उद्धट, उर्मट, चिवट, खट्याळ, नाटकी, सर्वांशी भांडणारा व विकाराधिन असतो.
अधीर आळिका अनाचारी । अंध पंगु खोंकलेकरी ।
थोंटा बधिर दमेकरी । तर्‍ही ताठा न संडी ॥ ३३ ॥
३३) तो कुलक्षणी उतावळा, कोणावरही उगाच आळ घेणारा, अनाचारी, आंधळा, पांगळा, खोंकणारा, थोटा, बहिरा, दमेकरी, असा असूनही आपला ताठा न सोडणारा असतो.
विद्याहीन वैभवहीन । कुळहीन लक्ष्मीहीन ।
शक्तिहीन सामर्थ्यहीन । अदृष्टहीन भिकारी ॥ ३४ ॥
बळहीन कळाहीन । मुद्राहीन दीक्षाहीन ।
लक्षणहीन लावण्यहीन । आंघीन विपारा ॥ ३५ ॥
युक्तिहीन बुद्धिहीन । आचारहीन विचारहीन ।
क्रियाहीन सत्वहीन । विवेकहीन संशई ॥ ३६ ॥
भक्तिहीन भावहीन । ज्ञानहीन वैराग्यहीन ।
शांतिहीन क्ष्माहीन । सर्वहीन क्षुल्लकु ॥ ३७ ॥
३४-३७) बळहीन, कळाहीन, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन, विद्रुप, युक्तिहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्वहीन, विवेकहीन, संशयी, भक्तिहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतिहीन, क्षमाहीन, सर्वहीन व क्षुल्लक असतो.       
समयो नेणे प्रसंग नेणे । प्रेत्न नेणे अभ्यास नेणे ।
आर्जव नेणे मैत्री नेणे । कांहींच नेणे अभागी ॥ ३८ ॥
३८) त्याला काळ, वेळ, प्रसंग कळत नाही. प्रयत्न कळत नाही, अभ्यास कळत नाही, आर्जव कळत नाही, मैत्री कशी टिकवावी कळत नाही. थोडक्यांत त्याला काहींच कळत नाही. असा तो अभागी कुलक्षणी असतो. 
असो ऐसे नाना विकार । कुलक्षणाचें कोठार ।
ऐसा कुविद्येचा नर । श्रोतीं वोळखावा ॥ ३९ ॥
३९) असे अनेक नानाप्रकारचे दोष अंगी असतात, नाना कुलक्षणांचे तो कोठारच असतो. कुविद्येच्या माणसाला अशा प्रकारे लोकांनी ओळखावे.
ऐसीं कुविद्येचीं लक्षणें । ऐकोनि त्यागचि करणें ।
अभिमानें तर्‍हें भरणें । हें विहित नव्हे ॥ ४० ॥
४०) अशी ही कुविद्येची लक्षणे ऐकून लोकांनी त्यांचा त्याग करावा. अभिमानाने ही लक्षणे न सोडण्याचा हट्ट धरणे योग्य नाही. 

॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कुविद्यालक्षणनाम समास तिसरा ॥
Samas Tisara Kuvidya Lakshan 
समास तिसरा कुविद्या लक्षण


Custom Search

Sunday, December 25, 2016

Surya Sukta सूर्य सूक्त


Surya Sukta 
Surya Sukta is in Sanskrit. It is from Rugveda.It is a praise of God Surya.
सूर्य सूक्त 
सूर्य सूक्त 
इस ऋग्वेदीय ' सूर्य सूक्त ' ( १ / ११ ५ ) के ऋषि ' कुत्स आङ्गिरस ' हैं, देवता सूर्य हैं और छन्द त्रिष्टुप है । इस सूक्तके देवता सूर्य संपूर्ण विश्वके प्रकाशक ज्योतिर्मय नेत्र हैं, जगत्की आत्मा हैं और प्राणिमात्रको सत्कर्मोंमें प्रेरित करनेवाले देव हैं, देवमण्डलमें इनका अन्यतम एवं विशिष्ट स्थान इसलिये भी है, क्योंकि ये जीवमात्रके लिये प्रत्यक्षगोचर हैं । ये सभीके लिये आरोग्य प्रदान करनेवाले एवं सर्वविध कल्याण करनेवाले हैं, अतः समस्त प्राणिधारियोंके लिये स्तवनीत हैं, वन्दनीय हैं ।      
चित्रं देवानामुदगादनीकं चक्षुर्मित्रस्य वरुणस्याग्नेः ।
आप्रा द्यावापृथिवी अन्तरिक्ष ँ् सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्र्च ॥ १ ॥
१) प्रकाशमान रश्मियोंका समूह अथवा राशि-राशि देवगण सूर्यमण्डलके रुपमें उदित हो रहे हैं । ये मित्र, वरुण, अग्नि और संपूर्ण विश्वके प्रकाशक ज्योतिर्मय नेत्र हैं । इन्होंने उदित होकर द्युलोक, पृथ्वी और अन्तरिक्षको अपने देदीप्यमान तेजसे सर्वतः परिपूर्ण कर दिया है । इस मण्डलमें जो सूर्य हैं, वे अन्तर्यामी होनेके कारण सबके प्रेरक परमात्मा हैं  तथा जङ्गम एवं स्थावर सृष्टिकी आत्मा हैं ।
सूर्यो देवीमुषसं रोचमानां मर्त्यो न योषामभ्येति पश्र्चात् ।
यत्रा नरो देवयन्तो युगानि वितन्वते प्रति भद्राय भद्रम् ॥ २ ॥
२) सूर्य गुणमयी एवं प्रकाशमान उषादेवीके पीछे पीछे चलते है, जैसे कोई मनुष्य सर्वाङ्ग सुन्दरी युवतीका अनुगमन करे । जब सुन्दरी उषा प्रकट होती है, तब प्रकाशके देवता सूर्यकी आराधना करनेके लिये कर्मनिष्ठ मनुष्य अपने कर्तव्य कर्मका सम्पादन करते हैं । सूर्य कल्याणरुप हैं और उनकी आराधनासे कर्तव्य कर्मके पालनसे कल्याणकी प्राप्ति होती हैं । 
भद्रा अश्र्वा हरितः सूर्यस्य चित्रा एतग्वा अनुमाद्यासः ।
नमस्यन्तो दिव आ पृष्ठमस्थुः परि द्यावापृथिवी यन्ति सद्यः ॥ ३ ॥
३) सूर्यका यह रश्मि मण्डल अश्र्वके समान उन्हें सर्वत्र पहुँचानेवाला चित्र विचित्र एवं कल्याणरुप है । यह प्रतिदिन तथा अपने पथपर ही चलता है एवं अर्चनीय तथा वन्दनीय है । यह सबको नमनकी प्रेरणा देता है और स्वयं द्युलोकके ऊपर निवास करता है । यह तत्काल द्युलोक और पृथ्वीका परिमन्त्रण कर लेता है ।
तत् सूर्यस्य देवत्वं तन्महित्वं मध्या कर्तोर्विततं सं जभार ।
यदेदयुक्त हरितः सधस्थादाद्रात्री वासस्तनुते सिमस्मै ॥ ४ ॥
४) सर्वान्तर्यामी प्रेरक सूर्यका यह ईश्र्वरत्व और महत्व है कि वे प्रारम्भ किये हुए, किंतु अपरिसमाप्त कृत्यादि कर्मको ज्यों का त्यों छोडकर अस्ताचल जाते समय अपनी किरणोंको इस लोकसे अपने आपमें समेट लेते हैं । साथ ही उसी समय अपने किरणों और घोडोंको एक स्थानसे खींचकर दूसरे स्थानपर नियुक्त कर देते हैं । उसी समय रात्रि अन्धकारके आवरणसे सबको आवृत्त कर देती है ।
तन्मित्रस्य वरुणस्याभिचक्षे सूर्यो रुपं कृणुते द्योरुपस्थे ।
अनन्तमन्यद् रुशदस्य पाजः कृष्णमन्यद्धरितः सं भरन्ति ॥ ५ ॥
५) प्रेरक सूर्य प्रातःकाल मित्र, वरुण और समग्र सृष्टिको सामनेसे प्रकाशित करनेके लिये प्राचीके आकाशीय क्षितिजमें अपना प्रकाशक रुप प्रकट करते हैं ।
इनकी रसभोजी रश्मियॉं अथवा हरे घोडे बलशाली रात्रिकालीन अन्धकारके निवारणमें समर्थ विलक्षण तेज धारण अन्धकारकी सृष्टि होती है ।
अद्या देवा उदिता सूर्यस्य निरहंसः पिपृता निरवद्यात् ।
तन्नो मित्रो वरुणो मामहन्तामदितिः सिन्धुः पृथिवी उत द्यौः ॥ ६ ॥
६) हे प्रकाशमान सूर्य रश्मियो आज सूर्योदयके समय इधर उधर बिखरकर तुम लोग हमें पापोंसे निकालकर बचा लो । न केवल पापसे ही, प्रत्युत जो कुछ निन्दित है, गर्हणीय है, दुःख दारिद्र्य है, सबसे हमारी रक्षा करो । जो कुछ हमने कहा है; मित्र, वरुण, अदिति, सिन्धु, पृथ्वी और द्युलोकके अधिष्ठातृ देवता उसका आदर करें, अनुमोदन करें, वे भी हमारी रक्षा करें । 

धन्यवाद सहित कल्याण कथाअङ्क  से उपलब्ध हिंदी भाषांतर .  
Surya Sukta
 सूर्य सूक्त 
  

Custom Search

Saturday, December 24, 2016

Dashak Dusara Samas Dusara Uttam Lakshan समास दुसरा उत्तम लक्षण


Dasbodha Dashak Dusara Samas Dusara Uttam Lakshan 
Samas Dusara Uttam Lakshan is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us what the good qualities a person should have to identify him as a good person. These qualities help him to proceed on the path of spirituality. If anybody wishes to be a spiritual person then he should here this samas carefully and tries to acquire the missing qualities in him.
समास दुसरा उत्तम लक्षण
श्रीराम ॥
श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण । 
जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ॥ १ ॥
अर्थ   
१) श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. मी आता उत्तम गुण सांगतो आहे. जे अंगी बाणवल्याने प्रपंच व परमार्थ ह्या दोन्हीचे ज्ञान प्राप्त होईल.
वाट पुसिल्याविण जाऊं नये । फळ वोळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ॥ २ ॥ 
२) वाट (माहित असल्याशिवाय) विचारल्याशिवाय प्रवासास जाऊं नये. फळ ओळखिल्याशिवाय खाऊं नये. वस्तु पडलेली दिसली तर एकदम उचलून घेऊं नये.
अति वाद करुं नये । पोटीं कपट धरुं नये ।
शोधिल्याविण करुं नये । कुळहीन कांता ॥ ३ ॥
३) फार वादावादी करुं नये. कपटीपणाने वागू नये. (बाहेरुन गोड परंतु पोटांत कपट असे वागूं नये.) कुलशीलाची नीट माहिती करुन घेतल्यावाचून मुलीशी लग्न करुं नये.
विचारेंविण बोलों नये । विवंचनेविण चालों नये ।
मर्यादेविण हालों नये । कांहीं येक ॥ ४ ॥
४) सारासार विचार केल्याशिवाय बोलू (न मागता सल्लासुद्धा) नये. कार्य सुरु करतांना सर्वांगीण बाजूंचा विचार केल्याशिवाय कार्य सुरु करु नये. नीतिअनीतिचा विचार केल्याशिवाय हालचाल करुं नये. 
प्रीतीविण रुसों नये । चोरास वोळखी पुसों नये ।
रात्रीं पंथ क्रमूं नये । येकायेकीं ॥ ५ ॥
५) प्रेम नसेल तेथे रुसणे नको. चोराला माहिती देऊं नये. अचानक रात्री प्रवास करु नये.   
जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । 
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥ ६ ॥
६) लोकांशी सरळपणाने वागणे सोडूं नये. पापमार्गाने पैसा जोडूं नये. कधीही नीतिने वागणें सोडूं नये.
निंदा द्वेष करुं नये । असत्संग धरुं नये ।
द्रव्यदारा हरुं नये । बळात्कारें ॥ ७ ॥
७) कोणाचीही निंदा, द्वेष करुं नये. अयोग्य, वाईट लोकांशी संगत, मैत्री करु नये. दुसर्‍याची बायको किंवा पैसा बळात्कारानें लुबाडूं नये.
वक्तयास खोदूं नये । ऐक्यतेसी फोडूं नये ।
विद्याअभ्यास सोडूं नये कांहीं केल्यां ॥ ८ ॥
८) वक्त्याला प्रश्र्ण विचारुन हैराण करुं नये. एकीने राहणार्‍या लोकांत फूट पाडू नये. कांही झाले तरी विद्या-अभ्यास सोडू नये. (ज्ञान मिळवणे सोडूं नये). 
तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये ।
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ॥ ९ ॥
९) तोंडाळ लोकांशी भांडण करु नये. वाचाळ माणसाशी वादंग करुं नये. अंतर्यामी (मनांवर) झालेले चांगले संस्कार सोडूं नये.
अति क्रोध करुं नये । जिवलगांस खेदूं नये ।
मनीं वीट मानूं नये । सिकवणेचा ॥ १० ॥
१०) फार रागावू नये. जिवलग नातेवाईक, मित्र यांना दुखवूं नये. चांगले शिकून घेण्याचा कंटाळा करुं नये.     
क्षणक्षणा रुसों नये । लटिका पुरुषार्थ बोलों नये ।
केल्याविण सांगों नये । आपला पराक्रमु ॥ ११ ॥
११) सारखे सारखे रुसूं नये. खोटेपणा करुन न केलेली गोष्ट सांगू नये. काहीहीं न करता (आपला पराक्रम) आपण केले असे सांगू नये.  
बोलिला बोल विसरों नये । प्रसंगीं सामर्थ्य चुकों न.ये ।
केल्याविण निखंदूं नये । पुढिलांसी कदा ॥ १२ ॥
१२) आपण दिलेला शब्द विसरुं नये. योग्य प्रसंगी आपल्या शक्तिचा वापर करण्यास चुकू नये. कार्य करुन दाखविल्याशिवाय दुसर्‍याला कधीही बोल लावूं नये.
आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिल्याविण करुं नये । कार्य कांहीं ॥ १३ ॥
१३) आळसांत पडून राहण्यांत सुख मानू नये. कोणाची चुगली-चहाडी करु नये. कोणतेही कार्य सर्वांगीण विचार केल्याशिवाय करुं नये.
सुखा आंग देऊं नये । प्रेत्न पुरुषें सांडूं नये ।
कष्ट करितां त्रासो नये । निरंतर ॥ १४ ॥
१४) देहाला अति सुखाची सवय लावूं नये. निरंतर प्रयत्न करण्याचे सोडूं नये. कधीही (आणि कितीही) कष्ट करावे लागले तरी त्रासून जाऊ नये.
सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।
पैज होड घालूं नये । कांहीं केल्यां ॥ १५ ॥
१५) सभेमधे लाजूं नये. (धिटाईने वागावे.) परंतु वायफळ बडबड करु नये. कधीही (कसलीही) पैज लावूं नये. 
बहुत चिंता करुं नये । निसुगपणें राहों नये ।
परस्त्रीतें पाहों नये । पापबुद्धी ॥ १६ ॥
१६) फार चिंता करुं नये. आळशीपणांत दिवस घालवू नये. वाईट दृष्टीने दुसर्‍याच्या बायकोकडे पाहूं नये.
कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये ।
परपीडा करुं नये । विस्वासघात ॥ १७ ॥
१७) कोणाच्या उपकाराचे ओझें बाळगूं नये. कोणी उपकार केल्यास तो फेडल्याशिवाय राहूं नये. दुसर्‍याचा विश्र्वासघात करुन त्याला पीडा देऊं नये.
शोच्येंविण असों नये । मळिण वस्त्र नेसों नये ।
जाणारास पुसों नये । कोठे जातोस म्हणौनी ॥ १८ ॥
१८) स्वच्छतेशिवाय राहूं नये. मलीन वस्त्र नेसूं नये. कोणी बाहेर जावयास निघाल्यावर त्याला कोठे जातोस म्हणून विचारु नये.
व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये ।
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ॥ १९ ॥
१९) आपला उदारपणा सोडू नये. कोणाच्या आधीन होऊं नये. परावलंबी किंवा दुसर्‍यावर आपले ओझें घालून राहू नये.
पत्रेंविण पर्वत करुं नये । हीनाचें रुण घेऊं नये ।
गोहीविण जाऊं नये । राजद्वारा ॥ २० ॥
२०) कागदपत्र केल्याशिवाय देण्या-घेण्याचे व्यवहार करु नये. हीन माणसाकडून कर्ज घेऊं नये. साक्षी-पुराव्याशिवाय कोर्टाची पायरी चढूं नये.
लटिकी जाजू घेऊं नये । सभेस लटिके करुं नये ।
आदर नस्तां बोलों नये । स्वभाविक ॥ २१ ॥
२१) खोटी हुज्जत घालूं नये. सर्व सभेला खोटे ठरवूं नये. ज्या ठिकाणी आपल्याला आदर-मान नाही तेथे बोलूं नये.
आदखणेपण करुं नये । अन्यायेंविण गांजूं नये ।
अवनीतीनें वर्तों नये । आंगबळें ॥ २२ ॥
२२) महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये. अन्यायाखेरीज कोणाला दुखवूं नये. अंगी फार शक्ती आहे म्हणुन दांडगेपणे वागूं नये.
बहुत अन्न खाऊं नये । बहुत निद्रा करुं नये ।
बहुत दिवस राहों नये । पिसुणाचेथें ॥ २३ ॥
२३) फार जेवण करुं नये. फार झोप काढूं नये. वाईट माणसाकडे फार दिवस राहूं नये.
आपल्याची गोही देऊं नये । आपली कीर्ती वर्णूं नये ।
आपलें आपण हासों नये । गोष्टी सांगोनी ॥ २४ ॥
२४) आपला म्हणून त्याच्या बाजूने साक्ष देऊं नये. आपल्या मोठेपणाचे आपणच प्रदर्शन करुं नये. गोष्टी सांगत आपले आपण हसूं नये.
धूम्रपान घेऊं नये । उन्मत्त द्रव्य सेऊं नये ।
बहुचकासीं करुं नये । मैत्री कदा ॥ २५ ॥
२५) धूम्रपान करुं नये. मादक पेय पिवूं नये. बोंबड्या माणसाशी मैत्री कधीच करुं नये.
कामेंविण राहों नये । नीच उत्तर साहों नये ।
आसुदें अन्न सेऊं नये । वडिलांचेंहि ॥ २६ ॥
२६) काम, उद्योग याशिवाय राहूं नये. कोणी अपमानास्पद (नीच) बोलला तर सहन करु नये. वडिलांचेही आयते अन्न खाऊं नये. 
तोंडीं सीवी असों नये । दुसर्‍यास देखोन हांसों नये ।
उणें अंगीं संचारों नये । कुळवंताचे ॥ २७ ॥
२७) तोडांत शिवी (घाणेरडी भाषा) असूं नये. दुसर्‍यास हासूं नये. कुळवान, शीलवान माणसाचे अंगी हीनपणा लावूं नये.
देखिली वस्तु चोरुं नये । बहुत कृपण होऊं नये ।
जिवलगांसीं करुं नये । कळह कदा ॥ २८ ॥
२८) पाहिलेली वस्तु (आवडली म्हणून) चोरु नये. फार कंजूषपणा करुं नये. आपल्या माणसांशी भांडण करुं नये. 
येकाचा घात करुं नये । लटिकी गोही देऊं नये ।
अप्रमाण वर्तों नये । कदाकाळीं ॥ २९ ॥
२९) कोणाचाही घात करुन त्याचे वाईट करुं नये. खोटी साक्ष देऊं नये. कधीही आपली वर्तणुक शास्त्राच्या विरुद्ध असूं नये. 
चाहाडी चोरी धरुं नये । परद्वार करुं नये ।
मागें उणें बोलों नये । कोणीयेकाचें ॥ ३० ॥
३०) कोणाची चहाडी, चोरी करुं नये. परस्त्रीशीं गैर (अनीतीने) वागू नये. कोणाच्याही मागे त्याच्याबद्दल वाईट बोलूं नये. 
समईं यावा चुकों नये । सत्वगुण सांडूं नये ।
वैरियास दंडूं नये । शरण आलियां ॥ ३१ ॥
३१) दुसर्‍यास मदतीची संधी सोडू नये. सत्वगुणाने वागणे कदापी सोडू नये. शरण आलेल्यास (चुकीची कबुली देणारास) शिक्षा करुं नये.
अल्पधनें माजों नये । हरिभक्तीस लाजों नये ।
मर्यादेविण चालों नये । पवित्र जनीं ॥ ३२ ॥
३२) कमी-अधिक पैसा मिळाला तरी त्याचे माजाने वागू नये. भगवंताची भक्ती करतांना लाजू नये. संत-महंत असलेल्या पवित्र ठिकाणी अमर्यादेने वर्तन करुं नये.
मूर्खासीं समंध पडों नये । अंधारीं हात घालूं नये ।
दुश्र्चितपणें विसरों नये । वस्तु आपुली ॥ ३३ ॥
३३) मूर्खांशी संबंध ठेवू नये. अंधार असलेल्या ठिकाणी हात घालूं नये. आपली वस्तु विसरण्याचा निष्काळजीपणा करुं नये.
स्नानसंध्या सांडूं नये । कुळाचार खंडूं नये ।
अनाचार मांडूं नये । चुकुरपणें ॥ ३४ ॥
३४) स्नान-संध्याआदि आपले आन्हिक सोडूं नये. कुलाचार सोडू नये. चुकारपणाने अनाचाराने वागूं नये. 
हरिकथा सांडूं नये । निरुपण तोडूं नये ।
परमार्थास मोडूं नये । प्रपंचबळें ॥ ३५ ॥
३५) हरिकथा, भजन, किर्तन आदि सोडूं नये.  प्रवचन निरुपण आदि सोडूं नये. प्रपंचाच्यामागे लागून परमार्थाची वाट सोडू नये.
देवाचा नवस बुडऊं नये । आपला धर्म उडऊं नये ।
भलतें भरीं भरों नये । विचारेंविण ॥ ३६ ॥
३६) देवाचा नवस फेडण्यास चुकू नये. आपला धर्म विरोधी वागून सोडू नये.  विचाराने न वागता भलते काम अंगावर घेऊ नये. 
निष्ठुरपण धरुं नये । जीवहत्या करुं नये ।
पाउस देखोन जाऊं नये । अथवा अवकाळीं ॥ ३७ ॥
३७) निष्ठूरपणे वागू नये. जीवाची हिंसा करु नये. पाऊस असेल तर किंवा योग्य काळ नसेल तर प्रवासास जाऊं नये.
सभा देखोन गळों नये । समईं उत्तर टळों नये ।
धिःकारिता चळों नये । धारिष्ट आपुलें ॥ ३८ ॥       
३८) सभेमध्ये घाबरु नये. वेळप्रसंगी योग्य उत्तर देण्यास चुकू नये. कोणी धिःकारिले तरी आपले धैर्य गमावूं नये. 
गुरुविरहित असों नये । नीच यातीचा गुरु करुं नये ।
जिणें शाश्र्वत मानूं नये । वैभवेंसीं ॥ ३९ ॥
३९) गुरुशिवाय राहू नये. हलक्या जातीचा गुरु करु नये. वैभवाचे जीणे कायमचे समजू नये. 
सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथे जाऊं नये ।
कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ॥ ४० ॥
४०) सत्याचा मार्ग सोडू नये. असत्याचे मार्गे जाऊ नये. खोट्या वागणुकीचा अभिमान बाळगू नये.    
अपकीर्ति ते सांडावी । सदकीर्ति वाढवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ॥ ४१ ॥
४१) अपकीर्तिच्या मार्गे जाऊ नये. सद्कीर्तिच्या मार्गे जावे. योग्य विचाराने सत्याचा मार्ग धरुन ठेवावा. (सत्कर्मे करुन सद्कीर्ति मिळवून देणारी सत्याची वाट घट्ट धरुन मार्ग चालावा.)
नेघतां हे उत्तम गुण । तें मनुष्य अवलक्षण ।
ऐक तयांचे लक्षण । पुढिले समासीं ॥ ४२ ॥
४२) जो कोणी हे उत्तमगुण अंगीकारत नाही, तो अवलक्षणीच होय. त्याची लक्षणे पुढील समासी ऐका. 

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तमलक्षणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara Uttam Lakshan
समास दुसरा उत्तम लक्षण



Custom Search