Wednesday, January 11, 2017

Samas Pahila JanmaDukha Nirupan समास पहिला जन्मदुःख निरुपण


Dashak Tisara Samas Pahila JanmaDukha Nirupan
 Samas Pahila JanmaDukha Nirupan is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about the pains suffered while taking birth on this earth.
समास पहिला जन्मदुःख निरुपण
श्रीराम ॥
जन्म दुःखाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर ।
जन्म भयाचा डोंगर । चळेना ऐसा ॥ १ ॥ 
अर्थ
१) जन्म हा दुःखरुपी वृक्षाचा अंकुर आहे. जसा जसा हा अंकुर वाढतो, म्हणजेच वृक्ष होतो तसे तसे दुःखही वाढत जाते. जन्म हा शोकाचा सागर आहे. समुद्र हा जसा नेहमी भरलेला असतो, तसेच मानसाचे जीवन दुःखांनी नेहमी भरलेलेच असते. जन्म हा भय भीतिचा डोंगर आहे. डोंगराप्रमाणेच भय पण हालत नाही.    
जन्म कर्माची आटणी । जन्म पातकाची खाणी ।
जन्म काळाची जाचणी । निच नवी ॥ २ ॥
२) जन्म हा केलेल्या कर्माचे फलित आहे. केलेल्या कर्माचा कांही भाग कर्मफलाच्या रुपाने भोगण्यासाठी जन्म आहे. जन्म हे पाप आहे. ईश्र्वराला विसरुन दृश्याच्या ओढीने केलेले कर्म दुःख सुरु करणारे होते. जन्म म्हणजे काळाचा जाच होय. काळ दृश्यामध्ये बदल करतअसतो, असा नवीन बदल व नवा नाश हे काळ घडवून आणत असतो. म्हणजे काळाचा जाचच असतो.   
जन्म कुविद्येचे फळ । जन्म लोभाचें कमळ ।
जन्म भ्रांतीचें पडळ । ज्ञानहीन ॥ ३ ॥
३) जन्म हा कुविद्येने (अज्ञानाने मागील जन्मी) जगल्यामुळे होतो. लोभाचे (आसक्ति) फलित जन्म आहे. वासनांच्या आसक्तिमुळे, ज्ञानहीन जगल्यामुळे भ्रांतींतच जीव राहतो व परत जन्म घ्यावा लागतो. 
जन्म जिवासी बंधन । जन्म मृत्यासी कारण ।
जन्म हेंचि अकारण । गथागोवी ॥ ४ ॥
४) जन्म म्हणजे जीवाचे बंधन आहे. जन्मामुळे देहप्राप्ती व त्यामुळे देहाच्या सुख-दुःखरुपी मर्यादा यामुळे जीवास बंधन होते. जन्म झाला म्हणजे मृत्यु येणारच. जन्मामुळे जीवाचा ईश्र्वराशी असलेला संबंध तुटतो व नाशीवंत देहाशी संबंध येतो व देहाच्या सुख-दुःखांत तो अडकतो, यामुळे जन्म जीवाच्या गुरफटण्यास कारण होतो.  
जन्म सुखाचा विसर । जन्म चिंतेचा आगर ।
जन्म वासनाविस्तार । विस्तारला ॥ ५ ॥
५) जीव ईश्र्वराला विसरल्यामुळे जन्माबरोबर सुखाचाही विसर व चिंतेचा मोठा डोंगर. जीवाची सुख मिळवण्याची धडपड त्याला चिंतेच्या खाईंत लोटते. सुखाच्या धडपडीने निरनिराळ्या वासनांच्या जाळ्यांतून वासना वाढतच जातात. 
जन्म जिवाची आवदसा । जन्म कल्पनेचा ठसा ।
जन्म लांवेंचा वळसा । ममतारुप ॥ ६ ॥
६) जन्म जीवाला मी ईश्र्वर आहे ह्या कल्पनेपासून मी देह आहे या कल्पनेवर आणून त्याचे अधःपतन करतो. जन्म म्हणजे मी देहही ममतारुपी डाकिण त्याला अज्ञानांतच ठेवते किंबहुना अज्ञान वाढवते.    
जन्म मायेचें मैंदावें । जन्म क्रोधाचें विरावें ।
जन्म मोक्षास आडवें । विघ्न आहे ॥ ७ ॥
७) जन्म म्हणजे मायेने निर्माण केलेली देहबुद्धि म्हणजेच कपट होय. जन्म हे क्रोधाचे फलित होय. जन्मामुळे जीवास मोक्ष मिळविण्याव्या मार्गांतील विघ्न आहे. मायेमुळे देहबुद्धि व देहबुद्धिमुळे अज्ञान व अज्ञानाने मोक्ष नाही.  
जन्म जिवाचें मीपण । जन्म अहंतेचा गुण ।
जन्म हेंचि विस्मरण । ईश्र्वराचें ॥ ८ ॥
८) जन्म हा जीवास मी-मी असे मीपण देतो. जन्म अहकांर देतो. तसाच जन्म हा जीवाला ईश्र्वराचे विस्मरण देतो. 
जन्म विषयांची आवडी । जन्म दुराशेची बेडी ।  
जन्म काळाची कांकडी । भक्षिताहे ॥ ९ ॥ 
९) जन्म हा जीवांत देहबुद्धि निर्माण करत असल्याने विषयांची आवड निर्माण करतो. कधीही तृप्त न होणार्‍या वासनांच्यामुळे चुकीच्या आशा व त्यांची बेडी जीवाच्या भोवती पडते. माणसाने काकडी खाणे जितके त्यास सोपे तसेच काळाला माणसाचे शरीर खाणे सहज सोपे असते.    
जन्म हाचि विषम काळ । जन्म हेचि वोखटी वेळ ।
जन्म हा अति कुश्र्चीळ । नर्कपतन ॥ १० ॥
१०) जन्म हा वाईट काळ, वाईट वेळ व दुःखरुपी नरकांत पडणे होय. हे सर्व का तर जीव हा जन्मामुळे ईश्र्वराला विसरतो, देहबुद्धिला धरुन जगतो व त्यामुळे त्याला दुःखातच राहावे लागते. 
पाहातां शरीराचें मूळ । या ऐसें नाहीं अमंगळ ।
रजस्वलेचा जो विटाळ । त्यामध्यें जन्म यासी ॥ ११ ॥
११) शरीराचे मूळ शोधले तर त्यासारखे अमंगळ काहीच नाही, असे वाटेल. स्त्रीच्या विटाळापासून शरीर तयार होते. 
अत्यंत दोष ज्या विटाळा । त्या विटाळाचाचि पुतळा ।
तेथें निर्मळपणाचा सोहळा । केवी घडे ॥ १२ ॥
१२) अतिशय अशुद्ध असा विटाळाचा हा देह. त्याला कितीही शुद्ध करु म्हटले तरी तो शुद्ध होणे कठीण.  
रजस्वलेचा जो विटाळ । त्याचा आळोन जाला गाळ ।
त्या गाळाचेंच केवळ । शरीर हें ॥ १३ ॥
१३) स्त्रीचा विटाळ दाट होऊन आळला की त्याचेच शरीर तयार होते. 
वरिवरि दिसे वैभवाचें । अंतरीं पोतडें नर्काचें ।
जैसें झांकणे चर्मकुंडाचें । उघडितांच नये ॥ १४ ॥
१४) शरीर वरवर सुंदर दिसले तरी ते एक घाणीने भरलेले पोतेच असते. चांभाराची कातडी पोतडी जशी दुर्गंधयुक्त असते, ती उघडूच नये पण उघडली तर त्या घाणीने, दुर्गंधीने पळून जावेसे वाटते.  
कुंड धुतां शुद्ध होतें । यास प्रत्यईं धुईजेतें ।
तरी दुर्गंधी देहातें । शुद्धता नये ॥ १५ ॥      
१५) कुंड धुतले तर स्वच्छ होते, देहाला मात्र रोज धुतला (रोज आपण आंघोळ करतोच) तरी त्याची दुर्गंधीने, घाणीने भरलेले शरीर शुद्ध होत नाही.     
अस्तीपंजर उभविला । सीरानाडीं गुंडाळिला ।
मेदमांसे सरसाविला । सांदोसांदीं भरुनी ॥ १६ ॥
१६) देह कसा तयार झाला ? तर हाडांचा सापळा उभा केला, तो शिरा, नाड्या यांनी गुंडाळला, सांध्यासांध्यांत चरबी व मांस भरले व देह तयार झाला.  अशुद्ध शब्दें शुद्ध नाहीं । तेंहि भरले असे देहीं ।
नाना व्याधी दुःखें तेहि। अभ्यांतरी वसती ॥ १७ ॥
१७) रक्त अशुद्ध ते शुद्ध नसतेच, ते देहांत भरले, निरनिराळे रोग व दुःखे यांनीही या देहांत राहावयास जागा केली आहे.
नर्काचें कोठार भरलें । आंत बाहेरी  लिडीबिडिलें ।
मूत्रपोतडे जमलें । दुर्गंधीचें ॥ १८ ॥
१८) शरीर म्हणजे आंतून बाहेरुन घाणीने भरलेले, लडबडलेले नरकाचे कोठारच आहे. मूत्राने भरलेले दुर्गंधीचे पोतडेच आहे.
जंत किडे आणी आंतडी । नाना दुर्गंधीची पोतडी ।
अमुप लवथविती कातडी । कांटाळवाणी  ॥ १९ ॥
१९) शरीरांत जंत व किडे आहेत. आतडी घाणीने भरलेली दुर्गंधाची पोती व घाणेरडी कातडी सगळीकडे लोंबत असते.  
सर्वांगास सिर प्रमाण । तेथें बळसें वाहे घ्राण ।
उठे घाणी फुटतां श्रवण । ते दुर्गंधी ने घवे ॥ २० ॥
२०) शरीरांतील सर्वांत श्रेष्ठ भाग म्हणजे डोके. पण तेथेही नाकांतून शेंबुड येतो. कान फुटले तर असह्य दुर्गंधी येते.  
डोळां निघती चिपडें । नाकीं दाटतीं मेकडें ।
प्रातःकाळीं घाणी पडे । मुखीं मळासारिखी ॥ २१ ॥
२१) डोळ्यांतून चिपाडें निघतात, नाकामध्यें मेंकडे होतात, सकाळी तोंडांतून घाण बाहेर पडते.
लाळ थुंका आणी मळ । पीत श्र्लेष्मा प्रबळ ।
तयास म्हणती मुखकमळ । चंद्रासारिखें ॥ २२ ॥
२२) तोंडांत लाळ, थुंकी, इतर घाण, नाकांत पिवळा शेंबुड, आणि अशा मुखाला कमळची व चंद्राची उपमा देतात. 
मुख ऐसे कुश्र्चीळ दिसे । पोटीं विष्टा भरली असे ।
प्रत्यक्षास प्रमाण नसे । भूमंडळीं ॥ २३ ॥
२३) मुख असे घाणेरडे तर पोटांत विष्टा, मूत्र भरलेले; हे प्रत्यक्ष प्रमाणच या जगती आहे.
पोटीं घालितां दिव्यान्न । कांहीं विष्टा कांहीं वमन ।
भागीरथीचें घेता जीवन । त्याची होये लघुशंका ॥ २४ ॥
२४) चांगले अन्न खाल्ले तरी काहीची विष्टा होते, तर काही ओकून पडते. गंगेचे पवित्र पाणी प्यायले तरी त्याचे मूत्र बनते.  
एवं मळ मूत्र आणी वमन । हेंचि देहाचें जीवन ।  
येणेंचि देह वाढे जाण । यदर्थी संशय नाहीं ॥ २५ ॥
२५) याप्रमाणे मळ, मूत्र आणि ओकारी हेच एकंदरींत जीवन व याप्राकारेच देह वाढतो, यांत संशय नाही. 
पोटीं नस्तां मळ मूत्र वोक । मरोन जाती सकळ लोक ।
जाला राव अथवा रंक । पोटीं विष्टा चुकेना ॥ २६ ॥
२६) मळ, मूत्र व ओक पोटांत नसतील तर सगळे लोक मरुन जातील. राजा असो श्रीमंत असो पोटांत विष्टा असतेच असते.   
निर्मळपणें काढूं जातां । तरी देह पडेल तत्त्वता ।
एवं देहाची वेवरता । ऐसी असे ॥ २७ ॥
२७) ही सर्व घाण शरीरांतून काढून स्वच्छ केले तर देह टिकणार नाही. तो मरुन जाईल. अशी देहाची व्यवस्था असते. 
ऐसा हा धड असतां । येथाभूत पाहों जातां ।
मग ते दुर्दशा सांगतां । शंका बाधी ॥ २८ ॥
२८) देह धड असतांना वर्णन केल्याप्रमाणे देहाचे घणेरडेपण सांगितले, ते खरे वाटत नाही, आणि खरच इतका घाणेरडा देह आहे कां ? अशी शंका मनांत येते.
ऐसिये कारागृहीं वस्ती । नवमास बहु विपत्ती ।
नवहि द्वारें निरोधती । वायो कैंचा तेथें ॥ २९ ॥
२९) अशा या तुरुंगांत देह राहात असल्याने (जन्मापूर्विंचे) नऊ महिने फार आपत्तीतून देहास जावे लागते. गर्भाशयांत वायु नसल्याने गर्भाची नवद्वारे- २ डोळे, २ कान, २ नाकपुड्या, तोंड, गुद व उपस्थ ही बंद असतात.   
वोका नरकाचे रस झिरपती । ते जठराग्नीस्तव तापती ।
तेणें सर्वहि उकडती । अस्तिमांस ॥ ३० ॥
३०) मातेच्या पोटांतील ओका, विष्टा यांची घाण जठरांतील उष्णतेने गरम होते व गर्भाचे मांस, हाडे उकडून निघतात.  
त्वचेविण गर्भ खोळे । तव मातेसी होती डोहळे ।
कटवतिक्षणें सर्वांग पोळे । तया बाळकाचें ॥ ३१ ॥
३१) गर्भाला त्वचा नसते, पातळ खोळींत मातेच्या खाण्याने विशेषतः डोहाळी लागल्यावर तिखट, आंबट, कडू अशा खाण्याने बाळाचे सर्वांग पोळून निघते.
बांधलें चर्माचें मोटाळें । तेथें विष्ठेचें पेटाळें ।
रसउपाय वंकनाळें । होत असे ॥ ३२ ॥
३२) गर्भ म्हणजे चामड्यांत गुंडाळलेले गाठोडे असते. तेथेच (मातेच्या देहांतील विष्टेनी भरलेले (आतडयांचे) वेटोळे असते. गर्भाच्या नाळामधून त्याला हवे असलेले रस, पोषक द्रवे मिळतात.
विष्ठा मूत्र वांती पीत । नाकीं तोंडीं निघती जंत ।
तेणें निर्बुजलें चित्त । आतिशयेंसीं ॥ ३३ ॥
३३) मळ, मूत्र, ओक व पित्त यामुळे नाकातोडांतून जंत बाहेर येतात, त्यामुळे गर्भाचा जीव फार घाबराघुबरा होतो. 
ऐसिये कारागृहीं प्राणी । पडिला अत्यंत दाटणीं ।
कळवळोन म्हणे चक्रपाणी । सोडवीं येथून आतां ॥ ३४ ॥
३४) अशा तुरुंगांत पडलेला तो जीव देवाला कळवळून सांगतो की, देवा आतां येथुन सोडव.
देवा सोडविसी येथून । तरी मी स्वहित करीन ।
गर्भवास हा चुकवीन । पुन्हां न ये येथें ॥ ३५ ॥
३५) देवा, तूं येथून मला सोडवलसे तर मी माझे भले करीन आणी हा परत गर्भवास चुकवीन. परत येथे येणार नाही. 
ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली । तंव जन्मवेळ पुढें आली ।
माता आक्रंदों लागली । प्रसूतकाळीं ॥ ३६ ॥
३६) अशी अती दुःख झाल्याने प्रतिज्ञा केली. आतां जन्म घेण्याची वेळ जवळ आली. प्रसूतीच्या वेदनांनी आई ओरडू लागली. 
नाकीं तोंडीं बैसलें मांस । मस्तकद्बारें सांडी स्वास । 
तेंहि बुजलें निशेष । जन्मकाळीं ॥ ३७ ॥
३७) जन्मवेळीं गर्भाच्या नाकातोंडावर मांस बसले. डोक्यावरील टाळू मधुन श्र्वास घेऊ लागला तर तेही बुजले.  
मस्तकद्वार तें बुजलें । तेणें चित्त निर्बुजलें । 
प्राणी तळमळूं लागलें । चहूंकडे ॥ ३८ ॥
३८) मस्तकाचे टाळूचे द्वारपण बुजल्याने बाळाचा जीव घाबरा झाला. तो श्र्वासाविना तळमळु लागला.  
स्वास उस्वास कोंडला । तेणें प्राणी जाजावला ।
मार्ग दिसेनासा जाला । कासावीस॥ ३९ ॥
३९) श्र्वासोश्र्वास कोंडल्याने व बाहेर पडायचा मार्ग पण दिसेनासा झाल्याने बाळ कासावीस झाला. 
चित्त बहु निर्बुजलें । तेणें आडभरी भरलें । 
लोक म्हणती आडवें आलें । खांडून काढा ॥ ४० ॥
४०) कासावीस झालेले ते बालक बाहेर येण्याची धडपड करता करता भलतीकडेच अडकले. लोक म्हणू लागले की, आडवे आले म्हणून तुकडे करुन बाहेर काढा.  
मग ते खांडून काढिती । हस्तपाद छेदून घेती ।
हातां पडिले तेंचि कापिती । मुख नासिक उदर ॥ ४१ ॥
४१) मग ते बाळाचे हातपाय , तसेच तोंड, नाक, पोट जे अवयव सापडतील ते कापून काढतात.  
ऐसे टवके तोडिले । बाळकें प्राण सोडिले । 
मातेनेंहि सांडिलें । कळिवर ॥ ४२ ॥        
४२) अशी कापाकाप झाल्यावर बाळाने प्राण सोडला. आईनेही देह टाकला.
मृत्य पावला आपण । मातेचा घेतला प्राण ।
दुःख भोगिलें दारुण । गर्भवासीं ॥ ४३ ॥
४३) अशाप्रकारे तो जीव मेला व त्याने आईचाही जीव घेतला. ह्याशिवाय गर्भवासाचे दारुण दुःख भोगलेच.  
तथापी सुकृतेंकरुनी । मार्ग सांपडला योनी ।
तर्‍हीं आडकला जाउनी । कंठ स्कंदी मागुता ॥ ४४ ॥
४४) यदाकादाचित जन्मवेळी बाहेर येण्यासाठी जीवाला योनी मार्ग सांपडलांच तर त्या लहान मार्गांतून बाहेर येतांना गळा, खांदा वगैरे कोठेतरी अडकतेच. 
तये संकोचित पंथीं । बळेंचि वोढून काढिती ।
तेणे गुणें प्राण जाती । बाळकाचे ॥ ४५ ॥ 
४५) मग त्या अरुंद मार्गांतून बाळाला ओढून बाहेर काढतात. त्यामुळे बाळाचे प्राण जातात.  
बाळकाचे जातां प्राण । अंतीं होये विस्मरण ।
तेणें पूर्वील स्मरण । विसरोन गेला ॥ ४६ ॥   
४६) जन्माला येण्याच्यावेळी जीव भगवंताची आठवण विसरुन जातो. त्यामुळे प्राण गेल्यावर, गर्भांत असतांना भगवंताची केलेली विनवणी विसरतो.   
गर्भी म्हणे सोहं सोहं । बाहेरी पडतां म्हणे कोहं ।
ऐसा कष्टी जाला बहु । गर्भवासीं ॥ ४७ ॥
४७) गर्भांत असतांना जीव सोहं सोह ( मी परमेश्र्वर आहे) म्हणत असतो. तर जन्म घेतांना बाहेर पडतांना मी कोण मी कोण असे म्हणणारा जीव गर्भवासाच्या यातनांनी दुःखी होतो. 
दुःखा वरपडा होता जाला । थोरा कष्टीं बाहेरी आला ।
सवेंच कष्ट विसरला । गर्भवासाचे  ॥ ४८ ॥
४८) गर्भवासाच्या यातनांतून सुटुन मोठ्या कष्टाने बाहेर आला, आणि गर्भवासाचे दुःख, यातना विसरला. 
सुंन्याकार जाली वृत्ती । कांहीं आठवेना चित्तीं ।
अज्ञानें पडिली भ्रांती । तेणें सुखचि मानिलें ॥ ४९ ॥ 
४९) मन शून्याकार झाले. पूर्विंचे कांही (गर्भवासाचे दुःख )आठवेना. अज्ञानाचे आवरण मनावर पडून भ्रांत अवस्था झाली. जीव आतां तेच सुख मानू लागला.
देह विकार पावलें । सुखदुःखें झळंबलें । 
असो ऐसें गुंडाळलें । मायाजाळीं ॥ ५० ॥
५०) देहाचे विकार मागे लागले. सुख-दुःखाचे खेळ सुरु झाले. अशारीतीने मायेच्या जाळ्यांत जीव अडकला. 
ऐसें दुःख गर्भवासीं । होतें प्राणीामात्रासीं । 
म्हणोनियां भगवंतासी । शरण जावें ॥ ५१ ॥
५१) असे गर्भवासी असतांना प्राणीमात्रांनादुःख, यातना होतात. म्हणून भगवंताला शरण जावे.
जो भगवंताचा भक्त । तो जन्मापासून मुक्त ।
ज्ञानबळें विरक्त । सर्वकाळ ॥ ५२ ॥  
५२) जो भगवंताचा भक्त असतो, तो जन्मापासून मुक्त होतो. आत्मज्ञान झाल्याने तो सर्वकाळ विरक्त असतो.  ऐशा गर्भवासीं विपत्ती । निरोपिल्या येथामती ।
सावध होऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ५३
५३) अशा गर्भावस्थेंतील आपत्तीचें, दुःखाचे वर्णन मला जमले तसे केले. श्रोत्यांनी सावधपणे पुढिल भागाकडे लक्ष द्यावे. 

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे जन्मदुःखनिरुपणनाम समास पहिला ॥  
Samas Pahila JanmaDukha Nirupan
समास पहिला जन्मदुःख निरुपण



Custom Search

Monday, January 9, 2017

Samas Dahava PadhataMoorkha Lakshan समास दहावा पढतमूर्ख लक्षण


Dashak Dusara Samas Dahava PadhataMoorkha Lakshan
Samas Dahava PadhataMoorkha Lakshan is in Marathi. In this Samas, Samarth Ramdas is telling us the bad qualities of a person who is knowledgeable, but behaves like Moorkha (Mad). Even if we are having such qualities, we need not be ashamed of, because these bad qualities can be removed from our nature with our efforts. He who is PadhataMoorkha is very proud of his knowledge and he disrespects others who are also knowledgeable. He is full of Rajogun and Tamogunas. He blames others for having bad virtues, but he forgets that he himself has these bad virtues in his nature. There are many such bad virtues of PadhataMoorkha are described in this Samas.
समास दहावा पढतमूर्ख लक्षण 
श्रीराम ॥
मागां सांगितलीं लक्षणें । मूर्खाआंगीं चातुर्य बाणे ।
आतां ऐका शाहाणे । असोनि मूर्ख ॥ १ ॥
अर्थ
१) मूर्ख माणूस चतुर व्हावा म्हणुन मागे (दशक दुसरा समास पहिला) मूर्खाची लक्षणे सांगितली. आतां कांहीं लोक शहाणे असूनही मूर्खासारखेच वागतात. त्यांची लक्षणे ऐका.
तया नाव पढतमूर्ख । श्रोतीं न मनावें दुःख । 
अवगुण त्यागितां सुख । प्राप्त होये ॥ २ ॥
२) शहाणा असून मूर्खासारखा वागणार्‍याला पढतमूर्ख असे म्हणतात. श्रोत्यांनी ह्यांतील काही लक्षणे त्यांच्या अंगी असली तरी वाईट वाटुन घेऊ नये. प्रयत्नाने त्या अवगुणांचा त्याग करुन सुखी व्हावे. 
बहुश्रुत आणी वित्पन्न । प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान ।
दुराशा आणी अभिमान । धरी तो येक पढतमूर्ख ॥ ३ ॥
३) पुष्कळ वाचलेले आहे, ज्ञान पुष्कळ मिळवले असून विद्वान आहे. आत्मज्ञान, परमार्थ फार सुंदर सांगतो. परंतु ज्याच्याजवळ वाईट वासना आहे व जो अभिमानी आहे. तो पढतमूर्ख असतो. 
मुक्त क्रिया प्रतिपादी । सगुण भक्ति उछेदी ।
स्वधर्म आणी साधन निंदी । तो येक पढतमूर्ख ॥ ४ ॥
४) आत्मज्ञान झाल्यावर वागणे, वर्तणुक यावर काहीही बंधने पाळण्याची आवशकता नसते, असे सांगतो. देवाच्या सगुण रुपाची भक्ति व्यर्थ आहे, असे सांगतो. स्वधर्म व साधन यांची निंदा करतो, तो पढत मूर्ख असतो. 
आपलेन ज्ञातेपणें । सकळांस शब्द ठेवणें ।
प्राणीमात्रांचें पाहे उणें । तो येक पढतमूर्ख ॥ ५ ॥  
५) आपल्या ज्ञानाचे अभिमानाने दुसर्‍यांना कमी लेखून त्यांचे दोष दाखवतो. तो पढत मूर्ख असतो. 
शिष्यास अवज्ञा घडे । कां तो संकटीं पडे ।
जयाचेनि शब्दें मन मोडे । तो येक पढतमूर्ख ॥ ६ ॥
६) आपले शिष्य पुरी करु शकणार नाहीत अशी गोष्ट, त्यांना करावयास सांगतो. किंवा ते करत असतांना त्यांना त्रास होईल, त्यांच्यावर संकट येईल अशी त्यांना आज्ञा देतो. ज्याच्या बोलण्याने लोकांची मने दुखावली जातात. तो पढत मूर्ख असतो.    
रजोगुणी तमोगुणी । कपटी कुटिळ अंतःकर्णी ।
वैभव देखोन वाखाणी । तो येक पढतमूर्ख ॥ ७ ॥
७) जो रजोगुणी व तमोगुणी असतो. कपटी असून दुष्ट अंतःकरणाचा असतो. लोकांचा बडेजाव, पैसाअडका बघुन स्तुती करतो. तो पढत मूर्ख असतो.  
समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी दूषण । 
गुण सांगतां अवगुण । पाहे तो येक पढतमूर्ख ॥ ८ ॥
८) सर्व ग्रंथ वाचल्याशिवाय, बघितल्याशिवाय त्या ग्रंथाला वाईट म्हणतो, दुषणें देतो. ग्रंथांतील गुण सांगितले, चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी त्यातले अवगुणच शोधतो. तो पढत मूर्ख असतो.  
लक्षणें ऐकोन मानी वीट । मत्सरें करी खटपट । 
नीतिन्याय उद्धट । तो येक पढतमूर्ख ॥ ९ ॥ 
९) चांगले गुण, लक्षणें सांगायला गेलो तर त्याचा त्याला कंटाळा येतो. मत्सरामुळे नाना खटाटोपी, उद्योग, कारभार करतो. नीति न्याय काही पाळत नाही. उद्धटपणाने वागतो. तो पढत मूर्ख असतो.   
जाणपणें भरीं भरे । आला क्रोध नावरे । 
क्रिया शब्दास अंतरे । तो येक पढतमूर्ख ॥ १० ॥
१०) मी मोठा ज्ञानी अशा अभिमानाने फुगलेला असतो. ज्याला राग आवरत नाही. ज्याचे बोलणे व वागणे याचा मेळ नसतो. बोलणे एक व करणे दुसरेच असा जो वागतो. तो पढत मूर्ख असतो.  
वक्ता अधिकारेंवीण । वगत्रृत्वाचा करी सीण ।
वचन जयाचें कठीण । तो येक पढतमूर्ख ॥ ११ ॥ 
११) पात्रता नसतांना वक्ता बनतो, कोणीही त्याच्या बोलण्यास किंमत देत नसतांना उगाचच बोलण्याचे कष्ट घेतो. जो कठोर वचनी असतो. तो पढत मूर्ख असतो.  
श्रोता बहुश्रुतपणें । वक्तयास आणी उणें ।
वाचाळपणाचेनि गुणें । तो येक पढतमूर्ख ॥ १२ ॥
१२) पुष्कळ माहिती असलेला श्रोता असून तोंडाळपणाने वक्त्यास कमी लेखतो, तो पढत मूर्ख असतो. 
दोष ठेवी पुढिलांसी । तेंचि स्वयें आपणापासीं ।
ऐसें कळेना जयासी । तो येक पढतमूर्ख ॥ १३ ॥
१३) लोकांचे दोष काढतो पण तेच दोष त्याच्या अंगी आहेत याकडे दुर्लक्ष करतो. स्वतःचे तेच दोष त्याला समजत नाहीत, तो पढत मूर्ख असतो. 
अभ्यासाचेनि गुणें । सकळ विद्या जाणे । 
जनास निवऊं नेणें । तो येक पढतमूर्ख ॥ १४ ॥ 
१४) जो अभ्यास करुन बर्‍याच विद्या मिळवितो. परंतु लोकांना मात्र त्याच्या जवळच्या ज्ञानाचा उपयोग करुन समाधानी, सुखी करु शकत नाही, तो पढत मूर्ख असतो. 
हस्त बांधीजे ऊर्णतंतें । लोभें मृत्य भ्रमरातें । 
ऐसा जो प्रपंचीं गुंते । तो येक पढतमूर्ख ॥ १५ ॥  
१५) एखादा हत्ती कोळ्याच्या जाळ्यांत बांधला जातो. किंवा भुंगा मधाच्या लोभाने कमळांत अडकून पडतो व मरतो. तसाच पुष्कळ विद्यांचे ज्ञान असलेला प्रपंचांत गुंतुन आपले ज्ञान फुकट दवडतो, तो पढत मूर्ख असतो.  
स्त्रियांचा संग धरी । स्त्रियांसी निरुपण करी ।
निंद्य वस्तु आंगिकारी । तो येक पढतमूर्ख ॥ १६ ॥
१६) सतत स्त्रीयांच्या संगतींत रमतो, त्यांना उपदेश करतो. निंदनीय वस्तूंचे उपभोगांत राहतो, तो पढत मूर्ख असतो. 
जेणे उणीव ये आंगासी । तेंचि दृढ धरी मानसीं ।
देहबुद्धी जयापासीं । तो येक पढतमूर्ख ॥ १७ ॥  
१७) ज्यामुळे कमीपणा पत्करावा लागतो, तेच मनांत घट्ट धरुन ठेवतो. कमीपणा आला तरी परतपरत तसेच वागतो. जो ज्ञानी असूनही देहबुद्धी सोडत नाही. तो पढत मूर्ख असतो.   
सांडूनियां श्रीपती । जो करी नरस्तुती ।
कां दृष्टी पडिल्यांची कीर्ती । वर्णी तो येक पढतमूर्ख ॥ १८ ॥
१८) श्रीहरीची स्तुती स्तवन न करता माणसाची स्तुती करतो. जो भेटतो त्याची स्तुती करतो, तो पढत मूर्ख असतो. 
वर्णी स्त्रियांचे आवेव । नाना नाटकें हावभाव ।
देखा विसरे जो मानव । तो येक पढतमूर्ख ॥ १९ ॥ 
१९) स्त्रीयांचे वर्णन जो करतो, त्यांच्यासारखे वेश करु नाना हावभाव करतो व जो माणुस देवाला विसरतो, तो पढत मूर्ख असतो.  
भरोन वैभवाचे भरीं । जीवमात्रास तुछ्य करी ।
पाषांड मत थावरी । तो येक पढतमूर्ख ॥ २० ॥
२०) अति वैभवसंपन्नतेमुळे इतर जनांस तुच्छ मानतो. त्यांना तुच्छतेने वागवितो. शास्त्राविरुद्ध मतांना उचलून धरतो, तो पढत मूर्ख असतो.   
वित्पन्न आणी वीतरागी । ब्रह्मज्ञानी माहायोगी ।
भविष्य सांगों लागे जगीं । तो येक पढतमूर्ख ॥ २१ ॥
२१) विद्वान, विरक्त, ब्रह्मज्ञानी, महायोगी असूनही लोकांना भविष्य सांगण्याच्या मागे लागतो, तो पढत मूर्ख असतो.  
श्रवण होतां अभ्यांतरीं । गुणदोषाची चाळणा करी ।
परभूषणें मत्सरी । तो येक पढतमूर्ख ॥ २२ ॥  
२२) कांही चांगले ऐकले की, त्यांतील गुणदोषाची छाननी करुन दोषच काढतो. दुसर्‍याच्या उत्कर्षाने मत्सराने फुलतो, तो पढत मूर्ख असतो. 
नाहीं भक्तीचें साधन । नाहीं वैराग्य ना भजन ।
क्रियेविण ब्रह्मज्ञान । बोले तो येक पढतमूर्ख ॥ २३ ॥ 
२३) भक्ती नाही, वैराग्य नाही, भजन नाही,  कोठचेही साधन करीत नाही. क्रियेविण वाचाळता अश्या प्रकारे लोकांना ब्रह्मज्ञान सांगतो, तो पढत मूर्ख असतो.  न मनी तीर्थ न मनी क्षेत्र । न मनी वेद न मनी शास्त्र ।
पवित्र कुळीं जो अपवित्र । तो येक पढतमूर्ख ॥ २४ ॥
२४) पवित्र कुळांत जन्म घेऊनही ज्याच्याजवळ तीर्थ, क्षेत्र, वेद, शास्त्र यांबद्दल मनांत आदर नसतो व अशा प्रकारे अपवित्रपणे वागतो, तो पढत मूर्ख असतो. 
आदर देखोनि मन धरी । कीर्तीविण स्तुती करी ।
सवेंचि निंदी अनादरी । तो येक पढतमूर्ख ॥ २५ ॥
२५) जो कोणी ह्याला मोठा म्हणतो, त्याची मनधरणी करतो. स्तुतीस पात्र नसलेल्याची स्तुती करतो, व त्याची निंदा व अनादरसुद्धा करतो, तो पढत मूर्ख असतो.   
मागें येक पुढें येक । ऐसा जयाचा दंडक ।
बोले येक करी येक । तो येक पढतमूर्ख ॥ २६ ॥ 
२६) जो तोंडावर एक बोलतो व मागे दुसरेंच बोलतो, अशी ज्याची वागण्याची पद्धत असते, जो बोलतो एक व करतो दुसरेच, तो पढत मूर्ख असतो.   
प्रपंवविशीं सादर । परमार्थीं ज्याचा अनादर ।
जाणपणें घे अधार । तो येक पढतमूर्ख ॥ २७ ॥ 
२७) प्रपंचाबद्दल कामास सदा तयार, परंतु परमार्थाविषयी जो अनादर करतो, समजून व ज्ञानवान असूनही असा जो वागतो, तो पढत मूर्ख असतो.    
येथार्थ सांडून वचन । जो रक्षून बोले मन ।
ज्याचें जिणें पराधेन । तो येक पढतमूर्ख ॥ २८ ॥
२८) जे नीतिस, धर्मास, ज्ञानास धरुन असते ते न बोलता दुसर्‍यांना आवडेल असे बोलतो, ज्याचे जीवन दुसर्‍यावर अवलंबून असते, तो पढत मूर्ख असतो.    
सोंग संपाधी वरीवरी । करुं नये तेंचि करी ।
मार्ग चुकोन भरे भरीं । तो येक पढतमूर्ख ॥ २९ ॥
२९ ) जो चांगले वागण्याचे ढोंग व सोंग करतो, वरवरचे त्याचे वर्तन बरोबर सोंगाप्रमाणे वठवितो, जे कर्म करु नये तेच करतो व मार्ग चुकला तरी त्याच मार्गावरुन हट्टाने चालतो, तो पढत मूर्ख असतो. 
रात्रंदिवस करी श्रवण । न संडी आपले अवगुण । 
स्वहित आपलें आपण । तो येक पढतमूर्ख ॥ ३० ॥
३०) रात्रंदिवस चांगले ऐकतो तरीही स्वतःचे वाईट गुण सोडत नाही, आपले स्वहित होईल असे वागणे तो करत नाही,  तो पढत मूर्ख असतो. 
निरुपणीं भले भले । श्रोते येऊन बैसले । 
क्षुद्रें लक्षुनी बोले । तो येक पढतमूर्ख ॥ ३१ ॥ 
३१) निरुपणाच्यावेळी मोठमोठे ज्ञानी श्रोते येऊन बसले त्यांना क्षुद्र लेखून त्यांचे उणेदुणे काढतो, तो पढत मूर्ख असतो. 
शिष्य जाला अनाधिकारी । आपली अवज्ञा करी ।
पुन्हा त्याची आशा धरी । तो येक पढतमूर्ख ॥ ३२ ॥   
३२) ज्याचा शिष्य अयोग्य वर्तनाने अनाधिकारी झाला, त्या शिष्याने अपमान केला तरी जो त्याची अपेक्षा धरतो, तो पढत मूर्ख असतो.  
होत असतां श्रवण । देहास आलें उणेपण ।
क्रोधें करी चिणचिण । तो येक पढतमूर्ख ॥ ३३ ॥  
३३) श्रवण करीत असतांना याच्या देहास कांही त्रास झाला तर चिडचिडेपणा करतो, तो पढत मूर्ख असतो. 
भरोन वैभवाचे भरीं । सद्गुरुची उपेक्षा करी ।
गुरुपरंपरा चोरी । तो येक पढतमूर्ख ॥ ३४ ॥  
३४) आपल्या श्रीमंतीने, वैभवाने फुगुन जाऊन सद्गुरुची मानमर्यादा ठेवत नाही, आपली गुरुपरंपरा लपवून ठेवतो, तो पढत मूर्ख असतो. 
ज्ञान बोलोन करी स्वार्थ । कृपणा ऐसा सांची अर्थ ।
अर्थासाठीं लावी परमार्थ । तो येक पढतमूर्ख ॥ ३५ ॥ 
३५) मोठ्यामोठ्या ज्ञानाच्या गोष्टी बोलून जो आपला स्वार्थ साधतो, कंजुषपणाने पैसा जमवून ठेवतो, पैशासाठी परमार्थ ज्ञानाचा उपयोग करतो, तो पढत मूर्ख असतो. 
वर्तल्यावीण सिकवी । ब्रह्मज्ञान लावणी लावी ।
पराधेन गोसावी । तो येक पढतमूर्ख ॥ ३६ ॥
३६) आपण योग्यप्रकार न वागता, लोकांना मात्र तसे वागण्यास सांगतो, ब्रह्मज्ञानी स्वतः नसतांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, दुसर्‍याच्यावर अवलंबुन असतो, तो पढत मूर्ख असतो.    
भक्तिमार्ग अवघा मोडे । आपणामध्यें उपंढर पडे ।
ऐसिये कर्मीं पवाडे । तो येक पढतमूर्ख ॥ ३७ ॥ 
३७) जी कर्में केली तर भक्तिमार्गाचे नुकसान होते, स्वतःचे जीवनसुद्धा बिघडते, तरीही तसाच वागतो, तो पढत मूर्ख असतो.   
प्रपंच गेला हातीचा । लेश नाहीं परमार्थाचा । 
द्वेषी देवां ब्राह्मणाचा । तो येक पढतमूर्ख ॥ ३८ ॥ 
३८) प्रपंच कायमचा कामाचा नाही म्हणून तो सोडला, परमार्थ करता येत नाही, आतां मात्र देवाचा, ब्राह्मणांचा द्वेष करु लागला. तो पढत मूर्ख असतो. 
त्यागावया अवगुण । बोलिलें पढतमूर्खाचें लक्षण ।
विचक्षणें नीउन पूर्ण । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ३९ ॥
३९) अवगुणांचा त्याग करावा म्हणून पढतमूर्खाची लक्षणे सांगितली, शहाण्यांनी ती राहीली असतील ती पुरी करुन घ्यावी, व मला क्षमा करावी. 
परम मूर्खांमाजी मूर्ख । जो संसारी मानी सुख ।
या संसारदुःखा ऐसें दुःख । आणीक नाहीं ॥ ४० ॥
४०) सर्व मूर्खांमध्ये मूर्ख म्हणजे संसार सुख हे नित्य मानणारा होय. या प्रपंच्याएवढे दुःख कोठेच नाही.    
तेंचि पुढें निरुपण । जन्मदुःखाचें लक्षण ।
गर्भवास हा दारुण । पुढें निरोपिला ॥ ४१ ॥  
४१) त्याचेच निरुपण पुढीले जन्मदुःखाचे लक्षण या समासी गर्भवासाचे दारुण दुःखाद्वारे केले आहे.  

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पढतमूर्खलक्षणनाम समास दहावा ॥ 
Samas Dahava PadhataMoorkha Lakshan
समास दहावा पढतमूर्ख लक्षण 


Custom Search

Saturday, January 7, 2017

Samas Navava Virakta Lakshan समास नववा विरक्त लक्षण


Dashak Dusara Samas Navava Virakta Lakshan
 Samas Navava Virakta Lakshan is in Marathi. Samarth Ramdas is telling us the qualities of Virakta. Virakta means a person who is having spiritual mind and wants to be on spiritual path for attaining Moksha. He is a satisfied person in material life; he has nothing to gain in material life. He is beyond all desires and only goal in his life is to have Moksha. He knows that the birth of a person on this earth is to become the God and not to live a life like animals which is to eat, drink and enjoy. There is something beyond that. He is on the search of it. However to accomplish the goal he requires to develop certain qualities in his nature. Samarth is telling us these qualities in this Ninth Samas.
समास नववा विरक्त लक्षण
श्रीराम ॥
ऐका विरक्तांचीं लक्षणें । विरक्तें असावें कोण्या गुणें ।
जेणें आंगीं सामर्थ्यें बाणे । योगियाचें ॥ १ ॥
अर्थ
१) आता विरक्तांची लक्षणें ऐका. विरक्ताजवळ कोणते गुण असावेत, ज्यामुळे योग्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी येते.  
जेणें सदकीर्ति वाढे । जेणें सार्थकता घडे ।
जेणें करितां महिमा चढे । विरक्तांसी ॥ २ ॥
२) ज्या गुणांमुळे सद्कीर्ति वाढते व जन्माची सार्थकता होते आनि विरक्ताचा मोठेपणा वाढतो. 
जेणें परमार्थ फावे । जेणें आनंद हेलावे । 
जेणें विरक्ती दुणावे । विवेकेंसहित ॥ ३ ॥
३) ज्यामुळे परमार्थ साधतो, आनंद वाढतो आणि विरक्तीही विवेकाने अधिक होते. 
जेणें सुख उचंबळे । जेणें सद्विद्या वोळे ।
जेणें भाग्यश्री प्रबळे । मोक्षेंसहित ॥ ४ ॥
४) विरक्ताच्या गुणांनी सुख उचंळून येते. सद्विद्या वश होते. मोक्षाबरोबरच भाग्य फळफळून येते.
मनोरथ पूर्ण होती । सकळ कामना पुरती ।
मुखीं राहे सरस्वती । मधुर बोलावया ॥ ५ ॥
५) सर्व मनोरथ पूर्ण होतात. सर्व इच्छांची पूर्ति होते. वाणी मधुर होते कारण जीभेवर, मुखांत सरस्वतीचा वास होतो. 
हे लक्षणें श्रवण कीजे । आणि सदृढ जीवीं धरिजे ।
तरी मग विख्यात होईजे । भूमंडळीं ॥ ६ ॥
६) ही विरक्त पुरुषाची लक्षणें ऐका व मनांत घट्ट धरुन ठेवा म्हणजे मग या भूमंडळावर प्रसिद्धि, मोठेपणा मिळतो.   
विरक्तें विवेकें असावें । विरक्तें अध्यात्म वाढवावें ।
विरक्तें धारिष्ट धरावें । दमनविषंई ॥ ७ ॥
७) विरक्ताने नेहमी विवेक जागृत ठेवावा. जनांमध्ये अध्यात्म, परमार्थ वाढवावा. इंद्रियांची वासना ताब्यांत ठेवण्यासाठी मोठ्या धैर्याने वागावे.
विरक्तें राखावें साधन । विरक्तें लावावे भजन ।
विरक्तें विशेष ब्रह्मज्ञान । प्रगटावावें ॥ ८ ॥
८) विरक्ताने आपले साधन व्यवस्थित व नियमीत करावे. लोकांना व भाविकांना भगवंताच्या भजनाविषयीं गोडी निर्माण करावी. विरक्ताने जनांना ब्रह्मज्ञानाबद्दल अधिक माहिती आपल्या अनुभवाने व निरुपणाने द्यावी.    
विरक्तें भक्ती वाढवावी । विरक्तें शांती दाखवावी ।
विरक्तें येत्नें करावी । विरक्ती आपुली ॥ ९ ॥
९) भगवंताची भाविकांमध्ये भक्ती वाढवावी. शांतीचे दर्शन लोकांना आपल्या अढळ शांतीने दाखवावे. हे सर्व करतांना प्रयत्नपूर्वक स्वतःची विरक्ती सांभाळावी.  विरक्तें सदक्रिया प्रतिष्ठावी । विरक्तें निवृत्ति विस्तारावी ।
विरक्तें नैराशता धरावी । सदृढ जिवेंसी ॥ १० ॥
१०) विरक्ताने सद्क्रिया, सद्कर्मे यांचे महत्व वाढवावे. विरक्ताने विरक्ती, संसारिक नैमित्तीक कार्यांतून लोकांमध्ये  निवृत्ती वाढवावी. विरक्ताने कर्मफलाविषयीं उदासिनता, नैराशता आपल्या मनांत घट्ट धरुन ठेवावी.  
विरक्तें धर्मस्थापना करावी । विरक्तें नीति आवलंबावी ।
विरक्तें क्ष्मा सांभाळावी । अत्यादरेंसी ॥ ११ ॥
११) विरक्ताने धर्माचे रक्षण करावे, त्याचे पुनरुज्जीवन करावे. त्याने नीतिमान व अत्यंत क्षमाशील असावे.
विरक्तें परमार्थ उजळावा । विरक्तें विचार शोधावा ।
विरक्तें सन्निध ठेवावा । सन्मार्ग सत्वगुण ॥ १२ ॥
१२) विरक्ताने परमार्थाचा मार्ग लोकांना स्वच्छ दाखवावा. सतत चिंतनशीलता जोपासावी. त्याने सत्वगुणी राहून नेहमी सन्मार्गाने चालावे. 
विरक्तें भाविकें सांभाळावीं । विरक्तें प्रेमळें निववावीं ।
विरक्तें साबडीं नुपेक्षावीं । शरणागतें ॥ १३ ॥
१३) विरक्ताने श्रद्धावान भाविकांचा सांभाळ करावा. भगवंतावर मनापासून प्रेम करणार्‍या भक्तांचा संशय, मनस्ताप दूर करावा. भोळ्याभाबड्या लोकांना दूर लोटू नये.
विरक्तें असावें परम दक्ष । विरक्तें असावें अंतरसाक्ष ।
विरक्तें वोढावा कैपक्ष । परमार्थाचा ॥ १४ ॥
१४) विरक्ताने नेहमी अति दक्ष असावे. त्याने दुसर्‍यांचे अंतरंग ओळखून वर्तन करावे, त्याने नेहमी परमार्थाचीच बाजू घ्यावी.  
विरक्तें अभ्यास करावा । विरक्तें साक्षेप धरावा ।
विरक्तें वगत्रुत्वें उभारावा । मोडला परमार्थ ॥ १५ ॥
१५) विरक्ताने नेहमी अध्यात्माचा अभ्यास करावा. त्याने नेहमी कांहीतरी करत राहावे, ऐकत राहावे. आपल्या निरुपणाने, प्रवचनांनी परमार्थ जनांमध्ये वाढवावा. लोकांचे शंका, संशय निरसुन परमार्थ परत मार्गी लावावा.  
विरक्तें विमळ ज्ञान बोलावें । विरक्तें वैराग्य स्तवीत जावें ।
विरक्तें निश्र्चयाचें करावें । समाधान ॥ १६ ॥
१६) विरक्ताने शुद्ध आत्मज्ञानाचा प्रसार करावा. नेहमी वैराग्य वृत्तीनेच राहावे व त्याचा लोकांनाही निश्र्चयात्मक उपदेश त्यांचे शंका समाधानकरुन करावा. 
पर्वें करावीं अचाटें । चालवावीं भक्तांची थाटे ।
नाना वैभवें कचाटें । उपासनामार्ग ॥ १७ ॥
१७) मोठ्या प्रमाणावर पर्व, जयन्त्या वगैरे उत्सव करावे. भजने, निरुपणे, किर्तने, प्रवचने वगैरे करुन भक्तीमार्गाचा प्रसार करावा. त्यानिमित्य भक्तांना एकत्र आणावे. 
हरिकीर्तनें करावीं । निरुपणें माजवावी ।
भक्तिमार्गें लाजवावीं । निंदक दुर्जनें ॥ १८ ॥
१८) भगवंताची कीर्तनें, भजनें करावी, करवावी. निरुपणे करावी. पुष्कळ भक्त एकत्र आणून भक्तीमार्गाचा दणका उडवून द्यावा. यायोगे दुर्जन निंदक यांना भक्तीमार्गाच्या या वैभवाने दिपवून टाकावे. 
बहुतांस करावे परोपकार । भलेपणाचा जीर्णोद्धार ।
पुण्यमार्गाचा विस्तार । बळेंचि करावा ॥ १९ ॥
१९) रंजले, गांजले, भक्त या सर्वांवर त्याचे भले होईल असे कांही उपकार करावा. सज्जनपणाने वागणार्‍यांचा सत्कार, गौरव करावा. पुण्य मार्गांत जास्तीत जास्त लोक येतील असे जोरदार प्रयत्न करावे.     
स्नान संध्या जप ध्यान । तीर्थयात्रा भगवद्भजन । 
नित्यनेम पवित्रपण । अंतरशुद्ध असावें ॥ २० ॥
२०) आपण स्वतः नित्य नेमाने स्नानसंध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा करणे असा नित्य नेम नेहमी काळजीपूर्वक करुन पवित्रपण जपून अंतरंग शुद्ध ठेवावे.
दृढ निश्र्चयो धरावा । संसार सुखाचा करावा ।
विश्र्वजन उद्धरावा । संसर्गमात्रें ॥ २१ ॥
२१) दृढ निश्र्चयाने वागून संसार सुखाचा करावा. लोकांना आपल्या संसर्गाने, संगतींत ठेवून भक्तीमार्गांत त्यांना आणुन त्यांचा उद्धार करावा. 
विरक्तें असावें धीर । विरक्तें असावें उदार ।
विरक्तें असावें तत्पर । निरुपणाविषंई ॥ २२ ॥
२२) विरक्ताने नेहमी धीराने, धैर्याने सावध असावे. त्याने उदार असावे. तत्परतेने निरुपणे करुन भक्तीभाव लोकांत वाढवावा. 
विरक्तें सावध असावें । विरक्तें शुद्धमार्गे जावें ।
विरक्तें झिजोन उरवावें । सदकीर्तिसी ॥ २३ ॥
२३) त्याने सावध असावे. नेहमी शुद्ध मार्गाचाच अवलंब करावा. प्रसंगी आपले धन खर्च करुन, मन भक्तीमार्गाला वाहून, देह झिजवून सद्कीर्तीस आपल्यानंतरही टिकवावे.     
विरक्तें विरक्त धुंडावें । विरक्तें साधु वोळखावें ।
विरक्तें मित्र करावें । संत योगी सज्जन ॥ २४ ॥
२४) विरक्ताने इतर विरक्तांचा शोध घ्यावा. साधु, सज्जन यांना ओळखून त्यांचा आदर करावा. त्याने संत, योगी व सज्जन अश्या योग्य लोकांशी मित्रत्व करावे.  
विरक्तें करावीं पुरश्र्चरणें । विरक्तें फिरावीं तीर्थाटणें ।
विरक्तें करावीं नाना स्थानें । परम रमणीय ॥ २५ ॥
२५) विरक्ताने पुरश्र्चरणे करावीत. तीर्थयात्रा कराव्यात. निरनिराळी रमणीय व पवित्र स्थाने करावीत.
विरक्तें उपाधी करावी । आणी उदास वृत्ति न संडावी ।
दुराशा जडों नेदावी । कोणयेकविषंई ॥ २६ ॥
२६) विरक्ताने निरनिराळ्या कामाद्वारे लोकांना मदत करावी, परोपकार करावा, पण त्यांतही आपली विरक्त वृत्ती कायम ठेवावी. कशाबद्दलही दुराशा जडवून घेउ नये.  
विरक्तें असावें अंतरनिष्ठ । विरक्तें नसावें क्रियाभ्रष्ट ।
विरक्तें न व्हावें कनिष्ठ । पराधेनपणें ॥ २७ ॥
२७) विरक्ताने अंतरमुख वृत्तीने असावे. त्याने वाईट काम करुन क्रियाभ्रष्ट होऊ नये, आचरण शुद्ध ठेवावे. दुसर्‍यांच्या आधिन होऊन कनिष्ठपण स्वीकारु नये.     विरक्तें समय जाणावा । विरक्तें प्रसंग वोळखावा ।
विरक्त चतुर असावा । सर्व प्रकारें ॥ २८ ॥   
२८) विरक्ताने वेळप्रसंग ओळखून वागावे. सर्वप्रकारे चातुर्य विरक्ताजवळ असावे.  
विरक्तें येकदेसी नसावें । विरक्तें सर्व अभ्यासावें ।
विरक्तें अवघें जाणावें । ज्याचें त्यापरी ॥ २९ ॥  
२९) विरक्तानें फक्त एकाच गोष्टीचे ज्ञान घेऊन थांबू नये, त्याला पुष्कळ गोष्टींचे ज्ञान असावे. सर्व ज्ञानाच्या शाखांचा त्याने अभ्यास करावा. जे जसे असेल तसे तसे ते समजून घ्यावे.
हरिकथा निरुपण । सगुणभजन ब्रह्मज्ञान ।
पिंडज्ञान तत्वज्ञान । सर्व जाणावें ॥ ३० ॥
३०) भगवंताच्या कथा ,निरुपण, भगवंताच्या सगुणरुपाचे भजन व उपासना, आत्मज्ञान, परमात्मस्वरुप ज्ञान, शरीराचे ज्ञान, तत्वज्ञान ह्या सर्वाचे ज्ञान त्याला असावे.  
कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग ।
प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । सकळ जाणावें ॥ ३१ ॥
३१) परमार्थाची साधने म्हणजे कर्ममार्ग, कोणत्या उपासना केल्यावर, कोणचे ज्ञान मिळवणे परमार्थासाठी योग्य, सिद्धांतमार्ग, प्रवृत्तीमार्ग, निवृत्ती कशाची व कशापासून परमार्थासाठी आवशक या सर्व मार्गांची माहिती व ज्ञान विरक्ताला असावे.  
प्रेमळ स्थिती उदास स्थिती । योगस्थिती ध्यानस्थिती ।
विदेह स्थिती सहज स्थिती । सकळ जाणावें ॥ ३२ ॥
३२) भगवंताचे प्रेम वाढू लागल्यावर होणारी अवस्था, इच्छा, वासनांचे पूर्ण निरसन होऊन येणारी उदासीन अवस्था, योग समाधी साधल्यावर, ध्यान साधल्यावर, विदेही अवस्थेचे ज्ञान झाल्यावर, सहज स्थिती हे अभ्यासाद्वारे विरक्ताने जाणावे.    
ध्वनी लक्ष मुद्रा आसनें । मंत्र यंत्र विधी विधानें ।
नाना मतांचें देखणें । पाहोन सांडावें ॥ ३३ ॥
३३) निरनिराळ्या प्रकारचे नाद, मुद्रा, आसनें, मंत्र, यंत्र यांचे विधी व विधानें, निरनिराळी मतें व दर्शने, या सर्वाचे ज्ञान घेऊन मग ते सोडून द्यावे. कारण परमार्थास ते उपयोगी नाही.  
विरक्तें असावें जगमित्र । विरक्तें असावें स्वतंत्र ।
विरक्तें असावें विचित्र । बहुगुणी ॥ ३४ ॥  
३४) विरक्ताने जगमित्र असावे. त्याने स्वतंत्र असावे. त्याने विचित्र अशा बहुविध गुणांनी युक्त असावे.
विरक्तें असावें विरक्त । विरक्तें असावें हरिभक्त ।
विरक्तें असावें नित्यमुक्त । अलिप्तपणें ॥ ३५ ॥
३५) विरक्ताने कमालीचे विरक्त असावे. कोठल्याही आशा, अपेक्षा, इच्छा, नाती, भावना अशा गोष्टींना आपल्याजवळ थारा देऊ नये.  
विरक्तें शास्त्रें धांडोळावी । विरक्तें मतें विभांडावी ।
विरक्तें मुमुक्षें लावावीं । शुद्धमार्गें ॥ ३६ ॥
३६) विरक्ताने शास्त्रांचे शुद्ध व सखोल ज्ञान मिळवावे. निरनिराळी परमार्थाला मारक मते खोडून काढावीत. भगवंतच्या प्रेमाची व प्राप्तीची इच्छा असणार्‍यांना शुद्धमार्गास लावावे.  
विरक्तें शुद्धमार्ग सांगावा । विरक्तें संशय छेदावा ।
विरक्तें आपला म्हणावा । विश्र्वजन ॥ ३७ ॥
३७) विरक्ताने परमार्थाचा शुद्धमार्ग सांगावा. निरुपणाद्वारे संशय, शंकांचे निरसन करावे. सर्व विश्र्वजनांस आपले म्हणावे. 
विरक्तें निंदक वंदावें । विरक्तें साधक बोधावे ।
विरक्तें बद्ध चेववावे । मुमुक्षुनिरुपणें ॥ ३८ ॥
३८) विरक्ताने निंदकांना (वाद न घालता) वंदन करावे. साधकांना शुद्ध ज्ञानाद्वारे भक्तीमार्गाचे ज्ञान द्यावे. संसारांत अजुनही आसक्त असलेल्यांना प्रवचनाद्वारे भगवंताच्या भक्तीविषयी, परमार्थाविषयीं जागरुक करावे.   
विरक्तें उत्तम गुण घ्यावे । विरक्तें अवगुण त्यागावे ।
नाना अपाय भंगावे । विवेकबळें ॥ ३९ ॥     
३९) विरक्ताने उत्तम गुण अंगी वाढवावे. अवगुणांचा त्याग करावा. परमार्थाच्या आड येणार्‍या सर्व संकटे, अडचणी यावर विवेकाने मात करावी. 
ऐसीं हें उत्तम लक्षणें । ऐकावीं येकाग्र मनें ।
याचा अव्हेर न करणें । विरक्त पुरुषें ॥ ४० ॥
४०) अशीही चांगली लक्षणे, मन एकाग्र करुन ऐकावीत. यांच्याकडे विरक्ताने दुर्लक्ष करु नये. 
इतुकें बोलिलें स्वभावें । त्यांत मानेल तितुकें घ्यावें ।
श्रोतीं उदास न करावें । बहु बोलिलें म्हणौनी ॥ ४१ ॥
४१) माझ्या स्वभावास अनुसरुन मी हे विरक्ताचे गुण सांगितले. त्यांतील मानवतील तेवढे स्वीकारावे. श्रोत्यांनी मी फार बोललो म्हणून उदास करु नये व होऊ पण नये.
परंतु लक्षणें ने घेतां । अवलक्षणें बाष्कळता ।
तेणें त्यास पढतमूर्खता । येवों पाहे ॥ ४२ ॥
४२) परंतु ही चांगली लक्षणे अंगी बाणविली नाहीत व अवगुण अंगीकारले तर पढतमूर्खपणा येऊ लागतो. 
त्या पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरुपण ।
बोलिलें असे सावधान । होऊन ऐका ॥ ४३ ॥
४३) पढतमूर्खाचे (अव)गुणवर्णन पुढले समासी (त्यागास्तव) सावधपणें ऐका.  

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विरक्तलक्षणनाम समास नववा ॥
Samas Navava Virakta Lakshan
समास नववा विरक्त लक्षण


Custom Search

Thursday, January 5, 2017

Samas Aathava Sadvidya Nirupan समास आठवा सद्विद्या निरुपण


Dashak Dusara Samas Aathava Sadvidya Nirupan
Samas Aathava Sadvidya Nirupan is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Sadvidya. He is describing the person who is having Sadvidya. The qualities of Sadvidya are very good and pure. If we just go on thinking deeply about these qualities then Sadvidya qualities becomes part of our nature. Everybody should have these qualities however the person who wants progress in spirituality then he must have Sadvidya qualities in his nature. The person, who is having Sadvidya qualities, is Satvaguni. He is very kind hearted, knowledgeable but calm and quiet. There are many described.
समास आठवा सद्विद्या निरुपण
श्रीराम ॥
ऐका सद्विद्येचीं लक्षणें । परम शुद्ध सुलक्षणें ।
विचार घेतां बळेंचि बाणे । सद्विद्या आंगी ॥ १ ॥
१) आता सद्विद्येची लक्षणें ऐका. ती अतिशय शुद्ध असून त्यांचा ठाम विचार केला की, सद्विद्या आपल्या अंगी बाणते. 
सद्विद्येचा जो पुरुष । तो उत्तम लक्षणी विशेष ।
त्याचे गुण ऐकतां संतोष । परम वाटे ॥ २ ॥  
२) सद्विद्या अंगी असलेला पुरुष अति उत्तम गुणांनी युक्त असतो. त्याचे गुण ऐकल्यावर मनाला परम संतोष वाटतो.
भाविक सात्विक प्रेमळ । शांति क्ष्मा दयासीळ ।
लीन तत्पर केवळ । अमृतवचनी ॥ ३ ॥ 
३) असा तो भाविक असतो, प्रेमळ व सात्विक असतो. जणु दया, क्षमा व शांती यांचा पुतळाच असतो. कितीही ज्ञानसंपन्न, थोर, उच्चपदस्थ असला तरी नम्र असतो व कोठच्याही चांगल्या कामास सदैव तयार असतो. त्याचे बोलणे आर्जवी, मधुर असते.  
परम सुंदर आणी चतुर । परम सबळ आणी धीर ।
परम संपन्न आणी उदार । आतिशयेंसीं ॥ ४ ॥ 
४) तो अति सुंदर व चतुर असतो. तो बलवान, धैर्यवान असतो. तो संपत्ती, ज्ञान ह्यांनी श्रीमंत असतो व धन अणि ज्ञान दात्यास देण्यासाठी उदार असतो. 
परम ज्ञाता आणी भक्त । माहा पंडित आणी उदार । 
माहा तपस्वी आणी शांत । आतिशयेंसीं ॥ ५ ॥ 
५) तो ज्ञानवान आणि देवाचा भक्त असतो. अंगी मोठे पांडित्य असून उदार असतो.  महा तपस्वी व शांत असतो. 
वक्ता आणी नैराशता । सर्वज्ञ आणी सादरता ।
श्रेष्ठ आणी नम्रता । सर्वत्रांसीं ॥ ६ ॥
६) तो मोठा वक्ता असून त्याला लोभ नसतो. सर्वज्ञ असुन दुसर्‍यांशी आदराने वागतो. श्रेष्ठ असुनही नम्र असतो. 
राजा आणी धार्मिक । शूर आणी विवेक । 
तारुण्य आणी नेमक । आतिशयेंसीं ॥ ७ ॥  
७) तो राजा असुन धार्मिक; शूर असून विवेकी; तरुण असुन नियमाने वागतो.
वृधाचारी कुळाचारी । युक्ताहारी निर्विकारी ।
धन्वंतरी परोपकारी । पद्महस्ती ॥ ८ ॥ 
८) वाडवडिलांच्या मार्गावरुन चालतो, कुळाचार पाळतो, परोपकारी व धन्वतरी, हातावर यश देणारे चिन्ह असते.  
कार्यकर्ता निराभिमानी । गायक आणी वैष्णव जनी ।
वैभव आणी भगवद्भजनी । अत्तादरें ॥ ९ ॥
९) चांगले काम करण्यास तयार, अभिमान नसतो, गायक असतो, भगवंताची भजने म्हणुन भक्ति करणारा, वैभवी असला तरी देवाची भक्ती आादराने करतो. 
तत्वज्ञ आणी उदासीन । बहुश्रुत आणी सज्जन ।
मंत्री आणी सगुण । नीतिवंत ॥ १० ॥
१०) तत्वज्ञानी असुन आसक्ति विरहीतअसतो, मोठा पंडित असुन सज्जन असतो, राज्यकारभारांत सल्ला मसलती करणारा, सद्गुणी व नीतिने आचरण करणारा असतो. 
साधु पवित्र पुण्यसीळ । अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ ।
कर्मनिष्ठ स्वधर्में निर्मळ । निर्लोप अनुतापी ॥ ११ ॥
११) साधु वृत्तीचा, पवित्र, पुण्यवंत, अंतःकरणाने शुद्ध, निर्मळ मनाचा, मोठा कर्मनिष्ठ, स्वधर्मी, निर्लोभी व स्वतःच्या चुकीचा खेद करणारा असतो.
गोडी आवडी परमार्थप्रीती । सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती ।
श्रुति स्मृती लीळा युक्ति । स्तुती मती परीक्षा ॥ १२ ॥
१२) परमार्थाची आवड, प्रेम व गोडी असते. सन्मार्गाने चालणारा, चांगल्या कर्मांचे आचरण करतो,  भगवंताचे कायम अनिसंधान ठेवतो, मन स्थिर ठेवतो, श्रुति,स्मृतिचे ज्ञान असते, खेळ म्हणून युक्तीने कार्य करतो, देवाची स्तुति करण्याची कला त्याला येते, निरनिराळ्या गोष्टींची माहिती किंवा ज्ञान त्याला असते.  दक्ष धूर्त योग्य तार्किक । सत्य साहित्य नेमक भेदक ।
कुशळ चपळ चमत्कारिक । नाना प्रकारें ॥ १३ ॥
१३) नेहमी सावध असतो, लबाडीने वागणार्‍याची लबाडी हुशारीने ओळखणारा असतो, योग्य प्रकारे विचार व तर्क करणारा असतो, सत्याच्या मार्गाने चालतो, साहित्याचे ज्ञान असते, नियमाने व नेमाने वागणारा, प्रत्येक गोष्टीचे अगर प्रसंगाचे मूळापर्यंत जाऊन ज्ञान करुन घेण्याची हातोटी त्याच्याजवळ असते, कुशलतेने काम करणारा, चपळाईने काम उरकणारा, असे निरनिराळे प्रसंगी चमत्कारिक वाटणारे गुण त्याच्याजवळ असतात.    
आदर सन्मान तार्तम्य जाणे । प्रयोग समयो प्रसंग जाणे ।
कार्याकारण चिन्हें जाणे । विचक्षण बोलिका ॥ १४ ॥
१४) लोकांचा आदर व सन्मान करतांना तो किती व कसा हे तो बरोबर जाणतो, कोणत्यावेळी कसे वागावे हे त्याला बरोबर माहित असते. कामे करतांना ती कां कराची ह्याचे ज्ञान त्याला असते. हुषारीने बोलणारा असतो.  
सावध साक्षेपी साधक । आगमनिगमशोधक ।
ज्ञानविज्ञानबोधक । निश्र्चयात्मक ॥ १५ ॥
१५) सावधगीरीने वागतो, नेहमी कार्यरत असतो, वेद व शास्त्रे यांचा अभ्यास करणारा, ज्ञान व विज्ञान यांची योग्य सांगड घालून पक्का बोध करुन घेणारा व देणारा असतो.
पुरश्र्चरणी तीर्थवासी । दृढव्रती कायाक्लेसी ।
उपासक निग्रहासी । करुं जाणे ॥ १६ ॥
१६) पुरश्र्चरणे करणारा, तीर्यात्रा करणारा, कठिण व्रते करतो, त्यासाठी देह कष्टवितो, निग्रहाने-निश्र्चयाने भगवंताची उपासना करतो. 
सत्यवचनी शुभवचनी । कोमळवचनी येकवचनी व सुखकार। 
निश्र्चयवचनी सौख्यवचनी । सर्वकाळ ॥ १७ ॥
१७) नेहमी खरे बोलणारा, शुभ बोलणारा, मृदु बोलणारा, एकवचनी, निश्र्चयात्मक बोलणारा व सुखकारक बोलणारा असतो. 
वासनातृप्त सखोल योगी । भव्य सुप्रसन्न वीतरागी ।
सौम्य सात्विक शुद्धमार्गी । निःकपट निर्वेसनी ॥ १८ ॥
१८) त्याच्या सर्व वासना तृप्त असतात, मूलापर्यंत जाऊन अभ्यास करणारा योगी असतो, भव्य व सुप्रसन्न व्यक्तिमत्वाचा, विरक्त असुन सौम्य व सात्विक वर्तुणुकीचा शुद्ध मार्गीअसतो, त्याच्याजवळ कपट नसते. तो व्यसनी नसतो. 
सुगड संगीत गुणग्राही । अनापेक्षी लोकसंग्रही ।
आर्जव सख्य सर्वहि । प्राणीमात्रासी ॥ १९ ॥
१९) कोणतेही काम उत्तम करतो, संगीतज्ञ असतो, दुसर्‍याच्या गुणांची प्रशंसा करतो, अपेक्षा न ठेवता अनेक लोकांशी मैत्री करतो, सर्व प्राण्यांशी आर्जवाने, सख्याने, गोडीने वागतो.
द्रव्यसुची दारासुची । न्यायसुची अंतरसुची ।
प्रवृत्तिसुची निवृत्तिसुची । सर्वसुची निःसंगपणें ॥ २० ॥
२०) धन व स्त्रिया यांच्या बाबतींत शीलवंत, वागणुक न्यायाला, नीतिमर्यादा धरुन व सांभाळुन असते. शुद्ध अंतःकरणी, संसारांत व परमार्थांतही वागणे चोख, पवित्र असते, सर्व जीवन पवित्र व निर्मळ असते.  
मित्रपणें परहितकारी । वाग्माधुर्य परशोकहारी ।
सामर्थ्यपणें वेत्रधारी । पुरुषार्थें जगमित्र ॥ २१ ॥
२१) दुसर्‍यांशी मित्रत्वाने वागणे, दुसर्‍यांचे हित करणे, भले चिंतणे, मधुर वाणीचा व इतरांचा शोक, दुःख कमी करणाराअसतो. आपल्या अधिकारांत गरिबांचे, अनाथांचे व सज्जनांचे भले करतो. आपल्या चांगल्या वागण्याने सर्वांचा मित्र बनतो.
संशयछेदक विशाळ वक्ता । सकळ क्लृप्त असोनि श्रोता ।
कथानिरुपणीं शब्दार्था । जाऊंच नेदी ॥ २२ ॥
२२) उत्कृष्ट ज्ञानी वक्ता असल्याने लोकांचे संशय निरसन करतो. सर्वज्ञान असले तरी उत्तम श्रोता होऊन दुसर्‍यांचे बोलणे व्यवस्थित ऐकून घेणारा असतो. कथा, प्रवचन यांचे निरुपण मनापासून ऐकतो व भावार्थाकडेही लक्ष देतो.
वेवादरहित संवादी । संगरहित निरोपाधी ।
दुराशारहित अक्रोधी । निर्दोष निर्मत्सरी ॥ २३ ॥
२३) वादविवादाशिवाय उत्तम संवाद साधतो, कोणतीही उपाधी लावून न घेता अलिप्त राहतो. अयोग्य आशा, अपेक्षा बाळगत नाही. क्रोध करत नाही. कोठचेही दोष त्याच्याजवळ नसतात, कोणाचाही मत्सर करत नाही.
विमळज्ञानी निश्र्चयात्मक। समाधानी आणी भजक ।
सिद्ध असोनी साधक । साधन रक्षी ॥ २४ ॥
२४) शुद्ध ज्ञानी असल्याने निश्र्चयी असतो, समाधानी व भगवंतास भजणारा असतो. सिद्धि प्राप्त झाल्या तरी साधकाच्याच वृत्तींत असतो. साधनाचे रक्षण करणारा असतो.
सुखरुप संतोषरुप । आनंदरुप हास्यरुप । 
ऐक्यरुप आत्मरुप । सर्वत्रांसी ॥ २५ ॥
२५) सद्विद्येनेयुक्त पुरुष सुखी, संतोषी, आनंदी, हसरा, आत्मरुपी होऊन सर्वांशी एकरुप झालेला असतो.  
भाग्यवंत जयवंत । रुपवंत गुणवंत ।
आचारवंत क्रियावंत । विचारवंत स्थिती ॥ २६ ॥
२६) तो भग्यवंत, जयवंत, रुपवंत, गुणवंत, आचारधर्म पाळणारा आचारवंत, क्रियावंत, उत्तम विचारी विचारवंत असतो.   
येशवंत कीर्तिवंत । शक्तिवंत सामर्थ्यवंत ।
वीर्यवंत वरदवंत । सत्यवंत सुकृती ॥ २७ ॥
२७) तो यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, त्याचा आशिर्वाद शुभफलदायी असतो, सत्यवंत व चांगली कामे, कृती करणारा असतो.  
विद्यावंत कळावंत । लक्ष्मीवंत लक्ष्णवंत ।
कुळवंत सुचिष्मंत । बळवंत दयाळु ॥ २८ ॥
२८) हे विद्याविभूषित, कलावंत, लक्ष्मीवंत, उत्तम लक्षणांनी युक्त असतो,  कुलीन, पवित्र, बळवंत व दयाळु असतो. 
युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ । बुद्धिवंत बहुधारिष्ट । 
दीक्षावंत सदा संतुष्ट । निस्पृह वीतरागी ॥ २९ ॥ 
२९) तो युक्तिने कार्य करणारा, गुणी, श्रेष्ठ, बुद्धिमान, धैर्यवान, परमार्थ दीक्षा संपन्न, संतुष्ट, इच्छा विरहीत म्हणजे कसलीही इच्छा न करणारा असतो, वैराग्यशील असतो.
असो ऐसे उत्तम गुण । हें सद्विद्येचें लक्षण ।
अभ्यासाया निरुपण । अल्पमात्र बोलिलें ॥ ३० ॥
३०) असो आतापर्यंत हे सद्विद्येचे गुण, त्यांचा अभ्यास करुन अंगांत बाणवावे म्हणुन थोडेसे सांगितले. 
रुप लावण्य अभ्यासितां नये । सहज गुणास न चले उपाये । 
कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ॥ ३१ ॥
३१) रुप व लावण्य हे गुण उपजत असतात मात्र इतर उत्तम गुण अभ्यास करुन, प्रयत्नाने अंगी बाणवता येतात.
ऐसी हे सद्विद्या बरवी । सर्वत्रांपासी असावी ।
परी विरक्त पुरुषें अभ्यासावी । अगत्यरुप ॥ ३२ ॥ 
३२) अशी सद्विद्या सर्वांजवळ असावी. विरक्त पुरुषाने मात्र ती आपल्या अंगी प्रयत्नपूर्वक वाढवावी. 

॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सद्विद्यानिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava Sadvidya Nirupan
समास आठवा सद्विद्या निरुपण


Custom Search