Sunday, June 4, 2017

Samas Dahava MuktiChatushtaya समास दहावा मुक्तिचतुष्टय


Dashak Choutha Samas Dahava MuktiChatushtaya 
Samas Dahava MuktiChatushatya is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Mukti. MuktiChatushtaya. There are foru types of Mukti. 1) Salokata 2) Samipata 3) Sarupata 4) SayojyaMukti. 1) Salokata Mukti means the devotee after his death goes to his God’s Loka. Suppose a particular devotee is in devotion of God Vishnu. Then after his death rest to VishnuLoka. 2) Samipata Mukti means Devotee live with the God. 3) Sarupata means devotee gets the rupa of God. These three mukties are not permanent. After the stck of their punya is finished, they are sent to earth again. 4) Sayojya Mukti this is a permanent mukti. Devotee is free from birth-death cycle and he rest with God forever.
समास दहावा मुक्तिचतुष्टय
श्रीराम ॥
मुळी ब्रह्म निराकार । तेथें स्फूर्तिरुप अहंकार ।
तो पंचभूतांचा विचार । ज्ञानदशकीं बोलिला ॥ १ ॥
१) मुळांत ब्रह्म अव्यक्त व आकाररहित आहे. तेथें ही व्यक्त व साकार सृष्टी वगैरे कांही नसतें व नव्हतें. त्या निरागस ब्रह्मामध्यें एक स्फुरण उद्भवले तो अहंकार होय. त्यांतून पंचभूतात्मक सृष्टि निर्माण झाली. ती कशी झाली त्याचा विचार ज्ञानदशकांत म्हणजे आठव्या दशकांत केला आहे.     
तो अहंकार वायोरुप । तयावरी तेजाचें स्वरुप ।ते
तया तेजाच्या आधारें आप। आवर्णोदकदाटलें ॥ २ ॥
२) तें अहंकाराचे स्फुरण वायुसारखे शक्तीरुप असते. त्यातून तेज प्रगटते. व त्या तेजाच्या आधारे सगळीकडे पाणी भरुन गेले.
तया आवर्णोदकाच्या आधारें । धरा धरिली फणिवरें ।
वरती छपन्न कोटी विस्तारें । वसुंधरा हे ॥ ३ ॥
३) त्या पाण्याच्या आधारे शेषाने आपल्या मस्तकावर पृथ्वी उचलून धरली. छपन्न कोटी योजने इतका पृथ्वीचा विस्तार आहे.  
इयेवरी परीघ सप्त सागर । मध्य मेरु माहां थोर । 
अष्ट दिग्पाळ तो परिवार । अंतरें वेष्टित राहिला ॥ ४ ॥
४) तिच्या भोवती सात सागरांचा वेढा आहे. मध्यें मोठा प्रचंड मेरु पर्वत आहे. आठ दिशापालकांचा हे सगळे अंतर वेढून आहे.  
तो सुवर्णाचा माहा मेरु । पृथ्वीस तयाचा आधारु ।
चौर्‍यासी सहस्त्र विस्तारु । रुंदी तयाची ॥ ५ ॥
५) तो प्रचंड मेरु पर्वत सोन्याचा आहे. पृथ्वीला तो आधार देतो. चौर्‍यांशी हजार योजने त्याची रुंदी आहे.  
उंच तरी मर्यादेवेगळा । भूमीमधें सहस्त्र सोळा ।
तया भोवता वेष्टित पाळा । लोकालोक पर्वताचा ॥ ६ ॥
६) त्याची उंची मोजणे शक्य नाही. तो भूमीच्या आंत सोळा हजार योजने गेला आहे. रक्षणासाठी त्याच्या भोवती लोकालोक पर्वताचा वेढा आहे.
तया ऐलिकडे हिमाचळ । जेथें पांडव गळाले सकळ ।
धर्म आणि तमाळनीळ । पुढें गेले ॥ ७ ॥
७) त्याच्या अलीकडे हिमालय आहे. तेथे सर्व पांडव गळून पडले. फक्त धर्म व यमदेव दोघेच पुढे गेले. 
जेथें जावया मार्ग नाहीं । मार्गी पसरले माहा अही ।
सितसुखें सुखावले ते हि । पर्वतरुप भासती ॥ ८ ॥
८) हिमालयांतून जायला वाट नाही. कारण वाटेमध्यें प्रचंड सर्प पसरलेले आहेत. बर्फाच्या थंडपणाने आराम करणारे ते सर्प पर्वतासारखे दिसतात. 
तया ऐलिकडे सेवटीं जाण । बद्रिकाश्रम बद्रिनारायण ।
तेथें माहां तापसी निर्वाण । देहत्यागार्थ जाती ॥ ९ ॥
९) त्याच्या अलीकडे टोकाला बद्रिकाश्रम व बद्रिनारायण आहेत. मोठे मोठे तपस्वी मोक्ष मिळवण्याच्या इच्छेने देह ठेवण्यास तेथे जातात. 
तया ऐलिकडे बद्रिकेदार । पाहोन येती लाहान थोर ।
ऐसा हा अवघा विस्तार । मेरुपर्वताचा ॥ १० ॥
१०) त्याच्या अलीकडे बद्रिकेदार आहे. लहानथोर सगळे तें पाहून येतात. असा हा मेरु पर्वताचा सगळा विस्तार आहे.
तया मेरुपर्वता पाठारीं । तीन श्रृंगे विषमहारी ।
परिवारें राहिले तयावरी । ब्रह्म विष्णु महेश ॥ ११ ॥
११) या मेरुपर्वताच्या पठारावर वाकड्यातिकड्या दिशांना तीन शिखरें आहेत.ब्रह्मा, विष्णु व महेश आपल्या परिवारासह तेथे राहतात.
ब्रह्मश्रृंग तो पर्वताचा । विष्णुश्रृंग तो मर्गजाचा ।
शिवश्रृंग तो स्फटिकाचा । कैळास नाम त्याचें ॥ १२ ॥
१२) ब्रह्मा राहतो तें शिखर साधे दगडाचे आहे. विष्णु राहतो ते शिखर पाचूचे आहे.आणि शंकर राहतो ते शिखर स्फटिकाचे आहे. त्याला कैलास म्हणतात.
वैकुंठ नाम विष्णुश्रृंगाचे । सत्यलोक नाम ब्रह्मश्रृंगाचें ।
अमरावती इंद्राचें । स्थळ खालतें ॥ १३ ॥
१३) वैकुंठ हे विष्णुच्या शिखराचे नांव आहे. ब्रह्मा राहतो त्या शिखराचे नांव सत्यलोक आहे. त्याच्या खाली अमरावती नावाचे इंद्राचे ठिकाण आहे. 
तेथे गण गंधर्व लोकपाळ । तेतिस कोटी देव सकळ ।
चौदा लोक सुवर्णाचळ । वेष्टित राहिले ॥ १४ ॥
१४) तेथें गण, गंधर्व, लोकपाळ, सगळे तेहतीस कोटी देव राहतात. सप्तस्वर्ग व सप्तपाताल असे चौदा लोक मेरुपर्वतावर वसलेले आहेत. 
तेथें कामधेनूचीं खिलांरें । कल्पतरुचीं वनें अपारें ।
अमृताचीं सरोवरें । ठाईं ठाईं उचंबळली ॥ १५ ॥
१५) तेथे कामधेनूंचे मोठे कळप आहेत. कल्पवृक्षांची पुष्कळ वने आहेत. ठिकठिकाणी अमृताने भरलेली सरोवरे उचंबळत असतात.
तेथें उदंड चिंतामणी । हिरे परिसांचिया खाणी ।
तेथें सुवर्णमये धरणी । लखलखायमान ॥ १६ ॥
१६) तेथें खूप चिंतामणी आहेत. हिर्‍यांच्या व परिसांच्या खाणी आहेत. तेथील सोन्याची जमीन लखलखाट करतअसते.
परम रमणीये फांकती किळा । नवरत्नाचिया पाषाणसिळा ।
तेथें अखंड हरुपवेळा । आनंदमये ॥ १७ ॥
१७) तेथें नवरत्नांच्या पाषाणशिला आहेत. त्यांची अतिशय सुंदर प्रभा आजुबाजुला फाकते. तेथे सदासर्वदा आनंद भरलेला असतो.   
तेथें अमृताचीं भोजनें । दिव्य गंधें दिव्य सुमनें ।
अष्टनायका गंधर्वगायनें । निरंतर ॥ १८ ॥
१८) त्या ठिकाणी भोजन अमृताचे असते. दिव्य सुवास असलेली दिव्य फुले असतात. अष्टनायिका व गंधर्व यांचे गायन सारखें चालू असते. 
तेथें तारुण्य वोसरेना । रोगव्याधी हि असेना ।
वृधाप्य आणी मरण येना । कदाकाळीं ॥ १९ ॥
१९) तेथें तारुण्य कधींच कमी होत नाही. कोणाला रोग, व्याधी होत नाही. कोणाला म्हातारपण व मरण कधींच येत नाही.
तेथें येकाहूनि येक सुंदर । तेथें येकाहूनि येक चतुर ।
धीर उदार आणी शूर । मर्यादेवेगळे ॥ २० ॥
२०) तेथें एकापेक्षां एक सुंदर असतात. एकापेक्षा एक चतुर असतात. तसेंच ज्यांच्या धैर्याला, औदार्याला आणि शौर्याला कांही सीमा नाही असे लोक असतात.
तेथें दिव्यदेह ज्योतिरुपें । विद्युलतेसारिखीं स्वरुपें ।
तेथें येश कीर्ति प्रतापें । सिमा सांडिली ॥ २१ ॥
२१) तेथील देह दिव्य प्रकाशमय असतात. तेथील रुप विजेप्रमाणें लखलखणारे असते. यश, कीर्ति आणि प्रताप यांना तेथें कांहीं मर्यादा नसते.
ऐसे ते स्वर्गभुवन । सकळ देवांचें वस्तें स्थान ।
तया स्थळाचें महिमान । बोलिजे तितुकें थोडें ॥ २२ ॥
२२) तें स्वर्गभुवन असें आहे. सगळ्या देवांचे ते राहण्याचे ठिकाण आहे. त्या स्थळाचा महिमा सांगावा तेवढा थोडाच होईल. 
येथें ज्या देवाचें भजन करावें । तेथें ते देवलोकीं राहावें ।
स्वलोकता मुक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २३ ॥
२३) या जगांत वास्तव्यांत ज्या देवाची उपासना केलेली असते.त्या देवाच्या लोकांत मृत्युनंतर राहावयास मिळते. सलोकता मुक्तीचे लक्षण असे आहे.
लोकीं राहावें ते स्वलोकता । समीप असावें ते समीपता ।
स्वरुप चि व्हावें ते स्वरुपता । तिसरी मुक्ती ॥ २४ ॥
२४) देवलोकांत राहावयास मिळणें यास सलोकता म्हणतात. देवाच्या जवळ राहावयास मिळणें यांस समीपता म्हणतात. ही दुसरी मुक्ति होय. देवाचे रुपच आपल्याला यावे ही सरुपता, ही तिसरी मुक्ति होय.       
देवस्वरुप जाला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं ।
स्वरुपतेचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥ २५ ॥
२५) उपासना करणार्‍यास देवाचें स्वरुप जरी प्राप्त झाले तरी श्रीवत्स कौस्तुभ व लक्ष्मी या गोष्टी त्याला मिळत नाहीत. सरुपता मुक्तीचें लक्षण असें आहे.  
सुकृत आहे तों भोगिती । सुकृत सरता ढकलून देती ।
आपण देव ते असती । जैसे तैसे ॥ २६ ॥
२६) जोपर्यंत पुण्यसंचय असतो तोपर्यंत स्वर्गांत राहून तेथील सुखें भोगतां येतात. पण पुण्याई संपली की देव जीवाला खाली ढकलून देतात. देव मात्र कायम तेथेंच राहतात. 
म्हणोनि तिनी मुक्ति नासिवंत । सायोज्यमुक्ति ते शाश्वत ।
तेहि निरोपिजेल सावचित्त । ऐक आतां ॥ २७ ॥
२७) यामुळे तिन्ही मुक्ति नाशवंत आहेत. सायुज्यमुक्ति मात्र शाश्वत आहे. तिचे वर्णन आतां करतो. ते लक्षपूर्वक ऐक. 
ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतासहितजळेल क्षिती ।
तेव्हां अवघेच देव जाती । मां मुक्ति कैंच्या तेथें ॥ २८ ॥
२८) कल्पांताच्यावेळीं हें विश्र्व नाश पावते. पर्वतासकट पृथ्वी जळून जाते. त्यावेळी सर्व देव नाहींसे होतात. मग त्या संहारामध्यें पहिल्या तीन मुक्ति कशा टिकणार ?
तेव्हां निर्गुण परमात्मा निश्र्चळ । निर्गुण भक्ति तेहि अचळ ।
सायोज्यमुक्ति ते केवळ । जाणिजे ऐसी ॥ २९ ॥
२९) त्यावेळी निर्गुण परमात्मस्वरुप जसें आहे तसेंच निश्चल राहते. त्या निर्गुणाची भक्तीदेखील तशीच निश्चल राहते. सायुज्यमुक्ति ही अशी आहे.
निर्गुणीं अनन्य असतां । तेणें होये सायोज्यता ।
सायोज्यता म्हणिजे स्वरुपता । निर्गुण भक्ती ॥ ३० ॥
३०) निर्गुण परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी अनन्यपणें विलीन झालें कीं सायुज्यमुक्ति मिळते. स्वस्वरुपांत समरस होणें हीच निर्गुण भक्ति व हीच सायुज्यता समजावी. 
सगुण भक्ति ते चळे । निर्गुण भक्ति ते न चळे ।
हें आवघें प्रांजळ कळे । सद्गुरु केलियां ॥ ३१ ॥
३१) सगुण नाशवंत म्हणुन सगुण भक्ति नाशवंत असते. निर्गुण शाश्वत म्हणून निर्गुण भक्ति कायम टिकते. सद्गुरु केल्यानें हें सगळे स्पष्टपणें समजते. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मुक्तिचतुष्टयेनाम समास दहावा ॥
Samas Dahava MuktiChatushtaya
समास दहावा मुक्तिचतुष्टय


Custom Search

No comments: