Saturday, January 23, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 4 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ४

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 4
Ovya 91 to 120
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ४
ओव्या ९१ ते १२०

तो जितेंद्रियु सहजें । तोचि योगयुक्तु म्हणिजे ।

जेणें सानें थोर नेणिजे । कवणे काळीं ॥ ९१ ॥

९१) तो सहजच जितेंन्द्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त म्हणावें व त्याला लहानथोर असा भेद कोणत्याच वेळेला प्रतीत होत नाही.

देखें सोनियाचें निखळ । मेरुयेसणें ढिसाळ ।

आणि मातियेचें डिखळ । सरिसेंचि मानी ॥ ९२ ॥

९२) पाहा, शुद्ध सोन्याचा मेरुपर्वताएवढा प्रचंड ढीग आणि मातीचे ढेकूळ ( तो ) सारखेंच मानतो. 

पाहतां पृथ्वीचें मोल थोडें । ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें ।

देखे दगडाचेनि पाडें । निचाडु ऐसा ॥ ९३ ॥

९३) पाहावयास गेले तर, पृथ्वीची किंमत ज्यापुढें कांहीं नाहीं, असें शुद्ध अमूल्य रत्न, ( पण तो तें ) दगडासारखेंच मानतो; असा तो निरिच्छ असतो.

तेथ सुहृद आणि शत्रु । कां उदासु आणि मित्रु ।

हा भावभेद विचित्रु । कल्पूं कैचा ॥ ९४ ॥

९४) त्याच्या ठिकाणीं हितचिंतक व शत्रु किंवा उदास आणि मित्र, अशा तर्‍हेची वेगवेगळ्या वृत्तीची कल्पना कोठून करावी ?

तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा ।

मीचि विश्र्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ॥ ९५ ॥

९५) मीच विश्र्व आहे, अशी प्रतीती ज्यास आली आहे, त्याला नातलग कोण आणि कशाचा ? व त्याला वैरी तरी कोण ?

मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरीटी ।

काय परिसाचिया कसवटी । वानिया कीजे ॥ ९६ ॥

९६) मग त्याच्या दृष्टीने अर्जुना, वाईट-चांगलें असेल काय ? परिसाच्या कसवटीवर घासलें असतां सोन्यांत निरनिराळे प्रकार करतां येतील काय ?  

ते जैशी निर्वाण वर्णुचि करी । तैशी जयाची बुद्धि चराचरीं ।

होय साम्याची उजरी । निरंतर ॥ ९७ ॥

९७) ती परिसाची कसवटी ज्याप्रमाणें त्याच्या बुद्धीमध्यें चराचराविषयींच्या समतेचा निरंतर उदय होतो. 

जे ते विश्र्वाळंकाराचे विसुरे । जरी आहाती आनानें आकारें ।

तरी घडले एकेंचि भांगारें । परब्रह्में ॥ ९८ ॥

९८) कारण, विश्र्वांतील प्राणीरुप अलंकाराचे समुदाय जरी निरनिराळ्या आकारांचे आहेत, तरी ते एक परब्रह्मरुप सोन्याचेच बनलेले आहेत. 

ऐसें जाणणें जें बरवें । ते फावलें तया आघवें ।

म्हणोनि आहाचवाहाचें न झकवे । येणें आकारचित्रें ॥ ९९ ॥   

९९) असें जें उत्तम ज्ञान, तें त्याला सर्व प्राप्त झालें, म्हणून तो वरवरच्या या नाना प्रकारच्या आकारांनीं फसत नाहीं. 

धापे पटामाजीं दृष्टी । दिसे तंतूंची सैंध सृष्टी ।

परि तो एकवांचूनि गोठी । दुजी नाहीं ॥ १०० ॥

१००) वस्त्राच्या आंत पाहिलें तर त्या वस्त्रामध्यें ( जिकडे-तिकडे अनेक ) तंतूंचीच रचना दिसते; तरीहि पण त्या वस्त्रांत एका सुतावाचून दुसरी गोष्टच नाहीं.  

ऐसेनि प्रतीती हे गवसे । ऐसा अनुभव जयातें असे ।

तोचि समबुद्धी हें अनारिसें । नव्हे जाणें ॥ १०१ ॥

१०१) अशा या तंतुपटन्यायानें, हा आधी सांगितलेला अनुभव येतो व असा ज्याचा अनुभव आहे, तोच समबुद्धि होय; यांत अन्यथा नाहीं, असें समज.

जयाचें नांव तीर्थरावो । दर्शनें प्रशस्तीसि ठावो ।

जयाचेनि संगे ब्रह्मभावो । भ्रांतासी ॥ १०२ ॥

१०२) ज्याचें नांव तीर्थराज आहे व ज्याचें दर्शन झालें असतां समाधान होतें व ज्याच्या संगतीनें भ्रमलेल्यास ब्रह्मत्व मिळते,

जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिद्धीतें विये ।

देखें स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा ॥ १०३ ॥

१०३) ज्याच्या बोलण्यानें धर्म जगतो, ज्याची कृपा मोठाल्या सिद्धींना उत्पन्न करते, पहा, स्वर्गसुखादिक ( देणें ) हीं ज्याला खेळ आहेत.

विपायें जरी आठवलें चित्ता । तरी दे आपुली योग्यता ।

हें असो तयातें प्रशंसितां । लाभु आथि ॥ १०४ ॥

१०४) अशा पुरुषाच्या नांवाचें मनांत सहज जरी स्मरण केलें तरी तो आपली योग्यता देतो; हें राहूं दे. त्याची स्तुति केल्यास लाभ होतो. 

पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें ।

मग आपणपांचि आपण असे । अखंडित ॥ १०५ ॥

१०५) पुन्हा मावळणार नाहीं अशा ऐक्यरुपी दिवसानें ज्यास उजाडलें आहे व जो मग निरंतर आपण आपल्या ठिकाणींच ( निमग्न ) असतो, 

ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी ।

सहजें अपरिग्रही जे तिहीं लोकीं । तोचि म्हणऊनि ॥ १०६ ॥

१०६) अशा दृष्टीनें जो विवेकी आहे, अर्जुना, तो एकाकी आहे कारण तिन्ही लोकांत तोच आहे. म्हणून तो सहज परिग्रहशून्य असतो.  

ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें ।

आपुलेनि बहुवसपणें । कृष्ण म्हणे ॥ १०७ ॥ 

१०७) ( ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात ) अशीं प्राप्त पुरुषांची लोकोत्तर लक्षणें कृष्ण आपल्या सर्वज्ञतेनें सांगतात.

तो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु ।

जया दादुलयाचा संकल्पु । विश्र्व रची ॥ १०८ ॥

१०८) जो ( श्रीकृष्ण ) ज्ञानी लोकांत श्रेष्ठ आहे, सर्व पाहणार्‍यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे व ज्या समर्थाचा संकल्प विश्वाची उभारणी करतो,

प्रणवाचिवे पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठें ।

तें जयाचिये यशा धाकुटें । वेढुं न पुरे ॥ १०९ ॥

१०९) ॐकाराच्या पेठेंत तयार झालेलें वेदरुप वस्त्र, तें ज्याच्या सहा गुणांपैकी एक जें यश, त्या यशाला अपुरें पडल्यामुळें वेढूं शकलें नाहीं, ( वेदांकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचेंसुद्धा संपूर्ण वर्णन होऊं शकलें नाहीं. )

जयाचेनि आंगिकें तेजें । आवो रविशशीचिये वणिजे ।

म्हणऊनि जग हें वेसजे-। वीण असे तया ॥ ११० ॥

११०) ज्याच्या ( श्रीकृष्णाच्या ) अंगांतील तेजानें सूर्यचंद्राच्या व्यापाराला जोर आहे, तर मग जग हें त्याच्या प्रकाशावांचून प्रकाशित आहे काय ?

हां गा नांवचि एक जयाचें । पाहतां गगनही दिसे टांचें ।

गुण एकेक काय तयाचे । आकळशील तूं ॥ १११ ॥

१११) ( ज्ञानेश्र्वरमहाराज आपल्या मनाला म्हणतात, हें मना, ) ज्या भगवंतांच्या नामाचें माहात्म्य पाहिलें असतां त्याच्यापुढें आकाशहि कमी दिसतें, त्या भगवंताचे एक एक गुण तूं कसे जाणशील ? 

म्हणोनि असो हें वानणें । सांगों नेणों कवणाचीं लक्षणें ।

दावावीं मिषें येणें । कां बोलिलों तें ॥ ११२ ॥

११२) म्हणून हें वर्णन करणें पुरें. या ( संतांचीं ) लक्षणें सांगण्याच्या निमित्तानें देवानें कोणाचीं लक्षणें सांगितलीं व तीं कां सांगितलीं, हें मला सांगतां येत नाही.  

ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी ।

तरि अर्जुनु पढिये हे गोडी । नासेल हन ॥ ११३ ॥‘

११३) ( पण मला असें वाटतें ) ऐक, द्वैताचा ठावठिकाणा नाहींसा करणारें असें जें आत्मज्ञान, तें उघड उघड व्यक्त केलें, तर अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहींशी होईल.   

म्हणोनि तें तैसें बोलणें । नव्हे सपातळ आड लावणें ।

केलें मनचि वेगळवाणें । भोगावया ॥ ११४ ॥

११४) म्हणून भगवंत तसें बोलले नाहींत. परंतु मध्यें अगदी बारीक असा पडदा ठेवला ( म्हणजे साधूच्या अद्वैतस्थितीच्या वर्णनानें अप्रत्यक्ष रीतीनें महावाक्याचाच बोध केला व अशा रीतीने  देवभक्त यांचीं ) मनें प्रेमसुख भोगण्याकरितां वेगळीं ठेवलीं.   

जय सोहंभाव हा अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु ।

तयाचिये दिठीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥ ११५ ॥

११५) जे ‘ मी ब्रह्म आहें ‘ अशा बोधांत अडकले आहेत व जे मोक्षसुखाकरितां दीन झाले आहेत, अशांच्या दृष्टीचा काळिमा तुझ्या प्रेमाला कदाचित् लागेल. 

विपायें अहंभाव ययाचा जाईल । मी तेंचि हा जरी होईल ।

तरि मग काय कीजेल । एकलेया ॥ ११६ ॥

११६) कदाचित् याचा मीपणा जाईल आणि हा जर मीच होईल, तर मग मी एकट्यानें काय करावें ? 

दिठीचि पाहतां निविजे । कां तोंड भरोनि बोलिजे ।

नातरी दाटुनि खेंव दीजे । ऐसें कोण आहे ॥ ११७ ॥

११७) डोळ्यांनींच पाहून शांत व्हावें किंवा तोंड भरुन बोलावें अथवा कडकडून आलिंगन द्यावें, असें ( दुसरें ) कोण आहे ?

आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं ।

ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें ॥ ११८ ॥

११८) जी गोष्ट आपल्या मनाला चांगली वाटते आणि जीवांत मावत नाहीं अशी गोष्ट, जर अर्जुनाचें आपणाशीं ऐक्य झालें तर, कोणास सांगावी ?  

इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि हातासनें ।

बोलामाजीं मन मनें । आलिंगूं सरलें ॥ ११९ ॥

११९) या काकुळतीनें ( काळजीनें ) अन्योपदेशाच्या हातवटीनें ( साधूंच्या वर्णनानें ) बोलण्यामध्यें श्रीकृष्णांनी अर्जुनाचें अर्जुनत्व कायम ठेवून आपल्या मनानें अर्जुनाच्या मनास आलिंगन दिलें.

हें परिसतां जरी कानडें । तरी जाण पां पार्थ उघडें ।

कृष्णसुखाचेंचि रुपडें । वोतलें गा ॥ १२० ॥

१२०) हें ऐकण्यास जरी अवघड वाटलें, तरी असें समज 

कीं, अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड

मूर्ति आहे.



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ३

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 3 
Ovya 61 to 90 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ३ 
ओव्या ६१ ते ९०

येणें उपायें योगारुढु । जो निरवधि जाहला प्रौढु ।

तयांचिया चिन्हांचा निवाडु । सांगेन आइकें ॥ ६१ ॥

६१) या उपायांनी जो योगनिष्णात अखंड परिपूर्ण झाला, त्याचीं चिन्हें तुला निवड करुन सांगतों ऐक.

तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाहीं विषयांचिया येरझारा ।

जो आत्मबोधाचिया वोवरां । पहुडला असे ॥ ६२ ॥

६२) तरी ज्याच्या इंद्रियरुपी घरांत विषयांचें येणें-जाणें होत नाहीं आणि जो आत्मज्ञानरुपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ निजलेला असतो.

जयाचें सुखदुःखाचेनि आंगें । झगटलें मानस चेवो नेघे ।

विषय पासींही आलिया से न रिघे । हें काय म्हणऊनि ॥ ६३ ॥

६३) ज्याच्या मनाला सुखदुःखांनीं स्वतः धक्के दिले असतांना तें जागें होत नाहीं, विषय अगदी जवळ आले तरी, हें काय आहे म्हणून ज्याला स्मरणही होत नाही;  

इंद्रियें कर्माचां ठायीं । वाढीनलीं परि कहीं ।

फळहेतूची चाड नाहीं । अंतःकरणीं ॥ ६४ ॥

६४) ज्याचीं इंद्रियें कर्म करीत असलीं, परंतु ज्याच्या अंतःकरणांत फलाची इच्छा कधीहि उत्पन्न झालीं नाहीं;

असतेनि देहें एतुला । जो चेतुचि दिसे निदेला ।

तोचि योगारुढु भला । वोळखें तूं ॥ ६५ ॥

६५) जो देहधारी असून वरीलप्रमाणें असतो व जो जागृत पुरुषाप्रमाणें सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्ता प्रमाणें क्रियाशून्य दिसतो, तोच उत्तम प्रतीचा योगनिष्णात आहे, असे तूं समज. 

तेथ अर्जुन म्हणे अनंता । हें मज विस्मो बहु आइकतां ।

सांगें तया ऐसी हे योग्यता । कवणें दिजे ॥ ६६ ॥

६६) त्या वेळी अर्जुन म्हणाला, अनंता, तुझें बोलणें ऐकून मला फार आश्र्चर्य वाटतें, त्याला अशीहि योग्यता कोण देतो ?

तंव हांसोनि कृष्ण म्हणे । तुझें नवल ना हें बोलणें ।

कवणासि काय दीजेल कवणें । येथ अद्वैतीं इये ॥ ६७ ॥

६७) तेव्हां कृष्ण हंसून म्हणाले, तुझें बोलणें आश्चर्यकारक नव्हे काय ? या अद्वैतामध्ये येथें कोणाला कोणी काय द्यावयाचे आहे ? 

पैं व्यामोहाचिया शेजे । बळिया अविद्या निद्रित होईजे ।

ते वेळीं दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ॥ ६८ ॥

६८) अविवेकरुपी अंथरुणावर प्रबळ अविद्येच्या योगानें ( ज्या वेळेला जीव ) निजतो, त्यावेळेला हें जन्ममरणरुपी वाईट स्वप्न तो अनुभवितो.

पाठी अवसांत ये चेवो । तैं ते अवघेंचि होय वावो ।

ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोही आपणपांचि ॥ ६९ ॥

६९) नंतर ज्यावेळेला अकस्मात जागृति येते, त्या वेळेला तें स्वप्न वगैरे सर्वच व्यर्थ होतें, अशा प्रकारचा आपल्या नित्य आस्तित्वाचा जो सहज प्रत्यय येतो, तोही आपल्याच ठिकाणीं आपल्याला येतो.    

म्हणऊनि आपणचि आपणपेया । घातु कीजतु असे धनंजया ।

चित्त देऊनि नाथिलीया । देहाभिमाना ॥ ७० ॥    

७०) म्हणून अर्जुना, मिथ्या जो देहाभिमान, त्याकडे चित्त देऊन आपणच आपला घात करतो.

हा विचारुनि अहंकारु सांडिजे । मग असतीच वस्तु होईजे ।

तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ॥ ७१ ॥

७१) विचार करुन हा अहंकार टाकावा आणि मग असलेलें आपलें स्वरुप ओळखून ब्रह्मरुप व्हावें, म्हणजे आपण आपलें कल्याण केल्यासारखें सहजच होईल.

एर्‍हवीं कोशकीटकाचि परी । आपणपया आपण वैरी ।

जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळीं ॥ ७२ ॥

७२) नाहीं तर, जो शरीर हेंच उत्तम ठिकाण समजून, तेथें आत्मबुद्धि ठेवतो, तो कोशकिड्याप्रमाणें आपला आपणच शत्रु होतो.

कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे ।

कीं असते आपुले डोळे । आपण झांकी ॥ ७३ ॥

७३) ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला आंधळेपणाचे डोहाळे कसे होतात पाहा ! तो आपले असलेले डोळे आपणच झांकून घेतो; 

कां कवण एकु भ्रमलेपणें । मी तो नव्हें गा चोरलों म्हणे ।

ऐसा नाथिला छंद अंतःकरणें । घेऊनि ठाके ॥ ७४ ॥

७४) किंवा  कोणी एक ( मनुष्य ) वेड लागल्यामुळें, पूर्वींचा जो मी, तो मी आतां नाहीं, मी चोरला गेलों, असें म्हणतो. ( आणि ) आपल्या मनांत असा नसताच आग्रह घेऊन असतो,   

एरव्ही होय तें तोचि आहे । परि काई कीजे बुद्धि तैशी नोहे ।

देखा स्वप्नींचेनि घायें । कीं मरे साचें ॥ ७५ ॥

७५) एर्‍हवीं हल्लीं तो जो आहे, तो पूर्वीचाच आहे; पण काय करावें ? त्याच्या बुद्धीला तसें वाटत नाहीं. पाहा; स्वप्नांतील तलवारीचा वारानें कोणी खरोखर मरतो काय ?

जैसी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोविन्नली एरी मोहरे ।

तरी तेणें उडावें परि न पुरे । मनशंका ॥ ७६ ॥

७६) ( पोपटाला धरण्याकरितां बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यामुळें  ) जेव्हां पोपटाच्या वजनानें ती नळी उलट बाजूला फिरते, तेव्हां त्याने वास्तविक तेथून उडून जावें, परंतु ( ही नळी सोडली तर आपण पडूं व मरुं, या ) त्याच्या मनांतील शंकेंचे समाधान होत नाहीं;  

वायांचि मान पिळी । अटुवें हियें आवळी ।

टिटांतु नळी । धरुनि ठाके ॥ ७७ ॥

७७) मग तो व्यर्थच मान इकडेतिकडे करतो व संकोचलेल्या छातीनें नळीला आंवळीत ( ती नळी ) चवड्यांत धरुन राहतो. 

म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडां ।

कीं मोकळिया पायांचा चवडा । गोंवी अधिकें ॥ ७८ ॥

७८) मग तो मनांत म्हणतो कीं, मी खरोखर बांधला गेलों आहे; अशा ( या ) कल्पनेच्या खोड्यांत सांपडतो आणि मग मोकळा असलेला आपल्या पायांचा चववडा अधिकच गुंतवितो.

ऐसा काजेंवीण आंतुडला । तो सांग पां काय आणिकें बांधला ।

मग नोसंडी जर्‍ही नेला । तोडूनि अर्धा ॥ ७९ ॥

७९) त्याप्रमाणें विनाकारण अडकलेल्या त्या पोपटाला दुसर्‍यानें कोणी बांधलें आहे काय ? अशा स्थितींत त्याला ओढून, अर्धा तोडून जरी नेला, तरी ती तो कांही केल्या नळी सोडीत नाहीं.  

म्हणऊनि आपणपया आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु ।

येर स्वयंबुद्धी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ॥ ८० ॥

८०) म्हणून ज्यानें आपला संकल्प ( देहाभिमान ) वाढविला आहे, तो आपला आपणच शत्रु होय. श्रीकृष्ण म्हणतात, दुसरा, जो खोट्याचा ( मिथ्या देहाचा ) अभिमान घेत नाही, तो आत्मज्ञानी म्हणावा. 

तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता ।

परमात्मा परौता । दुरी नाहीं ॥ ८१ ॥

८१) अशा त्या पुरुषानें आपले अंतःकरण जिंकल्यामुळें व त्याच्या इच्छा निवृत्त झाल्यामुळें, त्याला परमात्मा कोठें पलीकडे लांब नाहीं. 

जैसा किडाचा दोषु जाये । तरी पंधरें तेंचि  होये ।

तैसें जीवा ब्रह्मत्व आहे । संकल्पलोपीं ॥ ८२ ॥     

८२) ज्याप्रमाणें हिणकस सोन्यांतून मिसळलेल्या धातूचा दोष निघाला तर हेंच शंभर नंबरी सोनें होतें, त्याप्रमाणें अहंकाराचा नायनाट झाला असतां; जीवाला ब्रह्मत्व ठेवलेलेंच आहे.

हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा ।

नलगे मिळों जाणें आकाशा । आना ठाया ॥ ८३ ॥ 

( घट फुटून ) हा घटाचा आकार नाहींसा झाला असतां ; त्यांतील पोकळीस आकाशांत मिळण्याकरितां ज्याप्रमाणें दुसर्‍या ठिकाणी जावें लागत नाहीं; 

 

तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला ।

तोचि परमात्मा संचला । आधींचि आहे ॥ ८४ ॥

८४) त्याप्रमाणें ज्याचा हा मिथ्या देहाहंकार कारणासह नाहींसा झाला आहे, तो मूळचाच सर्वत्र भरलेला परमात्मा आहे.  

आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुःखांची कडसणी ।

इयें न समाती कांहीं बोलणीं । मानापमानाची ॥ ८५ ॥

८५) आतां थंड व उष्ण असे प्रकार किंवा हें सुख व हें दुःख अशी निवड, तसेंच हा मान व हा अपमान अशी समजूत, ह्या गोष्टी त्या पुरुषाच्या ठिकाणीं मुळींच संभवत नाहींत.  

जे जया वाटा सूर्यु जाये । तेउतें तेजाचें विश्र्व होये ।

तैसें तया पावे तें आहे । तोचि म्हणउनि ॥ ८६ ॥

८६) कारण कीं, सूर्य ज्या मार्गानें जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो. त्याप्रमाणें त्याला जे जे प्राप्त होतें तें त्याचेंच स्वरुप आहे. ( आधी सांगितलेली द्वंद्वे त्याच्या ठिकाणीं संभवत नाहींत )

देखें मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा ।

तैशीं शुभाशुभें योगीश्र्वरा । नव्हती आनें ॥ ८७ ॥

८७) पाहा, मेघापासून ज्या पावसाच्या धारा पडतात, त्या ज्याप्रमाणें समुद्राला बोंचत नाहींत, त्याप्रमाणें शुभाशुभें हीं योगेश्र्वराच्या आत्मस्वरुपाहून भिन्न नसल्यामुळे यास तीं द्वंद्वें प्रतीत होत नाहींत.   

जो हा विज्ञात्मकु भावो । तया विचारितां जाहला वावो ।

मग लागला जंव पाहो । तंव ज्ञान तें तोचि ॥ ८८ ॥

८८) अनुभवाला येणारें जें हें दृश्य जगत् त्याचा  विचार करतां, तें त्याच्या दृष्टीनें मिथ्या ठरलें;  व मग आपण कोण आहों, असें जेव्हां तो पाहावयास लागला, तेव्हां ज्ञान तेंच आपण आहोंत, असें त्यास कळलें.   

आतां व्यापकु कीं एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी ।

ते करावी ठेली आपैसी । दुजेनवीण ॥ ८९ ॥

८९) आतां द्वैत नसल्यामुळें ( मी ) व्यापक आहे किंवा मर्यादित आहे, अशी वाटाघाट करण्याचें ( त्याच्या ठिकाणीं ) सहजच थांबतें.

ऐसा शरीरीचि परि कौतुकें । परब्रह्माचेनि पाडें तुके ।

जेणें जिंतलीं एकें । इंद्रियें गा ॥ ९० ॥

९०) अशा रीतीनें ज्या कोणी एकानें आपलीं इंद्रियें 

जिंकली आहेत, तो देहधारीच असतो, परंतु सहजच तो 

परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो.



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 2 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग २

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 2 
Ovya 31 to 60 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग २ 
ओव्या ३१ ते ६०

परि अनुवादला मीं प्रसंगें । तें सज्जनीं उपसाहावें लागे ।

आतां सांगेन काय श्रीरंगें । निरोपिलें जें ॥ ३१ ॥

३१) परंतु वेळ आली म्हणून मी बोलून गेलों, तें संतांनी क्षमा करणें उचित हे. आतां श्रीकृष्णांनीं जें कांहीं सांगितलें तें सांगतों.

तें बुद्धीही आकळितां सांकडें । म्हणऊनि बोलीं विपायें सांपडे ।

परि निवृत्तिकृपादीपउजियेडें । देखेन मी ॥ ३२ ॥

३२) तें बुद्धीलादेखील आकलन करण्यास कठीण आहे, म्हणून शब्दांनीं तें क्वचित् सांगता येईल; तरी पण माझें गुरु निवृत्तिनाथ यांच्या कृपारुपी दिव्याच्या उजेडानें मी तें पाहीन.

जें दीठीही न पविजे । तें दिठीविण देखिजे ।

जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥ ३३ ॥

३३) जर अतींद्रिय ज्ञानाचें बळ प्राप्त होईल, तर जें दृष्टीला दिसत नाहीं, तें डोळ्यांशिवाय पाहतां येतें.

ना तरी धातुवादाही न जोडे । ते लोहींचि पंधरें सांपडे ।

जरी दैवयोगें चढे । परिसु हातां ॥ ३४ ॥

३४) दैवशात् परीस जर हाताला येईल, तर किमयेच्या योगानेंहि प्राप्त न होणारें उत्तम सोनें, लोखंडांतच मिळेल. 

तैसी सद्गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे ।

म्हणऊनि ते अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥ ३५ ॥

३५) त्याप्रमाणें जर सदगुरुची कृपा होईल, तर प्रयत्न केला असतां कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही ? ज्ञानदेव म्हणतात, माझ्यावर ती ( कृपा ) अलोट आहे.  

तेणें कारणें मी बोलेन । बोलीं अरुपाचें रुप दावीन ।

अतींद्रिय परी भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥ ३६ ॥

३६) त्या सद्गुरु कृपेच्या आधारावर मी व्याख्यान करीन व माझ्या व्याख्यानात अरुप ब्रह्माचे स्पष्ट रुप दाखवीन आणि जरी तें ( ब्रह्म ) इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचें आहे तरी त्याचाहि अनभव इंद्रियांना येईल, असें मी करीन.

आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्र्वर्य ।

हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥ ३७ ॥

३७) ऐका; यश, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्र्वर्य हे सहा उच्च प्रतीचे गुण ज्याच्या ठिकाणीं वास करतात, 

म्हणोनि तो भगवंतु । जो निःसंगाचा सांगातु ।

तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होईं आतां ॥ ३८ ॥

३८) म्हणून ज्यास भगवंत असे म्हणतात व जो सर्वसंगपरित्याग केलेल्यांचा सोबती आहे, तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, आतां तू पूर्ण लक्ष दे.

आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनाने झणीं मानीं ।

एर्‍हवी विचारजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ॥ ३९ ॥

३९) अर्जुना, ऐक या जगांत निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. त्यांना कदाचित तूं वेगळे मानशील, पण तसें मानूं नकोस. कारण, विचार करुन पाहिलें तर हे दोन्ही एकच आहेत.

सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगु तोचि संन्यासु ।

पहातां ब्रह्मीं नाहीं अवकाशु । दोहींमाजी ॥ ४० ॥

४०) नावांच्या वेगळेपणामुळें भासणारा दुजेपणा टाकून दिला तर, योग तोच संन्यास होय. तत्त्वतः पाहिलें तर ब्रह्मस्वरुपाच्या ठिकाणीं ह्या दोहोंत अंतर राहात नाहीं.

जैसें नामाचेनि अनारिसेपणें । एका  पुरुषातें बोलावणें ।

कां दोहीं मार्गीं जाणें । एकचि ठाया ॥ ४१ ॥

४१) ज्याप्रमाणें वेगवेगळ्या नांवांनीं एकाच पुरुषाला हांक मारतात, किंवा दोन रस्त्यांनीं एकच मुक्काम गाठतात;  

ना तरी एकचि उदक सहजें । परि सिनांना घटीं भरिजे ।

तैसें भिन्नत्व हें जाणिजे । योगसंन्यासांचें ॥ ४२ ॥

४२) किंवा स्वभावतः पाणी तितकें एकच, परंतु तें वेगवेगळ्या घागरींतून भरलें, म्हणजे जसें तें वेगवेगळें दिसतें, त्याप्रमाणें योग व संन्यास ह्यांचा वेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे. 

आइकें सकळ संमतें जगीं । अर्जुना गा तोचि योगी ।

जो कर्में करुनि रागी । नोहेचि फळीं ॥ ४३ ॥

४३) अर्जुना, ऐक. जो कर्माचे आचरण करुन त्याच्या फलाविषयीं आसक्त होत नाहीं, तोच ह्या जगामध्ये सर्वांना मान्य असलेला योगी होय.

जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुद्धीवीण सहजें ।

आणि तेथिंचीं तियें बीजें । अपेक्षीना ॥ ४४ ॥

४४) ज्याप्रमाणें पृथ्वी ही अहंकारावाचून सहजच वृक्षादिकांना जन्म देते व त्यांना येणार्‍या फलांची अपेक्षा करीत नाही,

तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें ।

जें जेणें अवसरें । करणें पावे ॥ ४५ ॥

४५) तसें कुक्रमातील वहिवाटीप्रमाणें वर्णाश्रमधर्मातील आचारांना अनुसरुन, जें कर्म ज्या वेळेला ( करणें ) प्राप्त आहे,    

 तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं ।

आणि बुद्धिही करोनि फळवेरीं । जायेचिना ॥ ४६ ॥

४६) तें त्याप्रमाणेंच व्यवस्थित करतो; परंतु त्यासंबंधीं आपल्या ठिकाणीं कर्तृत्वबुद्धि घेत नाही आणि बुद्धीनेहि फलापर्यंत जात नाहीं ( फलाची इच्छा करीत नाही ).

ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं ।

तोचि भरंवसेनिसीं । योगीश्र्वरु ॥ ४७ ॥

४७) असा जो असेल, तोच संन्यासी होय. अर्जुना, ऐक. तोच खात्रीनें योगिराज आहे असें समज.

वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हें सांडीन बद्धक ।

तरी टांकोटांकीं आणिक एक । मांडीचि तो ॥ ४८ ॥

४८) उलट जो नित्यनैमित्तिक कर्म करणें प्राप्त झालें तर त्या कर्माला हें कर्म बंधन करणारे आहे, हें मी टाकीन, असें म्हणतों पण हें कर्म  टाकलें कीं, लागलीच तो दुसरें एखादें कर्म करण्याचें आरंभितोच.     

जैसा क्षाळूनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु ।

तैसेनि आग्रहाचा पाइकु । विसंबे वायां ॥ ४९ ॥   

४९) असा एक लेप धुऊन टाकून लागलींच दुसरा लावावा, त्याप्रमाणें केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टांत पडतो.    

गृहस्थाश्रमाचें ओझें । कपाळीं आधींचि आहे सहजें ।

कीं तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ॥ ५० ॥

५०) डोक्यावर अगोदरच स्वभावतः गृहस्थाश्रमाचें ओझें आहेच. ते टाकण्याकरितां संन्यास घेतला, तर त्याबरोबरच पुनः संन्यासाश्रमांतील कर्माचें ओझें तो डोक्यावर घेतो;   

म्हणूनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां ।

आहे योगसुख स्वभावता । आपणपांचि ॥ ५१ ॥

५१) म्हणून अग्निसेवा न टाकतां व कर्माचरणाची मर्यादा उल्लंघन न करतां योगाचें सुख आपल्या ठिकाणी सहजच मिळणारे आहे.

ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जे जगीं ।

गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ॥ ५२ ॥

५२) ऐक जो संन्यासी तोच योगी आहे, अशी आपली एकवाक्यता असल्याबद्दल अनेक शास्त्रांनी या जगांत ध्वजा उभारुन प्रसिद्ध केले;

जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथेंचि योगाचें सार भेटे ।

ऐसें हें अनुभवाचेनि घटें । साचें जया ॥ ५३ ॥

५३) ज्या ठिकाणी त्याग केल्याचा संकल्प अजिबात नाहींसा होतो, त्याच ठिकाणीं योगाचे सर्वस्व ( ब्रह्म ) प्राप्त होतें, असें हें ज्याला अनुभवाच्या तराजूत खरें ठरुन पटलें आहे ( तोच संन्यासी व तोच योगी होय.   

आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था ।

तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणीं ॥ ५४ ॥

५४) अर्जुना, आतां योगरुपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोहोचावयाचें  असेल, त्यानें कर्ममार्गरुपी पायर्‍यांस चुकूं नये. 

येणें यमनियमांचेनि तळवटें । रिगे असनाचिये पाउलवाटे ।

येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ॥ ५५ ॥

५५) तो या यमनियमरुपी पायर्‍यांपासून निघून आसानाच्या पायवाटेनें, प्राणायामाच्या कड्याने योगरुपी डोगराच्या मध्याभागावर येतो.   

मग प्रत्याहाराचा आधाडा । बुद्धीचियाहि पाया निसरडा ।

जेथ हटिये सांडिती होडा । कडेलग ॥ ५६ ॥

५६) नंतर प्रत्याहाररुपी तुटलेला कडा लागतो, त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेहि पाय ठरत नाहीत, त्या प्रसंगात हठयोग्यांना शेवटीं आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात.    

तरी अभ्यासाचेनि बळें प्रत्याहारीं निराळे ।

नखी लागेल ढाळें ढाळें । वैराग्याची ॥ ५७ ॥

५७) तरी अभ्यासाच्या बळानें, चढण्यास आधार नसणार्‍या प्रत्याहाररुपी कड्यावर वैराग्यरुपी नखी ( घेरपडीसारखी ) हळूहळू चिकटेल ( आणि याप्रमाणें ) चढावयास आश्रय मिळेल.

ऐसा पवनाचेनि पाठारें । येतां धारणेचेनि पैसारें ।

क्रमी ध्यानाचें चवरें । सांडे तंव ॥ ५८ ॥

५८) याप्रमाणें प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरुन येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्यानें ध्यानरुपी शिखर मागें टाकीपर्यंत तो चालतो. 

मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीची हांव ।

जेथ साध्यसाधना खेंव । समरसें होय ॥ ५९ ॥

५९) मग या धारणामार्गाची चाल पुरी होऊन अमुक एक गोष्ट करावयाची आहे, अशा विषयीची इच्छा बंद पडून, ज्या अवस्थेमध्यें ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहींसा होतो; 

जेथ पुढील पैसा पारुखे । मागील स्मरावें तें ठाके ।

ऐसिये सरिसीये भूमिके । समाधि राहे ॥ ६० ॥

६०) ज्या ठिकाणीं पुढील प्रवृत्ति बंद पडून मागील 

कशाचेंहि स्मरण होत नाहीं, अशा या ऐक्याच्या भूमिकेवर

 समाधि राहाते,



Custom Search