Tuesday, June 29, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 5 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग ५

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 5 
Ovya 98 to 123 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग ५ 
ओव्या ९८ ते १२३
मूळ श्लोक
,सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् । 
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ ७ ॥
७) हे कौन्तेया, कल्पान्तीं सर्व भूतें माझ्या मायेप्रत जातात. त्यांना पुन्हां ( दुसर्‍या ) कल्पाच्या आरंभी मी निर्माण करतों.
जिये नांव गा प्रकृती । जे द्विविध सांगितली तुजप्रती ।
एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरुपा ॥ ९८ ॥
९८) जिला प्रकृति असें नांव आहे आणि जी तुला दोन प्रकारांनी सांगितली; एक आठ प्रकारचा भेद दाखवून स्पष्ट केली व दुसरी जीवरुपा म्हणून सांगितली. 
हा प्रकृतीवीखो आघवा । तुवां मागां परिसिलासे पांडवा ।
म्हणोनि असो काइ सांगावा । पुढतपुढती ॥ ९९ ॥
९९) हा सर्व प्रकृतीचा विषय अर्जुना, तूं मागें ( अध्याय ७ वा, श्लोक ४-५ मध्ये ) ऐकला आहेस, म्हणून आतां तो राहूं दे. वारंवार कशाला सांगावयास पाहिजे ?    
तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाचां अंतीं ।
सर्व भूतें अव्यक्तीं । ऐक्यासी येती ॥ १०० ॥
१००) तरी ही सर्व भूतें महाकल्पाच्या शेवटी या माझ्या अव्यक्त प्रकृतीत ऐक्याला येतात.
ग्रीष्माचां अतिरसीं । सबीजें तृणें जैसीं ।
मागुती भूमीसी । सुलीनें होती ॥ १०१ ॥
१०१) ग्रीष्म ऋतूच्या प्रखर उष्णतेंत बीजासहित गवतें ज्याप्रमाणे पुनः भूमीमध्यें पूर्णपणें लीन होतात;
कां वार्षीये ढेंढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे ।
तेव्हां घनजात आटे । गगनींचें गगनीं ॥ १०२ ॥
१०२) अथवा वर्षाऋतूचें अवडंबर नाहीसें होतें व जेव्हां शरद् ऋतूचें झांकलेंपण नाहींसे होतें ( म्हणजे शरद् ऋतू जेव्हां लागतो ) तेव्हां सर्व मेघमात्र आकाशाच्या आकाशांत नाहीसे होतात.
नातरी आकाशाचिये खोंपे । वायु निवांतुचि लोपे ।
कां तरंगता हारपे । जळीं जेवीं ॥ १०३ ॥
१०३) अथवा आकाशाच्या घरांत वायु शांतच होऊन नाहीसा होतो; अथवा लाटेचा आकार पाण्यामध्यें ज्याप्रमाणे नाहींसा होतो;    
अथवा जागिनलिये वेळे । स्वप्न मनींचें मनीं मावळे ।
तैसे प्राकृत प्रकृती मिळे । कल्पक्षयीं ॥ १०४ ॥
१०४) अथवा जागृति आली म्हणजे स्वप्न मनांतल्या मनांत नाहीसें होतें, त्याप्रमाणे कल्पाक्षयाच्या वेळीं प्रकृतिपासून झालेले सर्व जग पुनः प्रकृतीत लीन होतें. 
मग कल्पादीं पुढती । मीचि सृजीं ऐसी वदंती ।
तरी इयेविषयीं निरुती । उपपत्ति आइक ॥ १०५ ॥
१०५) नंतर पुनः कल्पाच्या आरंभीं मीच सृष्टि उत्पन्न करतों, असे लोक बोलतात; तर याविषयीं खरा विचार ऐक. 
मूळ श्लोक
प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ ८ ॥
८) ( मी ) आपल्या प्रकृतिचा अंगीकार करुन प्रकृतीच्या नियंत्रणामुळें पराधीन असलेलें सर्व भूतसमुदाय मी पुनः पुनः निर्माण करतो. 
तरी हेचि प्रकृति किरीटी । मी स्वकीया सहजें अधिष्ठीं ।
तेथ तंतूसमवायपटीं । जेविं विणावणी दिसे ॥ १०६ ॥
१०६) तर अर्जुना, या माझ्या मायेचा जेव्हां मी स्वभावतः अंगीकार करतों, तेव्हां सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणें विणकर दिसते,  
मग तिये विणावणीचेनि आधारें । लहानां चौकडियां पटत्व भरे ।
तैसी पंचात्मकें आकारें । प्रकृतिचि होये ॥ १०७ ॥
१०७) त्या विणकरीच्या आधारानें, मग लहान लहान चौकड्या एकत्र होऊन, जसें वस्त्र होतें; तशी मायाच पंचमहाभूतात्मक जगाच्या आकारानें प्रकट होते.  
जैसे विरजणियाचेनि संगे । दूधचि आटेजों लागे ।
तैसी प्रकृति आंगा रिगे । सृष्टिपणाचिया ॥ १०८ ॥
१०८) ज्याप्रमाणें विरजणाच्या संयोगानें पातळ दूध दहीरुपानें घट्ट होत जातें, त्याप्रमाणें प्रकृति सृष्टिपणाच्या आकाराला येते.  
बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।
तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ॥ १०९ ॥
१०९) बीजाला पाण्याचें सान्निध्य मिळालें म्हणजे तें बीजच जसें लहानमोठ्या फांद्यांच्या रुपानें विस्ताराला पावतें, त्याप्रमाणें मला प्राणीमात्रांचे हें उत्पन्न करणें आहे. 
अगा नगर हें रायें केलें । या म्हणणया साचेपण कीर आलें ।
परि निरुतें पाहतां काय शिणले । रायाचे हात ॥ ११० ॥
११०) अरे अर्जुना, नगर हें राजानें रचलें, या म्हणण्याला खरोखर खरेपणा आला आहे ( असें म्हणण्याचा प्रघात आहे ); पण वास्तविक पाहिलें तर, नगर रचण्यांत राजाच्या हाताला ( कांही ) श्रम पडले आहेत काय ?  
आणि मी प्रकृति अधिष्ठीं तें कैसें । जैसा स्वप्नीं जो असे ।
मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे ॥ १११ ॥
१११) आणि मी प्रकृतीचा अंगीकार करतों तें कसें म्हणशील तर, जसा स्वप्नामध्यें जो असतो तोच जागृतावस्थेंत प्रवेश करतो, त्याप्रमाणें, 
तरि स्वप्नौनि जागृती येतां । काय पाय दुखती पंडुसुता ।
की स्वप्नामाजी असतां । प्रवासु होय ॥ ११२ ॥
११२) तर आर्जुना, स्वप्नांतून जागृतींत येतांना त्याचे पाय दुखतात काय ? अथवा स्वप्नामध्यें असतांना प्रवास होतो काय ?  
या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हें भूतसृष्टीचें कांहीं ।
मज एकही करणें नाही । ऐसाचि अर्थु ॥ ११३ ॥
११३) या सर्वांचा अभिप्राय काय म्हणून विचारशील तर, भूतसृष्टीचें मला कांहीं एक देखील करावें लागत नाहीं; असाच याचा अर्थ आहे.   
जैशी रायें अधिष्ठिली प्रजा । व्यापारे आपुलालिया काजा ।
तैसा प्रकृतिसंगु माझा । येर करणें तें इयेचें ॥ ११४ ॥
११४) ज्याप्रमाणें राजाची आश्रित प्रजा आपापल्या व्यवहारांत वागते, त्याप्रमाणें प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो बाकी कर्तृत्व सर्व हिचें ( प्रकृतीचें ) आहे. 
पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी । समुद्र भरतें अपार दाटी । 
तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे ॥ ११५ ॥
११५) पाहा कीं, अर्जुना, पौर्णिमेच्या पूर्णचंद्राच्या भेटीनें समुद्र भरतीनें अफाट भरुन येतो; त्या भरती येण्यांत चंद्राला श्रम पडतात काय ?
जड परि जवळिका । लोह चळे तरि चळो कां ।
कवण शीण भ्रामका । सन्निधानाचा ॥ ११६ ॥
११६) ( लोहचुंबकाच्या ) जवळपणानें अचेतन लोखंड हलतें तर हालेना का ? पण जड लोखंडाला जवळ ओढून आणण्याचे श्रम लोहचुंबकाला काय पडले ?
किंबहुना यापरी । मी निजप्रकृति अंगीकारीं ।
आणि भूतसृष्टी एकसरी । प्रसवोंचि लागे ॥ ११७ ॥
११७) फार काय सांगावें ? याप्रमाणें मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो व त्या योगानें ती प्रकृति भूतसृष्टीला एकसारखी उत्पन्न करुंच लागते.  
जो हा भूतग्रामु आघवा । असे प्रकृतिआधीन पांडवा ।
जैसी बीजाचिया वेलपालवा । समर्थ भूमि ॥ ११८ ॥
११८) अर्जुना, हा जो प्राण्यांचा समुदाय आहे तो प्रकृतीच्या आधीन आहे. ज्याप्रमाणें बीजाच्या वेलाला आणि पानांना उत्पन्न करण्यास भूमि ( जमिन ) समर्थ आहे;  
नातरी बाळादिकां वयसां । गोसावी देहसंगु जैसा ।
अथवा धनावळी आकाशा । वार्षियें जेवीं ॥ ११९ ॥
११९) अथवा बाल्यादि अवस्थांस जसा देहसंगाचा आधार आहे. किंवा ज्याप्रमाणें मेघांची फळी येण्यास वर्षाऋतू आधारभूत आहे. 
कां स्वप्नासि कारण निद्रा । तैशी प्रकृति हे नरेंन्द्रा ।
या अशेषाहि भूतसमुद्रा । गोसाविणी गा ॥ १२० ॥
१२०) अथवा स्वप्नाला कारण जशी झोंप आहे. त्याचप्रमाणें हे श्रेष्ठ पुरुष, या सर्वहि भूतसमुदायाची मालकीण प्रकृति आहे.   
स्थावरा आणि जंगमा । स्थूळा अथवा सूक्ष्मा ।
हें असो भूतग्रामा । प्रकृतिचि मूळ ॥ १२१ ॥
१२१) स्थावरांना अथवा जंगमांना, मोठ्यांना अथवा लहानांना, हे राहूं दे, सर्व भूतसमुदायांस प्रकृतीच मूळ आहे.    
म्हणोनि भूतें हन सृजावीं । कां सृजिलीं प्रतिपाळावीं ।
इयें करणीं न येती आघवीं । आमुचिया आंगा ॥ १२२ ॥
१२२) म्हणून भूतें उत्पन्न करावींत, अथवा उत्पन्न केलेलीं भूतें रक्षण करावीत, या सर्व गोष्टी करण्याचा संबंध आमच्याकडे मुळींच येत नाही.  
जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली । ते वाढी चंद्रें नाहीं वाढविली ।
तेंविं मातें पावोनि ठेलीं । दुरी कर्में ॥ १२३ ॥
१२३) पाण्यामध्यें चांदण्याच्या वेली पसरलेल्या दिसतात ! त्या वेली वाढविण्याचे काम जसें चंद्रानें केलें नाहीं, त्याप्रमाणें ( जगाची उत्पत्ति, स्थिती वगैरे ) कर्म माझ्या पासून दूर राहिलें आहें. 



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 4 श्रीज्ञानेश्र्वरी,अध्याय ९ भाग ४

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 4 
Ovya 71 to 97 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग ४ 
ओव्या ७१ ते ९७
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्र्वरम् ।
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥ ५ ॥
५) ( कल्पना टाकून पाहूं लागलास तर ) सर्व भूतें माझ्या ठिकाणींहि नाहींत, असा हा माझा ऐश्र्वर्ययोग आहे, तो पाहा. ( तसेंच ) भूतांना धारण करणारें तथापि ( अलिप्त असल्यानें ) भूतांच्या ठिकाणीं स्थित नसलेलें आणि ज्याच्या ठिकाणीं भूतांची कल्पना केली जाते, अशा प्रकारचें माझें स्वरुप आहे.   
आमचा प्रकृतीपैलीकडील भावो । जरी जरी कल्पनेवीण लागसी पाहों ।
तरी मजमाजि भूतें हेंही वावो । जे मी सर्व म्हणउनी ॥ ७१ ॥
७१) मायेच्या पलीकडे असणारी आमची जी शुद्ध स्वरुपस्थिति, ती जर तूं कल्पना टाकून पाहशील, तर हे ( सर्व ) प्राणी माझ्या ठिकाणीं आहेत, हे म्हणणें देखील व्यर्थ आहे; कारण सर्व मीच आहें म्हणून    
एर्‍हवीं संकल्पाचिये सांजवेळे । नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे ।
म्हणोनि अखंडित परी झांवळें । भूतभिन्न ऐसें देखें ॥ ७२ ॥
७२) सहज विचार केला तर कल्पनारुप संध्याकाळच्या वेळीं बुद्धीची दृष्टि क्षणभर मंद होते, म्हणून माझें स्वरुप अखंड दंडायमान असलें तरी तें अस्पष्ट होतें व ( त्या ठिकाणीं ) भूतें निरनिराळी आहेत, असें दिसतें. 
तेचि संकल्पाची सांज जैं लोपे । तैं अखंडितचि आहे स्वरुपें ।
जैसें शंका जातखेंवो लोपे । सापपण माळेचें ॥ ७३ ॥
७३) तीच कल्पनारुपी संध्याकाळ नाहींशी झालीं, म्हणजे त्या वेळीं मी अखंड दंडायमानच स्वरुपानें आहें. तें कसें तर, ज्याप्रमाणें माळेवर भासणारी सर्पकल्पना जातांक्षणीच माळेचें सर्पपण जाऊन, तिचे मूळच स्वरुप दिसतें.  
एर्‍हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ । काय घडेयागाडगेयांचे निघती कोंभ ।
परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले कीं ॥ ७४ ॥
७४) सहज विचार करुन पाहिलें तर, घागरी व मडकी यांचे आकार आपोआप जमिनीतून निघतात काय ? तर नाहीं, परंतु त्या घागरी व मडकीं यांचे आकार उमटले आहेत.
नातरी सागरींचां पाणीं । काय तरंगाचिया आहाती खाणी ।
ते अवांतर करणी । वारियाची नव्हे ॥ ७५ ॥
७५) अथवा समुद्राच्या पाण्यांत लाटांच्या खाणी आहेत काय ? पाण्याचे रुपांत ( लाटा ) ही पाण्याची करणी नव्हे काय ?  
पाहें पां कापसाचां पोटीं । काय कापडाची होती पेटी ।
तो वेढितयाचिया दिठी । कापड जाहला ॥ ७६ ॥   
७६) असें पाहा की, कापसाच्या पोटांत कापडाचा गठ्ठा असतो काय ? तो कापूस नेसणाराच्या दृष्टीनें, कापड झाला आहे. 
जरी सोनें लेणें होऊनि घडे । तरी तयाचें सोनेपण न मोडे ।
येर अळंकार हे वरचिलीकडे । लेतयाचेनि भावें ॥ ७७ ॥
७७) सोन्याचे जरी अलंकार झाले, तरी त्यांचे सोनेपण मोडत नाही, सोन्याहून वेगळ्या आकाराचे अलंकार जे वरवर दिसतात, ते दागिने घाणार्‍याच्या दृष्टीनें दिसतात.  
सांगें पडिसादाचीं प्रत्युत्तरें । कां आरिसाँ जें आविष्करे ।
तें आपलें कीं साचोकारें । तेथेंचि होतें ॥ ७८ ॥
७८) प्रतिध्वनी प्रत्युत्तरें अथवा आरशामध्यें जें प्रतिबिंबित होतें, तें ( शब्द आणि रुप ) आपलें ( असतें ) कीं खरोखर दुसरें तेथें उत्पन्न होतें ? सांग.  
तैसी इये निर्मळे माझां स्वरुपीं । जो भूतभावना आरोपी ।
तयासि तयाचां संकल्पीं । भूतभासु असे ॥ ७९ ॥
७९) त्याप्रमाणें ह्या माझ्या शुद्ध स्वरुपीं जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो, त्याला त्याच्या कल्पनेमध्यें भूतांचा भास होतो. 
तेचि कल्पिती प्रकृती पुरे । आणि भासु आधींच सरे ।
मग स्वरुप उरे एकसरें । निखळ माझें ॥ ८० ॥
८०) तीच कल्पना करणारी प्रकृति संपली, की भूताभास मूळचाच संपलेला आहे. मग अखंड माझे शुद्ध स्वरुप राहातें.
हें असो आंगीं भरलिया भवंडीं । जैशा भोंवत दिसती अरडीदरडी ।
तैशीं आपुलिया कल्पना अखंडीं । गमती भूतें ॥ ८१ ॥
८१) हें असूं दे ! आपण आपल्या भोंवती गरगर फिरलें असतां अंगांत भोंवळ आल्यामुळें जसें ( भोवतालच्या ) भिंती, नदीचा कांठ वगैरे सर्व कांहीं फिरल्यासारखें दिसतें, त्याप्रमाणें आपल्या कल्पनेनें माझ्या अखंड स्वरुपीं भूतें भासतात.    
तेचि कल्पना सांडूनि पाहीं । तरि मी भूतीं भूतें माझां ठायीं ।
हें स्वप्नींहीं परि नाहीं । कल्पावयाजोगें ॥ ८२ ॥
८२) तीच कल्पना टाकून पाहिले असतां, मी भूतांमध्यें व भूतें माझ्यामध्यें, असें हे स्वप्नामध्येंसुद्धा कल्पना करण्यासारखें नाहीं.  
आतां मी एक भूतांतें धर्ता । अथवा भूतांमाजि मी असता ।
या संकल्पसन्निपाता- । आंतुलिया बोलिया ॥ ८३ ॥
८३) आतां मी एक भूतांना धारण करणारा अथवा भूतांमध्यें असणरा, ही बोलणी संकल्प ( कल्पनारुप ) सन्निपात झालेल्या मनुष्याच्या बडबडी आहेत . 
म्हणोनि परियेसीं गा प्रियोत्तमा । यापरी मी विश्र्वेंसीं विश्र्वात्मा ।
जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ॥ ८४ ॥
८४) म्हणून प्रियोत्तमा ( अर्जुना, ) ऐक; याप्रमाणें मी विश्वासहित विश्र्वाचाआत्मा आहे, आणि तो मी या मिथ्या भूतसमुदायाला सदा आश्रय आहें. 
रश्मीचेनि आधारें जैसें । नव्हतेंचि मृगजळ आभासे ।
माझां ठायी भूतजात तैसें । आणि मातेंही भावीं ॥ ८५  
८५) सूर्यकिरणांच्या आधारानें जसें मिथ्या मृगजळ भासतें, त्याप्रमाणें प्राणिमात्र माझ्या ठिकाणीं मृगजळवत् मिथ्या समज आणि मलाही सूर्यकिरणांप्रमाणे सत्य समज.    
मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु ।
जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥ ८६ ॥
८६) या प्रकारचा मी, जग या कल्पनेला आश्रय आहे. परंतु मी सर्व जगाहून वेगळा नाहीं, असा आहे. तो कसा तर, ज्याप्रमाणें सूर्य आणि सूर्याचा प्रकाश एकच आहे. ( त्याप्रमाणें सर्व प्राणी आणि मी एक आहे.) 
हा आमुचा ऐश्र्वर्ययोगु । तुवां देखिला की चांगु ।
आता सांगें कांहीं एथ लागु । भूतभेदाचा असे ॥ ८७ ॥
८७) अर्जुना, हा आमचा ऐश्र्वर्ययोग तुला चांगला समजला ना ? आतां येथें महत् तत्त्वापासून देहापर्यंतचीं तत्त्वें व मी, यांमधील भेदाचा कांहीं संबंध आहे का ? सांग.  
यालागीं मजपासूनि भूतें । आनें नव्हती हें निरुतें ।
आणि भूतावेगळिया मातें । कहींच न मनीं हो ॥ ८८ ॥
८८) याकरितां माझ्याहून सगळे प्राणी वेगळे नाहींत हें खास; आणि मलाहि प्राणिमात्राहून वेगळे कधींच मानूं नकोस हो !  
यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् ।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ६ ॥
६) सर्वत्र संचार करणारा महान् वायु आकाशाच्या ठिकाणीं जसा नित्य स्थित आहे, त्याप्रमाणें सर्व भूतें माझ्या ठिकाणी स्थित आहेस, असे जाण. 
पैं गगन जेवढें जैसें । पवनु गगनीं तेवढाचि असे ।
सहजे हालविलिया वेगळा दिसे । एर्‍हवीं गगन तेंचि तो ॥ ८९ ॥
८९) परंतु आकाश जसें व जेवढें आहे, तसाच व तेवढाच वायू आकाशांत असतो, सहज ( पंखा ) हालवून पाहिलें तर तो वेगळा दिसतो; नाहीं तर आकाश व तो एकच आहेत. 
तैसें भूतजात माझां ठायीं । कल्पिजे तरी आभासे कांहीं ।
निरविकल्पीं तरि नाहीं । तेध मीच मी आघवें ॥ ९० ॥
९०) त्याप्रमाणें प्राणिमात्र माझ्या ठिकाणीं कांहीं कल्पिलें तर भासतात व जर कल्पना केली नाही, तर तें नाहींतच त्या ठिकाणीसर्व मीच मी आहे.
म्हणऊनि नाहीं आणि असे । हें कल्पनेचेनि सौरसें ।
जे कल्पनालोपें भ्रंशे । आणि कल्पनेसवें होय ॥ ९१ ॥
९१) म्हणून भूतांचें असणें आणि नसणें कल्पनेच्या योगानें होतें, कारण कीं, भूताभास हा, कल्पना नष्ट झाली कीं, तिजबरोबर नष्ट होतो व कल्पना उत्पन्न झाली कीं, तिजबरोबर उत्पन्न होतो.   
तेंचि कल्पितें मुदल जाये । तैं असे नाहीं हें कें आहे ।
म्हणऊनि पुढती तूं पाहें । हा ऐश्र्वर्ययोगु ॥ ९२ ॥
९२) तें कल्पना करणारे भूतच ज्या वेळीं नाहीसें होतें, तेव्हां भूतांचे असणें व नसणें, हा व्यवहार कोठून होणार ? म्हणून तूं आणखी या ऐश्र्वर्ययोगासंबंधी पुनः विचार कर.     
ऐसिया प्रतीतिबोधसागरीं । तूं आपणेंयातें कल्लोळ एक करीं ।
मग जंव पाहासी चराचरी । तव तूंचि आहासी ॥ ९३ ॥
९३) अशा अनुभवरुपी ज्ञानसमुद्रामध्यें तू आपल्याला एक लाट कर.; मग चराचरांत तूं पाहशील, तर तूंच एक आहेस ( असें कळून येईल ).   
या जाणणेयाचा चेवो । तुज आला ना म्हणती देवो । 
तरी आतां द्वैतस्वप्न वावो । जालें कीं ना ॥ ९४ ॥
९४) देव म्हणतात, अर्जुना, या ज्ञानाची जागृति तुला आली ना ? जर आली असेल तर आतां द्वैतस्वप्न मिथ्या झालें कीं नाहीं ?  
तरी पुढती जरी विपायें । बुद्धीसि कल्पनेची झोंप ये ।
तरी अभेदबोधु जाये । जैं पडिजे ॥ ९५ ॥
९५) तरी पुनः जर कदाचित् बुद्धीला कल्पनेची झोप येईल, तर अभेदज्ञान जाईल. त्यामुळें मग ( कल्पनारुपी झोप लागल्यावर तूं ) द्वैतरुपी स्वप्नांत ( पुनः ) पडशील 
म्हणोनि ये निद्रची वाट मोडे । निखळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे ।
ऐसें वर्म जें आहे फुडें । तें दावों आतां ॥९६ ॥
९६) म्हणून या कल्पनारुपी झोपेचा मार्ग मोडेल आणि आपण केवळ स्वरुपजागृतिरुपच होऊन जाऊं, असें जें एक खास वर्म आहे, तें आतां तुला ( उघड ) दाखवितों. 
तरी धनुर्धरा धैर्या । निकें अवधान देई वा धनंजया ।
पैं सर्व भूतांतें माया । करी हरी गा ॥ ९७ ॥
९७) तरी हे धैर्यवंत अर्जुना, बाबा चांगलें लक्ष दे, अरे, सर्व प्राणीमात्रांना मायाच उत्पन्न करतो व तीच त्यांचा नाश करते.


Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 3 श्रीज्ञानेश्र्वरी,अध्याय ९ भाग ३

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 3 
Ovya 57 to 70 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग ३ 
ओव्या ५७ ते ७०
मूळ श्लोक
अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवत् र्मनि ॥ ३ ॥ 
३) हे शत्रुतापना, या ( आत्मज्ञानरुपी ) धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष माझी प्राप्ती न होतां मृत्युरुप संसाराच्या मार्गावर परत येतात.
पाहें पां दूध पवित्र आणि गोड । पासीं त्वचेचिया पदराआड ।
परि तें अव्हेरुनि गोचिड । अशुद्ध काय नेघती ॥ ५७ ॥
५७) अर्जुना, ( असें ) पाहा की, दूध हें पवित्र असून शिवाय गोड आहे व तें जवळच ( सडांच्या ) कातडीच्या पदरापलीकडे आहे; परंतु गोचीड तें टाकून देऊन रक्तच पीत नाहीं काय ?  
कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणूक एकेची घरीं ।
परि परागु सेविजे भ्रमरीं । जवळिलां चिखलुचि उरे ॥ ५८ ॥
५८) किंवा, कमळकंद आणि बेडूक यांची वस्ती एके ठिकाणींच असते; परंतु कमळांतील परिमळ ( दूरचें ) भुंगे येऊन, सेवन करुन जातात व जवळच असलेल्या बेडकांना ( मात्र ) चिखलच शिल्लक राहातो. 
नातरी निदैवांचा परिवरीं । लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरीं ।
परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ॥ ५९ ॥
५९) अथवा, दुर्दैवी पुरुषाच्या घरांत हजारों मोहोरा पुरलेल्या आहेत, परंतु तो तेथें राहून उपवास काढतो किंवा दारिद्र्यांत जीवित कंठितो.
तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु ।
कीं भ्रांतासि कामु । विषयावरी ॥ ६० ॥
६०) त्याप्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असा जो मी राम, तो मी ( सर्वांच्या ) हृदयांत असतांना ( त्या मला न जाणून ) मूर्ख लोक ( सुखाकरितां ) विषयांची इच्छा करतात.  
बहु मृगजळ देखोनि डोळां । थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा ।
तोडिला परिसु बांधिला गळा । शुक्तिकालाभें ॥ ६१ ॥
६१) मोठें मृगजळ डोळ्यांना दिसल्यावर अर्धवट गिळलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा, अथवा गळ्यांत बांधलेला परीस, शिंप मिळावी म्हणून तोडून टाकावा,  
तैसीं अहंममतेचिये लवसवडी । मातें न पवती बापुडीं ।
म्हणोनि जन्ममरणाचिये दुथडी । डहुळितें ठेलीं ॥ ६२ ॥
६२) त्याप्रमाणें ' मी व माझें ' या नादांत दंग झालेले तें दीन लोक मला येऊन मिळत नाहींत आणि म्हणूनच ते जन्ममरणरुप या दुधड्या नदींत ( संसारांत ) गटांगळ्या खात राहिले आहेत.  
एर्‍हवीं मी तरी कैसा । मुखाप्रति भानु कां जैसा ।
कहीं नसे न दिसे ऐसा । वाणीचा नव्हें ॥ ६३ ॥
६३) तसें पाहिलें तर मी कसा ( सुलभ ) आहे ? तर तोंडासमोर जसा सूर्य तसा मी सर्वांना सदा समोर आहें; पण तो सूर्य केव्हां ( रात्रीं ) नसतो म्हणून दिसत नाहीं. केव्हां केव्हां ( दिवसा ) दिसत नाहीं, असा त्याच्यांत कमीपणा आहे, तसा कमीपणा माझ्यांत नाहीं. 
मूळ श्लोक
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥ ४ ॥
४) अव्यक्त रुपानें मीं हें सर्व व्यापलेलें आहे. सर्व भूतें माझ्या ठिकाणीं आहेत, पण मी त्यांच्या ठिकाणीं स्थित नाहीं. 
माझेया विस्तारलेपणाचेनि नांवें । हें जगचि नोहे आघवें ।
जैसें दूध मुरालें स्नभावें । तरि तेंचि दहीं ॥ ६४ ॥
६४) माझा विस्तार म्हणजेच ( हें ) जग, नाही काय ? ( तर होय माझाच विस्तार आहे. ) तें कसें ? तर जसें दूध विरजलें असतां तेंच स्वभावतः दही होतें.
कां बीजचि जाहलें तरु । अथवा भांगारचि अळंकारु ।
तैसा मज एकाचा विस्तारु । तें हें जग ॥ ६५ ॥
६५) अथवा बीजच झाड झालें किंवा सोनेंच अलंकार बनलें, त्याप्रमाणें हें जग म्हणजे माझ्या एकाचा विस्तार आहे. 
हें अव्यक्तपणें थिजलें । तेंचि मग विश्र्वाकारें वोथिजलें ।
तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें । त्रैलोक्य जाणें ॥ ६६ ॥
६६) हें अव्यक्तपणानें थिजलेलें ( संकुचित ) असतें, तेंच मग विश्वाच्या आकारानें पातळ होतें ( पसरतें ); या रीतीनें अव्यक्त रुप असलेला मी त्रैलोक्याच्या रुपानें विस्तार पावतों, असें समज.
महदादि देहांतें । इयें अशेषेंही भूतें ।
परि माझां ठायीं बिंबते । जैसें जळीं फेण ॥ ६७ ॥
६७) पाण्यवर जसा फेस भासतो, त्याप्रमाणे महत् तत्त्वापासून देहापर्यंत हीं सर्वहि भूतें माझ्या ठिकाणीं भासतात.
परि तया फेणांआंतु पाहतां । जेवीं जळ न दिसे पंडुसुता ।
नातरीं स्वप्नींची अनेकता । चेइलिया नोहिजे ॥ ६८ ॥
६८) अर्जुना, पण या फेसाच्याआंत पाहिलें असतां जसें पाणी दिसत नाही, अथवा स्वप्नांतील अनेकपण जसें जागें झाल्यावर नसतें,  
तैसीं भूतें इयें माझा ठायीं । बिंबती तयामाजि मी नाहीं ।
इया उपपत्ती तुज पाहीं । सांगितलिया मागां ॥ ६९ ॥
६९) त्याप्रमाणें हीं भूतें माझ्या ठिकाणीं जरी भासली तरी पण त्यांमध्यें मी नाहीं, हा विचार तुला आम्हीं मागें ( अध्याय ७ वा श्लोक १२ मध्यें ) सांगितला ( आहे ). तो लक्षांत आण. 
म्हणऊनि बोलिलिया बोलाचा अतिसो । न कीजे यालागीं हें असो ।
तरी मजआंत पैसो । दिठी तुझी ॥ ७० ॥
७०) एवढ्याकरितां बोललेल्याच गोष्टींचा ( पुनरुक्ति करुन ) पाल्हाळ करुं ये. म्हणून हें बोलणें राहूं दे. तर माझ्या स्वरुपांत तुझी दृष्टि प्रवेश करो.  



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 2 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग २

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 2 
Ovya 34 to 56 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग २ 
ओव्या ३४ ते ५६
मूळ श्लोक
श्रीभगवानुवाच
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्जज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १ ॥
१) श्रीकृष्ण म्हणाले, आतां अत्यंत गुह्य असें हें ( ब्रह्माचें ) ज्ञान, प्रपंचज्ञानासह, असूयारहित अशा तुला सांगतों. हें जाणल्यानें तूं अशुभ संसारापासून मुक्त होशील.  
नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज ।
जें हें अंतःकरणींचें गुज । जीवाचिये ॥ ३४ ॥
३४) अथवा अर्जुना, हेंच वर्म, जें माझ्या अंतःकरणांतील जीवाची गोष्ट आहे, ती तुला पुन्हां सांगतों.  
येणें मानें जीवाचें हियें फोडावें । मग गुज कां पां मज सांगावें ।
ऐसें कांहीं स्वभावें । कल्पिशी जरी ॥ ३५ ॥
३५) एवढी जीवाच्या आंतली गोष्ट बाहेर काढून मग ती गुप्त गोष्ट मला कां सांगावी, अशी कांहीं कल्पना तुझ्या मनांत सहजच जर आली असेल,  
तरी परियेसीं प्राज्ञा । तूं आस्थेचीच संज्ञा ।
बोलिलिये गोष्टींची अवज्ञा । नेणसी करुं ॥ ३६ ॥
३६) तर बुद्धिमान् अर्जुना ऐक. तूं ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेचीच खूण ( मूर्ति ) आहेस, आणि त्याप्रमाणें सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणें तुला माहीत नाहीं. 
म्हणोनि गूढपण आपलें मोडो । वरि न बोलावेंही बोलावें घडो ।
परि आमुचिचे जीवींचें पडो । तुझां जीवीं ॥ ३७ ॥
३७) म्हणून आमचें गुप्तपण मोडलें तर मोडो !  शिवाय न बोलण्याची ( अशी ) जी गोष्ट तीहि बोलली जावो ! पण आमच्या अंतःकरणांतील गुप्त गोष्ट तुझ्या मनांत उतरो. 
अगा थानीं कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे कीं गोड ।
म्हणोनि सरो कां सेवितयाची चाड । जरी अनन्य मिळे ॥ ३८ ॥
३८) बा अर्जुना, स्तनांत खरोखर दूध गुप्त असतें, पण त्याची गोडी स्तनास नसते; याकरितां एकनिष्ठ सेवन करणर्‍याची इच्छा स्तनपान करुन तृप्त होईना का ?  
मुडाहूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमी पेरिलें ।
तरि तें सांडीविखुरीं गेलें । म्हणों ये कायी ॥ ३९ ॥
३९) कणगींतून बीं काढलें, आणि मग तें निर्मळ केलेल्या जमिनींत पेरलें, तर तें सांडण्यालवंडण्यांत गेले असें म्हणतां येईल काय ?  
यालागीं सुमनु आणि शुद्धमती । जो अनिंदकु अनन्यगती ।
पैं गा गौप्यही परी तयाप्रती । चावळिजे सुखें ॥ ४० ॥
४०) याकरितां चांगल्या मनाचा व शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणारा व एकनिष्ठ असा श्रोता जर मिळाला, तर त्यास आपली गोष्ट गुह्य असली तरी खुशाल सांगावी,
तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं । तूं वांचूनि आणिक नाहीं ।
म्हणोनि गुज तरी तुझां ठायीं । लपवूं नये ॥ ४१ ॥
४१) तर आता सध्या ह्या गुणांनी युक्त तुझ्यावांचून दुसरा कोणी दिसत नाहीं, म्हणून जरी गुह्य गोष्ट असली तरी तुझ्या ठिकाणीं ती लपवून ठेवतां येत नाही.   
आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज ।
तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी ॥ ४२ ॥
४२) आतां वारंवार ' गुह्य गुह्य ' असें म्हटले असतां तुला चमत्कारिक वाटेल. तर आता तुला सहजच प्रपंचज्ञानसहित आत्मज्ञान सांगेन. 
परि तेंचि ऐसेनि निवाडें । जैसें भेसळलें खरें कुडें ।
मग काढिजे फाडोवाडें । पारखूनियां ॥ ४३ ॥
४३) परंतु, जसें खरेंखोटें एकत्र मिसळलेलें असतां, तें परीक्षा करुन निरनिराळें काढावें, त्याप्रमाणें निवाडा करुन ज्ञानविज्ञान ( तुला ) सांगेन.  
कां चांचूचेनि सांडसें । खांडिजे पय पाणी राजहंसें ।
तुज ज्ञान विज्ञान तैसें । वांटूनि देऊं ॥ ४४ ॥
४४) अथवा, ज्याप्रमाणें राजहंसानें आपल्या चोंचीच्या चिमट्यानें एकत्र मिसळलेलें दूध व पाणी वेगळें करावें, त्याप्रमाणें तुला ज्ञान व विज्ञान हें स्वच्छ वेगवेगळें सांगूं
मग वारयाचियां धारसां । पडिला कोंडा कां नुरेचि जैसा ।
आणि अन्नकणाचा आपैसा । राशि जोडे ॥ ४५ ॥
४५) मळणी करुन एकत्र निसळलेलें कण व भूस वार्‍याच्या धारेवर उफणलें असतां, मग जसा कोंडा उडून जाऊन, धान्याची आपोआप रास जमते;
तैसेंजें जाणितलेयासाठीं । संसार संसाराचिये गांठी ।
लाऊनि बैसवी पाटीं । मोक्षश्रियेचां ॥ ४६ ॥
४६) त्याप्रमाणें जें ज्ञान जाणल्यामुळें, तें ज्ञान संसार संसाराच्या गांठी लावून ( अनात्मतत्वाच्या ठिकाणी ठेवून ) मोक्षरुपी लक्ष्मीच्या पटावर ( जाणणार्‍यास ) बसविते.
मूळ श्लोक
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । 
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ २ ॥
२) हें ( ज्ञान ) सर्व विद्यांचा राजा, सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र, उत्कृष्ट, प्रत्यक्ष अनुभवास येणारें, धर्माला अनुसरुन असलेलें, अनायासें आचरण करतां ( मिळवितां ) येणारें आणि क्षयरहित आहे.    
जें जाणयेयां आघवेयांचां गांवीं । गुरुत्वाची आचार्यपदवी ।
जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो ॥ ४७ ॥
४७) जें स्वरुपज्ञान या सर्व विद्यांच्या गांवांमध्यें श्रेष्ठ त्याच्या आचार्यपदावर ( अधिष्ठित ) आहे आणि जें ज्ञान सर्व गुप्त गोष्टींचा स्वामी आहे व जें पवित्र गोष्टींचा राजा आहे; 
आणि धर्माचें निजधाम । तेविंचि उत्तमाचें उत्तम ।
पैं जया येतां नाहीं काम । जन्मांतराचें ॥ ४८ ॥
४८) आणि जें धर्माचें स्वतःचें राहाण्याचें घर आहे आणि त्याचप्रमाणें जें सर्व उत्तम पदार्थांत उत्तम आहे व ज्याच्या ठिकाणीं प्राप्त झालें असतां पुनः दुसर्‍या जन्माचें काम ( उरत ) नाहीं,  
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे ।
प्रत्यक्ष फावो लागे तैसें । आपैसया ॥ ४९ ॥
४९) गुरुमुखांतून तें ज्ञान अमळसें उगवतांना दिसतें; पण तें हृदयांत मूळचें सिद्धच असतें, तसें तें आपोआप प्रत्यक्ष आनुभवाला येऊं लागतें.   
तेविंचि पैं गा सुखाचां पाउटीं । चढतां येइजे जयाचिया भेटी ।
मग भेटल्या कीर मिठी । भोगणेयाहि पडे ॥ ५० ॥
५०) त्याचप्रमाणें अरे अर्जुना, ज्याच्या भेटीला सुखाच्या चढत्या पायर्‍यांनीं यावयाचें असतें, आणि जें भेटलें असतां निश्चयेकरुन भोगणेंहि संपतें. 
परि भोगाचिया ऐलीकडिलिये मेरे । चित्त उभें ठेलेंचि सुख भरे ।
ऐसें सुलभ आणि सोपारें । वरि परब्रह्म ॥ ५१ ॥
५१) परंतु भोगाच्या अलीकडच्या कांठवर चित्त उभें राहिल्याबरोबर सुखानें पूर्ण भरुन जातें, असें तें ( स्वरुपज्ञान ) कष्टांवाचून मिळणारें व सोपें असून, शिवाय तें श्रेष्ठ ब्रह्म आहे.  
पैं गा आणिकही एक याचें । जें हाता आलें तरी न वचे ।
आणि अनुभवितां कांहीं न वेचे । वरि विटेहि ना ॥ ५२ ॥
५२) अर्जुना, याचें आणखीहि एक माहात्म्य आहे. तें असें की, जें प्राप्त झालें असतां कधीं ( हातांतून ) जात नाहीं आणि अनुभविलें असतां कांहीं सुद्धा कमी होत नाहीं व शिवाय त्यांत विकारहि उत्पन्न होत नाहींत. 
येथ जरी तूं तार्किका । ऐसी हन घेसी शंका ।
ना येवढी वस्तु हे लोकां । उरली केविं पां ॥ ५३ ॥
५३) तर्ककुशल अर्जुना, या ठिकाणीं जर तूं अशी शंका घेशील कीं, एवढी ज्ञानासारखी ही वस्तु ( तिचा ) अनुभव घेतल्याशिवाय लोकांत कशी राहिली ? 
एकोत्तरेयाचिया वाढी । जे जळतिये आगीं घालिती उडी ।
ते अनायासें स्वगोडी । सांडिती केविं ॥ ५४ ॥
५४) शंभराला एक व्याज मिळून एकशेएक रुपये व्हावेत, म्हणून जळत्या अग्नीसारख्या धोक्यांत उडी घालतात असे जे लोक, ते कष्टांवााचून मिळणारी स्वरुपसुखाची गोडी कशी टाकतील ?  
तरि पवित्र आणि रम्य । तेविंचि सुखोपायेंचि गम्य ।
आणि स्वसुख वरि धर्म्य । वरि आपणपां जोडे ॥ ५५ ॥
५५) तरी पवित्र आणि रम्य त्याचप्रमाणें सुखोपायानेंच प्राप्त होणारें स्वसुख, परंतु धर्माला धरुन मिळणारें, शिवाय तें आपल्याच ठिकाणीं आपल्याला मिळतें.  
ऐसा अवधाचि सुरवाडु आहे । तरी जनाहातीं केविं उरों लाहे ।
हा शंकेचा ठाव कीर होये । परि न धरावी तुवां ॥ ५६ ॥
५६) याप्रमाणें हें सर्व प्रकारें सुखकारक आहे, तर तें लोकांच्या सेवनांतून राहिलें कसें ? ही खरोखर शंकेची जागा आहे, परंतु तूं अशी शंका धरुं नकोस.



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 1 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 1 
Ovya 1 to 33 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग १ 
ओव्या १ ते ३३
तरि अवधान एकवेळे दीजे । मग सर्वसुखासि पात्र होइजे ।
हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥ १ ॥
१) श्रीज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात, अहो श्रोते हो, तर तुम्ही एक वेळ ( माझ्या बोलण्याकडे ) लक्ष द्या; म्हणजे मग सर्व सुखाला प्राप्त व्हाल; हें माझें उघड प्रतिज्ञेचें बोलणें ऐका. 
परि प्रौढी न बोलें हो जी । तुम्हां सर्वज्ञांचां समाजीं ।
देयाचें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥ २ ॥
२) परंतु महाराज, तुमच्यासारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमध्यें हें मी आढ्यतेनें बोलत नाहीं. लक्ष द्यावे ' ही माझी लडिवाळपणची विनंती आहे. 
कां जे लळेयांचें लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती ।
जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हां ऐसी ॥ ३ ॥
३) कारण कीं, तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील, तर हट्ट घेणारांचे लाड पुरतात व मनोरथ करणारांचे उंच डोलारे पूर्ण होतात.
तुमचेया दिठिवेयाचिये बोले । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ।
ते साउली देखोनि लोळें । श्रांतु जी मी ॥ ४ ॥
४) तुमच्या त्या कृपारुप दृष्टीच्या ओलाव्यानें प्रसन्नतारुप नळें टवटवीत झालें, त्याची ती सावली पाहून, महाराज, तेथें मी भागलेला लोळत आहें.    
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावों लाहों ।
येथही जरी सलगी करुं बिहों । तरी निघों कें पां ॥ ५ ॥
५) महाराज, आपण सुखरुपी अमृयाचे डोह आहांत, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरुप गारवा प्राप्त करुन घेतों. येथें देखील जर आम्ही लडिवाळपणा करण्यास भ्यालों, तर आम्हीं शांत कोठें व्हावें ?  
नातरी बालक बोबडां बोलीं । कां वांकुडां विचुकां पाउलीं ।
तें चोज करुनि माउली । रिझे जेवीं ॥ ६ ॥
६) अथवा लेकरुं बोबडें बोलत असलें, अथवा वेडेवाकडें पाऊल टाकीत असलें, तर त्याबद्दल त्याचें कौतुक करुन आई जशी समाधान पावते,  
तेवीं तुम्हां संतांचा पढियावो । कैसेनि तरि आम्हांवरी हो ।
या बहुवा आळुकिया जी आहों । सलगी करित ॥ ७ ॥
७) त्याप्रमाणें तुम्हां संतांचें प्रेम कशानें तरी आमच्यावर व्हावें, अशी आमची फार इच्छा असल्यामुळें, महाराज, आम्ही सलगी करीत आहोंत.    
वांचूनि माझिये बोलतीये योग्यते । सर्वज्ञ भवादृश श्रोते ।
काय घड्यावर सारस्वतें । पढों सिकिजे ॥ ८ ॥
८) वास्तविक पाहिलें तर, आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांपुढें ' माझ्या बोलण्याकडे अवधान द्या, म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल '; असें बोलण्याची माझी काय योग्यता आहे ? सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन  शिकावयाचें आहे काय ? ( तर नाहीं; सरस्वतीचा मुलगा स्वभावतःच सर्व जाणतो )
अवधारां आवडे तेसणा घुंघुरु । परि महातेजीं न मिरवे काय करुं ।
अमृताचिया ताटीं वोगरुं । ऐसी रससोय कैंची ॥ ९ ॥
९) ऐका. काजवा जरी हवा तेवढा मोठा असला, तरी सूर्याच्या प्रकाशापुढें त्याचें तेज पडत नाहीं; त्याला काय करावें ? अमृताच्या ताटामध्यें वाढण्यासारखें पक्वान्न कोठून असणार ?  
अहो हिमकरासी विंजणें । की नादापुढें आइकवणें ।
लेणियासी लेणें । हें कहीं आथी ॥ १० ॥
१०) अहो, शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्यानें वारा घालणें किंवा प्रत्यक्ष नादब्रह्माला गाणें ऐकविणें, किंवा स्वतः अलंकारास दागिन्यानें सजविणें, असें कोठें झालें आहे काय ? 
सांगा परिमळें काय तुरंबावें । सागरें कवणें ठायीं नाहावें ।
हें गगनचि आडे आघवें । ऐसा पवाडु कैंचा ॥ ११ ॥
११) सांगा सुवासानें कशाचा वास घ्यावा ? समुद्राने कोणत्या ठिकाणीं स्नान करावें ? हे सर्व आकाशच जीमध्यें मावेल अशी मोठी विस्तृत वस्तु कोठून असणार ?   
तैसें तुमचें अवधान धाये । आणि तुम्ही म्हणा हें होये ।
ऐसें वक्तृत्व कावणा आहे । जेणें रिझा तुम्ही ॥ १२ ॥
१२) त्याप्रमाणें तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल कीं, ' याला म्हणावें व्याख्यान ' व ज्या योगानें तुमचें मन रंगून जाईल, असें वक्तृत्व कोणाजवळ आहे ! 
तरि विश्र्वप्रगटितया गभस्ती । हातिवेनि न कीजे आरती ।
कां चुळोदकें अपांपती । अर्घ्यु नेदिजे ॥ १३ ॥
१३) असें जरी आहे, तरी जग उजेडांत आणणार्‍या सूर्याला काडवातीनें ओवाळूं नये काय ? किंवा चूळाभर पाण्यानें समुद्राला अर्घ्य देऊं नये काय ?  
प्रभु तुम्हीं महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितसें भक्ती ।
म्हणोनि बेल जर्‍ही गंगावती । तर्‍ही स्वीकाराल कीं ॥ १४ ॥
१४) महाराज तुम्ही मूर्तिमंत शंकर आहांत आणि मी दुर्बळ मनुष्य भक्तीनें पूजा करीत आहें; म्हणून बेलाऐवजी जरी मी निर्गुडी वाहात आहें, तरी तिला आपण बेल समजून स्वीकार कराल.  
बाळक बापाचिये ताटीं रिगे । रिगौनि बापातेंच जेवऊं लागे ।
की तो संतोषलेनि वेगें । मुखाचि वोडवी ॥ १५ ॥
१५) लहान मूल बापाच्या ताटांत जेवावयास बसतें आणि पानांतील पदार्थ घेऊन बापालाच जेवूं घालावयास लागतें, पण बाप ( न रागावतां उलट ) आनंदाच्या भरानें आपलें तोंडच त्याच्या पुढें करतो.   
तैसा मी जरी तुम्हांप्रती । चावटी करीतसें बाळमती ।
तरी तुम्हीं तोषेजे ऐसी जाती । प्रेमाची या ॥ १६ ॥
१६) त्याप्रमाणें जरी मी तुमच्याशीं बालबुद्धिनें बडबड करीत आहे, तरी त्यामुळें तुम्ही ' आनंदीच व्हावें 'असा ह्या प्रेमाचा स्वभाव आहे.  
आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें । तुम्ही संत घेतले असा बहुवे ।
म्हणोनि केलिये सलगीचा नोहे । आभारु तुम्हां ॥ १७ ॥
१७) आणि ( ज्ञानोबा आमचा आहे अशा ) त्या आपलेपणाच्या प्रेमानें तुम्ही संत अतिशय घेरलेले आहांत; म्हणून मी केलेल्या सलगीचें ओझें तम्हाला वाटणार नाही.   
अहो तान्हयाची लागता झटे । तरी अधिकचि पान्हा फुटे ।
रोषें प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ॥ १८ ॥
१८) अहो, गाईच्या सडाना तिच्या वासराने ढुसणी दिली त्या योगानें तिला जास्तच पान्हा फुटतो. ( कारण ) आवडल्याच्या रागानें प्रेम दुपट्ट होत असतें.   
म्हणऊनि मज लेंकुरवाचेनि बोलें । तुमचें कृपाळूपण निदैलें ।
तें चेइलें जी जाणवलें । यालागीं बोलिलों मी ॥ १९ ॥  
१९) म्हणून तुमचें निजलेले कृपाळूपण माझ्या लेंकरांच्याबोलण्यानें जागें झालें, हें मला कळलें, महाराज, याकरितां अवधान द्या असें मी बोललो. 
एर्‍हवीं चांदिणें पिकविजत आहे चेपणी । कीं वारया धापत आहे वाहणी ।
हां हो गगनासि गंवसणी । घालिजे केवीं ॥ २० ॥
२०) वास्तविक पाहिंले तर चांदणें आढीत ( घालून ) पिकवितात काय ? किंवा वार्‍याला कोणी गति दिली आहे काय ? अहो महाराज, आकाशाला गवसणी कशी घालाावी ?
आइकां पाणी वोथिजावें न लगे । नवनीतीं माथुला न रिगे ।
तेविं लाजिलें व्याख्यान न निगे । देखोनि जयांतें ॥ २१ ॥
२१) ऐका. ज्याप्रमाणें पाणी पातळ करावें लागत नाहीं, लोण्यामध्यें रवीचा प्रवेश होत नाहीं, त्याप्रमाणें ज्यांना पाहून माझें व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाहीं.
हें असो शब्दब्रह्म जिये बाजे । शब्द मावलेया निवांतु निजे ।
तो गितार्थु मर्‍हाटिया बोलिजे । हा पाडु काई ॥ २२ ॥
२२) हे असो; वेदांचे शब्द कुंठित झाले असतां ते वेद ज्या गीतार्थरुपी बाजेवर निवान्त निजतात, तो गीतार्थ मी मराठीमध्यें बोलावा, ही माझी योग्यता आहे काय ?   
परि ऐसियाही मज धिंवसा । तो पुढतियाचि येकी आशा ।
जे घिटींवा करुनि भवादृशां । पढियंतया होआवें ॥ २३ ॥
२३) परंतु असे असूनहि ही जी मला ( गीतार्थ मराठींत सांगण्याची ) तीव्र इच्छा झाली आहे, ती पुढच्या याच एका आशेनें कीं ( अशी ) धिटाई करुन आपल्यासारख्यांचा मी आवडता व्हावें. 
परि आतां चंद्रापासोनि निववितें । जें अमृताहूनि जीववितें ।
तेणें अवधानें कीजो वाढतें । मनोरथा माझिया ॥ २४ ॥
२४) तर, आतां चंद्रापेक्षां शांत करणारें व अमृताहूनहि जीवित वाढविणारें, असें जें आपलें लक्ष, त्या लक्षानें माझ्या मनोरथाची वाढ करावी. 
कां जैं दिठिवा तुमचा वरुषें । तैं सकळार्थासिद्धि मती पिके ।
एर्‍हवीं कोंमेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही ॥ २५ ॥
२५) कारण कीं, जेव्हां तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल, तेव्हां माझ्या बुद्धींत सर्व अर्थ पूर्णपणें स्फुरतील; पण जर तुम्ही उदास राहाल तर अंकुरदशेला आलेलें माझें ज्ञान सुकून जाईल.
सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा ।
तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥ २६ ॥
२६) तरी ऐका, कीं, सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरुपी जर खाद्य मिळेल, तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयांचीं दोंदें सुटतील. 
अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये ।
भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥ २७ ॥
२७) ( आणखी दुसरें असें कीं, ) वक्त्याच्या तोंडांतून केव्हां शब्दोच्चार होईल, याची अर्थ वाट पहात असतो व तेथें ( त्या वेळीं ) एकापासून दुसरा असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाच्या फुलांचा बहर होत जातो ( बुद्धीमध्यें अनेक अभिप्रायांच्या कल्पना स्फुरुं लागतात. ) 
म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे ।
आणि श्रोता दुश्र्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥ २८ ॥
२८) म्हणून उत्साहानें प्रश्र्नोत्तर देणें हाच कोणी अनुकूल वारा सुटला तर, हृदयरुपी आकाशांत शास्त्रसिद्धान्तरुपी मेघ दाट येतील; आणि श्रोता दुश्चित्त असेल, तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल. 
अहो चंद्रकांतु द्रवता करि होये । परि ते हातवटी चंद्री कीं आहे ।
म्हणऊनि वक्ता तो वक्ताचि नोहे । श्रोतेनविण ॥ २९ ॥
२९) अहो, चंद्रकांतमणि पाझरणारा आहे खरा, परंतु त्याला पाझरावयास लावण्याची युक्ति चंद्रामध्येंच आहे, ( त्याप्रमाणें वक्ता पुष्कळ बोलेल खरा, पण त्याला बोलावयास लावण्याची हातवटी श्रोत्यांमध्यें आहे, ) म्हणून श्रोत्यांशिवाय वक्ता हा वक्ताच नाही.   
परी आतां आमुतें गोड करावें । ऐसें हें तांदुळीं कासया विनवावें ।
साइखडियानें काइ प्रार्थावें । सूत्रधारातें ॥ ३० ॥
३०) परंतु आतां ' आम्हांस गोड करा ' अशी ही तांदुळांनी ( स्वयंपाक करणाराची ) प्रार्थना कशाकरितां करावयाची ? लांकडाच्या बाहुल्यांनी सूत्रधाराची कां प्रार्थना करावयाची ?
काय तो बाहुलियांचिया काजा नाचवी । कीं आपुलिये जाणिवेची कळा वाढवी ।
म्हणऊनि आम्हां या ठेवाठेवी । काय काज ॥ ३१ ॥
३१) तो ( सूत्रधार ) बाहुलीच्या कामाकरितां तिला नाचवितो काय ? ( तर नाहीं, मग ) बाहुली नाचविण्यानें तो आपल्या ज्ञानाची कळा वाढवित असतो. म्हणून ' अवधान द्या ' अशी श्रोत्यांची विनंती करण्याच्या उठाठेवीचें आम्हांला काय काम आहे ?  
तंव गुरु म्हणती काइ जाहलें । हें समस्तही आम्हां पावलें ।
आतां सांगे जें निरोपिलें । नारायणें ॥ ३२ ॥
३२) तेव्हां श्रीगुरुनिवृत्तिनाथ म्हणाले, अरें, झालें तरी काय ? तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली. आता भगवंतांनीं जें अर्जुनाला सांगितलें, तें सांग.
येथ संतोषोनि निवृत्तिदासें । जी जी म्हणऊनि उल्हासें ।
अवधारां श्रीकृष्ण ऐसे । बोलते जाहले ॥ ३३ ॥
३३) यावर निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्र्वर महाराज संतोषून उल्हासानें म्हणाले, जी महाराज, ऐका. श्रीकृष्ण याप्रमाणें बोलले.


Custom Search

Monday, June 28, 2021

Dnyaneshwari Adhyay 8 Part 11 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ११

 

Dnyaneshwari
Adhyay 8 Part 11 
Ovya 261 to 271 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ८ भाग ११ 
ओव्या २६१ ते २७१
मूळ श्लोक
वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥ २८ ॥
२८) वेदाध्ययन, यज्ञ, तपश्चर्या अथवा दान यांमध्यें जें जें पुण्यकारक फल सांगितलेलें आहे, त्या सर्व फलांहून अधिक फल हें ( जीव ब्रह्म यांचें ऐक्यरुपी ज्ञान ) आहे; हें जाणून योगी त्यांत ( वरील वेदाध्ययनादिकांच्या मार्गानें प्राप्त होणारीं स्वर्गसुखासारखीं फलें त्यांस ) मागें टाकून अत्यंत श्रेष्ठ अशा स्थानाप्रत जातो.   
वरी वेदाध्ययनाचें जालें । अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें ।
कां तपोदानांचें जोडलें । सर्वस्व हन जें ॥ २६१ ॥
२६१) जरी वेदाच्या अध्ययनानें मिळणारें पुण्य प्राप्त झालें, अथवा यज्ञरुप शेतच पिकलें, किंवा तपाचें अथवा दानाचें असलेलें सर्वस्व, पुण्य मिळालें. 
तया आघवियांचि पुण्याचा मळा । भारु आंतौनि जया ये फळा ।
जें परब्रह्म निर्मळ । सांठि न सरे ॥ २६२ ॥
२६२) ( तरी ) त्या सर्वच पुण्याच्या मळ्याला पुष्कळ पीक येऊन जें फळ येतें, तें फळ नित्य शुद्ध परमात्म्याच्या तुलनेला येत नाही. 
जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचां कांटाळा न दिसे सानें ।
पाहा पा वेदयज्ञादि साधनें । जया सुखा ॥ २६३ ॥
२६३) जें स्वर्गसुख, नित्यानंदाच्या मानानें उपमेच्या ताजव्यांत घालून पाहिलें असतां लहान दिसत नाही; पाहा कीं, ज्या सुखाच्या प्राप्तीकरितां वेदयज्ञादि साधनें आहेत;
जें विटे ना सरे । भोगितयाचेनि पवाडें पुरे ।
पुढती महासुखाचें सोयरें । भावंडचि ॥ २६४ ॥
२६४) जे ( स्वर्गसुख ) विटत नाहीं व संपत नाहीं, भोगणार्‍याच्या इच्छा पुरवितें आणि शिवाय जें स्वर्गसुख ब्रह्मसुखाचें धाकटें भावंडच आहे.    
ऐसें दृष्टीचेनि सुखपणें । जयासी अदृष्टाचें बैसणें ।
जें शतमखींहि आंगवणें । नोहेंचि एका ॥ २६५ ॥ 
२६५) अशा तर्‍हेचें दिसण्यांतच जें सुख आहे व ज्याला अदृष्टाचा ( संस्काररुपानें असलेल्या धर्माचा ) आधार आहे व जें शंभर यज्ञ करुनदेखील कित्येकांना साध्य होत नाहींच. 
तयातें योगीश्र्वर अलौकिकें । दिठीचेनि हाततुकें ।
अनुमानिती कौतुकें । तंव हळुवट आवडे ॥ २६६ ॥  
२६६) त्या स्वर्सुखाला योगेश्र्वर ( आपल्या ) लोकोत्तर विचारदृष्टिरुपी हातांवर लीलेनेंच वजन करुन त्या स्वर्गसुखाच्या योग्यतेचें अनुमान करतात, तों तें त्यांना अगदीच हलकें दिसून येतें 
 मग तया सुखाची किरीटी । करुनिया गा पाउटी ।
परब्रह्माचिये पाठीं । आरुढती ॥ २६७ ॥
२६७) अर्जुना, मग ते योगेश्र्वर त्या स्वर्गसुखाची पायरी करुन परब्रह्माच्या पटावर बसतात.  
ऐसें चराचरैकभाग्य । जें ब्रह्मेशां आराधनायोग्य ।
योगियांचें भोग्य । भोगधन जें ॥ २६८ ॥
२६८) याप्रमाणें स्थावरजंगमात्मक जगाचें जें एकमेव भाग्य, जें ब्रह्मदेव व शंकर यांनाहि आराधना करण्यास योग्य व जें योग्यांना भोगण्याला योग्य, असें भोगरुपी ऐक्य आहे.       
जो सकळ कळांची कळा । जो परमानंदाचा पुतळा ।
जो जिवाचा जिव्हाळा । विश्र्वचिया ॥ २६९ ॥
२६९) जो ( परमात्मा ) सर्व कळांची कळा आहे, जो परमानंदाची मूर्ति आहे, व जो विश्र्वाच्या जीवाचा जिव्हाळा आहे,
जो सर्वज्ञतेचा वोलावा । जो यादव कुळींचा कुळदिवा ।
तो कृष्ण जी पांडवा- । प्रती बोलिला ॥ २७० ॥
२७०) जो परमात्मा सर्वज्ञतेचें जीवन आहे; जो यादवांच्या कुलाचा कुलदीप आहे, असा श्रीकृष्ण अर्जुनास येणेंप्रमाणें बोलला.
ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतु । संजयो रायासी असे सांगतु ।
तेचि परियसा पुढां मातु । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥ २७१ ॥
२७१) अशी ही कुरुक्षेत्रावरील हकीकत संजय, राजा धृतराष्ट्राला सांगत होता. तीच गोष्ट पुढें तुम्ही ऐका, असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.  
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ब्रह्माक्षरनिर्देशोा नाम अष्टमोऽध्यायः ॥ ( श्लोक २८, ओव्या २७१ )
॥ ॐश्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥  




Custom Search

Dnyaneshwar Adhyay 8 Part 10 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग १०

 

Dnyaneshwari
Adhyay 8 Part 10 
Ovya 238 to 260 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ८ भाग १० 
ओव्या २३८ ते २६०
मूळ श्लोक
शुक्लकृष्णे गती होते जगतः शाश्र्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्ययवर्तते पुनः ॥ २६ ॥
२६) जगाचें प्रकाशरुप आणि अंधकाररुप ( म्हणजे अर्चिरादि आणि धूम्र ) असे हे दोन मार्ग नित्य आहेत. पहिल्या मार्गानें मनुष्य पुनः जन्माला येत नाहीं, पण दुसर्‍यानें पुनः जन्म पावतो.  
ऐसिया अनादि या दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा ।
म्हणऊनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज ॥ २३८ ॥
२३८) हे अर्जुना, अशा या अनादि कालापासून चालत असलेल्या दोन्ही वाटा आहेत. त्यांपैकीं एक सरळ व एक आडमार्गाची आहे. म्हणून तुला या दोन्ही वाटा मुद्दाम दाखविल्या आहेत. 
कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटिकें वोळखावें ।
हिताहित जाणावें । हिताचिलागीं ॥ २३९ ॥
२३९) कारण कीं, आपल्या हिताकरितां योग्य-अयोग्य मार्ग पाहावे, खरें-खोटें ओळकावें आणि आपलें हित कशांत आहे व अनहित कशांत आहे, हे समजून घ्यावें.
पाहें पां नाव देखतां बरवी । कोणी आड घाली काय अथावीं ।
कां सुपंथ जाणोनिया अडवीं । रिगवत असे ॥ २४० ॥
२४०) असें पाहा कीं, चांगली नाव डोळ्यांपुढें दिसत असून ( तीमध्यें न बसतां ) कोणी अथांग पाण्यांत उडी घालील काय ? अथवा राजमार्ग  माहीत असून, कोणी आडरानांत शिरेल काय ?
जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडू शके । 
तेविं जो उजू वाट देखे । तो अव्हांटा न वचे ॥ २४१ ॥
२४१) विष व अमृत ही जो ओळखतो, त्याच्यानें अमृत टाकवेल काय ? त्याचप्रमाणें जो सरळ मार्ग जाणतो, तो आडमार्गाला जाणार नाहीं.
म्हणोनि फुडें । पारखावें खरें कुडें ।
पारखिलें तरी न पडे । अनवसरें कही ॥ २४२ ॥
२४२) म्हणून खरें व खोटें, याची चांगली परीक्षा करावी. अशी परीक्षा केली असतां कधींहि अनुचित होणार नाही, ( अकाली देह पडणार नाहीं )
एर्‍हवीं देहांतीं थोर विषम । या मार्गाचें आहे संभ्रम ।
जन्में अभ्यासिलियाचें हन काम । जाईल वायां ॥ २४३ ॥
२४३) तसें केलें नाहीं तर मरणकाळीं या भ्रांतिकारक धूम्रमार्गाचें मोठे संकट आहे कीं, जन्मभर ज्या हेतूनें अभ्यास केला तो हेतु व्यर्थ जाईल. 
जरी अर्चिरा मार्गु चुकलिया । अवचटे धूम्रपंथें पडलिया ।
तरी संसारपांतीं जुंतलिया । भंवतचि असावें ॥ २४४ ॥
२४४) अर्चिरादि मार्ग चुकून, अकस्मात् जर धूम्रमार्गांत ( शरीर ) पडलें, तर संसाराच्या पातीला जुंपलें जाऊन फिरतच राहावें लागेल.
हे सायास देखोनि मोठे । आतां कैसेनि पां एकवेळ फिटे ।
म्हणोनि योगमार्ग गोमटे । शोधले दोन्ही ॥ २४५ ॥
२४५) हे ( पुनः पुन्हा जन्ममरणाचें ), मोठे सायास पाहून आतां हे सायास कशानें एकवार दूर होतील ( हें पाहावें ) म्हणून हे दोन्ही योगमार्ग नीट रीतीनें दाखविले. 
तंव एकें ब्रह्मत्वा जाइजे । आणि एकें पुनरावृत्ती येइजे ।
परि दैवगत्या जो लाहिजे । देहांतीं जेणें ॥ २४६ ॥
२४६) तर पहिल्या मार्गानें ( अर्चिरादि मार्गानें ) ब्रह्मत्वास जातां येते, आणि ( दुसर्‍या धूम्रमार्गानें ) पुनर्जन्माला येणें होतें. परंतु प्रारब्धानें मरणकाळीं ज्याला जो मार्ग वाट्याला येईल, ( त्याला त्या मार्गाने गति मिळेल ).
मूळ श्लोक
नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्र्चन ।
तस्मत्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥ २७ ॥ 
२७) हे पार्था, हे दोन मार्ग जाणणारा कोणताहि योगी मोह पावत नाही. म्हणून अर्जुना, तू सर्वकाळी योगयुक्त हो.  
ते वेळीं म्हणितलें हें नव्हे । वायां अवचटें काय पा
वे ।
देह जाऊनि वस्तु होआवे । मार्गेंचि कीं ॥ २४७ ॥
२४७) ( मरणकाळी अर्चिरादि मार्ग वाट्याला येतो का धूमर्माग वाट्याला येतो, हें अनिश्र्चित आहे. असे पाहून अर्जुन खिन्न झाला. ) त्यावेळीं ( भगवंत ) म्हणाले, देह जाऊन अर्चिरादि मार्गाने ब्रह्म होईल हे व्यर्थ आहे; कारण प्रारब्धवशात् अकस्मात् काय प्राप्त होईल कोणास ठाऊक ? ( तें कळत नाही. )  म्हणून हे नको. 
तरी आतां देह असो अथवा जावो । वस्तूचि आम्ही तों केवळ आहों ।
कां जे दोरीं सर्पत्व वावो । दोराचिकडुनि ॥ २४८ ॥
२४८) तर आता देह असो अथवा जावो. आम्ही तर केवळ ( ब्रह्मच ) आहोत. कारण की असें दोरीवर भासलेला सर्पपणा दोरीच्या दृष्टीनें मिथ्या आहे.    
मज तरंगपण असे का नसे । ऐसें हें उदकासी कहीं प्रतिभासे।
तें भलतेव्हां जैसें तैसें । उदकाचि कीं ॥ २४९ ॥
२४९) मला तरंगपणा आहे किंवा नाहीं, असें पाण्याला केव्हांतरी वाटते काय ? तें वाटेल तेव्हां पाणी जसेंच्या तसे पाणीच असतें.
तरंगाकारें न जन्मेचि । ना तरंगलोपें न निमेचि । 
तेविं देहीं जे देहेंचि । वस्तु जाहले ॥ २५० ॥
२५०) लाटेच्या व्यक्त होण्यानें पाणी जन्मत नाही. अथवा लाट नााहीशीं झाली तरी तें पाणी मरत नाहीं. त्याप्रमाणें जे देहवान् असतांना देहानेंच ब्रह्म झाले.  
आतां शरीराचें तयाचिया ठाईं । आडनांवही उरले नाहीं ।
तरी कोणें काळें काई । निमे तें पाहें पां ॥ २५१ ॥
२५१) आतां त्या तत्ववेत्त्यांच्या ठिकाणी शरीराचें आडनांवहि उरले नाहीं. तर बाबा अर्जुना, असा विचार कर कीं, कोणत्या काळी काय नाश पावणार आहे ? 
मग मार्ग तैं कायसा शोधावे । कोणें कोठूनि कें जावें ।
जरी देशकालादि आघवें । आपणचि असिजे ॥ २५२ ॥
२५२) जर सर्व देश व काल आपणच आहोंत, तर मग हे अर्चिरादि व धूम्रमार्ग हे कशाला शोधावे ? आणि अणि कोणी शोधून कोठे जावयाचें ?   
आणि हां गा घटु जे वेळीं फुटे । ते वेळीं तेथिंचे आकाश लागे नीटे वाटे ।
वाटा लागे तरि गगना भेटे । एर्‍हवी चुके ॥ २५३ ॥
२५३) आणि अरे अर्जुना, घटज्या वेळेला फुटतो, त्या वेळीं घटांतील आकाश नीट वाटेला लागतें व नीट वाटेला लागलें तर महाआकाशाला तें नेमके मिळतें, नाहीं तर ( एर्‍हवीं ) हे महाकाश तें महाकाशाला मिळावयाचें चुकेल काय ?     
पाहें पां ऐसें हन आहे । कीं तो आकारचि म्हणों जाये ।
येर गगन तें गगनींचि आहे । घटत्वाहि आधीं ॥ २५४ ॥
२५४) आम्हीं म्हणतो असें आहे; पाहा कीं घटाचा आकारच ( फक्त ) नाहींसा होतो. वास्तवीक पाहिलें तर घटपणाच्या आधींहि ( त्यांतील ) आकाश आकाशाच्या ठिकाणींच आहे. 
ऐसिया बोधाचेनि सुरवाडें । मार्गामार्गाचें सांकडें ।
तयां सोऽहंसिद्धा न पडे । योगियांसी ॥ २५५ ॥
२५५) अशा या बोधाच्या अनुकूलतेने मार्गामार्गाचे संकट, ' मी ब्रह्म आहे ' असें ज्ञान झालेल्या त्या योग्यांना पडत नाहीं.    
याकारणें पंडुसुता । तुवां होआवें योगयुक्ता । 
येतुलेनि सर्वकालीं साम्यता । आपणपां होईल ॥ २५६ ॥
२५६) अर्जुना, म्हणून तूं योगसंपन्न हो, एवढ्यानें स्वतःच्या ठिकाणीं सर्व काळ स्वरुपसाम्यता होईल. 
मग भलतेथ भलतेव्हां । देहबंधु असो अथवा जावा ।
परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं ॥ २५७ ॥
२५७) मग वाटेल तेथें वाटेल तेव्हां देहाचा पाश असो अथवा जावों, परंतु बंधरहित अखंड ब्रह्मस्थितींत बिघाड येणार नाहीं.
तो कल्पादि जन्मा नागवे । कल्पांतीं मरणें नाप्लवे ।
माजि स्वर्गसंसारांचेनि लाघवें । झकवेना ॥ २५८ ॥
२५८) तो कल्पाच्या आरंभी जन्मांत सांपडत नाहीं. कल्पाच्या अंती तो मरणानें बुडत नाहीं व मधल्या स्थितींत, म्हणजे स्थितिकालीं, स्वर्ग आणि संसार यांच्या मोहानें तो फसला जात नाहीं.    
येणें बोधें जो योगी होये । तयासी या बोधाचेंचि नीटपण आहे ।
कां जे भोगातें पेलूनि पाहे । निजरुपा ये ॥ २५९ ॥
२५९) या बोधानें जो योगी होतो. त्याला या बोधाचाच सरळपणा असतो. कारण कीं, तो स्वर्गातील व संसारातील भोगांना विचारानें वजन करुन पाहतो व ते असार म्हणून त्यांचा त्याग करुन तो आत्मस्वरुपाला येतो.
पैं गा इंद्रदिका देवां । जयां सर्वस्वें गाजती राणिवा ।
तें सांडणें मानूनि पांडवा । डावली जो ॥ २६० ॥
२६०) बा अर्जुना, इंद्रादिक देवांना त्यांचे सर्वस्व म्हणून जी राज्यें प्रसिद्ध आहेत, ती ओवाळून टाकलेल्या बळीप्रमाणें त्याज समजून तीं तो तुच्छ म्हणून टाकून देतो.   



Custom Search

Dnyaneshwari Adhyay 8 Part 9 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ९

 

Dnyaneshwari 
Adhyay 8 Part 9 
Ovya 220 to 237 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ८ भाग ९ 
ओव्या २२० ते २३७
मूळ श्लोक
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥ २४ ॥
२४) ( आंत ) अग्नि व ज्योतीचा प्रकाश, ( बाहेर ) दिवस,  शुक्लपक्ष आणि उत्तरायणाचे सहा महिने, यांच्या ठिकाणीं ( या स्थितींत ) ज्यांचें देहावसान होतें, ते ब्रह्मवेत्ते जन ब्रह्माप्रत जातात.   
आंत अग्निज्योतींचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु परी दिवसु ।
आणि सामासांमाजीं मासु । उत्तरयण ॥ २२० ॥
२२०) देहांत अग्नीचा व ज्योतीचा प्रकाश असून, बाहेर शुक्लपक्ष परंतु दिवस, आणि उत्तरायणांतील सहा महिन्यांपैकी एक महिना,    
ऐसिया समायोगाची निरुती । लाहोनि जे देह ठेवती ।
ते ब्रह्मविद होती । परब्रह्म ॥ २२१ ॥
२२१) अशा या चांगल्या जुळून आलेल्या योगांची प्राप्ति होऊन, जे योगी आपला देह सोडतात, ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात.  
अवधारीं गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा ।
तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा । यावयासी ॥ २२२ ॥
२२२) अर्जुना, ऐक. या कालाचें येथपर्यंत सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणें आत्मस्वरुपाकडे येण्यास हा सरळ मार्ग आहे.  
एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें ।  
दिवस जाणें तिसरें । चौथें शुक्लपक्ष ॥ २२३ ॥
२२३) येथें अग्नि ही पहिली पायरी आहे. ज्योतीचें स्वरुप ही पायरी दुसरी आहे, दिवस ही तिसरी पायरी आणि शुक्लपक्ष ही चौथी पायरी असें समज. 
आणि सामास उत्तरायण । तें वरचील गा सोपान ।
येणें सायुज्यसिद्धिसदन । पावती योगी ॥ २२४ ॥
२२४) आणि उत्तरायणांतील सहा महिने ही वरची पायरी आहे. या मार्गानें योगी तद्रूपता सिद्धीच्या वराला येतात.
हा उत्तम काळु जाणिजे । यातें अर्चिरा मार्गु म्हणिजे ।
आतां अकाळु तोही सहजें । सांगेन आईक ॥ २२५ ॥ 
२२५) हा उत्तम काळ आहे, असें समज. याला अर्चिरादि मार्ग म्हणावें. आतां अकाळ जो आहे. तोहि ओघानें सांगतो. ऐक.    
मूळ श्लोक
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ॥ २५ ॥
२५) ( आंत ) धूर ( धूमयुक्त अग्नि ), त्याप्रमाणें ( बाहेर ) रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे सहा महिने, या स्थितींत ( ज्याचें देहावसान होतें तो ) योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो.  
तरी प्रयाणाचेनि अवसरें । वातुश्र्लेष्मु सुभरे ।
तेणें अंतःकरणी आंधारें । कोंदलें ठाके ॥ २२६ ॥
२२६) तरी मरणाच्या वेळीं वात व कफ ( शरीरामध्यें ) फार दाटतो, त्यामुळें अंतःकरणांत अंधार गच्च भरुन राहतो. 
सर्वेंद्रियां लांकूड पडे । स्मृति भ्रमामाजीं बुडे ।
मन होय वेडें । कोंडे प्राण ॥ २२७ ॥
२२७) सर्व इंद्रियें लांकडासारखीं जड होतात, स्मरणशक्ति भ्रमांत बुडते, मन वेडें होतें व प्राण कोंडतो.   
अग्नीचें अग्निपण जाये । मग तो धूमचि अवघा होये ।
तेणें चेतना गिंवसली ठाये । शरीरींची ॥ २२८ ॥ 
२२८) अग्नीची उष्णता जाते, मग सर्व धूरच होतो, त्या धूरानें चेतना शरीरांत कोंडून राहते. 
जैसे चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ ।
मग गडद ना उजाळ । ऐसें झांवळें होय ॥ २२९ ॥
२२९) ज्याप्रमाणें पाण्यानें भरगच्च भरलेले ढग चंद्राच्या आड दाट यावेत, मग त्या वेळीं गडद अंधकारहि नाहीं आणि स्वच्छ उजेडहि नाहीं, असा झुंजुमुंजु उजेड असतो.  
कां मरे ना सावध । ऐसें जीवितासि पडे स्तब्ध ।
आयुष्य मरणाची मर्याद । वेळु ठाकी ॥ २३० ॥
२३०) याप्रमाणें तो धड मेलेला नसतो व शुद्धीवरहि नसतो अशी जीवितास स्तब्धता येते आणि मरणाच्या वेळेची वाट पाहात राहतें,  
ऐसी मनबुद्धिकरणीं । सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी ।
जेथ जन्में जोडलिये वाहणी । युगचि बुडे ॥ २३१ ॥
२३१) याप्रमाणें मन, बुद्धि व इंद्रियें यांच्या सभोंवती अशी ही धुराच्या समुदायाची वांटणी होते, तेव्हां जन्मभर संपादन केलेला स्वरुपअभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो. 
हां गा हातींचें जे वेळीं जाये । ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे ।
म्हणऊनि प्रयाणीं तंव होये । येतुली दशा ॥ २३२ ॥
२३२) बाबा अर्जुना, जन्मभर केलेला हातचा अभ्यास जेव्हां जातो त्या वेळीं आणखी प्राप्तीची गोष्ट कशाला मनांत आणावयाला पाहिजे ? म्हणून मरणकाळी तर अशी अवस्था होते. 
आणि देहाआंतु ऐसी स्थिती । बाहेरी कृष्णपक्षु वरि राति ।
आणि सामासही ते वोडवती । दक्षिणायन ॥ २३३ ॥
२३३) अशी ही देहाच्या आंत स्थिती होऊन, बाहेर वद्य पंधरवडा, शिवाय रात्र आणि दक्षिणायनांतील सहा महिने येतात. 
इये पुनरावृत्तीचीं घराणीं । आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं ।
तो स्वरुपसिद्धिची काहाणी । कैसेनि आइके ॥ २३४ ॥
२३४) ही वारंवार फेर्‍यांत आणणारीं ठिकाणें, ज्याच्या मरणाच्या वेळेला सर्वच एकत्र जुळुन येतात, तो ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल ?   
ऐसा जयाचा देह पडे । तया योगी म्हणोनि चंद्रवरी जाणें घडे ।
मग तेथूनि मागुता बहुडे । संसारा ये ॥ २३५ ॥
२३५) अशा रीतीनें ज्याचा देह पडतो, तो योगी असल्याकारणानें त्याचें चंद्रलोकापर्यंत जाणें घडतें. नंतर तेथून तो माघारा फिरुन पुनः मृत्युलोकांत जन्मास येतो.  
आम्हीं अकाळु जो पांडवा । म्हणितला तो हा जाणावा ।
आणि हाचि धूम्रमार्गु गांवा । पुनरावृत्तीचिया ॥ २३६ ॥
२३६) अर्जुना, आम्ही अकाळ म्हणून जो म्हटला, तो हाच, असें समज आणि हाच पुनर्जन्मरुप गांवास येण्याचा धूम्रमार्ग आहे. 
येर तो अर्चिरा मार्गु । तो वसता आणि असलगु । 
साविया स्वस्त चांगु । निवृत्तीवरी ॥ २३७ ॥
२३७) दुसरा जो अर्चिरादि मार्ग, तो वाहता आणि सुगम आहे; आणि तो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ति करुन देण्यास चांगला आहे.



Custom Search

Sunday, June 27, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 8 Part 8 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ८

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 8 Part 8 
Ovya 191 to 219 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ८ भाग ८ 
ओव्या १९१ ते २१९
ऐसें जाणूनि योगीश्र्वर । जयातें म्हणती परमपर ।
जें अनन्यगतीचें घर । गिंवसीत ये ॥ १९१ ॥
१९१) वर सांगितल्याप्रमाणें या पुरुषांचे स्वरुप आहे, असें जाणून श्रेष्ठ योगी ज्याला ( पुरुषाला ) सर्वांत पलीकडची गति असें म्हणतात; आणि जो परमात्मा एकनिष्ठ भक्तांचें घर शोधीत येतो.
जें तनूवाचाचित्तें । नाइकती दुजिये गोष्टीतें ।
तया एकनिष्ठेचें पिकतें । सुक्षेत्र जें ॥ १९२ ॥
१९२) जे कायावाचामनानें परमात्म्यावांचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत, त्या एकनिष्ठांच्या एकनीष्ठतेचें पीक देणारें जें चांगले शेत आहे. 
हें त्रैलोक्यचि पुरुषोत्तमु । ऐसा साचु जयांचा मनोधर्मु ।
तयां आस्तिकांचा आश्रमु । पांडवा गा ॥ १९३ ॥
१९३) हें त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे, अशी ज्यांची पक्की समजूत आहे, त्या आस्तिकांचें; अर्जुना, जें ( परमात्मस्वरुप ) राहण्याचें ठिकाण आहे;   
जें निगर्वाचें गौरव । जें निर्गुणाची जाणीव ।
जें सुखाची राणिव । निराशांसी ॥ १९४ ॥
१९४) जें गर्वरहित पुरुषांचे मोठेपण आहे, जें गुणातीत पुरुषांचे ज्ञान आहे व निरिच्छ पुरुषांस जें सुखाचें राज्य आहे; 
जें संतोषियां वाढिलें ताट । जें अर्चितां अनाथांचें मायपोट ।
भक्तीसी उजू वाट । जया गांवा ॥ १९५ ॥
१९५) जें संतोषी पुरुषांस वाधलेले ताट आहे; जें संसाराची चिंता न करणारें असून ज्यांना माझ्यावाचून दुसरा कोणी मालक नाहीं, अशा भक्तांचें मायपोट आहे आणि ज्या गांवाला, पोहोचण्याला भक्ति हीच रसाळ वाट आहे;   
हें एकैक सांगोनि वाया । काय फार करुं धनंजया ।
पैं गेलिया जया ठाया । तो ठावोचि होईजे ॥ १९६ ॥  
१९६) अर्जुना, हें एकेक सांगून व्यर्थ विस्तार कशाला करुं ? परंतु ज्या ठिकाणीं गेलें असतां तें ठिकाणच आपण होतों.      
हिंवाचिया झळुका । जैसें हिंवचि पडे उष्णोदका ।
कां समोर जालिया अर्का । तमचि प्रकाशु होय ॥ १९७ ॥
१९७) थंडीच्या झुळुकांनी जसें ऊन पाणीच थंड होतें अथवा सूर्यासमोर अंधार आला असतां तो अंधारच प्रकाश बनतो; 
तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा ।
होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ॥ १९८ ॥
१९८) अर्जुना, त्यप्रमाणें ज्या परमात्मस्वरुपीं मुक्कामाला हा ( दुःखरुप देहबुद्ध्यादिसंघातरुपी ) संसार पोंचला असतां, तो संसार सर्व बाजूंनीं मोक्षच ( दुःखरुप देहबुद्ध्यादिसंघातरुपी ) संसार पोंचला असतां, तो संसार सर्व बाजूंनी मोक्षच ( दुःखशून्य व सुखरुप असा ) होऊन राहातो.
तरि अग्नीमाजीं आलें । जैसें इंधनचि अग्नि जाहलें ।
पाठीं न निवडेचि कांहीं केलें । काष्टपण ॥ १९९ ॥
१९९) तरी ज्याप्रमाणें लांकूड अग्नीत गेलें म्हणजे अग्निरुपच होते व तें अग्निरुप झाल्यावर पुनः लांकूडपणानें निराळें काढूं म्हटले तर तें जसें निराळे निघतच नाही;    
नातरी साखरेचा माघौता । बुद्धिंमतपणेंही करितां ।
परि ऊंस नव्हे पंडुसुता । जियापरी ॥ २०० ॥
२००) अथवा उसाची साखर झाल्यावर त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचें जरी बुद्धिमान पुरुषानेंहि मनांत आणलें तरी पुनः ऊस होणें ज्याप्रमाणे शक्य नाहीं;
लोहाचें कनक जहालें । हें एकें परिसें केलें ।
आतां आणिक कैचें तें गेलें । लोहत्व आणी ॥ २०१ ॥
२०१) परिसानें लोखंडाचें सोनें केलें; आतां आणिक दुसरा पदार्थ कोठें आहे कीं, जो नाहींसा झालेला लोखंडपणा पुनः आणील ?   
म्हणोनि तूप होऊनि माघौतें । जेवीं दूधपणा न येचि निरुतें ।
तेवि पावोनियां जयातें । पुनरावृत्ति नाहीं ॥ २०२ ॥
२०२) म्हणून ज्याप्रमाणें दुधाचे तूप झाल्यावर तुपाला पुनः दुधपणा खात्रीनें येत नाहीं, त्याप्रमाणें ज्या परमात्मस्वरुपास पावल्यावर पुर्जन्म नाहीं; 
तें माझें परम । साचोकारें निजधाम ।
हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असे ॥ २०३ ॥
२०३) असें जें स्वरुप, ते माझें स्वतःचे खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे; ही अंतरंगातील गुह्य गोष्ट तुला दाखवीत आहें.  
मूळ श्लोक
यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ २३ ॥
२३) हे भरतश्रेष्ठा, तथापि कोणत्या कालीं देहावसान झाले असतांना योगी आवावृत्तिप्रत जातात ( जन्ममेणापासून मुक्त होतात ) व ( कोणत्या कालीं देहावसान झालें असतांना ) आवृत्तिप्रत ( पुनर्जन्माप्रत, ) जातात, तो काल सांगतों,  
तेवींचि आणिकेंही एकें प्रकारें । हे जाणतां आहे सोपारें ।
तरि देह सांडितेनि अवसरें । जेथ मिळती योगी ॥ २०४ ॥
२०४) त्याप्रमाणें आणखीहि एका प्रकारानें हें ( निजधाम ) जाणणें सोपें आहे. तरी योगी लोक योग्य कालीं देहत्याग करुन जेथें प्राप्त होतात ( तें माझें निजधाम होय );
अथवा अवचटें ऐसें घडे । जे अनवसरें देह सांडे ।
तरि माघौतें येणें घडे । देहासीचि ॥ २०५ ॥
२०५) अथवा, अकस्मात असें घडतें कीं, योग्याचा देह अयोग्य कालीं पडला, तर त्याला पुनःजन्माला यावें लागतें, 
म्हणोनि काळशुद्धी जरी देह ठेविती । तरी ठेवितखेवीं ब्रह्मचि होती ।
एर्‍हवीं अकाळीं तरी येती । संसारा पुढती ॥ २०६ ॥
२०६) म्हणून योग्यांनीं योग्य कालीं देह ठेवला, तर देह ठेवतांक्षणींच ब्रह्म होतात; एर्‍हवीं त्यांनीं जर अयोग्य कालीं देह ठेवला तर ते पुनः संसाराला येतात;  
तैसें सायुज्य आणि पुनरावृत्ती । ये दोन्हीअवसराआधीन आहाती ।
तो अवसरु तुजप्रती । प्रसंगें सांगों ॥ २०७ ॥
२०७) त्याप्रमाणें मद्रुप होणें आणि जन्ममरणांच्या फेर्‍यांत सांपडणें हीं दोन्हीं ठराविक मरणवेळेच्या आधीन आहेत.आतां प्रसंगानुसार त्याच कालासंबंधानें विचार तुला सांगतों.  
तरि ऐकें गा सुभटा । पातालिया मरणाचा माजिवटा ।
पांचै आपुलालिया वाटा । निघती अंती ॥ २०८ ॥
२०८) तर अर्जुना, ऐक. मरणाचा जोर प्राप्त झाला असतां शेवटीं पंचमहाभूतें आपापल्या वाटेनें निघतात.  
ऐसां वरिपडिलां प्रयाणकाळीं । बुद्धीतें भ्रमु न गिळी ।
स्मृति नव्हे आंधळी । न मरे मन ॥ २०९ ॥
२०९) असा मरणकाल प्राप्त झाला असतांना बुद्धिला भ्रम गिळीत नाहीं, स्मरणशक्ति आंधळी होत नाही; आणखी मन मरत नाहीं, 
हा चेतनावर्गु आघवा । मरणीं असे टवटवा ।
परि अनुभविलिया ब्रह्मभावा । गंवसणी होऊनि ॥ २१० ॥
२१०) याप्रमाणें हा सर्व इंद्रिसमुदाय मरणसमयीं टवटवीत असतो; पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यामुळें प्रसन्न असतो.
ऐसा सावध हा समवावो । आणि निर्वाणवेर्‍हीं निर्वाहो ।
हें तरीच घडे जरी सावावो । अग्नीचा आथी ॥ २११ ॥
२११) याप्रमाणें हा इंद्रियसमुदाय सावध असणें आणि तो त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणें, हें जर, अग्नीचें साह्य असेल तर घडेल.
पाहा पां वारेन कां उदकें । जैं दिवियाचें दिवेपण झांके ।
तैं असतीच काय देखे । दिठी आपुली ॥ २१२ ॥
२१२) असें पाहा कीं, वार्‍यानें अथवा पाण्यानें जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहींसा होतो, तेव्हां ( शाबूत ) असलेली आपलीच दृष्टि पाहूं शकते काय ?   
तैसें देहांतींचेनि विषमवातें । देह आंत बाहेरि श्र्लेष्मा आते ।
तैं विझोनि जाय उजितें । अग्नीचें जेव्हां ॥ २१३ ॥
२१३) त्याप्रमाणें देह पडण्याच्या वेळी होणार्‍या त्रिदोषानें देह आंतबाहेर कफानें व्यापला जातो, त्या वेळीं जेव्हां अग्नीचें तेज विझून जातें,  
ते वेळीं प्राणासीचि प्राणु नाहीं । तेथ बुद्धि असोनि करील काई ।
म्हणोनि अग्निविण देहीं । चेतना न थरे ॥ २१४ ॥    
२१४) त्या वेळीं प्राणासच क्रियाशक्ति नसते, मग तेथें बुद्धि असून काय करील ? म्हणून अग्निशिवाय शरीरांत चेतना ( ज्ञानकला ) टिकत नाही.         
अगा देहींचा अग्नि जरी गेला । तरी देह नव्हे चिखलु वोला ।
वायां आयुष्यवेळु आपुला । आंधारां गिंवसी ॥ २१५ ॥
२१५) अरे अर्जुना, जर देहांतील अग्नी गेला, तर तो देह नहीं, ओला चिखल आहे. असें झालें म्हणजे आयुष्य आपला वेळ व्यर्थ अंधारांत शोधीत राहातें. 
आणि मागील स्मरण आघवें । तें तेणें अवसरें सांभाळावें ।
मग देह त्यजूनि मिळावें । स्वरुपीं कीं ॥ २१६ ॥
२१६) आणि वास्तविक पाहिलें असतां, मागील जें सर्व स्मरण आहे, तें त्या वेळीं तसेंच ठेवायचें असते आणि मग देह टाकून परमात्मस्वरुपी मिळावयाचें असतें.   
तंव तयादेहश्र्लेष्माचां चिखलीं । चेतनाचि बुडोनि गेली ।
तेथ मागिली पुढिली हे ठेली । आठवण सहजें ॥ २१७ ॥
२१७) परंतु देहाला ज्या कफानें व्यापलें, त्या कफाच्या चिखलांत चेतना बुडून गेली, तेथें मागील ( केलेल्या अभ्यासाची ) पुढील ( स्वरुपस्थितीची ) आठवण स्वाभाविक रीतीनें थांबली.
म्हणोनि आदीचि अभ्यासु जो केला । तो मरण न येतांचि निमोनि गेला ।
जैसें ठेवणें न दिसतां मालवलां । दीपु हातींचा ॥ २१८ ॥
२१८) म्हणून ज्याप्रमाणें ठेवलेली वस्तु पाहण्याकरितां हातांत घेतलेला दिवा, ती वस्तु दिसण्यापूर्वीच  मालवून जावा, त्याप्रमाणें मरणाच्या अगोदरच जो जन्मभर अभ्यास केला, तो मरण येण्याच्या पूर्वींच नाहींसा झाला.  
आता असो हें सकळ । जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ ।
तया अग्नीचें प्रयाणीं बळ । संपूर्ण आथी ॥ २१९ ॥
२१९) आतां हें सगळें असूं दे. असे समज कीं, ज्ञानाला मूळ कारण अग्नि आहे. त्या अग्नीचें मरणकाळीं संपूर्ण बळ असावें,



Custom Search

Newer Posts Older Posts Home