Monday, January 4, 2021

Shri RamCharitManas Part 69 श्रीरामचरितमानस भाग ६९

 

Shri RamCharitManas Part 69 
Doha 311 to 316 
श्रीरामचरितमानस भाग ६९ 
दोहा ३११ ते ३१६ 
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

छं०—उपमा न कोउ कह दास तुलसी कतहुँ कबि कोबिद कहैं ।

बल बिनय बिद्या सील सोभा सिंधु इन्ह से एइ अहैं ॥

पुर नारि सकल पसारि अंचल बिधिहि बचन सुनावहीं ।

ब्याहिअहुँ चारिउ भाइ एहिं पुर हम सुमंगल गावहीं ॥

तुलसीदास म्हणतात की, कवी व विद्वान असे म्हणतात की, यांच्यासाठी कुठेही कुठलीही उपमा नाही. बल, विनय, विद्या आणि शोभेचे सागर असलेले हे, यांच्यासारखे हेच आहेत. जनकपूरच्या सर्व स्त्रिया पदर पसरुन विधात्याला म्हणतात की, ‘ चारीही भावांचा विवाह याच नगरात होवे आणि आम्ही सर्वजण मंगल गीते गाऊ ‘ ॥

सो०—कहहिं परस्पर नारि बारि बिलोचन पुलक तन ।

सखि सबु करब पुरारि पुन्य पयोनिधि भूप दोउ ॥ ३११ ॥

डोळ्यांत प्रेमाश्रू आणून पुलकित शरीराने स्त्रिया आपसात म्हणत होत्या की, ‘ हे सखी, दोन्ही राजे पुण्याचे सागर आहेत, त्रिपुरारी शिव सर्व मनोरथ पूर्ण करतील.’ ॥ ३११ ॥

एहि बिधि सकल मनोरथ करहीं । आनँद उमगि उमगि उर भरहीं ॥

जे नृप सीय स्वयंबर आए । देखि बंधु सब तिन्ह सुख पाए ॥

अशाप्रकारे सर्वजणी मनोरथ करीत होत्या आणि त्यांच्या हृदयाला आनंदाची भरती येत होती. सीतेच्या स्वयंवरासाठी जे राजे आले होते, त्यांनाही चारी भाऊ पाहून आनंद वाटला. ॥ १ ॥

कहत राम जसु बिसद बिसाला । निज निज भवन गए महिपाला ॥

गए बीति कछु दिन एहि भॉंती । प्रमुदित पुरजन सकल बराती ॥

श्रीरामांची निर्मल व महान कीर्ती सांगत, ते राजे लोक आपापल्या घरी परत गेले. अशा प्रकारे काही दिवस निघून गेले. जनकपुरवासी आणि वर्‍हाडी मंडळी सर्व मोठ्या आनंदात होते. ॥ २ ॥

मंगल मूल लगन दिनु आवा । हिम रितु अगहनु मासु सुहावा ॥

ग्रह तिथि नखतु जोगु बर बारु । लगन सोधि बिधि कीन्ह बिचारु ॥

मांगल्याचे मूळ असलेला लग्नाचा दिवस आला. हेमंत ऋतु आणि शोभिवंत मार्गशीर्ष महिना होता. ग्रह, तिथी, नक्षत्र, योग व वार उत्तम होते. मुहूर्त शोधून ब्रह्मदेवांनी त्यावर विचार केला. ॥ ३ ॥

पठै दीन्हि नारद सन सोई । गनी जनक के गनकन्ह जोई ॥

सुनी सकल लोगन्ह यह बाता । कहहिं जोतिषी आहिं बिधाता ॥

आणि ती मुहूर्ताची पत्रिका नारदांच्या हातून जनकांकडे पाठविली. जनकांच्या ज्योतिषांनीसुद्धा तीच गणना केली होती. जेव्हा सर्व लोकांना हे कळले, तेव्हा ते म्हणू लागले की, ‘ येथील ज्योतिषीसुद्धा ब्रह्मदेवच आहेत. ‘ ॥ ४ ॥

दोहा—धेनुधूरि बेला बिमल सकल सुमंगल मूल ।

बिप्रन्ह कहेउ बिदेह सन जानि सगुन अनुकूल ॥ ३१२ ॥

निर्मल व सर्व सुंदर मांगल्याचे मूळ असलेली गोरजाची पवित्र वेळ आली आणि अनुकूल शकुन होऊ लागले. हे पाहून ब्राह्मणांनी राजा जनकांना म्हटले. ॥ ३१२ ॥

उपरोहितहि कहेउ नरनाहा । अब बिलंब कर कारनु काहा ॥

सतानंद तब सचिव बोलाए । मंगल सकल साजि सब ल्याए ॥

तेव्हा राजा जनकांनी पुरोहित शतानंदांना विचारले की, ‘ आता उशीर करण्याचे कारण काय ? तेव्हा शतानंदांनी मंत्र्यांना बोलावले. ते सर्वजण मंगलकार्याचे सर्व सामान सजवून घेऊन आले. ॥ १ ॥

संख निसान पनव बहु बाजे । मंगल कलस सगुन सुभ साजे ॥

सुभग सुआसिनि गावहिं गीता । करहिं बेद धुनि बिप्र पुनीता ॥

शंख, नगारे, ढोल आणि अनेक वाद्ये वाजू लागली. मंगल कलश व शुभ शकुनाच्या दही, दुर्वा इत्यादी वस्तू सजवून ठेवल्या. सुंदर सुवासिनी स्त्रिया गीत गात होत्या आणि पवित्र ब्राह्मण वेदमंत्रांचा घोष करु लागले. ॥ २ ॥

लेन चले सादर एहि भॉंती । गए जहॉं जनवास बराती ॥

कोसलपति कर देखि समाजू । अति लघु लाग तिन्हहि सुरराजू ॥

सर्वजण मोठ्या आदराने वर्‍हाड आणण्यासाठी निघाले. ते जानवस घरी गेले. अयोध्यापती दशरथांचे वैभव पाहून त्यांना देवराज इंद्रसुद्धा फार तुच्छ वाटू लागला. ॥ ३ ॥

भयउ समउ अब धारिअ पाऊ । यह सुनि परा निसानहिं घाऊ ॥

गुरहि पूछि करि कुल बिधि राजा । चले संग मुनि साधु समाजा ॥

त्यांनी जाऊन विनंती केली की, ‘ वेळ झालेली आहे, आता चलावे.’ हे ऐकताच नगार्‍यांवर टिपरी पडली. गुरु वसिष्ठांना विचारुन आणि कुलाचाराप्रमाणे सर्व करुन राजा दशरथ मुनी आणि साधूंचा समुदाय बरोबर घेऊन निघाले. ॥ ४ ॥

दोहा—भाग्य बिभव अवधेस कर देखि देव ब्रह्मादि ।

लगे सराहन सहस मुख जानि जनम निज बादि ॥ ३१३ ॥

ब्रह्मदेव इत्यादी देव अयोध्यापती दशरथांचे भाग्य व वैभव पाहून आपला जन्म व्यर्थ समजू लागले आणि हजारो मुखांनी त्यांची प्रशंसा करु लागले. ॥ ३१३ ॥

सुरन्ह सुमंगल अवसरु जाना । बरषहिं सुमन बजाइ निसाना ॥

सिव ब्रह्मादिक बिबुध बरुथा । चढ़े बिमानन्हि नाना जूथा ॥

सुमंगल वेळ पाहून देवगण नगारे वाजवीत फुलांचा वर्षाव करु लागले. सिव, ब्रह्मदेव इत्यादी देववृंद जमावाने विमानांत चढू लागले. ॥ १ ॥

प्रेम पुलक तन हृदयँ उछाहू । चले बिलोकन राम बिआहू ॥

देखि जनकपुरु सुर अनुरागे । निज निज लोक सबहिं लघु लागे ॥

ते प्रेमाने पुलकित होऊन आणि हृदय उत्साहाने भरुन जाऊन श्रीरामांचा विवाह पाहण्यास निघाले. जनकपूर पाहून देव त्याच्या प्रेमात पडले व त्या सर्वांना आपापले लोक तुच्छ वाटू लागले. ॥ २ ॥

चितवहिं चकित बिचित्र बिताना । रचना सकल अलौकिक नाना ॥

नगर नारि नर रुप निधाना । सुघर सुधरम सुसील सुजाना ॥

चित्र-विचित्र मंडप व नाना प्रकारची ती सर्व अलौकिक मांडणी पाहून ते चकित झाले. नगरातील स्त्री-पुरुष रुपाचे भांडार होते, सुंदर ठेवणीचे होते, श्रेष्ठ धर्मात्मे, सुशील व सुजाण होते. ॥ ३ ॥

तिन्हहि देखि सब सुर सुरनारीं । भए नखत जनु बिधु उजिआरीं ॥

बिधिहि भयउ आचरजु बिसेषी । निज करनी कछु कतहुँ न देखी ॥

त्या लोकांना पाहून सर्व देव देवांगना चंद्राच्या प्रकाशाने जसे तारागण निस्तेज होतात, तसे प्रभाहीन झाले. ब्रह्मदेवांना विशेष आश्र्चर्य वाटले, कारण त्यांना तेथे स्वतःची निर्मिती कुठे दिसली नाही. ॥ ४ ॥

दोहा—सिवँ समुझाए देव सब जनि आचरज भुलाहु ।

हृदयँ बिचारहु धीर धरि सिय रघुबीर बिआहु ॥ ३१४ ॥

शिवांनी सर्व देवांना समजावून सांगितले की, ‘ तुम्ही आश्र्चर्यात पडू नका. मनात धीर धरुन विचार करा की, हा भगवंतांची महामहिमामयी निजशक्ती सीता आणि अखिल ब्रह्मांडांचे परम ईश्र्वर प्रत्यक्ष भगवान श्रीरामचंद्र यांचा विवाह आहे. ॥ ३१४ ॥

जिन्ह कर नामु लेत जग माहीं । सकल अमंगल मूल नसाहीं ॥

करतल होहिं पदारथ चारी । तेइ सिय रामु कहेउ कामारी ॥

ज्यांचे नाव घेताच जगातील सर्व अमंगळ नष्ट होते आणि अर्थ, धर्म, काम, मोक्ष हे पदार्थ मुठीत येतात, ते हेच जगताचे माता-पिता श्रीसीताराम आहेत, ‘ असे शिवांनी सांगितले. ॥ १ ॥

एहि बिधि संभु सुरन्ह समुझावा । पुनि आगें बर बसह चलावा ॥

देवन्ह देखे दसरथु जाता । महामोद मन पुकित गाता ॥

अशाप्रकरे शिवांनी सांगितले आणि मग आपुल्या नंदीश्र्वराला पुढे घेतले. राजा दशरथ मनातून फार प्रसन्न आणि प्रसन्न आणि शरीराने पुलकित होऊन पुढे चालले होते असे देवांना दिसले. ॥ २ ॥

साधु समाज संग महिदेवा । जनु तनु धरें करहिं सुख सेवा ॥

सोहत साथ सुभग सुत चारी । जनु अपबरग सकल तनुधारी ॥

त्यांच्यासोबत आनंदित साधू व ब्राह्मण मंडळी अशी दिसत होती की, जणू सर्व सुखे शरीर धारण करुन त्यांची सेवा करीत आहेत. चारी सुंदर पुत्र सोबत असे शोभून दिसत होते की जणू चारही मोक्ष देह धारण करुन आले आहेत. ॥ ३ ॥

मरकत कनक बरन बर जोरी । देखि सुरन्ह भै प्रीति न थोरी ॥

पुनि रामहि बिलोकि हियँ हरषे । नृपहि सराहि सुमन तिन्ह बरषे ॥

पाचूच्या वर्णाचा एक व सुवर्ण वर्णाचा दुसरा, अशी दशरथ-पुत्रांची सुंदर जोडी पाहून देवांनाही फार प्रेम वाटले. मग श्रीरामचंद्रांना पाहून ते मनापासून आनंदित झाले आणि राजांची वाखाणणी करीत त्यांनी फुले उधळली. ॥ ४ ॥

दोहा—राम रुपु नख सिख सुभग बारहिं बार निहारि ।

पुलक गात लोचन सजल उमा समेत पुरारि ॥ ३१५ ॥

श्रीरामचंद्राचे नखशिखांत सुंदर रुप पाहून पार्वतीसह श्रीशिवांचे शरीर पुलकित झाले आणि त्यांचे नेत्र प्रेमाश्रूंमुळे डबडबले. ॥ ३१५ ॥

केकि कंठ दुति स्यामल अंगा । तड़ित बिनिंदक बसन सुरंगा ॥

ब्याह बिभूषन बिबिध बनाए । मंगल सब सब भॉंति सुहाए ॥

श्रीरामांचे शरीर मोराच्या कंठासारख्या कांतीसारखे श्यामल होते. त्यांची प्रकाशमय पीत वस्त्रे विजेलाही लाजवीत होती. सर्व मंगलरुप आणि सर्व प्रकारे सुंदर तर्‍हेतर्‍हेची विवाहाची आभूषणे शरीरावर शोभत होती. ॥ १ ॥

सरद बिमल बिधु बदनु सुहावन । नयन नवल राजीव लजावन ॥

सकल अलौकिक सुंदरताई । कहि न जाइ मनहीं मन भाई ॥

त्यांचे सुंदर मुख शरद पौर्णिमेच्या निर्मल चंद्रासारखे आणि मनोहर नेत्र नवकमलाला लाजविणारे होते. सर्व सौंदर्य अलौकिक होते. मायिक नव्हे तर दिव्य सच्चिदानंदमय होते. ते सांगता येत नाही. मनातल्या मनातच त्याची गोडी वाटते. ॥ २ ॥

बंधु मनोहर सोहहिं संगा । जात नचावत चपल तुरंगा ॥

राजकुअँर बर बाजि देखावहिं । बंस प्रसंसक बिरिद सुनावहिं ॥

सोबत मनोहर भाऊ शोभून दिसत होते. ते चपळ घोड्यांना नाचवत चालले होते. राजकुमार घोड्यांची सुंदर चाल दाखवीत होते  आणि वंशाची प्रतिष्ठ सांगणारे मागध-भाट बिरुदावली ऐकवत होते. ॥ ३ ॥

जेहि तुरंग पर रामु बिराजे । गति बिलोकि खगनायकु लाजे ॥

कहि न जाइ सब भॉंति सुहावा । बाजि बेषु जनु काम बनावा ॥

ज्या घोड्यावर श्रीराम आरुढ होते, त्याची वेगवान चाल पाहून गरुडसुद्धा लाजून चूर होत असे. त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही, तो सर्व प्रकारे सुंदर होता. जणू कामदेवानेच घोड्याचा वेश धारण केला आहे. ॥ ४ ॥

छं०—जनु बाजि बेषु बनाइ मनसिजु राम हित अति सोहई ।

आपनें बय बल रुप गुन गति सकल भुवन बिमोहई ॥

जगमगत जीनु जराव जोति सुमोति मनि मानिक लगे ।

किंकिनि ललाम लगामु ललित बिलोकि सुर नर मुनि ठगे ॥

जणू श्रीरामचंद्रांच्यासाठी कामदेव घोड्याचा वेश धारण करुन शोभत होता. तो आपली अवस्था, बल, रुप, गुण आणि चाल यांमुळे सर्व लोकांना मोहून टाकीत होता. सुंदर मोती, मणि-माणिक्य जडविलेले जीन प्रकाशाने झगमगत होते. त्यांचे घुंघुरु लावलेले सुंदर लगाम पाहून देव, मनुष्य आणि मुनी हे सुद्धा थक्क होत होते.

दोहा—प्रभु मनसहिं लयलीन मनु चलत बाजि छबि पाव ।

भूषित उड़गन तड़ित घनु जनु बर बरहि नचाव ॥ ३१६ ॥

प्रभु रामचंद्रां इच्छेमध्ये आपले मन विलीन करुन चाललेला तो घोडा फार शोभून देसत होता. जणू तारागण व वीज यांनी अलंकृत झालेला मेघ सुंदर मोराला नाचवीत होता. ॥ ३१६ ॥

जेहिं बर बाजि रामु असवारा । तेहि सारदउ न बरनै पारा ॥

संकरु राम रुप अनुरागे । नयन पंचदस अति प्रिय लागे ॥

ज्या उत्तम घोड्यावर श्रीरामचंद्र बसले होते, त्याचे वर्णन सरस्वतीही करु शकणार नाही. श्रीशंकर श्रीरामांच्या रुपावर इतके भाळून गेले होते की, त्यांना या प्रसंगी आपले पंधरा नेत्र फार आवडू लागले होते. ॥ १ ॥

हरि हित सहित रामु जब जोहे । रमा समेत रमापति मोहे ॥

निरखि राम छबि बिधि हरषाने । आठइ नयन जानि पछिताने ॥

भगवान विष्णूंनी जेव्हा प्रेमाने श्रीरामांना पाहिले, तेव्हा ते स्वतः श्रीलक्ष्मीपती लक्ष्मीसह मोहित झाले. श्रीरामांची शोभा पाहून ब्रह्मदेव मोठे प्रसन्न झाले. पण आपल्याला फक्त आठ डोळे आहेत, म्हणून त्यांना खेद वाटला. ॥ २ ॥

सुर सेनप उर बहुत उछाहू । बिधि ते डेवढ़ लोचन लाहू ॥

रामहि चितव सुरेस सुजाना । गौतम श्रापु परम हित माना ॥

देवांचे सेनापती कार्तिकस्वामी यांच्या हृदयात मोठा उत्साह दाटला होता, कारण ते ब्रह्मदेवांच्या दीडपट ( बारा ) डोळ्यांनी राम-दर्शनाचा आनंद लुटत होते. सुजाण इंद्र आपल्या हजार डोळ्यांनी श्रीरामांना पाहात होता आणि गौतम मुनींनी दिलेला शाप आपल्यासाठी परम हितकारक मानत होता. ॥ ३ ॥

देव सकल सुरपतिहि सिहाहीं । आजु पुरंदर सम कोउ नाहीं ॥

मुदित देवगन रामहि देखी । नृपसमाज दुहुँ हरषु बिसेषी ॥

सर्व देव देवराज इंद्राशी इर्षा करु लागले होते आणि म्हणत होते की, ‘ आज इंद्रासारखा भाग्यवान दुसरा कोणीही नाही.’ श्रीरामचंद्रांना पाहून देवगण प्रसन्न होते आणि दोन्ही राजांच्या परिवारामध्ये आनंद पसरलेला होता. ॥ ४ ॥                   

छं०—अति हरषु राजसमाज दुहु दिसि दुंदुभीं बाजहिं घनी ।

बरषहिं सुमन सुर हरषि कहि जय जयति जय रघुकुलमनी ॥

एहि भॉंति जानि बरात आवत बाजने बहु बाजहीं ।

रानी सुआसिनि बोलि परिछनि हेतु मंगल साजहीं ॥

दोन्हीकडच्या राज परिवारांमध्ये अत्यंत हर्ष होता आणि

 फार जोराने नगारे वाजत होते. देव प्रसन्न होऊन ‘

 रघुकुलशिरोमणी श्रीरामांचा जयजयकार असो,’ असे

 म्हणत फुले उधळत होते. अशा प्रकारे वर्‍हाड आल्याचे

 समजल्यावर अनेक प्रकारची वाद्ये वाजू लागली आणि

 राण्या सुवासिनी स्त्रियांना बोलावून वराला 

ओवाळण्यासाठी मंगल द्रव्ये तयार करु लागल्या. ॥



Custom Search

No comments: