Friday, January 1, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 6 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ६

 

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 6 
Ovya 126 to 150 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ६ 
ओव्या १२६ ते १५०

म्हणोनि अविद्याजात नाथिलें । ते तिहींचि साच दाविलें ।

जिहीं सुखबुद्धी घेतलें । विषयदुःख ॥ १२६ ॥

१२६) म्हणून ज्यांनी विषयांपासून होणारें दुःखच सुख या समजुतीनें स्वीकारलें, त्यांनींच मिथ्या असलेले सर्व अविद्यादिक हे खरे करुन दाखविले.

या कारणें गा सुभटा । हा विचारितां विषय वोखटा ।

तूं झणें कहीं हा वाटा । विसरोनि जाशी ॥ १२७ ॥

१२७) अर्जुना, यामुळेंच विचार करुन पाहिलें, तर हे विषय वाईट आहेत. तूं कदाचित् चुकुन कधीं त्या मार्गाला जाशील, तर जाऊं नकोस. 

पैं यातें विरक्त पुरुष । त्यजिती कां जैसें विष ।

निराशां तयां दुःख । दाविलें नावडे ॥ १२८ ॥

१२८) जे विरक्त पुरुष आहेत, ते या विषयांस, जसें कांहीं ते विषच आहेत, असें समजून त्यांचा त्याग करतात. कारण ते निरिच्छ असल्याकारणानें विषयांनी दाखविलेले दुःखरुपी सुख त्यांना आवडत नाहीं. 

ज्ञानियांचा हन ठायीं । यांची मातुही कीर नाहीं ।

देहीं देहभावो जिद्दीं । स्ववश केले ॥ १२९ ॥

१२९) आत्मज्ञान्यांच्या ठिकाणीं तर, या दुःखरुप विषयांची गोष्टसुद्धा नाहीं. कारण त्यांनी देहांत असतांनाच कामक्रोधादि वृत्ति आपल्या आधीन ठेवल्या आहेत.

जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष ।

अंतरीं सुख । एक आथि ॥ १३० ॥

१३०) त्यांना अंतःकरणांत एक ब्रह्मसुख अनुभवाला आलेलें असतें, म्हणून ते बाह्य विषयांची गोष्ट मुळींच जाणत नाहींत.

परी ते वेगळेपणें भोगिजे । जैसे पक्षियें फळ चुंबिजे ।

तैसें नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपंही ॥ १३१ ॥

१३१) परंतु पक्षी जसें फळ खातो, ( म्हणजे खाणारा पक्षी, खाण्याचा विषय फळ आणिखाण्याची क्रिया ही त्रिपुटी जशी स्पष्ट भासते ) तसें तें ब्रह्मसुख वेगळेपणानें ( भोक्ता, भोग्य व भोग ही त्रिपुटी कायम ठेवून ) भोगण्यासारखें नाहीं, तर तेथें भोक्तेपणहि विसरलें पाहिजे. ( म्हणजें हें भोगणें त्रिपुटीविरहित, म्हणजे तद्रूपतेचें असतें. )   

भोगीं अवस्था एकी उठी । ते अहंकाराचा अचळु लोटी ।

मग सुखेंसि घे आंठी । गाढेपणें ॥ १३२ ॥

१३२) त्या भोगांमध्यें वृत्तीची अशी एक स्थिति उत्पन्न होतें कीं, ती स्थिति अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो.

तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी ।

तेथ जळ जैसें जळीं । वेगळें न दिसे ॥ १३३ ॥

१३३) पाण्यांत पाणी मिळाल्यानंतर जसें वेगवेगळें दिसत नाहीं, त्याप्रमाणें त्या आलिंगनाच्या संबंधांत आपणच आपल्याला मिठी मारतों, ( म्हणजे आपलेंच आपल्याशी सहज ऐक्य   होतें.

कां आकाशीं वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे ।

तैसें सुखचि उरे स्वरुपें । सुरतीं तिये ॥ १३४ ॥

१३४) अथवा, आकाशांत वायूचा लय झाल्यानंतर आकाश व वायू हें दोन आहेत, असें म्हणतां येत नाहीं; तसें या भागामध्ये केवळ एक ब्रह्मसुखच स्वरुपानें राहतें,

ऐशी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एकचि होय ।

तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणतें जें ॥ १३५ ॥

१३५) अशी द्वैताची गोष्टच गेली, म्हणजे मग ऐक्य होतें, असें जर म्हणावें, तर तसें ऐक्य जाणून, ‘ ऐक्य आहे ‘ असें म्हणणारा तेथें साक्षी तरी कोण उरला आहे ?  

म्हणोनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें ।

ते खुणचि पावेल स्वभावें । आत्माराम ॥ १३६ ॥

१३६) म्हणून हें मागील सगळें असूं दे. जें न बोलण्यासारखें आहे, तें काय बोलावें ? जो ब्रह्मनिष्ठ आहे, तोच हें मर्म सहज जाणील. 

जे ऐसेनि सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले ।

ते मी जाणें निखळ वोतले । सामरस्याचे ॥ १३७ ॥

१३७) जें अशा सुखानें धुंद झालें आहेत व आपल्या ठिकाणींच आपण रममाण झाले आहेत, ते पूर्णपणें साम्यरसाचे ( ब्रह्मैक्यभावाचे ) ओतलेले पुतळेच आहेत, असें मी समजतों.

ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर ।

की महाबोधें विहार । केले जैसे ॥ १३८ ॥

१३८) ते आनंदाचें प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंभ आहेत किंवा जणूं काय महाबोधानें आपल्याला राहण्याला मंदिर केले आहेत.

ते विवेकाचे गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव ।

नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥ १३९ ॥

१३९) ते विवेकाचे मूळ वसतिस्थान आहेत, किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणूं काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजविलेले अवयवच आहेत.

ते सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक ।

हें बहु असो एकैक । वानिसी काई ॥ १४० ॥

१४०) ते शुद्ध सत्त्वाचे सात्त्विक आहेत, अथवा चैतन्याचे अवयव आहेत. यावर श्रीगुरु निवृत्तिनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे. तूं एक एक वर्णन कोठवर करणार ?

तूं संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी ।

कीं निराळीं बोल देखसी । सनागर ॥ १४१ ॥

१४१) तूं जेव्हां संतांच्या स्तुतींत तन्मय होतोस, तेव्हां चालूं विषयाचे स्मरण तुला राहत नाहीं आणि विषयाला सोडून पण चांगलें बोल तूं बोलतोस,     

परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं ।

करीं साधुहृदयराउळीं । मंगळ उखा ॥ १४२ ॥

१४२) परंतु हा रसाचा विस्तार आवरता घे; आणि आतां ग्रंथाचा अर्थरुपी दिवा प्रज्वलित कर व सज्जनांच्या अंतःकरणरुपी मंदिरांत मंगलकारक दिवसाचा प्रातःकाल कर.   

ऐसा गुरुचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला ।

मग तो म्हणे कृष्ण बोलिला । तेंचि आइका ॥ १४३ ॥

१४३) याप्रमाणें श्रीगुरुंची सूचना निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्र्वर यांना मिळाली. मग ते म्हणाले, श्रीकृष्ण जें म्हणाले, तेच ऐका.

अर्जुना अनंत सुखांचां डोही । एकसरा तळुचि घेतला जिहीं ।

मग स्थिराऊनि तेही । तेंचि जाहले ॥ १४४ ॥

१४४) अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहांत, जे एकदम तळाशीं जाऊन पोंचले आहेत, ते मग त्याच ठिकाणीं स्थिर होऊन तद्रूपतेला प्राप्त झाले.     

अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्र्व देखे ।

तो देहेंचि परब्रह्म सुखें । मानूं येईल ॥ १४५ ॥

१४५) अथवा शुद्ध आत्मज्ञानानें जो, आपणच विश्व आहोंत, असें जाणतो, तो या देहांमध्येच परब्रह्म आहे, असें खुशाल मानतां येईल.

जें साचोकारें परम । ना तें अक्षर निःसीम ।

जिये गांवींचे निष्काम । अधिकारिये ॥ १४६ ॥

१४६) जें खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा जें क्षयरहित व अमर्याद आहे आणि निष्काम पुरुष ज्या ठिकाणाची प्राप्ति करुन घेण्यास अधिकारी आहेत; 

जें महर्षीं वाटलें । विरक्तां भागा फिटलें ।

जें निःसंशया पिकलें । निरंतर ॥ १४७ ॥

१४७) जें थोर ऋषींकरितांच काढून ठेवलें आहे किंवा वैराग्यवानांच्या वाट्याला आलेले आहे व जें नेहमीं संशयरहितास फलद्रुप होतें;  

जिहीं विषयांपासोनि हिरतलें । चित्त आपुलें आपण जिंतिलें ।

ते निश्र्चित जेथ सुतले । चेतीचिना ॥ १४८ ॥

१४८) ज्यांनी आपण आपलें चित्त विषयांपासून हिरावून घेऊन आपलें आधीन करुन ठेवलें आहे, असे पुरुष निश्र्चयानें ज्या स्वरुपांत लीन झालेअसतां पुनः जागें होत नाहीत ( वृत्तींवर येत नाहीत );

तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण ।

तेंचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ॥ १४९ ॥

१४९) जे मोक्षरुप परब्रह्म, आत्मज्ञान्यांचें जें साध्य, तेंच ते पुरुष आहेत असें अर्जुना, तूं समज.

ते ऐसे कैसेनि जाहले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले ।

हें ही पुससी तरी भलें । संक्षेपें सांगों ॥ १५० ॥

१५०) असे जे देहांत असतांनाच ब्रह्मभावास आले, ते, असे

 कशानें झाले, हेंहि विचारशील तर तें आम्ही चांगलें ( पण

 ) थोडक्यांत सांगतों.



Custom Search

No comments: