Saturday, September 11, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 42 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ४२

 

ShriRamCharitManas
AyodhyaKanda Part 42
Doha 245 to 250
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ४२ 
दोहा २४५ ते २५०

दोहा—महिसुर मंत्री मातु गुर गने लोग लिए साथ ।

पावन आश्रम गवनु किय भरत लखन रघुनाथ ॥ २४५ ॥

ब्राह्मण, मंत्री, माता, गुरु इत्यादी निवडक लोकांना घेऊन भरत, लक्ष्मण व श्रीराम हे पवित्र आश्रमाकडे निघाले.॥ २४५ ॥

सीय आइ मुनिबर पग लागी । उचित असीस लही मन मागी ॥

गुरपतिनिहि मुनितियन्ह समेता । मिली पेमु कहि जाइ न जेता ॥

सीतेने येऊन मुनिश्रेष्ठ वसिष्ठांचे चरण धरले आणि मनोवांछित आशीर्वाद प्राप्त केला. नंतर ती मुनींच्या पत्नी व गुरुपत्नी अरुंधतीला भेटली. त्यांच्या मनात जे प्रेम होते, ते सांगणे कठीण. ॥ १ ॥

बंदि बंदि पग सिय सबही के । आसिरबचन लहे प्रिय जी के ॥

सासु सकल जब सीयँ निहारीं । मूदे नयन सहमि सुकुमारीं ॥

सीतेने सर्वांच्या चरणांना वेगवेगळे वंदन केले आणि आपल्याला मनोनुकूल असे आशीर्वाद प्राप्त केले. जेव्हा सुकुमार सीतेने आपल्या सासूंना पाहिले, तेव्हा तिने घाबरुन आपले डोळे बंद करुन घेतले. ॥ २ ॥

परीं बधिक बस मनहुँ मरालीं । काह कीन्ह करतार कुचालीं ॥

तिन्ह सिय निरखि निपट दुखु पावा । सो सबु सहिअ जो दैउ सहावा ॥

आपल्या सासूंची वाईट दशा पाहून सीतेला असे वाटले की, जणू राजहंसी शिकार्‍याच्या तावडीत सापडल्या आहेत. तिला वाटले की, दुष्ट विधात्याने हे काय केले ? सीतेला पाहून त्यानांही फार वाईट वाटले. त्यांनी विचार केला की, दैव जे काही सोसायला लावते, ते सोसावेच लागते. ॥ ३ ॥‘

जनकसुता तब उर धरि धीरा । नील नलिन लोयन भरि नीरा ॥

मिली सकल सासुन्ह सिय जाई । तेहि अवसर करुना महि छाई ॥

मग जानकी मन आवरुन, आपल्या नीलकमलांसारख्या नेत्रांमध्ये पाणी आणून सर्व सासूंना जाऊन भेटली. त्यावेळी चहूकडे करुणरस पसरला. ॥ ४ ॥

दोहा—लागि लागि पग सबनि सिय भेंटति अति अनुराग ।

हृदयँ असीसहिं पेम बस रहिअहु भरी सोहाग ॥ २४६ ॥

सीता सर्वांच्या पायी लागून अत्यंत प्रेमाने त्यांना भेटत होती आणि त्या सर्व सासवा स्नेहपूर्ण मनाने आशीर्वाद देत होत्या की, “ तुझे सौभाग्य अखंड राहो. “ ॥ २४६ ॥

बिकल सनेहँ सीय सब रानीं । बैठन सबहि कहेउ गुर ग्यानीं ॥

कहि जग गति मायिक मुनिनाथा । कहे कछुक परमारथ गाथा ॥

सीता व सर्व राण्या स्नेहामुळे व्याकूळ झाल्या होत्या. मग ज्ञानी गुरुंनी सर्वांना बसण्यास सांगितले. नंतर मुनिवर्य वसिष्ठांनी जगाची गती मायिक आहे, असे म्हणून काही पारमार्थिक गोष्टी सांगितल्या. ॥ १ ॥

नृप कर सुरपुर गवनु सुनावा । सुनि रघुनाथ दुसह दुखु पावा ॥

मरन हेतु निज नेहु बिचारी । भे अति बिकल धीर धुर धारी ॥

मग वसिष्ठांनी, राजा दशरथांनी स्वर्गलोकी प्रयाण केल्याचे सांगितले. ते ऐकून श्रीराम ‘ हाय बाबा ! ‘ असे म्हणून अत्यंत शोकाकुल झाले. आपल्यावरील प्रेमामुळे त्यांना मरण आले, या विचाराने श्रीरामचंद्र अत्यंत व्याकूळ झाले. ॥ २ ॥

कुलिस कठोर सुनत कटु बानी । बिलपत लखन सीय सब रानी ॥

सोक बिकल अति सकल समाजू । मानहुँ राजु अकाजेउ आजू ॥

ती वज्रासारखी कठोर व कटू वाणी ऐकून लक्ष्मण, सीता व सर्व राण्या विलाप करु लागल्या. सारा समाज शोकाने फार व्याकूळ झाला. जणू राजा नुकताच गेला असावा. ॥ ३ ॥

मुनिबर बहुरि राम समुझाए । सहित समाज सुसरित नहाए ॥

ब्रत निरंबु तेहि दिन प्रभु कीन्हा । मुनिहु कहें जलु काहुँ न लीन्हा ॥

नंतर वसिष्ठांनी श्रीरामांना समजावले. तेव्हा त्यांनी व सर्व समाजाने श्रेष्ठ नदी मंदाकिनीत जाऊन स्नान केले. त्या दिवशी श्रीरामचंद्रांनी निर्जल व्रत केले. वसिष्ठ मुनींनी सांगितले, तरी त्यांनी पाणीही ग्रहण केले नाही. ॥ ४ ॥

दोहा—भोरु भएँ रघुनंदनहि जो मुनि आयसु दीन्ह ।

श्रद्धा भगति समेत प्रभु सो सबु सादरु कीन्ह ॥ २४७ ॥

दुसर्‍या दिवशी सकाळ झाल्यावर श्रीरघुनाथांना वसिष्ठांनी जी जी सांगितली, ती ती सर्व धार्मिक कार्ये प्रभूंनी श्रद्धेने व भक्तीने पूर्ण केली. ॥ २४७ ॥

करि पितु क्रिया बेद जसि बरनी । भे पुनीत पातक तम तरनी ॥

जासु नाम पावक अघ तूला । सुमिरत सकल सुमंगल मूला ॥

वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे पित्याची क्रिया-कर्मे करुन पापरुप अंधकार नष्ट करणारे सूर्यरुप श्रीरामचंद्र शुद्ध झाले. ज्यांचे नाम पापरुपी कापसाला लगेच जाळून टाकणारा अग्नी आहे आणि ज्यांचे स्मरण हे सर्व मांगल्याचे मूळ आहे, ॥ १ ॥

सुद्ध सो भयउ साधु संमतअस । तीरथ आवाहन सुरसरि जस ॥

सुद्ध भएँ दुइ बासर बीते । बोले गुर सन राम पिरीते ॥

ते नित्य शुद्ध बुद्ध भगवान श्रीराम शुद्ध झाले. साधूंच्या मते त्यांनी शुद्ध होणे म्हणजे तीर्थांचे आवाहन केल्याने ‘ गंगा ‘ शुद्ध होण्यासारखे आहे. शुद्ध होऊन दोन दिवस उलटल्यावर श्रीराम प्रेमाने गुरुजींना म्हणाले, ॥ २ ॥

नाथ लोग सब निपट दुखारी । कंद मूल फल अंबु अहारी ॥

सानुज भरतु सचिव सब माता । देखि मोहि पल जिमि जुग जाता ॥

‘ हे नाथ, इथे सर्वजणांना दुःख सोसावे लागत आहे. कंद, मुळे, फळे व जल यांचाच आहार आहे. शत्रुघ्नासह भरत, मंत्री व सर्व मातांना येथे पाहाताना मला एक एक क्षण युगासारखा वाटत आहे. ॥ ३ ॥

सब समेत पुर धारिअ पाऊ । आपु इहाँ अमरावति राऊ ॥

बहुत कहेउँ सब कियउँ ढिठाई । उचित होइ तस करिअ गोसाँई ॥

म्हणून तुम्ही सर्वांबरोबर अयोध्येला परत जा. तुम्ही येथे आहात व राजे स्वर्गात आहेत. त्यामुळे अयोध्या ओसाड झाली आहे. मी जास्त बोललो, हे माझे धारिष्ट्य आहे. हे गुरुवर्य ! जे योग्य असेल तेच आपण करा. ‘ ॥ ४ ॥

दोहा—धर्म सेतु करुनायतन कस न कहहु अस राम ।

लोग दुखित दिन दुइ दरस देखि लहहुँ बिश्राम ॥ २४८ ॥

वसिष्ठ म्हणाले, ‘ हे राम, तुम्ही धर्माचे सेतु व दयेचे धाम आहात, मग असे का सांगणार नाही ? या दुःखी दीनांना दोन दिवस तुमचे दर्शन घेऊन त्यांना शांती लाभू दे. ‘ ॥ २४८ ॥

राम बचन सुनि सभय समाजू । जनुजलनिधि महुँ बिकल जहाजू ॥

सुनि गुर गिरा सुमंगल मूला । भयउ मनहुँ मारुत अनुकूला ॥

श्रीरामांचे बोलणे ऐकून सर्व लोक घाबरले. समुद्रामध्ये जहाज हेलकावू लागते, त्याप्रमाणे. परंतु जेव्हा त्यांनी वसिष्ठांचे बोलणे ऐकले, तेव्हा त्या जहाजाला जणू अनुकूल वारे मिळाले.॥ १ ॥

पावन पयँ तिहुँ काल नहाहीं । जो बिलोकि अघ ओघ नसाहीं ॥

मंगलमूरति लोचन भरि भरि । निरखहिं हरषि दंडवत करि करि ॥

सर्व लोक जिच्या दर्शनाने पापांच्या राशी नाहीशा होतात, अशा पवित्र पयस्विनी नदीत त्रिकाल स्नान करीत होते आणि मंगलमूर्ती श्रीरामचंद्रांना दंडवत घालून प्रणाम करुन त्यांना डोळे भरुन पाहात होते. ॥ २ ॥

राम सैल बन देखन जाहीं । जहँ सुख सकल सकल दुख नाहीं ॥

झरना झरहिं सुधासम बारी । त्रिबिध तापहर त्रिबिध बयारी ॥

सर्वजण श्रीरामांचा कामदगिरी पर्वत व वन पाहण्यास जात. तिथे सर्व      

सुखे होती व सर्व दुःखांचा अभाव होता. झरे अमृतासारखे गोड पाणी घेऊन वाहात होते आणि शीतल, मंद, सुगंधित हवा आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक अशा त्रितापांचे हरण करीत होती. ॥ ३ ॥

बिटप बेलि तृन अगनित जाती । फल प्रसून पल्लव बहु भॉंती ॥

सुंदर सिला सुखद तरु छाहीं । जाइ बरनि बन छबि केहि पाहीं ॥

तेथे असंख्य जातीचे वृक्ष, वेजी व गवत होते आणि अनेक प्रकारची फळे, फुले, पाने होती. सुंदर शिळा होत्या. वृक्षांची सुखद सावली होती. त्या वनाची शोभा कोण वर्णन करु शकेल ? ॥ ४ ॥

दोहा—सरनि सरोरह जल बिहग कूजत गुंजत भृगं ।

बैर बिगत बिहरत बिपिन मृग बिहंग बहुरंग ॥ २४९ ॥

तलावांमधून कमळे उमललेली होती, पाण्यात राहणारे पक्षी कूजन करीत होते, भ्रमर गुंजारव करीत होते आणि अनेक रंगांचे पक्षी आणि पशू परस्पर वैरभाव सोडून वनात विहार करीत होते. ॥ २४९ ॥

कोल किरात भिल्ल बनबासी । मधु सुचि सुंदर स्वादु सुधा सी ॥

भरि भरि परन पुटीं रचि रुरी । कंद मूल फल अंकुर जूरी ॥

कोल, किरात, भिल्ल इत्यादी वनवासी लोक सुंदर द्रोण बनवून त्यांतून अमृतासारखा स्वादिष्ट मध भरभरुन आणत होते आणि कंदमूळे, फळे आणि अंकुर यांचे ढीग आणत होते. ॥ १ ॥

 सबहि देहिं करि बिनय प्रनामा । कहि कहि स्वाद भेद गुन नामा ॥

देहिं लोग बहु मोल न लेहीं । फेरत राम दोहाई देहीं ॥

मग सर्वांना विनवणी व प्रणाम करुन त्या वस्तूंचे निरनिराळे स्वाद, प्रकार, गुण व नावे सांगसांगून देत. लोक त्याचे पुष्कळ मूल्य देत, परंतु ते घेत नसत. परत करीत व श्रीरामांची शपथ घालीत. ॥ २ ॥

कहहिं सनेह मगन मृदु बानी । मानत साधु पेम पहिचानी ॥

तुम्ह सुकृती हम नीच निषादा । पावा दरसनु राम प्रसादा ॥

प्रेम-मग्न होऊन ते कोमल वाणीने म्हणत, ‘ साधू लोक प्रेम ओळखून त्याचा मान राखतात. तुम्ही तर पुण्यात्मे आहात, आम्ही हलके निषाद आहोत. श्रीरामांच्या कृपेमुळे आम्हांला तुमचे दर्शन घडले. ॥ ३ ॥

हमहि अगम अति दरसु तुम्हारा । जस मरु धरनि देवधुनि धारा ॥

राम कृपाल निषाद नेवाजा । परिजन प्रजउ चहिअ जस राजा ॥

ज्याप्रमाणे मरुभूमीमध्ये गंगेचे दर्शन होणे दुर्लभ आहे, त्याप्रमाणे आम्हा लोकांना तुमचे दर्शन दुर्लभ आहे. पाहा, श्रीरामांनी निषादांवर कशी कृपा केली आहे. जसा राजा असतो, त्यांचा परिवार व प्रजा यांनीही तसेच असले पाहिजे, ॥ ४ ॥

दोहा—यह जियँ जानि सँकोचु तजि करिअ छोहु लखि नेहु ।

हमहि कृतारथ करन लगि फल तृन अंकुर लेहु ॥ २५० ॥

असे मनात समजून, संकोच सोडून आणि आमचे प्रेम पाहून कृपा करा आणि आम्हांला कृतार्थ करण्यासाठी ही फळे, तृण व अंकुर घ्या. ॥ २५० ॥

तुम्ह प्रिय पाहुने बन पगु धारे । सेवा जोगु न भाग हमारे ॥

देब काह हम तुम्हहि गोसॉंई । ईंधनु पात किरात मिताई ॥   

तुम्ही प्रिय पाहुणे म्हणून वनात आला आहात. तुमची सेवा करण्याजोगे आमचे भाग्य नाही. हे स्वामी, आम्ही तुम्हांला काय देणार ? भिल्लांची मैत्री फक्त सर्पण व पानांशी असते. ॥ १ ॥

यह हमारि अति बड़ि सेवकाई । लेहिं न बासन बसन चोराई ॥

हम जड़ जीव जीव गन घाती । कुटिल कुचाली कुमति कुजाती ॥

आम्ही तुमचे कपडे, भांडी चोरत नाही, हीच आमची मोठी सेवा होय. आम्ही अज्ञानी जीव आहोत. प्राण्यांची हिंसा करणारे आहोत, कुटिल, दुष्ट चालीचे, दुर्बद्धीचे आणि हलक्या जातीचे आहोत. ॥ २ ॥‘

पाप करत निसि बासर जाहीं । नहिं पट कटि नहिं पेट अघाहीं ॥

सपनेहुँ धरमबुद्धि कस काउ । यह रघुनंदन दरस प्रभाऊ ॥

आमचे दिवस व रात्री हे पाप करणयातच जातात. तरीही आमच्या कमरेला वस्त्र नाही आणि आम्ही आपले पोटही भरु शकत नाही. मग स्वप्नातही कधी धर्मबुद्धी आम्हांला कशा येणार ? हा सर्व श्रीरघुनाथांचा दर्शनाचा प्रभाव आहे. ॥ ३ ॥

जब तें प्रभु पद पदुम निहारे । मिटे दुसह दुख दोष हमारे ॥

बचन सुनत पुरजन अनुरागे । तिन्ह के भाग सराहन लागे ॥

प्रभूंचे चरण-कमल जेव्हापासून पाहातो, तेव्हापासून आमची असह्य दुःखे व पापे नाहीशी झाली आहेत. ‘ वनवासींचे ते बोलणे ऐकून अयोध्येच्या लोकांचे मन प्रेमाने भरुन आले आणि ते त्या वनवासींच्या भाग्याची प्रशंसा करु लागले. ॥ ४ ॥  

    


Custom Search

No comments: