Showing posts with label Dashak Pachava. Show all posts
Showing posts with label Dashak Pachava. Show all posts

Monday, July 24, 2017

Samas Dahava Siddha Lakshan Nirupan समास दहावा सिद्धलक्षणनिरुपण


DashakPachava Samas Dahava Siddha Lakshan Nirupan
Samas Dahava Siddha Lakshan Nirupan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Siddha. Who is Siddha? Sadhak has now advanced on the path of spirituality. Now he has knowledge that without any any doubt he is Atma and not body. So now he is beyond Maya and known that Sansar or Prapancha is though visible not real and permanent. Only knowledge about Atma though it is invisible, is true and permanent. Now here in this Samas who is called as Siddha, is described in this Samas by Samarth Ramdas.
समास दहावा सिद्धलक्षणनिरुपण 
श्रीराम ॥ 
मागें बोलिला संसारिक । त्यागेंविण नव्हे कीं साधक ।
ऐका हो याचा विवेक । ऐसा असे ॥ १ ॥
१) मागील समासाच्या शेवटी श्रोत्यांने असा प्रश्र्ण केला कीं, संसाराचा त्याग केल्याशिवाय साधक होतां येणार नाही का? त्याचें उत्तर ऐका.  
सन्मार्ग तो जीवीं धरणें । अनमार्गाचा त्याग करणें ।
संसारिका त्याग येणें । प्रकारें ऐसा ॥ २ ॥
२) ज्याला साधक व्हावयाचे आहे, त्यानें मनापासून सन्मार्ग धरावा व अन्य मार्गांचा त्याग करावा. असा त्याग करणें संसारीकला शक्य आहे. 
कुबुद्धित्यागेंविण कांहीं । सुबुद्धि लागणार नाहीं ।
संसारिका त्याग पाहीं । ऐसा असे ॥ ३ ॥
३) वाईट बुद्धीचा त्याग केल्याशिवाय सुबुद्धी अंगी येणार नाही. प्रापंचिकाला अशा प्रकारे त्याग करता येतो. 
प्रपंचीं वीट मानिला । मनें विषयेत्याग केला ।
तरीच पुढें आवलंबिला । परमार्थमार्ग ॥ ४ ॥
४) प्रपंचाचा वीट आल्याने मनातून इंद्रियवासना भोगण्याची इच्छा काढून मगच साधक बनून परमार्थाची वाटचाल करणें शक्य होते. 
त्याग घडे अभावाचा । त्याग घडे संशयाचा ।
त्याग घडे अज्ञानाचा । शनै शनै ॥ ५ ॥
५) प्रत्येक साधकाला नास्तिकपणाचा, संशयाचा त्याग करावा लागतो. म्हणजे हळूहळू अज्ञानाचा त्याग करता येतो.  
ऐसा सूक्ष्म अंतर्त्याग । उभयांस घडे सांग ।
निस्पृहास बाह्यत्याग । विशेष आहे ॥ ६ ॥
६) सांसारीक असो वा नसो दोघांना सूक्ष्म व आंतरीक त्याग करावा लागतो. जो प्रपंचापासून निस्पृह असतो तो बाह्य व्यवहाराचा त्याग करतो. हे विशेष आहे.
संसारिकां ठाईं ठाईं । बाह्यत्याग घडे कांहीं ।
नित्यनेम श्रवण नाहीं । त्यागेंविण ॥ ७ ॥
७) संसारीकालही संसारांत थोडासा बाह्य त्याग घडतो. कारण तो घडल्याशिवाय नित्यनेमानें परमार्थश्रवण घडणार नाही. 
फिटली आशंका स्वभावें । त्यागेंविण साधक नव्हे ।
पुढें कथेचा अन्वय । सावध ऐका ॥ ८ ॥
८) असो. याप्रमाणें श्रोत्याला त्याच्या प्रश्र्णाचे उत्तर दिले की ज्यानें शंका सहज फिटली. आतां पुढील विषय लक्षपूर्वक ऐका.  
मागां जालें निरुपण । साधकाची वोळखण ।
आतां सांगिजेल खूण । सिद्धलक्षणाची ॥ ९ ॥
९) मागील समासांत साधक कसा ओळखावा ते सांगितले. आतां सिद्धास कसें ओळखावे त्याची खूण सांगतो. 
साधु वस्तु होऊन ठेला । संशय ब्रह्मांडाबाहेरि गेला ।   
निश्र्चये चळेना ऐसा जाला । या नाव सिद्ध ॥ १० ॥
१०) सिद्धपुरुष स्वतः ब्रह्मरुप होतो. त्याचा सर्व संशय ब्रह्माडाबाहेर जातो. " अहं ब्रह्मास्मी " हा त्याचा निश्र्चय ढळत नाही. त्याला सिद्ध असें म्हणतात. 
बद्धपणाचे अवगुणा । मुमुक्षपणीं नाहीं  जाण । 
मुमुक्षपणाचें लक्षण । साधकपणीं नाहीं ॥ ११ ॥
११) बद्धावस्थेंत जे दोष असतात, ते मुमुक्षु अवस्थेंत उरत नाहीत. मुमुक्षु अवस्थेंत असणार्‍या कमतरता, लक्षणें साधक अवस्थेंत दिसत नाहीत.
साधकासि संदेहवृत्ती । पुढें होतसे निवृत्ती ।
याकारणें निःसंदेह श्रोतीं । साधु वोळखावा ॥ १२ ॥
१२) साधकाच्या ठिकाणी असलेली संशय वृत्ती कलाांतराने साधनेच्या येोगे निघून जाते.  म्हणूज जो निःसंदेह असतो तो सिद्ध होय असे जाणावे. 
संशयरहित ज्ञान । तें चि साधूचें लक्षण ।
सिद्धाआंगीं संशय हीन । लागेल कैसा ॥ १३ ॥
१३) अत्यंत संशयरहित ज्ञान हें सिद्धपणा अंगी आल्याचे लक्षण आहे.  सिद्धाच्या अंगी संशयासारख  हीन अवगुण असतच नाही. 
कर्ममार्ग संशयें भरला । साधनीं संशये कालवला ।
सर्वांमधें संशय भरला । साधु तो निःसंदेह ॥ १४ ॥
१४) कर्ममार्ग समशयाने भरलेला आहे. परमार्थाच्या साधनामध्यें संशय कालवलेला आहे. मानवी जीवनां सर्वत्र संशय भरुन राहीलेला आहे. एकटा सिद्धपरुषच संशयविरहित असतो. 
संशयाचें ज्ञान खोटें । संशयाचें वैराग्य पोरटें ।
संशयाचें भजन वोखटें । निर्फळ होय ॥ १५ ॥
१५) संशयानें भरलेले ज्ञान खोटे असते. संशयासहित वैराग्य पोरटे दिनवाणें असते. तसेच भजन हे संशयानें भरलेले असेल तर तें वाईट व निर्फळ असते. 
वेर्थ संशयाचा देव । वेर्थ संशयाचा भाव ।
वेर्थ संशयाचा स्वभाव । सर्व कांहीं ॥ १६ ॥
१६) ज्या देवाबद्दल संशय येतो, तो देव व्यर्थ असतो. संशयाने भरलेला भाव व्यर्थच. संशयानें भरलेलाा स्वभाव व्यर्थच असतो. संशयानें भरलेलें सर्व कांहीं व्यर्थ जाते.  
वेर्थ संशयाचा व्रत । वेर्थ संशयाचें तीर्थ । 
वेर्थ संशयाचा परमार्थ । निश्र्चयेंविण ॥ १७ ॥
१७) सांशयसहित व्रत व्यर्थ जाते. ज्या तीर्थाबद्दल संशय तें तीर्थ व्यर्थ असते. तसेच परमार्थांत निश्र्चितपणा नसेल व संशय असेल तर सर्व परमार्थ व्यर्थच जातो. 
वेर्थ संशयाची भक्ती । वेर्थ संशयाची प्रीती ।
वेर्थ संशयाची संगती । संशयो वाढवी ॥ १८ ॥
१८) संशयासहित केलेली भक्ती, प्रीति किंवा संगती व्यर्थ जाते. त्यामध्यें संशय कमी न होतां वाढतच जातो.
वेर्थ संशयाचें जिणें । वेर्थ संशयाचें धरणें ।
वेर्थ संशयाचें करणें । सर्व कांहीं ॥ १९ ॥
१९) संशयानें भरलेलें जीवन व्यर्थ जाते. संशय मनांत बाळगुन केलेले सर्व व्यर्थच जाते.
वेर्थ संशयाची पोथी । वेर्थ संशयाची वित्पत्ती ।
वेर्थ संशयाची गती । निश्र्चयेंविण ॥ २० ॥
२०) संशयानें भरलेला ग्रंथ, विद्या दोन्ही व्यर्थ असतात. संशयानें व निश्र्चयाच्या अभावाने चांगली गति पण मिळत नाही.
वेर्थ संशयाचा दक्ष । वेर्थ संशयाचा पक्ष ।
वेर्थ संशयाचा मोक्ष । होणार नाहीं ॥ २१ ॥
२१) संशयानें भरलेली तत्परता व्यर्थ असते. संशयानें धरलेला एखादा पक्ष व्यर्थ जातो. संशय असेल तर मोक्षसुद्धा व्यर्थ होतो. 
वेर्थ संशयाचा संत । वेर्थ संशयाचा पंडित ।
वेर्थ संशयाचा बहुश्रुत । निश्र्चयेंविण ॥ २२ ॥
२२) संशयानें भरलेले संत, पंडित, किंवा विद्यावंत देखिल निश्र्चय नसल्यानें व्यर्थ जातात.  
वेर्थ संशयाची श्रेष्ठता । वेर्थ संशयाची वित्पन्नता ।
वेर्थ संशयाचा ज्ञाता । निश्र्चयेंविण ॥ २३ ॥
२३) त्याचप्रमाणे संशयावर उभारलेली श्रेष्ठता, विद्वता व ज्ञान निश्र्चितपणा नसल्यानें व्यर्थ जातात.
निश्र्चयेंविण सर्व कांहीं । अणुमात्र तें प्रमाण नाहीं ।
वेर्थचि पडिले प्रवाहीं । संदेहाचे ॥ २४ ॥
२४) कोणतीही गोष्ट संशयानें व निश्र्चितपणाच्या अभावाने खोटीच ठरते. खरी म्हणुन मान्य होत नाही. संशयाच्या प्रवाहांत पडलेले सर्व व्यर्थच जाते. 
निश्र्चयेंविण जें बोलणें । तें अवघेंचि कंटाळवाणें ।
बाष्कळ बोलिजे वाचाळपें । निरार्थक ॥ २५ ॥
२५) वक्त्याचे निश्र्चय नसतांना बोललेले सर्व कंटाळवाणेच होते. वाचाळपणें तो कांही अर्थहीन बडबड करतो. असेच समजावे.
असो निश्र्चयेविण जे वल्गना । ते अवघीच विटंबना ।
संशयें कांहीं समाधान । उरी नाहीं ॥ २६ ॥
२६) असो. निश्र्चयानें संपन्न ज्ञान नसतांना जो ज्ञानच्या मोठ्या बाता मारतो तो ज्ञानाचे विडंबन करतो. कारण संशयी मनामध्यें समाधान राहु शकत नाही. 
म्हणोनि संदेहरहित ज्ञान । निश्र्चयााचें समाधान ।
तेंचि सिद्धाचें लक्षण । निश्र्चयेंसीं ॥ २७ ॥
२७) म्हणून अजीबात संशय नाही असें ज्ञान आणि अत्यंत खात्रीचे समाधान हें सिद्धाचें निश्र्चित खरे लक्षण समजावे.
तव श्रोता करी प्रश्र्न । निश्र्चय करावा कवण ।
मुख्य निश्र्चयाचें लक्षण । मज निरोपावें ॥ २८ ॥
२८) मग श्रोत्यानें विचारलें कीं, निश्र्चय कोणता करावा? निश्र्चयाचें मुख्य लक्षण मला सांगावें.  
ऐक निश्र्चय तो ऐसा । मुख्य देव आहे कैसा ।
नाना देवाचा वळसा । करुंचि नये ॥ २९ ॥
२९) त्यावर श्रीसद्गुरु म्हणाले कीं, मुख्य देव कसा आहे हें निश्र्चितपणें ओळखणे यांचे नांव निश्र्चय होय. अनेक देवांच्या घोटाळ्यांत आपण पडूं नये. 
जेणें निर्मिलें सचराचर । त्याचा करावा विचार ।
शुद्ध विवेकें परमेश्र्वर । वोळखावा ॥ ३० ॥
३०) ज्यानें हे चराचर विश्व निर्माण केले त्याच्याविषयीं विचार करावा. अत्यंत शुद्ध, निःसंदेह व निःस्वार्थी विवेकाने परमेश्र्वराचें ज्ञान करुन घ्यावे.
मुख्य देव तो कवण । भक्ताचें कैसें लक्षण । 
असत्य सांडून वोळखण । सत्याची धरावी ॥ ३१ ॥
३१) मुख्य देव कोण? भक्ताचे लक्षण काय? हे प्रश्र्ण मिथ्या दृश्य बाजूस सारुन सत्यस्वरुप परमात्म्याचें ज्ञान करुन घ्यावे. 
आपल्या देवास वोळखावें । मग मी कोण हें पाहावें ।
संग त्यागून राहावें । वस्तुरुप ॥ ३२ ॥
३२) आधी आपल्या देवास ओळखावें, मगच " मी कोण आहे? " याचे ज्ञान करुन घ्यावे. मग सर्व दृश्यांतून बाहेर पडून ब्रह्मस्वरुप होऊन राहावें'.  
तोडावा बंधनाचा संशयो । करावा मोक्षाचा निश्र्चयो ।
पाहावा भूतांचा अन्वयो । वितिरेकेंसीं ॥ ३३ ॥
३३) मी बांधलेला आहे हा विकल्प तोडून मोक्ष निळविण्याचा निश्र्चय करावा. जें जे आपल्या अनुभवांत येते तें तें आत्मीय भावनेने पहावे. व तें तें मिथ्या आहे या भावनेने पहावे.  
पूर्वपक्षेसिं सिद्धान्त । पाहावा प्रकृतीचा अंत ।
मग पावावा निवांत । निश्र्चय देवाचा ॥ ३४ ॥
३४) " मी देह आहे " हा पूर्व पक्ष व " मी आत्मा आहे " हा सिद्धान्त. पूर्वपक्ष खोटा ठरवून मग आत्मज्ञानामार्फत सिद्धांतापर्यंत दृश्य प्रकृतींत विलीन झालेले पाहवे. मग प्रकृती स्वरुपांत विलीन देवाचे शुद्ध स्वरुप निश्र्चितपणें कळते.    
देहाचेनि योगें संशयो । करी समाधानाचा क्षयो ।
चळो नेदावा निश्र्चयो । आत्मत्वाचा ॥ ३५ ॥
३५) देहबुद्धीच्या ज्ञानाने संशय निर्माण होतो मगसमाधानाचाही लोप होतो. यासाठीं आपल्या स्वस्वरुपाचा निश्र्चय मुळींच ढळूं देऊ नये.
सिद्ध असतां आत्मज्ञान । संदेह वाढवी देहाभिमान ।
याकारणें समाधान । आत्मनिश्र्चयें राखावें ॥ ३६ ॥
३६) आपल्या अंतर्यामी आत्मज्ञान हें स्वतः सिद्ध आहे. पण देहाभिमान संशय निर्माण करतो. म्हणुन आत्मनिश्र्चय करुन समाधान राखावें.
आठवंता देहबुद्धी । उडे विवेकाची शुद्धी ।
याकारणें आत्मबुद्धी । सदृढ करावी ॥ ३७ ॥
३७) देहबुद्धीची आठवण झाली की विवेक संपतो. म्हणून मी आत्मा आहे ही आत्मबुद्धी सदृढ राखावी.
आत्मबुद्धि निश्र्चयाची । तेचि दशा मोक्षश्रीची ।
अहमात्मा हें कधींचि । विसरों नये ॥ ३८ ॥
३८) आत्मबुद्धीचा निश्र्चय दृढ असणें. मी आत्मा आहे हे निःसंशयानें अनुभवास येणे. हेंच मोक्षरुपी लक्ष्मीचे वैभव आहे. म्हणून मी आत्मा आहे ही जाणीव कधींहीं विसरु नये.   
निरोपिलें निश्र्चयाचें लक्षण । परी हें न कळे संतसंगेंविण ।
संतांसि गेलिया शरण । संशये तुटती ॥ ३९ ॥
३९) निश्र्चय कोणता करावा हें सांगिंतलें पण सत्संगतीवाचून त्याचा बरोबर अर्थ ध्यानांत येत नाही. संतांना शरण गेल्यावर संशय आपोआप दूर होतात. 
आतां असो हें बोलणें । ऐका सिद्धांची लक्षणें ।
मुख्य निःसंदेहपणें । सिद्ध बोलिजें ॥ ४० ॥
४०) आतां हें बोलणें पुरें. सिद्धपुरुषाची लक्षणें थोडक्यांत ऐका. जो संपूर्ण निःसंशय झाला तो सिद्ध बनला.
सिद्धस्वरुपीं नाहीं देहो । तेथें कैंचा हो संदेहो ।
याकारणें सिद्ध पाहो । निःसंदेही ॥ ४१ ॥
४१) सिद्धावस्थेंत देहाची आठवण उरत नाही. म्हणून तेथें संशयाला जागा रहात नाही. यामुळें सिद्धपुरुष सतत निःसंदेह असतो. 
देवसमंधाचेनि गुणे । लक्षणासि काये उणें ।
देहातीताची लक्षणें । काये म्हणोनि सांगावी ॥ ४२ ॥
४२) जेथें देहाचा व दृश्याचा संबंध असतो, तेथें हवीतेवढी लक्षणें सांगता येतात. पण देहाच्या पलीकडे गेलेल्याची लक्षणें सांगता येत नाहीत. त्याचे वर्णन करता येत नाही. 
जें लक्षवेना चक्षूसी । त्याचीं लक्षणें सांगावीं कैसीं ।
निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी । लक्षणें कैसीं ॥ ४३ ॥
४३) जे डोळ्यांनीं पाहतां येत नाहीं, त्याची लक्षणें सांगता येत नाहीत. सिद्ध हा शुद्ध ब्रह्मस्वरुप झालेला असल्यानें त्याची लक्षणें वर्णिता येत नाहीत.  
लक्षणें म्हणिजे केवळ गुण । वस्तु ठाईची निर्गुण ।
तेचि सिद्धांचें लक्षण । वस्तुरुप ॥ ४४ ॥
४४) त्रिगुणांना लक्षणें असतात. पण ब्रह्मस्वरुप झालेली वस्तु तर निर्गुण मग लक्षणें कशी?  गुणरहित असणें हेच सिद्धपुरुषाचे लक्षण होय.  
तथापि ज्ञानदशकीं बोलिलें । म्हणौनि वगतृत्व आटोपिलें ।
न्यूनपूर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ४५ ॥
४५) परंतु हा विषय पुढें ज्ञानदशकांत सांगितला आहे. म्हणून हें वर्णन आतां पुरें. ह्यांत जें कमी असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्धलक्षणनाम समास दहावा ॥
Samas Dahava Siddha Lakshan Nirupan 
समास दहावा सिद्धलक्षणनिरुपण 


Custom Search

Saturday, July 22, 2017

Samas Navava Sadhak Nirupan समास नववा साधकनिरुपण


Dashak Pachava Samas Navava Sadhak Nirupan 
Samas Navava Sadhak Nirupan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Sadhak. Who is Sadhak? To know that we can think of a person who is completely absorbed in Prapancha, Now he is repenting and talking about Parmartha. He now came to know his bad virtues, his bad karmas, his bad behaviour with the people, Santa, Good people. He now thinks of Parmartha. From Mumukshu now he has made a progress on the path of spirituality. He has now knowledge that there is no happiness in Prapancha. He now in search of a sadGuru for guidance to proceed further in this path of Parmarth. Now here in this Samas who is called as Sadhak, is described in this Samas by Samarth Ramdas.
समास नववा साधकनिरुपण 
श्रीराम ॥
मागां मुमुक्षाचें लक्षण । संकेतें केलें कथन ।
आतां परिसा सावधान । साधक तो कैसा ॥ १ ॥
१) मागील समासांत मुमुक्षुची लक्षणें सांगितली. आतां साधकाची लक्षणें सावधपणें ऐका.
अवगुणाचा करुनि त्याग । जेणें धरिला संतसंग ।
तयासी बोलिजे मग । साधक ऐसा ॥ २ ॥
२) अवगुणांचा त्याग करुन ज्याने संतांचा संग धरिला त्याला मग साधक असें म्हटले आहे. 
जो संतांसी शरण गेला । संतजनीं आश्र्वासिला ।
मग तो साधक बोलिला । ग्रंथांतरीं ॥ ३ ॥
३) जो संतांना शरण गेला. संतांवर ज्यानें विश्र्वास ठेवला त्याला ग्रंथांमध्यें साधक म्हटले आहे.
उपदेशिलें आत्मज्ञान । तुटलें संसारबंधन । 
दृढतेकारणें करी साधन । या नाव साधक ॥ ४ ॥
४) संतांनी ज्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला. तो श्रवण केल्यावर आपल्याला संसाराचे बंधन नाहीं हें ज्याला पटलें. तो दृढतेने साधन करुं लागतो त्याला साधक म्हणतात. 
धरी श्रवणाची आवडी । अद्वैतनिरुपणाची गोडी ।
मननें अर्थांतर काढी । या नाव साधक ॥ ५ ॥
५) ज्याला परमार्थ ऐकण्याची आवड असते. अद्वैत निरुपणाची ज्याला गोडी असते. जो गूढ व खरा अर्थ मननाने बरोबर समजतो. तो साधक समजावा.
होता सारासारविचार । ऐके होऊनि तत्पर ।
संदेह छेदूनि दृढोत्तर । आत्मज्ञान पाहे ॥ ६ ॥
६) कोणी आत्मानात्मविवेक मांडीत असेल तर ते विवेचन मनापासून ऐकतो. संशय नाहींसा करुन जो आत्मज्ञान पाहातो त्याला साधक म्हणतात.
नाना संदेहनिवृत्ती । व्हावया धरी सत्संगती ।
आत्मशास्त्रगुरुप्रचीती । ऐक्यतेसि आणी ॥ ७ ॥
७) नाना प्रकारचे संशय नाहींसे व्हावेत म्हणून जो सत्संगती धरतो. शास्त्रप्रचीति, गुरुप्रचीति व आत्मप्रचीति या तीन्हींत ऐक्य अनुभवतो.  
देहबुद्धि विवेकें वारी । आत्मबुद्धि सदृढ धरी ।
श्रवण मनन केलेंचि करी । या नाव साधक ॥ ८ ॥ 
८) मी देहच आहे ही मिथ्या भावना जो विवेकने बाजूस सारतो, मी आत्माच आहे ही सत्य भावना दृढपणें धरण्याचा अभ्यास करतो, निरंतर श्रवण मनन करतो, तो साधक असतो.  
विसंचूनि दृश्यभान । दृढ धरी आत्मज्ञान ।
विचारें राखें समाधान । या नाव साधक ॥ ९ ॥
९) दृश्याचे दिसणें नाहींसे करुन जो आत्मज्ञान घट्ट धरतो, आणि मी आत्मस्वरुप आहे, या विचारांत आपलें समाधान राखतो, तो साधक असतो.  
तोडूनि द्वैताची उपाधी । अद्वैत वस्तु साधनें साधी ।
लावी ऐक्यतेची समाधी । या नाव साधक ॥ १० ॥
१०) आपल्यामागें लागलेलें वेगळेपणाची उपाधी जो तोडून अभेदानें विलसणरे स्वस्वरुप जो साधनद्वारे साध्य करुन घेतो, आणि मी ब्रह्मच आहे अशा ऐक्यानें समाधींत जातो तो साधक असतो.  
आत्मज्ञान जीर्ण जर्जर । त्याचा करी जीर्णोद्धार ।
विवेकें पावे पैलपार । या नाव साधक ॥ ११ ॥ 
११) आत्मज्ञान फार जुनें झालें. स्वतः आत्मसाक्षात्कार करुन घेऊन जो ते पुनरुज्जीवीत करतो. आत्मसाक्षात्काराने जो प्रपंचांतुन पार पडतो. तो साधक असतो.  
उत्तमें साधूचीं लक्षणें । आंगिकारी निरुपणें ।
बळेंचि स्वरुपाकार होणें । या नाव साधक ॥ १२ ॥
१२) अध्यात्म निरुपणांत श्रवण केलेली सांधूंची उत्तम लक्षणें जो अंगी आणण्याचे जो यत्न करतो. अभ्यासाच्या जोरावर जोआपली वृत्ती आत्म्याशी तदाकार करतो, तो साधक असतो.
असत्क्रिया ते सोडिली । आणी सत्क्रिया ते वाढविली ।
स्वरुपस्थिती बळावली । या नाव साधक ॥ १३ ॥ 
१३) जो वाईट कृत्यें सोडून देतो. चांगली कृत्यें वाढवितो, ज्याची आत्म्याशी तदाकार होण्याची पात्रता वाढत जाते, तो साधक असतो.
अवगुण त्यागी दिवसेंदिवस । करी उत्तम गुणाचा अभ्यास ।
स्वरुपीं लावी निजध्यास २ या नाव साधक ॥ १४ ॥
१४) आपलें अवगुणांचा दिवसेंदिवस त्याग करतो, उत्तम गुण अंगी बाणवण्याचा अभ्यास करतो, आत्मस्वरुपाचे चिंतन करतो, तो साधक असतो.
दृढ निश्र्चयाचेनि बळें । दृश्य असतांच नाडळे ।
सदा स्वरुपीं मिसळे । या नाव साधक ॥ १५ ॥
१५) आत्मस्वरुपच सत्य आहे, सगळें दृश्य मिथ्या आहे, असा निश्र्चय करुन स्वस्वरुपांत मिसळलेला राहतो, तो साधक असतो. 
प्रत्यक्ष माया अलक्ष करी । अलक्ष वस्तु लक्षी अंतरीं ।
आत्मस्थितीची धारणा धरी । या नाव साधक ॥ १६ ॥ 
१६) माया प्रत्यक्ष दिसत असूनही मनांतुन काढुन टाकतो, दिसत नसलेली आत्मवस्तु अंतरांत स्थिर व धारण करतो, तो साधक असतो. 
जें या जनासि चोरलें । मनास न वचे अनुमानलें ।
तेंचि जेणें दृढ केलें । या नाव साधक ॥ १७ ॥
१७) आत्मस्वरुप लोकांपासून लपविलेले आहे. आपल्या मनाला त्याची कल्पना करतां येत नाही. तें स्वरुप जोअभ्यासानें मनांत दृढ करतो. तो साधक असतो.   
जें बोलतांचि वाचा धरी । जें पाहतांचि अंध करी ।
तें साधी नाना परी । या नाव साधक ॥ १८ ॥
१८) आत्मस्वरुपाचें करतांना वाचा कुंठीत होते. जें डोळ्यांनी पाहूं गेल्यास दृष्टी लटकी पडते, तें स्वरुप नाना प्रयत्न व अभ्यास करुन जो आपलेसें करुन घेतो, तो साधक असतो.  
जें साधूं जातां साधवेना । जें लक्षू जातं लक्षवेना ।
तेंचि अनुभवे आणी मना । या नाव साधक ॥ १९ ॥ 
१९) ज्याचा अनुभव घ्यावा म्हटला तर तो घेता येत नाही, पाहण्याचा प्रयत्न केला तर पाहता येत नाही, तें स्वस्वरुप जो अभ्यासानें अंतरांत दृढ करतो, तो साधक असतो. 
जेथें मनचि मावळे । जेथें तर्कचि पांगुळे ।
तेंचि अनुभवा आणी बळें । या नाव साधक ॥ २० ॥
२०) ज्या स्वस्वरुपाशीं मन मावळतें, तर्क पांगळें पडतात, त्या आत्मस्वरुपाचा जोअभ्यासनें अनुभव घेतो, तो साधक असतो. 
स्वानुभवाचेनि योगें । वस्तु साधी लागवेगें ।
तेंचि वस्तु होये आंगें । या नाव साधक ॥ २१ ॥
२१) स्वस्वरुपाचा जो अनुभव घेतो, त्यामुळें आत्मवस्तु त्याला त्वरीत प्राप्त होते, तसेच तो स्वतः आत्मस्वरुप होऊन जातो, तो साधक असतो.    
अनुभवाचीं आंगें जाणे । योगियांचे खुणे बाणे । 
कांहींच नहोन असणें । या नाव साधक ॥ २२ ॥
२२) स्वस्वरुपाच्या अनुभवाची सर्व अंगे जो जाणतो. योग्यांच्या खुणा ज्याच्या अंगी बाणतात, काहींच नसून असणे असा जो राहतो, तो साधक असतो.
परती सारुन उपाधी । असाध्य वस्तु साधनें साधी ।
स्वरुपीं करी दृढ बुद्धी । या नाव साधक ॥ २३ ॥
२३) दृश्याची सर्व बंधनें जो बाजुस टाकतो, व असाध्य वस्तु साधना करुन व अभ्यासानें जो साधतो, आणि आपली बुद्धी स्वस्वरुपांत स्थिर करतो, तो साधक असतो. 
देवाभक्ताचें मूळ । शोधून पाहे सकळ ।
साध्यचि होये तत्काळ । या नाव साधक ॥ २४ ॥
२४) देव कोण व भक्त कोण याचें मूळ जो शोधून पाहातो, आनि साध्य जें आत्मस्वरुप त्याच्याशी जो त्वरित एकरुप होऊन जातो, तो साधक असतो. 
विवेकबळें गुप्त जाला । आपोंआप मावळला ।
दिसतो परी देखिला । नाहींच कोंणी ॥ २५ ॥
२५) विवेकाच्या सामर्थ्यानें जो मीपणाने गुप्त होतो. ज्याचा अभिमान आपोआप निघून जातो. तो देहानें जरी लोकांना दिसत असला तरी त्याचे खरे स्वरुप कोणी जाणतच नाही. 
मीपण मागें सांडिलें । स्वयें आपणास धुंडिलें ।
तुर्येसहि वोलांडिलें । या नाव साधक ॥ २६ ॥ 
२६) ज्यानें मीपणा मागें टाकला, आपला खरा मी शोधून काढला, तुर्यावस्थेलाही जी द्वैतच सांगते तीलाही मागें टाकले, तो साधक असतो.
पुढें उन्मनीचा सेवटीं । आपली आपण अखंड भेटी ।
अखंड अनुभवी ज्याची दृष्टी । या नाव साधक ॥ २७ ॥ 
२७) तेथें उन्मनी अवस्था असते. शेवटीं आपल्या " मी "ची आपल्यला कधीं भंग न पडणारी अखंड भेट घडते. त्या स्वरुप साक्षात्काराकडे ज्याचे निरंतर लक्ष असते, तो साधक असतो.
द्वैताचा तटका तोडिला । भासाचा भास मोडिला ।
देहीं असोनि विदेह जाला । या नाव साधक ॥ २८ ॥
२८) जो या दृश्यमय द्वैताचा संबंध तोडून टाकतो, दृशाचा भास जो नाहींसा करतो, आणि जो देहांत असूनही विदेही बनतो, तो साधक असतो.
जयास अखंड स्वरुपस्थिती । नाहीं देहाची अहंकृती ।
सकळ संदेहनिवृत्ती । या नाव साधक ॥ २९ ॥
२९) जो अखंड स्वरुपाकार असतो, ज्याला देहाभिमान नसतो, ज्याचे सारे संशय फिटलेले असतात, त्याला साधक म्हणतात.
पंचभूतांचा विस्तार । जयासि वाटे स्वप्नाकार ।
निर्गुणीं जयाचा निर्धार । या नाव साधक ॥ ३० ॥
३०) पंचभूतांनीं गुंफलेला हा पसारा, ज्याला एखाद्या स्वप्नासारखा खोटा वाटतो, निर्गुण तेंच खरें असा ज्याचा निर्धार असतो, तो साधक असतो.  
स्वप्नीं भये जें वाटलें । तें जागृतीस नाहीं आलें ।
सकळ मिथ्या निर्धारिलें । या नाव साधक ॥ ३१ ॥
३१) स्वप्न भयानक पडले, भीति वाटली. पण जाग आल्यावर भीति कसली? सगळेंच खोटे. तसेच दृश्य विश्र्व हे खोटे आहे. हे जो ओळखतो. तो साधक होय. 
मायेचें जे प्रत्यक्षपण । जनास वाटे हें प्रमाण ।
स्वानुभवें अप्रमाण । साधकें केलें ॥ ३२ ॥
३२) मायेनें निर्माण केलेले दृश्य विश्र्व प्रत्यक्ष दिसते. म्हणून सामान्य माणसे ते प्रमाण मानतात. परंतु स्वस्वरुपाचे ज्ञान झाल्यावर साधक जगाचें खरेपण अज्ञान मानतो.  
निद्रा सांडूनि चेइरा जाला । तो स्वप्नभयापासून सुटला ।
माया सांडून तैसा गेला । साधक स्वरुपीं ॥ ३३ ॥
३३) एखादा झोपी गेलेल्या माणूस जागा झाल्यावर स्वप्नभयापासून मुक्त होतो. त्याचप्रमाणें मायानें निर्माण केलेले दृश्य खोटे आहे हे ओळखून साधक आत्मरुपी स्थिर होतो. 
ऐसी अंतरस्थिती बाणली । बाह्य निस्पृहता अवलंबिली ।
संसारउपाधी त्यागिली । या नाव साधक ॥ ३४ ॥
३४) अशारीतीनें जो अंतर्यामी आत्मस्वरुपी लीन आहे, बाहेर व्यवहारांत जो निःस्पृहपणें वागतो आणि जो संसारबंधनानें बांधलेला नसतो, तो साधक असतो.  
कामापासून सुटला । क्रोधापासून पळाला ।
मद मत्सर सांडिला । येकीकडे ॥ ३५ ॥
३५) साधक कामवासनेच्या विळख्यांतून सुटलेला असतो. क्रोधापासून दूर राहतो. मदव मत्सर यांचा त्याग करतो.
कुळाभिमानासि सांडिलें । लोकलाजेस लाजविलें ।
परमार्थास माजविलें । विरक्तिबळें ॥ ३६ ॥
३६) साधक कुलाभिमान सोडून देतो. लोकलाजेला हरवितो. वैराग्याच्या बळावर परमार्थ खूप वाढवितो.  
अविद्येपासून फडकला । प्रपंचापासून निष्टला ।
लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७ ॥
३७) साधक अविद्येशी संबंध तोडतो. प्रपंचातून निसटतो. लोभाच्या मोहांतून तो एकदम बाहेर पडतो.  
थोरपणासि पाडिलें । वैभवासि लिथाडिलें । 
महत्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें ॥ ३८ ॥
३८) साधक जगांतील मोठेपणाचा त्याग करतो. वैभवाला किंमत देत नाही. वैराग्याच्या बळावर मानसन्माला झुगारुन देतो. 
भेदाचा मडघा मोडिला । अहंकार सोडून पाडिला ।
पाईं धरुनि आपटिला । संदेहशत्रु ॥ ३९ ॥
३९) साधक भेद मोडून काढतो. अहंकाराला हरवून त्याला बाजुस टाकतो. संशयरुपी शत्रुला पायाखाली लोळवतो. 
विकल्पाचा केला वधु । थापें मारिला भवसिंधु ।
सकळ भुतांचा विरोधु । तोडून टाकिला ॥ ४० ॥
४०) साधक त्याच्या विकल्पाचा नाश करतो. मोठा प्रहार करुन भवसागर मारुन टाकितो. तसेंच पंचभूतांमधें असणारा विरोध तो नाहीसा करुन टाकतो. 
भवभयासि भडकाविलें । काळाचें टांगें मोडिलें ।
मस्तक हाणोनि फोडिलें । जन्ममृत्याचें ॥ ४१ ॥
४१) साधक संसाराच्या भयाचे थोबाड फोडतो. काळाची तंगडी मोडतो. तो मृत्युच्या मस्तकावर प्रहार करुन तें फोडून जन्ममृत्युचे भयही नाहीसे करतो.
देहसमंधावरी लोटला । संकल्पावरी उठावला ।   
कल्पनेचा घात केला । अकस्मात ॥ ४२ ॥
४२) साधक देहरुपी पिशाच्चावर हल्ला करुन त्यास काढून टाकतो. म्हणजेच मी आत्मा असतांना मी देह आहे अशी भ्रामक कल्पना,  भावना टाकून देतो. म्हणजेच तो कल्पना करणेंही बंद करतो.   
अपधाकासि ताडिलें । लिंगदेहासि विभांडिलें ।
पाषांडास पछ्याडिलें । विवेकबळें ॥ ४३ ॥
४३) साधक स्वतःचें  स्वतःला जें भय वाटते त्याला बडवून बाहेर काढतो. साधक आपल्या सूक्ष्म देहास जिंकतो. आपल्या वासना सूक्ष्म देहांत राहतात. साधक त्यांना पराभूत करतो. विवेकाच्या बळावर पाखंडी लोकांचा व पाखंडी मतांना विरोध करुन पराभूत करतो.         
गर्वावरी गर्व केला । स्वार्थ अनर्थी घातला ।
अनर्थ तोहि निर्दाळिला । नीतिन्यायें ॥ ४४ ॥
४४) मी ब्रह्म आहे या अभिमानानें साधक मी देह आहे हा अभिमान नष्ट करतो. तो देहबुद्धिच्या स्वार्थी अहंकाराला नाहींसा करतो. तो दुर्दैवाला सरळ शास्त्रोक्त मार्गाने मारुन टाकतो.   
मोहासी मधेंचि तोडिलें । दुःखासि दुःधडचि केलें ।
शोकास खंडून सांडिलें । येकीकडे ॥ ४५ ॥
४५) साधक मोहाला उभा चिरतो. दुःखाचे दोन तुकडे करतो. शोकाचे तुकडे तुकडे करुन बाजूला फेकून देतो. म्हणजेच मोह. दुःख व शोक यांना साधक जीवनांतून नाहींसे करतो. 
द्वेष केला देशधडी । अभावाची घेतली नरडी ।
धाकें उदर तडाडी । कुतर्काचें ॥ ४६ ॥
४६) साधक द्वेषाला देशोधडीस लावतो. नास्तिकपणाला नरडे दाबून मारुन टाकतो. कुतर्काला इतका दम देतो की, त्याचे हृदय धडधडते. 
ज्ञानेंविवेक माजला । तेणें निश्र्चयो बळावला ।
अवगुणाचा संहार केला । वैराग्यबळें ॥ ४७ ॥
४७) आत्मज्ञानानें साधकाचा विवेक बलवान होतो. त्यामुळें स्वस्वरुपाबद्दल निश्र्चय बळकट होतो. वैराग्याच्या सामर्थ्यानें तो अवगुणांचा संहार करतो.  
अधर्मास स्वधर्मे लुटिलें । कुकर्मासि सत्कर्में झगटिलें ।
लांटून वाटा लाविलें । विचारें अविचारासी ॥ ४८ ॥
४८) स्वधर्माच्या आचरणाने साधक अधर्माचें सर्वस्व काढून घेतो. सत्कर्मांनी कुकर्मास हाकलून लावतो. सद्विचारांनी अविचारांना वाटेस लावतो. 
तिरस्कार तो चिरडिला । द्वेष खिरडूनि सांडिला ।
विषाद अविषादें घातला । पायांतळीं ॥ ४९ ॥
४९) साधक तिरस्कार चिरडून टाकतो. द्वेष खरडून काढतो. खेदाला स्वानंदाच्या पायतळीं तुडवतो.  
कोपावरी घालणें घातलें । कापट्या अंतरी कुटिलें ।
सख्य आपुलें मानिलें । विश्र्वजनीं ॥ ५० ॥
५०) साधक क्रोधावर हल्ला करुन त्याचा नाश करतो. कपटाचा मनामध्येंच कुटुन नायनाट करतो. तो विश्र्वांतील सर्व भूतांमधें मित्रत्वानें पाहातो.  
प्रवृत्तीचा केला त्याग । सुहृदांचा सोडिला संग ।
निवृत्तिपंथे ज्ञानयोग । साधिता जाला ॥ ५१ ॥    
५१) साधक दृश्याकडे धांव घेणार्‍या वृत्तीचा त्याग करतो. आप्तजनांची संगत सोडतो. आणि वृत्तीला अंतर्यामी आत्मस्वरुपाकडे वळवून आत्मज्ञान करुन घेतो.  
विषयेमैंदास सिंतरिलें । कुविद्येसि वेढा लाविलें ।
आपणास सोडविलें । आप्ततश्करापासुनी ॥ ५२ ॥
५२) साधक दृश्यरुपी चोराला फसवितो. दृश्याच्या कचाट्यांतून निसटतो. विपरीत ज्ञानाला सर्व बाजुनीं वेढून तें नाहीसें करतो. आप्तरुपी चोरांपासून आपली सुटका करुन घेतो. 
पराधेनतेवरी कोपला । ममतेवरी संतापला ।
दुराशेचा त्याग केला । येकायेकी ॥ ५३ ॥
५३) साधक पराधिनतेवर रागावतो. ममतेवर संतापतो. लगेचच दुराशेचा त्याग करतो. 
स्वरुपीं घातलें मना । यातनेसि केली यातना ।
साक्षेप आणि प्रेत्ना । प्रतिष्ठिलें ॥ ५४ ॥
५४) साधक मनाला स्वस्वरुपी लीन करतो. त्यामुळे यातनेला यातना होतात. कारण यातना भोगायला मन उरतच नाही. तो उद्योग, श्रम आणि प्रयत्न यांची प्रतिष्ठा वाढवतो.     
अभ्यासाचा संग धरिला । साक्षपासरिसा निघाला ।
प्रेत्न सांगाती भला । साधनपंथें ॥ ५५ ॥
५५) साधक आपल्या साधनमार्गांत अभ्यासावर भर देतो. तो प्रयत्न आणि कष्ट यांनी साधनापंथ अभ्यासितो.  
सावध दक्ष तो साधक । पाहे नित्यानित्य  विवेक ।
संग त्यागूनि येक । सत्संग धरी ॥ ५६ ॥
५६) साधक अति सावध व दक्ष असतो. तो शाश्वत, अशाश्वत विवेकाने जाणतो. इतर सर्व संग सोडून एक सत्संग तेवढा धरतो.
बळेंचि सारिला संसार । विवेकें टाकिला जोजार ।
शुद्धाचारें अनाचार । भ्रष्टविला ॥ ५७ ॥
५७) साधक प्रपंचाला विवेकाच्या बळावर बाजूला टाकून देतो. संसाराचा बोजा फेकून देतो. स्वतःच्या शुद्धाचरणाने अनाचाराला हरवितो, भ्रष्ट करतो.
विसरास विसरला । आळसाचा आळस केला ।
सावध नाहीं दुश्र्चित्त जाला । दुश्र्चित्तपणासी ॥ ५८ ॥
५८) साधक स्वस्वरुपाचे अनुसंधान विसरण्याचे विसरतो. कामचुकारपणाचा स्वीकार करत नाही. म्हणजे आळसाचा आळस करतो. चित्ताची व्यग्रता नसते. म्हणजे अनेक गोष्टींमध्ये मन व्यग्र नसते. 
आतां असो हें बोलणें । अवगुण सांडी निरुपणें ।
तो साधक ऐसा येणें प्रमाणें । बुझावा ॥ ५९ ॥
५९) आतां हें बोलणें पुरें. उपदेश ऐकून जो आपले अवगुण सोडतो तो साधक असतो. हें या वर्णनावरुन ओळखावें. 
बळेंचि अवघा त्याग कीजे । म्हणौनि साधक बोलिजे ।
आतां सिद्ध तो जाणिजे । पुढिले समासीं ॥ ६० ॥
६०) मुद्दाम बळजबरीनें आपल्या देहबुद्धीचा त्याग करणारास साधक म्हणतात. आतां सिद्ध कोण असतो त्याचे लक्षण पुढील समासांत सांगितलें आहे. 
येथे संशय उठिला । निस्पृह तोचि साधक जाला ।
त्याग न घडे संसारिकाला । तरी तो साधक नव्हे कीं ॥ ६१ ॥
६१) येथें एक शंका येते ती अशी की जो निस्पृह होतो तो सादक बनतो. पण प्रापंचिकाला सर्व त्याग घडत नाही. मग तो साधक बनूं शकत नाहीं कीं काय?     
ऐसे श्रोतयांचें उत्तर । याचें कैसें प्रत्योत्तर । 
पुढिले समासीं तत्पर । होऊन ऐका ॥ ६२ ॥
६२) श्रोत्यांच्या या प्रश्र्णाचे उत्तर पुढील समासांत दिलें आहे. ते श्रोत्यांनी तत्पर हौऊन ऐकावें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे साधकलक्षणनिरुपणनाम समास नववा ॥
Samas Navava Sadhak Nirupan
समास नववा साधकनिरुपण 


Custom Search

Thursday, July 20, 2017

Samas Aatava Mumukshu Lakshan समास आठवा मुमुक्षुलक्षण


DashakPachava Samas Aatava Mumukshu Lakshan 
Samas Aatava Mumukshu Lakshan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Mumukshu. Who is Mumukshu? To know that we can think of a person who is completely absorbed in Prapancha, Now he is repenting and talking about Parmartha. He now came to know his bad virtues, his bad karmas, his bad behaviour with the people, Santa, Good people. He now thinks of Parmartha. Now here in this Samas who is called as Mumukshu, is described in this Samas by Samarth Ramdas.
समास आठवा मुमुक्षुलक्षण 
श्रीराम ॥
संसारमदाचेनि गुणें । नाना हीनें कुलक्षणें ।
जयाचेनि मुखावलोचनें । दोषचि लागे ॥ १ ॥
१) बद्ध माणूस संसाराच्या मदानें धुंद असतो. त्याच्या अंगीं अनेक हीन व वाईट लक्षणें उत्पन्न होतात. त्याच्या मुखावलोकनानें दोषच लागतो.
ऐसा प्राणी जो कां बद्ध । संसारी वर्तता अबद्ध ।
तयास प्राप्त झाला खेद । काळांतरीं ॥ २ ॥
२) असा बद्ध समसारंत मनसोक्त वागत असतो. काळांतरानें त्याच्यावर दुःखाचे खेदाचे प्रसंग ओढवतात.
संसारदुःखें दुखावला । त्रिविध तापें पोळला ।
निरुपणें प्रस्तावला । अंतर्यामीं ॥ ३ ॥
३) संसारांतील दुःखाने तो पीडतो. अनेक प्रकारच्या संकटांनीं तो पोळतो. सत्पुरुषाचा उपदेश ऐकून मग अंतर्यामी तो पस्तवतो. 
जाला प्रपंची उदास । मनें घेतला विषयत्रास ।
म्हणे आतां पुरे सोस । संसारींचा ॥ ४ ॥
४) त्याला प्रपंचाचा कंटाळा येतो. मनापासून विषयभोगाचा ताप वाटतो. संसाराचा सोस पुरें झाला असें त्याला वाटू लागते.   
प्रपंच जाईल सकळ । येथील श्रम तो निर्फळ ।
आतां कांहीं आपुला काळ । सार्थककरुं ॥ ५ ॥
५) हा तात्पुरता असलेला सर्व प्रपंच नाहींसा होईल. त्यासाठीं घेतलेले श्रम फुकट जातील. म्हणून आतां कांहीं आपला काळ सार्थकी लावू.   
ऐसी बुद्धि प्रस्तावली । पोटीं आवस्ता लागली ।
म्हणे माझी वयेसा गेली । वेर्थचि आवघी ॥ ६ ॥
६) अशा रीतीनें त्याच्या बुद्धीला पश्र्चाताप होतो. व मनाला तळमळ लागते. त्याच्या मनांत येऊ लागते कीं, अतांपर्यतचे आपलें सर्व आयुष्य फुकट गेले. 
पूर्वीं नाना दोष केले । ते अवघेचि आठवले ।
पुढें येऊनि उभे ठेले । अंतर्यामीं ॥ ७ ॥
७) पूर्वीं जी नाना दुष्कृत्यें केली ती त्याला आठवू लागतात. ते सर्व त्याला अंतर्यामी दिसूं लागते. 
आठवे येमाची यातना । तेणे भयेचि वाटे मना । 
नाहीं पापासि गणना । म्हणौनियां ॥ ८ ॥
८) आतां त्याला यम यातना आठवू लागतात. त्यामुळे मन भीतिग्रस्त होते. कारण अगणित अशी पापे त्यानें केलेली असतात. 
नाहीं पुण्याचा विचार । जाले पापाचे डोंगर ।
आतां दुस्तर हा संसार । कैसा तरों ॥ ९ ॥
९) आयुष्यांत कधी पुण्याचा विचार केला नाही. पापाचे डोंगर मात्र रचले. आतां हा अवघड संसार कसा तरावा?  
आपले दोष आछ्यादिले । भल्यांस गुणदोष लाविले ।
देवा म्यां वेर्थच निंदिले । संत साधु सज्जन ॥ १० ॥
१०) त्याला समजू लागते कीं, स्वतःचे दुर्गुण लपवून ठेऊन त्यानें उगाचच भल्या माणसांना वाईट ठरविले. हे देवा मी उगाचच साधु संतांची निंदा केली. 
निंदे ऐसे नाहीं दोष । ते मज घडले कीं विशेष ।
माझें अवगुणीं आकाश । बुडों पाहे ॥ ११ ॥
११) निंदेसारखें पातक नाहीं आणि तेंच माझ्याकडून पुष्कळ घडलें आहे. माझें अवगुण इतकें आहेत कीं, त्यांत आकाश बुडुन जाईल.   
नाहीं वोळखिले संत । नाहीं अर्चिला भगवंत ।
नाहीं अतित अभ्यागत । संतुष्ट केले ॥ १२ ॥
१२) मी संतांना ओळखले नाहीं, भगवंतालची पूजा केली नाहीं, अतिथी, अभ्यागत यांना संतुष्ट केलें नाही.
पूर्व पाप वोढवलें । मज कांहींच नाहीं घडलें ।
मन आव्हाटीं पडिलें । सर्वकाळ ॥ १३ ॥
१३) मझ्या पूर्व पापाचें फळ म्हणून माझ्या कडून कांहींच चांगलें घडलें नाही. माझ्या मनाने मला नेहमी आडमार्गानें नेले.  
नाहीं कष्टविलें शेरीर । नाहीं केला परोपकार । 
नाहीं रक्षिला आचार । काममदें ॥ १४ ॥
१४) कामाच्या मदामुळें शरीराला कष्टविले नाही. काम परोपकार केला नाही. आचार, चांगलें वागणें केले नाही.  
भक्ति माता हे बुडविली ।  शांति विश्रांति मोडिली । 
मूर्खपणें म्यां विघडिली । सद्बुद्धि सद्वासना ॥ १५ ॥
१५) भक्तिरुपी माउलीला बुडवून टाकीली. शांतिरुपी विश्रांति मोडून टाकली. सद्बुद्धि, सद्वासना मूर्खपणाने बिघडवून टाकल्या. 
आतां कैसें घडे सार्थक । दोष केले निरार्थक ।
पाहों जातां विवेक । उरला नाहीं ॥ १६ ॥
१६) मी विनाकारण पापाचरण केले. त्यामुळें आतां सार्थक कसें होणार? आतां माझ्याजवळ विवेक असा उरलाच नाही.  
कोण उपाये करावा । कैसा परलोक पावावा ।
कोण्या गुणें देवाधिदेवा । पाविजेल ॥ १७ ॥
१७) आतां कोणता उपाय करावा? परमार्थ कसा साधावा? कोणत्या मार्गानें मला भगवंताची प्राप्ती होईल? 
नाहीं सद्भाव उपजला । अवघा लोकिक संपादिला ।
दंभ वरपंगें केला । खटाटोप कर्माचा ॥ १८ ॥
१८) कधीहि चांगला भाव माझ्यांत उद्भवलाच नाही. सगळें लौकिकाला चांगलें दिसावें म्हणून केले. कर्माचा खटातोप वरपांगी होता. तो दंभाचार होता.  
कीर्तन केलें पोटासाठीं । देव मांडिले हाटवटीं ।
आहा देवा बुद्धि खोटी । माझी मीच जाणे ॥ १९ ॥
१९) पोट भरण्यासाठीं किर्तन केलें. देव बाजारांत मांडिले. देवा माझी बुद्धि किती खोटी आहे ते मीच जाणतो. 
पोटीं धरुनि अभिमान । शब्दीं बोले निराभिमान ।
अंतरीं वांछूनियां धन । ध्यानस्त जालों ॥ २० ॥
२०) आंत अभिमान ठेवून बाहेर मात्र निराभिमानपणाच्या थापा मारत राहीलो. मनांत पैशाची वासना ठेवून ध्यानाचे सोंग केलें. 
वित्पत्तीनें लोक भोंदिले । पोटासाठीं संत निंदिले ।
माझे पोटीं दोष भरले । नाना प्रकारीचे ॥ २१ ॥
२१) शास्त्रांचे पांडित्य दाखवून लोकांनाफसविलें, पोट भरण्यासाठीं संतांची निंदा केली. असें अनेक दोष माझ्या अंतर्यामी भरलेलें आहेत.
सत्य तेंचि उछ्छेदिलें । मिथ्या तेंचि प्रतिपादिलें । 
ऐसें नाना कर्म केलें । उदरंभराकारणें  ॥ २२ ॥
२२) सत्य तें खोटें ठरविले, खोटे असलेले खरे म्हणून सांगितलें. अशी अनेक पापें पोट भरण्यासाठी केली. 
ऐसा पोटीं प्रस्तावला । निरुपणें पालटला ।
तोचि मुमुक्षु बोलिला । ग्रंथांतरीं ॥ २३ ॥
२३) अशा रीतीनें ज्याला खरा पश्र्चाताप होतो तो उपदेशानें अंतर-बाह्य बदलतो त्याला परमार्थ ग्रंथांमध्यें मुमुक्षु म्हटले आहे.  
पुण्यमार्ग पोटीं धरी । सत्संगाची वांछा करी । 
विरक्त जाला संसारीं । या नाव मुमुक्ष ॥ २४ ॥
२४) पुण्याचा मार्ग अनुसरतो, सतसंगाची इच्छा व तो धरतो आणि संसारापासून जो विरक्त होतो त्याला मुमुक्ष म्हणतात.
गेले राजे चक्रवती । माझें वैभव तें किती ।
म्हणे धरुं सत्संगती  ।  या नाव मुमुक्ष ॥ २५ ॥ 
२५) मोठेमोठे चक्रवर्ती राजे गेले. त्यांच्यापुढें माझे वैभव कांहींच नाही. असा विवेक उत्पन्न होऊन जो सन्मार्ग धरतो त्याला मुमुक्ष म्हणतात. 
आपुले अवगुण देखे । विरक्तिबळें वोळखे । 
आपणासि निंदी दुःखें । या नाव मुमुक्ष ॥ २६ ॥
२६) जो स्वतःचे दोष जाणु लागतो आणि विरक्तीच्या शक्तीने त्यांना बरोबर ओळखतो मग स्वतःच आपली निंदा करुन दुःख व्यक्त करतो त्याला मुमुक्ष म्हणुन जाणावा.    
म्हणे मी काये अनोपकारी । म्हणे मी काय दंभधारी ।
म्हणे मी काये अनाचारी । या नाव मुमुक्ष ॥ २७ ॥
२७) तो म्हणतो की, मी उपकार न करणारा, दंभानें वागणारा, अनाचार करणारा असें जो पश्र्चातापानें म्हणतो तो मुमुक्ष होय.
म्हणे मी पतित चांडाळ । म्हणे मी दुराचारी खळ ।
म्हणे मी पापी केवळ । या नाव मुमुक्ष ॥ २८ ॥
२८) तो म्हणतो भ्रष्ट, चांडाळ, दुराचारी, दुष्ट आणि पापी आहेहोय. असें जो पश्र्चातापानें म्हणतो तो मुमुक्ष 
म्हणे मी अभक्त दुर्जन । म्हणे मी हीनाहूनि हीन ।
म्हणे मी जन्मलों पाषाण । या नाव मुमुक्ष ॥ २९ ॥
२९) तो म्हणतो मी अभक्त, दुर्जन, हीनाहून हीन, जणूं कांहीं मी दगडच असें जो पश्र्चातापानें म्हणतो तो मुमुक्ष होय.
म्हणे मी दुराभिमानी । म्हणे मी तपीळ जनीं ।
म्हणे मी नाना वेसनी । या नाव मुमुक्ष ॥ ३० ॥
३०) मी दुराभिमानी आहे, लोक मला रागीट म्हणून ओळखतात. मी व्यसनी आहे असे जो पश्र्चातापाने म्हणतो तो मुमुक्ष होय.
म्हणे मी आळसी आंगचोर । म्हणे मी कपटी कातर ।
म्हणे मी मूर्ख अविचार । या नाव मुमुक्ष ॥ ३१ ॥ 
३१) मी आळशी, अंगचोर, कपटी, भित्रा, मूर्ख आणि अविचारी आहे. असे जो पश्र्चातापाने म्हणतो तो मुमुक्ष होय.
म्हणे मी निकामी वाचाळ । म्हणे मी पाषांडी तोंडाळ ।
म्हणे मी कुबुद्धि कुटिळ । या नाव मुमुक्ष ॥ ३२ ॥
३२) मी नालायक, बडबड्या, पाखंडी, तोंड टाकून बोलणारा, वाकड्या बुद्धीचा, आणि वाकड्या वृत्तीचा आहे. असे जो पश्र्चातापाने म्हणतो तो मुमुक्ष होय.  
म्हणे मी कांहींच नेणे । म्हणे मी सकळाहूनि उणें ।
आपलीं वर्णी कुलक्षणें । या नाव मुमुक्ष ॥ ३३ ॥ 
३३) मला कांहींच ज्ञान नाही. मी सगळ्यांहून मागे आहे. अशा रीतीनें जो स्वतःची वाईट लक्षणें सांगतो. तो मुमुक्ष होय.
म्हणे मी अनाधिकारी । म्हणे मी कुश्र्चिळ अघोरी ।
म्हणे मी नीच नानापरी । या नाव मुमुक्ष ॥ ३४ ॥
३४) तो अजुन म्हणतो कीं, मी सर्व बाबतींत अनाधिकारी, हीन कुलाचा, भयंकर वाईट कर्में करणारा, आणि अनेक प्रकारें नीच आहे. असे जो पश्र्चातापाने म्हणतो तो मुमुक्ष होय.
म्हणे मी काये आपस्वार्थी । म्हणे मी काये अनर्थी ।
म्हणे मी नव्हे परमार्थी । या नाव मुमुक्ष ॥ ३५ ॥
३५) मी अति स्वार्थी आहे. मी अनर्थ करणारा आहे. मी परमार्थी नाही. असे जो पश्र्चातापाने म्हणतो तो मुमुक्ष होय.
म्हणे मी अवगुणाची रासी । म्हणे मी वेर्थ आलों जन्मासी ।
म्हणे मी भार जालों भूमीसी । या नाव मुमुक्ष ॥ ३६ ॥
३६) मी अवगुणांची रास आहे. मी फुकट जन्मास आलो. मी या भूमीला भार झालो. असे जो पश्र्चातापाने म्हणतो तो मुमुक्ष होय. 
आपणास निंदी सावकास । पोटीं संसाराचा त्रास ।
धरी सत्संगाचा हव्यास । या नाव मुमुक्ष ॥ ३७ ॥
३७)  अशा प्रकारे जो भरभरुन स्वतःची निंदा करतो. संसाराचा ज्यास त्रास वाटतो, संसार नकोसा होतो, ज्याला सत्संगतीची इच्छा उत्पन्न होते, तो मुमुक्ष असतो. 
नाना तीर्थें धुंडाळिलीं । शमदमादि साधनें केलीं ।
नाना ग्रंथालये पाहिली । शोधूनियां ॥ ३८ ॥
३८) पुष्कळ तीर्थे फिरला, शमदमादि साधनांचा अभ्यास केला, नाना ग्रंथांचा अभ्यास केला, 
तेणें नव्हे समाधान । वाटे  अवघाच अनुमान ।
म्हणे रिघों संतांस शरण । या नाव मुमुक्ष ॥ ३९ ॥ 
३९) त्याने समाधान झालें नाही. हें सगळें बुद्धीचें अनुमान आहे. कल्पनेचा खेळ आहे असे समजले. हें ध्यानांत घेऊन संतांना जो शरण आला तो मुमुक्ष होय. 
देहाभिमान कुळाभिमान । द्रव्याभिमान नानाभिमान ।
सांडूनि संतचरणीं अनन्य । या नाव मुमुक्ष ॥ ४० ॥
४०) ज्यानें देहाभिमान, कुळाभिमान, द्रव्याभिमान असें सर्व अभिमान सोडून संतचरणीं जो अनन्य झाला, शरण आला तो मुमुक्ष होय.
अहंता सांडूनि दूरी । आपणास निंदी नानापरी ।
मोक्षाची अपेक्षा करी । या नाव मुमुक्ष ॥ ४१ ॥
४१) आपला अहंभाव बाजुला ठेवला, आपल्याला नाना प्रकारे नांवे ठेविली, स्वतःची निंदा केली, आणि आतां मोक्षाची अपेक्षा करतो तो मुमुक्ष होय.  
ज्याचें थोरपण लाजे । जो परमार्थकारणें झिजे ।
संतापाईं विश्र्वास उपजे । या नाव मुमुक्ष ॥ ४२ ॥
४२) ज्याला लौकिक मोठेपणाची लाज वाटते, जोपरमार्थासाठीं झीजतो, संताविषयीं ज्याला विश्र्वास वाटतो, त्याला मुमक्ष म्हणतात. 
स्वार्थसांडून प्रपंचाचा । हव्यास धरिला परमार्थाचा ।
अंकित होईन सज्जनाचा । म्हणे तो मुमुक्ष ॥ ४३ ॥
४३) ज्याचा संसाराचा स्वार्थ सुटतो, ज्याला परमार्थाची उत्कट इच्छा निर्माण होते, आणि मी संतांचा होऊन राहीन असे जो म्हणतो तो मुमुक्ष होय. 
ऐसा मुमुक्ष जाणिजे । संकेतचिन्हें  वोळखिजे ।
पुढें श्रोतीं अवधान दीजे । साधकलक्षणीं ॥ ४४ ॥ 
४४) या लक्षणांवरुन मुमुक्षूला जाणावें त्याला ओळखण्याची ही संकेतचिन्हें आहेत. आतां पुढील समासीं साधकाची लक्षणें सांगतो. श्रोत्यांनी ती लक्ष देऊन ऐकावीत. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
 मुमुक्षलक्षणनाम समास आठवा ॥
Samas Aatava Mumukshu Lakshan
समास आठवा मुमुक्षुलक्षण 


Custom Search