Showing posts with label ShriRamcharitmans Part 42. Show all posts
Showing posts with label ShriRamcharitmans Part 42. Show all posts

Wednesday, September 2, 2020

ShriRamcharitmans Part 42 श्रीरामचरितमानस भाग ४२

 

ShriRamcharitmans Part 42  
Doha 213 to 215 
श्रीरामचरितमानस भाग ४२ 
दोहा २१३ ते २१५ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--धवल धाम मनि पुरट पट सुघटित नाना भॉंति ।
सिय निवास सुंदर सदन सोभा किमि कहि जाति ॥ २१३ ॥
देदीप्यमान महालांमध्ये अनेक प्रकारच्या सुंदर पद्धतीने बनविलेल्या रत्नजडित सोन्याच्या जरीचे पडदे लावलेले होते. सीतेच्या राहाण्याच्या सुंदर महालाच्या शोभेचे वर्णन तर काय करावे ? ॥ २१३ ॥
सुभग द्वार सब कुलिस कपाटा । भूप भीर नट मागध भाटा ॥
बनी बिसाल बाजि गज साला । हय गय रथ संकुल सब काला ॥
राजमहालाचे सर्व दरवाजे सुंदर होते. त्यांना चमकणार्‍या हिर्‍यांची दारे बसवलेली होती. तेथे मांडलिक राजे, नट, मागध आणि भाट यांची गर्दी झालेली असे. घोडे आणि हत्ती यांच्यांसाठी मोठमोठ्या पागा व हत्तीखानेबनविलेले होते. ते नेहमी घोडे, हत्ती व रथांनी भरलेले असत. ॥ १ ॥
सूर सचिव सेनप बहुतेरे । नृपगृह सरिस सदन सब केरे ॥
पुर बाहेर सर सरित समीपा । उतरे जहँ तहँ बिपुल महीपा ॥
पुष्कळ वीर, मंत्री आणि सेनापती होते, त्या सर्वांची घरेसुद्धा राजमहालासारखीच होती. नगराबाहेर असलेल्या तलाव आणि नदीजवळ जिकडे-तिकडे पुष्कळसे राजे लोक उतरले होते. ॥ २ ॥
देखि अनूप एक अँवराई । सब सुपास सब भॉंति सुहाई ॥
कौसिक कहेउ मोर मनु माना । इहॉं रहिअ रघुबीर सुजाता ॥
तेथील अनुपम सर्व प्रकारे शोभिवंत आमराई पाहून आणि तेथील सर्व सुखसोयी पाहून विश्र्वामित्र म्हणाले, ' हे प्रिय रघुवीरा, इथेच राहावे, असे मला वाटते. ॥ ३ ॥
भलेहिं नाथ कहि कृपानिकेता । उतरे तहँ मुनिबृदं समेता ॥
बिस्वामित्र महामुनि आए । समाचार मिथिलापति पाए ॥
कृपानिधान श्रीरामचंद्र म्हणाले की, ' मुनिवर्य ! फारच छान. ' असे म्हणून ते मुनींसह तेथेच राहिले. मिथिलापती जनकांना जेव्हा हे वर्तमान समजले की, महामुनी विश्वामित्र आले आहेत, ॥ ४ ॥
दोहा--संग सचिव सुचि भूरि भट भूसुर बर गुर ग्याति ।
चले मिलन मुनिनायकहि मुदित राउ एहि भॉंति ॥ २१४ ॥
तेव्हा पवित्र विचारांचे मंत्री, पुष्कळसे योद्धे, श्रेष्ठ ब्राह्मण, गुरु शतानंद आणि आपल्या जातीचे श्रेष्ठ लोक यांना बरोबर घेतले आणि मोठ्या आनंदाने राजा जनक हे मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना भेटण्यास निघाले. ॥ २१४ ॥
कीन्ह प्रनामु चरन धरि माथा । दीन्हि असीस मुदित मुनिनाथा ॥
बिप्रबृंद सब सादर बंदे । जानि भाग्य बड़ राउ अनंदे ॥
राजांनी मुनींच्या चरणी मस्तक ठेवून प्रणाम केला. मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. नंतर राजाने सर्व ब्राह्मण मंडळींना आदराने प्रणाम केला. हे आपले सद्भाग्य मानून राजा जनकांना आनंद वाटला. ॥ १ ॥
कुसल प्रस्न कहि बारहिं बारा । बिस्वामित्र नृपहि बैठारा ॥
तेहि अवसर आए दोउ भाई । गए रहे देखन फुलवाई ॥
वारंवार खुशाली विचारुन विश्वामित्रांनी राजांना बसवून घेतले. त्याचवेळी राम-लक्ष्मण हे दोघे फुलबाग पाहून तेथे आले. ॥ २ ॥
स्याम गौर मृदु बयस किसोरा । लोचन सुखद बिस्व चित चोरा ॥
उठे सकल जब रघुपति आए । बिस्वामित्र निकट बैठाए ॥
सुकुमार किशोर वयाचे, श्याम व गौर वर्णाचे ते दोघे कुमार नेत्रांना सुख देणारे आणि संपूर्ण विश्वाचे चित्त आकर्षून घेणारे होते. जेव्हा श्रीरघुनाथ आले, तेव्हा सर्वजण त्यांचे रुप व तेज यांनी प्रभावित होऊन उठून उभे राहिले. विश्वामित्रांनी त्यांना आपल्याजवळ बसवून घेतले. ॥ ३ ॥                  
भए सब सुखी देखि दोउ भ्राता । बारि बिलोचन पुलकित गाता ॥
मूरति मधुर मनोहर देखी । भयउ बिदेहु बिदेहु बिसेषी ॥
दोघा भावांना पाहून सर्वांना आनंद झाला. सर्वांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू, आनंदाश्रू वाहू लागले. शरीरे रोमांचित झाली. श्रीरामांची मधुर मनोहर मूर्ती पाहून विदेही राजा जनक हेसुद्धा ( वेगळ्या अर्थाने ) विदेही ( =देहभानरहित ) झाले. ॥ ४ ॥
दोहा--प्रेम मगन मनु जानि नृपु करि बिबेकु धरि धीर ।
बोलेउ मुनि पद नाइ सिरु गदगद गिरा गभीरा ॥ २१५ ॥
मन प्रेमामध्ये मग्न झाल्याचे पाहून राजा जनकांनी विवेकाने स्वतःला सावरले आणि मुनींच्या चरणी मस्तक ठेवून ते सद्गदित गंभीर वाणीने म्हणाले, ॥ २१५ ॥
कहहु नाथ सुंदर दोउ बालक । मुनिकुल तिलक कि नृपकुलपालक ॥
ब्रह्म जो निगम नेति कहि गावा । उभय बेष धरि की सोइ आवा ॥
' हे नाथा, सांगा बरे, हे दोघे सुंदर बालक मुनिकुलाचे भूषण आहेत की कुणा राजवंशाचे पालक आहेत ? किंवा वेदांनी ' नेति ' म्हणून ज्यांचे गुणगान केले आहे, ते ब्रह्मच या युगलरुपामध्ये आले आहे ? ॥ १ ॥
सहज बिरागरुप मनु मोरा । थकित होत जिमि चंद चकोरा ॥
ताते प्रभु पूछउॅं सतिभाऊ । कहहु नाथ जनि करहु दुराऊ ॥ 
माझे मन स्वभावतःच वैराग्यशील आहे. तरीही यांना पाहून ते असे मुग्ध होत आहे की, ज्याप्रमाणे चंद्राला पाहून चकोर होतो. हे प्रभो, म्हणून मी तुम्हांला मनापासून विचारतो, हे नाथ, काहीही न लपविता सांगा. ॥ २ ॥   
इन्हहि बिलोकत अति अनुरागा । बरबस ब्रह्मसुखहि मन त्यागा ॥
कह मुनि बिहसि कहेहु नृप नीका । बचन तुम्हार न होइ अलीका ॥
यांना पाहाताच अत्यंत प्रेमवश होऊन माझ्या मनाने बळेच ब्रह्मसुखाचा त्याग केला आहे. ' तेव्हा मुनी हसून म्हणाले, ' हे राजा, तुम्ही योग्यच बोललात. तुमचे वचन खोटे असू शकणार नाही. ॥ ३ ॥
ए प्रिय सबहि जहॉं लगि प्रानी । मन मुसुकाहिं रामु सुनि बानी ॥
रघुकुल मनि दसरथ के जाए । मम हित लागि नरेस पठाए ॥
जगात जितके प्राणी आहेत, त्या सर्वांना हे प्रिय आहेत. ' मुनींची ही रहस्यमय वाणी ऐकून श्रीरामांनी मनातल्या मनात स्मित केले. ( जणू त्यांनी संकेत दिला की, हे रहस्य उघड करु नका. ) ( तेव्हा मुनी म्हणाले, ) ' हे रघुकुलशिरोमणी महाराज दशरथांचे पुत्र आहेत. माझ्या कामासाठी राजाने यांना माझ्याबरोबर पाठविले आहे. ॥ ४ ॥


Custom Search