Showing posts with label ShriRamcharitmans Part 62. Show all posts
Showing posts with label ShriRamcharitmans Part 62. Show all posts

Wednesday, November 18, 2020

ShriRamcharitmans Part 62 श्रीरामचरितमानस भाग ६२

 

ShriRamcharitmans Part 62 
Doha 280 to 283 
श्रीरामचरितमानस भाग ६२ 
दोहा २८० ते २८३ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—परसुरामु तब राम प्रति बोले उर अति क्रोधु ।

संभु सरासनु तोरि सठ करसि हमार प्रबोधु ॥ २८० ॥

मग परशुराम अत्यंत क्रोधाने श्रीरामांना म्हणाले,’ अरे धूर्ता ! शिवांचे धनुष्य मोडून तू उलट मलाच ज्ञान पाजतोस ? ॥ २८० ॥

बंधु कहइ कटु संमत तोरें । तू छल बिनय करसि कर जोरें ॥

करु परितोषु मोर संग्रामा । नाहिं त छाड़ कहाउब रामा ॥

तुझा हा भाऊ तुझ्याच संमतीने कटू वचन बोलतोय आणि कपटाने हात जोडून विनवणी करतो आहेस. एक तर युद्ध करुन माझे समाधान कर; नाही तर स्वतःला ‘ राम ‘ म्हणवून घेणे सोडून दे. ॥ १ ॥

छलु तजि करहि समरु सिवद्रोही । बंधु सहित न त मारउँ तोही ॥

भृगुपति बकहिं कुठार उठाएँ । मन मुसुकाहिं रामु सिर नाएँ ॥

अरे शिवद्रोह्या ! कपट सोडून माझ्याशी युद्ध कर, नाही तर भावासह तुलाही मारुन टाकतो.’ अशाप्रकारे परशुराम परशू उभारुन बडबड करीत होते आणि श्रीराम मान खाली घालून मनात हसत होते. ॥ २ ॥

गुनह लखन कर हम पर रोषू । कतहुँ सुधाइहु ते बड़ दोषू ॥   

टेढ़ जानि सब बंदइ काहू । बक्र चंद्रमहि ग्रसइ न राहू ॥

श्रीराम मनातल्या मनात म्हणत होते, अपराध लक्ष्मणाचा आणि राग माझ्यावर काढत आहेत. कधी कधी सरळपणामध्येही मोठा दोष असतो. वाकडा असणार्‍या कुणालाही सर्वजण नमस्कार करतात. वाकड्या चंद्राला राहूसुद्धा ग्रासत नाही. ॥ ३ ॥

राम कहेउ रिस तजिअ मुनीसा । कर कुठारु आगें यह सीसा ॥ 

जेहिं रिस जाइ करिअ सोइ स्वामी । मोहि जानिअ आपन अनुगामी ॥

श्रीरामांनी उघडपणे म्हटले, ‘ हे मुनीश्र्वर ! राग सोडून द्या. तुमच्या हाती कुर्‍हाड आहे आणि माझे शिर समोर आहे. हे स्वामी, ज्यामुळे तुमचा राग शांत होईल, ते करा. मला आपला दास समजा. ॥ ४ ॥

दोहा—प्रभुहि सेवकहि समरु कस तजहु बिप्रबर रोसु ।

बेषु बिलोकें कहेसि कछु बालकहु नहिं दोसु ॥ २८१ ॥

स्वामी आणि सेवक यांच्यांत युद्ध कसले ? राग सोडा. तुमचा वीरवेष पाहूनच हा मुलगा काही बोलला. खरे तर यात त्याचाही काही दोष नाही. ॥ २८१ ॥

देखि कुठार बान धनु धारी । भै लरिकहि रिस बीरु बिचारी ॥

नामु जान पै तुम्हहि न चीन्हा । बंस सुभायँ उतरु तेहिं दीन्हा ॥

आपल्याकडे कुर्‍हाड व धनुष्यबाण पाहून आपण वीर आहात, असे बाळ लक्ष्मणाला वाटले. त्यामुळे त्याला राग आला. तुमचे नाव त्याने ऐकले होते, पण तुम्हांला त्याने ओळखले नाही. त्यामुळे आपल्या रघुवंशाच्या स्वभावाप्रमाणे त्याने उत्तर दिले. ॥ १ ॥

जौं तुम्ह औतेहु मुनि की नाईं । पद रज सिर सिसु धरत गोसाईं ॥

छमहु चूक अनजानत केरी । चहिअ बिप्र उर कृपा घनेरी ॥

जर तुम्ही मुनीसारखे आला असता, तर या मुलाने तुमच्या चरणांची धूळ शिरोधार्य केली असती. नकळत झालेल्या चुकीबद्दल क्षमा करा. ब्राह्मणांच्या मनांत मुख्यतः दया असायला हवी. ॥ २ ॥

हमहि तुम्हहि सरिबरि कसि नाथा । कहहु न कहॉं चरन कहँ माथा ॥

राम मात्र लघु नाम हमारा । परसु सहित बड़ नाम तोहारा ॥

हे नाथा, आमची-तुमची बरोबरी कसली ? कुठे चरण व कुठे मस्तक, सांगा ना ? कुठे माझे फक्त ‘ राम ‘ असे छोटेसे  नाव आणि कुठे तुमचे परशूसह मोठे नाव. ॥ ३ ॥

देव एकु गुनु धनुष हमारें । नव गुन परम पुनीत तुम्हारें ॥

सब प्रकार हम तुम्ह सन हारे । छमहु बिप्र अपराध हमारे ॥

हे देव, आमच्याजवळ एकच गुणयुक्त ( दोरी असलेले ) धनुष्य आहे, आणि तुमचे तर परम पवित्र शम, दम, तप, शौच, क्षमा, सरलता , ज्ञान, विज्ञान आणि आस्तिकता हे नऊ गुण, आम्ही सर्व प्रकारेतुमच्यासमोर पराजित आहोत. हे विप्र, आमच्या अपराधांना क्षमा करा. ॥ ४ ॥

दोहा—बार बार मुनि बिप्रबर कहा राम सन राम ।

बोले भृगुपति सरुष हसि तहूँ बंधु सम बाम ॥ २८२ ॥

श्रीरामांनी परशुरामांना वारंवार ‘ मुनि ‘ व ‘ विप्रवर ‘ असे म्हटले. तेव्हा भृगुपती परशुराम रागावून म्हणाले, ‘ तू सुद्धा आपल्या भावासारखा वाकडाच आहेस. ॥ २८२ ॥

निपटहिं द्विज करि जानहि मोही । मैं जस बिप्र सुनावउँ तोही ॥

चाप स्त्रुवा सर आहुति जानू । कोपु मोर अति घोर कृसानू ॥ 

तू मला निव्वळ ब्राह्मणच समजतोस ? मी कसा ब्राह्मण आहे, ते सांगतो. माझे धनुष्यही स्त्रुवा, बाण ही आहुती आणि माझा क्रोध हा अत्यंत भयानक अग्नी आहे. असे समज. ॥ १ ॥

समिधि सेन चतुरंग सुहाई । महा महीप भए पसु आई ॥

मैं एहिं परसु काटि बलि दीन्हे । समर जग्य जप कोटिन्ह कीन्हे ॥

चतुरंगिणी सेना या समिधा आहेत. मोठमोठे राजे यज्ञातील पशू आहेत. परशूने कापून मी त्यांचा बळी दिला आहे. असे कोट्यावधी जपयुक्त रणयज्ञ मी केलेले आहेत. ( अर्थात ज्याप्रमाणे मंत्रोच्चारपूर्वक ‘ स्वाहा ‘ म्हणून आहुती दिली जाते, त्याप्रमाणे मी आवाहन करीत राजांचा बळी दिलेला आहे. ) ॥ २ ॥

मोर प्रभाउ बिदित नहिं तोरें । बोलसि निदरि बिप्र के भोरें ॥

भंजेउ चापु दापु बड़ बाढ़ा । अहमिति मनहुँ जीति जगु ठाढ़ा ॥

माझा प्रभाव तुला माहीत नाही. त्यामुळे तू ब्राह्मण म्हणून माझा अनादर करीत आहेस. धनुष्य मोडलेस, त्यामुळे तुला मोठी घमेंड आली आहे. जणू जग जिंकून उभा ठाकल्याप्रमाणे तुझा अहंकार वाढलेला आहे.  ॥ ३ ॥

राम कहा मुनि कहहु बिचारी । रिस अति बड़ि लघु चूक हमारी ॥

छुअतहिं टूट पिनाक पुराना । मैं केहि हेतु करौं अभिमाना ॥

श्रीरामचंद्र म्हणाले, ‘ हे मुनी, विचार करुन बोला. तुमचा क्रोध फार मोठा आहे आणि माझी चूक फार छोटी आहे. धनुष्य जीर्ण होते, हात लावताच ते मोडले. त्यात मी कशाला अभिमान धरु ? ॥ ४ ॥

जौं हम निदरहिं बिप्र बदि सत्य सुनहु भृगुनाथ ।

तौ अस को जग सुभटु जेहि भय बस नावहिं माथ ॥ २८३ ॥

हे भृगुनाथ, जर आम्ही ब्राह्मण म्हणून ( तुमचा ) अपमान करीत असू, तर सत्य ऐका. जगात असा कोणता योद्धा आहे, ज्याच्या भयाने आम्ही त्याच्यापुढे मस्तक नमवावे ? ॥ २८३ ॥

देव दनुज भूपति भट नाना । समबल अधिक होउ बलवाना ॥

जौं रन हमहि पचारै कोऊ । लरहिं सुखेन कालु किन होऊ ॥

देव, दैत्य, राजा किंवा पुष्कळसे योद्धे हे बळाने आमच्या बरोबरीचे असोत किंवा आमच्यापेक्षा जास्त बलवान असोत, जर कुणीही आम्हांला युद्धासाठी ललकारले, तर आम्ही आनंदाने त्याच्याशी लढू. मग तो काळ का असेना ? ॥ १ ॥

छत्रिय तनु धरि समर सकाना । कुल कलंकु तेहिं पावँर आना ॥

कहउँ सुभाउ न कुलहि प्रसंसी । कालहु डरहिं न रन रघुबंसी ॥

क्षत्रियशरीर धारण करुन युद्धाला जो घाबरला, त्या नीच पुरुषाने आपल्या कुळाला कलंक लावला. मी हे स्वाभाविकपणे म्हणतो, कुळाची प्रशंसा म्हणून नव्हे, रघुवंशी युद्धामध्ये मृत्यूलाही घाबरत नाहीत. ॥ २ ॥

बिप्रबंस कै असि प्रभुताई । अभय होइ जो तुम्हहि डेराई ॥

सुनि मृदु गूढ़ बचन रघुपति के । उघरे पटल परसुधर मति के ॥

ब्राह्मणवंशाचा असा महिमा आहे की, जो तुम्हांला घाबरतो, तो निर्भय होतो.’ श्रीरघुनाथांचे कोमल व गूढ वचन ऐकून परशुरामांच्या बुद्धीवरील अज्ञानाचा पडदा दूर झाला. ॥ ३ ॥

राम रमापति कर धनु लेहू । खैंचहु मिटै मोर संदेहू ॥

देत चापु आपुहिं चलि गयऊ । परसुराम मन बिसमय भयऊ ॥

परशुराम म्हणाले, ‘ हे राम, हे लक्ष्मीपतीचे धनुष्य हाती 

धरा आणि ओढा, म्हणजे माझा संशय दूर होईल.’ 

परशुराम जेव्हा धनुष्य देऊ लागले, तेव्हा ते आपोआप 

श्रीरामांच्या हाती गेले. परशुरामांना मनातून आश्र्चर्य 

वाटले. ॥ ४ ॥



Custom Search