Sunday, October 6, 2019

Kahani Mahalaxmichi कहाणी महालक्ष्मीची

Kahani Mahalaxmichi
Kahani Mahalaxmichi is in Marathi. It is a story of Mahalaxmi Vrata. Psrforming this Vrata. many people have received the blessings of Mahalaxmi. And they become happy, wealthy and healthy.
कहाणी महालक्ष्मीची
कहाणी महालक्ष्मीची
आटपाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करीत होता. त्याला दोन राण्या होत्या.एक राणी आवडती होती, दुसरी नावडती होती. आवडत्या राणीचे नां होते पाटमाधवराणी. तर नावडतीचे नाव होते, चिमादेवराणी. राज्याच्या शत्रुचे नाव होते, नंदनबनेश्र्वर. त्याला काही अंतिद्रिय शक्ती मिळाल्या होत्या. कधी तो हवेत उडत असे तर कधी पाण्यांत बुडी मारत असे. कधी अंतराळांत तर कधी पाताळांत जाई. तो राजाला फार त्रास देतअसे. त्यामुळे राजा त्रासून गेला व त्याची तब्बेत बिघडली. 
एके दिवशी राजाने सर्व प्रजाजनांना बोलावले आणि नंदनबनेश्र्वरला मारुन टाकण्याची आज्ञा दिली. सर्व लोक त्याला शोधू लागले. त्या गावांत एक म्हातारी राहात होती. तिचा मुलगा तिला म्हणू लागला, आई, आई मला भाकरी दे. मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. म्हातारी म्हणाली बाबा रे तू गरिबाचा पोर. चार पावले पुढे जा. झाडाआड वाळली भाकरी खा. म्हणजे लोक तुला हसणार नाहीत. पोरांन बर म्हणून म्हटले. म्हातारीने भाकरी दिली. म्हातारीचा पोर भाकरी घेऊन निघाला. सगळ्यांच्या पुढे गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. सर्व लोक घरी आले. त्यांना नंदनबनेश्र्वर काही सापडला नाही. त्यामुळे राजाला मोठी काळजी लागली. म्हतातरीचा पोर मात्र तिथेच राहीला होता. 
पुढे मध्यरात्री काय झाले ? नागकन्या, देवकन्या तिथे आल्या. महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या. पोराने विचारले, बाई, बाई ह्यांन काय होत ? त्यांनी सांगितले, पडले, झडले, सापडते. मनीं चिंतीलेले कार्य होते. इतके ऐकल्यावर तोही त्यांच्याबरोबर महालक्ष्मीचा वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरी जातीजागती झाली. तसा नागक्न्या, देवकन्यांनी आशीर्वाद मागितला. तसाच ह्या मुलानेही मागितला. तसा देवीने त्याला आशीर्वाद दिला, राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल. माडीशी माडी बांधील, नवलवाट नांव ठेवील. तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणांत मरुन पडेल. असे म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरी आला. 
दुसर्‍या दिवशी राणी नेहमीप्रमाणे पहाटेस उठली.परसांत आली. राजाचा वैरी मेलेला पाहून तिला आनंद झाला. तशी ही गोष्ट तिने राजाला जाऊन सांगितली. राजाने चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांत मागे होता. त्यानेच ह्याला मारले असेल, असे लोकांनी राजाला सांगितले. राजाने त्याला बोलावून घेतले. म्हातारीचा पोर आला, त्याने राजाला विचारले, महाराज आळ नाही केला, अन्याय नाही केला. मला इथे कां बोलावले ? राजा म्हणाला भिऊ नकोस, घाबरु नकोस. माझा वैरी नंदनबनेश्र्वरला कोणी मारले? सगळे लोक तुझे नां कां सांगतात ? राजाला तो पोर म्हणाला, राजा मी मारले नाही, पण तो देवीने मला दिलेल्या वराने मेला. 
राजाने त्याला विचारले, ती देवी कोणती व तुला ती कोठे भेटली ? पोर म्हणाला सगळ्यांच्या मागून निघालो. नंतर त्यांच्या थोडा पुढे गेलो. शिळी भाकर झाडाआड करुन खाल्ली. येता येता रात्र झााली. झाडाखाली वस्ती केली. रात्री नागकन्या, देवकन्या तिथे आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. मी त्याची माहीती घेतली आणि महालक्ष्मीची पूजा केली. महालक्ष्मीने सर्वांना वर व आशीर्वाद दिला तसा मलाही दिला. राजाने विचारले तुला आशीर्वाद काय मिळाला ? पोरगा म्हणाला, मला आशीर्वाद मिळाला की, राजाचा शत्रू राजाच्य अंगणांत उद्या सकाळी मरुन पडेल. तुला अर्ध राज्य मिळेल. अर्ध भांडार मिळेल. माडीशी माडी बांधीन. नवलवाट नांव ठेवीन. असे सांगून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तरपूजा केली. मी तातू घेऊन घरी आलो. राजाने सर्व हकीगत ऐकली. त्याने पोराला अर्ध राज्य दिल, अर्ध भांडार दिले. माडीशी माडी बांधून दिली. नवलवाट नांव ठेवले.पुढे म्हातारीचा मुलगा आनंदाने म्हातरीला सुखांत ठेवून राहू लागला.
ही बातमी राजाच्या आवडत्या पाटमाधव राणीला समजली. तिने नवलवाटाला बोलावून घेतले आणि महालक्ष्मीचा वसा कसा वसावा असे विचारले. त्याने तिला तातू दाखविला. तिला सांगितले, आश्र्विन महिना येईल. पहिली अष्टमीला सोळा सुताचा तातू, तेल, हळद लावून करावा. सोळा दूर्वा, सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. सोळा अर्घ्य द्यावी. मग धूप दिप दाखवावा. नैवेद्य दा खवून कहाणी करावी. ज्यास हा वसा घेणे असेल त्याने तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणे प्रत्येक आश्र्विन महिन्यांत करावे. राणीने वसा समजून घेतला व ती व्रत करु लागली. 
पुढे एके दिवशी राजा राणीच्या महाली आला. राणीबरोबर सारीपाट खेळता खेळता त्याने राणीने बांधलेला तातू पाहिला. राजा म्हणाला माझे घरी, हारे बहु, दोरे बहु, कांकणे बहु, कळावे बहु व्रताचे सुत तोडून टाक. मला ह्याची गरज नाही. सकाळी दासी बटकी महाल झाडू लगल्या. त्यांना तातू सापडला. त्यांनी तो नवलवाटाला नेऊन दिला. त्याला राणीचा राग आला. इतक्यांत त्याला राजाची नावडती राणी, चिमादेवराणी भेटली. तिने तो तातू मागितला. नवलवाट म्हणाला उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील. ती म्हणाली उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तसा त्याने तातू तिला दिला आणि वसा सांगितला. 
पुढे आश्र्विन महिना आला. देवी महालक्ष्मीने म्हातारीचे सोंग घेतले. पाट माधवराणीचे महाली आली. महालक्ष्मी व्रताची तिला आठवण आहे का नाही, ते पाहू लागली. घरांत तिला काहीच तयारी दिसेना. तेव्हा ती म्हातारी पाट माधवराणीला विचारु लागली, अग पाट माधवराणी, पोरांची आई, आज तुझ्या घरी काय आहे?  राणीने तिला सांगितले, आज माझ्या घरी कांही नाही. तेव्हा राणीला ती म्हातारी म्हणाली, अग म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल. राणीने उत्तर दिले, म्हातारीला तांब्याभर पाणी दिले तर माझ्या राज्याला पुरणार नाही. म्हातारीने पुन्हा राणीला हाक मारली व सांगितले की, अग म्हातारीला दही-भाताची शिदोरी देशील तर राज्याला पुरे होईल. राणी म्हणाली म्हातारीला जर दही-भाताची शिदरी दिली तर माझ्या राज्याला पुरणार नाही. म्हातारीला राग आला. तीने राणीला शाप दिला, की सवतीच्या न्हाणी डाराडुरी करीत असशील. अर्धे अंग बेडकाचे, अर्धे अंग मनुष्याचे अशी होऊन पडशील. राणीने ऐकले व खदाखदा हसली. 
पुढे म्हातारी चिमणादेवीच्या महाली आली. इकडे तिकडे तिला गडबड दिसली. तीला पूजेची सामुग्री दिसली. एकीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला दिसला. तिने चिमादेवराणीला विचारले, अग अग पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? तिला राणीने उत्तर दिले. आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली महालक्ष्मी म्हणतात, तीच मी. राणी म्हणाली कसे ओळखावे ? कसे जाणावे ? तो ती म्हातारी सकाळी कुंवारीण झाली. दुपारी सवाशीण आणि संध्याकाळी पोक्त बाई झाली. अशा तिन्ही कळा म्हातारीने राणीला दाखविल्या. नंतर राणी तिला घरांत घेऊन आली. न्हावू माखू घातले. पीतांबर नेसायला दिला. राणीने व नवलवाटाने तिची पूजा केली. नंतर संध्याकाळी दोघे घागरी फुंकु लागली. तसा घागरीचा आवाज राजाच्या कानावर पडला. धुपाचा वास महालांत आला. त्याने शिपायांना नावडतीच्या महाली जाऊन माहीती काढन्यास सांगितले. शिपायांनी राजास येऊन सां गितले की महालक्ष्मीची पूजा नावडतीच्या महाली चालू आहे. राजा मग तिथे आला. चिमादेवराणीने राजाला पंचारती ओवाळली व मंदिरांत घेऊन गेली. दोघे सारीपाट खेळू लागली. पहाट झाली. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरात जातीजागती झाली. तशी राणीने नमस्कार करुन तिच्याकडेा आशीर्वाद मागितला. महालक्ष्मी म्हणाली, तुला राजा सकाळी घेऊन जाईल. तुझी सवत तुझ्या न्हाणी बेडूक बनून राहील, तीच अर्ध अंग मनुष्याचे व अर्धे बेडकाचे अशी पडून राहील. चिमादेव राणीने महालक्ष्मीची विनवणी केली की तिला एवढा कडक शाप देऊ नये. तशी महालक्ष्मीने सांगितले की, ठिक आहे मग राजा तीला बारा वर्षे वनांत धाडेल. असे म्हणून देवी अदृश्य झाली. 
     उजाडल्यावर राजाने चिमादेवराणीला रथांत घातले. वाड्यासमोर घेऊन आला. पाट माधवराणीला निरोप पाटविला की राजा राणीला घेऊन येत आहे. तिला तूं सामोरी ये. पाट माधवराणी जुनेरे नेसून केस मोकळे सोडून मळवट भरुन डोक्यावर खापर घेऊन ओरडत आरडत सामोरी आली. राजाने विचारले ओरडत कोण येत आहे. भूत आहे की खेत आहे? शिपायाने सांगितले की भूत नाही खेत नाही. तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. राजा म्हणाला तीला रानांत नेऊन मारुन टाका. असा शिपायाना त्याने हुकूम दिला. शिपायांनी पाटमाधव राणीला रानांत नेले. राजाचा हुकूम सांगितला. राणी रडू लागली. शिपाई म्हणाले बाई रडू नको. तुझ्या हातचे आम्ही खाल्ले आहे. आम्ही तुला मारत नाही. तुला सोडून देतो. पण या राज्यांत तू पुन्हा येऊ नकोस. 
पाटमाधव राणी मग तशीच फिरत फिरत एका नगरांत गेली. कुंभाराचे आळींत आली. तेथे नव्या राणीला नवा कळस घडवीत होते. कळस काहीं उतरेना. चौकशी केली आळींत नवे माणूस कोण आले आहे ? तो ही सापडली त्यांनी तिला हाकून पिटून लावली. कासाराच्या आळींत आली. तिथे नव्या राणीला नवा चूडा करीत होते. पण एकही चूडा उतरेना. चौकशी केली, आळींत नवे कोण आले आहे ? ही सापडली. हीला हाकून, पिटून घालवून दिली. तिथून निघून ती सोनाराच्या आळींत आली. तिथे नव्या राणीला नवा दागिना घडवित होते. दागिना उतरेना तेव्हा चौकशी केली की, नविन माणूस कोण आले आहे ? ही सापडली. हीला तेथूनही हाकून पिटून घालवून लावली. 
नंतर ती साळ्याच्या आळींत गेली. तेथे नव्या राणीला नवा साडा विणीत होते. पण एकही साडा उतरेना. मग त्यांनी चौकशी केली नविन माणूस कोण आले आहे ? तो ही सापडली. मग तेथूनही हीला हाकून पिटून घालवून लावले.

मग जाता जाता हीला एका ऋषींची गुंफा दिसली. तिथे गेली ऋषी ध्यानमग्न होते. ती तेथेच राहीली. ऋषी स्नानास गेले की, ही कुटीची झाडसारण करुं लागली. पूजेचे मांडून ठेवू लागली. अशी तिथे तिने बारा वर्षे सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले. ते म्हणाले, येथे झाडसारण कोण करते त्याने पुढे यावे. तशी ही पुढे आली व ऋषींना नमस्कार करुन सुरवातीपासूनची आपली सर्व हकीगत तीने त्यांना सांगितली. ऋषींना तीच्यावर महालक्ष्मीचा कोप झाला आहे हे अंतर्ज्ञानाने समजले. मग त्यांनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवून घेतली. घागर फुंकरुन घेतली. पहाटे महालक्ष्मी माय कोल्यापुरी जातीजागती झाली, तसा राणीने आशीर्वाद मागितला. तेव्हां देवीने तिला उःशाप दिला. सांगितले की ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव. चंदनाची उटी ठेव. फराळाची तयारी कर. कापुरी विडा ठेव. वाळ्याचा पंखा ठेव. त्याला सगळ्याला तुझ्या हातचा वास येऊ दे. राजा येथे आज उद्या येईल. तो तहानलेला असेल. शिपाई पाण्याच्या शोधांत येथे येतील. इथली सर्व तयारी बघून राजाला घेऊन येथे येतील. राजा आला. त्याने पाय धुतले. पोटभर फराळ केला. पाणी प्याला. कापुरी विडा खाल्ला. त्याने शिपायांना विचारले. या सर्वाला पाट माधवराणीच्या हातचा वास कसा आला. शिपाई म्हणाले अभय असेल तर सांगतो. राजाने त्यांना अभय दिले. शिपायांनी सामगितले की, आम्ही पाट माधवराणीला न मारता रानांत सोडून दिले. हे ऐकून राजाने त्यांना तीचा शोध करण्यास सांगितले. ऋषींच्या गुंफेत ती सापडली. राजाला घेऊन ते तेथे आले. राजाने ऋषींचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार केला. ऋषींनी सर्व हकीगत राजाला सांगितली व राणीला महालक्ष्मीने दिलेला उःशापही सांगितला. मग ऋषींनी त्या दोघांना बोध केला व आशीर्वाद दिला. राजा राणीला रथांत बसवून नगरांत घेऊन आला. चिमादेवराणीला निरोप दिला की, राणीला घेऊन येत आहे. सामोरी ये. चिमादेवी साज श्रृंगार करुन पंचारती घेऊन आली. नंतर राजा दोघींसह सुखाने राज्य करु लागला. महालक्ष्मी मातेने जसा नवलवाटला, चिमादेवीला आशीर्वाद देऊन सुख-समृद्धी देऊन त्यांचे मनोरथ पूर्ण केले व पाटमाधवराणीलाही उःशाप देऊन सुखी केले तसे महालक्ष्मी माता तुमचे आमचेही मनोरथ पूर्ण करुन आम्हालाही सुखी, समृद्धी करो. ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.                                     

Custom Search

No comments: