Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग ५९. Show all posts
Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग ५९. Show all posts

Saturday, November 14, 2020

ShriRamcharitmans Part 59 श्रीरामचरितमानस भाग ५९

 

ShriRamcharitmans Part 59 
Doha 268 to 271 
श्रीरामचरितमानस भाग ५९ 
दोहा २६८ ते २७१ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—सांत बेषु करनी कठिन बरनि न जाइ सरुप ।

धरि मुनितनु जनु बीर रसु आयउ जहँ सब भूप ॥ २६८ ॥

वेष शांत, परंतु कृती मात्र उग्र. त्या सर्व राजांच्या सभेत वीर-रसच जणु शरीर धारण करुन प्रकट झाला होता. ॥ २६८ ॥

देखत भृगुपति बेषु कराला । उठे सकल भय बिकल भुआला ॥

पितु समेत कहि कहि नीज नामा । लगे करन सब दंड प्रनामा ॥

परसुरामांचे ते उग्र रुप पाहून सर्व राजे भयाने व्याकूळ होऊन उठून उभे राहिले आणि आपल्या पित्याचे नाव घेत आपली ओळख देऊन दंडवत करु लागले. ॥ १ ॥

जेहि सुभायँ चितवहिं हितु जानी । सो जानइ जनु आइ खुटानी ॥

जनक बहोरि आइ सिरु नावा । सीय बोलाइ प्रनामु करावा ॥

त्यांनी आपुलकीने सहजपणे कोणाकडे पाहिले तरी त्याला वाटे की आता आपला काळ आला. नंतर जनक राजांनी येऊन ( परशुरामांच्या चरणांवर ) मस्तक ठेवले आणि जानकीला बोलावून प्रणाम करायला लावला. ॥ २ ॥

आसिष दीन्ही सखीं हरषानीं । निज समाज लै गईं सयानीं ॥

बिस्वामित्रु मिले पुनि आई । पद सरोज मेले दोउ भाई ॥

परशुरामांनी सीतेला आशीर्वाद दिला. सख्यांना आनंद झाला आणि ( आता तेथे आणखी थांबणे योग्य न समजून ) त्या चतुर सख्या सीतेला घेऊन आपल्या मंडळींमध्ये गेल्या. नंतर विश्र्वामित्र येऊन भेटले व त्यांनी दोन्ही भावांना परशुरामांच्या चरणी घातले. ॥ ३ ॥

रामु लखनु दसरथ के ढोटा । दीन्ही असीस देखि भल जोटा ॥

रामहि चितइ रहे थकि लोचन । रुप अपार मार मद मोचन ॥

विश्र्वामित्र म्हणाले, ‘ हे राम व लक्ष्मण राजा दशरथांचे पुत्र आहेत. ‘ त्यांची सुंदर जोडी पाहून परशुरामांनी आशीर्वाद दिला. कामदेवाचा अहंकार उतरविणारे श्रीरामांचे अपार लावण्य पाहून त्यांचे नेत्र थक्क झाले. ॥ ४ ॥

दोहा—बहुरि बिलोकि बिदेह सन कहहु काह अति भीर ।

पूँछत जानि अजान जिमि ब्यापेउ कोपु सरीर ॥ २६९ ॥

नंतर सर्व पाहून व जाणूनही काहीच माहीत नसल्यासारखे त्यांनी विचारले, सांगा, ही मोठी गर्दी कसली जमली आहे ? ‘ हे विचारताना ते संतापले होते. ॥ २६९ ॥

समाचार कहि जनक सु नाए । जेहि कारन महीप सब आए ॥

सुनत बचन फिरि अनत निहारे । देखे चापखंड महि डारे ॥

राजा जनकांनी सर्व राजे लोक कशासाठी आले होते, तो वृत्तांत सांगितला. जनकांचे बोलणे ऐकून परशुरामांनी वळून दुसरीकडे पाहिले, तर धनुष्याचे तुकडे जमिनीवर पडलेले दिसले. ॥ १ ॥

अति रिस बोले बचन कठोरा । कहु जड़ जनक धनुष कै तोरा ॥

बेगि देखाउ मूढ़ न त आजू । उलटउँ महि जहँ लहि तव राजू ॥

अत्यंत क्रोधाने व कठोर शब्दात ते म्हणाले, ‘ अरे, मूर्ख जनका, धनुष्य कोणी मोडले ? ते सांग. मला तो तत्काळ दाखव, नाही तर मूर्खा, जितके तुझे राज्य आहे, तितकी पृथ्वी मी उलथून टाकीन, ‘ ॥ २ ॥

अति डरु उतरु देत नृपु नाहीं । कुटिल भूप हरषे मन माहीं ॥

सुर मुनि नाग नगर नर नारी । सोचहिं सकल त्रास उर भारी ॥

राजा घाबरला, त्यामुळे उत्तर देऊ शकला नाही. ते पाहून दुष्ट राजे मनातून खूष झाले. देव, नाग, मुनी, आणि नगरातील स्त्री-पुरुष काळजीत पडले. सर्वांच्या मनात भयंकर भीती होती. ॥ ३ ॥

मन पछिताति सीय महतारी । बिधि अब सँवरी बात बिगारी ॥

भृगुपति कर सुभाउ सुनि सीता । अरध निमेष कलप सम बीता ॥

सीतेची आई मनात पश्र्चात्ताप करु लागली की, ‘ अरेरे, विधात्याने सगळे जुळून आलेले बिघडवून टाकले. ‘ परशुरामांचा स्वभाव ऐकून सीतेला अर्धा क्षणही कल्पासारखा वाटू लागला. ॥ ४ ॥

दोहा—सभय बिलोके लोग सब जानि जानकी भीरु ।

हृदयँ न हरषु बिषादु कछु बोले श्रीरघुबीरु ॥ २७० ॥

तेव्हा श्रीरामचंद्रांनी सर्व लोकांना भयभीत झालेले पाहून व सीतेला घाबरलेली बघून म्हटले, त्यावेळी त्यांच्या मनात हर्ष नव्हता की विषाद नव्हता. ॥ २७० ॥

मासपारायण, नववा विश्राम

नाथ संभुधनु भंजनिहारा । होइहि केउ एक दास तुम्हरा ।

आयसु काह कहिअ किन मोही । सुनि रिसाइ बोले मुनि कोही ॥

‘ हे नाथ, शिवांचे धनुष्य मोडणारा कुणी तुमचा दासच असणार. काय आज्ञा आहे ? मला का नाही विचारत ? हे ऐकून क्रुद्ध मुनी रागारागाने म्हणाले, ॥ १ ॥

सेवकु सो जो करै सेवकाई । अरि करनी करि करिअ लराई ॥

सुनहु राम जेहिं सिवधनु तोरा । सहसबाहु सम सो रिपु मोरा ॥

‘ जो सेवेचे काम करतो, तो सेवक असतो. शत्रूसारखे काम केल्यावर युद्धच केले पाहिजे. हे रामा, ऐक. ज्याने शिवांचे धनुष्य मोडून टाकले, तो सहस्रार्जुनासारखा माझा शत्रू होय. ॥ २ ॥       

सो बिलगाउ बिहाइ समाजा । न त मारे जैहहिं सब राजा ॥

सुनि मुनि बचन लखन मुसुकाने । बोले परसुधरहि अपमाने ॥

ज्याने हे केले आहे त्याने या समाजातून बाजूला व्हावे, नाहीतर सर्व राजे मारले जातील.’ मुनींचे बोलणे ऐकून लक्ष्मणाने स्मित केले आणि परशुरामांचा अपमान करण्यासाठी तो म्हणाला, ॥ ३ ॥

बहु धनुहीं तोरीं लरिकाईं । कबहुँ न असि रिस कीन्हि गोसाईं ॥

एहि धनु पर ममता केहि हेतु । सुनि रिसाइ कह भृगुकुलकेतू ॥

महाराज, लहानपणी आम्ही अशा पुष्कळ धनुकल्या मोडल्या आहेत, परंतु तेव्हा तुम्ही कधी असे रागावला नाही ? या धनुष्याबद्दल तुम्हांला एवढी ममता का वाटते ? हे ऐकून भृगुवंशाला ध्वजास्वरुप असलेले परशुराम तावातावाने बोलू लागले, ॥ ४ ॥

दोहा—रे नृप बालक काल बस बोलत तोहि न सँभार ।

धनुही सम तिपुरारि धनु बिदित सकल संसार ॥ २७१ ॥

‘ अरे राजपुत्रा, कालाला वश झाल्यामुळे तुला बोलण्याचीसुद्धा शुद्ध उरली नाही. सार्‍या जगात प्रसिद्ध असलेले शिवांचे धनुष्य काय धनुकलीप्रमाणे आहे ? ‘ ॥ २७१ ॥

लखन कहा हँसि हमरें जाना । सुनहु देव सब धनुष समाना ॥

का छति लाभु जून धनु तोरें । देखा राम नयन के भोरें ॥

लक्ष्मण हसत म्हणाला, ‘ हे देवा, ऐका. आमच्या लेखी सर्व धनुष्ये एकसारखीच आहेत. जुने धनुष्य मोडले, त्यात हानि-लाभ कसला ? श्रीरामचंद्रांना हे नवीन असल्याचे वाटले होते. ॥ १ ॥

छुअत टूट रघुपतिहु न दोसू । मुनि बिनु काज करिअ कत रोसू ॥

बोले चितइ परसु की ओरा । रे सठ सुनेहि सुभाउ न मोरा ॥

मग स्पर्श करताच हे मोडून गेले. यात श्रीरघुनाथांचा काय दोष ? मुनी तुम्ही विनाकारण का रागावता ? परशुरामांनी आपल्या कुर्‍हाडीकडे पाहात म्हटले,’ अरे दुष्टा, तू माझा स्वभाव ऐकलेला नाहीस ? ॥ २ ॥

बालकु बोलि बधउँ नहिं तोही । केवल मुनि जड़ जानहि मोही ॥

बाल ब्रह्मचारी अति कोही । बिस्व बिदित छत्रियकुल द्रोही ॥

तुला मी बालक समजून मारत नाही. अरे मूर्खा, तू मला फक्त मुनी समजतोस काय ? मी बालब्रह्मचारी आणि अत्यंत क्रोधी आहे. क्षत्रियकुलाचा शत्रू म्हणून मी जगात विख्यात आहे. ॥ ३ ॥

भुजबल भूमि भूप बिनु कीन्ही । बिपुल बार महिदेवन्ह दीन्ही ॥

सहसबाहु भुज छेदनिहारा । परसु बिलोकु महीपकुमारा ॥

आपल्या बाहुबलाने मी पृत्वी राजारहित केली आहे आणि पुष्कळ वेळा ती ब्राह्मणांना दान दिलेली आहे. हे राजकुमारा, सहस्रबाहुच्या भुजा तोडून टाकणारी ही माझी कुर्‍हाड बघ. ॥ ४ ॥




Custom Search