Showing posts with label Shri Dnyaneshwari. Show all posts
Showing posts with label Shri Dnyaneshwari. Show all posts

Friday, October 1, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 20 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग २०

 

Shri Dnyaneshwari
Adhyay 9 Part 20
Ovya 517 to 535
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग २० 
ओव्या ५१७ ते ५३५

मूळ श्लोक

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।

मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण: ॥ ३४ ॥

३४) माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो, माझा भक्त

 हो; माझें यजन करणारा हो, ( सर्वत्र ) मला ( एकाला )

 वंदन कर. अशा रीतीनें मत्परायण होत्साता ( माझें

 ठिकाणीं ) चित्त योजल्यावर तूं माझ्याप्रतच येशील. 

तूं मन हें मीचि करीं । माझां भजनीं प्रेम धरीं ।

सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ॥ ५१७ ॥

५१७) तूं आपलें मन मद्रूप कर; माझ्या भजनाच्या ठिकाणीं प्रेम धर; आणि सर्व ठिकाणीं माझेंच स्वरुप आहे, असे समजून मला एकाला नमस्कार कर.

माझेनि अनुसंधानें देख । संकल्पु जाळणें निःशेख ।

मद्याजी चोख । याचि नांव ॥ ५१८ ॥

५१८) पाहा; जो माझ्या वेधानें संकल्प पूर्णपणें जाळतो, त्यालाच माझें चांगलें भजन करणारा म्हणावें. 

ऐसा मियां आधिला होसी । तेथ माझियाचि स्वरुपा पावसी ।

हें अंतःकरणींचें तुजपासीं । बोलिजत असे ॥ ५१९ ॥

५१९) याप्रमाणें तूं माझ्या अंतःकरणांतील ( गुह्य गोष्ट ) तुझ्याजवळ मी सांगत आहे.

अगा आवाघिया चोरिया आपुलें । जें सर्वस्व आम्हीं असे ठेविलें ।

तें पावोनि सुख संचले । होऊनि ठासी ॥ ५२० ॥

५२०) अरे, सर्वांपासून लपवून ठेवलेलें असें जें आमचें सर्व भांडवल, तें तुला प्राप्त झालें आहे त्यामुळें तूं सुखरुप होऊन राहाशील. 

ऐसें सांवळेनि परब्रह्में । भक्तकामकल्पदुमें ।

बोलिलें आत्मारामें । संजयो म्हणे ॥ ५२१ ॥

५२१) भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे कल्पतरु जे मेघश्याम परब्रह्म श्रीकृष्ण, ते असें बोलले, असें संजय म्हणाला.

अहो ऐकिजत असे कीं अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा ।

जैसा म्हैसा नुठी कां पुरा । तैसा उगाचि असे ॥ ५२२ ॥

५२२) ( ज्ञानेश्र्वरमहाराज श्रोत्यांना म्हणतात, ऐका: ) संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐकत आहां काय ? तेव्हां वृद्ध धृतराष्ट्र, ज्याप्रमाणें पाण्याच्या पुरांत असलेला रेडा हालत नाहीं त्याप्रमाणें चित्तांत कांहीहि हालचाल न होतां या बोलण्याविषयीं  निवांत असलेला दिसला.

तेथ संजयें माथा तुकिला । अहा अमृताचा पाऊस वर्षला ।

कीं हा एथ असतुचि गेला । सेजिया गांवा ॥ ५२३ ॥

५२३) त्या वेळी संजयानें मान डोलावली आणि ( आपल्याशीच ) म्हणाला, ‘ अहा ! आज अमृताची वृष्टि झाली; परंतु हा धृतराष्ट्र येथेंच असूनहि शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे.

तर्‍ही दातारु हा आमुचा । म्हणोनि हें बोलतां मैळेल वाचा ।

काइ झालें ययाचा । स्वभावोचि ऐसा ॥ ५२४ ॥

५२४) पण हा आमचा मालक आहे, त्याच्याविषयीं असें बोललें असतां वाचेस दोष लागेल; काय करावें ? याचा स्वभावच  असा आहे.

परि बाप भाग्य माझें । जें वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें ।

कोसा रक्षिलों मुनिराजें । श्रीव्यासदेवें ॥ ५२५ ॥

५२५) परंतु धन्य माझें भाग्य कीं, महामुनि व्यासदेवांनीं धृतराष्ट्राला युद्धांतील वृत्तान्त सांगावयाच्या निमित्तानें माझें कसें रक्षण केलें ! ( म्हणजे ज्ञानपूर्ण संवादश्रवणानें जन्ममृत्युपासून माझें रक्षण केलें. )    

येतुलें हें वाडें सायासें । जंव बोलत असे दृढें मानसें ।

तंव न धरवेचि आपुलिया ऐसें । सात्त्विकें केलें ॥ ५२६ ॥

५२६) मोठ्या कष्टानें मन आंवरुन धरुन, तो संजय इतकें बोलत होता तोंच अष्ट सात्त्विक भाव उत्पन होऊन, त्यांनीं संजयास असें आपल्या आधीन करुन घेतलें कीं, त्यास ते अष्ट सात्त्विक आवरुन धरवेनात.  

चित्त चाकाटलें आटु घेत । वाचा पांगुळली जेथिंची तेथ ।

आपादकंचुकित । रोमांच आले ॥ ५२७ ॥

५२७) चित्त चकित होऊन आटूं लागलें आणि वाचा जागच्या जागीं कुंठित होऊन राहिली व पायापासून मस्तकापर्यंत अंगरखा घातल्यासारखें सर्व अंगावर रोमांच आले.

अर्धोन्मीलित डोळे वर्पताति आनंदजळें ।

आंतुलिया सुखोमींचेनि बळें । बाहेरि कांपे ॥ ५२८ ॥

५२८) अर्धवट उघडलेले डोळे आनंदाचा वर्षाव करुं लागले व आंत होणार्‍या सुखाच्या लाटेच्या जोरामुळें त्यांचे बाहेरील शरीर कांपू लागलें..

पैं आघवांचि रोगमूळीं । आली स्वेदकणिका निर्मळी ।

लेइला मोतियांचीं कडियाळीं । आवडे तैसा ॥ ५२९ ॥

५२९) सर्व रोमांचांच्या बुडाशीं निर्मळ घामाचे थेंब आले, त्यामुळें जसा एखाद्यानें मोत्यांचा जाळीदार अंगरखा घालावा, तसा तो दिसूं लागला.   

ऐसा महासुखाचेनि अतिरसें । जेथ आटणी होईल जीवदशे ।

तेथें निरोविलें व्यासें । तें नेदीच ॥ ५३० ॥

५३०) याप्रमाणें महासुखाच्या भरानें जेव्हां जीवदशेचीं आटणी होण्याची वेळ आली, तेव्हां व्यासांनीं युद्धवृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा ती आटणी होऊं देईना.

आणि कृष्णार्जुनाचें बोलणें । घों करी आलें श्रवणें ।

कीं देहस्मृतीचा तेणें । वापसा केला ॥ ५३१ ॥

५३१) आणि त्यावर श्रीकृष्ण व अर्जुन यांचें बोलणें घों घों अशी गर्जना करीत संजयाच्या कानावर आलें व त्या बोलण्यानें संजयाच्या ठिकाणीं देहस्मृतीचा वाफसा केला. ( संजय देहस्मृतीवर आला. )

तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी । सर्वांगींचा स्वेदु परिमार्जी ।

तेवींच अवधान म्हणे हो जी । धृतराष्ट्रातें ॥ ५३२ ॥

५३२) तेव्हां डोळ्यांतील आनंदाश्रु त्यानें पुसले व सर्व अंगास आलेला घाम पुसून टाकला व त्याप्रमाणें ‘ महाराज लक्ष द्या ‘ असें तो धृतराष्ट्राला म्हणाला.

आतां कृष्णवाक्यबीजा निवाडु । आणि संजय सात्त्विकाचा बिवडु ।

म्हणोनि श्रोतया होईल सुरवाडु । प्रमेयपिकाचा ॥ ५३३ ॥

५३३) आतां श्रीकृष्णांची वाक्यें हीच कोणी एक उत्तम बीजें आणि त्यांस संजय हीच अष्ट सात्त्विक भावरुपी पिकाच्या बिवडाची जमीन मिळाली; त्यामुळें श्रोत्यांना प्रमेयपिकाचा सुकाळ होईल.  

अहो अळुमाळ अवधान देयावें । येतुलेनि आनंदाचिया राशीवरी बैसावें ।

बाप श्रवणेंद्रिया दैवें । घातली माळ ॥ ५३४ ॥

५३४) अहो थोडकेसें लक्ष द्यावें आणि एवढ्यानें आनंदाच्या राशीवर बसावें. धन्य आहे त्या कानांची कीं, आज त्यांस भाग्यानें माळ घातली आहे !

म्हणोनि विभूतींचा ठावो । अर्जुना दावील सिद्धांचा रावो ।

तो ऐका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥ ५३५ ॥

५३५) म्हणून ( आपल्या ) विभूतींची जीं स्थानें आहेत, ती सिद्धांचा राजा जो श्रीकृष्ण, तो अर्जुनास दाखवील. निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्र्वर म्हणतात, तो प्रसंग श्रोत्यांनी ऐकावा.

इति श्रीमद् भगवद् गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥ श्लोक ३४; ओव्या ५३५ )

ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।


Custom Search

Saturday, September 11, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 19 Ovya 497 to 516 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १९ ओव्या ४९७ ते ५१६

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 19 
Ovya 497 to 516
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग १९ 
ओव्या ४९७ ते ५१६

आतां सुखेंसि जीविता । कैंची ग्राहिकी कीजेल पांडुसुता ।

काय राखोंडी फुंकितां । दिपु लागे ॥ ४९७ ॥

४९७) आतां अर्जुना, सुखानें जगणें, हा माल येथे  खरेदी कसा करतां येईल ? राखुंडी फुंकून कधीं दिवा लागला आहे काय ?  

अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रस घेइजे पिळुनी ।

तया नाम अमृत ठेउनी । जैसें अमर होणें ॥ ४९८ ॥

४९८) अर्जुना, विषाचे कांदे वाटून जो रस निघेल, तो पिळून घ्यावा आणि त्या रसाचें नांव अमृत ठेवून ( त्याच्या सेवनानें ) ज्याप्रमाणें अमर होण्याची खात्री धरावी,

तेविं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख ।

परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥ ४९९ ॥

४९९) त्याप्रमाणें विषयांमध्यें जें सुख आहे, तें निव्वळ कडेलोटीचें दुःखच आहे. परंतु काय करावें ? लोक मूर्ख आहेत. विषयांचें सेवन केल्यावांचून त्यांचें चालतच नाहीं. 

कां शीस खांडुनि आपुलें । पायींचां खतीं बांधिलें ।   

 तैसे मृत्युलोकींचें भलें । आहे आघवें ॥ ५०० ॥

५००) किंवा आपलें मस्तक तोडून तें पायात पडलेल्या जखमेवर जसें बांधावें, तसें या मृत्युलोकांतील सर्व व्यवहार चालले आहेत.

म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचां श्रवणीं ।

कैंची सुखनिद्रा आंथरुणी । इंगळांचां ॥ ५०१ ॥

५०१) एवढ्या करितां या मृत्यु लोकांत सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानानें ऐकतां येईल काय ? निखारे असणार्‍या अंथरुणावर आनंदानें झोप कोठून येणार ?

जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागीं ।

दुःख लेऊनी सुखाची आंगी । सळित जगातें ॥ ५०२ ॥

५०२) ज्या लोकांतील चंद्र क्षयरोगानें ग्रासलेला आहे, जेथें मावळण्याकरितां ( सूर्याचा ) उदय होत असतो; ( जेथें ) दुःख हें सुखाचा पोषाख करुन जगाला सारखें छळीत आहे; 

जेथे मंगळाचां अंकुरीं । सवेंचि अमंगळाची पडे पोरी ।

म्रुत्यु उदराचां परिवरीं । गर्भु गिंवसी ॥ ५०३ ॥

५०३) जेथें मंगळरुप अंकुराबरोबरच त्यावर अमंगळ गोष्टीची कीड पडते व ( जेथें ) पोटांत असतांनाच गर्भाला मरण घेरतें;  

जें नाहीं तयांतें चिंतवी । तंव तेंचि नेईजे गंधवीं ।

गेलियाची कवणे गांवीं । शुद्धि न लभे ॥ ५०४ ॥

५०४) जे प्राप्त नाहीं त्याचें चिंतन करावयास ( मृत्युलोकची वस्ती ) लावते. ( बरें, तें प्राप्त झालें ) तेव्हां त्याच वेळीं ते गंधर्व ( अदृश्य पुरुष ) नेतात. बरें, तें घेऊन कोणाच्या गांवाला गेले त्याचा शोधहि लागत नाहीं. 

अगां गिवसितां आघवां वाटीं । परतलें पाउलचि नाहीं किरीटी ।

निमालियांचिया गोठी । तियें पुराणें जेथिंचीं ॥ ५०५ ॥

५०५) अरे अर्जुना, सर्व वाटांनीं शोध केला, तरी मृत्युच्या मुखांत गेलेल्यांचें एकहि पाऊल परत फिरलेलें दिसत नाहीं व जेथलीं पुराणें, ही सर्व गेलेल्यांच्याच गोष्टींनीं भरलेली आहेत.    

जेथींचिये अनित्यतेची थोरी । करितया ब्रह्मयाचें आयुष्यवेरी ।

कैसें नाहीं होणें अवधारीं । निपटूनियां ॥ ५०६ ॥

५०६) या मृत्युलोकाची रचना करणार्‍या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जेथील क्षणभंगुरतेचा प्रभाव जाऊन भिडतो. अर्जुना, हें नाहींसे होणें, कसें सरसकट व्यापकआहे तें नीट ऐक. 

ऐसी लोकीची जिये नांदणूक । तेथ जन्मले आथि जे लोक ।

तयांचिये निश्र्चिंतीचें कौतुक । दिसत असे ॥ ५०७ ॥

५०७) ( अशा तर्‍हेची ) ज्या लोकांतील वागणूक आहे, त्या लोकांना ज्यांनी जन्म घेतला आहे, त्या लोकांना बेफिकीरपणाचें मोठे नवल दिसलें ! 

पैं दृष्टादृष्टींचिये जोडी- । लागीं भांडवल न सुटे कवडी ।

जेथ सर्वस्वें हानि तेथ कोडी । वेंचिती गा ॥ ५०८ ॥

अरे, ज्यापासून इहपरलोकींचा लाभ होतो, त्याकरितां ( हे लोक ) एक कवडीदेखील भांडवल सोडीत नाहींत व ज्या ठिकाणीं सर्वस्वाची हानि होते, तेथे कोट्यावधि रुपये खर्च करतात.   

जो बहुवें विषयविलासें गुंफे । तो म्हणती उवायें पडिला सापें ।

जो अभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥ ५०९ ॥

५०९) जो अनेक विषयविलासांत निमग्न असतो, तो सध्या सुखांत आहे. असें म्हणतात व जो लोभाने ग्रस्त झालेला आहे त्यास या जगांत ज्ञानी म्हणतात.

जयाचे आयुष्य धाकुटें होय । बळ प्रज्ञा जिरोनि जाय ।

तयाचे नमस्कारिती पाप । वडिल म्हणोनि ॥ ५१० ॥

५१०) ज्याचें आयुष्य थोडें उरलें आहे व त्याचप्रमाणें ज्यांची  बल आणि बुद्धि हीं नाहींशीं झालीं आहेत, अशा म्हातार्‍यास वडील म्हणून नमस्कार करतात.

जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव मोजें नाचती कोडें ।

आयुष्य निमालें अंतुलियेकडे । ते म्लानीचि नाहीं ॥ ५११ ॥

५११) जसजसें मूल वयानें वाढत जातें ( वयानें मोठे होतें ) तसतसें त्याचे आईबाप वगैरे आनंदानें व कौतुकाने नाचतात. पण वरुन जरी ( तें मूल ) मोठें वाढतांना दिसलें, तरी वास्तविक पाहिलें तर आंतून ( त्याचें ) आयुष्य सरुन जात आहे, त्याची ( त्यांना ) खंतीच नाहीं.   

जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचियाचि ऐसें 

कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥ ५१२ ॥

५१२) जन्मल्यापासून दिवसेंदिवस तें मूल अधिकाधिक काळाच्या  तावडींत जातें; असें असून ( आईबाप ) आनंदानें त्याच्या वाढदिवसाचा उत्सव करतात व आनंदप्रदर्शक गुढ्याहि उभारतात.   

अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती ।

परि असवें जात न गणिती । गहिंसपणें ॥ ५१३ ॥

५१३) अरे अर्जुना, कोणी कोणाला ‘ तूं मर ‘ असें म्हटलें तर तें त्यास सहन होत नाही  आणि ( त्याच्या निवृत्तीचा उपाय न करतां ) मेल्यावर रडत बसतात. पण असलेलें आयुष्य व्यर्थ जात आहे. हे त्यांना मूर्खपणानें समजत नाही.

दर्दुर सापें गिळिजतु आहु उभा । कीं तो मासिया वेटाळी जिभा ।

तैसे प्राणिये कवणा लोभा । वाढविती तृष्णा ॥ ५१४ ॥

५१४) बेडूक सापाकडून उभा गिळला जात असतांना देखील, तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्यकरितां जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो, तशाच तर्‍हेनें प्राणी कोणत्या लोभानें तृष्णा वाढवितात कोण जाणे !     

अहा कटा हें वोखटें । मृत्युलोकींचें उफराटें ।

एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं ॥ ५१५ ॥

५१५) अरेरे ! हे वाईट आहे ! मृत्यु लोकांतील सर्वच न्याय उफराटा आहे. अर्जुना, तू जरी येथें अकस्मात् जन्मला आहेस,                                  

तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग ।

जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥ ५१६ ॥

५१६) तरी या मृत्युलोकाच्या राहाटीतून झटकन मोकळा

 हो; आणि या भक्तीच्या मार्गाला लाग कीं, त्या भक्तीच्या

 योगानें माझें निर्दोष स्वरुप पाहशील.



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 18 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १८

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 18 
Ovya 475 to 496 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग १८ 
ओव्या ४७५ ते ४९६

मूळ श्लोक

किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।

अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥ ३३ ॥

३३) तर मग पुण्यशील ब्राह्मण, भक्त असलेले आणि ऋषींप्रमाणें आचरण करणारे राजे, हे उत्कृष्ट गति पावतील, यांत नवल काय ? अनित्य व सुखहीन असा हा ( मर्त्य ) लोक प्राप्त झाला असतां, तूं माझीच भक्ति कर.

मग वर्णामाजी छत्रचामर । स्वर्ग जयांचें अग्रहार ।

मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे ॥ ४७५ ॥

४७५) मग चारहि वर्णामध्यें छत्रचामराप्रमाणें सर्वांच्या वर असलेले, ज्यांना स्वर्ग हा निर्वाहाकरितां इनाम दिलेला आहे व जे वेदांतील मंत्ररुप विद्येचें माहेरघर आहेत, असे जे ब्राह्मण,   

जेथ अखंड वसिजे यागीं । जे वेदांची वज्रांगी ।

जयाचिये दिठीचां उत्संगीं । मंगळ वाढे ॥ ४७६ ॥

४७६) जेथें ( ज्या ब्राह्मणांच्या ठिकाणी ) नेहमीं यज्ञाचें राहणें असतें, जें वेदांचे अभेद्य चिलखत आहेत, ज्यांच्या दृष्टिरुप मांडीवर कल्याणाची वाढ होत राहते;

जे पृथ्वीतळींचे देव । जे तपोवतार सावयव ।

सकळ तीर्थांसि दैव । उदयलें जे ॥ ४७७ ॥

४७७) जें या पृथ्वीवरील देव आहेत, जे मूर्तिमंत तपाचें अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आलेलें देवच आहेत,

जयांचिये आस्थेचिये वोले । सत्कर्म पाल्हाळीं गेलें ।

संकल्पें सत्य जियालें । जयांचेनि ॥ ४७८ ॥

४७८) ज्यांच्या इच्छारुप ओढीनें, चांगलें कर्म हाच कोणी वेल, तो विस्तार पावला आहे; ज्यांच्या संकल्पानें सत्य जिवंत राहिलें आहे;

जयांचेनि गा बोलें । अग्नीसि आयुष्य जाहालें ।

म्हणोनि समुद्रें पाणी आपुलें । दिधलें यांचिया प्रीती ॥ ४७९ ॥

४७९) ज्यांच्या आशीर्वादानें अग्नीचें आयुष्य वाढलें, म्हणून समुद्रानें आपलें पाणी यांच्या प्रीतीकरितां दिले;

मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती । फेडोनि कौस्तुभ घेतलां हातीं ।

मग वोढविली वक्षस्थळाची वाखती । चरणरजां ॥ ४८० ॥

४८०) मी लक्ष्मीला सारुन पलीकडे केली, गळ्यांतील कौस्तुभ काढून हातांत घेतला व मग ज्यांच्या पायधुळीकरितां छातीचा खळगा पुढें केला,

आझूनि पाउलाची मुद्रा । मी हृदयीं वाहें गा सुभद्रा ।

जे आपुलिया दैवसमुद्रा । जतनेलागीं ॥ ४८१ ॥

४८१) अर्जुना, अजूनपर्यंत ( त्या ) पावलांची खूण मी हृदयाच्या ठिकाणीं वागवीत आहें, ती मी कां वागवितों म्हणून म्हणशील, तर आपल्या षड्गुणैश्वर्यभाग्यरुप समुद्राचें रक्षक होण्याकरितां; 

जयांचा कोप सुभटा । काळाग्निरुद्राचा वसौटा ।

जयांचां प्रसादीं फुकटा । जोडली सिद्धी ॥ ४८२ ॥

४८२) अर्जुना, ज्यांचा राग हा काळाग्नि नावांच्या प्रळयकाळाच्या रुद्रदेवतेचें वसतिस्थान आहे व ज्याच्या प्रसन्नतेनें अष्ट महासिद्धि फुकट म्हणजे आनायासें प्राप्त होतात;  

ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण । आणि माझां ठायीं अतिनिपुण ।

आतां मातें पावती हें कवण । समर्थणें ॥ ४८३ ॥

४८३) याप्रमाणें पुण्याईनें पूज्य आसलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणीं अतिशय तत्पर आहेत, ते मला प्राप्त होतात, हे काय आतां निराळें सिद्ध करावयास पाहिजे ?

पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें । शिवतिले निंब होते जे जवळे ।

तिहीं निर्जीवींही देवांचीं निडळें । बैसणीं केलीं ॥ ४८४ ॥

४८४) पाहा, चंदनाच्या झाडावरुन आलेल्या वार्‍यानें स्पर्श केलेलीं लिंबाचीं झाडें, जीं चंदनाच्या जवळ होतीं, ती निर्जीव ( अचेतन ) असूनहि त्यांनीं देखील देवांच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळविली. 

मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसें मनीं कैसेनि धरावें ।

अथवा पातला हें समर्थावें । तेव्हां कायि साच ॥ ४८५ ॥ 

४८५) मग खास चंदन ती जागा मिळविणार नाहीं, असें मनांत तरी कसें आणतां येईल ? किंवा, त्यास ती जागा मिळाली आहे, हें सिद्ध केलें तरच तें खरें ठरणार, असें आहे काय ?   

जेथ निववील ऐसिया आशा । हरें चंद्रमा आध ऐसा ।

वाहिजत असे शिरसा । निरंतर ॥ ४८६ ॥

४८६)  ज्या अर्थी शंकरांनी ( हालाहल विष प्राशन केल्यानें जी आग होत होती ती ) थंड करील या आशेनें अर्धा असा चंद्र मस्तकावर निरंतर धारण केला आहे,  

तेथ निवविता आणि सगळा । परिमळें चंद्राहूनि आगळा ।

तो चंदनु केविं अवलीळा । सर्वांगीं न बैसे ॥ ४८७ ॥

४८७) त्या अर्थी थंड करणारा आणि पूर्ण व सुवासानें चंद्रापेक्षां अधिक असा जो चंदन, तो सहज सर्वांगाच्या ठिकाणीं कसा बसणर नाहीं ?  

कां रथ्योदकें जियेचिये कासे । लागलिया समुद्र जालीं अनायासें ।

तिये गंगेसि काय अनारिसें । गत्यंतर असे ॥ ४८८ ॥

४८८) अथवा रस्त्यावरील पाण्यांनीं जिचा आश्रय केला असतां, जीं ( रथ्योदकें ) अनायासानें समुद्ररुप होतात, त्या गंगेला कांहीं समुद्राशिवाय दुसरी गति आहे काय ?    

म्हणोनि राजर्षि कां ब्राह्मण । जयां गती मती मीचि शरण ।

तयां त्रिशुद्धी मीचि निर्वाण । स्थितिही मीचि ॥ ४८९ ॥

४८९) म्हणून क्षत्रिय असून ऋषि झालेले असोत किंवा ब्राह्मण असोत, ज्यांच्या क्रियेला व बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे, त्यांना निश्चयानें मीच परमगति आहे; आणि त्यांचे असणेंहि मीच आहे.

यालागीं शतजर्जरें नावे । रिगोनि केविं निश्र्चिंत होआवें ।

कैसेनि उघडिया असावें । शतवर्षी ॥ ४९० ॥

४९०) याकरितां शेकडों ठिकाणीं खिळखिळ्या झालेल्या नांवेंत बसून स्वस्थ कसें राहावें ? व शस्त्रांचा वर्षाव होत असतां उघड्या अंगानें कसें असावें ?   

अंगावरी पडतां पाषाण । न सुवावें केविं वोडण ।

रोगें दाटलिया आणि उदासपण । वोखदेंसीं ॥ ४९१ ॥

४९१) अर्जुना, अंगावर धोंडे पडत असतांना मध्यें ढाल कशी घालूं नये ! रोगानें ग्रस्त झालें असतां औषधाविषयीं बेफिकीर  कसें राहावें ? 

जेथ चहूंकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजे केविं पांडवा ।

तेविं लोकां येऊनिया सोपद्रवां । केविं न भजिजे मातें ॥ ४९२ ॥

४९२) अर्जुना, जेथे चोहोंकडून वणवा लागला आहे, तेथून बाहेर कसें पडूं नये ? त्याप्रमाणें अनेक दुःखांनीं भरलेल्या या मृत्युलोकांत येऊन, मला कसें भजूं नयें बरें ?

अगा मातें न मजावयालागीं । कवण बळ पां आपुलां आंगीं ।

काइ घरीं कीं मांगीं । निश्र्चिंती केली ॥ ४९३ ॥

४९३) अरे अर्जुना, माझें भजन न करण्याला असें आपल्या ( प्राण्यांच्या ) अंगीं कोणतें सामर्थ्य आहे ? हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिकीर झाले आहेत ? 

नातरी विद्या कीं वसया । यां प्राणियांसि हा ऐसा ।

मज न भजतां भरवंसा । सुखाचा कोण ॥ ४९४ ॥

४९४) अथवा विद्येनें अथवा तारुण्यानें हे बेपर्वा होऊन बसले आहेत ? माझें भजन न करतां असें बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे ?

तरी भोग्यजात जेतुलें । तें एक देहाचिया निकिया लागलें ।

आणि येथ देह तंव असे पडिलें । काळाचां तोंडीं ॥ ४९५ ॥   

४९५) तर जेवढे विषयमात्र म्हणून आहेत, ते सर्व एका देहाच्याच बर्‍याकरितां ( सुखाकरितां ) उपयोगांत आले आहेत ! आणि या मृत्युलोकांत देह तर काळाच्या तोंडीं पडलेला आहे !

बाप दुःखाचें केणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले ।

तिये म्रुत्युलोकींचिये शेवटिले । येणे जाहालें हाटवेळे ॥ ४९६ ॥ब

४९६) ‘ बापरे बाप ! ‘ जेथें दुःखरुपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापानें मोजला जात आहे, अशा त्या मृत्युलोकांतील ( नरदेहरुपी ) शेवटच्या बाजाराच्या वेळीं येणें झालें आहे. 

Custom Search

Sunday, June 27, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 8 Part 6 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ६

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 8 Part 6 
Ovya 137 to 159 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ६ 
ओव्या १३७ ते १५९
नातरी देहांतींचि मियां यावें । मग आपणयातें न्यावें ।
हेंही नाहीं स्वभावें । जे आधीचि मज मीनले ॥ १३७ ॥
१३७) अथवा, मरणाच्या वेळेलाच मी यावें आणि नंतर त्यांना आपणाकडे न्यावें ( म्हणजें आपल्या स्वरुपांत मिळवावें ), असें करावे लागत नाहीं, कारण ते ( भक्त ) आधीच मला सहज मिळालेलें असतात.   
येरी शरीराचां पा सलिली । असतेपण हेंचि साउली ।
वांचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रीच आहे ॥ १३८ ॥
१३८) एर्‍हवीं चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यांत झाला, तरी तें चांदणें चंद्राच्याच ठिकाणीं असतें, त्याप्रमाणें शरीररुप पाण्यांत जरी तो भक्त दिसला, तरी तो नुसता भासमात्र आहे. वास्तविक तो माझ्या स्वरुपींच आहे.   
ऐसे जे नित्ययुक्त । तयासि सुलभ मी सतत । 
म्हणऊनि देहांतीं निश्र्चित । मीचि होती ॥ १३९ ॥
१३९) याप्रमाणें जें माझ्या ठिकाणीं नित्य जडलेले असतात, त्यांना मी नेहमी जवळ आहे, म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात.  
मग क्लेशतरुची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी ।
जे मृत्युकाकासि कुरोंडी । सांडिली आहे ॥ १४० ॥
१४०) नंतर जे ( शरीर ) दुःखरुप वृझांचीबाग, व आध्यात्माचि तीन तापरुपी विस्तवाची शेगडी व मृत्युरुपी कावळ्यास उतरुन टाकलेला बळी आहे.    
जें दैन्याचें दुभतें । जें महाभयातें वाढवितें ।
जें सकळ दुःखाचें पुरतें । भांडवल ॥ १४१ ॥
१४१) जें दैन्य प्रसवणारें आहे, जें मरणाला पोसतें व जें सर्व दुःखाचे पुरे भांडवल आहे,  
जें दुर्मतीचें मूळ । जें कुकर्माचें फळ ।
जें व्यामोहाचें केवळ । स्वरुपचि ॥ १४२ ॥
१४२) जें दुष्ट बुद्धीचें उत्पत्तिस्थान व वाईट क्रियांचें फल आहे, जे केवळ मूर्तिमंत गाढ अविवेकच आहे,
जें संसाराचें बैसणें । जें विकाराचें उद्यानें ।
जें सकळ रोगांचें भाणें । वाढिलें आहे ॥ १४३ ॥
१४३) जें संसाराची बैठक आहे, जें विकाररुपी झाडांची बाग आहे व जें सर्व रोगांचें वाढलेलें ताट आहे;   
जें काळाचा खिचउशिटा । जें आशेचा आंगवठा ।
जन्ममरणाचा वोलिंवटा । स्वभावें जें ॥ १४४ ॥
१४४) जें मृत्युचें खाऊन राहिलेले अन्न आहे. जें मूर्तिमंत आशा आहे, जें जन्म व मृत्युची स्वाभाविक वाहती वाट आहे. 
जें भुलीचें भरिंव । जें विकल्पाचें वोतिंव ।
किंबहुना पेंव । विंचवाचें ॥ १४५ ॥
१४५) जें भ्रमाचें भरलेले व संशयाचें ओतलेले आहे; फार काय सांगावें ? जें विंचवाचे पेंव आहे.
जें व्याघ्राचें क्षेत्र । जे पण्यांगनेचें मैत्र ।
जें विषयविज्ञानयंत्र । सुपूजित ॥ १४६ ॥
१४६) जें शरीर, वाघाचें वसतिस्थान आहे, जें वेश्येच्या स्नेहाप्रमाणें ( दिखाऊ ) आहे; जें विषयांचा अनुभव आणून देणारें सुपूजित यंत्रच आहे, 
जें लावेचा कळवळा । निवालिया विषोदकाचा गळाळा ।
जें विश्र्वासु आंगवळा । संवचोरचा ॥ १४७ ॥
१४७) जें राक्षसीची दिखाऊ कळकळ आहे, जे निवालेल्या विषाचा घोट आहे, जें सावांचे सोंग घेतलेल्या चोराचा मिळविलेला विश्वास आहे.
जें कोढियाचें खेंव । जें कालसर्पाचें मार्दव ।
जें गोरीचें स्वभाव । गायन जें ॥ १४८ ॥
१४८) जें रक्तपित्याचें आलिंगन आहे, जेम हटकून मारणार्‍या सापाचा मऊपणा आहे व जें पारध्याचें स्वाभाविक गायन आहे;  
जें वैरियाचा पाहुणेरु । जें दुर्जनाचा आदरु ।
हें असो जें सागरु । अनर्थाचा ॥ १४९ ॥
१४९) जें शत्रूचा पाहुणचार आहे, जें दुष्ट लोकांचा सन्मान आहे; हें राहूं द्या. जें ( सर्व ) अनर्थांचा समुद्र आहे;  
जें स्वप्नीं देखिलें स्वप्न । जें मृगजळें सासिन्नलें वन ।
जें धूम्ररजांचें गगन । ओतलें आहे ॥ १५० ॥
१५०) जें ( शरीर ) स्वप्नांत पाहिलेले स्वप्न आहे, अथवा मृगजळाच्या पाण्यानें भरास आलेलें रान आहे, किंवा जें शरीर म्हणजे धुराच्या कणांचें बनविलेले आकाश आहे; 
ऐसें जें हें शरीर । तें ते पवतीची पुढती नर ।
जें होऊनि ठेले अपार । स्वरुप माझें ॥ १५१ ॥
१५१) असें ( अनर्थकारक व खोटें ) जें शरीर तें, जे पुरुष माझें अमर्याद स्वरुपच होऊन राहिलेले आहेत, त्यांस पुन्हां प्राप्त होत नाहीं. 
मूळ श्लोक
आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ १६ ॥
१६) अर्जुना, ब्रह्मलोकासकट सर्व लोकींचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत, हे कुंतीपुत्रा, परंतु मजप्रत आल्यानंतर पुनर्जन्म नाहीं.  
एर्‍हवी ब्रह्मपणाचिये भडसे । न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे ।
परि निवटलियांचे जैसे । पोट न दुखे ॥ १५२ ॥
१५२) सहजच विचार करुन पाहिलें तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी, त्यास पुनः पुनः येणारे जन्ममरणांचे फेरे चुकतच नाहीत. परंतु ज्याप्रमाणें मेलेल्या माणसाचें पोट दुखत नाहीं; 
नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नींचेनि महापूरें ।
तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ॥ १५३ ॥
१५३) अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नांतील महापुरानें बुडत नाहीं; त्याप्रमाणें जें माझ्या स्वरुपीं प्राप्त झाले, ते पुरुष संसारबंधनांत सांपडत नाहींत, 
एर्‍हवीं जगदााराचें सिरें । जें चिरस्थापीयांचे धुरे ।
ब्रह्मभुवन गा चवरे । लोकाचळाचें ॥ १५४ ॥
१५४) एर्‍हवीं जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थांमध्ये अग्रगण्य व स्वर्गदि लोकरुपी पर्वताचें शिखर जो सत्यलोक ( ब्रह्मदेवाचा लोक ); 
जिये गांवींचा पहारु दिवोवरी । एका अमरेंद्राचें आयुष्य न धरी ।
विळोनि पांती उठी एकसिरी । चवदाजणांची ॥ १५५ ॥
१५५) ज्या सत्यलोकरुपी गांवाच्या प्रहर दिवसपर्यंत एका इंद्राचें आयुष्य टिकत नाहीं, ( तर त्या गांवाच्या ) एका दिवसांत एकसारखी चौदा इंद्रांची पंगत उठते; 
मूळ श्लोक
सहस्त्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदुः ।
रात्रिं युगसहस्त्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ १७ ॥
१७) एक सहस्त्र युगें ( चार युगांच्या सहस्त्र चौकड्या ) झालीं म्हणजे संपणारा असा ब्रह्मदेवाचा एक दिवस होय; आणि एक सहस्त्र युगें राहणारी ( ब्रह्मदेवाची ) एक रात्र होय, असें जे जानतात, ते ( ब्रह्मदेवाचे ) अहोरात्र जाणणारे होत.  
जैं चोकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होय ।
आणि तेसेंचि सहस्त्रे भरिये पाहें । रात्री जेथ ॥ १५६ ॥
१५६) चार युगांच्या जेव्हां हजार फेर्‍या होतात, तेव्हां ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवसच होतो व पाहा, त्याचप्रमाणें हजार चौकड्या भरल्या म्हणजे जेथील एक रात्र होते,  
येवढे अहोरात्र जेथिंचे । तेणें न लोटती जे भाग्याचे । 
देखती ते स्वर्गींचे । चिरंजीव ॥ १५७ ॥
१५७) ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढी मोठी आहेत, त्या कालांत जे मरत नाहींत, ते भाग्यवान् हा दिवस ( आपल्या डोळ्यांनी ) पाहातात. ते स्वर्गांतील चिरंजीव होत. 
येरां सुरगणाची नवाई । विशेष सांगावी येथ कांई ।
मुदला इंद्राचीचि दशा पाहीं । जे दिहाचे चौदा ॥ १५८ ॥
१५८) इतर देवांचे या ठिकाणीं विशेष आश्र्चर्य काय सांगावयाचें आहे ! मुख्य देवांचा राजा जो इंद्र त्याचीच दशा पाहा कीं, ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसांत चौदा होतात. 
परि ब्रह्मयाचियाहि आठां प्रहारांतें । आपुलियां डोळां देखते । 
आहाति गा तयांतें । अहोरात्रविद म्हणिपे ॥ १५९ ॥
१५९) परंतु ब्रह्मदेवाच्याहि आठां प्रहारांना आपल्या डोळ्यांनीं पाहाणारे जे आहेत, त्यास ब्रह्मदेवाच्या दिवसरात्रींना जाणणारे म्हणावेत.   



Custom Search