Saturday, March 13, 2021

AyodhyaKanda Part 11 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ११

 

AyodhyaKanda Part 11 
Doha 59 to 64 
श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ११ 
दोहा ५९ ते ६४ 
ShriRamCharitManas AyodhyaKanda

दोहा—करि केहरि निसिचर चरहिं दुष्ट जंतु बन भूरि ।

बिष बाटिकॉं कि सोह सुत सुभग सजीवनि मूरि ॥ ५९ ॥

हत्ती, सिंह, राक्षस इत्यादी अनेक दुष्ट जीव-जंतू वनात वावरत असतात. बाळा ! त्या विषाच्या वाटिकेमध्ये संजीवनीची मुळी कशी शोभून दिसेल ? ॥ ५९ ॥

बन हित कोल किरात किसोरी । रचीं बिरंचि बिषय सुख भोरी ॥

पाहनकृमि जिमि कठिन सुभाऊ । तिन्हहि कलेसु न कानन काऊ ॥

वनामध्ये ब्रह्मदेवाने विषयसुखाशी अपरिचित असणार्‍या कोल व भिल्ल यांच्या मुली निर्माण केल्या आहेत. त्यांचा स्वभाव पाषाण-किड्याप्रमाणे कठोर असतो. त्यांना वनात कधी त्रास वाटत नाही. ॥ १ ॥

कै तापस तिय कानन जोगू । जिन्ह तप हेतु तजा सब भोगू ॥

सिय बन बसिहि तात केहि भॉंती । चित्रलिखित कपि देखि डेराती ॥

 किंवा तपस्वांच्या स्त्रिया वनात राहण्यास योग्य आहेत. त्यांनी तपस्येसाठी सर्व भोग सोडून दिलेले  असतात. हे पुत्रा, जी चित्रातील माकड पाहून घाबरते, ती सीता वनात कशी राहू शकेल ? ॥ २ ॥

सुरसर सुभग बनज बन चारी । डाबर जोगु कि हंसकुमारी ॥

अस बिचारि जस आयसु होई । मैं सिख देउँ जानकिहि सोई ॥

देवसरोवरातील कमलवनात संचार करणारी हंसी डबक्यात राहण्यास योग्य आहे काय ? याचा विचार करुन जर तुझी आज्ञा असेल, तर मग मी जानकीला तसा उपदेश देईन.’ ॥ ३ ॥

जौं सिय भवन रहै कह अंबा । मोहि कहँ होइ बहुत अवलंबा ॥

सुनि रघुबीर मातु प्रिय बानी । सील सनेह सुधॉं जनु सानी ॥

कौसल्या म्हणाली, ‘ जर सीता घरी राहिली, तर मला मोठा आधार होईल.’ श्रीरामांनी जणू शील व स्नेहरुपी अमृताने ओथंबलेली मातेची प्रिय वाणी ऐकून ॥ ४ ॥

दोहा—कहि प्रिय बचन बिबेकमय कीन्हि मातु परितोष ॥

लगे प्रबोधन जानकिहि प्रगटि बिपिन गुन दोष ॥ ६० ॥

विवेकपूर्ण प्रिय वचन बोलून मातेचे समाधान केले. मग वनातील गुण-दोष सांगून ते सीतेला समजावीत म्हणू लागले. ॥ ६० ॥

मास पारायण, चौदावा विश्राम

मातु समीप कहत सकुचाहीं । बोले समउ समुझि मन माहीं ॥

राजकुमारि सिखावनु सुनहू । आन भॉंति जियँ जनि कछू गुनहू ॥

मातेसमोर सीतेला काही बोलण्यास श्रीराम संकोचत होते. परंतु मनात त्यांनी विचार केला की, हीच वेळ योग्य आहे. म्हणून ते म्हणाले, ‘ हे राजकुमारी, माझे म्हणणे ऐक. मनात उगाच दुसरे काही आणू नकोस. ॥ १ ॥

आपन मोर नीक जौं चहहू । बचनु हमार मानि गृह रहहू ॥

आयसु मोर सासु सेवकाई । सब बिधि भामिनि भवन भलाई ॥

जर तुला माझे व स्वतःचे भले व्हावे अशी इच्छा असेल, तर माझे म्हणणे मानून तू घरी राहा. हे भामिनी, त्यामुळे माझ्या आज्ञेचे पालन होईल; सासूची सेवा घडेल. घरी राहण्यात सर्व प्रकारे कल्याण आहे. ॥ २ ॥

एहि ते अधिक धरमु नहिं दूजा । सादर सासु ससुर पद पूजा ॥

जब जब मातु करिहि सुधि मोरी । होइहि प्रेम बिकल मति भोरी ॥

आदराने सासू-सासर्‍यांच्या चरणांची सेवा करण्याहून दुसरा कोणताही श्रेष्ठ धर्म नाही. जेव्हा जेव्हा मातेला माझी आठवण येईल आणि प्रेमाने व्याकूळ झाल्यामुळे तिला स्वतःचा विसर पडेल, ॥ ३ ॥

तब तब तुम्ह कहि कथा पुरानी । सुंदरि समुझाएहु मृदु बानी ॥

कहउँ सुभायँ सपथ सत मोही । सुमुखि मातु हित राखउँ तोही ॥

तेव्हा तेव्हा हे सुंदरी, तू कोमल वाणीने पूर्वीच्या कथा सांगून तिला समजव. हे सुमुखी, तुला माझी शंभर वेळा शपथ आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की, मी तुला फक्त मातेच्या सेवेसाठीच घरी ठेवतो. ॥ ४ ॥

दोहा—गुर श्रुति संमत धरम फलु पाइअ बिनहिं कलेस ।

हठ बस सब संकट सहे गालव नहुष नरेस ॥ ६१ ॥

माझी आज्ञा मानून घरी राहिल्यामुळे गुरु व वेद यांनी मान्य केलेल्या धर्माच्या आचरणाचे फळ तुला क्लेशाविना मिळेल. परंतु हट्टाने वनात आलीस, तर तुला क्लेश भोगावे लागतील. हट्टामुळे गालाव मुनी राजा महुष इत्यादी सर्वांना फार संकटे भोगावी लागली आहेत. ॥ ६१ ॥

मैं पुनि करि प्रवान पितु बानी । बेगि फिरब सुनु सुमुखि सयानी ॥

दिवस जात नहिं लागिहि बारा । सुंदरि सिखवनु सुनहु हमारा ॥

हे सुमुखी, हे बुद्धिमती, ऐक. मीसुद्धा वडिलांचे वचन पूर्ण करुन लवकरच परत येईन. दिवस सरायला वेळ लागणार नाही. हे सुंदरी, माझे हे म्हणणे ऐक. ॥ १ ॥

जौं हठ करहु प्रेम बस बामा । तौ तुम्ह दुखु पाउब परिनामा ॥

काननु कठिन भयंकरु भारी । घोर घामु हिम बारि बयारी ॥

हे प्रिय, जर प्रेमामुळे तू हट्ट करशील, तर परिणामी तुला दुःख भोगावे लागेल. वन फार क्लेशदायक व भयंकर आहे. तेथील ऊन, थंडी, पाऊस आणि वारे हे सर्व भयानक आहे. ॥ २ ॥

कुस कंटक मग कॉंकर नाना । चलब पयादेहिं बिनु पदत्राना ॥

चरन कमल मृदु मंजु तुम्हारे । मारग अगम भूमिधर भारे ॥

रस्त्यात सराटे, काटे-कुटे, खडे फार असतात. त्यावरुन अनवाणी पायी चालावे लागेल. तुझे चरण कमलासारखे कोमल च सुंदर आहेत आणि वाटेत मोठ-मोठे दुर्गम पर्वत आहेत. ॥ ३ ॥

कंदर खोह नदीं नद नारे । अगम अगाध न जाहिं निहारे ॥

भालु बाघ बृक केहरि नागा । करहिं नाद सुनि धीरजु भागा ॥

पर्वतांमधील गुहा, दर्‍या, नद्या, आणि ओढे हे अगम्य व खोल आहेत. त्यांच्याकडे पाहावतसुद्धा नाही. अस्वले, वाघ, लांडगे, सिंह आणि हत्ती असे भयानक ओरडत असतात की, ते ऐकूनच धैर्य गळून जाते. ॥ ४ ॥

दोहा—भूमि सयन बलकल बसन असनु कंद फल मूल ।

ते कि सदा सब दिन मिलहिं सबुइ समय अनुकूल ॥ ६२ ॥

जमिनीवर झोपायचे, झाडांच्या सालींची वस्त्रे घालायची आणि कंद, मुळे, फळे खायची आणि सर्व काळ ते नेहमी मिळणार काय ? सर्व काही आपापल्या कालानुरुप असेच मिळेल. ॥ ६२ ॥

नर अहार रजनीचर चरहीं । कपट बेष बिधि कोटिक करहीं ॥

लागइ अति पहार कर पानी । बिपिन बिपति नहिं जाइ बखानी ॥

तेथे माणसांना खाणारे निशाचर राक्षस फिरत असतात. ते पुष्कळ प्रकारचे कपट-वेश घेतात. पर्वताचे पाणी फार बाधते. वनातील संकटे सांगता येत नाहीत.॥ १ ॥

ब्याल कराल बिहग बन घोरा । निसिचर निकर नरि नर चोरा ॥

डरपहिं धीर गहन सुधि आएँ । मृगलोचनि तुम्ह भीरु सुभाएँ ॥

वनात भीषण सर्प, भयानक पक्षी आणि स्त्री-पुरुषांचे अपहरण करणार्‍या राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी असतात. वनातेल भयानकतेची आठवण येताच धैर्यवान पुरुषही घाबरुन जातात. मग हे मृगलोचने, तू तर स्वभावतःच घाबरुन जाणारी आहेस. ॥ २ ॥

हंसगवनि तुम्ह नहिं बन जोगू । सुनि अपजसु मोहि देइहि लोगू ॥

मानस सलिल सुधॉं प्रतिपाली । जिअइ कि लवन पयोधि मराली ॥

 हे हंसगामिनी, तू वनात जाण्याच्या योग्यतेची नाहीस. तू वनात जाणार असे समकल्यावर लोक मला नावे ठेवतील. मानससरोवराच्या अमृतासमान पाण्यावर पोसलेली हंसी कधी खार्‍या समुद्रात जगू शकेल काय ? ॥ ३ ॥

नव रसाल बन बिहरनसीला । सोह कि कोकिल बिपिन करीला ॥

रहहु भवन अस हृदयँ बिचारी । चंदबदनि दुखु कानन भारी ॥

नव्याने बहरलेल्या आमराईत विहार करणारी कोकिळा काटेरी झाडांच्या जंगलात शोभून दिसेल काय ? हे चंद्रमुखी, मनात असा विचार करुन तू घरीच राहा. वनात फार कष्ट असतात. ॥ ४ ॥

दोहा—सहज सुहृद गुर स्वामि सिख जो न करइ सिर मानि ।

सो पछिताइ अघाइ उर अवसि होइ हित हानि ॥ ६३ ॥

मनापासून हित चिंतिणारे गुरु व स्वामी यांचे बोलणे जो शिरोधार्य मानीत नाही, तो पश्र्चात्ताप पावतो आणि त्याच्या कल्याणाची हानी होते. ‘ ॥ ६३ ॥

सुनि मृदु बचन मनोहर पिय के । लोचन ललित भरे जल सिय के ॥

सीतल सिख  दाहक भइ कैसें । चकइहि सरद चंद निसि जैसें ॥

प्रियतम श्रीरामांचे कोमल व मनोहर बोलणे ऐकून सीतेचे सुंदर नेत्र पाण्याने डबडबले. चक्रवाक पक्षिणीला शरदऋतूची चांदणी जशी होरपळून काढते, त्याप्रमाणे श्रीरामांचे हे शांत बोलणे सीतेला जाळू लागले. ॥ १ ॥

उतरु न आव बिकल बैदेही । तजन चहत सुचि स्वामि सनेही ॥

बरबस रोकि बिलोचन बारी । धरि धीरजु उर अवनिकुमारी ॥

जानकीला काही उत्तर देता येईना. माझ्या पवित्र व प्रेमळ स्वामींना मला सोडून जाण्याची इच्छा आहे. असे तिला वाटून ती व्याकूळ झाली. डोळ्यांतील पाणी मोठ्या कष्टाने आवरुन ती पृथ्वीकन्या सीता मन घट्ट करुन, ॥ २ ॥

लागि सासु पग कह कर जोरी । छमबि देबि बड़ि अबिनय मोरी ॥

दीन्हि प्रानपति मोहि सिख सोई । जेहि बिधि मोर परम हित होई ॥

सासूच्या पाया पडून व हात जोडून म्हणू लागली की, ‘ सासूबाई ! माझ्या या धारिष्ट्याबद्दल क्षमा करा. माझे परम हित ज्यात आहे, असेच माझ्या प्राणप्रिय पतीने सांगितले आहे. ॥ ३ ॥

मैं पुनि समुझि दीखि मन माहीं । पिय बियोग सम दुखु जग नाहीं ॥

परंतु मी मनात विचार करुन पाहिला की, पतीच्या विरहासारखे जगात कोणतेही दुःख नाही. ॥ ४ ॥

 दोहा—प्राननाथ करुनायततन सुंदर सुखद सुजान ।

तुम्ह बिनु रघुकुल कुमुद बिधु सुरपुर नरक समान ॥ ६४ ॥

हे प्राणनाथ, हे दयाधाम, हे सुंदर, हे सुखदायक, हे सज्जनशिरोणी, हे रघुकुलरुपी कुमुदांना प्रफुल्लित करणारे चंद्रमा, तुमच्याविना मला स्वर्गसुद्धा नरकासमान आहे. ॥ ६४ ॥

मातु पिता भगिनी प्रिय भाई । प्रिय परिवारु सुहृद समुदाई ॥

सासु ससुर गुर सजन सहाई । सुत सुंदर सुसील सुखदाई ॥

माता-पिता,बहीण, प्रिय भाऊ, आवडता परिवार, मित्र-मंडळी, सासू-सासरा, गुरु, स्वजन, सहाय्यक आणि सुंदर, सुशील व सुखद पुत्र, ॥ १ ॥

जहँ लगि नाथ नेह अरु नाते । पिय बिनु तियहि तरनिहु ते ताते ॥

तनु धनु धामु धरनि पुर राजू । पति बिहीन सबु सोक समाजू ॥

हे नाथ, जितकी म्हणून नाती आहेत, ती सर्व पतीविना स्त्रीला सूर्याहून तापदायक आहेत. शरीर, धन, घर, पृथ्वी, नगर आणि राज्य हे सर्व स्त्रीला पतीविना शोकाचा समुदाय आहे. ॥ २ ॥                

भोग रोगसम भूषन भारु । जम जातना सरिस संसारु ॥

प्राननाथ तुम्ह बिनु जग माहीं । मो कहुँ सुखद कतहुँ कछु नाहीं ॥

भोग हे रोगासारखे आहेत, दागिने भाररुप आहेत, संसार हा यम-यातनेसारखा आहे. हे प्राणनाथ, तुमच्याविना मला या जगात काहीही सुखाचे नाही. ॥ ३ ॥

जिय बिनु देह नदी बिनु बारी । तैसिअ नाथ पुरुष बिनु नारी ॥

नाथ सकल सुख साथ तुम्हारें । सरद बिमल बिधु बदनु निहारें ॥

ज्याप्रमाणे जिवाविना देह आणि पाण्याविना नदी असते,

 त्याप्रमाणे हे नाथ, पुरुषाविना स्त्री असते. हे नाथ

, तुमच्यासोबत राहून तुमचे शरद पौर्णिमेच्या निर्मल

 चंद्रासारखे मुख पाहण्यामुळे मला सर्व सुखे आपोआप

 मिळतील. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: