Saturday, March 13, 2021

AyodhyaKanda Part 12,Doha 65 to 70,अयोध्याकाण्ड भाग १२,दोहा ६५ ते ७०

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 12 
Doha 65 to 70 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग १२ 
दोहा ६५ ते ७०

दोहा—खग मृग परिजन नगरु बनु बलकल बिमल दुकूल ।

नाथ साथ सुरसदन सम परनसाल सुख मूल ॥ ६५ ॥

हे नाथ, तुमच्यासोबत असताना मला पक्षी व पशू हे माझे कुटुंबीय असतील, वन हेच नगर व वृक्षांच्या साली याच निर्मळ वस्त्रे असतील आणि पर्णकुटी ही स्वर्गासारखी सुखाचे माहेर असेल. ॥ ६५ ॥

बनदेबीं बनदेव उदारा । करिहहिं सासु ससुर सम सारा ॥

कुस किसलय साथरी सुहाई । प्रभु सँग मंजु मनोज तुराई ॥

वनात उदार मनाच्या वनदेवी व वनदेव हे सासू-सासर्‍यांप्रमाणे माझा सांभाळ करतील, आणि कुश व पानांचा सुंदर बिछाना प्रभूंच्या संगतीमुळे कामदेवाच्या मनोहर गादीप्रमाणे वाटेल. ॥ १ ॥

कंद मूल फल अमिअ अहारु । अवध सौध सत सरिस पहारु ॥

छिनु छिनु प्रभु पद कमल बिलोकी । रहिहउँ मुदित दिवस जिमि कोकी ॥

कंद-मुळे व फळे ही अमृतासमान आहार असेल आणि पर्वत हेच अयोध्येमधील शेकडो राजमहालासारखे असतील. क्षणोश्रणी प्रभूंच्या चरणकमलांना पाहून दिवस जशी चकवी आनंदित असते, तशी मी आनंदात राहीन. ॥ २ ॥

बन दुख नाथ कहे बहुतेरे । भय बिषाद परिताप घनेरे ॥

प्रभु बियोग लवलेस समाना । सब मिलि होहिं न कृपानिधाना ॥

हे नाथ, तुम्ही वनातील पुष्कळशी दुःखे, बरेच भय, विषाद व दुःखे सांगितली, परंतु हे कृपानिधान, हे सर्व जरी एकत्र केले तरी प्रभू, तुमच्या वियोगाच्या दुःखापुढे लवलेशही नाहीत. ॥ ३ ॥

अस जियँ जानि सुजान सिरोमनि । लेइअ संग मोहि छाड़िअ जनि ॥

बिनती बहुत करौं का स्वामी । करुनामय उर अंतरजामी ॥

असा मनात विचार करुन हे नाथ, मला तुमच्यासोबत घेऊन चला. येथे सोडून जाऊ नका. हे स्वामी, मी आणखी काय विनवणी करु ? तुम्ही करुणामय आहात आणि सर्वांच्या मनातील जाणणारे आहात. ॥ ४ ॥

दोहा—राखिअ अवध जो अवधि लगि रहत न जनिअहिं प्रानु ।

दीनबंधु सुंदर सुखद सील सनेह निधान ॥ ६६ ॥

हे दीनबंधु, हे सुंदर, हे सुखदायक, हे शील व प्रेमाचे भांडार, जर चौदा वर्षांचा अवधी पूर्ण होईपर्यंत मला अयोध्येमध्ये ठेवाल, तर मी जिवंत राहणार नाही, असे समजा. ॥ ६६ ॥

मोहि मग चलत न होइहि हारी । छिनु छिनु चरन सरोज निहारी ॥

सबहि भॉंति पिय सेवा करिहौं । मारग जनित सकल श्रम हरिहौं ॥

क्षणोक्षणी तुमचे चरणकमल पाहात राहिल्यामुळे मला वाटेत चालताना थकवा वाटणर नाही. हे प्रियतम, मी सर्व प्रकारे तुमची सेवा करीन आणि वाट चालताना येणारा थकवा दूर करीन. ॥ १ ॥

पाय पखारि बैठि तरु छाहीं । करिहउँ बाउ मुदित मन माहीं ॥

श्रम कन सहित स्याम तनु देखें । कहँ दुख समउ प्रानपति पेखें ॥

मी तुमचे पाय धुऊन झाडांच्या सावलीत बसून मनात प्रसन्न होऊन तुम्हांला वारा घालीन. तुमचे स्वेद-बिंदू झळकणारे श्याम शरीर पाहात प्राणप्रिय पतीचे दर्शन घेताना मला दुःखासाठी जागाच कुठे राहील ? ॥ २ ॥

सम महि तृन तरुपल्लव डासी । पाय पलोटिहि सब निसि दासी ॥

बार बार मृदु मूरति जोही । लागिजहि तात बयारि न मोही ॥

सपाट जमिनीवर गवत व झाडांची पाने अंथरुन ही दासी रात्रभर तुमचे पाय चेपीत राहील. वारंवार तुमची कोमल मूर्ती पाहून मला कधी उकाडा जाणवणार नाही. ॥ ३ ॥     

को प्रभु सँग मोहि चितवनिहारा । सिंघबधुहि जिमि ससक सिआरा ॥

मैं सुकुमारि नाथ बन जोगू । तुम्हहि उचित तप बयारि न मोही ॥

आपण सोबत असताना माझ्याकडे डोळे वर करुन तरी कोण पाहाणार आहे ? ससे व कोल्हे सिंहिणीकडे कधी बघू शकत नाहीत. मी सुकुमारी आहे आणि तुम्ही वनात जाण्याजोगे आहात काय ? मग तुमच्यासाठी तेवढी तपस्या योग्य व मला विषय-भोग योग्य आहेत, असे तुम्हांला वाटते काय ? ॥ ४ ॥

दोहा—ऐसेउ बचन कठोर सुनि जौं न हृदउ बिलगान ।

तौ प्रभु बिषम बियोग दुख सहिहहिं पावँर प्रान ॥ ६७ ॥

तुमचे असे हे कठोर बोलणे ऐकूनही माझे हृदय विदीर्ण झाले नाही, त्यावरुन हे प्रभु माझे हे क्षुद्र प्राण तुमच्या वियोगाचे दुःख सहन करु शकतील असे वाटते. ‘ ( अर्थात तुमच्या विरहाने माझे प्राण राहाणार नाहीत. ) ॥ ६७ ॥

अस कहि सीय बिकल भइ भारी । बचन बियोगु न सकी सँभारी ।

 देखि दसा रघुपति जियँ जाना । हठि राखें नहिं राखिहि प्राना ॥

असे म्हणून सीता फार शोकाकुल झाली. ती बोलण्यातील वियोगसुद्धा सहन करु शकली नाही, तिची अवस्था पाहून श्रीरघुनाथांनी मनात जाणले की, हिला आग्रहाने इथे ठेवल्यास हिचे प्राण वाचणार नाहीत. ॥ १ ॥

कहेउ कृपाल भानुकुल नाथा । परिहरि सोचु चलहु बन साथा ॥

नहिं बिषाद कर अवसरु आजू । बेगि करहु बन गवन समाजू ॥

तेव्हा कृपाळू सूर्यकुलाचे स्वामी श्रीरामचंद्र म्हणाले, ‘ काळजी करणे सोडून देऊन माझ्याबरोबर वनात चल. ही विषाद मानण्याची वेळ नाही. लगेच वनगमनाची तयारी कर. ‘ ॥ २ ॥

कहि प्रिय बचन प्रिया समुझाई । लगे मातु पद आसिष पाई ॥

बेगि प्रजा दुख मेटब आई । जननी निठुर बिसरि जनि जाई ॥

श्रीरामचंद्रांनी प्रिय बोलून सीतेला समजाविले. नंतर मातेचे पाय धरुन आशीर्वाद घेतला. कौसल्या म्हणाली, ‘ मुला ! लवकर परत येऊन प्रजेचे दुःख दूर कर. या निष्ठुर आईला तुझा विसर न पडो. ॥ ३ ॥

फिरिहि दसा बिधि बहुरि कि मोरी । देखिहउँ नयन मनोहर जोरी ॥

सुदिन सुघरी तात कब होइहि । जननी जिअत बदन बिधु जोइहि ॥

हे विधात्या, माझी ही दशा कधी बदलेल काय ? मी आपल्या डोळ्यांनी या मनोहर जोडप्याला पुन्हा पाहू शकेन काय ? हे पुत्रा, तुझी आई जिवंतपणी तुझा मुखचंद्र पुन्हा पाहू शकेल, तो सुंदर दिवस व शुभ क्षण केव्हा येईल ? ॥ ४ ॥

दोहा—बहुरि बच्छ कहि लालु कहि रघुपति रघुबर तात ।

कबहिं बोलाइ लगाइ हियँ हरषि निरखिहउँ गात ॥ ६८ ॥

बाळा ! ‘ वत्स ‘ म्हणून, ‘ लाला ‘ म्हणून, ‘ रघुपती ‘ म्हणून, ‘ रघुबर ‘ म्हणून मी तुला पुन्हा केव्हा हृदयाशी धरीन ? व आनंदाने तुला पाहू शकेन ? ‘ ॥ ६८ ॥

लखि सनेह कातरि महतारी । बचनु न आव बिकल भइ भारी ॥

राम प्रबोधु कीन्ह बिधि नाना । समउ सनेहु न जाइ बखाना ॥

माता प्रेमाने अधीर असून इतकी व्याकूळ झाली आहे की, तिच्या तोंडातून शब्द फुटत नाही. तेव्हा श्रीरामचंद्रांनी अनेक प्रकारे मातेला समजावले. त्या प्रसंगाचे व प्रेमाचे वर्णन करणे अशक्य. ॥ १ ॥

तब जानकी सासु पग लागी । सुनिअ माय मैं परम अभागी ॥

सेवा समय दैअँ बनु दीन्हा । मोर मनोरथु सफल न कीन्हा ॥

मग जानकी सासूच्या पाया पडून म्हणाली,  ‘ आई ! ऐका. मी मोठी दुर्दैवी आहे. तुमची सेवा करण्याच्या वेळी देवाने मला वनवास दिला. माझे मनोरथ पूर्ण केले नाहीत. ॥ २ ॥

तजब छोभु जनि छाड़िअ छोहू । करमु कठिन कछु दोसु न मोहू ॥

सुनि सिय बचन सासु अकुलानी । दसा कवनि बिधि कहौं बखानी ॥

तुम्ही क्षोभ सोडा, परंतु माझ्यावरील कृपा सोडू नका. कर्माची गती कठीण आहे, माझाही काही दोष नाही. ‘ सीतेचे हे बोलणे ऐकून सासू व्याकूळ झाली. तिच्या अवस्थेचे वर्णन मी कसे करणार ? ॥ ३ ॥

बारहिं बार लाइ उर लीन्ही । धरि धीरजु सिख आसिष दीन्ही ॥

अचल होउ अहिवातु तुम्हारा । जब लगि गंगा जमुना जल धारा ॥  

कौसल्येने सीतेला वारंवार हृदयाशी धरले व धीर धरुन उपदेश केला, आणि आशीर्वाद दिला की, ‘ जोपर्यंत गंगा व यमुनेचा प्रवाह वाहात राहील, तोपर्यंत तुझे सौभाग्य अढळ राहील. ‘ ॥ ४ ॥

दोहा—सीतहि सासु असीस सिख दीन्हि अनेक प्रकार ।

चली नाइ पद पदुम सिरु अति हित बारहिं बार ॥ ६९ ॥

सासूने सीतेला अनेक प्रकारचे आशीर्वाद व उपदेश दिले. आणि सीता मोठ्या प्रेमाने सासूच्या चरणी मस्तक ठेवून निघाली. ॥ ६९ ॥

समाचार जब लछिमन पाए । ब्याकुल बिलख बदन उठि धाए ॥

कंप पुलक तन नयन सनीरा । गहे चरन अति प्रेम अधीरा ॥

जेव्हा लक्ष्मणाला ही बातमी सनजली, तेव्हा तो व्याकूळ व उदास होऊन धावला. शरीर थरथरत होते, रोमांच आले होते आणि नेत्र अश्रूंनी भरले होते. प्रेमाने अत्यंत अधीर होऊन त्याने श्रीरामांचे चरण धरले. ॥ १ ॥

कहि न सकत कछु चितवत ठाढ़े । मीनु दीन जनु जल तें काढ़े ॥

सोचु हृदयँ बिधि का होनिहारा । सबु सुखु सुकृतु सिरान हमारा ॥

तो काही बोलत नव्हता, उभ्या पाहात होता. जळातून बाहेर काढल्यावर मासा जसा मलूल होतो, तसा तो दीनवाणा झाला होता. मनात विचार करीत होता की, हे विधात्या, काय होणार आहे ? आमचे सर्व सुख व पुण्य संपून गेले काय ? ॥ २ ॥

मो कहुँ काह कहब रघुनाथा । रखिहहिं भवन कि लेहहिं साथा ॥

राम बिलोकि बंधु कर जोरें । देह गेह सब सन तृनु तोरें ॥

मला श्रीराम आता काय सांगतील ? घरी ठेवतील की सोबत नेतील ? ‘ श्रीरामांनी लक्ष्मणाला हात जोडून उभा असलेला व घरचीच नव्हे, तर शरीराचीही सर्व नाती तोडून आलेला आहे, असे पाहिले. ॥ ३ ॥

बोले बचनु राम नय नागर । सील सनेह सरल सुख सागर ॥

तात प्रेम बस जनि कदराहू । समुझि हृदयँ परिनाम उछाहू ॥

तेव्हा नीति-निपुण आणि शील, स्नेह, सरळपणा आणि सुखाचे सागर असलेले श्रीराम म्हणाले, ‘ बंधो ! तू येथे राहण्यामुळे परिणामी होणार्‍या लाभाचा विचार मनात ठेवून तू प्रेमाने अधीर बनू नकोस. ॥ ४ ॥

दोहा—मातु पिता गुरु स्वामि सिख सिर धरि करहिं सुभायँ ।

लहेउ लाभु तिन्ह जनम कर नतरु जनमु जग जायँ ॥ ७० ॥

जे लोक माता, पिता, गुरु आणि स्वामी यांचा उपदेश मनःपूर्वक शिरोधार्य मानून त्याचे पालन करतात, त्यांनीच जन्माचे सार्थक केले. नाहीतर जगात जन्म घेणे व्यर्थ आहे. ॥ ७० ॥

अस जियँ जानि सुनहु सिख भाई । करहु मातु पितु पद सेवकाई ॥

भवन भरतु रिपुसूदनु नाहीं । राउ बृद्ध मम दुखु मन माहीं ॥

हे बंधू, हे लक्षात आणून माझे म्हणणे ऐक व माता-पित्यांच्या चरणांची सेवा कर. भरत आणि शत्रुघ्न हे घरी नाहीत. महाराज वृद्ध आहेत आणि त्यांच्या मनात माझ्या वनगमनाचे फार दुःख आहे. ॥ १ ॥

मैं बन जाउँ तुम्हहि लेइ साथा । होइ सबहि बिधि अवध अनाथा ॥

गुरु पितु मातु प्रजा परिवारु । सब कहुँ परइ दुसह दुख भारु ॥

अशा अवस्थेमध्ये मी तुला बरोबर घेऊन वनात गेलो, तर अयोध्या सर्व प्रकारे अनाथ होईल. गुरु, माता, पिता, प्रजा व परिवार या सर्वांवर दुःखाचे असह्य ओझे पडेल. ॥ २ ॥

रहहु करहु सब कर परितोषू । नतरु तात होइहि बड़ दोषू ॥

जासु राज प्रिय प्रजा दुखारी । सो नृपु अवसि नरक अधिकारी ॥

तेव्हा तू येथेच राहा आणि सर्वांचे समाधान कर. नाहीतर बंधो ! फार मोठा दोष पदरी येईल. ज्याच्या राज्यात प्रजा दुःखी असते, तो राजा नक्कीच नरकास पात्र ठरतो. ॥ ३ ॥

रहहु तात असि नीति बिचारी । सुनत लखनु भए ब्याकुल भारी ॥

सिअरें बचन सूखि गए कैसें । परसत तुहिन तामरसु जैसें ॥

बंधो ! या नीतीचा विचार करुन तू घरीच रहा. ‘ हे

 ऐकताच लक्ष्मण फार व्याकुळ झाला. दवामुळे कमळ

 जसे करपून जाते, त्याप्रमाणे श्रीरामांच्या शीतल

 वचनामुळे तो करपून गेला. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: