Tuesday, June 2, 2020

Dnyaneshwari Adhyay 2 Part 5 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ५ ओव्या १०१ ते १२५


Dnyaneshwari Adhyay 2 Part 5 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ५ 
 ओव्या १०१ ते १२५

 परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतिसी ।
आणि तूंचि नीति सांगसी । आम्हांप्रति ॥ १०१ ॥
१०१) पण मूर्खपणामुळें तुला समजत नाहीं; मनांत आणूं नये तें तूं आणतोस; आणि ( उलट ) तूंच नीतीच्या गोष्टी आम्हांला सांगतोस !
देखें विवेकी जें होती । ते दोहींतेंही न शोचती ।
जे होय जाय हे भ्रांती । म्हणऊनियां ॥ १०२ ॥
१०२) हें पाहा, जन्म व मृत्यु ही केवळ भ्रांति असल्यामुळें जें विचारवंत आहेत ते या दोहोंचाहि ( दोहोंबद्दलहि ) शोक करीत नाहींत, 
अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख ।
आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी ॥ १०३ ॥
१०३) अर्जुना, सांगतों ऐक. पाहा. येथें आम्ही, तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे ( जें आहोंत ),
नित्यता ऐसेचि असोनी । ना तरी निश्र्चित क्षया जाउनि ।
हे भ्रांति वेगळी करुनी । दोन्हीं नाहीं ॥ १०४ ॥
१०४) ते हल्लीं आहों, असेच निरंतर राहूं अथवा खात्रीनें नाश पावूं एवढी भ्रांति दूर झाली कीं, वस्तुतः ( या ) दोन्ही ( गोष्टी ) खर्‍या नाहींत.
हें उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे ।
येर्‍हवीं तत्त्वता वस्तु जे असे । ते अविनाशचि ॥ १०५ ॥   
१०५) ( भ्रांतीला वश झाल्यामुळें ) जन्म व मृत्यु हे अनुभवास येतात. एर्‍हवीं वास्तविक वस्तु ( आत्मा ) जी आहे, ती अविनाशीच आहे.
जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें ।
तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ ॥ १०६ ॥
१०६) जसें वार्‍यानें पाणी हालविलें, त्यामुळें त्याला तरंगांचें रुप आलें; तर या ठिकाणी कोणाला व कुठें जन्म आला असें म्हणता येईल ? 
तेंचि वायूचें स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाटलें ।
तरी आतां काय निमालें । विचारीं पां ॥ १०७ ॥
१०७) पुढें तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप सपाट झालें, तर आतां कशाचा नाश झाला ? विचार कर.
आइकें शरीर तरी एक । परी वयस भेद अनेक ।
हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥ १०८ ॥
१०८) आणखी असें पाहा कीं, शरीर तर एकच आहे, पण वयपरत्वें त्यास अनेक दशा प्राप्त होतात; हा प्रत्यक्ष पुरावा तूं पाहा. 
एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे ।
परी देहचि न नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥
१०९) याच्या ठिकाणीं पहिल्यानें बालपण दिसतें, मग तारुण्यांत तें बालपण नाहींसें होतें; पण शरीराच्या एकेक अवस्थेबरोबर शरीराचा कांहीं नाश होत नाहीं.
तैसीं चैतन्याचां ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं ।   
ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥
११०) त्याचप्रमाणें, हे पाहा, चैतन्याच्या ठिकाणीं निरनिराळीं शरीरें येतात व जातात असें जो जाणतो, त्याला भ्रांतिजन्म दुःख कधींहि होत नाही.
एथ नेणावया हेंचि कारण । जे इंद्रियांआधीनपण ।
तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥ १११ ॥
१११) असें न जाणण्याला इंद्रियाधीनता हेंच एक कारण आहे. तीं इंद्रियें अंतःकरणावर आपला पगडा बसवितात, म्हणून त्याला भ्रम होतो.
इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती ।
ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥ ११२ ॥
११२) इंद्रियें विषयांचें सेचन करतात, त्यामुळें सुखदुःखें उत्पन्न होतात. तीं ( मग ) आपल्या संसर्गानें अंतःकरण ग्रासून टाकतात.   
जयां विषयांचां ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।
तेथ दुःख आणि कांहीं । सुखहि दिसे ॥ ११३ ॥    
११३) ज्या ( शब्दादि ) विषयांच्या ठिकाणीं एक स्थिति कधीं नसते, त्या विषयांपासून कधीं सुख तर कधीं दुःख प्राप्त होतें.
देखें हे शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।
तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥
११४) पाहा कीं, निंदा आणि स्तुति ही शब्दांची व्याप्ति आहे. कर्णद्वारानें जसें निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दाचें सेवन होईल, तसे क्रोध किंवा लोभ अंतःकरणांत उत्पन्न होतात.
मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण ।
जे वपूचेनि संगे कारण । संतोषखेदां ॥ ११५ ॥
११५) मृदु आणि कठीण हे, स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत; ते त्वचेच्या संयोगानें संतोषाला व दुःखाला कारण होतात.
भ्यासुर आणि सुरेख । हें रुपाचें स्वरुप देख ।
जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥ ११६ ॥
११६) पाहा, भेसूर आणि सुरेख ही रुप या विषयाचीं दोन स्वरुपें आहेत; ती नेत्राद्वारें सुखदुःख उत्पन्न करतात. 
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।
जो घ्राणसंगें विषादु-। तोषु देता ॥ ११७ ॥
११७) सुगंध आणि दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगानें दुःख आणि सुख उत्पन्न करतात. 
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु ।
म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥
११८) त्याप्रमाणें ( कडू व गोड असा ) दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगति अधोगतीला नेणारी आहे.   
देखें इंद्रियांअधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे ।
आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥
११९) पाहा, जेव्हां ( मनुष्य ) इंद्रियांच्या ताब्यांत जातो, तेव्हां त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वतः सुखदुःखांच्या ताब्यांत सापडतो.
या विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।
ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥
१२०) पाहा, या इंद्रियांचा हा स्वभावच असा आहे की, त्यांना या विषयांवांचून दुसरें काहींच गोड वाटत नाहीं.
हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।
कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥
१२१) हे विषय आहेत तरी कसे ? मृगजल जसें आभासात्मक, किंवा स्वप्नांत पाहिलेला हत्ती जसा केवळ भासमय असतो;
देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं ।
हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥
१२२) पाहा, तसे ( हें विषय ) क्षणभंगुर आहेत; याकरितां धनुर्धरा, तूं त्यांचा त्याग कर; त्यांच्या नादीं मुळीच लागूं नकोस. 
हे विषय जयातें नाकळिती । तया सुखदुःखें दोन्ही न पचती ।  
आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥ १२३ ॥
१२३) या विषयांच्या तावडीत जो सापडत नाहीं, त्याला सुखदुःख हीं दोन्हीं होत नाहीत आणि गर्भवासाची संगति त्याला कधी घडत नाहीं.
तो नित्यरुपु पार्था । वोळखावा सर्वथा ।
जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥ १२४ ॥
१२४) जो या इंद्रियांचे जे विषय त्यांच्या कह्यांत सापडत नाही, तो पार्था, पूर्णपणें ब्रह्मरुप आहे, असें जाणावें.
आतां अर्जुना आणिक कांहीं एक । सांगेन मी आइक ।
जें विचारें परलोक । वोळखिती ॥ १२५ ॥
१२५) आतां अर्जुना, तुला मी आणखी कांहीं एक ( गोष्ट ) 
सांगतों, ऐक. तें वस्तुस्वरुप ज्ञानी पुरुष विचारानें 

जाणतात.


Custom Search

No comments: