Saturday, November 28, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 8 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ८

 

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 8
Ovya 176 to 200 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ८ 
ओव्या १७६ ते २००

सांगे भुवनत्रयाची काजळी । जे गगनमाजि उधवली ।

तिये प्रळयींचे वाहटुळी । काय अभ्र पुरे ॥ १७६ ॥

१७६) तिन्ही लोकांचीं राख आकाशांत उडवून देणारी जीं प्रळयकाळची वावटळ, तिच्या पुढें ढग काय टिकणार आहेत ? सांग बरें.

कीं पवनाचेनि कोपें । पाणियेंचि जो पळिपे ।

तो प्रळयानळु दडपे । तृणें काष्ठें काइ ॥ १७७ ॥ 

१७७) अथवा, वार्‍याच्या क्षोभानें जो प्रळयकाळचा अग्नि केवळ पाण्यानेंच पेटतो तो गवत व काष्ठें यांनी दबेल काय ?

म्हणोनि असो हें न घडे । ते विचारितांचि असंगडें ।

पुढती ज्ञानाचेनि पाडें । पवित्र न दिसे ॥ १७८ ॥

१७८) असो; म्हणून असें घडणें अशक्य आहे. यावर विचार केला तरी हें अशक्य आहे, असें दिसतें. एकंदरीत पाहतां ज्ञानासारखें पवित्र कांहीं नाहीं.

एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक तैसें कें आहे ।

जैसें चैतत्य कां नोहे । दुसरें गा ॥ १७९ ॥

१७९) इहलोकीं ज्ञान हे उत्तम आहे. अरे, ज्याप्रमाणें दुसरें चैतन्य नाहीं, त्याप्रमाणें ( ज्ञानाइतकें उत्तम ) दुसरें कोठें आहे ?

या महातेजाचेनि कसें । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे ।

कां गिंवसिलें गिंवसे । आकाश हें ॥ १८० ॥

१८०) या सूर्याच्या कसोटीला लावून पाहातां, त्याचें प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असें आढळेल किंवा आकाशाला कवळूं जाता, जर कवळतां येईल;

नातरी पृथ्वीचेनि पाडें । कांटळि जरी जोडे ।

तरी उपमा ज्ञानीं घडे । पंडुकुमरा ॥ १८१ ॥

१८१) अथवा, योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचें जर कांहीं मिळेल, तरच अर्जुना, ज्ञानाला उपमा सांपडेल. 

म्हणूनि बहुतीं परीं पाहतां । पुढतपुढतीं निर्धारिता 

हे ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींचि आथि ॥ १८२ ॥

१८२) म्हणून अनेक प्रकारांनीं विचार केला असतां व पुनः पुन्हां निर्णय करुन पाहिलें असतां असें दिसतें कीं, ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी आहे. 

जैसी अमृताची चवी निवडिजे । तरी अमृताचिसारिखी म्हणिजे ।

तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेंसींचि ॥ १८३ ॥

१८३) अमृताची चव कशासारखी आहे, हे निवडूं जातां ती अमृतासारखीच आहे, असें ज्याप्रमाणें म्हणावें लागतें, त्याप्रमाणेंच ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणें भाग आहे.

आतां यावरी जें बोलणें । ते वायांचि वेळु फेडणें ।

तंव सांचचि जी हें पार्थु म्हणे । जें बोलत असां ॥ १८४ ॥

१८४) आतां ( यापेक्षां ज्ञानाच्या महतीविषयीं ) जास्त बोलणें म्हणजे केवळ वेळ फुकट घालविणें होय. यावर अर्जुन म्हणाला, महाराज, आपण जे बोलत आहांत तें खरेंच आहे;

परि तेंचि ज्ञान केवीं जाणावें । ऐसें अर्जुनें जंव पुसावें ।

तंव तें मनोगत देवें । जाणितलें ॥ १८५ ॥

१८५) पण तेंच ज्ञान प्राप्त करुन कसें घ्यावें ? असें अर्जुन विचारणार तोंच तें त्याचें मनोगत देवानें जाणलें.

मग म्हणतसे किरीटी । आतां चित्त देयीं गोठी ।

सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपाय तुज ॥ १८६ ॥

१८६) मग देव म्हणाले, अर्जुना, ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतों. आतां या गोष्टीकडे नीट चित्त दे.

तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकल विषयां ।

जयाचां ठायीं इंद्रियां । मानु नाहीं ॥ १८७ ॥

तर आत्मसुखाची चटक लागल्यामुळें जो सर्व विषयांना विटतो, ज्याच्या ठिकाणीं इंद्रियांचा बडेजाव नसतो;  

जो मनासी चाड न सांगे । जो प्रकृतीचें केलें नेघे ।

जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया जाहला ॥ १८८ ॥

१८८) जो कशाचीहि इच्छा मनांत येऊं देत नाही, जो प्रकृतीकडून होणारीं कर्में  ( त्या कर्मांचे कर्तृत्व ) आपल्याकडे घेत नाहीं, श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला असतो,

तयातेंचि गिंवसित । हें ज्ञान पावे निश्र्चित ।

जयामाजि अचुंबित । शांति असे ॥ १८९ ॥

१८९) ज्या ज्ञानांत निर्भेळ शांतीची वस्ती असते, तें ज्ञान त्याला शोधीत येऊन निश्चित प्राप्त होतें.  

तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे ।

मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ॥ १९० ॥

१९०) तें ज्ञान अंतःकरणांत स्थिर होतें आणि मग शांतीचा अंकुर फुटतो, मग आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रकट होतो.

मग जेउती वास पाहिजे । तेउती शांतीचि देखिजे ।

तेथ अपारा पारु नेणिजे । निर्धारितां ॥ १९१ ॥

१९१) मग जिकडे पाहील, तिकडे त्याला शांतीच दिसते. त्या अमर्याद शांतीचें पैलतीर कुठें आहे, तें विचार करुनहि समजत नाहीं.

ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानबीजाचा विस्तारु ।

सांगतां असे अपारु । परि असो आतां ॥ १९२ ॥

१९२) अशा या ज्ञानरुप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगूं लागलों तर तो अपार आहे. पण तें आतां राहूं दे. 

ऐकें जया प्राणियांचा ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं ।

तयाचें जियालें म्हणों काई । वरी मरण चांग ॥ १९३ ॥

१९३) ऐक. ज्या प्राण्याच्या ठिकाणीं या ज्ञानाची आवड नाहीं त्याच्या जगण्याला काय म्हणावें ? त्यापेक्षां मरण बरें.  

शून्य जैसें गृह । कां चैतन्येंवीण देह ।

तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीना ॥ १९४ ॥

१९४) जसें ओसाड घर किंवा जसा प्राणरहित देह ( व्यर्थ होय ), तसे ज्ञानहीनास जीवित हें केवळ शून्यवत आहे. 

अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परी ते चाड एकी जरी वाहे ।

तरी तेथ जिव्हाळा कांहीं आहे । प्राप्तीचा पैं ॥ १९५ ॥

१९५) अथवा, खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली, पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्यानें बाळगली, तरी त्याला ज्ञान प्राप्त होण्याची कांहीतरी आशा आहे.

वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परि ते आस्थाही न धरी मानसीं ।

तरी तो संशयरुपहुताशीं । पडिला जाण ॥ १९६ ॥

१९६) एर्‍हवीं ज्ञानाची गोष्ट कशाला ? पण जो त्याच्याबद्दल आस्थाहि बाळगीत नाहीं, तो संशयरुप अग्नींत पडला, असें समज.

जे अमृतही परि नावडे । ऐसें साविताचि आरोचकु जैं पडे ।

तैं मरण आलें असें फुडें । जाणों ये कीं ॥ १९७ ॥

१९७) अमृतहि आवडत नाहीं, अशी अरुची ज्यावेळेस स्वभावतःच येते, त्यावेळेस मरण ओढवलें आहे असें निश्र्चित समजावें.

 तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेंसींचि माजे ।

तो संशयें अंगीकारिजे । एथ भ्रांति नाहीं ॥ १९८ ॥

१९८) त्याप्रमाणें जो विषयसुखानें रंगून जातो व ज्ञानाविषयीं जो बेपर्वा असतो, तो संशयानें घेरला जाईल, यांत संशय नाहीं. 

मग संशयीं जरी पडला । तरी निभ्रांत जाणें नासला ।

तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासि गा ॥ १९९ ॥

१९९) अशा रीतीनें जो संशयांत पडला, त्याचा निःसंशय घात झाला असें समज. तो इहलोकांतील सुखाला आचवला. 

जया काळज्वरु आंगीं बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे ।

आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानी ॥ २०० ॥

२००) ज्याला विषयज्वर झालेला असतो, त्याला जसें 

शीत-उष्ण कांहीं कळत नाहीं; तो अग्नि आणि चांदणें ही 

दोन्हीं सारखींच मानतो;



Custom Search

No comments: