Wednesday, December 29, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 10 Part 3 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १० भाग ३

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 10 Part 3 
Ovya 64 to 91 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १० भाग ३ 
ओव्या ६४ ते ९१

मूळ श्र्लोक 

न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।

अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वश: ॥ २ ॥

२) देवांना किंवा महर्षींना माझी उत्पत्ति माहीत नाहीं. कारण देव आणि महर्षि या सर्वांचें आदिकारण मी आहें.

एथ वेद मुके जाहाले । मन पवन पांगुळले ।

रातीविण मावळले । रविशशी ॥ ६४ ॥

६४) या माझ्या स्वरुपीं वेदांना बोलतां येईना, मन आणि प्राण यांची गति माझ्या स्वरुपीं चालेना, सूर्य व चंद्र हे माझ्या स्वरुपीं रात्रींशिवाय मावळले. ( ते माझ्या स्वरुपाचें प्रकाशन करुं शकत नाहीत. )

उदरींचा गर्भु जैसा । नेणे मायेची वयसा ।

देवांसि मी तैसा । चोजवेना ॥ ६५ ॥

६५) पोटांत असलेला गर्भ ज्याप्रमाणें ( आपल्या ) आईचें वय जाणत नाहीं, त्याप्रमाणें देवांना माझें ज्ञान होत नाहीं,

आणि जळचरां उदधीचें मान । मशकां नोलांडवे गगन ।

तैसें महर्षींचे ज्ञान । नेणे मातें ॥ ६६ ॥

६६) आणि ज्याप्रमाणें पाण्यांत राहणार्‍या प्राण्यांना समुद्राचें माप कळत नाहीं. ( किंवा ) चिलटास आकाश ओलांडता येत नाहीं, त्याप्रमाणें मोठाल्या ऋषींचे ज्ञान मला जाणू शकत नाहीं.

मी कवण केतुका । कवणाचा कैं जाहला ।

निरुती या करितां बोला । युगें गेलीं ॥ ६७ ॥

६७) मी कोण आहे, केवढा आहे कोणापासून व केव्हां उत्पन्न झालों, या गोष्टींचा निर्णय करण्यांत किती एक युगें निघून गेली. 

महर्षी आणि या देवां । येरां भूतजातां सर्वां ।

मी आदि म्हणोनि पांडवा । जाणता अवघड ॥ ६८ ॥

६८) मोठाले ऋषि आणि देव यांना आणि दुसरे जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना मीच कारण आहे. म्हणून अर्जुना मला जाणणें, त्यांना कठीण आहे.,

उतरलें उदक पर्वत वळघे । कां वाढते झाड मुळीं लागे ।

 तरी मियां जालेनि जगें । जाणिजे मी ॥ ६९ ॥

६९) पर्वतावरुन खालीं आलेलें पाणी जर पुन्हा पर्वतावर चढेल, अथवा वाढणारें झाड शेंड्याकडून मुळाकडे येईल, तर माझ्यापासून झालेल्या जगाकडून मी जाणला जाईन.

का गाभेवनें बटु गिंवसवे । तरंगीं सागरु सांठवे ।

कां परमाणूमाजीं सामावे । भूगोलु हा ॥ ७० ॥

७०) अथवा वडाच्या सूक्ष्म अंकुरांत जर वडाचें विस्तीर्ण झाड सापडलें जाईल, अथवा, जर लाटेमध्ये जर समुद्र सांठवला जाईल, अथवा ही पृथ्वी जर परमाणूंत सांपडली जाईल;  

तरी मियां जालियां जीवां । महर्षी अथवा देवां ।

मातें जाणावया होआवा । अवकाशु गा ॥ ७१ ॥

७१) असेण होईल तर, अर्जुना, माझ्यापासून उत्पन्न झालेल्या प्राण्यांना, महर्षींना अथवा देवांना माझी ओळख होणयास लाग आहे.

ऐसाही जरी विपायें । सांडुनि पुढील पाये ।

सर्वेंद्रियांसि होये । पाठिमोरा जो ॥ ७२ ॥

७२) असा जरी मी जाणण्याला कठीण आहे, तरी कदाचित् जो कोणी बाह्य वृत्ति टाकून ( देहादि अनात्म तत्त्वांकडे जाणारी वृत्ति काढून ) सर्व इंद्रियांकडे पाठमोरा होतो ( वृत्ति अंतर्मुख करतो; )

प्रवर्तलाही वेगीं बहुडे । देह सांडुनि मागलीकडे ।

महाभूतांचिया चढे । माथयावरी ॥ ७३ ॥

७३) देहादि अनात्म तत्त्वांकडे जरी त्याची प्रवृत्ति झाली, तरी तेथून वेगानें माघारी फिरतो; स्थूल, सूक्ष्म व कारण हे देह मागें टाकून ( विचाराने यांचा निरास करुन ) पंचमहाभूतांच्याहि माथ्यावर ( जो ) चढतो, ( पंचमहाभूतांचा निरास करतो. )

मूळ श्लोक

यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।

असंमूढः स मर्तेषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३ ॥

३) जो मला जन्मरहित, अनादि आणि लोकमहेश्वर असें जाणतो, तो मानवांमध्यें ज्ञानी आहे व तो सर्व पापांपासून मुक्त होतो. 

तैसा राहोनि ठायठिके । स्वप्रकाशें चोखें ।

अजत्व माझें देखे । आपुलिये डोळां ॥ ७४ ॥

७४) याप्रमाणें चांगल्या रीतीनें त्या ठिकाणीं स्थिर राहून शुद्ध आत्मप्रकाशाच्या योगानें, आपल्या डोळ्यांनी ( प्रत्यक्ष ) माझें जन्मरहित्य ( जो ) जाणतो 

मी आदिसि परु । सकळलोकमहेश्र्वरु ।

ऐसिया मातें जो नरु । यापरी जाणे ॥ ७५ ॥

७५) मी आरंभाच्या पलीकडील ( अनादि ) आहे व सर्व लोकांचा मुख्य ईश्र्वर आहे, अशा मला जो पुरुष याप्रमाणें जाणतो;

तो पाषाणांमाजि परिसु । रसांमाजी सिद्धरसु । 

तैसा मनुष्याकृति अंशु । तो माझाचि जाण ॥ ७६ ॥

७६) तो पुरुष पाषाणामध्ये परीस जसा श्रेष्ठ किंवा सर्व रसांत अमृत जसें श्रेष्ठ, त्याप्रमाणें तो मनुष्याच्या आकारानें असलेला माझा ( श्रेष्ठ ) अंश आहे असें समज.

तो चालतें ज्ञानाचें बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ ।

परी माणुसपणाची भांब । लोकाचि भागु ॥ ७७ ॥

७७) तो ज्ञानाची चालती मूर्ति आहे, त्याचे अवयव ते सुखाला फुटलेले अंकुर आहेत; परंतु ( त्याच्या ठिकाणीं दिसणारा ) माणूसपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भ्रम आहे.

अगा अवचिता कापुरा--। माजीं सांपडला हिरा ।

वरी पडलिया नीरा । न निगे केवीं ॥ ७८ ॥

७८) अर्जुना, हिरा जर अकस्मात् कापरांत सांपडला व त्यावर जर पाणी पडलें, तर त्या पाण्याकडून तो विघळल्याशिवाय भिन्न असा बाहेर निराळा कसा पडणार नाहीं ? ( तर पडेल तो कापरासारखा पाण्यांत विरघळणार नाहीं. )

तैसा मनुषयलोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु ।

तर्‍ही प्रकृतिदोषाची मातु । नेणिजे तेथ ॥ ७९ ॥

७९) त्याप्रमाणें मनुष्यप्राण्यांत जरी तो शरीरधारी दिसला, तरी पण त्याच्या ठिकाणीं जन्ममृत्यु आदिकरुन प्रकृतिदोषांची गोष्टहि माहीत नसते. 

तो आपसयेंचि सांडिजे पापीं । जैसा जळत चंदनु सर्पीं ।

तैसा मातें जाणे तो संकल्पीं । वर्जूनि घालिजे ॥ ८० ॥

८०) त्या पुरुषाला आपोआपच पापें टाकून जातात. ज्याप्रमाणें आग लागलेल्या चंदनाच्या झाडाला वेढा घालून असलेले साप सोडून जातात, त्याप्रमाणें मला जो ओळखतो; तो संकल्पांकडून टाकला जातो.

तेंचि मातें कैसें जाणिजे । ऐसें कल्पी जरी चित्त तुझें ।

तरी मी ऐसा हे माझे । भाव ऐकें ॥ ८१ ॥

८१) तेंच मला कसें जाणावें, असें जर कांहीं तुझें मन इच्छा करील, तर मी असा आहें व हें माझ्यापासून झालेले निराळे पदार्थ असे आहेत, तें ऐक, 

जे वेगळालां भूतीं । सारिखे होऊनि प्रकृती ।

विखुरले आहेति त्रिजगतीं । आघविये ॥ ८२ ॥

८२) ते माझे विकार भिन्न भिन्न प्राण्यांमध्यें त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनून संपूर्ण त्रैलोक्यांत पसरले आहेत.   

मूळ श्र्लोक

बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः ।

सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेवच ॥ ४ ॥

४) बुद्धि, ज्ञान, असंमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दुःख, होणें, न होणें, भय व अभय; 

अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।

भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ ५ ॥

५) अहिंसा, समता, तुष्टि, तप, दान, यश, अपकीर्ति, इत्यादि भूतांचे निरनिराळ्या प्रकारचे भाव, माझ्यापासूनच उत्पन्न होतात. 

ते प्रथम जाण बुद्धि । मग ज्ञान जें निरवधि ।

असंमोह सहनसिद्धि । क्षमा सत्य ॥ ८३ ॥

८३) त्यापैकी पहिली बुद्धि आहे असें समज. नंतर अगाध ज्ञान, असंमोह ( सहज उपस्थित झालेल्या ज्ञेय गोष्टींकडे विवेकपूर्वक प्रवृत्ति ), सहन करण्याचा स्वभाव म्हणजे भ्रम आणि सत्य ( हीं समज ). 

मग शम दम दोन्ही । सुख दुःख वर्तत जनीं ।

अर्जुना भावाभाव मानीं । भावाचिमाजीं ॥ ८४ ॥

८४) मग शम ( मनोनिग्रह ) आणि दम ( इंद्रियनिग्रह ) हे दोन आणि लोकांत असलेलें सुख व दुःख, आणि अर्जुना, होणें आणि नसणें या सर्वांची माझ्याच विकारात गणना कर.

आतां भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता ।

हे मम रुपाचि पांडुसुता । ओळख तूं ॥ ८५ ॥

८५) आतां अर्जुना, भय आणि निर्भयपणा, अहिंसा आणि समबुद्धि हीं माझींच रुपें आहेत, हें तूं जाण.

दान यश अपकीर्ति । हे जे भाव सर्वत्र वसती ।

ते मजचि पासून होती । भूतांचां ठायीं ॥ ८६ ॥    

८६) दान, यश व दुष्कीर्ति, हे जे विकार सर्व ठिकाणीं राहतात, ते माझ्यापासून प्राण्यांच्या ठिकाणीं उत्पन्न होतात; 

जैसीं भूते आहति सिनानीं । तैसे चिहे वेगळाले मानीं ।

एक उपजती माझां ज्ञानी । एक नेणती मातें ॥ ८७ ॥

८७) जशीं भूतें वेगवेगळाली आहेत, तसेच हे भाव वेगवेगळाले आहेत, असें समज. त्यापैकीं कित्येक भाव माझ्या ज्ञानांत उत्पन्न होतात आणि कित्येक मला जाणत नाहींत, ( माझ्या अज्ञानांत उत्पन्न होतात ).

अगा प्रकाश आणि कडवसें । सूर्याचिस्तव जैसें ।

प्रकाश उदयीं दिसे । तम अस्तूसीं ॥ ८८ ॥

८८) अरे अर्जुना, प्रकाश आणि अंधार हे परस्पर विरुद्ध स्वभावाचे असूनहि ते ज्याप्रमाणें एका सूर्यापासून होतात; सूर्याच्या उदयांत प्रकाश दिसतो आणि सूर्याच्या अस्ताबरोबर अंधार होतो.  

आणि माझें जें जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवांचें करणें ।

म्हणोनि भूतीं भावाचें होणें । विषम पडे ॥ ८९ ॥

८९) आणि माझें जें ज्ञान होणें अथवा माझें जें अज्ञान असणें, हें प्राण्यांच्या दैवाचें कर्तव्य आहे, म्हणून त्याप्रमाणें प्राणिमात्राच्या ठिकाणीं कमीजास्त प्रमाणांत ह्या विकारांस व्हावें लागतें.     

यापरी माझां भावीं । हें जीवसृष्टि आहे आघवी ।

गुंतली असे जाणावीं । पंडुकुमरा ॥ ९० ॥

९०)  ह्याप्रमाणें माझ्या विकारांत ही संपूर्ण जीवनसृष्टि सांपडली आहे, असें अर्जुना, समज,   

आतां इये सृष्टीचे पालक । तयां आधीन वर्तती लोक ।

ते अकरा भाव आणिक । सांगेन तुज ॥ ९१ ॥

९१) आतां ह्या सृष्टिचें पालन करणारे आणि ज्यांच्या

 ताब्यांत सर्व लोक वागतात, ते आणखी अकरा भाव तुला

 सांगेन. 



Custom Search

No comments: