Thursday, April 28, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 4 Doha 7 to 9 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग ४ दोहा ७ ते ९

ShriRamCharitManas
Aranyakand Part 4 
Doha 7 to 9 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग ४ 
दोहा ७ ते ९

दोहा—देखि राम मुख पंकज मुनिबर लोचन भृंग ।

सादर पान करत अति धन्य जन्म सरभंग ॥ ७ ॥

श्रीरामचंद्रांचे मुखकमल पाहून मुनिश्रेष्ठ शरभंगांचे नेत्ररुपी भ्रमर अत्यंत आदराने त्याचे सौंदर्यपान करु लागले. शरभंगांचा जन्म धन्य होय. ॥ ७ ॥

कह मुनि सुनु रघुबीर कृपाला । संकर मानस राजमराला ॥

जात रहेउँ बिरंचि के धामा । सुनेउँ श्रवन बन ऐहहिं रामा ॥

मुनी म्हणाले, ‘ हे कृपाळू रघुवीर, हे श्रीशंकरांच्या मनरुपी मनाससरोवरातील राजहंस, ऐका. मी ब्रह्मलोकी जात होतो. इतक्यात माझ्या कानी आले की, श्रीराम वनात येणार आहेत. ॥ १ ॥

चितवन पंथ रहेउँ दिन राती । अब प्रभु देखि जुड़ानी छाती ॥

नाथ सकल साधन मैं हीना । कीन्ही कृपा जानि जन दीना ॥

तेव्हापासून रात्रंदिवस मी तुमची वाट पाहात आहे. आज प्रभूंना पाहून मन शांत झाले. हे नाथ, मी कोणतेही साधन केलेले नाही. तरीही तुम्ही आपला दीन सेवक समजून माझ्यावर कृपा केली. ॥ २ ॥

सो कछु देव न मोहि निहोरा । निज पन राखेउ जन मन चोरा ॥

तब लगि रहहु दीन हित लागी । जब लगि मिलौं तुम्हहि तनु त्यागी ॥

हे देवा, हा काही माझ्यावर तुमचा उपकार नाही. हे भक्ताचे हृदय चोरणारे, असे करुन तुम्ही आपल्या ब्रीदाचे पालन केलेत. आता मी शरीर सोडून तुमच्या परमधामात जात नाही, तोपर्यंत या दीन सेवकाच्या कल्याणासाठी येथे थांबा. ‘ ॥ ३ ॥

जोग जग्य जप तप ब्रत कीन्हा । प्रभु कहँ देइ भगति बर लीन्हा ॥

एहि बिधि सर रचि मुनि सरभंगा । बैठे हृदयँ छाड़ि सब संगा ॥

योग, यज्ञ, जप, तप व व्रत इत्यादी जे काही शरभंगांनी केले होते, ते सर्व प्रभूंना अर्पण केले आणि त्याबदली भक्तीचे वरदान घेतले. अशाप्रकारे दुर्लभ भक्ती प्राप्त केल्यावर मुनी शरभंगांनी चिता रचली व मनःपूर्वक सर्व आसक्ती सोडून ते चितेवर बसले. ॥ ४ ॥

दोहा—सीता अनुज समेत प्रभु नील जलद तनु स्याम ॥

मम हियँ बसहु निरंतर सगुनरुप श्रीराम ॥ ८ ॥

ते म्हणाले, ‘ हे नील मेघाप्रमाणे श्याम शरीर असणार्‍या सगुण रुप श्रीराम, सीता व लक्ष्मणासह तुम्ही माझ्या हृदयावर निरंतर निवास करा.’ ॥ ८ ॥

अस कहि जोग अगिनि तनु जारा । राम कृपॉं बैकुंठ सिधारा ॥

ताते मुनि हरि लीन न भयऊ । प्रथमहिं भेद भगति बर लयऊ ॥

असे म्हणून शरभंगांनी योगाग्नीने आपले शरीर भस्म करुन टाकले व ते श्रीरामांच्या कृपेने वैकुंठास गेले. त्यांनी भेद-भक्तीचा वर पूर्वीच घेतला होता, म्हणून ते भगवंतामध्ये लीन झाले नाहीत. ॥ १ ॥  

रिषि निकाय मुनिबर गति देखी । सुखी भए निज हृदयँ बिसेषी ॥

अस्तुति करहिं सकल मुनि बृंदा । जयति प्रनत हित करुना कंदा ॥

ऋषि-समाज मुनिश्रेष्ठ शरभंगांची ती दुर्लभ गती पाहून आपल्या मनातून खूप सुखावला. सर्व मुनिवृदं श्रीरामांची स्तुती करु लागला. ते म्हणत होते, ‘ शरणागतहितकारी करुणाकंद प्रभूंचा विजय असो.’ ॥ २ ॥

पुनि रघुनाथ चले बन आगे । मुनिबर बृंद बिपुल सँग लागे ॥

अस्थि समूह देखि रघुराया । पूछी मुनिन्ह लागि अति दाया ॥

नंतर श्रीरघुनाथ पुढील वनात गेले. श्रेष्ठ मुनींची अनेक मंडळे त्यांच्याबरोबर निघाली. वाटेत एका ठिकाणी हाडांचे ढीग पाहून श्रीरामांना अतिशय दया आली. त्यांनी मुनींना विचारले, ॥ ३ ॥

जानतहूँ पूछिअ कस स्वामी । सबदरसी तुम्ह अंतरजामी ॥

निसिचर निकर सकल मुनि खाए । सुनि रघुबीर नयन जल छाए ॥

मुनी म्हणाले, ‘ हे स्वामी, तुम्ही सर्वदर्शी आणि अतंर्यामी आहात. सर्व जाणत असतानाही आम्हांस कां विचारता ? राक्षसांच्या झुंडींनी सर्व मुनींना खाऊन टाकले, त्यांची ही हाडे आहेत. ‘ हे ऐकताच श्रीरघुवीरांच्या नेत्रंमध्ये करुणेमुळे पाणी आले. ॥ ४ ॥

दोहा---निसिचर हीन करउँ महि भुज उठाइ पन कीन्ह ।

सकल मुनिन्ह के आश्रमन्हि जाइ सुख दीन्ह ॥ ९ ॥

त्यावेळी श्रीरामांनी हात उचलून प्रतिज्ञा केली की, ’ मी पृथ्वीला राक्षसरहित करुन टाकीन. ‘ नंतर त्यानी सर्व मुनींच्या आश्रमांना भेटी देऊन दर्शन व संभाषणाचे त्यांना सुख दिले. ॥ ९ ॥

मुनि अगस्ति कर सिष्य सुजाना । नाम सुतीछन रति भगवाना ॥

मन क्रम बचन राम पद सेवक । सपनेहुँ आन भरोस न देवक ॥

अगस्त्य मुनींचे सुतीक्ष्ण नावाचे एक ज्ञानी शिष्य होते. त्यांना भगवंतांविषयी अत्यंत प्रेम होते. ते काया-वाचा-मनाने श्रीरामांच्या चरणांचे सेवक होते. त्यांना स्वप्नातही इतर कोणत्याही देवाविषयी आदर वाटत नव्हता. ॥ १ ॥

प्रभु आगवनु श्रवन सुनि पावा । करत मनोरथ आतुर धावा ॥

हे बिधि दीनबंधु रघुराया । मी से सठ पर करिहहिं दाया ॥

जेव्हा त्यांनी प्रभूंचे आगमन होत असल्याचे ऐकले, तेव्हा ते अनेक मनोरथ करीत आतुर होऊन धावत निघाले. ते मनात म्हणत होते की, ‘ हे विधात्या, दीनबंधू श्रीरघुनाथ माझ्यासारख्या दुष्टावरही दया करतील काय ? ॥ २ ॥

सहित अनुज मोहि राम गोसाईं । मिलिहहिं निज सेवक की नाईं ॥

मोरे जियँ भरोस दृढ़ नाहीं । भगति बिरति न ग्यान मन माहीं ॥

स्वामी राम हे लक्ष्मणासह मला आपल्या सेवकाप्रमाणे भेटतील काय ? माझ्या मनाला याची खात्री वाटत नाही. कारण माझ्या मनात भक्ती, वैराग्य किंवा ज्ञान यांपैकी काहीही नाही. ॥ ३ ॥

नहिं सतसंग जोग जप जागा । नहिं दृढ़ चरन कमल अनुरागा ॥

एक बानि करुनानिधान की । सो प्रिय जाकें गति न आन की ॥

मी कधी सत्संग, योग, जप किंवा यज्ञसुद्धा केलेला नाही; आणि प्रभूंच्या चरणी माझे दृढ प्रेमही नाही. एक मात्र खरे की, ज्याला कुणाचा आधार नाही, तो प्रभूंना प्रिय असतो, असा दयेचे भांडार असलेल्या प्रभूंचा स्वभाव आहे. ॥ ४ ॥

होइहैं सुफल आजु मम लोचन । देखि बदन पंकज भव मोचन ॥

निर्भर प्रेम मगन मुनि ग्यानी । कहि न जाइ सो दस भवानी ॥

भगवंतांच्या या स्वभावाची आठवण येताच ते आनंदमग्न होऊन म्हणू लागले की, ‘ भवबंधनांतून मुक्त करणारे प्रभूंचे मुखकमल पाहून आज माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. ‘ शिव म्हणतात, ‘ हे भवानी, ज्ञानी मुनी प्रेमामध्ये पूर्णपणे निमग्न झाले. त्यांची ती दशा अवर्णनीय होती. ॥ ५ ॥

दिसि अरु बिदिसि पंथ नहिं सूझा । को मैं चलेउँ कहॉं नहिं बूझा ॥

कबहुँक फिरि पाछें पुनि जाई । कबहुँक नृत्य करइ गुन गाई ॥

त्यांना दिशा किंवा रस्ता हे काहीच कळत नव्हते. आपण कोण आहोत आणि कुठे जात आहोत, हे काहीही कळत नव्हते. ते कधी मागे वळून पुन्हा पुढेचालू लागत आणि कधी प्रभूंचे गुण गात नाचू लागत. ॥ ६ ॥

अबिरल प्रेम भगति मुनि पाई । प्रभु देखैं तरु ओट लुकाई ॥

अतिसय प्रीति देखि रघुबीरा । प्रगटे हृदयँ हरन भव भीरा ॥

मुनींनी प्रगाढ अशी प्रेमभक्ती प्राप्त केली होती. प्रभू श्रीराम वृक्षाआडून लपून भक्तीची ती प्रेमोन्मत्त दशा पाहात होते. मुनींचे अत्यंत प्रेम पाहून भव-भय हरण करणारे श्रीरघुनाथ मुनींच्या हृदयांत प्रगट झाले. ॥ ७ ॥

मुनि मग माझ अचल होइ बैसा । पुलक सरीर पनस फल जैसा ॥

तब रघुनाथ निकट चलि आए । देखि दसा निज जन मन भाए ॥

हृदयात प्रभूंचे दर्शन झाल्याने मुनी रस्त्यामध्येच स्तब्ध बसले. त्यांचे शरीर रोमांच्यामुळे फणसासारखे काटेदार झाले. तेव्हा श्रीरघुनाथ त्यांच्याजवळ आले आणि आपल्या भक्ताची प्रेमदशा पाहून मनाने अत्यंत प्रसन्न झाले. ॥ ८ ॥

मुनिहि राम बहु भॉंति जगावा । जाग न ध्यान जनित सुख पावा ॥

भूप रुप तब राम दुरावा । हृदयँ चतुर्भुज रुप देखावा ॥

श्रीरामांनी त्यांना जागे करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते जागे झाले नाहीत, कारण त्यांना प्रभूंच्या ध्यानाचे सुख लाभत होते. तेव्हा श्रीरामांनी आपले राजरुप लपविले आणि मुनींच्या हृदयात आपले चतुर्भुजरुप प्रकट केले. ॥ ९ ॥

मुनि अकुलाइ उठा तब कैसें । बिकल हीन मनि फनिबर जैसें ॥

आगें देखि राम तन स्यामा । सीता अनुज सहित सुख धामा ॥

आपले इष्ट-स्वरुप अंतर्धान होताच, जसा श्रेष्ठ मणिधर साप मण्याविना व्याकूळ होऊन जातो, तसे मुनी व्याकूळ झाले. मुनींना आपल्या डोळ्यांसमोर सीता व लक्ष्मणासह श्यामसुंदर मूर्ती असलेले सुखधाम श्रीराम दिसले. ॥ १० ॥

परेउ लकुट इव चरनन्हि लागी । प्रेम मगन मुनिबर बड़भागी ॥

भुज बिसाल गहि लिए उठाई । परम प्रीति राखे उर लाई ॥

प्रेमात मग्न झालेल्या त्या भाग्यवान श्रेष्ठ मुनींनी दंडवत करीत श्रीरामांच्या चरणी लोळण घेतली. श्रीरामांनी आपल्या विशाल भुजांनी धरुन त्यांना उठवले आणि मोठ्या प्रेमाने हृदयाशी धरले. ॥ ११ ॥

मुनिहि मिलत अस सोह कृपाला । कनक तरुहि जनु तमाला ॥

राम बदनु बिलोक मुनि ठाड़ा । मानहुँ चित्र माझ लिखि काढ़ा ॥

कृपाळू श्रीरामचंद्र मुनींना भेटताना असे वाटत होते की,

 जणू सोन्याच्या वृक्षाला तमाल वृक्ष मिठि मारत आहे.

 मुनी निस्तब्ध उभे होते आणि एकटक श्रीरामांचे मुख

 न्याहाळत होते; जणू ते चित्र चितारुन बनविले असावे. 

॥ १२ ॥ 

 


Custom Search

No comments: