Monday, May 10, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 23 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग २३

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 23 
Doha 131 To 136 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग २३
दोहा १३१ ते १३६
दोहा—जाहि न चाहिअ कबहुँ कछु तुम्ह सन सहज सनेहु ।
बसहु निरंतर तासु मन सो राउर निज गेहु ॥ १३१ ॥
ज्याला कधीही काहीही नको असते आणि ज्याला तुमच्याविषयी स्वाभाविक प्रेम आहे, तुम्ही त्याच्या मनात निरंतर वास करा. ते तुमचे स्वतःचे घर होय. ‘ ॥ १३१ ॥
एहि बिधि मुनिबर भवन देखाए । बचन सप्रेम राम मन भाए ॥
कह मुनि सुनहु भानुकुलनायक । आश्रम कहउँ समय सुखदायक ॥
अशा प्रकारे मुनिश्रेष्ठ वाल्मीकींनी श्रीरामचंद्रांना घरे दाखविली. त्यांचे प्रेमपूर्ण शब्द ऐकून श्रीरामांच्या मनाला बरे वाटले. नंतर मुनी म्हणाले, ‘ हे सूर्यकुलाचे स्वामी, ऐका. आता मी या प्रसंगी तुम्हांला सुखदायक ठरणारा आश्रम सांगतो. ॥ १ ॥
चित्रकूट गिरि करहु निवासु । तहँ तुम्हार सब भॉंति सुपासू ॥
सैलु सुहावन कानन चारु । करि केहरि मृग बिहग बिहारु ॥
तुम्ही चित्रकूट पर्वतावर निवास करा. तेथे सर्व प्रकारच्या सोयी आहेत आणि सुंदर पर्वत व वन आहे. तो पर्वत हत्ती, सिंह, हरीण व पक्ष्यांचे विहार स्थल आहे. ॥ २ ॥
नदी पुनीत पुरान बखानी । अत्रिप्रिया निज तप बल आनी ॥
सुरसरि धार नाउँ मंदाकिनि । जो सब पातक पोतक डाकिनि ॥
जिची पुराणांमध्ये प्रशंसा केली आहे, ती पवित्र नदी तेथे आहे. अत्री ॠषींची पत्नी अनसूया हिने आपल्या तपोबलाने तिला आणले आहे. ती गंगेचीच धार असून तिला मंदाकिनी असे नाव आहे. ती सर्व पापरुपी बालकांना खाऊन टाकणार्‍या डाकिणी सारखी आहे. ॥ ३ ॥
अत्रि आदि मुनिबर बहु बसहीं । करहिं जोग जप तप तन कसहीं ॥
चलहु सफल श्रम सब कर करहू । राम देहु गौरव गिरिबरहू ॥
अत्री इत्यादी पुष्कळ श्रेष्ठ मुनी तेथे निवास करतात. ते योग, जप आणि तप यांच्याद्वारे आपले शरीर झिजवीत असतात. हे रामा, चला. त्या सर्वांचे परिश्रम सफल करा व पर्वतश्रेष्ठ चित्रकूट पर्वताला गोरव प्राप्त करुन द्या. ॥ ४ ॥
दोहा—चित्रकूट महिमा अमित कही महामुनि गाइ ।
आइ नहाए सरित बर सिय समेत दोउ भाइ ॥ १३२ ॥
महामुनी वाल्मिकींनी चित्रकूट पर्वताचा अपार महिमा वर्णन करुन सांगितला. तेव्हा सीतेसह दोघा भावांनी येऊन श्रेष्ठ नदी मंदाकिनीमध्ये स्नान केले. ॥ १३२ ॥
रघुबर कहेउ लखन भल घाटू । करहु कतहुँ अब ठाहर ठाटू ॥
लखन दीख पय उतर करारा । चहुँ दिसि फिरेउ धनुष जिमि नारा ॥
श्रीरामचंद्र म्हणाले, ‘ लक्ष्मणा, फार चांगला घाट आहे. आता येथेच कुठेतरी राहाण्याची व्यवस्था कर. ‘ तेव्हा लक्ष्मणाने पयस्विनी नदीच्या उत्तरेकडील उंच किनारा पाहिला आणि म्हटले, ‘ याच्या चोहीकडे धनुष्यासारखा वळण घेतलेला ओढा आहे. ॥ १ ॥
नदी पनच सर सम दम दाना । सकल कलुष कलि साउज नाना ॥
चित्रकूट जनु अचल अहेरी । चुकइ न घात मार मुठभेरी ॥
मंदाकिनी नदी त्या धनुष्याची प्रत्यंचा आहे आणि शम, दम, दान हे बाण आहेत. कलियुगातील सर्व पापे ही अनेक हींस्र पशू आहेत. चित्रकूट हा जणू स्थिर शिकारी आहे. त्याचा नेम कधी चुकत नाही. तो समोरासमोर मारतो. ॥ २ ॥
अस कहि लखन ठाउँ देखरावा । थलु बिलोकि रघुबर सुखु पावा ॥
रमेउ राम मनु देवन्हु जाना । चले सहित सुर थपति प्रधाना ॥
असे म्हणून लक्ष्मणाने ते स्थान दाखविले. ते स्थान पाहून श्रीरामांना बरे वाटले. जेव्हा देवांना कळले की, येथे श्रीरामांचे मन रमले आहे, तेव्हा ते देवांचा मुख्य स्थापत्य विशारद विश्वकर्मा याला बरोबर घेऊन तेथे आले. ॥ ३ ॥
कोल किरात बेष सब आए । रचे परन तृन सदन सुहाए ॥
बरनि न जाहिं मंजु दुइ साला । एक ललित लघु एक बिसाला ॥
सर्व देव कोल व भिल्लांच्या रुपाने आले आणि त्यांनी दिव्य पानांनी व गवतांनी सुंदर घरे बनविली. दोन सुंदर कुटी बनविल्या. त्यांचे वर्णन करणे शक्य नाही. त्यांमध्ये एक फार सुंदर अशी कुटी होतीआणि दुसरी मोठी. ॥ ४ ॥
दोहा--लखन जानकी सहित प्रभु राजत रुचिर निकेत ।
सोह मदनु मुनि बेष जनु रितुराज समेत ॥ १३३ ॥
लक्ष्मण आणि जानकीसह प्रभू रामचंद्र सुंदर गवत-पानांच्या घरांमध्ये शोभून दिसत होते. जणू कामदेवच मुनीचा वेष धारण करुन पत्नी रती व वसंत ऋतूसह शोभत होता. ॥ १३३ ॥
मासपरारायण सतरावा विश्राम
अमर नाग किंनर दिसिपाला । चित्रकूट आए तेहि काला ॥
राम प्रनामु कीन्ह सब काहू । मुदित देव लहि लोचन लाहू ॥
त्यावेळी देव, नाग, किन्नर आणि दिक्पाल हे चित्रकूटावर आले आणि श्रीरामांनी त्यांना प्रणाम केला. डोळ्यांचे पारणे फिटल्यामुळे देव आनंदित झाले. ॥ १ ॥
बरषि सुमन कह देव समाजू । नाथ सनाथ भए हम आजू ॥
करि बिनती दुख दुसह सुनाए । हरषित निज निज सदन सिधाए ॥
फुले उधळीत देवांनी म्हटले, ' हे नाथ, आज तुमच्या दर्शनाने आम्ही सनाथ झालो. ' त्यानंतर त्यांनी आपली असह्य दुःखे सांगितली आणि दुःखाचा नाश करण्याचे आश्वासन श्रीरामांच्याकडून मिळवून आनंदाने ते आपापल्या स्थानी निघून गेले. ॥ २ ॥
चित्रकूट रघुनंदनु छाए । समाचार सुनि सुनि मुनि आए ॥
आवत देखि मुदित मुनिबृंदा । कीन्ह दंडवत रघुकुलचंदा ॥
श्रीरघुनाथ हे चित्रकूटावर राहात आहेत, ही वार्ता ऐकून पुष्कळसे मुनी आले. रघुकुलाचे चंद्र असलेल्या श्रीरामांनी आनंदित झालेल्या मुनि-मंडळींना येत असल्याचे पाहून दंडवत प्रणाम केला. ॥ ३ ॥
मुनि रघुबरहि लाइ उर लेहिं । सुफल होन हित आसिष देहीं ॥
सिय सौमित्रि राम छबि देखहिं । साधन सकल सफल करि लेखहिं ॥
मुनिगणांनी श्रीरामांना हृदयाशी धरले आणि यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. सीता, लक्ष्मण आणि श्रीराम यांचे लावण्य त्यांनी पाहिले व आपल्या सर्व साधनांचे साफल्य झाले, असे त्यांना वाटले. ॥ ४ ॥
दोहा--जथाजोग सनमानि प्रभु बिदा किए मुनिबृंद ।
करहिं जोग जप जाग तप निज आश्रमन्हि सुछंद ॥ १३४ ॥
प्रभू श्रीरामांनी मुनी मंडळींचा यथायोग्य सन्मान करुन त्यांना निरोप दिला. श्रीराम आल्यामुळे ते सर्व आपापल्या आश्रमांमध्ये आता निर्धास्तपणे योग, जप, यज्ञ व तप करु लागले. ॥ १३४ ॥            
यह सुधि कोल किरातन्ह पाई । हरषे जनु नव निधि घर आई ॥
कंद मूल फल भरि भरि दोना । चले रंक जनु लूटन सोना ॥
श्रीरामांच्या आगमनाची वार्ता जेव्हा कोल व भिल्ल या लोकांना मिळाली, तेव्हा ते असे आनंदित झाले की, जणू नव निधी त्यांच्या घरी आले.ते द्रोणांमध्ये कंद, मुळे व फळे भरभरुन घेऊन निघाले. जणू दरिद्री लोक सोने लुटायला निघाले होते. ॥ १ ॥
तिन्ह महँ जिन्ह देखे दोउ भ्राता । अपर तिन्हहि पूँछहिं मगु जाता ॥
कहत सुनत रघुबीर निकाई । आइ सबन्हि देखे रघुराई ॥
त्यांपैकी ज्यांनी दोघा भावांना पूर्वी पाहिले होते, त्यांना इतर लोक वाटेत जाताना त्यांच्याबद्दल विचारत होते. अशा प्रकारे श्रीरामांचे सौंदर्य सांगत-ऐकत सर्वांनी येऊन श्रीरामांचे दर्शन घेतले. ॥ २ ॥
करहिं जोहारु भेंट धरि आगे । प्रभुहि बिलोकहिं अति अनुरागे ॥
चित्र लिखे जनु जहँ तहँ ठाढ़े । पुलक सरीर नयन जल बाढ़े ॥
भेटी समोर ठेवून त्यांनी जोहार केला आणि अत्यंत प्रमाने ते प्रभूंना पाहात राहिले. ते मुग्ध होऊन चित्राप्रमाणे उभे होते. त्यांचे शरीर पुलकित झाले होते आणि नेत्रांतून प्रेमाश्रूंची धार लागली होती. ॥ ३ ॥
राम सनेह मगन सब जाने । कहि प्रिय बचन सकल सनमाने ॥
प्रभुहि जोहारि बहोरि बहोरी । बचन बिनीत कहहिं कर जोरी ॥
श्रीरामांनी त्यांना प्रेममग्न होतांना पाहून त्यांच्याशी गोड बोलत त्यांचा यथोचित सन्मान केला. ते वारंवार श्रीरामांना जोहार करीत हात जोडून म्हणाले, ॥ ४ ॥  
दोहा--अब हम नाथ सनाथ सब भए देखि प्रभु पाय ।
भाग हमारें आगमनु राउर कोसलराय ॥ १३५ ॥
हे प्रभू, तुमच्या चरणांचे दर्शन लाभल्यामुळे आता आम्ही सनाथ झालो. हे कोसलराज आमचे मोठे भाग्य म्हणून तुमचे शुभगमन येथे झाले. ॥ १३५ ॥
धन्य भूमि बन पंथ पहारा । जहँ जहँ नाथ पाउ तुम्ह धारा ॥
धन्य बिहग मृग काननचारी । सफल जनम भए तुम्हहि निहारी ॥
हे नाथ तुमचे चरण जेथे पडले, ते पृथ्वी, वन, मार्ग आणि पर्वत धन्य होत. तुम्हांला पाहून ज्यांचा जन्म सफल झाला, ते वनात फितणारे पक्षी व पशू धन्य होत. ॥ १ ॥
हम सब धन्य सहित परिवारा । दीख दरसु भरि नयन तुम्हारा ॥
कीन्ह बासु भल ठाउँ बिचारी । इहॉं सकल रितु रहब सुखारी ॥
डोळे भरुन तुमचे दर्शन घेणारे आम्ही सर्व आपल्या परिवारासह धन्य झालो आहोत. तुम्ही विचारपूर्वक मोठ्या चांगल्या ठिकाणी निवास केला आहे. येथे सर्व ऋतूंमध्ये तुम्ही सुखाने राहाल. ॥ २ ॥
हम सब भॉंति करब सेवकाई । करि केहरि अहि बाघ बराई ॥
बन बेहड़ गिरि कंदर खोहा । सब हमार प्रभु पग पग जोहा ॥
आम्ही सर्वप्रकारे हत्ती, सिंह, सर्प व वाघ यांच्यापासून रक्षण करुन सेवा करु. हे प्रभो, येथील घनदाट वने, पर्वत, गुहा आणि दर्‍या यांची आम्हांला खडान् खडा माहिती आहे. ॥ ३ ॥
तहँ तहँ तुम्हहि अहेर खेलाउब । सर निरझर जलठाउँ देखाउब ॥
हम सेवक परिवार समेता । नाथ न सकुचब आयसु देता ॥
आम्ही त्या स्थानी तुम्हांला शिकार खेळवू आणि तलाव, झरे आणि जलाशय दाखवू, आम्ही आमच्या कुटुंबासह तुमचे सेवक आहोत. म्हणून हे नाथ, आम्हांला आज्ञा देण्यांत संकोच करु नका. ' ॥ ४ ॥
दोहा--बेद बचन मुनि मन अगम ते प्रभु करुना ऐन ।
बचन किरातन्ह के सुनत जिमि पितु बालक बैन ॥ १३६ ॥
जे वेदांच्या वचनांना व मुनींच्या मनाला अगम्य आहेत, ते करुणाधाम श्रीराम भिल्लांचे बोलणे ऐकत होते, ज्याप्रमाणे पिता आपल्या बालकांचे वचन कौतुकाने ऐकतो. ॥ १३६ ॥
रामहि केवल प्रेमु पिआरा । जानि लेउ जो जाननिहारा ॥
राम सकल बनचर तब तोषे । कहि मृदु बचन प्रेम परिपोषे ॥
श्रीरामचंद्र फक्त प्रेमाचे भुकेले आहेत. ज्याला जाणायचे असेल त्याने जाणून घ्यावे. मग श्रीरामचंद्रांनी प्रेमपूर्ण मृदू वचन बोलून त्या वनात वावरणार्‍या सर्व लोकांना संतुष्ट केले. ॥ १ ॥
बिदा किए सिर नाइ सिधाए । प्रभु गुन कहत सुनत घर आए ॥
एहि बिधि सिय समेत दोउ भाई । बसहिं बिपिन सुर मुनि सुखदाई ॥
नंतर त्यांना निरोप दिला. ते सर्व मस्तक नमवून निघाले आणि प्रभूंचे गुण सांगत-ऐकत घरी आले. अशा प्रकारे देव व मुनी यांना सुख देणारे दोघे बंधू सीतेसह वनात निवास करु लागले ॥ २ ॥
जब तें आइ रहे रघुनायकु । तब तें भयउ बनु मंगलदायकु ॥
फूलहिं फलहिं बिटप बिधि नाना । मंजु बलित बर बेलि बिताना ॥
श्रीरघुनाथ वनात येऊन राहिले, तेव्हापासून वन मंगलदायक झाले. अनेक प्रकारचे वृक्ष फुलत होते व फळत होते. त्यांना बिलगलेल्या वेलींचे मंडप तयार झाले होते. ॥ ३ ॥
सुरतरु सरिस सुभायँ सुहाए । मनहुँ बिबुध बन परिहरि आए ॥
गुंज मंजुतर मधुकर श्रेनी । त्रिबिध बयारि बहइ सुख देनी ॥
ते कल्पवृक्षाप्रमाणे स्वाभाविकपणे सुंदर होते, जणू ते देवांचे नंदनवन सोडून तेथे आले होते. भ्रमरांच्या पंक्ती फारच सुरेख गुंजारव करीत होत्या. आणि तेथे सुखदायक शीतल, मंद, सुगंधित हवा वाहात होती. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: