Friday, July 8, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 20 Ovya 416 to 435 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग २० ओव्या ४१६ ते ४३५

 

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 20 Ovya 416 to 435 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग २० 
ओव्या ४१६ ते ४३५

तियें रत्नें दांताचिये सवडी । कूट लागलें जिभेचां बुडीं ।

कांहीं कांहीं आगरवडीं । द्रंष्ट्रांचीं माखलीं ॥ ४१६ ॥

४१६) मुकुटांवरील कांहीं रत्नें दांतांच्या फटींत सांपडली आहेत; कित्येक रत्नांचें झालेलें पीठ, जीभेच्या बुडास लागलें असून कांहीं कांहीं दाढांचे अग्रभागहि त्या पिठानें माखून गेले आहेत;

हो कां जे विश्र्वरुपें काळें । ग्रासिलीं लोकांचीं शरीरें बळें ।

परि जीवदेहींचीं सिसाळें । अवश्य कीं राखिलीं ॥ ४१७ ॥

४१७) अथवा ज्याप्रमाणें विश्वरुपी काळानें लोकांचीं शरीरे व बळें जरी ग्रासलीं तरी जीवांच्या देहाचे उत्तम भाग जीं लोकांचीं मस्तकें, तीं अवश्य रक्षण केलीं गेलीं, 

तैसीं शरीरामाजीं चोखडीं । होतीं उत्तमांगें इयें फुडीं ।

म्हणोनि महाकाळाचांहि तोंडीं । परि उरलीं शेखीं ॥ ४१८ ॥

४१८) त्याप्रमाणें मस्तकें निश्चयेकरुन शरीराचे उत्तम भाग होतीं; म्हणून तीं महाकाळाच्या ( विश्वरुपी काळाच्या ) तोंडंत जरी गेली, तरी पण शेवटी विश्वरुपी महाकाळाच्याहि तोंडांत नाश पावलीं नाहीत. 

मग म्हणे हें काई । जन्मलयां आन मोहरचि नाहीं ।

जग आपैसेंचि वदनडोहीं । संचरताहे ॥ ४१९ ॥

४१९) नंतर अर्जुन म्हणावयास लागला, हें काय ? जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही ! सर्व जण आपोआप विश्वरुपाच्या मखरुपी डोहांत जात आहे.

या आघवियाचि सृष्टी । लागलिया आहाति वदनाचां वाटीं ।

आणि हा जेथिंचिया तेथ मिठी । देतसे उगला ॥ ४२० ॥

४२०) या सर्वच सृष्ट्या मुखाच्या वाटेस लागल्या असून, हे विश्वरुप उगीच जागच्या जागीच त्यांस गिळून टाकीत आहे.

ब्रह्मादिक समस्त । उंचा मुखामाजीं धांवत ।

येर सामान्य हे भरत । ऐलीच वदनीं ॥ ४२१ ॥

४२१) ब्रह्मदेव आदिकरुन सर्वजण उंच असलेल्या मुखांमध्यें वेगाने जात आहेत आणि बाकीचे जे साधारण प्रतीचे लोक आहेत ते अलीकडील तोंडांतच पडत आहेत.

आणीकही भूतजात । तें उपजलेचि ठायीं ग्रासित ।

परि याचिया मुखा निभ्रांत । न सुटेचि कांहीं ॥ ४२२ ॥

४२२) आणखी देखील जेवढे प्राणी आहेत, तेवढ्या सर्वांस उत्पन्न झालेल्या ठिकाणींच मुख गिळून टाकीत आहे; पण याच्या मुखांतून खरोखर कांहींच सुटत नाहीं.

मूळ श्लोक

यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।

तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥ २८ ॥

२८) ज्याप्रमाणें नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडेच तोंड करुन धांव घेतात, त्याप्रमाणें सर्व बाजूंनी जळत असलेल्या तुझ्या तोंडांत हे नरवीर प्रवेश करीत आहेत.

जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचें आंग ।

तैसें आघवांचिकडूनि जग । प्रवेशत मुखीं ॥ ४२३ ॥

४२३) ज्याप्रमाणें मोठ्या नद्यांचे प्रवाह मोठ्या वेगानें समुद्रास येउन मिळतात, त्याप्रमाणें सर्व बाजूंनीं हें जग त्याच्या मुखंत शिरत आहे.

आयुष्यपंथें प्राणिगणीं । करोनि अहोरात्रांची सोवाणी ।

वेगें वक्त्रामिळणीं । साधिजत आहाती ॥ ४२४ ॥

४२४) आयुष्याच्या मार्गानें रात्रंदिवसांच्या पायर्‍या करुन सर्व प्रकारच्या प्राण्यांचे समुदाय त्वरेनें मुखांत प्रवेश करण्याचें साधीत आहेत.  

मूळ श्लोक

यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः ।

तथैव नाशाय विशन्ति लोकस्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥ २९ ॥

२९) अत्यंत वेगानें युक्त असे पतंग ज्याप्रमाणें प्रदीप्त अग्नीमध्यें ( स्वतःच्या ) नाशाकरितांच तुझ्या मुखामध्यें प्रवेश करीत आहेत.

जळतया गिरीचिया गवखा--। माजीं घापती पतंगाचिया झाका ।

तैसे समग्र लोक देखा । इये वदनीं पडत ॥ ४२५ ॥

४२५) पेट घेतलेल्या डोंगराच्या दरीमध्यें ज्याप्रमाणें पतंगाचे समुदाय उड्या घालतात, त्याप्रमाणें पाहा, ते सर्व लोक या तोंडामध्यें येऊन पडत आहेत.

परि जेतुलें येथ प्रवेशलें । तेतुलया लोहें पाणीचि पां गिळिलें ।

वहिवटींहि पुसिलें । नामरुप तयांचें ॥ ४२६ ॥ 

४२६) परंतु तापलेलें लोखंड जसें पाण्याला शोषून टाकतें, त्याप्रमाणें जेवढे म्हणून प्राणी या मुखांत जात आहेत, तेवढ्यांचें वहिवाटीलासुद्धां नामरुप राहात नाही.

मूळ श्लोक

लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः ।

तेजभिरापूर्य जगत् समग्रं भासस्तवोग्राः प्रतपंति विष्णो ॥ ३० ॥

३०) हे विष्णो, जळत असणार्‍या मुखांनीं सर्व लोकांना सर्व बाजूनीं गिळत असणारा तूं, ( अतृप्तीमुळें ) जिभा चाटीत आहेस. तुझी प्रखर तेजें ( आपल्या ) तेजानें सर्व जगाला व्यापून त्याला ताप देत आहेत. 

आणि येतुलाही आरोगण । करितां भुके नाहीं उणेपण ।

कैसें दीपन असाधारण । उदयलें यया ॥ ४२७ ॥

४२७) आणि इकडेहि खात असतां भूक कांहीच कमी होत नाही याच्या जठराग्नीला किती तरी विशेष प्रखरता आली आहे ! 

जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । का भणंगा दुष्काळु पाहला ।

तैसा जिभांचा लळलळाटु देखिला । आवाळुवें चाटितां ॥ ४२८ ॥

४२८) जसा एकादा रोगी तापांतून बरा व्हावा ( म्हणजे त्याला खा खा सुटते ), अथवा जसें एखाद्या भिकारी मनुष्याला दुष्काळ संपून सुकाळ झाला म्हणजे खा खा सुटते, त्याप्रमाणें ओष्ठप्रांत चाटतांना जिभेच्या हलण्याची गडबड दिसते.  

तैसें आहाराचेन नांवें कांहीं । तोंडापासूनि उरलेंचि नाहीं ।

कैसी समसमित नवाई । भुकेलेपणाची ॥ ४२९ ॥

४२९) तसेंच खाण्याचा जेवढा म्हणून पदार्थ आहे, त्यापैकीं तुझ्या तोंडापासून कशाचाच बचाव झाला नाहीं, खरमरीत भूक लागलेल्या स्थितीची ही कशी अपूर्वता आहे ? 

काय सागराचा धोंडु भरावा । कीं पर्वताचा घांसु करावा ।

ब्रह्नकटाहो घालावा । आसकाचि दाढे ॥ ४३० ॥

४३०) सर्व समुद्रच पिऊन टाकावा कीं काय किंवा पर्वताच गट्ट करावा कीं काय, अथवा हें संपूर्ण विश्व दाढेखालीं घातलें कीं काय,   

दिशा सगळियाचि गिळाविया । चांदिणिया चाटूनि घ्याविया ।

ऐसें वर्तत आहे साविया । लौल्य बा तुज ॥ ४३१ ॥

४३१) सगळ्या दिशाच गिळून टाकाव्या अथवा चांदण्या चाटूनपुसून घ्याव्यात, अशी ही, देवा तुला साहजिक हांव दिसत आहे. 

जैसा भोगीं कामु वाढे । कां इंधनें आगीसि हाकाक चढे ।

तैसी खातखातांचि तोंडें । खाखातें ठेली ॥ ४३२ ॥

४३२) ज्याप्रमाणें विषयभोगानें भोगण्याची इच्छा वाढते, अथवा सरपणानें अग्नीची खा खा अधिक होते, त्याप्रमाणें तुझीं तोंडें सारखीं खात असतांहि पुनः पुनः खा खा करीतच राहिलीं आहेत.     

कैसें एकचि केवढें पसरलें । त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकलें ।

जैसें का कवींठ घातलें । वडवानळीं ॥ ४३३ ॥

४३३) एकच तोंड ( पण ) कसें व केवढें पसरलें आहे ! ज्याप्रमाणें वडवानळामध्यें कवठ घालावें त्याप्रमाणें हे तिन्ही लोक तुझ्या जिभांच्या टोकालाच लागलेले दिसतात. 

ऐसीं अपारें वदनें । आतां येतुलीं कैचीं त्रिभुवनें ।

कां आहारु न मिळतां येणें मानें । वाढविलीं असह्या ॥ ४३४ ॥

४३४) ( एका तोंडाची अशी वाट झाली ! ) अशीं ( आपल्या विश्वरुपांत ) असंख्य तोंडें आहेत ! आतां ( इतक्या मुखांना ) इतकीं त्रिभुवनें कोठलीं ? तेव्हां ( ज्याच्या तेजाचा ताप ) सहन करणें अशक्य आहे अशा तूं, त्यांना खायला मिळत नसतां तीं इतकीं कशाला वाढविलीस ?  

अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळां वरपडा ।

जैसीं वणवेयाचिया वेढां । सांपडती मृगें ॥ ४३५ ॥

४३५) अहो, बिचारें हें जगत् तुझ्या तोंडांतून निघणार्‍या ज्वाळांच्या मडक्यांत सांपडलें आहे. ज्याप्रमाणें वणव्याच्या वेढ्यांत जनावरें सांपडावींत, 

आतां तैसें विश्वासि जाहालें । देवो नव्हे हें कर्म आलें ।

कीं जगजळचरां पांगिलें । काळजाळें ॥ ४३६ ॥

४३६) आतां त्याप्रमाणें जगाला झालें आहें. हा ( तारणारा )

 देव नाहीं, तर हें सर्वांचें अनिष्ट कर्मच विश्वरुपानें

 ओढवलें आहे, अथवा जगद्रुपी जलचरांना ( विश्वरुप हें )

 काळरुपी जाळेंच पसरलें आहे.


Custom Search

1 comment:

sriganeshh said...

Shri Gurucharitra Mahatmya

Sir, I want to read this... is it available in print version.. Please recommend the publishers name... Thanks a lot 🙏