Showing posts with label ओव्या १५४ ते १७५. Show all posts
Showing posts with label ओव्या १५४ ते १७५. Show all posts

Wednesday, April 27, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 6 Ovya 154 to 175 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ६ ओव्या १५४ ते १७५

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 6 
Ovya 154 to 175 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ६ 
ओव्या १५४ ते १७५

मूळ श्लोक

न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।

दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्र्वरम् ॥ ८ ॥

८) केवळ या तुझ्या दृष्टीनें मला पाहाण्यास तूं समर्थ नाहींस, ( याकरितां ) मी तुला दिव्य दृष्टि देतों. ( आतां ) माझें ईश्र्वरी सामर्थ्य पाहा. 

मग म्हणे उत्कंठे बोहट न पडे । अझुनी सुखाची सोप न सांपडे ।

परि दाविलें तें फुडें । नाकळेचि यया ॥ १५४ ॥

१५४) मग देव म्हणाले, याची विश्वरुप पाहाण्याची इच्छा कमी झालेली दिसत नाही व अद्याप याला सुखाचा मार्ग सापडला नाहीं; इतकेंच नव्हे, परंतु आम्ही विश्वरुप दाखविलें तें याला मुळीच आकलन होत नाहीं.

हें बोलोनि देवो हांसिले । हांसोनि देखणिया म्हणितलें ।

आम्हीं विश्र्वरुप तरी दाविलें । परि न देखसीच तूं ॥ १५५ ॥

१५५) असें बोलून देव हंसले व हंसून अर्जुनास म्हणाले, तूं खूप पाहणारा आहेस ! आम्हीं तुला विश्वरुप दाखविलें, परंतु ( तूं ) पाहतच नाहीस.

यया बोला येरें विचक्षणें । म्हणितलें हां जी कवणासी तें उणें ।

तुम्ही बकाकरवीं चांदिणें । चरऊं पहा मा ॥ १५६ ॥

१५६) या श्रीकृष्णाच्या भाषणावर हुशार अर्जुन म्हणाला, महाराज, तर मग हा कमीपणा कोणाला आहे ? बगळ्याला चंद्रामृताचा उपभोग देऊं पाहाता ना ?

हां हो उटोनियां आरिसा । आंधळिया दाऊं जैसा ।

बहिरीयापुढें हृषीकेशा । गाणीव करा ॥ १५७ ॥

१५७) अहो महाराज, आपण आरसा घांसून तो आंधळ्यास दाखवावयास लागला आहातं. किंवा हे श्रीकृष्णा आपण बहिर्‍यापुढे गाणें सुरु केले आहे.

मकरंदकणाचा चारा । जाणतां घालूनि दर्दुरा ।

वायां धाडा शार्ङ्गधरा । कोपा कवणा ॥ १५८ ॥

१५८) पुष्पांतील सुगंधी कणाचा चारा जाणूनबुजून चिखल खाणार्‍या बेडकांपुढे टाकून, श्रीकृष्णा, वायां घालवीत आहात. मग रागावतां कोणावर ?    

जें अतींद्रिय म्हणोनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया विभागा फिटलें ।

तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें । मी कैसेनि देखों ॥ १५९ ॥

१५९) जें ( विश्र्वरुप ) इंद्रियांस प्रत्यक्ष दिसणें शक्य नाहीं, म्हणून शास्त्रांद्वारां ठरलें आहे व जें केवळ ज्ञानदृष्टीलाच विषय होणारें आहे, असें जें विश्वरुप, तें तुम्हीं माझ्या चर्मचक्षूंपुढें ठेविलें; तर मी तें कसें पाहूं ? 

परि हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें ।

एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा ॥ १६० ॥

१६०) परंतु हा तुमचा कमीपणा बोलूं नये, मीच सहन करावें तें बरें. या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले, होय बाबा, तूं म्हणतोस तें मला मान्य आहे. 

सच स्वरुप जरी आम्हीं दावावें । तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें ।

परि बोलत प्रेमभावें । घसाळ गेलों ॥ १६१ ॥

१६१) आम्हांला जर स्वरुप खरोखरच दाखवावयाचें होतें, तर तुला प्रथम पाहण्याचे सामर्थ्य द्यावयास पाहिजे होतें. परंतु प्रेमामुळेबोलतां बोलतां विसरुन गेलो.

काय जाहलें न बाहतां भुई पेरिजे । तरी तो वेळु विलया जाइजे ।

तरी आतां माझें निजरुप देखिजे । ते दृष्टी देघों तुज ॥ १६२ ॥

१६२) हें कसें झालें म्हणशील तर, जमिनीची मशागत न करितां तिच्यांत बी पेरलें आणि त्यास पाणी घातलें, तर तो पेरण्याचा आणि पाणी घालण्याचा वेळ फुकट जातो; ( त्याप्रमाणें तुला विश्वरुप पाहण्याची दृष्टि न देतां तुझ्यापुढें विश्वरुप मांडलें, तर तें मांडणें व्यर्थ जाणारच. ) परंतु आतां माझें स्वतःचे स्वरुप पाहण्यास समर्थ असणारीं दृष्टि तुला देतों.   

मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्र्वर्ययोगु आघवा ।

देखोनियां अनुभवा । माजिवडा करीं ॥ १६३ ॥

१६३) मग अर्जुना, त्या दृष्टीने आमचा सर्व ऐश्र्वर्ययोग पाहून त्याला अनुभवामध्यें सांठवून ठेव.

ऐसें तेणें वेदांतवेद्यें । सकळ लोकआद्यें ।

बोलिलें आराध्यें । जगाचेनि ॥ १६४ ॥   

१६४) वेदान्ताचा जो जाणण्याचा विषय, सर्व लोकांचा जो मूळ पुरुष व जो जगाला पूजनीय, असा जो श्रीकृष्ण परमात्मा, तो याप्रमाणें बोललां ( असें संजय म्हणाला ).

मूळ श्लोक

संजय उवाच

एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्र्वरो हरिः ।

दर्शयामास पार्थाय परमं रुपमैश्वरम् ॥ ९ ॥

९) संजय म्हणाला, हे राजा ( धृतराष्ट्रा ), महायोगेश्र्वैर्यसंपन्न हरि याप्रमाणें बोलून, नंतर अर्जुनाला ( आपलें ) ऐश्र्वर्ययुक्त उत्कृष्ट रुप दखविता झाला.   

पैं कौरवकुळचक्रवर्ती । मज हाचि विस्मयो पुढतपुढती ।

जे श्रियेहुनि त्रिजगतीं । सदैव असे कवणी ॥ १६५ ॥

१६५) ( संजय म्हणाला, ) हे कौरव-कुळांतील सार्वभौम महाराजा, मला वारंवार हेंच आश्चर्य वाटलें की, लक्ष्मीपेक्षां त्रैलोक्यामध्यें जास्त दैववान् कोणी आहे का ? 

ना तरी खुणेचे वानावयालागीं । श्रुतीवांचूनि दावा पां जगीं ।

ना सेवकपण तरी अंगीं । शेषाचांचि आथि ॥ १६६ ॥

१६६) अथवा तत्त्वाची गोष्ट वर्णन करण्यांत वेदाशिवाय जगांत दुसरा कोण समर्थ आहे, दाखवा बरें ! अथवा एकनिष्ठ सेवकपण जर पाहिलें, तर तें एक शेषाच्याच ठिकाणी  आहे.

हां हो जयाचेनि सोसें । शिणत आठही पाहार योगी जैसे ।

अनुसरलें गरुडाऐसें । कवण आहे ॥ १६७ ॥

१६७) अहो महाराज, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या इच्छेनें योगी असे आठहि प्रहर शिणत असतात, ( असे भगवंताकरिता कष्ट सोसणारे कोण आहेत; ) व गरुडासारखा देवास आपल्याला वाहून घेतलेला ( दुसरा ) कोण आहे ?    

परि तें आघवेंचि एकीकडे ठेलें । सापें कृष्णसुख एकंदरें जाहलें ।

जिये दिउनि जन्मले । पांडव हे ॥ १६८ ॥

१६८) परंतु तें ( आता ) सर्व एका बाजूला राहिलें. ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले, त्या दिवसापासून, तें श्रीकृष्णापासून भक्तालां होणारें सुख त्यांच्याच ठिकाणी एकवटलें.  

परि पांचांही आंतु अर्जुना । कृष्ण सावियाचि जाहला अधीना ।

कामुक कां जैसा अंगना । आपैता कीजे ॥ १६९ ॥

१६९) परंतु पाचहि पांडवांमध्यें श्रीकृष्ण हे सहजच अर्जुनाच्या आधीन झाले. जसें एखाद्या विषयासक्त पुरुषाला स्त्री आपल्या आधीन करते. 

पढ़विलें पाखिरुं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले ।

कैसें दैव एथ सुरवाडलें । तें जाणों न ये ॥ १७० ॥

१७०) शिकवलेला पक्षीहि असें बोलत नाहीं; करमणुकीकरिता पाळलेला पशूहि इतका हुकमांत राहात नाहीं, इतके अर्जुनाच्या आधीन श्रीकृष्ण झाले. या अर्जुनाच्या ठिकाणी दै कसें भरभराटीस आलेलें आहे तें समजत नाहीं.

आजि परब्रह्म हें सगळें । भोगावया सदैव याचेचि डोळे ।

कैसे वाचेचे हन लळे । पाळीव असे ॥ १७१ ॥

१७१) या प्रसंगी संपूर्ण परब्रह्मवस्तूचा अनुभव घेण्याचें भाग्य याच्याच दृष्टीला लाभलें आहे. पाहा ! श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्याचे लाड कसें पुरवीत आहेत !   

हा कोपे कीं निवांतु साहे । हा रुसे तरी बुझावीत जाये ।

नवल पिसें लागलें आहे । पार्थाचे देवा ॥ १७२ ॥

१७२) अर्जुन रागावला कीं, कृष्ण निवांतपणें सहन करतात. अर्जुन रुसला म्हणजे देव त्याची समजूत करीत असतात. एकूण देवाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेड लागलें आहें. 

एर्‍हवीं विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले ।

ते विषयोचि वानितां जाहले । भाट ययाचे ॥ १७३ ॥

१७३) सहज विचार करुन पाहिलें तर, विषयाला जिंकूनच जन्माला आलेले शुकादिक खरे खरे पुरुष ते भगवंताच्या केवळ वैषयिक लीलांचेच वर्णन करणारे स्तुतिपाठक झाले. 

हा योगियांचें समाधिधन । कीं होऊनि ठेलें पार्थाअधीन ।

यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ॥ १७४ ॥

१७४) योगी ज्यांचे सुख समाधीतच भोगतात, असा हा योग्यांच्या समाधीत भोगण्याचें ऐश्वर्य असून, तो अर्जुनाच्या अगदीं आधीन झाला आहे. याकरितां राजा धृतराष्ट्रा, माझें मन आश्चर्य करतें.  

तेवींचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथ कौरवेशा ।

कृष्णें स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय ॥ १७५ ॥

१७५) तसेंच संजय म्हणाला, कौरवांच्या राजा ( धृतराष्ट्रा )

, याच्यांत आश्चर्य तें काय ? कृष्ण त्याचा स्वीकार

 करतात, त्याचा असा भाग्योदय होतो.



Custom Search