Showing posts with label ओव्या २२६ ते २५०. Show all posts
Showing posts with label ओव्या २२६ ते २५०. Show all posts

Friday, October 9, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 Part 10, ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग १०

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 10 
Ovya 226 to 250 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग १० 
ओव्या २२६ ते २५०

हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध ।

परी कृमिदोषीं विरुद्ध । घेपे केवीं ॥ २२६ ॥

२२६) बाबा, साखर व दूध हे पदार्थ गोड आहेत, हें सर्वांना ठाऊक आहेत; पण जंतांच्या रोगांत त्यांचा वाईट परिणाम होत असल्यामुळें, ज्यांना तो रोग आहे, त्यांनी ते पदार्थ कसें सेवन करावेत ? 

ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते आळुकीची उरेल ।

जे तें परिणामीं पथ्य नव्हेल । धनुर्धरा ॥ २२७ ॥

२२७) असें असूनहि जर त्यांचें सेवन केलें, तर सेवन करणारांचा तो हट्ट ठरेल. कारण अर्जुना, त्यांचें तें करणें परिणामीं हितकर होणार नाही.  

म्हणोनि आणिकांसी जें विहित । आणि आपणपेयां अनुचित ।

तें नाचरावें जरी हित । विचारिजे ॥ २२८ ॥

२२८) म्हणून दुसर्‍यांना जे विहित पण आपणांस जें अयोग्य म्हणून ठरलें आहे, तें हिताचा विचार करुन पाहिलें, तर आचरुं नये. ( हें बरें ) ! 

या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जीविता ।

तोहि निका वर उभयतां । दिसत असे ॥ २२९ ॥

२२९) ( फार काय ) या आपल्या धर्माचें आचरण करीत असतां, जरी प्राण खर्ची पडतील, तरीहि तरी इहपरलोकाच्या दृष्टीनें तो धर्म चांगलाच आहे.  

ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ श्रीशार्ङ्गपाणी ।

तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥ २३० ॥

२३०) सर्व देवांत श्रेष्ठ असलेले, श्रीकृष्ण ज्या वेळीं असें बोलले त्या वेळीं अर्जुन म्हणाला, देवा माझी एक विनंती आहे.

हें जें तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसलें ।

परी आतां पुसेन कांहीं आपुलें । अपेक्षित ॥ २३१ ॥

२३१) तुम्हीं मला जें सांगितलें, ते खरोखर मी सर्व ऐकलें हें खरें आहे; परंतु आता मला कांहीं पाहिजे आहे, तें मी विचारतों.

तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांचीही स्थिति भ्रंशे ।

मार्गु सांडुनि अनारिसे । चालत देखों ॥ २३२ ॥

२३२) तर देवा, हें असें कसें होतें कीं ज्ञानी पुरुषांचीहि स्थिति बिघडून, ते मार्ग सोडून भलत्याच वाटेनें चालत असल्याचें नजरेस येतें !  

सर्वज्ञुही जे होती । हे उपायही जाणती ।

तेही परधर्में व्यभिचरति । कवणें गुणें ॥ २३३ ॥

२३३) ज्यांना सर्व कळतें व ज्यांस हे उपायहि ठाऊक असतात, ते देखील परधर्माचें आचरण करुन स्वधर्मापासून कशामुळें भ्रष्ट होतात ?

बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणे जैसा ।

नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ॥ २३४ ॥

२३४) ज्याप्रमाणें आंधळा धान्य आणि कोंडा यांची निवड जाणत नाहीं, त्याप्रमाणें कधीं कधीं डोळसालाहि कळत नाहीं, असें कां व्हावें ?

जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करितां न धाती ।

वनवासीही सेविती । जनपदातें ॥ २३५ ॥

२३५) जे असलेल्या सर्व संगाचा त्याग करतात तेच परत कितीहि संग केला तरी तृप्त होत नाहींत. सर्वस्व सोडून अरण्यांत राहिलेले लोकदेखील पुन्हां लोकांत येऊन राहातात.

आपण तरी लपती । सर्वस्वें पाप चुकविती ।

परी बलात्कारें सुइजती । तयाचि माजीं ॥ २३६ ॥

२३६) आपण स्वतः पापांना चुकविण्याकरितां लपून बसतात, सर्व प्रकारें पाप चुकविण्याकरितां प्रयत्न करतात, परंतु पुनः बळजबरीनें त्यांतच कोंबले जातात.

जयांची जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसीं ।

चुकविती ते गिंवसी । तयातेंचि ॥ २३७ ॥

२३७) ज्यांचा मनापासून कंटाळा येतो, तेच अंतःकरणाला येऊन चिकटतात व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांनाच घेरतात.  

ऐसा बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे ।

हें बोलावें हृषीकेशें । पार्थु म्हणे ॥ २३८ ॥

२३८) अशी एक बळजबरी दिसून येते; ती तेथें कोणाच्या जोरामुळें होते ? हें देवांनी मला सांगावें. असें अर्जुन म्हणाला.

तंव हृदयकमळआरामु । जो योगियांचा निष्कामकामु ।

तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ॥ २३९ ॥

२३९) तेव्हां हृदयरुपीं कमलामध्यें विश्रांति घेणारा ( राहाणारा ) व निरिच्छ झालेले योगी ज्याची इच्छा करतात असा जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाला काय म्हणाला, ऐक. 

तरी हे काम क्रोधु पाहीं । जयांते कृपेची साठवण नाहीं ।

हें कृतांताचां ठायीं । मानिजती ॥ २४० ॥

२४०) बर बाबा, ( बलात्कार करणारे ) हे कामक्रोध आहेत असे समज; हे असे आहेत कीं, ज्यांच्या मनांत दयेचा सांठा मुळीच नाहीं; हे कामक्रोध प्रत्यक्ष यमधर्म आहेत, असें समजलें जातें.

हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरांचे वाघ ।

भजनमार्गींचे मांग । मारक जे ॥ २४१ ॥

२४१) हे ज्ञानरुपी ठेव्यावर असलेले सर्प होत; हे विषयरुपी दर्‍यांत राहाणारे वाघ आहेत. हे भजनरुपी रस्त्यावरील वाटमारे मांग आहेत.   

हे दैहदुर्गींचे धोंड । इंद्रियग्रामींचें कोंड ।

यांचें व्यामोहादिक बंड । जगावरी ॥ २४२ ॥

२४२) हे देहरुपी डोंगरी किल्ल्याचे मोठाले दगड आहेत; हे इंद्रियरुपी गांवाचें बांवकूम आहेत; यांचे अविवेकादिकांच्या रुपानें जगावर ( मोठें ) बंड आहे. 

हे रजोगुण मानसाचे । समूळ आसुरियेचे ।

धायपण ययांचें । अविद्या केलें ॥ २४३ ॥

२४३) हें मनांत असलेल्या रजोगुणाचे वळलेले आहेत व मुळापासूनच आसुरी संपत्तीचे आहेत. यांचें पालनपोषण अविद्येनें केलेलें आहे.

हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले ।

तेणें निजपद यां दिधलें । प्रमादमोहो ॥ २४४ ॥

२४४) हे वास्तविक रजोगुणाचे जरी बनलेले आहेत, तरी तें तमोगुणाला फार प्रिय होऊन राहिले आहेत. त्या तमोगुणानें प्रमाद व मोहरुपी आपली गादी यांना बहाल केली आहे.

हे मृत्यूचां नगरीं । मानिजती निकियापरी ।

जे जीविताचे वैरी । म्हणऊनियां ॥ २४५ ॥

२४५) ह्यांची मृत्युच्या नगरांत चांगली पत आहे, कारण कीं, जीविताचे शत्रू आहेत.

जयांसि भुकेलियां आमिषा । हें विश्र्व न पुरेचि घांसा ।

कुळवाडी यांची आशा । चाळीत असे ॥ २४६ ॥

२४६) भूक लागली असतां खाण्यास हें जग एक घांसासहि ज्यांना पुरें पडत नाहीं, अशा या कामक्रोधांचा जो ( नाशकारक ) व्यापार, त्या व्यापारावर देखरेख आशा करते. 

कौतुकें कवळितां मुठीं । जिये चवदा भुवनें थेंकुटीं ।

ते भ्रांति तिये धाकुटी । वाल्हीदुल्ही ॥ २४७ ॥

२४७) लीलेनें मुठींत धरली तर चौदाहि भुवनें जिला अपुरीं आहेत, अशी जी भ्रांति ती या आशेची नव्या नवसाची लाडकी धाकटी बहीण आहे.

जे लोकत्रयाचें भातुकें । खेळताचि खाय कवतिकें ।

तिच्या दासीपणाचेनि बिकें । तृष्णा जिये ॥ २४८ ॥

२४८) जी खेळत असतां त्रैलोक्यरुप खाऊ सहज खाऊन टाकते, त्या भ्रांतीच्या दासीपणाचे जोरावर तृष्णा जगली आहे.

हें असो मोहें मानिजे । यांतें अहंकारें घेपे दीजे ।

जेणें जग आपुलेनि मोजें । नाचवीत असे ॥ २४९ ॥

२४९) हें असो. या कामक्रोधांना मोहाच्या घरीं मान आहे; आपल्या करामतीनें जो सर्व जगास नाचवितो, तो अहंकार या कामक्रोधांपाशीं देवघेव करतो;

जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला ॥

तो दंभु रुढविला । जगीं इहीं ॥ २५० ॥

२५०) ज्यानें पोटीं असलेला सत्याचा मालमसाला काढून 

त्याऐवजीं अकृत्याचा पेंढा भरला, असा जो दंभ, तो या 

कामक्रोधांनीं जगांत पुढें आणला.



Custom Search

Thursday, June 25, 2020

Dnyaneshwari Adhyay 2 Part 10 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १०


Dnyaneshwari Adhyay 2 Part 10 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १० 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या २२६ ते २५०
सुखीं संतोषा न यावें । दुःखी विषादा न भजावें ।
आणि लाभालाभ न धरावें । मनामाजीं ॥ २२६ ॥
२२६) सुखाच्या वेळीं संतोष मानूं नये. दुःखाच्या वेळीं खिन्नता धरुं नये आणि लाभ व हानि मनांत धरुं नये.
एथ विजयपण होईल । कां सर्वथा देह जाईल ।
हें आधींचि कांही पुढील । चिंतावेना ॥ २२७ ॥
२२७) या युद्धामध्यें जय मिळेल किंवा अजिबात देहच नाहींसा होईल, या पुढच्या गोष्टी अगोदरच चिंतीत बसूं नये.
आपणयां उचित । स्वधर्मातेंचि रहाटतां ।
जें पावे तें निवांता । साहोनि जावें ॥ २२८ ॥
२२८) आपल्याला योग्य असें जें स्वधर्माचें आचरण, तेंच करीत असतांना, जो प्रसंग येईल, तो मुकाट्यानें सहन करावा. 
ऐसेया मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें ।
म्हणोनि आतां झुंझावें । निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥
२२९) अशी मनाची तयारी होईल, तर मग सहजच पाप घडणार नाहीं; म्हणून तूं आतां खुशाल लढावें.
हे सांख्यस्थिति मुकुलित । सांगितली तुज एथ ।
आतां बुद्धियोगु निश्र्चित । अवधारीं पां ॥ २३० ॥
२३०) येथपर्यंत तुला हा ज्ञानमार्ग थोडक्यांत सांगितला. आतां निष्काम कर्ममार्ग निश्चित सांगतों. तो तूं ऐक.
जया बुद्धियुक्ता । जाहलिया पार्था ।
कर्मबंधु सर्वथा । बाधूं न पावे ॥ २३१ ॥
२३१) अर्जुना, निष्काम कर्मयोगांतील बुद्धि ज्याला साधली, त्याला कर्मबंधन मुळींच बाधत नाहीं.
जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।
परी जैतेंसीं उरिजे । अचुंबिता ॥ २३२ ॥
२३२) ज्याप्रमाणें वज्रासारखे चिलखत अंगांत घातलें असतां शस्त्रांची वृष्टि सहन करतां येतें, इतकेंच नव्हें तर ( त्या शस्त्रांचा अंगाला ) स्पर्शहि न होतां विजयी होऊन राहातां येतें;  
तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे ।
जेथ पूर्वानुक्रम दिसे । चोखाळत ॥ २३३ ॥
२३३) त्याप्रमाणें ज्या कर्मयोगांत पूर्वीपासूनच चालत आलेलें कर्म शुद्धपणानें चालूं राहिलेलें दिसून येतें, त्या कर्मयोगांत इहलोकांतील भोगांचा नाश तर होत नाहींच आणि मोक्ष तर ठेवलेलाच आहे.
कर्माधारें राहाटिजे । परी कर्मफळ न निरिक्षिजे ।
जैसा मंत्रज्ञु न बधिजे । भूतबाधा ॥ २३४ ॥
२३४) कर्माच्या आधारानें वागावें, पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवूं नये; ज्याप्रमाणें मंत्र जाणणार्‍याला भुताची बाधा होत नाहीं;
तियापरी जे सुबुद्धि । आपुल्याला निरवधि ।
हा असतांचि उपाधि । आकळूं न सके ॥ २३५ ॥
२३५) त्याप्रमाणें अनासक्तपणें कर्म करण्याची बुद्धि एकदां पूर्णपणें आपलीशी झाली, म्हणजे हा उपाधींत असूनहि उपाधि त्याला बाधा करुं शकत नाहीं.
जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निष्कंप ।
गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥ २३६ ॥
२३६) ज्या बुद्धींत पुण्यपापादि कर्मफलांचा प्रवेश होत नाहीं, जी सूक्ष्म व अति निश्चल झालेली असते व जिला तीन गुणांचा विटाळ नसतो;
अर्जुना ते पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे ।
तरी अशेपही नाशे । संसारभय ॥ २३७ ॥
२३७) अर्जुना, ती बुद्धि पुण्याईच्या योगानें जर थोडीशी हृदयांत प्रकट होईल, तर संसाराचें सर्व भय नाहीसें होईल.
जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रगटी ।
तैसी सद्बुद्धि हे थेकुटी । म्हणों नये ॥ २३८ ॥
२३८) ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी पण ती मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणें ह्या सद्बुद्धीला लहान म्हणतां येत नाहीं. 
पार्था बहुतीं परीं । हे अपेक्षिजे विचारशूरीं ।
जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥ २३९ ॥
२३९) अर्जुना, विचार करण्यांत पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारें इच्छा करतात; कारण एकंदर सृष्टींत ही सद्बुद्धि दुर्लभ आहे.
आणिसारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु ।
कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥ २४० ॥
२४०) ज्याप्रमाणें इतर वस्तु हव्या तितक्या मिळतात; पण परीस तसा मिळत नाहीं, किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोग लागतो.
तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि ।
जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥ २४१ ॥
त्याचप्रमाणें परमात्मा हाच जिचें अंतिम ध्येय आहे ती सदबुद्धि दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणें समुद्रावांचून निखालस अन्य गति नाहीं,
तैसी ईश्र्वरावांचूनि कांहीं । जिये आणकि लाणी नाहीं ।
ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥ २४२ ॥
२४२) त्याप्रमाणें जिला ईश्वरावांचून अन्य आश्रयस्थान नाहीं; तीच जगांत फक्त एक सद्बुद्धि आहे. पाहा.
येरी जे दुर्मति । जे बहुधा असे विकरती ।
तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥ २४३ ॥
२४३) हीहून अन्य जी बुद्धि ती दुर्बुद्धि होय. ती अनेक प्रकारें विकास पावते. अधिकारी असतात, तेच तिच्या ठिकाणीं नेहमीं रममाण होतात.   
म्हणोनि तया पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था ।
आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥ २४४ ॥
२४४) म्हणून पार्था, त्यांना स्वर्ग, संसार व नरक हे प्राप्त होतात, ( पण ) त्यांना आत्मसुखाचें मुळींच दर्शन होत नाहीं.
वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती ।
परी कर्मफळीं आसक्ती । धरुनियां ॥ २४५ ॥
२४५) ते वेदवचनांचीं प्रमाणें देऊन बोलतात. केवळ कर्ममार्गाचें श्रेष्ठत्व सिद्ध करतात. पण कर्मफळाचा लोभ धरतात.
म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादि कर्म कीजें ।
मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥ २४६ ॥
२४६) ते म्हणतात, मृत्युलोकीं जन्मावें, यज्ञादि कर्मे करावीं आणि मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा. 
एथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाहीं ।
ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥ २४७ ॥
२४७) यावांचून या लोकीं दुसरें मुळींच सुख नाहीं, असे ते दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादतात; अर्जुना, पाहा.
देखें कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत ।
ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥ २४८ ॥
२४८) पाह, केवळ सुखोपभोगाकडे नजर देऊन व फलाशेनें व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्में आचरितात.
क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें ।
निपुण होऊनि धर्मातें । अनुष्ठिती ॥ २४९ ॥
२४९) अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठानानें, विधींत यत्किंचितहि चूक होऊं न देतां व अगदी दक्षतेनें ते धर्माचरण करतात.  
परि एकचि कुडें करिती । जे स्वर्गकामु मनीं धरिती ।
यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥ २५० ॥

२५०) पण ते एकच वाईट गोष्ट करतात, ती हीच कीं, 

स्वर्गाची इच्छा ते 

मनांत बाळगतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा, 

त्याला विसरतात. 


Custom Search