Shri Dnyaneshwari Adhyay 4
आजि
श्रवणेंद्रिया पिकलें । जे येणें गितानिधान देखिलें ।
आतां स्वप्नचि
हें तुकलें । साचासरिसें ॥ १ ॥
१) आज श्रवणेंद्रियाला सुकाळ झाला; कारण गीतेसारखा ठेवा त्याला
पाहावयास मिळाला. जसें कांहीं स्वप्नच खरें व्हावें, तसें आतां हें झालें आहे.
आधींचि
विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी ।
आणि
भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥ २ ॥
२)
अगोदरच ही विवेकाची कथा, त्यांत तिचें प्रतिपादन जगांत अत्यंत प्रतापशाली असे
श्रीकृष्ण करीत असून भक्तांमध्यें श्रेष्ठ असणारा अर्जुन तें ऐकत आहे.
जैसा
पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु ।
तैं भला
जाहला विनोदु । कथेचा इये ॥ ३ ॥
३)
ज्याप्रमाणें पंचम स्वर व सुवास किंवा सुवास व उत्तम रुची यांच्या गोड मिलाफाचा
योग यावा, ( त्याप्रमाणें ), या कथेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे.
कैसी आगळिक
दैवाची । जे गंगा वोळली अमृताची ।
हो कां
जपतपें श्रोतयांचीं । फळा आलीं ॥ ४ ॥
४) काय
दैवाचा जोर पाहा ! ही अमृताची गंगाच लाभली म्हणावयाची; किंवा श्रोत्यांची जपतपादि
अनुष्ठानें ( या कथेच्या रुपानें ) फळास आलीं आहेत.
आतां
इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें ।
मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥ ५ ॥
५) आतां एकूण एक इंद्रियांनीं श्रवणेंद्रियाचा आश्रय करावा;
आणि मग गीता नांवाच्या संवादाचें सुख भोगावें.
हा अतिसो अतिप्रसंगें । सांडूनि कथाचि ते सांगे ।
जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ॥ ६ ॥
६) हा अप्रासंगिक पाल्हाळ पुरे कर व कृष्ण आणि अर्जुन हे
दोघे जें कांहीं बोलत होते ती हकीकतच सांग, ( असें श्रोते म्हणाले. )
ते वेळीं संजयों रायातें म्हणे । अर्जुनु अधिष्ठिला
दैवगुणें ।
जे अतिप्रीती नारायणें । बोलिजतु असे ॥ ७ ॥
७) ( ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात, ) त्या वेळीं संजय
धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखर भाग्यानेंच अर्जुनाचा आश्रय केला. कारण प्रत्यक्ष
भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमानें बोलत आहेत.
जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगेचि माते देवकीसी ।
जें न संगेचि बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशीं बोलत ॥ ८॥
८) पिता वसुदेव याला जें सांगितलेंच नाहीं. आई देवकी हिला
जें सांगितलेंच नाहीं, बळिभद्र याला जें सांगितलेंच नाहीं, तें रहस्य अर्जुनाजवळ
श्रीकृष्ण बोलत आहेत.
देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । तेही न देखे या प्रेमाचें सुख ।
आणि कृष्णस्नेहाचें पिक । यातेंचि आधी ॥ ९ ॥
९) ( श्रीकृष्णदेवाच्या ) जवळ असणारी एवढी देवी लक्ष्मी पण
या ( कृष्णाच्या ) प्रेमाचें सुख तिलाहि ( कधीं ) दिसलें नाहीं. कृष्णाच्या
प्रेमाचे सर्व फळ यालाच ( अर्जुनालाच ) आज लाभत आहे.
सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होतिया कीर बहुवसा ।
परी त्याही येणें मानें यशा । येतीचिना ॥ १० ॥
१०) सनकादिकांच्या ( परमात्मसुखाबद्दलच ) आशा खरोखर खूपच
बळावल्या होत्या; पण त्या इतक्या प्रमाणांत यशाला आल्याच नाहींत.
या जगदीश्र्वराचें प्रेम । एथ दिसतसे निरुपम ।
कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ॥ ११ ॥
११) या जगदीश्र्वराचें प्रेम येथें ( या अर्जुनावर ) अगदीं
निरुपम दिसत आहे. या पार्थानें कसें उत्कृष्ट पुण्य केलें आहे बरें !
हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती ।
मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥ १२ ॥
१२) पाहा, ज्या अर्जुनाच्या प्रीतीमुळें हा कृष्ण, (
वास्तविक ) निराकार असून साकार झाला, त्या अर्जुनाची ( देवांशीं ) एकरुपता मला
चांगलीच पटते.
एर्हवीं हा योगियां नाडळे । वेदार्थासी नाकळे ।
जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥ १३ ॥
१३) नाहीं तर हा योग्यांना सांपडला नाहीं, वेदांच्या
अर्थाला सांपडत नाहीं. ध्यानाचीहि नजर जेथपर्यंत पोंचत नाहीं,
तें हा निजस्वरुप । अनादि निष्कंप ।
परी कवणें मानें सकृप । जाहला आहे ॥ १४ ॥
१४) अशी जी आत्मस्थिति, तद्रुप असणारा हा श्रीकृष्ण मूळचाच
अचल आहे; पण ( आज या अर्जुनावर ) किती बरें कृपावंत झाला आहे !
हा त्रैलोक्यपटाची घडी । आकाराची पैलथडी ।
कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥ १५ ॥
१५) हा त्रैलोक्यरुप वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे;
( पण ) या अर्जुनाच्या प्रेमानें कसा आटोक्यांत आणला आहे !
मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता ।
कथिला परी ते वार्ता । बहुवां दिवसांची ॥ १६ ॥
१६) मग देव म्हणाला, अरे अर्जुना, हाच योग आम्हीं सूर्याला
सांगितला; परंतु ती गोष्ट फार दिवसांपूर्वीची आहे.
मग तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी ।
निरुपिली बरवी । मनु प्रती ॥ १७ ॥
१७) मग त्या विवस्वान् सूर्यानें या योगाची संपूर्ण माहिती
वैवस्वत मनूला उत्तम प्रकारें सांगितली.
मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली ।
ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥ १८ ॥
१८) वैवस्वत मनूनें यांचें स्वतः आचरण केलें आणि मग ( आपला
मुलगा जो ) इक्ष्वाकु त्याला उपदेश केला. अशी ही परंपरा मूळापासून चालत आलेली आहे.
मग आणिकहि या योगातें । राजर्षि जाहले जाणते ।
परि तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोणी ॥ १९ ॥
१९) मग आणखीहि ह्या निष्काम कर्मयोगाला जाणणारे राजर्षि पुढें
होऊन गेले; पण तेव्हांपासून आतां हल्लीं हा कोणाला ठाऊक नाहीं.
जे प्राणियां कामीं भरु । देहाचिवरी आदरु ।
म्हणोनि पडिला विसरु । आत्मबोधाचा ॥ २० ॥
२०) कारण प्राण्यांचा सगळा भर विषयवासनेवर ( पडला ) व त्यांचा सगळा जीव काय तो देहावर आहे; म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला.
अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि ।
जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ॥ २१ ॥
२१) आत्मबोधाची आस्था ज्या बुद्धीनें बाळगावयाची ती
आडमार्गाला लागल्यामुळें ( लोकांना ) विषयसुख हेच आत्यंतिक सुख वाटूं लागलें व
देहादिक प्रपंच हा प्राणाप्रमाणें प्रिय झाला.
एर्हवीं तरी खवणेयांचां गांवीं । पाटाउवें काय करावीं ।
सांगें जात्यंधा रवी । काय आथी ॥ २२ ॥
२२) नाहीं तर, नग्न लोकांच्या गावीं उंची वस्त्रें काय
करायचीं ? जन्मांधाला सूर्य काय होय ? सांग, बरें
कां बहिरयांचा आस्थानीं । कवण गीतातें मानी ।
कीं कोल्हेया चांदणीं आवडी उपजे ॥ २३ ॥
२३) किंवा, बहिर्यांच्या सभेंत गाण्याला कोण किंमत देणार ?
किंवा, कोल्ह्याच्या मनांत चांदण्याबद्दल प्रेम कधीं उत्पन्न होईल काय ?
पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते ।
ते काउळे केवीं चंद्रातें । वोळखती ॥ २४ ॥
२४) चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे ,
( निरुपयोगी होतात ) ते कावळे चंद्राला कसे बरें ओळखणार ?
तैसे वैराग्याची
शिंव न देखती । जे विवेकाची भाषा नेणती ।
ते मूर्ख केंवीं पावती । मज ईश्र्वरातें ॥ २५ ॥
२५) त्याप्रमाणें वैराग्यरुपी नगराच्या शिवेचेंही ज्यांनी
कधीं दर्शन घेतलें नाहीं, विवेक कशाला म्हणतात हें ज्यांना माहीत नाही, त्या
मूर्खांना, माझी ईश्र्वराची कशी बरें प्राप्ति होणार ?