Showing posts with label Ovya 26 to 50. Show all posts
Showing posts with label Ovya 26 to 50. Show all posts

Monday, October 26, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 2 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग २


 

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 2 
Ovya 26 to 50 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग २ 
ओव्या २६ ते ५०

कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला ।

म्हणोनि योगु हा लोपला । लोकीं इये ॥ २६ ॥

२६) हा मोह इतका कसा वाढला कोण जाणें ! त्यामुळें बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकांतला हा निष्काम कर्मयोग बुडाला.

तोचि हा आजि आतां । तुजप्रती कुंतीसुता ।

सांगितला आम्ही तत्त्वता । भ्रांति न करीं ॥ २७ ॥

२७) तोच हा योग अर्जुना, आम्हीं तुला आज खरोखर सांगितला, याविषयीं संशय ठेवूं नकोस.

हें जीवींचें निज गुज । परी केवीं राखों तुज ।

जे पढियेसी तूं मज । म्हणऊनियां ॥ २८ ॥

२८) हा योग ( म्हणजे ) माझ्या जिवाची अगदीं गुप्त गोष्ट आहे; पण तुझ्यापासून ती कशी चोरुन ठेवूं ? कारण तूं माझा अगदी लाडका पडलास.

तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा ।

मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ॥ २९ ॥

२९) अर्जुना, तूं प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा व सख्याची जीवनकला आहेस.

तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों ।

जरी संग्रामारुढ आहों । जाहलों आम्ही ॥ ३० ॥

३०) अर्जुना, तुझा व माझा संबंध अगदीं निकटचा आहे. या वेळीं तुझी फसवणूक कशी करावी ? जरी आम्ही युद्धाला सज्ज झालों आहों;

तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें ।

परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं ॥ ३१ ॥

३१ तरी क्षणभर तें बाजूला ठेवून, या गडबडीचाहिं विचार मनांत न आणतां पहिल्यानें तुझें अज्ञान घालवून टाकलें पाहिजे. 

तंव अर्जुन म्हणे हरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी ।

एथ विस्मयो काय अवधारीं । कृपानिधी ॥ ३२ ॥

३२) तेव्हां अर्जुन म्हणाला, कृपानिधि श्रीहरि, पाहा बरें, आई आपल्या ( मुलांवर ) ममता करते, त्यांत नवल तें काय ?

तूं संसारश्रांतांची साउली । अनाथा जीवांची माउली ।

आमुतें कीर प्रसवली । तुझी कृपा ॥ ३३ ॥

३३) संसारतापानें थकलेल्यांची तूं सावली आहेस; अनाथ जीवाची आई आहेस, आम्हांला तर केवळ तुझ्या कृपेनेंच जन्मास घातलें आहे.   

देवा पांगुळ एकादें विइजे । तरी जन्मौनि जोजारु साहिजे ।

हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां ॥ ३४ ॥

३४) देवा, ( आईनें ) एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला, तर जन्मापासून त्याचा त्रास तिला काढावाच लागतो; या तुझ्या ( गोष्टीं ) तुझ्यासमोर काय बोलाव्या.

आतां पुसेन जें मी कांहीं । तेथ निकें चित्त देईं ।

तेवींचि देवें कोपावें ना कांहीं । बोला एका ॥ ३५ ॥  

३५) आतां मी जें काहीं विचारीन, त्याकडे चांगलें चित्त दे. त्याचप्रमाणें देवा, माझ्या या बोलाचा ( प्रश्र्णाचा ) मुळीं राग धरुं नकोस.

तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता ।

ते नावेक मज चित्ता । मानेचिना ॥ ३६ ॥

३६) अनंता, पूर्वींची गोष्ट म्हणून जी तूं मला सांगितलीस, ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाहीं.  

जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाउकें नाहीं ।

तरी तुवांचि केवीं पाहीं । उपदेशिला ॥ ३७ ॥

३७) पाहा, तो विवस्वत म्हणजे कोण हें वाडवडिलांनासुद्धां ठाऊक नाहीं; तर तूं त्याला उपदेश केलास, हे कसें शक्य आहे ?  

तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव कृष्ण सांपेचा ।

म्हणोनि गा इये मातुचा । विसंवादु ॥ ३८ ॥

३८) तो तर फार पूर्वींच्या काळाचा, म्हणजे देवा, हें तुझें बोलणें विसंगत आहे.

तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांहीं काय जाणिजे ।

हें लटिकें केवीं म्हणिजे । एकिहेळां ॥ ३९ ॥

३९) तसेंच; देवा, तुझें चरित्र मला कसें काय समजणार ? तेव्हा हें एकदम खोटें तरी कसें म्हणावें ?

परी हेचि मातु आघवी । मी परियेसें तैशी सांगावी ।

जे तुवांचि तया रवीं केवीं । उपदेशु केला ॥ ४० ॥   

४०) तेव्हां तूंच त्या सूर्याला उपदेश कसा केलास, हीच सगळी हकीकत मला पटेल तशी सांग.

तंव कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता ।

तैं आम्ही नसों ऐसीचित्ता । भ्रांति जरी तुज ॥ ४१ ॥

४१) त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, जेव्हा तो विवस्वान् होता, तेव्हां आम्ही नव्हतों, अशी जर तुझ्या चित्ताला भ्रांति झाली आहे,

तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हांसी ।

बहुतें गेलीं परी तियें न समरसी । आपलीं तूं ॥ ४२ ॥

४२) तरी अरे, तुला हें माहीत नाहीं कीं, तुमचे व आमचे ( आजपर्यंत ) कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत; पण तुला आपल्या जन्मांची आठवण नाही.

मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें ।

तें समस्तही स्मरें । धनुर्धरा ॥ ४३ ॥

४३) ज्या ज्या वेळीं जें जें रुप घेऊन मी अवतरलों, तें तें सगळे अर्जुना मला आठवतें.

म्हणोनि आघवें । मागील मज आठवें ।

मी अजुही परि संभवें । प्रकृतियोगें ॥ ४४ ॥

४४) म्हणून मागचें सगळें मला आठवतें. मी जन्मरहित आहें. पण मायेच्या योगानें जन्म घेतों.

माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे ।

तें प्रतिबिंबे मायावशें । माझांचि ठायीं ॥ ४५ ॥  

४५) माझा अविनाशीपणा तर नाहींसा होत नाहीं. पण अवतार घेणें व संपविणें ही जी एक क्रिया ( माझ्या संबंधानें ) दिसते, ती माझ्या ठिकाणीं मायेच्या योगानें भासते.

माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे ।

तेंही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एर्‍हवीं नाहीं ॥ ४६ ॥   

४६) माझी स्वतंत्रता तर बिघडतच नाहीं; परंतु मी कर्माधीन आहे, असें जें दिसतें, ते भ्रांत ( अज्ञान ) बुद्धि असली तरच दिसतें, एरव्हीं नाहीं.     

कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें ।

एर्‍हवीं काय वस्तुविचारें । दुजें आहे ॥ ४७ ॥

४७) किंवा एकाच वस्तूचीं दोन रुपें दिसतात; पण तीं केवळ आरशाच्या योगानें दिसतात; एर्‍हवीं ( त्या मूळ ) वस्तूचा विचार केला तर, तिला दुसरें ( रुप ) आहे काय ?

तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं ।

तैं साकारपणें नटें नटीं । कार्यालागीं ॥ ४८ ॥

४८) तसा अर्जुना, मी निराकारच आहें;  पण जेव्हां मायेचा आश्रय करतों तेव्हां कांहीं विशेष कार्यासाठी मी सगुण रुपाच्या वेषानें नटतों.

जे धर्मजात आघवें । युगायुगीं म्या रक्षावें ।

ऐसा ओघु हा स्वभावें । आद्य असे ॥ ४९ ॥

४९) कारण कीं, जेवढे धर्म म्हणून आहेत, तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगांत मी रक्षण करावें, असा क्रम स्वभावतः अगदीं मुळापासून चालत आलेला आहे. 

म्हणोनि अजत्व परतें ठेवीं । मी अव्यक्तपणही नाठवीं ॥

जे वेळीं धर्मातें अभिभवी । अधर्मु हा ॥ ५० ॥

५०) म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतों, त्या वेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतों व आपलें अव्यक्तपणहि मनांत आणीत नाहीं. 




Custom Search


Wednesday, August 12, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 Part 2 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग २

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 2 Ovya 26 to 50 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग २ ओव्या २६ ते ५०
तरी आपुलिया सवेसा । कां न मगावासि परेशा ।
देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥ २६ ॥
२६) तर मग हे परमेश्र्वरा, आपल्या इच्छेला येईल तसें तुजजवळून कां मागून घेऊं नये ? देवा, माझ्या मनांतील हेतु पूर्ण सफल होण्याची ही वेळ आली आहे. 
देखें सकळार्तीचें जियालें । आजि पुण्य यशासी आलें ।
हे मनोरथ जहाले । विजयी माझे ॥ २७ ॥
२७) पाहा, माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झालें, आज माझें पूर्व पुण्य यशस्वी झालें व माझ्या मनातील हेतु आज तडीस गेले.
जी जी परममंगळधामा । देवदेवोत्तमा । 
तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणऊनियां ॥ २८ ॥
२८) कारण, अहो महाराज, सर्वोत्कृष्ट मंगलाचें स्थान आणि ( सर्व ) देवांत श्रेष्ठ अशा देवा, तूं आमच्या ताब्यांत आला आहेस, म्हणून  
जैसें मातेचां ठायीं । अपत्या अनवसरु नाहीं ।
स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥ २९ ॥
२९) पाहा, जसें लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणीं वेळ-अवेळ अशी कांहींच नसते;   
तैसें देवा तूतें । पुसिजतसें आवडे तें ।
आपुलेनि आर्तें । कृपानिधि ॥ ३० ॥
३०) तसें हे कृपानिधि देवा, मी आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणें तुला वाटेल तें विचारीत आहें.
तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित ।
तें सांगें एक निश्र्चित । पार्थु म्हणे ॥ ३१ ॥
३१) तर मग परलोकीं कल्याणकारक आणि ( इहलोकीं ) आचरण्याला तर योग्य असें जें असेल तें एक मला निश्र्चित करुन सांग, असें अर्जुन म्हणाला.
या बोला अच्युतु । म्हणतसे विस्मितु । 
अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥ ३२ ॥
३२) अर्जुनाच्या या भाषणानें श्रीकृष्ण आश्र्चर्यचकित होऊन म्हणूं लागले, अर्जुना, आम्हीं, तुला हा थोडक्यांत मतलब सांगितला
जे बुद्धियोगु सांगतां । सांख्यमतसंस्था । 
प्रकटिली स्वभावता । प्रसंगें आम्हीं ॥ ३३ ॥
३३) कारण कीं, निष्काम कर्मयोग सांगत असतांना प्रसंगानें सहजच आम्ही ज्ञानमार्गाची व्यवस्था ( ज्या हेतूनें ) स्पष्ट केली,
तो उद्देशु तूं नेणसीचि । म्हणोनि क्षोभलासि वायांचि ।
तरी आतां जाण म्यांचि । उक्त दोन्ही ॥ ३४ ॥
३४) तो आमच्या प्रतिपादनाचा हेतु तूं जाणलाच नाहींस, म्हणून उगीच रागावला आहेस. तर आतां ध्यानांत ठेव कीं, हे दोनहि मार्ग मीच सांगितलेलें आहेत.
अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा ।
मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥ ३५ ॥
३५) हे वीरश्रेष्ठा अर्जुना, ऐक. या लोकाममध्यें हे दोन्ही मार्ग माझ्यापासून प्रकट झालेले आहेत व ते मुळापासून तसेच चालत आलेले आहेत.
एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठिजे ।
जेथ ओळखीसवें पाविजे । तद् रुपता ॥ ३६ ॥
३६) त्यांपैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात, त्याचें आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्यांत ओळखीबरोबर परमात्मस्वरुपाशीं तन्मयता प्राप्त होतें.  
एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण ।
होवूनिया निर्वाण । पावती वेळे ॥ ३७ ॥
३७) दुसरा तो कर्मयोग समज. जेथें साधक लोक निष्णात होऊन परम गतीला पावतात, ( परंतु ) ते कांहीं कालानें पावतात.   
हे मार्गु तरी दोनी । परि एकवटती निदानीं ।
जैसीं सिद्धसाध्यभोजनीं । तृप्ति एकी ॥ ३८ ॥
३८) हे मार्ग तर दोन आहेत; परंतु ते शेवटीं एकाच ठिकाणी येऊन मिळतात. ज्याप्रमाणें तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवणांत सारखीच तृप्ती असते; 
कां पूर्वापर सरिता । भिन्न दिसती पाहतां ।
मग सिंधुमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं ॥ ३९ ॥
३९) किंवा पूर्वेकडून व पश्र्चिमेकडून वाहणार्‍या नद्या पाहिल्या तर वाहतांना वेगळाल्या दिसतात, मग समुद्रांत मिळाल्या असतां शेवटी एकच होतात; 
तैसीं दोनी ये मतें । सूचिती एका कारणातें ।
परी उपास्ति ते योग्यते-। आधीन असे ॥ ४० ॥
 ४०) त्याप्रमाणें ज्ञानयोग व कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहेत, तरी ते एकाच साध्याला सुचवितात. परंतु त्यांचे आचरण करणें करणाराच्या योग्यतेवर अवलंबून आहे. 
देखें उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा ।
सांगें नरु केवीं तैसा । पावे वेगां ॥ ४१ ॥
४१) हें पाहा. ज्याप्रमाणें पक्षी उड्डाणाबरोबर फळाला बिलगतो त्याप्रमाणें मनुष्याला त्या वेगानें तें फळ कसें प्राप्त करुन घेतां येईल ? सांग बरें. 
तो हळूहळू ढाळेंढाळें । केतुकेनि एके वेळे ।
मार्गाचेनि बळें । निश्र्चित ठाकी ॥ ४२ ॥
४२) तो हलके हलके एका फांदीवरुन दुसर्‍या फांदीवर जात जात, कांहीं वेळानें त्या मार्गाच्या आधारानें त्या फळापर्यंत खात्रीनें पोंचतो.  
तैसें देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें ।
सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥ ४३ ॥
४३) पाहा. तसें वरील दृष्टान्तांतील पक्ष्याच्या मार्गाप्रमाणें ज्ञानमार्गाचा आश्रय करुन ज्ञानी तत्क्षणींच मोक्ष आपल्या अधीन करुन घेतात.
येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें ।
पूर्णता अवसरें । पावते होती ॥ ४४ ॥
४४) दुसरे जे कर्मयोगी, ते कर्मयोगाच्या आश्रयानें वेदांत सांगितलेला आपला आचारच पाळून, कांहीं कालानें पूर्णतेस पोहोंचतात.   
वांचोनि कर्मारंभ उचित । न करितांचि सिद्धवत ।
कर्महीना निश्र्चित । होईजेना ॥ ४५ ॥
४५) शिवाय योग्य कर्माचा आरंभ न करतांच कर्महीनाला सिद्धाप्रमाणें ( निष्कर्म ) निश्र्चयानें होतां येणार नाहीं. 
कां प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्या होईजे ।
हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ॥ ४६ ॥
४६) किंवा अधिकारपरत्वें आपल्या भागाला आलेलें कर्म टाकून द्यावें व एवढ्यानेंच निष्कर्म व्हावे, हें बोलणें अर्जुना, व्यर्थ व मूर्खपणाचें आहे.   
सांगें पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे ।
तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ॥ ४७ ॥
४७) पलीकडील तीराला कसें जावें अशी जेथें अडचण पडली आहे, तेथें नावेचा त्याग करुन कसें चालेल ? सांग बरें
ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेननि पाकु न कीजे ।
कीं सिद्धुही न सेविजे । केवीं सांगें ॥ ४८ ॥
४८) अथवा, जर भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे तर स्वतंपाक न करुन कसें चालेल ? किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करतां कसें चालेल ? सांग.
जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारु असे पाहीं ।
मग संतुष्टीचां ठायीं । कुंठे सहजें ॥ ४९ ॥
४९) जोंपर्यंत निरिच्छता प्राप्त झाली नाहीं तोंपर्यंत कर्म करणें हें राहाणारच, असें समज ; व मग आत्मतृप्ति प्राप्त झाली असतां कर्म सहजच थांबतें.
म्हणोनि आइकें पार्था । जया नैष्कर्म्यपदीं आस्था ।
तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥ ५० ॥
५०) म्हणून अर्जुना, ऐक. ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा आहे, त्यानें आपली विहित कर्में टाकणें मुळींच योग्य होणार नाहीं.   
 


Custom Search