Sunday, July 12, 2020

ShriRamcharitmans Part 26 श्रीरामचरितमानस भाग २६


ShriRamcharitmans Part 26 श्रीरामचरितमानस भाग २६ 
दोहा १६२ ते १६५ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—आदिसृष्टि उपजी जबहिं तब उतपति भै मोरि ।
नाम एकतनु हेतु तेहि देह न धरी बहोरि ॥ १६२ ॥
तो कपटी मुनी म्हणाला, ‘ जेव्हा सर्वप्रथम सृष्टी उत्पन्न झाली होती, तेव्हा माझी उत्पत्ती झाली होती. तेव्हापासून मी दुसरा देह धारण केलेला नाही. म्हणून माझे नाव ‘ एकतनू ‘ असे आहे. ॥ १६२ ॥
जनि आचरजु करहु मन माहीं । सुत तप तें दुर्लभ कछु नाहीं ॥
तपबल तें जग सृजइ बिधाता । तपबल बिष्नु भए परित्राता ॥
हे पुत्रा, मनात आश्र्चर्य करु नकोस. तपामुळे काहीही दुर्लभ नाही. तपानेच ब्रह्मदेव जगाची रचना करतात. तपामुळेच विष्णू हे जगाचे पालन करणारे झाले आहेत. ॥ १ ॥
तपबल संभु करहिं संघारा । तप तें अगम न कछु संसारा ॥
भयउ नृपहि सुनि अति अनुरागा । कथा पुरातन कहै सो लागा ॥
तपामुळेच रुद्र संहार करतात. जगात अशी कोणतीही गोष् नाही. ‘ हे ऐकून राजाला ( त्याच्याविषयी अतिशय ) प्रेम वाटू लागले. तेव्हा तो तपस्वी प्राचीन कथा सांगू लागला. ॥ २ ॥
करम धरम इतिहास अनेका । करइ निरुपन बिरति बिबेका ॥
उदभव पालन प्रलय कहानी । कहेसि अमित आचरज बखानी ॥
कर्म, धर्म आणि अनेक तर्‍हेचे इतिहास सांगून तो वैराग्याचे आणि ज्ञानाचे निरुपण करु लागला. सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार यांच्या मोठ्या आश्र्चर्यकारक कथा त्याने विस्ताराने सांगितल्या. ॥ ३ ॥
सुनि महीप तापस बस भयऊ । आपन नाम कहन तब लयऊ ॥
कह तापस नृप जानउँ तोही । कीन्हेहु कपट लाग भल मोही ॥
त्या ऐकून राजा त्या तपस्व्याच्या पूर्णपणे अधीन झाला आणि मग त्याला तो आपले नाव सांगू लागला. तपस्वी म्हणाला, ‘ राजा मी तुला जाणतो. तू कपटाने खोटे नाव सांगितलेस, ते मला आवडले. ॥ ४ ॥
सो—सुनु महीस असि नीति जहँ तहँ नाम न कहहिं नृप ।
मोहि तोहि पर अति प्रीति सोइ चतुरता बिचारि तव ॥ १६३ ॥
हे राजन, ऐक. नीती असे सांगते की, राजे लोक वाटेल तेथे आपले नाव सांगत नाहीत. तुझे हे चातुर्य पाहून मला तुझ्याविषयी फार प्रेम वाटू लागले आहे. ॥ १६३ ॥
नाम तुम्हार प्रताप दिनेसा । सत्यकेतु तव पिता नरेसा ॥
गुर प्रसाद सब जानिअ राजा । कहिअ न आपन जानि अकाजा ॥
तुझे नाव प्रतापभानू आहे. महाराज सत्यकेतू तुझे वडील होते. हे राजन, गुरुंच्या कृपेमुळे मी सर्व जाणतो, परंतु त्यात आपलाच तोटा समजून मी सांगत नाही. ॥ १ ॥
देखि ताततव सहज सुधाई । प्रीति प्रतीति नीति निपुनाई ॥
उपजि परी ममता मन मोरें । कहउँ कथा निज पूछे तोरें ॥
 हे राजन, तुझा सहज साधेपणा, प्रेम, विश्वास आणि नीति-निपुणता पाहून माझ्या मनात तुझ्याबद्दल ममता उत्पन्न झाली आहे. म्हणून मी तू न विचारता आपली कहाणी सांगतो. ॥ २ ॥
अब प्रसन्न मैं संसय नाहीं । मागु जो भूप भाव मन माहीं ॥
सुनि सुबचन भूपति हरषाना । गहि पद बिनय कीन्हि बिधि नाना ॥
आता मी खूष आहे, यात शंका बाळगू नकोस. ‘ हे राजन, मनात जे येईल, ते मागून घे. ‘ हे मनमोहक बोलणे ऐकून राजाला आनंद झाला आणि मुनीच्या पाया पडून त्याने विनवणी केली. ॥ ३ ॥
कृपासिंधु मुनि दरसन तोरें । चारि पदारथ करतल मोरें ॥
प्रभुहि तथापि प्रसन्न बिलोकी । मागि अगम बर होउँ असोकी ॥
‘ हे दयासागर मुनी, तुझ्या दर्शनानेच चारी पुरुषार्थ ( धर्म, अर्थ, काम, मोक्ष ) माझ्या हाती आले. तरीही स्वामींना प्रसन्न पाहून मी असा दुर्लभ वर मागतो की, मी शोकरहित व्हावे. ॥ ४॥
दोहा—जरा मरन दुख रहित तनु समर जितै जनि कोउ ।
एकछत्र रिपुहीन महि राज कलप सत होउ ॥ १६४ ॥
माझे शरीर वृद्धावस्था, मृत्यु आणि दुःखाने रहित होवो. मला युद्धात कुणीही जिंकू नये आणि पृथ्वीवर माझे शंभर कल्प एकछत्री राज्य असावे.’ ॥ १६४ ॥
कह तापस नृप ऐसेइ होऊ । कारन एक कठिन सुनु सोऊ ॥
कालउ तुअ पद नाइहि सीसा । एक बिप्रकुल छाड़ि महीसा ॥
तपस्वी म्हणाला, ‘ हे राजन, ‘ तथास्तु ‘ परंतु एक गोष्ट कठीण वाटते, तीही ऐक. हे पृथ्वीच्या स्वामी, फक्त ब्राह्मण कुलातील लोक सोडून प्रत्यक्ष काळसुद्धा तुझ्या चरणी मस्तक ठेवील. ॥ १ ॥
तपबल बिप्र सदा बरिआरा । तिन्ह के कोप न कोउ रखवारा ॥
जौं बिप्रन्ह बस करहु नरेसा । तौ तुअ बस बिधि बिष्नु महेसा ॥
तपामुळे ब्राह्मण नेहमी बलवान असतात. त्यांचा क्रोध झाल्यास रक्षण करणारा कोणीही नाही. हे नरपती, जर तू ब्राह्मणांना वश केलेस, तर ब्रह्मदेव, विष्णू व महेश हे सुद्धा तुझ्या अधीन होतील. ॥ २ ॥
चल न ब्रह्मकुल सन बरिआई । सत्य कहउँ दोउ भुजा उठाई ॥
बिप्र श्राप बिनु सुनु महिपाला । तोर नास नहिं कवनेहुँ काला ॥
ब्राह्मणांवर बळजबरी चालत नसते, हे मी दोन्ही हात उभारुन सत्य सांगतो. हे राजा, ऐक. ब्राह्मणांच्या शापाशिवाय तुझा नाश कोणत्याही काळी होणार नाही.’ ॥ ३ ॥
हरषेउ राउ बचन सुनि तासू । नाथ न होइ मोर अब नासू ॥
तव प्रसाद प्रभु कृपानिधाना । मो कहुँ सर्ब काल कल्याना ॥
राजा ते बोलणे ऐकून अतिशय प्रसन्न झाला आणि म्हणाला, ‘ हे स्वामी, आता माझा नाश कधीही होणार नाही. हे कृपानिधान प्रभो, तुमच्या कृपेने माझे आता नित्य कल्याण होईल.’ ॥ ४ ॥
एवमस्तु कहि कपटमुनि बोला कुटिल बहोरि ।
मिलब हमार भुलाब निज कहहु त हमहि न खोरि ॥ १६५ ॥
‘ असेच होईल ‘, असे म्हणून तो कुटिल मुनी म्हणाला, ‘ परंतु मला भेटला होतास आणि वाट चुकला होतास, ही गोष्ट जर कुणालाही सांगितलीस, तर मग ( वर सफल न झाल्यास ) आमचा दोष नाही. ॥ १६५ ॥
तातें मैं तोहि बरजउँ राजा । कहें कथा तव परम अकाजा ॥
छठें श्रवन यह परत कहानी । नास तुम्हार सत्य मम बानी ॥
हे राजा, मी तुला एवढ्यासाठी मनाई करतो की, हा प्रसंग कोणालाही सांगितल्यास तुझे मोठे नुकसान होईल. हे माझे सत्य वचन समज. ॥ १ ॥
यह प्रगटें अथवा द्विजश्रापा । नास तोर सुनु भानुप्रतापा ॥
आन उपायँ निधन तव नाहीं । जौं हरि हर कोपहिं मन माहीं ॥
हे प्रतापभानू, ऐक. ही गोष्ट जाहीर करण्याने किंवा ब्राह्मणांच्या शापाने तुझा नाश होईल, इतर कोणत्याही कारणाने नाही. अगदी (ब्रह्मदेव ), विष्णू, शंकर हेसुद्धा तुझ्यावर रागावले, तरी तुला मृत्यु येणार नाही.’ ॥ २ ॥स
सत्य नाथ पद गहि नृप भाषा । द्विज गुर कोप कहहु को राखा ॥
राखइ गुर जौं कोप बिधाता । गुर बिरोध नहिं कोउ जग त्राता ॥
राजाने मुनीचे पाय धरुन म्हटले, ‘ हे स्वामी, खरेच आहे. ब्राह्मण आणि गुरुच्या क्रोधापासून बचाव कोण बरे करणार ? सांगा. जरी ब्रह्मदेव रागावले, तरी गुरु वाचवितो, पण गुरु रागावले, तर जगात कोणीही वाचविणारा नाही. ॥ ३ ॥
जौं न चलब हम कहे तुम्हारें । होउ नास नहिं सोच हमारें ॥
एकहिं डर डरपत मन मोरा । प्रभु महिदेव श्राप अति घोरा ॥
जर मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागलो नाही, तर 

खुशाल 

मला मृत्यु येवो. मला त्याची काळजी नाही. पण माझ्या 

मनात एकच भीती आहे. ती म्हणजे ब्राह्नणांचा शाप 

भयंकर असतो. ॥ ४ ॥


Custom Search

No comments: