Saturday, February 27, 2021

AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 7 अयोध्याकाण्ड द्वितीय सोपान भाग ७

 

AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 7 
Doha 35 to 40 
अयोध्याकाण्ड द्वितीयसोपान भाग ७ 
दोहा ३५ ते ४०

दोहा—मरम बचन सुनि राउ कह कहु कछु दोषु न तोर ।

लागेउ तोहि पिसाच जिमि कालु कहावत मोर ॥ ३५ ॥

कैकेयीचे मर्मभेदी शब्द ऐकून राजे म्हणाले, ‘ तू तुला हवे ते म्हण, तुझा काही दोष नाही. माझा मृत्यु पिशाच होऊन तुझ्यात शिरला आहे. तोच तुझा बोलाविता धनी आहे. ॥ ३५ ॥

चहत न भरत भूपतहि भोरें । बिधि बस कुमति बसी जिय तोरें ॥

सो सबु मोर पाप परिनामू । भयउ कुठाहर जेहिं बिधि बामू ॥

भरताला चुकुनही राजपदाची इच्छा नाही. दुर्दैवाने तुझ्याच मनात दुर्बुद्धी आली आहे. हे सर्व माझ्या पापांचे फळ होय. त्यामुळे विधाता अवेळी प्रतिकूल झाला आहे. ॥ १ ॥

सुबस बसिहि फिरि अवधसुहाई । सब गुन धाम राम प्रभुताई ॥

करिहहिं भाइ सकल सेवकाई । होइहि तिहुँ पुर राम बड़ाई ॥

तू उध्वस्त केलेली ही सुंदर अयोध्या पुन्हा व्यवस्थितपणे वसेल आणि समस्त गुणांची खाण असलेल्या श्रीरामाची सत्तासुद्धा प्रस्थापित होईल. सर्व भाऊ त्याची सेवा करतील आणि त्रैलोक्यात त्याची महत्ता वाढेल. ॥ २ ॥

तोर कलंकु मोर पछिताऊ । मुएहुँ न मिटिहि न जाइहि काऊ ॥

अब तोहि नीक लाग करु सोई । लोचन ओट बैठु मुहु गोई ॥

 फक्त तुझ्यावरील कलंक व माझा पश्र्चातपा मेल्यानेही नाहीसा होणार नाही. तो कशाही प्रकारे जाणार नाही. आता तुला बरे वाटेल ते कर. तोंड लपवून माझ्या डोळ्याआड बैस. मला तोंड दाखवू नकोस. ॥ ३ ॥

जब लगि जिऔं कहउँ कर जोरी । तब लगि जनि कछु कहसि बहोरी ॥

फिरि पछितैहसि अंत अभागी । मारसि गाइ नहारु लागी ॥

मी हात जोडून सांगतो की, जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत आता आणखी काही बोलू नकोस. अग अभागिनी ! शेवटी तुला पश्र्चाताप करावा लागणार. कारण चमड्याची वादी बनविण्यासाठी तू गोहत्या करीत आहेस.’ ॥ ४ ॥

दोहा—परेउ राउ कहि कोटि बिधि काहे करसि निदानु ।

कपट सयानि न कहति कछु जागति मनहुँ मसानु ॥ ३६ ॥

राजे अनेक प्रका’रे समजावून म्हणाले, ‘ तू हा सर्वनाश का करीत आहेस ? ‘ आणि ते जमिनीवर कोसळले. परंतु कपट करण्यात चतुर कैकेयी काही बोलली नाही. जणू ती स्मशानात मौन बसून प्रेत-मंत्र सिद्ध करीत होती. ॥ ३६ ॥

राम राम रट बिकल भुआलू । जनु बिनु पंख बिहंग बेहालू ॥

हृदयँ मनाव भोरु जनि होई । रामहि जाइ कहै जनि कोई ॥

राजा “ राम राम “ असे घोकत होते व पंख कापलेल्या पक्ष्याप्रमाणे व्याकूळ झाले होते. त्यांना वाटत होते की, सकाळ होऊ नये आणि कुणी जाऊन श्रीरामांना ही गोष्ट सांगू नये. ॥ १ ॥

उदउ करहु जनि रबि रघुकुल गुर ।अवध बिलोकि सूल होइहि उर ॥

भूप प्रीति कैकइ कठिनाई । उभय अवधि बिधि रची बनाई ॥

‘ हे रघुकुलाचे मूळपुरुष सूर्य नारायणा, तुम्ही उद्या उगवू नका. अयोध्या व्याकूळ झालेली पाहून तुम्हांला फार दुःख होईल.’ राजांचे प्रेम आणि कोकेयीची निष्ठुरता ही दोन्ही विधात्याने दोन टोकाची निर्मिली होती. ॥ २ ॥

बिलपत नृपहि भयउ भिनुसारा । बीना बेनु संख धुनि द्वारा ॥

पढ़हिं भाट गुन गावहिं गायक । सुनत नृपहि जनु लागहिं सायक ॥

विलाप करता करता सकाळ झाली. राजद्वारात वीणा, बासरी आणि शंख यांचे आवाज येऊ लागले. भाट बिरुदावली म्हणू लागले आणि गवई गुण-गान करु लागले. ते ऐकून राजांच्या हृदयात बाण रुतल्यासारखे वाटत होते. ॥ ३ ॥

मंगल सकल सोहाहिं न कैसें । सहगामिनिहि बिभूषन जैसें ॥

तेहि निसि नीद परी नहिं काहू । राम दरस लालसा उछाहू ॥

ज्याप्रमाणे पतीबरोबर सती व्हायला निघालेल्या स्त्रीला आभूषणे आवडत नाहीत, त्याप्रमाणे राजाला ही मंगलवाद्ये आवडत नव्हती. श्रीरामचंद्रांच्या दर्शनाची लालसा आणि उत्साह यांमुळे त्या रात्री कुणालाच झोप आली नाही. ॥ ४ ॥

दोहा—द्वार भीर सेवक सचिव कहहिं उदित रबि देखि ।

जागेउ अजहुँ न अवधपति कारनु कवनु बिसेषि ॥ ३७ ॥

राजद्वारावर मंत्री व सेवकंची गर्दी झाली. सूर्य उगवलेला पाहून ते म्हणाले की, ‘ असे काय कारण घडले की, अयोध्यापती दशरथ अद्याप जागे झाले नाहीत ? ॥ ३७ ॥

पछिले पहर भूपु नित जागा । आजु हमहि बड़ अचरजु लागा ॥

जाहु सुमंत्र जगावहु जाई । कीजिअ काजु रजायसु पाई ॥

महाराज नेहमी रात्रींच्या शेवटच्या प्रहरी जागे होत असतात. परंतु आज आम्हांला आश्र्चर्य वाटते. हे सुमंत्रा, तुम्ही जाऊन राजांना जागे करा. त्यांची आज्ञा मिळताच आम्ही सर्व कामाला लागू. ॥ १ ॥

 गए सुमंत्रु तब राउर माहीं । देखि भयावन जात डेराहीं ॥

धाइ खाइ जनु जाइ न हेरा । मानहुँ बिपति बिषाद बसेरा ॥

तेव्हा सुमंत्र राजमहालात गेले, परंतु महाल भयानक दिसू लागला, तेव्हा आत शिरताना त्यांना भय वाटू लागले.वाटत होते की, जणू कोणी भूत समोर असून ते धावत येऊन कापून खाईल. परंतु ते दिसत नव्हते. जणू विपत्ती व विषाद यांनी तेथे मुक्काम ठोकला होता. ॥ २ ॥

पूछें कोउ न ऊतरु देई । गए जेहिं भवन भूप कैकेई ॥

कहि जयजीव बैठ सिरु नाई । देखि भूप गयउ सुखाई ॥

विचारल्यावर कोणी बोलत नव्हते. सुमंत्र जेथे राजा व कैकेयी ही दोघे होती, त्या महालात शिरले. ‘ जय जीव ‘ म्हणून त्यांनी मस्तक लववून अभिवादन केले व बसले. राजांची अवस्था पाहून ते गर्भगळित झाले. ॥ ३ ॥

सोच बिकल बिबरन महि परेऊ ।  मानहुँ कमल मूल परिहरेऊ ॥

सचिउ सभीत सकइ नहिं पूँछी । बोली असुभ भरी सुभ छूँछी ॥

त्यांना दिसले की, महाराज काळजीने व्याकूळ झाले आहेत. त्यांचा चेहरा पडला आहे. एखादे कमळ मुळापासून उपटून कोमजलेल्या अवस्थेत पडलेले असावे, तसे राजे जमिनीवर पडले होते. तेव्हा अशुभपूर्ण आणि शुभाचा लवलेश नसलेल्या वाणीने कैकेयी म्हणाली, ॥ ४ ॥

दोहा—परी न राजहि नीद निसि हेतु जान जगदीसु ।

रामु रामु रटि भोरु किय कहइ न मरमु महीसु ॥ ३८ ॥

‘ राजांना रात्रभर झोप आली नाही. कारण काय ते परमेश्र्वराला माहीत. यांनी ‘ राम राम ‘ असे म्हणत सकाळ झाल्याचे सूचित केले, परंतु याचे रहस्य महाराज काहीही सांगत नाहीत. ॥ ३८ ॥

आनहु रामहि बेगि बोलाई । समाचार तब पूँछेहु आई ॥

चलेउ सुमंत्रु राय रुख जानी । लखी कुचालि कीन्हि कछु रानी ॥

तुम्ही त्वरित रामाला बोलावून आणा आणि मग खुशाली विचारा. ‘ राजांचा कल पाहून सुमंत्र निघाले. राणीने काही दुष्ट चाल खेळली आहे, हे त्यांनी ओळखले. ॥ १ ॥

सोच बिकल मग परइ न पाऊ । रामहि बोलि कहिहि का राऊ ॥

उर धरि धीरजु गयउ दुआरें । पूँछहिं सकल देखि मनु मारें ॥

सुमंत्र काळजीने व्याकूळ झाले. वाटेत पाय धडपणे पडत नव्हते. ते विचार करु लागले की ‘ श्रीरामांना बोलावून राजे काय सांगतील ?’ मन घट्त करुन ते राजद्वारी आले. त्यांना उदास झालेले पाहून लोक विचारु लागले. ॥ २ ॥

समाधानु करि सो सबही का । गयउ जहॉं दिनकर कुल टीका ॥

राम सुमंत्रहि आवत देखा । आदरु कीन्ह पिता सम लेखा ॥

सर्व लोकांना समजावून सांगत सुमंत्र सूर्यकुलाचे तिलक श्रीरामचंद्र यांच्याकडे गेले. श्रीरामांनी सुमंत्रांना येताना पाहून पित्यासमान मानून त्यांना सन्मान दिला. ॥ ३ ॥

निरखि बदनु कहि भूप रजाई । रघुकुलदीपहि चलेउ लेवाई ॥

रामु कुभॉंति सचिव सँग जाहीं । देखि लोग जहँ तहँ बिलखाहीं ॥

श्रीरामांच्या मुखाकडे पाहात राजांची आज्ञा सांगून सुमंत्र रघुकुलदीपक श्रीरामचंद्नांना आपल्याबरोबर घेऊन निघाले. ते सुमंत्राबरोबर लवाजम्याशिवाय जात असल्याचे पाहून जिकडे तिकडे लोक खिन्न होऊ लागले. ॥ ४ ॥

दोहा—जाइ दीख रघुबंसमनि नरपति निपट कुसाजु ।

सहमि परेउ लखि सिंघिनिहि मनहुँ बृद्ध गजराजु ॥ ३९ ॥

रघुवंशमणी श्रीरामचंद्रांनी जाऊन पाहिले तर ज्याप्रमाणे सिंहिणीला पाहून एखादा म्हातारा हत्ती घाबरुन पडला असावा, तसे महाराज वाईट अवस्थेत पडले होते.

सूखहिं अधर जरइ सबु अंगू । मनहुँ दीन मनिहीन भुअंगू ॥

सरुष समीप दीखि कैकेई । मानहुँ मीचु घरीं गनि लेई ॥

राजांचे ओठ सुकून गेले होते आणि संपूर्ण शरीर पोळून निघत होते. मण्याविना साप दुःखी व असहाय्य होतो, तसे राजे दिसत होते. जवळच रागाने जळफळत असलेल्या कैकेयीला त्यांनी पाहिले. जणू प्रत्यक्ष मृत्यूच जवळ बसून राजांच्या अंतिम काळाचे क्षण मोजत होता. ॥ १ ॥

करुनामय मृदु राम सुभाऊ । प्रथम दीख दुखु सुना न काऊ ॥

तदपि धीर धरि समउ बिचारी । पूँछी मधुर बचन महतारी ॥

श्रीरामचंद्रांचा स्वभाव अत्यंत कोमल व करुणामय होता. त्यांनी आपल्या जीवनात प्रथमतःच हे दुःख पाहिले. यापूर्वी कधी त्यांनी दुःख ऐकलेसुद्धा नव्हते. तरीही प्रसंग पाहून मनात धीर धरुन त्यांनी गोड शब्दांत कैकेयी मातेस विचारले, ॥ २ ॥

मोहि कहु मातु तात दुख कारन । करिअ जतन जेहिं होइ निवारन ॥

सुनहु राम सबु कारनु एहू । राजहि तुम्ह पर बहुत सनेहू ॥

‘ हे माते, मला बाबांच्या दुःखाचे कारण सांग, म्हणजे ते दूर करण्याचा मला प्रयत्न करता येईल.’ कैकेयी म्हणाली, ‘ हे रामा, ऐक. राजांचे तुझ्यावर अत्यंत प्रेम आहे, हेच मुख्य कारण आहे. ॥ ३ ॥

देन कहेन्हि मोहि दुइ बरदाना । मागेउँ जो कछु मोहि सोहाना ॥

सो सुनि भयउ भूप उर सोचू । छाड़ि न सकहिं तुम्हार सँकोचू ॥

यांनी मला दोन वर दिले होते. मला जे बरे वाटले, ते मी मागितले. ते ऐकून राजे काळजीत पडले, कारण हे तुझा मोह सोडू शकत नाहीत. ॥ ४ ॥

दोहा—सुत सनेहु इत बचनु उत संकट परेउ नरेसु ।

सकहु त आयसु धरहु सिर मेटहु कठिन कलेसु ॥ ४० ॥

एकीकडे पुत्र-प्रेम आणि दुसरीकडे प्रतिज्ञा. राजे याच धर्मसंकटात पडले आहेत. जर तुला शक्य असेल, तर राजांची आज्ञा शिरोधार्य मानून यांच्या कठीण यातना दूर कर. ‘ ॥ ४० ॥

निधरक बैठि कहइ कटु बानी । सुनत कठिनता अति अकुलानी ॥

जीभ कमान बचन सर नाना । मनहुँ महिप मृदु लच्छ समाना ॥

कैकेयी बेधडकपणे अशी कटु वाणी बोलत होती. ती ऐकून प्रत्यक्ष निष्ठुरतासुद्धा फार व्याकूळ झाली. तिची जीभ ही धनुष्य आहे, शब्द हे पुष्कळसे बाण आहेत आणि जणू राजा हेच कोमल लक्ष्य आहे. ॥ १ ॥

जनु कठोरपनु धरें सरीरु । सिखइ धनुषबिद्या बर बीरु ॥

सबु प्रसंगु रघुपतिहि सुनाई । बैठि मनहुँ तनु धरि निठुराई ॥

या सर्व सरंजामासह जणू प्रत्यक्ष कठोरपणा उत्कृष्ट वीराचे रुप घेऊन धनुष्य-विद्या शिकत होता. श्रीरघुनाथांना सर्व हकीगत सांगून ती खाली बसली. जणू निष्ठुरता हीच देह धारण करुन बसली असावी. ॥ २ ॥

मन मुसकाइ भानुकुल भानू । रामु सहज आनंद निधानू ॥    

बोले बचन बिगत सब दूषन । मृदु मंजुल जनु बाग बिभूषन ॥

सूर्यकुलाचे सूर्य, स्वभावतःच आनंदनिधान असलेले श्रीराम मनातून हसले व सर्व दूषणरहित कोमल आणि सुंदर वचन बोलले, जणू ते वाणीचे भूषणच होते. ॥ ३ ॥

सुनु जननी सोइ सुतु बड़भागी । जो पितु मातु बचन अनुरागी ॥

तनय मातु पितु तोषनिहारा । दुर्लभ जननि सकल संसारा ॥

‘ हे माते, तोच पुत्र भाग्यशाली असतो, जो माता-पित्यांच्या

 वचनांचे पालन करतो. हे माते, आज्ञा-पालन करुन

 माता-पित्यांना संतुष्ट करणारा पुत्र जगात दुर्लभ असतो.

 ॥ ४ ॥



Custom Search

No comments: