Monday, June 4, 2018

Samas Pahila BahuDevaSthana Nirupan समास पहिला बहुदेवस्थान निरुपण


Dashak Atharava Samas Pahila BahuDevaSthana Nirupan
Samas Pahila BahuDevaSthana Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about BahuDevsthana.
समास पहिला बहुदेवस्थान निरुपण
श्रीराम ॥
तुज नमूं गजवदना । तुझा महिमा कळेना ।
विद्या बुद्धि देसी जना । लाहानथोरांसी ॥ १ ॥
१) गजवदना मी तुला नमस्कार करतो. तुझा महिमा कळत नाहीं. लहान आणि थोर माणसांना तूं विद्या व बुद्धि देतोस. 
तुज नमूं सरस्वती । च्यारी वाचा तुझेन स्फूर्ती ।
तुझें निजरुप जाणती । ऐसे थोड़े ॥ २ ॥
२) सरस्वती, मी तुला नमन करतो. चारहि वाणी तुझ्या सत्तेनें स्फुरतात. तुझें खरें स्वरुप ओळखणारे जगांत फार कमी असतात.
धन्य धन्य चतुरानना । तां केली सृष्टीरचना ।
वेद शास्त्रें भेद नाना । प्रगट केले ॥ ३ ॥
३) ब्रह्मदेवा तूं धन्य आहेस. तूं सृष्टीरचना केलीस. वेद, शास्तरे व इतर अनेक भेद तूं प्रगट केलेस.   
धन्य विष्णु पाळण करिसी । येकांशें सकळ जीवांसी ।
वाढविसी वर्तविसी । जाणजाणों ॥ ४ ॥
४) विष्णु, तूं धन्य आहेस, तूं पालन करतोस. आपल्या एका अंशानें सर्व जीवांना त्यांच्या अंतरंगाप्रमाणें वाढवतोस व वागवतोस. 
धन्य धन्य भोळाशंकर । जयाच्या देण्यास नाहीं पार ।
रामनाम निरंतर । जपत आहे ॥ ५ ॥
५) भोळा शंकर धन्य होय. त्यच्या देण्याला कांहीं मर्यादाच नाहीं. तो निरंतर रामनाम जपत असतो.
धन्य धन्य इंद्रदेव । सकळ देवांचाहि देव ।
इंद्रलोकींचें वैभव । काये म्हणौनि सांगावें ॥ ६ ॥
६) इंद्रदेव धन्य होय.तो सर्व देवांचा देव आहे. इंद्रलोकांचे वैभव वर्णन करणें कठिण आहे.
धन्य धन्य येमधर्म । सकळ जाणती धर्माधर्म ।
प्राणीमात्रांचें वर्म । ठांई पाडिती ॥ ७ ॥
७) यमधर्म धन्य होय. सगळ्यांना तो धर्म व अधर्म यांचे ज्ञान तो करुन देतो. जीवानें धर्म किती पाळला व अधर्म किती केला याचा बरोबर हिशोब तो करतो.
वेंकटेसीं महिमा किती । भले उभ्या अन्न खाती ।
वडे धिरडी स्वाद घेती । आतळस आपालांचा ॥ ८ ॥
८) व्यंकटेशाचा महिमा फार आहे. तेथें चांगलीं माणसें उभ्यानें अन्न खातात. वडे, धिरडी व खमंग घारग्यांचा ते रसास्वाद घेतात. 
धन्य तूं वो बनशंकरी । उदंड शाखांचिया हारी ।
विवरविवरों भोजन करी । ऐसा कैंचा ॥ ९ ॥
९) हे बनशंकरी तूं धन्य आहेस. तुझ्या नैवेद्याला खुप भाज्या असतात. त्यांतील प्रत्येक भाजीची चव घेऊन रसास्वाद घेणारा भक्त भेटणें कठीण आहे.   
धन्य भीम गोलांगुळा । कोरवड्यंच्य उदंड माळा ।
दहि वडे खातां ं । समाधान होये ॥ १० ॥
१०) वानररुपी बलभीम हनुमान धन्य आहे. उडदाच्या पीठाचे वडे तळतात. व त्यांच्या माळा मारुतीरायास घालतात. दहिवडे खाऊन सर्वांचें समाधान होते. 
धन्य तूं गा खंडेराया । भंडारें होये पिंवळी काया ।
कांदेभरीत रोटगे खाया । सिद्ध होती ॥ ११ ॥
११) खंडेराया तूं धन्य आहेस. तुझ्या दर्शनास आल्यावर भंडार्‍यानें सर्व अंग पिवळें होऊन जाते. मग कांद्याचे भरीत व रोडगे खायला सगळेजण आतुर होतात.  
धन्य तुळजाभोवानी । भक्तां प्रसन्न होते जनीं ।
गुणवैभव गणी । ऐसा कैंचा ॥ १२ ॥
१२) तुळजाभवानी धन्य आहे. भक्तांवर ती प्रसन्न होते. तिचे अनंत गुण आहेत. त्यांची कल्पना कोणासच येत नाहीं.
धन्य धन्य पांडुरंग । अखंड कथेचा होतो धिंग ।
तानमाने रागरंग । नाना प्रकारीं ॥ १३ ॥
१३) पांडुरंग अतिशय धन्य आहे. त्याच्यासमोर कथाकिर्तनांचा गदारोळ अखंड चाललेला असतो. अनेक प्रकारचा तानमान आणि रागरंग तेथें अहर्निश चालतो.   
धन्य तूं गा क्षत्रपाळा । उदंड जना लाविला चाळा ।
भावें भक्ति करितां फळा । वेळ नाहीं ॥ १४ ॥
१४) क्षेत्रपाळ बहिरोबा, तूं धन्य आहेस. अनेक लोकांस तूं प्रेम लावलें आहेस. मनापासून तुझी भक्ति केली तर फळ मिळण्यास उशीर लागत नाहीं. 
रामकृष्णादिक अवतार । त्यांचा महिमा अपार ।
उपासनेस बहुत नर । तत्पर जाले ॥ १५ ॥
१५) राम, कृष्ण वगैरे हे अवतार आहेत. त्यांचा महिमा फारच मोठा आहे. पुष्कळ लोक अगदी त्यांची मनापासून उपासना करतात.  
सकळ देवांचे मूळ । तो हा अंतरात्माचि केवळ ।
भूमंडळीं भोग सकळ । त्यासीच घडे ॥ १६ ॥
१६) सगळ्या देवांचे मूळ असेल तर तो हा अंतरात्माच आहे. या जगामधील सारे भोग अखेर अंतरात्म्यालाच घडतात. 
नाना देव होऊन बैसला । नाना शक्तिरुपें जाला ।
भोक्ता सकळ वैभव । तोचि येक ॥ १७ ॥
१७) अंतरात्मा अनेक देवांच्या रुपांनी व शक्तींच्या रुपांनीं व्यक्त होतो. सर्व प्रकारचे वैभव भोगणारा फक्त तोच एक आहे.
याचा पाहावा विचार । उदंड लांबला जोजार ।
होती जाती देव नर । किती म्हणोनि ॥ १८ ॥
१८) हा विचार नीट करुन पाहावा. देवांचे वर्णन करायचें म्हणजे फार मोठा विस्तार आहे. देव आणि माणसें किती होऊन जातात याची गणती करणें शक्य नाहीं.   
कीर्ति आणि अपकीर्ति । उदंड निंदा उदंड स्तुती ।
सर्वत्रांची भोगप्राप्ती । अंतरात्म्यासीच ॥ १९ ॥
१९) जगामध्यें होणारी कीर्ति आणि अपकीर्ति, अतिनिंदा आणि अति स्तुति, या सगळ्या गोष्टी अखेर अंतरात्म्यालाच भोगाव्या लागतात. 
कोण देहीं काये करितो । कोण देहीं काये भोगितो ।
भोगी त्यागी वीतरागी तो । येकचि आत्मा ॥ २० ॥
२०) कांहीं देहांत तो कार्य करतो, कांहीं देहांत भोग भोगतो. भोग असो वा त्याग असो वा वीतराग असो, सर्वांचा अनुनय घेणरा तो अंतरात्मा एकच आहे. 
प्राणी साभिमानें भुलले । देह्याकडे पाहात गेले ।
मुख्य अंतरात्म्यास चुकलें । अंतरीं असोनी ॥ २१ ॥
२१) माणसें देहाभिमानाला भुलतात. आणि केवळ देहाला पाहातात. देहालाच खरेपणा देतात. त्यामुळें अंतरात्मा देहामध्यें वास करीत असून देखील त्याला चुकतात. 
आरे या आत्मयाची चळवळ पाहे । ऐसा भूमंडळीं कोण आहे ।
अगाध पुण्यें अनुसंधान राहे । कांहींयेक ॥ २२ ॥
२२) अहो, या अंतरात्म्याचे कर्तेपण समजणारा व जाणणारा माणूस फारच क्वचित आढळतो. फार मोठें पुण्य गांठी असेल तर त्याचे थोडेफार अनुसंधान राखता येते.  
त्या अनुसंधानासरिसें । जळोनी जाईजे किल्मिषें ।
अंतरनिष्ठ ज्ञानी ऐसे । विवरोन पाहाती ॥ २३ ॥
२३)त्याचे अनुसंधान लागल्याबरोबर पाप जळून जातें. जो अंतरनिष्ट ज्ञानी असतो तो हे सगळें नीटपणें समजतो. 
अंतरनिष्ठ तितुके तरले । अंतरभ्रष्ट तितुके बुडाले ।
बाह्याकारें भरंगळले । लोकाचारें ॥ २४ ॥
२४) जें अंतरनिष्ट पुरुष असतात, तेवढेंच तरतात. जे अंतरभ्रष्ट असतात ते सारे बुडतात. वाया जातात. कारण बहिर्मुख लोकाचाराच्या नादी लागून ते भरमसाट वागतात. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बहुदेवस्थाननिरुपणनाम समास पहिला ॥
Samas Pahila BahuDevaSthana Nirupan
समास पहिला बहुदेवस्थान निरुपण


Custom Search

No comments: