Wednesday, June 6, 2018

Samas Tisara Nispruha Shikavan समास तिसरा निस्पृह शिकवण


Dashak Atharava Samas Tisara Nispruha Shikavan 
Samas Tisara Nispruha Shikavan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Nispruha Shikavan.
समास तिसरा निस्पृह शिकवण 
श्रीराम ॥
दुल्लभ शरीरीं दुल्लभ आयुष्य । याचा करुं नये नास ।
दास म्हणे सावकास । विवेक पाहावा ॥ १ ॥
१) माणसाचा देह मिळणें दुर्लभ असते. त्यांत आयुष्य मिळणें दुर्लभ असते. म्हणून त्याचा नाश करुं नये. श्रीरामदास म्हणतात स्वस्थपणें विचार करुन पाहावा.
न पाहातां उत्तम विवेक । आवघा होतो अविवेक ।
अविवेकें प्राणी रंक । ऐसा दिसे ॥ २ ॥
२) माणसानें नीटपणें विचार केला नाहीं, तर सारा अविचार होतो. विवेकहीन माणूस दीन बनतो.
हे आपले आपण केलें । आळसें उदास नागविलें ।
वाईट संगतीनें बुडविलें । देखत देखतां ॥ ३ ॥
३) असें घडून येण्याला आपलें आपणच कारण असतो. उदासीन वृत्तीचा माणूस आळसानें नागवला जातो. वाईट संगतीनें माणूस पाहातां पाहातां बुडतो.  
मूर्खपणाचा अभ्यास जाला । बाश्कलपणें घातला घाला ।
काम चांडाळ उठिला । तरुणपणीं ॥ ४ ॥
४) मूर्खोपणा अंगवळणी पडला, पोरकटपणानें वागूं लागला, तरुणपण आल्यानें कामवासना बळावली,
मूर्ख आळसी आणी तरुणा । सर्वांविषीं दैन्यवाणा । 
कांहीं मिळेना कोणा । काये म्हणावें ॥ ५ ॥
५) अशा प्रकारचा मूर्ख, आळशी आणि तरुण सर्व बाबतींत दैन्यवाणा बनतो. त्याला कांहीं मिळवतां येत नाहीं. याला काय म्हणावें?
जें जें पाहिजे तें तें नाहीं । अन्नवस्त्र तेंहि नाहीं ।
उत्तम गुण कांहींच नाहीं । अंतर्यामी ॥ ६ ॥
६) जीवनाला जें जें आवश्यक आहे, त्यापैकीं कांहींच त्याच्याजवळ नसतें. त्याच्यापाशी धड अन्न वस्त्र नसतें. त्याच्या अंतर्यामीं उत्तम गुण वगैरे कांहींच नसतात. 
बोलता येना बैसतां येना । प्रसंग कांहींच कळेना ।
शरीर मन हे कळेना । अभ्यासाकडे ॥ ७ ॥
७) नीट बोलतां येत नाहीं. बसता येत नाहीं. प्रसंग वगैरे कांहींच कळत नाहीं, शरीर आणी मन अभ्यासाकडे वळत नाहीं. 
लिहिणें नाहीं वाचणें नाहीं । पुसणें नाहीं सांगणें नाहीं ।
नेमस्तपणाचा अभ्यास नाहीं । बाष्कळपणं ॥ ८ ॥
८) लिहिणें नाहीं, वाचनें नाहीं, कोणाला विचारणें नाहीं किंवा सांगणें नाहीं. पोरकटपणानें नियमितपणाचा अभ्यास नाहीं, अशी त्याची दयनीय अवस्था असते.   
आपणास कांहींच येना । आणी सिकविलेंहि मानेना ।
आपण वेडा आणी सज्जना । बोल ठेवी ॥ ९ ॥
९) स्वतःला कांहींच येत नसतें. अणि जर कोणीं शिकवूं लागलें तर तेंहि आवडत नाहीं. असा माणूसआपण वेडा असतो आणि सज्जनांचा मात्र तो उगीच दोष देतो.
अंतरी येक बाहेर एक । ऐसा जयाचा विवेक ।
परलोकाचें सार्थक । कैंसे घडे ॥ १० ॥
१०) मनांत एक व जनांत एक असा त्याचा विवेक असतो. त्याच्या हातून परलोकाचे सार्थक किंवा परमार्थ कसा घडणार?  
आपला संसार नासला । मनामधें प्रस्तावला ।
तरी मग अभ्यास केला । पाहिजे विवेकाचा ॥ ११ ॥
११) अशा रीतीनें संसारांत फसगत झाल्यावर माणसाच्या मनाला पश्र्चाताप होतो.मग त्यानें विवेकाचा अभ्यास करावा. 
येकाग्र करुनियां मन । बळेंचि धरावें साधन ।
येत्नीं आळसाचें दर्शन । होऊंच नये ॥ १२ ॥
१२) अशा माणसानें मन एकाग्र करावें. आणि जबरदस्तीनें परमार्थ साधना करण्यास लागावें. आपल्या प्रयत्नामध्यें चुकूनसुद्धा आळसाचा शिरकाव होऊं देऊं नये. 
अवगुण अवघेचि सांडावें । उत्तम गुण अभ्यासावे ।
प्रबंद पाठ करीत जावे । जाड अर्थ ॥ १३ ॥
१३) आपल्या अंगचे सगळे अवगुण सोडावें. उत्तम गुणांचा अभ्यास करावा. ग्रंथ पाठ करावें. आणि त्यांतील मोठा व खोल अर्थ ध्यानांत धरावा.  
पदप्रबंद श्र्लोकप्रबंद । नाना धाटी मुद्रा छंद ।
प्रसंगज्ञानेंचि आनंद । होत आहे ॥ १४ ॥
१४) नाना प्रकारची रचना असलेले श्लोक आणि पदें, तसेंच अनेक धाटी, मुद्रा आणि छंद पाठ करावे. योग्य प्रसंगी त्यांचा उचित उपयोग केला तर सर्वांना आनंद होतो. 
कोणे प्रसंगीं काये म्हणावें । ऐसें समजोन जाणावें ।
उगेंचि वाऊगें सिणावें । कासयासी ॥ १५ ॥  
१५) कोणत्या प्रसंगीं काय म्हणणें योग्य आहे हे बरोबर समजून असावें. उगीच व्यर्थ गैरलागू म्हणण्यांत केवळ शीण होतो. 
दुसर्‍याचें अंतर जाणावें । आदर देखोन म्हणावें ।
जें आठवेल तें गांवें । हें मूर्खपण ॥ १६ ॥
१६) श्रोत्यांचे अंतरंगांत काय आहे तें आधी ओळखावें. आपण जें म्हणतो, त्याबद्दल त्यांची उत्सुकता दिसली तरच तें म्हणावें. उगीच जें आठवेल तें गाणें किंवा म्हणणें हें मूर्खपण होय.
ज्याची जैसी उपासना । तेंचि गावें चुकावेना ।
रागज्ञाना ताळज्ञाना । अभ्यासावें ॥ १७ ॥
१७) ज्याची जशी उपासना असेल तेंच त्यानें गांवें. त्यामध्यें चूक करुं नये. रागाचा व तालाचा अभ्यास करावा.
साहित संगीत प्रसंग मानें । करावीं कथेंचीं घमशानें ।
अर्थांतर श्रवणमननें । काढीत जावें ॥ १८ ॥
१८) साहित्य, संगीत, योग्य प्रसंग यांचा मेळ बसवून मोठ्य धडाक्यानें कथा करावी. श्रवण, मनन करुन ग्रंथांमधील निरनिराळे अर्थ काढावें. 
पाठ उदंडचि असावें । सर्वकाळ उजळीत जावें ।
सांगितलें गोष्टीचें असावें । स्मरण अंतरीं ॥ १९ ॥
१९) सपाटून पाठांतर असावें. सतत त्याची उजळणी करावी. जी गोष्ट सांगितली असेल तिचेअंतरी स्मरण ठेवावें. 
अखंड येकांत सेवावा । ग्रन्थमात्र धांडोळावा ।
प्रचित येईल तो घ्यावा । अर्थ मनीं ॥ २० ॥
२०) निरंतर एकांत सेवन करावा. एकामतामध्यें सगळें ग्रंथ सूक्ष्मपणें अभ्यासावें. आणि जोअर्थ अनुभवाला जुळेल तो ध्यानांत ठेवावा.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निस्पृहसिकवणनाम समास तिसरा ॥
Samas Tisara Nispruha Shikavan 
समास तिसरा निस्पृह शिकवण 


Custom Search

No comments: