Saturday, August 14, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 40 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ४०

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 40 
Doha 233 to 238 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ४० 
दोहा २३३ ते २३८

दोहा—मातु मते महुँ मानि मोहि जो कछु करहिं सो थोर ।

अघ अवगुन छमि आदरहिं समुझि आपनी ओर ॥ २३३ ॥

मी मातेशी सहमत असल्याचे समजून, ते जे काही करतील, ते थोडेच आहे. परंतु ते आपले बिरुद व संबंध जाणून माझी पापे व अवगुण क्षमा करुन माझा आदरच करतील. ॥ २३३ ॥

जौं परिहरहिं मलिन मनु जानी । जौं सनमानहिं सेवकु मानी ॥

मोरें सरन रामहि की पनही । राम सुस्वामि दोसु सब जनही ॥

हवे तर ते माझे मन दूषित समजून माझा त्याग करोत, हवे तर आपला सेवक समजून माझा सन्मान करोत, माझ्यासाठी श्रीरामांच्या पादुकाच मला शरण-स्थान आहेत. श्रीराम हे चांगले स्वामी आहेत. दोष जो आहे तो सर्व मज सेवकाचाच आहे. ॥ १ ॥

जग जस भाजन चातक मीना । नेम पेम निज निपुन नबीना ॥

अस मन गुनत चले मग जाता । सकुच सनेहँ सिथिल सब गाता ॥

जगामध्ये चातक व मासे हेच कीर्तीला पात्र आहेत, तेच नेम आणि प्रेम यांची जपणूक करण्यात निपुण आहेत. असा मनात विचात करीत भरत वाटेने निघाला होता. त्याचे शरीर संकोच व प्रेमाने मलूल झाले होते. ॥ २ ॥

फेरति मनहुँ मातु कृत खोरी । चलत भगति बल धीरज धोरी ।

जब समुझत रघुनाथ सुभाऊ । तब पथ परत जताइल पाऊ ॥

मातेची दुष्टता जणू त्याला मागे ओढत होती, परंतु धैर्य धरुन भरत भक्तीच्या जोरावर पुढे जात होता. जेव्हा श्रीरघुनाथांच्या स्वभावाची आठवण येई, तेव्हा वाटेवर त्याचे पाय जलद जलद पडत होते. ॥ ३ ॥

भरत दसा तेहि अवसर कैसी । जल प्रबाहँ जल अलि गति जैसी ॥

देखि भरत कर सोचु सनेहू । भा निषाद तेहि समयँ बिदेहू ॥

त्यावेळी भरताची दशा अशी होती, जशी पाण्याच्या प्रवाहात भोवर्‍याची असते. भरताची मनःस्थिती व प्रेम पाहून निषादराजसुद्धा देहभान विसरला. ॥ ४ ॥

दोहा—लगे होन मंगल सगुन सुनि गुनि कहत निषादु ।

मिटिहि सोचु होइहि हरषु । पुनि परिनाम बिषादु ॥ २३४ ॥

मंगल शकुन होऊ लागले. ते ऐकून व विचार करुन निषादराज म्हणाला की, ‘ चिंता दूर होईल, हर्ष होईल पण शेवटी दुःख होईल.’ ॥ २३४ ॥

सेवक बचन सत्य सब जाने । आश्रम निकट जाइ निअराने ॥

भरत दीख बन सैल समाजू । मुदित छुधित जनु पाइ सुनाजू ॥

भरताने गुहाचे सर्व बोलणे खरे मानले व तो आश्रमाजवळ जाऊन पोहोचला. तेथील वने व पर्वतांचे समूह पाहिले, तेव्हा भरताला इतका आनंद झाला की, जणू एखाद्या भुकेलेल्याला चविष्ट अन्न मिळावे. ॥ १ ॥

ईति भीति जनु प्रजा दुखारी । त्रिबिध ताप पीड़ित ग्रह मारी ॥

जाइ सुराज सुदेस सुखारी । होहिं भरत गति तेहि अनुहारी ॥

ज्याप्रमाणे ईतीच्या भीतीने दुःखी झालेली आणि त्रितापांनी व क्रूर ग्रहांनी आणि महामारींनी पिडलेली प्रजा एखाद्या उत्तम प्रदेशात व उत्तम राज्यात गेल्यावर सुखी होते, अगदी तशीच दशा भरताची झाली होती. ॥ २ ॥

( अतिवृष्टी, दुष्काळ, उंदरांचा उपद्रव, टोळधाडी, पक्षी व इतर राजांचे आक्रमण या शेतीच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल असलेल्या उपद्रवांना ‘ ईती ‘ असे म्हणतात. )

राम बास बन संपति भ्राजा । सुखी प्रजा जनु पाइ सुराजा ॥

सचिव बिरागु बिबेकु नरेसू । बिपिन सुहावन पावन देसू ॥

श्रीरामांच्या निवासामुळे वन-संपदा अशी शोभून दिसत होती की, जणू चांगला राजा मिळाल्याने प्रजा सुखी होते. शोभिवंत वन हा पवित्र देश होता आणि विवेक हा त्याचा राजा होता आणि वैराग्य हा त्याचा मंत्री होता. ॥ ३ ॥

भट जम नियम सैल रजधानी । सांति सुमति सुचि सुंदर रानी ॥

सकल अंग संपन्न सुराऊ । राम चरन आश्रित चित चाऊ ॥

यम, नियम हे योद्धे होते. पर्वत ही राजधानी होती. शांती व सुबुद्धी या दोन सुंदर राण्या होत्या. विवेकरुपी श्रेष्ठ राजा हा राज्याच्या सर्व अंगांनी परिपूर्ण होता आणि श्रीरामचंद्रांच्या चरणांचा आश्रित असल्यामुळे त्याच्या मनात आनंद होता. ॥ ४ ॥

( स्वामी, अमात्य, सुहृद, कोष, राज्य, दुर्ग व सेना ही राज्याची सात अंगे होत. )        

दोहा—जीति मोह महिपालु दल सहित बिबेक भुआलु ।

करत अकंटक राजु पुरँ सुख संपदा सुकालु ॥ २३५ ॥

मोहरुपी राजाला सेनेसह जिंकून विवेकरुपी राजा निष्कंटक राज्य करीत होता. त्याच्या नगरात सुख, संपत्ती व सुकाळ भरलेला होता. ॥ २३५ ॥

बन प्रदेस मुनि बास घनेरे । जनु पुर नगर गाउँ गन खेरे ॥

बिपुल बिचित्र बिहग मृग नाना । प्रजा समाजु न जाइ बखाना ॥

वनरुपी प्रांतांमध्ये मुनींची जी पुष्कळ निवासस्थाने आहेत. तीच जणू शहरे, नगरे, गावे आणि खेड्यांचे समूह होत. पुष्कळ प्रकारचे पक्षी आणि अनेक अनेक पशू हे जणू प्रजा होत. त्यांचे वर्णन करणे कठीण. ॥ १ ॥

खगहा करि हरि बाघ बराहा । देखि महिष बृष साजु सराहा ॥

बयरु बिहाइ चरहिं एक संगा । जहँ तहँ मनहुँ सेन चतुरंगा ॥

गेंडे, हत्ती, सिंह, वाघ, डुक्कर, रेडे व बैल पाहून राजाच्या समृद्धीची प्रशंसा करीत राहावे, असे वाटे. हे सर्व प्राणी आपापसातील वैरभाव सोडून सर्वत्र बरोबर फिरत होते, जणू ती चतुरंग सेना होय. ॥ २ ॥

झरना झरहिं मत्त गज गाजहिं । मनहुँ निसान बिबिधि बिधि बाजहिं ॥

चक चकोर चातक सुक पिक गन । कूजत मंजु मराल मुदित मन ॥

पाण्याचे झरे वाहात होते आणि हत्ती धुंदीमध्ये चीत्कार करीत होते. ते म्हणजे तेथे अनेक प्रकारचे वाजणारे नगारे होते. चक्रवाक, चकोर, चातक. पोपट आणि कोकिळ यांचे थवे आणि सुंदर हंस प्रसन्न चित्ताने किलबिलाट करीत होते. ॥ ३ ॥

अलिगन गावत नाचत मोरा । जनु सराज मंगल चहु ओरा ॥

बेलि बिटप तृन सफल सफूला । सब समाजु मुद मंगल मूला ॥

भ्रमरांचे थवे गुंजारव करीत होते आणि मोर नाचत होते. जणू या उत्कृष्ट राज्यात चोहीकडे मांगल्य पसरले होते. वेली, वृक्ष, तृण हे सर्व फळा-फुलांनी डवरले होते. सर्व समाज आनंदाचे व मांगल्याचे मूळ बनून गेला होता. ॥ ४ ॥

दोहा—राम सैल सोभा निरखि भरत हृदयँ अति पेमु ।

तापस तप फलु पाइ जिमि सुखी सिरानें नेमु ॥ २३६ ॥

श्रीरामांच्या पर्वताची शोभा पाहून भरताच्या मनात अत्यंत प्रेम दाटून आले. तपस्वी पुरुष नियमांचे पारणे झाल्यावर तपस्येचे फळ मिळाल्याने आनंदित होतो, त्याप्रमाणे, ॥ २३६ ॥

मासपारायण, विसावा विश्राम

नवाह्नपारायण, पाचवा विश्राम

तब केवट ऊँचें चढ़ि धाई । कहेउ भरत सन भुजा उठाई ॥

नाथ देखिअहिं बिटप बिसाला । पाकरि जंबु रसाल तमाला ॥

मग निषादराज धावत जाऊन उंच चढला आणि हात वर करुन म्हणू लागला, ‘ हे नाथ, हे जे पिंपरी, जांभळे, आंबे व तमालाचे वृक्ष दिसत आहेत,’ ॥ १ ॥

जिन्ह तरुबरन्ह मध्य बटु सोहा । मंजु बिसाल देखि मनु मोहा ॥

नील सघन पल्लव फल लाला । अबिरल छाहँ सुखद सब काला ॥

ज्या श्रेष्ठ वृक्षांमध्ये एक सुंदर व विशाल वटवृक्ष शोभत आहे, ज्याला पाहून मन मोहून जाते, ज्याची पाने निळसर व दाट आहेत आणि ज्याला लाल फळे लागलेली आहेत, ज्याची दाट सावली ही सर्व ऋतूंमध्ये सुखकर असते. ॥ २ ॥

मानहुँ तिमिर अरुनमय रासी । बिरची बिधि सँकेलि सुषमा सी ।

ए तरु सरित समीर गोसॉंई । रघुबर परनकुटी जहँ छाई ॥

जणू ब्रह्मदेवांनी परम शोभा एकत्र करुन अंधकार आणि लालिमा यांची रास रचली होती, असे हे वृक्ष नदीजवळ आहेत आणि हे राजकुमार ! तेथेच श्रीरामांची पर्णकुटी आहे. ॥ ३ ॥

तुलसी तरुबर बिबिध सुहाए । कहुँकहुँसियँ कहुँलखन लगाए ।

बट छायॉं बेदिका बनाई । सियँ निज पानि सरोज सुहाई ॥

तेथे तुळशीची अनेक झाडे शोभत आहेत. कुठे सीतेने तर कुठे लक्ष्मणाने ती लावलेली आहेत. याच वटवृक्षाच्या सावलीमध्ये सीतेने आपल्या कर-कमलांनी सुंदर चबुतरा बनविला आहे. ॥ ४ ॥

दोहा—जहॉं बैठि मुनिगन सहित नित सिय रामु सुजान ।

सुनहिं कथा इतिहास सब आगम निगम पुरान ॥ २३७ ॥

तेथे ज्ञानी श्रीराम मुनिवृंदांसमवेत बसून नित्य शास्त्र, वेद आणि पुराणे यांच्या कथा श्रवण करतात.’ ॥ २३७ ॥

सखा बचन सुनि बिटप निहारी । उमगे भरत बिलोचन बारी ॥

करत प्रनाम चले दोउ भाई । कहत प्रीति सारद सकुचाई ॥

मित्राचे बोलणे ऐकून आणि ते वृक्ष पाहून भरताच्या नेत्रांमध्ये पाणी आले. दोघे बंधू प्रणाम करीत पुढे निघाले. त्यांच्या प्रेमाचे वर्णन करण्यास सरस्वतीसुद्धा संकोच पावेल. ॥ १ ॥

हरषहिं निरखि राम पद अंका । मानहुँ पारसु पायउ रंका ॥

रज सिर धरि हियँ नयनन्हि लावहिं । रघुबर मिलन सरिस सुख पावहिं ॥

श्रीरामचंद्रांची चरणचिन्हे पाहून दोघे बंधू असे आनंदित झाले की, जणू एखाद्या दरिद्री मनुष्याला परीस मिळावा. तेथील धूळ मस्तकावर धारण करुन ती त्यांनी आपल्या हृदयाला आणि नेत्रांना लावली. तेव्हा तर त्यांना श्रीराम भेटल्याचाच आनंद झाला. ॥ २ ॥    

देखि भरत गति अकथ अतीवा । प्रेम मगन मृग खग जड़ जीवा ॥

सखहि सनेह बिबस मग भूला । कहि सुपंथ सुर बरषहिं फूला ॥

भरताची ती अत्यंत अवर्णनीय दशा पाहून वनातील पशु, पक्षी व वृक्षादी जड जीव प्रेम-मग्न झाले. अधिक प्रेम-वश झाल्यामुळे निषादराजही रस्ता चुकला. तेव्हा रस्ता दाखवून देव फुले उधळू लागले. ॥ ३ ॥

निरखि सिद्ध साधक अनुरागे । सहज सनेहु सराहन लागे ॥

होत न भूतल भाउ भरत को । अचर सचर चर अचर करत को ॥

भरताच्या प्रेमाची ही दशा पाहून सिद्ध व साधक लोकसुद्धा प्रेममग्न झाले आणि त्याच्या स्वाभाविक प्रेमाची प्रशंसा करु लागले की, जर या पृथ्वीतलावर भरताचा जन्म झाला नसता, तर जडाला चेतन व चेतनाला जड कुणी केले असते ? ( भरताचे प्रेम पाहून जड चेतनासारखे व चेतन जडासारखे स्तब्ध झाले. ) ॥ ४ ॥

दोहा—पेम अमिअ मंदरु बिरहु भरतु पयोधि गँभीर ।

मथि प्रगटेउ सुर साधु हित कृपासिंधु रघुबीर ॥ २३८ ॥

प्रेम हे अमृत आहे, विरह हा मंदराचल आहे आणि भरत हा समुद्र आहे. कृपासागर श्रीरामचंद्रांनी देव आणि साधूंच्या कल्याणासाठी स्वतः या भरतरुपी समुद्राचे विरहरुपी मंदराचलाने मंथन करुन हे प्रेमरुपी अमृत प्रकट केले आहे. ॥ २३८ ॥

सखा समेत मनोहर जोटा । लखेउ न लखन सघन बन ओटा ॥

भरत दीख प्रभु आश्रमु पावन । सकल सुमंगल सदनु सुहावन ॥

मित्र निषादराजासोबत येत असलेल्या या सुंदर जोडीला दाट वनाच्या आडून लक्ष्मण पाहू शकला नाही. भरताने प्रभू श्रीरामचंद्रांचा सर्व मांगल्याचे धाम, सुंदर व पवित्र असलेला आश्रम पाहिला. ॥ १ ॥

करत प्रबेस मिटे दुख दावा । जनु जोगीं परमारथु पावा ॥

देखे भरत लखन प्रभु आगे । पूँछे बचन कहत अनुरागे ॥

आश्रमात प्रवेश करताच भरताचे दुःख व दाह नाहीसे झाले. जणू योग्याला परमार्थच गवसला. भरताला दिसले की, लक्ष्मण प्रभूंच्यासमोर उभा राहून विचारलेल्या प्रश्नांची प्रेमाने उत्तरे देत होता. ॥ २ ॥      

सीस जटा कटि मुनि पट बॉंधें । तून कसें कर सरु धनु कॉंधें ॥

बेदी पर मुनि साधु समाजू । सीय सहित राजत रघुराजू ॥

त्याच्या डोक्यावर जटा होत्या. कमरेला वल्कले नेसलेली होती आणि त्यानांच बाणांचा भाता बांधला होता. हातात बाण व खांद्यावर धनुष्य होते. वेदीवर मुनी व साधु-समाज बसला होता आणि तेथे श्रीराम सीतेसह विराजमान होते. ॥ ३ ॥

बलकल बसन जटिल तनु स्यामा । जनु मुनिबेष कीन्ह रति कामा ॥

कर कमलनि धनु सायकु फेरत । जिय की जरनि हरत हँसि हेरत ॥

श्रीरामांनी वल्कले परिधान केली होती, जटा धारण

 केल्या होत्या व त्यांचा श्याम रंग होता. सीताराम असे

 वाटत होते की, जणू रतीने व कामदेवाने मुनिवेश धारण

 केला आहे. श्रीराम आपल्या करकमलांत धनुष्य-बाण

 फिरवीत होते, आणि जेव्हा ते हसत, तेव्हा पाहणार्‍याच्या

मनातील दुःख हरण होत होते व त्याला परमानंद व

 शांतता लाभत होती. ॥ ४ ॥



Custom Search

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 39 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ३९

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 39 
Doha 227 and 232 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ३९ 
दोहा २२७ आणि २३२

दोहा—नाथ सुहृद सुठि सरल चित सील सनेह निधान ।

सब पर प्रीति प्रतीति जियँ जानिअ आपु समान ॥ २२७ ॥

हे बंधुराज ! तुम्ही अकारण परम हित करणारे आहात, सरल-हृदय आणि शील व प्रेमाचे भांडार आहात. तुमचे सर्वांवर प्रेम आणि विश्वास आहे आणि मनात सर्वांना आपल्यासारखेच मानता. ॥ २२७ ॥

बिषई जीव पाइ प्रभुताई । मूढ़ मोह बस होहिं जनाई ॥

भरतु नीति रत साधु सुजाना । प्रभु पद प्रेमु सकल जगु जाना ॥

परंतु मूढ व विषयी जीव सत्ता मिळाल्यावर मोहामुळे आपले खरे स्वरुप दाखवितात. भरत हा नीतिपरायण साधु व चतुर आहे आणि प्रभु, तुमच्या चरणी त्याचे प्रेम आहे, ही गोष्ट सार्‍या जगाला माहीत आहे.  ॥ १ ॥

तेऊ आजु राम पदु पाई । चले धरम मरजाद मेटाई ॥

कुटिल कुबंधु कुअवसरु ताकी । जानि राम बनबास एकाकी ॥

तो भरतसुद्धा आज तुमचे सिंहासन मिळाल्यावर धर्म-मर्यादा सोडून वागत आहे. दुष्ट व खोटा भाऊ भरत वाईट वेळ आल्यावर आणि श्रीराम वनवासामध्ये एकटे आहेत, हे पाहून, ॥ २ ॥

करि कुमंत्रु मन साजि समाजू । आए करै अकंटक राजू ॥

कोटि प्रकार कलपि कुटिलाई । आए दल बटोरि दोउ भाई ॥

आपल्या मनात वाईट विचार धरुन व सर्व समाजाला आपल्या बाजूला घेऊन राज्य निष्कंटक करण्यासाठी येथे आला आहे. अनेक प्रकारची कारस्थाने करुन सेना जमवून दोघे बंधू आलेले आहेत. ॥ ३ ॥

जौं जियँ होति न कपट कुचाली । केहि सोहाति रथ बाजि गजाली ॥

भरतहि दोसु देइ को जाएँ । जग बौराइ राज पदु पाएँ ॥

जर त्यांच्या मनात कपट नसते व दुष्ट विचार नसते, तर रथ, घोडे आणि हत्तींच्या रांगा यावेळी कुणाला बर्‍या वाटल्या असत्या काय ? परंतु भरताला विनाकारण दोष कसा द्यावा ? राजपद मिळाल्यावर सर्वच उन्मत्त होत असतात. ॥ ४ ॥

दोहा—ससि गुर तिय गामी नघुषु चढ़ेउ भूमिसुर जान ।

लोक बेद तें बिमुख भा अधम न बेन समान ॥ २२८ ॥

चंद्र गुरुपत्नीगामी झाला. नहुषाने ब्राह्मणांना पालखीला जुंपले आणि राजा वेन याच्याइतका नीच कोणी असणार नाही. तो लोक व वेद यांना विन्मुख झाला. ॥ २२८ ॥

सहसबाहु सुरनाथु त्रिसंकू । केहि न राजमद दीन्ह कलंकू ॥

भरत कीन्ह यह उचित उपाऊ । रिपु रिन रंच न राखब काऊ ॥

सहस्त्रबाहू, देवराज इंद्र आणि त्रिशंकू इत्यादींपैकी कुणाला राजमदाने कलंकित केले नाही ? भरताने हा योग्य उपाय योजला आहे. कारण शत्रू किंवा ऋण यांना कधी थोडेसुद्धा शिल्लक ठेवू नये. ॥ १ ॥

एक कीन्हि नहिं भरत भलाई । निदरे रामु जानि असहाई ॥

समुझि परिहि सोउ आजु बिसेषी । समर सरोष राम मुखु पेखी ॥

श्रीरामांना असहाय्य समजून त्याने त्यांचा अनादर केला, ही गोष्ट भरताने चांगली केली नाही. परंतु आज युद्धात हे श्रीराम, तुमचे क्रोधित मुख पाहून त्याला ही गोष्ट चांगली कळून येईल आणि या अवमानाचे फळ त्याला मिळेल. ‘ ॥ २ ॥

एतना कहत नीति रसभूला । रन रस बिटपु पुलक मिस फूला ॥

प्रभु पद बंदि सीस रज राखी । बोले सत्य सहज बलु भाषी ॥

इतके बोलून लक्ष्मण नीती विसरला आणि त्याच्या शरीरात वीर-रस संचारला. तो प्रभू श्रीरामांना वंदन करुन, त्यांची चरणधूळ मस्तकी लावून आपले सत्य व सहज बळ लक्षात आणून म्हणाला, ॥ ३ ॥

अनुचित नाथ न मानब मोरा । भरत हमहि उपचार न थोरा ॥

कहँ लगि सहिअ रहिअ मनु मारें । नाथ साथ धनु हाथ हमारें ॥

‘ हे नाथ, माझे बोलणे अनुचित मानू नका. भरताने आपणाला काही कमी डिवचले नाही. अखेर कुठवर सहन करायचे आणि मन मारायचे ? जर स्वामी आमच्या सोबत आहेत आणि आमच्या हाती धनुष्य आहे, ॥ ४ ॥

 दोहा—छत्रि जाति रघुकुल जनमु राम अनुग जगु जान ।

लातहुँ मारें चढ़ति सिर नीच को धूरि समान ॥ २२९ ॥

मी जातीने क्षत्रिय आहे, रघुकुलातील माझा जन्म आहे आणि शिवाय मी श्रीरामामचा सेवक आहे. हे सर्व जगाला माहीत आहे. ( मग सहन का करायचे ? ) धुळीसारखे क्षुद्र काय आहे ? परंतु तीसुद्धा लाथ मारल्यावर डोक्यावर बसते. ‘ ॥ २२९ ॥

उठि कर जोरि रजायसु मागा । मनहुँ बीर रस सोवत जागा ॥

बॉंधि जटा सिर कसि कटि भाथा । साजि सरासनु सायकु हाथा ॥

असे म्हणून लक्ष्मणाने उठून हात जोडून आज्ञा मागितली. जणू तो म्हणजे जागा झालेला मूर्तिमंत वीररस होता. त्याने डोक्यावरील जटा बांधून कमरेला भाता आवळला आणि धनुष्य सज्ज करुन व बाण हातात घेऊन तो म्हणाला. ॥ १ ॥

आजु राम सेवक जसु लेऊँ । भरतहि समर सिखावन देऊँ ॥

राम निरादर कर फलु पाई । सोवहुँ समर सेज दोउ भाई ॥

‘ आज मी श्रीरामांचा सेवक असण्याची कीर्ती मिळवीन आणि भरताला युद्धात धडा शिकवीन. श्रीरामांचा अनादर करणारे दोघे बंधू रण शय्येवर झोपू देत. ॥ २ ॥

आइ बना भल सकल समाजू । प्रगट करउँ रिस पाछिल आजू ॥

जिमि करि निकर दलइ मृगराजू । लेइ लपेटि लवा जिमि बाजू ॥

बरे झाले सर्व परिवार एकत्र जमलेला आहे. आज मी पूर्वीचा सर्व राग काढतो. जसा सिंह हत्तींच्या कळपाचे निर्दालन करतो आणि ससाणा लावा पक्ष्याला पकडतो; ॥ ३ ॥

तैसेहिं भरतहि सेना समेता । सानुज निदरि निपातउँ खेता ॥

जौं सहाय कर संकरु आई । तौ मारउँ रन राम दोहाई ॥

त्याप्रमाणे भरताला सैन्यासह व लहान भावासह तुच्छ मानून मी रणमैदानात लोळवीन. जरी प्रत्यक्ष शंकर येऊन त्यांनी त्यांना मदत केली, तरीही मी श्रीरामांची शपथ घेऊन सांगतो की, मी त्यांना युद्धात नक्की मारुन टाकीन. ‘ ॥ ४ ॥

दोहा—अति सरोष माखे लखनु लखि सुनि सपथ प्रवान ।

सभय लोक सब लोकपति चाहत भभरि भगान ॥ २३० ॥

अत्यंत क्रोधामुळे संतापलेल्या लक्ष्मणाला पाहून आणि त्याची सत्य प्रतिज्ञा ऐकून सर्वजण भयभीत झाले आणि लोकपाल घाबरुन पळू लागले. ॥ २३० ॥

जगु भय मगन गगन भइ बानी । लखन बाहुबल बिपुल बखानी ॥

तात प्रताप प्रभाउ तुम्हारा । को कहि सकइ को जननिहारा ॥  

सर्व जग भीतीने धास्तावले. तेव्हा लक्ष्मणाला पाहून अपार बाहुबलाची प्रशंसा करीत आकाशवाणी झाली की, ‘ हे लक्ष्मणा, तुझा प्रताप कोण सांगू शकेल. ? आणि कोण जाणू शकेल ? ॥ १ ॥

अनुचित उचित काजु किछु होऊ । समुझि करिअ भल कह सबु कोऊ ॥

सहसा करि पाछें पछिताहीं । कहहिं बेद बुध ते बुध नाहीं ॥

परंतु कोणतेही कार्य असो, ते उचित-अनुचित याचा खूप विचार करुन करावे, म्हणजे सर्वजण त्याला चांगले म्हणतात. वेद व विद्वान म्हणतात की, जे विचार न करता घाईघाईने एखादे काम करुन मागाहून पश्चात्ताप करतात, ते बुद्धिमान नव्हेत. ‘ ॥ २ ॥

सुनि बचन लखन सकुचाने । राम सीयँ सादर सनमाने ॥

कही तात तुम्ह नीति सुहाई । सब तें कठिन राजमदु भाई ॥

देववाणी ऐकून लक्ष्मण ओशाळला. श्रीरामांनी व सीतेने आदरपूर्वक त्याचा सन्मान करुन म्हटले की, ‘ वत्सा ! तू फार चांगली नीति सांगितलीस. हे बंधो, राज्याचा मद हा फार कठीण मद आहे. ॥ ३ ॥

जो अचवँत नृप मातहि तेई । नाहिन साधुसभा जेहिं सेई ॥

सुनहु लखन भल भरत सरीसा । बिधि प्रपंच महँ सुना न दीसा ॥

ज्यांनी साधूंचा सत्संग केलेला नाही, तेच राजे राजमदरुपी मदिरा पिताच धुंद होऊन जातात. हे लक्ष्मणा ऐक, भरतासारखा उत्तम पुरुष ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये कुठे ऐकलेला नाही की पाहिलेला नाही. ॥ ४ ॥

दोहा—भरतहि होइ न राजमदु बिधि हरि हर पाइ ।

कबहुँ कि कॉंजी सीकरनि छीरसिंधु बिनसाइ ॥ २३१ ॥

अयोध्येचे राज्य ते काय, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव यांचे पद मिळाले, तरी भरताला मद होणार नाही. आंबट थेंबांनी क्षीरसमुद्र कधी नासतो का ? ॥ २३१ ॥

तिमिरु तरुन तरनिहि मकु गिलई । गगन मगन मकु मेघहिं मिलई ॥

गोपद जल बूड़हिं घटजोनी । सहज छमा बरु छाड़ै छोनी ॥

जरी माध्यान्हीच्या सूर्याला अंधकाराने गिळून टाकले, आकाश हे मेघांमध्ये विरुन गेले, गाईच्या खुराइतक्या पाण्यात अगस्त्य मुनी बुडाले आणि पृथ्वीने आपली स्वाभाविक सहनशीलता सोडून दिली, ॥ १ ॥

मसक फूँक मकु मेरु उड़ाई । होइ न नृपमदु भरतहि भाई ॥

लखन तुम्हार सपथ पितु आना । सुचि सुबंधु नहिं भरत समाना ॥

डासाच्या फुंकरीने सुमेरु उडून गेला, तरीही हे बंधो, भरताला कधी राजमद बाधू शकणार नाही. मी तुझी व बाबांची शपथ घेऊन सांगतो की, भरतासारखा पवित्र व उत्तम भाऊ जगात नाही. ॥ २ ॥

सगुन खीरु अवगुन जलु ताता । मिलइ रचइ परपंचु बिधाता ॥

भरतु हंस रबिबंस तड़ागा । जनमि कीन्ह गुन दोष बिभागा ॥

हे बाळा ! गुणरुपी दूध व अवगुणरुपी पाणी मिसळून विधाता या जगाची रचना करतो. परंतु भरताने सूर्यवंशरुपी तलावात हंसरुपाने जन्म घेऊन गुण व दोष यांना वेगवेगळे केलेले आहे. ॥ ३ ॥

गहि गुन पय तजि अवगुन बारी । निज जस जगत कीन्हि उजिआरी ॥

कहत भरत गुन सीलु सुभाऊ । पेम पयोधि मगन रघुराऊ ॥

गुणरुपी दूध घेऊन व अवगुणरुपी जल टाकून देऊन भरताने आपल्या कीर्तीने जगाला उजळून टाकले आहे. भरताचे गुण, शील व स्वभाव हे सांगता सांगता श्रीरघुनाथ प्रेमसमुद्रात मग्न झाले. ॥ ४ ॥

दोहा—सुनि रघुबर बानी बिबुध देखि भरत पर हेतु ।

सकल सराहत राम सो प्रभु को कृपानिकेतु ॥ २३२ ॥

श्रीरामचंद्रांची वाणी ऐकून आणि भरतावर असलेले त्यांचे प्रेम पाहून सर्व देव त्यांची स्तुती करीत म्हणू लागले की, ‘ श्रीरामांसारखा कृपा-धाम असलेला प्रभू दुसरा कोण आहे ? ॥ २३२ ॥

जौं न होत जग जनम भरत को । सकल धरम धुर धरनि धरत को ॥

कबि कुल अगम भरत गुन गाथा । को जानइ तुम्ह बिनु रघुनाथा ॥

जर जगात भरताचा जन्म झाला नसता, तर पृथ्वीवर सर्व धर्मांची धुरा कुणी धारण केली असती ? हे रघुनाथ, कविकुलालाहि अगम्य असलेली भरताच्या गुणांची कथा तुमच्याखेरीज दुसरा कोण जाणु शकणार ?’ ॥ १ ॥

लखन राम सियँ सुनि सुर बानी । अति सुखु लहेउ न जाइ बखानी ॥

इहॉं भरतु सब सहित सहाए । मंदाकिनीं पुनीत नहाए ॥

लक्ष्मण, श्रीराम व सीता ही देववाणी ऐकून सुखावून गेले. त्याचे वर्णन करता येत नाही. तेथे पोहोचल्यावर भरताने सर्व मंडळींच्याबरोबर पवित्र मंदाकिनीत स्नान केले. ॥ २ ॥

सरित समीप राखि सब लोगा । मागि मातु गुर सचिव नियोगा ॥

चले भरतु जहँ सिय रघुराई । साथ निषादनाथु लघु भाई ॥

नंतर सर्वांना नदीजवळ थांबवून, माता, गुरु व मंत्री यांची आज्ञा घेऊन आणि निषादराज व शत्रुघ्नाला बरोबर घेऊन जेथे सीता व श्रीरघानाथ होते, तिकडे भरत गेला. ॥ ३ ॥                   

समुझि मातु करतब सकुचाहीं । करत कुतरक कोटि मन माहीं ॥

रामु लखनु सिय सुनि मम नाऊँ । उठि जनि अनत जाहिं तजि ठाऊँ ॥

आपली माता कैकयीच्या कृत्याची आठवण आल्यावर

 भरत संकोचत होता आणि मनात अनेक कुतर्क करीत

 होता की, माझे नाव ऐकल्यावर श्रीराम ,लक्ष्मण व सीता

 हे येथील जागा सोडून दुसरीकडे जाऊ नयेत, म्हणजे 

झाले. ॥ ४ ॥





Custom Search

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 38 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ३८

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 38 
Doha 221 to 226 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ३८ 
दोहा २२१ ते २२६

दोहा—मगबासी नर नारि सुनि धाम काम तजि धाइ ।

देखि सरुप सनेह सब मुदित जनम फलु पाइ ॥ २२१ ॥

वाटेत राहाणारे स्त्री-पुरुष ही वार्ता ऐकताच घरदार व कामकाज सोडून धावत येत आणि त्यांचे रुप-सौंदर्य आणि प्रेम पाहून सर्वजण जन्माचे सार्थक झाल्याचे मानून आनंदित होत होते. ॥ २२१ ॥

कहहिं सपेम एक एक पाहीं । रामु लखनु सखि होहिं कि नाहीं ॥

बय बपु बरन रुपु सोइ आली । सीलु सनेहु सरिस सम चाली ॥

गावातील स्त्रिया एक दुसरीला प्रेमाने म्हणत की, ‘ सखी, हे राम-लक्ष्मण आहेत का ? हे सखी, यांची अवस्था, शरीर व रंग-रुप अगदी तसेच आहे. वागणे व स्नेह त्यांच्यासारखेच आणि चालणेसुद्धा त्यांच्यासारखेच आहे. ॥ १ ॥

बेषु न सो सखि सीय न संगा । आगें अनी चली चतुरंगा ॥

नहिं प्रसन्न मुख मानस खेदा । सखि संदेहु होइ एहिं भेदा ॥

परंतु हे सखी, यांचा तसा मुनिवेष नाही आणि बरोबर सीताही नाही. यांच्यापुढे चतुरंग सेना चालली आहे. शिवाय यांचे मुख प्रसन्न नाही. मनातून खंत आहे. हे सखी, या फरकामुळे वेगळेपणा वाटतो.’ ॥ २ ॥

तासु तरक तियगन मन मानी । कहहिं सकल तेहि सम न सयानी ॥

तेहि सराहि बानी फुरि पूजी । बोली मधुर बचन तिय दूजी ॥

तिचा तर्क इतर स्त्रियांना पटला. सर्वजणी म्हणत होत्या की, हिच्या सारखी शहाणी कोणी नाही. तिची वाखाणणी करीत व ‘ तुझे म्हणणे खरे आहे ‘ असे म्हणत दुसरी एकजण गोड शब्दांत म्हणाली. ॥ ३ ॥

कहि सपेम सब कथाप्रसंगू । जेहि बिधि राम राज रस भंगू ॥

भरतहि बहुरि सराहन लागी । सील सनेह सुभाय सुभागी ॥

श्रीरामांच्या राजतिलकाचा आनंद कसा भंग पावला, तो सर्व प्रसंग सांगून ती भाग्यवान स्त्री भरताचे वर्तन, स्नेह व स्वभाव यांची प्रशंसा करु लागली. ॥ ४ ॥

दोहा—चलत पयादें खात फल पिता दीन्ह तजि राजु ।

जात मनावन रघुबरहि भरत सरिस को आजु ॥ २२२ ॥

‘ बघा, पित्याने दिलेले राज्य सोडून हा भरत पायी चालत आहे आणि फलाहार करीत श्रीरामांना अयोध्येला परतण्याची विनवणी करण्यास जात आहे. यांच्यासारखा दुसरा कोण ( रामभक्त ) आहे ? ॥ २२२ ॥

भायप भगति भरत आचरनु । कहत सुनत दुख दूषन हरनू ॥

जो किछु कहब थोर सखि सोई । राम बंधु अस काहे न होई ॥

भरताचा बंधु-भाव, भक्ती आणि त्याचे वर्तन, याविषयी सांगणे व ऐकणे हे दोष हरण करणारे आहे. हे सखी, त्याच्याविषयी जितके सांगावे, तितके थोडेच आहे. श्रीरामांचा भाऊ असा का असणार नाही बरे ? ॥ १ ॥

हम सब सानुज भरतहि देखें । भइन्ह धन्य जुबती जन लेखें ॥

सुनि गुन देखि दसा पछिताहीं । कैकइ जननि जोगु सुतु नाहीं ॥

शत्रुघ्नासह भरताला पाहून आज आम्ही सर्वजणी मोठ्या भाग्यवान स्त्रियांच्या पंक्तीत आलो. ‘ अशा प्रकारे भरताचे गुण ऐकून आणि त्याची दशा पाहून स्त्रियांना वाईट वाटत होते आणि त्या म्हणत होत्या की, ‘ हा पुत्र कैकेयीसारख्या मातेला शोभत नाही. ‘ ॥ २ ॥

कोउ कह दूषनु रानिहि नाहिन । बिधि सबु कीन्ह हमहि जो दाहिन ॥

कहँ हम लोक बेद बिधि हीनी । लघु तिय कुल करतूति मलीनी ॥

कुणी म्हणत होती की, ‘ यात राणीचाही दोष नाही. हे सर्व विधात्याने घडविले आहे. तो आम्हांला अनुकूल आहे, म्हणून आम्हांला यांचे दर्शन घडले. नाहीतरी कुठे आम्ही लौकिकदृष्ट्या व वैदिक दृष्ट्या मर्यादाहीन, कुल व करणी या दोन्हींमध्ये मलिन, तुच्छ स्त्रिया, ॥ ३ ॥           

बसहिं कुदेस कुगॉंव कुबामा । कहँ यह दरसु पुन्य परिनामा ॥

अस अनंदु अचिरिजु प्रति ग्रामा । जनु मरुभूमि कलपतरु जामा ॥

आम्ही वाईट प्रदेशात आणि कुग्रामांत राहातो आणि स्त्रियांमध्येसुद्धा नीच स्त्रिया आहोत, आणि कुठे हे महान पुण्यामुळे होणारे यांचे दर्शन. ‘ असाच आनंद आणि आश्चर्य गावा-गावात लोकांना वाटत होते, जणु मरुभूमीमध्ये कल्पवृक्ष उगवला असावा. ॥ ४ ॥

दोहा—भरत दरसु देखत खुलेउ मग लोगन्ह कर भागु ।

जनु सिंघलबसिन्ह भयउ बिधि बस सुलभ प्रयागु ॥ २२३ ॥

भरताचे स्वरुप पाहून वाटेत राहाणार्‍या लोकांचे भाग्य उजळले. जणू दैवयोगाने सिंहल द्विपातील रहिवाश्यांना तीर्थराज प्रयाग सुलभ झाले. ॥ २२३ ॥

निज गुन सहित राम गुन गाथा । सुनत जाहिं सुमिरत रघुनाथा ॥

तीरथ मुनि आश्रम सुरधामा । निरखि निमज्जहिं करहिं प्रनामा ॥

अशा प्रकारे आपल्या गुणांबरोबरच श्रीरामांच्या गुणांचे गायन ऐकत आणि श्रीरघुनाथांचे स्मरण करीत भरत चालला होता. वाटेत तो तीर्थ पाहून स्नान करीत होता. मुनींचे आश्रम आणि देवांची मंदिरें पाहून प्रणाम करीत होता. ॥ १ ॥

मनहीं मन मागहिं बरु एहू । सीय राम पद पदुम सनेहू ॥

मिलहिं किरात कोल बनबासी । बैखानस बटु जती उदासी ॥

आणि मनातल्या मनात हा वर मागत होता की, श्रीसीतारामांच्या चरण-कमलांच्या ठायी प्रेम वसो. वाटेत भिल्ल, कोल इत्यादी वनवासी आणि वानप्रस्थ, ब्रह्मचारी, संन्यासी आणि विरक्त भेटत होते. ॥ २ ॥

करि प्रनामु पूँछहिं जेहि तेही । केहि बन लखनु रामु बैदेही ॥

ते प्रभु समाचार सब कहहीं । भरतहि देखि जनम फलु लहहीं ॥

त्यांपैकी सर्वांना प्रणाम करुन तो विचारत होता की, लक्ष्मण, श्रीराम व जानकी हे कोणत्या वनात आहेत ? ते लोक प्रभु श्रीरामांची सर्व वार्ता सांगत व भरताला पाहून त्यांच्या जन्माचे सार्थक होत, होते. ॥ ३ ॥

जे जन कहहिं कुसल हम देखे । ते प्रिय राम लखन सम लेखे ॥

एहि बिधि बूझत सबहि सुबानी । सुनत राम बनबास कहानी ॥

ते म्हणत की, ‘ आम्ही त्यांना सुखरुप पाहिले आहे, ते भरताला श्रीराम-लक्ष्मणांसमान प्रिय वाटत अशा प्रकारे भरत सुंदर वाणीने विचारत होता व श्रीरामांच्या वनवासाची कथा ऐकत जात होता. ॥ ४ ॥

दोहा—तेहि बासर बसि प्रातहीं चले सुमिरि रघुनाथ ॥

राम दरस की लालसा भरत सरिस सब साथ ॥ २२४ ॥

त्या दिवशी तेथेच थांबून दुसर्‍या दिवशी सकाळीच श्रीरघुनाथांचे स्मरण करुन भरत निघाला. सोबत असलेल्या सर्व लोकांनाही भरतासारखीच श्रीरामांच्या दर्शनाची लालसा होती. ॥ २२४ ॥

मंगल सगुन होहिं सब काहू । फरकहिं सुखद बिलोचन बाहू ॥

भरतहि सहित समाज उछाहू । मिलिहहिं रामु मिटिहि दुख दाहू ॥

सर्वांना मंगलसूचक शकुन होऊ लागले. पुरुषांचे उजवे, तर स्त्रियांचे डावे नेत्र आणि भुजा स्फुरत होत्या. सर्व परिवाराबरोबरच भरताला असा उत्साह वाटत होता की, श्रीराम भेटतील आणि दुःखाची आग शांत होईल. ॥ १ ॥

करत मनोरथ जस जियँ जाके । जाहिं सनेह सुराँ सब छाके ॥

सिथिल अंग पग मग डगि डोलहिं । बिहबल बचन पेम बस बोलहिं ॥

ज्याच्या मनात जसे असते, त्याप्रमाणे तो स्वतः मनोरथ करित असतो. सर्वजण स्नेहरुपी मदिरेमुळे धुंद होऊन चालले होते. त्यांची शरीरे थकली होती, वाटेवर पाय डगमगत होते आणि प्रेमाधिक्यामुळे विव्हळ होऊन ते बोलत होते. ॥ २ ॥

रामसखाँ तेहि समय देखावा । सैल सिरोमनि सहज सुहावा ॥

जासु समीप सरित पय तीरा । सीय समेत बसहिं दोउ बीरा ॥

रामांचा मित्र निषादराज याने त्याचवेळी स्वाभाविकपणे सुंदर असलेला पर्वतश्रेष्ठ कामदगिरी दाखविला. त्याच्याजवळच पयस्विनी नदीकाठी सीतेसह दोघे बंधू निवास करीत होते. ॥ ३ ॥

देखि करहिं सब दंड प्रनामा । कहि जय जानकि जीवन रामा ॥

प्रेम मगन अस राजसमजू । जनु फिरि अवध चले रघुराजू ॥

सर्व लोकांनी तो पर्वत पाहून ‘ जानकीजीवन श्रीरामचंद्र की जय ‘ , असे म्हणत त्याला दंडवत प्रणाम केला. राजपरिवारही प्रेमामध्ये असा मग्न झाला की, जणू श्रीरघुनाथ अयोध्येला परत निघाले आहेत. ॥ ४ ॥

दोहा—भरत प्रेमु तेहि समय जस तस कहि सकइ न सेषु ।

कबिहि अगम जिमि ब्रह्मसुखु अह मम मलिन जनेषु ॥ २२५ ॥

भरताच्या मनात त्यावेळी जे प्रेम उफाळून आले होते, त्याचे वर्णन शेषसुद्धा करु शकणार नाही. ज्याप्रमाणे अहंता आणि ममता यांमुळे मलिन झालेल्या मनुष्यांना ब्रह्मानंद अगम्य असतो, त्याप्रमाणे कवीला ते प्रेम आगम्य आहे. ॥ २२५ ॥

सकल सनेह सिथिल रघुबर कें । गए कोस दुइ दिनकर ढरकें ॥

जलु थलु देखि बसे निसि बीतें । कीन्ह गवन रघुनाथ पिरीतें ॥

सर्व लोक प्रेमाने विह्वल झाल्यामुळे सूर्यास्त होईपर्यंत दोन कोसच चालू शकले आणि पाणी व निवार्‍याची सोय पाहून रात्री तेथेच काहीच न खाता-पिता थांबले. रात्र सरल्यावर श्रीरघुनाथांवर प्रेम असलेला भरत पुढे निघाला. ॥ १ ॥

उहॉं रामु रजनी अवसेषा । जागे सीयँ सपन अस देखा ॥

सहित समाज भरत जनु आए । नाथ बियोग ताप तन ताए ॥

तिकडे श्रीरामचंद्र रात्र अजून शिल्लक उरली असतांनाच जागे झाले. त्या रात्री सीतेला स्वप्न पडले, ते ती प्रभूंना सांगू लागली की, सर्व परिवारासह भरत येथे येत आहे. प्रभूंच्या वियोगाग्नीमुळे त्याचे शरीर पोळून निघत आहे. ॥ २ ॥

सकल मलिन मन दीन दुखारी । देखीं सासु आन अनुहारी ॥

सुनि सिय सपन भरे  जल लोचन । भए सोचबस सोच बिमोचन ॥

सर्व लोक मनातून उदास, दीन व दुःखी झाले होते. सासूबाईसुद्धा वेगळ्याच दिसल्या. ‘ सीतेचे स्वप्न ऐकून श्रीरामचंद्रांच्या नेत्रांत पाणी भरुन आले आणि सर्वांना चिंतेतून मुक्त करणारे प्रभू स्वतःच चिंतित झाले. ॥ ३ ॥

लखन सपन यह नीक न होई । कठिन कुचाह सुनाइहि कोई ॥

अस कहि बंधु समेत नहाने । पूजि पुरारि साधु सनमाने ॥

आणि म्हणाले, ‘ लक्ष्मणा, हे स्वप्न काही चांगले नाही. एखादी भयप्रद वार्ता कुणीतरी येऊन सांगेल.’ असे म्हणून सांगेल.’ असे म्हणून त्यांनी भावाबरोबर स्नान केले आणि त्रिपुरारी महादेवांचे पूजन करुन साधूंना सन्मानित केले. ॥ ४ ॥

छं०—सनमानि सुर मुनि बंदि बैठे उतर दिसि देखत भए ।

नभ धूरि खग मृग भूरि भागे बिकल प्रभु आश्रम गए ॥

तुलसी उठे अवलोकि कारनु काह चित सचकित रहे ।

सब समाचार किरात कोलन्हि आइ तेहि अवसर कहे ॥

देवांचे पूजन आणि मुनींचे वंदन झाल्यावर श्रीराम बसले आणि उत्तर दिशेकडे पाहू लागले. आकाशात धुरळा पसरत होता. पुष्कळसे पक्षी आणि पशू व्याकूळ होऊन पळत प्रभूंच्या आश्रमाकडे येत होते. तुलसीदास म्हणतात की, हे पाहून श्रीराम उठून उभे राहीले आणि विचार करु लागले की, असे व्हायचे काय कारण असावे ? मनात त्यांना आश्चर्य वाटत होते. त्याचवेळी कोल-भिल्लांनी येऊन सर्व बातमी सांगितली.

सो०—सुनत सुमंगल बैन मन प्रमोद तन पुलक भर ।

सरद सरोरुह नैन तुलसी भरे सनेह जल ॥ २२६ ॥

तुलसीदास म्हणतात की, ते त्यांचे मंगल बोलणे ऐकताच श्रीरामांच्या मनाला खूप आनंद झाला. शरीर पुलकित झाले आणि शरदऋतूमधील प्रफुल्लित कमलांसारखे त्यांचे नेत्र प्रेमाश्रूंनी भरुन गेले. ॥ २२६ ॥

बहुरि सोचबस भे सियरवनू । कारन कवन भरत आगवनू ॥

एक आइ अस कहा बहोरी । सेन संग चतुरंग न थोरी ॥

सीतापती श्रीरामांच्या मनांत पुन्हा विचार आला की, भरताच्या येण्याचे काय कारण असावे ? नंतर एकाने येऊन सांगितले की, भरताबरोबर जंगी चतुरंग सेनाही आहे. ॥ १ ॥

सो सुनि रामहि भा अति सोचू । इत पितु बच इत बंधु सकोचू ॥

भरत सुभाउ समुझि मन माहीं । प्रभु चित हित थिति पावत नाहीं ॥

हे ऐकून श्रीरामांना फार काळजी वाटू लागली. एकीकड़े पित्याचे वचन, तर दुसरीकडे भरताची भीड. भरताचा स्वभाव मनात जाणल्यावर प्रभू श्रीरामचंद्रांच्या मनाला कुठेही आधार दिसेना. ॥ २ ॥

समाधान तब भा यह जाने । भरतु कहे महुँ साधु सयाने ॥

लखन लखेउ प्रभु हृदयँ खभारु । कहत समय सम नीति बिचारु ॥

परंतु भरत साधु-स्वभावाचा व शहाणा आहे आणि माझे म्हणणे ऐकणारा आहे. हे लक्षात आल्यावर श्रीरामांना समाधान झाले. प्रभू श्रीरामांच्या मनात चिंता आहे, असे लक्ष्मणाला दिसले. तेव्हा तो प्रसंगानुरुप आपले नीतियुक्त विचार मांडू लागला. ॥ ३ ॥

बिनु पूछें कछु कहउँ गोसाईं । सेवकु समयँ न ढीठ ढिठाईं ॥

तुम्ह सर्बग्य सिरोमनि स्वामी । आपनि समुझि कहउँ अनुगामी ॥

‘ हे स्वामी, न विचारता मी काही सांगत आहे. प्रसंगी

 सेवकाने काही आगळीक केली, तरी ती आगळीक

 मानायची नसते. हे स्वामी, सर्वज्ञांमध्ये तुम्ही अग्रगण्य

 आहात. तुम्हांला सर्व कळते, तरीही मी आपल्या

समजुतीप्रमाणे जे रास्त आहे, ते सांगतो, ॥ ४ ॥



Custom Search