Tuesday, June 30, 2020

ShriRamCharitManas Part 21 श्रीरामचरितमानस भाग २१


ShriRamCharitManas Pratham Sopan Balkand Part 21 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड भाग २१ 
दोहा १३१ ते १४०

 दोहा—एहि अवसर चाहिअ परम सोभा रुप बिसाल ।
जो बिलोकि रीझै कुअँरि तब मेलै जयमाला ॥ १३१ ॥
या वेळी मला खूप लावण्य आणि अत्यंत सुंदर रुप हवे. ते पाहून राजकुमारी माझ्यावर भाळून जाईल आणि वरमाला मला घालील. ॥ १३१ ॥
हरि सन मागौं सुंदरताई । होइहि जात गहरु अति भाई ॥
मोरें हित हरि सम नहिं कोऊ । एहि अवसर सहाय सोइ होऊ ॥
( आता असे करावे. ) भगवंताकडे सौंदर्य मागावे. परंतु त्यांच्याकडे जाण्यास फार वेळ होईल. परंतु श्रीहरींच्याशिवाय माझा हिरचिंतक कोणी नाही, म्हणून या वेळी तेच मला साह्य करोत म्हणजे झाले. ॥ १ ॥
बहुबिधि बिनय कीन्हि तेहि काला । प्रगटेउ प्रभु कौतुकी कृपाला ॥
प्रभु बिलोकि मुनि नयन जुडाने । होइहि काजु हिएँ हरषाने ॥
त्यावेळी नारदांनी भगवंतांना पुष्कळ प्रार्थना केली, तेव्हा लीलामय कृपाळू प्रभू तेथे प्रगट झाले. स्वामींना पाहाताच नारदांचे नेत्र प्रफुल्लित झाले. आणि ते मनात आनंदित होऊन म्हणाले की, आता काम झालेच. ॥ २ ॥
अति आरति कहि कथा सुनाई । करहु कृपा करि होहु सहाई ॥
आपन रुप देहु प्रभु मोही । आन भाँति नहिं पावौं ओही ॥
नारदांनी काकुळतीला येऊन सर्व कथा सांगितली ( आणि प्रार्थना केली की, ) कृपा करा आणि मला मदत करा. हे प्रभो, तुम्ही मला आपले रुप द्या. याखेरीज दुसर्‍या कशामुळेही मी त्या राजकन्येस मिळवू शकणार नाही. ॥ ३ ॥
जेहि बिधि नाथ होइ हित मोरा । करहु सो बेगि दास मैं तोरा ॥
निज माया बल देखि बिसाला । हियँ हँसि बोले दीनदयाला ॥
हे नाथ, माझे कल्याण होईल, असे लवकर करा. मी तुमचा दास आहे. ‘ आपल्या मायेचे प्रचंड बळ पाहून दीनदयाळ भगवान मनात हसत म्हणाले, ॥ ४ ॥
दोहा—जेहि बिधि होइहि परम हित नारद सुनहु तुम्हार ।
सोइ हम करब न आन कछु बचन न मृषा हमार ॥ १३२ ॥
‘ हे नारद, ज्यामुळे तुमचे परम हित होईल, तेच आम्ही करु. दुसरे काही नाही. आमचे वचन असत्य ठरत नसते. ॥ १३२ ॥
कुपथ माग रुज ब्याकुल रोगी । बैद न देइ सुनहु मुनि जोगी ॥
एहि बिधि हित तुम्हार मैं ठयऊ । कहि अस अंतरहित प्रभु भयऊ ॥
हे योगी मुनी, ऐका. रोगाने व्याकुळ झालेल्या रोग्याने कुपथ्य मागितले, तरी वैद्य ते देत नाही. तशा प्रकारे मीही तुमचे कल्याण करण्याचा निश्चय केलेला आहे. ‘ असे म्हणून भगवंत अंतर्धान पावले. ॥ १ ॥
माया बिबस भए मुनि मूढा । समुझी नहिं हरि गिरा निगूढा ॥
गवने तुरत तहाँ रिषिराई । जहाँ स्वयंबर भूमि बनाई ॥
( भगवंताच्या ) मायेच्या अधीन झालेले मुनी इतके बुद्धिहीन झाले होते की, ते भगवंतांची रहस्यमय वाणी समजू शकले नाहीत. ऋषिराज नारद स्वयंवरासाठी बनविलेल्या मंडपाकडे गेले. ॥ २ ॥
निज निज आसन बैठे राजा । बहु बनाव करि सहित समाजा ॥
मुनि मन हरष रुप अति मोरें । मोहि तजि आनहि बरिहि न भोरें ॥
राजे मोठे नटून-थटून आपल्या परिवारासह आपापल्या आसनावर बसले होते. नारद मुनी मनातून आनंदित होते की, माझे रुप फार सुंदर आहे. राजकन्या मला सोडून दुसर्‍या कुणालाही वरणार नाही. ॥ ३ ॥
मुनि हित कारन कृपानिधाना । दीन्ह कुरुप न जाइ बखाना ॥
सो चरित्र लखि काहुँ न पावा । नारद जानि सबहिं सिर नावा ॥
कृपानिधान भगवंतांनी मुनींच्या कल्याणासाठी त्यांना इतके कुरुप बनविले होते की, सांगून सोय नाही. परंतु भगवंतांची ही लिला कुणाला कळू शकली नाही. त्यांना नारद समजूनच सर्वांनी प्रणाम केला. ॥ ४ ॥
दोहा—रहे तहाँ दुइ रुद्र गन ते जानहिं सब भेउ ।
बिप्रबेष देखत फिरहिं परम कौतुकी तेउ ॥ १३३ ॥
तेथे शिवांचे दोन गण होते. त्यांना सर्व रहस्य समजले होते. ते ब्राह्मणांचा वेष धारण करुन सर्व लीला पाहात फिरत होते. तेही मोठे थट्टेखोर होते. ॥ १३३ ॥
जेहिं समाज बैठे मुनि जाई । हृदयँ रुप अहमिति अधिकाई ॥
तहँ बैठे महेस गन दोऊ । बिप्रबेष गति लखइ न कोऊ ॥
नारद आपल्या मनात रुपाचा मोठा अभिमान बाळगूज ज्या समुदायात बसले होते, तेथेच ते दोन्ही गणही बसले होते. ब्राह्मणवेषात असल्यामुळे त्यांचे हे कपट कुणाच्याही लक्षात आले नाही. ॥ १ ॥
करहिं कूटि नारदहि सुनाई । नीकि दीन्हि हरि सुंदरताई ॥
रीझिहि राजकुअँरि छबि देखी । इन्हहि बरिहि हरि जानि बिसेषी ॥
ते नारदांना ऐकू जाईल, अशा तर्‍हेने नातदांची टर उडवू लागले, “ भगवंतांनी यांना काय सौंदर्य बहाल केले आहे. यांची शोभा पाहून राजकुमारी भाळून जाईल आणि ‘ हरी ‘ ( वानर ) समजून यानांच वरेल. ‘ ॥ २ ॥
मुनिहि मोह मन हाथ पराएँ । हँसहिं संभु गन अति सचु पाएँ ॥
जदपि सुनहिं मुनि अटपटि बानी । समुझि न परइ बुद्धि भ्रम सानी ॥
नारदांना मोह झाला होता, कारण त्यांचे मन मायेच्या अधीन झाले होते. शिवांचे गण ते पाहून मोठ्या आनंदाने हसत होते. त्यांची टवाळी मुनी ऐकत होते, परंतु बुद्धी भ्रमात पडल्यामुळे ती त्यांना समजत नव्हती. ( त्या गोष्टी त्यांना स्वतःच्या प्रशंसेच्या वाटत होत्या. ) ॥ ३ ॥
काहुँ न लखा सो चरित बिसेषा । सो सरुप नृपकन्याँ देखा ॥
मर्कट बदन भयंकर देही । देखत हृदयँ क्रोध भा तेही ॥
ही बाब इतर कुणालाही समजली नाही. फक्त राजकन्येने नारदांचे ते रुप पाहिले. त्यांचे तोंड माकडासारखे होते आणि ते भयंकर शरीर पाहताच राजकन्येला राग आला. ॥ ४ ॥
दोहा—सखीं संग लै कुअँरि तब चलि जनु राजमराल ।
देखत फिरइ महीप सब कर सरोज जयमाल ॥ १३४ ॥
मग राजकुमारी सख्यांबरोबर जणू राजहंसीसारखी चालत निघाली. ती आपल्या करकमलांमध्ये जयमाला घेऊन सर्व राजे लोकांना पाहात फिरु लागली. ॥ १३४ ॥
जेहि दिसि बैठे नारद फूली । सो दिसि तेहिं न बिलोकीं भूली ॥
पुनि पुनि मुनि उकसहिं अकुलाहीं । देखि दसा हर गन मुसुकाहीं ॥
जिकडे नारद ( रुपाच्या घमेंडीमध्यें ) फुगून बसले होते, तिकडे तिने चुकूनही बघितले नाही. नारदमुनी वारंवार मान उंचावून बघत होते आणि चरफडत होते. त्यांची ती दशा पाहून शिवगण हसत होते. ॥ १ ॥
धरि नृपतनु तहँ गयउ कृपाला । कुअँरि हरषि मेलेउ जयमाला ॥
दुलहिनि लै गे लच्छिनिवासा । नृपसमाज सब भयउ निरासा ॥
कृपाळू भगवंतही राजाचे शरीर धारण करुन तेथे जाऊन पोहोचले. राजकुमारीने आनंदित होऊन त्यांच्या गळ्यांत जयमाला घातली. लक्ष्मीनिवास भगवंत नवरीला घेऊन गेले. सर्व राजे मंडळी निराश झाली. ॥ २ ॥
मुनि अति बिकल मोहँ मति नाठी । मनि गिरि गई छूटि जनु गाँठी ॥
तब हर गन बोले मुसुकाई । निज मुख मुकुर बिलोकहु जाई ॥
मोहामुळे नारद मुनींची बुद्धी नष्ट झाली होती. त्यामुळे ते ( राजकुमारी गेल्याचे पाहून ) खट्टू झाले, जणू गाठीतील रत्न हरवले होते. तेव्हा शिवांचे गण हसून म्हणाले की, ‘ जाऊन आरशात आपले तोंड तर बघा.’ ॥ ३ ॥
अस कहि दोउ भागे भयँ भारी । बदन दीख मुनि बारि निहारी ॥
बेषु बिलोकि क्रोध अति बाढा । तिन्हहि सराप दीन्ह अति गाढा ॥
असे म्हणून ते दोघे घाबरुन पळून गेले. मुनींनी पाण्यामध्ये डोकावून आपले तोंड पाहिले. आपले रुप पाहून त्यांना फार राग आला. त्यांनी शिवांच्या त्या गणांना कठोर शाप दिला. ॥ ४ ॥
  दोहा—होइ निसाचर जाइ तुम्ह कपटी पापी दोउ ।
हँसेहु हमहि सो लेहु फल बहुरि हँसेहु मुनि कोउ ॥ १३५ ॥
‘ तुम्ही दोघे कपटी आणि पापी राक्षस व्हाल. तुम्ही माझे हसे केले, त्याचे फळ भोगा. यापुढे कोणा मुनीची फजिती कराल ?’ ॥ १३५ ॥
पुनि जल दीख रुप निज पावा । तदपि हृदयँ संतोष न आवा ॥
फरकत अधर कोप मन माहीं । सपदि चले कमलापति पाहीं ॥
मुनींनी पुन्हा पाण्यात पाहिले, तर त्यांना आपले ( खरे ) रुप प्राप्त झाले.  तरीही त्यांचे समाधान झालें नाही. त्यांचे ओठ फडफडत होते, मनात राग भरला होता. त्वरीत ते भगवान कमलापतींच्याकडे गेले. ॥ १ ॥
देहउँ श्राप कि मरिहउँ जाई । जगत मोरि उपहास कराई ॥
बीचहिं पंथ मिले दनुजारी । संग रमा सोइ राजकुमारी ॥
( मनात विचार चालला होता की, ) ‘ जाऊन आता शाप तरी द्यावा किंवा प्राण तरी द्यावा. त्यांनी जगात माझे हसे केले.’ त्यांना दैत्यांचे शत्रू भगवान श्रीहरी वाटेतच भेटले. त्यांच्या सोबत लक्ष्मी आणि तीच राजकुमारी होती. ॥ २ ॥
बोले मधुर बचन सुरसाईं । मुनि कहँ चले बिकल की नाईं ॥
सुनत बचन उपजा अति क्रोधा । माया बस न रहा मन बोधा ॥
देवांचे स्वामी भगवंतांनी गोड वाणीने विचारले, ‘ हे मुनी, व्याकुळ झाल्यासारखे कुठे निघालात ?’ हे शब्द ऐकताच नारदांना फार राग आला. मायेच्या अधीन झाल्यामुळे मनाला विवेकाचा विसर पडला. ॥ ३ ॥
पर संपदा सकहु नहिं देखी । तुम्हरें इरिषा कपट बिसेषी ॥
मथत सिंधु रुद्रहि बौरायहु । सुरन्ह प्रेरि बिष पान करायहु ॥
( मुनी म्हणाले, ) ‘ तुम्हांला दुसर्‍याचे बरे झालेले पाहवत नाही. तुमच्यामध्ये ईर्ष्या आणि कपट आहे. समुद्रमंथन करताना तुम्ही शिवांना बावळट बनविले आणि देवांना प्रेरित करुन त्यांना ( शिवांना ) विष प्राशन करायला लावले. ॥ ४ ॥
दोहा—असुर सुरा बिष संकरहि आपु रमा मनि चारु ।
स्वारथ साधक कुटिल तुम्ह सदा कपट ब्यवहारु ॥ १३६ ॥
असुरांना मदिरा आणि शिवांना विष देऊन तुम्ही स्वतः मात्र लक्ष्मी आणि सुंदर कौस्तुभ मणी घेतलात. तुम्ही धोकेबाज आणि स्वार्थी आहात. नेहमी कपटी व्यवहार करता. ॥ १३६ ॥
परम स्वतंत्र न सिर पर कोई । भावइ मनहि करहु तुम्ह सोई ॥
भलेहि मंद मंदेहि भल करहू । बिसमय हरष न हियँ कछु धरहू ॥
तुम्ही पूर्ण स्वतंत्र आहात. तुमच्यावर अंकुश ठेवणारा कोणी नाही, म्हणून मनाला येईल तसे करता. चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगले करता. मनात हर्ष-विषाद काहीही आणत नाही. ॥ १ ॥
डहकि डहकि परिचेहु सब काहू । अति असंक मन सदा उछाहू ॥
करम सुभासुभ तुम्हहि न बाधा । अब लगि तुम्हहि न काहूँ साधा ॥
सर्वांना ठकवून ठकवून सोकावला आहात आणि फार बेफिकीर झाला आहात. म्हणून ( ठकविण्याच्या बाबतीत ) तुमच्या मनात नेहमी उत्साह असतो. शुभ-अशुभ कर्मांची तुम्हांला बाधा नसते. आजपर्यंत तुम्हांला कोणी सरळ केलेले नाही. ॥ २ ॥
भले भवन अब बायन दीन्हा । पावहुगे फल आपन कीन्हा ॥
बंचेहु मोहि जवनि धरि देहा । सोइ तनु धरहु श्राप मम एहा ॥
या वेळीं तुम्ही चांगल्या घरी वाण दिले आहे. ( माझ्यासारख्या भारी व्यक्तिला डिवचले आहे. ) म्हणून स्वतःच्या कर्माचे फळ नक्की मिळेल. जे राजाचे शरीर धारण करुन तुम्ही मला ठकविले आहे, तेच शरीर तुम्ही धारण कराल, हा माझा शाप आहे. ॥ ३ ॥
कपि आकृति तुम्ह कीन्हि हमारी । करिहहिं कीस सहाय तुम्हारी ॥
मम अपकार कीन्ह तुम्ह भारी । नारि बिरहँ तुम्ह होब दुखारी ॥
तुम्ही माझे रुप माकडासारखे बनविले होते, म्हणून माकडेच तुम्हांला मदत करतील. ( मला ज्या स्त्रीची इच्छा होती, तिच्याशी माझा वियोग करुन ) तुम्ही माझे मोठे अहित केले आहे, म्हणून तुम्हीसुद्धा स्त्रीच्या वियोगाने दुःखी व्हाल. ॥ ४ ॥
दोहा—श्राप सीस धरि हरषि हियँ प्रभु बहु बिनती कीन्हि ।
निज माया कै प्रबलता करषि कृपानिधि लीन्हि ॥ १३७ ॥
प्रभूंनी तो शाप मोठ्या आनंदाने शिरोधार्य मानून नारदांचे सांत्वन केले आणि कृपानिधान भगवंतांनी आपली प्रबळ माया काढून घेतली. ॥ १३७ ॥
जब हरि माया दूरि निवारी । नहिं तहँ रमा न राजकुमारी ॥
तब मुनि अति सभीत हरि चरना । गहे पाहि प्रनतारति हरना ॥
जेव्हा भगवंतांनी आपली माया दूर सारली, तेव्हा तेथे लक्ष्मी राहिली नाही आणि राजकुमारीही राहिली नाही. तेव्हा मुनींनी अत्यंत घाबरुन श्रीहरींचे चरण धरले आणि म्हटले, ‘ हे शरणागतांची दुःखे हरण करणारे प्रभो, माझे रक्षण करा. ॥ १ ॥   
मृषा होउ मम श्राप कृपाला । मम इच्छा कह दीनदयाला ॥
मैं दुर्बचन कहे बहुतेरे । कह मुनि पाप मिटिहिं किमि मेरे ॥
हे कृपाळू, माझा शाप खोटा ठरु दे.’ तेव्हा दीनांवर दया करणारे भगवान म्हणाले, ‘ हे सर्व माझ्या इच्छेने घडले आहे. ‘ तेव्हा नारद म्हणाले, ‘ मी तुम्हांला अत्यंत वाईट साईट बोललो. माझे पाप कसे नाहीसे होईल ?’ ॥ २ ॥
जपहु जाइ संकर सत नामा । होइहि हृदयँ तुरत बिश्रामा ॥
कोउ नहिं सिव समान प्रिय मोरें । असि परतीति तजहु जनि भोरें ॥
( भगवंतानी म्हटले, ) ‘ जाऊन शंकरांच्या शतनाम स्तोत्राचा जप करा, त्यामुळे मनाला शांतता लाभेल. शिवांसारखा दुसरा कोणीही मला प्रिय नाही, याची खात्री बाळगा. ॥ ३ ॥
जेहि पर कृपा न करहिं पुरारी । सो न पाव मुनि भगति हमारी ॥
अस उर धरि महि बिचरहु जाई । अब न तुम्हहि माया निअराई ॥
हे मुनी, शिव ज्याच्यावर कृपा करीत नाहीत, त्याला माझी भक्ती लाभत नाही. मनात असा दृढ विश्वास बाळगून पृथ्वीवर जाऊन संचार करा. आता माझी माया तुमच्याजवळ फिरकणार नाही. ॥ ४ ॥
दोहा—बहुबिधि मुनिहि प्रबोधि प्रभु तब भए अंतरधान ।
सत्यलोक नारद चले करत राम गुन गान ॥ १३८ ॥
अशा रीतीने पुष्कळ प्रकारे मुनींना समजावून सांगून प्रभू अंतर्धान पावले आणि नारद श्रीरामचंद्रांचे गुण-गान करीत सत्यलोकी निघाले. ॥ १३८ ॥
हर गन मुनिहि जात पथ देखी । बिगत मोह मन हरष बिसेषी ॥
अति सभीत नारद पहिं आए । गहि पद आरत बचन सुनाए ॥
शिवांच्या ( त्या दोन्ही ) गणांनी मुनींना जेव्हा मोहरहित व प्रसन्न मनाने वाटेने जाताना पाहिले, तेव्हा ते अत्यंत घाबरुन नारदांच्याजवळ आले आणि त्यांचे चरण धरुन दीनपणे म्हणाले, ॥ १ ॥
हर गन हम न बिप्र मुनिराया । बड अपराध कीन्ह फल पाया ॥
श्राप अनुग्रह करहु कृपाला । बोले नारद दीनदयाला ॥
‘ हे मुनिराज, आम्ही ब्राह्मण नसून शिवांचे गण आहोत. आम्ही मोठा अपराध केला, त्याचे फळ आम्हांला मिळाले. हे कृपाळू, आता शाप दूर करण्याची कृपा करा. ‘ दीनांच्यावर दया करणारे नारद म्हणाले, ॥ २ ॥
निसिचर जाइ होहु तुम्ह दोऊ । बैभव बिपुल तेज बल होऊ ॥
भुजबल बिस्व जितब तुम्ह जहिआ । धरिहहिं बिष्नु मनुज तनु तहिआ ॥
‘ तुम्ही दोघेजण राक्षस बना, तुम्हांला महान ऐश्वर्य, तेज आणि बल मिळो. तुम्ही आपल्या बाहुबलाने जेव्हा संपूर्ण जग जिंकून घ्याल, तेव्हा भगवान विष्णू मनुष्य शरीर धारण करतील. ॥ ३ ॥
समर मरन हरि हाथ तुम्हारा । होइहहु मुकुत न पुनि संसारा ॥
चले जुगल मुनि पद सिर नाई । भए निसाचर कालहि पाई ॥
युद्धामध्ये श्रीहरींच्या हातून तुमचा मृत्यु होईल, त्यामुळे तुम्ही मुक्त व्हाल आणि पुन्हा संसारात जन्म घेणार नाही.’ ते दोघे मुनींच्या चरणी नमन करुन निघाले आणि पुढे योग्य वेळी राक्षस झाले. ॥ ४ ॥
दोहा—एक कलप एहि हेतु प्रभु लीन्ह मनुज अवतार ।
सुर रंजन सज्जन सुखद हरि भंजन भुबि भार ॥ १३९ ॥
देवांना प्रसन्न करणार्‍या, सज्जनांना सुख देणार्‍या आणि पृथ्वीचा भार हरण करणार्‍या भगवंतांनी एका कल्पामध्ये त्यासाठीच मनुष्य अवतार धारण केला होता. ॥ १३९ ॥
एहि बिधि जनम करम हरि केरे । सुंदर सुखद बिचित्र घनेरे ॥
कलप कलप प्रति प्रभु अवतरहीं । चारु चरित नानाबिधि करहीं ॥
अशाप्रकारे भगवंतांचे अनेक सुंदर, सुखदायक आणि अलौकिक जन्म आणि कर्मे आहेत. प्रत्येक कल्पामध्ये जेव्हा जेव्हा भगवान अवतार घेतात आणि नाना प्रकारच्या सुंदर लीला करतात, ॥ १ ॥
तब तब कथा मुनीसन्ह गाई । परम पुनीत प्रबंध बनाई ॥
बिबिध प्रसंग अनूप बखाने । करहिं न सुनि आचरजु सयाने ॥
तेव्हा तेव्हा मुनीश्वरांनी परम पवित्र काव्यरचना करुन त्यांच्या कथांचे गायन केलेले आहे आणि वेगवेगळ्या अनुपम प्रसंगांचे वर्णन केलेले आहे. ते ऐकल्यावर विचारी लोक आश्र्चर्य करीत नाहीत. ॥ २ ॥
हरि अनंत हरिकथा अनंता । कहहिं सुनहिं बहुबिधि सब संता ॥
रामचंद्र के चरित सुहाए । कलप कोटि लगि जाहिं न गाए ॥
श्रीहरि अनंत आहेत, त्यांच्या कथाही अनंत आहेत. सर्व संत त्या नाना प्रकारे सांगतात व ऐकतात. श्रीरामांचे सुंदर चरित्र कोट्यावधी कल्पांमध्येही गाता येत नाही. ॥ ३ ॥
यह प्रसंग मैं कहा भवानी । हरिमायाँ मोहहिं मुनि ग्यानी ॥
प्रभु कौतुकी प्रनत हितकारी । सेवत सुलभ सकल दुखहारी ॥
( शिव म्हणतात ) ‘ हे पार्वती, मी हा प्रसंग एवढ्यासाठी सांगितला की, ज्ञानी मुनीसुद्धा भगवंतांच्या मायेमुळे मोहित होतात. प्रभूंची ही कौतुकमय लीला आहे आणि शरणागताचे हित करणारी आहे. ते प्रभू सेवा करण्यास फार सुलभ आणि सर्व दुःखे हरण करणारे आहेत. ॥ ४ ॥
सो—सुर नर मुनि कोउ नाहिं जेहि न मोह माया प्रबल ।
अस बिचारि मन माहिं भजिअ महामाया पतिहि ॥ १४० ॥
देव, मनुष्य आणि मुनी यांच्यापैकी असा कोणीही नाही की त्याला भगवंतांची महान प्रबळ माया मोहित करीत नाही, मनात असा विचार करुन त्या महामायेचे स्वामी असणार्‍या श्री भगवंतांचे भजन करायला हवे. ॥ १४० ॥
अपर हेतु सुनु सैलकुमारी । कहउँ बिचित्र कथा बिस्तारी ॥
जेहि कारन अज अगुन अरुपा । ब्रह्म भयउ कोसलपुर भूपा ॥
हे गिरिराजकुमारी, आता भगवंतांच्या अवताराचे दुसरे कारण ऐक. मी त्याची मनोहर कथा विस्ताराने सांगतो. ज्यामुळे जन्मरहित, निर्गुण व रुपरहित ( अव्यक्त सच्चिदानंद ) ब्रह्म अयोध्यापुरीचे राजे झाले. ॥ १ ॥
जो प्रभु बिपिन फिरत तुम्ह देखा । बंधु समेत धरें मुनिबेषा ॥
जासु चरित अवलोकि भवानी । सती सरीर रहिहु बौरानी ॥
ज्या प्रभू, श्रीरामांना तू, बंधू लक्ष्मणासोबत मुनींसारखा वेष धारण करुन वनात फिरताना पाहिले होतेस आणि हे भवानी, ज्यांची लीला पाहून सतीच्या शरीरात असताना तू अशी भ्रमित झाली होतीस की, ॥ २ ॥
अजहुँ न छाया मिटति तुम्हरी । तासु चरित सुनु भ्रम रुज हारी ॥
लीला कीन्हि जो तेहिं अवतारा । सो सब कहिहउँ मति अनुसारा ॥
अजूनही तुझ्या भ्रमाचे पटल दूर झालेले नाही. त्या भ्रमरुपी रोगाचे हरण करणारे त्यांचे चरित्र श्रवण कर. त्या अवतारात भगवंतांनी ज्या ज्या लीला केल्या , त्या सर्व मी आपल्या बुद्धीप्रमाणे तुला सांगतो.’ ॥ ३ ॥
भरद्वाज सुनि संकर बानी । सकुचि सप्रेम उमा मुसुकानी ॥
लगे बहुरि बरनै बृषकेतू । सो अवतार भयउ जेहि हेतू ॥

( याज्ञवल्क्य म्हणाले, ) ‘ हे भरद्वाज, शंकरांचे वचन 

ऐकून पार्वती संकोचाने प्रेमपूर्वक हसली. नंतर ज्या

 कारणाने भगवंतांचा तो अवतार झाला होता, त्याचे 

वर्णन शिव करु लागले. ॥ ४ ॥


Custom Search

>Dnyaneshwari Adhyay 2 Part 11 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ११


Dnyaneshwari Adhyay 2 Part 11 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ११ 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या २५१ ते २७५

Dnyaneshwari Adhyay 2 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या २५१ ते २७५
जैसा कर्पूराचा राशि कीजे । मग अग्नि लाऊनि दीजे ।
कां मिष्टानीं संचरविजे । काळकूट ॥ २५१ ॥
२५१) ज्याप्रमाणें कापसाची रास करावी आणि मग तिला अग्नि लावून द्यावा, किंवा मिष्टान्नांत जालीम विष घालावें; 
दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला ।
तैसा नासिती धर्म निपजला । हेतुकपणें ॥ २५२ ॥
२५२) किंवा दैवयोगानें मिळालेला अमृताचा घडा लाथ मारुन पालथा करावा, त्याप्रमाणें फलाचा अभिलाष धरुन ते हातून घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवितात.
सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु का अपेक्षिजे ।
परी नेणती ते काय कीजे । अप्राप्त देखें ॥ २५३ ॥
२५३) मोठ्या आयासांनीं पुण्य जोडावें, आणि मग संसाराची अपेक्षा कां ठेवावी ? पण पाहा, सद्बुद्धि ज्यांस प्राप्त नाहीं, अशा त्या अज्ञानी लोकांस हें समजत नाहीं. काय करावें ?
जैसी रांधवणी रससोय निकी । करुनियां मोलें विकी ।
तैसा भोगासाठीं अविवेकी । धाडिती धर्मु ॥ २५४ ॥
२५४) ज्याप्रमाणें एखाद्या सुगरण स्त्रीनें उत्तम पक्वान्नें करुन तीं केवळ द्रव्याच्या आशेनें विकून टाकावीं, त्याप्रमाणें हे अविचारी लोक सुखोपभोगांच्या आशेनें हातचा धर्म दवडतात.
म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा ।
तयां वेदवादरतां । मनीं वसे ॥ २५५ ॥
२५५) म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामध्यें मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनांत पूर्णपणें ही दुर्बुद्धि वास करीत असते, हें लक्षांत ठेव.
तिन्हीं गुणीं आवृत्त । हे वेद जाणें विभ्रांत ।
म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्त्विक ते ॥ २५६ ॥
तूं असें निःसंशय समज कीं, वेद हे ( सत्त्व, रज व तम या ) तीन गुणांनी व्याप्त आहेत; म्हणून ( त्यांपैकीं ) उपनिषदादि जे भाग आहेत, ते सगळे सात्त्विक आहेत.
येर रजतमात्मक । जेथ निरुपिजे कर्मादिक ।
जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥ २५७ ॥
२५७) आणि अर्जुना, केवळ स्वर्गसूचक अशा कर्मादिकांचें ज्यांत निरुपण केलेलें आहे, ते बाकीचे ( वेदांचे भाग ) रज व तम या गुणांनी युक्त आहेत.
म्हणोनि तूं जाण । हे सुखदुःखासीच कारण ।
एथ झणें अंतःकरण । रिगों देसी ॥ २५८ ॥
२५८) म्हणून हे केवळ सुखदुःखाला कारण होणारे आहेत, असें तूं लक्षांत ठेव व त्यांच्या ठिकाणी कदाचित् तुझें मन जाईल तर जाऊं देऊं नकोस.
तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं ।
एक आत्मसुखअंतरीं । विसंब झणीं ॥ २५९ ॥
२५९) तूं तिन्ही गुण टाकून दे; मी व माझेंपण धरुं नकोस; ( पण ) अंतःकरणांत फक्त एक आत्मसुखाचा विसर पडूं देऊं नकोस.
जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले ।
तर्‍ही आपण हित आपुलें । तेंचि घेपे ॥ २६० ॥
 २६०) जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत; अनेक ( विधिनिषेधांचे ) प्रकार सुचविलें आहेत, तरी त्यापैकीं जेवढें कांहीं आपल्या हिताचे असेल, तेवढेंच घ्यावें,
जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती ।
तरी तेतुलेही काय चालिजती । सांगे मज ॥ २६१ ॥
२६१) ज्याप्रमाणें सूर्योदय होतांच सगळे रस्ते दिसूं लागतात. म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्यांनीं कां जावयाचें ? सांग बरें मला.
कां उदकमय सकळ । जर्‍ही जाहलें असे महीतळ ।
तरी आपण घेपे केवळ । आर्तीचजोगें ॥ २६२ ॥
२६२) किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तेवढें जरी पाणी असलें , तरी त्यांतून आपण आपल्या गरजेपुरतें घेतों.
तैसे ज्ञानीये जे होती । ते वेदार्थातें विवरिती ।
मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्र्वत जें ॥ २६३ ॥
२६३) त्याप्रमाणें जे ज्ञानी आहेत, ते वेदार्थाचा विचार करतात; मग ज्यांत शाश्वत व जें इष्ट आहे त्याचेंच ग्रहण करतात.
म्हणौनि आइकें पार्था । याचिपरी पाहतां ।
तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥ २६४ ॥
२६४) म्हणून अर्जुना, ऐक. याच दृष्टीनें पाहिलें, तर हें स्वकर्मच याच वेळीं तुला उचित आहे.
आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेंचि हें मना आलें ।
जे न संडिजे तुवा आपुलें । विहित कर्म ॥ २६५ ॥
२६५) आम्हीं सर्व गोष्टींचा विचार करुन पाहिला; तेव्हां हें असेंच आमच्या मनाला पटलें कीं, तूं आपलें विहित कर्म सोडूं नयेस.
परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मीं  संगति न व्हावी ।
हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥ २६६ ॥
२६६) परंतु कर्मफलाच्या ठिकाणीं आशा ठेवूं नये आणि निषिद्ध कर्म करण्याविषयींहि प्रवृत्ति होऊं देउं नकोस; हा सदाचारच निष्काम बुद्धीनें आचरावा.
तूं योगयुक्त होउनी । फळाचा संग सांडुनी ।
मग अर्जुना चित्त देउनी । करीं कर्में ॥ २६७ ॥
२६७) अर्जुना, तूं निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफलाचा अभिलाष टाकून मग मन लावून विहित कर्में करावींस.
परी आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे ।
तरी विशेषें तेथ तोषावें । हेही नको ॥ २६८ ॥
२६८) परंतु दैवाच्या अनुकुलतेनें हातांत घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडलें, तरी त्यांत विशेष संतोष मानावा, हेंहि नको.  
कां निमित्तें कोणें ऐकें । तें सिद्धी न वचतां ठाके ।
तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥ २६९ ॥
२६९) किंवा, कांहीं कारनामुळें तें ( आरंभिलेंलें कर्म ) जरी सिद्धीस न जातां ( अर्धवट ) राहिलें, तरीहि त्यासंबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊं देऊं नये.   
आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें ।
परी  ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥ २७० ॥
२७०) हातीं घेतलेलें कर्म सिद्धीस गेलें तर खरोखरच आपलें काम झालें असेंच समज.
देखें जेतुलालें कर्म निपजे । तेतुलें आदिपुरुषीं जरी अर्पिजे ।
तरी परीपूर्ण सहजें । जहालें जाणें ॥ २७१ ॥
२७१) ( कारण असें पाहा ) जेवढें म्हणून हातून कर्म होईल, तेवढें सगळें जर परमात्म्याला समर्पण केलें; तर तें सहजच परिपूर्ण झालें, असेंच समज.
देखें संरासंतीं कर्मीं । हें जें सरिसेपण मनोधर्मीं ।
तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे ॥ २७२ ॥
२७२) हें पाहा, पूर्ण आणि अपूर्ण कर्माविषयीं हा जो मनाचा समतोलपणा आहे, तीच ( खरी ) योगस्थिति ( निष्काम कर्मयोग ). तिचीच ज्ञानी पुरुष प्रशंसा करतात.
अर्जुना समत्व चित्ताचें । तेंचि सार जाण योगाचें ।
जेथ मना आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥ २७३ ॥
२७३) अर्जुना, ( यशपयशीं ) चित्ताची समता हेंच योगाचें वर्म आहे असें समज. या योगांत मन व बुद्धि यांचें ऐक्य असतें. ( मनाचा संकल्प व बुद्धिचा निश्चय यांत विरोध नसतो. )
तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडें पार्था ।
दिसे हा अरुता । कर्मभागु ॥ २७४ ॥
२७४) पार्था, बुद्धियोगाचा ( निष्काम कर्माचरणाचा ) विचार करुन ( तुलनेनें ) पाहतां सकाम कर्माचा भाग हा फारच कमी प्रतीचा दिसतो.
परी तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे ।
जें कर्मशेष सहजे । योगस्थिति ॥ २७५ ॥ 

२७५) परंतु ( आरंभीं ) तेंच सकाम कर्म जेव्हां करावें 

तेव्हांच ( पुढें ) ह्या निष्काम कर्मयोगाची प्राप्ति 

होते. कारण असें करतां करतां सकाम कर्मांतून कर्तृत्वमद आणि फलास्वाद टाकून राहिलेलें जें शेष कर्म ती सहजच योगस्थिति होय.


Custom Search

Thursday, June 25, 2020

Dnyaneshwari Adhyay 2 Part 10 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १०


Dnyaneshwari Adhyay 2 Part 10 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १० 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या २२६ ते २५०
सुखीं संतोषा न यावें । दुःखी विषादा न भजावें ।
आणि लाभालाभ न धरावें । मनामाजीं ॥ २२६ ॥
२२६) सुखाच्या वेळीं संतोष मानूं नये. दुःखाच्या वेळीं खिन्नता धरुं नये आणि लाभ व हानि मनांत धरुं नये.
एथ विजयपण होईल । कां सर्वथा देह जाईल ।
हें आधींचि कांही पुढील । चिंतावेना ॥ २२७ ॥
२२७) या युद्धामध्यें जय मिळेल किंवा अजिबात देहच नाहींसा होईल, या पुढच्या गोष्टी अगोदरच चिंतीत बसूं नये.
आपणयां उचित । स्वधर्मातेंचि रहाटतां ।
जें पावे तें निवांता । साहोनि जावें ॥ २२८ ॥
२२८) आपल्याला योग्य असें जें स्वधर्माचें आचरण, तेंच करीत असतांना, जो प्रसंग येईल, तो मुकाट्यानें सहन करावा. 
ऐसेया मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें ।
म्हणोनि आतां झुंझावें । निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥
२२९) अशी मनाची तयारी होईल, तर मग सहजच पाप घडणार नाहीं; म्हणून तूं आतां खुशाल लढावें.
हे सांख्यस्थिति मुकुलित । सांगितली तुज एथ ।
आतां बुद्धियोगु निश्र्चित । अवधारीं पां ॥ २३० ॥
२३०) येथपर्यंत तुला हा ज्ञानमार्ग थोडक्यांत सांगितला. आतां निष्काम कर्ममार्ग निश्चित सांगतों. तो तूं ऐक.
जया बुद्धियुक्ता । जाहलिया पार्था ।
कर्मबंधु सर्वथा । बाधूं न पावे ॥ २३१ ॥
२३१) अर्जुना, निष्काम कर्मयोगांतील बुद्धि ज्याला साधली, त्याला कर्मबंधन मुळींच बाधत नाहीं.
जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।
परी जैतेंसीं उरिजे । अचुंबिता ॥ २३२ ॥
२३२) ज्याप्रमाणें वज्रासारखे चिलखत अंगांत घातलें असतां शस्त्रांची वृष्टि सहन करतां येतें, इतकेंच नव्हें तर ( त्या शस्त्रांचा अंगाला ) स्पर्शहि न होतां विजयी होऊन राहातां येतें;  
तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे ।
जेथ पूर्वानुक्रम दिसे । चोखाळत ॥ २३३ ॥
२३३) त्याप्रमाणें ज्या कर्मयोगांत पूर्वीपासूनच चालत आलेलें कर्म शुद्धपणानें चालूं राहिलेलें दिसून येतें, त्या कर्मयोगांत इहलोकांतील भोगांचा नाश तर होत नाहींच आणि मोक्ष तर ठेवलेलाच आहे.
कर्माधारें राहाटिजे । परी कर्मफळ न निरिक्षिजे ।
जैसा मंत्रज्ञु न बधिजे । भूतबाधा ॥ २३४ ॥
२३४) कर्माच्या आधारानें वागावें, पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवूं नये; ज्याप्रमाणें मंत्र जाणणार्‍याला भुताची बाधा होत नाहीं;
तियापरी जे सुबुद्धि । आपुल्याला निरवधि ।
हा असतांचि उपाधि । आकळूं न सके ॥ २३५ ॥
२३५) त्याप्रमाणें अनासक्तपणें कर्म करण्याची बुद्धि एकदां पूर्णपणें आपलीशी झाली, म्हणजे हा उपाधींत असूनहि उपाधि त्याला बाधा करुं शकत नाहीं.
जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निष्कंप ।
गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥ २३६ ॥
२३६) ज्या बुद्धींत पुण्यपापादि कर्मफलांचा प्रवेश होत नाहीं, जी सूक्ष्म व अति निश्चल झालेली असते व जिला तीन गुणांचा विटाळ नसतो;
अर्जुना ते पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे ।
तरी अशेपही नाशे । संसारभय ॥ २३७ ॥
२३७) अर्जुना, ती बुद्धि पुण्याईच्या योगानें जर थोडीशी हृदयांत प्रकट होईल, तर संसाराचें सर्व भय नाहीसें होईल.
जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रगटी ।
तैसी सद्बुद्धि हे थेकुटी । म्हणों नये ॥ २३८ ॥
२३८) ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी पण ती मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणें ह्या सद्बुद्धीला लहान म्हणतां येत नाहीं. 
पार्था बहुतीं परीं । हे अपेक्षिजे विचारशूरीं ।
जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥ २३९ ॥
२३९) अर्जुना, विचार करण्यांत पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारें इच्छा करतात; कारण एकंदर सृष्टींत ही सद्बुद्धि दुर्लभ आहे.
आणिसारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु ।
कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥ २४० ॥
२४०) ज्याप्रमाणें इतर वस्तु हव्या तितक्या मिळतात; पण परीस तसा मिळत नाहीं, किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोग लागतो.
तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि ।
जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥ २४१ ॥
त्याचप्रमाणें परमात्मा हाच जिचें अंतिम ध्येय आहे ती सदबुद्धि दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणें समुद्रावांचून निखालस अन्य गति नाहीं,
तैसी ईश्र्वरावांचूनि कांहीं । जिये आणकि लाणी नाहीं ।
ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥ २४२ ॥
२४२) त्याप्रमाणें जिला ईश्वरावांचून अन्य आश्रयस्थान नाहीं; तीच जगांत फक्त एक सद्बुद्धि आहे. पाहा.
येरी जे दुर्मति । जे बहुधा असे विकरती ।
तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥ २४३ ॥
२४३) हीहून अन्य जी बुद्धि ती दुर्बुद्धि होय. ती अनेक प्रकारें विकास पावते. अधिकारी असतात, तेच तिच्या ठिकाणीं नेहमीं रममाण होतात.   
म्हणोनि तया पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था ।
आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥ २४४ ॥
२४४) म्हणून पार्था, त्यांना स्वर्ग, संसार व नरक हे प्राप्त होतात, ( पण ) त्यांना आत्मसुखाचें मुळींच दर्शन होत नाहीं.
वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती ।
परी कर्मफळीं आसक्ती । धरुनियां ॥ २४५ ॥
२४५) ते वेदवचनांचीं प्रमाणें देऊन बोलतात. केवळ कर्ममार्गाचें श्रेष्ठत्व सिद्ध करतात. पण कर्मफळाचा लोभ धरतात.
म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादि कर्म कीजें ।
मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥ २४६ ॥
२४६) ते म्हणतात, मृत्युलोकीं जन्मावें, यज्ञादि कर्मे करावीं आणि मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा. 
एथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाहीं ।
ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥ २४७ ॥
२४७) यावांचून या लोकीं दुसरें मुळींच सुख नाहीं, असे ते दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादतात; अर्जुना, पाहा.
देखें कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत ।
ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥ २४८ ॥
२४८) पाह, केवळ सुखोपभोगाकडे नजर देऊन व फलाशेनें व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्में आचरितात.
क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें ।
निपुण होऊनि धर्मातें । अनुष्ठिती ॥ २४९ ॥
२४९) अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठानानें, विधींत यत्किंचितहि चूक होऊं न देतां व अगदी दक्षतेनें ते धर्माचरण करतात.  
परि एकचि कुडें करिती । जे स्वर्गकामु मनीं धरिती ।
यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥ २५० ॥

२५०) पण ते एकच वाईट गोष्ट करतात, ती हीच कीं, 

स्वर्गाची इच्छा ते 

मनांत बाळगतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा, 

त्याला विसरतात. 


Custom Search