Tuesday, January 30, 2018

Samas Dahava Nispruha Vartanuk समास दहावा निस्पृह वर्तणूक


Dashak Aakarava Samas Dahava Nispruha Vartanuk
Samas Dahava Nispruha Vartanuk, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Mahant. Mahant and his qualities are described in here.
समास दहावा निस्पृह वर्तणूक
श्रीराम ।
मूर्ख येकदेसी होतो । चतुर सर्वत्र पाहातो ।
जैसा बहुधा होऊन भोगितो । नाना सुखें ॥ १ ॥
१) मूर्ख माणूसआकुंचित दृष्टीनें जीवनाकडे पाहातो. चतुर माणुस सर्वांगीण दृष्टीनें विश्र्वाकडे बघतो. अंतरात्मा ज्याप्रमाणें अनेक जीवांमधें व्यापून निरनिराळी सुखें भोगतो, तसाच चतुर माणूस अनेकांच्या जीवनांत समरस होतो. 
तोचि अंतरात्मा महंत । तो कां होईल संकोचित ।
प्रशस्त जाणता समस्त । विख्यात योगी ॥ २ ॥
२) अंतरात्मा हाच महंत आहे. तो कधीं आकुंचित होणार नाहीं. तो अति विशाल, महान आहे. तो सर्व जाणणारा आहे. तोच विख्यात योगी आहे.  
कर्ता भोक्ता तत्वता । भूमंडळीं सर्व सत्ता ।
त्यावेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवणु ॥ ३ ॥
३) जगामध्यें खरा कर्ता व भोक्ता अंतरात्माच आहे. सर्व जगावर त्याची सत्ता चालते. तो स्वतः स्वतःला जाणू शकतो. दुसरा कोणी त्यास जाणु शकत नाही.
ऐसें महंतें असावें । सर्व सार शोधून घ्यावें ।
पाहों जातों न संपडावें । येकायेकी ॥ ४ ॥
४) महंतानी या अंतरात्म्यासारखें बनले पाहिजे. सर्व सार तेवढें त्यानें शोधून घ्यावें.कोणी पहायला आल्यास त्यानें सहज सांपडू नये.    
कीर्तिरुपें उदंड ख्यात । जाणती लाहान थोर समस्त ।
वेश पाहातां शाश्र्वत । येकहि नाहीं ॥ ५ ॥
५) महंताची कीर्ति सगळीकडे पसरलेली असल्यानें सगळ्या लहान थोर माणसांना त्याची माहिती असते. पण तो कायम एक वेष घालून फिरत नाही.  
प्रगट कीर्ति ते ढळेना । बहुत जनास कळेना ।
पाहों जातां आढळेना । काये कैसें ॥ ६ ॥
६) त्याची कीर्ति कधीं कमी होत नाही. पण पुष्कळ लोकांना त्याची माहिती नसते. त्याला शोधायला गेल्यास तो कसा व काय आहे हे ठाऊक नसल्यानें तो सांपडत नाहीं. 
वेषभूशण तें दूषण । कीर्तिभूषण तें भूषण ।
चाळणेविण येक क्षण । जाऊंच नेदी ॥ ७ ॥  
७) वेष हें कांही माणसाचे खरें भूषण नाही. कीर्ति हे त्याचे खरें भूषण आहे. आपल्या समोरील समस्यांवर त्याचें अखंड मनन चालूं असते. 
त्यागी वोळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन ।
लोक शोधून पाहाती मन । परी इच्छा दिसेना ॥ ८ ॥ 
८) खरा महंत आपली ओळखीची माणसें सोडतो व नवनविन माणसें आपलीशी करुन घेतो. लोक अनेक प्रकारें त्याचें अंतरंग शोधू पाहातात. पण त्यांना त्याच्या अंतर्यामी कोठलीही इच्छा किंवा वासना आढळत नाहीं.
पुर्तें कोणाकडे पाहेना । पुर्तें कोणासीं बोलेना । 
पुर्तें येके स्थळी राहेना । उठोन जातो ॥ ९ ॥
९) मोकळेपणानें तो कोणाकडे पाहात नाही. अघळपघळ तो कोणाशी बोलत नाही. फार काळ एका ठिकाणीं राहात नाही. तो लगेच तेथून निघून जातो.
जातें स्थळ तें सांगेना । सांगितलें तेथें तरी जायेना ।
आपुली स्थिती अनुमाना । येवोंच नेदी ॥ १० ॥
१०) आपण कोठें जाणार हें तो सांगत नाही. सांगितलेंच तर तेथें जाईलच असें नाही. आपण कसें, काय आहोत हे कोणास कळूं देत नाहीं. 
लोकीं केलें तें चुकावी । लोकीं भाविलें तें उलथवी ।
लोकीं तर्किलें तें दावी । निर्फळ करुनी ॥ ११ ॥
११) लोकांनी त्याच्याबद्दल केलेला अंदाज चुकवितो. लोकांनी त्याच्याबद्दल केलेली भावना उलटीपालटी करतो. लोकांनी जो तर्क केलेला असेल तो निर्फळ करतो.  
लोकांस पाह्याचा आदर । तेथें याचा अनादर ।
लोकसर्वकाळ तत्पर । तेथें याची अनिछ्या ॥ १२ ॥
१२) लोकांना जें पहावयाची हौस असते तें महंताला किरकोळ वाटते. लोकांची मनें ज्या गोष्टींमधें रमतात, त्या गोष्टींची त्याला इच्छाही होत नाही.
एवं कल्पितां कल्पेना । ना तर्कितांहि तर्केना ।
कदापी भावितां भावेना । योगेश्र्वर ॥ १३ ॥
१३) अशा रीतीनें ज्याची स्थिति कल्पनेनें करता येत नाहीं, तर्कानें आकलन होत नाहीं, आणि समजून घ्यावी म्हटलें तर समजत नाहीं, तो खरा योगेश्र्वर महंत होय.  
ऐसें अंतर सांपडेना । शरीर ठाईं पडेना ।
क्षणयेक विशंभेना । कथाकीर्तन ॥ १४ ॥
१४) या महंताच्या मनांत काय आहे तें कळत नाहीम. शरीरानें तो एके ठिकाणी सांपडत नाहीम. पण एक क्षणभरदेखील तो भगवंताच्या गुणानुवादाला विसंबत नाही. तो भगवंताचें गुणवर्णन अखंड करीत राहतो.  
लोक संकल्प विकल्प करिती । 
ते अवघेचि निर्फळ होती ।
जनाची जना लाजवी वृत्ति । तेव्हां योगेश्र्वर ॥ १५ ॥
१५) त्याच्याबद्दल लोक अनेक तर्कवितर्क करतात. पण तो सगळें खोटे ठरवतो. असें झाल्यानें लोकांना आपल्या तर्कवितर्काबद्दल लाज वाटते. असें ज्याच्या बाबतींत घडते तो महंत खरा योगेश्र्वर समजावा.  
बहुतीं शोधून पाहिलें । बहुतांच्या मनास आलें ।
तरी मग जाणावें साधिलें । महत्कृत्य ॥ १६ ॥
१६) महंतानें नव्यानें आरंभलेल्या कार्याबद्दल प्रथम लोकांच्या मनांत अश्रद्धा असते. लोक बारकाईनें तपासून पाहातात. पुष्कळ माणसांना तें पटलें, आवडलें कीं, आनेक माणसें त्या कार्यांत भाग घेतात. असें घडून आलें म्हणजें फार मोठें कार्य साधलें असें समजावें.   
अखंड येकांत सेवावा । अभ्यासचि करीत जावा ।
काळ सार्थकचि करावा । जनासहित ॥ १७ ॥
१७) महंतानें अधूनमधून एकांतात जावें. ध्यान धारणा व ग्रंथांचा अभ्यास चालूं ठेवावा. लोकांना मार्गाला लावून त्यांचा व आपला काळ सार्थकीं लावावा.  
उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊन जनास सिकवावे ।
उदंड समुदाये करावे । परी गुप्तरुपें ॥ १८ ॥
१८) आपण स्वतः उत्तम गुण घ्यावें आणि लोकांना शिकवावे. मोठे मोठे लोकसमुह बनवावे. पण तें गुप्त असावेत. 
अखंड कामाची लगबग । उपासनेस लावावें जन ।
लोक समजोन मग । आज्ञा इच्छिती ॥ १९ ॥
१९) निरंतर कामें करण्याची, उरकण्याची मोठीं घाई असावी. लोकांना भगवंताच्या उपासनेला लावाण्यांत दिरंगाई करुं नये. म्हणजे लोक गुरु म्हणून मान देतात व आज्ञा पाळण्यास तयार असतात. 
आधीं कष्ट मग फळ । कष्टचि नाहीं तें निर्फळ ।
साक्षेपेंविण केवळ । वृथापुष्ट ॥ २० ॥
२०) आधीं कष्ट व मग फळ हा जीवनाचा नियम आहे. कष्ट केलें नाहींत तर फळ मिळणार नाहीं. श्रम केल्यावाचून जो निरुद्योगीपणानें जगतो तो ऐतखाऊ समजावा.  
लोक बहुत शोधावें । त्यांचे अधिकार जाणावे । 
जाणजाणोन धरावे । जवळ दुरी ॥ २१ ॥
२१) पुष्कळ लोकांचे सूक्ष्म निरिक्षण करावें. त्यांची पात्रता, लायकी ओळखावी व मग त्याच्या त्याच्या लायकीप्रमाणें त्याला जवळ करावें किंवा दूर सारावें. 
अधिकारपरत्वें कार्य होतें । अधिकार नस्तां वेर्थ जातें ।
जाणोनि शोधावीं चित्तें । नाना प्रकारें ॥ २२ ॥
२२) ज्याची जी योग्यता असते त्याप्रमाणें त्याच्या शक्तीनें त्याच्याकडून कार्य होते. योग्यता व शक्ती नसेल तर कार्य व श्रम वाया जातात. यासाठीं लायकी ठरवण्यास लोकांचे अंतरंग अनेक प्रकारे तपासून बघावें.
अधिकार पाहोन कार्य सांगणें । साक्षेप पाहोन विश्र्वास धरणें ।
आपला मगज राखणें । कांहींतरी ॥ २३ ॥
२३) माणसाचा अधिकार बघून त्याला झेपेल असें काम त्यास सांगावें. माणसाची ताकद बघून त्याचा विश्वास धरावा. पण हें करत असतांना आपलें मोठेपण, महत्व टिकवून ठेवावें. 
हें प्रचितीचें बोलिलें । आधीं केलें मग सांगितलें ।
मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणीयेकें ॥ २४ ॥
२४) स्वतः अनुभव घेऊन मी हे बोलत आहे. मी हें आधीं केलें व मग जगाला सांगितलें.  जर पटलें तर कोणीतरी तसें वागून पाहावें.
महंतें महंत करावे । युक्तिबुद्धीने भरावे ।
जाणते करुन विखरावे । नाना देसीं ॥ २५ ॥
२५) महंतानें दुसरें महंत तयार करावेत. त्यांना युक्ति व बुद्धि शिकवावी. त्यांना ज्ञानसंपन्न करुन देशाच्या निरनिराळ्या भागांत लोकसंग्रहार्थ पाठवून द्यावें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निस्पृहवर्तणुकनाम समास दाहावा ॥
Samas Dahava Nispruha Vartanuk
समास दहावा निस्पृह वर्तणूक


     


Custom Search

Monday, January 29, 2018

Samas Navava Upadesha Nirupan समास नववा उपदेश निरुपण


Dashak Aakarava Samas Navava Upadesha Nirupan 
Samas Navava Upadesha Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us everybody has to do certain Karma. The karma should be done very sincerely, should be beautifully. When a difficult is there while doing Karma, we should remember God. We have to find out how is God? What he do? In our body there is Atma, the same Atma is outside everywhere and called as Jagdatma.
समास नववा उपदेश निरुपण
श्रीराम ।
आधीं कर्माचा प्रसंग । कर्म केले पाहिजे सांग ।
कदाचित पडिलें  व्यंग । तरी प्रत्यवाय घडे ॥ १ ॥
१) जीवनांत प्रथम कर्माचा प्रसंग येतो. माणसाला कर्म करावेंच लागते. कर्म उत्तम रीतीनें करावे. त्यांत कांहीं दोष किंवा कमीपणा झाला तर तें कर्म करण्यास विघ्न निर्माण होते.
म्हणौन कर्म आरंभिलें । कांहीयेक सांग घडलें ।
जेथजेथें अंतर पडिलें । तेथें हरिस्मरण करावें ॥ २ ॥
२) म्हणून आपण कर्म करायला सुरुवात केली. त्यापैकी कांहीं कर्म चांगलें झालें. मात्र मधें अडचण आली तर जेथें अडचण निर्माण होईल तेथें भगवंताचे स्मरण करावें.       
तरी तो हरि आहे कैसा । विचार पाहावा ऐसा ।
संधेपूर्वीं जगदीशा । चोविसां नामीं स्मरावें ॥ ३ ॥
३) तो भगवंत आहे तरी कसा असा सूक्ष्म विचार करावा. संध्या करतांना चोवीस नामांनी भगवंताचे प्रथम स्मरण करतात.  
चोविसनामी सहस्त्रनामी । अनंतनामी तो अनामी ।
तो कैसा आहे अंतर्यामीं । विवेकें वोळखावा ॥ ४ ॥
४) पण त्याला कांहीं चोविसच नांवें आहेत असें नाहीं. त्याला हजार नांवें आहेत, अनंत नावें आहेत. असें असूनही तो अनामी आहे. सर्व नामांच्या पलीकडे आहे. असा तो कसा आहे हें विवेकानें आपण आपल्या अंतर्यामी समजून घ्यावें.   
ब्राह्मण स्नानसंध्या करुन आला । मग तो देवार्चनास बैसला ।
येथासांग तो पूजिला । प्रतिमादेवो ॥ ५ ॥
५) एक ब्राह्मण नदीवर स्नानसंध्या करुन आला. व घरीं देवपूजेला बसला. त्यानें देवाच्या प्रतिमेची यथासांग पूजा केली.
नाना देवांच्या नाना प्रतिमा । लोक पूजिती धरुन प्रेमा ।
ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा । कैसा आहे ॥ ६ ॥
६) अनेक देवांच्या अनेक प्रतिमा असतात. लोक अगदी प्रेमानें त्यांची पूजा करतात. पण ज्याच्या त्या प्रतिमा आहेत तो परमात्म कसा आहे.  
ऐसें वोळखिलें पाहिजे । वोळखोन भजन कीजे ।
जैसा साहेब नमस्कारिजे । वोळखिल्याउपरी ॥ ७ ॥
७) हें आपण ओळखलें पाहिजे. साहेबाला बघितल्यावर आपण त्याला जसा नमस्कार करतो. तसें परमात्म्याला ओळखून त्याची भक्ति करावी.    
तैसा परमात्मा परमेश्र्वर  । बरा वोळखावा पाहोन विचार ।
तरीच पाविजे पार । भ्रमसगराचा ॥ ८ ॥
८) नीट विचार करुन परमात्मा किंवा परमेक्ष्वर चांगल्या प्रकारें ओळखावा. तरच दृश्यानें भरलेल्या या भ्रमसमुद्राचा पैलतीर गाठता येईल. 
पूजा घेताती प्रतिमा । आंगा येतो अंतरात्मा ।
अवतारी तरी निजधामा । येऊन गेले ॥ ९ ॥
९) आपण प्रतिमेची पूजा करतो. पण त्यामुलें आपल्या अंतरांतील अंतरात्मा प्रगट होतो. अवतारी पुरुषांमधें तो अंतरात्मा प्रगट होत असतो. अंतरात्म्यापासून तें खालीं येतात व पुनः अवतार संपवून अंतरात्म्यांत जातात.  
परी ते निजरुपें असती । तें निजरुप ते जगज्जोती ।
सत्वगुण तयेस म्हणती । जाणती कळा ॥ १० ॥
१०) अवतारी पुरुष स्वस्वरुपानें कायमचे असतात. पण जगत्ज्योती हें त्यांचे निजरुप होय. तिला शुद्ध सत्त्वगुण किंवा ज्ञानकला असें म्हणतात.  
तये कळेचे पोटीं । देव असती कोट्यान्कोटी ।
या अनुभवाच्या गोष्टी । प्रत्ययें पाहाव्या ॥ ११ ॥   
११) या ज्ञानकलेच्या पोटांत कोट्यानुकोटी देव आहेत. या गोष्टी अनुभवाच्या आहेत. स्वतः अनुभव घेऊनच त्या जाणून घ्याव्या.   
देहपुरामधें ईश । म्हणोन तया नांव पुरुष ।
जगामधें जगदीश । तैसा वोळखावा ॥ १२ ॥
१२) अंतरात्मा या देहरुपी नगरींत किंवा पुरीमधें राहतो. म्हणून त्याला पुरुष म्हणतात. त्याचप्रमाणें जगामधें राहणारा अंरात्मा तो जगदीश हे ओळखावें.
जाणीवरुपें जगदांतरें । प्रस्तुत वर्तती शरीरें ।
अंतःकरणविष्णु येणें प्रकारें । वोळखावा ॥ १३ ॥
१३) या जगाच्या अंतर्यामी शुद्ध जाणीव वास करते. तीच सर्व शरीरांना हालचाल करण्याची प्रेरणा देते. ही जाणीव म्हणजेच विष्णु किंवा विश्वाचें अंतःकरण होय. असें समजावें. 
तो विष्णु आहे जगदांतरीं । तोचि आपुले अंतरीं ।
कर्ता भोक्ता चतुरीं । अंतरात्मा वोळखावा ॥ १४ ॥
१४) जगांत राहणारा विष्णुच आपल्या अंतःकरणांत आहे. हा अंतरात्माच खरा कर्ता व भोक्ता आहे. हें शहाण्या, चतुर माणसांनी ओळखावें.       
ऐके देखे हुंगे चाखे । जाणोन विचारें ओळखे ।
कित्येक आपुले पारिखे । जाणताहे ॥ १५ ॥
१५) विश्व व्यापणारा हा सगळ्या शरीरांमध्यें ऐकतो, पाहतो, वास घेतो, चव घेतो समजून विचार करतो व जाणतो.आपला कोण व आपला कोण नाहीं हें सुद्धां तोच जाणतो.
येकचि जगाचा जिव्हाळा । परी देहलोभाचा आडताळा ।
देहसमंधें वेगळा । अभिमान धरी ॥ १६ ॥
१६) जगाचें अंतःकरण एकच आहे. पण देहाच्या आसक्तीमुळे तें तसे आपल्याला अनुभवास येत नाही. देहाच्या समंधानें माणूस वेगळेपणाचा अभिमान धरतो. मी देहच आहे या अभिमानाने माणूस वेगळेपणने जीवन जगतो.  
उपजे वाढे मरे मारी । जैशा उचलती लहरीवरी लहरी ।
चंचळ सागरीं भरोवरी । त्रैलोक्य होत जातें ॥ १७ ॥
१७) सागर्‍याच्या पाण्यावर ज्याप्रमाणें लाटावर लाता येत राहतात, त्याचप्रमााणें या जाणीवरुप सागरामध्यें देहाच्या अनंत लाटा येत असतात आणि जात असतात. प्राण्याचा देह उपजतो, वाढतो, मरतो व मारतो. या अंतरात्म्याच्या सागरांत अशी पुष्कळ विश्वें उत्पन्न होतात आणि लय पावतात.  
त्रैलोका वर्तवितो येक । म्हणौन त्रैलोक्यनायेक ।
ऐसा प्रत्ययाचा विवेक । पाहाना कैसा ॥ १८ ॥
१८) या प्रचंड त्रैलोक्याला चालवतो म्हणून त्या अंतरात्म्याला त्रैलोक्यनायक असें म्हणतात. विवेकानें याचा अनुभव घेऊन पाहावा. 
ऐसा अंतरात्मा बोलिला । परी तोहि तत्वांमधें आला ।
पुढें विचार पाहिजे केला । माहावाक्याचा ॥ १९ ॥
१९) आतांपर्यंत अंतरात्म्याचे इतके वर्णन केले, पण तोही मायेच्या कक्षांत येतो. म्हणून एक पाऊल पुढें जाऊन महावाक्याचा म्हणजे शुद्ध परब्रह्नाचा विचार करणें अवश्य आहे.  
आधीं देखिला देहधारी । मग पाहावें जगदांतरीं ।
तयाचेनियां उपरी । परब्रह्म पावे ॥ २० ॥
२०) आधीं आपल्या देहामधिल स्वस्वरुप अनुभवावे. मग विक्ष्वामध्यें व्यापून असणारे ईश्र्वरस्वरुप अनुभवावें. तो अनुभव मागें सारुन मगच शुद्ध परब्रह्म अनुभवास येते. 
परब्रह्माचा विचार । होतां निवडे सारासार ।
चंचळ जाईल हा निर्धार । चुकेना कीं ॥ २१ ॥ 
२१) शुद्ध निर्विकार परब्रह्माचा साक्षात्कार झाला म्हणजे शाश्वत अशाश्वताची बरोबर निवड होते. त्यानंतर अशाश्वत सगळें नश्र्वर आहे हा निश्र्चय पक्का होतो. 
उत्पत्ति स्थिति संव्हार जाण । त्याहून वेगळा निरंजन ।
येथें ज्ञानाचें विज्ञान । होत आहे ॥ २२ ॥
२२) जें नश्र्वर आहे त्यास उत्पत्ति, स्थिति व संहार हे विकार असतात. निरंजन ब्रह्म त्याहून अगदीं निराळें आहे. त्या ठिकाणी ज्ञानाचे पर्यवसान विज्ञानामध्यें होते.   
अष्टदेह थानमान । जाणोन जालियां निर्शन ।
पुढें उरे निरंजन । विमळ ब्रह्म ॥ २३ ॥
२३) पिंडब्रह्मांडाचे आठ देह आणि स्थलकालांनी मापलेले दृश्य विश्र्व यांना ओळखून त्यांचा लय केल्यावर मग पुढें निरंजन व विमल ब्रह्म उरतें.
विचारेंचि अनन्य जाला । पाहाणाराविण प्रत्यय आला ।
तेहि वृत्ति निवृत्तिला । बरें पाहा ॥ २४ ॥
२४) जो साधक अखंड व निरंतर चिंतनाने अंतरात्म्याशी अनन्य होतो, त्याचा मीपणा नाहींसा होतो. त्याला आत्मस्वरुपाचा साक्षात अनुभव येतो. परंतु अनुभव येणें ही एक वृत्तीच आहे. ती वृत्ती देखील नाहींशी होऊन वृत्तिशून्य अवस्था पुढें येते. हीच सर्वश्रेष्ठ अवस्था समजावी.   
येथें राहिला वाच्यांश । पाहोन सांडिला लक्ष्यांश ।
लक्ष्यांशासरिसा वृत्तिलेश । तोहि गेला ॥ २५ ॥ 
२५) प्रथम शब्द ऐकण्याचा अनुभव, नंतर त्यांचा अर्थ आकलन होण्याचा अनुभव, त्यानंतर अर्थानें अभिप्रेत असलेल्या वस्तूचा अनुभव आणि अखेर अनुभव घेण्याच्या वृत्तीचा लय, अशा या साधनाच्या पायर्‍या आहेत. म्हणून वाच्यांश मागे राहिला, वस्तोोचा साक्षात् अनुभव आल्यानें लक्ष्यांश मागें राहिला, आणि शेवटीं वृत्तीदेखील नाहींशी झाली.    
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उपदेश नाम समास नववा ॥
Samas Navava Upadesha Nirupan 
समास नववा उपदेश निरुपण



Custom Search

Sunday, January 28, 2018

Samas Aathava Antaratma Vivaran समास आठवा अंतरात्मा विवरण


Dashak Aakarava Samas Aathava Antaratma Vivaran 
Samas Aathava Antaratma Vivaran, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us Atma in this Samas
समास आठवा अंतरात्मा विवरण
श्रीराम ॥
आधीं वंदूं सकळकर्ता । समस्त देवांचा जो भर्ता ।
त्याचे भजनीं प्रवर्ता । कोणीतरी ॥ १ ॥
१) सर्व घटनांचा कर्ता, तसेंच सर्व देवांचा मालक असा जो अंतरात्मा त्याचें ज्ञान करुन घेण्याचा कोणीतरी प्रयत्न करावा.
तेणेविण कार्य न चले । पडिलें पर्ण तेंहि न हाले ।
अवघें त्रैलोक्येचि चाले । जयाचेनी ॥ २ ॥  
२) त्याच्याशिवाय कांहींही कार्य होत नाही. त्याच्या सत्तेवाचून झाडाचे पडलेले पानही हालत नाहीं. त्याच्यापासून मिळणार्‍या शक्तीनेंच त्रैलोक्य चालते.  
तो अंतरात्मा सकळांचा । देवदानवमानवांचा ।
चत्वारखाणीचत्वारवाणीचा । प्रवर्तकु ॥ ३ ॥
३) देव, दानव, मानव, चार खाणी व चार वाणी या सर्वांचा प्रवर्तक एकटा तो अंतरात्मा आहे. 
तो येकलाचि सकळां घटीं । करी भिन्नभिन्ना राहाटी ।
सकळ सृष्टीची गोष्टी । किती म्हणौन सांगावी ॥ ४ ॥
४) सर्व प्राण्यांच्या देहामध्यें तोच वास करतो. आणि त्यांना निरनिराळ्या प्रकारे वागायला शक्ति व प्रेरणा देतो. सार्‍या विश्र्वाचे चालन करणार्‍या त्याचें संपूर्ण कर्तृत्व सांगता येणार नाही.  
ऐसा जो गुप्तेश्र्वर । त्यास म्हणावें ईश्र्वर ।
सकळ ऐश्र्वर्य थोर थोर । जयाचेनि भोगिती ॥ ५ ॥
५) असा जो गुप्त मालक आहे त्यालाच ईश्र्वर म्हणतात. त्याच्या सत्तेनेंच लोक मोठी ऐश्र्वर्य भोगतात.  
ऐसा जेणें वोळखिला । तो विश्र्वंभरचि जाला ।
समाधी सहजस्थितीला । कोण पुसे ॥ ६ ॥
६) अशा अंतरात्म्याचें ज्याला ज्ञान होतें तो स्वतः विश्र्वव्यापी विश्र्वंभर बनतो. मग समाधि व सहजस्थिति यांचें कांहीं महत्व उरत नाही. ईश्र्वराशी तदाकार होण्याची स्थिति इतर सर्व अवस्थांच्या मानानें फारच पलीकडची असते. 
अवघें त्रैलोक्य विवरावें । तेव्हां वर्म पडेल ठावें ।
आवचतें घबाड सिणावें । नलगेचि कांहीं ॥ ७ ॥
७) या सगळ्या दृश्य विश्र्वाचे विवरण करीत गेल्यानें अंतरात्म्याचें रहस्य आपोआप आकलन होते. एकाएकी प्रचंड लाभ हातीं येतो. त्यासाठीं निराळे श्रम करावें लागत नाहींत.
पाहातां ऐसा कोण आहे । जो अंतरात्मा विवरोन पाहे ।
अल्प स्वल्प कळोन राहे । समाधानें ॥ ८ ॥
८) बुद्धीनें विवरण करुन अंतरात्म्याचे ज्ञान करुन घेणें कोणासहि शक्य नाही. त्याचे ज्ञान होण्यासाठीं बुद्धीनें धडपडणार्‍यांना त्याचें येवढेंतेवढें ज्ञान होते. व त्यावरच तें समाधान मानतात. 
आरे हें पाहिलेंच पाहावें । विवरलेंचि मागुतें विवरावें ।
वाचिलेंचि वाचावें । पुन्हपुन्हा ॥ ९ ॥
९) अल्पस्वल्प ज्ञानानें अंतरात्म्याचें जें किंचित दर्शन झालें असेल तें वारंवार पुन्हपुन्हा घ्यावे. पुन्हपुन्हा त्याचे विवरण करावें. त्याच्याबद्दल वाचलेले पुन्हपुन्हा वाचावे.   
अंतरात्मा केवढा कैसा । पाहाणाराची कोण दशा ।
देखिल्या ऐकिल्या ऐसा । विवेक सांगे ॥ १० ॥
१०) हा अंतरात्मा केवढा आहे व कसा आहे, त्याला जो पाहातो त्याची दशा काय होते.,याबद्दल जो सांगतो तें अपूर्ण असते. कारण त्यानें जें पाहिले असते व ऐकलेले असतें तेवढेच तो सांगतो. 
उदंड ऐकिलें देखिलें । अंतरात्म्यास नवचे पुरविलें ।
प्राणी देहधारी बाउलें । काये जाणे ॥ ११ ॥
११) माणसानें कितीही ऐकलें आणि पाहिलें तरी अंतरात्म्याचे संपूर्ण वर्णन करण्यास तें पुरें पडत नाही. देहधारी माणूस अनंत व अपार अंतरात्म्यास संपूर्णपणें जाणणे शक्य नसते.  
पूर्णास अपूर्ण पुरेना । कां जें अखंड विवरेना ।
विवरतां विवरतां उरेना । देवावेगळा ॥ १२ ॥
१२) माणूस अपूर्ण तर अंतरात्मा पूर्ण आहे. पूर्णाला अपूर्ण आकलन करुं शकत नाहीं. याचें कारण असें कीं माणूस पूर्णाचे अखंड चिंतन करीत नाही. तसें जर केलें तर माणूस देवाहून वेगळेपणानें उरत नाहीं. 
विभक्तपणें नसावें । तरीच भक्त म्हणवावें ।
नाहींतरी वेर्थचि सिणावें । खटाटोपें ॥ १३ ॥
१३) देवाशी वेगळेपण नसावें. म्हणजेच मग भक्त म्हणून घेणें शोभतें. देवाशीं तादात्म्य साधलें नाहीं तर खटाटोप श्रम व्यर्थ वाया जातात.  
उगाच घर पाहोन गेला । घरधनी नाहीं वोळखिला ।
राज्यामधूनचि आला । परी राजा नेणे ॥ १४ ॥
१४) एक माणूस घर पाहून गेला पण त्यानें घराच्या मालकास पाहिलेंच नाहीं. ओळखलें नाही. दुसरा एक माणूस एका राज्यामधून आला, पण येथील राजा कोण याची चौकशी त्यानें केली नाहीं.  
देहसंगें विषये भोगिले । देहसंगे प्राणी मिरवलें ।
देहधर्त्यास चुकलें । नवल मोठें ॥ १५ ॥
१५) हें जसें घडतें त्याचप्रमाणें माणूस देहाच्या संगतीनें इंद्रियांचे सुख भोगतो, जन्मभर देहाच्या संगतीनें मिरवतो. पण जो अंतरात्मा देहास चालवतो त्याला माणूस जाणत नाहीं. हें एक मोठें नवलच आहे.   
ऐसे लोक अविवेकी । आणि म्हणती आम्ही विवेकी ।
बरें ज्याची जैसी टाकी । तैसें करावें ॥ १६ ॥
१६) अशा रीतीनें लोक विवेकहीन असून देखील स्वतःला मोठे विवेकी म्हणवतात. एकंदरींत ज्याला जशी जगण्याची सवय लागते तसें तो जगतो.  
मूर्ख अंतर राखों नेणे । म्हणौन असावें शाहाणे ।   
ते शाहाणेहि दैन्यवाणे । होऊन गेले ॥ १७ ॥
१७) ज्याला आपलें अंतरंग सांभालता येत नाहीं तो मूर्ख होय. म्हणून माणसानें शहाणपण शिकावें असें म्हणतात. म्हणून शहाण्यास पाहावे तर ते देखील अंतरंगाचें ज्ञान नसल्यानें दिनवाणें झालेलें असतात.  
अंतरीं ठेवणें चुकलें । दारोदारीं धुंडूं लागलें ।  
तैसें अज्ञानास जालें । देव न कळे ॥ १८ ॥
१८) समजा, एखाद्याच्या घरांतच संपत्ती ठेवलेली आहे. ती तो विसरला आणि मग संपत्तीसाठीं दारोदार हिंडूं लागला. त्याच प्रमाणें अज्ञानी माणसाची अवस्था होते. स्वतःच्या अंरंगात असलेला ईश्र्वर त्यास कळत नाहीं, तो त्यास बाहेर शोधायला जातो.   
या देवाचें ध्यान करी । ऐसा कोण सृष्टीवरी ।
वृत्ती येकदेंसी तर्तरी । पवाडेल कोठें ॥ १९ ॥
१९) अनंत अंतरात्म्याचे ध्यान करणारा या विश्र्वांत कोणीही नाही. माणसाची जाणण्याची वृत्ती एकदेशी आहे. तिची झेप दृश्यापर्यंत मर्यादित आहे. अशा स्थळकालांनीं मर्यादित असणार्‍या वृत्तीची चपळता अंतरात्म्याचें ध्यान करण्याइतकी पुरीं पडत नाहीं. 
ब्रह्मांडीं दाटले प्राणी । बहुरुपें बहुवाणी ।
भूगर्भीं आणि पाषाणीं । कितीयेक ॥ २० ॥
२०) या जगामध्यें जीवप्राणी नुसतें गर्दी करुन आहेत. त्यांची रुपें व भाषा नाना तर्‍हांची आहेत. पृथ्वीच्या पोटांत व पाषाणांत देखील असे कितीतरी प्राणी आहेत.  
इतुके ठाईं पुरवला । अनेकीं येकचि वर्तला ।
गुप्त आणि प्रगटला । कितीयेक ॥ २१ ॥
२१) या सर्वांमध्यें अंतरात्मा भरुन पुनः उरला आहे. अशा रीतीनें अनेकांमध्यें एकच एक अंतरात्मा नटला आहे. कांहीं ठिकाणीं तो गुप्त असतो तर कांहीं ठिकाणी तो प्रगटपणें दिसतो. 
चंचळें न होईजे निश्र्चळ । प्रचित जाणावी केवळ ।
चंचळ तें नव्हे निश्र्चळ । परब्रह्म तें ॥ २२ ॥
२२) आपण अशाश्र्वत मायेमध्यें जोपर्यंत आहोत तोपर्यंत शाश्र्वत ब्रह्मवस्तु हस्तगत होणार नाही. प्रत्यक्ष अनुभवानें आपण हें ओळखावें. जें अशाश्र्वत आहें तें शाश्र्वत परब्रह्म मुळींच नव्हें.     
तत्वें तत्व जेंव्हां उडे । तेव्हां देहबुद्धि झडे ।
निर्मळ निश्र्चळ चहुंकडे । निरंजन ॥ २३ ॥
२३) एका तत्वानें दुसर्‍या तत्वाचा जेव्हां निरास होत जातो तेव्हां देहबुद्धीचा क्षय होतो. मग चोहीकडे एक निर्मल, निश्र्चल व निरंजन ब्रह्म अनुभवास येते.  
आपण कोण कोठें कैंचा । ऐसा मार्ग विवेकाचा ।
प्राणी जो स्वयें काचा । त्यास हें  कळेना ॥ २४ ॥
२४) विवेकाचा जो मार्ग आहे त्यामध्यें " मी कोण, मी कोठून आलो व मी कसा आहे  " हे प्रश्र्ण सोडवावे लागतात. जो माणूस स्वतः विवेकानें कच्चा आहे. त्याला हें कळत नाहीं. 
भल्यानें विवेक धरावा । दुस्तर संसार तरावा ।
अचघा वंशचि उधरावा । हरिभक्ती करुनी ॥ २५ ॥
२५) म्हणून भल्या माणसानें विवेकाची कास धरावी. तरण्यास कठीण असा हा संसार विवेकाच्या बळावर तरुन जावा. भगवंताची भक्ती करुन आपल्या वंशाचा उद्धार करावा. 
इति श्रीदासबोधे गुरुशिश्यसंवादे अंतरात्माविवरण नाम समास आठवा ॥
Samas Aathava Antaratma Vivaran  
समास आठवा अंतरात्मा विवरण


Custom Search

Thursday, January 25, 2018

Samas Satava ChanChal Nadi समास सातवा चंचळ नदी


Dashak Aakarava Samas Satava ChanChal Nadi 
Samas Satava ChanChal Nadi, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us that this world ChanChal Nadi means Maya. Maya means the world we see, we live in it and we die in it. We forget our aim due to bindings of this Maya.
समास सातवा चंचळ नदी
श्रीराम ।
चंचळ नदी गुप्त गंगा । स्मरणें पावन करीं जगा ।
प्रचित रोकडी पाहा गा । अन्यथा नव्हे ॥ १ ॥
१) ही चंचळ नदी म्हणजे मूळमाया होय. असेच समर्थांना अभिप्रेत आहे. मूळमाय ही एक वाहती नदी आहे. ती एक अदृश्य असलेली गंगाच आहे. की जीच्या केवळ स्मरणमात्रेच मनुष्य पावन होतो. या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहावा.    
केवळ अचंचळीं निर्माण जाली । अधोमुखें बळें चालिली ।
अखंड वाहे परी देखिली । नाहींच कोणी ॥ २ ॥
२) ही नदी अचंचळ ब्रह्मरुपी पर्वतावर उगम पावते व स्थूळ व दृश्य विश्र्वाकडे ती वाहात जाते. ती अखंड वाहात असूमही तीला कोणीही पाहिलेले नाही. 
वळणें वांकाणें भोवरे । उकळ्या तरंग झरे ।
लादा लाटा कातरे । ठाईं ठाईं ॥ ३ ॥
३) या नदीला वळणें व वांकड्या धारा आहेत. तिच्यांत भोवरे, उकळ्या, तरंग आणि झरे आहेत. तिच्यांत चिखल, लाटा आहेत. वाटेंतील मोठ्या खडकांमुळें तीचा प्रवाह दुभंगतो.  
शुष्क जळाचे चळाळ । धारा धबाबे खळाळ ।
चिपळ्या चळक्या भळाळ । चपळ पाणी ॥ ४ ॥   
४) कांहीं ठिकाणीं पाणी आटल्यानें प्रवाह कोतडा असतो. तर कांहीं ठिकाणीं धारा व धबदहब्यांमुळे मोठा खळखळाट असतो. तर कांहीं ठिकाणी नदीचा प्रवाह चिंचोळा ओहोळ होतो, उथळ होतो. किंवा रुंद होतो. अशा प्रकारें या नदीचे पाणी वाहाते. 
फेण फुगे हेलावे । सैरौवरा उदक धावे ।
थेंब फुईं मोजावे । अणुरेणु किती ॥ ५ ॥
५) पाण्यावर फुगे बनून ते झोके, हेलकावे खातात. प्रवाहाचें पाणी स्वच्छंदपणें वाहात असते. त्या प्रवाहांतून उडणारे मोठे थेंब व अणुरेणुंसारखें मोठे तुषार मोजणें अशाक्य आहे.   
वोसाणे वाहती उदंड । झोतावे दर्कुटे दगड ।
खडकें बेटें आड । वळसा उठे ॥ ६ ॥
६) प्रवाहामध्यें खूप करकचरा वाहात जातो. जोराचा प्रवाह आला म्हणजे कडेकपारी, दगड, खडक, लहान बेटें यांना वळसा घालून पुढें जातो. 
मृद भूमी तुटोन गेल्या । कठीण तैश्याचि राहिल्या ।
ठाईं ठाईं उदंड पाहिल्या । सृष्टीमधें ॥ ७ ॥
७) कांठची मऊ जमीन वाहून जाते. कठीण जमीन तशीच राहते. जगामध्यें ठिकठिकाणी अशा जमिनी पुष्कल पाहिल्या.   
येक ते वाहतचि गेले । येक वळशामधें पडिले ।
येक सांकडींत आडकले । अधोमुख ॥ ८ ॥
८) कित्येक जीव माया नदीच्या प्रवाहामध्यें वाहात जातात व नाश पावतात. कांहीं जीव मोठ्या हिमतीनें उगमाकडे पोहोत जातात. व ब्रह्मदर्शनाने पावन होतात. कांहीं जीव भोवर्‍यामधें सापडतात. तर कांहीं नीच योनींत जातात. कांहीं जन्म-मरणाच्या चक्रांत अडकतात. तर कांहीं देहबुद्धिनें अत्यंत स्वार्थी बनून बहिर्मुख होतात.
येक आपटआपटोंच गेली । येक चिरडचिर्डोच मेलीं ।
कितीयेक ते फुगलीं । पाणी भरलें ॥ ९ ॥
९) कांहीं जीव आपटूनापटून मेले. कांहीं जीव चिरडून चिरडून गेले. तर कांहीं जीवांच्या पोटांत पाणी शिरुन ते फुगले. याचा अर्थ असा कीं कांहीं जीव दृश्याच्या मागें लागले पण तेथें द्वैतानें संघर्ष होऊन मार खाऊन मेले. तर कांहीं संसारांतील संकटानीं मेले. आणि कांहीं अहंकारानें उन्मत्त होऊन मेले. 
येक बळाचे निवडले । ते पोहतचि उगमास गेले ।
उगमदर्शनें पवित्र जाले । तीर्थरुप ॥ १० ॥
१०) कांहीं जीव मोठे बलवान होते. प्रवाहाच्या उलट दिशेने ते पोहत पोहत नदीच्या उगमापर्यंत ते पोहचले. म्हणजेच मायेच्या विळख्यांतून निश्र्चळ ब्रह्मापर्यंत पोहोचले. स्थूलांतून सूक्ष्मापर्यंतचा प्रवास त्यांनी केला. त्यामुलें ते पवित्र झाले. पवित्रपणानेम तीर्थाची योग्यता पावतो.  
तेथें ब्रह्मादिकांचीं भुवनें । ब्रह्मांडदेवतांचीं स्थानें ।
उफराटी गंगा पाहातां मिळणें । सकळांस तेथें ॥ ११ ॥
११) या गंगेमधें उरफाटे जाऊन पाहिले तर तेथे ब्रह्मादिकांची भुवनें आढळतात. ब्रह्मांडांतील देवतांची स्थानें लागतात. त्या सगळ्यांची तेथें गांठ पडते. माणूस अंतर्मुख होत गेला म्हणजे तो सूक्ष्माच्या मार्गास लागतो. जसा तो वरवरच्या पातळीवर जातो तसे त्यास निरनिराळे लोक लागतात. तसाच तो ब्रह्मलोकांत जातो. तेथें त्याला ब्रह्मादिकांचे दर्शन घडते.  
त्या जळाऐसें नाहीं निर्मळ । त्या जळाऐसें नाहीं चंचळ ।
आपोनारायण केवळ । बोलिजे त्यासी ॥ १२ ॥
१२) उगमापाशीं मायारुप गंगेचे पाणी अत्यंत निर्मळ असते. पण तें अत्यंत चंचळ म्हणजे प्रवाही असते. म्हणून त्यास आपोनारायण म्हणतात. गुणमाया निर्माण होण्यापूर्वी मूलमाया खरोखर ब्रह्मरुपच असते. म्हणून ती अत्यंत पवित्र, निर्मल व भेदरहित असते. 
माहानदी परी अंतराळीं । प्रत्यक्ष वाहे सर्वकांळीं ।
स्वर्गमृत्यपाताळी । पसरली पाहा ॥ १३ ॥    
१३) ही माहानदी खरी पण ती आकाशांत वाहाते. सारखी प्रत्यक्ष वाहातच  आहे. स्वर्ग, मृत्यु व पाताळ या तीन्हीं लोकीं ती पसरली आहे. मूळ माया अत्यंत सूक्ष्म असल्यानें ती सूक्ष्म आकाशांत वाहाते. तीचे मूल आकाशाही पलीकडे आहे.  
अधोर्ध अष्टहि दिशा । तिचें उदक करी वळसा ।
जाणते जाणती जगदीशा । सारिखीच ते ॥ १४ ॥
१४) खालीं, वर व आठ दिशा मिळून दहाही दिशांमधें मायेचा प्रवाह भोवर्‍यासारखा फिरतो आहे. म्हणून ज्ञानी जन तीला ईश्र्वरासारखींच मानतात. ती तशीच सर्वव्यापी आहे. सर्वांवर सत्ता गाजविणारी आहे. म्हणून ती ईश्र्वरस्वरुप आहे. असे ज्ञानी समजतात.     
अनंत पात्रीं उदक भरलें । कोठें पाझपाझरोंच गेलें ।
कितीयेक तें वेचलें । संसारासी ॥ १५ ॥
१५) समजा असंख्य भांडी आहेत. त्यामधें पाणी भरलेले आहे. कांहीं भांड्यांतील पाणी पाझरुन जाते तर कांहीं भामड्यांतील पाणी संसारांत वापरले जाते.  भांडें म्हणजे जीव व पाणी म्हणजे माया. पाणी पाझरुन जाणें म्हणजे माया नाहींशी होणें. आत्मज्ञानी पुरुषांच्या बाबतींत असें घडतें. त्याच्या देहामधे स्वस्वरुप भरुन राहते. इतर माणसें मायेमुळें संसारांत गुरफटतात.   
येक्यासंगें तें कडवट । येक्यासंगें तें गुळचट ।
येक्यासंगें तें तिखट । तुरट क्षार ॥ १६ ॥
१६) ज्याप्रकारचें भांडे असतें त्या तर्‍हेची चव त्यांतील पाण्याला येते. एखाद्या भांड्यांतील फार कडवट असते, तर एखाद्यांतील फार गुळचट असते. तर इतर भांड्यांमधें तिखट, तुरट किंवा खारट आढळते. माया म्हणजे चित्शक्ती होय. सत्वगुणी माणसामधें ती गोड स्वभावानें व्यक्तरुप धारण करते. रजोगुणी माणसामधें ती विकाररुपाने व तमोगुणी माणसामधें दुष्टपणाने दिसते.   
ज्या ज्या पदार्थास मिळे । तेथें तद्रूपचि मिसळे ।
सखोल भूमीस तुंबळे । सखोलपणें ॥ १७ ॥
१७) ज्या ज्या पदार्थांशी तिचा संबंध येतो त्या पदार्थांशी ती समरस होते. खोल जमीन असेल तर ती खोलपणें तुंबुन राहते. चितशक्ति स्वतः काहींच नाही. ज्या ज्या दृश्य वस्तुशीं तिचा संबंध येईल तिच्याशी समरस होऊन राहणें येवढेंच ती करते. म्हणून वस्तुमधिल चत्शक्तीचे प्रमाण वस्तुच्या गहनतेवर किंवा खोलपणावर अवलंबून असते. 
विषामधें विषचि होतें । अमृतामधें मिलोन जाते ।
सुगंधीं सुगंध तें । दुर्गंधीं दुर्गंध ॥ १८ ॥
१८) विषामधें ती विष होते. तर अमृतामधें ती अमृत बनते. सुगंधानें सुगंधी बनणे व दुर्गंधानें दुर्गंधी बनणे हाच तिचा स्वभावधर्म आहे.  
गुणीं अवगुणीं मिळे । ज्याचें त्यापरी निवळे ।
त्या उदकाचा महिमा न कळे । उदकेंविण ॥ १९ ॥
१९) गुणांमधे ती गुणी बनते. तर अवगुणांत अवगुणी. ज्याच्याशी तीचा संबंध येतो त्याच्याप्रमाणें ती अनुभवास येते. त्या चित्शक्तिचा महिमा कळण्यासाठीं तिचीच कृपा अवश्यक असते. त्या मूलमायेचा अमंल सर्व चराचर विश्र्वावर चालतो. तिच्याच कृपेने परमार्थ विचार उत्पन्न होतात. तीच सारासार निवडून दाखविते. तीच अनुभवाची खूण आहे. म्हणून तिच्या मनांत आलें तरच माणसाला तीचे अनिर्वचनीय स्वरुप आकलन होत असते.       
उदक वाहे अपरांपर । न कळे नदी कीं सरोवर ।   
जलवास करुन नर । राहिले कितीयेक ॥ २० ॥ 
२०) या नदीला पाणी इतके अथांग आहे कीं ती नदी आहे कां सरोवर आहे. याचा पत्ता लागत नाहीं. कितीतरी माणसें मायानदीच्या पाण्यांतच वस्ती करुन राहतात. सरोवर स्थिर असते, नदी अस्थिर असते. हें दृश्य विश्र्व स्थिर आहे असें वाटते पण दृश्यानें ते इतके अपरंपार भरलें आहे कीं त्याचे अस्थिरपण प्रवाहीपण माणसाच्या ध्यानामतच येत नाही. म्हणून माणूस दृश्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करीत नाहीं. तो फसतो व अडकतो.       
उगमापैलीकडे गेले । तेथें परतोन पाहिलें ।
तंव तें पाणीच आटलें । कांहीं नाहीं ॥ २१ ॥
२१) जें उगमाच्या पलीकडे पोहोचले त्यांनी मागें वळून पाहीले तेव्हां त्यांना असें आधळले कीं, मायानदीचे पाणी संपूर्ण आटले. तेथें नदीचा मागमूसही उरला नाही. आपली वृत्ति अंतर्मुख करुन सूक्ष्मांत शिरलें व मायानदी ओलांडून ब्रह्मस्वरुप झाले.  त्यांच्या दृष्टीनें माया मुळीं नाहींच अशी अनुभुती आली.    
वृत्तिसुन्य योगेश्र्वर । याचा पाहावा विचार ।
दास म्हणे वारंवार । किती सांगों ॥ २२ ॥
२२) ज्यानें आपली वृत्ति शून्य केली, जो निर्वृत्ति बनला असा थोर ज्ञानी पुरुषाच्या स्थितीचा अभ्यास करुन ती समजून घ्यावी. अखेर दास म्हणतात कीं, हीच गोष्ट पुनः पुनः कितीवेला सांगावी?   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चंचळनदीनिरुपणनाम समास सातवा ॥
Samas Satava ChanChal Nadi 
समास सातवा चंचळ नदी



Custom Search

Tuesday, January 23, 2018

Samas Sahava Mahant Lakshan समास सहावा महंतलक्षण


Dashak Aakarava Samas Sahava Mahant Lakshan 
Samas Sahava Mahant Lakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us that in this world there are many Spiritual Leaders or Gurus but a real Guru should have which virtues, qualities to become a good spiritual leader.
समास सहावा महंतलक्षण  
श्रीराम ॥
शुद्ध नेटकें ल्याहावें । लेहोन शुद्ध शोधावें ।
शोधून शुद्ध वाचावें । चुकों नये ॥ १ ॥
महंतानें शुद्ध लिहावें. लेकहन नीटनेटके असावें. लिहील्यावर त्यांत कांहीं अशुद्ध आहे कां हे तपासावें व तसें आढळल्यास तें दुरुस्त करावें किंवा काढून टाकावें. तपासल्यावर शुद्ध वाचावें. वाचतांना चुकु नये.  
विश्कळित मात्रुका नेमस्त कराव्या । धाकट्या जाणोन सदृढ धराव्या ।
रंग राखोन भराव्या । नाना कथा ॥ २ ॥
२) कानामात्रा मागेंपुढें झाल्या असतील तर त्या जेथल्या तेथें नीट लिहून काढाव्या. लिहीण्याची जी पद्धत असेल ती बदलू नये. लिखाणांत चांगल्या कथा रंग भरुन लिहाव्यात.  
जाणायाचें सांगतां न यें । सांगायाचें नेमस्त न ये ।
समजल्याविण कांहींच न ये । कोणीयेक ॥ ३ ॥
३) काय जाणायचें तें ज्याला सांगता येत नाही. जें सांगायाचे तें बरोबर सांगता येत नाही. ज्याला नीट समजून घेता येत नाही. असा मनुष्य महंत बनूं शकत नाही.
हरिकथा निरुपण । नेमस्तपणें राजकारण ।
वर्तायाचें लक्षण । तेंहि असावें ॥ ४ ॥
४) आत्मज्ञानाचा विचार, आवश्यक तेवढें राजकारण, चार लोकांत कसें वागायचे ह्याचें ज्ञान, या सर्व गोष्टी महंताच्या अंगी असाव्यात. 
पुसों जाणें सांगों जाणें । अर्थांतर करुं जाणे । 
सकळिकांचें राखों जाणे । समाधान ॥ ५ ॥  
५) कोणाला काय विचारवें, कोणाला काय सांगावें ग्रंथांचा बरोबर अर्थ कसा काढावा हें जो जाणतो व सर्वांचे समाधान कसें करावें हें त्याला कळते.    
दीर्घ सूचना आधीं कळे । सावधपणें तर्क प्रबळे ।
जाणजाणोनि निवळे । येथायोग्य ॥ ६ ॥
६) पुढें घटना कशा घडणार याचा अंदाज त्याला आधींच येतो. सर्व गोष्टींकडे त्याचे लक्ष असल्यानें त्याचा विचार मोठा प्रबळ असतो. परत परत समजून घेतल्यानें त्याला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतात. 
ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुद्धिवंत ।
यावेगळें अंतवंत । सकळ कांहीं ॥ ७ ॥
७) अशा रीतीनें जो सर्व गोष्टी जाणतो, तोच खरा बुद्धिवान महंत समजावा. अशा महंताखेरीज दुसरें कशांत कांहीं अर्थ नाही. तें सर्व विनाशवंत असते. 
ताळवेळ तानमानें । प्रबंद कविता जाड वचनें ।
मज्यालसी नाना चिन्हें । सुचती जया ॥ ८ ॥
८) कालवेळ, तानमान, प्रबंध, कविता, महत्वाची वचनें, सभाधीटपणा वगैरे नाना गोष्टी महंताला वेळेवर सुचतात. त्याला त्याचे ज्ञान असते.  
जो येकांतास तत्पर । आधीं करीं पाठांतर ।
अथवा शोधी अर्थांतर । ग्रंथगर्भींचें ॥ ९ ॥
९) त्याला एकांत आवडतो. तो आधी स्वतः पाठांतर करतो. ग्रंथाच्या अंतरंगांतील गर्भित अर्थ शोधून काढतो.   
आधींच सिकोन जो सिकवी । तोचि पावे श्रेष्ठ पदवी ।
गुंतल्या लोकांस उगवी । विवेकबळें ॥ १० ॥
१०) तो स्वतः आधी शिकतो व मग लोकांना शिकवतो. त्यातूनच त्याला मोठेपण मिळते. अडचणींत असलेल्या लोकांना विवेकाच्या बळावर बाहेर काढतो. संसार, प्रपंचात अडकलेल्यांना परमार्थमार्गी बनवतो. 
अक्षर सुंदर वाचणें सुंदर । बोलणें सुंदर चालणें सुंदर ।
भक्ति ज्ञान वैराग्य सुंदर । करुन दावी ॥ ११ ॥
११) त्याचे अक्षर सुंदर असते. त्याचे वाचणें सुंदर असते. त्याचे बोलणे व चालणेंही सुंदर असते. भक्ति, ज्ञान व वैराग्य वगैरे सगळे तो सुंदर रीतीनें करुन दाखवितो.  
जयास येत्नचि आवडे । नाना प्रसंगी पवाडे ।
धीटपणें प्रगटे दडे । ऐसा नव्हे ॥ १२ ॥
१२) त्याला प्रयत्न करण्याची फार आवड असते. निरनिराळ्या प्रसंगांत त्याचे मोठेपण दृष्टीस पडते. कोणत्याही प्रसंगी तो धीटपणें वागतो. प्रसंग पाहून पलायन करणारा तो नसतो. 
सांकडीमधें वर्तों जाणे । उपाधीमधें मिळों जाणे । 
अलिप्तपणें राखों जाणे । आपणासी ॥ १३ ॥
१३) संकट प्रसंगीं कसें वागावें हे त्याला माहीत असते. व्यापामधें मिसळून कसें जायचे हें त्याला बरोबर समजते. परंतु यासर्वांतूनही आपण अलिप्त कसें राहायचे हें ही तो जाणतो.   
आहे तरी सर्वां ठांई । पाहों जातां कोठेंचि नाहीं ।
जैसाा अंतरात्मा ठाईंचा ठाईं । गुप्त जाला ॥ १४ ॥
१४) अंतरात्म्यासारखींच महंताची अलिप्तता असते. अंतरात्मा सर्वांच्या ठिकाणीं असतो. पण त्याला पाहूं गेल्यास तो कोठेंच दिसत नाही. तो जेथल्या तेथें गुप्त होतो. तसाच महंत सर्वांमधे मिसळतो. पण त्याला पाहिला गेल्यास तो एकदम नाहींसा होतो. एकांतात जातो.  
त्यावेगळें कांहींच नसे । पाहों जातां तो न दिसे ।
न दिसोन वर्तवीतसे । प्राणीमात्रांसी ॥ १५ ॥
१५)  अंतरात्म्याशिवाय कोणीही असूं शकत नाही.पहायला गेल्यावर दिसत नाही. तरीसुद्धा सर्व जीवांना तो हालचाल करण्यास समर्थ बनवतो. त्याचप्रमाणें समजांतील चळवळींना महंत प्रेरणा देतो. त्यांचे चालन करतो. पण पाहावयास गेल्यास तो सापडत नाहीं. हीच त्याची अलिप्तता होय. 
तैसाच हाहि नानापरी । बहुत जनास शाहाणे करी ।
नाना विद्या त्या विवरी । स्थूळ सूक्ष्मा ॥ १६ ॥
१६) अलिप्त राहणार्‍या अंरात्म्याप्रमाणें महंत लोकांना शहाणे करतो. स्थूल व सूक्ष्म अशा विद्या देतो. दृश्य विश्र्वाचे ज्ञान देणार्‍या स्थूल विद्या तर न दिसणार्‍या भगवंताचे ज्ञान देणार्‍या त्या सूक्ष्म विद्या होत.
आपणाकरितां शाहाणे होती । ते सहज चि सोये धरिती ।
जाणतेपणाची महंती । ऐसी असे ॥ १७ ॥
१७) महंत ज्या लोकांना विद्या देऊन शाहाणे बनवितो. ते लोक त्याचे अनुयायी बनतात. त्याला वश होतात. हे सहज, सरळच आहे. जाणतेपणानें केलेल्या महंतीचा प्रभाव हा असा असतो.  
राखों जाणें नीतिन्याय । न करी न करवी अन्याये ।
कठीण प्रसंगीं उपाये । करुं जाणे ॥ १८ ॥
१८) खरा महंत नीति व न्याय यांचे पालन, रक्षण करणारा असतो. तो स्वतः अनीति, अन्यायानें वागत नाही. आणि इतरांकडूनही करवीत नाही. कठीण प्रसंग आलाच तर त्यांतून बाहेर पडण्याचा तो उपाय काढतो.  
ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा । 
दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा ॥ १९ ॥
१९) अशा मनोबलाचा जो असतो त्याचा पुष्कळ लोकांना आधार असतो. श्रीरामदास म्हणतात कीं, श्रीरामचंद्राच्या अंगी वरील गुण आहेत. ते महंतांनी जरुर घ्यावेत.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे महंतलक्षणनाम समास सहावा ॥    
Samas Sahava Mahant Lakshan    
समास सहावा महंतलक्षण  



Custom Search