Wednesday, February 28, 2018

Samas Choutha Pralay Nirupan समास चौथा प्रलयनिरुपण


Dashak Terava Samas Choutha Pralay Nirupan 
Samas Choutha Pralay Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about the world and destruction of it. Destruction of the world happens step by step systematically.
समास चौथा प्रलयनिरुपण 
श्रीराम ॥
पृथ्वीस होईल अंत । भूतांस मांडेल कल्पांत ।
ऐसा समाचार साध्यंत । शास्त्रीं निरोपिला ॥ १ ॥
१) संहारकाळीं पृथ्वीचा अंत होईल. पंचभूतांचा कल्पांत होईल. याची सविस्तर माहिती शास्त्रांमध्यें सांगून ठेवलेली आहे.
शत वरुषें अनावृष्टि । तेणें जळेल हे सृष्टि ।
पर्वत माती ऐसी पृष्ठी । भूमीची तरके ॥ २ ॥
२) शंभर वर्षें पाऊस न पडल्यानें सृष्टि जळूं लागेल. पर्वत मोठमोठ्या भेगांमध्यें नाहींसे होतील. 
बारा कळीं सूर्यमंडळा । किर्णापासून निघती ज्वाळा ।
शत वरुषें भूगोळा । दहन होये ॥ ३ ॥
३) सूर्याच्या बारा कळांतील किरणांमधून ज्वाळा बाहेर पडतील. त्यामुळें शंभर वर्षें पृथ्वी जळत राहील.  
सिंधुरवर्ण वसुंधरा । ज्वाळा लागती फणिवरा ।
तो आहाळोन सरारां । विष वमी ॥ ४ ॥
४) पृथ्वी जळतांना त्या जाळाचा रंग शेंदरी दिसतो. शेंदरी रंगाचा तो जाळ शेषापर्यंत जातो. त्यानें शेष भाजून भराभर वीष ओकतो.    
त्या विषाच्या ज्वाळा निघती । तेणें पाताळें जळती ।
माहापावकें भस्म होती । पाताळ लोक ॥ ५ ॥
५) त्या विषांतून ज्वाळा भडकतात, त्यामुळें पाताळें जळतात. अशा या प्रचंड आगीनें पाताळें भस्म होतात. 
तेथें माहाभूतें खवळती । प्रळयेवात सुटती ।
प्रळयेपावक वाढती । चहुंकडे ॥ ६ ॥
६) मग महाभूतें खवळतात.  प्रलयाचा वारा सुटतो, प्रलयाचा अग्नि भडकतो सगळें व्यापून टाकतो.
तेथें अकरा रुद्र खवळले । बारा सूर्य कडकडिले ।
पावकमात्र येकवटले । प्रळयेकाळीं ॥ ७ ॥
७) त्यावेळीं अकरा रुद्र खवळतात. बारा सूर्य कडाडतात. अशा रीतीनें प्रलयकाल आला म्हणून सर्व अग्नि एकवटून येतात.  
वायो विजांचे तडाखे । तेणें पृथ्वी अवघी तरखे ।
कठिणत्व अवघेंचि फांके । चहुंकडे ॥ ८ ॥
८) वायु व विजा यांचे तडाखे बसतात. त्या योगानें सारी पृथ्वी तडकते, फूटूं लागते. तिचा कठिणपणा चारी बाजूला पसरतो. 
तेथें मेरुची कोण गणना । कोण सांभाळिल कोणा ।
चंद्र सूर्य तारांगणा । मूस आली ॥ ९ ॥ 
९) तेथें मेरुची किंमत उरत नाहीं. कोणी कोणास सांभाळू शकत नाहीं. चंद्र, सूर्य व तारेायांच एकच गोळा होऊन जातो.    
पृथ्वीनें विरी सांडिली । अवघी धगधगायेमान जाली ।
ब्रह्मांडभटी जळोन गेली । येकसरां ॥ १० ॥
१०) मग भयंकर महावृष्टी होते. त्या पाण्यांत जळून राख झालेली पृथ्वी विरुन जाते. 
जळोनि विरी सांडिली । विशेष माहावृष्टी जाली ।
तेणें पृथ्वी विराली । जळामधें ॥ ११ ॥
११) भाजलेला चुना जसा पाण्यांत चट्दिशी विरतो, त्याचप्रमाणें पृथ्वी प्रलयकालच्या अतिवृष्टीमध्यें चटकन विरुन जाते.  
भाजला चुना जळीं विरे । तैसा पृथ्वीस धीर न धरे ।
विरी सांडूनिया त्वरें । जळीं मिळाली ॥ १२ ॥
१२) शेष, कूर्म, वराह गेल्यानें पृथ्वीचा आधार नाहींसा होतो. आपला कठिणपणा सोडून ती पाण्यांत विरुन जाते.  
शेष कूर्म वार्‍हाव गेला । पृथ्वीचा आधार तुटला ।
सत्व सांडून जळाला । मिळोन गेली ॥ १३ ॥
१३) शेष, कूर्म, वराह गेल्यानें पृथ्वीचा आधार नाहींसा होतो. आपला कठिणपणा सोडून ती पाण्यांत विरुन जाते. 
तेथें प्रळयेमेघ उचलले । कठिण घोषें गर्जिनले ।
अखंड विजा कडकडिले । ध्वनि घोष ॥ १४ ॥
१४) मग आकाशांत प्रलयकालचे प्रचंड ढग प्रगट होतात. त्याच्यां घर्षाणाचा भयंकर गडगडाट होऊन विजांचाही कडकडाचा आवाज सारखा चालू राहतो.  
पर्वतप्राये पडती गारा । पर्वत उडती ऐसा वारा ।
निबिड तया अंधकारा । उपमाचि नाहीं ॥ १५ ॥
१५) डोंगराएवढ्या मोठ्या गारा पडूं लागतात. डोंगर उडतात असा प्रचंड वारा वाहुं लागतो. अगदीं घनदाट अंधार पडतो त्याला कांहीं उपमाच देता येत नाहीं. 
सिंधु नद्या एकवटल्या । नेणो नभींहून रिचवल्या ।
संधिच नाहीं धारा मिळाल्या । अखंड पाणी ॥ १६ ॥
१६) आकाशांतून एकत्र आल्याप्रमाणें समुद्र व सार्‍या नद्या एकरुप होतात. वेगळें प्रवाहच न राहील्यानें सगळीकडें पाणीच पाणी दिसते. 
तेथें मच्छ कूर्म सर्प पडती । पर्वतासारिखे दिसती ।
गर्जना होतां मिसळती । जळांत जळें ॥ १७ ॥
१७) तेथें मासे, कासवें, सर्प असे सर्व डोंगरासारखें दिसतात. पण मोठ्या घनगर्जनेबरोबर ते पाण्यांत गडप होतात.  
सप्त सिंधु आवर्णीं गेले । आवर्णवेडे मोकळे जाले ।
जळरुप जालियां खवळले । प्रळयेपावक ॥ १८ ॥
१८) सात समुद्र सपाटून वाढतात. व त्यांचें प्रवाहपाणी आवरणोदकापर्यंत वाढते. त्यामुळें विश्र्वाला वेढणारे आवरणोदक मोकळें होतें. असें सर्व जलमय झाल्यानें प्रळयाग्नि खवळतो. 
ब्रह्मांडाऐसा तप्तलोहो । शोषी जळाचा समूहो ।
तैसें जळास जालें पाहो । अपूर्व मोठे ॥ १९ ॥
१९) विश्र्वाचा तापलेला जणुं काय लोखंडाचा गोळा सागळे पाणी शोषून टाकतो. पाण्याच्याबाबतींत असें विलक्षण घडतें.  
तेणें आटोन गेलें पाणी । असंभाव्य माजल  वन्ही ।
तया वन्हीस केली झडपणी । प्रंयवातें ॥ २० ॥
२०) प्रलयाग्निमुळें सारें पाणी आटतें आणि मग कल्पना करतांच येणार नाहीं येवढी आग भडकते. त्या आगीला प्रलयकालचा वायु झडपतो.
दीपस पालव घातला । तैसा प्रळयेपावक विझाला ।
पुढें वायो प्रबळला । असंभाव्य ॥ २१ ॥
२१) पदराच्या वार्‍यानें जसा दिवा विझावा तसा प्रलयाग्नि विझतो. मग अकल्पनीय असा वारा वाहुं लागतो.  
उदंड पोकळी थोडा वारा । तेणें वितळोन गेला सारा  ।
पंचभूतांचा पसारा । आटोपला ॥ २२ ॥
२२) पण आकाशाची पोकळी अनंत असून वारा थोडा असतो. त्यामुळें वारा त्या पोकळींत नाहींसा होतो. अशा प्रकारें पंचमहाभूतांचा पसारा संपतो. 
महद्भूत मूळमाया । विस्मरणें वितुळें काया ।
पदार्थमात्र राहावया । ठाव नाहीं ॥ २३ ॥
२३) अंतरात्मा व मूळमाया यांना स्वतःचा विसर पडतो. आणि त्यांचा आकार किंवा देह वितळून जातो. मग कोणताही निर्मित पदार्थ राहण्यास जागाच उरत नाहीं. 
दृश्य हलकालोळें नेलें । जड चंचळ वितुळलें ।
याउपरी शाश्र्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २४ ॥  
२४) याप्रमाणें संहाराच्या धूमाकुळांत सारें दृश्य नाहींसे होते. जड व चंचळ वितळून जाते. सगळें नाहींसे झाल्यावर जें केवळ उरतें तेंच परब्रह्म होय.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रळयेनाम समास चौथा ॥
Samas Choutha Pralay Nirupan 
समास चौथा प्रलयनिरुपण 


Custom Search

Monday, February 26, 2018

Samas Tisara Ubharani Nirupan समास तिसरा उभारणी निरुपण


Dashak Terava Samas Tisara Ubharani Nirupan 
Samas Choutha Ubharani Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about the world and creation of it.
समास तिसरा उभारणी निरुपण
श्रीराम ॥
ब्रह्म घन आणि पोकळ । आकाशाहून विशाळ ।
निर्मळ आणि निश्र्चळ । निर्विकारी ॥ १ ॥
१) ब्रह्म सर्वत्र गच्च भरलेले आहे. पण तें अगदी सूक्ष्म असल्यानें पोकळ वाटते. आकाशाहून विशाल असणारे हे ब्रह्म निर्मळ, निश्र्चळ व निर्विकार आहे.  
एैसेंचि असतां कित्येक काळ । तेथें आरंभला भूगोळ ।
तया भूगोाळाचें मूळ । सावध ऐका ॥ २ ॥
२) अशा अवस्थेंत खूप काळ गेल्यावर त्याच्यामध्यें विश्र्नि र्निमितीला आरंभ झाला. त्या विश्र्वाचें मूळ लक्षपूर्वक ऐकावें. 
परब्रह्म असतां निश्र्चळ । तेथें संकल्प उठिला चंचळ ।
तयास बोलिजे केवळ । आदिनारायेण ॥ ३ ॥
३) परब्रह्म निश्र्चळपणें असतां त्यांत चंचळ संकल्प उठला त्याला आदिनारायण असें म्हणतात. 
मूळमाया जगदेश्र्वर । त्यासीच म्हणिजे शड्गुणैश्र्वर ।
अष्टधा प्रकृतीचा विचार । तेथें पाहा ॥ ४ ॥
४) मूळमाया, जगदीश्र्वर यांनाच षड्गुणेश्र्वर म्हणतात. अष्टधा प्रकृतीचा विचार तेथेंच आरंभतो.
ऐलिकडे गुणक्षोभिणी । तेथें जन्म घेतला त्रिगुणीं ।
मूळ वोंकाराची मांडणी । तेथून जाणावी ॥ ५ ॥
५) त्याच्या अलीकडे गुणक्षोभिणी असते. कारण सत्व,रज व तम हे तीन गुण तेथें जन्मतात. मूळ ओंकाराची मांडणी तेथूनच होते.   
अकार उकार मकार । तिनी मिळोन वोंकार ।
पुढें पंचभूतांचा विस्तार । विस्तारला ॥ ६ ॥
६) अकार, उकार व  मकार मिळून ओंकार घडतो. त्यानंतर पंचभूतांचा सारा विस्तार सर्वत्र पसरतो.  
आकाश म्हणिजेतें अंतरात्म्यासी । तयापासून जन्म वायोसी ।
वायोपासून तेजासी । जन्म जाला ॥ ७ ॥
७) अंतरात्म्याला आकाश म्हणतात. त्यापासून वायुचा जन्म होतो. व वायुपासून तेजाचा जन्म होतो. 
वायोचा कातरा घसवटे । तेणें उष्णें वन्ही पेटे ।
सूर्यबिंब तें प्रगटे । तये ठांई ॥ ८ ॥
८) एकमेकासमोरुन येणारे वायुचे दोन प्रवाह एकमेकांशी घासतात व त्या घर्षणांतून अग्नि पेट घेतो. सूर्यबिंब तेथें प्रगट होते.  
वारा वाजतो सीतळ । तेथें निर्माण जालें जळ ।
तें जळ आळोन भूगोळ । निर्माण जाला ॥ ९ ॥
९) जो थंड वारा वाहातो त्यांतून पाणी उत्पन्न होते. तें पाणी थिजते. त्यापासून पृथ्वी बनते. 
त्या भूगोळाचे पोटीं । अनंत बीजंचिया कोटी ।
पृथ्वी पाण्या होता भेटी । अंकुर निघती ॥ १० ॥
१०) पृथ्वीच्या पोटीं कोट्यावधि बिजें असतात. पाण्याशी त्यांचा संबंध आल्यावर त्यांतून अंकुर फुटतात. 
पृथ्वी वल्ली नाना रंग । पत्रें पुष्पांचे तरंग ।
नाना स्वाद ते मग । फळें जालीं ॥ ११ ॥
११) त्यांतून नाना प्रकारचे वृक्ष व वेली, नाना रंगाची पानें, फुलें आणि नाना प्रकारचे स्वाद असणारीं फळें निर्माण होतात.  
पत्रें पुष्पें फळें मुळें । नाना वर्ण नाना रसाळें ।
नाना धान्यें अन्नें केवळें । तेथून जालीं ॥ १२ ॥
१२) नाना रंगांची व रसांनी भरलेलीं पानें, फुलें, फळें, आणि मुळें त्याचप्रमाणें नाना प्रकारची अन्नधान्यें सारी त्या अंकुरापासूनच निर्माण होतात. 
अन्नापासून जालें रेत । रेतापासून प्राणी निपजत ।
ऐसी हे रोकडी प्रचित । उत्पत्तीची ॥ १३ ॥
१३) अन्नापासून वीर्य उत्पन्न होतें आणि वीर्यापासून प्राणी निपजतो. हा तर जीचवाच्या उत्पत्तीचा प्रत्यक्ष अनुभव आहे. 
अंडज जारज श्र्वेतज उद्वीज । पृथ्वी पाणी सकळांचे बीज ।
ऐसें हें नवल चोज । सृष्टिरचनेचें ॥ १४ ॥ 
१४) अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज हे चारी प्रकारचे जीवप्राणी, पृथ्वी व पाणी यांच्यापासून उपजतात. या सृष्टिरचनेचें हेंच मोठें नवल आहे.  
च्यारि खाणी च्यारि वाणी । चौर्‍यासि लक्ष जीवयोनी ।
निर्माण झाले लोक तिनी । पिंडब्रह्मांड ॥ १५ ॥
१५) चार खाणी, चार वाणी, चौर्‍याांशी लक्ष जीवयोनी, तिन्ही लोक आणि सारें पिंडब्रह्मांड अशा प्रकारें निर्माण झालें. 
मुळीं अष्टधा प्रकृती । अवघें पाण्यापासून जन्मती ।
पाणी नस्तां मरती । सकळ प्राणी ॥ १६ ॥
१६) मुळांत अष्टधा प्रकृति आहे. तिच्यांतील पंचभूतांमध्यें पाणी असतें. त्या पाण्यापासून सारें जीव जन्मतात. पाणी मिळाले नाहीं तर सारें जीव मरतात. 
नव्हें अनुमानचें बोलणें । याचा बरा प्रत्यय घेणें ।
वेदशास्त्रें पुराणें । प्रत्ययें घ्यावीं ॥ १७ ॥
१७) हें कांहीं नुसतें कल्पनेनें बोलणें नाहीं. पाण्यापासून सारे जीव जन्मतात याचा अनुभव घेऊन पाहावा. वेद, शास्त्र व पुराणें प्रत्यक्ष अनुभवानें स्वीकारावी. 
जें आपल्या प्रत्यया येना । तें अनुमानिक घ्यावेन ।
प्रत्ययाविण सकळ जना । वेवसाये नाहीं ॥ १८ ॥
१८) जो सिद्धान्त आपल्या अनुभवास येत नाहीं. प्रत्यक्ष अनुभवाच्या परीक्षेला उतरत नाहीं, तो अनुमानानें स्वीकारु नये. जीवनांत व व्यवहारांत निर्णय घेतांना प्रत्यक्ष अनुभवावाचून दुसरें साधन नाही.
वेवसाये प्रवृत्ती निवृत्ती । दोहिंकडे पाहिजे प्रचिती ।
प्रचितीवीण अनुमानें असती । ते विवेकहीन ॥ १९ ॥
१९) व्यवहार प्रपंचाचा किंवा परमार्थाचा दोन्हीकडे अनुभवच पाहिजे. अनुभव न घेतां जे लोक नुसतें कल्पनेनें चालतात, तें विवेकहीन असतात.  
ऐसा सृष्टिरचनेचा विचार । संकळित बोलिला प्रकार ।
आतां विस्ताराचा संहार । तोहि ऐका ॥ २० ॥
२०) अशा रीतीनें विश्वरचना कशीं होतें हें थोडक्यांत वर्णन केलें. आतां या विश्व विस्ताराचा संहार कसा होतो तें ऐका.   
मुळापासून सवेटवरी । अवघा आत्मारामचि करी ।
करी आणि विवरी । येथेयोग्य ॥ २१ ॥
२१) अगदी प्रारंभापासून अखेरपर्यंत सगळें कांहीं आत्मारामच घडवतो. तो जसें घडवून आणतो तसाच तो सगळ्याचा उलगडा करतो. 
पुढें संव्हार निरोपिला । श्रोतीं पाहिजे ऐकिला ।
इतुक्याउपरी जाला । समास पूर्ण ॥ २२ ॥
२२) पुढें संहार सांगितला आहे. तो जरुर ऐकावा. येथें हा समास संपला. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उभारणीनिरुपणनाम समास तिसरा ॥
Samas Tisara  Ubharani Nirupan
समास तिसरा उभारणी निरुपण


Custom Search

Saturday, February 24, 2018

Samas Dusara Sarasar Nirupan समास दुसरा सारासार निरुपण


Dashak Terava Samas Dusara Sarasar Nirupan 
Samas Dusara Sarasar Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Sar and Asar. Samarth is asking us to think what is permanent and and what is temporary.
समास दुसरा सारासार निरुपण
श्रीरामसमर्थ ॥
ऐका सारासार विचार । उभारलें जगडंबर ।
त्यांत कोण सार कोण असार । विवेकें वोळखा ॥ १ ॥
१) आतां सारासार विचार ऐका. विश्र्वाचा हा जो मोठा पसारा समोर आहे, त्यांतून सार कोणतें व असार कोणतें हें विवेकानें ओळखावें.  
दिसेल तें नासेल । आणि येईल तें जाईल ।
जें असतचि असेल । तेंचि सार ॥ २ ॥
२) जें दिसतें तें नासतें, जें येतें तें जातें, हें असार होय. पण जें नेहमी सदैव आहेंच आहे तें सार होय.  
मागां आत्मानात्माविवेक बोलिला । अनात्मा वोळखोन सांडिला।
आत्मा जाणतां लागला । मुळींचा मूळतंतु ॥ ३ ॥
३) मागें आत्मानात्मविवेक सांगितला त्यांत जो अनात्मा त्याला ओळखून बाजूला काढला. आत्मा जाणून घेतां घेतां मुलांतील आरंभीचा धागा हाताला लागला. 
मुळीं जे राहिली वृत्ति । जाली पाहिजे निवृत्ति । 
सारासार विचार श्रोतीं । बरा पाहावा ॥ ४ ॥
४) वृत्ति मूळमायेपाशीं जाऊन बसली पण तेथून देखील ती निवृत्त झाली पाहिजे. यासाठीं श्रोत्यांनी सारासार विचारच केला पाहिजे.  
नित्यानित्य विवेक केला । आत्मा नित्यसा निवडिला । 
निवृत्तिरुपें हेत उरला । निराकारीं ॥ ५ ॥
५) नित्यानित्यविवेक बरोबर झाल्यानें नित्य अंतरात्मा निवडून तेथें वृत्ति चिकटवली, पण तेथून निवृत्त होऊन निराकारांत जावें हा हेतु शिल्लक राहतोच.   
हेत म्हणिजे तो चंचळ । निर्गुण म्हणिजे निश्र्चळ ।
सारासारविचारें चंचळ । होऊन जातें ॥ ६ ॥
६) हेतु हा अशाश्वतच असतो. आणि निर्गुण स्वरुप तर शाश्वत असतें. जें येतें तें जातें तें अशाश्वत असतें, हें सारासार विचार केल्यानें समजते.  
चळे म्हणोनि तें चंचळ । न चळे म्हणोनि निश्र्चळ ।
निश्र्चळीं उडे चंचळ । निश्र्चयेसीं ॥ ७ ॥
७) चळतें म्हणून त्यास चंचळ म्हणतात. चळत नाहीं म्हणून त्यास निश्र्चळ म्हणतात. निश्र्चळ स्वरुपांत चंचळतेला वाव नाहीं. हें निःसंशय समजावें.
ज्ञान आणि उपासना । दोनी येकचि पाहाना ।
उपासनेकरितां जना । जगोद्धार ॥ ८ ॥
८) अखेर ज्ञान व उपासना दोन्ही एकरुपच होतात. पण उपासनेमुळें जगाचा उद्धार होतों हें खरें. 
द्रष्टा साक्षी जाणता । ज्ञानधन चैतन्यसत्ता ।
ज्ञान देवचि तत्वता । बरें पाहा ॥ ९ ॥
९) द्रष्टा, साक्षी, जाणता, ज्ञानघन, चैतन्यसत्ता ज्ञान व देव ही सगळीं एकाच अंतरात्म्याची वेगवेगळीं नांवे आहेत. हें समजून घेणें जरुर आहे.  
त्या ज्ञानाचें विज्ञान होतें । शोधून पाहा बहुत मतें ।
चंचळ अवघें नासतें । येणें प्रकारें ॥ १० ॥
१०) या ज्ञानाचेच मग विज्ञान होतें. निरनिराळ्या अनेक मतांचा अभ्यास केला कीं असें आढळतें जेव्हां सारें चंचळ नाहींसे होतें तेव्हां ज्ञानाचे विज्ञान होते. 
नासिवंत नासेल किं नासेना । ऐसा अनुमानचि आहे मना ।
तरी तो पुरुष सहसा ज्ञाना । अधिकारी नव्हे ॥ ११ ॥
११) आत्मानात्मविवेकानें जें नाशवंत आहे असे ठरलें तें नाश पावतें किंवा नाहीं असा संदेह जोपर्यंत असतो तोपर्यंत माणूस ज्ञानाचा अधिकारी होत नाहीं.
नित्य निश्र्चये केला । संदेह उरतचि गेला ।
तरी तो जाणावा वाहावला । माहा मृगजळीं ॥ १२ ॥
१२) अनात्म नाशवंत आहे असा निश्र्चय नेहमी केला आणि तरीसुद्धा त्याबद्दल संशय राहीला, तर तो माणूस दृश्याच्या मोहांत अडकून वाहावला आहे असें समजावें.  
क्षयेचि नाहीं तो अक्षई । व्यापकपणें सर्वां ठाईं ।
तेथें हेत संदेह नाहीं । निर्विकारी ॥ १३ ॥
१३) परब्रह्माला कधीहीं क्षय नाहीं म्हणून तें अक्षय असतें. व्यापकपणें तें सर्वत्र भरुन राहीलेलें आहे. अशा त्या निर्विकार स्वरुपांत हेतु व संशय याला जागाच नाहीं. 
जें उदंड घनदाट । आद्य मध्य सेवट ।
अचळ अढळ अतुट । जैसें तैसें ॥ १४ ॥
१४) निश्चळ परब्रह्म अति विशाल आहे. आणि सगळीकडे अगदी दाटपणें भरुन आहे. आरंभ, मध्य व शेवट या तिन्ही अवस्थांत तें अगदी जसेंच्या तसें अचळ, अढळ व अतूट असतें. 
पाहाता जैसें गगन । गगनाहून तें सघन ।        
जनचि नाहीं निरंजन । सदोविरहदित ॥ १५ ॥
१५) त्याचा अनुभव आला म्हणजे तें आकाशासारखें वाटतें. परंतु आकाशापेक्षांही तें अधिक दाट आहे. आकाशाशिवाय एखादें ठिकाण सापडेल पण ब्रह्मविरहीत असें ठिकाण आढळणार नाहीं. ज्याच्या ठिकाणीं प्राण्यांचा संबंध नाहीं असें तें निरंतर निरंजनपणानें असतें.  
चर्मचक्षु ज्ञानचक्षु । हा तों अवघाच पूर्वपक्षु ।
निर्गुण ठाईंचा अलक्षु । लक्षवेना ॥ १६ ॥
१६) चर्मचक्षूनें अनुभव घेणें हीं देहबुद्धीची भूमिका, तर ज्ञानचक्षूनें अनुभव घेणें ही आत्मबुद्धीची भूमिका होय. पण या दोन्ही भूमिका ब्रह्मानुभवाच्या अलीकडील आहेत. निर्गुण ब्रह्मरुप हे स्वभावतःच जाणण्याच्या पलीकडे असल्यानें त्यास जाणूं म्हटलें तरी जाणता येत नाहीं.  
संगत्यागेंविण कांहीं । परब्रह्म होणार नाहीं । 
संगत्याग करुन पाहीं । मौन्यगर्भा ॥ १७  ॥
१७) मीपणाचा संपूर्ण त्याग झाल्यावाचून कोणालाही ब्रह्मस्वरुप होता येत नाहीं. म्हणून साधकानें मीपणाचा निःशेष त्याग करावा. आणि मौनगर्भ म्हणजे शब्दातीत असणारें परब्रह्म अनुभवावें.  
निर्शतां अवघेंचि निर्शलें । चंचळ तितुकें निघोन गेलें ।
निश्र्चळ परब्रह्म उरलें । तेंचि सार ॥ १८ ॥
१८) असाराचें निरसन करतां करतां सारें असार बाजूस सरलें, जेवढें अशाश्वत होतें, तें सगळें नाहीसें झालें; मगजें निश्र्चळ परब्रह्म उरलरं तेंच सार होय.  
आठवा देह मूळमाया । निर्शोन गेल्या अष्टकाया ।
साधु सांगती उपाया । कृपाळुपणें ॥ १९ ॥
१९) पिंडब्रह्मांडांच्या देहापैकी आठवा देह म्हणजे मूळमाया होय. तिच्यास आठही देहांचा निरास करण्याची तयारी झाल्यावर साधुपुरुष अतिकृपाळूपणें ब्रह्मज्ञानाचा उपाय सांगतात.  
सोहं हंसा तत्वमसी । तें ब्रह्म तूं आहेसी ।
विचार पाहातां स्थिति ऐसी । सहजचि होतें ॥ २० ॥
२०) सः अहं म्हणजे तो मी आहे, हंसः म्हणजे अहं सः म्हणजे मी तो आहे. तत्त्वमसि म्हणजे तें ब्रह्म तूंच आहेस. साधकानें सारासार विचार केल्यास आपलें ब्रह्मस्वरुप सहज अनुभवास येते.   
साधक असोन ब्रह्म उरलें । तेथें वृत्तिसुन्य जालें ।
सारासार विचारिलें । येणें प्रकारें ॥ २१ ॥
२१) साधकपणानें राहून संपूर्णसंग त्याग केला कीं केवल ब्रह्म उरतें. साधकाची वृत्तिशून्य अवस्था होते. सारासार विचारानें हेंच साधायचे असतें.  
तें तापेना ना निवेना । उजळेना ना नासेना ।
डहुळेना ना निवळेना । परब्रह्म तें ॥ २२ ॥
२२) तें परब्रह्म तापत नाहीं निवत नाहीं. तें चकचकीत होत नाहीं कीं काळवंडत नाहीं. तें ढवळून गढूळ होत नाहीं कीं निवळून स्वच्छ होत नाहीं. 
दिसेना ना भासेना । उपजेना ना काळवंडेना ।
तें येना ना जाईना । परब्रह्म तें  ॥ २३ ॥    
२३) तें इंद्रियांना दिसत नाहीं आणि मनाला भासत नाहीं. तें उत्पन्न होत नाहीं व नाश पावत नाहीं, तें येत नाहीं व जात नाही. 
तें भिजेना ना वाळेना । तें विझेना ना जळेना ।
जयास कोणीच नेईना । परब्रह्म तें ॥ २४ ॥
२४) तें भिजत नाहीं वा वाळत नाहीं, तें जळत नाहीं आणि विझत नाहीं, त्यास कोणीही कोठे नेऊं शकत नाहीं. 
जें सन्मुख चि चहुंकडे । जेथें दृश्य भास उडे ।
धन्य साधु तो पवाडे । निर्विकारीं ॥ २५ ॥
२५) चहुकडे जिकडे बघाल तिकडे तें समोर उभें राहातें. त्याच्या ठिकाणी सार्‍या दृश्याचा भास नाहींसा होतो. अशा त्या निर्विकार ब्रह्माशी तदाकार होतो तो मोठा साधु होय. 
निर्विकारी कल्पनातीत । तोचि वोळखावा संत ।
येर अवघेचि असंत । भ्रमरुप ॥ २६ ॥
२६) स्वतः कल्पनातीत होऊन जो निर्विकल्प ब्रह्मामध्यें लीन होतो तोच संत म्हणून ओळखावा. बाकीचे सगळे मायेच्या कक्षेंतील असंत समजावेत. ते भ्रमरुप असतात. 
खोटें सांडून खरें घ्यावें । तरीचं परीक्षवंत म्हणावें ।
असार सांडून सार घ्यावें । परब्रह्म तें ॥ २७ ॥ 
२७) जो खोटे बाजूल सारुन खरें ग्रहण करतो, त्याला परीक्षावंत म्हणतात. म्हणून जाणत्यानें भ्रमरुप असार टाकून परब्रह्मस्वरुप सार तें घ्यावें.
जाणतां जाणतां जाणीव जाते । आपली वृत्ति तद्रूप होते ।
आत्मनिवेदन भक्ति ते । ऐसी आहे ॥ २८ ॥
२८) सार जाणतां जाणतां अखेर आपली जाणीव नाहींशी होतें, वृत्ति ब्रह्मस्वरुपाशी तदाकार होतें. खरी आत्मनिवेदन भक्ति अशी आहे. 
वाच्यांशें भक्ति मुक्ति बोलावी । लक्ष्यांशें तद्रूपता विवरावी ।
विवरतां हेतु नुरावी । ते तद्रूपता ॥ २९ ॥
२९) भक्ति आणि मुक्ति यांचें शब्दांनीं वर्णन करावें. त्या शब्दांचा अर्थ ध्यानांत घेऊन तद्रूपता कशी असते तें बुद्धिनें आकलन करावें. त्यावर चिंतन करतांकरतां मी पण नाहींसें झालें की तद्रूपता साधते.  
सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप । स्वस्वरुप म्हणिजे आपलें रुप ।
आपलें रुप म्हणिजे अरुप । तत्वनिर्शनाउपरी ॥ ३० ॥
३०) जें परब्रह्म सद्रुप आहे व चिद्रूप आहे त्याच्याशी आपलें स्वस्वरुप तद्रूप आहे, पण सर्व तत्वांचें निरसन झाल्यावर आपलें रुप अरुपच आहे असा अनुभव येतो.    
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सारासारनिरुपणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara  Sarasar Nirupan 
समास दुसरा सारासार निरुपण


Custom Search

Thursday, February 22, 2018

Samas Pahila Aatmanatma Vivek समास पहिला आत्मानात्मविवेक


Dashak Terava Samas Pahila Aatmanatma Vivek 
Samas Pahila Aatmanatma Vivek, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Aatma and Anatma. Samarth is asking us to think what is real and what is not; What is permanent and what is temporary.
समास पहिला आत्मानात्मविवेक
श्रीरामसमर्थ ॥
आत्मानात्मविवेक करावा । करुन बरा विवरावा ।
विवरोन सदृढ धरावा । जीवामद्हें ॥ १ ॥
१) साधकाने आत्मानात्मविवेक करावा. त्या विवेकानें चांगलें विवरण करावें. असें विवरण केल्यावर मग तो विवेल अंतःकरणांत दृढपणें स्थिर ठेवावा.
आत्मा कोण अनात्मा कोण । त्याचें करावें विवरण ।
तेंचि आतां निरुपण । सावध ऐका ॥ २ ॥
२) आत्मा कोणता व अनात्मा कोणता याचें सूक्ष्म विवरण करावें. तेंच विवरण आतां लक्ष देऊन ऐकावें. 
च्यारि खाणी च्यारि वाणी । चौर्‍यासि लक्ष जीवप्राणी ।
संख्या बोलली पुराणीं । वर्तती आतां ॥ ३ ॥
३) जगामध्यें जें जीवप्राणी आढळतात त्यांच्या चार खाणी व चार वाणी मिळून चौर्‍यांशी लक्ष योनी आहेत. असें पुराणांतरीं वर्णन आहे. 
नाना प्रकारीचीं शरीरें । सृष्टींत दिसती अपारें ।
तयामधें निर्धारें । आत्मा कवणु ॥ ४ ॥
४) या चौर्‍यांशीं लक्ष योनींमध्यें अनेक प्रकारची शरीरें दिसतात. त्यांच्या अंतर्यामीं आत्मा कोणता तें निश्र्चयात्मक रीतीनें शोधून काढावें.  
दृष्टीमधें पाहातो । श्रवणामध्यें ऐकतो ।
रसनेमध्यें स्वाद घेतो । प्रत्यक्ष आतां ॥ ५ ॥
५) देहांत राहणारा आत्मा डोळ्यांतून पाहातो. कानांतून ऐकतो. जिभेंतून स्वाद घेतो. असें प्रत्यक्ष दिसतें.  
घ्राणामधें वास घेतो । सर्वांगीं तो स्पर्शतो ।
वाचेमधें बोलवितो । जाणोनि शब्द ॥ ६ ॥
६) तो नाकांतून वास घेतो. सर्वांगानें स्पर्श करतो. शब्द ओळखून वाणींतून बोलवितो.  
सावधान आणि चंचळ । चहुंकडे चळवळ ।
येकलाचि चालवी सकळ । इंद्रियेंद्वारा ॥ ७ ॥
७) आत्मा मोठा सावध असून चंचळ आहे. गतिमान आहे. इंद्रियांच्या द्वारां तो एकटा सर्व बाजूस सगळी हालचाल घडवून आणतो. 
पाये चालवी हात हालवी । भृकुटी पालवी डोळा घालवी ।
संकेतखुणा बोलवी । तोचि आत्मा ॥ ८ ॥
८) तों पायानें चालवतो, हात हलवतो, भुवया खालीवर करतो, डोळे झांकतो, तोच आत्मा संकेत, खुणा करुन मनांतील हेतु स्पष्ट करतो.  
धिटाई लाजवी खाजवी । खोंकवी वोकवी थुंकवी ।
अन्न जेऊन उदक सेवी । तोचि आत्मा ॥ ९ ॥
९) आत्माच धीटपणा देतो. तोच लाजवतो, खाजवतो, तसेच तोच खोकायला, ओकायला व थुंकायला लावतो. जेवण झाल्यावर आत्माच पाणी पिण्यास लावतो.
मळमूत्रत्याग करी । शरीरमात्र सावरी ।
प्रवृत्ति निवृत्ति विवरी । तोचि आत्मा ॥ १० ॥
१०) तोच आत्मा मलमूत्राचा त्याग करवतो. सर्व शरीराचा समतोल सावरुन धरतो. तोच प्रवृत्ति व निवृत्ति यांचे विवरण करतो. 
ऐके देखे हुंगे चाखे । नाना प्रकारें वोळखे।
संतोष पावे आणी धाके । तोचि आत्मा ॥ ११ ॥
११) तोच आत्मा ऐकत , पाहतो, हुंगतो, चाखतो, अनेक रीतीनें ओळखतो, आनंदी होतो आणि घाबरतो.  
आनंद विनोद उदेग चिंता । काया छ्याया माया ममता ।
जीवित्वें पावे नाना वेथा । तोचि आत्मा ॥ १२ ॥
१२) आनंद, विनोद, उद्वेग, चिंता वगैरे अनुभव तो आत्माच देतो. आत्म्याची छाया असणार्‍या देहाबद्दल खरेपणाचा भ्रम व ममता  तोच निर्माण करतो. जीवदशेमध्यें भोगावें लागणारें अनेक क्लेश तो आत्माच भोगतो. 
पदार्थाची आस्था धरी । जनीं वाईट बरें करी ।
आपल्यां राखे पराव्यां मारी । तोचि आत्मा ॥ १३ ॥
१३) अनेक पदार्थांची आसक्ति धरणारा, लोकांत बरीवाईट कर्में करणारा, आपल्या माणसास सांभाळणारा, आणि परक्यास मारणारा तो आत्माच होय.
युध्ये होतां दोहिंकडे । नाना शरीरीं वावडे ।
परस्परें पाडी पडे । तोचि आत्मा ॥ १४ ॥
१४)  जेव्हां एखादें युद्ध पेटतें तेव्हां दोन्ही बाजूंच्या अनेक शरीरांत तो आत्माच वावरतो.. एकमेकांशीं लढणार्‍या माणसांपैकी त्याच्यामुळें एक पाडतो व दुसरा त्याच्यामुळेंच पडतो.  
तो येतो जातो देहीं वर्ततो । हासतो रडतो प्रस्तावतो ।
समर्थ करंटा होतो । व्यापासारिखा ॥ १५ ॥
१५) तो देहांत येतो, देहांतून जातो व देहांत राहतो. तो हांसतो, रडतो व पश्र्चाताप पावतो. ज्याच्या त्याच्या व्यापाप्रमाणें तो आत्माच भग्यवान किंवा भाग्यहीन बनतो. 
होतो लंडी होतो बळकट । होतो विद्यावंत होतो धट ।
न्यायेवंत होतो उत्धट । तोचि आत्मा॥ १६ ॥
१६) तो आत्माच बलहीन, भ्याड किंवा बलवान होतो. विद्यासंपन्न किंवा धटिंगण बनतो. न्यायप्रिय किंवा उद्धट होतो.  
धीर उदार आणि कृपण । वेडा आणि विचक्षण ।
उछक आणि सहिष्ण । तोचि आत्मा॥ १७ ॥
१७) तो आत्माच धीर, उदार आणि कंजूष होतो. वेडा वा शाहाणा होतो. उश्रृंखल आणि सहनशील होतो. 
विद्या कुविद्या दोहिकडे । आनंदरुप वावडे ।
जेथें तेथें सर्वांकडे । तोचि आत्मा॥ १८ ॥
१८) विद्या आणि अविद्या दोन्हींमध्यें तो आत्माच असतो. आनंदरुपानें तो आत्माच जिकडेतिकडे सर्वांच्या ठिकाणीं वावरतो. 
निजे उठे बैसे चाले । धावे धावडी तोले । 
सोइरे धायेरे केले । तोचि आत्मा॥ १९ ॥ 
१९) तो आत्माच निजतो, उठतो, बसतो, चालतो, पळतो, पिटाळतो, डोलतो, तोलतो, आणि सोयरेधायरे जोडतो. 
पोथी वाची अर्थ सांगे । ताळ धरी गाऊं लागे ।
वाद वेवाद वाउगे । तोचि आत्मा॥ २० ॥ 
२०) तो आत्माच पोथी वाचतो व अर्थ सांगतो. ताल धरतो व गाणें गातो. आणि उगाच वादविवाद करत बसतो.  
आत्मा नस्तां देहांतरीं । मग तें प्रेत सचराचरीं ।
देहसंगें आत्मा करी । सर्व कांहीं ॥ २१ ॥
२१) देहांत जर आत्मा नसेल तर तें प्रेतच होते. या विश्र्वांत देहाच्यायोगें आत्मा सगळें कांहीं करतो. 
येकेंविण येक काये । कामा नये वायां जाये ।
म्हणोनि हा उपाये । देहयोगें ॥ २२ ॥
२२) देह आणि आत्मा यांपैकी एक असेल व त्याच्याबरोबर दुसरे नसेल तर दोन्ही कामास येत नाहींत. फुकट जातात. म्हणून आत्म्याचा देहाशी संयोग होणें हाच दोन्ही उपयोगी पडण्याचा मार्ग आहे. 
देह अनित्य आत्मा नित्य । हाचि विवेक नित्यानित्य ।
अवघें सूक्ष्माचें कृत्य । जाणती ज्ञानी ॥ २३ ॥
२३) देह नाशवंत आहे. तर आत्मा शाश्वत आहे. हें विचारानें पटणें याचे नांव नित्यानित्यविवेक होय. जगांतील सार्‍या घटना सूक्ष्म आत्म्याच्या सत्तेनेच चालतात. हीं गोष्ट ज्ञानी माणसें ओळखतात. 
पिंडी देहधर्ता जीव । ब्रह्मांडीं देहधर्ता शिव ।
ईश्र्वरतनुचतुष्टये सर्व । ईश्र्वर धर्ता ॥ २४ ॥
२४) पिंडाच्या दृष्टीनें देह धारण करणारा आत्मा तो जीव, तर ब्रह्मांडाच्या दृष्टीनें विश्व धारण करणारा आत्मा तो शिव होय. विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळप्रकृति या आपल्या चार देहांनीं ईश्र्वर सर्व विश्र्वाला धारण करतो. 
त्रिगुणापर्ता जो ईश्र्वर । अर्धनारीनटेश्र्वर ।
सकळ सृष्टीचा विस्तार । तेथून जाला ॥ २५ ॥
२५) तीन गुणांच्या पलीकडे असणारा जो ईश्र्वर किंवा अर्धनारीनटेश्र्वर, त्याच्यापासून संपूर्ण विश्र्वाचा विस्तार झालेला आहे. 
बरवें विचारुन पाहीं । स्त्री पुरुष तेथें नाहीं ।
चंचळरुप येतें कांहीं । प्रत्ययासी ॥ २६ ॥
२६) अर्धनारीनटेश्र्वर असें म्हणत असतां तेथें स्त्री व पुरुष असा भेद नसतो. हें नीट विचारानें समजून घ्यावें. त्या ठिकाणीं थोडे चंचळपण अनुभवास येते इतकेंच.    
मुळींहून सेवटवरी । ब्रह्मादि पिल्पीका देहधारी ।
नित्यानित्य विवेक चतुरीं । जाणिजे ऐसा ॥ २७ ॥
२७) अगदी मूळापासून ते शेवटपर्यंत किंवा ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत सगळे देहधारी आहेत. साकार आहेत. त्याला अनुसरुन शहाण्या माणसांनीं नित्य काय व अनित्य काय याचा विवेक करावा. 
जड तितुकें अनित्य । आणि सूक्ष्म तितुकें नित्य ।
याहिमध्यें नित्यानित्य । पुढें निरोपिलें ॥ २८ ॥
२८) जें जें जड तें तें अनित्य समजावें. जें जें सूक्ष्म आहे तें तें नित्य समजावें. यामधें अधिक खोलांत शिरुन आणिक नित्यानित्य विवेक कसा करावा तें पुढें सांगितलें आहें. 
स्थूळ सूक्ष्म वोलांडिलें । कारण माहाकारण सांडिलें ।
विराट हिरण्यगर्भ खंडिलें । विवेकानें ॥ २९ ॥
२९) या खोल विवेकांत स्थूल सूक्ष्म मागें टाकायचे, कारण माहाकारण देह मागें टाकायचे , विराट व हिरण्यगर्भसुद्धा ओलांडायचे. 
अव्याकृत मूळप्रकृती । तेथें जाऊन बैसली वृत्ती ।
तें वृत्ति व्हावया निवृत्ति । निरुपण ऐका ॥ ३० ॥
३०) अशा रीतीनें वृत्ति सूक्ष्म व विशाल होत अव्याकृत व मूळप्रकृतीशी जाऊन बसतें. त्या वृत्तिचीही निवृत्ति व्हायला पाहिजे. त्याचा उपाय ऐका.
आत्मानात्मविवेक बोलिला । चंचळात्मा प्रत्यया आला ।
पुढिले समासीं निरोपिला । सारासार विचार ॥ ३१ ॥
३१) या समासांत जो आत्मानात्मविवेक सांगितला त्याच्या योगानें चंचळ अंतरात्मा अनुभवास येतो. त्याच्या पलीकडे जाण्यास पुढील समासांत सारासार विचार सांगितला आहे.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मानात्मविवेकनाम समास पहिला ॥
Samas Pahila Aatmanatma Vivek 
समास पहिला आत्मानात्मविवेक


Custom Search

Tuesday, February 20, 2018

Samas Dahava UttamPurusha Nirupan समास दहावा उत्तमपुरुष निरुपण


Dashak Barava Samas Dahava UttamPurusha Nirupan 
Samas Dahava UttamPurusha Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Uttam Purusha. How those who are having knowledge should behave. He is required to use his knowledge to impart it with others.
समास दहावा उत्तमपुरुष निरुपण 
श्रीराम ॥
आपण येथेष्ट जेवणें । उरलें तें अन्न वाटणें ।
परंतु वाया दवडणें । हा धर्म नव्हे ॥ १ ॥
१) आपण यथेच्छ जेवावें. आपण जेवल्यावर जें अन्न उरलें असेल तें दुसर्‍यांना वाटावें. उरलेले अन्न वाया दवडणें हा कांहीं धर्म नव्हे. 
तैसें ज्ञाने तृप्त व्हावें । तेंचि ज्ञान जनास सांगावें ।
तरतेन बुडों नेदावें । बुडतयासी ॥ २ ॥
२) हें ज्याप्रमाणें तसेंच आपण स्वतः आत्मज्ञानाने तृप्त व्हावें, समाधान मिळवावें. मग त्या ज्ञानचा उपयोग करुन लोकांना शिकवावे. जो स्वतः उत्तम पोहतो व तरतो त्यानें बुडणार्‍या माणसाला वांचवावे व तारावें हें योग्य आहे.  
उत्तम गुण स्वयें घ्यावे । ते बहुतांस सांगावे ।
वर्तल्याविण बोलावे । ते शब्द मिथ्या ॥ ३ ॥
३) आधीं स्वतः उत्तम गुण अंगीं आणावेत आणि मग तें पुष्कळांना सांगावेत. त्या गुणांचे आचरण स्वतः न करतां जर लोकांना सांगितलें तर सांगणारा खोटे शब्द बोलतो.  
स्नान संध्या देवार्चन । येकाग्र करावें जपध्यान ।
हरिकथा निरुपण । केलें पाहिजे ॥ ४ ॥
४) ज्ञानी माणसानें आचार व उपासना सोडूं नये. स्नान, संध्या, देवाची पूजा, एकाग्र मनानें; जप, ध्यान, हरिकथा आणि निरुपण या सर्व गोष्टीं करणें जरुर आहे.  
शरीर परोपकारीं लावावें । बहुतांच्या कार्यास यावें ।
उणें पडों नेदावें । कोणियेकाचें ॥ ५ ॥
५) आपलें शरीर परोपकारांत झिजवावें. पुष्कळ लोकांची कामें करुन द्यावी. कोणाचेंहि उणे पडूं देऊं नये. 
आडलें जाकसलें जाणावें । यथानशक्ति कामास यावें ।
मृदवचनें बोलत जावें । कोणीयेकासी ॥ ६ ॥
६) ज्यांचें अडलें असेल तें ओळखावें. जो गांजला असेल त्याचे दुःख जाणून, शक्य असेल तितकें त्याचे काम करुन द्यावें. कोणीही माणूस असो त्याच्याशी मृदु शब्दांनी बोलण्याची सवय ठेवावी.   
दुसर्‍याच्या दुःखें दुःखवावें । परसंतोषें सुखी व्हावें ।
प्राणीमात्रास मेळऊन घ्यावें । बर्‍या शब्दें ॥ ७ ॥  
७)  दुसर्‍याच्या दुःखानें दुःखी व्हावें. तसेंच दुसर्‍याच्या संतोषानें सुखी व्हावें. गोड शब्द बोलून माणसांना आपलेसें करुन घ्यावें.    
बहुतांचे अन्याये क्ष्मावे । बहुतांचे कार्यभाग करावे ।
आपल्यापरीस व्हावे । पारखे जन ॥ ८ ॥
८) पुष्कळांना त्यांच्या अन्यायाची क्षमा करावी. पुष्कळ लोकांना त्यांच्या कामांत मदत करावी. परके लोक आपल्या बाजुला वळवून घ्यावेत. 
दुसर्‍यांचें अंतर जाणावें । तदनुसारचि वर्तावें ।
लोकांस परीक्षित जावें । नाना प्रकारें ॥ ९ ॥
९) दुसर्‍याच्या मनांत काय आहें तें ओळखून त्या धोरणानें वागावें. अनेक प्रकारें लोकांची परीक्षा करीत असावें. 
नेमकचि बोलावें । तत्काळचि प्रतिवचन द्यावें ।
कदापी रागास न यावें । क्ष्मारुपें ॥ १० ॥
१०) जरुर तेवढेंच बोलावें. कोणी प्रश्र्ण विचारला तर त्याचे उत्तर चटकन द्यावें. अंगीं क्षमा असावी तिच्या बळावर कधीहीं रागाच्या आधीन होऊं नये. 
आलस्य अवघाच दवडावा । येत्न उदंडचि करावा ।
शब्दमत्सर न करावा । कोणीयेकाचा ॥ ११ ॥ 
११) आळस संपूर्ण नाहींसा करावा. अगदीं खूप प्रयत्न करावा. कोणी एखादा वेडा वाकडा शब्द बोलला तर तेवढ्यावरुन त्याचा द्वेष करुं नये.       
उत्तम पदार्थ दुसर्‍यास द्यावा । शब्द निवडून बोलावा ।
सावधपणें करीत जावा । संसार आपला ॥ १२ ॥
१२) उत्तम पदार्थ आपण न घेतां दुसर्‍यास द्यावा. शब्द बोलतांना अगदी निवडून बोलावा. अगदी सावधपणें आपला संसार करावा. 
मरणाचें स्मरण असावें । हरिभक्तीस सादर व्हावें ।
मरोन कीर्तीस उरवावें । येणें प्रकारें ॥ १३ ॥
१३) आपण एक दिवस मरणार आहोत याची जाणीव विसरुं नये. हरिभक्तीला नेहमी तयार असावें. अशा रीतीनें आयुष्य जगावें व मेल्यावर आपली कीर्ति मागें राहूं द्यावी. 
नेमकपणें वर्तों लागला । तो बहुतांस कळों आला ।
सर्व आर्जवी तयाला । काये उणें ॥ १४ ॥
१४) आपल्या ध्येयाला अनुरुप अशा शिस्तीनें माणूस एकदां कां वागूं लागला म्हणजे तो पुष्कळ लोकांना माहीत होतो. सर्व लोक त्याचे चाहते होतात. मग त्याला कांहीं कमी पडत नाहीं. 
ऐसा उत्तम गुणी विशेष । तयास म्हणावें पुरुष ।
जयाच्या भजनें जगदीश । तृप्त होये ॥ १५ ॥
१५) अशा उत्तम गुणांनी जो संपन्न असतो त्याला उत्तम पुरुष म्हणावें. त्यानें केलेल्या भक्तीनें परमेश्र्वर तृप्त होतो. प्रसन्न होतो. 
उदंड धिःकारुन बोलती । तरी चळों नेदावी शांति ।
दुर्जनास मोळोन जाती । धन्य ते साधु ॥ १६ ॥
१६) कोणी कितीही अवहेलना करुन बोलला तरी उत्तम पुरुषानें आपली शांती भंगू देऊं नये. दुर्जनांशी जे समरस होऊं शकतात ते साधु पुरुष खरोखर धन्य समजावेत.   
उत्तम गुणी श्रृंघारला । ज्ञानवैराग्यें शोभला ।
तोचि येक जाणावा भला । भूमंडळीं ॥ १७ ॥
१७) जो पुरुष उत्तम गुणांचा प्रेमानें अंगीकार करतो, ज्ञानानें व वैराग्यानें जो खरोखर शोभतो, तोच एक पुरुष जगामध्यें खरोखर चांगला असतो.  
स्वयें आपण कष्टावें । बहुतांचें सोसित जावें ।
झिजोन कीर्तीस ञरवावें । नाना प्रकारें ॥ १८ ॥
१८) आपण स्वतः कष्ट करावें. पुष्कळांसाठीं पुष्कळ सोसावें. लोकांसाठीं नाना प्रकारें झिजून आपली कीर्ति मागे ठेवावी. 
कीर्ती पाहों जातां सुख नाहीं । सुख पाहातां कीर्ती नाहीं ।
विचारेंविण कोठेंचि नाहीं । समाधान ॥ १९ ॥
१९) कीर्ति हवी असेल तर देहाला सुख देऊन चालणार नाहीं. देहाला सुख देण्याची लालसा असेल तर कीर्ति मिळणार नाहीं. विचारांवाचून कोणालाही खरें समाधान मिळणार नाहीं. 
परांतरास न लावावा ढका । कदापि पडों नेदावा चुका ।
क्ष्मासीळ तयाच्या तुका । हानी नाहीं ॥ २० ॥
२०) दुसर्‍याचे अंतःकरण दुखवूं नये. आपल्याहातून कधीहिं गैर कृति घडूं नये. जो खरा क्षमाशील असतो त्याच्या मोठेपणास कधीहिं उणेपणा येत नाहीं. 
आपलें अथवा परावें । कार्य अवघेंच करावें ।
प्रसंगीं कामास चुकवावें । हें विहित नव्हे ॥ २१ ॥
२१) एखादे काम आपलें असो कीं दुसर्‍याचे असो तें अगदी मनापासून करावें. काम करण्याचा प्रसंगा आला असतां कामचुकारपणा करणें कांहीं बरोबर नव्हें.     
बरें बोलतां सुख वाटतें । हें तो प्रत्यक्ष कळतें ।
आत्मवत परावें तें । मानीत जावें ॥ २२ ॥
२२) गोड शब्द बोलण्यानें मनाला आनंद होतो. हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. यावरुन आपण दुसर्‍याला आपल्यासारखें मानायला शिकावें.     
कठिण शब्दें वाईट वाटतें । हें तों प्रत्ययास येतें ।
तरी मग वाईट बोलावें तें । काये निमित्य ॥ २३ ॥
२३) कोणी कठोर शब्द बोलला तर मनाला वाईट वाटतें हाहि प्रत्यक्ष अनुभव येतो. तर मग विनाकारण वाईट बोलूं नये हें उत्तम होय.  
आपणास चिमोटा घेतला । तेणें कासाविस जाला ।
आपणावरुन दुसर्‍याला । राखत जावें ॥ २४ ॥
२४) आपल्याला कोणी चिमटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो. हें लक्षांत ठेवून दुसर्‍याला दुःख देऊं नये. 
जे दुसर्‍यास दुःख करी । ते अपवित्र वैखरी । 
आपणास घात करी । कोणियेके प्रसंगीं ॥ २५ ॥
२५) ज्या बोलण्यानें दुसर्‍यास दुःख होतें, जी वाणी दुसर्‍यास दुःखी करते, ती वाणी अपवित्र होय. कोण्या एका प्रसंगी ती आपलादेखील घात करते. 
पेरिलें तें उगवतें । बोलण्यासारिखें उत्तर येतें ।
तरी मग कर्कश बोलावें तें । काये निमित्य ॥ २६ ॥
२६) जें बी पेरावें तेंच उगवते. आपण जसें बोलावें तसें उलट उत्तर येते. असें जर आहे तर मग विनाकारण कठोर व कटू शब्द न बोलणें हें उत्तम होय.   
आपल्या पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें ।
परंतु कष्टी करावें । हे राक्षेसी क्रिया ॥ २७ ॥ 
२७) आपण श्रेष्ठपदास चढून वैभव मिळवावें. त्या वैभवानें पुष्कळांना सुखी करावें. पण त्या वैभवाच्या जोरावर लोकांना दुःखी करणें हें राक्षसी होय.
दंभ दर्प अभिमान । क्रोध आणी कठिण वचन ।
हें अज्ञानाचें लक्षण । भगवद्गीतेंत बोलिलें ॥ २८ ॥
२८) दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर वाणी ही अज्ञानाची लक्षणें आहेत. असें भगवद्गीता सांगते. 
जो उत्तम गुणें शोभला । तोचि पुरुष माहा भला ।
कित्येक लोक तयाला । शोधीत फिरती ॥ २९ ॥
२९) वर सांगितलेल्या उत्तमगुणांनी जो शोभून दिसतो तोच खरा थोर पुरुष होय. अशा पुरुषाला लोक शोधीत येतात.
क्रियेवीण शब्दज्ञान । तेंचि स्वानाचें वमन ।
भले तेथें अवलोकन । कदापी न करिती ॥ ३० ॥
३०) क्रियाहीन नुसतें शब्दज्ञान हें कुत्र्याच्या ओकारीप्रमाणें अति किळसवाणें असते. चांगली माणसें त्याच्याकडे कधीं लक्षही देत नाहीत. 
मनापासून भक्ति करणें । उत्तम गुण अवश्य धरणें ।
तया माहांपुरुषाकारणें । धुंडीत येती ॥ ३१ ॥
३१) जो अगदी मनापासून भगवंताची भक्ति करतो आणि अगत्यानें उत्तमगुणांचा अभ्यास करतो, तो खरा थोर पुरुष असतो. अशा थोर पुरुषाला लोक शोधीत येतात.  
ऐसा जो माहानुभाव । तेणें करावा समुदाव ।
भक्तियोगें देवाधिदेव । आपुला करावा ॥ ३२ ॥
३२) असा जो थोर स्वानुभवी पुरुष असेल त्यानें लोकांना एकत्र आणून त्यांचे पुढारीपण करावें. लोकांना भक्तीच्या मार्गास लावून भगवंत आपलासा करुन घ्यावा. 
आपण आवचितें मरोन जावें । मग भजन कोणें करावें ।
याकारणें भजनास लावावे । बहुत लोक ॥ ३३ ॥
३३) समजा जर आपण असस्मात मरुन गेलेो तर भगवंताची भक्ति करणारा राहाणार नाहीं. म्हणून पुष्कळ लोक भगवंताच्या भजनाला लावावेत. 
आमची प्रतिज्ञा ऐसी । कांहीं न मागावें शिष्यासी ।
आपणामागें जगदीशासी । भजत जावें ॥ ३४ ॥
३४) आपण आपल्या शिष्यांजवळ कांहींहि मागायचे नाहीं अशी त्याची प्रतिज्ञा असते. तरी देखील तो एक गोष्ट मागतो; ती ही कीं आपल्या पश्र्चात शिष्यांनी भगवंताची भक्ति चालूं ठेवावी.
याकारणें समुदाव । जाला  पाहिजे मोहोछाव ।
हातोपातीं देवाधिदेव । वोळेसा करावा ॥ ३५ ॥
३५) हें साध्य होण्यासाठीं लोकसमुदाय तयार व्हायला पाहिजे. आणि मोठे उत्सव घडवून आणले पाहिजेत. मग परमार्थ पाहतां पाहतां आपल्यावर कृपा करील असें करणें शक्य होतें.  
आतां समुदायाकारणें । पाहिजेती दोनी लक्षणें ।
श्रोतीं येथें सावधपणें । मन घालावें ॥ ३६ ॥
३६) अशा प्रकारचा लोकसमुदाय तयार होण्यासाठीं पुढार्‍याच्या अंगीं दोन लक्षणें असावी लागतात. श्रोत्यांनीं मनापासून तीं सावधानतेनें ऐकावी. 
जेणें बहुतांस घडे भक्ति । ते हे रोकडी प्रबोधशक्ति ।
बहुतांचें मनोगत हातीं । घेतलें पाहिजे ॥ ३७ ॥
३७) रोकडी प्रबोधशक्ति हे पहिलें लक्षण तर पुष्कळ लोकांचें मनोगत हातीं घेणें, हें दुसरें लक्षण होय.  महंताच्या अंगीं उत्तम प्रकारचे वकृत्व असावें. आपला विषय उत्तमप्रकारें, सोपा करुन, रसभरित करुन लोकांपुढें मांडता आला पाहिजे. शिवाय माणसांशी संबंध येईल त्यांची निष्ठा आपल्यावर बसेल असें बोलणें, चालणें असलें पाहिजें.  
मागां बोलिले उत्तम गुण । तयास मानिती प्रमाण ।
प्रबोधशक्तीचें लक्षण । पुढें चाले ॥ ३८ ॥
३८) मागें जें उत्तम गुण सांगितलें ते ज्याच्या अंगीं आढळतात त्याला लोक मानूं लागतात. अशा पुरुषाच्या वकृत्वाला वजन येते. व त्यांच्या कार्याचा प्रसार होतो. 
बोलण्यासारिखें चालणें । स्वयें करुन बोलणें ।
तयाचीं  वचनें प्रमाणें । मानिती जनीं ॥ ३९ ॥
३९) जो पुरुष जसें बोलतो तसें वागतो, जो स्वतः आधी आचरण करतो व मग लोकांना तसें वागण्यास सांगतो, अशा पुरुषाच्या शब्दाला लोक प्रमाण मानतात. 
जें जें जनास मानेना । तें तें जनहि मानीना ।
आपण येकला जन नाना । सृष्टिमधें ॥ ४० ॥
४०) जी गोष्ट लोकांच्या मनाला पटत नाहीं ती गोष्ट लोक कधींहि प्रमाण मानीत नाहींत. " माझेंच म्हणणें खरें " असें जगांत चालत नाहीं. आपण एकाकी व जगांत पुष्कळ लोक आहेत. त्यामुळें आपण जगांत एकटे पडूं. 
म्हणोन सांगाती असावे । मानत मानत शिकवावे ।
हळु हळु सेवटा न्यावे । विवेकानें ॥ ४१  ॥   
४१) म्हणून लोकांना बरोबर घेऊन चालावें. क्रमाक्रमानें त्यांना शिकवावें. आणि विवेकानें त्यांना हळुहळु शेवटच्या पायरीपर्यंत न्यावें.  
परंतु हे विवेकाची कामें । विवेकी करील नेमें ।
इतर ते बापुडे भ्रमें । भांडोंच लागले ॥ ४२ ॥
४२) परंतु अशाप्रकारचें पुढारीपणाचे काम हें विवेकाचे आहे. जो खरोखरी विवेकी आहे तो हें बरोबर करतो. इतर बिचारे गैरसमजानें आपापसांत भांडत बसतात. 
बहुतांसीं भांडतां येकला । शैन्यावांचून पुरवला । 
याकारणें बहुतांला । राजी राखावें ॥ ४३ ॥
४३) सैन्यावांचून सेनापती जसा एकटा लढूं शकत नाहीं त्याचप्रमाणें जो पुढारी पुष्कळ लोकांशी भांडतो तो एकटा कार्य करुं शकत नाहीं. म्हणून त्यानें पुष्कळ लोकांना आपलेसे करुन ठेवावें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तमपुरुषनिरुपणनाम समास दहावा ॥
Samas Dahava UttamPurusha Nirupan
समास दहावा उत्तमपुरुष निरुपण 


Custom Search