Showing posts with label Dasbodha. Show all posts
Showing posts with label Dasbodha. Show all posts

Wednesday, July 4, 2018

Samas Dahava VimalBrahma Nirupan समास दहावा विमलब्रह्म निरुपण


Dashak Visava Samas Dahava VimalBrahma Nirupan 
Samas Dahava VimalBrahma Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us the Brahma. Brahma is Nirugun and Nirvikar. It is always there. It has no end. It surrounds everything and is everywhere. Name of this Samas is VimalBrahma Nirupan.
समास दहावा विमलब्रह्म निरुपण 
श्रीराम ॥
धरुं जातां धरितां न ये । टाकूं जातां टाकितां न ये ।
जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ॥ १ ॥
१) तें धरावें म्हटलें तर धरतां येत नाहीं, टाकण्याचा प्रयत्न केाला तर टाकतां येत नाहीं. हें परब्रह्म जिथें तिथें आहेच आहे. कधीं नाहीं असें होत नाही. 
जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख होतें ।
सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्यां ॥ २ ॥
२) जिकडे तिकडे आणि जेथें तेथें असणार्‍या या परब्रह्माकडून तोंड फिरवावें म्हटलें तर जिकडे तोंड फिरवावें तिकडे समोर येतेच. कोणत्याहि दिशेला तोंड फिरवावें तिकडे तें समोर येते. कांहीं केल्या त्यास चुकविता येत नाहीं. 
बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें ।
आकाश चहूंकडे पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३ ॥
३) एखादा बसलेला माणूस उठून गेला तर तेथें आकाश राहतेंच. कोणत्याहि दिशेला तोंड वळवलें तरी आकाश आपल्या तोंडासमोर असतें. 
जिकडे जिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशचि भोवतें ।
बळें आकाशाबाहेर तें । कैसें जावें ॥ ४ ॥
४) समजा एखादा प्राणी पळून जाऊं लागला, तो ज्या ज्या दिशेला पळेल त्या त्या दिशेला त्याच्या भोवतीं आकाश असतेंच. अगदी फार मोठा प्रयत्न करुनसुद्धा कोणालाहि आकाशाबाहेर जातां येत नाहीं.   
जिकडे तिकडे प्राणी पाहे । तिकडे तें सन्मुखचि आहे ।
समस्तांचे मस्तकीं राहे । माध्यानीं मार्तंड जैसा ॥ ५ ॥
५) प्राणि जिकडे जिकडे पहातो तिकडे तिकडे आकाश त्याच्या तोंडासमोर येतेच. मध्यान्हीचा सूर्य ज्याप्रमाणें सर्वांच्या डोक्यावर असतो त्याचप्रमाणें सर्वांच्या डोक्यावर आकाश असते.  
परी तो आहे येकदेसी । दृष्टांत न घडे वस्तुसी ।
कांहीं येक चमत्कारासी । देउनी पाहिलें ॥ ६ ॥
६) परंतु सूर्याचा हा दृष्टांत परब्रह्मास लागूं पडत नाहीं. सूर्य एकदेशी आहे. तर ब्रह्म सर्व दिशी आहे. ब्रह्माची कांहीं कल्पना यावी, यासाठीं हा चमत्कार सांगितला. एकच सूर्याचे बिंब अगदी कोट्यावधि लोकांना आपल्या डोक्यावर दिसतें. हा चमत्कारच आहे.  
नाना तीर्थें नाना देसीं । कष्टत जावें पाहाव्यासी ।
तैसें न लगे परब्रह्मासी । बैसले ठाईं ॥ ७ ॥
७) अनेक देशांमध्यें अनेक तीर्थें आहेत. तीं पहायची असतील तर कष्ट सोसून दूर जावें लागतें. पण परब्रह्म दर्शन करण्यास तसें करावें लागत नाहीं. बसल्या ठिकाणीं तें पहाता येते.  
प्राणी बैसोनीच राहातां । अथवा बहुत पळोन जातां ।रिकामें 
परब्रह्म तें तत्वतां । समागमें ॥ ८ ॥
८) समजा, एखादा प्राणी एका जागी बसून राहिला, नंतर तो पळत पळत दूर गेला. त्याच्या या दोन्ही अवस्थांमध्यें परब्रह्म अगदी त्याच्या बरोबर राहतें.  
पक्षी अंतराळीं गेलां । भोंवतें आकाशचि तयाला ।
तैसें ब्रह्म प्रााणीयाला । व्यापून आहे ॥ ९ ॥ 
९) एखादा पक्षी आकाशांत अगदी उंच उडाला. त्याच्याभोवतीं जिकडे तिकडे आकाशच असतें. त्याचप्रमाणें परब्रह्म प्राण्यांना सर्व बाजूनें व्यापून राहतें.
परब्रह्म पोकळ घनदाट । ब्रह्म सेवटाचा सेवट ।
ज्यासी त्यासी ब्रह्म नीट । सर्वकाळ ॥ १० ॥
१०) ब्रह्म पोकळ म्हणजे रिकामें आहे. पण तें अगदी दाट भरलेलें आहे. ब्रह्म पोकळ आहे याचा अर्थ ब्रह्माच्या ठिकाणीं त्याच्याखेरीज अन्य वस्तू नाहीं. म्हणून तें अगदी भरलेलें आहे. झाडून सगळ्यांचा शेवट अखेर ब्रह्मामध्येंच होतो. ज्याला त्याला सर्वकाळ ब्रह्म अगदी सरळ असतें.
दृश्या सबाहे अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं ।     
आ  रे त्या विमळाची सरी । कोणास द्यावी ॥ ११ ॥
११) या अवाढव्य ब्रह्मांडाच्या पोटांत अगदी गच्चपणें भरलेलें ब्रह्म दृश्यांच्या आंत बाहेर व्यापून आहे. त्या निर्मळ ब्रह्माची सर कोणालाहि येऊं शकत नाहीं. 
वैकुंठकैळासस्वर्गलोकीं । इंद्रलोकीं चौदा लोकीं ।
पन्नगादिकपाताळलोकी । तेथेंहि आहे ॥ १२ ॥
१२) वैकुंठ, कैलास, स्वर्गलोक, इहलोक, परलोक, इंद्रलोक, चौदालोक,महासर्पाचे पाताळ लोक या सर्व लोकांना ब्रह्म व्यापून राहिलेलें आहे. 
कासीपासून रामेश्र्वर । आवघें दाटलें अपार ।
परता परता पारावार । त्यास नाहीं ॥ १३ ॥
१३) काशीपासून रामेश्र्वरपर्यंत सर्व जागीं अपार ब्रह्म गच्चपणें भरलेले आहे. त्याच्यापलीकडे जावे म्हणून कितीही दूर गेले तरी त्याला शेवट नाहीं. त्यामुळें जेथें ब्रह्म नाहीं अशी जागाच नाहीं.
परब्रह्म तें येकलें । येकदांचि सकळांसी व्यापिले ।
सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठाईं ॥ १४ ॥
१४) परब्रह्म अगदी एकटे आहे, एकमेव व अद्वितीय आहे. त्यानें एकदांच सगळ्यांना व्यापून टाकलें आहे. सगळ्यांना स्पर्श करुन तें सगळ्या ठिकाणीं राहिलें आहे. 
परब्रह्म पाउसें भिजेना । अथवा चिखलानें भरेना ।
पुरामधें परी वाहेना । पुरासमागमें ॥ १५ ॥
१५) परब्रह्म पावसानें भिजत नाहीं किंवा चिखलानें माखलें जात नाहीं. पाण्याच्या पूरांतही तें वाहून जात नाहीं. 
येकसरें सन्मुख विमुख । वाम सव्य दोहिंकडे येक ।
आर्धऊर्ध प्राणी सकळीक । व्यापून आहे ॥ १६ ॥
१६) एकाच वेळीं तें समोर असतें व मागें असतें. उजव्या बाजूला असतें व डाव्या बाजूला असतें. खालीं असतें व वर असतें. सर्व प्राण्यांना तें सर्व बाजूंनी व्यापून राहतें.
आकाशाचा डोहो भरला । कदापी नाहीं उचंबळला ।
असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥ १७ ॥
१७) परब्रह्मानें जणू काय आकाशाचा डोह भरुन टाकला आहे. पण या डोहामधील पाणी कधी उचंबळत नाहीं. कल्पना करतां येत नाहीं अशा अफाट विस्तारानें तों डोह जिकडे तिकडे पसरला आहे.
येकजिनसी गगन उदास । जेथें नाहीं दृश्यभास । 
भासेंविण निराभास । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥ 
१८) ज्याच्या ठिाकाणी दृश्याचा यत्किंचित भास नाहीं, असें अगदी एकजिनसी शन्य आकाश कल्पावें. अशा प्रकारचें इंद्रियांना न भासणारें, मनाला आकलन न होणारें, जें आकाश तेंच परब्रह्म समजावें. आपल्या प्रत्ययाला येणार्‍या आकाशांतून सर्व दृश भास नाहींसा केल्यावर जें केवळ आकाश उरतें तेंच परब्रह्म होय. 
संतसाधुमहानुभावां । देवदानवमानवां ।
ब्रह्म सकळांसी विसांवा । विश्रांतिठाव ॥ १९ ॥
१९) संत, साधु, महात्मे, देव, दानव आणि मानव या सगळ्यांना परब्रह्म हेंच खर्‍या विश्रांतीचें ठिकाण आहे. त्याच्यापाशी सर्वांना विसावा मिळतो.  
कोणेकडे सेवटा जावें । कोणेकडे काये पाहावें ।
असंभाव्य तें नेमावें । काये म्हणोनी ॥ २० ॥
२०) कोणत्या बाजूला परब्रह्माचा शेवट आहे, कोणत्या बाजूला तें कसें पाहावें हें सांगणें अशक्य आहे. जें मुळांत अनंत आहे व अमर्याद आहे, त्याला कोणतीहि मर्यादा घालणें शक्य नाहीं. 
स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं येकासारिखें नव्हे ।
ज्ञानदृष्टीविण नव्हे । समाधान ॥ २१ ॥
२१) परब्रह्म स्थूळ नाहीं किंवा सूक्ष्महि नाहीं. या विश्र्वामधील कोणत्यही वस्तूसारखें तें नाहीं. फक्त ज्ञानदृष्टीला त्याचे स्वरुप आकलन होतें. आणि म्हणून ज्ञानदृष्टीनें मनाचे समाधान होतें.    
पिंडब्रह्मांडनिरास । मग तें ब्रह्म निराभास ।
येथून तेथवरी अवकास । भकासरुप ॥ २२ ॥
२२) पिंड व ब्रह्मांड हीं दोन्ही भासरुप आहेत. त्यांचा निरास झाला कीम ब्रह्म निराभास किंवा भासरहित होतें. मग येथून तेथपर्यंत नुसता रिकामा अवकाश अनुभवास येतो. 
ब्रह्म व्यापक हें तो खरें । दृश्य आहे तों हें उत्तरें ।
व्यापेंविण कोण्या प्रकारें । व्यापक म्हणावें ॥ २३ ॥
२३) ब्रह्म व्यापक आहे हें म्हणणें खरेंच आहे, पण जोपर्यंत व्याप्त दृश्य आहे तोपर्यंत हें बोलणें खरें असतें. ब्रह्माला व्यापून रहायला दृश्यच उरलें नाहीं तर मग ब्रह्म व्यापक आहे ही भाषाच संभवत नाहीं.  
ब्रह्मासि शब्दचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना ।
कल्पनेतीत निरंजना । विवेकें वोळखावें ॥ २४ ॥
२४) शब्द ब्रह्मापर्यंत पोचूं शकत नाहीं. मानवी कल्पना ब्रह्माची कल्पना करुं शकत नाहीं. अशा या कल्पनातीत निरंजन स्वरुपाला विवेकानें ओळखावें.  
शुद्ध सार श्रवण । शुद्ध प्रत्ययाचें मनन ।
विज्ञानीं पावतां उन्मन । सहजचि होतें ॥ २५ ॥
२५) सर्व साधनाचे रहस्य असेल तर तें अध्यात्म श्रवण होय. श्रवण करुन सतत मनन करावें आणि स्वतः अनुभव घ्यावा. स्वानुभव प्राप्त झाला कीं ज्ञानाचें विज्ञान होतें. आणि मग आपोआपच उन्मनी अवस्था होते. 
जालें साधनाचें फळ । संसार जाला सफळ ।
निर्गुणब्रह्म तें निश्र्चळ । अंतरीं बिंबलें ॥ २६ ॥
२६) ज्याला उन्मनी साधतें, त्यास त्याच्या साधनेचें फळ मिळतें. त्याचा संसार सफळ झाला. निश्र्चळ व निर्गुण ब्रह्म त्याच्या अंतर्यामी स्थिर झालें. 
हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा ।
साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥
२७) मायेचा हिशोब झाला. मायेचे देणें घेणें संपलें. कांहीहि बाकी राहिली नाहीं. मूळमायेपासून चारी खाणीपर्यंत सारीं तत्वें अशाश्वत आहेत. हें निश्र्चित ठरलें. साध्य पदरांत पडल्यानें साधनाला अवकाश उरला नाहीं. साधना आपोआपच विराम पावली.    
स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें ।
सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये ॥ २८ ॥
२८) स्वप्नांत जें जें पाहिलेले असतें तें सगळें जागेपणी नाहीसें होते. अशा रीतीनें सहजच अनिर्वाच्य स्वरुप बनल्यावर त्याबद्दल कांहीं बोलतां येत नाहीं.
ऐसें हें विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेंसी बाणावें ।
जन्ममृत्याच्या नांवें । सुन्याकार ॥ २९ ॥
२९) असें हें सगळें विवेकानें जाणावे. स्वतः अनुभव घ्यावा. त्या अनुभवांनी आत्मज्ञानाच्या खुणा अंगीं बाणाव्या. म्हणजे मग आपल्याला जन्म मृत्यु शून्यवत होतात. आपण अमृतपदास पोचतो.
भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें ।
समर्थकृपेचीं वचनें । तो हा दासबोध ॥ ३० ॥   
३०) श्रीरामरायानें भक्ताचा अभिमान धरला आणि त्याच्यावर कृपा केली. त्या समर्थाच्या कृपेनें हीं वचनें स्फुरलीं. त्या वचनांचा संग्रह म्हनजेच हा दासबोध होय.     
वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां शोध ।
मननकर्त्यास विशद । परमार्थ होतो ॥ ३१ ॥
३१) दासबोधाचे वीस दशक आहेत. तो श्रवण करुन त्यावर जो शोधपूर्वक मनन करील त्यास परमार्थ म्हणजे काय हें स्पष्टपणें कळेल.     
वीस दशक दोनीसें समास । साधकें पाहावें सावकास ।
विवरतां विशेषाविशेष । कळों लागे ॥ ३२ ॥
३२) दासबोधाचे हे वीस दशक आणि दोनशें समास साधकानें स्वस्थपणें आभ्यासावें. त्याच्यावर विचार केल्यास अधिकाधिक अर्थ कळूं लागेल.   
ग्रंथाचें करावें स्तवन । स्तवनाचें काये प्रयोजन ।
येथें प्रत्ययास कारण । प्रत्ययो पाहावा ॥ ३३ ॥
३३) ग्रंथाची स्तुति करण्याची पद्धत आहे. परंतु अशी स्तुति करण्याचे कारण नाहीं. या ठिकाणी अनुभव हा प्रधान आहे. ग्रंथामध्यें सांगितलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा.  
देहे तंव पांचा भूतांचा । कर्ता आत्मा तेथींचा ।
आणी कवित्वप्रकार मनुशाचा । काशावरुनी ॥ ३४ ॥
३४) देह तर पंचभूतांचा बनलेला आहे. अंतरात्मा हा तेथिल खरा कर्ता आहे. हें जर खरें तर कवित्वाचें कर्तेपण आत्म्याकडेच आहे. माणसाकडे नाहीं. 
सकळ करणें जगदीशाचें । आणी कवित्वचि काये मानुशाचें ।
ऐशा अप्रमाण बोलण्याचें । काये घ्यावें ॥ ३५ ॥
३५) जगामध्यें सगळें कर्तेपण जगदीश्वराचे आहे. अर्थांत कवित्वाचे कर्तेपण माणसाकडे असूं शकत नाहीं. माणसानें कवित्वाचे कर्तेपण स्वतःकडे घेणें अगदी अप्रमाण आहे.  
सकळ देह्याचा झाडा केला । तत्वसमुदाव उडाला ।
तेथें कोण्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ॥ ३६ ॥
३६) आपला देह संपूर्ण निरास केला म्हणजे तत्वांचा समुदाय उडून जातो. मग कोणत्याही वस्तूला आपलें म्हणतां येत नाहीं.
ऐसींहे विचाराचीं कामें । उगेंच भ्रमों नये भ्रमें ।
जगदेश्र्वरें अनुक्रमें । सकळ केलें ॥ ३७ ॥
३७) अशीं ही विचारांची कामें आहेत. माणसानें भ्रमांत पडून उगीच भटकूं नये. जगदीश्वरानें व्यवस्थितपणें क्रमाक्रमानें सगळें रचलें आहे. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विमळब्रह्मनिरुपणनाम समास दहावा ॥
॥ इति दासबोध ॥ 
Samas Dahava VimalBrahma  Nirupan
समास दहावा विमलब्रह्म निरुपण 


Custom Search

Tuesday, July 3, 2018

Samas Navava Sookshma Nirupan समास नववा सूक्ष्मनिरुपण


Dashak Visava Samas Navava Sookshma Nirupan 
Samas Navava Sookshma Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us the Antaratma i.e. Atma in our body. Name of this Samas is Sookshma Nirupan.
समास नववा सूक्ष्मनिरुपण
श्रीराम ॥
मृतिकापूजन करावें । आणी सवेंचि विसर्जावें ।
हें मानेना स्वभावें । अंतःकर्णासी ॥ १ ॥
१) मातीचा देव आणून त्याची पूजा करायची नंतर विसर्जन म्हणून त्यालाच टाकून द्यायचा. हें आपल्या अंतःकरणाला स्वाभाविकपणें योग्य वाटत नाहीं.
देव पूजावा आणी टाकावा । हें प्रशस्त न वटे जीवा ।
याचा विचार पाहावा । अंतर्यामीं ॥ २ ॥ 
२) ज्या देवाची पूजा करयची त्यालाच टाकून द्यायचा. हें माणसाच्या जीवाला प्रशस्त वाटत नाहीं. आपल्या मनांत याचा विचार करावा. 
देव करिजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं ।
म्हणोनि याचा कांहीं । विचार पाहावा ॥ ३ ॥
३) देव बनवतां येण्यासारखा नाहीं. तसाच तो टाकून देण्यासारखा पण नाहीं. म्हणून यावर कांहीं विचार करणें जरुर आहे.   
देव नाना शरिरें धरितो । धरुनी मागुती सोडितो ।
तरी तो देव कैसा आहे तो । विवेकें वोळखावा ॥ ४ ॥
४) देव अनेक देह धारण करतो. आणि धरल्यानंतर मागून तें टाकून देतो. देह धारण करणारा आणि देह सोडणारा हा देव कसा आहे, ते विवेकानें ओळखावें.   
नाना साधनें निरुपणें । देव शोधायाकारणें ।
सकळ आपुले अंतःकर्णे । समजले पाहिजे ॥ ५ ॥
५) देवाचा शोध कसा करावा हे सांगणारीं अनेक निरुपणें आहेत. तशीच अनेक साधनेंही आहेत. पण ती सगळी आपण आपल्या अंतःकरणानें समजून घेतली पाहिजेत.  
ब्रह्मज्ञानाचा उपाये । समजल्याविण देतां नये ।
पदार्थ आहे मा घे जाये । ऐसें म्हणावें ॥ ६ ॥ 
६)  ब्रह्मज्ञानाचा उपाय स्वतः समजून घ्यावा. तो स्वतःला समजल्यावांचून दुसरा कोणी देऊं शकत नाही. तो कांहीं असा पदार्थ नाहीं कीं, '" हा घेऊन जा "असें म्हणतां येईल.
सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रतक्ष भेटवावा देव ।
परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥ ७ ॥
७) सर्वसाधारण माणसाच्या मनांत असा हेतु असतो कीं, " मला देवाची प्रत्यक्ष भेट व्हावी " परंतु देवदर्शन करुन घेण्यास विवेकाचा उपाय कांहीं वेगळाच आहे. 
विचार पाहातां तगेना । त्यास देव ऐसें म्हणावेना ।
परंतु जन राहेना । काये करावें ॥ ८ ॥
८) विचारानें परीक्षण केलें असतां, जें शाश्वतपणें टिकत नाहीं त्यास देव म्हणता येत नाहीं. पण लोक ऐकत नाहींत ते अशाश्वतालाच देव म्हणतात. याला कांहीं इलाज नाहीं.
थोर लोक मरोनि जाती । त्यांच्या सुरता करुनी पाहाती ।
तैसीच आहे हेहि गती । उपासनेची ॥ ९ ॥
९) थोर माणसें मरुन गेल्यावर त्यांच्या मूर्ति करुन ठेवतात. व ती मूर्ति तो माणूस आहे असें समजतात. उपासनेच्या बाबतींत असाच प्रकार होतो. आपल्या कल्पनेनें देवाची मूर्ति करुन त्यासच सामान्य लोक देव समजतात. 
थोर व्यापार ठाकेना जनीं । म्हणोनि केली रखतवानी ।
राजसंपदा तयाचेनी । प्राप्त कैची ॥ १० ॥
१०) एखाद्या माणसाला मोठा व्यापार करणें जमेना, म्हणून त्यानें शाईचा व्यापार केला. तर त्या व्यापारांत त्याला राजासारखी संपत्ती मिळवणें कधींच शक्य नाही. उपासनेला हाच नियम लागूं आहे. खरा देव साध्य होत नाहीं म्हणून मातीच्या मूर्तिची उपासना करण्यानें खरें समाधान प्राप्त होणार नाहीं.  
म्हणोनि जितुका भोळाभाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव ।
अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥
११) म्हणून जेवढा भोळा भाव आहे तेवढा अज्ञानाचा स्वभाव समजावा. अज्ञानानें परमात्मस्वरुपाची प्राप्ती होणें शक्य नाहीं. दृश्य मिथ्या आहे. तें खरें मानणें हाच अज्ञानस्वभाव आहे. 
अज्ञानासी ज्ञान न माने । ज्ञात्यास अनुमान न माने ।
म्हणोनि सिद्धांचीये खुणें । पावलें पाहिजे ॥ १२ ॥
१२) अज्ञानी माणसाला ज्ञान मानवत नाहीं. तर ज्ञानी माणसाला केवळ तर्कवाद मानवत नाहीं. म्हणून जे साक्षात्कारी सिद्ध आहेत त्यांचे अनुभव प्रमाण धरुन त्यांच्या संकेतांनी आपण वागलें पाहिजे. आपले अनुभव संतांच्या अनुभवाशी जुळले पाहिजेत.     
माया सांडून मुळास जावें । तरीच समाधान पावावें ।
ऐसें न होतां भरंगळावें । भलतीकडे ॥ १३ ॥
१३) माया बाजूस टाकून मूळ परब्रह्मापर्यंत गेल्यावर खरें समाधान लाभतें. असें झालें नाहीं तर साधक भलतीकडेच भरकटतो. त्याला समाधान लाभत नाहीं.
माया उलंघावाकारणें । देवासी नाना उपाय करणें ।
अध्यात्मश्रवणपंथेंचि जाणे । प्रत्ययानें ॥ १४ ॥
१४) मायेचे उल्लंघन करतां यावें म्हणून भगवंतानें साधनेचे अनेक प्रकार निर्माण करुन ठेवलें आहेत. परंतु त्या सर्व प्रकारांत अध्यात्माचें श्रवणमनन ही सर्व श्रेष्ठ साधना आहे. साधकानें तसें करुन स्वतः अनुभव घेत पुढें जावें.
ऐसें न करितां लोकिकीं । अवघीच होते चुकामुकी ।
स्थिति खरी आणि लटकी । ऐसी वोळखावी ॥ १५ ॥
१५) या राजमार्गानें न जातां सामान्य माणसें अन्य उपाय करतात. त्यामुळे त्यांची व देवाची चुकामुक होते. साधना खरी कोणती व खोटी कोणती अशा रीतीनें ओळखावीं.    
खोट्याचे वाटे जाऊं नये । खोट्याची संगती धरुं नये ।
खोटें संग्रहीं करुं नये । कांहींयेक ॥ १६ ॥
१६) जें मिथ्या आहे त्याच्या वाटेनें जाऊं नये. त्याची संगत धरुं नये. कांहीहि मिथ्या संग्रही ठेवूं नये. 
खोटें तें खोटेंचि खोटें । खर्‍यासीं तगेनात बालटें ।
मन अधोमुख उफराटें । केलें पाहिजे ॥ १७ ॥
१७) जें मिथ्या आहे तें कोणत्याहि कालीं कोणत्याहि परिस्थितींत मिथ्याच राहणार हें खरें आहे. त्याच्यापुढें खोट्याचा टिकाव लागत नाहीं. खोट्यामधें गुंतलेले मन खर्‍याकडे नेण्यासाठीं त्यास उरफाटे केलें पाहिजे. बहिर्मुख मनाला अंतर्मुख केलें पाहिजे.  
अध्यात्मश्रवण करीत जावें । म्हणिजे सकळ कांहीं फावे ।
नाना प्रकारीचे गोवे । तुटोनी जाती ॥ १८ ॥
१८) अध्यात्म श्रवण करीत जावें. त्या योगानें सर्व गोष्टी हस्तगत होतात. अनेक प्रकारच्या गुंतागुंती उकलल्या जातात.  
सूत गुंतलें तें उकलावें । तैसे मन उगवावें । 
मानत मानत घालावें । मुळाकडे ॥ १९ ॥
१९) ज्याप्रमाणें सुताचा गुंता आपण उकलतो. त्याचप्रमाणें मनाचा झालेला गुंता उकलावा. मनाला हळूहळू मूळ परब्रह्माकडे वळवावे. मायेच्या पसार्‍यांत अनेक ठिकाणीं अनेक प्रकारें गुंतलेले मन क्रमाक्रमानें तेथून सोडवावे. त्यास अंतर्मुख करुन परब्रह्माकडे वाटचाल करण्याची हळुंहळुं सवय लावावी.   
सकळ कांहीं कालवलें । त्या सकळाचें सकळ जालें ।
शरीरीं विभागलें । सकळ कांहीं ॥ २० ॥   
२०) मूळ मायेंतील सगळीम तत्वें एकत्र मिसळली आहेत. त्या मिश्रणापासून विश्वांतील सर्व वस्तु बनल्या आहेत. सर्व प्रकारच्या शरीरांमध्यें तेंच मिश्रण विभागशः भरलेले आहे.  
काये तें येथेंचि पाहावें । कैसें तें येथेंचि शोधावें ।
सूक्ष्माचीं चौदा नांवें । येथेंचि समजावीं ॥ २१ ॥  
२१) हें मिक्षण कोणत्या तत्वांचे बनलेलें आहे व तें कसें बनतें हें या मानवदेहांतच शोधावें. सूक्ष्माची जी चौदा नांवें आहेत, ती येथेच समजून घ्यावी.  
निर्गुण निर्विकारी येक । तें सर्वां ठाईं व्यापक ।
देह्यामधें तें निष्कळंक । आहे कीं नाहीं ॥ २२ ॥
२२) सर्व ठिकाणीं व्यापून असणारें निर्गुण व निर्विकारी असें एकच परब्रह्म आहे. तें निष्कलंक स्वरुप या देहामध्यें आहे किंवा नाहीं याचा शोध घ्यावा.  
मूळमाया संकल्परुप । तें अंतःकर्णाचें स्वरुप ।
जड चेतवी चैतन्यरुप । तें हि शरीरीं आहे ॥ २३ ॥
२३) मूळमाया संकल्परुप आहे. अंतःकरणाचें तेंच स्वरुप आहे. जडाला चेतना देण्याचे चैतन्य तेंच आहे. संकल्प, अंतःकरण व चैतन्य तिन्ही या शरीरांतच आहेत.  
समानगुण गुणसाम्य । सूक्ष्म विचार तो अगम्य ।
सूक्ष्म साधु जाणते प्रणम्य । तया समस्तांसी ॥ २४ ॥
२४) या अवस्थेंत गुण समान असतात. ती गुणसाम्य अवस्था होय. या साम्यावस्थेचा विचार अतिशय सूक्ष्म व अगम्य आहे. जे साधुपुरुष ही सूक्ष्म अवस्था जाणतात, ते सर्वांना वंद्य असतात.    
द्विधा भासतें शरीर । वामांग दक्षणांग विचार ।
तोचि अर्धनारीनटेश्र्वर । पिंडीं वोळकावा ॥ २५ ॥
२५) आपल्या शरीराला डावा व उजवा असें दोन विभाग आहेत. पण दोन्ही जसें एकच रुप आहेत. त्याचप्रमाणें पिंडांत अर्धनारीनटेश्र्वर असतो हें ओळखावें.   
तोचि प्रकृतिपुरुष जाणिजे । शिवशक्ती वोळखिजे ।
शडगुणईश्र्वर बोलिजे । तया कर्दमासी ॥ २६ ॥
२६) तोच प्रकृतिपुरुष आहे. शिवशक्ती पण तोच आहे. त्याच मिश्रणाला षडगुणैश्वर सुद्धां म्हणतात. 
तयासीच म्हणिजे महत्तत्व । जेथें त्रिगुणाचें गूढत्व ।
अर्धमात्रा शुद्धसत्व । गुणक्षोभिणी ॥ २७ ॥
२७) त्रिगुण ज्यांत गुप्तरुपानें राहतात तें महत्तत्व देखील तेंच समजावें. अर्मात्रा, शुद्धसत्व आणि गुणक्षोभिणी तिन्जी एकाच मूळ तत्वांची नांवें आहेत. 
त्रिगुणें चालतें शरीर । प्रतक्ष दिसतो विचार ।
मुळींच्या कर्दमाचें शरीर । ऐसें जाणावें ॥ २८ ॥
२८) तीन गुणांच्या मिश्रणानें आपलें शरीर चालतें. हीं गोष्ट तर प्रत्यक्षच दिसते. मूळच्या मिश्रणाचे बनलेले हें शरीर आहे, असें यावरुन समजावें. 
मन माया आणि जीव । हाहि दिसतो स्वभाव ।
चौदा नामांचा अभिप्राव । पिंडीं पाहावा ॥ २९ ॥
२९) मन, माया आणि जीव या तीन गोष्टी तर शरीराचा स्वभावच आहे. अशा रीतीनें पिंडामध्यें चौदा नावांचा संकेत पहावा. त्यांचें अस्तित्व समजावें.  
पिंड पडतां अवघेंचि जातें । परंतु परब्रह्म राहातें ।
शाश्र्वत समजोन मग तें । दृढ धरावें ॥ ३० ॥
३०) पिंड पडला कीं हें सगळें जातें. परंतु परब्रह्म तेवढें राहातें. तें शाश्वत आहे. असें जाणून घट्ट धरुन ठेंवावें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मनिरुपणनाम समास नववा ॥
Samas Navava Sookshma Nirupan 
समास नववा सूक्ष्मनिरुपण


Custom Search

Monday, July 2, 2018

Samas Aathava Dehekshetra Nirupan समास आठवा देहेक्षेत्र निरुपण


Dashak Visava Samas Aathava Dehekshetra Nirupan 
Samas Aathava Dehekshetra Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us the Deha i.e. our body. Name of this Samas is Dehekshetra Nirupan.
समास आठवा देहेक्षेत्र निरुपण
श्रीराम ॥
विधीप्रपंचतरु वाढला । वाढतां वाढतां विस्तीर्ण जाला ।
फळेम येता विश्रांती पावला । बहुत प्राणी ॥ १ ॥
१) ब्रह्मदेवाच्या प्रपंचाचा वृक्ष वाढला. त्याची वाढ होतां होतां तो फारच विस्तारला. नंतर त्यास फळें आलीं. त्यावेळीं पुष्कळ प्रान्यांना समाधान मिळालें. 
नाना फळें रसाळें लागलीं । नाना जिनसी गोडीस आलीं ।
गोडी पाहावया निर्माण केलीं । नाना शरीरें ॥ २ ॥
२) या प्रचंड वृक्षाला अनेक रसाळ फळें लागली आहेत. त्यांची गोडी अनेक पदार्थांमध्यें अनुभवास येते. ती गोडी चाखण्याकरितां अनेक शरीरें निर्माण झालीं. जीवाला पहावेसें वाटलें म्हणून डोळे निर्माण झालें. ऐकावेसे वाटलें म्हणून कान निर्माण झालें. चाखावेसेम वाटलें म्हणून जीभ निर्माण झालीं. 
निर्माण जाले उत्तम विषये । शरीरेंविण भोगितां नये ।
म्हणोनी निर्मिला उपाये । नाना शरीरें ॥ ३ ॥
३) उत्तम विषय निर्माण केलेलें असलेम तरी शरीराशिवाय त्यांचा भोग घेता येत नाहीं. तें भोग भोगण्याचे साधन म्हणून अनेक प्रकारचीम शरीरें निर्माण झाली.
ज्ञानइंद्रियें निर्माण केलीं । भिन्न भिन्न गुणांचीं निर्मिलीं ।
येका शरीरासी लागलीं । परी वेगळालीं ॥ ४ ॥
४) पांच ज्ञानेंद्रियें निर्माण केलीं. पण प्रत्येकाचा गुण निराळा आहे. ती सारीं एकाच शरीरांत राहतात. पण प्रत्येक इंद्रिय निराळे आहे. 
श्रोत्रइंद्रिईं शब्द पडिला । त्याचा भेद पाहिजे कळला ।
ऐसा उपाये निर्माण केला । इंद्रियांमधें ॥ ५ ॥
५) शब्द हा विषय कानाचा आहे. शब्दांचे भेद कळण्याची योजना, व्यवस्था कानाच्या ठिकाणीं केलेली आहे. 
त्वचेइंद्रियें सीतोष्ण भासे । चक्षुइंद्रियें सकळ दिसे ।
इंद्रियांमधें गुण ऐसे । वेगळाले ॥ ६ ॥
६) त्वचेनें थंडपणा व गरमपणा याचे ज्ञान होतें. डोळ्यांनी सगळें पाहातां येते. ज्ञानेंद्रियांमध्यें अशा प्रकारचे वेगळे वेगळे गुण आहेत. 
जिव्हेमधें रस चाखणें । घ्राणामधें परिमळ घेणें ।
इंद्रियांमधें वेगळाल्या गुणें । भेद केले ॥ ७ ॥
७) जिभेनें रस चाखण्याचा गुण आहे. तर नाकांत वास घेण्याचा गुण आहे. अशा वेगवेगळ्या गुणांमुळें इंद्रियांत भेद झाला आहे.      
वायोपंचकीं अंतःकर्णपंचक । मिसळोनि फिरे निशंक ।
ज्ञानइंद्रियें कर्मइंद्रियें सकळिक । सावकास पाहे ॥ ८ ॥
८) अंतःकरणपंचक प्राणपंचकांत मिसळतें आणि निःशंकपणें शरीरांत वावरते. ज्ञानेंद्रियें व कर्मेंद्रियें यांचीं कार्ये सगळी अशा रीतेेनें स्वस्थपणें पाहावीत.   
कर्मइंद्रियें लागवेगीं । जीव भोगी विषयांलागीं ।
ऐसा हा उपाये जगीं । ईश्र्वरें केला ॥ ९ ॥ 
९) या कर्मेंद्रियांद्वारा जीव विषय भोगतो. ईश्र्वरानें जगांत हा असा उपाय करुन ठेवला आहे.   
विषय निर्माण जाले बरवे । शरीरेंविण कैसे भोगावे ।
नाना शरीराचे गोवे । याकारणें ॥ १० ॥
१०) भोगण्याचे विषय पुष्कळ उत्पन्न केलेलें आहेत. पण तें शरीरावांचून भोगता येत नाहींत. म्हणून नानाप्रकारची गुंतागुंतीची शरीरें ईश्र्वरानें निर्माण केलीं. 
अस्तीमांशाचें शरीर । त्यामधें गुणप्रकार ।
शरीरासारिखें यंत्र । आणीक नाहीं ॥ ११ ॥
११) शरीर हाडामांसाचे बनलेलें असतें. त्यामध्यें गुणांचे अनेक प्रकार असतात. या शरीरासारखें दुसरे यंत्र जगांत नाहीं. 
ऐसीं शरीरें निर्माण केलीं । विषयभोगें वाढविलीं ।
लाहानथोर निर्माण जालीं । येणें प्रकारें ॥ १२ ॥
१२) अशी ही शरीरें निर्माण केलीं. विषयांच्या भोगानें ती वाढविली. या रीतीनें त्यांच्यामधें लहान मोठा हा भेद निर्माण होतो.
अस्तिमांशाचीं शरीरें । निर्माण केली जगदेश्र्वरें ।
विवेकें  गुणविचारे । करुनियां ॥ १३ ॥
१३) जगदीश्र्वरानें ही अस्थिमांसाची शरीरें निर्माण केलीं. ती निर्माण करतांना विवेकानें गुणविचार करुन त्यांना निर्माण केलें.   
अस्तिमौंशाचा पुतळा । जेणें ज्ञानें सकळ कळा ।
शरीरभेद  वेगळा । ठाईं ठाईं ॥ १४ ॥
१४) शरीर म्हणजे अस्थिमांसाचा पुतळा असतो. पण त्यांत ज्ञान भरलेलें आहे. त्याच्या सामर्थ्यानें जीवाला सर्व कला साध्य होतात. परंतु ठिकठिकाणीं शरीरांच्यामधें भेद आढलतो. 
तो भेद कार्याकारण । त्याचा उदंड आहे गुण ।
सकळ तीक्ष्ण बुद्धीविण । कये कळे ॥ १५ ॥
१५) ज्या शरीरांत जेवढें ज्ञान असते, तेवढ्या कला त्यास साध्य होतात. शरीरांच्या ठिकाणीं हा जो भेद आढळतो त्याला देखील योग्य कारण आहे. त्या त्या भेदाचा मोठा उपयोग असतो. त्याच्या योगानेंच सर्व व्यवहार चालतात. पण तीक्ष्ण बुद्धिवांचून हें ध्यानांत येणार नाहीं. 
सकळ करणें ईश्र्वराला । म्हणोनी भेद निर्माण केला ।
ऊर्ध्वमुख होतां भेदाला । ठाव कैंचा ॥ १६ ॥
१६) ईश्र्वराला हे विचित्र विश्र्व निर्माण करायचे होतें. म्हणून त्यानें भेद निर्माण केला. ऊर्ध्वमुख होऊन पाहिलें तर भेदाला जागाच राहात नाहीं.
सृष्टिकर्णी आगत्य भेद । संव्हारें सहजचि अभेद ।
भेद अभेद हा संवाद । मायागुणें ॥ १७ ॥
१७) ही सृष्टि निर्माण करायची म्हणजे, भेद अवश्यकच होता. सृष्टीचा संहार केला कीं तेथें सहजच अभेद असतो. माया आहे तोपर्यंत भेद  व अभेद ही भाषा संभवते. 
मायेमधें अंतरात्मा । नकळे तयाचा महिमा ।
जाला चतुर्मुख ब्रह्मा । तोहि संदेहीं पडे ॥ १८ ॥
१८) मूळमायेंत अंतरात्मा आहे. त्याचा महिमा कळत नाहीं. ब्रह्मदेवाला चार तोंडें असूनदेखील अंतरात्मा त्याला संशयांत पाडतो. मानवी बुद्धीला तर अनेक प्रश्र्ण पडतात.
पीळ पेंच कडोविकडीं । तर्क तीक्ष्ण घडीनें घडी ।
मनासी होये तांतडी । विवरण करितां ॥ १९ ॥
१९) त्या अंतरात्म्याचा विचार करतांना पदोपदी तर्काचे अनेक प्रकार, पीळ, पेंच, तीक्ष्ण तर्क वापरुन देखील अमतरात्म्याच अंत लागत नाहीं. त्यावेळीं मानवी मन अगदी हतबल होऊन जाते. 
आत्मत्वें लागतें सकळ कांहीं । निरंजनीं हे कांहींच नाहीं ।
येकांतकाळीं समजोन पाहीं । म्हणिजे बरें ॥ २० ॥
२०) अंतरात्म्याचा विचार करतांना या सगळ्या गोष्टी लागतात. पण निरंजन व निर्गुण परब्रह्माच्या ठिकाणीं यांचा कांहींच उपयोग होत नाही. एकांतांत जाऊन विचार केला तरच हें सगळें ध्यानांत येते.
देहेसामर्थ्यानुसार । सकळ करी जगदेश्र्वर ।
थोर सामर्थ्यें अवतार । बोलिजेती ॥ २१ ॥
२१) जगामध्यें सर्व देहांमध्यें अंतरात्मा विभागलेला आही. प्रत्येकामध्यें त्याचा अंश आहे. ज्या देहाचें सामर्थ्य जेवढे असते तेवढेंच कार्य जगदीश्र्वर त्या देहाकडून करवून घेतो. ज्या देहामध्यें अतिशय थोर सामर्थ्य आढळतें त्यास अवतार असें म्हणतात. 
शेष कूर्म वर्‍हाव जाले । येवढे देहे विशाळ धरिले ।
तेणें करितां रचना चाले । सकळ सृष्टीची ॥ २२ ॥
२२) शेष, कूर्म, वराह यांचे देह फारच विशाल आहेत. त्यांच्या आधारावर सारी सृष्टि चालते.
ईश्र्वरें केवढें सूजगात्र केलें । सूर्यबिंब धावाया लाविलें ।
धुकटाकरवीं धरविलें । अगाध पाणी ॥ २३ ॥
२३) ईश्वराने केवढी करामत केली आहे. त्यानें सूर्याला आकाशंत धावावयास लावलें आहे.ढग म्हणजे धूर. पण त्याच्यामधें उदंड पाणी साठवलें आहे.   
पर्वताऐसे ढग उचलती । सूर्यबिंबासी आछ्यादिती ।
तेथें सवेंचि वायोची गती । प्रगट होये ॥ २४ ॥
२४) आकाशामध्यें पर्वतप्राय ढग उत्पन्न होऊन सूर्याला झांकून टाकतात. मग तेथें वायूची गति लगेच प्रगट होते. 
झिडकझिडकुं धांवे वारा । जैसा काळाचा म्हणियारा ।
ढग मारुनी दिनकरा । मोकळे करी ॥ २५ ॥
२५) जणूं कांहीं काळाच्या सेवकाप्रमाणें वारा झडझडून वाहूं लागतो. तो ढगाला मारुन टाकतो व सूर्याला मोकळे करतो.  
बैसती वीजांचे तडाखे । प्राणीमात्र अवचिता धाके ।
गगन कडकडून तडके । स्थळांवरी ॥ २६ ॥
२६) आकाशामध्यें मग विजांचा गडगडांट सुरु होतो. प्राण्यांच्या मनांत त्यामुळें भय निर्माण होते. आणि आकाश कडाडून पृथ्वीवर आदळल्यासारखें वाटते. 
येहलोकासी येक वर्म केलें । महद्भूते महद्भूतआळिलें ।
सकळां समभागें चालिलें । सृष्टिरचनेसी ॥ २७ ॥ 
२७) या दृश्य विश्र्वामधें ईश्र्वरानें असें एक वर्म ठेवले आहे कीं, एक महाभूत दुसर्‍या महाभूतस आवरतें. म्हणून सर्व महाभूतांच्या सम प्रमाणानें सृष्टीचा व्यवहार व्यवस्थितपणें  चालतो. 
ऐसे अनंत भेद आत्मयाचे । सकळ जाणती ऐसे कैचें ।
विवरतां विवरतां मनाचे । फडके होती ॥ २८ ॥
२८) अंतरात्म्याचे अशा प्रकारें अनंत भेद आहेत. ते सगळे भेद जाणणारा कोणीच नाहीं. त्या भेदांचें विवरण करतां करतां मानवी मनाच्या चिंध्या होतात. 
ऐसी माझी उपासना । उपासकीं आणावी मना ।
अगाध महिमा चतुरानना । काये कळे ॥ २९ ॥
२९) माझी उपासना ही अशी आहे. जे उपासक असतील त्यांनी तिच्यावर विचार करवा. त्या उपासनेचा महिमा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला देखील कळणार नाहीं. 
आवाहन विसर्जन । हें चि भजनाचें लक्षण ।
सकळ जाणती सज्जन । मी काये सांगों ॥ ३० ॥   
३०) आवाहन आणि विसर्जन हेंच भजनाचें लश्रण आहे. संत सज्जन हें जाणतात. मी अधिक सांगण्याची गरज नाहीं.          
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसमवादे देहेक्षेत्रनिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava Dehekshetra Nirupan
समास आठवा देहेक्षेत्र निरुपण


Custom Search

Sunday, July 1, 2018

Samas Satava Aatma Nirupan समास सातवा आत्मा निरुपण


Dashak Visava Samas Satava Aatma Nirupan 
Samas Satava Aatma Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us the vitues of Aatma. Name of this Samas is Aatma Nirupan.
समास सातवा आत्मा निरुपण 
श्रीराम ॥
अनुर्वाच्य समाधान जालें । तें पाहिजे बोलिलें ।
बोलिल्यासाठीं समाधान गेलें । हें तो घडेना ॥ १ ॥
१) आत्मसाक्षात्कार होऊन शब्दांनीं सांगता न येणारे समाधान प्राप्त झालें. तरी पण तें सांगितलें पाहिजे. कारण या समाधानाचे शब्दांनी वर्णन केलें तर तर तें समाधान नाहींसें झालें असें कधी होत नाही.  
कांहीं सांडावें लागत नाहीं । कांहीं मांडावें लागत नाहीं ।
येक विचार शोधून पाहीं । म्हणिजे कळे ॥ २ ॥
२) समाधान प्राप्त करुन घेण्यासाठीं कांहीं सोडावें लागत नाहीं. व कांहीं नवीन मांडावें लागत नाहीं. एका विचारानें शोध घेतला म्हणजे तें कळतें. 
मुख्य कासीविश्र्वेश्र्वर । श्र्वेतबंद रामेश्र्वर ।
मलकार्जुन भीमाशंकर । गुण आत्मयाचे ॥ ३ ॥
३) मुख्य काशीविश्र्वेश्र्वर, मग सेतुबंध रामेश्र्चर, मल्लिकार्जुन, भीमाशंकर,  
जैसीं मुख्य बारा लिंगें । यावेगळीं अनंत लिंगें ।
प्रचित जाणिजेत जगें । गुण आत्मयाचे ॥ ४ ॥
४) अशीं मुख्य बारा ज्योतिर्लिंगें आहेत. त्याशिवाय आणखी पुष्कळ लिंगें आहेत. त्यांची प्रचीति अनेक लोकांना येते. पण हें आत्म्याचे गुण आहेत.
भूमंडळीं अनंत शक्ति । नाना साक्षात्कार चमत्कार होती ।
नाना देवांच्या सामर्थ्यमूर्ती । गुण आत्मयाचे ॥ ५ ॥  
५) पृथ्वीवर अनंत शक्ति आहेत. अनेकांना त्यांचा साक्षात्कार होतो. त्या शक्तीचें अनेक चमत्कार दृष्टीस पडतात. त्याचप्रमाणें अनेक देवांच्या सामर्थ्यसंपन्न मूर्ति आहेत. हे आत्म्याचे गुण आहेत.  
नाना सिद्धांची सामर्थ्यें । नाना मंत्रांचीं सामर्थ्यें ।
नाना मोहरेवल्लींत सामर्थ्यें । गुण आत्मयाचे ॥ ६ ॥ 
६) अनेक सिद्धपुरुषांचे सामर्थ्य, अनेक मंत्रांचें सामर्थ्य, सर्पाच्या मस्तकावर असणार्‍या मण्याचे सामर्थ्य, अनेक वनस्पतींचें सामर्थ्य, 
नाना तीर्थांची सामर्थ्यें । नाना क्षेत्रांची सामर्थ्यें ।
नाना भूंमडळीं सामर्थ्यें । गुण आत्मयाचे ॥ ७ ॥
७) अनेक तीर्थांचें व क्षेत्रांचे सामर्थ्य, जगांतील अनेक प्रकारचे सामर्थ्य अशी अनेक प्रकारची सामर्थ्यें आत्म्याचे गुण आहेत.
जितुके कांहीं उत्तम गुण । तितुकें आत्मयाचे लक्षण ।
बरें वाईट तितुकें जाण । आत्म्याचकरितां ॥ ८ ॥
८) जेवढे म्हणून उत्तम गुणआहेत, तेवढें सगळें आत्म्याचे लक्षण समजावें. परंतु जेवढें बरें वाईट आढळतें तेवढें सारें आत्म्यामुळें असतें. हें ओळखावें.   
शुद्ध आत्मा उत्तम गुणी । सबळ आत्मा अवलक्षणी ।
बरी वाईटआवघी करणी । आत्मयाची ॥ ९ ॥
९) आत्मा शुद्ध असला म्हणजे उत्तम गुण प्रगट करतो. तोच आत्मा मिश्रित असतो तेव्हां अवलक्षणें प्रगट करतो. बरी आणि वाईट करणी अखेर आत्म्याचीच असतें.  
नाना साभिमान धरणें । नाना प्रतिसृष्टी करणें ।
नाना श्रापउश्रापलक्षणें । आत्मयाचेनी ॥ १० ॥
१०) अनेक प्रकारचा अभिमान धरणें, प्रतिसृष्टि निर्माण करणें, अनेक प्रकारचे शाप देणें व उःशाप देणें ही सगळी आत्म्याची लक्षणें आहेत.  
पिंडाचा बरा शोध घ्यावा । तत्वांचा पिंड शोधावा ।
तत्वें आत्माशोधितां पिंड आघवा । कळों येतो ॥ ११ ॥
११) साधकानें आपल्या देहाचा शोध नीटपणें घ्यावा. त्यामध्यें स्थूल, सूक्ष्म तत्वें नीट शोधावीत. त्तवांचा शोध केल्यानें पिंडाची सबंध रचना कळून येते.
जड देह भूतांचा । चंचळ गुण आत्मयाचा ।
निश्र्चळ ब्रह्मावेगळा ठाव कैचा । जेथें तेथें ॥ १२ ॥
१२) तत्वांचा शोध केला तर असें आढळतें कीं, देह जड आहे. पंचभूतांचा आहे. देहामधील चंचळपणा किंवा जाणीव हा अंतरात्म्याचा गुण आहे. त्याचबरोबर निश्र्चळ परब्रह्म सर्वव्यापी असल्यानें तें नाहीं असें स्थानच नाहीं.
निश्र्चळ चंचळ आणी जड । पिंडीं करावा निवाड ।
प्रत्ययावेगळें जाड । बोलणें नाहीं ॥ १३ ॥
१३) आपला पिंड जड देह, चंचळ आत्मा आणि निश्र्चळ परब्रह्म ही तीन तत्वें मिळून बनतो. या तत्वांचा निवाडा आपल्या पिंडांतच करुन घ्यावा. आनुभव घेतल्यावांचून बोलण्यास वजन येत नाहीं.
पिंडामधून आत्मा जातो । तेव्हां निवाडा कळों येतो ।
देहे जड हा पडतो । देखतदेखतां ॥ १४ ॥  
१४) अंतरात्मा पिंडांतून निघून जातो. त्याप्रसंगी तत्वांचा निर्णय ध्यानांत येतो. आपल्या देखत पाहतां पाहतां देह जड होऊन पडतो.   
जड तितुके  पडिले । चंचळ तितुकें निघोनी गेलें ।
जडचंचळाचें रुप आलें । प्रत्ययासी ॥ १५ ॥
१५) जड तेवढें निश्र्चेष्ट पडतें.चंचळ तेवढें देह सोडून निघून जातें. पण या शनुभवावरुन जड व चंचळ यांचें स्वरुप आपल्या अनुभवास येते. 
निश्र्चळ आहे सकळां ठांई । हें तों पाहाणें नलगे कांहीं ।
गुणविकार तेथें नाहीं । निश्र्चळासी ॥ १६ ॥
१६) निश्चळ मुळीं सर्व ठिकाणीं व्यापून आहे. तें कांहीं पहावें लागत नाहीं. निश्चळ स्वरुपांत कोणताच गुणविकार नसतो. केव्हांहि व कोठेंहि तें अगदी जसेंच्या तसेंच राहतें. 
जैसें पिंड तैसें ब्रह्मांड । विचार दिसतो उघड ।
जड चंचळ जातां जाड । परब्रह्मचि आहे ॥ १७ ॥
१७) पिंडाच्या बाबतींत जें खरें तेंच ब्रह्मांडाच्या बाबतींत खरें असतें. हा विचार अगदी उघड आहे. स्पष्ट आहे. जड आणि चंचळ नाहींसें झालें कीं, सर्व व्यापी घनदाट परब्रह्म तेवढें शिल्लक उरते.
माहांभूतांचा खंबीर केला । आत्मा घालून पुतळा जाला ।
चालिला सृष्टीचा गल्बला । येणें रीतीं ॥ १८ ॥
१८) महाभूतांचा खंबीर केला-----म्हणजे रांधा करुन आंबवलेली कणिक----- त्यामध्यें आत्मा घातला, म्हणजे त्यामध्यें जाणीव घातली, तेव्हा त्याचा पुतळा तयार झाला. अशा रीतीनें पृथ्वीचा खटाटोप चालतो. 
आत्मा माया विकार करी । आळ घालिती ब्रह्मावरी ।
प्रत्ययें सकळ कांहीं विवरी । तोचि भला ॥ १९ ॥
१९) खरें म्हणजे माया व अंतरात्मा सर्व बदल घडवून आणतात. पण ब्रह्मावर त्याचा आरोप घातला जातो. जो कोणी या सगळ्या गोष्टींचें विचारानें विवरण करतों तोच मनुष्य उत्तम होय.  
ब्रह्म व्यापक अखंड । वरकड व्यापकता खंड ।
शोधून पाहातां जड । कांहींच नाहीं ॥ २० ॥
२०) ब्रह्माची व्यापकता अगदी अखंड आहे. त्यामुळें त्याच्या ठिकाणीं बदल घडण्यास अवकाश असतो. नीट विचार करुन शोधून पाहिलें तर यांत समजण्यास अवघड असें कांहीं नाहीं.    
गगनासी खंडता नये । गगनाचें नासेल काये ।
जरी जाला माहांप्रळये । सृष्टीसंव्हार ॥ २१ ॥
२१) आकाशाला खंडित करतां येत नाहीं. आकाशाला आपण भेगा पाडूं शकत नाहीं. म्हणून महाप्रलय होऊन सृष्टीचा संव्हार झाला तरी आकाशाचा मुळींच नाश होत नाहीं. 
जें संव्हारामध्यें सांपडले । तें सहजचि नासिवंत जालें ।
जाणते लोकीं उगविलें । पाहिजे कोडें ॥ २२ ॥
२२) जें संहातामधें सांपडते ते स्वाभाविकपणें नाशवंत असतें. विचारवंत जाणत्या लोकांनी हें कोडें सोडविलें पाहिजे. त्यांनीं या गूढ गोष्टीचा उलगडा करणें जरुर आहे. जड आणि चंचळ दोन्ही आलें आणि गेलें तरी परब्रह्म अगदी जसेंच्या तसें कसें राहतें, हें सृष्टीचें कोडें आहे. जाणत्या लोकांनी त्याचा उलगडा करावा. 
न कळतां वाटे कोडें । कळतां आवघें दिसें उघडें ।
म्हणोनी येकांतीं निवाडे । विचार पाहावा ॥ २३ ॥
२३) पण या विश्र्वरचनेची गंमत अशी आहे कीं, जोपर्यंत ती कळत नाहीं तोपर्यंत ती गूढ वाटते. पण ती कळली कीं तिच्यामध्यें कांहीं गूढ नाहीं, ती अगदी सरळ व उघडी आहे, असें कळतें. म्हणून एकांतामध्यें जावें आणि अत्यंत विचार करुन हें गूढ उकलावें.  
मिळतां प्रत्ययाचे संत । येकांतापरीस येकांत ।
केली पाहिजे सावचीत । नाना चर्चा ॥ २४ ॥
२४) स्वानुभवसंपन्न असा कोणी संत भेटला तर मोठ्या सावधान चित्तानें अनेक विषयांवर त्याच्याशी चर्चा करावी. कारण अशा संताची भेट म्हणजे एकांतापेक्षांही मोठा एकांत असतो.  
पाहिल्यावेगळें कळत नाहीं । कळतां कळतां संदेह नाहीं ।
विवेक पाहातां कोठेंचि नाहीं । मायाजाळ ॥ २५ ॥
२५) माणसानें शोधून पाहिलें नाहीं तर काहींच कळत नाहीं. त्याला कळूं लागले कीं कळतां कळतां त्याचे संदेह नाहींसे होतात. विवेकानें शोध केला तर मायाजाळ खरेंपणानें कोठेंच नाहीं अशी खात्री होते.   
गगनीं आभाळ आलें । मागुती सवेंचि उडालें ।
आत्म्याकरितां दृश्य जालें । उडेल तैसें ॥ २६ ॥
२६) आकाशांत अभ्र येतें आणि लगोलग लगेच नाहींसे होऊन जाते. या अंतरात्म्याच्या आश्रयानें हें दृश्य विश्र्व भासतें. पण विवेकानें भ्रम नाहींसा झाला कीं तें लगेच नाहींसे होतें. 
मुळापासून सेवटवरी । विवेकी विवेकें विवरी । 
तोचि निश्र्चय थावरी । चळेना ऐसा ॥ २७ ॥
२७) विवेकी साधक विवेकानें विवरण करतां करतां अगदीं मूळमायेपासून अगदी शेवटपर्यंत जातो. आपल्या सूक्ष्म विवेकानें अशाश्वत तत्वांना तो बाजूस सारतो आणि जो कधी चळणार नाहीं असा स्वस्वरुप निश्र्चय करतो. त्याचा आत्मनिश्र्चय अत्यंत स्थिर असतो. 
वरकड निश्र्चय अनुमानाचें । अनुमानें बोलतां काये वेंचे ।
जाणते पुरुष प्रचितीचे । ते तों मानीतना ॥ २८ ॥  
२८) बाकीचे निश्र्चय अनुमानाच्या बळावर केलेले असतात. अनुमानाच्या आधारानें बोलायला माणसाचें कांहींच जात नाहीं. पण जे साक्षात्कारी जाणते पुरुष असतात ते अनुमानाच्या बोलण्याला मानत नाहींत.    
उगें न बोलणें अनुमानाचें । अनुमानाचें कोण्या कामाचें ।
येथें सगट विचाराचें । काम नाहीं ॥ २९ ॥
२९) अनुमानाचें उगीच बोलणें कामास येत नाहीं. येथें सरसकट तर्क चालवून काम भागत नाहीं. माणसाचा तर्क देखिल अखेर दृश्यामधें घोटाळत असल्यानें, अतींद्रिय क्षेत्रामध्यें त्याला योग्य संचार करतां येत नाहीं. तेथें तो लटका पडतो. 
सगट विचार तो अविचार । कित्येक म्हणती येकंकार ।
येकंकार भ्रष्टाकार । करुं नये ॥ ३० ॥
३०) जो विचार दृश्यामधें उपयोगी पडतो तोच जर सूक्ष्माच्या क्षेत्रांत वापरला तर तेथें अविचार ठरतो. कांहीं लोक त्याला एकंकार म्हणतात. एकंकार हा भ्रष्टाचार असतो. आपण तो करुं नये.  
कृत्रिम अवघें सांडावें । कांहीं येक शुद्ध घ्यावें ।
जाणजाणों निवडावें । सारासार ॥ ३१ ॥
३१) जें कृत्रिम आहे तें सारें सोडावें. जें शुद्ध असेल तें घ्यावें. पुनः पुनः समजून सारासार निवडावें. कृत्रिम म्हणजे सत्य नसून सत्यासारखें दिसतें तें, अर्थात् मिथ्या होय.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मानिरुपणनाम समास सातवा ॥
Samas Satava Aatma Nirupan
 समास सातवा आत्मा निरुपण 


Custom Search