Saturday, September 11, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 19 Ovya 497 to 516 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १९ ओव्या ४९७ ते ५१६

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 19 
Ovya 497 to 516
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग १९ 
ओव्या ४९७ ते ५१६

आतां सुखेंसि जीविता । कैंची ग्राहिकी कीजेल पांडुसुता ।

काय राखोंडी फुंकितां । दिपु लागे ॥ ४९७ ॥

४९७) आतां अर्जुना, सुखानें जगणें, हा माल येथे  खरेदी कसा करतां येईल ? राखुंडी फुंकून कधीं दिवा लागला आहे काय ?  

अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रस घेइजे पिळुनी ।

तया नाम अमृत ठेउनी । जैसें अमर होणें ॥ ४९८ ॥

४९८) अर्जुना, विषाचे कांदे वाटून जो रस निघेल, तो पिळून घ्यावा आणि त्या रसाचें नांव अमृत ठेवून ( त्याच्या सेवनानें ) ज्याप्रमाणें अमर होण्याची खात्री धरावी,

तेविं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख ।

परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥ ४९९ ॥

४९९) त्याप्रमाणें विषयांमध्यें जें सुख आहे, तें निव्वळ कडेलोटीचें दुःखच आहे. परंतु काय करावें ? लोक मूर्ख आहेत. विषयांचें सेवन केल्यावांचून त्यांचें चालतच नाहीं. 

कां शीस खांडुनि आपुलें । पायींचां खतीं बांधिलें ।   

 तैसे मृत्युलोकींचें भलें । आहे आघवें ॥ ५०० ॥

५००) किंवा आपलें मस्तक तोडून तें पायात पडलेल्या जखमेवर जसें बांधावें, तसें या मृत्युलोकांतील सर्व व्यवहार चालले आहेत.

म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचां श्रवणीं ।

कैंची सुखनिद्रा आंथरुणी । इंगळांचां ॥ ५०१ ॥

५०१) एवढ्या करितां या मृत्यु लोकांत सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानानें ऐकतां येईल काय ? निखारे असणार्‍या अंथरुणावर आनंदानें झोप कोठून येणार ?

जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागीं ।

दुःख लेऊनी सुखाची आंगी । सळित जगातें ॥ ५०२ ॥

५०२) ज्या लोकांतील चंद्र क्षयरोगानें ग्रासलेला आहे, जेथें मावळण्याकरितां ( सूर्याचा ) उदय होत असतो; ( जेथें ) दुःख हें सुखाचा पोषाख करुन जगाला सारखें छळीत आहे; 

जेथे मंगळाचां अंकुरीं । सवेंचि अमंगळाची पडे पोरी ।

म्रुत्यु उदराचां परिवरीं । गर्भु गिंवसी ॥ ५०३ ॥

५०३) जेथें मंगळरुप अंकुराबरोबरच त्यावर अमंगळ गोष्टीची कीड पडते व ( जेथें ) पोटांत असतांनाच गर्भाला मरण घेरतें;  

जें नाहीं तयांतें चिंतवी । तंव तेंचि नेईजे गंधवीं ।

गेलियाची कवणे गांवीं । शुद्धि न लभे ॥ ५०४ ॥

५०४) जे प्राप्त नाहीं त्याचें चिंतन करावयास ( मृत्युलोकची वस्ती ) लावते. ( बरें, तें प्राप्त झालें ) तेव्हां त्याच वेळीं ते गंधर्व ( अदृश्य पुरुष ) नेतात. बरें, तें घेऊन कोणाच्या गांवाला गेले त्याचा शोधहि लागत नाहीं. 

अगां गिवसितां आघवां वाटीं । परतलें पाउलचि नाहीं किरीटी ।

निमालियांचिया गोठी । तियें पुराणें जेथिंचीं ॥ ५०५ ॥

५०५) अरे अर्जुना, सर्व वाटांनीं शोध केला, तरी मृत्युच्या मुखांत गेलेल्यांचें एकहि पाऊल परत फिरलेलें दिसत नाहीं व जेथलीं पुराणें, ही सर्व गेलेल्यांच्याच गोष्टींनीं भरलेली आहेत.    

जेथींचिये अनित्यतेची थोरी । करितया ब्रह्मयाचें आयुष्यवेरी ।

कैसें नाहीं होणें अवधारीं । निपटूनियां ॥ ५०६ ॥

५०६) या मृत्युलोकाची रचना करणार्‍या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जेथील क्षणभंगुरतेचा प्रभाव जाऊन भिडतो. अर्जुना, हें नाहींसे होणें, कसें सरसकट व्यापकआहे तें नीट ऐक. 

ऐसी लोकीची जिये नांदणूक । तेथ जन्मले आथि जे लोक ।

तयांचिये निश्र्चिंतीचें कौतुक । दिसत असे ॥ ५०७ ॥

५०७) ( अशा तर्‍हेची ) ज्या लोकांतील वागणूक आहे, त्या लोकांना ज्यांनी जन्म घेतला आहे, त्या लोकांना बेफिकीरपणाचें मोठे नवल दिसलें ! 

पैं दृष्टादृष्टींचिये जोडी- । लागीं भांडवल न सुटे कवडी ।

जेथ सर्वस्वें हानि तेथ कोडी । वेंचिती गा ॥ ५०८ ॥

अरे, ज्यापासून इहपरलोकींचा लाभ होतो, त्याकरितां ( हे लोक ) एक कवडीदेखील भांडवल सोडीत नाहींत व ज्या ठिकाणीं सर्वस्वाची हानि होते, तेथे कोट्यावधि रुपये खर्च करतात.   

जो बहुवें विषयविलासें गुंफे । तो म्हणती उवायें पडिला सापें ।

जो अभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥ ५०९ ॥

५०९) जो अनेक विषयविलासांत निमग्न असतो, तो सध्या सुखांत आहे. असें म्हणतात व जो लोभाने ग्रस्त झालेला आहे त्यास या जगांत ज्ञानी म्हणतात.

जयाचे आयुष्य धाकुटें होय । बळ प्रज्ञा जिरोनि जाय ।

तयाचे नमस्कारिती पाप । वडिल म्हणोनि ॥ ५१० ॥

५१०) ज्याचें आयुष्य थोडें उरलें आहे व त्याचप्रमाणें ज्यांची  बल आणि बुद्धि हीं नाहींशीं झालीं आहेत, अशा म्हातार्‍यास वडील म्हणून नमस्कार करतात.

जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव मोजें नाचती कोडें ।

आयुष्य निमालें अंतुलियेकडे । ते म्लानीचि नाहीं ॥ ५११ ॥

५११) जसजसें मूल वयानें वाढत जातें ( वयानें मोठे होतें ) तसतसें त्याचे आईबाप वगैरे आनंदानें व कौतुकाने नाचतात. पण वरुन जरी ( तें मूल ) मोठें वाढतांना दिसलें, तरी वास्तविक पाहिलें तर आंतून ( त्याचें ) आयुष्य सरुन जात आहे, त्याची ( त्यांना ) खंतीच नाहीं.   

जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचियाचि ऐसें 

कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥ ५१२ ॥

५१२) जन्मल्यापासून दिवसेंदिवस तें मूल अधिकाधिक काळाच्या  तावडींत जातें; असें असून ( आईबाप ) आनंदानें त्याच्या वाढदिवसाचा उत्सव करतात व आनंदप्रदर्शक गुढ्याहि उभारतात.   

अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती ।

परि असवें जात न गणिती । गहिंसपणें ॥ ५१३ ॥

५१३) अरे अर्जुना, कोणी कोणाला ‘ तूं मर ‘ असें म्हटलें तर तें त्यास सहन होत नाही  आणि ( त्याच्या निवृत्तीचा उपाय न करतां ) मेल्यावर रडत बसतात. पण असलेलें आयुष्य व्यर्थ जात आहे. हे त्यांना मूर्खपणानें समजत नाही.

दर्दुर सापें गिळिजतु आहु उभा । कीं तो मासिया वेटाळी जिभा ।

तैसे प्राणिये कवणा लोभा । वाढविती तृष्णा ॥ ५१४ ॥

५१४) बेडूक सापाकडून उभा गिळला जात असतांना देखील, तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्यकरितां जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो, तशाच तर्‍हेनें प्राणी कोणत्या लोभानें तृष्णा वाढवितात कोण जाणे !     

अहा कटा हें वोखटें । मृत्युलोकींचें उफराटें ।

एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं ॥ ५१५ ॥

५१५) अरेरे ! हे वाईट आहे ! मृत्यु लोकांतील सर्वच न्याय उफराटा आहे. अर्जुना, तू जरी येथें अकस्मात् जन्मला आहेस,                                  

तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग ।

जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥ ५१६ ॥

५१६) तरी या मृत्युलोकाच्या राहाटीतून झटकन मोकळा

 हो; आणि या भक्तीच्या मार्गाला लाग कीं, त्या भक्तीच्या

 योगानें माझें निर्दोष स्वरुप पाहशील.



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 18 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १८

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 18 
Ovya 475 to 496 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग १८ 
ओव्या ४७५ ते ४९६

मूळ श्लोक

किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।

अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥ ३३ ॥

३३) तर मग पुण्यशील ब्राह्मण, भक्त असलेले आणि ऋषींप्रमाणें आचरण करणारे राजे, हे उत्कृष्ट गति पावतील, यांत नवल काय ? अनित्य व सुखहीन असा हा ( मर्त्य ) लोक प्राप्त झाला असतां, तूं माझीच भक्ति कर.

मग वर्णामाजी छत्रचामर । स्वर्ग जयांचें अग्रहार ।

मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे ॥ ४७५ ॥

४७५) मग चारहि वर्णामध्यें छत्रचामराप्रमाणें सर्वांच्या वर असलेले, ज्यांना स्वर्ग हा निर्वाहाकरितां इनाम दिलेला आहे व जे वेदांतील मंत्ररुप विद्येचें माहेरघर आहेत, असे जे ब्राह्मण,   

जेथ अखंड वसिजे यागीं । जे वेदांची वज्रांगी ।

जयाचिये दिठीचां उत्संगीं । मंगळ वाढे ॥ ४७६ ॥

४७६) जेथें ( ज्या ब्राह्मणांच्या ठिकाणी ) नेहमीं यज्ञाचें राहणें असतें, जें वेदांचे अभेद्य चिलखत आहेत, ज्यांच्या दृष्टिरुप मांडीवर कल्याणाची वाढ होत राहते;

जे पृथ्वीतळींचे देव । जे तपोवतार सावयव ।

सकळ तीर्थांसि दैव । उदयलें जे ॥ ४७७ ॥

४७७) जें या पृथ्वीवरील देव आहेत, जे मूर्तिमंत तपाचें अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आलेलें देवच आहेत,

जयांचिये आस्थेचिये वोले । सत्कर्म पाल्हाळीं गेलें ।

संकल्पें सत्य जियालें । जयांचेनि ॥ ४७८ ॥

४७८) ज्यांच्या इच्छारुप ओढीनें, चांगलें कर्म हाच कोणी वेल, तो विस्तार पावला आहे; ज्यांच्या संकल्पानें सत्य जिवंत राहिलें आहे;

जयांचेनि गा बोलें । अग्नीसि आयुष्य जाहालें ।

म्हणोनि समुद्रें पाणी आपुलें । दिधलें यांचिया प्रीती ॥ ४७९ ॥

४७९) ज्यांच्या आशीर्वादानें अग्नीचें आयुष्य वाढलें, म्हणून समुद्रानें आपलें पाणी यांच्या प्रीतीकरितां दिले;

मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती । फेडोनि कौस्तुभ घेतलां हातीं ।

मग वोढविली वक्षस्थळाची वाखती । चरणरजां ॥ ४८० ॥

४८०) मी लक्ष्मीला सारुन पलीकडे केली, गळ्यांतील कौस्तुभ काढून हातांत घेतला व मग ज्यांच्या पायधुळीकरितां छातीचा खळगा पुढें केला,

आझूनि पाउलाची मुद्रा । मी हृदयीं वाहें गा सुभद्रा ।

जे आपुलिया दैवसमुद्रा । जतनेलागीं ॥ ४८१ ॥

४८१) अर्जुना, अजूनपर्यंत ( त्या ) पावलांची खूण मी हृदयाच्या ठिकाणीं वागवीत आहें, ती मी कां वागवितों म्हणून म्हणशील, तर आपल्या षड्गुणैश्वर्यभाग्यरुप समुद्राचें रक्षक होण्याकरितां; 

जयांचा कोप सुभटा । काळाग्निरुद्राचा वसौटा ।

जयांचां प्रसादीं फुकटा । जोडली सिद्धी ॥ ४८२ ॥

४८२) अर्जुना, ज्यांचा राग हा काळाग्नि नावांच्या प्रळयकाळाच्या रुद्रदेवतेचें वसतिस्थान आहे व ज्याच्या प्रसन्नतेनें अष्ट महासिद्धि फुकट म्हणजे आनायासें प्राप्त होतात;  

ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण । आणि माझां ठायीं अतिनिपुण ।

आतां मातें पावती हें कवण । समर्थणें ॥ ४८३ ॥

४८३) याप्रमाणें पुण्याईनें पूज्य आसलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणीं अतिशय तत्पर आहेत, ते मला प्राप्त होतात, हे काय आतां निराळें सिद्ध करावयास पाहिजे ?

पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें । शिवतिले निंब होते जे जवळे ।

तिहीं निर्जीवींही देवांचीं निडळें । बैसणीं केलीं ॥ ४८४ ॥

४८४) पाहा, चंदनाच्या झाडावरुन आलेल्या वार्‍यानें स्पर्श केलेलीं लिंबाचीं झाडें, जीं चंदनाच्या जवळ होतीं, ती निर्जीव ( अचेतन ) असूनहि त्यांनीं देखील देवांच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळविली. 

मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसें मनीं कैसेनि धरावें ।

अथवा पातला हें समर्थावें । तेव्हां कायि साच ॥ ४८५ ॥ 

४८५) मग खास चंदन ती जागा मिळविणार नाहीं, असें मनांत तरी कसें आणतां येईल ? किंवा, त्यास ती जागा मिळाली आहे, हें सिद्ध केलें तरच तें खरें ठरणार, असें आहे काय ?   

जेथ निववील ऐसिया आशा । हरें चंद्रमा आध ऐसा ।

वाहिजत असे शिरसा । निरंतर ॥ ४८६ ॥

४८६)  ज्या अर्थी शंकरांनी ( हालाहल विष प्राशन केल्यानें जी आग होत होती ती ) थंड करील या आशेनें अर्धा असा चंद्र मस्तकावर निरंतर धारण केला आहे,  

तेथ निवविता आणि सगळा । परिमळें चंद्राहूनि आगळा ।

तो चंदनु केविं अवलीळा । सर्वांगीं न बैसे ॥ ४८७ ॥

४८७) त्या अर्थी थंड करणारा आणि पूर्ण व सुवासानें चंद्रापेक्षां अधिक असा जो चंदन, तो सहज सर्वांगाच्या ठिकाणीं कसा बसणर नाहीं ?  

कां रथ्योदकें जियेचिये कासे । लागलिया समुद्र जालीं अनायासें ।

तिये गंगेसि काय अनारिसें । गत्यंतर असे ॥ ४८८ ॥

४८८) अथवा रस्त्यावरील पाण्यांनीं जिचा आश्रय केला असतां, जीं ( रथ्योदकें ) अनायासानें समुद्ररुप होतात, त्या गंगेला कांहीं समुद्राशिवाय दुसरी गति आहे काय ?    

म्हणोनि राजर्षि कां ब्राह्मण । जयां गती मती मीचि शरण ।

तयां त्रिशुद्धी मीचि निर्वाण । स्थितिही मीचि ॥ ४८९ ॥

४८९) म्हणून क्षत्रिय असून ऋषि झालेले असोत किंवा ब्राह्मण असोत, ज्यांच्या क्रियेला व बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे, त्यांना निश्चयानें मीच परमगति आहे; आणि त्यांचे असणेंहि मीच आहे.

यालागीं शतजर्जरें नावे । रिगोनि केविं निश्र्चिंत होआवें ।

कैसेनि उघडिया असावें । शतवर्षी ॥ ४९० ॥

४९०) याकरितां शेकडों ठिकाणीं खिळखिळ्या झालेल्या नांवेंत बसून स्वस्थ कसें राहावें ? व शस्त्रांचा वर्षाव होत असतां उघड्या अंगानें कसें असावें ?   

अंगावरी पडतां पाषाण । न सुवावें केविं वोडण ।

रोगें दाटलिया आणि उदासपण । वोखदेंसीं ॥ ४९१ ॥

४९१) अर्जुना, अंगावर धोंडे पडत असतांना मध्यें ढाल कशी घालूं नये ! रोगानें ग्रस्त झालें असतां औषधाविषयीं बेफिकीर  कसें राहावें ? 

जेथ चहूंकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजे केविं पांडवा ।

तेविं लोकां येऊनिया सोपद्रवां । केविं न भजिजे मातें ॥ ४९२ ॥

४९२) अर्जुना, जेथे चोहोंकडून वणवा लागला आहे, तेथून बाहेर कसें पडूं नये ? त्याप्रमाणें अनेक दुःखांनीं भरलेल्या या मृत्युलोकांत येऊन, मला कसें भजूं नयें बरें ?

अगा मातें न मजावयालागीं । कवण बळ पां आपुलां आंगीं ।

काइ घरीं कीं मांगीं । निश्र्चिंती केली ॥ ४९३ ॥

४९३) अरे अर्जुना, माझें भजन न करण्याला असें आपल्या ( प्राण्यांच्या ) अंगीं कोणतें सामर्थ्य आहे ? हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिकीर झाले आहेत ? 

नातरी विद्या कीं वसया । यां प्राणियांसि हा ऐसा ।

मज न भजतां भरवंसा । सुखाचा कोण ॥ ४९४ ॥

४९४) अथवा विद्येनें अथवा तारुण्यानें हे बेपर्वा होऊन बसले आहेत ? माझें भजन न करतां असें बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे ?

तरी भोग्यजात जेतुलें । तें एक देहाचिया निकिया लागलें ।

आणि येथ देह तंव असे पडिलें । काळाचां तोंडीं ॥ ४९५ ॥   

४९५) तर जेवढे विषयमात्र म्हणून आहेत, ते सर्व एका देहाच्याच बर्‍याकरितां ( सुखाकरितां ) उपयोगांत आले आहेत ! आणि या मृत्युलोकांत देह तर काळाच्या तोंडीं पडलेला आहे !

बाप दुःखाचें केणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले ।

तिये म्रुत्युलोकींचिये शेवटिले । येणे जाहालें हाटवेळे ॥ ४९६ ॥ब

४९६) ‘ बापरे बाप ! ‘ जेथें दुःखरुपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापानें मोजला जात आहे, अशा त्या मृत्युलोकांतील ( नरदेहरुपी ) शेवटच्या बाजाराच्या वेळीं येणें झालें आहे. 

Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 17 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १७

 

Shri Dnyaneshwari
Adhyay 9 Part 17
Ovya 443 to 474 
श्रीज्ञानेश्र्वरी
अध्याय ९ भाग १७ 
ओव्या ४४३ ते ४७४

मूळ श्लोक

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः ।

स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥ ३२ ॥

३२) कारण हे पार्था, माझा आश्रय केल्यावर स्त्रिया, वैश्य, शूद्र, त्याचप्रमाणे ज्यांचा जन्म पापयोनींत झाला आहे, असे हे सर्व उत्कृष्ट गतीला पावतात.

अगा नांवें घेतां वोखटीं । जे आघवेया अधमांचिये शेवटीं ।

तिये पापयोनीही कीरीटी । जन्मले जे ॥ ४४३ ॥

४४३) अर्जुना, ज्या जातीच्या नांवाचा उच्चार करणें वाईट आहे, ( फार काय सांगावें ? ) जी जात सर्व निकृष्टांत निकृष्ट आहे, त्या पापरुप जातीमध्यें जे जन्मास आले आहेत,

ते पापयोनि मूढ । मूर्ख ऐसे जे दगड ।

परि माझां ठायीं दृढ । सर्वभावें ॥ ४४४ ॥

४४४) ते पापी जातीतील अविवेकी, दगडाप्रमाणें मूर्ख असे असेनात, परंतु सर्व भावानें ज्यांची माझ्या ठिकाणीं पक्की भक्ति आहे,  

जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टि भोगी माझेंचि रुप ।

जयांचें मन संकल्प । माझाचि वाहे ॥ ४४५ ॥

४४५) ज्यांच्या वाणींत माझीच कथा आहे, ज्यांचे डोळे माझेंच रुप पाहण्यांत गुंतले आहेत, ज्यांचे मन माझ्याच विषयीचा विचार करीत राहतें ;

माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाहीं श्रवण ।

जयां सर्वांगीं भूषण । माझी सेवा ॥ ४४६

४४६) माझे गुण ऐकण्यावाचून ज्यांचे कान रिकामे नसतात, ज्यांच्या शरीरातींल प्रत्येक अवयवाला माझी कोणती ना कोणती तरी सेवा, भूषण होऊन राहिली आहे;

जयांचें ज्ञान विषो नेणे । जाणीव मजचि एकातें जाणे ।

जया ऐसें लाभे तरी जिणें । एर्‍हवीं मरण ॥ ४४७ ॥

४४७) ज्या भक्ताची ज्ञानवृत्ति विषयाचे ग्रहण न करतां मलाच एकाला जाणते, ज्यांना याप्रमाणें ( सर्व इंद्रियांच्या व्यापारद्वारां भगवंताची सेवा करणें ) मिळाले, तरच जगण्याची सार्थकता वाटते, नाहीं तर जगणें मरणप्राय वाटतें,       

ऐसा आघवाचि परी पांडवा । जिहीं आपुलिया सर्वभावा ।

जियावयालागीं बोलावा । मीचि केला ॥ ४४८ ॥

४४८) याप्रमाणें अर्जुना, सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींना जगण्याला मीच जीवन केलें आहे;

ते पापयोनीही होतु कां । ते श्रुताधीतही न होतु कां ।

परि मजसी तुकितां तुका । तुटी नाहीं ॥ ४४९ ॥

४४९) ते दुष्ट जातींतदेखील जन्माला आलेले असेनांत का ? ते ऐकून व शिकून विद्वान् झालेले नसेनात का; परंतु त्यांची माझ्याशीं तुलना केली असतां, ते वजनांत कमी भरत नाहींत.

पाहें पां भक्तीचेनि आथिलेपणें । दैत्यीं देवां आणिलें उणें ।

माझें नृसिंहत्व लेणें । जयाचिये महिमे ॥ ४५० ॥

४५०) अर्जुना पाहा, भक्तीच्या संपन्नतेनें राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला. ज्या प्रल्हादाच्या भक्तिमाहात्म्यासाठीं मला नरसिंहरुप हा अवतार धारण करावा लागला,    

तो प्रल्हादु गा मजसाठीं । घेतां बहुतें सदा किरीटी ।

कां जें मियां द्यावें ते गोष्टी । तयाचिया जोडे ॥ ४५१ ॥

४५१) अर्जुना, त्या प्रल्हादाचा माझ्याऐवजी पुष्कळांनी नेहमी अंगीकार केला, ( माझी भक्ति करण्याच्या ऐवजी प्रल्हादाची भक्ति केली ) कारण मी जें द्यावयाचें तें, त्याचें ( प्रल्हादाचें ) वर्णन केलें असतांहि मिळतें.

एर्‍हवीं दैत्यकुळ साचोकारें । परि इंद्रही सरी न लाहे उपरें ।

म्हणोनि भक्ति गा एथ सरे । जाति अप्रमाण ॥ ४५२॥

४५२) एर्‍हवी त्याचें कुळ वास्तविक दैत्याचें, परंतु इंद्रालाहि त्याच्यापेक्षां जास्त योग्यता मिळत नाही; म्हणून अर्जुना, ठिकाणीं भक्तीच सरती होते. जातीला कांही किंमत नाही.

राजाज्ञेचीं अक्षरें आहाती । तियें चामा एका जया पडती ।

तया चामासाठीं जोडती । सकळ वस्तु ॥ ४५३ ॥

४५३) राजाच्या हुकुमाची अक्षरें ज्या एका कातड्यांवर उमटलेली आहेत, त्या तुकड्याच्या मोबदल्यांत सर्व पदार्थ प्राप्त करुन घेतां येतात, 

वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे । एथ राजाज्ञाचि समर्थ आहे ।

तेचि चाम एक जैं लाहे । तेणें विकती आघवीं ॥ ४५४ ॥

४५४) प्रत्यक्ष सोने, रुपें जरी असलें ( आणि त्याच्यावर राजाच्या हुकुमाची अक्षरें नसली ) तर त्या सोन्यारुप्याची व्यवहारात नाणें म्हणून किंमत नाहीं. व्यवहारांत राजाच्या आज्ञेचाच जोर आहे. तीच जेव्हां राजाच्या हुकमाची अक्षरें असलेला एक चामड्याचा तुकडा प्राप्त होतो, तेव्हां त्यानें सर्व माल विकत घेतां येतो. 

तैसें उत्तमत्व तैंचि तरे । तैंचि सर्वज्ञता सरे ।

जैं मनोबुद्धि भरे । माझेनि प्रेमें ॥ ४५५ ॥

४५५) त्याप्रमाणें आपला उत्तमपणा त्याच वेळेला टिकेल; त्या वेळेला सर्व सर्वज्ञता मान्य होईल कीं, ज्या वेळेला मन आणि बुद्धि माझ्या प्रेमाने भरुन जाईल.

म्हणोनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण ।

एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ ४५६ ॥

४५६) याकरितां अरे, उत्तम कुळ, जाति अगर वर्ण हे सर्व निष्फळ आहेत. अर्जुना, एक माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे.

तेंचि भलतेणें भावें । मन मजआंतु येतें होआवें ।

आलें तरी आघवें । मागील वावो ॥ ४५७ ॥

 ४५७) तेंच मन वाटेल त्या हेतूनें का होईना, पण माझ्या स्वरुपांत येईल ( मद्रप होईल ) असें करावें, आणि एकदां माझ्या स्वरुपांत आले तर मागील ( जातीकुळवगैरे ) गोष्टी निष्फळ होतात.             

जैसें तंवचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ ।

मग होऊनि ठाकती केवळ । गंगारुप ॥ ४५८ ॥

४५८) जोपर्यंत गंगेच्या पाण्याला जाऊन मिळालें नाहीं, तोंपर्यंत नाल्याओढ्यांच्या पाण्याला नाले, ओढे म्हणतात; मग ते गंगेला येऊन मिळाल्यानंतर ते केवळ गंगारुप होऊन राहतात.

कां खैर चंदन काष्ठें । हे विवंचना तंवचि घटे ।

जंव न घापती एकवटें । अग्नीनाजीं ॥ ४५९ ॥

४५९) किंवा खैराचें लांकूड , चंदनाचें लाकूड व इतर रायवळ लांकडें ही निवड, जेथपर्यंत एकत्र करुन ती अग्नीमध्यें घातलीं नाहींत, तेथपर्यंतच होऊं शकते,  

तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यादि इया ।

जाती तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें ॥ ४६० ॥

४६०) त्याचप्रमाणें क्षत्रिय, वैश्य, शुद्र व अत्यंज आणि स्त्रिया ह्या जाति, जेथपर्यंत भक्त माझ्याशीं एकरुप झाले नाहींत तेथपर्यंत वेगवेगळ्या असतात.

मग जातीव्यक्ती पडे बिंदुलें । जेव्हां भाव होती मज मीनले ।

जैसे लवणकण घातले । सागरामाजीं ॥ ४६१ ॥

४६१) जसें समुद्रामध्यें मिठाचे कण घातले असतां तें समुद्ररुप होऊन, त्यांचा कणपणा नाहींसा होतो, त्याप्रमाणें जेव्हां सर्व वृत्ति मद्रुप होतात, तेव्हां त्या जाति व व्यक्ति यांच्या नांवानें शून्य पडतें.

तंववरी नदानदींची नांवें । तंवचि पूर्वपश्र्चिमेचे यावे ।

जंव न येती आघवे । समुद्रामाजीं ॥ ४६२ ॥

४६२) तेथपर्यंतच ( शोणभद्र व सिंधू अशीं ) नदाचीं नांवें व ( नर्मदा, गंगा अशी ) नांवें राहतील; आणि तेथपर्यंतच पूर्वेकडे व पश्र्चिमेकडे वाहणारे ओघ, असे भेद राहतील कीं, जेथपर्यंत सर्व समुद्रांत येऊन मिळत नाहींत.  

हेंचि कवणें एकें मिसें । चित्त माझां ठायीं प्रवेशे ।

येतुलें हो मग आपैसें । मी होणें असे ॥ ४६३ ॥

४६३) कोणत्याहि एका निमित्तानें हेंच चित्त माझ्या स्वरुपांत प्रवेश करुन राहो, एवढें झालें, म्हणजे मग आपआप मद्रूप होणे ( निश्र्चित ) आहे.   

अगा वरी फोडावयाचि लागीं । लोहो मिळो कां परिसाचां आंगी ।

कां जे मिळतिये प्रसंगीं । सोनेंचि होईल ॥ ४६४ ॥

४६४) अर्गुना, फोडण्याच्या उद्देशानें लोखंडाचा घण परिसावर पडला तरी देखील घणाचा संबंध परिसाशीं येणार्‍या वेळेस तो घण सोनेंच बनून जाईल.    

पाहें पां वालभाचेनि व्याजें । तिया व्रजांगनांचीं निजें ।

मज मीनलिया काय माझें । स्वरुप नव्हतीचि ॥ ४६५ ॥             

४६५) असें पहा कीं, त्या गोपींचीं अंतःकरणें प्रेमाच्या निमित्तानें मला येऊन मिळालीं असतां, त्या गोपी मद्रूप झाल्या नाहीत काय ?      

नातरी भयाचेनि मिसे । मातें न पविजेचि काय कंसें ।

कीं अखंड वैरवशें । चैद्यादिकीं ॥ ४६६ ॥

४६६) अथवा भीतीच्या निमित्तानें ( कां होईना ) कंस मला येऊन मिळाला नाहीं काय ? किंवा निरंतर वैर करण्याच्या जोरावर शिशुपालादिकांनी माझी प्राप्ति करुन घेतली नाहीं काय ?

अगा  सोयरेपणेंचि पांडवा । माझें सायुज्य यादवां ।

कीं ममत्वें वसुदेवा- । दिकां सकळां ॥ ४६७ ॥

४६७) अरे अर्जुना, नातेपणाच्या संबंधानेंच या यादवांना माझ्या स्वरुपाची प्राप्ति झाली; किंवा ममत्व ठेवल्यामुळे वसुदेवादिक सर्वांना माझी प्राप्ति झाली.

नारदा ध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा ।

यां भक्ती मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥ ४६८ ॥

४६८) नारदाला, ध्रुवाला, अक्रूराला, शुकाला अथवा सनत्कुमार यांना, अर्जुना, ज्याप्रमाणें मी भक्तीच्या योगानें प्राप्त करुन घेण्याला योग्य झालों,  

तैसाचि गोपीसि कामें । तया कंस भयसंभ्रमें ।

येरां घातकें मनोधर्में । शिशुपालादिकां ॥ ४६९ ॥

४६९) त्याचप्रमाणें गोपिकांस कामानें ( विषयबुद्धीनें ), त्या कंसाला भयाच्या भ्रांतीनें आणि त्या इतर शिशुपालादिकांस त्यांच्या त्या घातक बुद्धीनें ( मी प्राप्त झालों ).

अगा मी एकुलाणीचें खागें । मज येवों ये भलतेनि मार्गें ।

भक्ती कां विषयें विरागें । अथवा वैरें ॥ ४७० ॥

४७०) अरे अर्जुना, मी सर्व मार्गांच्या मुक्कामाचें एक शेवटचें ठिकाण आहे. वाटेल त्या मार्गानें मजकडे ( माझ्या स्वरुपीं ) येतां येतें. भक्तीनें अथवा विषय बुद्धीनें अथवा वैराग्यानें अथवा वैरानें,

म्हणोनि पार्था पाहीं । प्रवेशावया माझां ठायीं ।

उपायांची नाहीं । केणि एथा ॥ ४७१ ॥

४७१) म्हणून अर्जुना, पाहा, माझ्या स्वरुपांत मिळावयाचें असेल तर येथें साधनाचें बंधन नाहीं.

आणि भलतिया जाती जन्मावें । मग भजिजे कां विरोधावें ।

परि भक्त कां वैरिया व्हावें । माझियाचि ॥ ४७२ ॥

४७२) आणि वाटेल त्या जातींत जन्माला आलें तरी चालेल, मग भक्ति किंवा वैर केलें तरी हरकत नाहीं. परंतु भक्ति किंवा वैरी व्हावयाचें तर तें माझेंच झालें पाहिजे,

अगा कवणें एकें बोलें । माझेपण जर्‍ही जाहालें ।

तरी मी होणें आलें । हाता निरुतें ॥ ४७३ ॥

४७३) कोणत्याहि का निमित्तानें होईना, जर माझ्याशी दृढ संबंध झाला, तर मद्रूप होणें हें खास हातीं आलें, असें समजावें,

यापरी पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना ।

मातें भजतां सदना । माझिया येती ॥ ४७४ ॥  

४७४) याप्रमाणें अर्जुना, दुष्ट जातींत जन्म झालेले किंवा वैश्य, शूद्र अथवा स्त्रिया यांनी माझें भजन केलें असतां, तीं सर्व माझ्या स्वरुपाला येऊन मिळतात.      



Custom Search