Friday, March 30, 2018

Samas Sahava Chaturya Lakshan समास सहावा चातुर्य लक्षण


Dashak Choudava Samas Sahava Chaturya Lakshan 
Samas Sahava Chaturya Lakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Chaturya in this samas. Chaturya means wiseness. Wiseness is required in Prapancha and Parnarth also. The qualities of Chaturya are described here.
समास सहावा चातुर्य लक्षण 
श्रीराम ॥
रुप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाये ।
कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ॥ १ ॥
१) आपल्या शरीराचें रुप व सौंदर्य हे गुण अभ्यासानें साध्य होत नाहीत. तें जन्मजात असल्यानें त्यावर इलाज चालत नाहीं. म्हणून अभ्यासानें साध्य होणार्‍या आगांतुक गुणांच्या मागें लागावें. 
काळें माणुस गोरें होयेना । वनाळास येत्न चालेना ।
मुक्यास वाचा फुटेना । हा सहजगुण ॥ २ ॥
२) माणूस काळा असेल तर तो गोरा होऊं शकत नाहीं. तोंडावर असलेल्या वणाला प्रयत्नानें उपयोग होत नाहीं. म्हणजे तों घालविता येत नाहीं. मनुष्य मुका असेल तर त्याला बोलता येत नाहीं. या उपजत गोष्टींना उपाय नसतो.    
आंधळें डोळस होयेना । बधिर तें ऐकेना ।
पांगुळ पाये घेइना । हा सहजगुण ॥ ३ ॥
३) माणूसआंधळा असेल तर त्यास दृष्टि येत नाहीं. बहिरा असेल तर त्यास ऐकायला येत नाहीं. पांगळा असेल तर त्यास चालतां येत नाहीं. या उपजत गोष्टींना उपाय नसतो. 
कुरुपतेची लक्षणें । किती म्हणोनि सांगणें ।
रुप लावण्य याकारणें । पालटेना ॥ ४ ॥
४) कुरुपचेची अशी बरीच लक्षणें आहेत. तीं सगळीं सांगतां येत नाहीत. म्हणूनच शरीराचें रुप व सौंदर्य बदलतां येत नाहींत असें सांगितलें. 
अवगुण सोडितां जाती । उत्तम गुण अभ्यासितां येती ।
कुविद्या सांडून सिकती । शाहाणे विद्या ॥ ५ ॥
५) परंतु अवगुण सोडायचे म्हटल्यावर तें सोडतां येतात. व उत्तम गुण अभ्यासकरुन मिळवतां येतात. शहाणी माणसें कुविद्या सोडून देऊन विद्या शिकतात. 
मूर्खपण सांडिता जातें । शाहाणपण सिकतां येतें ।
कारबार करितां उमजतें । सकळ कांहीं ॥ ६ ॥
६) मूर्खपण सोडावयाचें म्हटलें तर सोडतां येतें आणि शहाणपण शिकायचें मनांत आणलें तर शिकतां येतें. त्या दृष्टीनें अभ्यास केला तर सर्व कांहीं ध्यानांत येते. 
मान्यता आवडे जीवीं । तरी कां उपेक्षा करावी ।
चातुर्येविण उंच पदवी । कदापी नाहीं ॥ ७ ॥
७) माणसाला मान मिळाला तर तो मनापासून आवडतो. मग शहाणपण शिकण्याचाही आळस, उपेक्षाकरुं नये.  अंगीं चातुर्य किंवा शहाणपण असल्याखेरीज समाजामध्यें मोठेपण कधीं मिळत नाहीं. 
ऐसी प्रचित येते मना । तरी कां स्वहित कराना ।
सन्मार्गें चालतां जनां । सज्जन माने ॥ ८ ॥
८) ही गोष्ट जीवनांत आपल्या प्रचितीला येते. यासाठीं आपण आपलें हित करुन घेणें जरुर आहे. जो माणूस चांगल्या मार्गानें जातो, तो संतांना आणि सामान्य जनांना योग्य वाटतो. 
देहे नेटकें श्रुंघारिलें । परी चातुर्येविण नासलें ।
गुणेंविण साजिरें केलें । बाष्कळ जैसें ॥ ९ ॥
९) समाजा एखाद्यानें आपलें शरीर पुष्कळ श्रृंगारले. परंतु त्याच्या अंगीं शहाणपण नाहीं तर तें श्रृंगारणें फुकटच जातें. एखाद्या गुणहीन वेड्याला साजशृंगार करावा तसें तें होतें. 
अंतर्कळा श्रुंघारावी । नानापरी उमजवावी ।
संपदा मेळऊन भोगावी । सावकास ॥ १० ॥
१०) माणसानें आपल्या अंतरंगास चांगल्या जाणीवरुपें सजवावें. त्या जाणिवेंत अनेक प्रकारचे ज्ञान भरावें. त्यायोगें संपत्तीही मिळवावी व तीचा मनप्रमाणें भोगही घ्यावा. 
प्रेत्न करीना सिकेना । शरीर तेंहि कष्टवीना ।
उत्तम गुण घेईना । सदाकोपी ॥ ११ ॥
११) जो माणूस प्रयत्न करीत नाहीं आणि शहाणपण शिकत नाहीं, शरीर कष्ट घेत नाहीं, उत्तम गुणांचा अभ्यास करीत नाहीं, तो नेहमी चिडचिडलेला असतो.  
आपण दुसर्‍यास करावें । तें उेसिणें सवेंचि घ्यावें ।
जना कष्टवितां कष्टावें । लागेल बहु ॥ १२ ॥
१२) आपण दुसर्‍यांशी जसें वर्तन करावें त्याचे तसें उसनें लगेच फेडावें लागतें.  आपण दुसर्‍यांना त्रास दिला तर आपणाला देखील पुष्कळ त्रास भोगावा लागतो. हें ज्याला कळत नाहीं तो करंटा होय. तो दैन्यवाणाच.   
न्यायें वर्तेल तो शाहाणा । अन्याइ तो दैन्यवाणा ।
नाना चातुर्याच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥
१३) जो न्यायानें वागतो तो शहाणा आणि जो अन्यायानें वागतो तो दैन्यवाणा. चतुर माणसाला चातुर्याच्या अनेक खुणा माहित असतात.  
जें बहुतांस मानलें । तें बहुतीं मान्य केलें ।
येर तें वेर्थचि गेलें । जगनिंद्य ॥ १४ ॥
१४) जी गोष्ट पुष्कळ लोकांना पसंत पडतें तिचा प्रसार पुश्कळ लोकांमध्यें होतो. पुष्कळांना नापसंत असलेलें बाकीचें वाया जाते.  
लोक आपणासि वोळावे। किंवा आवघेच कोंसळावे ।
आपणास समाधान फावे । ऐसें करावें ॥ १५ ॥ 
१५) पुष्कळ लोक आपल्यला वश व्हावेंत किंवा पुष्कळ लोक आपल्या विरुद्ध जावेत या दोन्ही गोष्टी आपल्या हातांत आहेत. म्हणून आपल्याला समाधान प्राप्त होईल असें माणसानें वागावें.       
समाधानें समाधान वाढे । मित्रिनें मित्रि जोडे ।
मोडितां क्षणमात्रें मोडे । बरेपण ॥ १६ ॥
१६) समाधानानें समाधान वाढत जातें. स्नेहानें स्नेह जुळतो. चांगलेपणा नाहींसा करायचा म्हटला तर तो क्षणांत नाहींसा करतां येतो. 
अहो कांहो अरे कांरे । जनीं ऐकिजेतें किं रे ।
कळस असतांच कां रे । निकामीपण ॥ १७ ॥
१७) " अहो तर काहो ",  " अरे तर कारे " अशी लोकांमध्यें एक म्हण आहे. हें आपल्याला समजते. तें कळत असून देखील शहाणपण मिळवण्याचा प्रयत्न न करणें योग्य नाहीं.    
चातुर्ये श्रुंघारे अंतर । वस्त्रें श्रुंघारे शरीर । 
दोहिमधें कोण थोर । बरें पाहा ॥ १८ ॥
१८) शहाणपणानें अंतरंग श्रृंगारलें जातें तर वस्त्राने शरीर श्रृंगारले जातें या दोन्हीपैकी श्रेष्ठ कोणतें याचा तुम्हीच विचार करा.
बाह्याकार श्रुंघरिलें । तेणें लोकांच्या हातासि काये आलें ।
चातुर्ये बहुतांसी रक्षिलें । नाना प्रकारें ॥ १९ ॥
१९) एखाद्यानें आपल्या शरीराला खूप सजवलें तर त्यापासून लोकांना कांहींच फायदा होत नाहीं. माणसाच्या अंगीं चातुर्य असेल तर त्यानें तो पुष्कळ लोकांचे अनेक रीतीनें तो संरक्षण करुं शकतो.
बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें ।
समस्तीं बरें म्हणावें । ऐसी वासना ॥ २० ॥
२०) चांगलें खावें, चांगलें जेवावें, चांगलें वस्त्र पांघरावें व नेसावें, सर्वांनीं आपल्याला चांगलें म्हणावें, अशी वासना सामान्य माणसाला असते.   
तनें मनें झिजावें । तेणें भले म्हणोन घ्यावें ।
उगें चि कल्पितां सिणावें । लागेल पुढें ॥ २१ ॥
२१) परंतु शरीरानें व मनानें लोकांसाठीं झिजावें तरच लोकांमध्यें भलेपणा मिळतो. असें न करितां जो निर्थक कल्पना करीत बसतो त्याला पुढें कष्ट भोगावें लागतात.  
लोकीं कार्यभाग आडे । तो कार्यभाग जेथें घडे । 
लोक सहजचि वोढे । कामासाठीं ॥ २२ ॥
२२) समजा लोकांचे एखादे काम अडून राहीलें आहे, तर तें काम अडचण दूर करुन जो तें व्यवस्थितपणें करतो, त्याच्याकडे लोक आपोआप आपल्या कामासाठीं येऊं लागतात.  
म्हणोन दुसर्‍यास सुखी करावें । तेणें आपण सुखी व्हावें ।
दुसर्‍यास कष्टवितां कष्टावें । लागेल स्वयें ॥ २३ ॥
२३) म्हणून जो दुसर्‍याला सुखी करतो तो स्वतः सुखी होतो. जो दुसर्‍यास कष्ट देतो त्यास स्वतः पुढें कष्ट भोगावें लागतात. 
हें तो प्रगटचि आहे । पाहिल्याविण कामा नये ।
समजणेम हा उपाये । प्राणीमात्रासी ॥ २४ ॥
२४) या गोष्टी अगदी उघड आहेत. पण त्या नीट पाहून समजून घेतल्याखेरीज कामाला येत नाहीं. यासाठीं त्या समजून घेणें हा भाग्यवान बनण्याचा सोपा उपाय आहे.    
समजले आणी वर्तले । तेचि भाग्यपुरुष जाले ।
यावेगळे उरले । ते करंटे पुरुष ॥ २५ ॥
२५) अशा रीतीनें जीवन समजून घेऊन जें वागतात तेच भाग्यवान पुरुष बनतात. बाकीचे न समजणारे उरलेले पुरुष करंटे समजावे. 
जितुका व्याप तितुकें वैभव । वैभवासारिखा हावभाव ।
समजले पाहिजे उपाव । प्रगटचि आहे ॥ २६ ॥
२६) जेवढा व्याप तेवढें वैभव, हा नियम आहे. ज्या मानानें वैभव असतें त्या मानानें वागावें लागतें. माणसाला हें समजलें पाहिजें. वैभव प्राप्त करुन घेण्याचा उपाय अगदी उघड आहे. 
आळसें कार्येभाग नासतो । साक्षेप होत होत होतो ।
दिसते गोष्टी कळेना तो । शाहाणा कैसा ॥ २७ ॥
२७) कोणतेहीं काम आळशीपणानें नासतें. परंतु  माणुसप्रयत्न करीत राहीला तर तें क्रमाक्रमानें सिद्धीस जातें. ही उघड असलेली गोष्ट ज्याला कळत नाहीं, त्याला शाहाणा म्हणतां येत नाहीं.  
मित्रि करितां होतें कृत्य । वैर करितां होतो मृत्य ।
बोलिलें हें सत्य किं असत्य । वोळखावें ॥ २८ ॥
२८) मित्रत्व जोडल्यानें काम शेवटास जातें आणि वैर केल्यानें मरणाचा प्रसंग ओढवतो. हें माझें म्हणणें खरें कां खोटे तें तुम्हीच ओळखा. 
आपणास शाहाणें करुं नेणे । आपलें हित आपण नेणे । 
जनीं मैत्रि राखों नेणे । वैर करी ॥ २९ ॥
२९) आपण आपल्याला शाहाणें कसें करावें हें कळत नाहीं, लोकांशी स्नेह राखतां येत नाहीं, आपले हित कसें करावें कळत नाहीं, उगीच वैर करतो, 
ऐसे प्रकारीचे जन । त्यास म्हणावें अज्ञान । 
तयापासीं समाधान । कोण पावे ॥ ३० ॥
३०) अशा प्रकारच्या माणसांना अज्ञानी म्हणावें. त्यांच्यापाशीं कोणासही समाधान मिळत नाहीं. 
आपण येकायेकी येकला । सृष्टींत भांडत चालिला ।
बहुतांमध्यें येकल्याला । येश कैचें ॥ ३१ ॥
३१) आपण एकटाच एकअसणारा आणि तो जर जगांत सर्वांशी भांडत सुटला तर पुष्कळ लोकांमध्यें या एकट्याला यश मिळणें शक्य नाहीं.  
बहुतांचे मुखीं उरावें । बहुतांचे अंतरीं भरावें ।
उत्तम गुणीं विवरवें । प्राणीमात्रासी ॥ ३२ ॥  
३२) म्हणून पुष्कळ लोकांच्या तोंडीं आपलें नांव असावें. पुष्कळ लोकांच्या अंतःकरणांत आपण प्रेमरुपानें भरुन जावें. आणि आपल्या उत्तम गुणांनी अनेक लोकांना विवेकी बनवावें.       
शाहाणे करावे जन । पतित करावे पावन ।
सृष्टिमधें भगवद्जन । वाढवावें ॥ ३३ ॥
३३) पुष्कळ लोकांना शहाणें करावें, जे भ्रष्ट असतील त्यांना पवित्र करावें. आणि जगामध्यें भगवंताची भक्ति वाढवावी. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चातुर्येलक्षणनाम समास सहावा ॥
Samas Sahava Chaturya Lakshan
समास सहावा चातुर्य लक्षण 



Custom Search

Wednesday, March 28, 2018

Samas Pachava Harikatha Lakshan समास पांचवा हरिकथा लक्षण


Dashak Choudava Samas Pachava Harikatha Lakshan
Samas Pachava Harikatha Lakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about the Harikatha. Harikatha means Story of God. The way of telling it to the people is described in this Samas.
समास पांचवा हरिकथा लक्षण 
श्रीराम ॥
मागां हरिकथेचें लक्षण । श्रोतीं केला होता प्रस्न ।
सावध होऊन विचक्षण । परिसोत आतां ॥ १ ॥
१) हरिकथेंचे लश्रण कोणतें असा प्रश्र्ण पूर्वी श्रोत्यांनीं केला होता. त्याचे उत्तर जाणत्यांनीं आतां सावधपणें ऐकावें. 
हरिकथा कैसी करावी । रंगें कैसी भरावी ।
जेणे पाविजे पदवी । रघुनाथकृपेची ॥ २ ॥
२) हरिकथा कशी करावी. तिच्यांत रंग कसा भरावा. म्हणजे त्या कथेमुळें मोठी योग्यता मिळून भगवंताची कृपा संपादन होईल. 
सोनें आणी परिमळे । युक्षदंडा लागती फळें ।
गौल्य माधुर्य रसाळें । तरी ते अपूर्वता ॥ ३ ॥
३) समजा सोन्याला सुगंध आला किंवा उसाला गोड, मधुर फळें लागलीं तर तो मोठा अपूर्व योग होईल. 
तैसा हरिदास आणी विरक्त । ज्ञाता आणी प्रेमळ भक्त ।
वित्पन्न आणि वादरहित ।  तरी ते अपूर्वता ॥ ४ ॥ 
४) त्याचप्रमाणें हरिदास असून विरक्त; ज्ञानी असून प्रेमळ भक्त, आणि मोठा विद्वान असून वाद न घालणारा असा किर्तनकार असेल तर तो मोठा अपूर्व योग समजावा. 
रागज्ञानी ताळज्ञानी । सकळकळा ब्रह्मज्ञानी ।
निराभिमानें वर्ते जनीं ।  तरी ते अपूर्वता ॥ ५ ॥
५) उत्तम रागज्ञान, उत्तम तालज्ञान, सर्व कलांचें उत्तम ज्ञान असून शिवाय अंगी ब्रह्मज्ञान असणारा आणि तरीही लोकांशी वागतांना अत्यंत निरभिमान वृत्ति असणारा असा हरिदास मिळणें म्हणजे मोठा अपूर्व योग समजावा.    
मछर नाहीं जयासी । जो अत्यंत प्रिये सज्जनासी ।
चतुरांग जाणे मानसीं । अंतरनिष्ठ ॥ ६ ॥
६) ज्याला द्वेष, मत्सर करणें माहीत नाहीं, संतांना जो अत्यंत आवडतो, ज्याच्या अंगीं चौफेर ज्ञान आहे आणि ज्याच्या मनांत भगवंतावर पूर्ण निष्ठा आहे, असा हरिदास खरोखर उत्तम आहे. ज्ञान, विज्ञान, कला आणि लोकसंग्रह हें चतुरांग आहे.
जयंत्यादिकें नाना पर्वें । तीर्थे क्षेत्रें जें अपूर्वें । 
जेथें वसिजे देवाधिदेवें । सामर्थ्यरुपें ॥ ७ ॥
७) देवाची जयंती, संताची पुण्यतिथि या व अश्या अनेक पर्वण्या, परमात्मा जेथें वास करतो अशी तीर्थें व क्षेत्रें,
तया तीर्थातें जे न मानिती । शब्दज्ञानें मिथ्या म्हणती ।
तया पामरां श्रीपती । जोडेल कैंचा ॥ ८ ॥
८) त्यांना जो मानीत नाहीं, शब्दपांडित्याच्या अभिमानानें " त्यांत कांहीं अर्थ नाहीं " असे जो म्हणतो, त्या पामराला भगवंताची प्राप्ती होत नाहीं. 
निर्गुण नेलें संदेहानें । सगुण नेलें ब्रह्मज्ञानें । 
दोहिकडे अभिमानें । वोस केलें ॥ ९ ॥
९) एकीकडे निर्गुण आहें किंवा नाहीं या संशयानें निर्गुण हातचे गेलें. दुसरीकडे ब्रह्मस्वरुपाच्या शब्दज्ञानानें सगुण खरें नाहीं असें वाटूं लागलें. अशा रीतीनें देहाभिमानामुळें सगुण व निर्गुण दोहींकडे नागावल्याप्रमाणें होते. 
पुढें असतां सगुणमूर्ती । निर्गुणकथा जे करिती ।
प्रतिपादून उछेदिती । तेचि पढतमूर्ख ॥ १० ॥
१०) सगुणमूर्तीपुढें कथा करीत असतां " निर्गुणच खरें, सगुण खरें नाहीं " असें सांगून जे सगुणाचा उच्छेद करतात, असें हरिदास पढतमूर्ख समजावेत. 
ऐसी न कीजे हरिकथा । अतंर पडे उभये पंथा ।
परिस लक्षणें आतां । हरिकथेचीं ॥ ११ ॥
११) अशी हरिकथा कधीं करुं नये. त्यामुळें सगुण व निर्गुण दोन्ही हातचे सुटतात. म्हणून हरिकथा कशी असावी त्याची लक्षणें सांगतो तीं ऐकावी. 
सगुणमूर्तीपुढें भावें । करुणाकीर्तन करावें ।
नाना ध्यानें वर्णावें । प्रतापकीर्तीते ॥ १२ ॥  
१२) सगुण मूर्तीपुढें मोठ्या श्रद्धेनें व प्रेमानें कीर्तन करावें. त्यामध्यें करुणेनें भगवंताला आळवावे. भगवंताची अनेक रुपें व त्याचे अनेक प्रकार वर्णन करावेत. त्याची कीर्ति गावी.  
ऐसें गातां स्वभावें । रसाळ कथा वोढावे ।
सर्वांतरीं हेलावे । प्रेमसुख ॥ १३ ॥
१३) अशा रीतीनें भगवंताचे गुण गायिले असतां किर्तनांत मोठा रसाळपणा उत्पन्न होतो. तें ऐकून सर्व श्रोत्यांच्या मनांत भगवंताचे प्रेम उचंबळून येते. सर्वांना आनंद होतो.
कथा रचायाची खूण । सगुणीं नाणावें निर्गुण ।
न बोलावे दोष गुण । पुढिलांचे कदा ॥ १४  ॥
१४) उत्तम कीर्तन करण्याची युक्ति अशीं की, सगुणाच्या प्रतिपादनामध्यें निर्गुण आणूं नये. त्याचप्रमाणें समोर बसलेल्या श्रोत्याचें गुणदोषावर बोलूं नये. 
देवाचें वर्णाावें वैभव । नाना प्रकारें महत्व ।
सगुणीं ठेउनियां भाव । हरिकथा करावी ॥ १५ ॥
१५) देवाच्या वैभवाचे वर्णन करावें. अनेक प्रकारे देवाचे महत्व सांगून तें पटवून द्यावें. सगुणाच्या ठिकाणीं पूर्ण भाव ठेवून कीर्तन करावें.  
लाज सांडून जनाची । आस्था सांडून धनाची ।
नीच नवी कीर्तनाची । आवडी धरावी ॥ १६ ॥
१६) लोकांची लाज सोडावी. पैशाची आशा सोडावी. कीर्तनाची नित्य नवी आवड उत्पन्न करावी. इतर गोष्टी मनानें बाजूस सारुन शुद्ध कीर्तनाची गोडी वाढावावी. 
नम्र होऊन राजांगणीं । निःशंक जावें लोटांगणीं ।
करताळिका नृत्य वाणी । नामघोषें गर्जावें ॥ १७ ॥
१७) देवासमोरच्या देवळाच्या अंगणाांत कीर्तनास उभे राहिल्यावर अत्यंत नम्र व्हावें. अगदी निःशंक मनानें देवास साष्टांग नमस्कार घालावा. टाळ्या वाजवत नृत्यही करावें. आणि भगवंताच्या नावाचा घोष करावा. 
येकांची कीर्ति येकापुढें । वर्णितां साहित्य न पडे ।
म्हणोनियां निवाडे । जेथील तेथें ॥ १८ ॥
१८) ज्या देवासमोर कीर्तन असेल त्याची कीर्ति वर्णावी. एका देवासमोर दुसर्‍या देवाची कीर्ति वर्णन केल्यानें कथेला रंग चढत नाहीं. 
मूर्ती नस्तां सगुण । श्रवणीं बैसले साधुजन ।
तरी अद्वैतनिरुपण । अवश्य करावें ॥ १९ ॥
१९) समजा समोर सगुण मूर्ति नाहीं आणि साधुसंत श्रवणास बसलें आहेत, अशावेळीं अद्वैताचे प्रतिपादन कीर्तनांत अवश्य करावें.   
नाहीं मूर्ती नाहीं सज्जन । श्रवणीं बैसले भाविक जन ।
तरी करावें कीर्तन । प्रस्ताविक वैराग्य ॥ २० ॥
२०) समजा समोर सगुण मूर्ति नाही व साधुसंतही नाहींत केवळ भाविक लोक श्रवणास आहेत अशावेळीं प्रपंचाबद्दल अनुताप व वैराग्य यांचें प्रतिपादन करावें.   
श्रुंघारिक नवरसिक । यामधें सांडावें येक ।
स्त्रियादिकांचें कौतुक । वर्णूं नये कीं ॥ २१ ॥
२१) कीर्तनांत शृंगार, वीर, करुण, हास्य, अद्भुत, भयानक, बीभत्स, रौद्र व शांत हे नऊ रस अवश्य असावेत. परंतु स्त्रीयांचें हावभाव, लीला, कौतुक यांचे वर्णन करुं नये. 
लावण्य स्त्रियांचें वर्णितां । विकार बाधिजे तत्वता ।
धारिष्टापासून श्रोता । चळी तत्काळ ॥ २२ ॥
२२) कीर्तनामध्यें स्त्रियांच्या सौंदर्याचें वर्णन केल्यानें श्रोत्यांच्या मनांत कामवासनेचा विकार निर्माण होतो. त्यामुळें श्रोत्यांच्या मनाचा संयम तत्काळ सुटतो.
म्हणउन तें तजावें । जें बाधक साधकां स्वभावें ।
घेतां अंतरीं ठसावें । ध्यान स्त्रियांचें ॥ २३ ॥
२३) म्हणून साधकाला जें बाधतें तें कीर्तनामध्यें टाळावें. नाहींतर स्त्रियांच्या वर्णनानें साधकाच्या मनामध्यें स्त्रियांचे ध्यान घट्टपणानें बसतें.  
लावण्य स्त्रियांचें ध्यान । कामाकार जालें मन ।
कैचें आठवेल ध्यान । ईश्र्वराचें ॥ २४ ॥
२४) सुंदर स्त्रियांचे ध्यान ठसल्यावर संपूर्ण मन कामविकारानें भरुन जातें. असें झाल्यावर ईश्र्वराचे ध्यान लागणें अशक्य होतें. 
स्त्री वर्णिता सुखावला । लावण्याचे भरीं भरला ।
तो स्वयें जाणावा चेवला । ईश्र्वरापासुनी ॥ २५ ॥
२५) स्त्रीचें वर्णन ऐकतां ऐकतां साधकाच्या मनाला बरें वाटते, नंतर तिच्या सौंदर्याच्या चिंतनानें त्याचे मन भरुन जाते. असा साधक आपणहून ईश्र्वरापासून दूर गेला असें समजावें.  
हरिकथेसी भावबळें । गेला रंग तो तुंबळे ।
निमिष्य येक जरी आकळे । ध्यानी परमात्मा ॥ २६ ॥
२६) समजा कीर्तनांत ईश्र्वराच्या रंगाचा भंग झाला. पण नंतर जरी एक क्षणभर जरी भगवंताचें ध्यान बरोबर जमलें तरी त्या प्रेमाच्या बळानें भंगलेला रंग पुन्हां उचंबळून येतो.
ध्यानीं गुंतलें मन । कैंचे आठवेल जन ।
निशंक निर्ल्लज कीर्तन । करितां रंग माजे ॥ २७ ॥
२७) मन एकदा कां भगवंताच्या ध्यानांत गुंतले म्हणजे माणसाला लोकांचे स्मरण उरत नाहीं. मग निःशंक व निर्लज्य होऊन कथा चालू केली कीं रंग तुडूंब भरतो.  
रागज्ञान ताळज्ञान । स्वरज्ञानेंसी वित्पन्न ।
अर्थान्वयाचें कीर्तन । करुं जाणे ॥ २८ ॥
२८) चांगल्या हरिदासाला उत्तम रागज्ञन, तालज्ञान आणि स्वरज्ञान असतें. तो विद्वान असून विषयांचें अत्यंत तर्कशुद्ध प्रतिपादन कसें करावें, अर्थ व अन्वय बरोबर कसा सांगावा हें जाणतो. 
छपन्न भाषा नाना कळा । कंठमाधुर्य कोकिळा ।
परी तो भक्तिमार्ग वेगळा । भक्त जाणती ॥ २९ ॥
२९) कीर्तनामध्यें अजून एक विशेष असा आहे कीं, पुष्कळ भाषा आहेत, पुष्कळ कला आहेत, कोकिळेस कंठमाधुर्य आहे. या सार्‍या गोष्टी हरिदासापाशीं असाव्यात. परंतु भक्तिमार्ग म्हणून कांहीं वेगळाच आहे. तो फक्त भक्तच जाणतात. 
भक्तांस देवाचें ध्यान । देवावांचून नेणे अन्न ।
कळावंतांचें जें मन । तें कळाकार जालें ॥ ३० ॥
३०) मनांत केवळ एक देवाचेंच ध्यान लागलेलें असतें. देवांवाचून इतर कांहीं तें जाणतच नाहींत. कलावंताचें मन जसें कलेनें संपूर्ण भरुन जातें, तसें भक्ताचे मन संपूर्णपणें भगवंतानें भरुन जातें. 
श्रीहरिवीण जे कळा । तेचि जाणावी अवकळा । 
देवास सांडून वेगळा । प्रत्यक्ष पडिला ॥ ३१ ॥
३१) भगवंतावांचून जीं कला तीं कला नव्हे, ती प्रत्यक्ष अवकळाच होय. कलेमुळें कलावंत भगवंताला सोडतो व त्याहून वेगळा पडतो, हें प्रत्यक्ष दिसते.  
सर्पी वेढिलें चंदनासी । निधानाआड विवसी ।
नाना कळा देवासी । आड तैस्या ॥ ३२ ॥
३२) चंदनाच्या झाडाला साप वेटाळून बसतात, पुरुन ठेवलेले धनाजवळ हडळ बसलेली असतें. सापांच्यामुळें चंदन मिळत नाहीं. हडळीमुळें धन हातीं येत नाहीं. त्याचप्रमाणें निरनिराळ्या कला भगवमताच्या प्राप्तीच्या आड येतात.  
सांडून देव सर्वज्ञ । नादानध्यें व्हावें मग्न ।
तें प्रत्यक्ष विघ्न । आडवें आलें ॥ ३३ ॥
३३) कीर्तन करीत असतां सर्वज्ञ भगवंताला बाजूला सारुन जो गायनांत तल्लीन होतो त्याला देव प्राप्ती साधत नाहीं. नादामध्यें तल्लीन होणें हें भगवंताच्या आड येणारें प्रत्यक्ष विघ्न आहें.    
येक मन गुंतलें स्वरीं । कोणें चिंतावा श्रीहरी ।
बळेंचि धरुनियां चोरीं । शिश्रूषा घेतली ॥ ३४ ॥
३४) एक चोर होता त्यानें बळजबरीनें एका माणसाला धरुन ठेवलेम.आणि त्याच्याकडून सेवा करुन घेतली. त्याचप्रमाणें मन एकदा स्वरांमध्यें गुंतून गेल्यावर त्यास भगवंताचें चिंतन करता येत नाहीं. तें स्वरांचे गुलाम बनते.      
करितां देवाचें दर्शन । आडवें आलें रागज्ञान ।
तेणें धरुनियां मन । स्वरामागें नेलें ॥ ३५ ॥
३५) कीर्तनाकार भगवंताच्या दर्शनास निघाला व त्यासाठीं कीर्तन करुं लागला. त्यांत संगीताचें  ज्ञान आडवें आलें. त्यानें मनाला धरलें व स्वरांच्या मागें नेलें. त्यामुळें हरिदास भगवंताला अंतरला.   
भेटों जातां राजद्वारीं । बळेंचि धरिला बेगारी ।
कळावंतां तैसी परी । कळेंनें केली ॥ ३६ ॥
३६) एक माणूस राजाला भेटण्यासाठीं राजवाड्याकडे निघाला . वाटेमध्यें त्याला बेगारी म्हणून धरला. कलावंताच्या बाबतींत कला असाच प्रकार घडवून आणते.
मन ठेऊन ईश्ररीं । जो कोणी हरिकथा करी ।
तोचि ये संसारीं । धन्य जाणा ॥ ३७ ॥
३७) जो हरिदास भगवंताच्या ठिकाणी मन ठेवून हरिकथा करतो, तोच या जगांत धन्य समजावा. 
जयास हरिकथेची गोडी । उठे नीत नवी आवडी ।
तयास जोडली जोडी । सर्वोत्तमाची ॥ ३८ ॥   
३८) ज्याला हरिकथेची गोडी असते आणि भगवंताची कथा ऐकण्याची आवड नवेपणानें वाढत जातें त्यानें भगवंताला आपलासा करुन घेतला असें निश्र्चितपणें समजावें.       
हरिकथा मांडली जेथें । सर्व सांडून धावे तेथें ।
आलस्य नीद्रा दवडून स्वार्थे । हरिकथेसी सादर ॥ ३९ ॥ 
३९) ज्या ठिकाणी हरिकथा सुरु असेल त्या ठिकाणी खरा साधक सगळीं कामें सोडून धांवत जातो. आळस, झोप, व बाकीचा स्वार्थ सोडून तो हरिकथा ऐकतो.  
हरिभक्तांचिये घरीं । नीच कृत्य अंगीकारीं । 
साहेभूत सर्वांपरीं । साक्षपें होये ॥ ४० ॥
४०) जे भगवंताचे भक्त असतात त्यांच्या घरीं वख त्यांच्या घरचें हलके काम देखील तो मनापासून करतो. सर्व दृष्टीनें तो अगदी प्रयत्नपूर्वक मदत करतो. 
या नाव हरिदास । जयासि नामीं विश्र्वास ।
येथून हा समास । संपूर्ण जाला ॥ ४१ ॥ 
४१) भगवंताच्या नावावर ज्याचा विश्र्वास असतो, त्याला हरिदास हेम नांव शोभते. येथें हा समास पूर्ण झाला. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे हरिकथालक्षणनिश्र्चयनाम समास पांचवा ॥
Samas Pachava Harikatha Lakshan
समास पांचवा हरिकथा लक्षण 



Custom Search

Monday, March 26, 2018

Samas Choutha Kirtan Lakshan समास चौथा कीर्तन लश्रण


Dashak Choudava Samas Choutha Kirtan Lakshan 
Samas Choutha Kirtan Lakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about the Kirtan. Kirtan should be such that it will impart the true knowledge to the people and bring them on the path of Parmarth.
समास चौथा कीर्तन लश्रण
श्रीराम ॥
कलयुगीं कीर्तन करावें । केवळ कोमळ कुशळ गावें ।
कठीण कर्कश कुर्टे सांडावें । येकीकडे ॥ १ ॥
१) कलियुगांत कीर्तन करावें. त्यांत फक्त कोमळ गावें. पण कौशल्यानें गांवें. कठोर, कर्कश किंवा चोरटें गांवू नये.
खटपट खुंटून टाकावी । खळखळ खळांसीं न करावी ।
खरें खोटें खवळों नेदावी । वृत्ती आपुली ॥ २ ॥
२) भांडणतंटा सोडून द्यावा. दुष्टाबरोबर विरोध करुं नये. खरें खोटें करण्याच्या भानगडींत आपली वृत्ती भडकूं देऊं नये.   
गर्वगाणें गाऊं नये । गातां गातां गळों नये ।
गोप्य गुज गर्जो नये । गुण गावे॥ ३ ॥ 
३) अभिमानानें गाणें गाऊं नये. गातागाता थकून मध्येंच गाणें अर्धवट सोडूं नये. कोणाची गुप्त गोष्ट लोकांत उघड सांगूं नये. दुसर्‍याचे गुणच सांगावें. 
घष्टणी घिसणी घस्मरपणें । घसर घसरुं घसा खाणें ।
घुमघुमों चि घुमणें । योग्य नव्हे ॥ ४ ॥
४) धसधसा,घिसघिस करीत आणि घसा सारखा साफ करीत व खांकरत गाणें गाऊं नये. घशाला ताण देऊन गाणें गाऊं नये. कीर्तनांत अंगांत आल्यासारखें बोलूं नये.   
नाना नामें भगवंताचीं । नाना ध्यानें सगुणाची ।
नाना कीर्तनें कीर्तीचीं । अद्भुत करावीं ॥ ५ ॥
५) भगवंताची नाना प्रकारचीं नांवें घ्यावी. भगवंताचे अनेक सगुणरुपांचे वर्णन करावें. भगवंताच्या अनेक प्रकारच्या कीर्तीचे वर्णन करावें.  
चकचक चुकावेना । चाट चावट चळावेना ।
चरचर चुरचुर लागेना । ऐसें करावें ॥ ६ ॥
६) चक् चक् करण्याची वेळ येईल अशी चूक करुं नये. लबाड व चावट लोक चेकाळतील असें करुं नये. लोकांच्या मनाला फार लागेल असें बोलूं नये.  
छळछळ छळणा करुं नये । छळितां छळितां छळों नये ।
छळणें छळणा करुं नये । कोणीयेकाची ॥ ७ ॥
७) कोणालाही मुद्दाम फसवूं नये. कोणाचाही छळ करुं नये. एखाड्यानें अपल्याला छळलें तरी त्याला आपण छळूं नये.  
जि जि जि जि म्हणावेना । जो जो जागे तो तो पावना ।
जपजपों जनीणजनार्दना । संतुष्ट करावें ॥ ८ ॥
८) कोणाच्या फार पुढें पुढें करुं नये. जागें होणार्‍या सर्वांना परमार्थ साधत नाही, निरंतर जप करुन सर्व भूतमात्रांत वावरणार्‍या भगवंतास प्रसन्न करुन घ्यावें. 
झिरपे झरे पाझरे जळ । झळके  दुरुनी झळाळ ।
झडझडां झळकती सकळ । प्राणी तेथें ॥ ९ ॥
९) झिरपें आणि झरें यांतून पाणी पाझरते, तें पाणी लांबून झळाळतें व चमकतें. तें पिण्यासाठीं प्राणी झडझडून झर्‍यापाशीं गोळा होतात.
या या या या म्हणावें नलगे । या या या या उपाव नलगे ।
या या या या कांहीं च नलगे । सुबुद्धासी ॥ १० ॥  
१०) त्याचप्रमाणें जो शहाणा व समजदार असतो त्याला या या असें बोलवावें लागत नाहीं. तो यावा म्हणून कांहीं उपाय करावा लागत नाहीं. जेथें कांहींतरी विशेष आहे तेथें येण्यासाठीं शहाण्याला कांहीं लागत नाहीं.       
टक टक टक करुं नये । टाळाटाळी टिकों नये ।
टम टम टम टम लाऊं नये । कंटाळवाणी ॥ ११ ॥
११) सारखी कटकट करुं नये. टाळाटाळ करुं नये. कंटालवाणी बडबड करुं नये. 
ठस ठोंबस ठाकावेना । ठक ठक ठक करावेना ।
ठाकें ठमकें ठसावेना । मूर्तिध्यान ॥ १२ ॥
१२) अडाणी व निर्बुद्ध माणसाशी संगत नसावी. उगीच रटाळ भुणभुण लावूं नये. बाहेरुन कांहीं नखरेलपणा केला तरी अंतःकरणांत भगवंताचें ध्यान स्थिर होत नाहीं. 
डळमळ डळमळ डकों नये । डगमग डगमग कामा नये ।
डंडळ डंडंळ चुकों नये । हेंकाडपणें ॥ १३ ॥
१३) मनाचा फार अनिश्र्चितपणा असूं नये.  सारखी बदलणारी वृत्ती चांगलीं नाही. अनिश्र्चितपणामुळें चुकींचें वेडगळ वर्तन करुं नये. 
ढिसाळ ढाला ढळती कुंचे । ढोबळा ढसका डुले नाचे ।
ढळेचिना ढिगाढिगांचे । कंटाळवाणे ॥ १४ ॥
१४) कशातरी चवर्‍या व निशाणें हालवतात. कांहीं ढोबळ माणसें डोलतात. नाचतात. कांहीं पोत्यासारखीं एकाच ठिकाणीं उभी राहतात.    
नाना नेटक नागर । नाना नम्र गुणागर ।
नाना नेमक मधुर । नेमस्त गाणें ॥ १५ ॥
१५) नेटकेपणा व सुसंस्कृतपणा असावा. अनेक गुणांनी संपन्न असून नम्र असावें. नियमांनी निश्र्चित असें वर्तन असावें. गोड व व्यवस्थित गाणें गावें.   
ताळ तंबुरे तानमानें । ताळबद्ध तंतगाणें ।
तूर्त तार्किक तनें मनें । तल्लीन होती ॥ १६ ॥
१६) गाण्याच्या साथीला ताल, तंबोरें, ताना, तालबद्ध तंतुवाद्य असें असावें. त्यामुळें तेवढावेळ तरी गाणें जाणणारे तल्लीन होऊन जावेत.  
थर्थरां थरकती रोमांच । थै थै थै स्वरें उंच ।
थिरथिर थिरावे नाच । प्रेमळ भक्तांचा ॥ १७ ॥
१७) प्रेमळ भक्त प्रेमाच्या आवेशांत उंच स्वरांत थय थय नाचतात. त्यांच्या अंगावर रोमांच उठून ते बराच वेळ नाचतात.  
दक्षदाक्षण्य दाटलें । बंदे प्रबंदे कोंदाटलें ।
दमदम दुमदुमों लागलें । जगदांतर ॥ १८ ॥
१८) मग श्रोते आदरानें पूर्ण लक्ष देऊन किर्तनांत रंगतात. श्रोत्यांच्या मनांत बंध, प्रबंध इत्यादी साहित्य भरुन त्यांचें अंतःरंग कीर्तनाच्या घोषानें दुमदुमतें.  
धूर्त तूर्त धावोन आला । धिंगबुद्धीनें धिंग जाला ।
धाकें धाकें धोकला । रंग अवघा ॥ १९ ॥
१९) अशा रीतीनें कीर्तन रंगांत आलें असतां एक धटिंगण धांवत येतो व कीर्तनांत घुसतो. त्यानें दांडगाई केल्यानें त्याच्या भीतीनें कीर्तनाच्या रंगाचा बेरंग होतो की काय असें वाटते. 
नाना नाटक नेटकें । नाना मानें तुकें कौतुकें ।
नाना नेमक अनेकें । विद्यापात्रें ॥ २० ॥ 
२०) पण हा एक कीर्तनाचाच भाग होता, नाटक होतें असें लक्षांत आल्यावर श्रोते कौतुक करतात. त्यांच्यापैकी कांहींजण माना डोलावतात. 
पाप पळोन गेलें दुरी । पुण्य पुष्कळ प्रगटे वरी ।
परतरतो परे अंतरीं । चटक लागे ॥ २१ ॥ 
२१) अशा कीर्तनाच्या प्रभावानें पाप दूर पळून जाते. पुष्कळ पुण्य प्रगट होते. आणि लोकांना कीर्तनाची आवड लागल्यानें तें परत कीर्तनास येतात.   
फुकट फाकट फटवणें नाहीं । फटकळ फुगडी पिंगा नाहीं ।
फिकें फसकट फोल नाहीं । भकाध्या निंदा ॥ २२ ॥
२२) चांगल्या कीर्तनांत फसवाफसवी नसतें. फुगडी, पिंगा सारख्या गोष्टी नसतात. फुसकी, कुटाळकी व निंदा नसतें. 
बरें बरें बरें म्हणती । बाबा बाबा उदंड करिती ।
बळें बळेचिं बळाविती । कथेलागीं ॥ २३ ॥
२३) जो असें कीर्तन करतो त्याला लोक चांगलें म्हणतात. बाबा बाबा म्हणून त्याची सगळी सोय करतात. मोठ्या आग्रहानें त्याला कथा करावयास बोलवितात. 
भला भला भला लोकीं । भक्तिभावें भव्य अनेकीं ।
भूषण भाविक लोकीं । परोपकारें ॥ २४ ॥
२४) असा कीर्तनकार खरा भला कीर्तनकार होय. भक्तिभाव अंगी मुरलेला असल्यानें तो लोकांत तो भव्यपणें वेगळा दिसतो. परोपकार करणारा असल्यानें भाविकांत तो भूषण होतो. 
मानेल तरी मानावें मनें । मत्त न व्हावें ममतेनें ।
मी मी मी मी बहुत जनें । म्हणिजेत आहे ॥ २५ ॥
२५) आतां सांगितलेलें जर पटत असेल तर मनांत धरुन ठेवावें. माझेपणानें उगीच माजूं नये. उन्मत्त होऊं नये. मी मी असा अहंकाराचा दर्प जगांत पुष्कळ लोकांत असतो. 
येकें टोंकत येकांपासीं । येऊं येऊं येती झडेसीं ।
या या या या असे तयासी । म्हणावें नलगे ॥ २६ ॥
२६) स्वार्थी कलाहीन कीर्तनकार " मी तुमच्याकडे कीर्तनास येतो " असें म्हणून जबरदस्तीनें मागें लागतात. " आमच्याकडे या " असें त्यांना म्हणावें लागत नाहीं. 
राग रंग रसाळ सुरंगें । अंतर संगित रागें ।
रत्नपरीक्षा रत्नामागें । धांवती लोक ॥ २७ ॥
२७) ज्या कीर्तनांत रंग भरतो, जें रसाळ असतें, शिवाय सुंदर रागदारीचें संगीत असते, अशा कीर्तनाला लोक आपणहून धावतांत. जसें कीं, रत्नपारखी रत्नाच्या मागें.   
लवलवां लवती लोचन । लकलकां लकलें मन ।
लपलपों लपती जन । आवडीनें ॥ २८ ॥
२८) श्रोत्यांचें डोळे पाण्यानें भरुन येतात. मन कौतुकानें, आनंदानें भरुन जातें. आणि लोक अगदी दाटीवाटीनें बसतात.   
वचनें वाउगी वदेना । वावरेविवरे वसेना ।
वगत्रुत्वें निववी जना । विनित होउनी ॥ २९ ॥
२९) कीर्तनकार वाफळ शब्द बोलत नाहीं. त्याच्या मनांत भकत्या गोष्टी राहात नाहीत. तो अत्यंत नम्रपणें बोलतो. आणि आपल्या बोलण्यानें लोकांना शांत करतो. 
सारासार समस्तांला । सिकऊं सिकऊं जनाला ।
साहित संगित सज्जनाला । बरें वाटे ॥ ३० ॥
३०) कीर्तनास येणार्‍या सर्व लोकांना तो सारासार विचार करायला शिकवतो. साहित्य आणि संगीतानें सज्जन श्रोत्यांचे मन भरुन जाते.  
खरेंखोटें खरें वाटलें । खर्खर खुर्खुर खुंटलें ।
खोटें खोटेपणें गेलें । खोटें म्हणोनियां ॥ ३१ ॥
३१) जगामध्यें खरें व खोटे यांचें मिश्रण सगळीकडे भरलें आहे. त्यामध्यें खरें कोणतें तें कळलें कीं जीवनामधील खरखर किंवा घर्षण बंद पडतें. खोटे खोटेच असते तें खोटेपणामुळें नाहींसे होते. 
शाहाणें शोधितां शोधेना । शास्त्रार्थ श्रुती बोधेना ।
शुक शारिका शमेना । शब्द तयाचा ॥ ३२ ॥
३२) शहाणे म्हणणारांना शोध धेऊन देखील मूळस्वरुपाची प्राप्ती होत नाहीं. शास्त्राचा खरा अर्थ व श्रुतीचा भाव त्यांच्या लक्षांत येत नाहीं. पण पोपट व साळुंखी या पक्ष्यांप्रमाणें तें आपलें शब्दज्ञान बडबडतच असतात. 
हरुषें हरुषें हासिला । हाहाहोहोनें भुलला ।
हित होईना तयाला । परत्रीचें ॥ ३३ ॥
३३) हर्षानें सुखावून जाऊन जो हसतो, श्रोत्यांनी हा हा हो हो केलें कीं जो भुलतो, अशा कीर्तनकाराला परमार्थ साधत नाहीं. 
लक्षावें लक्षितां अलक्षीं । लक्षिलें लोचनातें लक्षी ।
लंगलें लयेते अलक्षी । विहिंगमार्गे ॥ ३४ ॥
३४) अलक्ष असणारें जे परमार्थस्वरुप तिकडे लक्ष लावण्याचा प्रयत्न करावा. डोळ्यांनीं सगळें पाहातां येते, त्या डोळ्यांना जो पाहातो तो आत्मा पहावा. देहबुद्धि लंघून ओलांडून विहंगम मार्गानें अलक्षी लय लावावा. 
क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षोभतो । क्षमेनें क्षमून क्ष्मवितो । 
क्ष्मणें क्षोभणें क्षेत्रज्ञ तो । सर्वां ठाईं ॥ ३५ ॥   
३५) शरीरांत राहाणारा आत्मा विकारवान होतो. प्रक्षुब्ध होतो. त्याला शांत करुन इतरांना जो शांत करतो तो धन्य होय. क्षुब्ध होणें आणि शांत होणें असे दोन्ही गुण ज्याच्यापाशी आढळतात तो आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कीर्तनलक्षणनाम समास चौथा ॥
Samas Choutha Kirtan Lakshan
समास चौथा कीर्तन लश्रण

Custom Search

Saturday, March 24, 2018

Samas Tisara Kavitva Kala Nirupan समास तिसरा कवित्वकला निरुपण


Dashak Choudava Samas Tisara Kavitva Kala Nirupan 
Samas Tisara Kavitva Kala Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about the Poetry and three different types of it. The best poetry is one in which Bhakti of God is described.
समास तिसरा कवित्वकला निरुपण
श्रीराम ॥
कवित्व शब्दसुमनमाळा । अर्थ परिमळ आगळा ।
तेणें संतषट्पदकुळा । आनंद होये ॥ १ ॥
१) शब्दरुपी फुलांची माळा म्हणजेच काव्य. कवितेचा अर्थ म्हणजे त्या माळेंतील सुंदर फुलांचा सुगंध होय. 
ऐसी माळा अंतःकरणीं । गुंफून पूजा रामचरणीं ।
वोंकारतंत अखंडपणीं । खंडूं च नये ॥ २ ॥
२) अशा शब्दरुपी फुलांची माळा अंतःकरणी गुंफावीआणि पूजा म्हणून रामचरणीं वाहावी. सर्व शब्दांचे मूळरुप म्हणजे ओंकार होय. परेपासून ( परा वाणी ) वैखरीपर्यंत त्याचा तंतु अखंड राहतो. तो तंतु तुटणार नाहीं याची काळजी घ्यावी. 
परोपकाराकाीरणें । कवित्व अगत्य करणें ।
तया कवित्वाचीं लक्षणें । बोलिजेती ॥ ३ ॥
३) जनतेचे कल्याण व्हावे यासाठी कविता अगत्य करावी. ती कविता कशी असावी तें आतां सांगतो.   
जेणें घडे भगवद्भक्ती । जेणें घडे विरक्ती ।
ऐसिया कवित्वाची युक्ती । आधीं वाढवावी ॥ ४ ॥
४) ज्या कवितेनें भगवंताची भक्ति वाढेल आणि विरक्ति उत्पन्न होईल अशा प्रकारची कविता पुष्कळ करावी. 
क्रियेवीण शब्दज्ञान । तया न मनिती सज्जन ।
म्हणौनी देव प्रसन्न । अनुतापें करावा ॥ ५ ॥
५) स्वानुभवावांचून जें नुसतें शब्दज्ञान असतें त्यास संतसज्जन किंमत देत नाहीत. म्हणून अनुतापानें देव प्रसन्न करुन घ्यावा.
देवाचेन प्रसन्नपणें । जें जें घडे बोलणें । 
तें तें अत्यंत श्र्लाघ्यवाणें । या नाव प्रासादिक ॥ ६ ॥
६) देव प्रसन्न झाल्यावर जें शब्द येतात, जें जें कांहीं वाणींतून प्रगट होते, तें सारें अतिशय चांगलें असतें. त्याला प्रासादिक असें म्हणतात.  
धीट पाठा प्रसादिक । ऐसें बोलती अनेक ।
तरी हा त्रिविध विवेक । बोलिजेला ॥ ७ ॥
७) धीट, पाठ आणि प्रासादिक असें कवितेचें तीन प्रकार आहेत. हें तीन प्रकार काय आहेत तें सांगतो.  
धीट म्हणिजे धीटपणें केलें । जें जें आपुल्या मनास आलें
बळेंचि कवित्व रचिलें । या नाव धीट बोलिजे ॥ ८ ॥
८) धीटपणानें केलेलें काव्य तें धीट कवित्व होय. आपल्या मनांत जें कांहीं येते तें काव्यांत प्रगट करणें यास धीट काव्य म्हणतात.  
पाठ म्हणिजे पाठांतर । बहुत पाहिलें ग्रंथांतर ।
तयासारिखा उतार । आपणहि केला ॥ ९ ॥ 
९) पाठ म्हणजे पाठांतर पुष्कळ ग्रंथ वाचून त्यामधील काव्यासारखी कविता आपण करणें यास पाठ कवित्व असें म्हणतात.    
सीघ्रचि कवित्व जोडिलें । दृष्टी पडिलें तें चि वर्णिलें ।
भक्तिवांचून जें केलें । त्या नाव धीटपाठ ॥ १० ॥
१०) तत्काळ कविता करण्याची शक्ति संपादन केली, म्हणजें मग जें दिसेल त्यावर कविता रचली जाते. जें भगवंताच्या भक्तिशिवाय केलें जाते त्यास धीट कवित्व म्हणतात.
कामिक रसिक श्रृंघारिक । वीर हास्य प्रस्ताविक ।
कौतुक विनोद अनेक । या नाव धीटपाठ ॥ ११ ॥
११) जी कविता कामिक व रंगेल आहे, जिच्यामध्यें श्रृंगार, वीर, हास्य, पश्र्चाताप, कौतुक, विनेद इत्यादि अनेक विषय असतात त्या कवितेला धीटपाठ कविता म्हणतात.  
मन जालें कामाकार । तैसेचि निघती उद्गार ।
धीटपाठें परपार । पाविजेत नाहीं ॥ १२ ॥
१२) कवीचें मन कामवासनेंने भरुन कामाकार झालें, म्हणजे त्यास अनुसरुन त्यांचे उद्गार निघतात. अशा धीटपाठ कवितेनें परमार्थ साधत नाहीं. 
व्हावया उदरशांती । करणे लागे नरस्तुती ।
तेथें केली जे वित्पत्ती । त्या नाव धीटपाठ ॥ १३ ॥
१३) पोटांतील भुकेची आग शांत करण्यासाठीं कवीला माणसांची स्तुती करावी लागते. अशी नरस्तती करण्यासाठीं केलेली कविता  म्हणजे धीटपाठ कविता होय.  
कवित्व नसावें धीटपाठ । कवित्व नसावें खटपट ।
कवित्व नसावें उद्धट । पाषांडमत ॥ १४ ॥
१४) कविता धीटपाठ नसावी. कविता ओढूनताणून केलेली नसावी. कविता उद्धट किंवा पाखंड मत प्रतिपादन करणारी नसावी. 
कवित्व नसावें वादांग । कवित्व नसावें रसभंग ।
कवित्व नसावें रंगभंग । दृष्टांतहीन ॥ १५ ॥
१५) कवितेंत वादविवादाचें अंग असूं नये. कवितेंमध्यें रस भंग व रंगाचा बेरंग नसावा. दृष्टांतावाचून कविता असूं नये.  
कवित्व नसावें पाल्हाळ । कवित्व नसावें बाष्कळ ।
कवित्व नसावें कुटीळ । लक्षुनियां ॥ १६ ॥
१६) कवितेंत पाल्हाळ व पाचकळपणा नसावा. वाईट किंवा लबाड लोकांना उद्देशून कविता करुं नये. 
हीन कवित्व नसावें । बोलिलेंचि न बोलावें ।
छंदभंग न करावें । मुद्राहीन ॥ १७ ॥
१७) हलक्या दर्जाचे कवित्व नसावें. कवितेंत तेंच तेंच पुनः पुनः सांगितलेले नसावें. काव्यशास्त्राचे नियम मोडणारें कवित्व नसावें. छंद, मात्रा, वृत्त वगैरेंचें नियम मोडूं नयेत.   
वित्पत्तीहीन तर्कहीन । कळाहीन शब्दहीन ।
भक्तिज्ञानवैराग्यहीन । कवित्व नसावें ॥ १८ ॥
१८) विद्याविलास, तर्क, कला, उचित शब्द, भक्ति, ज्ञान, वैराग्य यांचा अभाव असणारें कवित्व नसावें.  
भक्तिहीन जें कवित्व । तेंचि जाणावें ठोंबें मत ।
आवडीहीन जें वगत्रुत्व । कंटाळवाणें ॥ १९ ॥
१९) ज्या काव्यांत भक्ति नाहीं तें अडाणी काव्य समजावें. जें काव्य भक्तिच्या आवडी विरहीत असतें तें कंटाळवाणें होते.  
भक्तिविण जो अनुवाद । तोचि जाणावा विनोद ।
प्रीतीविण संवाद । घडे केवी ॥ २० ॥
२०) भक्तिशिवाय केलेली काव्यरचना हें मनोरंजनच समजावें. भगवंताच्या प्रेमाखेरीज त्याच्याशी खरा वार्तालाप होत नाहीं.
असो धीट पाठ तें ऐसें । नाथिलें अहंतेचे पिसें ।
आतां प्रासादिक तें कैसें । सांगिजेल ॥ २१ ॥
२१) असो. धीटपाठ कविता ही अशी असते, मिथ्या असलेल्या अहंकाराला लागलेलें तें एक प्रकारचे वेडच आहे. प्रासादिक कविता कशी असते तें आतां सांगतो. 
वैभव कांता कांचन । जयास वाटे हें वमन ।
अंतरीं लागलें ध्यान । सर्वोत्तमाचें ॥ २२ ॥
२२) ज्याला वैभव, पैसा आणि कामवासना तिन्ही वांतीसारखीं वाटतात, ज्याच्या हृदयांत भगवंताचे ध्यान अखंड चालूं असतें. 
जयास घडीनें घडी । लागे भगवंतीं आवडी । 
चढती वाढती गोडी । भगवद्भजनाची ॥ २३ ॥
२३) क्षणाक्षणाला ज्यास भगवंताचें स्मरण होतें आणि त्यामुळें त्याला असलेली भगवंताची आवड वाढत जातें, ज्याची भगवंताची भक्ति आणि भक्तिची गोडी अधिकाधिक वाढत जाते,   
जो भगवद्भजनेंवीण । जाऊं नेदी येक क्षण ।
सर्वकाळ अंतःकरण । भक्तिरंगें रंगलें ॥ २४ ॥ 
२४) भगवंताच्या भजनावांचून एक क्षणदेखिल तो वाया जाऊं देत नाहीं, ज्याचें अंतःकरण सदैव भगवंताच्या प्रेमांत रंगलें आहे,  
जया अंतरीं भगवंत । अचळ राहिला निवांत ।
तो स्वभावें जें बोलत । तें ब्रह्मनिरुपण ॥ २५ ॥
२५) आणि ज्याच्या अंतर्यामी भगवंत अचल आणि स्थिर असतो, असा एकच पुरुष जें सहज बोलतों तें ब्रह्मनिरुपण होय. 
अंतरीं बैसला गोविंद । तेणें लागला भक्तिछंद ।
भक्तीविण अनुवाद । आणीक नाहीं ॥ २६ ॥
२६) अंतःकरणामध्यें भगवंतानें ठाण मांडल्यानें अशा पुरुषाला भक्तिचा छंद लागतो. त्यामुळें तो भक्तवांचून दुसरें कांहींच बोलत नाही. 
आवडी लागली अंतरीं । तैसीच वदे वैखरी ।
भावें करुणाकीर्तन करी । प्रेमभरें नाचतु ॥ २७ ॥
२७) अंतर्यामीं ज्याची आवड लागलेली असते, त्याला अनुसरुन त्याची वाणी बोलूं लागते. मोठ्या प्रेमानें व श्रद्धेनें तोकरुणारसानें भरलेलें किर्तन करतो. कीर्तनामध्यें प्रेम अनिवार होऊन तों नाचतो.  
भगवंतीं लागलें मन । तेणें नाठवे देहभान ।
शंका लज्जा पळोन । दुरी ठेली ॥ २८ ॥
२८) त्याचे मन भगवंताला चिकटल्यानें त्याला देहभान राहात नाहीम. शंका व लाज त्याच्यापासून दूर पळून जातात. 
तो प्रेमरंगें रंगला । तो भक्तिमदें मातला ।
तेणें अहंभाव घातला । पायांतळीं ॥ २९ ॥
२९) प्रेमच्या रंगानें रंगलेला आणि भक्तीच्या कैफानें मस्त झालेला असा तो स्वतःचा अहंभाव आपल्या पायाखालीं तुडवितो. 
गात नाचत निशंक । तयास कैचे दिसती लोक ।
दृष्टीं त्रैलोक्यनायेक । वसोन ठेला ॥ ३० ॥
३०) तो अगदी निःशंक मनानें गातो व नाचतो. अजूबाजूच्या लोकांचे अस्तित्व त्याला भासत नाहीं. कारण त्याच्या नजरेमध्यें त्रैलोक्यनायक भगवंत भरुन राहतो. 
ऐसा भगवंतीं रंगला । आणीक कांहीं नलगे त्याला ।
स्वइच्छा वर्णूं लागला । ध्यान कीर्ती प्रताप ॥ ३१ ॥
३१) अशा रीतीनें जो भगवंताच्या ठिकाणी रंगून जातो त्याला कशाचीही वासना शिल्लक उरत नाहीं. मग तो स्वछंदपणें भगवंताची ध्यान मूर्ती, त्याची कीर्ति आणि त्याचा प्रताप यांचें वर्णन करुं लागतो. 
नाना ध्यानें नाना मूर्ती । नाना प्रताप नाना कीर्ती ।
तयापुढें नरस्तुती । त्रुणतुल्य वाटे ॥ ३२ ॥
३२) भगवमताच्या नाना प्रकारच्या ध्यानमूर्ति, सगुण मूर्ति, कीर्ति आणि पराक्रम वर्णन करण्यापुढें माणसाची स्तुति करणें त्याला अगदीं कःपदार्थ वाटतें. 
असो ऐसा भगवद्भक्त । जो ये संसारीं विरक्त ।
तयास मानिती मुक्त । साधुजन ॥ ३३ ॥
३३) सार्‍या संसारापासून विरक्त असणारा असा तो वर वर्णन केलेला भगवद्भक्त असतो. त्याला संतमंडळीं मुक्त पुरुष मानतात.
त्याचे भक्तीचें कौतुक । तया नाव प्रसादिक ।
सहज बोलतां विवेक । प्रगट होय ॥ ३४ ॥
३४) अशा पुरुषाची भक्ति जेव्हां शब्दरुप घेऊन प्रगट होते, तेव्हां तिला प्रासादिक म्हणतात, त्याच्या सहज बोलण्यांत आत्मानात्मविवेक प्रगट होतो. 
ऐका कवित्वलक्षण । केलेंच करुं निरुपण ।
जेणे निवे अंतःकर्ण । श्रोतयांचें ॥ ३५ ॥  
३५) आतां उत्तम कवितेचे लक्षण ऐका. मागें सांगून झालें आहें तेंच पुनः सांगतों. तें सांगितल्यानें श्रोत्यांचें अंतःकरण तृप्त होईल. 
कवित्व असावें निर्मळ । कवित्व असावें सरळ ।
कवित्व असावें प्रांजळ । अन्वयाचें ॥ ३६ ॥    
३६) उत्तम कविता निर्मल, सरळ आणि मागचा पुढचा संदर्भ स्पष्ट करणारी असावी.  
कवित्व असावें भक्तिबळें । कवित्व असावें अर्थागळें ।
कवित्व असावें वेगळें । अहंतेसी ॥ ३७ ॥
३७) कविता भक्तीच्या भरांतून आलेली असावी. ती मोठ्या आशयानें भरलेलीं असावी. तिच्यामध्यें अहंकाराचा मागमूस नसावा.  
कवित्व असावें कीर्तिवाड । कवित्व असावें रम्य गोड ।
कवित्व असावें जाड । प्रतापविषीं ॥ ३८ ॥
३८) कवितेंत भगवंताची भरपूर कीर्ति, स्तुती असावी. कविता मन प्रसन्न करणारी व गोड असावी. कवितेमध्यें देवाचे पराक्रम काठोकाठ भरलेला असावा.  
कवित्व असावें सोपे । कवित्व असावें अल्परुपें ।
कवित्व असावें सुल्लपें । चरणबंद ॥ ३९ ॥
३९) कविता समजायला सोपी असावी. तशीच ती लहान असावी. कविता क्लिष्ट नसावी. कवितेचे चरण नियमाप्रमाणें बांधलेलें असावें.   
मृदु मंजुळ कोमळ । भव्य अद्भुत विशाळ ।
गौल्य माधुर्य रसाळ । भक्तिरसें ॥ ४० ॥
४०) कवितेमध्यें मुख्य भक्तिरस असावा. त्या भक्तिरसानें कविता मृदु, मंजुळ, कोमल, तशीच भव्य,  अद्भुत, विशाळ आणि व्यवस्थित रचलेली, मधुर आणि रसानें भरलेली अशी असावी.   
अक्षरबंद पदबंद । नाना चातुर्य प्रबंद ।
नाना कौशल्यता छंदबंद । धाटी मुद्रा अनेक ॥ ४१ ॥
४१) उत्तम कवितेमध्यें, पुढील अनेक गोष्टी असाव्यात. अक्षरबंध, पदबंध, म्हणजे चित्रकाव्य, नाना चतुर रचना, चातुर्यानें रचलेलें निरनिराळें छंद, बंध, धाटी, मुद्रा, 
नाना युक्ती नाना बुद्धी । नाना कळा नाना सिद्धी ।
नाना अन्वये साधी । नाना कवित्व ॥ ४२ ॥
४२) अनेक प्रकारचे उचित उपाय, चांगलें विचार, सुंदर कलाप्रकार, लहानमोठ्या सिद्धी, नाना कार्यकारण भावा, वेगवेगळे छंद,  
नाना साहित्य दृष्टांत । नाना तर्क धात मात ।
नाना संमती सिद्धांत । पूर्वपक्षेंसीं ॥ ४३ ॥
४३) नाना तर्हेची माहिती, निरनिराळे दृष्टांत, तर्कप्रकार, कथा व कहाण्या अनेक आधारवचनें, पूर्वपक्षासगट सिद्धांत,  
नाना गती नाना वित्पत्ती । नाना मती नाना स्फूर्ति ।
नाना धारणा नाना धृती । या नाव कवित्व ॥ ४४ ॥
४४) अनेक प्रकारच्या अवस्थांचें वर्णन, भिन्न भिन्न क्षेत्रांतील विद्वता, कल्पना व स्फूर्ति यांचे निरनिराळे प्रकार, अनेक तर्‍हेच्या धारणा, आणि धैर्याचे प्रकार या व असल्या गोष्टींचें सुंदर वर्णन ज्यांत आढळते ती उत्तम कविता होय.    
शंका आशंका प्रत्योत्तरें । नाना काव्यें शास्त्राधारें ।
तुटे संशये निर्धारें । निर्धारितां ॥ ४५ ॥
४५) उत्तम कवितेमध्यें शंका कुशंका, व आशंका मांडून प्रत्युत्तरानीं त्यांचें निरसन केलेलें असावें. अनेक काव्यसंग्रह व शास्त्रग्रंथ यांच्या वचनांचा आधार देऊन निश्र्चित निर्णय करावा. आणि अशारीतीनें संशय मोडून टाकावेत.       
नाना प्रसंग नाना विचार । नाना योग नाना विवर ।
नाना तत्वचर्चासार । या नाव कवित्व ॥ ४६ ॥
४६) पुढील गोष्टी ज्या साहित्यामध्यें आढळतात त्यास खरें उत्तम काव्य म्हणतां येते. उत्तम कवितेमध्यें अनेक प्रसंग,विचार, योग, स्पष्टीकरणें , तत्वांबद्दल चर्चेचा सारांश,  
नाना साधनें पुरश्र्चरणें । नाना तपें तीर्थाटणें ।
नाना संदेह फेडणें । या नाव कवित्व ॥ ४७ ॥
४७) साधनें, पुरश्र्चरणें, तपश्र्चर्येचें प्रकार, तीर्थाटनें आणि अनेक शंकांचें निरसन असावें. 
जेणें अनुताप उपजे । जेणें लोकिक लाजे ।
जेणें ज्ञान उमजे । या नाव कवित्व ॥ ४८ ॥
४८) ज्या कवितेच्या योगानें अनुताप उत्पन्न होतो, लौकिक जीवनाची म्हणजे देहबुद्धीच्या स्वार्थी जीवनाची लाज वाटते, आत्मज्ञान काय हें बरोबर ध्यानांत येते,  
जेणें ज्ञान हें प्रबळे । जेणे वृत्ती हे मावळे ।
जेणें भक्तिमार्ग कळे । या नाव कवित्व ॥ ४९ ॥
४९) ज्ञानाचा उत्कर्ष होतो. वृत्ति मावळतात, भक्तोमार्ग आकलन होऊं लागतो,  
जेणे देहबुद्धी तु्टे । जेणे भवसिंधु आटे ।
जेणें भगवंत प्रगटे । या नाव कवित्व ॥ ५० ॥
५०) देहबुद्धी नाश पावते, दृश्यभवसागर आटतो, भगवंत प्रगट होतो,  
जेणें सद्बुद्धि लागे । जेणें पाषांड भंगे ।
जेणें विवेक जागे । या नाव कवित्व ॥ ५१ ॥
५१) सद्बुद्धी अंगी जडते,आत्मज्ञानविरोधी मते भंग पावतात. आत्मानात्मविवेक जागा होतो,
जेणें सद्वस्तु भासे । जेणें भास हा निरसे ।
जेणें भिन्नत्व नासे । या नाव कवित्व ॥ ५२ ॥ 
५२) सद्वस्तु, परब्रह्म प्रचितीत येते, मिथ्या दृश्य भास नाहींसा होतो. भेद सगळा नाहींसा होतो, 
जेणें होये समाधान । जेणें तुटे संसारबंधन ।
जया मानिती सज्जन । तया नाव कवित्व ॥ ५३ ॥
५३) जीवाचें समाधान होतेम, संसाराचें बंधन तुटते, आणि ज्या कवितेला संत मान्यता देतात ती कविता उत्तम होय.    
ऐसें कवित्वलक्षण । सांगतां तें असाधारण ।
परंतु कांहींयेक निरुपण । बुझावया केलें ॥ ५४ ॥
५४) उत्तम कवितेचें लक्षण खरोखर सांगणें कठिण आहे. कारण तें फारच विलक्षण आहे. पण तिचें स्वरुप कांहींसे लक्षांत यावें म्हणून येथें थोडेसें वर्णन केलें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कवित्वकळानिरुपणनाम समास तिसरा ॥
Samas Tisara Kavitva Kala Nirupan
समास तिसरा कवित्वकला निरुपण



Custom Search