Wednesday, May 30, 2018

Samas Satava JagJivan Nirupan समास सातवा जगजीवन निरुपण


Dashak Satarava Samas Satava JagJivan Nirupan 
Samas Satava JagJivan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Jag Jivan. Jivan means Life. In this Samas Samarth is telling us about Atma is appearing differently in each person.
समास सातवा जगजीवन निरुपण
श्रीराम ॥
मुळीं उदक निवळ असतें । नाना वल्लीमधें जातें ।
संगदोषें तैसें होतें । आंब्ल तिक्षण कडवट ॥ १ ॥
१) पाणी मुळामध्यें स्वच्छ असते. अनेक प्रकारच्या वेली वनस्पतींमध्यें तें शिरते आणि त्यांच्या संगतीचा दोष लागून तें आंबट, तिखट किंवा कडू बनतें.  
आत्मा आत्मपणें असतो । देहसंगें विकारतो ।
साभिमानें भरीं भरतो । भलतिकडे ॥ २ ॥
२) त्याचप्रमाणें आत्मा मुळांत आत्मस्वरुपानें शुद्ध असतो. त्याला देहाची संगत लाभली कीं, त्याचें शुद्धपण लोपते. आणि त्याच्यांत विकार उत्पन्न होतात. अभिमानाच्या भरांत तो भलत्याच भरीला पडतो.
बरी संगती सांपडली । जैसी उंसास गोडी आली ।
विषवल्ली फापांवली । घातकी प्राणी ॥ ३ ॥
३) पाण्याला चांगली संगत लाभली कीं तें चांगलें होतें. जसें की, उसाची संगत लाभली की पाण्याचा गोड रस होतो. परंतु विषारी वेलीची संगत लागली तर त्याच पाण्याचा प्राणघातक रस होतो. 
अठराभार वनस्पती । गुण सांगावे ते किती ।
नाना देहाचे संगती । आत्मयास होये ॥ ४ ॥
४) अठरा प्रकारच्या वनस्पती आहेत. प्रत्येकांत पाण्यास निरनिराळे गुण प्राप्त होतात. ते सगळें सांगणें शक्य नाहीं. अंतरात्म्याचे देखील असेंच घडते. निरनिराळ्या देहांच्या संगतीनें त्याच्यामध्यें निरनिराळे गुण आढळतात. 
त्यामधें कोणी भले । ते संतसंगें निघाले ।
देहाभिमान सांडून गेले । विवेकबळें ॥ ५ ॥  
५) देहांत जें चांगलें असतात तें संतसंगतीनें कालक्रमणा करतात. सत् संगतीमुळें उत्पन्न होणार्‍या विवेकाच्या जोरावर ते देहाभिमान सोडून जातात. विवेकानें त्यांची देहबुद्धि नष्ट होते.       
उदजाचा नाशचि होतो । आत्मा विवेकें निघतो । 
ऐसा आहे प्रत्यय तो । विवेकें पाहा ॥ ६ ॥
६) परंतु पाणी व अंतरात्मा यांच्यात फरक आहे. पाणी पंचभूतांपैकी आहे. म्हणून त्याचा नाश होतो. अंतरात्मा अविनाशी असल्यानें तो आत्मानात्म विवेकानें देहांतून बाहेर पडतो. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. तो विचारानें ओळखावा.
ज्यास स्वहितचि करणें । त्यास किती म्हणौन सांगणें ।
हें ज्याचें त्यानें समजणें । सकळ कांहीं ॥ ७ ॥  
७) ज्याला आपले कल्याण करुन घ्यायचे आहे, त्याला आणखी किती सांगायचें? ज्याचें त्यानेंच हें सर्व कांहीं समजून घेतलें पाहिजे.  
आपला आपण करी कुडावा । तो आपला मित्र जाणावा ।
आपला नाश करी तो समजावा । वैरी ऐसा ॥ ८ ॥
८) जो स्वतःच स्वतःस सांभाळतो तो स्वतःचा मित्र समजावा. जो स्वतःच स्वतःचा नाश करतो, तो स्वतःचा शत्रु समजावा.  
आपलें आपण अन्हित करावें । त्यास आडवें कोणें निघावें ।
येकांतीं जाऊन जीवें । मारी आपणासी ॥ ९ ॥
९) जो स्वतःचे अकल्याण करायला निघाला असेल, त्याला आडवें जाण्यांत अर्थ नाहीं. एकांतामध्यें जाऊन तो स्वतःच आपला जीव देतो.
जो आपला आपण घातकी । तो आत्महत्यारा पातकी ।
याकारणें विवेकी । धन्य साधु ॥ १० ॥
१०) जो स्वतःच आपला घात करुन घेतो तो आत्महत्यारा पातकी समजावा. म्हणून आत्मानात्म विवेक करणारा साधु धन्य होय. 
पुण्यवंतां संत्सगती । पापिष्टां असत्संगती । 
गति आणि अवगती । संगतीयोगें ॥ ११ ॥
११) पुण्यवान पुरुष सत् संगती धरतो. तर पापी वाईट संगति धरतो. त्या संगतीमुळें एकाला उत्तम गति मिळते तर दुसर्‍याला अधोगति मिळते. 
उत्तम संगती धरावी। आपली आपण चिंता करावी ।
अंतरीं बरी विवरावी । बुद्धि जाणत्याची ॥ १२ ॥
१२) म्हणून माणसानें उत्तम संगति धरावी. आपणच आपली काळजी घ्यावी. जाणत्या माणसाचे विचार घेऊन आपल्या अंतर्यामी त्यांचें विवरण करावें. 
इहलोक आणि परलोक । जाणता तो सुखदायेक । 
नेणत्याकरितां अविवेक । प्राप्त होतो ॥ १३ ॥
१३) इहलोक असो किंवा परलोक असो, दोन्हीकडे जो जाणता असेल त्यास सुख लाभते. जो नेणता आहे तो दोन्हीकडे अविवेकानें वागतो. 
जाणता देवाचा अंश । नेणता म्हणिजे तो राक्षस ।
यामधें जें विशेष । तें जाणोन घ्यावें ॥ १४ ॥
१४) जो जाणता आहे तो देवाचा अंश समजावा. तर नेणता आहे तो राक्षसाचा अंश समजावा. या दोन्हींत जें विशेष असेल, योग्य आणि ग्राह्य असेल , ते ओळखून ग्रहण करावें.
जाणतां तो सकळां मान्य । नेणता होतो अमान्य ।
जेणेंकरितां होईजे धन्य । तेंचि घ्यावें ॥ १५ ॥
१५) जो जाणता असेल तो सगळ्यांना मान्य होतो. तर जो नेणता आहे तो सर्वांना अमान्य होतो. ज्याच्या योगानें आपण धन्य होऊन जाऊं, तेच आपण ग्राह्य करावें.  
साक्षपी शाहाण्याची संगती । तेणें साक्षपी शाहाणें होती ।
आळसी मूर्खाची संगती । आळसी मूर्ख ॥ १६ ॥
१६) उद्योगी व शाहाण्या माणसाची संगत आपण धरली तर आपण देखील उद्योगी व शहाणे बनतो. आळशी व मूर्ख माणसाची संगत आपल्यला आळशी व मूर्ख बनवते.  
उत्तम संगतीचें फळ सुख । अद्धम संगतीचें फळ दुःख ।
आनंद सांडुनियां शोक । कैसा घ्यावा ॥ १७ ॥
१७) उत्तम संगतीचे सुख हें फळ आहे. तर अधम संगतीचे दुःख हे फळ आहे.  असें जर आहे तर आनंदाचा अव्हेर करुन मुद्दाम दुःख पत्करणें योग्य नाहीं.  
ऐसें हें प्रगट दिसे । जनामधें उदंड भासे ।
प्राणीमात्र वर्ततसे । उभयेयोगें ॥ १८ ॥
१८) जगांत हें उघड दिसतें. लोकांमध्यें हें पुष्कळ पाहावयास मिळतें. कांहीं लोक सत्संगतीनें वागतात तर लोक असत्संगतीनें वागतात. तर कांहीं त्यामुळें बिघडतात. या दोन्ही गोष्टी पाहावयास मिळतात. 
येका योगें सकळ योग । येका योगें सकळ वियोग ।
विवेकयोगें सकळ प्रयोग । करीत जावे ॥ १९ ॥
१९) सज्जनांशी योग आला तर सगळ्या चांगल्या गोष्टी जुळून येतात. दुर्जनांशी योग आला तर सगळ्या गोष्टींचा विचका होतो. असें असल्यानें आपली सर्व कामें विवेकी पुरुषांच्या मदतीनें करीत जावीत.   
अवचितें सांकडींत पडिलें । तरी तेथून पाहिजे निघालें ।
निघोन जातां जालें । परम समाधान ॥ २० ॥
२०) समजा एखादे अनपेक्षित संकट आपल्यावर आलें तर न घाबरतां विवेकानें आपण त्यांतून बाहेर पडावें. असे केल्यानें मनाला फार मोठे समाधान लाभते.  
नाना दुर्जनांचा संग । क्षणक्षणा मनभंग ।
याकारणें कांहीं रंग । राखोन जावें ॥ २१ ॥
२१) जीवनांत अनेक प्रकारच्या दुर्जनांशी संगत घडते. त्या योगानें पदोपदी आपला मानभंग होतो. आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात. या कराणानें आपलें महत्व राहील असेंच आपण वागावें. 
शाहाणा येत्न त्याच्या गुणें । पाहों जातां काये उणें ।
सुख संतोष भोगणें । नाना श्र्लाघ्यता ॥ २२ ॥  
२२) मनुष्य जर शहाणपणानें प्रयत्न करील, तर त्या गुणानें माणसाला कांहींच कमी पडणार नाहीम. त्याच्या प्रयत्मनानें सुखसंतोष तर लाभेलच पण लोकांमध्यें त्याला महत्व प्राप्त होईल.        
आतां लोकीं ऐसें आहे । सृष्टीमधें वर्तताहे ।
जो कोणी समजोन पाहे । त्यास घडे ॥ २३ ॥
२३) जगामध्यें आणि मानवसमाजामध्यें अशी परिस्थिती आहे त्याला इलाज नाहीं. जो माणूस हें समजून जगतो त्यास सुखसंतोष लाभतो. 
बहुरत्न वसुंधरा । जाणजाणों विचार करा ।
समजल्यां प्रत्ययो अंतरा- । माजीं येतो ॥ २४ ॥
२४) या पृथ्वीवर पुष्कळ नररत्नें आहेत. त्यांना जाणून घ्यावें व आपण विचार करावा. अशा प्रकारें जीवन समजले म्हणजे आपल्या अंतर्यामीं आपल्याला प्रचिती येते. 
दुर्बळ आणि संपन्न । वेडें आणि वित्पन्न । 
हें अखंड दंडायमान । असतचि असे ॥ २५ ॥
२५) एक दरिद्री तर एक श्रीमंत, एक वेडा तर एक विद्वान, अशी जगाची राहाटी पूर्वीपासून चालत आलेली आहे. हा भेद असाच कायम राहाणार.  
येक भाग्यपुरुष मोडती । येक नवे भाग्यवंत होती ।
तैसीच विद्या वित्पत्ती । होत जाते ॥ २६ ॥
२६) एके काळी संपत्तिमान असलेलेम पुरुष कालंतरानें संपत्तिहीन बनतात. आणि नविन संपत्तिमान पुरुष पुढें येतात. विद्येच्या आणि ज्ञानाच्या बाबतींतही असेंच घडतें. 
येक भरे येक रितें । रितें मागुतें भरतें ।
भरतेंहि रितें होतें । काळांतरीं ॥ २७ ॥
२७) एक भरतें, दुसरें रिकामें होते. रिकामें झालेलें पुनः भरते. कालांतरानें जें भरलेलें असरें तें पुनः रिकामें होऊन जाते. 
ऐसी हे सृष्टीची चाली । संपत्ति दुपारची साउली ।
वयेसा तरी निघोन गेली । हळुहळु ॥ २८ ॥
२८) सृष्टीचा व्यवहार हा असा चालतो. दुपारची सावली जशी तात्पुरती तशीच संपत्तिची स्थिती असतें. माणसाचें आयुष्य न कळत हळुहळु कमी होत असते. 
बाळ तारुण्य आपलें । वृधाप्य प्रचितीस आलें ।
ऐसें जाणोन सार्थक केलें । पाहिजे कोणियेकें ॥ २९ ॥
२९) बाळपण जातें, तरुणपण जातें आणि म्हातारपण अनुभवास येते.हें ओळखून प्रत्येकानें आपलें सार्थक करुन घ्यावें. 
देह जैसें केलें तैसें होतें । येत्न केल्यां काये साधतें ।
तरी मग कष्टाचें तें । काये निमित्य ॥ ३० ॥
३०) देहाला जसें वागवावें तसें तो वागायला शिकतो. माणसानें प्रयत्न केला तर त्याला कोणतेही कार्य साध्य करतां येते. असें असल्यानें मग विनाकारण कष्ट करण्याचें कांहींच कारण नाहीं. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे जगजीवननिरुपणनाम समास सातवा ॥    
   Samas Satava JagJivan Nirupan
समास सातवा जगजीवन निरुपण


Custom Search

Tuesday, May 29, 2018

Samas Sahava Dehatma Nirupan समास सहावा देहात्म निरुपण


Dashak Satarava Samas Sahava Dehatma Nirupan 
Samas Sahava Dehatma Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Deha (body) and Aatma. Body and Aatma both are related to each other.
समास सहावा देहात्म निरुपण
श्रीराम ॥
आत्मा देहामध्यें असतो । नाना सुखदुःखें भोगितो ।
सेवटीं शरीर सांडून जातो । येकायेकीं ॥ १ ॥
१) आत्मा देहांत राहतो आणि अनेक प्रकारची सुखदुःखें भोगतो. अखेर तो एकाएकी देह सोडून जातो.     
शरीरीं शक्ति तारुण्यपणीं । नाना सुखें भोगी प्राणी ।
अशक्त होतां वृद्धपणीं । दुःखें भोगी ॥ २ ॥
२) तरुणपणीं शरीरांत शक्ति असते त्या जोरावर माणूस अनेक सुखें भोगतो. म्हातारपणीं शक्ति क्षीण होते व मग अनेक दुःखें भोगावी लागतात. 
मरावेना ऐसी आवडी । हातपाये खोडून प्राण सोडी ।
नाना दुःखें अवघडी । वृद्धपणीं ॥ ३ ॥
३) आपण मरुं नये असें प्रत्येकास मनापासून वाटतें. पण मृत्यु आला कीं, माणूस हातपाय झाडून प्राण सोदतो. म्हातारपणीं अनेक प्रकारच्या दुःखांनीं माणूस अवघडून जातो. 
देहआत्मयांची संगती । कांहींयेक सुख भोगिती ।
चर्फडचर्फडून जाती । देहांतकाळीं ॥ ४ ॥
४) देह व आत्मा यांची संगत झाली म्हणजे कांहीं सुखें भोगायला मिळतात. हें खरें, पण देह सुटायच्यावेळीं जीव अगदी धडपडून मरतो.  
ऐसा आत्मा दुःखदायेक । येकांचे प्राण घेती येक ।
आणी सेवटीं निरार्थक । कांहींच नाहीं ॥ ५ ॥
५) देहात्मयोग अशारीतीनें दुःख देणारा होतो. जगांत स्वार्थानें माणसें एकमेकांचा प्राण घेतात. पण शेवटीं हें सगळें व्यर्थ जातें. त्याचा कांहीं उपयोग होत नाहीं. 
ऐसा दों दिसांचा भ्रम । त्यास म्हणती परब्रह्म ।
नाना दुःखाचा संभ्रम । मानून घेतला ॥ ६ ॥
६) असा हा दोन दिवसांचा दृश्याचा भ्रम आहे. त्यालाच परब्रह्म समजून, सर्वस्व मानून लोक जगतात. या दुःखाच्या पसार्‍याला लोक गोड मानून घेतात. 
दुःखी होऊन चर्फडून गेले । तेथें कोण समाधान जालें ।
कांहींयेक सुख भोगिलें । तों सवेंचि दुःख ॥ ७ ॥
७) दुःख भोगावें लागल्यानें चरफडत जाण्याची पाळी आली तर त्यांत कांहींही समाधान मिळत नाहीं. थोडें कांहीं सुख भोगायला जावें तर त्याच्याबरोबर दुःख भोगावें लागतें. 
जन्मदारभ्य आठवावें । म्हणिजे अवघें पडेल ठावें ।
नाना दुःख मोजावें । काये म्हणोनी ॥ ८ ॥
८) जन्मल्यापासूनचें आपलें जीवन आपण आठवावें, म्हणजे सगळें आपोआप ध्यानांत येईल. आपण इतकीं दुःखें भोगलेलीं असतात कीम त्यांची मोजदाद करतां येणार नाहीं.  
ऐसी आत्मयांची संगती । नाना दुःखें प्राप्त होती ।
दैन्यवाणे होऊन जाती । प्राणीमात्र ॥ ९ ॥
९) देहाशीं आत्म्याची संगत ही अशी आहे. देहात्मयोगानें जीवाला अनेक दुःखें भोगावीं लागतात. आयुष्याच्या शेवटीं सारे प्राणी दीनवाणें होऊन मरतात.   
कांहीं आनंद कांहीं खेद । जन्मवरी पडिला समंध ।
नाना प्रकारीं विरुद्ध । तडातोडी ॥ १० ॥
१०) कांहीं सुख व कांहीं दुःख, असा हा जन्माचा संबंध असतो. त्यामध्यें नाना प्रकारच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात, तसेंच अनेकांची ताटातूट होते.   
निद्राकाळीं ढेकूण पिसा । नाना प्रकारीं वळसा ।
नाना उपायें वळसा । त्यांस होये ॥ ११ ॥
११) झोपेच्या वेळीं ढेकूण आणि पिसवा अनेक प्रकारें माणसाला त्रास देतात. माणूस त्यांचा प्रतिकार करतो. तेव्हां त्यांनाहीं अनेक प्रकारें त्रास होतो. 
भोजनकाळीं माश्या येती । नाना पदार्थ उंदीर नेती ।
पुढें त्यांची हि फजिती । मार्जारें करिती ॥ १२ ॥
१२) जेवायला बसलें कीं माश्या येऊन त्रास देतात. उंदीर कितीतरी पदार्थ घेऊन जातात. नंतर मांजरें त्यांची फजिती करतात. त्यांना त्रास देतात. 
वा चामवा गोंचिड । गांधेलें कानटें उदंड ।
येकास येक चर्फड । दोहिकडे ॥ १३ ॥
१३) उवा, चामवा, कातड्यांत शिरणारे किडे, गोचीड, गांधील माश्या, कानटे नावाचे सर्प, असे नाना प्रकारचे प्राणी आहेत. या प्राण्यांत एकमेकाविषयीं वैर असतें. त्यामुळें सर्वांना दुःख भोगावें लागतें. 
विंचु सर्प वाग रिसें । सुसरी लांडिगे माणसास माणसें ।
परस्परें सुखसंतोषें । येकहि नाहीं ॥ १४ ॥
१४) विंचू, साप, वाघ, अस्वल, सुसरी, लांडगे आणि माणसाला माणसें या सर्व प्राण्यांमध्यें परस्परांबद्दल प्रेम, सुख व संतोष कोठेंहि आढळत नाहीं.
चौर्‍यासि लक्ष उत्पत्ती । येकास येक भक्षिती ।
नाना पीडा दुःखणी किती । म्हणौन सांगावें ॥ १५ ॥
१५) जगांत येवढे चौर्‍यांशी लक्ष प्राणी आहेत, पण ते एकमेकांना खातात. जगांत पीडांचे व दुःखांचे इतके प्रकार आहेत कीं, त्या सर्वांचे वर्णन करणें अशक्य आहे.   
ऐसी अंतरात्म्याची करणी । नाना जीव दाटले धरणी ।
परस्परें संव्हारणी । येकायेकांची ॥ १६ ॥
१६) त्या अंतरात्म्याची करणी अशी विलक्षण आहे. या पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव गर्दी करुन आहेत. ते परस्परांचा संहार करतात. 
अखंड रडती चर्फडिती । विवळोंविवळ प्राण देती ।
मूर्ख प्राणी त्यास म्हणती । परब्रह्म ॥ १७ ॥
१७) जीवनामध्यें माणूस दुःखानें सारखा रडतो., चरफडतो, दुःखानेम विव्हळून प्राण देतो. अशा या दुःखमय जीवात्म्याला लोक परब्रह्म मानतात.
परब्रह्म जाणार नाहीं । कोणास दुःख देणार नाहीं ।
स्तुति निंदा दोनी नाहीं । परब्रह्मीं ॥ १८ ॥
१८) परब्रह्म शाश्वत असल्यानें तें कधीं जात नाहीं. तें कोणास दुःख देणार नाहीं. त्याच्या ठिकाणीं निंदा व स्तुति दोन्ही स्पर्श करुं शकत नाहीं.
उदंड शिव्या दिधल्या । तितुक्या अंतरात्म्यास लागल्या ।
विचार पाहातां प्रत्यया आल्या । येथातथ्य ॥ १९ ॥
१९) एखाद्यानें खूप शिव्या दिल्या तर त्या सगळ्या अंतरात्म्यास लागतात. विचार करुन पाहिलें तर हा अगदी असाच अनुभव येतो. 
धगडीचा बटकीचा लवंडीचा । गधडीचा कुतरीचा वोंगळीचा ।
ऐसा हिशेब सिव्यांचा । किती म्हणोनि सांगावा ॥ २० ॥
२०) धगडीचा, बटकीचा, लवंडीचा, गधडीचा, कुतरीचा, चांडाळणीचा अशा कितीतरी शिव्या आहेत. त्या सर्व सांगता येणार नाहींत. 
इतुकें परब्रह्मीं लागेना । तेथें कल्पनाचि चालेना ।
तडातोडीचें ज्ञान मानेना । कोणीयेकासी ॥ २१ ॥
२१) पण यापैकीं कांहींसुद्धा परब्रह्मास स्पर्श करुं शकत नाहीं. परब्रह्माच्या ठिकाणीं मानवी कल्पना चालूंच शकत नाहीं. असंबद्ध ज्ञान कोणासही मान्य होणार नाहीं.  
सृष्टीमधें सकळ जीव । सकळांस कैचे वैभव ।
याकारणें ठायाठाव । निरमिला देवें ॥ २२ ॥   
२२) सगळे प्राणी या पृथ्वीवर जगतात. पण ते सगळें कांहीं वैभव भोगित नाहीत. सगळ्यांना वैभव भोगावयास मिळत नाहीं याचा अर्थ असा कीं, भगवंतानें प्रत्येकाचें स्थान ठरवून त्यास निर्माण केलें आहे.                 
उदंड लोक बाजारीचे । जें जें आलें तें तें वेंचे ।
उत्तम तितुके भाग्याचे । लोक घेती ॥ २३ ॥
२३) बाजार भरला म्हणजे पुष्कळ लोक बाजारांत येतात. त्यापैंकी बहुतेक माणसें अशीं असतात कीं, जो कांहीं माल विकायला आला असेल तो ते विकत घेतात. परंतु त्यांच्यापैकीं जे भाग्यवान असतात तेच तेवढें उत्तम वस्तु घेऊन जातात. त्याचप्रमाणें या संसाराच्या बाजारांत बहुजनसमाज प्रपंचाच्या मागें धांवतो. थोडीं पुण्यवान माणसें भगवंताच्या नादी लागून भगवंताची प्राप्ती करुन घेतात.  
येणेंचि न्यायें अन्न वसन । येणेंचि न्यायें देवार्चन ।
येणेंचि न्यायें ब्रह्मज्ञान । प्राप्तव्यासारिखें ॥ २४ ॥
२४) अन्नवस्त्र, देवपूजा आणि ब्रह्मज्ञान यांच्या बाबतींत हाच न्याय लागूं पडतो. माणसाचें अन्नवस्त्र, त्याच्या हातून घडणारें देवतार्चन आणि त्यास प्राप्त होणारे ब्रह्मज्ञान या तिन्ही गोष्टी नियतीवर अवलंबून असतात.  
अवघेच लोक सुखी असती । संसार गोड करुन नेती ।
माहाराजे वैभव भोगती । तें करंट्यास कैचें ॥ २५ ॥
२५) जगांत सगळेच लोक सुखी असतात. आपला संसार जसा असेल तसा तें गोड करुन घेतात. परंतु महाराजे जें वैभव भोगतात तें कांहीं करंट्यांच्या वाट्यास येत नाहीं. 
परंतु अंती नाना दुःखें । तेथें होतें सगट सारिखें ।
पूर्वी भोगिलीं नाना सुखें । अंतीं दुःख सोसवेना ॥ २६ ॥
२६) माणसाला शेवटीं अनेक प्रकारची दुःखें भोगावी लागतात. सर्व माणसांना ती सारख्याच स्वरुपांत भोगावी लागतात. अयुष्यांत आधी सुखें भोगलेलीं असल्यामुळें अंतकाळीं होणारीं दुःखें सोसवत नाहींत.    
कठिण दुःख सोसवेना । प्राण शरीर सोडिना ।
मृत्यदुःख सगट जना । कासाविस करी ॥ २७ ॥
२७) कठीण दुःखें सोसवत नाहींत आणि प्राण तर जाता जात नाहीं. अशा रीतीनें मरणकाळचें दुःख सर्व लोकांना सारखेंच कासावीस करुन सोडते. 
नाना अवेवहीन जालें । तैसेंचि पाहिजे वर्तलें ।
प्राणीं अंतःकाळीं गेलें । कासाविस होऊनी ॥ २८ ॥
२८) रोगानें किंवा अपघातानें कोणाचें अवयव निकामी होतात किंवा तोडावें लागतात. पण अशा अवयवहीन अवस्थेंत माणसाला जीवनाचे व्यवहार करावें लागतात. अशी सगळीं माणसें अंतकाळीं कासावीस होऊन मरतात.  
रुप लावण्य अवघें जातें । शरीरसामर्थ्य अवघें राहातें ।
कोणी नस्तां मरतें । आपदआपदों ॥ २९ ॥
२९) माणसाचें रुप किंवा सौंदर्य तें सगळें नष्ट होतें. शरीरांतील सामर्थ्य नाहींसें होतें. जवळ कोणी असत नाहीं. अशा परिस्थितींत यातना भोगीत माणूस मरतो.  
अंतकाळ दैन्य दीन । सकळिकांस तत्समान । 
ऐसें चंचळ अवलक्षण । दुःखकारी ॥ ३० ॥
३०) अंतकाल सर्वंना सारखाच असतो. त्यावेळीं माणसाची फार दीनवाणी अवस्था होतें. अशाश्वताचे दुःखकारक अवलक्षण हें असें आहे. 
भोगून अभोक्ता म्हणती । हे तों अवघीच फजिती ।
लोक उगेच बोलती । पाहिल्याविण ॥ ३१ ॥
३१) भोग भोगून अभोक्तेपणा ठेवावा अशी भाषा लोक बोलतात. पण ही सगळी फजिती आहे. खरें पाहिल्यावाचून लोक उगीच कांहींतरी बोलतात. भोग भोगीत असतांना मनानें त्यापासून अलिप्त राहणें ही कांहीं सामान्य गोष्ट नव्हें. देहदुःख आलें असतां मोठमोठे साधक अनुसंधानापासून खालीं घसरतात. किंबहुना देहदुःख व दारिद्र्य या दोन अवस्थांत भगवंतास यत्किंचित दोष न देतां जो आपलें अनुसंधान यथास्थित सांभाळतो, तोच साधकाच्या पदावर स्थिर झाला असें खात्रीनें समजावें. बाकीचे साधक खरें पण परीक्षा पास झालेले साधक नव्हेत.    
अंतकाळ आहे कठिण । शेरीर सोडिना प्राण ।
बराड्यासारिखें लक्षण । अंतःकाळीं ॥ ३२ ॥ 
३२) अंतकाळ फार कठीण आहे. जीव वासनेंत गुंतल्यानें प्राण शरीराला सोडता सोडीत नाहीं. त्यामुळें सामान्य माणसाची अवस्था एखाद्या भिकार्‍यासारखीं अगदी दीनवाणी बनतें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहात्मनिरुपणनाम समास सहावा ॥
Samas Sahava Dehatma Nirupan
समास सहावा देहात्म निरुपण


Custom Search

Sunday, May 27, 2018

Samas Pachava Ajapa Nirupan समास पांचवा अजपा निरुपण


Dashak Satarava Samas Pachava Ajapa Nirupan 
Samas Pachava Ajapa Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Ajapa. The Mantra, that goes on and on with our breath every now. That mantra is Soham, Soham.
समास पांचवा अजपा निरुपण
श्रीराम ॥
येकवीस सहश्र सासें जपा । नेमून गेली ते अजपा ।
विचार पाहातां सोपा । सकळ कांहीं ॥ १ ॥
१) दिवसाच्या चोवीस तासांमध्यें माणसाचे एकवीस हजार सहाशें श्वास प्रश्वास होतात. हा नैसर्गिकजप आहे. यास अजपाजप म्हणतात. विचार करुन पाहिलें तर यांत कठिण कांहीं नाहीं.   
  मुखीं नासिकीं असिजे  प्राणें । तयास अखंड येणें जाणें ।
याचा विचार पाहाणें । सूक्ष्मदृष्टीं ॥ २ ॥
२) तोंड व नाक यांत प्राणाचें राहाणें असतें. प्राण सारखा येतो व जातो. याविषयीं सूक्ष्म विचार करावा. 
मुळीं पाहातां येक स्वर । त्याचा तार मंद्र घोर ।
त्या घोराहून सूक्ष्म विचार । अजपाचा ॥ ३ ॥
३) मुळामध्यें स्वर एकच आहे. तार म्हणजे उच्च स्वर, मंद्र म्हणजे मध्य स्वर, आणि घोर म्हणजे खालचा स्वर. घोर किंवा खालच्या स्वराहून अजपा अधिक सूक्ष्म आहे.  
सरिगमपदनिस । सरिं मात्रुका सायास । 
प्रथम स्वरें मात्रुकांस । म्हणोन पाहावें ॥ ४ ॥  
४) गायन शास्त्रामध्यें सा रे ग म प ध नि सा हे सात स्वर आहेत.प्रथम सप्तकांतील सा पासून आरंभ करावा आणि दुसर्‍या सप्तकांतील रे पर्यंत स्वरमातृका प्रयत्नानें म्हणून पाहाव्या.   
परंवाचेहून अर्तें । आणि पश्यंतीखालतें ।
स्वराचेजन्मस्थान तें । तेथून उठे ॥ ५ ॥
५) अशा रीतीनें चढतें उतरतें स्वर म्हणून पहावें. तसें म्हटल्यास परावाचेच्या अलीकडे म्हणजे बेंबीच्यावर आणि पश्यन्तीच्या खाली म्हणजे हृदयाच्या खालीं स्वरांचे जन्मस्थान आहे. असे आढळून येईल. तेथून स्वर उत्पन्न होतो.  
येकांतीं उगेंच बैसावें । तेथें हें समजोन पाहावें ।
अखंड घ्यावें सांडावें । प्रभंजनासी ॥ ६ ॥
६) एखाद्या अगदी निवांत ठिकाणी बसावें. मन स्वस्थ असावें. आणि तेथें हें सगळें नीट लक्ष देऊन पाहावें. अखंड येणार्‍या व जाणार्‍या वायूवर लक्ष ठेवावें. 
येकांतीं मौन्य धरुन बैसे । सावध पाहातां कैसें भासे ।
सोहं सोहं ऐसे । शब्द होती ॥ ७ ॥
७) एकान्तामध्यें मौन धरुन बसावें आणि सावधपणें श्वास प्रश्वासाच्या येजाकडे लक्ष द्यावें. तेव्हां असें प्रत्ययास येईल कीं, श्वासाच्या येण्याकाण्यामध्यें सोहं सोहं असे शब्द होत आहेत. 
उच्चारेंविण जे शब्द । ते जाणावेसहज शब्द ।
प्रत्यया येती परंतु नाद । कांहींच नाहीं ॥ ८ ॥
८) आपणहून प्रयत्न न करतां उच्चार न करतां जे हे शब्द ऐकू येतात ते सहज शब्द समजावे. आपल्या जन्मापासून ते आपल्याबरोबर असतात. त्या शब्दांचा उच्चार झालेला समजतो. परंतु त्यांना ध्वनीचें व्यक्त स्वरुप नसतें.   
ते शब्द सांडून बैसला । तो मौनी म्हणावा भला ।
योगाभ्यासाचा गल्बला । याकारणें ॥ ९ ॥
९) सोहं सोहं असे होणारे सहज शब्द जो मागे टाकून बसतो, तो खरा उत्तम मौनी होय. हे साधन्यासाठींच योगाभ्यासाची खटपट असते. 
येकांतीं मौन्य धरुन बैसला । तेथें कोण शब्द जाला । 
सोहं ऐसा भासला । अंतर्यामीं ॥ १० ॥
१०) आपण मौन धरुन एकांतामध्यें बसलो असतां कोणतातरी शब्द उमटल्याचा भास होतो. आपण त्याला सोहं असें म्हणतो. आपल्या मनानें कल्पिलेला तो एक भास असतो.  
धरितां सो सांडितां हं । अखंड चाले सोहं सोहं ।
याचा विचार पाहातां बहु । विस्तारला ॥ ११ ॥
११) श्वास घेतांना सो असा सूक्ष्म आवाज होतो. आणि श्वास सोडतांना हं असा सूक्ष्म आवाज होतो. अशा रीतीनें अखंड सोहं सोहं शब्द चालतो. याचा विचार करावयाचा तर त्याचा विस्तार फार मोठा आहे. 
देहधारक तितुका प्राणी । श्र्वेतजउद्भिजादिक खाणी ।
स्वासोस्वास नस्तां प्राणी । कैसे जिती ॥ १२ ॥
१२) स्वेदज, उद्बिज, जारज आणि अंडज असे चार खाणींमधील जे देहधारक प्राणी आहेत, त्या सर्वांना श्वासोश्वास आहे. त्याविना देहधारक प्राणी जगूंच शकत नाहीत. वनस्पतींना देखील प्राणवायूची गरज असते. त्यांच्यामधें जीवनकला असते. हें संत जाणतात.  
ऐसी हे अजपा सकळासा । परंतु कळे जाणत्यासी । 
सहज सांडून सायासीं । पडोंच नये ॥ १३ ॥
१३) अशा रीतीनें सर्व सजीव प्राण्यांमधें अजपा श्वासोश्वासाबरोबर चालूं असतो. ही विनासायास होणारी अजपा फक्त जाणत्यांनाच आकलन होते. सहज चालणारी ही अजपा सोडून कष्टाच्या साधनामागें जाऊं नये.  
सहज देव असतचि असे । सायासें देव फुटे नासे ।
नासिवंत देवास विश्र्वासे । ऐसा कवणु ॥ १४ ॥
१४) देव आपले स्वस्वरुप असल्यानें तो आपल्यापाशीं नेहमी सहज असतोच. सायासानें व कष्टानें निर्माण केलेला देव तुटतो, फुटतो व नाश पावतो. नाशवंत देवावर कोणी विश्र्वास ठेवीत नाहीं.
जगदांतराचें दर्शन । सहज घडे अखंड ध्यान ।
आत्मइछेनें जन । सकळ वर्तती ॥ १५ ॥
१५) जगामध्यें अंतर्यामीपणानें राहणार्‍या अंतरात्म्याचें दर्शन सहज घडतें. त्याचे ध्यान अखंड राहणें हेच त्याचे दर्शन होय. त्या अंतरात्म्याच्या इच्छेने सर्व प्राणीमात्र वागतात.  
आत्मयाचे समाधान । घडे तैसेंचि आशन ।
सांडलें फिटलें समर्पण । तयासीच होये ॥ १६ ॥
१६) अंतरात्म्याचे समाधान होईल असें खाणें प्रत्येक प्राण्याचे घडत असतें. त्याचप्रमाणें जें सांडतें, लवंडते, हरवतें हे देखील अंतरात्म्यालाच समर्पण होते. अग्नपुरुष पोटीं वसती । तयास अवदानें सकळ देती ।
लोक आज्ञेमधें असती । आत्मयांचे ॥ १७ ॥
१७) प्रत्येक प्राण्याच्या पोटांत अग्निनारायण वास करतो. त्या जठराग्नीला सर्वजण आहुती देतात. अशा रीतीनें सर्व प्राणी त्या अंतरात्म्याच्या आज्ञेंतच वागतात. 
सहज देवजपध्यानें । सहज चालणें स्तुती स्तवनें ।
सहज घडे तें भगवान्नें । मान्य कीजे ॥ १८ ॥
१८) आपल्या अंतर्यामी अंतरात्मा अगदी सहज आहे. त्याचा जप, ध्यान सहज चाललेम पाहिजे. आपलें सहज बोलणें चालणें हीच त्याची स्तुति व स्तवन . अशा रीतीनें जें सहज घडेल तेंच भगवंताला मान्य होतें.  
सहज समजायाकारणें । नाना हटयोग करणें ।
परंतु येकायेकीं समजणेंद्र । घडत नाहीं ॥ १९ ॥
१९) ही सहजावस्था काय आहे हें समजण्यासाठीं साधकाला अनेक कठीण साधनें करावी लागतात. अनेक साधनें केल्याखेरीज सहजावस्था कशी असते तें चटकन समजणें जमत नाहीं.  
द्रव्य चुकतें दरिद्र येतें । तळीं लक्ष्मी वरी वर्ततें ।
प्राणी काये करील तें । ठाउकें नाहीं ॥ २० ॥
२०) द्रव्य आहे तें पुरुन ठेवलेले आहे. त्याची जागा चुकली कीं द्रव्य असून दारिद्र्य येते. माणूस ज्या ठिकाणीं बसतो त्याच्या खालींच द्रव्य तळाशीा असते.  त्याचा व्यवहार वर चालतो. त्याला माहित नसतें. त्यामुळें तो दारिद्र्य भोगतो.      
तळघरामधें उदंड द्रव्य । भिंतीमधें घातलें द्रव्य ।
स्तंभी तुळवटीं द्रव्य । आपण मधें ॥ २१ ॥
२१) तळघरामध्यें खूप द्रव्य असतें, भिंती, खांब व तुळ्या द्रव्यांनी भरलेल्या असतात. असें सभोवती द्रव्य भरलेले असून हा त्यामध्यें दरिद्रीपणानें राहतो. 
लक्ष्मीमध्यें करंटा नांदे । त्याचें दरिद्र अधीक सांदे ।
नवल केलें परमानंदें । परमपुरुषें ॥ २२ ॥
२२) आजुबाजुला संपत्ती असून तिच्यामधें भाग्यहीन माणूस असतो. तेव्हां त्याचे करंटेपण अधिकच उठून दिसते. परमानंदस्वरुप परमात्म्यानें हा केवढा मोठा चमत्कार केलेला आहे.   
येक पाहाती येक खाती । ऐसी विवेकाची गती ।
प्रवृत्ति अथवा निवृत्ती । येंणेंचि न्यायें ॥ २३ ॥
२३) व्यवहारामध्यें जसा श्रीमंत माणूस ऐश्वर्य भोगतो आणि दरिद्री माणूस त्याच्याकडे नुसता बघत बसतो, तसा परमार्थांत जो विवेकशील असतो तो भगवंताचा आनंद भोगतो व जो विवेकशील नाहीं तो त्याच्याकडे नुसता आशाळभूतपणें बघत बसतो. विवेकशील माणूस प्रपंचांतून निवृत्त होऊन अंतरात्म्याला ओळखतो तर अविवेकी माणूस दृश्यामध्यें प्रवृत होऊन नाना प्रकारची प्रापंचिक दुःखें भोगतो. 
अंतरीं वसतां नारायेणें । लक्ष्मीस काये उणें ।
ज्याची लक्ष्मी तो आपणें । बळकट धरवा ॥ २४ ॥
२४) ज्याच्या अंतर्यामीं नारायण वस्ती करतो त्याला लक्ष्मी कमी पडणें शक्य नाही. म्हणून लक्ष्मी ज्याच्या आधीन आहे तो नारायण आपण घट्ट धरुन ठेवावा.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अजपानिरुपणनाम समास पांचवा ॥
Samas Pachava Ajapa Nirupan
समास पांचवा अजपा निरुपण


Custom Search

Friday, May 25, 2018

Samas Choutha Anuman Nirsan समास चौथा अनुमान निरसन


Dashak Satarava Samas Choutha Anuman Nirsan 
Samas Choutha Anuman Nirsan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Anuman.
समास चौथा अनुमान निरसन
श्रीराम ॥
बहुत जनासी उपाये । वक्तयास पुसतां त्रासों नये ।
बोलतां बोलतां अन्वयें । सांडूं नये ॥ १ ॥
१) लोकांमधें अध्यात्माचा प्रसार केल्यानें पुष्कळ लोकांना फायदा होतो. लोक पुष्कळ प्रश्र्न विचारतात. त्यामुळें वक्त्यानें चिडून जाऊं नये. लोकांना उत्तरे देत असतां मागचा पुढचा संदर्भ तुटणार नाहीं, अशा रीतीनें बोलावें.
श्रोत्यानें आशंका घेतली । ते तत्काळ पहिजे फेडिली ।
स्वगोष्टीनें स्वगोष्टी पेंचली । ऐसें न व्हावें ॥ २ ॥
२) एखाद्या श्रोत्यानें शंका घेतली तर तिचे ताबडतोप निरसन करावेम. अपल्या बोलण्यानें आपल्या बोलण्यास विरोध होईल असें होऊं देऊं नये.  
पुढें धरितां मागें पेंचला । मागें धरितां पुढें उडाला ।
सांपडतचि गेला । ठाइं ठाइं ॥ ३ ॥
३) समजा एखाड्या वक्यानें भाषण केले व त्यांत परस्पर विरोधी विधानें केली. त्यानें नंतर केलेल्या विधानांवर आक्षेप घेतला, तर त्यानेंच आधीं केलेल्या विधानांनी पेचांत पडतो. आणि त्यानें आधी केलेल्या विधानावर आक्षेप घेतला, तर त्यानें नंतर केलेले विधान व्यर्थ होते. परस्परविरोधी विधानें करणारा वक्ता अशा रीतीनें ठिकठिकाणीं अडचणींत सापडतो.   
पोहणारचि गुचक्या खातो । जनास कैसा काढूं पाहातो ।
आशय लोकांचा राहातो । ठाइं ठाइं ॥ ४ ॥
४) जो पोहणारा स्वतःच गटांगळ्या खातो, तो इतर बुडणार्‍या लोकांना बाहेर काढूं शकत नाहीं. त्याचप्रमाणें विषय नीट आकलन न झाल्यानें ज्याच्या भाषणांत घोटाळा असतो, त्याच्या भाषणानें ठिकठिकाणच्या लोकांच्या शंका  तशाच राहून जातात.   
आपणचि बोलिला संव्हार । आपणचि बोलिजे सर्वसार ।
दुस्तर मायेचा पार । टाकिला पाहिजे ॥ ५ ॥
५) एकीकडे सर्व नाशवंत आहे असें आपण म्हणतो आणि दुसरीकडे सर्व कांहीं सार आहे, घेण्यालायक आहे असे आपणच सांगतो. वक्त्याच्या अशा बोलण्यानें घोटाळा उत्पन्न होतो. उलट वक्त्याचे भाषण असें असावें कीं, त्याच्या योगानें तरुन जाण्यास कठीण असलेली माया नदी माणसाला पार करतां येईल.  
जें जें सूक्ष्म नाम घ्यावें । त्याचें रुप बिंबऊन द्यावें ।
तरीच वक्ता म्हणवावें । विचारवंत ॥ ६ ॥
६) ज्या ज्या सूक्ष्म तत्वाचें नांव घ्यावें त्याचे स्वरुप स्वच्छपणें समजून द्यावें. असें केलें तरच विचारवंत वक्ता म्हणवून घेतां येतें.
ब्रह्म कसें मूळमाया कैसी । अष्टधाप्रकृती शिवशकति कैसी ।
शड्गुणेश्र्वराची स्थिति कैसी । गुणसाम्याची ॥ ७ ॥
७) उदा. ब्रह्म कसें आहे? मूळमाया कशी आहे? अष्टधा प्रकृति व शिवशक्ति कशा आहेत? षड्गुणिक्ष्वराची व गुणसाम्याची स्थिति कशी आहे? 
अर्धनारीनटेश्र्वर । प्रकृतिपुरुषाचा विचार ।
गुणक्षोभिणी तदनंतर । त्रिगुण कैसे ॥ ८ ॥
८) अर्धनारी नटेश्र्वर व प्रकृतिपुरुष यांचा विचार कस? गुणक्षोभिणी व नंतर त्रिगुण कसें असतात? 
पूर्वपक्ष कोठून कोठवरी । वाच्यांशलक्ष्यांशाची परी ।
सूक्ष्म नाना विचार करी । धन्य तो साधु ॥ ९ ॥
९) पूर्वपक्षाचे क्षेत्र कोठून कोठवर असावें? वाच्यांश व लक्ष्यांश यांचे प्रकार कोणतें? अशा रीतीनें अनेक सूक्ष्म विचार जो करतो तो साधु धन्य होय. 
नाना पाल्हाळीं पडेना । बोलिलेंचि बोलावेना ।
मौन्यगर्भ अनुमाना । आणून सोडी ॥ १० ॥
१०) चतुर अध्यात्म वक्ता  उगीच पाल्हाळ लावित नाही. तो एकदा जे बोलतो ते पुनः पुनः बोलत नाहीम. परंतु वाणीला जेथें मौन पडते, असें ब्रह्मस्वरुप आपल्या वक्तृत्वानें तो श्रोत्यांच्या कल्पनेंत आणून सोडतो.   
घडी येक विमळ ब्रह्म । घडी येक म्हणे सर्व ब्रह्म ।
द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म । क्षण येक ॥ ११ ॥
११) एकदां म्हणतो ब्रह्म निर्मळ आहे. नंतर म्हणतो जें कांहीं आहे ते ब्रह्म आहे. पुनः म्हणतो ब्रह्म द्रष्टा आहे, साक्षी आहे व सत्तारुप आहे.
निश्र्चळ तेंचि जालें चंचळ । चंचळ तेंचि ब्रह्म केवळ ।
नाना प्रसंगीं खळखळ । निवाडा नाहीं ॥ १२ ॥
१२) एकदां म्हणतो ब्रह्म निश्र्चळ होतें, तें चंचळ झालें. आणि त्यावर म्हणतो कीं जें चंचल आहे तेंच ब्रह्म आहे. अशा प्रकारची परस्पर विरोधी विधानें निरनिराळ्या प्रसंगीजो वक्ता करतो, त्याला विषय नीट कळलेला नसतो. त्याच्या कल्पना स्पष्ट नसतात.     
चळतें आणी निश्र्चळ । अवघें चैतन्यचि केवळ ।
रुपें वेगळालीं प्रांजळ । कदापी बोलवेना ॥ १३ ॥
१३) प्रत्यक्ष चंचळ असून तें निश्र्चळ कसें? असें विचारलें तर तो म्हणतो कीं, केवळ एकचित्स्वरुप सगळीकडे असल्यानें चंचळसुद्धा मूळ स्वरुपच समजावें. एकाच चैतन्याची ही भिन्न रुपें आहेत. पण हें आपलें म्हणणें त्याला कधीही स्पष्ट करुन सांगता येत नाहीं. 
उगीच करी गथागोवी । तो लोकांस कैसें उगवी ।
नाना निश्र्चयें नाना गोवी । पडत जाते ॥ १४ ॥
१४) अशा प्रकारचा घोटळा ज्याच्या विचारामध्यें असतो तो वक्ता लोकांची समजूत योग्यप्रकारें घालूं शकत नाहीं. लोकांना योग्य व बरोबर ज्ञान देऊं शकत नाहीं. निरनिराळीं मतें ऐकत गेल्यानें नवीन नवीन घोटाळे निर्माण होतात.   
भ्रमास म्हणे परब्रह्म । परब्रह्मास म्हणे भ्रम ।
ज्ञातेपणाचा संभ्रम । बोलोन दावी ॥ १५ ॥
१५) असा अर्धवट वक्ता भ्रमाला परब्रह्म म्हणतो व परब्रह्माला भ्रम म्हणतो. आपण ज्ञानी आहोत या अभिमानाने तो बोलत असतो. 
घाली शास्त्रांची दडपण । प्रचितिविण निरुपण ।
पुसों जातां उगाच सीण । अत्यंत मानी ॥ १६ ॥
१६) आपल्या चुकीच्या विधानांना तो शास्त्रवचनांचा आधार दाखवतो. परंतु त्याचे बोलणें प्रचितीचे नसतें. त्याला जर प्रश्र्ण विचारलें तर तो अत्यंत नाराज होतो. 
ज्ञात्यास आणी पदार्थभिडा । तो काय बोलेल बापुडा ।
सारासाराचा निवाडा । जाला पाहिजे ॥ १७ ॥
१७) जो स्वतःला ज्ञाता म्हणवतो आणि वस्तूंची अपेक्षा धरतो तो बिचारा निर्भयपणें सत्य सांगूं शकत नाहीं. सार कोणतें व असार कोणतें याचा बरोबर निवाडा झाला पाहिजे. तरच तो ज्ञाता खरा. 
वैद्य मात्रेची स्तुती करी । मात्रा गुण कांहींच न करी ।
प्रचितिविण तैसी परी । ज्ञानाची जाली ॥ १८ ॥
१८) समजा, एखादा वैद्य आपल्या मात्रेची मोठी तारिफ करतो पण त्या मात्रेचा गुण मात्र कांहीं दिसत नाहीं. तर त्याची तारीफ व्यर्थ ठरते. त्याचप्रमाणें प्रत्यक्ष अनुभव नसेल तर ज्ञानाची अवस्था त्या मात्रेसारखी होते.  
जेथें नाहीं सारासार । तेथें अवघा अंधकार ।
नाना परीक्षेचा विचार । राहिला तेथें ॥ १९ ॥
१९) ज्या ठिकाणी सारासार विचाराचा अभाव असतो, त्या ठिकाणीं सगळा अज्ञानाचा अंधार असतो. अशा माणसाला निरनिराळ्या परीक्षा करुन ज्ञान प्राप्त करुन घ्यावें, हा विचार सुचत नाहीं.   
पाप पुण्य स्वर्ग नर्क । विवेक आणि अविवेक ।
सर्वब्रह्मीं काये येक । सांपडलें नाहीं ॥ २० ॥
२०) सर्व ब्रह्म आहे, असें एकदा म्हटलें कीं, मग तेथें पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, विवेक, अविवेक यांना स्थान उरत नाहीं.
पावन आणि तें पतन । दोनीं मानिलीं तत्समान । 
निश्र्चये आणि अनुमान । ब्रह्मरुप ॥ २१ ॥
२१) पतित आणि पावन हीं दोन्ही ब्रह्मरुपच होतात. निश्चयाचें ज्ञान आणि केवळ अनुमान दोन्ही ब्रह्मरुपच बनतात. 
ब्रह्मरुप जालें आवघें । तेथें काये निवडावें ।
आवघी साकरचि टाकावें । काये कोठें ॥ २२ ॥
२२) ज्याप्रमाणें सगळीकडे साखरच साखर झाली तर साखर निराळी काढून बाजूला ठेवता येत नाहीं. त्याचप्रमाणें जें जें आहे, ते सारे ब्रह्मरुप झाल्यावर तेथें सारासार निवडायला जागाच उरत नाहीं.  
तैसे सार आणि असार । अवघा जाला येकंकार ।
तेथें बळाबळा अविचार । विचार कैंचा ॥ २३ ॥
२३) जसें हें, तसें जेथें सार आणि असार हा भेद नाहींसा होऊन एकंकार झाला तेथें विचार उरत नाहीं. अविचाराचेंच प्राबल्य होतें. 
वंद्य निंद्य येक जालें । तेथें काये हाता आलें ।
उन्मत्त द्रव्यें जें भुललें । तें भलतेंच बोले ॥ २४ ॥
२४) जेथें वंद्य व निंद्य यामधील भेद नाहींसा होतो, तेथें कांहींच हाती लागत नाहीं. तेथें माणूस भ्रष्टचरित बनतो. अंमली पदार्थ प्यायल्यावर नशेमधें माणूस जसें वाटेल तें बरळतो, तसें हें सर्व ब्रह्मवादी बरळतात.   
तैसा अज्ञानभ्रमें भुलला । सर्व ब्रह्म म्हणोन बैसला ।
माहांपापी आणि भला । येकचि मानी ॥ २५ ॥
२५) मादक द्रव्य घेतलेला माणूस जसें भलतेंच बोलतो, त्याचप्रमाणें अज्ञानांतून उदय पावलेल्या भ्रमानें जो मोह पावला आहे, तोच सर्व ब्रह्म आहे असें म्हणत बसतो. महापापी व पुण्यवान यांना तो एकच मानतो.  
सर्वसंगपरित्याग । अव्हासवा विषयेभोग ।
दोघे येकचि मानितां मग । काये उरलें ॥ २६ ॥
२६) सर्वसंगपरित्याग ही प्रखर वैराग्य पावल्याची अवस्था, आणि बंधनरहित स्वैर विषयोपभोग या दोन्ही स्थिति एकच मानल्यावर पुढें कांहीं सांगायचें उरतच नाहीं.  
भेद ईश्र्वर करुन गेला । त्याच्या वाचेन न वचे मोडिला ।
मुखामधें घांस घातला । तो अपानीं घालावा ॥ २७ ॥
२७) वास्तविक जगामध्यें ईश्र्वरानेंच भेद निर्माण करुन ठेवला आहे तो कोणासही मोडता येणार नाहीं. जगांत भेद राहणारच. जो घास तोंडांत घालायचा तो घास गुदद्वारांत घालता येणें शक्य नाहीं. 
ज्या इंद्रियास जो भोग । तो तो करी येथासांग । 
ईश्र्वराचें केलें जग । मोडितां उरेना ॥ २८ ॥
२८) ज्या इंद्रियांचा जो भोग निसर्गानें नेमला आहे, तो भोग तें इंद्रिय यथासांग घेऊं शकते. ईश्र्वरानें जगाची रचना केलेली आहे, ती मोडता येत नाहीं.  
अवघी भ्रांतीची भुटाटकी । प्रचितिविण गोष्टी लटकी ।
वेड लागलें जे बटकी । ते भलतेंचि बोले ॥ २९ ॥
२९) सर्वब्रह्मवाद्यांचे बोलणें, जगांत भेद मुळींच नाहीं हें म्हणणे ही भ्रमाची भुताटकी आहे. प्रत्यक्ष अनुभवाचा अभाव असल्यानें तें बोलणें खोटें आहे. दासीला वेड लागल्यानें ती जसें बरळतें तसें हें सर्वब्रह्मवाद्याचें बरळणें समजावें. 
प्रत्ययज्ञाता सावधान । त्याचें ऐकावें निरुपण ।
आत्मसाक्षात्काराची खूण । तत्काळ बाणे ॥ ३० ॥
३०) जो स्वतः अनुभव घेऊन आत्म्याचे ज्ञान संपादन करतो आणि जो सावधान असतो त्याचेच निरुपण ऐकावें. आशाचें निरुपण ऐकल्यानें आत्मसाक्षात्काराची खूण ताबडतोप अंतःकरणांत बाणतें. 
वेडें वांकडें जाणावें । आंधळें पाउलीं वोळखावें ।
बाश्कळ बोलणें सांडावें । वमक जैसें ॥ ३१ ॥
३१) जें वेडेवाकडें आहे तें बरोबर सनजावें. माणूस आंधळा आहे. हे त्याच्या चालण्यावरुन ओळखतात. त्याचप्रमाणें सर्वब्रह्मवाद्यांसारखें वेडेवाकडे सांगणारा ज्ञानी आहे किंवा नाहीं, स्वानुभवी आहे किंवा नाहीं, हे त्याच्या प्रत्यक्ष वागण्यावरुन ओळखावें. असलेम वाह्यात बोलणें ओकारीपणें ओकून चालतें व्हावें.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अनुमाननिर्शननाम समास चौथा ॥ 
Samas Choutha Anuman Nirsan 
समास चौथा अनुमान निरसन


Custom Search