Monday, April 30, 2018

Samas Pahila Valmik Stavan Nirupan समास पहिला वाल्मीकि स्तवन


Dashak Solava Samas Pahila Valmik Stavan Nirupan 
Samas Pahila Valmik Stavan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Valmiki Rushi. Valmiki has written The great Ramayan before God Rama's Birth.
समास पहिला वाल्मीकि स्तवन
श्रीराम ॥
धव्य धन्य तो वाल्मीक । ऋषीमाजी पुण्यश्र्लोक ।
जयाचे हा त्रिलोक । पावन जाला ॥ १ ॥
१) ऋषींमधील पुण्यश्र्लोक असा तो वाल्मीकि अतिशय धन्य होय. हे तीन्ही लोक त्यानें पावन केलें. 
भविष्य आणी शतकोटी । हें तो नाहीं देखिलें दृष्टीं ।
धांडोळितां सकळ सृष्टि । श्रुत नव्हे ॥ २ ॥
२) भविष्यकाळीं घडणारेआणि तें शतकोटी रामायण वाल्मीकिनें आधींच रचिलें. सारी सृष्टी धुंडाळली तरी अशी गोष्ट दुसर्‍याकोणीं केलीली पाहण्यांत किंवा ऐकण्यांत नाहीं. 
भविष्याचें येक वचन । कदाचित जालें प्रमाण ।
तरी आश्र्चिर्य मानिती जन । भूमंडळीचे ॥ ३ ॥
३) भविष्यांत घडून येणारी गोष्ट जरी कोणीं आधीं सांगितलीं आणि ती त्याप्रमाणें घडून आली तर जगांतील लोकांना त्याचे मोठे आश्र्चर्य वाटते. 
नसतां रघुनाथ अवतार । नाहीं पाहिला शास्त्राधार ।
रामकथेचा विस्तार । विस्तारिला जेणें ॥ ४ ॥
४) पण रामाचा अवतार झालेला नव्हता, दुसरा कांहीं शास्त्राधार नव्हता असें असतांना देखील ज्यानें रामकथा सविस्तर सांगितलीं. 
ऐसा जयाचा वाग्विळास । ऐकोनी संतोषला महेश ।
मग विभागिलें त्रयलोक्यास । शतकोटी रामायेण ॥ ५ ॥
५) असा हा वाल्मीकिचा वाग्विलास होता. तो ऐकून श्रीशंकर प्रसन्न झालें. मग शतकोटी रामायणाचे तिन्ही लोकांसाठीं विभाग केलें.
ज्याचें कवित्व शंकरें पाहिलें । इतरां न वचे अनुमानलें ।
रामउपासकांसी जालें । परम समाधान ॥ ६ ॥
६) सामान्य माणसाला वाल्मीकीच्या काव्यशक्तीची कल्पना करतां येणें शक्य नाहीं. श्रीशंकराला ती करतां आली. श्रीरामाच्या उपासकांना फार मोठें समाधान वाटलें.   
ऋषी होते थोर थोर । बहुतीं केला कवित्वविचार ।
परी वाल्मीकासारिखा कवेश्र्वर । न भूतो न भविष्यति ॥ ७ ॥
७) पूर्वींच्या पुष्कळ मोठमोठ्या ऋषींनी कवित्व रचना केली. पण वाल्मीकि हा एकच कवीश्वर असा कीं जो न भूतो न भविष्यति. 
पूर्वीं केली दृष्ट कर्में । परी पावन जाला रामनामें ।
नाम जपतां दृढ नेमें । पुण्यें सीमा सांडिली ॥ ८ ॥
८) पूर्वायुष्यांत वाल्मीकिनें फार दुष्ट कर्में केली. परंतु रामनामानें तो पावन झाला. अत्यंत दृढ निश्र्चयानें त्यानें रामनाम जपलें. त्यामुळें त्याच्या पुण्याला कांहीं सीमा उरली नाहीं.
उफराटें नाम म्हणतां वाचें । पर्वत फु्टले पापाचे ।
ध्वज उभारले पुण्याचे । ब्रह्मांडावरुते  ॥ ९ ॥
९) तो आपल्या वाणीनें रामाचें नाम उलटें उच्चारीत होता. तरी त्याच्या पापाचे पर्वत फुटुन नाहींसें झालें. जगामध्यें त्याच्या पुण्याचे निशाण फडकले. 
वाल्मीकें जेथें तप केलें । तें वन पुण्यपावन जालें ।
शुष्क काष्ठीं अंकुर फुटले । तपोबळें जपाच्या ॥ १० ॥
१०) ज्या वनामध्यें वाल्मीकिनें तप केलें तें वन देखील त्याच्या पुण्याईनें पवित्र झालें. त्याच्या तपाच्या बळानें कोरड्या लाकडांना अंकुर फुटलें.
पूर्वी होता वाल्हाकोळी । जीवघातकी भूमंडळीं ।
तोचि वंदिजे सकळीं । विबुधीं आणि ऋषेश्र्वरीं ॥ ११ ॥
११) आधी वाल्हा कोळी होता. जगांत त्यानें पुष्कळ जीवांची हिंसा केली होती. पण पुढें पंडित व मोठमोठे ऋषी त्यास वंदन करुं लागले.  
उपरति आणि अनुताप । तेथें कैंचे उरेल पाप ।
देह्यांततपें पुण्यरुप । दुसरा जन्म जाला ॥ १२ ॥
१२) त्याला उपरति झाली व ज्याला पश्र्चाताप झाला त्याच्या ठिकाणीं पाप उरणें शक्य नसतें. देहाचा नाश करण्यापर्यंत तप केल्यानें त्या तपाचरणानें अत्यंत पुण्यरुप असा जणुं काय दुसरा जन्मच त्यास प्राप्त झाला.
अनुतापें आसन घातलें । देह्यांचें वारुळ जालें ।
तेंचि नाम पुढें पडिलें । वाल्मीक ऐसें ॥ १३ ॥
१३) पश्र्चाताप होऊन त्यानें आसान मांडलें. त्याच्या देहाभोवती वारुळ वाढलें. त्यामुळें त्याला लोक पुढें वाल्मीकि असें म्हणूं लागलें. 
वारुळास वाल्मीक बोलिजे । म्हणोनि वाल्मीक नाम साजे ।
जयाच्या तीव्र तपें झिजे । हृदय तापसाचें ॥ १४ ॥
१४) वारुळाला वाल्मीक म्हणतात. म्हणून त्याला वाल्मीकि नाव शोभतें. त्याची तपस्या पाहून तपस्वी लोकांचें हृदय कापतें. 
जो तापसांमाजीं श्रेष्ठ । जो कवेश्र्वरांमधें वरिष्ठ ।
जयाचें बोलणें पष्ट । निश्र्चयाचें ॥ १५ ॥
१५) वाल्मीकि तपस्वी लोकांत श्रेष्ठ आहे. कविगणांमध्यें तो फार वरच्या दर्जाचा आहे. त्याचे बोलणें फार स्पष्ट व निश्र्चित असतें.  
जो निष्ठावंतांचें मंडण । रघुनाथभक्तांचें भूषण ।
ज्याची धारणा असाधारण । साधकां सदृढ करी ॥ १६ ॥
१६) त्याच्या असाधारण निष्ठेमुळें तो निष्ठावंतांची शोभा आहे. श्रीराम भक्तांचे तो भूषण आहे. त्याची विलक्षण धारणा बघून साधकाची साधन निष्ठा पक्की होते.  
धन्य वाल्मीक ऋषेश्र्वर । समर्थाचा कवेश्र्वर ।
तयासी माझा नमस्कार । साष्टांगभावें ॥ १७ ॥
१७) समर्थ रामरायाचे यश गाणारा कवीश्र्वर वाल्मीकि धन्य होय. अशा या ऋषीश्र्वराला मी श्रद्धापूर्वक साष्टांग नमस्कार करतो.  
वाल्मीक ऋषी बोलिला नसता । तरी आम्हांसी कैंची रामकथा ।
म्हणोनियां समर्था । काय म्हणोनि वर्णावें ॥ १८ ॥
१८) वाल्मीकि ऋषीनें रामायण गायिलें नसतें तर आम्हाला रामकथा मिळाली नसती. अशा या थोर वाल्मीकिचे वर्णन करावें तितकें थोडेंच आहे. 
रघुनाथकीर्ति प्रगट केली । तेणें तयाची महिमा वाढली ।
भक्तमंडळी सुखी जाली । श्रवणमात्रें ॥ १९ ॥
१९) श्रीरामाचे यश गाऊन त्याची कीर्ति प्रगट केली त्यामुळें वाल्मीकिचा मोठेपणा वाढला. रामाची यशकीर्ति ऐकून भक्तमंडळीं सुखी झाली.   
आपुला काळ सार्थक केला । रघुनाथकीर्तिमधें बुडाला ।
भूमंडळीं उधरिला । बहुत लोक ॥ २० ॥
२०) श्रीरामाच्या कीर्तिमध्यें डुंबल्यानें वाल्मीकिनें आपला काळ सार्थकीं लावला. आणि त्याबरोबर जगांत पुष्कळ लोकांचा उद्धार झाला. 
रघुनाथभक्त थोर थोर । महिमा जयांचा अपार ।
त्या समस्तांचा किंकर । रामदास म्हणे ॥ २१ ॥
२१) ज्यांचा महिमा अपार आहे. असे थोर थोर श्रीरामभक्त होऊन गेले. श्रीरामदास म्हणतात कीं, त्या सर्व भक्तांचा मी दास आहे.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वाल्मीकस्तवननिरुपणनाम समास पहिला ॥
Samas Pahila Valmik Stavan Nirupan
समास पहिला वाल्मीकि स्तवन


Custom Search

Friday, April 27, 2018

Samas Dahava Siddhanta Nirupan समास दहावा सिद्धांत निरुपण


Dashak Pandharava Samas Dahava Siddhanta Nirupan 
Samas Dahava Siddhanta Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Adawaita. He is telling us that after acquiring knowledge, Sadhak knows that there is no Dwait. Dwait means there is God and Sadhak but after acquiring Sadhak knows that God and Sadhak are one.
समास दहावा सिद्धांत निरुपण 
श्रीराम ।
गगनीं अवघेंचि होत जातें । गगनाऐसें तगेना तें ।
निश्र्चळीं चंचळ नाना तें । येणेंचि न्यायें ॥ १ ॥
१) आकाशामध्यें सर्व घटना होतात व जातात. तसेंच होणार्‍या व जाणार्‍या घटना कायम टिकत नाहीत.निश्र्चळामध्यें चंचळाचे अनेक प्रकार असेच होतात व जातात ते कायम टिकत नाहीत. 
अंधार दाटला बळें । वाटे गगन जालें काळें ।
रविकिर्णे तें पिवळें । सवेंचि वाटे ॥ २ ॥
२) अगदी दाट अंधार पडला तर आकाश काळें झालें असें वाटते. सूर्याच्या किरणांनीं तेंच आकाश पिवळें झाले असें वाटते. 
उदंड हिंव जेव्हां पडिलें । गमे गगन थंड जालें ।
उष्ण झळेनें वाळलें । ऐसें वाटे ॥ ३ ॥
३) अतिशय कडक थंडी पडते तेव्हां आकाश थंड झालें असें वाटते. उष्णता भडकली तर हेंच आकाश वाळलें असें वाटते.   
ऐसें जें कांहीं वाटलें । तें तें जालें आणि गेलें ।
आकाशासारिखें तगलें । हें तो घडेना ॥ ४ ॥
४) अशा रीतीनें जें जें कांहीं वाटते, तें तें आकाशामध्यें झालें आणि गेलें पण तें आकाशाप्रमाणें कायम टिकते असें कधीं होत नाही. 
उत्तम जाणीवेचा जिनस । समजोन पाहे सावकास ।
निराभास तें आकाश । भास मिथ्या ॥ ५ ॥
५) शुद्ध जाणीव ही सर्वोत्तम वस्तु आहे. ती ओळखून जर स्वच्छपणें पाहिलें तर असें आढळते कीं, आकाशाचा भास होत नाही. जो जो भास होतो तो तो मिथ्या असतो. 
उदक पसरे वायो पसरे । आत्मा अत्यंतचि पसरे ।
तत्वें तत्व अवघेंचि पसरे । अंतर्यामीं ॥ ६ ॥
६) पाणी व्यापक बनते. वायु व्यापक बनतो, आत्मा अतिशय व्यापक बनतो. एकूणएक तत्व अंतर्यामीं व्यापकपणें अनुभवास येते.   
चळतें आणि चळेना तें । अंतरीं अवघेंच कळतें ।
विवरणेंचि निवळतें । प्राणीमात्रासी ॥ ७ ॥
७) मग जें चळते तें आणि जें चळत नाहीं तें, सगळें आपल्या अंतर्यामीं कळतें. मनन-चिंतनानेंच माणसाला तें अंतर्यामीं स्पष्ट होतें.     
विवरतां विवरतां शेवटीं । निवृत्तिपदीं अखंड भेटी ।
जालियानें तुटी । होणार नाहीं ॥ ८ ॥
८) निरंतर चिंतन करतां करतां अखेर निवृत्तिपदाला माणूस पोचतो. तेथें स्वरुपाची अखंड भेट होते. एकदा भेट झाली कीं मग कधीही ताटातूट होत नाहीं.     
जेथें ज्ञानाचें होतें विज्ञान । आणि मनाचें होतें उन्मन ।
तत्वनिर्शनीं अनन्य । विवेकें होतें ॥ ९ ॥
९) तेथें ज्ञानाचे विज्ञान होतें आणि मनाचें उन्मन होतें. सर्व तत्वांचे निरसन झाल्यानें विवेकानें परब्रह्माशी अनन्यपणा घडतो. 
वडिलांस शोधून पाहिलें । तों चंचळाचें निश्र्चळ जालें ।
देवभक्तपण गेलें । तये ठाइं ॥ १० ॥
१०) अंतरात्म्याचा शोध करायला निघालेला साधक असें अनुभवतो कीं, जें चंचळ आहे तें निश्र्चळ बनतें. त्या ठिकाणीं देव व भक्त यांचें निराळेपण संपतें. दोघे एक जीव होऊन जातात.  
ठाव म्हणतां पदार्थ नाहीं । पदार्थमात्र मुळीं नाहीं ।
जैसें तैसें बोलों कांहीं । कळावया ॥ ११ ॥
११) तेथें असा जरी शब्द वापरला असला तरी या अनुभवामध्यें स्थल नाहीं. कोणताही दृश्य पदार्थ मुळींच नाहीं. त्या अनुभवाची कांहीं कल्पना यावी, यासाठी जसें येईल तसें मी बोलत आहे.  
अज्ञानशक्ति निरसली । ज्ञानशक्ति मावळली ।
वृत्तिसुन्यें कैसी जाली । स्थिती पाहा ॥ १२ ॥
१२) ही स्थिती अशी आहे कीं, तिच्यामध्यें अज्ञान व त्याचे सर्व भ्रम नाश पावतात. तसेंच ज्ञान व त्याचे परिणाम शांत होतात. व अखेर वृत्ति शून्य होऊन केवलपणा उरतो. 
मुख्य शक्तिपात तो ऐसा । नाहीं चंचळाचा वळसा ।
निवांतीं निवांत कैसा । निर्विकारी ॥ १३ ॥
१३) जीव आजपर्यंत चंचळाच्या भोवर्‍यांत गिरक्या खात होता. त्या भोवर्‍यांतून त्याला बाहेर खेचणें हें शक्तिपाताचे प्रमुख लक्षण आहे. चंचळाच्या चक्रांतून बाहेर पडलेला जीव परमात्मस्वरुप बनतो. त्या निवांत व निर्विलारी स्वरुपांत निवांतपणें स्थिर होतो.
चंचळाचीं विकार बालटें । तें चंचळचि जेथें आटे ।
चंचळ निश्र्चळ घनवटे । हें तो घडेना ॥ १४ ॥
१४) जोपर्यत चंचळ असते तोपर्यंत या बदलणार्‍या दृश्याचा भ्रम राहतो. ते चंचळ आटल्यावर मग भ्रम शिल्लक उरत नाहीं. चंचळ व निश्र्चळ दोन्ही एकरुप कधींच होत नाहीत.  
माहावाक्याचा विचारु । तेथें संन्याशास अधिकारु ।
दैवीकृपेचा जो नरु । तोहि विवरोन पाहे ॥ १५ ॥
१५) जो संन्यासी आहे त्याला महावाक्याचा विचार करण्याचा अधिकार आहे.  ईश्र्वरीकृपा ज्याच्यावर असते असा भाग्यवान पुरुष देखील महावाक्याचा विचार करुं शकतो.
संन्यासी म्हणिजे शडन्यासी । विचारवंत सर्व संन्यासी ।
आपली करणी आपणासी । निश्र्चयेंसीं ॥ १६ ॥
१६) मनांतील सहाही विकार जो सोडतो तो खरा संन्यासी होय. खरे विचारवंत पुरुष सगळे संन्यासी समजावे. आपण जेवढी साधना करावी तेवढी आपल्या उपयोगास खात्रीनें येते. यांत शंका नाहीं.  
जगदीश वोळल्यावरी । तेथें कोण अनुमान करी ।
आतां असो हें विचारी । विचार जाणती ॥ १७ ॥
१७) एकदां विश्र्वाचा मालक प्रसन्न झाल्यावर मग उगीच कल्पना करत कोणी बसत नाहीं. असो. जे विचारवंत आहेत त्यांना हा विचार समजतो.  
जे जे विचारी समजले । ते ते निःसंग होऊन गेले ।
देहाभिमानी जे उरले । ते देहाभिमान रक्षिती ॥ १८ ॥
१८) ज्या ज्या विचारवंत पुरुषांना हें समजलें तें सगळें निःसंशय बनलें अभिमानशून्य झालें.जे देहाभिमानाला चिकटून बसलें, ते  देहाभिमानाला सांभाळत बसलें. 
लक्षीं बैसलें अलक्ष । उडोन गेला पूर्वपक्ष । 
हेतुरुपें अंतरसाक्ष । तोहि मावळला ॥ १९ ॥
१९) जेथें लक्ष पोंचत नाहीं असें अलक्ष ब्रह्म मनाला व्यापून राहिल्यावर मायारुप पूर्वपक्ष नाहींसा होतो. वासनेच्या अनुरोधानें असणारा व अंतर्यामीं साक्षीरुपानें राहाणारा तोहि नाहींसा होतो.    
आकाश आणि पाताळ । दोनी नामें अंतराळ ।
काढितां दृश्याचें चडळ । अखंड जालें ॥ २० ॥
२०) आकाश व पाताळ हीं दोन नांवें एका अवकाशाचींच आहेत. त्यामध्यें भेद उत्पन्न करणारा दृश्याचा पडदा गेला कीं केवळ एकच सलग अवकाश उरते. 
तें तों अखंडचि आहे । मन उपाधी लक्षून पाहे ।
उपाधीनिरासें साहे । शब्द कैसा ॥ २१ ॥
२१) मुळांत सारा अवकाश एकच आहे. अखंड आहे. उपाधीकडे पाहून मन त्यामध्यें खंड पाडतें. ती उपाधी नाहींशी झाल्यावर तेथें शब्दाचा व्यवहार सहन होत नाहीं.  
शब्दपर कल्पनेपर । मनबुद्धिअगोचर ।
विचारें पहावा विचार । अंतर्यामीं ॥ २२ ॥
२२) परमात्मा अवकाशासारखा अखंड व निराभास आहे. तो शब्दाच्या व कल्पनेच्या पलीकडे आहे. मन व बुद्धि यांना अगोचर आहे. आपल्याला अंतर्यामीं वारंवार विचार करुन हें समजते. 
पाहातां पाहातां कळों येतें । कळलें तितुकें वेर्थ जातें ।
अवघड कैसें बोलावें तें । कोण्या प्रकारें ॥ २३ ॥
२३) सतत चिंतन करीत गेल्यास अशा गोष्टी कळूं लागतात. पण आपणास जेवढें कळले तेवढें व्यर्थ आहे असें अनुभवाला येते. मला कळलें असें वाटतें तोपर्यंत तें खरें कळलेले नसते. हा विषय अवघड आहे. तो कसा सांगावा व कोणत्याप्रकारें मांडावा तें समजत नाहीं.  
वाक्यार्थवाच्यांश शोधिला । अलक्षीं लक्ष्यांश बुडाला ।
पुढें समजोन बोला । कोणीतरी ॥ २४ ॥
२४) स्वानुभवाचा प्रकार असा आहे.महावाक्यांतील शब्दांचा जो अर्थ तो वाच्यांश.तो नीट शोधून पाहिला. " मी ब्रह्म आहें " असा त्याचा अर्थ कळला त्याचे सतत मनन चिंतन करीत गेल्यानें अनुसंधान लागलें. मन सारखें स्वस्वरुपांत रमूं लागलें. हा लक्ष्यांश होय. लक्ष्य जें स्वस्वरुप तेथें स्थिर होणें म्हणजे लक्ष्यांश साधणें होय. त्यानंतर ध्यान करणारें मन नाहींसे होऊन वृत्तिशून्यता आली; लक्ष्यांश अलक्ष्यपरब्रह्मांत लीन झालें. अनुभव घेणारा, बोलणारा, सांगणारा, पाहणारा, साक्षी सर्व लय पावल्यावर पुढें बोलण्याचें शिल्लक उरत नाहीं.  
शाश्र्वतास शोधीत गेला । तेणें ज्ञानी साच जाला । 
विकार सांडून मिळाला । निर्विकारी ॥ २५ ॥ 
२५) जो शाश्र्वताचा शोध करीत गेला तोच यथार्थ ब्रह्मज्ञानी झाला. विकाररुपी चंचळ मागें टाकून तो निर्विकार ब्रह्माशीं तदाकार होतो. 
दुःस्वप्न उदंड देखिलें । जागें होतां लटिकें जालें ।
पुन्हां जरी तें आठविलें । तरी तें मिथ्या ॥ २६ ॥
२६) अज्ञानाच्या अवस्थेंत असतांना हें दृश्यरुप वाईट स्वप्न त्यानेम फार मोठ्या प्रमाणांत पाहिलें. पण ब्रह्मज्ञानरुपी जागृति आल्यावर तें सारें खोटे होते असा अनुभव आला. आणि पुन्हा जरी तें आठवलें तरी तें खोटे होतें अशी त्याची खात्री असते.  
प्रारब्धयोगें देह असे । असे अथवा नासे ।
विचार अंतरीं बैसे। चळेना ऐसा ॥ २७ ॥
२७) ज्ञान आल्यावर प्रारब्धानुसार त्याचा देह चालतो. तो राहील अथवा जाईल. पण त्याच्या अंतःकरणांत ब्रह्मविचार अत्यंत स्थिर असतो. 
बीज अग्नीनें भाजलें । त्याचें वाढणें खुंटलें ।
ज्ञात्यास तैसें जालें । वासनाबीज ॥ २८ ॥
२८) बीज जर आगींत भाजलें तर तें वाढत नाहीं. त्याचप्रमाणें ज्ञानी पुरुषाच्या वासनेचे बीज जळून जाते. त्यामुळें त्याला वासना उरत नाहीं.
विचारें निश्र्चळ जालीं बुद्धि । बुद्धिपासीं कार्यसिद्धि ।
पाहातां वडिलांची बुद्धि । निश्र्चळीं गेलीं ॥ २९ ॥
२९) साधकानें आत्मविचार सतत करुन आपली बुद्धि निश्र्चल करावी. निश्र्चल बुद्धिनेंच भ्रह्मज्ञान सिद्ध होते. पूर्वी होऊन गेलेल्या थोर संतांची बुद्धि अशा रीतीनें निश्र्चळ ब्रह्मामध्यें गेली असें आढळते.
निश्र्चळास ध्यातो तो निश्र्चळ । चंचळास ध्यातो तो चंचळ ।
भूतास ध्यातो तो केवळ । भूत होये ॥ ३० ॥
३०) जो निश्र्चळ ध्यान करतो तो निश्र्चळ बनतो. तर जो चंचळाचे ध्यान करतो  तो चंचळ बनतो. जो दृश्याचे ध्यान करतो तो दृश्यरुप बनतो. 
जो पावला सेवटवरी । तयास हें कांहींच न करी ।
अंतरनिष्ठा बाजीगरी । तैसी माया ॥ ३१ ॥
३१) जो शेवटपर्यंत म्हणजे परब्रह्मापर्यंत जातो त्याला चंचळ आणि दृश्य कांहीं करुं शकत नाहीं. जो खरा अंतरनिष्ठ आहे, त्याला माया जादूप्रमाणें खोटी दिसते. 
मिथ्या ऐसें कळों आलें । विचारानें सदृढ जालें ।
अवघें भयेंचि उडालें । अकस्मात ॥ ३२ ॥
३२) हें दृश्य सारें मिथ्या आहे हे प्रथम कळतें. मग सतत चिंतनानें तें मनामध्यें अगदी घट्ट स्थिर होतें. अशा रीतीनें दृश्याचे मिथ्यापण अंतरीं स्थिर झालें कीं एकाएकी भय समूळ नाश पावतें.  
उपासनेचें उतीर्ण व्हावें । भक्तजनें वाढवावें ।
अंतरीं विवेकें उमजावें । सकळ कांहीं ॥ ३३ ॥
३३) ज्या उपासनेनें साधक ब्रह्मज्ञानापर्यंत पोचला त्याचे ऋण फेडणें अवश्य असतें. जगांत भक्तीचा प्रसार करुन तें ऋण ज्ञानी माणसानें फेडावे. भक्त निर्माण करावे. अंतर्यामी विवेक करुन सगळें कांहीं बरोबर समजलेले असावें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसांवादे सिद्धांतनिरुपणनाम समास दहावा ॥
Samas Dahava Siddhanta Nirupan
समास दहावा सिद्धांत निरुपण


Custom Search

Wednesday, April 25, 2018

Samas Navava Pindotpatti Nirupan समास नववा पिंडोत्पत्ति निरुपण


Dashak Pandharava Samas Navava Pindotpatti Nirupan 
Samas Navava Pindotpatti Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Pindotpatti, The birth of a person or any animal or tree or living things. The important thing in it is Antaratma.
समास नववा पिंडोत्पत्ति निरुपण 
श्रीराम ॥
चौखाणीचे प्राणी असती । अवघे उदकेंचि वाढती ।
ऐसे होती आणि जाती । असंख्यात ॥ १ ॥
१) चारहि खाणींमध्यें जन्म घेणारे सारे प्राणी पाण्यापासूनच वाढतात. असे असंख्य प्राणी जन्मास येतात व मरतात. 
तत्वांचें शरीर जालें । अंतरात्म्यासगट वळलें ।
त्यांचें मूळ जों शोधिलें । तो उदकरुप ॥ २ ॥
२) तीन गुण, पंचभूतें आणि अंतरात्मा हे एके ठिकाणीं कालवून मानवी शरीर बनलेले असते. पण त्यामध्यें मूळ शोधलें तर तें आपरुप आहे असेच आढळते. 
शरत्कळींचीं शरीरें । पीळपीळों झिरपती नीरें ।
उभये रेतें येकत्रें । मिसळती रक्तीं ॥ ३ ॥
३) पावसाळ्यानंतर उगवणार्‍या वनस्पती जर पिळून बघितल्या तर त्यांच्यातून पाणी झिरपते. मानवी शरीराच्या बाबतींत रेतें रक्तामध्यें एकत्र मिसळतात. 
अन्नरस देहरस । रक्तरेतें बांधे मूस ।
रसद्वयें सावकास । वाढों लागे ॥ ४  ॥ 
४) रक्तरेताच्या संयोगानें अन्नरस व देहरस यांची एक मूस तयार होते. या दोन्ही रसांच्या योगानें ती मूस किंवा तो पिंड हळुहळु वाढु लागतो.  
वाढतां वाढतां वाढलें । कोमळाचें कठीण जालें ।
पुढें उदक पैसावलें । नाना अवेवीं ॥ ५ ॥
५) असाच वाढत जाऊन त्यामधील जे कोमल असतें तें कठीण बनतें. नंतर सर्व अवयवांमध्यें जीवनरस पसरतो.  
संपूर्ण होतां बाहेरी पडे । भूमीस पडतां मग तें रडे ।
अवघ्याचें अवघेंच घडे । ऐसें आहे ॥ ६ ॥
६) शरीर संपूर्ण तयार झलें म्हणजें तें बाहेर येते. तें जमिनीवर पडतांच रडूं लागतें. सर्व माणसांच्या बाबतींत सगळें असेंच घडून येते. 
कुडी वाढे कुबुद्धि वाढे । मुळापासून अवघेंच घडे ।
अवघेंचि मोडे आणि वाढे । देखतदेखतां ॥ ७ ॥
७) देह वाढत जातो तशी कुबुद्धि पण वाढत जाते. मुळापासून हें सारें घडतें. पाहतां पाहतां सगळें वाढतें आणि मोडतें. 
पुढें अवघियांचें शरीर । दिवसेंदिवस जालें थोर ।
सुचों लागला विचार । कांहीं कांहीं ॥ ८ ॥
८) सर्वांचें शरीर दिचसेंदिवस मोठें होत जाते. मग निरनिराळे विचार सुचूं लागतात.
फळामधें बीज आलें । तेणें न्यायें तेथें जालें ।
ऐकतां देखतां उमजलें । सकळ कांहीं ॥ ९ ॥
९) ज्याप्रमाणें झाडाच्या फळांत बीज असते, त्याप्रमाणें मानवी जीवनांत देखील घडतें. ऐकून व स्वतः पाहून तें सगळें कांहीं ध्यानांत येते. 
बीजें उदकें अंकुरती । उदक नस्तां उडोन जाती ।
येके ठाईं उदक माती । होतां बरें ॥ १० ॥
१०) बीजाला पाणी मिळालें कीं तें अंकुरते. त्यास पाणी मिळालें नाहीं तर तें उडून जातें. पाणी व मातीचे मिश्रण झालें कीं बीजाला उत्तम असतें. 
दोहिमधें असतां बीज । भिजोन अंकुर सहज ।
वाढतां वाढतां पुढें रीझ । उदंड आहे ॥ ११ ॥
११) पाणी व माती यांच्यांत बीज असेल तर तें भिजतें आणि त्यास अंकुर फुटतो. तो आपोआप वाढत जातो. त्या वाढण्यांत मोठा आनंद मिळतो.  
इकडे मुळ्या धावा घेती । तिकडे अग्रें हेलावती ।
मुळें अग्र द्विधा होती । बीजापासून ॥ १२ ॥
१२) मुळ्या खालीं जमिनींत धांवतात तर फांद्या वर डोलतात. मुळ्या व फांद्या बीजामध्यें एकच असतात.परंतु नंतर दोनीही दोन्ही बाजूंना वाढतात.   
मुळ्या चालिल्या पाताळीं । अग्रें धांवती अंतराळीं ।
नाना पत्रीं पुष्पीं फळीं । लगडलीं झाडें ॥ १३ ॥
१३) मुळ्या जमिनींत खोल जातात तर झाडांचें शेंडे वर आकाशांत जातात. मगे अनेक प्रकारच्या पानांनी, फुलांनीं, फळांनीं झाडें भरुन जातात.  
फळांवडिल सुमनें । सुमनांवडिल पानें ।
पानांवडिल अनुसंधानें । काष्ठें आवघीं ॥ १४ ॥
१४) झाड्याच्या वाढण्यामध्यें पाहिलें तर असें आढळतें कीं, फळाहून फूल वडिल आहे, तर फुलाहून पान वडिल आहे. आणि याच क्रमानें पानाहून लाकडें वडिल आहेत.  
काष्ठांवडिल मुळ्या बारिक । मुळ्यांवडिल तें उदक ।
उदक आळोन कौतुक । भूमंडळाचें ॥ १५ ॥
१५) लाकडाहून बारीक मुळ्या वडिल आहेत. मुळ्यांहून पाणी वडील आहे. पाणी घट्ट बनतें आणि त्यामुळें पृथ्वीवर अनेक प्रकारच्या पिंडांचें कौतुक पहावयास मिळतें.   
याची ऐसी आहे प्रचिती । तेव्हां सकळांवडिल जगती ।
जगतीवडिल मूर्ती । आपोनारायेणाची ॥ १६ ॥
१६) वर सांगितल्याप्रमाणें जगांत पिंडोत्पत्तिच्या बाबतींत प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणून पृथ्वीसर्वांमध्यें वडिल होय. परंतु या सृष्टीमध्यें पृथ्वीपेक्षां आप श्रेष्ठ किंवा वडिल आहे.    
तयावडिल अग्निदेव । अग्नीवडिल वायोदेव ।
वायेदेवावडिल स्वभाव । अंतरात्म्यांचा ॥ १७ ॥
१७) पाण्याहून अग्नि श्रेष्ठ आहे, अग्नीहून वायु श्रेष्ठ आहे. आणि वायुहून अंतरात्मा स्वाभाविपणें श्रेष्ठ आहे.  
सकळांवडिल अंतरात्मा । त्यासि नेणे तो दुरात्मा ।
दुरात्मा म्हणिजे दुरी आत्मा । अंतरला तया ॥ १८ ॥
१८) अशा अनुक्रमानें तर अंतरात्मा सगळ्यांपेक्षा वडील किंवा श्रेष्ठ आहे. त्याला जो जाणत नाहीं तो दुरात्मा होय. आत्म्यापासून जो दूर झाला किंवा आत्मा ज्यास अंतरला तो दुरात्मा होय. 
जवळी असोन चुकलें । प्रत्ययास नाहीं सोकलें ।
उगेंचि आलें आणी गेलें । देवाचकरितां ॥ १९ ॥
१९) शोकांतिका अशी आहे कीं, अंतरात्माजवळ असून लोक त्याला चुकतात. त्याला अनुभवावेसें कोणाला वाटत नाहीं. कोणास त्याची जिज्ञासा नाहीं. देवानें जन्मास घातलें म्हणून येतात आणि उगीच जगून तसेंच जातात. 
म्हणौन सकळांवडिल देव । त्यासी होतां अनन्यभाव ।
मग हे प्रकृतीचा स्वभाव । पालटों लागे ॥ २० ॥
२०) म्हणून सगळ्यांहून श्रेष्ठ जो अंतरात्मा त्याच्याशी अनन्य व्हावें. मग प्रकृतीचा स्वभाव बदलावयास लागतो.    
करी आपुला व्यासंग । कदापि नव्हे ध्यानभंग ।
बोलणें चालणें वेंग । पडोंच नेदी ॥ २१ ॥
२१) अंतरात्म्याशी अनन्यपण साधलेला पुरुष आपला नित्याचा व्यवसाय करतो. पण तो करीत असतांना त्याचा ध्यानभंग होत नाहीम. त्याचे अनुसंधान चुकत नाहीं. त्याच्या बोलण्याचालण्यांत कांहीं दोष, कमीपणा किंवा विपरीतपणा दिसत नाहीं.  
जें वडिलीं निर्माण केलें । तें पाहिजे पाहिलें ।
काये काये वडिलीं केलें । किती पाहावें ॥ २२ ॥
२२) वडिलांनीं जें निर्माण करुन ठेवलें आहे तें लाहिलें पाहिजें. असा व्यवहारांत शिरस्ता आहे. पण या वडिल अंतरात्म्यानें जें निर्माण केलें आहें तें पाहूं लागल्यावर मन थक्क होतें. त्यानें काय काय निर्माण केलें आहे आणि आपण काय काय पाहावें असें होऊन जातें.    
तो वडिल जेथें चेतला । तोचि भाग्यपुरुष जाला ।
अल्प चेतनें तयाला । अल्पभाग्य ॥ २३ ॥
२३) तो वडिल अंतरात्मा ज्याच्या अंतःकरणांत जागा झाला. तोच भाग्यपुरुष बनला. त्याची जाग अल्प असेल तर भाग्य देखील अल्पच असतें. 
तया नारायेणाला मनीं । अखंड आठवावें ध्यानीं ।
मग ते लक्ष्मी तयापासुनी । जाईल कोठें ॥ २४ ॥
२४) त्या अंतरात्मारुप नारायणाला अखंड ध्यानींमनीं आठवावें. मग लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाणार नाहीं. 
नारायेण असे विश्र्वीं । त्याची पूजा करीत जावी ।
याकारणें तोषवावी । कोणीतरी काया ॥ २५ ॥
२५) अंतरात्मा विश्वामध्यें व्यापून आहे. त्याची पूजा करत जावी. त्यासाठी कोणीतरी एखादा जीव संतुष्ट करावा. देहाला केलेले अंतरात्मा ग्रहण करतो. त्याच्यापर्यंत तें पोचतें. म्हणून कोणाच्याही देहाची मनापासून सेवा करावी. 
उपासना शोधून पाहिली । तों ते विश्र्वपाळिती जाली ।
न कळे लिळा परीक्षिली । न वचे कोण कोण ॥ २६ ॥   
२६) खरी उपासना कोणती हें जर शोधून पाहिलें तर उपासना म्हणजे विश्र्वावर आपलेपणानें प्रेम करणें होय असें आढळतें. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी अंतरात्मा आहे. म्हणून कोणाचेंही अंतःकरण न दुखावणें आणि जो भेटेल त्याला आपलाच समजणें ही उपासनेची दोन चिन्हें आहेत. अंतरात्म्याचा खेळ कोणास कळत नाहीं. त्याची परीक्षा कोणासच होत नाहीं.               
देवाची लीळा देवेंविण । आणीक दुसरा पाहे कोण ।
पाहाणें तितुकें आपण । देवचि असे ॥ २७ ॥
२७) अंतरात्म्याचा खेळ अंतरात्म्याखेरीज दुसर्‍या कोणास पाहातां येत नाहीं. ज्या प्रमाणांत तो खेळ पाहायला जावें त्या प्रमाणांत पाहाणारा अंतरात्म्याशी तदाकार होत जातो. 
उपासना सकळां ठाईं । आत्माराम कोठें नाहीं ।
याकारणें ठाइं ठाइं । रामे आटोपिलें ॥ २८ ॥
२८) अंतरात्मा नाही अशी जागाच नसल्यानें त्याची उपासना सगळीकडे भरलेली आहे. या कारणानें ठिकठिकाणीं भगवंताची सत्ता काम करते.
ऐसी माझी उपासना । आणितां नये अनुमाना ।
नेऊन घाली निरंजना । पैलिकडे ॥ २९ ॥
२९) माझी उपासना ही अशी आहे. तर्कानें कल्पना केल्यानें ती समजणार नाहीं. ही उपासना उपासकाला मूळमायेच्या पलीकडे निरंजनापर्यंत नेऊन पोचवते.  
देवाकरितां कर्मे चालती । देवाकरिता उपासक होती ।
देवाकरितां ज्ञानी असती । कितीयेक ॥ ३० ॥
३०) अंतरात्म्याच्या सत्तेनें सर्व कर्मे चालतात. त्याच्या कृपेनें माणूस उपासक बनतो. त्याच्या अनुभवानें कित्येक माणसें ज्ञानसंपन्न बनतात. 
नाना शास्त्रें नाना मतें । देवचि बोलिला समस्तें ।
नेमकांनेमक वेस्तावेस्तें । कर्मानुसार ॥ ३१ ॥
३१) नाना शास्त्रें व नाना मतें ही अंतरात्म्यांतूनच प्रगट होतात. तसेंच व्यवस्थित व अव्यवस्थित हे प्रकार ज्याच्या त्याच्या कर्मानुसारच घडतात. संगळ्यांना मूळ प्रेरणा अंतरात्म्याची असते.  
देवास अवघें लागे करावें । त्यांत घेऊं ये तितुकें घ्यावें ।
अधिकारासारिखें चालावें । म्हणिजे बरें ॥ ३२ ॥
३२) अंतरात्म्याच्या प्रेरणेनें व सत्तेनें सारें कांहीं घडतें. ही गोष्ट खरी परंतु त्यापैकी आपल्याला जें योग्य व घेण्यासारखें असेल तेंच आपण घ्यावें. आपली ताकद, अधिकार पाहून वागावें. हें चांगलें. 
आवाहान विसर्जन । ऐसेंचि बोलिलें विधान ।
पूर्वपक्ष जाला येथून । सिद्धांत पुढें ॥ ३३ ॥   
३३) कर्ममार्गांत आवाहन व विसर्जन सांगितलें आहे. येथपर्यंत पूर्वपक्ष झाला यापुढें सिद्धांत वर्णन आहे.   
वेदांत सिद्धांत धादांत । प्रचित प्रमाण नेमस्त ।
पंचिकर्ण सांडून हित । वाक्यार्थ पाहावा ॥ ३४ ॥
३४) वेदांत म्हणजे शास्त्र प्रचिती, सिद्धांत म्हणजे गुरुप्रचिती आणि धादांत म्हणजे आत्मप्रचिती. यांत आत्मप्रचिती निश्र्चित प्रमाण आहे. पंचभूतांचा अवाढव्य पसारा बाजूस सारावा आणि आपले आत्महीत करुन देणार्‍या महावाक्यांचा अर्थ पाहावा.    
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पिंडोत्पत्तिनिरुपणनाम समास नववा ॥
Samas Navava Pindotpatti Nirupan
समास नववा पिंडोत्पत्ति निरुपण 


Custom Search

Monday, April 23, 2018

Samas Aathava Sookshmajiv Nirupan समास आठवा सूक्ष्मजीव निरुपण


Dashak Pandharava Samas Aathava Sookshmajiv Nirupan
Samas Aathava Sookshmajiv Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Jiv Shrushti.
समास आठवा सूक्ष्मजीव निरुपण   
श्रीराम ॥
रेणूहून सूक्ष्म किडे । त्यांचे आयुष्य निपटचि थोडें ।
युक्ति बुद्धि तेणेंचि पाडें । तयामधें ॥ १ ॥
१) धुळीच्या कणांतसुद्धा अगदी लहान असें सूक्ष्म किडे आहेत. जसा त्याचा ाकार लहान तसेंच त्यांचे आयुष्यही अल्प असते. त्यांची युक्ति व बुद्धिही तशीच अल्प असते.  
ऐसें नाना जीव असती । पाहों जातां न दिसती ।
अंतःकर्णपंचकाची स्थिती । तेथेंहि आहे ॥ २ ॥
२) असें अनेक प्रकारचे जीव असतात. साध्या डोळ्यांनीं तें दिसत नाहीत. परंतु त्यांच्यामध्यें देखील अंतःकरण, मन, बुद्धि, चित्त व अहंकार या पंचकाचे सूक्ष्म अस्तित्व असते. 
त्यांपुरतें त्यांचें ज्ञान । विषये इंद्रियें समान ।
सूक्ष्म शरीरें विवरोन । पाहातो कोण ॥ ३ ॥  
३) त्यांचा जीव केवढासा पण त्यांच्यापुरतें त्यांचें ज्ञान असते. त्यांची इंद्रियें व त्यांचे भोग तसेच असतात. पण हीं सूक्ष्म शरीरें कोणी नीट विवरुन समजून घेत नाहीं.  
त्यास मुंगी माहा थोर । नेणों चालिला कुंजर ।
मुंगीस मुताचा पूर । ऐसें बोलती ॥ ४ ॥ 
४) ते किडे इतके लहान असतात कीं त्यांना मुंगीसुद्धा प्रचंड मोठी आहे असें वाटते. एखाद्या हत्ती येवढा तीचा आकार मोठा आहे असें त्यांना वाटते. पण आपल्यादृष्टीनें मुंगी फारच लहान आहे. मुंगी माणसाच्या मुताचा पूर आहे असें म्हणतात.      
तें मुंगीसमान शरीरें । उदंड असती लाहानथोरें ।
समस्तांमध्यें जीवेश्र्वरें । वस्ति कीजे ॥ ५ ॥
५) मुंगीच्या शरीराएवढे शरीर असणारे लहानमोठे जीव तर पुष्कळच आहेत. त्या सगळ्यांमध्यें जीवाचा ईश्र्वर वास करतो.  
ऐसिया किड्यांचा संभार । उदंड दाटला विस्तार ।
अत्यंत साक्षपी जो नर । तो विवरोन पाहे ॥ ६ ॥
६) अशा किड्यांची संख्या फार मोठी आहे. जिकडेतिकडे ते दाटीवाटीनें पसरलें आहेत. अतिशय कष्टाळू व जिज्ञासू माणूस त्यांचे निरिक्षण करुन त्यांचे ज्ञान मिळवितो.   
नाना नक्षत्रीं नाना किडे । त्यांस भासती पर्वतायेवढें ।
आयुष्यहि तेणेंचि पाडें । उदंड वाटे ॥ ७ ॥
७) निरनिराळ्या नक्षत्रांवर निरनिराळ्या प्रकारचे किडे निर्माण होतात. माणसाला त्यांची कल्पना येत नाही. पृथ्वीवरील किडामुंगीच्या मानानें ते पर्वताएवढे भासतात. त्याच मोजमापानें त्यांचे आयुष्यही फारच मोठें असतें.
पक्षायेवढे लाहान नाहीं । पक्षायेवढें थोर नाहीं ।
सर्प आणि मछ पाहीं । येणेंचि पाडें ॥ ८ ॥  
८) पक्ष्यांच्या समुदायांत कांहीं अतिशय लहान असतात. तर कांहीं अतिशय मोठे असतात. साप व मासेसुद्धा असे लहानापासून अतिशय मोठ्या आकाराचे आढळतात.
मुंगीपासून थोरथोरें । चढतीं वाढतीं शरीरें ।
त्यांचीं निर्धारितां अंतरें । कळों येती ॥ ९ ॥
९) मुंगी अति लहान असते तिच्यापासून सुरवात करुन पाहिलें तर पुढील प्राण्यांचे देह एकाहून एक मोठे आढलतात. आपण जर नीट निरिक्षण करुन विचार केला तर त्यांची मनोरचना कळून येते.   
नाना वर्ण नाना रंग । नाना जीवनाचे तरंग ।
येक सुरंग येक विरंग । किती म्हणौनि सांगावे ॥ १० ॥
१०) प्राण्यांचे नाना तर्‍हेचे रंग, वर्ण, त्यांच्या जीवनांतील तरंग किंवा हालचाली, कांही प्राण्यांचे सुंदर रंग, काहींचे घाणेरडे रंग अशी सर्व माहिती सांगणें शक्य नाहीं.  
येकें सकुमारें येकें कठोरें । निर्माण केलीं जगदेश्र्वरें ।
सुवर्णासारिखीं शरीरें । दैदिप्यमानें ॥ ११ ॥  
११) कांहीं प्राण्यांचे शरीर मऊ, नाजूक असतें. तर काहींचें कठीण व कडक असते.परंतु हे सर्व प्राणी जगदीश्र्वरानेच निर्माण केले आहेत. कांहींचे देह तर सोन्याप्रमाणें चकाकतात.  
शरीरभेदें आहारभेदें । वाचाभेदें गुणभेदें ।
अंतरीं वसिजे अभेदें । येकरुपें ॥ १२ ॥ 
१२) आपण जे प्राणी पाहतो त्याच्यांत खाण्यापिण्याचे, शरीररचनेचे आवाजाचे आणि गुणांचे भेद दिसतात. यांत शंका नाहीं पण प्रत्येक प्राण्यांत राहणार्‍या अंतरात्म्यामध्यें भेद नाहीं. तो एकच एक आहे.   
येक त्रासकें येक मारकें । पाहो जातां नाना कौतुकें ।
कितीयेक आमोलिकें । सृष्टीमध्यें ॥ १३ ॥ 
१३) एकादा प्राणी चिडका असतो. तर दुसरा मारका असतो. आपण जर नीट निरिक्षण केलें तर या सृष्टीमध्यें अनेकप्रकारची अशी अमोलिक आश्र्चर्ये बघावयास मिळतात.  
ऐसीं अवघीं विवरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे ।
आपल्यापुरतें जाणोन राहे । किंचितमात्र ॥ १४ ॥
१४) सृष्टीमधील हीं अमोल कौतुकें नीट निरीक्षण करणारा कोणी भेटत नाहीं. जो तो आपापल्यापुरतें अल्प ज्ञान मिळवतो व जगत असतो. 
नवखंड हे वसुंधरा । सप्तसागरांचा फेरा ।
ब्रह्मांडाबाहेरील नीरा । कोण पाहे ॥ १५ ॥
१५) नउ खंड मिळून पृथ्वीचा विस्तार आहे. तिच्या भोवतीं सात समुद्रांचा वेढा आहे. पण ब्रह्मांडाच्या बाहेर असणारे पाणी कोणीच पाहात नाहीं. 
त्या नीरामध्यें जीव असती । पाहों जातां असंख्याती । 
त्या विशाळ जीवांची स्थिती । कोण जाणे ॥ १६ ॥
१६) त्या पाण्यांत अक्षरशः असंख्य जीव आहेत. त्या प्रचंड विशाल जीवांची स्थिती कोणालाही माहित नाहीं.
जेथें जीवन तेथें जीव । हा उत्पत्तीचा स्वभाव ।
पाहातां याचा अभिप्राव । उदंड असे ॥ १७ ॥
१७) जेथें पाणी तेथें जीवन आहेच आहे. हा ञत्पत्तीचा नियम, स्वभावच फार मोठा आहे.  
पृथ्वीगर्भीं नाना नीरें । त्या नीरामधें शरीरें ।
नाना जीनस लाहानथोरें । कोण जाणे ॥ १८ ॥
१८) पृथ्वीच्या पोटांत पुष्कळ प्रकारचे पाणी असते.  त्या पाण्यांत जीव आहेत. अनेकप्रकारचे लहानमोठे पदार्थ आहेत. त्यांचें ज्ञान कोणाला नसतें.
येक प्राणी अंतरिक्ष असती । तेहीं नाहीं देखिली क्षिती ।
वरीच्यावर उडोन जाती । पक्ष फुटल्यानंतरें ॥ १९ ॥
१९) कांहीं प्राणी आकाशांत असतात. त्यांनी पृथ्वी कधीं पाहिलेलीच नसतें. वर आकाशामतच त्यांना पंख फुटतात मग ते वरच्यावर उडून जातात.  
नाना खेचरें आणि भूचरें । नाना वनचरें आणि जळचरें ।
चौर्‍यासि योनीप्रकारें । कोण जाणे ॥ २० ॥
२०) चौर्‍यांशीं योनींत अनेक प्रकारचे आकाशांत राहणारे, पृथ्वीवर राहणारे, जंगलांत राहणारे, आणि पाण्यांत राहणारे जीवप्राणी आहेत. त्या सर्वांचे ज्ञान कोणास नसतें.
उष्ण तेज वेगळें करुनी । जेथें तेथें जीवयोनी ।
कल्पनेपासुनी होती प्राणी । कोण जाणे ॥ २१ ॥
२१) एक उष्ण अग्नि सोडला तर इतर सर्व ठिकाणीं जीवप्राणी आढळतात. इतकेंच काय पण कल्पनेपासून देखील प्राणी निर्माण होतात. त्यांचें ज्ञान कोणालाच नसतें. 
येक नाना सामर्थ्ये केलें । येक इच्छेपासून जाले ।
येक शब्दासरिसे पावले । श्रापदेह ॥ २२ ॥   
२२) त्याचप्रमाणें कांहीं प्राणी सिद्धिने, सामर्थ्याने निर्माण होतात. कांहीं इच्छेपासून तर इतरकांहीं शापामुळें निर्माण होतात.  
येक देह बाजीगरीचे । येक देह वोडंबरीचे ।
येक देह देवतांचे । नाना प्रकारें ॥ २३ ॥
२३) कांहीं देह माणसाच्या जादुगिरीमुळें होतात. तर कांहीं राक्षसाच्यां मायेने होतात. तर कांहीं देवांच्या देहाचे प्रकार आहेत. 
येक क्रोधापासून जाले । येक तपापासून जन्मले ।
येक उश्रापें पावले । पूर्वदेह ॥ २४ ॥
२४) कांहीं देह क्रोधापासून तर कांहीं तपश्र्चर्येंतून जन्मास येतात. कांहीं उःशापाने शापदेह सोडून मुळाच्या देहांत येतात.  
ऐसें भगवंताचें करणें । किती म्हणौन सांगणें ।
विचित्र मायेच्या गुणें । होत जातें ॥ २५ ॥
२५)  भगवंताचें कर्तृत्व असें विलक्षण आहे. तें सगळें वर्णन करणें शक्य नाहीं. माया मोठी विचित्र आहे. तिच्या योगानें हें सर्व घडून येते.   
नाना अवघड करणी केली । कोणीं देखिली ना ऐकिली ।
विचित्र कळा समजली । पाहिजे सर्वे ॥ २६ ॥
२६) मायेनें अशी कांहीं कठिण करणी करुन ठेवली आहे कीं, तशी कोणी पाहिली नाहीं. ऐकली नाहीं. मायेची ही संपूर्ण कला समजून घ्यावी. 
थोडे बहुत समजले । पोटापुरती विद्या सिकलें ।
प्राणी उगेंच गर्वे गेलें । मी ज्ञाता म्हणोनी ॥ २७ ॥
२७) एखाद्याला जर थोडें समजले, तो पोटापुरता विद्या शिकला तर त्याला " मी मोठा जाणता आहे " असा गर्व चढतो. व तो माणूस वाया जातो.  
ज्ञानी येक अंतरात्मा । सर्वांमधें सर्वात्मा । 
त्याचा कळावया महिमा । बुद्धि कैंची ॥ २८ ॥
२८) जगामध्यें एक अंतरात्मा तेवढा एक खरा ज्ञानी आहे. तोंच सर्वांच्या अंतर्यामी आत्मरुपानें राहतो. त्याचा महिमा आकलन होण्याइतकी बुद्धि फारच कमी आढळते. 
सप्तकंचुक ब्रह्मांड । त्यांत सप्तकंचुक पिंड ।
त्या पिंडामधें उदंड । प्राणी असती ॥ २९ ॥
२९) पंचमहाभूतें, अहंकार व महत्तत्व हीं सात वेष्टनें ब्रह्मांडाची आहेत. त्यांत राहणार्‍या पिंडाला पण तशीच सात आवरणें असतात. त्या पिंडांत असंख्य प्राणी आहेत. 
आपल्या देहांतील न कळे । मा तें अवघें कैंचे कळे ।
लोक होती उतावळे । अल्पज्ञानें ॥ ३० ॥
३०) आपल्या देहांत राहणारे प्राणी आपल्याला कळत नाहींत तर मग अवघ्या विश्वामधें राहणारे प्राणी कळणें कसें शक्य आहे ?
अणुरेणा ऐसें जिनस । त्यांचे आम्ही विराट पुरुष ।
आमचें उदंडचि आयुष्य । त्यांच्या हिसेबें ॥ ३१ ॥
३१) अणुरेणुसारखे जे अति लहान पदार्थ व जीव आहेत, त्यांच्या दृष्टीनें आपण माणसें म्हणजे जणुं कांहीं विश्वाएवढे विराट पुरुष आहोत. त्यांच्या हिशेबानें आपलें आयुष्य देखील अतिशय दीर्घ आहे. 
त्यांच्या रिती त्यांचे दंडक । वर्तायाचे असती अनेक ।
जाणे सर्वहि कौतुक । ऐसा कैंचा ॥ ३२ ॥
३२) अणुरेणुसमान सूक्ष्म जीवांच्या वागण्याच्या रीति आणि वागण्याचे नियम पुष्कळ प्रकारचे आहेत. त्या सर्वांचे ज्ञान कोणास नसतें.
धन्य परमेश्र्वराची करणी । अनुमानेना अंतःकरणीं ।
उगीच अहंता पापिणीं । वेढा लावी ॥ ३३ ॥
३३) थोडक्यांत परमेश्र्वराची करणी मोठी विस्मयकारक आहे. माणसाला आपल्या बुद्धिनें तीची कल्पना येणें शक्य नाहीं. असें असूनही अहंता पापिणीनें माणसाला वेढून टाकलें आहे. 
अहंता सांडून विवरणें । कित्येक देवाचें करणें ।
पाहातां मनुष्याचें जिणें । थोडें आहे ॥ ३४ ॥
३४) आपली अहंता बाजूस सारुन भगवंताच्या अनेक करणींचें मनन चिंतन माणसाने करावे. माणसाचे आयुष्य फार कमी आहे.  
थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया ।
शरीर आवघें पडाया । वेळ नाहीं ॥ ३५ ॥
३५) आयुष्य अल्प व देह क्षणभंगुर असतांना माणूस निष्कारण गर्व धारण करतो. शरीर पडायला मुळींच वेळ लागत नाहीं. 
कुश्र्चीळ ठांईं जन्मलें । आणि कुश्र्चीळ रसेंचि वाढलें ।
यास म्हणती थोरलें । कोण्या हिसेबें ॥ ३६ ॥
३६) हा देह घाणेरड्या जागीम जन्म घेतों. घाणेरड्या रसानेंच पोसला जातो. अशा या देहाला थोर म्हणून त्याचा अभिमान बाळगतात याला कांहींच अर्थ नाहीं.
कुश्र्चीळ आणि क्ष्णभंगुर । अखंड वेथा चिंतातुर ।
लोक उगेच म्हणती थोर । वेडपणें ॥ ३७ ॥
३७) घाणेरडें, क्षणभंगुर, निरंतर व्यथेनें आणि कालजीनें पछाडलेले असेम हें शरीर आहे. लोक उगीच वेडेपणानें त्याला थोर म्हणतात. 
काया माया दों दिसांची । अदिअंतीं अवघी ची ची ।
झांकातापा करुन उगीचि । थोरीव दाविती ॥ ३८ ॥ 
३८) शरीर व ऐश्र्वर्य सारा दोन दिवसांचा खेळ आहे. आरंभी व अखेर सारी फजिती असतें. कपड्यालत्यांनीं उगीच झाकताप करुन लोक उगीच मोठेपणा मिरवतात. 
झांकिलें तरी उपंढर पडे । दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे ।
जो कोणी विवेकें पवाडे । तोचि धन्य ॥ ३९ ॥
३९) देह जिवंतपणीं कितीही झाकला तरी तो अखेरीस उघडा पडतोच. त्याची दुर्गंधी जिकडेतिकडे पसरते. म्हणून जो कोणी विवेकानें विशाल बनतो, देहबुद्धितून बाहेर पडतो, तोच खरा धन्य होय.
उगेंचि कायसा तंडावें । मोडा अहंतेचे पुंडावें ।
विवेकें देवास धुंडावें । हें उत्तमोत्तम ॥ ४० ॥
४०) उगीच शब्दजालांत गुरफटु नये. या अहंकाराचा पुंडपणा अगदी मोडून काढावा. विवेकानें भगवंताचा शोध घ्यावा हें उत्तमांतउत्तम आहे.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मजीवनिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava Sookshmajiv Nirupan
समास आठवा सूक्ष्मजीव निरुपण 
  


Custom Search