Tuesday, October 31, 2017

Samas Tisara NisSandeh Nirupan समास तिसरा निःसंदेह निरुपण


Dashak Navava Samas Tisara NisSandeh Nirupan
Samas Tisara NisSandeh Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about NisSandeha in this Samas.
समास तिसरा निःसंदेह निरुपण 
श्रीराम ॥
श्रोतीं केला अनुमान । ऐसें कैसें ब्रह्मज्ञाान ।
कांहींच नाहीं असोन । हें केवि घडे ॥ १ ॥
१) मागील समासाच्या शेवटीं  " करुन कांहींच न करावें, असून कांहींच नसावें " असें वक्त्यानें सांगितलें. त्यावर श्रोत्यानें शंका काढली कीं,  " ब्रह्मज्ञान असें कसें असतें ? " आपण असून नसावें. हें कसें शक्य आहे ? "  
सकळ करुन अकर्ता । सकळ भोगून अभोक्ता ।
सकळांमध्यें अलिप्तता । येईल कैसी ॥ २ ॥
२) सगळीं कर्में करुन अकर्तेपणा, सगळे भोग भोगून अभोक्तेपणा, आणि सगळ्यांत राहून अलिप्तपणा येईल कसा ?
तथापी तुम्ही म्हणतां । योगी भोगून अभोक्ता ।
स्वर्गनर्कहि आतां । येणेंचि न्यायें ॥ ३ ॥
३) तथापि आपण म्हणतां कीं, योगी भोग भोग ून अभोक्ता राहतो. तर मग स्वर्ग व नरक यांच्या भोगांना हा अभोक्तेपणाचा नियम लागूं करावयास पाहिजे.  
जन्म मृत्य भोगिलेच  भोगी । परी तो भोगून अभोक्ता योगी ।
यातना हि तयालागी । येणेंचि पाडें ॥ ४ ॥
४) जन्म व मृत्यु यांचे भोग भोगावेंच लागतात. पण तें भोग भोगून योगी अभोक्ता राहतो. असें जर आहे तर भोगाच्या यातना भोगून देखील योगी त्या भोगीत नाहीं. असें म्हणावें लागेल. 
कुटून नाहीं कुटिला । रडोनि नाहीं रडला ।
कुंथोन नाहीं कुंथिला । योगेश्र्वर ॥ ५ ॥
५) याचा अर्थ असा होतो कीं, योगी पुरुष मार खाऊन मार खात नाहीं, शोकानें रडतो पण रडत नाहीं, शरीर दुःख सहन न होऊन कण्हतो पण तो कण्हत नाही.
जन्म नसोन घातला । पतित नसोन जाला ।
यातना नसोन पावला । नानापरी ॥ ६ ॥
६) त्याला जन्म नसून जन्म घेतो. पतित नसून पतित होतो. आणि यातना नसून नाना प्रकारच्या यातना त्याला भोगाव्या लागतात. 
ऐसा श्रोतयांचा अनुमान । श्रोतीं घेतलें आडरान ।
आतां याचें समाधान । केलें पाहिजे ॥ ७ ॥
७) वक्त्याच्या बोलण्यावर तर्क चालवून श्रोत्यानें काढलेलें हें अनुमान बरोबर नाहीं. श्रोता विचारांच्या आडरानांत पडला आहे. तरी आतां त्याचे समाधान केलें पाहिजे.   
वक्ता म्हणे सावध व्हावें । तुम्ही बोलतां बरवें । 
परी हें तुमच्याच अनुभवें । तुम्हास घडे ॥ ८ ॥
८) वक्ता म्हणतो कीं, श्रोत्यांनीं नीट श्रवण करावें. तुमचें म्हणणें तुम्हांस येणार्‍या अनुभवाच्या दृष्टीनें बरोबर आहे.  
ज्याचा अनुभव जैसा । तो तो बोलतो तैसा ।
संपदेविण जो धिवसा । तो निरार्थक ॥ ९ ॥
९) ज्याला जसा अनुभव येतो तसा तो जीवनाचा अर्थ समजतो. आणि सांगतो. ज्याच्याजवळ फार संपत्ती नसते तो मोठें साहस करुं शकत नाही.  तसा प्रयनही निरर्थक असतो.  
नाहीं ज्ञानची संपदा । अज्ञानदारिद्रें आपदा ।
भोगिल्याच भोगी सदा । शब्दज्ञानें  ॥ १० ॥
१०) ज्या माणसाजवळ आत्मज्ञारुपी संपत्ती नसते, त्याच्याजवळ अज्ञानरुपी दारिद्र्य असतें. त्यामुळे तो अनेक दुःखे भोगतो. त्याची गति फक्त शब्दज्ञानापर्यंतच असते.  
योगी वोळखावा योगेश्र्वरें । ज्ञानी वोळखावा ज्ञानेश्र्वरें ।          
माहाचतुर तो चतुरें । वोळखावा ॥ ११ ॥
११) योग्याची अवस्था योग्यासच कळते. ज्ञान्याची अवस्था ज्ञानी पुरुषासच कळते. चतुर पुरुषच मोठ्या चतुर पुरुषास ओळखूं शकतो.  
अनुभवी अनुभवियास कळे । अलिप्त अलिप्तपणें निवळें ।
विदेहाचा देहभाव गळे । विदेही देखतां ॥ १२ ॥
१२) स्वानुभवी पुरुषच आत्मज्ञानी पुरुषास ओळखतो. जो स्वतः अलिप्त असतो तोच अलिप्तपणानें संपन्न पुरुष ओळखतो. स्वतः विदेही असलेला पुरुष दुसर्‍या विदेही पुरुषास पाहून देहभान विसरतो.  
बद्धासारिखा सिद्ध । आणी सिद्धासारिखा बद्ध ।
येक भावील तो अबद्ध । म्हणावाच नलगे ॥ १३ ॥
१३) नुसत्या देहावरुन बघितलें तर एखादा सिद्ध पुरुष बद्धा सारखा दिसतो व बद्ध पुरुष सिद्धासारखा म्हणुन दोघांची योग्यता एकच आहे असें जो मानतो तो मूर्ख आहे हें सांगावयास नको. 
झडपला तो देहधारी । आणी देहधारक पंचाक्षरी ।
परंतु दोघां येकसरी । कैसी द्यावी ॥ १४ ॥ 
१४) भूतबाधा झालेला माणूस व भूत काढून टाकणारा पंचाक्षरी माणूस दोघे देहानें सारखेंच दिसतात. पण दोघांची योग्यता सारखीं नसते.    
तैसा अज्ञान पतित । आणी ज्ञानी जीवनमुक्त ।
दोघे समान मानील तो युक्त । कैसा म्हणावा ॥ १५ ॥
१५) त्याचप्रमाणे एखदा भ्रष्ट अज्ञानी माणूस व एखादा जीवनमुक्त ज्ञानी पुरुष दोघेही देहानें सारखेंच दिसतात. म्हणून दोघांची योग्यता सारखीच म्हणणारा माणूस विचारी कसा म्हणावा ? 
आतां असो हे दृष्टांत । प्रचित बोलों कांहीं हेत ।
येथें श्रोतीं सावचित्त । क्षणयेक व्हावें ॥ १६ ॥
१६) आतां हें दृष्टांत पुरें. स्वरुपानुभवाच्या कांहीं खुणा आतां सांगतो. श्रोत्यांनीं क्षणभर लक्ष देऊन त्या ऐकाव्यात.   
जो जो ज्ञानें गुप्त जाला । जो विवेकें विराला ।
जो अनन्यपणें उरला । नाहींच कांहीं ॥ १७ ॥
१७) आत्मज्ञानाच्या योगानें जो गुप्त होतो, म्हणजे ज्याचा मीपणा अंतर्धान पावतो, निदिध्यासानें जो स्वरुपामध्यें विलीन होतो, आणि स्वरुपाशी एकरुप झाल्यानें जो यत्किंचित वेगळेपणानें उरत नाहीं,
तयास कैसें गवसावें । शोधूं जातां तोचि व्हावें ।
तोचि होतां म्हणावें । नलगे कांहीं ॥ १८ ॥
१८) त्याला सापडवणें सोपें नसतें. जो त्याला शोधावयास जातो, तो स्वतः तेंच रुप बनतो. तो स्वतः तेंच झाल्यावर सगळें खुंटतें. बाकी कांहीं उरतच नाही.
देहीं पाहातां दिसेना । तत्त्वें शोधितां भासेना ।
ब्रह्म आहे निवडेना । कांहीं केल्यां ॥ १९ ॥  
१९) देहामध्यें त्याला पाहीला जावें तर तर तो तेथें नसतो. पंचभूतांमध्येंही तो दिसत नाही, ब्रह्मरुप होऊन तो ब्रह्मामध्यें तो असतो तरी त्यास स्वरुपाहून वेगळे काढून त्यास पाहता येत नाही.  
दिसतो तरी देहधारी । परी कांहींच नाहीं अंतरीं ।
तयास पाहातां वरिवरी । कळेना कैसा ॥ २० ॥
२०) बाहेरुन तो सामान्य माणसासारखा देहधारी दिसतो. पण त्याला " मी देह आहे ही जाणीव नसते. " अशा ज्ञानी पुरुषास वरवर पाहिलें तर त्याची आंतील अवस्था ध्यानांत येणार नाही.   
कळाया शोधावें अंतर । तंव तो नित्य निरंतर ।
जयास धुंडितां विकार । निर्विकार होती ॥ २१ ॥
२१) तो खरा कसा आहे हे कळण्यासाठीं त्याची अंतरस्थिती शोधून पहावी.  तसें केल्यावर कळतें कीं, तो सदासर्वदा शाश्वत वस्तु असतो. स्वस्वरुपाशीं तदाकार झालेला असतो. त्याचा शोध घेतां घेतां आपली देहबुद्धी नाहीशी होते. आणि आपण स्वतः निर्विकार सद्वस्तु बनतो.    
तो परमात्मा केवळ । तयास नाहीं मायामळ ।
अखंड हेतूचा विटाळ । जालाच नाहीं ॥ २२ ॥
२२) तो शुद्ध व केवल परमात्मस्वरुप असतो. त्याच्या ठिकाणीं मायेचा मल नसतो. कोणत्याही संकल्पाचा त्यास कधींही स्पर्श होत नाहीं.  
ऐसा जो कां योगीराज । तो आत्मा सहजीं सहज ।
पूर्णब्रह्म वेदबीज । देहाकारें कळेना ॥ २३ ॥
२३) अनुभवाच्या अशा उच्च पातळीवर स्थिर राहणारा योगीराज अगदी सहजपणें आत्मस्वरुप असतो. वेदाचें मूळ असणारा आणि पूर्णब्रह्मस्वरुप झालेला तो ज्ञानी त्याच्या देहावरुन ओलखता येणें शक्य नाहीं. 
देह भावितां देहचि दिसे । परी अंतर अनारिसें असे ।
तयास शोधितां नसे । जन्ममरण ॥ २४ ॥
२४) देहाच्या दृष्टीनें तो सामान्य देहधारी पुरुष वाटतो. पण त्याची आंतील स्थिती अगदी निराळीच असते. तिचा शोध घेतला तर त्यास जन्ममरण नाहीं हें समजून येतें. 
जयास जन्ममरण व्हावें । तें तो नव्हेचि स्वभावें ।
नाहींच तें आणावें । कोठून कैंचें ॥ २५ ॥
२५) अविद्येमुळें जीवपणा व जीवपणामुळें जन्ममरण. ज्ञानी पुरुषाची अविद्या व जीवपणा स्वस्वरुप साक्षात्कारानें आपोआप नाहींसें होतात. तो जीवरुप नसून परमात्मस्वरुप असतो. त्यामुळे त्यास जन्ममरण नसतें. जें नाहींच तें आणणार कोठून ?    
निर्गुणास जन्म कल्पिला । अथवा निर्गुण उडविला ।
तरी उडाला आणी जन्मला । आपला आपण ॥ २६ ॥
२६) ज्ञानी पुरुष निर्गुण असतो. त्यास जन्ममरण नसतें. पण अज्ञानी माणसानें निर्गुणास जन्म मरण असते अशी कल्पना केली, तरी निर्गुण जसेंच्या तसेंच राहते. ज्ञानी पुरुषाला कोणाच्या म्हणण्यानें जन्ममरण भोगावें लागत नाही. पण त्या कल्पना करणार्‍या अज्ञानी माणसासच तें भोगावें लागतें.    
माध्यांनीं थुंकितां सूर्यावरी । तो थुंका पडेल आपणाच वरी ।
दुसर्‍यास चिंतितां अंतरीं । आपणास घडे ॥ २७ ॥
२७) भर दुपारीं एखाद्यानें सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर तो थुंका त्याच्याच अंगावर पडतो. किंवा दुसर्‍याचे वाईट व्हावें असें आपण मनांत आणलें तर आपलेंच वाईट होते.   
समर्थ रायाचें महिमान । जाणतां होतें समाधान ।
परंतु भुंकों लागलें स्वान । तरी तें स्वानचि आहे ॥ २८ ॥
२८) समजा एक कर्तृत्ववान थोर पुरुष आहे, त्याचा थोरपणा समजला म्हणजे मनाचें समाधान होते. पण त्याच्यावर भुंकणारी कुत्रीं असतात. ती भुंकली तरी ती कुत्रीच आहेत म्हणून कोणी तिकडे लक्ष देत नाहीत.   
ज्ञानी तो सत्यस्वरुप । अज्ञान देखे मनुष्यरुप ।
भावासारिखा फळद्रूप । देव तैसा ॥ २९ ॥
२९) आत्मज्ञानी पुरुष परमात्मस्वरुप असतो. अज्ञानी त्याला सामान्य मनुष्य समजतात. जसा ज्याचा भाव तसा देव त्याला फलद्रुप होतो. ज्ञानी पुरुषाला जो सामान्य समजतो त्याला फलदेखिल माणसाचेंच प्राप्त होते.   
देव निराकार निर्गुण । लोक भाविती पाषाण ।
पाषाण फुटतो निर्गुण । फुटेल कैसा ॥ ३० ॥
३०) खरा देव निर्गुण आहे. तसाच तो ाकाररहितही आहे. सामान्य लोक पाषाणामध्यें त्याची भाचना करतात. पाषाण तर फुटतो, निर्गुण देव फुटणें शक्य नाही.  
देव सदोदित संचला । लोकीं बहुविध केला ।
परंतु बहुविध जाला । हें तों घडेना  ॥ ३१ ॥
३१) देव सगळीकडें गच्च भरुन आहे. सामान्य लोक त्याला अनेकपणानें भजतात. एकाला अनेकपण देतात. मात्र एकच एक असणारा देव अनेक होणें शक्य नाहीं. 
तैसा साधु आत्मज्ञानी । बोधें पूर्ण समाधानी ।
विवेकें आत्मनिवेदनी । आत्मरुपी ॥ ३२ ॥
३२) तसेंच साधु आत्मज्ञानी असतो. त्या ज्ञानानें तो संपूर्ण समाधानी असतो. निदिध्यासानें तो अनन्य होऊन आत्मस्वरुपाकार बनतो. 
जळोन काष्ठाचा आकार । अग्नि दिसे काष्ठाकार । 
परी काष्ठ होईल हा विचार । बोलोंच नये ॥ ३३ ॥
३३) एखादें लाकूड जेव्हां अग्नीने जळते तेव्हां अग्नीला त्या लाकडाचा आकार प्राप्त होतो. पण अग्नी लाकूड कधींच होत नाही.  
कर्पूर असे तो जळतां दिसे । तैसा ज्ञानीदेह भासे ।
तयास जन्मवितां कैसें । कर्दळीउदरी ॥ ३४ ॥
३४) कापूर जलतो तो जळतांना दिसतो, पण तो कर्दळीच्या पोटांत उत्पन्न होत नाही. त्याचप्रमाणें आत्मज्ञान धारण करणार्‍या ज्ञानी पुरुषाचा देह दिसतो; पण एकदा तो पतन पावला कीं ज्ञानी पुरुषास परत जन्म येत नाही.  
बीज भाजलें उगवेना । वस्त्र जळालें उकलेना ।
बोध निवडितां निवडेना । गंगेमधें ॥ ३५ ॥
३५) बी भाजलें कीं तें उगवत नाही. वस्त्र जळलें कीं तें उकलत नाहीं. एखदा  ओढा गंगेला मिळला कीं परत निराळा काढता येत नाही.  
बोध गंगेमागें दिसे । गंगा येकदेसी असे ।
साधु कांहींच न भासे । आणी आत्मा सर्वगत ॥ ३६ ॥
३६) ओढा गंगेला मिळण्यापूर्वी वेगळा दिसतो नंतर दिसत नाहीं. कारण गंगा एकदेशी आहे. त्यामुळें आधींचा ओढा दिसत राहतो. पण आत्मा सर्वदेसी आहे, सर्वव्यापी आहे व स्थळकाळाच्या त्याला मर्यादा नाहींत. त्यामुळें आत्मज्ञानी पुरुष एकदा का स्वरुपाकार झाला कीं वेगळा दिसत नाही. येथें गंगेची व ओढ्याचा दृष्टांत उणा पडतो.    
सुवर्ण नव्हे लोखंड । साधूस जन्म थोतांड ।
अज्ञान प्राणी जडमूढ । तयास हें उमजेचिना ॥ ३७ ॥
३७) सोनें म्हणजे सर्वोत्तम धातु तर लोखंड म्हणजे हीन धातु. त्याचप्रमाणें साधु हा सुवर्णासारखा तर अज्ञानी हा लोखंडासारखा समजावा. सामन्यांस पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण साधूला पुन्हा जन्म नसतो. सामान्य अज्ञानी व मूढ माणसांना हें उमजत नाहीं.  
अंधास कांहींच न दिसे । तरी ते लोक आंधळे कैसे ।
सन्नपातें बरळतसे । सन्नपाती ॥ ३८ ॥
३८) आंधळ्या माणसास स्वतःला कांहींच दिसत नाहीं. म्हणून इतर सर्व माणसांना आंधळेंपणानें कांहीं दिसत नाहीं. असें म्हणता येणार नाहीं. सन्निपातज्वरामध्यें माणूस कांहींहीं बरळतो. त्याचप्रमाणें अज्ञानी माणूस साधूबद्दल कांहींहीं बडबडतो.  
जो स्वप्नामधें भ्याला । तो स्वप्नभयें वोसणाला ।
तें भयें जागत्याला । केवि लागे ॥ ३९ ॥
३९) एका माणसाला भयानक स्वप्न पडलें व तत्यामुळें तो घाबरला आणि मोठ्यानें ओरडला जागा असलेल्या माणसाला तें भय वाटणार नाहीं.
मुळीं सर्पाकार देखिली । येक भ्याला येकें ओळखिली ।
दोघांची अवस्था लेखिली । सारिखीच कैसी ॥ ४० ॥
४०) सर्पाचा आकार असलेली मुळी दोघांनी पाहीली. एक घाबरला तर दुसर्यानें ती मुळीं आहे हें ओळखलें. या दोघांची अवस्था सारखींच आहे असें म्हणता येत नाहीं कारण एक घाबरलेला आहे तर दुसरा निर्भय आहे.  
हातीं धरितां हि डसेना । हें येकास भासेना ।
तरी ते त्याची कल्पना । तयासीच बाधी ॥ ४१ ॥
४१) ती मुळीं हातात धरली तरी चावत नाहीं हें घाबरलेल्या माणसाला पटत नाही. ती मुळी नसून सापच आहे ही त्याची कल्पनाच त्याला बाधते.  
विंचु सर्प डसला । तेणें तोचि जाकळला ।
तयाचेनि लोक जाला । कासावीस कैसा ॥ ४२ ॥
४२) ज्या मानसाला साप किंवा विंचू चावतो, त्यालाच तें वीष बाधून तो कासावीस होतो. त्या वीषानें इतर लोक कासावीस होत नाहीत.    
आतां तुटला अनुमान । ज्ञानियास कळे ज्ञान ।
अज्ञानास जन्ममरण । चुकेचिना ॥ ४३ ॥
४३) आतां श्रोत्यानें काढलेल्या शंकेचें निरसन झालें. जो स्वतः ज्ञानी असतो त्यालाच ज्ञानी पुरुषाची अवस्था आकलन होतें. जो अज्ञानी असतो त्याचे मात्र जन्ममरण चुकत नाही.   
येका जाणण्यासाठीं । लोक पडिले अटाटीं ।
नेणपणें हिंपुटी होती । जन्ममृत्यें ॥ ४४ ॥
४४) आपणास ज्ञान व्हावें यासाठीं लोक खटपट करीत असतात. पण अज्ञानामुळें त्यांचे जन्ममृत्यु कांहीं चुकत नाहीत. त्यामुळें त्यांना दुःख भोगावें लागतें. 
तेंचि कथानुसंधान । पुढें केलें परिछिन्न ।
सावधान सावधान । म्हणे वक्ता ॥ ४५ ॥
४५) हाच विषय पुढें अगदी स्पष्ट करुन सांगितला आहे. म्हणून श्रोत्यांनी फार लक्ष द्यावें. अशी वक्ता विनंती करतो. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निःसंदेहनिरुपणनाम समास तिसरा ॥
Samas Tisara NisSandeh Nirupan
समास तिसरा निःसंदेह निरुपण 


Custom Search

Sunday, October 29, 2017

Samas Dusara Brahma Nirupan समास दुसरा ब्रह्मनिरुपण


Dashak Navava Samas Dusara Brahma Nirupan 
Samas Dusara Brahma Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Brahma in this Samas.
समास दुसरा ब्रह्मनिरुपण 
श्रीराम ॥
जें जें कांहीं साकार दिसे । तें तें कल्पांती नासे ।
स्वरुप तें आसतचि असे । सर्वकाळ ॥ १ ॥
१) जें जें आकारासहित असते तें तें अखेर नाश पावतें. पण परमात्स्वरुप मात्र सदासर्वकाळ जसेंच्या तसेंच राहतें.
जें सकळांमध्यें सार । मिथ्या नव्हे तें साचार ।
जें कां नित्य निरंतर । संचलें असे ॥ २ ॥
२) जें सर्व वस्तुंचें सार तत्व असतें तें पूर्णोणें सत्य असतें. तें कधींच खोटे होत नाही. तें सदैव सगळीकडें भरुन राहतें.    
तें भगवंताचें निजरुप । त्यासि बोलिजे स्वरुप ।
याहि वेगळीं अमूप । नामें तयाचीं ॥ ३ ॥
३) तेंच भगवंताचें स्वतःचे रुप होय. त्याला स्वरुप असें म्हणतात. शिवाय त्यास आणखी पुष्कळ नांवें आहेत.  
त्यास नामाचा संकेत । कळावया हा दृष्टांत ।
परी तें स्वरुप नामातीत । असतचि असे ॥ ४ ॥
४) स्वरुपाला ओळखण्यासाठीं नाम हा एक संकेत आहे. त्याची कल्पना येण्यासाठीं दृष्टांत द्यावा लागतो. परंतु तें स्वरुप सर्व नामांच्या व दृष्टांतांच्या पलीकडे अगदीं जसेंच्या तसें असतें.
दृश्यासबाह्य संचलें । परी तें विश्र्वास चोरलें ।
जवळिच नाहींसें जालें । असतचि कैसें ॥ ५ ॥
५) सर्व दृश्य पदार्थांच्या आंतबाहेर तें स्वरुप भरुन आहे. पण तें सर्वांपासून गुप्त आहे. प्रत्येकाच्या अगदी जवळ असूनसुद्धा तें त्यांना नसल्यासारखें झालेलें आहे.  
ऐसा ऐकोनियां देव । उठे दृष्टीचा भाव ।
पाहों जातां दिसे सर्व । दृश्यचि आवघें ॥ ६ ॥
६) भगवंताचे वर्णन ऐकून सामान्य माणसाला वाटते कीं भगवंताला डोळ्यांनी पहावें. पण तसें करावयास गेल्यावर सर्वत्र दृश्यच आढळते.   
दृष्टीचा विषयो दृश्य । तोचि जालियां सादृश्य ।
तेणें दृष्टी पावे संतोष । परी तें देखणें नव्हे ॥ ७ ॥
७) दृश्य हा दृष्टीचा विषय होय. वस्तु दृश्य होऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहातां आली म्हणजे आम्ही वस्तु पाहीली असें वाटुन आनंद होतो. पण केवळ डोळ्यांनी पाहाणें हें कांहीं खरें पाहाणें नव्हे.  
दृष्टीस दिसे तें नासे । येतद्विषंई श्रुति असे ।
म्हणौन जें दृष्टीस दिसे । तें स्वरुप नव्हे ॥ ८ ॥
८) जें जें डोळ्यांनी दिसतें नाश पावतें. असें सांगणारें एक श्रुतिवचन आहे. (यद् दृष्टं तद् नष्टं ) म्हणून डोळ्यांना जें दिसतें तें स्वस्वरुप नव्हे. 
स्वरुप तें निराभास । आणी दृश्य भासलें साभास ।
भासास बोलिला नास । वेदांतशास्त्रीं ॥ ९ ॥
९) स्वरुपाला भास नाहीं. दृष्याच्या ठिकाणीं भास आहे. मिथ्यापण आहे. भास नाशवंत असतो असें वेदान्तशास्त्र सांगतें.  
आणी पाहातां दृश्यचि भासे । वस्तु दृश्यावेगळी असे ।
स्वानुभवें पाहातां दिसे । तें दृश्यासबाह्य ॥ १० ॥
१०) आपण जेव्हां डोळ्यांनी पाहातों तेंव्हां फक्त दृश्य दिसतें. सद्ववस्तु किंवा स्वरुप सकल दृश्याहून वेगळी आहे. स्वरुपानुभव आला म्हणजे सद्वस्तु दृश्याला आंतबाहेर व्यापून आहे असें दिसतें. 
जें निराभास निर्गुण । त्याची काये सांगावी खूण ।
परी तें  स्वरुप जाण । सन्निधचि असे ॥ ११ ॥
११) स्वरुपाला आभास किंवा गुण नाही. त्यामुळें त्याला ओळखण्याची खूण सांगता येत नाही. तरी ही तें स्वरुप जवळच आहे. यांत शंका नाही.
जैसा आकाशीं भासला भास । आणी सकळांमधें आकाश ।
तैसा जाणिजे जगदीश सबाह्य अभ्यंतरीं ॥ १२ ॥
१२) आपण आकाश पाहतों. त्यावेळीं आपल्याला आकाश दिसलें असा भास होतो. आकाश वेगळेंपणानें आपल्याला दिसत नाही. कारण सर्व बाजूंना तें पसरलेलें आहे. त्याचप्रमाणें परमेश्र्वर सर्व दृश्य वस्तूंना सगळीकडे आंत व बाहेर व्यापून आहे.  
उदकामधें परी भिजेना । पृथ्वीमधें परी झिजेना ।
वन्हीमधें परी सिजेना । स्वरुप देवाचें ॥ १३ ॥
१३) भगवंताचें स्वरुप पाण्यांत व्यापून आहे पण तें भिजत नाहीं. पृथ्वीमध्यें व्यापून आहे पण झिजत नाहीं. अग्नीमध्यें तें व्यापून आहे पण जळत नाहीं. 
तें रेंद्यामधें परी बुडेना । तें वायोमधें परी उडेना ।
सुवर्णीं असे परी घडेना । सुवर्णासारिखें ॥ १४ ॥
१४) तें चिखलामध्यें व्यापून आहे पण बुडत नाही. वार्‍यामध्यें व्यापून आहे पण उडत नाही. सोन्यामध्यें व्यापून आहे पण त्याचे सोन्यासारखें दागिने बनवता येत नाहीत. 
ऐसें जें संचलें सर्वदा । परी ते आकळेना कदा ।
अभेदामाजीं वाढवी भेदा । ते हे अहंता ॥ १५ ॥
१५) अशा रीतीनें सदासर्वकाळ सर्व ठिकाणीं घनदाटपणें भरुन राहिलेलें स्वस्वरुप अनुभवाच्या कक्षेंत आणणें कठीण असतें. त्या भेदरहित स्वरुपामध्यें अहंता भेद निर्माण करते. 
तिच्या स्वरुपाची खूण । सांगों कांहीं वोळखण ।
अहंतेचे निरुपण । सावध ऐका ॥ १६ ॥ 
१६) अहंतेचें स्वरुप ध्यानांत यावें म्हणून कांहीं खुणा सांगतो. अहंतेचें हे विवेचन लक्ष देऊन ऐकावें.        
जे स्वरुपाकडे पावे । अनुभवासवें झेपावे ।
अनुभवाचे शब्द आघवे । बोलोन दावी ॥ १७ ॥
१७) अहंता सूक्ष्म होत जाऊन स्वरुपापर्यंत पोहोचते. ती स्वरुपाच्या अनुभवाच्या मागें मागें राहाते. अनुभव जेथपर्यंत जाईल तेथपर्यंत जाते. मग तो अनुभव शब्दांनीं वर्णन करुन सांगते.    
म्हणे आतां मीच स्वरुप । तेंचि अहंतेचें रुप ।
निराकारीं आपोआप । वेगळी पडे ॥ १८ ॥
१८) " मीच स्वस्वरुप आहें " हें अहंतेचे रुप समजावें. निराकार व भेदरहित स्वस्वरुपामध्यें ती आपोआप वेगळेपणानें नजरेस पडते.
स्वयें मीच आहे ब्रह्म । ऐसा अहंतेचा भ्रम ।
ऐसिये सूक्ष्मीं सूक्ष्म । पाहातां दिसे ॥ १९ ॥
१९) ' स्वतः मीच ब्रह्म आहे हा अहंतेचा भ्रम आहे. अत्यंत सूक्ष्मांत जाऊन सूक्ष्मपणें पाहिलें म्हणजे माझें हें बोलणें बरोबर कळेल. 
कल्पना आकळी हेत । वस्तु कल्नातीत ।
म्हणौन नाकळे अंत । अनंताचा ॥ २० ॥
२०) " मी देह आहे " ही जशी कल्पना तशीच " मी ब्रह्म आहे " हीं देखिल कल्पनाच आहे. कल्पनेंतून भावना निर्माण होते. सद्वस्तु किंवा स्वस्वरुप तर कल्पनेच्या पलीकडे आहे. कल्पना स्वरुपाला मर्यादा घालूं पाहातें. पण तें अनंत असल्यानें त्याला मर्यादा घालतां येत नाही. स्वरुपाचा अंत लागत नाही. 
अन्वये आणी वीतरेक । हा शब्दभेद कोणीयेक ।
निशब्दाचा आंतरविवेक । शोधिला पाहिजे ॥ २१ ॥
२१) अन्वय व व्यतिरेक हा एक शब्दांचा भेद आहे. सद्ववस्तु खरोखर निःशब्द आहे. म्हणून आपल्या अंतर्यामीं खोल शिरुन निःशब्द स्वस्वरुपाचा शोध घ्यावा. 
आधीं घेईजे वाच्यांश । मग वोळखिजे लक्ष्यांश । 
लक्ष्यांशीं पाहातां वाच्यांश । असेल कैंचा ॥ २२ ॥
२२) स्वस्वरुपाचें वर्णन शब्दांनी केलेले असते. त्या शब्दांचा अर्थ प्रथम नीट समजून घ्यावा. शब्दांचा अर्थ बरोबर समजणें हा वाच्यार्थ होय. पण शब्द खुणेंने सद्वस्तुचें वर्णन करतात. म्हणून वाच्यार्थ ध्यानांत आल्यावर सद्वस्तुची बरोबर कल्पना करावी. हा लक्ष्यांश होय. एकदा लक्ष्यांश ध्यानांत आला म्हणजे वाचार्थाला महत्व उरत नाहीं. एकच लक्ष्यांश निरनिराळ्या शब्दांनीं सांगतां येणें शक्य असतें. या कारणानें शब्दांना लक्ष्यांशापेक्षां कमी महत्व असते.     
सर्वब्रह्म आणी विमळब्रह्म । हा वाच्यांशाचा अनुक्रम ।
शोधितां लक्ष्यांशाचें वर्म । वाच्यांश नसे ॥ २३ ॥
२३) सर्वब्रह्मवादी म्हणतो कीं, " सर्व दृश्य बाजूस केल्यावर जें शुद्ध व निर्मल ब्रह्मस्वरुप उरतें तें ब्रह्म होय. ब्रह्मवर्णानाचे हे दोन प्रकार केवळ शब्दापुरतें भिन्न आहेत. दोन्हींचा लक्ष्यांश जें परब्रह्म तें अगदी एकच एक आहे. तेथें भेद उरत नाहीं.   
सर्व विमळ दोनी पक्ष । वाच्यांशीं आटती प्रत्यक्ष ।
लक्ष्यांशीं लावितां लक्ष । पक्षपात घडे ॥ २४ ॥
२४) सर्वब्रह्म व विमलब्रह्म हे दोन्ही पक्ष वाच्यांशामध्यें आटून जातात. शब्दांच्या पलीकडे त्यांचे क्षेत्र नाहीं. शब्दांच्या कक्षेंतच तें वावरतात. स्वस्वरुप हें दोन्हींचा लक्ष्यांश आहे. तिकडे लक्ष लागलें कीं दोन्हीं पक्ष गळून पडतात. त्यांचा नाश होतो. 
हें लक्ष्यांशें अनुभवणें । येथें नाहीं वाच्यांश बोलणें ।
मुख्य अनुभवाचे खुणे । वाचारंभ कैचा ॥ २५ ॥   
२५) लक्ष्यांशावर लक्ष केंद्रित करुनच स्वस्वरुपाचा अनुभव घ्यावा. त्या अनुभवामध्यें शब्द बोलण्याचे काम नाही. कारण अनुभव शब्दांच्या पलीकडे असतो. निःशब्द अवस्थेंत जाणें ही स्वरुपानुभवाची मुख्य खुण आहे.        
परा पश्यंती मधेमां वैखरी । जेथें वोसरती च्यारी ।
तेथें शब्दकळाकुंसरी । कोण काज ॥ २६ ॥
२६) परा, पश्यन्ति, मध्यमा व वैखरी या चारही वाणी स्वरुपानुभवाच्या ठिकाणीं ओस पडतात, शून्य होतात. म्हणून तेथें शब्दचातुर्याचें काम उरतनाहीं. तेथें शब्दांची कला लटकी पडते.  
शब्द बोलतां सवेंच नासे । तेथें शाश्वतता कोठें असे ।
प्रत्यक्षास प्रमाण नसे । बरें पाहा ॥ २७ ॥
२७) आपण शब्द उच्चारला कीं तो लगेच नाश पावतो.  म्हणून शब्द अशाश्वत असतो. तें अशाश्वतपण आपण प्रत्यक्ष पाहतों. त्यास आणखी पुरावा लागतच नाहीं. 
शब्द प्रत्यक्ष नासिवंत । म्हणोन घडे पक्षपात ।
सर्व विमळ ऐसा हेत । अनुभवीं नाहीं ॥ २८ ॥ 
२८) शब्द नाशवंत आहे. म्हणून तत्त्वज्ञानामधील वाद अखेर गळून पडतात. सर्वब्रह्मवाद व विमलब्रह्मवाद असे पक्ष स्वरुपानुभवामध्यें शिल्लक उरत नाहीत.  
ऐक अनुभवाचें लक्षण । अनुभव म्हणिजे अनन्य जाण ।
ऐक अनन्याचें लक्षण । ऐसें असे ॥ २९ ॥
२९) अनुभवाचें लक्षण ऐकावें. अनुभव म्हणजे स्वरुपाशी अनन्यपण होय. आतां अनन्यपणाचें लक्षण सांगतों.  
अनन्य म्हणिजे अन्य नसे । आत्मनिवेदन जैसें ।
संगभंगें असतचि असे । आत्मा आत्मपणें ॥ ३० ॥
३०) अन्य नाहीं तें अनन्य. जसें कीं, आत्मनिवेदन. अहंतेनें अन्यपण किंवा निराळेंपण येतें. पण अहंता गेली कीं आत्मा एकच एक आत्मपणानें जसाच्या तसा असतो.  
आत्म्यास नाहीं आत्मपण । हेंचि निःसंगाचें लक्षण ।
हें वाक्यांशें बोलिलें जाण । कळवया कारणें ॥ ३१ ॥ 
३१) " मी आत्मा आहे " अशी आत्मपणाची जाणीव आत्मस्वरुपास नसते. असें केवलस्वरुपानें असणें हेंच अत्यंत संगरहित असण्याची खूण आहे. हे शब्दांच्या पलीकडे आहे. पण कल्पनायेण्यासा्ठीं शब्दांनी वर्णन केलें.     
येरवी लक्ष्यांश तो वाच्यांशें । सांगिजेल हें घडे कैसें ।
वाक्यविवरणें अपैसें । कळों लागे ॥ ३२ ॥
३२) सद्वस्तुचे स्वरुप शब्दांनीं सांगतां येण्यासारखें नाही. परमतु संतवचनांवर चिंतन व मनन केलें तरच तें आकलन होऊं लागतें. 
करावें तत्वविवरण । शोधावें ब्रह्म निर्गुण ।
पाहावें आपणास आपण । म्हणिजे कळे ॥ ३३ ॥
३३) या दृश्य विश्र्वांतील तत्त्वांचें विवरण करावें, निर्गुण ब्रह्माचा शोध घ्यावा, आपण कोण तें नीट पाहावें, म्हणजे स्वरुप कसें आहें तें कळूं लागतें.  
हें न बोलतांच विवरिजे । विवरोन विरोन राहिजे ।
मग अबोलणेंचि साजे । माहापुरुषीं ॥ ३४ ॥
३४) स्वरुपाविषयीं बोलणें थांबवून त्याचें अखंड मनन करावें. तसें करतां करतां त्यामध्यें लीन होऊन जावें. अशा रीतीनें स्वस्वरुपाशीं अनन्य झाल्यावर माणूस महापुरुष बनतो. त्याला मौन शोभून दिसतें. 
शब्दचि निशब्द होती । श्रुति नेति नेति म्हणती ।
हें तों आलें आत्मप्रचिती । प्रत्यक्ष आतां ॥ ३५ ॥
३५) स्वरुपानुभवामध्यें शब्द शब्दपणानें विरुन जातात. ही अवस्था श्रुति असें नाहीं असें नाहीं म्हणून म्हणते. ती असें कां म्हणते याचा प्रत्यय आतां स्वतःला येतो. 
प्रचित आलियां अनुमान । हा तों प्रत्यक्ष दुराभिमान ।
तरी आतां मी अज्ञान । मज कांहींच न कळे ॥ ३६ ॥
३६) अशा प्रकारचा स्वरुपानुभव आल्यावर तर्काच्या व अनुमानाच्या मागें लागणें हें मीपणाचें लक्षण आहे. पण हा मी कसा आहे तो पहा. अनुमानाचा हट्ट धरणारा मी अज्ञाानी आहे. त्याला कांहींच कळत नाहीं.  
मी लटिका माझें बोलणें लटिकें । मी लटिका माझें चालणें लटिकें ।
मी माझें अवघेंचि लटिकें । काल्पनिक ॥ ३७ ॥
३७) हा मी मुळांतच खोटा असल्यानें त्याचें बोलणें चालणें खोटेच आहे. त्याचें माझेपण सर्व खोटे आहे. काल्पनिक आहे.     
मज मुळींच नाहीं ठाव । माझें बोलणें अवघेंचि वाव ।
हा प्रकृतीचा स्वभाव । प्रकृती लटिकी ॥ ३८ ॥
३८) त्याला मुळीं स्थानच नाहीं. त्याचें सारें बोलणें अर्थहीन असतें. हा मी व त्याचे सारे व्यवहार प्रकृतीजन्य आहेत. आणि प्रकृति तर खोटी आहे.  
प्रकृति आणी पुरुष । यां दोहींस जेथें निरास ।
तेथें मीपण विशेष । हें केवि घडे ॥ ३९ ॥
३९) स्वरुपानुभवामध्यें प्रकृति व पुरुष या दोघांचा निरास होतो. दोघांचा स्वरुपांत लय होतो. मग त्या ठिकाणीं प्रकृतींतून प्रगट होणार्‍या मीला वेगळेपनें अस्तित्व उरणें अगदीच अशक्य आहे.   
जेथें सर्व हि अशेष जालें । तेथें विशेष कैंचे आलें ।
मी मौनी म्हणतां भंगलें । मौन्य जैसें ॥ ४० ॥
४०) ज्या ठिकाणीं सर्व दृश्य निःशेष नाहींसें होतें त्या ठिकाणीं विशेषपणानें मी कसा उरणार ? मौन पाळणारा एक माणूस म्हणाल " मी मौनव्रत धरलें आहे. " त्याच्या या बोलण्यानेंच त्याचे मौन भंग पावतें.  
आतां मौन्य न भंगावें । करुन कांहींच न करावें ।
असोन निशेष नसावें । विवेकबळें ॥ ४१ ॥
४१) म्हणून स्वानुभव घ्यावा, त्यांत राहून मौन भंगूं देऊं नये. सर्व कांहीं करुन कांहीं केलें नाहीं असें निःसंग असावें. आणि दिसायल वेगळें दिसून अनुभवानें अगदी मुळींच निराळें नसावें.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ब्रह्मनिरुपणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara Brahma Nirupan 
समास दुसरा ब्रह्मनिरुपण 


Custom Search

Saturday, October 28, 2017

Samas Pahila Aakaksha समास पहिला आशंकानाम


Dashak Navava Samas Pahila Aakaksha 
Samas Pahila Aakaksha, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us what is Parabrahma in this Samas.
समास पहिला आशंकानाम
श्रीराम ॥
निराकार म्हणिजे काये। निराधार म्हणिजे काये ।
निर्विकार म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १ ॥
१) निराकार, निराधार, निर्विकार म्हणजे काय तें मला सांगावें. 
निराकार म्हणिजे आकार नाहीं  । निराधार म्हणिजे आधार नाहीं ।
निर्विकार म्हणिजे कल्पना नाहीं । परब्रह्मासी ॥ २ ॥
२) परब्रह्माला आकार नाहीं, आधार नाहीं. त्याच्या ठिकाणी कल्पना नाहीं. 
निरामय म्हनिजे काये । निराभास म्हणिजे काये ।
निरावेव म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ३ ॥
३) निरामय, निराभास, निरावेव म्हणजे काय तें मला सांगावें. 
निरामय म्हनिजे जळमये नाहीं । निराभास म्हणिजे भासचि नाहीं ।
निरावेव म्हणिजे अवेव नाहीं । परब्रह्मासी ॥ ४ ॥   
४) आमय म्हणजे रोग, नाश किंवा विकार. रोग हा पिंडाचा विकार तर प्रलयकालीं जलमय होणें हा ब्रह्मांडाचा विकार होय. परब्रह्माला सृष्टीच्या शेवटीं व आधीं हा विकार बाधत नाहीं. म्हणून तें निरामय आहे. परब्रह्माच्या ठिकाणीं भास नाहीं. त्यास आकार नाहीं. म्हणून अवयव नाहींत.   
निःप्रपंच म्हणिजे काये । निःकळंक म्हणिजे काये ।
निरोपाधी न्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ५ ॥
५) निःप्रपंच, निःकलंक, निरुपाधि म्हणजे काय तें मला सांगावें. 
निःप्रपंच म्हणिजे प्रपंच नाहीं । निःकळंक म्हणिजे कळंक नाहीं ।
निरोपाधी म्हणिजे उपाधी नाहीं । परब्रह्मासी ॥ ६ ॥ 
६) परब्रह्माला संसार नाहीं. कसलाही कलंक नाहीं. व कोणतीही उपाधी किंवा मर्यादा नाहीं. 
निरोपम्य म्हणिजे काये । निरालंब म्हणिजे काये ।
निरापेक्षा म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ७ ॥
७) निरुपम, निरालंब, निरपेक्ष म्हणजे काय तें मला सांगावें. 
निरोपम्य म्हणिजे उपमा नाहीं । निरालंब म्हणिजे अवलंब नाही ।
निरापेक्षा म्हणिजे अपेक्षा नाहीं । परब्रह्मासी ॥ ८ ॥
८) परब्रह्माला उपमा नाहीं. तें कशावर अवलंबून नाहीं. त्याला कशाची अपेक्षा नाही. 
निरंजन म्हणिजे काये । निरंतर म्हणिजे काये।
निर्गुण म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ९ ॥
९) निरंजन, निरंतर, निर्गुण म्हणजे काय तें मला सांगावें. 
निरंजन म्हणिजे जनचि नाहीं । निरंतर म्हणिजे अंतर नाहीं ।
निर्गुण म्हणिजे गुणचि नाहीं । परब्रह्मासी ॥ १० ॥
१०) परब्रह्मास प्राणीमात्रांचा संसर्कनाही. परब्रह्मामध्यें अवकाश किंवा मोकळी जागा नाहीं. तें सगळीकडे सारखें भरलेलें आहे. त्याला गुण नाहीत.  
निःसंग म्हणिजे काये । निर्मळ म्हणिजे काये ।
निश्र्चळ म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ ११ ॥
११) निःसंग, निर्मळ, निश्र्चळ म्हणजे काय तें मला सांगावें. 
निःसंग म्हणिजे संगचि नाहीं । निर्मळ म्हणिजे मळचि नाहीं ।
निश्र्चळ म्हणिजे चळण नाहीं । परब्रह्मासी ॥ १२ ॥
१२) परब्रह्मास आसक्ती नाहीम. कसलाही मल नाही. त्याला स्वस्थितीपासून चळण नाहीं.
निःशब्द म्हणिजे काये । निर्दोष म्हणिजे काये ।
निवृत्ती म्हणिजे काये । मज निरोपावरं ॥ १३ ॥
१३) निःशब्द, निर्दोष, निर्वृत्ति म्हणजे काय तें मला सांगावें. 
निशब्द म्हणिजे शब्दचि नाहीं । निर्दोष म्हणिजे दोषची नाहीं ।
निःवृत्ती म्हणिजे वृत्तिच नाहीं । परब्रह्मासी ॥ १४ ॥
१४) परब्रह्माच्या ठिकाणीं शब्दाला किंवा भाषेला वाव नाहीं. कोणताही दोष नाही. कोणतीही वृत्ती नाही.   
निःकाम म्हणिजे काये । निर्लेप म्हणिजे काये ।
निःकर्म म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १५ ॥
१५) निःकाम, निर्लेप, निहकर्म म्हणजे काय तें मला सांगावें. 
निःकाम म्हणिजे कामचि नाहीं । निर्लेप म्हणिजे लेपचि नाहीं ।
निःकर्म म्हणिजे कर्मचि नाहीं । परब्रह्मासी ॥ १६ ॥
१६) परब्रह्माला कोणतीही इच्छा नाहीं. त्याला कांहीं चिकटत नाहीं. त्याच्या ठिकाणीं कोणतेही कर्म नाहीं.
अनाम्य म्हणिजे काये । अजन्मा म्हणिजे काये ।
अप्रत्यक्ष म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १७ ॥
१७) अनामा, आजन्मा, अप्रत्यक्ष म्हणजे काय तें मला सांगावें. 
आनाम्य म्हणिजे नामचि नाहीं । अजन्मा म्हणिजे जन्मचि नाहीं ।
अप्रत्यक्ष म्हणिजे प्रत्यक्ष नाहीं । परब्रह्म तें ॥ १८ ॥
१८) परब्रह्मास कांहीं नाव नाही. कारण त्यास रुप नाहीं. त्यास जन्म नाहीं. परब्रह्म इंद्रियांना गोचर नाहीं. 
अगणीत म्हणिजे काये । अकर्तव्य म्हणिजे काये ।
अक्षै म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ १९ ॥
१९) अगणित, अकर्तव्य, अक्षय म्हणजे काय तें मला सांगावें. 
अगणीत म्हणिजे गणीत नाहीं । अकर्तव्य म्हणिजे कर्तव्यता नाहीं ।
अक्षै म्हणिजे क्षयचि नाहीं । परब्रह्मासी ॥ २० ॥
२०) परब्रह्माचे मोजमाप करतां येत नाही. तें नीतिअनीतीच्या पलीकडे आहे. त्यास कधींच झीज नाहीं. 
अरुप म्हणिजे काये । अलक्ष म्हणिजे काये ।
अनंत म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ २१ ॥
२१) अरुप, अलक्ष्य, अनंत म्हणजे काय तें मला सांगावें. 
अरुप म्हणिजे रुपचि नाहीं । अलक्ष म्हणिजे लक्षत नाहीं ।
अनंत म्हणिजे अंतचि नाहीं । परब्रह्मासी ॥ २२ ॥
२२) परब्रह्मास कोणतेंच रुप नाहीं. तें मनाला आकलन होत नाहीं. त्यास कधीं अंत नाहीं. 
अपार म्हणिजे काये । अढळ म्हणिजे काये ।
अतर्क्ये म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ २३ ॥
२३) अपार, अधळ, अतर्क्य म्हणजे काय तें मला सांगावें.  
अपार म्हणिजे पारचि नाहीं । अधळ म्हणिजे ढळचि नाहीं ।
अतर्क्ये म्हणिजे तर्कत नाहीं । परब्रह्म तें ॥ २४ ॥
२४) परब्रह्म अमर्याद आहे. त्याचा परतीर गाठंता येत नाही. परब्रह्म आपल्या स्थानापासून कधींच ढळत नाहीं. भ्रष्ट होत नाहीं. बुद्धीला त्याच्या स्वरुपाबद्दल कल्पना करतां येत नाहीं. 
अद्वैत म्हणिजे काये । अदृश्य म्हणिजे काये ।
अच्युत म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ २५ ॥
२५) अद्वैत, अदृश्य, अच्युत म्हणजे काय तें मला सांगावें. 
अद्वैत म्हणिजे द्वैतचि नाहीं । अदृश्य म्हणिजे दृश्यचि नाहीं ।
अच्युत म्हणिजे चेवत नाहीं । परब्रह्म तें ॥ २६ ॥
२६) परब्रह्म अगदी एकच एकआहे. तेथें दुसरें कांहीं नाहीं. परब्रह्म अतिंद्रिय आहे. इंद्रियांना कधीं गोचर होत नाहीं. तसेंच तें स्वस्थानापासून कधींही खाली घसरत नाहीं. 
अछेद म्हणिजे काये । अदाह्य म्हणिजे कये ।
अक्लेद म्हणिजे काये । मज निरोपावें ॥ २७ ॥
२७) अच्छेद, अदाह्य, अक्लेद्य म्हणजे काय तें मला सांगावें.     
अछेद म्हणिजे छेदेना । अदाह्य म्हणिजे जळेना ।
अक्लेद म्हणिजे कालवेना । परब्रह्म तें ॥ २८ ॥
२८) परब्रह्माला तोडता येत नाहीं. तें जळत नाहीं. तें भिजत नाहीं.
परब्रह्म म्हणिजे सकळांपरतें । तपास पाहातां आपणचि तें ।
हें कळें अनुभवमतें । सद्गुरु केलियां ॥ २९ ॥
२९) सांगण्याचें तात्पर्य असें कीं, परब्रह्म सार्‍या दृश्य विश्र्वाच्या पलीकडे आहे. त्याच्यासारखें तेंच आहे. दुसरें काहींहीं त्याच्यासारखें नाही. सद्गुरुची संगत केल्यानें अनुभव येतो. आणि मग परब्रह्माचें स्वरुप समजते.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आशंकानाम समास पहिला ॥
Samas Pahila Aakaksha

समास पहिला आशंकानाम




Custom Search

Thursday, October 26, 2017

Samas Dahava Shoonyatva Nirshan समास दहावा शून्यत्वनिर्शन


Dashak Aathava Samas Dahava Shoonyatva Nirshan 
Samas Dahava Shoonyatva Nirshan, It is in Marathi. There are various opinions about Parmarth in the people due to lack of true knowledge. These different opinions and experiences of people are described by Swami Samarth Ramdas.
समास दहावा शून्यत्वनिर्शन
श्रीराम ॥
जनाचे अनुभव पुसतां । कळहो उठिला अवचिता ।
हा कथाकल्लोळ श्रोतां । कौतुकें ऐकावा ॥ १ ॥
१) सामान्य लोकांची मतें, त्यांचे अनुभव जर बघितले तर ते परस्पर विरुद्ध असतात. कलह उत्पन्न होण्याची वेळ येते. या मतांचा गोंधळ व अनुभवांची आरडाओरड श्रोत्यांनी गमतीनें ऐकावी.  
येक म्हणती हा संसारु । करितां पावे पैलपारु ।
आपला नव्हे कीं जोजारु । जीव देवाचे ॥ २ ॥
२) एक म्हणतो कीं, आपण हा संसार करावा. तो करतां करतां त्यांतून पार पडता येते. जीवांवर देवाचें नियंत्रण असल्यनें हा व्याप आपल्या मालकीचा नव्हे.  
येक म्हणती हें न घडे । लोभ येऊन आंगीं जडे ।
पोटस्तें करणें घडे । सेवा कुटुंबाची ॥ ३ ॥
३) एक म्हणतो कीं, हे करुन चालणार नाहीं. संसार करतांना लोभ अंगी जडतो. मगआपल्या पोटासाठीं अपल्याला कुटुंबाची सेवा करावी लागते.  
येक म्हणती स्वभावें । संसार करावा सुखें नावें ।
कांहीं दान पुण्य करावें । सद्गतीकारणें ॥ ४ ॥
४) एक म्हणतो संसार सहजपणें व सुखानें करावा. पण त्यानें सद्गती मिळणार नाही. म्हणून सद्गतीसाठीं कांहीं दान पुण्य करावें. 
येक म्हणती संसार खोटा । वैराग्यें घ्यावा देशवटा ।
येणें स्वर्गलोकींच्या वाटा । मोकळ्या होती ॥ ५ ॥
५) एक म्हणतो कीं, संसार मुळीं खोटाच आहे. वैराग्य धारण करुन देशांतरास निघून जावें. असें केल्यानें स्वर्ग प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो.  
येक म्हणती कोठें जावे । वेर्थचि कासया हिंडावें ।
आपुले आश्रमी असावें । आश्रमधर्म करुनी ॥ ६ ॥
६) एक म्हणतो कीं, आपलें घर सोडून कोठें जायचे ? उगाच पायपीट करुन कशाला हिंडायचे ? आश्रमधर्म सांभाळून आपल्या घरींच असावें.
येक म्हणती कैंचा धर्म । अवघा होतसे अधर्म ।
ये संसारीं नाना कर्म । करणें लागे ॥ ७ ॥
७) एक म्हणतो कीं, कसला आला आहे धर्म ? जिकडे तिकडे अधर्म बोकाळला आहे. या संसारांत निरनिराळीं कर्मे ( भली बुरी ) करावी लागतात. 
येक म्हणती बहुतांपरी । वासना असावी बरी ।
येणेंचि तरिजे संसारीं । अनायासें ॥ ८ ॥
८) एक म्हणतो कीं, शक्य तितकीं वासना चांगली ठेववी. वासना शुद्ध ठेवल्यास माणूस फार सायास न होता संसार तरुन जातो.  
येक म्हणती कारण भाव । भावेंचि पाविजे देव ।
येर हें अवघेंचि वाव । गथागोवी ॥ ९ ॥
९) एक म्हणतो कीं, निष्ठा हवी तर संसार तरता येतो. निष्थेनेंच भगवंताची प्राप्ती होते. बाकी सर्व गोष्टी वायफळ समजाव्यात. 
येक म्हणती वडिलें जीवीं । अवघीं देवचि मानावीं ।
मायेबापें पूजीत जावीं । येकाभावें ॥ १० ॥
१०) एक म्हणतो कीं, आईबापांना मनापासून देव मानावें व शुद्ध निष्ठा ठेवून त्यांना पूजीत जावें. 
येक म्हणती देवब्राह्मण । त्यांचें करावें पूजन ।
मायेबाप नारायेण । विश्र्वजनाचा ॥ ११ ॥
११) एक म्हणतो कीं, देवाब्राह्मानांचे पूजन करावें. त्यामुळें सर्वांचा मायबाप नारायण प्रसन्न होतो. 
येक म्हणती शास्त्र पाहावें । तेथें निरोपिलें देवें ।
तेणें प्रमाणेंचि जावें । परलोकासी ॥ १२ ॥
१२) एक म्हणतो कीं, शास्त्रामचा अभ्यास करावा. भगवंतानें त्यांत जो उपदेश केला आहे त्याप्रमाणें वागावें. म्हणजे परलोक प्राप्त होतो. 
येक म्हणती अहो जना । शास्त्र पाहातां पुरवेना ।
याकारणें साधुजना । शरण जावें ॥ १३ ॥
१३) एक म्हणतो कीं, अहो, शास्त्रें पुष्कळ आहेत, त्यांचे अध्ययन संपणार नाही. म्हणून साधुला शरण जावें.    
येक म्हणती सांडा गोठी । वायांचि करिता चाउटी ।
सर्वांस कारण पोटीं । भूतदया असावी ॥ १४ ॥
१४) एक म्हणतो कीं, जाऊं द्या या सार्‍या गोष्टी, उगाच वायफळ बडबड नको. भूतदयेनें सर्वांनशीं वागावें.
येक म्हणती येकचि बरवें । आपुल्या आचारें असावें ।
अंतःकाळीं नाम घ्यावें । सर्वोत्तमाचे ॥ १५ ॥
१५) एक म्हणतो कीं, आपण आपल्या आचारधर्माप्रमाणें वागावें. अंतःकाळीं भगवंताचे नांव घ्यावें. 
येक म्हणती पुण्य असेल । तरीच नाम येईल । 
नाहीं तरी भुली पडेल । अंतकाळीं ॥ १६ ॥
१६) एक म्हणतो कीं, पुण्य केलें असेल तरच अंतःकाळीं भगवंताचे नांव तोंडांत येईल. नाहीतर तेव्हांच माणसाला भ्रम होतो. 
येक म्हणती जीत असावें । तंवचि सार्थक करावें ।
येक म्हणती फिरावें । तीर्थाटण ॥ १७ ॥
१७) एक म्हणतो कीं, आपण जिवंत असेंपर्यंत आपलें सार्थक करुन घ्यावें. एक म्हणतो कीं, तीर्थाटन करीत फिरावें.   
येक म्हणती हे अटाटी । पाणीपाषाणाची भेटी ।
चुबकळ्या मारितां हिंपुटी । कासाविस व्हावें ॥ १८ ॥  
१८) एक म्हणतो कीं, तीर्थाटनाची यातायात करण्याची जरुरी नाही. कारण शेवटी पाणी व पाषाण यांचेच दर्शन घ्यावें लागते. व नाकातोंडांत पाणी जाऊन जीव कासावीस होतो.           
येक म्हणती सांडीं वाचाळी । अगाध महिमा भूमंडळीं ।
दर्शनमात्रें होये होळी । माहापातकाची ॥ १९ ॥
१९) एक म्हणतो कीं, हा वाचाळपणा आवरा. तीर्थांचा महिमा थोर व अगाध आहे. नुसत्या दर्शनानें पापांची होळी होते.  
येक म्हणती तीर्थ स्वभावें । कारण मन अवरावें ।
येक म्हणती कीर्तन करावें । सावकास ॥ २० ॥
२०) एक म्हणतो कीं, मन आवरावें. हा सगळ्या साधनांचा हेतु आहे. शेवटीं मनच तीर्थ बनते. एक म्हणतो कीं, नेहमी सावकाश किर्तन करीत असावें. 
येक म्हणती योग बरवा । मुख्य तोचि आधीं साधावा ।
देहो अमरचि करावा । अकस्मात ॥ २१ ॥
२१) एक म्हणतो कीं, योगसाधन सर्वांत उत्तम आहे. म्हणून सर्व बाजुला ठेवून आधीं योगसाधना करावी. त्यानें देह अमर करुन टाकावा.  
येक म्हणती ऐसें काये । काळवंचना करुं नये ।
येक म्हणती धरावी सोये । भक्तिमार्गाची ॥ २२ ॥
२२) एक म्हणतो कीं, हें भलतेंच काय ? असें करुन काळाला फसवूं नये. एक म्हणतो कीं, भक्ती मार्गाचा अवलंब करावा.   
येक म्हणती ज्ञान बरवें । येक म्हणती साधन करावें ।
येक म्हणती मुक्त असावें । निरंतर ॥ २३ ॥
२३) एक म्हणतो कीं, ज्ञानमार्ग चांगला. एक म्हणतो कीं, साधना करावी. तर एक म्हणतो कीं, नेहमी मुक्तपनें वागावें.  
येक म्हणती अनर्गळा । धरीं पापाचा कंटाळा ।
येक म्हणती रे मोकळा । मार्ग आमुचा ॥ २४ ॥
२४) एक म्हणतो कीं, मुक्तपणें म्हणजे स्वैर वागणार्‍या माणसा पापाचा थोडासा तरी कंटाळा करावा. एक म्हणतो कीं, आमचा हा मार्ग बंधनरहित आहे. 
येक म्हणती हे विशेष । करुं नये निंदा द्वेष ।
येक म्हणती सावकास । दुष्टसंग त्यागावा ॥ २५ ॥
२५) एक म्हणतो कीं, परमार्थांत विशेष कांहीं म्हणजे कोणाची निंदा, द्वेष करुं नये. एक म्हणतो कीं, दुष्टांची संगत हळूहळू सोडून द्यावी.  
येक म्हणती ज्याचें खावें । त्या सन्मुखांचे मरावें ।
तेणें तत्काळचि पावावें । मोक्षपद ॥ २६ ॥
२६) एक म्हणतो कीं, आपण ज्याचे अन्न खातो. त्याच्याच चाकरींत त्याच्या समोर देह ठेवावा. असें करुन ताबडतोप मोक्षपद मिळवावें.   
येक म्हणती सांडा गोठी । आधीं पाहिजे ते रोटी ।
मग करावी चाउटी । सावकास ॥ २७ ॥
२७) एक म्हणतो कीं, या गोष्टीं राहूं द्या. आधीं खायला पोटभर अन्न हवें. तें मिळाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी सावकाश बोलाव्या.  
येक म्हणती पाउस असावा । मग सकळ योग बरवा ।
कारण दुष्काळ न पडावा । म्हणिजे बरें ॥ २८ ॥
२८) एक म्हणतो कीं, आधीं पाऊस चांगला झाला पाहिजे. मग सगळ्या गोष्टी छान चालतात. कारण दुष्काळ पडूं नये म्हणजे मग सगळें ठिक चालते.  
येक म्हणती तपोनिधी । होतां वोळती सकळ सिद्धी ।
येक म्हणती रे आधीं । इंद्रपद साधावें ॥ २९ ॥
२९) एक म्हणतो कीं, पुष्कळ तपश्चर्या करुन तप सांथवावें. त्यानें सर्व सिद्धी वश होतात. एक म्हणतो कीं, आधीं इंद्रपद साधून घ्यावें. 
येक म्हणती आगम पाहावा । वेताळ प्रसन्न करुन घ्यावा ।
तेणें पाविजे देवा । स्वर्गलोकीं ॥ ३० ॥
३०) एक म्हणतो कीं, तंत्रशास्त्राचा अभ्यास करुन वेताळ प्रसन्न करुन घ्यावा. त्याच्या सहाय्यानें स्वर्ग मिळवून देव बनून रहावें.
येक म्हणती म्हणती अघोरमंत्र । तेणें होईजे स्वतंत्र ।
श्रीहरी जयेचा कळत्र । तेचि वोळे ॥ ३१ ॥
३१) एक म्हणतो कीं, अघोरमंत्र साध्य करुन घ्यावा. म्हनजे त्यानें स्वतंत्र होता येईल. श्रीहरि जिचा आश्रय आहे ती लक्ष्मी मग प्रसन्न होईल. 
ती लागले सर्व धर्म । तेथें कैंचे क्रियाकर्म ।
येक म्हणती कुकर्म । तिच्या मदे ॥ ३२ ॥
३२)  लक्ष्मीच्या भोवतीं सर्व धर्म गोळा झालेले असतात. मग इतर क्रियाकर्मांची आवश्यकता राहात नाही. एक म्हणतो कीं, लक्ष्मीच्या मदानें सर्व वाईट कर्में घडतात. 
येक म्हणती येक साक्षप । करावा मृत्युंजयाचा जप ।
तेणें गुणें सर्व संकल्प । सिद्धीतें पावती ॥ ३३ ॥
३३) एक म्हणतो कीं, एकच करा ते म्हनजे मृत्युंजयाचा जप करा. त्याच्या सामर्थ्यानें सर्व संकल्प सिद्धीला जातात.  
येक म्हणती बटु भैरव । तेणें पाविजे वैभव ।
येक म्हणती झोटिंग सर्व । पुर्वितसे ॥ ३४ ॥
३४) एक म्हणतो कीं, बटुभैरवाच्या कृपेनें वैभव प्राप्त होते. एक म्हणतो कीं, झोटींग सर्व कांहीं पुरवितो. 
येक म्हणती काळी कंकाळी । येक म्हणती भद्रकाळी ।
येक म्हणती उचिष्ट चांडाळी । साहें करावी ॥ ३५ ॥
३५) एक म्हणतो कीं, काळी कंकाळी, एक म्हणतो कीं, भद्रकाळी, एक म्हणतो कीं, उचिष्ट चांडाळी प्रसन्न करुन घ्यावी. 
येक म्हणती विघ्नहर । येक म्हणती भोळा शंकर ।
येक म्हणती सत्वर । पावे भगवती ॥ ३६ ॥
३६) एक म्हणतो कीं, विघ्नहर गणपति, एक म्हणतो कीं, भोळा शंकर, एक म्हणतो कीं, भगवती या देवता  लवकर प्रसन्न होतात.  
येक म्हणती मल्लारी । सत्वरचि सभाग्य करी ।
येक म्हणती माहा बरी । भक्ति वेंकटेशाची ॥ ३७ ॥
३७) एक म्हणतो कीं, मल्हारी ताबडतोप भाग्यवान करतो. एक म्हणतो कीं, व्यंकटेशाची भक्ती सर्वांत उत्तम भक्ती आहे. 
येक म्हणती पूर्व ठेवा । येक म्हणती प्रेत्न करावा ।
येक म्हणती भार घालावा । देवाच वरी ॥ ३८ ॥
३८) एक म्हणतो कीं, पूर्वपुण्याईवर सर्व अवलंबून असते. एक म्हणतो कीं, पुष्कळ प्रयत्न करावा. एक म्हणतो कीं, देवावर भार घालून आपण स्वस्थ बसावें.   
येक म्हणती देव कैंचा । अंतचि पाहातो भल्यांचा ।
येक म्हणती हा युगात्मा । युगधर्म  ॥ ३९ ॥
३९) एक म्हणतो कीं, एक म्हणतो कीं, हा कसला सज्जनांचाअंत पाहणारा देव ? एक म्हणतो कीं,  हा देवाचा दोष नाही. हा तर युगाचा युगधर्मच आहे.  
येक म्हणती आश्र्चीर्य मानिती । येक विस्मयो करिती ।
येक कंटाळोन म्हणती । काये होईल तें पाहावें ॥ ४० ॥
४०) एक म्हणतो कीं, आश्र्चर्य आहे. तर दुसरे परिस्थिती पाहून थक्क होतात. कांहीं लोक कंटाळून जें काय होईल तें पहावें असें म्हणतात.
ऐसें प्रपंचिक जन । लक्षणें सांगतां गहन ।
परंतु कांहीं येक चिन्ह । अल्पमात्र बोलिलों ॥ ४१ ॥
४१) संसारिक माणसें अशा रीतीनें आपापली मतें सांगतात. ती सगळीं सांगता येणें शक्य नाही. त्यांची तर्‍हा ध्यानांत यावी म्हणून थोडे प्रकार वर्णान केले आहेत. 
आतां असो हा स्वभाव । ज्ञात्यांचा कैसा अनुभव ।
तोहि सांगिजेल सर्व । सावध ऐका ॥ ४२ ॥
४२) प्रापंचिक लोकांचा स्वभाव वर्णन आतां पुरें. ज्ञानी लोकांचे अनुभव किती प्रकारचे असतात. तें आतां सांगतो. तें लक्ष देऊन ऐका.     
येक म्हणती करावी भक्ती । श्रीहरी देईल सद्गती ।
येक म्हणती ब्रह्मप्राप्ती । कर्मेचि होये ॥ ४३ ॥
४३) एक म्हणतो कीं, भक्ति करावी म्हणजे भगवंत चांगली गति देतो. एक म्हणतो कीं, कर्म करण्यानेंच ब्रह्मप्राप्ती होते. 
येक म्हणती भोग सुटेना । जन्म मरण हें तुटेना ।
येक म्हणती उर्मी नाना । अज्ञानाच्या ॥ ४४ ॥
४४) एक म्हणतो कीं, भोग भोगल्यावाचून कांहीं सुटत नाही. एक म्हणतो कीं, अज्ञानांतून सर्व उर्मि येतात. अज्ञान आहे तोपर्यंत त्या येत राहणार. 
येक म्हणती सर्व ब्रह्म । तेथें कैंचें क्रियाकर्म ।
येक म्हणती हा अधर्म । बोलोंचि नये ॥ ४५ ॥ 
४५) एक म्हणतो कीं, एका ब्रह्मा.खेरीज जर दुसरें कांहीं नाहीं तर मग क्रियाकर्माची जरुरच काय ? एक म्हणतो कीं, क्रियाकर्माच्या बाबतींत अशी भाषा वापरणें हा अधर्म आहे. असे बोलू नये. 
येक म्हणती सर्व नासें । उरलें तेंचि ब्रह्म असे ।
येक म्हणती ऐसें नसे । समाधान ॥ ४६ ॥
४६) एक म्हणतो कीं, दृश्य सारें नाशवंत आहे. नंतर जें उरतें तेच ब्रह्म आहे. एक म्हणतो कीं, समाधानाचें स्वरुप असें नाही. 
सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म । दोनी पूर्वपक्षाचे भ्रम ।
अनुभवाचें वेगळें वर्म । म्हणती येक ॥ ४७ ॥
४७) सर्व ब्रह्म आहे असे म्हणणें व दृश्य नष्ट झाल्यावर उरणारे तें ब्रह्म आहे असें म्हणणें हे दोन्ही सिद्धान्त पूर्वपक्षाचे भ्रम आहेत. ब्रह्माच्या अनुभवाचे वर्म कांहीं वेगळेंच आहे.  
येक म्हणती हें न घडे । अनुर्वाच्य वस्तु घडे ।
जें बोलतां मोन्य पडे । वेदशास्त्रांसी ॥ ४८ ॥
४८) एक म्हणतो कीं, ब्रह्माचे वर्णन करुं जातां वेदशास्त्रे मौन होतात. बोलणें थांबवावें लागते. ब्रह्म मन आणी वाणी यांच्या कक्षेंमध्यें येत नाही. तें मनाच्या म्हणजे अनुभवाच्या आवाक्यामध्यें येणें शक्य नाही.  
तव श्रोता अनुवादला । म्हणे निश्र्चये कोण केला ।
सिद्धांतमतें अनुभवाला । उरी कैंची ॥ ४९ ॥   
४९) हें ऐकून श्रोत्यानें असेम विचारलें कीं, ब्रह्म असें आहें किंवा तसेआहे हा निश्र्चय कोणी केला ? कारण सिद्धान्तपक्षाप्रमाणें मी अनुभव घेतो असें द्वैत नसतें. तेथें अनुभव निर्माण होऊंच शकत नाही.  
अनुभव देहीं वेगळाले । हें पूर्वींच बोलिलें ।
आतां कांहीं येक केलें । नवचे कीं ॥ ५० ॥
५०) यावर वक्ता म्हणतो कीं, प्रत्येक माणसाचे अनुभव वेगळे निरनराळे असतात. हें पूर्वींच सांगितलें आहे. ते सगळे आतां एक करता येणार नाहींत.   
येक साक्षत्वें वर्तती । साक्षी वेगळाचि म्हणती ।
आपण द्रष्टा ऐसी स्थिती । स्वानुभवाची ॥ ५१ ॥
५१) एक साक्षित्वानें वागतो. साक्षी वेगळा आहे असें तो म्हणतो. आपण द्रष्टा आहोत. केवळ पाहणारे साक्षी आहोत. ही खरी स्वानुभवाची अवस्था आहे.  
दृश्यापासून द्रष्टा वेगळा । ऐसी अलिप्तपणाची कळा ।
आपण साक्षत्वें निराळा । स्वानुभवें ॥ ५२ ॥
५२) दृश्याहून द्रष्टा वेगळा आहे असा अनुभव स्थिर झाला. म्हणजे दृश्यांत स्थिर राहून त्यापासून अलिप्त राहण्याची कला साधते. साक्षीरुपानें आपण निराळें आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो. 
सकळ पदार्थ जाणतां । तो पदार्थाहून पर्ता ।
देहीं असोनी अलिप्तता । सहजचि आली ॥ ५३ ॥  
५३) सर्व पदार्थांना जो जाणतो तो त्या पदार्थांच्या पलिकडे असतो. त्यांच्याहून निराळा असतो. असा अनुभव आल्यावर देहांत असून देखील अगदीं सहज अलिप्तता साधते.  
येक ऐसें स्वानुभवें । म्हणती साक्षत्वें वर्तावें ।
दृश्य असोनि वेगळें व्हावें । द्रष्टेपणें ॥ ५४ ॥
५४) ज्याला हा अनुभव येतो, तो म्हणतो कीं, आपण साक्षीपणें वागावें. दृश्य बाजूला असले तरी द्रष्टेपणानें त्यापासून वेगळें होऊन राहावें. मी केवळ पाहणारा आहे या भूमिकेनें दृश्यांत वावरावें. 
येक म्हणती नाहीं भेद । वस्तु ठाईंच अभेद ।
तेथें कैंचा मतिमंद । द्रष्टा आणिला ॥ ५५ ॥
५५) यावर एक म्हणतो कीं, ब्रह्मवस्तूमध्यें मुळांत कसला भेद नाहीं. ती पूर्ण अभेद आहे. त्या अभेदरुप वस्तूमध्यें हा वेडा द्रष्टा कसा आणतां येईल? 
अवघी साकरचि स्वभावें । तेथें कडु काय निवडावें ।
द्रष्टा कैंचा स्वानुभवें । अवघेंचि ब्रह्म ॥ ५६ ॥
५६) समजा, एके ठिकाणी सगळीकडे साखरच भरली आहे. तिच्यामधून कडूपणा निवडून बाजूला काढता कसा येईल? त्याचप्रमाणें सगळीकडे घनदाट परब्रह्म भरलेलें असतां तेथें स्वानुभवानें द्रष्टा वेगळेपणानें बाजूला काढता येणार नाहीं. 
प्रपंच परब्रह्म अभेद । भेदवादी मानिती भेद ।
परी हा आत्मा स्वानंद । आकारला ॥ ५७ ॥
५७) प्रपंच व परब्रह्म, दृश्य, विश्र्व आणि परमात्मवस्तु यामध्यें यत्किंचितही भेद नाही. तसे मानणारे उगीच भेद मानतात. एकच एक स्वानंदघन आत्मा विश्वरुपानें आकारास आला आहे. 
विघुरलें तुप थिजलें । तैसें निर्गुणचि गुणा आलें ।
तेथें काय वेगळें केलें । द्रष्टेपणें ॥ ५८ ॥
५८) गरम तूप पातळ असतें. तें थंड झालें कीं थिजते. तुपांत कांहीं फरक पडत नाही. त्याचप्रमाणें मूळ निर्गुण परमात्मवस्तु सगुण होऊन आकारास आली. तिच्यांत फरक नाही. तेथें द्रष्टेपणानें वेगळे काय करतां येणार? कांहींच नाही.  
म्हणौनि द्रष्टा आणी दृश्य । अवघा येकचि जगदीश ।
द्रष्टेपणाचे सायास । कासयासी ॥ ५९ ॥
५९) म्हणून द्रष्टा व दृश्य दोन्ही मिळून एक परमेश्र्वर आहे. मग दृष्टेपणाची खटपट कशाला हवी?  
ब्रह्मचि आकारलें सर्व । ऐसा येकांचा अनुभव ।
ऐसे हे दोनी स्वभाव । निरोपिले ॥ ६० ॥
६०) थोडक्यांत हें दृश्यविश्र्व म्हणजे आकारास आलेले परब्रह्म होय. असा कामहीं लोकांचा अनुभव असतो. अशा प्रकारचे हे दोन अनुभव सांगितलें. एकअनुभव असा कीं, द्रष्टा दृश्याहून वेगळा आहे. तो साक्षीत्वानें दृश्य पाहातो. दुसरा अनुभव असा कीं, द्रष्टा वेगळेंपणानें नाहीच. द्रष्टा व दृश्य दोन्ही एकच परमात्मवस्तु आहेत.  
अवघा आत्मा आकारला । आपण भिन्न कैंचा उरला ।
दुसरा अनुभव बोलिला । ऐसियापरी ॥ ६१ ॥
६१) एकच एकआत्मस्वरुप जर विश्र्वरुपानें साकार झालेलें आहे तर द्रष्टेपणानें आपण वेगळें उरत नाहीं. हा दुसरा अनुभव प्रकार सांगितला.
ऐक तिसरा अनुभव । प्रपंच सारुनियां सर्व ।
कांहीं नाहीं तोचि देव । ऐसें म्हणती ॥ ६२ ॥
६२) अनुभवाचा तिसरा प्रकार सांगतो. तो ऐकावा. सर्व दृश्य प्रपंच अथवा दृश्य विश्र्व बाजुस सारावें. तें बाजुस सारल्यावर जें कांहीं शिल्लकउरलें नाही असे वाटते तोच देव समजावा. असें कांहीं लोक म्हणतात.   
दृश्य अवघें वेगळें केलें । केवळ अदृश्यचि उरलें ।
तेंचि ब्रह्म अनुभविलें । म्हणती येक ॥ ६३ ॥
६३) जेवढें दृश्य म्हणून आहे तें सगळें बाजुस सारल्यावर केवळ अदृश्य शिल्लक उरतें. त्याचा अनुभव हाच ब्रह्मस्वरुपाचा अनुभव होय असें कांहीं लोक म्हणतात.    
परी तें ब्रह्म म्हणो नये । उपायासारिखा अपाये ।
सुन्यत्वास ब्रह्म काये । म्हणों येईल ॥ ६४ ॥ 
६४) सगळें दृश्य बाजुस सारलें कीं शून्य उरतें. त्या शून्याला ब्रह्म म्हणतां येणार नाही. शून्याला ब्रह्म म्हटलें तर अपाय उपाय झाल्यासारखें होईल. ब्रह्मासारखें खरें अस्तित्व दुसरें नाहीं. तें ब्रह्म शून्य आहे म्हणजे ब्रह्माच्या अस्तित्वाला नाहींसे करण्यासारखेंच आहे. म्हणून ब्रह्म अनुभवण्यास जो उपाय केला तो अखेर अपाय ठरतो.  
दृश्य अवघें वोलांडिले । अदृश्य सुन्यत्वीं पडिलें ।
ब्रह्म म्हणौनि मुरडलें । तेथुनिच मागे ॥ ६५ ॥ 
६५) दृश्य सगळें ओलांडलें म्हणजे अदृश्य शिल्लक उरते. तें शून्यरुप आहे., तेच शून्यच ब्रह्म आहे असें समजून साधक मागें फिरतो.  
इकडे दृश्य तिकडे देव । मध्यें सुन्यत्वाचा ठाव ।
तयास मंदबुद्धिस्तव । प्राणी ब्रह्म म्हणे ॥ ६६ ॥
६६) वास्तविक या कडेला दृश्य विश्र्व आहे, त्या कडेला परब्रह्म आहे. या दोन्हीच्या मध्यें शून्याचें स्थान आहे. वेडा साधक या शून्यालाच ब्रह्म समजतो.  
रायास नाहीं वोळखिलें । सेवकास रावसें कल्पिलें ।
परी तें अवघें वेर्थ गेलें । राजा देखतां ॥ ६७ ॥
६७) एकजण राजाला भेटला गेला. त्याला राजाचा नोकर भेटला. त्या नोकराला तो राजा समजला. नंतर खरा राजा भेटला तेव्हां त्या माणसाची पहिली समजूत अगदी चुकीची होती हे समजले.   
तैसें सुन्यत्व कल्पिलें ब्रह्म । पुढें देखतां परब्रह्म ।
सुन्यत्वाचा अवघा भ्रम । तुटोन गेला ॥ ६८ ॥
६८) त्याचप्रमाणें दृश्य ओलांडल्यावर आढळलें शून्य ब्रह्म मानलें खरें. पण नंतर खरें परब्रह्मदर्शन झालें. तेव्हां शून्यपणाचा सर्व भ्रम नाहींसा झाला. 
परी हा सूक्ष्म आडताळा । वारी विवेकें वेगळा ।
जैसें दुग्ध घेऊन जळा । राजहंस सांडी ॥ ६९ ॥
६९) शून्याचा प्रांत हा सूक्ष्मांत येतो. परब्रह्म दर्शनांत येणारा हा अडथळा सूक्ष्म असतो. तो सूक्ष्म विवेकानें बाजुस सारावा लागतो. दूध व पाणी वेगळें करुन फक्त दूध ग्रहण करणार्‍या राजहंसाप्रमाणें विवेकानें शून्य बाजूस सारुन विवकी साधक ब्रह्मस्वरुप ग्रहण करतो.   
आधीं दृश्य सोडिलें । मग सुन्यत्व वोलांडिलें ।
मूळमायेपरतें देखिलें । परब्रह्म ॥ ७०  ॥
७०) आधीं सर्व दृश्य बाजूस सारायचें. मग अदृश्य शून्य ओलांडून जायचें. त्यानंतर मूळमायेच्या पलीकडे असणार्‍या परब्रह्माचें दर्शन घडतें.  
वेगळेपणें पाहाणें घडे । तेणे वृत्ती सुन्यत्वीं पडे ।
पोटीं संदेह पवाडे । सुन्यत्वाचा ॥ ७१ ॥
७१) आपण वेगळेंपणानें जोंपर्यंत पाहतों तों पर्यंत आपली वृत्ती शून्यपणापर्यंत जाऊन तेथें थांबते. त्यामुळें मनांत शून्यपणाची कल्पना वाढते.  
भिन्नपणें अनुभविलें । तयास सुन्य ऐसें बोलिलें ।
वस्तु लक्षितां अभिन्न जालें । पाहिजे आधीं ॥ ७२ ॥
७२) जें अदृश्य सूक्ष्म वेगळेंपणानें अनुभवतां येते त्यांस शून्य असें म्हणतात. पण परमात्मवस्तु अनुभवायची असेल तर प्रथम तिच्याशी तदाकार व्हावें लागते. तिच्याशीं अभिन्न होऊनच ती पाहतां येते.   
वस्तु आपणचि होणें । ऐसें वस्तूचें पाहाणें ।
निश्र्चयेंसीं भिन्नपणें । सुन्यत्व लाभे ॥ ७३ ॥
७३) आपण वस्तुरुप होऊन जाणें ही परमात्मवस्तु पाहण्याची रीत आहे. वेगळेपणानें पाहूं गेल्यास खात्रीनें शून्यदर्शनच घडते.   
याकारणें सुन्य कांहीं । परब्रह्म होणार नाहीं ।
वस्तुरुप होऊन पाहीं । स्वानुभवें ॥ ७४ ॥
७४) या सर्व विवेचनावरुन हें स्पष्टपणें ध्यानांत येईल कीं, कांहीं केल्या शून्य परब्रह्म होऊं शकणार नाही. परब्रह्माचे दर्शन हवें असल्यास ब्रह्माशी तदाकार होऊनच तें घ्यावें लागते. ब्रह्मरुप होऊनच ब्रह्माचा अनुभव येतो. 
आपण वस्तु सिद्धचि आहे । मन मी ऐसें कल्पूं नये ।
साधु सांगती उपाये । तूंचि आत्मा ॥ ७५ ॥   
७५) आपला खरा मी ब्रह्मस्वरुप आहे. मी आणि परब्रह्म यांचे ऐक्य स्वतःसिद्ध आहे. म्हणून मन मी आहे अशी कल्पना करुं नये. मी स्वतःसिद्ध आत्माच आहे अशी भावना करावी. हा उपाय सत्पुरुष सांगतात.   
मन मी ऐसें नाथिलें । संतीं नाहीं निरोपिलें ।
मानावें कोणाच्या बोलें । मन मी ऐसें ॥ ७६ ॥
७६) मुळांत मी मनरुप नाहींच. शिवाय संतांनी तसें कधींही सांगितलेंच नाही. मग उगाच कोणाच्यातरी सांगण्यावरुन किंवा बोलण्यावर विश्र्वास ठेवून मी मनरुप आहे असें मानूं नये.   
संतवचनीं ठेवितां भाव । तोचि शुद्ध स्वानुभव ।
मनाचा तैसाच स्वभाव । आपण वस्तु ॥ ७७ ॥
७७) संतवचनावर एकनिष्ठेनें श्रद्धा ठेवणें हाच शुद्ध स्वरुपानुभव येण्याचा मार्ग होय. मन पण मग ब्रह्मस्वरुप होऊंन जाते. 
जयाचा घ्यावा अनुभव । तोचि आपण निरावेव ।
आपुला घेती अनुभव । विश्र्वजन ॥ ७८ ॥
७८) ज्या स्वरुपाचा अनुभव घ्यायचा ते निरावेव. विश्र्वजन मग आपला अनुभव घेतात.  
लोभी धन साधूं गेले । तंव ते लोभी धनचि जाले ।
मग तें भाग्यपुरुषीं भोगिलें । सावकास ॥ ७९ ॥
७९) एखादा लोभी धन मिळविण्याच्या मागें लागतो इतका कीं तो धन मिळविण्याचा हेतुच विसरुन जातो. धनाचा उपभोग न घेता नुसतेच सांठवून ठेवतो. नंतर कोणी भाग्यवान त्या धनाचा यथेच्छ उपभोग घेतो.   
तैसें देहबुद्धी सोडितां । साधकास जालें तत्वता । 
अनुभवाची मुख्य वार्ता । ते हे ऐसी ॥ ८० ॥
८०) साधकाच्या बाबतींत असेंच घडतें. स्वानंदासाठीं साधक आधी परब्रह्माच्या नादीं लागतो. पुढें त्याची देहबुद्धि कमी होत जाते. स्वानंद भोगण्याचा त्याचा हेतु नाहींसा होतो. त्याची वृत्ती ब्रह्ममय होते. अर्थातच स्वानंद भोगायला मीपणाने तो उरतच नाही. मग त्याच्या ब्राह्मी स्थितीचा किंवा आध्यात्मिक श्रीमंतीचा फायदा इतर लोकांनाच मिळतो.  
आपण वस्तु मुळीं येक । ऐसा ज्ञानाचा विवेक ।
येथून हा ज्ञानदशक । संपूर्ण जाला ॥ ८१ ॥
८१) आपला खरा मी आणि परब्रह्म मुळांत एकरुपच आहेत. असा ज्ञानाचा स्वच्छ निर्णय आहे. या ठिकाणीं ज्ञानदशक संपूर्ण झाला. 
आत्मज्ञान निरोपिलें । येथामतीनें बोलिलें ।
न्यूनपर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ८२ ॥
८२) माझ्या बुद्धीप्रमाणें मी आत्मज्ञानाचें विवेचन केलें त्यामध्यें जें कमीजास्त असेल त्याबद्दल श्रोत्यांनी मला क्षमा करावी. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सुन्यत्वनिर्शननाम समास दहावा ॥
Samas Dahava Shoonyatva Nirshan 
समास दहावा शून्यत्वनिर्शन


Custom Search