Showing posts with label Dashak Navava. Show all posts
Showing posts with label Dashak Navava. Show all posts

Thursday, November 16, 2017

Samas Dahava Sthiti Nirupan समास दहावा स्थितिनिरुपण


Dashak Navava Samas Dahava Sthiti Nirupan 
Samas Dahava Sthiti Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Sthiti. Janiva and Neniva are two sthitis of the people. Janiva means means a person who has become Dyani. Neniva means person who has no knowledge.
समास दहावा स्थितिनिरुपण
श्रीराम ॥
देउळामधें जगन्नाथयेक । आणी देउलावरी बैसला काक ।
परी तो देवाहून अधिक । म्हणों नये कीं  ॥ १ ॥
१) एखाद्या देवळांत गाभार्‍यांत देव व देवळाच्या शिखरावर कावळा बसला तर तो कावळा देवापेक्षां श्रेष्ठ असें कोणी म्हणत नाहीं.
सभा बैसली राजद्वारीं । आणी मर्कट गेलें स्तंभावरी ।
परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरीं । कैसें मानावें ॥ २ ॥
२) राजवाड्यांत राजसभा भरली आहे. अशावेळी सभामंडपाच्या खांबावर माकड चढून बसले तर सभासद खाली बसलेले असून माकड त्यांच्यापेक्षां उंच जागी बसले म्हणून माकडाला सभासदांहून मोठा मानीत नाहीत. 
ब्राह्मण स्नान करुन गेले । आणी बक तैसेंचि बैसले ।
परी ते ब्राह्माणास भले । कैसे मानावे ॥ ३ ॥
३) कांहीं ब्राह्मण तळ्यावर स्नान करुन व ध्यान करुन गेले. तेथेंच बगळेसुद्धा डोळें बंद करुन बसून राहीले. तर त्यांना ब्राह्मणांहून श्रेष्ठ मानता येत नाहीत.  
ब्राह्मणामधें कोणी नेमस्त । कोणी जाले अव्यावेस्त ।
आणी स्वान सदा ध्यानस्त । परी तें उत्तम नव्हे ॥ ४ ॥
४) ब्राह्मणांमधें कांहींजण नियम पाळणारे तर कांहीं न पाळणारे अव्यवस्थित आहेत. कुत्रा तर सदा ध्यानस्त बसलेला. तरी तो कांहीं ब्राह्मणांहून श्रेष्ठ मानता येत नाही. 
ब्राह्मण लक्षमुद्रा नेणें । मार्जर लक्षविषईं शाहाणें ।
परी ब्राह्मणापरीस विशेष कोणें । म्हणावें तयासी ॥ ५ ॥
५) एखाद्या वस्तूकडे एकाग्र होऊन बघण्याची संवय कित्येक ब्राह्मणांपाशी नसते. पण मांजर एखाद्या वस्तुकडे एकाग्र होऊन बघूं शकते म्हणून तें कांहीं ब्राह्मणांपेक्षां श्रेष्ठ मानता येत नाही. 
ब्राह्मण पाहे भेदाभेद । मक्षिका सर्वांस अभेद । 
परी तीस जाला ज्ञानबोध । हें तो न घडे कीं ॥ ६ ॥
६) ब्राह्मण भेदाभेद पाहून वागतो. पण माशी कोणताही भेद पाळत नाहीं. तिला उकिरडा व उत्तम अन्न दोन्ही सारखेंच असतात. असें असलें तरी माशीला आत्मज्ञान झालें असें कधी होत नाही. 
उंच वस्त्रें नीच ल्याला । आणि समर्थ उघडाच बैसला ।
परी तो आहे परीक्षिला । परीक्षवंतीं ॥ ७ ॥
७) समजा, एखाद्या कनिष्ठ प्रतीच्या माणसानें भारी कपडे घातले आहेत व एखादा थोर पुरुष उघडाच बसला आहे. तर खरी परीक्षा करणारे जाणते लोक श्रेष्ठ कोण व कनिष्ठ कोण हें बरोबर ओळखतात.  
बाह्याकार केला अधीक । परी तो अवघा लोकिक ।
येथें पाहिजे मुख्य येक । अंतरनिष्ठा ॥ ८ ॥
८) बाहेरुन पुष्कळ देखावा केला तर तो व्यवहारांत चालतो. पण परमार्थांत मुख्य अंतर्निष्ठा लागते. ती नसेल तर परमार्थ लटका पडतो. अंतर्निष्ठा म्हणजे आत्मनिष्ठा होय.  
लोकिक बरा संपादिला । परी अंतरीं सावध नाहीं जाला ।
मुख्य देवास चुकला । तो आत्मघातकी ॥ ९ ॥
९) एखाद्यानें व्यवहारांमध्यें उत्तम लौकिक मिळवला. पण अंतर्यामींच्या स्वरुपाकडे लक्ष दिलें नाहीं, तर मुख्य देव त्यास प्राप्त होत नाहीं. असा मनुष्य आत्मघातकी होय. तो स्वतःच स्वतःचा घात करुन घेतो. 
देवास भजतां देवलोक । पित्रांस भजतां पित्रलोक ।
भूतांस भजतां भूतलोक । पाविजेतो ॥ १० ॥
१०) देवतांची उपासना केली तर देवलोक मिळतो. पितरांची उपासना केली तर पितृलोक मिळतो. भूतांची उपासना केली तर भूतलोक मिळतो.
जेणें जयास भजावें । तेणें त्या लोकासी जावें ।
निर्गुणीं भजतां व्हावें । निर्गुणचि स्वयें ॥ ११ ॥
११) जो ज्याची उपासना करतो त्यास तो लोक मिळतो. निर्गुणाची उपासाना केल्यास माणूस स्वतः निर्गुणी बनतो. 
निर्गुणाचें कैसें भजन । निर्गुणीं असावें अनन्य ।
अनन्य होतां होईजे धन्य । निश्र्चयेंसीं ॥ १२ ॥
१२) श्रोत्यांनी विचारलें निर्गुणाची उपासना कशी करावी ? वक्त्यानें सांगितलें कीं, आपण निर्गुणाशी अनन्य व्हावें, मीपणा बाजूस सारुन त्यांत मिसळून जावें. अशा रीतीनें निर्गुणाशी समरस होणारा निश्र्चितपणें धन्य होऊन जातो.   
सकळ केलियाचें सार्थक । देव वोळखावा येक ।
आपण कोण हा विवेक । पाहिला पाहिजे ॥ १३ ॥
१३) एक देव ओळखण्यामध्यें जीवनांतील सगळ्या खटपटीचें सार्थक आहे.  मी कोण आहे ? यावर सूक्ष्म विचार करावा.  
देव पाहातां निराकार । आपला तों माईक विचार ।
सोहं आत्मा हा निर्धार । बाणोन गेला ॥ १४ ॥   
१४) देव पाहावा तर तो निर्गुण व निराकार आहे. मीपणाचा विचार केला तर तो खरा नाहीं. अशा रीतीनें खोल विचार केला तर  " मी तोच आहे. मी आत्माच आहे. असा निःसंशय निर्धार अंगीं बाणतो.      
आतां अनुमान तो काई । वस्तु आहे वस्तुचा ठाईं ।
देहभाव कांहींच नाहीं । धांडोळितां ॥ १५ ॥
१५) मग कल्पना करण्याची गरज नसते. ब्रह्म जसें आहे. तसेंच स्वस्थानीं निःश्चल असतें. त्याच्यावर आरोपलेल्या देहबुद्धीचा शोध केला कीं, ती खरी नाहीं. असा अनुभव येतो.  
सिद्धास आणी साधन । हा तों अवघाच अनुमान ।
मुक्तास आणी बंधन । आडळेना ॥ १६ ॥
१६) " मी आत्माच आहे " असा साक्षात्कार होऊन जो सिद्ध बनला त्यास साधन चिकटवणें म्हणजे केवळ कल्पना होय. जो खरोखर मुक्त झाला त्याला साधनाचें बंधन असणें शक्य नाहीं.   
साधनें जें कांहीं साधावें । तें तों आपणचि स्वभावें ।
आतां साधकाच्या नावें । सुन्याकार ॥ १७ ॥
१७) साधन करुन जें कांहीं साधायचें तें आत्मस्वरुप स्वतःच बनल्यावर साधन संपतें. तेथें साधकावस्था संपते.
कुल्लाळ पावला राजपदवी । आतां रासभें कासया राखावीं ।
कुल्लाळपणाची उठाठेवी । कासया पाहिजे ॥ १८ ॥
१८) समजा एका कुंभाराला राज्यपद मिळालें तर तो गाढवें सांभळण्याचें काम करत नाहीं. कुंभाराच्या व्यवसायाची उठाठेव तो करत नाहीं. 
तैसा अवघा वृत्तीभाव । नाना साधनांचा उपाव ।
साध्य जालियां कैंचा ठाव । साधनांसी ॥ १९ ॥
१९) त्याचप्रमाणें कोनतेही साधन करायचें म्हणजे त्याचा वृत्तीशी अती निकट संबंध असतो. आणि आत्मस्वरुप बनण्यासाठीं वृत्तीरहित व्हावें लागतें. यामुळें आत्मज्ञान साध्य झाल्यावर वृत्ति निर्माण होत नाहीं म्हणून साधन होऊं शकत नाहीं.  
साधनें काये साधावें । नेमें काये फळ घ्यावें ।
आपण वस्तु भरंगळावें । कासयासी ॥ २० ॥
२०) साधनानें आपल्याला काय साधावयाचें आहे. आणि नियमानें वागून आपल्याला कोणते फळ मिळवायचे आहे. याबद्दल आपला समज अगदी स्वच्छ व योग्य असावा. आपण आत्मस्वरुप असल्यानें उगीच भलत्या कल्पनांनी चूकीच्या मार्गानें जाऊं नये.  
देह तरी पांचा भूतांचा । जीव तरी अंश ब्रह्मींचा ।
परमात्मा तरी अनन्याचा । ठाव पाहा ॥ २१ ॥
२१) देहाचा विचार केला तर तो आहे पांच भूतांचा. जीवाचा विचार केला तर तर तो अंश आहे ब्रह्माचा. आणि जो अनन्य होतो तोच परमात्म्यापर्यंत पोहोचतो हें लक्षांत ठेवावें.  
उगेंचि पाहातां मीपण दिसे । शोध घेता कांहींच नसे ।
तत्वें तत्व निरसे । पुढें निखळ आत्मा ॥ २२ ॥
२२) उगीच पाहिलें तर मीपण दिसते. पण विचारानें त्याचा शोध घ्यावयास गेल्यावर तें खरें नाहीं असें आढळतें. एका तत्वानें दुसर्‍या तत्वाचें निरसन करत गेले असतां सगळें दृश्य खरें नाहीं असे अनुभवास येते. नंतर शुद्ध निर्भेळ आत्मस्वरुप तेवढें शिल्लक उरते.  
आत्मा आहे आत्मपणें । जीव आहे जीवपणें ।
माया आहे मायापणें । विस्तारली ॥ २३ ॥
२३) आत्मा- स्वस्वरुप हे आत्मपणानें असतें. जीव जीवपणानें राहतो. माया मिथ्यापणानें सगळीकडें पसरुन राहते.  
ऐसें अवघेंचि आहे । आणी आपण हि कोणीयेक आहे ।
हें सकळ शोधून पाहे । तोचि ज्ञानी ॥ २४ ॥  
२४) असें हें सगळें आहेपणानें दिसतें. आणि त्याचबरोबर मी कोणीतरी एक आहे असें वाटतें. यांपैकी खरें आहेपण कशाला आहे, शुद्ध अस्तित्व किंवा खरेपण कोणास आहे, हे शोधून काढतो तो खरा ज्ञानी होय.  
शोधूं जाणें सकळांसी । परी पाहों नेणे आपणासी ।
ऐसा ज्ञानी येकदेसी । वृत्तीरुपें ॥ २५ ॥
२५) ज्ञाता आणि ज्ञेय यांच्या द्वैतामध्यें वावरणारा शोधक ज्ञेयरुपानें पुढें येणारें सर्व जग जाणतो. त्याचा शोध घेतो. पण मीपणानें जगाचा शोध घेणारा जो ज्ञाता त्याचा शोध कोणी करत नाहीं. जगाचें ज्ञान वृत्तिरुप असल्यानें मीपणाचा शोध न घेणारा ज्ञाता अपूर्णज्ञानी समजावा.    
तें वृत्तिरुप जरी पाहिलें । तरी मग कांहींच नाहीं राहिलें ।
प्रकृतिनिरासें अवघें चि गेलें । विकारवंत ॥ २६ ॥
२६) देहबुद्धीचे ज्ञान वृत्तिरुप असतें. त्या वृत्तिचें नीट परीक्षण केलें तर सगळ्या वृत्ति कल्पनेनें भरलेल्या आहेत हें लक्षांत येईल. कल्पनेनें निर्माण केलेलें खरें असूं शकत नाहीं. अशा रीतीनें प्रकृतीनें निर्माण केलेलें सर्व दृश्य विकारवंत व चंचल म्हणून खोटें ठरते.  
उरलें तें निखळ निर्गुण । विवंचितां तेंचि आपण ।
ऐसी परमार्थाची खूण । अगाध आहे ॥ २७ ॥
२७) एकदेशी व परिछिन्न दृश्य लय पावलें कीं शेवटी केवळ शुद्ध निर्गुण स्वस्वरुप उरते. अधिक विवेक केल्यास तें स्वरुप आपण स्वतः आहोत असा आत्मसाक्षात्कार होतो. परमार्थाची ही अशी अत्यंत खोल व गहन खूण आहे. 
फळ येक आपण येक । ऐसा नाहीं हा विवेक ।
फळाचें फळ कोणीयेक । स्वयेंचि होईजे ॥ २८ ॥
२८) परमार्थाचा विचार वेगळा आहे. वस्तु जाणणारा ज्ञाता आणि जाणायची वस्तु ज्ञेय ही दोन्ही या विचारांमध्यें वेगळे राहात नाहीत. या विचारामध्यें ज्ञाता स्वतः ज्ञेयरुप बनून जातो. ज्ञाता ज्ञेयाशी अनन्य होऊन तें ज्ञान घडते.  
रंक होता राजा जाला । बरें पाहातां प्रत्यये आला ।
रंकपणाचा गल्बला । रंकीं करावा ॥ २९ ॥
२९) एक भिकारी होता. तो राजा झाला. आपण खरोखर राजे आहोत असा त्यास अनुभव आला. मग भिकारीपणाची धडपड करणें त्यास शोभणार नाहीं. त्याचप्रमाणें आत्मज्ञानी पुरुष वृत्तिरुप ज्ञानाची धडपड करणार नाहीं. 
वेद शास्त्रें पुराणें । नाना साधनें निरुपणें ।
सिद्ध साधु ज्याकारणें । नाना सायास करिती ॥ ३० ॥ 
३०) वेद, शास्त्रें, पुराणें, नाना प्रकारची साधनें, निरुपणें, सिद्ध आणी साधु ज्याची प्राप्ती व्हावी यासाठी धडपडतात, 
तें ब्रह्मरुप आपणचि आंगें । सारासारविचारप्रसंगें ।
करणें न करणें वाउगें । कांहींच नाहीं ॥ ३१ ॥
३१) तें ब्रह्मस्वरुप आपण स्वतःच आहोंत असा अनुभव आल्यानंतर कर्म-अकर्माची समस्या उरत नाहीं. प्रसंग आला असतां सारासार विचार करुन हें करणें बरें कीं तें करणें बरें हा प्रश्र्ण लटका होऊन कांहीं कर्तव्यच शिल्लक उरत नाही.    
रंक राजआज्ञेसि भ्याले । तेंचि पुढें राजा जालें ।
मग तें भयेचि उडालें । रंकपणासरिसें ॥ ३२ ॥
३२) एक गरिब माणूस राजाज्ञेला भीत असे. पुढें तो स्वतःच राजा झाला. राजा होताक्षणीच त्याची गरीबी जशी नाहीशीं झाली तसें त्याचे भयही नाहीसें झाले. 
वेदें वेदाज्ञेने चालावें । सच्छास्त्रें शास्त्र अभ्यासावें ।
तीर्थें तीर्थास जावें । कोण्या प्रकारें ॥ ३३ ॥
३३)  आत्मज्ञानी पुरुष स्वतः वेदशास्त्रांचे मूळ बनतो. तीर्थस्वरुप होतो. वेदानें वेदांची आज्ञा पाळावीत. वेदांतशास्त्रानें शास्त्रांचा अभ्यास करावा, तीर्थानें तीर्थयात्रा करावी, हे जसें अशक्य व अयोग्य असते तसें ज्ञानी पुरुषास दृश्याची बंधनें किंवा मर्यादा घालणें योग्य नसतें.    
अमृतें सेवावें अमृत । अनंतें पाहावा अनंत ।
भगवंतें लक्षावा भगवंत । कोण्या प्रकारें ॥ ३४ ॥
३४) तसेंच अमृतानें अमृत प्यावें. अनंतानें अनंत पाहावा. भगवंतानें भगवंताचे ध्यान करावें. हें घडणें शक्य नसतें.  
संतें असंत त्यागावे । निर्गुणें निर्गुणासी भंगावें ।
स्वरुपें स्वरुपीं रंगावें । कोण्या प्रकारें ॥ ३५ ॥
३५) संत म्हणजे सदा, सर्वत्र पूर्णपणें व्यापून असणारें ब्रह्मस्वरुप होय. असंत म्हणजे जें कधी नव्हतेंच नव्हतें तें भासरुप होय. जे सदा आहेच आहे त्याने जे कदा नाहींच नाहीं तें टाकावें, निर्गुणानें निर्गुणाचा भंग करावा. स्वस्वरुपानें स्वरुपामध्येंच रंगून जावें , हें घडणें शक्य नसतें.   
अंजनें ल्यावें अंजन । धनें साधावें धन ।
निरंजनें निरंजन । कैसें अनुभवावें ॥ ३६ ॥
३६) अंजनानें स्वतःला अंजन घालावें. धनानेंच धनाची प्राप्ती करुन घ्यावी. शुद्ध परमात्मस्वरुपानें तशाच परमात्स्वरुपाचा अनुभव घ्यावा. हें घडणें शक्य नसतें.   
साध्य करावें साधनासी । ध्येंयें धरावें ध्यानासी ।
उन्मनें आवरावें मनासी । कोण्या प्रकारें ॥ ३७ ॥
३७) जें स्वतः साध्य आहे त्यानेंच साधना करावी. जें स्वतः ध्येय आहे त्यानेंच घ्यान लावावें. जो स्वतः उन्मन बनला आहे त्यानें मन आवरावें या गोष्टी घडणें शक्य नसतें. संगण्याचा भावार्थ असा कीं, आत्मसाक्षात्कारी ज्ञानी पुरुष त्रिगुणांच्या व पंचमहाभूतांच्या कक्षेपलीकडे गेलेला असतो. दृश्याच्या सार्‍या कल्पना तेथें लटक्या पडतात. आपण त्याच्याबद्दल जी जी कांहीं कल्पना करुं ती देहबुद्धीची असल्यानें द्वैतप्रधान असते. आणि तो तर संपूर्ण अद्वैतसाम्राज्यांत राहतो. म्हणून अशा परस्पर विरोधी भाषेनें त्याच्या स्थितिची कल्पना द्यावी लागते.     
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्थितिनिरुपणनाम समास दहावा ॥ 
Samas Dahava  Sthiti Nirupan
समास दहावा स्थितिनिरुपण


Custom Search

Tuesday, November 14, 2017

Samas Navava Sandeha Varan समास नववा संदेहवारण


Dashak Navava Samas Navava Sandeha Varan 
Samas Navava Sandeha Varan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Brahma. The listeners have some doubts about Brahma. Here Swami Samarth is answering their doubts about Brahma.
समास नववा संदेहवारण 
श्रीराम ॥
ब्रह्म वारितां वारेना । ब्रह्म सारिता सरेना ।
ब्रह्म कांहीं वोसरेना । येकीकडे ॥ १ ॥
१) श्रोता म्हणतो कीं, ब्रह्माचें निवारण करुं म्हटलें तरी करतां येत नाहीं. त्यास बाजूससारावें म्हटलें तर सारता येत नाहीं. ब्रह्म एका बाजूस साठवावें म्हटलें तर तसेही करतां येत नाहीं. 
ब्रह्म भेदितां  भेदेना । ब्रह्म छेदितां छेदेना ।
ब्रह्म परतें होयेना । केलें तरी ॥ २ ॥
२) ब्रह्म मोडावे तर तें मोडता येत नाहीं. ब्रह्म छेदावें तर तें छेदतां येत नाहीं. ब्रह्माला मागें ढकलावें म्हटलें तर ढकलता येत नाहीं.   
ब्रह्म खंडेना अखंड । ब्रह्मीं नाहीं दुसरें बंड ।
तरी कैसें हें ब्रह्मांड । सिरकलें मधें ॥ ३ ॥
३) ब्रह्म अखंड आहे त्याचे तुकडे पाडता येत नाहीत. ब्रह्म एकजिनसी आहे. त्याच्यात त्याच्यावाचून दुसरें कांहीं नाहीं. असें असून त्यांत हे ब्रह्मांड शिरले कसें ?   
पर्वत पाषाण सिळा सिखरें । नाना स्थळें स्थळांतरें ।
भूगोळरचना कोण्या प्रकारें । जालीं परब्रह्मीं ॥ ४ ॥
४) पर्वत, पाषाण, शिला, शिखरें, नाना प्रकारची स्थानें असलेली ही जड पृथ्वी; सूक्ष्म परब्रह्मामधें झाली कशी ?
भूगोळ आहे ब्रह्मामधें । ब्रह्म आहे भूगोळामधें ।
पाहाता येक येकामधें । प्रत्यक्ष दिसे ॥ ५ ॥  
५)  पृथ्वी ब्रह्मामधें आहे व तसेंच ब्रह्म पृथ्वीमधें आहे. नीट पाहीलें तर पृथ्वी आणी ब्रह्म एकमेकांमध्यें आहेत. असे आढळते.     
ब्रह्मीं भूगोळें पैस केला । आणि भूगोळ ब्रह्में भेदिला ।
विचार पाहातां प्रत्यय आला । प्रत्यक्ष आतां ॥ ६ ॥  
६) ब्रह्मामधें पृथ्वीनें जागा व्यापली आहे. व पृथ्वीच्या अंतर्यामीं ब्रह्म आहे. विचार केला तर पृथ्वी आणी ब्रह्म यांचा हा परस्परसंबंध प्रत्यक्ष अनुभवास येतो.   
ब्रह्में ब्रह्मांड भीदिलें । हें तों पाहातां नीटचि जालें ।
परी ब्रह्मांस ब्रह्मांडें भेदिलें । हे विपरीत दिसे ॥ ७ ॥
७) ब्रह्म सूक्ष्म आहे. म्हणून ब्रह्म ब्रह्मांडाचा भेद करुन त्याच्या अंतर्यामीं राहते हें बरोबर आहे. पण ब्रह्मांड स्थूल आहे जड आहे, त्यानें ब्रह्मांडाचा भेद करुन त्यांत जागा व्यापावी हें चूकीचे वाटतें.   
भेदिलें नाहीं म्हणावें । तरी ब्रह्मीं  ब्रह्मांड स्वभावें ।    
हें सकळांस अनुभवें । दिसत आहे ॥ ८ ॥
८) ब्रह्मांडानें ब्रह्माचा भेद केला नाहीं म्हणावें तर तें ब्रह्मामधें सहजपणें आहे हे सगळ्यांना प्रत्यक्ष अनुभवानें दिसते. 
तरी हें आतां कैसें जालें । विचारुन पाहिजे बोलिलें ।
ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । आक्षेपवचन ॥ ९ ॥
९) तर हें असें घडलें कसें ? या प्रश्र्णाचे उत्तर विचार करुन दिले पाहिजे. श्रोत्यांनी हा असा आक्षेप काढला.  
आतां याचें प्रत्योत्तर । सावध ऐका निरोत्तर ।
येथें पडिले कीं विचार । संदेहाचे ॥ १० ॥
१०) आतां या प्रश्र्नाचे उत्तर लक्षपूर्वक ऐकावें. तें उत्तर तुम्हांला निरुत्तर करील. हा प्रश्र्ण सोडवितांना कांहीं शंका येतात. 
ब्रह्मांड नाहीं म्हणों तरी दिसे । आणी दिसे म्हणों तरी नासे ।
आतां हें समजती कैसें । श्रोतेजन ॥ ११ ॥
११) ब्रह्मांड नाहीं असें म्हणावें तर तें डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते. बरें तें दिसतें म्हणून आहे म्हणावें तर नाश पावतें. श्रोत्यांनी ब्रह्मांडाचे हें स्वरुप आधीं नीट समजून घ्यावें.
तंव श्रोते जाले उद्दित । आहों म्हणती सावचित्त ।
प्रसंगे बोलों उचित । प्रत्योत्तर ॥ १२ ॥
१२) तेव्हां श्रोते म्हणालें कीं, आम्ही उत्तर समजून घेण्यास तयार आहोत. व लक्षपूर्वक तें ऐकतों. यावर वक्ता म्हणाला कीं, या प्रश्र्नाला उचित असें उत्तर देतो.  
आकाशीं दीपास लाविलें । दीपें आकाश परतें केलें ।
हें तों घडेना पाहिलें । पाहिजे श्रोतीं ॥ १३ ॥
१३) आपण आकाशांत दिवा लावला. तर त्या दिव्यानें आकाश बाजूला सारलें असें होत नाहीं. हे श्रोत्यांनी ध्यानांत ठेवावे. 
आप तेज अथवा पवन । सारुं न सकती गगन ।
गगन पाहातां सघन । चळेल कैसें ॥ १४ ॥
१४) पाणी, अग्नि आणि वायु या तीन भूतांपैकीं एकही आकाशाला बाजूला सारुं शकत नाहीं. आकाश दाटपणें, गच्चपणें भरलेलें असून तें स्थिर आहे. त्याच्यामध्यें हालचाल होऊं शकत नाहीं. म्हणून त्यास बाजूला सारता  येत नाहीं. 
अथवा कठीण जाली मेदनी । तरी गगनें केली चाळणी ।
पृथ्वीचें सर्वांग भेदुनी । राहिलें गगन ॥ १५ ॥ 
१५) पृथ्वी कठिण आहे. पण आकाश अत्यंत सूक्ष्म, मृदु व बारीक आहे. त्यामुळें तें पृथ्वीच्या अणुपरमाणुमधें भरुन आहे. त्यानें जणूं पृथ्वीची चाळण केली आहे.   
याची प्रचित ऐसी असे । जें जडत्वा आलें तितुकें नासे ।
आकाश जैसें तैसें असे चळणार नाहीं ॥ १६ ॥
१६) जें जें स्थूल असतें तें तें नाश पावतें. जें सूक्ष्म असतें ते अविनाशी असते. आकाश सूक्ष्म आहे व उरवरीत चारी भूतें जड आहेत. ती नाश पावली तरीं आकाश आहे तसेंच राहतें. तें चळत नाहीं.   
वेगळेपणें पाहावें । तयास आकाश म्हणावें ।
अभिन्न होतां स्वभावें । आकाश ब्रह्म ॥ १७ ॥
१७) आकाशाला आपण वेगळेपणानें पाहूं शकतो. म्हणून त्यास महाभूत म्हणायचे. त्याच्याशी तदाकार किंवा अभिन्न होऊन बघितलें तर आकाशाला ब्रह्म म्हणायला हरकत नाहीं.  
तस्मात आकाश चळेना । भेद गगनाचा कळेना ।
भासलें ब्रह्म तयास जाणा । आकाश म्हणावें ॥ १८ ॥
१८) आकाश ब्रह्मासारखें निश्चळ व अविनाश आहे. आकाशाचे खरें स्वरुप आपल्याला आकलन होत नाहीं. परब्रह्मास वेगळेंपणाने पाहिलें म्हणजे त्यास आकाश म्हणतात. 
निर्गुण ब्रह्मसें भासलें । कल्पूं जातां अनुमानलें ।
म्हणोन आकाश बोलिलें । कल्पनेंसाठीं ॥ १९ ॥
१९) आकाशाकडे पाहिले तर तें निर्गुण ब्रह्मच आहे कीं काय असें वाटतें. पण तें निर्गुण ब्रह्म नाहीं. कारण आपण बुद्धीनें त्याची कल्पना करुं शकतो. त्याची कल्पना करता येते म्हणून त्यास आकाश म्हणतात.   
कल्पनेसि भासे भास । तितुकें जाणावें आकाश ।
परब्रह्म निराभास । निर्विकल्प ॥ २० ॥
२०) वस्तु वेगळेपणानें भासतें तोपर्यंत आपण जें पाहतो तें आकाश समजावें. कारण परब्रह्माच्या ठिकाणी वेगळेपणानें पाहणें नाहीं, त्यामुळें त्याची कल्पनाही करतां येत नाही. ब्रह्म निराभास व निर्विकल्प आहे.  
पंचभूतांमधें वास । म्हणौन बोलिजे आकाश ।
भूतांतरीं जो ब्रह्मांश । तेंचि गगन ॥ २१ ॥
२१) आकाश पांच भूतांमध्यें गणले जाते म्हणून त्यास आकाश म्हणायचे. भूतांच्या अंतर्यामीं जो ब्रह्मांश असतो तेंच खरें आकाश होय. 
प्रत्यक्ष होतें जातें । अचळ कैसें म्हणावें त्यातें ।
म्हणोनियां गगनातें । भेदिलें नाहीं ॥ २२ ॥
२२) इतर चारही भूतें आकाशांत उत्पन्न होतात व त्यांतच पुन्हा विलीन होतात. म्हणून त्यांना निश्चल म्हणता येत नाहीं. तीं आकाशांत आली आणि गेली तरी आकाश जसेंच्या तसें राहतें. त्याचा भेद होत नाहीं. 
पृथ्वी विरोन उरे जीवन । जीवन नस्तां उरे अग्न ।
अग्न विझतां उरे पवन । तोहि नासे ॥ २३ ॥
२३) पृथ्वी विरुन पाणी राहते. पाणी आटून अग्नि उरतो. अग्नि विझून वायु उरतो. अखेर वायुदेखील नाहींसा होतो. 
मिथ्या आलें आणी गेलें । तेणें खरें तें भंगलें ।
ऐसें हें प्रचितीस आलें । कोणेंपरी ॥ २४ ॥
२४) जें दिसतें व नासतें तें खोटे असतें. जें खोटे आहे ते आले आणी गेले. त्यामुळें जें खरें आहे तें भंगल्यासारखें दिसते. असा जो अनुभव त्याचे कारण काय हें पाहणें अवश्य आहे. 
भ्रमें प्रत्यक्ष दिसतें । विचार पाहातां काये तेथें ।
भ्रममूळ या जगातें । खरें कैसें म्हणावें ॥ २५ ॥   
२५) भ्रम झालेल्या माणसाला कांहींतरी दिसते. पण विचारानें शोध घेतला तर तेथें कांहींच आढळत नाही. जगसुद्धां असेंच भ्रममूळक आहे. म्हणून जगाला खरें म्हणतां येत नाहीं.  
भ्रम शोधितां कांहींच नाहीं । तेथें भेदिलें कोणें काई ।
भ्रमें भेदिलें म्हणतां ठाईं । भ्रमचि मिथ्या ॥ २६ ॥
२६) भ्रमानें जें दिसतें त्याचा शोध घेतला. तेथें कांहींच नसतें. असा अनुभव आला. मग जें मुळांत नाहींच त्यानें कशाचा तरी भेद केला हेही शक्य नाहीं. अमक्यानें तमक्याचा भेद केला असें भ्रमानें म्हटलें तर भ्रमच खोटा होतो.   
भ्रमाचें रुप मिथ्या जालें । मग सुखें म्हणावें भेदिलें ।
मुळीं लटिकें त्यानें केलें । तेंहि तैसें ॥ २७ ॥
२७) भ्रमानें जें दिसतें तें खरें नाहीं असें एकदां निश्र्चित केल्यावर मगअमक्यानें तमक्याचा भेद केला असें खुशाल बोलावें. जें मुळांतच खरें नाहीं त्यानें अमुक एक केलें असें म्हटलें तर तें करणें देखील खरें नसतें.   
लटिक्यानें उदंड केलें । तरी आमुचें काये गेलें ।
केलें म्हणतांच नाथिलें । शाहाणे जाणती ॥ २८ ॥
२८) जें नाहींच नाहीं, ज्याला अस्तित्व नाहीं, त्यानें खूप कांहीं केलें असें बोलल्यानें कोणाचें कांहीं जात नाहीं. त्यानें केले असें म्हणत असतां तें घडलेंच नाहीं ही वस्तुस्थिति शहाणीं माणसें जाणतात.  
सागरामधें खसखस । तैसें परब्रहमीं दृश्य ।
मतीसारिखा मतिप्रकाश । अंतरीं वाढे ॥ २९ ॥
२९) दर्यामें खसखस अशीं म्हण आहे. विशाळ सागरांत खसखसीच्या दाण्याचा पत्ताही लागत नाहीं. त्याचप्रमाणें अनंत व अपार परब्रह्मामधें हें दृश्य विश्व फारच अल्प आहे. माणसाच्या बुद्धीच्या प्रमाणांत त्याच्या ठिकाणीं ज्ञानाचा प्रकाश आढळतो. पण बुद्धीला विशाल करतां येते.  
मती करितां विशाळ । कवळो लागे अंतराळ ।
पाहातां भासे ब्रह्मगोळ । कवीठ जैसें ॥ ३० ॥
३०) सध्याच्या अवस्थेंत आपल्याला हें विश्व केवढें तरी मोठे वाटते. पण बुद्धि विशाल केली तर ती आकाशाला कवटाळते, मगहें विश्व एखाद्या कवठाएवढें लहान दिसतें.   
वृत्ति त्याहून विशाळ । करितां ब्रह्मांड बद्रिफळ ।
ब्रह्माकार होतां केवळ । कांहींच नाहीं ॥ ३१ ॥
३१) आपण आपली वृत्ति त्याहून विशाल केलीं तर तेंच विश्व एखाद्या बोराएवढें दिसूं लागतें. अखेर वृत्ति ब्रह्माशी तदाकार झालीं कीं मग विश्व मुळीं दिसायलाच उरत नाहीं.
आपण विवेकें विशाळला । मर्यादेवेगळा जाला ।
मग ब्रह्मगोळ देखिला । वटबीजन्यायें ॥ ३२ ॥ 
३२) देहबुद्धि नाहींशी करुन आपण विवेकानें विशाल झालो तर आपल्या स्थळकाळाच्या मर्यादा गळून पडतात. त्या अमर्याद विशाल अवस्थेंमध्यें हें विश्व एखाद्या वडाच्या बीजाएवढें छोटेसें दिसेल.  
होतां त्याहून विस्तीर्ण । वटबीज कोतिप्रमाण ।
आपण होतां परिपूर्ण ।  कांहींच नाहीं ॥ ३३ ॥
३३) आपण त्याहून विशाल बनलों तर हें विश्व वटबीजापेक्षांहीअतिशय लहान दिसेल. आपण ब्रह्मरुप झालो कीं मग विश्व दिसायला मुळीं शिल्लकच उरत नाहीं.      
आपण भ्रमें लाहानाळला । केवळ देहधारी जाला ।
तरी मग ब्रह्मांड त्याला । कवळेल कैसें ॥ ३४ ॥
३४) सध्या देहबुद्धीमुळें आपण आकुंचित झालो आहोत. स्वतःला देह समजू लागलो आहोत. अशा आकुंचित वृत्तीच्या माणसाच्या बुद्धीला विश्वास गवसणी घालणें शक्य नाहीं.   
वृत्ती ऐसी वाढवावी । पसरुन नाहींच करावी ।
पूर्णब्रह्मास पुरवावी । चहूंकडे ॥ ३५ ॥
३५) आपण आपली वृत्ती विशाल करावी. ती इतकी पसरावी कीं ती अखेर नाहीशींच होऊन जाईल. पूर्णब्रह्माला चहुंकडून पुरेल इतकी तिला पसरावी, विशाल करावी.   
जंव एक सुवर्ण आणितां । तेणें ब्रह्मांड मढवितां ।
कैसें होईल तें तत्वतां । बरें पाहा ॥ ३६ ॥
३६) समजा आपण थोडें सोनें आणलें आणि त्यानें सर्व विश्व मढविण्याचा प्रयत्न केला. तर काय होईल ? आपण कितीही प्रयत्न केला तरी सोनें शेवटी अपुरेंच पडेल. तसाच प्रकार वृत्तीच्याबाबतींत घडतो.  
वस्तु वृत्तिस कवळे । तेणें वृत्ति फाटोन वितुळे ।
निर्गुण आत्माच निवळे । जैसा तैसा ॥ ३७ ॥
३७) आपली वृत्ती परब्रह्नाचे आकलन करावयास निघालीं कीं तीं मोठी मोठी होऊ लागतें. तसें करतां करतां तीची मर्यादा संपते  व ती फाटते. व परब्रह्मीं लीन होऊन जातें. मग मूळचें निर्गुण आत्मस्वरुप जसेंच्या तसें स्पष्टपणें प्रत्ययास येतें.   
येणें फिटली आशंका । श्रोते हो संदेह धरुं नका ।
अनुमान असेल तरी विवेका । अवलोकावें ॥ ३८ ॥
३८) आतां शंकेचे निरसन झालें असें मी समजतो. श्रोतेहो आतांपर्यंत जें सांगितलें त्याबद्दल मनांत शंका धरुं नका. मनांत शंका असेल तर नीट विचार करुन पाहा. 
विवेकें तुटे अनुमान । विवेकें होये समाधान ।
विवेकें आत्मनिवेदन । मोक्ष लाभे ॥ ३९ ॥   
३९) मनुष्य विवेक करील तर त्याच्या शंकेचे निरसन होईल.विवेकानें त्यास समाधान मिळेल. आणि विवेकानेच शरणागती साधून मोक्ष मिळेल.  
केली मोक्षाची उपेक्षा । विवेकें सारिलें पूर्वपक्षा ।
सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा । प्रमाण नलगे ॥ ४० ॥
४०) मोक्षाच्या मागें जाण्याचें कारण नाहीं. मोक्ष बाजूला ठेवावा. पण विवेकानें खरें वाटणारें पण खरें नसणारें दृश्य बाजूस सारावे. म्हणजे मग आत्माचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. त्यास आणखी पुरावा कशाला हवा ? दृश्य खरें वाटणें हा पूर्वपक्ष आणि अतींद्रिय आत्मस्वरुप हा सिद्धांतपक्ष होय. 
हें प्रचितीचीं उत्तरें । कळती सारासारविचारें ।
मननध्यासें साक्षात्कारें । पावन होईजे ॥ ४१ ॥
४१) हा जो विषय सांगितला तो माझा अनुभव आहे. सारासार विचार केला तर माझा अभिप्राय ध्यानांत येईल. हें झालें श्रवण. त्यावर मनन करावें. त्यांतून निदिध्यास लागला कीं आत्मसाक्षात्कार होईल. साक्षात्कारानें पवित्र होऊन जावें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे संदेहवारणनाम समास नववा ॥
Samas Navava  Sandeha Varan 
समास नववा संदेहवारण 



Custom Search

Sunday, November 12, 2017

Samas Aathava Dehanta Nirupan समास आठवा देहान्त निरुपण


Dashak Navava Samas Aathava Dehanta Nirupan 
Samas Aathava Dehanta Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about why common people have a Birth- Death Cycle. Why Dnyani Santa have Mukti.
समास आठवा देहान्त निरुपण 
श्रीराम ॥
ज्ञाता सुटला ज्ञानमतें । परंतु जन्म कैसा बद्धातें ।
बद्धाचें काये जन्मतें । अंतकाळीं ॥ १ ॥
१) ज्ञानी पुरुष आत्मज्ञानामुळें जन्माच्या तडाख्यांतून सुटतो हें अगदी खरें. पण अज्ञानी माणसाला जन्म कसा येतो? बद्ध माणूस मेल्यानंतर त्याचें काय उरतें व तें त्याला पुनः जन्माला घालते ? 
बद्ध प्राणी मरोन गेले । तेथें कांहींच नाहीं उरलें ।
जाणीवेचें विस्मरण जालें । मरणापूर्वीं ॥ २ ॥
२) वरवर पाहिलें तर बद्ध माणूस मेल्यानंतर त्याचें कांहींच शिल्लक उरत नाहीं. मरणाच्या अगोदर त्याची जाणीवसुद्धां संपूर्ण नाहींशी होतें 
ऐसी घेतली आशंका । याचें उत्तर ऐका ।
आतां दुश्र्चीत होऊं नका । म्हणे वक्ता ॥ ३ ॥
३) श्रोत्यानें अशी शंका काढली. वक्ता म्हणाला त्या शंकेचें निरसन ऐकावें. मनाला व्यग्रता येऊं देऊं नये.  
पंचप्राण स्थळें सोडिती । प्राणरुप वासनावृत्ती ।
वासनामिश्रीत प्राण जाती । देह सोडुनियां ॥ ४ ॥
४) पांचही प्राण शरीरांतील आपलीं स्थानें सोडतात. त्यावेळीं वासना त्यांच्या मागोमाग जाते. कारण वासना प्राणरुप आहे. मृत्युच्यावेळीं वासना कालवलेला प्राण देह सोडून जाते. 
वायोसरिसी वासना गेली । ते वायोरुपेंचि राहिली ।
पुन्हां जन्म घेऊन आली । हेतुपरत्वें ॥ ५ ॥
५) प्राण वायुरुप असतो. वायूबरोबर वासना देह सोडते. ती वायुरुपच शिल्लक राहाते. आणि मरतांना जसा हेतु असेल त्याप्रमाणें ती पुनः जन्म घेऊन येते. 
कित्येक प्राणी निःशेष मरती । पुन्हां मागुते जीव येती ।
ढकलून दिल्हें तेणें दुखवती । हस्तपादादिक ॥ ६ ॥
६) कांहीं वेळीं एखादा माणूस संपूर्ण मरतो. त्याचा देह प्रेत होतो. पण पुनः त्याचा जीव देहांत परत येतो. प्रेत म्हणून त्यास ढकलून दिलें तर त्याच्या हातापायांना मार लागतो.   
सर्पदृष्टी जालियांवरी । तीं दिवसां उठवी धन्वंतरी ।
तेव्हां ते माघारी । वासना येते कीं ॥ ७ ॥
७) एखाद्यला सर्पाच्या नजरेचें विष बाधतें. त्यामुळें तो मरतो. तीन दिवसानंतर मांत्रिक त्याचें विष उतरवून त्यास उठवितो. मरतांना देहाबाहेर पडलेली वासना परत देहामध्यें येते म्हणूनच तो जिवंत होऊन उठतो.   
कित्येक सेवें होऊन पडती । कित्येक तयांस उठविती ।
येमलोकींहून आणिती । माघारे प्राणी ॥ ८ ॥
८) कांहीं माणसें प्राण निघून गेल्यानें प्रेत होऊन पडतात. त्यांना कांहीं लोक जिवंत करतात. म्हणजे त्यांना यमलोकाहून परत घेऊन येतात. 
कित्येक पूर्वीं श्रापिले । ते शापें देह पावले ।
उश्रापकाळीं पुन्हां आले । पूर्वदेहीं ॥ ९ ॥
९) पूर्वीं कांहीं लोकांना शाप दिलें. शापामुळें त्यांना नविन देह घ्यावें लागले. पण उःशापाच्या योगानें योग्य काळीं ते परत पहिल्या देहांत आलें. 
कित्येकीं बहु जन्म घेतले । कित्येक परकाया प्रवेशले ।
ऐसे आले आणी गेले । बहुत लोक ॥ १० ॥
१०) कांहीं लोकांनी पुष्कळ जन्म घेतलें. कांहीं लोकांनी परकाया प्रवेश केला. अशा रीतीनें कितीतरी लोक जन्मास आले आणि मरण पावले. 
फुंकिल्यासारिसा वायो गेला । तेथें वायोसूत निर्माण जाला ।
म्हणोन वायोरुप वासनेला । जन्म आहे ॥ ११ ॥
११) मूळ वायु स्तब्ध असतो. फुंकलें कीं त्यास गति मिळते. तो हालचाल करतो. वायु हालचाल करुं लागला कीं प्राण निर्माण होतो. प्राण वासनारुप असतो आणि वासना जन्म घ्यायला लावते.   
मनाच्या वृत्ती नाना । त्यांत जन्म घेते वासना ।
वासना पाहातां दिसेना । परंतु आहे ॥ १२ ॥
१२) मूळ वासना अति सूक्ष्म असते. बघावयास गेले तर ती आढळत नाही. परंतु ती असते यांत शंका नाहीं. आपल्या मनामध्यें ज्या अनेक वृत्ती निर्माण होतात त्यांचे मूळ वासमेंत असतें. वासनेंतून वृत्ती निर्माण होतात. आणि वृत्तीमधून वासना पोसली जाते.   
वासना जाणिजे जाणीवहेत । जाणीव मुळींच मूळतंत ।
मूळमायेंत असे मिश्रित । कारणरुपें ॥ १३ ॥
१३) देहबुद्धीमध्यें वावरणारी जाणीव हेतुसहित असते. ही हेतुसहित असणारे जाणीवेचे स्वरुप म्हणजेच वासना होय. या जाणीवेचा संबंध मूळमायेपर्यंत पोहोचतो. मूळमायेमध्यें वायु जाणिवेसहित असतो. वासना जाणीवयुक्त असते. याकारणानें जानीवेचा धागा अगदी मूळमायेपर्यंत पोहोचतो.   
कारणरुप आहे ब्रह्मांडीं । कार्यरुपें वर्ते पिंडीं ।
अनुमानितां तांतडीं । अनुमानेना ॥ १४ ॥
१४) ब्रह्मांडामध्यें असणारी जाणीव कारणरुप आहे. पिंडामध्यें ती कार्यरुपानें वावरते. तिचें स्वरुप एकदम आकलन होत नाहीं. 
परंतु आहे सूक्ष्म रुप । जैसें वायोचें स्वरुप ।
सकळ देव वायोरुप । आणी भूतसृष्टि ॥ १५ ॥
१५) परंतु वासना आहे आणि ती वायूसारखी सूक्ष्म आहे. सगळे देवदेखील वायुरुप आहेत. पंचभूतात्मक सृष्टीचाच ते भाग आहेत. 
वायोमधें विकार नाना । वायो तरी पाहातां दिसेना ।
तैसी जाणीववासना । अति सूक्ष्म ॥ १६ ॥
१६) वायूमध्यें कितीतरी नाना प्रकार होतात. असें असून तो दिसत नाहीं. त्याचप्रमाणें जाणीवरुपीप वासना अति सूक्ष्म आहे. तिच्यामधें निरनिराळे बदल होतात. पण ती दिसत नाहीं.
त्रिगुण आणी पंचभूतें । हे वायोमध्यें मिश्रिते ।
अनुमानेना म्हणोन त्यातें । मिथ्या म्हणों नये ॥ १७ ॥
१७) तीन गुण आणि पंचभूतें अशीं आठ तत्त्वें वायूमधें मिसळलेली आहेत. त्यांची कल्पना येत नाहीं म्हणून तें तसें नाहीं असें मानूं नये.  
सहज वायो चाले । तरी सुगंध दुर्गंध कळों आले ।
उष्ण सीतळ तप्त निवाले । प्रत्यक्ष प्राणी ॥ १८ ॥ 
१८) वारा सहज वाहूं लागला कीं, सुगंध व दुर्गंध समजतो. गरम पदार्थ थंड होतात. आणि उष्णतेनें त्रस्त झालेले प्राणी थंड होतात. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. 
वायोचेनि मेघ वोळती । वायोचेनि नक्षत्रें चालती ।
सकळ सृष्टीची वर्तती गती । सकळ तो वायो ॥ १९ ॥
१९) वायूनें ढग हालचाल करतात. व वर्षाव करतात. वायूनें नक्षत्रें फिरतात. विश्वामधें सगळीकडे वायुमुळें गति मिळते. अशा रीतीनें वायुच सर्व जगांत कार्य करतो.   
वायोरुपें देवतें भूतें । आंगीं भरती अकस्मातें ।
वीघ केलियां प्रेतें । सावध होतीं ॥ २० ॥
२०) भुतें व दैवतें किंवा हलक्या देवता वायुरुप असतात. त्या एकाएकीं अंगांत संचरतात. मंत्रतंत्राचें काहीं प्रकार केल्यानें प्रेतेंसुद्धा जिवंत होतात.  
वारें निराळें न बोले । देहामधें भरोन डोले ।
आळी घेऊन जन्मा आले । कित्येक प्राणी ॥ २१ ॥
२१) अंगांत संचरणारें वारे देहावाचून बोलूं शकत नाहीं. कोणत्या तरी देहांत संचार करुन तें प्रकट होते. अशा तर्‍हेची वासना घेऊन कित्येक जीव जन्मास येतात.     
राहाणें ब्राह्मणसमंध जाती । राहाणें ठेवणीं सांपडती ।
नाना गुंतले उगवती । प्रत्यक्ष राहाणें ॥ २२ ॥
२२) राहाणें म्हणजें मंत्र वापरुन अंगांत देवतेचा संचार करणें. अशा संचारानें ब्रह्मसंमधाला काढून लावतात.  जमिनींत पुरुन ठेवलेला धनाचा साठा शोधून देतात. आणि नाना प्रकारच्या संकटांत अडकलेल्यां लोकांची त्यातून सुटका करतात.    
ऐसा वायोचा विकार । येवंचे कळेना विस्तार ।
सकळ कांहीं चराचर । वायोमुळें ॥ २३ ॥
२३) वायूचें असें हें प्रकार आहेत. सांगण्याचें तात्पर्य असें कीं, वायूचा विस्तार कळणें फार कठिण आहे. सगळें चराचर ,विश्वामधिल सर्व व्यवहार वायुमुळें चालतात.  
वायो स्तद्धरुपें सृष्टीधर्ता । वायो चंचळरुपें सृष्टीकर्ता ।
न कळे तरी विचारीं प्रवर्ता । म्हणिजे कळे ॥ २४ ॥
२४) वायूचें जें स्थिर रुप आहे तें विश्व धारण करते व टिकवते. वायूचें जें गतिमान रुप आहे, तें विश्व निर्माण करतें. माझें हें म्हणणें कळलें नसेल तर खोल विचार करावा. म्हणजे मग तें कळेल.  
मुळापासून सेवटवरी । वायोचि सकळ कांहीं करी ।
वायोवेगळें कर्तुत्व चतुरीं । मज निरोपावें ॥ २५ ॥
२५) विश्वाच्या आरंभापासून तें अखेरपर्यंत वायु घडवून आणतो. येतहें वायुशिवाय आणखी कोणाचे कर्तृत्व आहे तें शहाण्या माणसानें मला दाखवून द्यावें.  
जाणीव मूळमाया । जाणीव जाते आपल्या ठाया ।
गुप्त प्रगट होऊनियां । विश्र्वीं वर्ते ॥ २६ ॥
२६) मूळमाया जाणीवरुप आहे. स्वस्वरुप हें जाणीवेचें मूळ ठिकाण असोोन तेथें ती सहज जाते. स्वरुपीं लिन असणारी जाणीव स्तब्ध असते. विश्वामधें गतिमान होऊन ती कर्तृत्व गाजवते. कोठें प्रगटपणें तर कोठें अप्रगटपणें तिचे कार्य चालू असते.  
कोठे गुप्त कोठे प्रगटे । जैसें जीवन उफाळे आटे ।
पुढें मागुता बोध लोटे । भूमंडळीं ॥ २७ ॥
२७) ज्याप्रमाणें पाणी जमिनींतून कधीं उफाळून वर येतें, कधीं आटून जाते, आटल्यानंतर कांहीं दिवसांनीं तो प्रवाह पुन्हा जोरानें जमिनीवर वाहु लागतो, त्याचप्रमाणें जाणीव कोठें गुप्त असतें तर कोठे प्रगटपणें दिसतेतर कोठे प्रगट असलेली गुप्त होते.    
तैसाच वायोमधें जाणीवप्रकार । उमटे आटे निरंतर ।
कोठें विकारें कोठें समीर । उगाच वाजे ॥ २८ ॥ 
२८) वायूमधें असणार्‍या जाणिवेचा प्रकार असाच आहे. कोठें ती प्रगटपणें दिसते तर कोठें ती गुप्त होते. कोठें तिच्यामधें बदल घडलेला दिसतो तर कोठें वायु नुसताच कार्य करतो.      
वारीं आंगावरुन जाती । तेणें हातपायें वाळती ।
वारा वाजताम करपती । आलीं पिकें ॥ २९ ॥
२९) वारें अंगावरुन गेल्यावर हातपाय सुकतात. वारा वाहिल्यानें कित्येक वेळां भरांत आलेली पिकें करपून जातात. 
नाना रोगांची नाना वारीं । पीडा करिती पृथ्वीवरी ।
वीज कडाडी अंबरीं । वायोमुळें ॥ ३० ॥
३०) अनेक प्रकारच्या वार्‍यांनीं अनेक प्रकारचे रोग होतात. पृथ्वीवरील लोकांना त्यांच्यापासून पीडा होते. वायूमुळें आकाशांत वीज चमकते.  
वायोकरितां रागोद्धार । कळे वोळखीचा निर्धार ।
दीप लागे मेघ पडे हा चमत्कार । रागोद्धारीं ॥ ३१ ॥
३१) वायूमुळें राग गाता येतात. श्रोत्यांना वायुमुळें राग निश्र्चितपणें कळतो. दीपरागानें दिवे लागणें. मेघमल्हार रागानें पाऊस पडणें हें रागांचे चमत्कार वायूमुळेंच घडतात.  
वायो फुंकितां भुली पडली । वायो फुंकितां खांडकें करपती ।
वायोकरितां चालती । नाना मंत्र ॥ ३२ ॥
३२) वायु फुंकल्यानें माणसांना भुरळ पडते. वायु फुंकल्यानें अंगावरील गळवें कोरडी पडतात. वायूमुळेंच अनेक प्रकारचे मंत्र परिणाम करतात.   
मंत्रें देव प्रगटती । मंत्रें भूतें अखरकिती ।
बाजीगरी वोडंबरी करिती । मंत्रसामर्थ्यें ॥ ३३ ॥
३३) मंत्राानें देवता प्रगट होतात. मंत्रानें भुतें समोर आणता येतात. एका वस्तुची दुसरी वस्तु करणें. निरनिराळें रुपें घेऊन लोकांना चकित करणें. अशा जादूच्या करामती मंत्रसामर्थ्यानें करतां येतात. 
राक्षसांची मावरचना । ते हे देवांदिका कळेना ।
विचित्र सामर्थ्यें नाना । स्तंबनमोहनादिकें ॥ ३४ ॥
३४) देवांना देखील न कळणारी राक्षसांची मायामय रचना मंत्रसामर्थ्यानें करतां येते. अशा विचित्र प्रकारची सामर्थ्यें मंत्रांच्या ठिकणीं असतात.  
धशचि पिसें करावें । पिसेंच उमजवावें ।
नाना विकार सांगावें । किती म्हणोनी ॥ ३५ ॥
३५) चांगल्या धड व नीट माणसाला वेडें करावें आणी वेड्या माणसाला नीट व धड करावें असेम वायुचें अनेक विकार आहेत. ते सांगावें तेवढें कमीच. 
मंत्रीं संग्राम देवाचा । मंत्रीं साभिमान ऋषीचा। 
महिमा मंत्रसामर्थ्याचा । कोण जाणे ॥ ३६ ॥
३६) मंत्रांच्या सामर्थ्यानें देवांच्या लधाया चालतात. ऋषींचा दरारा त्यांच्या मंत्रसामर्थ्यावरच चालतो. मंत्रसामर्थ्याचा महिमा कोणासही संपूर्ण सांगता येत नाही. 
मंत्री पक्षी आटोपिती । मूशकें स्वापदें बांधती ।
मंत्रीं माहांसर्प खिळीती । आणी धनलाभ ॥ ३७ ॥
३७) मंत्रांनी पक्षी ताब्यांत ठेवता येतात. उंदीर व जनावरें बांधून ठेवता येतात. मंत्रानें मोठालें सर्प एका जागीं खिळवून ठेवता येतात. मंत्रानें धनलाभही करुन घेता येतो. 
आतां असो हा प्रश्र्ण जाला । बद्धाचा जन्म प्रत्यया आला ।
मागील प्रश्र्ण फिटला । श्रोतयाचा ॥ ३८ ॥  
३८) आतां हा विषय पुरे. श्रोत्याच्या प्रश्र्णाला उत्तर दिलें. बद्धाला जन्म कसा येतो. या श्रोत्यांच्या प्रश्र्णाला उत्तर मिळाले.    
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहांतनिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava  Dehanta Nirupan
समास आठवा देहान्त निरुपण 


Custom Search