Friday, August 25, 2017

Shri Ganesh Hruda श्रीगणेश हृदय


Shri Ganesh Hruday 
These re 21 names of God Ganesh from Mudagal Purana. These names are very pious. It is to be chanted for 21 times 21 days. to complete 1 one Mandal. there are people who compltes 21 such Mandals. All our troubles, difficulties vanishes and everything we want to is achieved by the blessings of God Ganesh.
श्रीगणेश हृदय 
ॐ श्री गणेशाय नमः । ॐ श्री एकदन्ताय नमः । 
ॐ श्री चिन्तामणये नमः ।  ॐ श्री विनायकाय नमः । 
 ॐ श्री ढुंढीराजाय नमः ।  ॐ श्री मयुरेशाय  नमः । 
 ॐ श्री लंबोदराय नमः ।  ॐ श्री गजाननाय नमः । 
 ॐ श्री हेरंबाय नमः ।  ॐ श्री वक्रतुंडाय नमः । 
 ॐ श्री जेष्ठराजाय नमः ।  ॐ श्री स्वानंदनाथाय नमः । 
 ॐ श्री आशा पुरकाय नमः ।  ॐ श्री वरदाय नमः । 
 ॐ श्री सर्वपुज्याय नमः ।  ॐ श्री विकटाय नमः । 
 ॐ श्री धरणीधराय नमः ।  ॐ श्री सिद्धिबुद्धिपतये नमः । 
 ॐ श्री ब्रह्मणेस्पतये नमः ।  ॐ श्री विघ्ननायकाय नमः ।
 ॐ श्री मांगलेशाय नमः । 
इती मुदगल्पुराणे शिव- गंगा संवादे गणेश हृदय संपूर्णम् ॥

गणेश हृदय
हे २१ नावांचे आहे. मुदगल् पुराणांत आठव्या खण्डांत आले आहे. हे गणेश हृदय भगवान शंकरांनी गंगामातेला सांगितलेलें आहे. ही सर्व नावें अतिशय पवित्र असून शुभ फलदायीं आहेत. रोज २१ वेळां असे २१ दिवस हे म्हणतात. हे एक मंडल होते.  
फलश्रुती श्री गणेशाच्या कृपेनें सर्व सांसारीक अडचणी, त्रास, संकटे यांचा नाश होतो. याशिवाय सांसारीक कमतरतांची पूर्तता होते.  
Shri Ganesh Hruda 
श्रीगणेश हृदय


Custom Search

Thursday, August 24, 2017

Samas Pachava DwaitKalpana Nirsan समास पांचवा द्वैतकल्पना निरसन


Dashak Satava Samas Pachava DwaitKalpana Nirsan 
Samas Pachava DwaitKalpana Nirsan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is describing Dwait and Adwait. Dwait means Maya. Adwait means Brhma. Sadhak knows that what he see is Maya and not real. He advances to the next step and knows that Brahma is real.
समास पांचवा द्वैतकल्पना निरसन 
श्रीराम ॥
केवळ ब्रह्म जें बोलिलें । तें अनुभवास आलें ।
आणी मायेचेंहि लागलें । अनुसंधान ॥ १ ॥
१) श्रोता म्हणाला कीं, मागे जे शुद्ध ब्रह्मस्वरुप सांगितलें, तें पूर्ण पटलें पण मायेचे जें अनुसंधान लागलें आहे तें कांहीं सुटत नाही.  
ब्रह्म अंतरी प्रकाशे । आणी मायाहि प्रत्यक्ष  दिसे ।
आतां हे द्वैत निरसे । कवनेपरी हो ॥ २ ॥
२) ब्रह्म हें अंतरंगांत प्रगटते व माया बाहेर इंद्रियांना प्रत्यक्ष दिसते. हे द्वैत कसें नाहींसे होईल. 
तरी आतां सावधान । येकाग्र करुनियां मन ।
माया ब्रह्म हें कवण । जाणताहे ॥ ३ ॥
३) हें ऐकून वक्ता म्हणाला कीं, आतां सावध होऊन व मन ऐकाग्र करुन असा विचार करावा कीं, माया आणी ब्रह्म यांना कोण जाणते? 
सत्य ब्रह्नाचा संकल्प । मिथ्या मायेचा विकल्प ।
ऐसिया द्वैताचा जल्प । मनचि करी ॥ ४ ॥ 
४) मनच संकल्प व विकल्प करतें. जेव्हां मनांत ब्रह्माची कल्पना येते तेव्हां ती खरी असते व तिला संकल्प म्हणतात. जेव्हां मन मायेची कल्पना करते तेव्हां ती खोटी असते व तीला विकल्प म्हणतात. या द्वैताचा घोटाळा मनच करते.   
जाणे ब्रह्म जाणे माया । ते येक जाणावी तुर्या ।
सर्व जाणे म्हणोनिया । सर्वसाक्षिणी ॥ ५ ॥
५) ब्रह्माचेहि ज्ञान व मायेचेहि ज्ञान हें तुर्या अवस्थें असते. दोन्हींही जाणते म्हणुन तीला सर्वसाक्षिणी म्हणतात.
ऐक तुर्येचें लक्षण । जेथें सर्व जाणपण ।
सर्वचि नाहीं कवण । जाणेल गा ॥ ६ ॥
६) जी सर्व कांहीं जाणते ती तुर्या अवस्था होय. हें लक्षांत ठेवावे. परंतु सर्वच जेथें नाहींसे झाले तेथे जाणावयास काय उरले?
संकल्पविकल्पाची सृष्टी । जाली मनाचिये पोटीं । 
तें मनचि मिथ्या सेवटीं । साक्षी कवणु ॥ ७ ॥
७) ज्या मनांतून संकल्पविकल्पामुळें सृष्टी निर्माण झाली. तें मनच शेवटीं खोटे ठरल्यावर साक्षीपणानें पाहायला कोणीच उरत नाही.
साक्षत्व चैतन्यत्व सत्ता । हे गुण ब्रह्माचिया माथां ।
आरोपलें जाण वृथा । मायागुणें ॥ ८ ॥
८) दृशाचा कोणताच गुण शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणीं नाहीं. साक्षित्व, चैतन्य व सत्ता हे गुण माया उगाचच ब्रह्माच्या माथीं मारते. ब्रह्मावर माया या गुणांचा आरोप करते. 
घटमठाचेनि गुणें । त्रिविधा आकाश बोलणें । 
मायेचेनि खरेंपणें । गुण ब्रह्मीं ॥ ९ ॥
९) आकाश खरें ऐकच आहे. पण घटाकाश म्हणजे भांड्यांतील आकाश, मठाकाश म्हणजे घरांतील आकाश व महद्आकाश म्हणजे विश्र्वांतील आकाश असे तीन भेद करतात. त्याचप्रमाणें माया खरी मानली म्हणजे ब्रह्मावर गुणांचा आरोप करतात. शुद्ध ब्रह्मांत हे गुण नाहीत.
जव खरेंपण मायेसी । तवचि साक्षत्व ब्रह्मासी ।
मायेअविद्येचे निरासीं । द्वैत कैचें ॥ १० ॥
१०) जोपर्यंत मायेचे खरेंपण वाटते, तोपर्यंत ब्रह्माला साक्षित्व असते. " मी साक्षीपणानें पहातों " असें द्वैत असते. पण माया व अविद्या या दोन्हीचें निरसन झालें म्हणजे मग द्वैत संपते  व त्याबरोबर साक्षित्व ही विलीन होते.
म्हणोनि सर्वसाक्षी मन । तेंचि जालिया उन्मन ।
मग तुर्यातरुप ज्ञान । मावळोन गेलें ॥ ११ ॥
११) मनच व्यापक होता होता सर्वसाक्षी बनतें. तें जेव्हां उन्मन होते तेव्हां तुर्या अवस्था संपते. व त्याबरोबर मी सर्व जाणतो हें ज्ञान देखील मावळून जाते. 
जयास  द्वैत भासलें । तें मन उन्मन जालें ।
द्वैताअद्वैताचें तुटलें । अनुसंधान ॥ १२ ॥
१२) ज्या मनाला द्वैताचा अनुभव येतो, तेंच मन उन्मन झालें कीं द्वैत नाहीसें होऊन अद्वैत उरते. मग द्वैत व अद्वैताचे चिंतन देखील आपोआप थांबते.  
येवं द्वैत आणी अद्वैत । होये वृत्तीचा संकेत ।
वृत्ती जालिया निवृत्त । द्वैत कैंचें ॥ १३ ॥
१३) द्वैत व अद्वैत हा भेद प्रतीत होणें हीं वृत्तीची खूण आहे. ही वृत्तीच नाहीशीं झाल्यावर मग द्वैत उरत नाही. 
वृत्तीरहित जें ज्ञान । तेंचि पूर्ण समाधान ।
जेथें तुटे अनुसंधान । मायाब्रह्मीचें ॥ १४ ॥
१४) ज्या ज्ञानामध्यें वृत्तील जागाच नाहीं, तेंच खरें ब्रह्मज्ञान होय. तेथेंच पूर्ण समाधान होते. मग या ज्ञानामुळेंच माया व ब्रह्म यांचे चिंतन संपते.   
मायाब्रह्म ऐसा हेत । मनेंत्त कल्पिला संकेत ।
ब्रह्म कल्पनेरहित । जाणती ज्ञानी ॥ १५ ॥
१५) दृश्य मायामय व शुद्ध ब्रह्म शाश्वत अशी कल्पना करुन मन खुणेंने दोन्हींचे अस्तित्व मानते. पण ब्रह्म कल्पनेरहित आहे हे ज्ञानी जाणतात. 
जें मनबुद्धि अगोचर । जें कल्पनेंहून पर ।
तें अनुभवितां साचार । द्वैत कैंचें ॥ १६ ॥
१६) शुद्ध ब्रह्म हें मन व बुद्धीयांच्या आटोक्याबाहेर आहे. ते कल्पनेपलिकडे आहे. त्या ब्रह्माचा साक्षात अनुभव घेतला म्ग द्वैत कुठलें.  
द्वैत पाहातां ब्रह्म नसे । ब्रह्म पाहातां द्वैत नासे ।
द्वैताद्वैत भासे । कल्पनेसी ॥ १७ ॥
१७) द्वैताचे भान असेपर्यंत ब्रह्माचा अनुभव येत नाही.  आणि ब्रह्माचा अनुभव आला कीं, द्वैत उरत नाही.  द्वैत व अद्वैत या कल्पना आहेत त्यांचा मनाला भास होतो. 
कल्पना माया निवारी । कल्पना ब्रह्म थावरी ।
संशय धरी आणी वारी । तेहि कल्पना ॥ १८ ॥
१८) कल्पना मायेचे निवारण करते. कल्पनाच ब्रह्माची स्थापना करते. कल्पनाच संशय निर्माण करते व कल्पनाच तो संशय नाहींसा करते. 
कल्पना करी बंधन । कल्पना दे समाधान ।
ब्रह्मीं लावी अनुसंधान । तेहि कल्पना ॥ १९ ॥
१९) कल्पना बंधन निर्माण करते. कल्पना समाधान देते. कल्पनाच शुद्ध ब्रह्माचें चिंतनाची शिकवण देते.  
कल्पना द्वैताची माता । कल्पना ज्ञेप्ती तत्वता ।
बद्धता आणी मुक्तता । कल्पनागुणें ॥ २० ॥
२०) कल्पना द्वैत निर्माण करते. खरोखर पाहीलें तर कल्पनाच ज्ञान आहे. मी बद्ध आहे व मी मुक्त आहे या अवस्था   
कल्पना अंतरी सबळ । नस्ते दावी ब्रह्मगोळ ।
क्षणभर येकातें निर्मळ । स्वरुप कल्पी ॥ २१ ॥
२१) आपल्या अंतर्यामी वास करणारी कल्पना जर सबळ असेल, जर ती देहबुद्धीला व अविद्येला धरुन असेल तर मुळांत नसलेले विश्र्व अनुभवास येते. तीच कल्पना एकांतात बसून निर्मळ केली तर दृश्य विरहित निर्मळ स्वरुप अनुभवास आणून देते.    
क्षणा येका धोका वाहे । क्षणा येका स्थिर राहे ।
क्षणा येका पाहे । विस्मित होउनी ॥ २२ ॥
२२) कल्पना संकटाची आठवण करुन काळजी उत्पन्न करील तर लगेच तें विसरुन मन स्थिर करील व पुढच्याच क्षणीं आश्र्चर्य करुं लागेल. 
क्षणा येकातें उमजे । क्षणा येकातें निर्बुजे ।
नाना विकार करिजे । ते कल्पना जाणावी ॥ २३ ॥
२३) एखाद्या क्षणीं कल्पनेला सर्व स्वच्छ ज्ञान असते. पण दुसर्‍या क्षणीं त्याच्या उलट अज्ञान दाखवते. अशारीतीनें वृत्तीचे नाना प्रकार उत्पन्न करते ती कल्पना जाणावी.  
कल्पना जन्माचें मूळ । कल्पना भक्तीचें फळ ।
कल्पना तेचि केवळ । मोक्षदाती ॥ २४ ॥
२४) ही कल्पना आपल्या जन्माचे मूळ कारण आहे. भक्तीचें फळ देणारी कल्पनाच. आणि शेवटी मोक्ष देणारीही कल्पनाच आहे.  
असो ऐसी हे कल्पना । साधनें दे समाधाना ।
येरवी हे पतना । मूळच कीं ॥ २५ ॥
२५) असो अशी ही कल्पना परमार्थ साधनेंत अडकविली तर समाधान देते. तसें केलें नाहीं तर माणसाचें अधःपतन करते.
म्हणौन सर्वाचें मूळ । ते हे कल्पनाच केवळ ।
इचें केलियां निर्मूळ । ब्रह्मप्राप्ती ॥ २६ ॥
२६) म्हणून या विश्वरचनेंचे मूळ असलेली कल्पना मूळासकट उपटून टाकीली तर ब्रह्मप्राप्तीला वेळ लागत नाही. 
श्रवण आणी मनन । निजध्यासें समाधान ।
मिथ्या कल्पनेचें भान । उडोन जाये ॥ २७ ॥
२७) श्रवण, मनन व निदिध्यास या साधनामार्गानें गेलें असतां आत्मसाक्षात्कार होऊन खात्रीनें समाधान लाभतें. या साधनेनें दृश्यांत अडकलेल्या खोट्या कल्पनेचे भान साफ उडून जाते.
शुद्ध ब्रह्माचा निश्र्चयो । करी कल्पनेचा जयो ।
निश्र्चितार्थें संशयो । तुटोन गेला ॥ २८ ॥
२८) शुद्ध ब्रह्मस्वरुपाचा अनुभव येऊन प्रज्ञा स्थिर झाली कीं, कल्पना नाहीशीं होते. ब्रह्मज्ञानानेम मनामध्ये स्वस्वरुपाचा निश्र्चय झाला कीं, देहबुद्धीचें सर्व संशय नष्ट होतात.   
मिथ्या कल्पनेचें कोडें । कैसें राहे साचापुढें ।
जैसें सूर्याचेनि उजेडें । नासे तम ॥ २९ ॥
२९) सूर्याच्या प्रकाशापुढें अंधार टिकत नाही. त्याच प्रमाणेम खर्‍या शुद्ध ब्रह्मस्वरुपापुढें खोट्या कल्पनेचे कोडे टिकत नाही.   
तैसें ज्ञानाचेनि प्रकाशें । मिथ्या कल्पना हे नासे ।
मग हें तुटे अपैसें । द्वैतानुसंधान ॥ ३० ॥
३०) ब्रह्मज्ञानच्या प्रकाशानें खोटी कल्पना नाश पावतें. मग द्वैताचे भान व चिंतन आपोआप नाहींसे होते. 
कल्पनेनें कल्पना उडे । जैसा मृगें मृग सांपडे ।
कां शरें शर आतुडे । आकाशमार्गीं ॥ ३१ ॥
३१) ज्याप्रमाणें हरणाचा उपयोग करुन हरीण पकडावे, बाणानेंच आकाशमार्गे येणारा बाण तोडावा, तसेच कल्पनेनेंच कल्पना नाहींशी करावी.   
शुद्ध कल्पनेचें बळ । जालियां नासे सबळ ।
हेंचि वचन प्रांजळ । सावध ऐका ॥ ३२ ॥
३२) कल्पना शुद्ध केली तर तीच्या अंगी मोठें सामर्थ्य निर्माण होते. त्यानें शबल किंवा अशुद्ध कल्पना नाहींशी करता येते. हे अधिक स्पष्ट सांगतो. ते ऐका. 
शुद्ध कल्पनेची खूण । स्वयें कल्पिजे निर्गुण ।
सस्वरुपीं विस्मरण । पडोंचि नेदी ॥ ३३ ॥
३३) कल्पना शुद्ध असण्याची खूण म्हणजे ती स्वतः निर्गुणरुपांत स्थिर असते. स्वस्वरुपाचे विस्मरण ती कधीही होऊ देत नाही.  
सदा स्वरुपानुसंधान । करी द्वैताचे निर्शन ।
अद्वयनिश्र्चयाचें ज्ञान । तेचि शुद्ध कल्पना ॥ ३४ ॥
३४) सदैव स्वस्वरुपीं लीन, द्वैत दृश्याचे संपूर्ण विस्मरण, आणि अद्वितीय ब्रह्माचें साक्षात् ज्ञान या तीन गोष्टीं जेथें आढळतात,  तेथें शुद्ध कल्पना आहे असें खात्रीनें समजावें. 
अद्वैत कल्पी ते शुद्ध । द्वैत कल्पी ते अशुद्ध ।
अशुद्ध तेचि प्रसिद्ध । सबळ जाणावी ॥ ३५ ॥
३५) जी कल्पना अद्वैतांतच रममाण होते, ती शुद्ध व जी कल्पना द्वैतांतच रमते ती अशुद्ध होय. अशुद्ध कल्पनेला शबल कल्पना म्हणतात. 
शुद्ध कल्पनेचा अर्थ । अद्वैताचा निश्र्चितार्थ ।
आणी सबळ वेर्थ । द्वैत कल्पी ॥ ३६ ॥
३६) एकच एक ब्रह्म सत्य आहे असा निश्र्चय होणें हा शुद्ध कल्पनेचा अर्थ आहे. अशुद्ध कल्पना मात्र द्वैताची कल्पना करीत राहाते.  
अद्वैतकल्पना प्रकाशे । तेचि क्षणीं द्वैत नासे ।
द्वैतासरिसी निरसे । सबळ कल्पना ॥ ३७ ॥
३७) अद्वैत कल्पनेचा प्रकाश पडला की त्याच क्षणीं द्वैताचा नाश होतो. आणि द्वैताबरोबरच शबल (अशद्ध) कल्पना पण नाहीशी होते.    
कल्पनेनें कल्पना सरे । ऐसी जाणावी चतुरें ।
सबळ गेलियां नंतरें । शुद्ध उरली ॥ ३८ ॥
३८) शुद्ध कल्पनेने अशुद्ध कल्पना नाहीशीं करता येते हें चतुर लोकांनी समजुन घ्यावें. एकदा अशुद्ध कल्पना गेली कीं शुद्ध कल्पनाच उरते.
शुद्ध कल्पनेचे रुप । तेंचि जें कल्पी स्वरुप ।
स्वरुप कल्पितां तद्रूप । होये आपण ॥ ३९ ॥   
३९) शुद्ध कल्पना ज्याची कल्पना करतें तेच आपले स्वस्वरुप होय. त्या स्वरुपाची कल्पना करुं लागले की आपण तद्रुपच होतो.         
कल्पनेसी मिथ्यत्व आलें । सहजचि तद्रूप जालें । 
आत्मनिश्र्चयें नासिलें । कल्पनेसी ॥ ४० ॥
४०) स्वस्वरुपाशीं तद्रुप झाले म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो. आत्मस्वरुपाखेरीज इतर कांहीं सत्य नाहीं असा निश्र्चय झाला म्हणजे कल्पना नाहींशी होते. 
जेचि क्षणीं निश्र्चये चळे । तेचि क्षणीं द्वैत उफळे ।
जैसा अस्तमानीं प्रबळे । अंधकार ॥ ४१ ॥
४१) ज्याक्षणीं तद्रुपतेला धक्का बसून आत्मनिश्र्चय डळमळतो, त्याच क्षणीं द्वैतमय दृश्य उफाळून वर येते. ज्याप्रमाणें सूर्य अस्ताला जाऊं लागला जोरानें पसरुं लागतो. 
तैसें ज्ञान होतां मळिण । अज्ञान प्रबळे जाण ।
याकारणें श्रवण । अखंड असावें ॥ ४२ ॥
४२) त्याचप्रमाणे आत्मज्ञान मलिन झालें कीं अज्ञानाचा जोर वाढतो. हें टाळण्यासाठीं अखंडपणें श्रवण करीत जावें.
आतां असो हें बोलणें जालें । आशंका फेडू येका बोले ।
जयास द्वैत भसलें । तें तूं नव्हेसी सर्वथा ॥ ४३ ॥ 
४३) आतां हें बोलणें पुरे झाले. यानंतर एकाच वाक्यानें शंका निरसन करुं. ज्या कल्पनारुप मनाला हें द्वैतमय दृश्य अनुभवास येतें तें मन तुझें खरें स्वरुप मुळींच नाही. खरा तूं त्या पलीकडे आहेस.
मागील आशंका फिटली । इतुकेन हे कथा संपली ।
पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ४४ ॥
४४) मागील शंका निरसन झाली. म्हणून हा चालू विषय संपला. पुढील विषय ऐकण्यासाठीं श्रोत्यांनी मनाची एकाग्रता करावी.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वैतकल्पनानिर्शननाम समास पांचवा ॥
Samas Pachava DwaitKalpana Nirsan
समास पांचवा द्वैतकल्पना निरसन 



Custom Search

Monday, August 21, 2017

Samas Chavatha VimalBrahma Nirupan समास चवथा विमलब्रह्म निरुपण


Dashak Satava Samas Chavatha VimalBrahma Nirupan 
Samas Chavatha VimalBrahma Nirupan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is describing VimalBrahma. Vimal means Shudha Brahma, it is everywhere but we can’t see it nor experience it because we are engulfed by Maya.
समास चवथा विमलब्रह्म निरुपण
श्रीराम ॥
ब्रह्म नभाहून निर्मळ । पाहातां तैसेंचि पोकळ ।
अरुप आणी विशाळ । मर्यादेवेगळें ॥ १ ॥
१) ब्रह्म आकाशाहून मलरहित आहे. पाहायाला गेलो तर तें आकाशासारखें पोकळ, कोणतेंही रुप नसलेले आणि मर्यादा नसलेले असे विशाळ आहे.  
येकविस स्वर्गे सप्त पाताळ । मिळोन एक ब्रह्मगोळ ।
ऐसीं अनंत तें निर्मळ । व्यापून असे ॥ २ ॥
२) एकवीस स्वर्ग व सात पाताळ मिळून एक ब्रह्मगोल होतो. अशा अनेक ब्रह्मगोलांना या निर्मळ ब्रह्मानें व्यापून टाकले आहे.  
अनंत ब्रह्मांडांखालतें । अनंत ब्रह्मांडांवरुतें ।
तेणेंविण स्थळ रितें । अणुमात्र नाहीं ॥ ३ ॥
३) अनंत ब्रह्मांडांच्या वर आणी अनंत ब्रह्मांडांच्या खालीं जिकडे तिकडे ब्रह्म पसरले आहे. जेथें ब्रह्म नाही अशी कोठेही रीकामी जागा नाही.     
जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं । ऐसी वदे लोकवाणी ।
तेणेंविण रिता प्राणी । येकहि नाहीं ॥ ४ ॥
४) लोक म्हणतात कीं, जळीं, स्थळीं, काष्ठीं व पाषाणी ब्रह्म व्यापून आहे. ब्रह्म नाहीं असा एकही प्राणी नाही.
जळचरांस जैसें जळ । बाह्याभ्यांतरीं निखळ ।
तैसें ब्रह्म हें केवळ । जीवमात्रांसी ॥ ५ ॥
५) समुद्रामधें जळचरांना पाणी जसें आंत बाहेर व्यापून असते, त्याचप्रमाणें सर्व जीवांना ब्रह्म हें आंतबाहेर व्यापून आहे.  
जळावेगळा ठाव आहे । ब्रह्माबाहेरी जातां नये ।
म्हणौनि उपमा न साहे । जळाची तया ॥ ६ ॥
६) पाण्याची उपमा ब्रह्माला देता येत नाही कारण पाण्याला मर्यादा आहे. ते संपले की जमीन असते. पण ब्रह्माचे तसे नाही. ब्रह्म कोठेंच संपत नाही. ब्रह्माला ओलांडून पलीकडे जाता येत नाही.
आकाशाबाहेरी पळों जातां । पुढें आकाशचि तत्वता ।
तैसें तयां अनंता । अंतचि नाहीं ॥ ७ ॥
७) आकाशाच्या पलीकडे जावें असे कोणाला वाटलें व तो पळत निघाला तरी तो जिकडे जाईल तिकडे त्याच्यापुढें त्याला आकाश दिसते. त्याचप्रमाणें अनंत ब्रह्माला कोठे अंतच नाही.  
परी जें अखंड भेटलें । सर्वांगास लिगटलें ।
अति निकट परी चोरलें । सकळांसि जें ॥ ८ ॥
८) जन्मापासूनच तें आपल्या अंगाला चिकटलेले आहे. इतकें जवळ असूनही तें सर्वांच्यापासून लपून राहीलेले आहे.   
तयामधेंचि असिजे । परी तयास नेणिजे ।
उमजे भास नुमजे । परब्रह्म तें ॥ ९ ॥
९) आपण सर्व त्या ब्रह्मांतच असतो. पण त्यामधें आहोत याची जाणीव आपल्याला नसते. भ्रमानें निर्माण होणारा भास समजतो पण ज्याच्यामुळें हा भास निर्माण होतो ते ब्रह्म समजत नाही.  
आकाशामधें आभाळ । तेणें आकाश वाटे डहुळ ।
परी तें मिथ्या निवळ । आकाशचि असे ॥ १० ॥
१०) आकाशांत ढग येतात त्यामुळें तें मलिन झाल्यासारखे वाटते. पण ढगांमुळें आलेला मलिनपणा आकाशाला चिकटत नाही. ढग गेल्यावर आकाश परत जसें तसेंच असते व दिसते. तसाच संबंध ब्रह्म व विश्र्व यामधें आहे.   
नेहार देतां आकाशीं । चक्रें दिसती डोळ्यांसी ।
तैसे दृश्य ज्ञानियांसी । मिथ्यारुप ॥ ११ ॥
११) आकाशाकडे सारखें टक लावून पाहिलें तर डोळ्यापुढें प्रकाशाची चक्रें दिसतात. तीं कांहीं खरी नसतात. त्याचप्रमाणें अज्ञानी माणसांच्या अनुभवाला येणारे दृश्यविश्र्व ज्ञानी पुरुषांना त्यांच्या अनुभवानें खोटेपणाने प्रतीत होते.   
मिथ्याचि परी आभासे । निद्रिस्तांस स्वप्न जैसें ।
जाग जालियां अपैसें । बुझों लागे ॥ १२ ॥
१२) दृश्य खोटें म्हटलें तरी इंद्रियांना ते दिसते. पण माणसाला झोपेंत स्वप्न पडते. झोपेंत त्या स्वप्नांतील सर्व त्याला खरेच वाटते. पन जागें झाल्यावर स्वप्न व ती दृश्यें खरी नाहीत, नव्हती हें त्याला समजते.  
तैसें आपुलेन अनुभवें । ज्ञानें जागृतीसि यावें ।
मग माईक स्वभावें । कळों लागे ॥ १३ ॥
१३) ह्याचप्रमाणें जो स्वस्वरुपाचा अनुभव घेतो त्यास आत्मज्ञान होते. त्या ज्ञानाने त्याची अज्ञानरुपी नीद्रा जाते. मग त्याला दृश्य विश्र्व खरें नसून माईक आहे. हे कळूं लागते.  
आतां असो हें कुवाडें । जे ब्रह्मांडापैलिकडे । 
तेंचि आतां निवाडें । उमजोन दाऊं ॥ १४ ॥
१४) आतां ही गहन व दुर्बोध भाषा पुरे. ब्रह्मांडाला व्यापून उरणारे जें परब्रह्म तें उमजेल असें सांगतो.  
ब्रह्म ब्रह्मांडीं कालवलें । पदार्थासी व्यापून ठेलें ।
सर्वांमधें विस्तारलें । अंशमात्रें ॥ १५ ॥
१५) ब्रह्म ब्रह्मांडांमधे कालवलेले आहे. सर्व पदार्थांस व्यापून आहे. सर्वांत पसरलेले असले तरी तो पसारा अंशमात्रेंच आहे.
ब्रह्मामधें सृष्टी भासे । सृष्टीमधें ब्रह्म असे ।
अनुभव घेतां आभासे । अंशमात्रें ॥ १६ ॥
१६) त्या ब्रह्मांत सर्व विश्र्व मावते. तसेंच सर्व विश्र्वांतही ते व्यापून आहे. मात्र त्याचा अनुभव घ्यावा तर तें अंशमात्रेच आहे. असा अनुभव येतो.   
अंशमात्रे सृष्टीभीतरीं । बाहेरी मर्यादा कोण करी ।
सगळें ब्रह्म ब्रह्मांडोदरी । माईल कैसें ॥ १७ ॥
१७) या अवाढव्य विश्र्वामधें ब्रह्म जर अल्प अंशमात्रेच आहे. तर विश्र्वाच्याबाहेर तें किती आहे ह्याचे मोजमाप कोण करेल? तें अपरंपार, अनंत ब्रह्म एवढ्याशा विश्वांच्या पोटांत मावेलच कसें. 
अमृतीमधें आकाश । सगळें सांठवतां प्रयास ।
म्हणौन तयाचा अंश । बोलिजेतो ॥ १८ ॥
१८) देवाचें तीर्थ ठेवण्याच्या छोट्या चंबूमध्यें सगळें आकाश साठवण्याचा प्रयत्न वाया जातो. तसें करतां येत नाही. त्याचप्रमाणें विश्र्वामधें संपूर्ण ब्रह्म सामावून घेण्याचा प्रयत्न व्यर्थ जातो. म्हणून विश्र्वामध्यें ब्रह्माचा अंश व्यापून आहे असे म्हणालो.   
ब्रह्म तैसें कालवलें । परी तें नाहीं हालवलें ।
सर्वांमधें परी संचले । संचलेपणें ॥ १९ ॥
१९) सर्व पदार्थांत ब्रह्म मिसळले आहे. तें अखंड स्थिर आहे. तें कधीं हललेच नाही. तें इतके घट्टपणें सांचलेले आहे की त्यास हलणें शक्य नाही.  
पंचभूतीं असे मिश्रित । परंतु तें पंचभूतातीत ।
पंकीं आकाश अलिप्त । असोनि जैसें ॥ २० ॥
२०) पंचभूतामध्यें तें मिसळले आहे. पण त्यांना चिकटलेलें नाही. जसेंकी चिखलामध्यें आकाश दिसते पण आकाशाला चिखल चिकटत नाही. 
ब्रह्मास दृष्टांत न घडे । बुझावया देणें घडे ।
परी दृष्टांतीं साहित्य पडे । विचारितां आकाश ॥ २१ ॥
२१) ब्रह्म कसे आहे हे सांगण्यास कोणताही दृष्तांत योग्य वाटत नाही. परंतु तें कसें आहे याची थोडी कल्पना येण्यासाठीं दृश्य विश्र्वांतील दृष्टांत द्यावा लागतो. त्यासाठीं वाङ्मयाची मदत घ्यावी लागते. त्या दृष्टीनें विचार करता आकाशाचा दृष्टांत देऊन ब्रह्मस्वरुप सांगण्याचा प्रयत्न करावा लागतो.   
खंब्रह्म ऐसी श्रुती । गगनसदृशं हे स्मृती । 
म्हणौनि ब्रह्मास दृष्टांतीं । आकाश घडे ॥ २२ ॥
२२) खंब्रह्म म्हणजे आकाश हे ब्रह्म असें श्रुति सांगते. श्रुतिनें तसे सांगितल्यानें ब्रह्माला आकाशाचा दृष्टांत देतात. 
काळिमा नस्तां पितळ । मग तें सोनेंचि केवळ ।
सुन्यत्व नस्तां निवळ । आकाश ब्रह्म ॥ २३ ॥
२३) पितळाच्या पिवळेपणांत किंचीत काळसरपणा नसतां तर तें पितळ नसून सोनेंच आहे असे म्हटले असते. तसेंच आकाश हें ब्रह्मासारखेंच सूक्ष्म व विशाळ आहे. पण आकाशांत शून्यत्व असतें तेंच ब्रह्मामध्यें नसते. नाहींतर आकाश ब्रह्मस्वरुपच झालें असते.   
म्हणौनि ब्रह्म जैसें गगन । आणि माया जैसा पवन ।
आडळे परी दर्शन । नव्हे त्याचें ॥ २४ ॥
२४) ब्रह्म आकाशासारखें आहे व माया वायुसारखी आहे असे म्हणतात. वायु आहे पण तो प्रत्यक्ष दिसत नाही. त्याचप्रमाणे मायेचा प्रभाव दिसतो पण माया दिसत नाही. 
शब्दसृष्टीची रचना । होत जात क्षणक्षणा ।
परंतु ते स्थिरावेना । वायुच ऐसी ॥ २५ ॥
२५) शब्दसृष्टींत सारखी रचना बदलत असते. कारण लोक सारखें शब्द बोलत असतात. पण ही शब्दसृष्टी अशाश्वत असते. वायुला जशी स्थिरता नसते तशीच शब्दसृष्टीला पण स्थिरता नसते.  
असो ऐसी माया माईक । शाश्वत तें ब्रह्म येक ।
पाहों जातां अनेक । व्यापून आहे ॥ २६ ॥
२६) मायासुद्धा अशीच अस्थिर व अशाश्वत असते. फक्त ब्रह्म तेवढें शाश्वत आहे. एकच ब्रह्म अनेकांना व्यापून आहे असे सूक्ष्म दृष्टीनें पाहातां आढळतें. 
पृथ्वीसी भेदून आहे । परी तें ब्रह्म कठीण नव्हे ।
दुजी उपमा न साहे । तया मृदत्वासी ॥ २७ ॥
२७) जड पृथ्वीला भेदून तिच्यात राहणारे ब्रह्म पृथ्वीसारखें जड नाही. किंबहुना तें इतकें सूक्ष्म आहे कीं त्याच्या इतकें सूक्ष्म अजुन कांहींच नाही.  
पृथ्वीहूनि मृद जळ । जळाहूनि तो अनळ ।
अनळाहूनि कोमळ । वायो जाणावा ॥ २८ ॥
२८) पृथ्वीपेक्षां सूक्ष्म पाणी असते. पाण्यापेक्षां तेज सूक्ष्म असते. तेजाापेक्षां वायु सूक्ष्म असतो.
वायोहूनि तें गगन । अत्यंतचि मृद जाण ।
गगनाहून मृद पूर्ण । ब्रह्म जाणावें ॥ २९ ॥
२९) वायुपेक्षा आकाश अत्यंत सूक्ष्म असते. आणि आकाशाहून ब्रह्म सूक्ष्म असते. या सूक्ष्म ब्रह्मास पाहण्यास जीवही अती सूक्ष्म व्हावा लागतो. त्यावेळीं त्याला ब्रह्मस्वरुपाचा अनुभव होण्याची पात्रता येते.
वज्रास असे भेदिलें । परी मृदत्व नाहीं गेलें ।
उपमेरहित संचलें । कठिण ना मृद ॥ ३० ॥
३०) वज्र अति कठीण पण त्यासही ब्रह्म भेदून जाते. तरीही ब्रह्माचे सूक्ष्मपण कमी होत नाही. खरें म्हणजे ब्रह्माला उपमा देता येत नाही. तें जड किंवा सूक्ष्म नसून सर्व ठिकाणीं भरलेले आहे.   
पृथ्वीमधें व्यापून असे । पृथ्वी नासे तें न नासे ।
जळ शोषे तें न शोषे । जळीं असोनी ॥ ३१ ॥
३१) ब्रह्म पृथ्वीला आंतून बाहेरुन व्यापून आहे. परंतु पृथ्वीचा नाश झाला तरी त्याला नाश नाही. ब्रह्म पाण्याला व्यापून आहे. पण पाणी शोषलें जाते, नाश पावते. पण ब्रह्म शोषलेही जात नाही व त्याचा नाशपण होत नाही.
तेजीं असे परी जळेना । पवनीं असे परी चळेना ।
गगनीं असे परी कळेना । परब्रह्म तें ॥ ३२ ॥
३२) ब्रह्म तेजाला व्यापून असते. पण तेजानें तें जळत नाही. ब्रह्म वायूला व्यापून असते. पण वायूसारखें तें चळत नाही. ब्रह्म आकाश व्यापून असते पण तें आपल्याला कळत नाही.  
शेरीर अवघें व्यापलें । परी तें नाहीं आडळलें ।            जवळिच दुरावलें । नवल कैसें ॥ ३३ ॥
३३) आपल्या सर्व शरीरभर ब्रह्म त्याला व्यापून आहे. परंतु तें आपल्याला आढळत नाही. तें इतकें जवळ असून फार दूर झाले हें नवलच आहे.    
सन्मुखचि चहुंकडे । तयामधें पाहाणें घडे ।
बाह्याभ्यांतरीं रोकडें । सिद्धचि आहे ॥ ३४ ॥
३४) सगळीकडे चारी दिशांना ब्रह्म समोरच असते. आपले पाहाणे व इतर सर्व गोष्टी ब्रह्मांतच घडतात. आंतून व बाहेरुन व्यापून असलेले ब्रह्म स्वयंसिद्ध आहे.  
तयामधेंचि आपण । आपण सबाह्य तें जाण ।
दृशावेगळी खूण । गगनासारिखी ॥ ३५ ॥
३५) आपण ब्रह्मामधेंच जगतों व राहातों. आपल्या आंत बाहेर तेंच आहे. अवकाशांतील सर्व दृश्य विलीन केल्यावर जें केवळ निव्वळ आकाश उरतें तसें ब्रह्म आहे. हे खूणेनेच समजावे.  
कांहीं नाहींसें वाटलें । तेथेंचि तें कोंदाटलें ।
जैसें न दिसे आपलें । आपणासि धन ॥ ३६ ॥   
३६) इथें कांहीं नाही असे जेथें वाटते तेथेंच ब्रह्म पुष्कळ भरलेले असते. आपण स्वतः बाजूला ठेवलेले धन आपल्याला दिसत नाही. तसेंच ब्रह्माच्या बाबतींत घडून येते.    
जो जो पदार्थ दृष्टी पडे । तें त्या पदार्था ऐलिकडे ।
अनुभवें हें कुवाडें । उकलावें ॥ ३७ ॥
३७) जी जी गोष्ट आपण पाहातों ती दृष्टीस पडण्या आधी मध्यें ब्रह्म असते. स्थूल दृष्टीस ब्रह्म न दिसणारे असल्यानें स्वरुपानुभावेंच तें कोडे उलगडून घ्यावें 
मागें पुढें आकाश । पदार्थेंविण जो पैस ।
पृथ्वीविण भकास । येकरुप ॥ ३८ ॥
३८) सर्व पदार्थांना आकाश मागेंपुढें व्यापून असते. सर्व पदार्थ समजा नाहींसे झालें तरी अवका उरेल. त्यांतच पृथ्वीही नाहीशी झाली तर सगळीकडे ओसाड पोकळी दिसेल.  
जें जें रुप आणी नाम । तो तो नाथिलाच भ्रम ।
नामरुपातीत वर्म । अनुभवी जाणे ॥ ३९ ॥
३९) इंद्रियांना दिसणारा नामरुपांचा आकार मुळांतच नसणारा भ्रम आहे. नामरुपांच्या पलीकडे असलेले ब्रह्मरुप रहस्य साक्षात्कारीच जाणतात. 
नभीं धूम्राचे डोंगर । उचलती थोर थोर ।
तैसें दावी वोडंबर । माया देवी ॥ ४० ॥
४०) आकाशामध्यें मोठमोठे धुराचे डोंगर दिसतात. पण तें सगळें तात्पुरतें असतात. आकाशाला त्यांचा स्पर्श होत नाही. त्याचप्रमाणें शुद्ध ब्रह्मांमधें मायेने विश्र्वाचे अवडंबर आढळतें.
ऐसी माय अशाश्वत । ब्रह्म जाणावें शाश्वत ।
सर्वां ठाईं सदोदित । भरलें असे ॥ ४१ ॥
४१) अशा रीतीनें माया अशाश्वत असून ब्रह्म मात्र शाश्वत आहे. ते सर्वत्र सर्व ठिकांणी कायम भरलेलें आहे.  
पोथी वाचूं जातां पाहे । मातृकांमधेंचि आहे ।
नेत्रीं निघोनि राहे । मृदपणें ॥ ४२ ॥
४२) ग्रंथ, पोथी वाचीत असतां ब्रह्मच वाचत असतें. अक्षरांतील कानामात्रांमधें तेंच असते. सूक्ष्मपणें डोळ्यांत राहून पाहण्याची क्रिया तेंच करतें. 
श्रवणें शब्द ऐकतां । मनें विचार पाहातां । 
मना सबाह्य तत्वता । परब्रह्म तें ॥ ४३ ॥
४३) कानानें शब्द ऐकतां, मनानें विचार करीत असतां, मनाच्या आंतबाहेर खरोखर ब्रह्मच असतें.  
चरणें चालतां मार्गीं । जें आडळे सर्वांगीं ।
करें घेतां वस्तुलागीं । आडवें ब्रह्म ॥ ४४ ॥
४४) पायांनी वाट चालत असतां ब्रह्म सर्व शरीरांत व्यापून असते. हातांनीं वस्तु घेत असतां त्या वस्तुला व्यापून ब्रह्मच येतें.
असो इंद्रियेंसमुदाव । तयामधें वर्ते सर्व । 
जाणों जातां मोडे हांव । इंद्रियांची ॥ ४५ ॥
४५) आपल्या सर्व इंद्रियांना आंतबाहेर ब्रह्मच व्यापून आहे. त्यामध्यें इंद्रियांची सर्व कामें होत असतात. परंतु इंद्रियांनी ते जाणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा हव्यास मोडून जातो. ब्रह्म अतिद्रिय असल्यानें इंद्रियांची गति खुंटते.  
तें जवळिच असे । पाहों जातां न दिसे ।
न दिसोन वसे । कांहीं येक ॥ ४६ ॥
४६) ब्रह्म आपल्या अगदीं जवळच आहे. परंतु तें पहावें म्हटलें तर दिसत नाही. तरी न दिसतासुद्धा त्याच्या असण्यांत फरक पडत नाही. तें असतेंच 
जें अनुभवेंचि जाणावें । सृष्टीचेनि अभावें ।
आपुलेन स्वानुभवें । पाविजे ब्रह्म ॥ ४७ ॥
४७) प्रथम हें सारें दृश्य विश्र्व मनांतून नाहीसें झालें पाहिजे. आपल्या देहासकट सर्व दृश्य सृष्टी सत्य नाहीं अशी खात्री झाली म्हणजे ब्रह्माचा अनुभव येण्याची पात्रता अंगीं येते. त्यानंतर ब्रह्माचा साक्षात्कार होतो व जीव ब्रह्मरुप होऊन जातो. 
ज्ञानदृष्टीचें देखणें । चर्मदृष्टी पाहो नेणे ।
अंतरवृत्तीचिये खुणे । अंतरवृत्ती साक्ष ॥ ४८ ॥
४८) ज्ञानदृष्टीनेंच ब्रह्म जाणता येते. त्याला जाणण्यासाठीं आपली स्थूल दृष्टी उपयोगी पडत नाही. अंतरंगांत वृत्ती अत्यंत सूक्ष्म बनणें ही ज्ञानदृष्टीची खूण आहे. आणि हे ज्याचे त्यालाच अंतरंगांत समजते.    
जाणे ब्रह्म जाणे माया । जाणे अनुभवाच्या ठाया ।
ते येक जाणावी तुर्या । सर्वसाक्षिणी ॥ ४९ ॥
४९) जागृती, स्वप्न व सुषुप्ति या तीन अज्ञानवृत्तीच्या अवस्था आहेत.  चवथी अवस्था तुर्या ही ज्ञानवृत्तीची अवस्था आहे. तुर्या अवस्थेंमध्यें एकीकडे ब्रह्माचे भान असते तर दुसरीकडे दृश्य विश्र्वाचे देखील भान असते. स्वानुभव येण्यासाठीं वृत्ति कोठें ठेववी हें तुर्येमधें बरोबर समजते. ती सर्वसाक्षीणी अवस्था आहे. 
साक्षत्व वृत्तीचें कारण । उन्मनी ते निवृत्ति जाण ।
जेथें विरे जाणपण । विज्ञान तें ॥ ५० ॥
५०) " मी आत्मा सर्व दृश्याच्या अतीत आहें, मी केवळ त्याचा साक्षी आहे अशी अवस्था असली तरी तिच्यामध्यें साक्षित्वाची सूक्ष्म वृत्ती असते. साक्षित्व मावळून ती वृत्तीसुद्धां विलीन झाली म्हणजे उन्मनी अवस्था प्राप्त होते. संपूर्ण वृत्तीरहित अवस्था म्हणजे उन्मनी होय. त्या निवृत्ती अवस्थेंमध्यें सर्व जाणतेपण विरते. तेंच विज्ञान होय.   
जेथें अज्ञान सरे । ज्ञान तेंहि नुरे ।
विज्ञानवृत्ती मुरे । परब्रह्मीं ॥ ५१ ॥
५१) प्रथम अज्ञान नाहींसे होऊन ज्ञान उदय पावतें. पुढें ज्ञान नाहींसे होऊन विज्ञान येते. अखेर विज्ञान देखील परब्रह्मामतजिरतें. मग केवळ शुद्ध व विमळ ब्रह्म तेवढें शिल्लक उरते. 
ऐसें ब्रह्म शाश्वत । जेथें कल्पनेसी अंत ।
योगी जना येकांत । अनुभवें जाणावा ॥ ५२ ॥
५२) असें हें शाश्वत ब्रह्म आहे. तेथें सर्व कल्पना नाहींशा होतात. योगी लोकांचा हा एकान्त आहे. तो अनुभवानें आपण समजून घ्यावा.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विमळब्रह्मनिरुपणनाम समास चवथा ॥
Samas Chavatha VimalBrahma Nirupan
समास चवथा विमलब्रह्म निरुपण


Custom Search

Saturday, August 19, 2017

Samas Tisara ChaturdashaBrahma Nirupan समास तिसरा चतुर्दशब्रह्म निरुपण


Dashak Satava Samas Tisara ChaturdashaBrahma
Nirupan Samas Tisara ChaturdashaBrahma Nirupan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is describing Fourteen Brahmas. Each and every brahma with the qua;ities is described here. This is for knowing real, true ParBrahma which has no end. We will come to know about ParaBrahma in this samas.
समास तिसरा चतुर्दशब्रह्म निरुपण
श्रीराम ॥
श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों ब्रह्मज्ञान ।
जेणें होये समाधान । साधकाचें ॥ १ ॥
१) श्रोत्यांनी आतां लक्षपूर्वक ऐकावे. मी आतां ब्रह्मज्ञान सांगणार आहे. तें ऐकले कीं, साधकांचे समाधन होईल. 
रत्नें साधायाकारणें । मृत्तिका लागे येकवटणें ।
चौदा ब्रह्मांची लक्षणें । जाणिजे तैसीं ॥ २ ॥
२) खाणींमधलीं रत्नें मातींतून काढावी लागतात. तसेंच आधी चौदा ब्रह्में कोणती व त्यांची लश्रणें यांचे वर्णन ऐकल्यावर शुद्ध ब्रह्म गवसेल. 
पदार्थेंविण संकेत । द्वैतावेगळा दृष्टांत ।
पूर्वपक्षेंविण सिद्धांत । बोलतांचि न ये ॥ ३ ॥
३) जें सूक्ष्म व अतिंद्रिय आहे. त्याचे लक्षण समजण्यासाठीं दृश्य पदार्थाचा आधार घ्यावा लागतो. द्वैताशिवाय तो देता येत नाही. तसेच पूर्वपक्ष नीट मांडल्याशिवाय सिद्धांत सांगता येत नाही.   
आधीं मिथ्या उभारावें । मग तें वोळखोन सांडावें ।
पुढें सत्य तें स्वभावें । अंतरीं बाणे ॥ ४ ॥
४) जें खोटे आहे त्याचे सविस्तर वर्णन आधी करावे. त्यामधले दोष शोधून समजून घेतल्यावर तें बाजूस काढल्यावर खरें आहे तें अंतःकरणांत ठाम बसते.   
म्हणौन चौदा ब्रह्मांचा संकेत । बोलिला कळाया सिद्धांत ।
येथें श्रोतीं सावचित । क्षण येक असावें ॥ ५ ॥
५) हें लक्षांत घेऊनच चौदा ब्रह्मांच्या खुणा सांगितल्यावर शुद्ध ब्रह्म कसें आहें, तें ध्यानीं येईल. श्रोत्यांनी क्षणभर सावधानतेनें ऐकावे. 
पहिलें तें शब्दब्रह्म । दुजें मीतिकाक्षरब्रह्म । 
तिसरें खंब्रह्म । बोलिली श्रुती ॥ ६ ॥
चौथे जाण सर्वब्रह्म । पांचवें चैतन्यब्रह्म । 
साहावें सत्ताब्रह्म । साक्षब्रह्म सातवें ॥ ७ ॥
आठवें सगुणब्रह्म । नवें निर्गुणब्रह्म ।
दाहावें वाच्यब्रह्म । जाणावें पैं ॥ ८ ॥
अनुभव तें अक्रावें । आनंदब्रह्म तें बारावें । 
तदाकार तेरावें । चौदावें अनुर्वाच्य ॥ ९ ॥
६-९) पहिले शब्दब्रह्म, दुसरें ॐ एकाक्षरब्रह्म, तिसरें श्रुतीनें सांगितलेले खंब्रह्म, चौथे सर्वब्रह्म, पांचवे चैतन्यब्रह्म, सहावे सत्तब्रह्म, सातवें साक्षब्रह्म, आठवें सगुणब्रह्म, नववे निर्गुणब्रह्म, दहावे वाच्यब्रह्म, अकरावें अनुभवब्रह्म, बारावें आनंदब्रह्म, तेरावें तदाकार ब्रह्म, चौदावें अनिर्वाच्य ब्रह्म अशी ही चौदा ब्रह्में 
ऐसीं हे चौदा ब्रह्में । यांचीं निरोपिली नामें ।
आतां स्वरुपाचीं वर्में । संकेत दाऊं ॥ १० ॥
१०) चौदा ब्रह्मांची नावें सांगितली. आतां त्यंच्या स्वरुपांची वर्मे, रहस्यें खुणांनी सांगतो.
अनुभवेंविण भ्रम । या नांव शब्दब्रह्म ।
आतां मीतिकाक्षरब्रह्म । तें येकाक्षर ॥ ११ ॥
११) साक्षात अनुभव नसतां नुसत्या शब्दांनी तें ब्रह्म असें आहे, तसे आहे असे भ्रमाने सांगणे म्हणजे शब्दब्रह्म होय. ॐ या एकाक्षरानें दाखविले जाणारे तें मितीकाक्षर ब्रह्म होय.
खंशब्दें आकाशब्रह्म । महादाकाश व्यापकधर्म ।
आतां बोलिलें सूक्ष्म । सर्वब्रह्म ॥ १२ ॥
१२) खं नावाने आकाशब्रह्म समजते. म्हणजेच सर्व व्यापक महद्आकाश. आतां सूक्ष्म असलेले सर्वब्रह्म सांगतो. 
पंचभूतांचें कुवाडें । जें जें तत्त्व दृष्टी पडे ।
तें तें ब्रह्मचि चोखडें । बोलिजेत आहे ॥ १३ ॥
१३) पंचभूतांच्या अवाढव्य गुंतागुंतीमध्यें जें जें तत्व नजरेस पडते तें तें खरें ब्रह्म असे समजतात. तें सूक्ष्म ब्रह्म होय. 
या नाव सर्वब्रह्म । श्रुतिआश्रयाचें वर्म । 
आतां चैतन्यब्रह्म । बोलिजेल ॥ १४ ॥
१४) याचे नांव सर्वब्रह्म आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म या श्रुतींचा आधार याला आहे. आतां चैतन्यब्रह्म सांगतो.   
पंचभूतादि मायेतें । चैतन्य चि चेतवितें ।
म्हणौनि त्या चैतन्यातें । चैतन्ब्रह्म बोलिजे ॥ १५ ॥ 
१५) माया आणि पंचमहाभूतें या सर्वांना प्राण देऊन चालविणारे मूळ चैतन्यच होय. म्हणून त्याला चैतन्यब्रह्म म्हणतात. 
चैतन्यास ज्याची सत्ता । तें सत्ताब्रह्म तत्वता ।
तये सत्तेस जाणता । या नाव साक्षब्रह्म ॥ १६ ॥
१६) चैतन्यास ज्याच्या सत्तेचा आधार तें सत्ताब्रह्म होय. त्या सत्तेला जाणणारे ते साक्षब्रह्म होय.  
साक्षत्व जयापासूनी । तें हि आकाळिलें गुणीं ।
सगुणब्रह्म हे वाणी । तयासि वदे ॥ १७ ॥
१७) साक्षित्व म्हणजे वेगळेपणाने पाहाणें किंवा जाणणे. हा गुणच असल्यानें साक्षब्रह्माला सगुणब्रह्म हा शब्द लावतात. 
जेथें नाहीं गुणवार्ता । तें निर्गुणब्रह्म तत्वता ।
वाच्यब्रह्म तें हि आतां । बोलिजेल ॥ १८ ॥
१८) जेथें गुणांना स्थानच नाही, तें खरें निर्गुणब्रह्म होय. आतां वाच्यब्रह्म काय तें सांगतो.  
जें वाचें बोलतां आलें । तें वाच्यब्रह्म बोलिलें ।
अनुभवासि कथिलें । नवचे सर्वथा ॥ १९ ॥
१९) वाणीनें ज्याचे वर्णन करता येते. ते वाच्यब्रह्म म्हटलेले आहे. ब्रह्म स्वतः अनुभवावे लागते व तो शब्दांनी सांगता येत नाही.
या नांव अनुभवब्रह्म । आनंदवृत्तीचा धर्म ।
परंतु याचेंहि वर्म । बोलिजेल ॥ २० ॥
२०) असें शब्दांच्या पलीकडे असलेले केवळ अनुभवास येणारे तें अनुभव ब्रह्म होय. आनंद हा वृत्तीचा गुण आहे. परंतु आनंदब्रह्माचेही वर्म सांगतो.  
ऐसें हें ब्रह्म आनंद । तदाकार तें अभेद ।
अनुर्वाचीं संवाद । तुटोन गेला ॥ २१ ॥
२१) आनंदाचा अनुभव घेणारी वृत्ती जेथें असते तें आनंदब्रह्म. समरस होऊन अभेद घडतो तें तदाकार ब्रह्म होय. ज्या ठिकाणीं वाणी व मन दोन्हींही नसते व जें सांगता येत नाही, तें अनिर्वाच्यब्रह्म होय.   
ऐसीं हे चौदा ब्रह्में । निरोपिलीं अनुक्रमें ।
साधकें पाहातां भ्रमें । बाधिजेना ॥ २२ ॥
२२) अशी चौदा ब्रह्में अनुक्रमें सांगितली. साधकांनी ती नीट समजून घेतली तर अज्ञाानानें होणारा भ्रम होणार नाही.  
ब्रह्म जाणावें शाश्वत । माया तेचि अशाश्वत ।
चौदा ब्रह्मांचा सिद्धांत । होईल आतां ॥ २३ ॥
२३) शुद्ध ब्रह्म हें शाश्वत आहे व माया ही अशाश्वत आहे. हे पक्के लक्षांत ठेवावे. त्यामुळे पुढें चौदा ब्रह्मांचे निरसन केलेले नीट समजेल.  
शब्दब्रह्म तें शाब्दिक । अनुभवेंविण माईक ।
शाश्वताचा विवेक । तेथें नाहीं ॥ २४ ॥
२४) शब्दब्रह्मांत नुसते शाब्दिकज्ञान ज्यांत अनुभव नाही. तेथें शाश्वताचा विचार नसतो. ते मायेंतच असते.  
जें क्षर नाहीं अक्षर । तेथें कैंचें मीतिकाक्षर ।
शाश्वताचा विचार । तेथेहि न दिसे ॥ २५ ॥
२५) सद्वस्तु विनाशी नाहीं तशीच अविनाशी नाही. म्हणून ती एका अक्षरानें वर्णन करणें योग्य नाही. शिवाय अक्षर ही मानवी कल्पना मायेच्या कक्षेंतील म्हणजे शाश्वताचा विचार नाही.  
खंब्रह्म ऐसें वचन । तरी सुन्यातें नासी ज्ञान ।
शाश्वताचें अधिष्ठान । तेथेहि न दिसे ॥ २६ ॥  
२६) खंब्रह्म म्हणजे आकाश हेंच ब्रह्म होय. असें श्रुतिवचन आहे. पण आकाश शून्यरुप आहे. ब्रह्मज्ञानानें शून्य नाहीसें होते. म्हणून येथेंही शाश्वतता नाही.              
सर्वत्रास आहे अंत । सर्वब्रह्म नासिवंत ।
प्रळये बोलिला निश्र्चित । वेदांतशास्त्रीं ॥ २७ ॥
२७) विश्र्वरुपानें दिसणारें सर्व दृश्य नाशिवंत आहे. म्हणजे सर्वब्रह्म विश्वाबरोबर लय पावते. वेदांता या विश्वाच्या प्रळयाची कल्पना दिली आहे. 
ब्रह्मप्रळये मांडेल जेथें । भूतान्वय कैचा तेथें ।
म्हणौनियां सर्वब्रह्मातें । नाश आहे ॥ २८ ॥
२८) ब्रह्मदेवाची रात्र सुरु होऊन प्रलय मांडला म्हणजे भूलोकापर्यंतची पंचमहाभूतें विरायला लागतात. त्यामुळें सर्वब्रह्मही नाशिवंत आहे. 
अचळासि आणी चळण । निर्गुणास लावितां गुण ।
आकारास विचक्षण । मनीतना ॥ २९ ॥ 
२९) मूळ अचल, स्थिर आहे त्यास चंचलपणा लावला जातो. जे निर्गुणी आहेत्यास गुण लावले जातात. त्यामुळें आकाराला आलेल्या वस्तूला ज्ञानी शाश्वत ब्रह्म मानीत नाहीत. 
जें निर्माण पंचभूत । तें प्रत्यक्ष नासिवंत ।
सर्वब्रह्म हे मात । घडे केवी ॥ ३० ॥
३०) जें भूत निर्माण झालेले आहे, अशा पंचभूतात्मक विश्वाला नाश आहे. म्हणून हें सर्व ब्रह्मच आहे असें मान्य कसें करावयाचें?     
असो आतां हें बहुत । सर्वब्रह्म नासिवंत । 
वेगळेपणास अंत । पाहाणें कैचें ॥ ३१ ॥
३१) याहून अधिक सांगावयाचे कारण नाही. सर्वब्रह्म नाशिवंत आहे. हें वेगळेंपणाने पाहणारा द्रष्टा त्यालाही अंत आहे. तर नाशिवंत ब्रह्म कोणी पहावें?     
आतां जयास चेतवावें । तेंचि माईक स्वभावें ।
तेथें चैतन्याच्या नावें । नास आला ॥ ३२ ॥
३२) ज्या विश्वांत चैतन्य जिवंत ठेवतें तें विश्व मायीकच. म्हणून खोटेपणानें भासणार्‍या विश्वाला चालना देणारे चैतन्य त्या विश्वाबरोबर नाश पावते. 
परिवारेंविण सत्ता । ते सत्ता नव्हे तत्वता ।
पदार्थेंविण साक्षता । तेहि मिथ्या ॥ ३३ ॥
३३) सत्ताब्रह्म परिवारावर, कनिष्ठांवर सत्ता चालते. पण तोच परिवार नसेल तर सत्तेला अर्थ नाही. म्हनजे सत्ताब्रह्म खरें नाही. साक्षब्रह्म पदार्थांना वेगळेपणाने पाहाणे म्हणजे साक्षित्व. पण पदार्थच नाहीत तेथें साक्षित्वाला कांही अर्थ नाही. म्हणजेच साक्षब्रह्म खरें नाही.    
सगुणास नाश आहे । प्रत्यक्षास प्रमाण काये ।
सगुणब्रह्म निश्र्चयें । नासिवंत ॥ ३४ ॥
३४) जें जें गुणांनी वेढलेलें आहें तें नाशिवंत आहे. असा प्रत्यक्ष अनुभव येतो त्याला प्रमाणाची जरुरी नाही. म्हणुन सगुण ब्रह्म नाशिवंत आहे, हें निश्र्चयपूर्वक.   
निर्गुण ऐसें जें नांव । त्या नावास कैचा ठाव ।
गुणेंविण गौरव । येईल कैचें ॥ ३५ ॥
३५) निर्गुणब्रह्म-- गुणमय दृश्य सृष्टी हा शब्दांचा भाग आहे. जेथे गुण नाहीत तेथे शब्दही नाहीत. म्हणजेच निर्गुण हा नुसता एक शब्दच आहे. वस्तुचा बोध नाही, गुणच नाहीत तर वस्तुही नाही. मग वर्णन कसलें करावयाचे?   
माया जैसें मृगजळ । ऐसें बोलती सकळ । 
कां तें कल्पनेचें आभाळ । नाथिलेंची ॥ ३६ ॥
३६) ज्ञानी असें सांगतात कीं, माया मृगजळासारखीं आहे. हें दृश्य विश्व म्हणजे कधींच निर्माण न झालेलें कल्पनेंचे अभ्र आहे. 
ग्रामो नास्ति कुतः सीमा । जन्मेंविण जीवात्मा ।
अद्वैतासी उपमा । द्वैताची ॥ ३७ ॥
३७) जेथें गांवच नाही तेथें त्या गावांची हद्द कशी सांगणार.  जन्म झाला म्हणुन जीवात्मा आहे असे आपण म्हणतो पण जर जन्मच झाला नाहीं तर जीवात्मा आहे असे म्हणता येत नाही. जेथें गुणमय विश्वच मृगजळासारखें तेथें गुणांच्या पलीकडील निर्गुण ब्रह्म खरें मानता येत नाही. ब्रह्म सगुण नाही तसेंच तें निर्गुण नाही. द्वैताच्या अनुभवामध्यें ज्या कल्पना आपण वापरतो त्याच कल्पना आपण अद्वैत पतमवस्तु सांगण्यास वापरतो. पण त्यामुळें सद्वस्तु जशी आहे तशी ग्रहण होऊ शकत नाही.     
मायेविरहित सत्ता । पदार्थेंविण जाणता ।
आविद्येंविण चैतन्यता । कोणास आली ॥ ३८ ॥
३८) मायेच्या पसार्‍यांत सत्ता वावरते. पदार्थांत जाणतेपणा वावरतो. अविद्येंत चित्शक्तीचा खेळ चालतो. 
सत्ता चैतन्यता साक्षी । सर्व हि गुणाचपासीं ।
ठाईचें निर्गुण त्यासी । गुण कैचें ॥ ३९ ॥
३९) सत्ता, साक्षित्व, व चैतन्य या कल्पना माया, दृश्य पदार्थ व अज्ञान यामुळें निर्माण होतात. पण ह्या तिन्ही गोष्टी गुणांच्या कक्षेंतील आहेत. ज्या स्वरुपाला (शुद्ध ब्रह्म) गुणांचा संपर्कच नाही तेथे हें सर्व लटकें पडतें. 
ऐसें जें गुणरहित । तेथें नामाचा संकेत ।
तोचि जाणावा अशाश्वत । निश्र्चयेंसी ॥ ४० ॥
४०) असें जें गुणरहित ब्रह्म तें निर्गुण या शब्दाच्या खुणेनें सांगावयाचे. पण तो शब्द व त्यानें दर्शविलेला संकेत दोन्ही निश्र्चयपूर्वक अशाश्वत आहेत. 
निर्गुण ब्रह्मासि संकेतें । नामें ठेविलीं बहुतें ।
तें वाच्यब्रह्म त्यातें । नाश आहे ॥ ४१ ॥
४१) गुणरहित ब्रह्माला खुणेनें ओळखण्यासाठीं पुष्कळ नावें देतात. म्हणून त्यांना वाच्यब्रह्म म्हणतात. परंतु तें सर्व नाशिवंत आहे. 
आनंदाचा अनुभव । हाहि वृत्तीचाचि भाव ।
तदाकारीं ठाव । वृत्तीस नाहीं ॥ ४२ ॥
४२) अनुभवब्रह्म-- आनंदब्रह्म -- आनंद होतो हा वृत्तीचाच भाग आहे. व त्याचा अनुभव त्या वृत्तीतच येतो. त्यामुळें हे दोन्ही वृत्ती बरोबर नाश पावणारे. तदाकारब्रह्म-- ब्रह्माशी तदाकार झाल्यानंतर वृत्ती राहू शकत नाही. परंतु तदाकारब्रह्मांत अज्ञान शिल्लक असल्यानें तसें होत नाही. त्यामुळे ते शुद्ध ब्रह्म नाही. 
अनुर्वाच्य याकारणें । संकेत वृत्तीच्या गुणें ।
तया संकेतास उणें । निवृत्तीनें आणिलें ॥ ४३ ॥
४३) अनुर्वाच्यब्रह्म-- ब्रह्मज्ञानास अनुर्वाच्य असें वृत्तीच्या अनुरोधानें म्हणतात. म्हणून हें नुसते सांकेतीक आहे. परंतु शुद्ध ब्रह्माशी तदाकार झाल्यावर वृत्ती उरतच नाही. म्हणून त्यास अनिर्वाच्य म्हणणे गौणच आहे. 
अनुर्वाच्य ते निवृत्ती । तेचि उन्मनीची स्थिती ।
निरोपाधी विश्रांती । योगियांची ॥ ४४ ॥
४४) मन वृत्तीमय असते. त्याच्या बदल होऊन मग निवृत्ती येते. यालाच उन्मनी अवस्था म्हणतात.  यामधें साधक बंधनमुक्त, मर्यादामुक्त असतो. यामुळें योगीजनांची हीच विश्रांतीची जागा असते. 
वस्तु जे कां निरोपाधी । तेचि सहज समाधी ।
जेणें तुटे आदिव्याधी । भवदुखाची ॥ ४५ ॥
४५) उपाधिशून्य सद्वस्तु स्वतः बनणें म्हणजेच सहजसमाधि. यामुळें संसारांतील आधी व्याधी नष्ट होतात. 
जो उपाधीचा अंत । तोचि जाणावा सिद्धांत ।
सिद्धांत आणी वेदांत । धादांत आत्मा ॥ ४६ ॥
४६) सर्व उपाधींचा नाश होणें हाच ब्रह्मसाक्षात्कार होय. वेदान्ताचा अखेरचा सिद्धांत हाच आहे. 
असो ऐसें जें शाश्वत ब्रह्म । जेथें नाहीं मायाभ्रम ।
अनुभवी जाणे वर्म । स्वानुभवें ॥ ४७ ॥
४७) असो. असें जें शाश्वत ब्रह्म आहे तेथें माया अगर मायेचा भ्रमसुद्धा नाही. अज्ञान, दृश्य, कल्पना कांहींच नाही. जें साधक शुद्ध ब्रह्माचा साक्षात अनुभव घेतात, त्यांना परब्रह्माचे आकलन होते.  
आपुलेन अनुभवें । कल्पनेसि मोडावें । 
मग सुकाळीं पडावें । अनुभवाचे ॥ ४८ ॥
४८) स्वस्वरुपाच्या अनुभवानें देहबुद्धी, मी देह ह्या कल्पना काढून टाकाव्यांत. तसें झालें म्हणजे सर्वत्र ब्रह्मस्वरुपाचा अनुभव येईल.
निर्विकल्पास कल्पावें । कल्पना मोडें स्वभावें ।
मग नसोनि असावें । कल्पकोटी ॥ ४९ ॥
४९) देहबुद्धीची कल्पना नाहीशीं करण्यासाठीं निर्विकल्प ब्रह्मस्वरुपाची कल्पना करावी. यामुळें आपोआप " मी देह आहे " ही कल्पना नष्ट होते. नंतर मग निर्विकल्पता आल्यावर मी पणाने नसुन सद्धा ब्रह्मस्वरुपांत अनंत काळ राहावे. 
कल्पनेचें येक बरें । मोहरितांच मोहरे ।
स्वरुपीं घालिता भरे । निर्विकल्पीं ॥ ५० ॥    
५०) कल्पनेची एक विशेषता म्हणजे ज्याची कल्पना करावयाची त्याच्याशी तीं एकरुप होते. म्हणून ती स्वस्वरुपाकडे नेली तर ती निर्विकल्प होते.      
निर्विकल्पासी कल्पितां । कल्पनेची नुरे वार्ता ।
निःसंगास भेटों जातां । निःसंग होइजे ॥ ५१ ॥
५१) पण जें निर्विकल्प आहे, त्याची कल्पना करुं लागल्यावर कल्पनाच विलीन होते. कारण ब्रह्मस्वरुप निःसंग असल्यानें साधक स्वतःच निःसंग बनतो.
पदार्थाऐसें ब्रह्म नव्हे । मा तें हाती धरुन द्यावें ।
असो हें अनुभवाचें । सद्गुरुमुखें ॥ ५२ ॥
५२) परब्रह्म म्हणजे दृश्य पदार्थ नाही, जें हातांत घेऊन देता येईल. सद्गुरुमुखानें तें श्रवण करुन मगआपण त्याचा अनुभव घ्यावा. 
पुढें कथेचा अन्वये । केलाचि करुं निश्र्चये ।
जेणे अनुभवासी ये । केवळब्रह्म ॥ ५३ ॥
५३) आतांपर्यंत ब्रह्मस्वरुप कसें आहे, ते सांगितले. तें अधिक निश्र्चितपणें समजण्यासाठीं पुढें विवेचन केले आहे. तें श्रवण केल्यानें शुद्ध व शाश्वत ब्रह्माचा अनुभव येईल. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशाब्रह्मनिरुपण नाम समास तिसरा ॥
Samas Tisara ChaturdashaBrahma Nirupan
समास तिसरा चतुर्दशब्रह्म निरुपण