Saturday, June 30, 2018

Samas Sahava AatmaGuna Nirupan समास सहावा आत्मागुण निरुपण


Dashak Visava Samas Sahava AatmaGuna Nirupan 
Samas Sahava AatmaGuna Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us the vitues of Aatma. Name of this Samas is AatmaGuna Nirupan.
समास सहावा आत्मागुण निरुपण 
श्रीराम ॥
पाहों जातां भूमंडळ । ठाईं ठाईं आहे जळ ।
कितेक तेम निर्मळ माळ । जळेंविण पृथ्वी ॥ १ ॥
) पृथ्वी फिरुन पाहिली तर आपल्याला ठिकठिकाणीं पाणी आढळतें. कांहीं ठिकाणीं मुळींच पाणी नसतें. केवळ उजाड माळजमीन असतें.
तैसें दृश्य विस्तारलें । कांहीयेक जाणीवेनें शोभलें ।
जाणीवरहित उरलें । कितीयेक दृश्य ॥ २ ॥
२) दृश्याचा विस्तार हा असाच आहे. दृश्यांपैकीं कांहीं भाग जाणिवेनें शोभतो तर कांहीं भाग जाणिवरहित असतो. दृश्याचा जाणिवरहित भाग बराच आहे.
च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्‍यासी लक्ष जीवयोनी ।
शास्त्रीं अवघें नेमुनी । बोलिलें असे ॥ ३ ॥
३) जाणीवेनें शोभणारें जें दृश्य आहे, त्याच्या चार खाणी चार वाणी,चौर्‍यांशी लक्ष जीवयोनी आहेत. शास्त्रामध्यें हें सारे व्यवस्थितपणें सांगितलेलें आहे.    
श्र्चोक 
जलजा नवलक्षााश्च दशलक्षाश्च पक्षिणः ।
कृमयोरुद्रलक्षाश्च विंशल्लक्षा गवादयः ।।
स्थावरास्त्रिंशल्लक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवाः ।
पापपुण्यं समं कृत्वा नरयोनिषु जायते ॥ १ ॥
श्लोकाचा अर्थ
१) पाण्यांत जन्मणारे नऊ लाख, पक्षी दहा लाख, कृमी किटक अकरा लाख, गाईबैलांसारखें पशु वीस लाख, वृक्षादि स्थावर तीस लाख, माणसें चार लाख, पाप पुण्य सारख्याप्रमाणांत असेल तेव्हां नरदेहाची प्राप्ति होते. 
मनुष्यें च्यारी लक्ष । पशु वीस लक्ष ।
क्रिम आक्रा लक्ष । बोलिलें शास्त्रीं ॥ ४ ॥
४) माणसें चार लक्ष, पशु वीस लक्ष, कृमी अकरा लक्ष, असें शास्त्रांत सांगितलें आहे. 
दाहा लक्ष ते खेचर । नव लक्ष जळचर । 
तीस लक्ष स्थावर । बोलिलें शास्त्रीं ॥ ५ ॥
५) दहा लाख पक्षी, नऊ लाख जलचर, तीस लाख स्थावर असें शास्त्र सांगतें.
ऐसी चौर्‍यासी लक्ष योनी । जितुका तितुका जाणता प्राणी ।
अनंत देह्याची मांडणी । मर्यादा कैंची ॥ ६ ॥  
६) चौर्‍यांशी लक्ष योनींचा हिशेब हा असा आहे. त्या मध्यें जितके प्राणी आहेत त्यांना जाणीव आहे, जाणतेपणा आहे. प्राण्यांच्या देहाची रचना अनंत प्रकारची आहे. त्या विविध प्रकारांना मुळी मर्यादा नाहीं. 
अनंत प्राणी होत जाती । त्यांचें अधिष्ठान जगती ।
जगतीवेगळी स्थिती । त्यास कैंची ॥ ७ ॥
७) अक्षरशः अनंत प्राणी जन्मास येतात आणि मृत्यु पावतात. पृथ्वी हा त्यांचा आधार आहे. पृथ्वीवांचून त्यंना जीवन जगणें शक्य नाहीं. 
पुढें पाहातां पंचभूतें । पावलीं पष्टदशेतें ।
कोणी विद्यमान कोणी तें । उगीच असती ॥ ८ ॥
८) यानंतर पुढें विचार केला तर व्यक्त दशेला आलेली पंचभूतें आढळतात. पंचभूतांपैकीं कांहीं इंद्रियगोचर आहेत. तर कांहीं इंद्रियांना दिसत नाहींत. गुप्त असतात. 
अंतरात्म्याची वोळखण । तेचि जेथें चपळपण ।
जाणीवेचें अधिष्ठान । सावध ऐका ॥ ९ ॥
९) जेथें चंचलपणा आहे तेथें अंतरात्मा आहे असें ओळखावें. आतां जाणीवेचे राहाणें कोठें कोठें असतें तें सावधपणें ऐका.
सुखदुख जाणता जीव । तैसाचि जाणावा सदाशिव ।
अंतःकर्णपंचक अपूर्व । अंश आत्मयाचा ॥ १० ॥
१०) सुख आणि दुःख याची जाणीव जीवाला असते. त्याचप्रमाणें ती सदाशिवाला म्हणजे जगदीश्वराला पण असते. विलक्षण असें अंतःकरणपंचक म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार हा अंतरात्म्याचा अंश होय.  
स्थुळीं आकाशाचे गुण । अंश आत्मयाचे जाण ।
सत्व रज तमोगुण । गुण आत्मयाचे ॥ ११ ॥
११) स्थूलामध्यें आकाशाचे गुण म्हणजे काम, क्रोध, भय, शोक, मोह असे आत्म्याचे अंश समजावें. तसेंच सत्त्व, रज व तम हेहि आत्म्याचे गुण आहेत. 
नाना चाळणा नाना धृती । नवविधा भक्ति चतुर्विधा मुक्ती ।
अलिप्तपण सहजस्थिती । गुण आत्मयाचे ॥ १२ ॥ 
१२) अनेक प्रकारचे विवेकयुक्य विचार, धैर्य, नवविधा भक्ति, चार प्रकारच्या मुक्ति अलिप्तपणा सहजस्थिति, 
द्रष्टा साक्षी ज्ञानघन । सत्ता चैतन्य पुरातन ।
श्रवण मनन विवरण । गुण आत्मयाचे ॥ १३ ॥
१३) द्रष्टा, साक्षी, ज्ञानघन, सत्ता, चैतन्य, पुरातन, श्रवण, मनन, विवरण,
दृश्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता ज्ञान । गुण आत्मयाचे ॥ १४ ॥
१४) दृश्य, द्रष्टा-दर्शन, ध्येय, ध्याता, ध्यान, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान,
वेदशास्त्रपुराणअर्थ । गुप्त चालिला परमार्थ ।
सर्वज्ञपणें समर्थ । गुण आत्मयाचे ॥ १५ ॥
१५) वेद, शास्त्र, पुराणें, यांचा अर्थ, गुप्तपणें चाललेला परमार्थ, सर्वज्ञपणानें आलेलें सामर्थ्य,
बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध। विचार पाहाणें शुद्ध ।
बोध आणि प्रबोध । गुण आत्मयाचे ॥ १६ ॥
१६) बद्ध,मुमुक्ष, साधक, सिद्ध, शुद्ध, विचार करणें, बोध प्रबोध, 
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या । प्रकृतिपुरुष मूलमाया ।
पिंड ब्रह्मांड अष्टकाया । गुण आत्मयाचे ॥ १७ ॥
१७) जागृति, स्वप्न, सुषुप्ति, तुर्या, प्रकृतिपुरुष, मूळमाया, पिंड, ब्रह्मांड, आठ देह,
परमात्मा आणि परमेश्र्वरी । जगदात्मा आणी जगदेश्र्वरी ।
महेश आणी माहेश्र्वरी । गुण आत्मयाचे ॥ १८ ॥
१८) परमात्मा व परमेश्र्वरी; जगदात्मा व जगदीश्वरी; महेश व माहेश्र्वरी,
सूक्ष्म जितुकें नामरुप । तितुकें आत्मयाचें स्वरुप ।
संकेतनामाभिधानें अमूप । सीमा नाहीं ॥ १९ ॥
१९) हे सर्व प्रकार आत्म्याचे गुण आहेत. जेवढें म्हणून सूक्ष्म नामरुप आहे, तेवढें सर्व अंतरात्म्याचें स्वरुप आहे. अशा सूक्ष्म नामरुपाच्या संकेतांची नांवें खूपच आहेत. त्यांना मर्यादा नाहीं. सूक्ष्माच्या प्रातांत अंतरात्मा जाणिवेची इतकी अनंत रुपें घेतों, कीं त्यांना कांहीं सीमाच नाहीं. 
आदिशक्ती शिवशक्ती । मुख्य मूळमाया सर्वशक्ती ।
नाना जीनस उत्पत्ती स्थिती । तितुके गुण आत्मयाचे ॥ २० ॥
२०) आदिशक्ति, शिवशक्ति, मुख्य मूळमाया, सर्व प्रकारच्या शक्ति, नाना पदार्थाची उत्पत्ति व स्थिति, 
पूर्वपक्ष आणी सिद्धांत । गाणें वाजवणें संगीत ।
नाना विद्या अद्भुत । गुण आत्मयाचे ॥ २१ ॥
२१) पूर्वपक्ष आणि सिद्धान्त, गाणेंबजावणें, संगीत, नाना अद्भुत विद्या,
ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान । असद्वृत्ति सद्वृत्ति जाण ।
ज्ञेप्तिमात्र अलिप्तपण । गुण आत्मयाचे ॥ २२ ॥ 
२२) ज्ञान, अज्ञान, विपरित ज्ञान, असद्वृत्ति, सद्वृत्ति, ज्ञानमात्र, अलिप्तपणा,
पिंड ब्रह्मांड तत्वझाडा । नाना तत्वांचा निवाडा ।
विचार पाहाणें उघडा । गुण आत्मयाचे ॥ २३ ॥ 
२३) पिंडब्रह्मांडांतील तत्वांचा शोध, अनेक तत्वांचा निवाडा, स्पष्टपणें विचार करणें, 
नाना ध्यानें अनुसंधानें । नाना स्थिति नाना ज्ञानें ।
अनन्य आत्मनिवेदनें । गुण आत्मयाचे ॥ २४ ॥
२४) नाना प्रकारचे ध्यान, अनुसंधान, अनेक प्रकारच्या स्थिति, अनेक प्रकारचें ज्ञान, अनन्य आत्मनिवेदन,  
तेतिस कोटी सुरवर । आठ्यासी सहश्र ऋषेश्र्वर ।
भूत खेचर अपार । गुण आत्मयाचे ॥ २५ ॥ 
२५) तेहतीस कोटी देव, अठ्ठ्याऐशी हजार ऋषी, असंख्य भूतपिशाच्चें, 
भूतावळी औट कोटी । च्यामुंडा छपन्न कोटी ।
कात्यायेणी नव कोटी । गुण आत्मयाचे ॥ २६ ॥ 
२६) साडेतीन कोटी भुतावळ, छप्पन कोटी चामुंडा, नऊ कोटी कात्यायनी, 
चंद्र सूर्य तारामंडळें । नाना नक्षत्रें ग्रहमंडळें ।
शेष कूर्म मेघमंडळें । गुण आत्मयाचे ॥ २७ ॥
२७) चंद्र, सूर्य, तारामंडळ, अनेक नक्षत्रें, ग्रहमंडळें, शेष, कूर्म, मेघमंडळें, 
देव दानव मानव । नाना प्रकारीचे जीव ।
पाहातां सकळ भावाभाव । गुण आत्मयाचे ॥ २८ ॥
२८) देव, दानव, मानव, अनेक प्रकारचे जीव, सर्व प्रकारचे भाव आणि अभाव असणें आणि नसणें, हे सगळें आत्म्याचेच गुण आहेत.
आत्मयाचे नाना गुण । ब्रह्म निर्विकार निर्गुण ।
जाणणें येकदेसी पूर्ण । गुण आत्मयाचे ॥ २९ ॥
२९) अशा रीतीनें त्या अंतरात्म्याचे अनेक गुण आहेत. ब्रह्म मात्र निर्गुण आणि निर्विकार आहे. जाणणें किंवा जाणीव असणें हा अंतरात्म्याचा गुण आहे.मग ती जाणीव पूर्ण असो किंवा अपूर्ण व एकदेशी असो.  
आत्मारामउपासना । तेणें पावले निरंजना ।
निसंदेहे अनुमाना । ठावचि नाहीं ॥ ३० ॥
३०) अशा प्रकारच्या अनेक गुणांनी अंतरात्मा दृश्यामध्यें पूर्ण भरलेला आहे. असा त्याला पाहाणें ही त्याची उपासना होय. अशी उपासना जो करील त्याला निरंजन ब्रह्म प्राप्त होईल व तो निःसंदेह होईल. निःसंदेह अवस्थेंत कल्पनेला वाव राहात नाहीं.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मागुणनिरुपणनाम समास सहावा ॥ 
Samas Sahava AatmaGuna Nirupan
समास सहावा आत्मागुण निरुपण 


Custom Search

Friday, June 29, 2018

Samas Panchava Chatvar Jinas समास पांचवा चत्वारजिनस निरुपण


Dashak Visava Samas Panchava Chatvar Jinas 
Samas Panchava Chatvar Jinas, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Chatvar Jinas.
समास पांचवा चत्वारजिनस निरुपण 
श्रीराम ॥
येथून पाहातं तेथवरी । चत्वार जीनस अवधारीं ।
येक चौदा पांच च्यारी । ऐसें आहे ॥ १ ॥
१) या विश्र्वरचनेमध्यें येथून तेथपर्यंत फक्त चारच पदार्थ आहेत. ते ऐकून ठेवा. एकब्रह्म, चौदा मायेची नांवें, पांच महाभूतें आणि चार खाणी असें हें पदार्थ आहेत.   
परब्रह्म सकळांहून वेगळें । परब्रह्म सकळांहून आगळें ।
नाना कल्पनेनिराळें । परब्रह्म तें ॥ २ ॥
२) परब्रह्म सर्व पदार्थांहून वेगळें आणि आगळें म्हणजे श्रेष्ठ आहे. मानवी कल्पनांहून निराळे ासें तें ब्रह्म आहे.  
परब्रह्माचा विचार । नाना कल्पनेहून पर ।
निर्मळ निश्र्चळ निर्विकार । अखंड आहे ॥ ३ ॥
३) आपण अनेक प्रकारच्या कल्पना केल्या तरी त्यांच्यापलीकडे परब्रह्माचा विचार जातो. परब्रह्म निर्मळ, निश्र्चल, निर्विकार, आणि अखंड आहे.
परब्रह्मास कांहींच तुळेना । हा येक मुख्य जिनसाना ।
दुसरा जिनस नाना कल्पना । मूळमाया ॥ ४ ॥
४) परब्रह्म हाच या विश्र्वरचनेमधील मुख्य जिन्नस आहे. त्याच्याबरोबर दुसर्‍या कशाचीही तुलना करतां येत नाहीं. अनेक कल्पनांनी भरलेली मूळमाया हा दुसरा जिन्नस आहे.
नाना सूक्ष्मरुप । सूक्ष्म आणी कर्दमरुप ।
मुळींच्या संकल्पाचा आरोप । मूळमाया ॥ ५ ॥
५) मूळमायेची अनेक सूक्ष्मरुपें आहेत. ती अतिशय सूक्ष्म असून मिश्रणमय आहे. निर्भेळ नाहीं. परब्रह्माच्या ठिकाणीं जें मूळ स्फूरण झालें, त्याच्यावर जो आरोप करतात, त्यास मूळमाया म्हणतात. 
हरिसंकल्प मुळींचा । आत्माराम सकळांचा ।
संकेत नामाभिधानाचा । येणें प्रकारें ॥ ६॥
६) या मूळच्या संकल्पाला हरिसंकेत असें म्हणतात. सर्वांच्या अंतर्यामीं वास करणारा आत्माराम अथवा अंतरात्मा तो हाच होय. त्याला जी नांवें दिलेली आहेत त्याचे संकेत पुढीलप्रमाणें आहेत.
निश्र्चळीं चंचळ चेतलें । म्हणौनि चैतन्य बोलिलें ।
गुणसमानत्वें जालें । गुणसाम्य ऐसें ॥ ७ ॥
७) निश्र्चल ब्रह्मामध्यें चैतन्य जागें झालें म्हणून त्यास चैतन्य म्हणतात. तेथें गुणांचे प्रमाण सम किंवा सारखें असतें म्हणून त्यास गुणसाम्य म्हणतात.
अर्धनारीनटेश्र्वर । तोचि शडगुणैश्र्वर ।
प्रकृतिपुरुषाचा विचार । शिवशक्ती ॥ ८ ॥
८) अर्धनारीनटेश्र्वर व षडगुणेश्वर तोच आहे. शिवशक्ति आणि प्रकृतिपुरुषाचा विचारही तोच आहे. 
शुद्धसत्वगुणाची मांडणी । अर्धमात्रा गुणक्षोभिणी । 
पुढें तिही गुणांची करणी । प्रगट जाली ॥ ९ ॥
९) शुद्धसत्व गुणाची कल्पना, अर्धमात्रा असलेली गुणक्षोभिणी, तिच्यामधून पुढें प्रगट होणारे सत्व, रज व तम हे तीन गुण, मूळमायेची नांवें आहेत.
मन माया अंतरात्मा । चौदा जिनसांची सीमा ।
विद्यमान ज्ञानात्मा । इतुके ठाइं ॥ १० ॥ 
१०) मन, माया, अंतरात्माअसें मायेच्या नांवाचें एकंदर चौदा प्रकार आहेत. सदैव अस्तित्वांत असणारा तो ज्ञानात्मा अथवा आदिसंकल्प इतक्या प्रकारानें प्रत्ययास येतो. 
ऐसा दुसरा जिनस । अभिधानें चतुर्दश ।
आतां तिसरा जिनस । पंचमाहाभूतें ॥ ११ ॥
११) चौदा नावांचा हा दुसरा जिन्नस आहे. पंचमहाभूतें हा तिसरा जिन्नस होय.
येथें पाहातां जाणीव थोडी । आदिअंत हे रोकडी ।
खाणी निरोपिल्या तांतडी । तो चौथा जिनस ॥ १२ ॥
१२) पंचमहाभूतांमध्यें जाणीवेचा अंश कमी प्रमाणांत आढळतो. परंतु त्यांच्या आधी व नंतर म्हणजे शेवटी जाणिवेचे अस्तित्व प्रत्यक्ष दिसते. आधीं मूळमायेमध्यें जाणीव असते. आणि नंतर चार खाणींमध्यें जाणीव दिसतें. म्हणून पंचभूतांच्या आदिअंती जाणीव असते. पूर्वी चात खाणी म्हणून घाईघाईनें सांगितलें तो चौथा जिन्नस होय.  
च्यारी खाणी अनंत प्राणी । जाणीवेची जाली दाटणी ।
च्यारी जिनस येथुनी । संपूर्ण जाले ॥ १३ ॥
१३) चार खाणी अनंत प्राणी आहेत. त्या प्राण्यांच्या अंतर्यामीं जाणिवेची जणूं काय गर्दी झाली आहे. त्यांच्या ठिकाणीं पुष्कळच जाणीव आढळते. असो. असे हे विश्र्वरचनेचे चार जिन्नस सांगितलें. 
बीज थोडें पेरिजेतें । पुढें त्याचें उदंड होतें ।
तैसें जालें आत्मयातें । खाणी वाणी प्रगटतां ॥ १४ ॥
१४) आपण थोडें बीज पेरतों. पण त्यापासून पुढें उदंड धान्य प्राप्त होते. चार खाणींमधील अनंत प्राण्यांमध्यें प्रगट होतांना अंतरात्म्याची स्थिति या बीजासारखी होते.  
ऐसी सत्ता प्रबळली । थोडे सत्तेची उदंड जाली ।
मनुष्यवेषें सृष्टी भोगिली । नाना प्रकारें ॥ १५ ॥
१५) अशा रीतीनें सत्तेची वाढ झाली. मूळच्या थोड्या सत्तेचा सपाटून विस्तार झाला. अखेर मनुष्यदेहामध्यें ती सत्ता सृष्टीचा अनेक प्रकारे भोग घेते.
प्राणी मारुन स्वापद पळे । वरकड त्यास काये कळे ।
नाना भोग तो निवळे । मनुष्यदेहीं ॥ १६ ॥
१६) एखादा हिंस्त्र पशु दुसर्‍याला मारुन पळून जातो. त्याला यापेक्षां अधिक कांहीं कळत नाहीं. पण अनेक प्रकारचे भोग भोगण्यांत माणूस मोठा पटाईत आहे. उदा. पशु मारुन त्याच्या मांसाचे अनेक प्रकार करुन खाण्याचे ज्ञान त्याला आहे. इतर प्राण्यांना नाहीं.   
नाना शब्द नाना स्पर्श । नाना रुप नाना रस ।
नाना गंध हे विशेष । नरदेह जाणे ॥ १७ ॥
१७) शब्द, स्पर्श, रुप, रस आणि गंध यांचे नाना प्रकार माणूस विशेष रीतीनें जाणतो. 
अमोल्य रत्नें नाना वस्त्रें । नाना यानें नाना शस्त्रें ।
नाना विद्या कळा शास्त्रें । नरदेह जाणे ॥ १८ ॥
१८) अनेक प्रकारची अमोल रत्नें, वस्त्रें वाहनें, शस्त्रें, नाना तर्‍हेच्या विद्या, कला, शास्त्रें माणसालाच माहित आहेत.
पृथ्वी सत्तेनें व्यापिली । स्थळोस्थळीं अटोपिली ।
नाना विद्या कळा केली । नाना धारणा ॥ १९ ॥ 
१९) त्या अंतरात्म्याच्या किंवा ईश्र्वराच्या सत्तेनें पृथ्वी व्यापली आहे. ठिकठिकाणीं ती सत्ताच व्यवस्था निर्माण करते.  ज्या सत्तेच्या प्रेरणेनें अनेक प्रकारच्या विद्या, कला आणि धारणा प्रगट होतात. 
दृश्य अवघेंचि पाहावें । स्थानमान सांभाळावें ।
सारासार विचारावें । नरदेहे जालियां ॥ २० ॥
२०) म्हणून नरदेह हातीं आल्यावर हें सगळें दृश्य पहावें. व्यवहारामधील आपलें स्थान आणी मान दोन्ही सांभाळावेत. आणि सारासार विचार करावा. 
येहलोक आणी परलोक । नाना प्रकारींचा विवेक ।
विवेक आणी अविवेक । मनुष्य जाणे ॥ २१ ॥
२१) इहलोक आणि परलोक अनेक प्रकारचे इतर विवेक, शिवाय विवेक आणि अविवेक या गोष्टी माणूसच जाणतो.  
नाना पिंडीं ब्रह्मांडरचना । नाना मुळींची कल्पना ।
नाना प्रकारीं धारणा । मनुष्य जाणे ॥ २२ ॥
२२) अनेक प्रकारच्या पिंडांची रचना, ब्रह्मांडरचना, मूळमायेंतील अनेक कल्पना, अनेक प्रकारच्या ध्यान धारणा माणूस जाणतो. 
अष्टभोग नवरस । नाना प्रकारींचा विळास ।
वाच्यांश लक्ष्यांश सारांश । मनुष्य जाणे ॥ २३ ॥
२३) अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या व अलंकार हे आठही प्रकारचे भोग किंवा सुगंध, स्त्री, तांबूल,वस्त्र, गायन, भोजन, शय्या आणि मादक द्रव्य हे आठ भोग, नऊ प्रकारचे रस, अनेक विलास, वाच्यांश, लक्ष्यांश व सारांश या गोष्टी माणूसच जाणतो. 
मनुष्यें सकळांस आळिलें । त्या मनुष्यास देवें पाळिलें ।
ऐसे हें अवघें कळलें । नरदेहयोगें ॥ २४ ॥
२४) माणूसइतर सर्व प्राण्यांना आपल्या ताब्यांत ठेवतो. पण माणसाला देव पाळतो, सांभाळतो. आपल्या ताब्यांत ठेवतो. या सार्‍या गोष्टी मानव देहांतच कळतात.  
नरदेह परम दुल्लभ । येणें घडे अलभ्य लाभ ।
दुल्लभ तें सुल्लभ । होत आहे ॥ २५ ॥
२५) मानवदेह अत्यंत दुर्लभ आहे. त्याच्या योगानें अलभ्य लाभ प्राप्त होतो. जी गोष्ट दुर्लभ आहे ती सुलभ होते. 
वरकड देहे हे काबाड । नरदेह मोठें घबाड । 
परंतु पाहिजे जाड । विवेकरचना ॥ २६ ॥
२६) इतर देह हे रसहीन आहेत. नुसते कष्टकारक आहेत. पण मानवदेह म्हणजे फार मोठे घबाड आहे. त्याचा संपूर्ण फायदा होण्यास अतिशय मोठा किंवा विशाल विवेक केला पाहिजे. 
येथें जेणें आळस केला । तो सर्वस्वें बुडाला ।
देव नाहीं वोळखिला । विवेकबळें ॥ २७ ॥
२७) माणसाचा देह मिळूनही जो आळशीपणानें वागतो, तो सर्व बाजूंनी बुडतो. त्याचे सर्वस्वीं नुकसान होते. कारण विवेकाच्या बळानें तो देवाची ओळख करुन घेत नाहीं.
नर तोचि नारायेण । जरी प्रत्ययें करी श्रवण ।
मननशीळ अंतःकर्ण । सर्वकाळ ॥ २८ ॥
२८) ज्याचे अंतःकरण निरंतर मननशील असतें आणि जो श्रवण केलेल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. तो देहानें माणूस असला तरी देवपदाच्या पदवीला चढतो.
जेणें स्वयेंचि पोहावें । त्यास कासेस नलगे लागावें ।
स्वतंत्रपणें शोधावें । सकळ कांहीं ॥ २९ ॥
२९) ज्याला स्वतःला पोहायला येते, त्याला दुसर्‍याची कास धरण्याची गरज लागत नाहीं. त्याचप्रमाणें जो मननशील आहे, त्यानें सर्व कांहीं स्वतंत्रपणें शोधून पहावें. 
सकळ शोधून राहिला । संदेह कैचा तयाला ।
पुढें विचार कैसा जाला । त्याचा तोचि जाणे ॥ ३० ॥
३०) आशा रीतीनें सर्व विष्वाचा जो स्वतंत्रपणें शोध घेतो, त्याला कोणताहि संदेह उरत नाहीं. अशा रीतीनें संपूर्ण संदेहरहित झाल्यावर पुढें जी अवस्था येते ती त्याची त्यालाच समजते.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चत्वारजिनसनाम समास पांचवा ॥ 
Samas Panchava Chatvar Jinas
समास पांचवा चत्वारजिनस निरुपण 


Custom Search

Thursday, June 28, 2018

Samas Choutha Aatma Niupan समास चौथा आत्मा निरुपण


Dashak Visava Samas Choutha Aatma Niupan 
Samas Choutha Aatma Niupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Aatma. Sadhak is reqyired to know about Aatma so as to advanced further on to the road of Mukti.
समास चौथा आत्मा निरुपण
श्रीराम ॥
सकळ जनास प्रार्थना । उगेंच उदास करावेना । 
निरुपण आणावें मना । प्रत्ययाचें ॥ १ ॥
१) सर्व लोकांना माझी प्रार्थना अशी आहे कीं, कोणीहि उगीच उदासीन होऊं नये. मी सांगतो हें निरुपण स्वानुभवाचें आहे. तें नीट समजून घ्यावें. 
प्रत्यये राहिला येकेकडे । आपण धांवतो भलतेकडे ।
तरी सारासाराचे निवाडे । कैसे होती ॥ २ ॥
२) स्वानुभव राहिला एकीकडे आणि आपण धांवतों भलतीकडे. अशा परिस्थितींत सार व असार यांच्या बरोबर निवाडा करतां येणें शक्य नाहीं.  
उगिच पाहातां सृष्टी । गल्बला दिसतो दृष्टीं ।
परी ते राजसत्तेची गोष्टी । वेगळीच ॥ ३ ॥
३) सृष्टीकडे जर आपण सहज पाहिलें तर जिकडे तिकडे गोंधळ नजरेस पडतो. पण राजसत्तेची गोष्टच निराळी असते. ज्याप्रमाणें व्यवहारांत गोंधळ आढळला तरी त्याच्या पाठीशीं अदृश्य राजसत्ता असते, त्याचप्रमाणें या जगांत आपल्या दृष्टीला गोंधळ किंवा अव्यवस्था आढळतें. तरी त्याच्यामागें ईश्र्वरी सत्ता कार्य करत असते. हें अगदी खरें आहे. 
पृथ्वीमधें जितुकीं शरीरें । तितुकीं भगवंताची घरें ।
नाना सुखें येणें द्वारें । प्राप्त होती ॥ ४ ॥
४) पृथ्वीवर जेवढीं म्हणून शरीरें आहेत तेवढी सारी भगवंताची घरें आहेत. प्रत्येक शरीरांत भगवंत राहतो. त्या शरीराच्या द्वारानें जीव अनेक प्रकारची सुखें भोगतो.
त्याचा महिमा कळेल कोणाला । माता वांटून कुपाळु जाला ।
प्रत्यक्ष जगदीश जगाला । रक्षितसे ॥ ५ ॥  
५) त्या ईश्र्वराचा महिमा कोणालाही कळलेला नाहीं. भगवंतानें आपला कृपाळूपणा जगांतील अयांच्या ठिकाणीं वाटला आहे. प्रत्यक्ष ईश्र्वरच जगाचे रक्षण करतों. ज्या कृपाळूपणानें ईश्र्वर जगाचे रक्षण करतअसतो, त्याची कल्पना येण्यास मातेचे कृपाळूपण बघावें.
सत्ता पृथ्वीमध्यें वांटली । जेथें तेथें विभागली ।
कळेनें सृष्टि चालिली । भगवंताचे ॥ ६ ॥
६) ईश्र्वराची सत्ता जगामधें वातलेली आहे. जेथें ते थें ती विभागलेली आहे. भगवंताच्या कलेनेंच सर्व सृष्टी चाललेली आहे. ईश्र्वरी सत्ता जाणीवरुप आहे. जगांमधील प्रत्येक वस्तूंत ती अंतर्यामीं वास करते. तिच्या सामर्थ्यानेंच वस्तूची हालचाल होत असते. 
मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता । शरीरीं विभागली तत्वता ।
सकळ कळा चातुर्यता । तेथें वसे ॥ ७ ॥  
७) मूळ पुरुष जो ज्ञानी अंतरात्मा त्याची सत्ता सर्व ठिकाणीं वावरते, सर्व जीवांच्या देहामध्यें जाणीवरुपानें ती विभागली आहे. जीवांच्या ठिकाणी आढळणारें कौशल्य व चातुर्य या सत्तेचाच परिणाम आहे. 
सकळ पुराचा ईश । जगामध्यें तो जगदीश ।
नाना शरीरीं सावकास । करुं लागे ॥ ८ ॥
८) सगळ्या देहरुपी नगरांचा तो स्वामी असून जगामधील जगदीश किंवा जागाचा स्वामी देखील तोच आहे. तो अनेक शरीरांत वास करतो आणि जीवनाचा व्यवहार स्वस्थपणें चालवतो.  
पाहातां सृष्टिची रचना । ते येकाचेन चालेना ।
येकचि चालवी नाना । देह धरुनी ॥ ९ ॥
९) सृष्टीची रचना पाहिली तर असें दिसतें कीं, एवढा हा विशाल पसारा एखाददुसर्‍याला आवरणें अशक्य आहे. मूळ चालवणारा एकच असला तरी तो अनेक देह धारण करुन एवढा अवाढव्य पसारा चालवीत असतो.
नाही उंच नीच विचारिलें । नाहीं बरें वाईट पाहिलें ।
कार्ये चालों ऐसें जालें । भगवंतासी ॥ १० ॥
१०) सृष्टि निर्माण केली त्यावेळीं ईश्र्वरानें श्रेष्ठ व कनिष्ठ हा विचार केला नाहीं. किंवा चांगलें वाईट हा भेद पाहिला नाहीं. कोणीकडून तरी सृष्टीचें कार्य चालावें, अशा हेतुनें त्यानें अनेक देह निर्माण केले आणि त्यांच्यांत आपलें अधिष्ठान ठेवलें.  
किंवा नेणणें आडवें केलें । किंवा अभ्यासी घातलें । 
हें कैसें कैसें केलें । त्याचा तोचि जाणे ॥ ११ ॥
११) कांहीं जीवांच्या आड अज्ञान घातलेंकांहीं जीवांना त्यानें अभ्यासांत घातलें तें कां घातलें? अशा रीतीनें त्यानें जग कसें कसें निर्माण केलें हें त्याचा तोच जाणे.  
जगदांतरी अनुसंधान । बरें पाहाणें हेंचि ध्यान ।
ध्यान आणी तें ज्ञान । येकरुप ॥ १२ ॥
१२) जगांत घडणार्‍या घटनांच्या अंतर्यामीं ईश्र्वराची सत्ता कार्य करते असें सतत भान ठेवणें, हें भगवंताचे अनुसंधान होय. अनुसंधानामध्यें स्वतःचा विसर पडणें हें ध्यान होय. स्वतःचा पूर्ण विसर पडून ध्यान परिपक्व झालें म्हणजें तेंच ज्ञान होय. ध्यान आणि ध्यान अखेर एकरुपच आहेत.  
प्राणी संसारास आला । कांहीं येक शाहाणा जाला ।
मग तो विवेरों लागला । भूमंडळीं ॥ १३ ॥
१३) माणूस जगामध्यें जन्माला येतो. तो थोडाबहुत शहाणा होतो. आणि मग तो जगाबद्दल विचार करुं लागतो. 
प्रगट रामाचें निशाण । आत्माराम ज्ञानघन ।
विश्र्वंभर विद्यमान । भग्यें कळे ॥ १४ ॥
१४) त्या अंतरात्म्याचे निशाण जगांत प्रगट आहे. म्हणजे त्याच्या सत्तेची खूण प्रगटपणें जगांत अनुभवास येते. तो ज्ञानमय आहे. ज्ञानानें आंतबाहेर दाटपणें भरलेला आहे. विश्वाला सांभाळणारा तो अंतरात्मा सर्व ठिकाणीं विद्यमान आहे. परंतु त्याच्या अस्तित्वाचें ज्ञान एखाद्यालाच भाग्यानें प्राप्त होतें.  
उपासना धुंडून वासना धरिली । तरी ते लांबतचि गेली ।
महिमा न कळे बोलिली । येथार्थ आहे ॥ १५ ॥
१५) एखाद्यानें आपल्याला हवी तशी उपासना शोधून काढली, पण ती करीत असतां कांहीं वासना मनांत धरली, तर ती वासना नाहींशी होत नाही. उलट वाढतच जाते. त्यामुळें अंतरात्म्याचा महिमा कळत नाहीं. असें जें म्हणतात तें अगदी बरोबर आहे. उपासनेमधें जोपर्यंत वासना प्रधान आहे तोपर्यंत मन अधोमुख राहते. तें उर्ध्वमुख झाल्यावांचून ईश्र्वराचा महिमा कळत नाहीं. आणि वासना असे पर्यंत मन ऊर्ध्वमुख होत नाही.
द्रष्टा म्हणिजे पाहाता । साक्षी म्हणिजे जाणता ।
अनंतरुपी अनंता । वोळखावें ॥ १६ ॥   
१६) अंतरात्मा द्रष्टा व साक्षी आहे. द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि साक्षी म्हणजे जाणणारा. अनंतरुपांनी द्रष्टेपणा व साक्षीपणा दाखवणारा असा अनंत अंतरात्मा आपण ओळखावा.     
संगती असावी भल्यांची । धाटी कथा निरुपणाची ।
कांहीं येक मनाची । विश्रांती आहे ॥ १७ ॥
१७) सज्जनांची संगत ठेवावी आणि कथा निरुपणें ऐकण्याची संवय असावी. त्या योगानें मनाला थोडीफार विश्रांति लाभते.
त्याहिमधें प्रत्ययेज्ञान । जाळून टाकिला अनुमान । 
प्रचितीविण समाधान । पाविजेल कैंचे ॥ १८ ॥
१८) त्यातल्यां त्यांत अनुभवाचे ज्ञान असावें. त्या ज्ञानानें अनुमानाचें भस्म होऊन जातें. प्रत्यक्ष अनुभवावांचून मनाला समाधान मिळत नाहीं.
मूळ संकल्प तो हरिसंकल्प । मूळमायेमधील साक्षेप ।
जगदांतरीं तेंचि रुप । देखिजेतें ॥ १९ ॥
१९) मूळ संकल्प तोच हरिसंकल्प होय. मूळमायेचा सारा खटाटोप या संकल्पामुळें चालतो. जगाच्या अंतरंगांत हा मूळ संकल्प भरलेला आहे. त्या संकल्पाप्रमाणें जगांतील सार्‍या घटना घडतात.  
उपासना ज्ञानस्वरुप । ज्ञानी चौथा देह आरोप ।
याकारणें सर्व संकल्प । सोडून द्यावा ॥ २० ॥
२०) मूळमाया हा ब्रह्मांडाचा चौथा व महाकारणदेह आहे. तो ज्ञानस्वरुप आहे. तोच उपासनेचा ईश्र्वर होय. ईश्र्वराची उपासना म्हणजे ज्ञानस्वरुपाचीच उपासना असते. पण ही मूळमाय  संकल्परुप आहे. परब्रह्मावर आरोप आहे. यासाठी साधकानें सर्व संकल्पांचा त्याग करायला पाहिजे. 
पुढें परब्रह्म विशाळ । गगनासारिखें पोकळ ।
घन पातळ कोमळ । काये म्हणावें ॥ २१ ॥
२१) सर्व संकल्पांचा त्याग केल्यावर मूळमाया बाजूस सरते. मग त्याच्या पुढें आकाशासारखें विशाल व पोकळ परब्रह्म जिकडे तिकडे अनुभवास येते. त्या स्वरुपाला घनदाट म्हणावें कां पातळ म्हणावें किंवा नाजूक कोमल म्हणावें, काय म्हणावें तें कळत नाहीं. 
उपासना म्हणिजे ज्ञान । ज्ञानें पाविजे निरंजन ।
योगियांचें समाधान । येणें रीतीं ॥ २२ ॥
२२) उपासना ही ज्ञानाची पूर्वावस्था आहे. उपासनेचे पर्यवसान ज्ञानामध्यें होतें. ज्ञानानें नंतर निरंजन ब्रह्माची प्राप्ती होते. अशा रीतीनें योग्यांना समाधान लाभतें. 
विचार नेहटूनसा पाहे । तरी उपासना आपणचि आहे ।
येक जाये एक राहे । देह धरुनी ॥ २३ ॥
२३) निश्र्चयानें नेट लावून जर विचार केला तर असें आढळेल कीं, ज्याची उपासना करायची तें उपास्य आपणच आहोंत. उपासनेला द्वैत लागते. पण उपासक उपास्याची उपासना करतां करतां स्वतः आपण उपास्यामध्यें विलिन होतो. अर्थात एक जातो व एक राहतो. ज्या देहांत उपासक राहात होता त्याच देहांत आतां उपास्य राहतो.     
अखंड ऐसी घालमेली । पूर्वापार होत गेली ।
आताम हि तैसीच चालिली । उत्पत्ति स्थिती ॥ २४ ॥
२४) अशी ही उलाढाल पूर्वींपासून होत आली आहे. आतांहि उत्पत्ति व स्थिति तशीच चालली आहे.  
वनावरी वनचरांची सत्ता । जळावरी जळचरांची सत्ता ।
भूमंडळीं भूपाळां समस्तां । येणेंचि न्यायें ॥ २५ ॥
२५) वनावर वनचरांची सत्ता चालते, जलावर जलचरांची सत्ता चालते, याच न्यायानें पृथ्वीवर सगळ्या राजांची सत्ता चालते. अर्थात सर्व विश्र्वावर भगवंताची सत्ता चालते.  
सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥ २६ ॥
२६) कर्मामध्यें सामर्थ्य आहे. जो जो कर्म करील त्यास सामर्थ्य प्राप्त होईल. परंतु त्या कर्मास भगवंताच्या अनुसंधानाचा आधार पाहिजे. आपण निमित्तमात्र आहोत, खरा कर्ता भगवंत आहे. त्याच्या सत्तेनें कर्म घडणार व फळ प्राप्त होणार. अशी निष्ठा असणें हें भगवंताचे अधिष्ठान होय. अशा निष्ठेनें माणूस कर्म उत्तम करुन देखील त्यापासून अलिप्त राहील, त्यास कर्तेपणाचा अभिमान होणार नाहीं.   
कर्ता जगदीश हें तों खरें । परी विभाग आला पृथकाकारें ।
तेथें अहंतेचें काविरें । बाधिजेना ॥ २७ ॥
२७) खरा कर्ता जगदीश्र्वर भगवंत आहे. ही गोष्ट पूर्णपणें खरीं आहे. परंतु त्याची सत्ता प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणीं विभागली आहे. ईश्र्वर स्वतः वेगळेपणानें कांहीं करत नाहीं. निरनिराळ्या प्राण्यांकडून तो आपल्या सत्तेनें कर्में घडवून आणतो. म्हणून आपल्या हातून जें जें कर्म घडतें, त्याच्या अहंकाराचे वेड जाणत्याला बाधत नाहीं.  
हरिर्दाता हरिर्भोक्ता । ऐसें चालतें तत्वता ।
ये गोष्टीचा आतां । विचार पाहावा ॥ २८ ॥
२८) भगवंत दाता तसा भोक्ता पण आहे. ही खरी वस्तुस्थिति आहे. या गोष्टीचा नीट विचार करावा. 
सकळ कर्ता परमेश्र्वरु । आपला माइक विचारु ।
जैसें कळेल तैसें करुं । जगदांतरें ॥ २९ ॥
२९) परमेश्र्वर सकळ कर्ता आहे. आपण मायिक आहोत, आपलें कर्तेपण मायिक आहे. खोटें आहे. म्हणून जगाचा अंतर्यामी ईश्र्वर जेवढें ज्ञान देईल तेवढें समजून जें कर्म करतां येईल तें करावें. 
देवायेवढें चपळ नाहीं । ब्रह्मायेवढें निश्र्चळ नाहीं ।
पाइरीनें पाइरी चढोन पाहीं । मूळपरियंत ॥ ३० ॥
३०) देवाइतकें म्हणजे अंतरात्म्याइतकें चपळ दुसरें कोणी नाहीं. परब्रह्मा इतकें निश्र्चळ दुसरें कांहीं नाहीं, पण हे कळण्यासाठीं पायरी पायरीनें चढत मूळमायेपर्यंत जावें. आणि तेथें स्वानुभवानें पहावें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मानिरुपणनाम समास चौथा ॥ 
Samas Choutha Aatma Niupan
समास चौथा आत्मा निरुपण


Custom Search

Wednesday, June 27, 2018

Samas Tisara Sookshma Namabhidhan Niupan समास तिसरा सूक्ष्मनामाभिधान निरुपण


Dashak Visava Samas Tisara Sookshma Namabhidhan Niupan 
Samas Tisara Sookshma Namabhidhan Niupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us Srushti. Srushti means Chachal Dasha. Sadhak is required to reach to Nishchal. Nishchal means ParBrahma. Aimof Sadhak is to attain ParBrahma. Name of this Samas is Sookshma Namabhidhan Niupan.
समास तिसरा सूक्ष्मनामाभिधान निरुपण
श्रीराम ॥ 
मुळींहून सेवटवरी । विस्तार बोलिला नानापरी ।
पुन्हा विवरत विरत माघारी । वृत्ति न्यावी ॥ १ ॥
१) मूळमायेपासून चार प्रकारच्या जीवप्राण्यांपर्यंत या सृष्टीचा विस्तार अनेक प्रकारानें सांगितला आहे. त्याच्यावर पुनः पुनः मनन करुन आपली वृत्ति माघारी फिरवावी. आणि अखेर ती मूळमाये पर्यंत नेऊन सोडावी.   
च्यारी वाणी च्यारी खाणी । चौर्‍यासि लक्ष जीवयोनी । 
नाना प्रकारीचे प्राणी । जन्मास येती ॥ २ ॥
२) च्यार वाणी व च्यार खाणी मिळून चौर्‍याशीं लक्ष जीवयोनी आहेत. त्यांमधील अनेक प्रकारचे प्राणी जगांत जन्मास येतात. 
अवघे होती पृथ्वीपासुनी । पृथ्वीमधें जाती नासोनी ।
अनेक येती जाती परी अवनी । तैसीच आहे ॥ ३ ॥
३) हे सगळे प्राणी पृथ्वीपासून जन्मास येतात व अखेर पृथ्वींतच नाश पावतात. अनेक प्राणी आले आणी गेले पण पृथ्वी मात्र जशींच्या तशींच राहिली आहे. 
ऐसें हें सेंड्याकडिल खांड । दुसरें भूतांचें बंड ।
तिेसरें नामाभिधानें उदंड । सूक्ष्मरुपें ॥ ४ ॥
४) पृथ्वी आणी तिच्यावरील जीवप्राणी हा ब्रह्मांडवृक्षाचा शेंड्याकडील म्हणजे टोकाचा विभाग आहे. तो आतां सांगितला. पंचभूतांचा अफाट विस्तार हा दुसरा विभाग आहे. मूळमायेपासून त्रिगुणापर्यंत अनेक सूक्ष्मत्तत्वांची नामें सांगितलीं. तो त्या वृक्षाचा तिसरा विभाग होय.    
स्थूळ अवघें सांडून द्यावे । सूक्ष्मरुपें वोळखावें ।
गुणापासून पाहिलेच पाहावें । सूक्ष्मदृष्टीं ॥ ५ ॥  
५) जेवढें स्थूल आहे तेवढें सगळें टाकून द्यावें. शुद्ध जाणीव सत्वगुण जें सूक्ष्म आहे त्याचे गुणधर्म ओळखावें. गुणापासून मूळमायेपर्यंत वारंवार सूक्ष्म दृष्टीनें चिंतन करीत जावें.   
गुणांचीं रुपें जाणीव नेणीव । पाहिलाच पाहावा अभिप्राव ।
सूक्ष्मदृष्टीचें लाघव । येथून पुढें ॥ ६ ॥
६) गुणांच्यामध्यें जाणीव आणि नेणीव दोन्ही आहेत. त्रिगुणांवर पुनः पुनः विचार करावा आणि हे रहस्य समजून घ्यावें. सूक्ष्मदृष्टीचें कौशल्य तर खरें येथून पुढेंच आहे.   
शुद्ध नेणीव तमोगुण । शुद्ध जाणीव सत्वगुण । 
जाणीवनेणीव रजोगुण । मिश्रित चालिला ॥ ७ ॥
७) तमोगुण म्हणजे शुद्ध अज्ञान, सत्वगुण म्हणजे शुद्ध ज्ञान, रजोगुण म्हणजे ज्ञान व अज्ञान यांचे मिश्रण होय. 
त्रिगुणाचीं रुपें ऐसीं । कळों लागलीं अपैसीं ।
गुणापुढील कर्दमासी । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥
८) त्रिगुणांचा मूळ स्वभाव कसा आहे हें बरोबर कळलें म्हणजे त्यांच्यापुढें जो काला आहे त्यास गुणक्षोभिणी म्हणतात हें समजेल.  
रज तम आणि सत्व । तिहींचें जेथें गूढत्व । 
तें जाणिजे महत्तत्व । कर्दमरुप ॥ ९ ॥
९) रज, तम आणि सत्व हे तिन्ही गुण ज्या ठिकाणीं अत्यंत गुप्तपणानें राहतात त्या अवस्थेला महत् तत्व म्हणतात. महत् तत्व चिखलाप्रमाणें मिश्रणरुप आहे.  
प्रकृति पुरुष शिवशक्ति । अर्धनारीनटेश्र्वर म्हणती ।
परी याची स्वरुपस्थिती । कर्दमरुप ॥ १० ॥
१०) प्रकृतिपुरुष, शिवभक्ति, अर्धनारी नटेश्र्वर हीं नांवें देखील वापरतात. पण त्यांचे स्वरुप मिश्रणमयच आहे. 
सूक्ष्मरुपें गुणसौम्य । त्यास बोलिजे गुणसाम्य ।
तैसेंचि चैतन्य अगम्य । सूक्ष्मरुपी ॥ ११ ॥
११) गुणक्षोभिणीमध्यें तिन्ही गुण अत्यंत सूक्ष्मरुपांत असतात. तसेच ते सौम्य असतात. त्या अवस्थेला गुणसाम्य म्हणतात. त्याचप्रमाणें अत्यंत सूक्ष्मरुप चैतन्य तेथेंच असतें. तें कळयाला फार कठीण असते. 
बहुजिनसी मूळमाया । माहांकारण ब्रह्मांडीची काया ।
ऐसिया सूक्ष्म अन्वया । पाहिलेंचि पाहावें ॥ १२ ॥
१२) मूळमाया अनेक तत्वांनी भरलेली आहे, मूळमाया म्हणजे ब्रह्मांडाचा माहाकारण देह होय. हीं तत्वें आणि त्यांचें संबंध सूक्ष्म आहेत. वारंवार विचार करुन त्यांचें दर्शन करुन घ्यावें. 
च्यारी खाणी पांच भूतें । चौदा सूक्ष्म संकेतें ।
काये पाहाणें तें येथें । शोधून पाहावें ॥ १३ ॥
१३) चार खाणी, पांच महाभूतें आणि मायेची चौदा सूक्ष्म संकेतमय नांवें, यांच्यावर विचार करुन सारी सृष्टीरचना शोधून पहावी.
आहाच पाहातां कळेना । गरज केल्यां समजेना ।
नाना प्रकारीं जनाच्या मना । संदेह पडती ॥ १४ ॥
१४) नुसतें वारंवार पाहिलें तर हें कळायचे नाहीं. उगीच तात्पुरता किंवा कामापुरता विचार केला तरी हे कळायचे नाहीं. सामान्यतः लोक अशा रीतीनें विचार करतात, म्हणून त्यांच्या मनांत अनेक संदेह उत्पन्न होतात. 

चौदा पांच येकोणीस । येकोणीस च्यारी तेविस ।
यांमधें मूळ चतुर्दश । पाहिलेंचि पाहावें ॥ १५ ॥
१५) मूळमायेची चौदा नांवें, त्यांत पांच महाभूतें मिळवली म्हणजे एकोणीस, त्यांत चार खाणी मिळवल्या म्हणजे एकंदर तेवीस तत्वें होतात. यापैकी मूळमायेच्या चौदा संकेतांचा पुनः पुनः विचार करावा आणि त्यांचें स्वरुप समजून घ्यावें.   
जो विवरोन समजला । तेथें संदेह नाहीं उरला ।
सकजल्याविण जो गल्बला । तो निरार्थक ॥ १६ ॥
१६) जो अत्यंत सूक्ष्म मनन करुन मूळमायेचे व त्रिगुणांचें स्वरुप समजून घेतो, त्यास कोणताहि संदेह उरत नाहीं. तें न समजतां बडबड करणें व्यर्थ होय. 
सकळ सृष्टीचें बीज । मूळमायेंत असे सहज ।
अवघें समजतां सज्ज । परमार्थ होतो ॥ १७ ॥
१७) या सगळ्या विश्र्वाचे बीज मूळमायेंत अगदी सहजपणानें आहे. आणि हें जर नीटपणानें कळलें तर परमार्थ सिद्ध होतो. 
समजले माणूस चावळेना । निश्र्चइ अनुमान धरीना ।
सावळगोंदा करीना । परमार्थ कदा ॥ १८ ॥
१८) मूळमाया आणि त्रिगुण यांचें खरें स्वरुप ज्याला कळतें त्याच्या मनांत घोटाळा शिल्लक राहात नाहीं. त्याचा निश्रचय पक्का झाल्यानें तो उगीच कल्पना करीत राहात नाहीं. त्याच्या परमार्थामध्यें सावळागोंधळ आढळत नाहीं. 
शब्दातीत बोलतां आलें । त्यास वाच्यांश बोलिलें ।
शुद्ध लक्ष्यांश लक्षिलें । पाहिजे विवेकें ॥ १९ ॥
१९) जें शब्दातींतच आहे, त्याच्याबद्दल कांहीं बोलता आलें तरी तो वाच्यांश समजावा. जो शुद्ध लक्षांश आहे तो अखेर विवेकाच्या ज्ञानदृष्टीनेंच पाहावा लागतो.  
पूर्वपक्ष म्हणिजे माया । सिद्धांतें जाये विलया ।
माया नस्तां मग तया । काये म्हणावें ॥ २० ॥
२०) मायेला पूर्वपक्ष म्हणतात. सिद्धांतानें पूर्वपक्ष विलयास जातो. म्हणजे परब्रह्माच्या साक्षात्कारानें माया नाश पावतें. माया नाहीशीं झाल्यावर जें कांहीं उरतें त्यास नांव तरी काय द्यावें? नांव देणें मायेच्या अलीकडचा प्रकार आहे. म्हणून माया विलीन झाल्यावर शब्दसुद्धां उरत नाहींत.
अन्वये आणी वीतरेक । हा पूर्वपक्षाचा विवेक ।
सिद्धांत म्हणिजे शुद्ध येक । दुसरें नाहीं ॥ २१ ॥
२१) मााया हयात असतांना अन्वय आणि व्यतिरेक या पद्धतीनें विवेकाची क्रिया चालते. तेथें द्वैत असल्यानें हें शक्य होते. पण माया विलिन झाल्यावर " शुद्ध असेम एकमेव ब्रह्म आहे, दुसरें मुळीं नाहींच " असा प्रत्यक्ष अनुभव येतो. तेथेम संपूर्ण अद्वैत असतें.    
अधोमुखें भेद वाढतो । ऊर्धमुखें भेद तुटतो । 
निःसंगपणें निर्गुणी तो । माहांयोगी ॥ २२ ॥
२२) जीव अधोमुख असतो तेव्हां म्हणजे, मायेकडे तोंड करुन असतो तेव्हां भेद वाढतो. अनेकपणाच अनुभवास येतो. जीव ऊर्ध्वमुख होतो तेव्हां, भेद कमी होतो, एकपणाचा अनुभव येऊं लागतो. सर्वसंग सोडून जो अलिप्तपणानें निर्गुणाशीं समरस होतो, त्यालाच महायोगी म्हणतात.
माया मिथ्या ऐसी कळली । तरी मग भीड कां लागली ।
मायेचे भिडेनें घसरली । स्वरुपस्थिती ॥ २३ ॥
२३) माया खरी नाहीं. हें एकदा कळल्यावर मग तीचे दडपण जीवावर पडूं नये. पण मायेचे दडपण पडतें आणि जीव आपल्या स्वस्वरुपावस्थेंतून खालीं घसरतो.   
लटके मायेनें दपटावें । सत्य परब्रह्म सांडावें ।
मुख्य निश्र्चयें हिंडावें । कासयासी ॥ २४ ॥
२४) मिथ्या मायेच्या दडपणाखालीं सांपडल्यानें सत्य परब्रह्म सोडणें बरोबर नाहीं. परब्रह्म तेवढेंच सत्य आहे अशी खात्री झाल्यावर मग संशयाच्या नादानें इकडेतिकडे हिंडणें बरोबर नाहीं.
पृथ्वीमधें बहुत जन । त्यामध्यें असती सज्जन ।
परी साधूस वोळखतो कोण । साधुवेगळा ॥ २५ ॥
२५) जगांत पुष्कळ मानसें आहेत. त्यामधें साधुपुरुष पण असतात. हें जरी खरें तरी साधूला साधूवांचून दुसरा कोणी ओळखूं शकत नाहीं. 
म्हणौन संसार सांडावा । मग साधूचा शोध घ्यावा ।
फिरफिरों ठाइं पाडावा । साधुजन ॥ २६ ॥
२६) म्हणून ज्याला परमार्थाची तहान आहे, त्यानें संसार सोडावा. आणि साधूचा शोध करावा. ठिकठिकाणीं फिरावें आणि साधुपुरुष धुंडून काढावे.  
उदंड हुडकावे संत । सांपडे प्रचितीचा महंत ।
प्रचितीविण स्वहित । होणार नाहीं ॥ २७ ॥   
२७) असे पुष्कळ संत पाहिले म्हणजे त्यांच्यांतच एखादा मोठा स्वानुभवी महात्मा आढळतो. साक्षात्कारावांचून आत्महित होत नाहीं. 
प्रपंच अथवा परमार्थ । प्रचितीविण अवघें वेर्थ ।
प्रत्ययेज्ञानी तो समर्थ । सकळांमध्यें ॥ २८ ॥
२८) प्रपंच असो किंवा परमार्थ असो, प्रत्यक्ष अनुभव नसेल तर दोन्ही व्यर्थ जातात. सर्वांच्यामध्यें स्वानुभवाच्या ज्ञानानें संपन्न असलेला पुरुष हाच समर्थ पुरुष होय.
रात्रंदिवस पाहावा अर्थ । अर्थ पाहेल तो समर्थ ।
परलोकींचा निजस्वार्थ । तेथेंचि घडे ॥ २९ ॥
२९) साधकानें रात्रंदिवस अर्थाचे मनन करीत असावें. अशा रीतीनें मनन करुन जो अर्थ शोधून काढतो, तोच समर्थ पुरुष होय. परमार्थामधील आत्मज्ञानाचा स्वार्थ त्यालाच हस्तगत होतो.  
म्हणौन पाहिलेंचि पाहावें । आणि शोधिलेंचि ।
अवघें कळतां स्वभावें । संदेह तुटती ॥ ३० ॥
३०) म्हणून साधकानें जो अर्थ समजला आहे, त्याच्यावरच पुनः पुनः मनन करावें. ज्या स्वरुपाचा शोध केला आहे त्याचाच पुनः पुनः शोध करावा. या मार्गानें वाटचाल केली असतां सहजच सगळें कळलें म्हणजे सारें संदेह नाहींसे होतात.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मनामाभिधाननाम समास तिसरा ॥  
 Samas Tisara Sookshma Namabhidhan Niupan
समास तिसरा सूक्ष्मनामाभिधान निरुपण


Custom Search