Monday, November 21, 2022

BhaktiYoga Part 4 Ovya 60 to 88 भक्तियोग भाग ४ ओव्या ६० ते ८८

 

BhaktiYoga Part 4 
Shri Dnyaneshwari 
Adhyay 12 Ovya 60 to 88
भक्तियोग भाग ४ 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १२ ओव्या ६० ते ८८

मूळ श्लोक

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।

अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५ ॥

५) अव्यक्त ब्रह्माच्या ठिकाणीं ज्याचें चित्त आसक्त आहे, त्यांना अधिक क्लेश पडतो. कारण देहधार्‍यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टानें साध्य होतो.   

जिहीं सकळभूतांचां हितीं । निरालंबीं अव्यक्तीं ।

पसरलिया आसक्ती । भक्तीवीण ॥ ६० ॥

६०) सगुणाच्या भक्तीस डावलून निराश्रय, निर्गुण आणि सर्व प्राण्यांचें मूर्तिमंत हितच, असें जें ब्रह्म त्या ब्रह्माची प्राप्ति होण्याकरिता ज्या योग्यांनीं त्या ठिकाणीं आसक्ति धरलेली असते,  

तयां महेंद्रादि पदें । करिताति वाटवधें ।

आणि ऋद्धिसिद्धींचीं द्वंद्वें । पडोनि ठाती ॥ ६१ ॥

६१) त्यांस ( त्या योग्यांस ) इंद्रपदादि पदें वाटमारेपणा करतात व ऋद्धिसिद्धींपासून उत्पन्न होणारीं सुखदुःखे त्या योग्यांच्या ब्रह्मप्राप्तीच्या आड पडून राहतात. 

कामक्रोधांचे विलग । उठावती अनेग ।

आणि शून्येंसीं आंग । जुंझवावें कीं ॥ ६२ ॥

६२) कामक्रोधांचे अनेक उपद्रव उद्भवतात व निराकाराबरोबरच शरीर लढवावें लागतें. 

ताहाने ताहानाचि पियावी । भुकेलिया भूकचि खावी ।

अहोरात्र वावीं  । मवावा वारा ॥ ६३ ॥

६३) तहानेनें तहानच प्यावी, भूक लागली असतां भूकच खावी आणि रात्रंदिवस वावांनी वारा मोजावा.

उन्निद्रेयाचें पहुडणें । निरोधाचें वेल्हावणें ।

झाडासि साजणें । चाळावें गा ॥ ६४ ॥

६४) जेथें जागणें हेंच निजणें, इंद्रियांचा निरोध करणें हेंच विषयांचें हेंच विषयाचें प्रशस्त भोगणें आणि अरे, झाडाशी मैत्री करुन बोलावे लागतें, 

शीत वेढावें । उष्ण पांघुरावें ।

वृष्टीचिया असावें । घराआंतु ॥ ६५ ॥

६५) थंडी नेसावी, ऊन पांघरावें आणि पावसाच्या घरांत असावें. 

किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेशु नीत नवा ।

भ्रतारेंवीण करावा । तो हा योगु ॥ ६६ ॥

६६) अर्जुना फार काय सांगावें ? हा योग करणें, म्हणजे नवर्‍यावांचून नित्य नवा अग्निप्रवेश करणें ( सती जाणें ) आहे.    

एथ स्वामीचें काज । ना वापिकें व्याज ।

परि मरणेंसीं झुंज । नीत नवें ॥ ६७ ॥

६७) हा योग करण्याच्या कामांत नवर्‍याचें ( नवर्‍याबरोबर सती गेले असतां जसा पुढें तोच नवरा मिळतो, तसें नवरा मिळवण्याचें ) काम नाही अथवा नवर्‍याकडच्या कुलाचाराचें कांहीं निमित्तहि नाही; परंतु मरणाबरोबर ( मात्र ) नित्य नवी लढाई आहे.

ऐसें मृत्यूहूनि तिख । कां घोंटे कढत विख ।

डोंगर गिळितां मुख । न फाटे काई ॥ ६८ ॥

६८) याप्रमाणें योगाचें दुःख मृत्यूहून तीक्ष्ण आहे. अथवा कढत विष पिववेल काय ? डोंगर गिळतांना मुख फाटणार नाहीं काय ? 

म्हणोनि योगाचिया वाटा । जे निगाले गा सुभटा ।

तयां दुःखाचाचि वाटा । भागा आला ॥ ६९ ॥

६९) म्हणून अर्जुना, या योगाच्या वाटेनें माझी प्राप्ति करुन घेण्याकरितां जे निघाले, त्यांच्या वांट्याला दुःखाचाच भाग आला.

पाहें पां लोहाचे चणे । जैं बोचरिया पडती खाणें ।

तैं पोट भरणें कीं प्राणें । शुद्धी म्हणों ॥ ७० ॥     

७०) असें पाहा कीं, जेव्हां बोचर्‍या माणसास लोखंडाचें चणे खाण्याचा प्रसंग येतो, तेव्हां तें त्यांचें पोट भरणें म्हणावें, कीं प्राणांशीं त्याचा वियोग म्हणावा ?    

म्हणोनि समुद्र वाहीं । तरणें आथि केंही ।

कां गगनामाजीं पाईं । खोलिजतु असे ॥ ७१ ॥

७१) म्हणून बाहूंनी समुद्र तरुन जाणें, हें कोठें ( शक्य ) आहे काय ? अथवा आकाशांत पायानें चालणें घडतें काय ?

वळघलिया रणाची थाटी । आंगीं न लगतां काठी ।

सूर्याची पाउटी । कां होय गा ॥ ७२ ॥

७२) युद्धाच्या गर्दीत गेल्यावर अंगाला काठीचा घाव न लागतां सूर्याची पायरी करुन ( सूर्यंमंडळाचा भेद करुन ) जातां येईल काय ?

यालागीं पांगुळा हेवा । नव्हे वायूसि पांडवा ।

तेवीं देहवंतां जीवां । अव्यक्तीं गति ॥ ७३ ॥

७३) म्हणून अर्जुना, ज्याप्रमाणें पांगळ्याला वायूशीं स्पर्धा करतां येणार नाहीं, त्याप्रमाणें शरीरधारी जीवांची निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणीं गति नाही.  

ऐसाही जरी धिंवसा । बांधोनिया आकाशा ।

झोंबती तरी क्लेशा । पात्र होती ॥ ७४ ॥

७४) असें असूनहि जर ते जीव, धैर्य धरुन निर्गुणाचाच पिच्छा पुरवतील, तर त्यांना दुःख प्राप्त होईल. 

म्हणोनि येर ते पार्था । नेणतीचि हे व्यथा ।

जे कां भक्तिपंथा । वोटंगले ॥ ७५ ॥

७५) म्हणून अर्जुना, याहून दुसरे जे भक्तिमार्गाला लागले, ते हें दुःख जाणतच नाहींत.

मूळ श्लोक

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।

अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ ६ ॥

६) पण, हे पार्था, जे सर्व कर्में मला अर्पण करुन मत्पर होऊन, अनन्य भक्तियोगानें माझें ध्यान करीत उपासना करतात;  

कर्मेंद्रियें सुखें । करिती कर्में अशेखें ।

जिये कां वर्णविशेखें । भागा आलीं ॥ ७६ ॥

७६) ( येथून भक्तिमार्गाला लागलेल्या पुरुषाचें वर्णन करतात. ) त्या भक्तिमार्गाला लागलेल्या पुरुषांची कर्मेंद्रियें हीं वर्णाश्रम धर्मानुसार सर्व कर्में आनंदानें करीत असतात.

विधीते पाळित । निषेधातें गाळित ।

मज देऊनि जाळित । कर्मफळें ॥ ७७ ॥

७७) ते पुरुष शास्त्रानें सांगितलेल्या आज्ञांचे पालन करतात व शास्त्रानें मनाई केलेली कर्में ते करीत नाहींत व केलेल्या कर्मांची फळें, तीं कर्में मला अर्पण करुन , जाळून टाकतात.   

ययापरी पाहीं । अर्जुना माझां ठाई ।

संन्यासूनि नाहीं । करिती कर्में ॥ ७८ ॥

७८) अर्जुना, याप्रमाणे ते मला कर्में अर्पण करुन कर्में नाहींशीं करता

आणीकही जे जे सर्व । कायिक याचिक मानसिल भाव ।

तयां मीवांचूनि धांव । आनौती नाहीं ॥ ७९ ॥त

७९) आणखी ज्या ज्या म्हणून काहीं शरीराच्या, वाणीच्या व मनाच्या क्रिया असतात, त्या सर्वांची प्रवृत्ति माझ्याशिवाय दुसरीकडे नसते.

ऐसे जे मत्पर । उपासिती निरंतर ।

ध्यानमिषें घर । माझें झाले ॥ ८० ॥

८०) असें जे माझे ठिकाणीं गढून माझी निरंतर उपासना करतात व जे माझें निरंतर ध्यान करतात व त्या ध्यानाच्या निमित्तानें जे माझें घर झाले आहेत;

जयांचिये आवडी । केली मजशीं कुळवाडी ।

भोग मोक्ष बापुडीं । त्यजिलीं कुळें ॥ ८१ ॥

८१) ज्यांच्या प्रेमानें माझ्याशीं देवघेव केलेली असते व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष, हीं कुळें दोन आहेत, असें समजून ज्यांनी त्यांचा त्याग केलेला असतो.   

ऐसे अनन्ययोगें । विकले जीवें मनें आंगें ।

तयांचें कायि एक सांगें । जें सर्व मी करीं ॥ ८२ ॥    

८२) याप्रमाणें एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर व मन यांसह जे मला विकलेले असतात, त्यांचें काय एक मी करतों म्हणून सांगूं ? कारण सर्वच मी करतों.  

तेषांमहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।

भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ ७ ॥

७) माझ्या ( सगुणस्वरुपाच्या ) ठिकाणीं ज्यांनी चित्त ठेविलें आहे, अशा त्या ( भक्तांचा ) मीअल्प काळांत मृत्युरुप संसारसागरामधून उद्धार करणारा होतों. 

किंबहुना धनुर्धरा । जो मातेचिया ये उदरा ।

तो मातेचा सोयरा । केतुला पां ॥ ८३ ॥

८३) फार काय सांगावें ? अर्जुना, जो आईच्या पोटीं जन्म घेतो, तो आईचा किती आवडता असतो बरें ?

तेवीं मी तयां । जैसे असती तैसियां ।

कळिकाळ नोकोनियां । घेतला पटा ॥ ८४ ॥

८४) त्याप्रमाणें माझें भक्त जसे असतील त्या स्थितींत मी त्यांच्यावर प्रेम करतों व कळिकाळाचा पराभव करुन त्यांस मी आपल्या पदरांत घेतों.

एर्‍हवीं तरी माझिया भक्तां । आणि संसाराची चिंता ।

काय समर्थाची कांता । कोरान्न मागे ॥ ८५ ॥

८५) सहज विचार करुन पाहिले तर, ( कोणीहि ) एकदां माझा भक्त म्हणून ठरला, मग त्यास संसाराच्या काळजीची गोष्ट कशाला ? सांग. राजाच्या कुटुंबास भीक मागण्याचें कारण पडेल काय ?      

तैसे ते माझें । कलत्र हें जाणिजे ।

कायिसोनिही न लाजें । तयांचेनि मी ॥ ८६ ॥

८६) त्याप्रमाणें तें भक्त माझें कुटुंब आहेत असें समजावें, त्यांचे कोणतेंहि पडलेलें काम करण्यांत मला कमीपणा वाटत नाहीं.  

जन्ममृत्युचां लाटीं । झळंबती इया सृष्टी ।

तें देखोनियां पोटीं । ऐसें जाहलें ॥ ८७ ॥

८७) जन्ममृत्युच्या लाटांत हें जग गटांगळ्या खात असलेलें पाहून, माझ्या पोटांत असा विचार आला.

भवसिंधूचेनि माजें । कवणासि धाकु नुपजे ।

येथ जरी कीं माझे । विहिती हन ॥ ८८ ॥

८८) संसारसागराच्या खवळण्यानें कोणास भय उत्पन्न

 होणार नाहीं ? या योगानें ( संसारसागराच्या क्षोभानें )

 माझें भक्त कदाचित् भितील; 



Custom Search

BhaktiYoga Part 3 Ovya 35 to 59 भक्तियोग भाग ३ ओव्या ३५ ते ५९

 

BhaktiYoga Part 3 
Shri Dnyaneshwari 
Adhyay 12 
Ovya 35 to 59 
भक्तियोग भाग ३ 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १२ 
ओव्या ३५ ते ५९

मूळ श्लोक

श्रीभगवानुवाचः – मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।

                        श्रद्ध्या परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ २ ॥

२) श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणीं मन ठेवून नित्ययुक्त होऊन, अतिशय श्रद्धेनें युक्त असे जे माझी उपासना करतात, ते सर्वांत उत्कृष्ट योगी मी समजतों.   

तरि अस्तुगिरीचां उपकंठीं । रिगालिया रविबिंबापाठीं ।

रश्मी जैसे किरीटी । संचरती ॥ ३५ ॥

३५) तर अर्जुना, अस्ताचलाच्या समीप सूर्य गेल्यानंतर सूर्यबिंबामागून जशी किरणें जातात;

वर्षाकाळीं सरिता । जैसी चढों लागें पांडुसुता ।

तैसी नीच नवी भजतां । श्रद्धा दिसे ॥ ३६ ॥

३६) अर्जुना, ज्याप्रमाणें पावसाळ्यांत नदीचें पाणी रोज वाढतें, त्याप्रमाणें माझें भजन करीत असतांना माझ्या भक्तांचें माझ्याविषयींचें प्रेम नित्य नवें ( वाढणारें ) दिसतें.

परि ठाकिलियाहि सागरु । जैसा मागीलही यावा अनिवारु ।

तिये गंगेचिये ऐसा पडिभरु । प्रेमभावा ॥ ३७ ॥

३७) परंतु गंगानदी समुद्रास प्राप्त झाल्यानंतरहि जसा ( तिच्या ) मागील पाण्याचा अनिवार लोट येत राहतो, त्या गंगेसारखा ज्याच्या प्रेमभावाला जोर असतो;

तैसें सर्वांद्रियासहित । मजमाजीं सूनि चित्त ।

जे रातिदिवो न म्हणत । उपासेती ॥ ३८ ॥

३८) तसेंच जे रात्र आणि दिवस असें कांहीं न म्हणतां, सर्व इंद्रियांसहित माझ्या स्वरुपीं दृढ अंतःकरण ठेवून माझी उपासना करतात;

यापरी जे भक्त । आपणपें मज देत ।

तेचि मी योगयुक्त । परम मानीं ॥ ३९ ॥

३९) याप्रमाणें जे भक्त मला आपला आत्मभाव देतात, त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतों.

मूळ श्लोक

ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।

सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ॥ ३ ॥

३) तथापि जे अक्षर, अनिर्देश्य, अव्यक्त, सर्वव्यापी, अचिन्त्य, अविकारी, अचल व ध्रुव ( अशा वस्तुची ) उपासना करतात;

आणि येर तेही पांडवा । जे आरुढोनिसोऽहंभावा ।

झोंबती निरवयवा । अक्षरासी ॥ ४० ॥

४०) आणि अर्जुना, याशिवाय दुसरे ( निर्गुण उपासक ) जें, तें ब्रह्म मी आहें, अशी दृढ भावना करुन अवयवरहित व अविनाशी अशा ब्रह्माला धरावयास पाहतात; 

मनाची नखी न लगे । जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे ।

इंद्रियां कीर जोगें । काइ होईल ॥ ४१ ॥ 

४१) ज्या ब्रह्माच्या ठिकाणीं मनाचा प्रवेश होत नाहीं, आणि बुद्धीची दृष्टि जेथें प्रवेश करीत नाहीं, तें इंद्रियांना खरोखर गोचर होईल काय ?

परि ध्यानाही कुवाडें । म्हणोनि एके ठायीं न संपडे ।

व्यक्तीसि माजिवडें । कवणेही नोहे ॥ ४२ ॥

४२) परंतु जें ब्रह्म एका ठिकाणीं न सापडल्यामुळें व कोणत्याहि आकारांत तें येत नसल्यामुळें जें ध्यानालाहि कठिण आहे;

जया सर्वत्र सर्वपणें । सर्वांही काळीं असणें ।

जें पावूनि चिंतवणें । हिंपुटी जाहलें ॥ ४३ ॥

४३) जी वस्तु सर्व ठिकाणीं सर्व रुपानें व सर्व कालीं असते, ज्या स्वरुपाचें ध्यान करण्याकरितां गेलें असतां, चिंतन करण्याची क्रिया तेथें आपला कांहीं लाग न लागल्यामुळें खजील होते;  

जें होय ना नोहे । जें नाहीं ना आहे ।

ऐसें म्हणोनि उपाये । उपजतीचिना ॥ ४४ ॥

४४) जी वस्तु उत्पन्न होत नाहीं व नाशहि पावत नाहीं व जी वस्तु नाहीं असेंही नाही व आहे असेहीं नाहीं; व जी वस्तु अशी असल्यामुळे जिच्या प्राप्तिविषयीं साधनें संभवतच नाहीत;

जें चळे ना ढळे । सरे ना मैळे ।

तें आपुलेनिचि बळें । आंगविलें जिहीं ॥ ४५ ॥

४५) जें चालत नाहीं व हालत नाहीं, जें संपत नाहीं व मळत नाहीं तें ( ब्रह्म ) आपल्या बळानेंच ज्यांनी स्वाधीन करुन घेतलें आहे.

मूळ श्लोक

संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।

ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ ४ ॥

४) इंद्रियसमुदायाचें नियमन करुन, सर्वत्र समबुद्धि ठेवणारे व सर्व भक्तांचें जें हित त्यामध्यें रत असणारे, ( अशी उपासना करणारे ) ते देखील माझ्याप्रतच येतात.

पैं वैराग्यमहापावकें । जाळूनि विषयांचीं कटकें ।

अधपलीं तवकें । इंद्रियें धरिलीं ॥ ४६ ॥

४६) ( ज्यांनी ) वैराग्यरुपी मोठ्या अग्नीनें विषयांचीं सैन्यें जाळून, त्या योगानें होरपळलेलीं इंद्रियें धैर्यांनें आवरुन धरलीं; 

मग संयमाची धाटी । सूनि मुरडिलीं उफराटीं ।

इंद्रियें कोंडिलीं कपाटीं । हृदयाचां ॥ ४७ ॥

४७) मग इंद्रियांस ( निग्रहाच्या ) पाशांत घालून अंतर्मुख केलें व अशा तर्‍हेने त्यांस हृदयाच्या कपाटांत कोंडलें, 

अपानींचिया कवाडा । लावोनि आसनमुद्रा सुहाडा ।

मूळबंधाचा हुडा । पन्नासिला ॥ ४८ ॥

४८) हे सुजाण अर्जुना, गुदद्वाराला आसनमुद्रा लावून मूळबंधाच्या किल्ला तयार केला.

आशेचे लाग तोडिले । अधैर्याचे कडे झाडिले ।

निद्रेचें शोधिलें । काळवखें ॥ ४९ ॥

४९) आशेचे संबंध तोडून टाकले. भित्रेपणाचे कडे ढांसळून दिले आणि निद्रारुपी अंधार नाहींसा करुन टाकला.

वज्राग्निचां ज्वाळीं । करुनि अपानधातूंची होळी ।

व्याधींचां सिसाळीं । पूजिलीं यंत्रें ॥ ५० ॥   

५०) वज्राग्नीच्या ज्वाळाने अपानरुप धातूंची होळी करुन रोगरुपी मुंडक्यांनी प्राणायामरुपी तोफा पूजिल्या.  

मग कुंडलिनियेचा टेंभा । आघारीं केला उभा ।

तया चोजविलें प्रभा । निमथावरी ॥ ५१ ॥

५१) मग कुंडलिनीची मशाल आधार चक्रावर उभी केली व तिच्या प्रकाशाने ब्रह्मरंध्रापर्यंत मार्ग समजला.

नवद्वारांचां चौचकीं । बाणूनि संयतीची आडवंकी ।

उघडली खिडकी । ककारांतींची ॥ ५२ ॥

५२) शरीरांतील नऊहि द्वारांच्या कवाडांवर संयमाचा अडसर घालून, सुषुम्ना नाडीचे मुख उघडलें.

प्राणशक्तिचामुंडे । प्रहारुनि संकल्पमेंढे ।

मनोमहिषाचेनि मुंडे । दिधलीं बळी ॥ ५३ ॥

५३) प्राणशक्तिरुपी चामुंडा देवीला संकल्परुपी मेंढे मारु व मनोरुप महिषाचें मस्तक हे बळी दिले.

चंद्रसूर्यां बुझावणी । करुनि अनाहताची सुडावणी ।

सतरावियेचें पाणी । जिंतिलें वेगें ॥ ५४ ॥

५४) इडा व पिंगला नाड्यांचा सुषुम्नेंत प्रवेश करुन अनाहत शब्दाचा गजर खुला केला व चंद्रामृत त्वरेनें जिंकून घेतलें.

मग मध्यमामध्यविवरें । तेणें कोरिवें दादरें ।

ठाकिलें चवरें । ब्रह्मरंघ्रींचें ॥ ५५ ॥

५५) मग सुषुम्ना नाडीच्या मधील कोरीव अशा विवररुपी दादरावरुन ब्रह्मरंध्राचें शिखर प्राप्त करुन घेतलें.

वरी मकरांत सोपान । ते सांडोनिया गहन ।

काखे सूनियां गगन । भरले ब्रह्मीं ॥ ५६ ॥

५६) शिवाय आज्ञाचक्ररुप अथवा ॐकाराची तिसरी मात्रा जो मकार, त्या मकाररुपी जिन्याचा बिकट शेवट जे चढून जातात व मूर्घ्नि आकाशाला बगलेंत मारुन ब्रह्माशीं ऐक्याला पावतात.

ऐसेनि जे समबुद्धी । गिळावया सोऽहंसिद्धी ।

आंगविताति निरवधी । योगदुर्गें ॥ ५७ ॥

५७) अशा प्रकारें सर्वत्र सारखी बुद्धि ठेवलेले जे असतात, ते मी ब्रह्म अशीं भावना प्राप्त करुन घेण्याकरितां योगरुपी अमर्याद किल्ले स्वाधीन करुन घेतात.

आपुलिया साटोवाटी । शून्य घेती उठाउठी ।

तेही मातेंचि किरीटी । पावती गा ॥ ५८ ॥

५८) आपल्याला मोबदल्यांत देऊन निराकार ब्रह्म त्वरित घेतात, तेहि अर्जुना, मला पावतात.

वांचूनि योगाचेनि बळें । अधिक कांहीं मिळे ।

ऐसें नाहीं आगळें । कष्टचि तया ॥ ५९ ॥

५९) एर्‍हवीं योगाचरणाच्या जोरावर विशेष कांहीं लाभ

 होतो, असे मुळींच नाही. उलट जास्त श्रम मात्र त्यांच्या

 पदरात पडतात; दुसरें कांहीं नाहीं. 



Custom Search

BhaktiYoga Part 2 Ovya 16 to 34 भक्तियोग भाग २ ओव्या १६ ते ३४

 

BhaktiYoga Part 2 
Shri Dnyaneshwari 
Adhyay 12 
Ovya 16 to 34 
भक्तियोग भाग २ 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १२ 
ओव्या १६ ते ३४

मर्‍हाठियेचां नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं ।

घेणें देणें सुखचिवरी । हों देईं या जगा ॥ १६ ॥

१६) या मराठी भाषेच्या गांवांत आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेंच घेणें देणें होऊं दे.

तूं आपुलेनि स्नेहपल्लवें । मातें पांघरुविशील सदैवें ।

तरि आतांचि हें आघवें । निर्मीन माये ॥ १७ ॥

१७) श्रीगुरुरुपी माते, जर तूं आपल्या प्रेमरुपी पदरानें मला निरंतर पांघरुण घालशील, तर आतां मी हें सर्व उत्पन्न करीन.

इये विनवणीयेसाठी  । अवलोकिलें गुरु कृपादृष्टी ।

म्हणे गीतार्थेंसी उठी । न बोलें बहु ॥ १८ ॥

१८) या विनवणीबरोबर गुरुंनी त्यास कृपादृष्टीनें पाहिलें व म्हटलें, गीतार्थ सांगावयास लाग. फार बोलूं नकोस.

तेथ जी जी महाप्रसादु । म्हणोनि साविया जाला स्वानंदु ।

आतां निरोपीन प्रबंधु । अवधान दीजे ॥ १९ ॥

१९) ( असें गुरु बोलले ) तेव्हां ज्ञानेश्र्वरमहाराजांना सहजच आनंद झाला व ते म्हणाले, महाराज, आपण जी मला आज्ञा केली, ती मी आपला महाप्रसाद समजतों. तर आता आपल्या आज्ञेप्रमाणें मी कथा सांगेन,आपण लक्ष देण्याची कृपा करावी.

अर्जुन उवाचः—एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।

ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के तोगवित्तमाः ॥ १ ॥

१) अर्जुन म्हणाला, याप्रमाणें सतत ( तुझ्या व्यक्त स्वरुपाच्या ठिकाणीं ) युक्त असलेले जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा अक्षरब्रह्माची उपासना करतात, त्या ( दोन प्रकारच्या ) योग्यांपैकीं उत्तम योगी कोणते ?

तरी सकळवीराधिराजु । जो सोमवंशीं विजयध्वजु ।

तो बोलता जाहला आत्मजु । पांडुनृपाचा ॥ २० ॥

२०) तरी सर्व वीरांचा सार्वभौम राजा व चंद्रवंशाच्या विजयाचा ध्वज व पंडुराजाचा मुलगा जो अर्जुन, तो बोलला.

कृष्णातें म्हणे अवधारिलें । आपण विश्र्वरुप मज दाविलें ।

तंव नवल म्हणोनि बिहालें । चित्त माझें ॥ २१ ॥

२१) मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, ऐकलें महाराज, आपण मला विश्वरुप दाखविलें, तेव्हां तें विश्वरुप अपूर्व म्हणून माझें चित्त भ्यालें

आणि ये कृष्णमूर्तीची सवे । यालागीं सोय धरिली जीवें ।

तंव नको म्हणानि देवें । वारिलें मातें ॥ २२ ॥

२२) आणि ( मला ) या श्रीकृष्णाच्या सगुण रुपाची सवय आहे म्हणून मनानें त्याचाच आश्रय केला. तेव्हां सगुण मूर्तीवर प्रेम ठेवणे चांगलें नाहीं, म्हणून तेथें प्रेम ठेवूं नकोस, असें देवांनी मला बजावलें.   

तरि व्यक्त आणि अव्यक्त । हें तूंचि एक निभ्रांत ।

भक्ती पाविजे व्यक्त । अव्यक्त योगें ॥ २३ ॥

२३) तर व्यक्त रुपानें अथवा अव्क्त रुपानें तूंच एकआहेस, याविषयी ( माझ्या मनांत ) संशय नाहीं, भक्तीनें व्यक्त स्वरुपाची व योगानें अव्यक्त स्वरुपाची प्राप्ति होते.

या दोनी जी वाटा । तूतें पावावया वैकुंठा ।

व्यक्ताव्यक्त दारवंठां । रिगिजे येथ ॥ २४ ॥

२४) हे वैकुंठा, व्यक्त व अव्यक्त असा जो तूं, त्या तुझ्या प्राप्तीच्या उंबरठ्यांत सोडणारे, भक्ति व योग हे दोन मार्ग आहेत.  

पैं जे वानी श्यातुका । तेचि वेगळिया वाला येका ।

म्हणोनि एकदेशिया व्यापका । सरिसा पाडु ॥ २५ ॥   

२५) परंतु जो कस शंभरभार सोन्याच्या लगडीला असतो तोच कस त्या लगडीतील वेगळ्या काढलेल्या एका वालभर सोन्याला असतो, म्हणून मर्यादित व व्यापक यांची योग्यता सारखी आहे. 

अमृताचां सागरीं । जे लाभे सामर्थ्याची थोरी ।

तेचि दे अमृतलहरी । चुळीं घेतलिया ॥ २६ ॥

२६) अमृताच्या समुद्रामध्यें जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते, तीच थोरवी त्या अमृतसमुद्राच्या लाटेतील एक चुळकाभर अमृत प्यालें असतां प्राप्त होते. ( त्याप्रमाणें व्यक्त रुप जरी परिछिन्न आहे व अव्यक्तरुप हें जरी व्यापक आहे, तरी ती दोन्ही रुपें एकाच योग्यतेची आहेत. )  

हे कीर माझां चित्तीं । प्रतीति आथि जी निरुती ।

परि पुसणें योगपती । तें याचिलागीं ॥ २७ ॥

२७) महाराज, माझ्या चित्तात हाच ( व्यक्त व अव्यक्त हीं दोन्ही रुपें एकच आहेत ) खरोखरी निश्चयें करुन अनुभव आहे; परंतु योगेश्र्वरा, आपल्याला विचारावयाचें तें एवढ्याचकरितां की,

जें देवा तुम्हीं नावेक । अंगिकारिलें व्यापक ।

तें साचचि कीं कवतिक । हें जाणावया ॥ २८ ॥

२८) हे श्रीकृष्णा, तुम्ही जी मागें क्षणभर व्यापक रुपाची ग्राह्य म्हणून शिफारस केलीत तें तुमचें प्रतिपादन खरं खरं मनापासूनचे आहे किंवा तो एक तुम्ही एक क्षणभर केलेला विनोद आहे, हें नीट समजून यावें म्हणून ( मी आपल्यास खुलासा विचारीत आहे. )

तरि तुजलागीं कर्म । तूंचि जयांचें परम ।

भक्तीसी मनोधर्म । विकोनि घातला ॥ २९ ॥

२९) तरी जे भक्त तुझ्या प्राप्तीकरितां कर्म करतात व तूं ज्यांची परम गति आहेस व ज्यांनीं आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला विकल्यासारखे वाहिले आहेत;    

इत्यादि सर्वीं परीं । जे भक्त तूंते हरी ।

बांधोनियां जिव्हारीं । उपासिती ॥ ३० ॥

३०) हे कृष्णा, या व अशाच इतर सर्व प्रकारांनीं, जें भक्त तुला आपल्या अंतःकरणांत दृढ धारण करुन तुझी उपासना करतात;

आणि जें प्रणवेपैलीकडे । वैखरीयेसि जें कानडें ।

कायिसयाहि सांगडें । नव्हे जें वस्तु ॥ ३१ ॥

३१) आणि जी वस्तू ॐकारापलीकडे आहे व वैखरी नांवाच्या वाचेस जी दुर्बोध आहे व जी वस्तु कशाहीसारखी नाहीं,              

तें अक्षर जी अव्यक्त । निर्देशदेशरहित ।

सोऽहंभावें उपासित । ज्ञानिये जे ॥ ३२ ॥

३२) ती वस्तु अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे. ती वस्तु दाखवितां येण्याजोगी नाहीं व ती देशानें मर्यादित नाहीं, अशी आहे; अशा वस्तुची जे ज्ञानी ‘ ती वस्तु मी आहें ‘ अशा भावनेने उपासना करतात. 

तयां आणि जी भक्तां । येरयेरांमाजीं अनंता ।

कवणें योगु तत्त्वता । जाणितला सांगा ॥ ३३ ॥

३३) महाराज, अशा या योगी व भक्तांपैकी कोणीं एकानें, हे अनंता, खरोखर योग जाणला, सांगा बरें ?

इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला ।

म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करुं ॥ ३४ ॥

३४) या अर्जुनाच्या बोलण्यानें तो जगद्बंधु श्रीकृष्ण

 परमात्मा संतुष्ट होऊन म्हणाला, ‘ अरे, अर्जुना, तूं प्रश्न

 करण्याचें चांगलें जाणतोस.’



Custom Search