Showing posts with label Samas Dusara Brahma Nirupan. Show all posts
Showing posts with label Samas Dusara Brahma Nirupan. Show all posts

Sunday, October 29, 2017

Samas Dusara Brahma Nirupan समास दुसरा ब्रह्मनिरुपण


Dashak Navava Samas Dusara Brahma Nirupan 
Samas Dusara Brahma Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Brahma in this Samas.
समास दुसरा ब्रह्मनिरुपण 
श्रीराम ॥
जें जें कांहीं साकार दिसे । तें तें कल्पांती नासे ।
स्वरुप तें आसतचि असे । सर्वकाळ ॥ १ ॥
१) जें जें आकारासहित असते तें तें अखेर नाश पावतें. पण परमात्स्वरुप मात्र सदासर्वकाळ जसेंच्या तसेंच राहतें.
जें सकळांमध्यें सार । मिथ्या नव्हे तें साचार ।
जें कां नित्य निरंतर । संचलें असे ॥ २ ॥
२) जें सर्व वस्तुंचें सार तत्व असतें तें पूर्णोणें सत्य असतें. तें कधींच खोटे होत नाही. तें सदैव सगळीकडें भरुन राहतें.    
तें भगवंताचें निजरुप । त्यासि बोलिजे स्वरुप ।
याहि वेगळीं अमूप । नामें तयाचीं ॥ ३ ॥
३) तेंच भगवंताचें स्वतःचे रुप होय. त्याला स्वरुप असें म्हणतात. शिवाय त्यास आणखी पुष्कळ नांवें आहेत.  
त्यास नामाचा संकेत । कळावया हा दृष्टांत ।
परी तें स्वरुप नामातीत । असतचि असे ॥ ४ ॥
४) स्वरुपाला ओळखण्यासाठीं नाम हा एक संकेत आहे. त्याची कल्पना येण्यासाठीं दृष्टांत द्यावा लागतो. परंतु तें स्वरुप सर्व नामांच्या व दृष्टांतांच्या पलीकडे अगदीं जसेंच्या तसें असतें.
दृश्यासबाह्य संचलें । परी तें विश्र्वास चोरलें ।
जवळिच नाहींसें जालें । असतचि कैसें ॥ ५ ॥
५) सर्व दृश्य पदार्थांच्या आंतबाहेर तें स्वरुप भरुन आहे. पण तें सर्वांपासून गुप्त आहे. प्रत्येकाच्या अगदी जवळ असूनसुद्धा तें त्यांना नसल्यासारखें झालेलें आहे.  
ऐसा ऐकोनियां देव । उठे दृष्टीचा भाव ।
पाहों जातां दिसे सर्व । दृश्यचि आवघें ॥ ६ ॥
६) भगवंताचे वर्णन ऐकून सामान्य माणसाला वाटते कीं भगवंताला डोळ्यांनी पहावें. पण तसें करावयास गेल्यावर सर्वत्र दृश्यच आढळते.   
दृष्टीचा विषयो दृश्य । तोचि जालियां सादृश्य ।
तेणें दृष्टी पावे संतोष । परी तें देखणें नव्हे ॥ ७ ॥
७) दृश्य हा दृष्टीचा विषय होय. वस्तु दृश्य होऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहातां आली म्हणजे आम्ही वस्तु पाहीली असें वाटुन आनंद होतो. पण केवळ डोळ्यांनी पाहाणें हें कांहीं खरें पाहाणें नव्हे.  
दृष्टीस दिसे तें नासे । येतद्विषंई श्रुति असे ।
म्हणौन जें दृष्टीस दिसे । तें स्वरुप नव्हे ॥ ८ ॥
८) जें जें डोळ्यांनी दिसतें नाश पावतें. असें सांगणारें एक श्रुतिवचन आहे. (यद् दृष्टं तद् नष्टं ) म्हणून डोळ्यांना जें दिसतें तें स्वस्वरुप नव्हे. 
स्वरुप तें निराभास । आणी दृश्य भासलें साभास ।
भासास बोलिला नास । वेदांतशास्त्रीं ॥ ९ ॥
९) स्वरुपाला भास नाहीं. दृष्याच्या ठिकाणीं भास आहे. मिथ्यापण आहे. भास नाशवंत असतो असें वेदान्तशास्त्र सांगतें.  
आणी पाहातां दृश्यचि भासे । वस्तु दृश्यावेगळी असे ।
स्वानुभवें पाहातां दिसे । तें दृश्यासबाह्य ॥ १० ॥
१०) आपण जेव्हां डोळ्यांनी पाहातों तेंव्हां फक्त दृश्य दिसतें. सद्ववस्तु किंवा स्वरुप सकल दृश्याहून वेगळी आहे. स्वरुपानुभव आला म्हणजे सद्वस्तु दृश्याला आंतबाहेर व्यापून आहे असें दिसतें. 
जें निराभास निर्गुण । त्याची काये सांगावी खूण ।
परी तें  स्वरुप जाण । सन्निधचि असे ॥ ११ ॥
११) स्वरुपाला आभास किंवा गुण नाही. त्यामुळें त्याला ओळखण्याची खूण सांगता येत नाही. तरी ही तें स्वरुप जवळच आहे. यांत शंका नाही.
जैसा आकाशीं भासला भास । आणी सकळांमधें आकाश ।
तैसा जाणिजे जगदीश सबाह्य अभ्यंतरीं ॥ १२ ॥
१२) आपण आकाश पाहतों. त्यावेळीं आपल्याला आकाश दिसलें असा भास होतो. आकाश वेगळेंपणानें आपल्याला दिसत नाही. कारण सर्व बाजूंना तें पसरलेलें आहे. त्याचप्रमाणें परमेश्र्वर सर्व दृश्य वस्तूंना सगळीकडे आंत व बाहेर व्यापून आहे.  
उदकामधें परी भिजेना । पृथ्वीमधें परी झिजेना ।
वन्हीमधें परी सिजेना । स्वरुप देवाचें ॥ १३ ॥
१३) भगवंताचें स्वरुप पाण्यांत व्यापून आहे पण तें भिजत नाहीं. पृथ्वीमध्यें व्यापून आहे पण झिजत नाहीं. अग्नीमध्यें तें व्यापून आहे पण जळत नाहीं. 
तें रेंद्यामधें परी बुडेना । तें वायोमधें परी उडेना ।
सुवर्णीं असे परी घडेना । सुवर्णासारिखें ॥ १४ ॥
१४) तें चिखलामध्यें व्यापून आहे पण बुडत नाही. वार्‍यामध्यें व्यापून आहे पण उडत नाही. सोन्यामध्यें व्यापून आहे पण त्याचे सोन्यासारखें दागिने बनवता येत नाहीत. 
ऐसें जें संचलें सर्वदा । परी ते आकळेना कदा ।
अभेदामाजीं वाढवी भेदा । ते हे अहंता ॥ १५ ॥
१५) अशा रीतीनें सदासर्वकाळ सर्व ठिकाणीं घनदाटपणें भरुन राहिलेलें स्वस्वरुप अनुभवाच्या कक्षेंत आणणें कठीण असतें. त्या भेदरहित स्वरुपामध्यें अहंता भेद निर्माण करते. 
तिच्या स्वरुपाची खूण । सांगों कांहीं वोळखण ।
अहंतेचे निरुपण । सावध ऐका ॥ १६ ॥ 
१६) अहंतेचें स्वरुप ध्यानांत यावें म्हणून कांहीं खुणा सांगतो. अहंतेचें हे विवेचन लक्ष देऊन ऐकावें.        
जे स्वरुपाकडे पावे । अनुभवासवें झेपावे ।
अनुभवाचे शब्द आघवे । बोलोन दावी ॥ १७ ॥
१७) अहंता सूक्ष्म होत जाऊन स्वरुपापर्यंत पोहोचते. ती स्वरुपाच्या अनुभवाच्या मागें मागें राहाते. अनुभव जेथपर्यंत जाईल तेथपर्यंत जाते. मग तो अनुभव शब्दांनीं वर्णन करुन सांगते.    
म्हणे आतां मीच स्वरुप । तेंचि अहंतेचें रुप ।
निराकारीं आपोआप । वेगळी पडे ॥ १८ ॥
१८) " मीच स्वस्वरुप आहें " हें अहंतेचे रुप समजावें. निराकार व भेदरहित स्वस्वरुपामध्यें ती आपोआप वेगळेपणानें नजरेस पडते.
स्वयें मीच आहे ब्रह्म । ऐसा अहंतेचा भ्रम ।
ऐसिये सूक्ष्मीं सूक्ष्म । पाहातां दिसे ॥ १९ ॥
१९) ' स्वतः मीच ब्रह्म आहे हा अहंतेचा भ्रम आहे. अत्यंत सूक्ष्मांत जाऊन सूक्ष्मपणें पाहिलें म्हणजे माझें हें बोलणें बरोबर कळेल. 
कल्पना आकळी हेत । वस्तु कल्नातीत ।
म्हणौन नाकळे अंत । अनंताचा ॥ २० ॥
२०) " मी देह आहे " ही जशी कल्पना तशीच " मी ब्रह्म आहे " हीं देखिल कल्पनाच आहे. कल्पनेंतून भावना निर्माण होते. सद्वस्तु किंवा स्वस्वरुप तर कल्पनेच्या पलीकडे आहे. कल्पना स्वरुपाला मर्यादा घालूं पाहातें. पण तें अनंत असल्यानें त्याला मर्यादा घालतां येत नाही. स्वरुपाचा अंत लागत नाही. 
अन्वये आणी वीतरेक । हा शब्दभेद कोणीयेक ।
निशब्दाचा आंतरविवेक । शोधिला पाहिजे ॥ २१ ॥
२१) अन्वय व व्यतिरेक हा एक शब्दांचा भेद आहे. सद्ववस्तु खरोखर निःशब्द आहे. म्हणून आपल्या अंतर्यामीं खोल शिरुन निःशब्द स्वस्वरुपाचा शोध घ्यावा. 
आधीं घेईजे वाच्यांश । मग वोळखिजे लक्ष्यांश । 
लक्ष्यांशीं पाहातां वाच्यांश । असेल कैंचा ॥ २२ ॥
२२) स्वस्वरुपाचें वर्णन शब्दांनी केलेले असते. त्या शब्दांचा अर्थ प्रथम नीट समजून घ्यावा. शब्दांचा अर्थ बरोबर समजणें हा वाच्यार्थ होय. पण शब्द खुणेंने सद्वस्तुचें वर्णन करतात. म्हणून वाच्यार्थ ध्यानांत आल्यावर सद्वस्तुची बरोबर कल्पना करावी. हा लक्ष्यांश होय. एकदा लक्ष्यांश ध्यानांत आला म्हणजे वाचार्थाला महत्व उरत नाहीं. एकच लक्ष्यांश निरनिराळ्या शब्दांनीं सांगतां येणें शक्य असतें. या कारणानें शब्दांना लक्ष्यांशापेक्षां कमी महत्व असते.     
सर्वब्रह्म आणी विमळब्रह्म । हा वाच्यांशाचा अनुक्रम ।
शोधितां लक्ष्यांशाचें वर्म । वाच्यांश नसे ॥ २३ ॥
२३) सर्वब्रह्मवादी म्हणतो कीं, " सर्व दृश्य बाजूस केल्यावर जें शुद्ध व निर्मल ब्रह्मस्वरुप उरतें तें ब्रह्म होय. ब्रह्मवर्णानाचे हे दोन प्रकार केवळ शब्दापुरतें भिन्न आहेत. दोन्हींचा लक्ष्यांश जें परब्रह्म तें अगदी एकच एक आहे. तेथें भेद उरत नाहीं.   
सर्व विमळ दोनी पक्ष । वाच्यांशीं आटती प्रत्यक्ष ।
लक्ष्यांशीं लावितां लक्ष । पक्षपात घडे ॥ २४ ॥
२४) सर्वब्रह्म व विमलब्रह्म हे दोन्ही पक्ष वाच्यांशामध्यें आटून जातात. शब्दांच्या पलीकडे त्यांचे क्षेत्र नाहीं. शब्दांच्या कक्षेंतच तें वावरतात. स्वस्वरुप हें दोन्हींचा लक्ष्यांश आहे. तिकडे लक्ष लागलें कीं दोन्हीं पक्ष गळून पडतात. त्यांचा नाश होतो. 
हें लक्ष्यांशें अनुभवणें । येथें नाहीं वाच्यांश बोलणें ।
मुख्य अनुभवाचे खुणे । वाचारंभ कैचा ॥ २५ ॥   
२५) लक्ष्यांशावर लक्ष केंद्रित करुनच स्वस्वरुपाचा अनुभव घ्यावा. त्या अनुभवामध्यें शब्द बोलण्याचे काम नाही. कारण अनुभव शब्दांच्या पलीकडे असतो. निःशब्द अवस्थेंत जाणें ही स्वरुपानुभवाची मुख्य खुण आहे.        
परा पश्यंती मधेमां वैखरी । जेथें वोसरती च्यारी ।
तेथें शब्दकळाकुंसरी । कोण काज ॥ २६ ॥
२६) परा, पश्यन्ति, मध्यमा व वैखरी या चारही वाणी स्वरुपानुभवाच्या ठिकाणीं ओस पडतात, शून्य होतात. म्हणून तेथें शब्दचातुर्याचें काम उरतनाहीं. तेथें शब्दांची कला लटकी पडते.  
शब्द बोलतां सवेंच नासे । तेथें शाश्वतता कोठें असे ।
प्रत्यक्षास प्रमाण नसे । बरें पाहा ॥ २७ ॥
२७) आपण शब्द उच्चारला कीं तो लगेच नाश पावतो.  म्हणून शब्द अशाश्वत असतो. तें अशाश्वतपण आपण प्रत्यक्ष पाहतों. त्यास आणखी पुरावा लागतच नाहीं. 
शब्द प्रत्यक्ष नासिवंत । म्हणोन घडे पक्षपात ।
सर्व विमळ ऐसा हेत । अनुभवीं नाहीं ॥ २८ ॥ 
२८) शब्द नाशवंत आहे. म्हणून तत्त्वज्ञानामधील वाद अखेर गळून पडतात. सर्वब्रह्मवाद व विमलब्रह्मवाद असे पक्ष स्वरुपानुभवामध्यें शिल्लक उरत नाहीत.  
ऐक अनुभवाचें लक्षण । अनुभव म्हणिजे अनन्य जाण ।
ऐक अनन्याचें लक्षण । ऐसें असे ॥ २९ ॥
२९) अनुभवाचें लक्षण ऐकावें. अनुभव म्हणजे स्वरुपाशी अनन्यपण होय. आतां अनन्यपणाचें लक्षण सांगतों.  
अनन्य म्हणिजे अन्य नसे । आत्मनिवेदन जैसें ।
संगभंगें असतचि असे । आत्मा आत्मपणें ॥ ३० ॥
३०) अन्य नाहीं तें अनन्य. जसें कीं, आत्मनिवेदन. अहंतेनें अन्यपण किंवा निराळेंपण येतें. पण अहंता गेली कीं आत्मा एकच एक आत्मपणानें जसाच्या तसा असतो.  
आत्म्यास नाहीं आत्मपण । हेंचि निःसंगाचें लक्षण ।
हें वाक्यांशें बोलिलें जाण । कळवया कारणें ॥ ३१ ॥ 
३१) " मी आत्मा आहे " अशी आत्मपणाची जाणीव आत्मस्वरुपास नसते. असें केवलस्वरुपानें असणें हेंच अत्यंत संगरहित असण्याची खूण आहे. हे शब्दांच्या पलीकडे आहे. पण कल्पनायेण्यासा्ठीं शब्दांनी वर्णन केलें.     
येरवी लक्ष्यांश तो वाच्यांशें । सांगिजेल हें घडे कैसें ।
वाक्यविवरणें अपैसें । कळों लागे ॥ ३२ ॥
३२) सद्वस्तुचे स्वरुप शब्दांनीं सांगतां येण्यासारखें नाही. परमतु संतवचनांवर चिंतन व मनन केलें तरच तें आकलन होऊं लागतें. 
करावें तत्वविवरण । शोधावें ब्रह्म निर्गुण ।
पाहावें आपणास आपण । म्हणिजे कळे ॥ ३३ ॥
३३) या दृश्य विश्र्वांतील तत्त्वांचें विवरण करावें, निर्गुण ब्रह्माचा शोध घ्यावा, आपण कोण तें नीट पाहावें, म्हणजे स्वरुप कसें आहें तें कळूं लागतें.  
हें न बोलतांच विवरिजे । विवरोन विरोन राहिजे ।
मग अबोलणेंचि साजे । माहापुरुषीं ॥ ३४ ॥
३४) स्वरुपाविषयीं बोलणें थांबवून त्याचें अखंड मनन करावें. तसें करतां करतां त्यामध्यें लीन होऊन जावें. अशा रीतीनें स्वस्वरुपाशीं अनन्य झाल्यावर माणूस महापुरुष बनतो. त्याला मौन शोभून दिसतें. 
शब्दचि निशब्द होती । श्रुति नेति नेति म्हणती ।
हें तों आलें आत्मप्रचिती । प्रत्यक्ष आतां ॥ ३५ ॥
३५) स्वरुपानुभवामध्यें शब्द शब्दपणानें विरुन जातात. ही अवस्था श्रुति असें नाहीं असें नाहीं म्हणून म्हणते. ती असें कां म्हणते याचा प्रत्यय आतां स्वतःला येतो. 
प्रचित आलियां अनुमान । हा तों प्रत्यक्ष दुराभिमान ।
तरी आतां मी अज्ञान । मज कांहींच न कळे ॥ ३६ ॥
३६) अशा प्रकारचा स्वरुपानुभव आल्यावर तर्काच्या व अनुमानाच्या मागें लागणें हें मीपणाचें लक्षण आहे. पण हा मी कसा आहे तो पहा. अनुमानाचा हट्ट धरणारा मी अज्ञाानी आहे. त्याला कांहींच कळत नाहीं.  
मी लटिका माझें बोलणें लटिकें । मी लटिका माझें चालणें लटिकें ।
मी माझें अवघेंचि लटिकें । काल्पनिक ॥ ३७ ॥
३७) हा मी मुळांतच खोटा असल्यानें त्याचें बोलणें चालणें खोटेच आहे. त्याचें माझेपण सर्व खोटे आहे. काल्पनिक आहे.     
मज मुळींच नाहीं ठाव । माझें बोलणें अवघेंचि वाव ।
हा प्रकृतीचा स्वभाव । प्रकृती लटिकी ॥ ३८ ॥
३८) त्याला मुळीं स्थानच नाहीं. त्याचें सारें बोलणें अर्थहीन असतें. हा मी व त्याचे सारे व्यवहार प्रकृतीजन्य आहेत. आणि प्रकृति तर खोटी आहे.  
प्रकृति आणी पुरुष । यां दोहींस जेथें निरास ।
तेथें मीपण विशेष । हें केवि घडे ॥ ३९ ॥
३९) स्वरुपानुभवामध्यें प्रकृति व पुरुष या दोघांचा निरास होतो. दोघांचा स्वरुपांत लय होतो. मग त्या ठिकाणीं प्रकृतींतून प्रगट होणार्‍या मीला वेगळेपनें अस्तित्व उरणें अगदीच अशक्य आहे.   
जेथें सर्व हि अशेष जालें । तेथें विशेष कैंचे आलें ।
मी मौनी म्हणतां भंगलें । मौन्य जैसें ॥ ४० ॥
४०) ज्या ठिकाणीं सर्व दृश्य निःशेष नाहींसें होतें त्या ठिकाणीं विशेषपणानें मी कसा उरणार ? मौन पाळणारा एक माणूस म्हणाल " मी मौनव्रत धरलें आहे. " त्याच्या या बोलण्यानेंच त्याचे मौन भंग पावतें.  
आतां मौन्य न भंगावें । करुन कांहींच न करावें ।
असोन निशेष नसावें । विवेकबळें ॥ ४१ ॥
४१) म्हणून स्वानुभव घ्यावा, त्यांत राहून मौन भंगूं देऊं नये. सर्व कांहीं करुन कांहीं केलें नाहीं असें निःसंग असावें. आणि दिसायल वेगळें दिसून अनुभवानें अगदी मुळींच निराळें नसावें.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ब्रह्मनिरुपणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara Brahma Nirupan 
समास दुसरा ब्रह्मनिरुपण 


Custom Search

Thursday, August 17, 2017

Samas Dusara Brahma Nirupan समास दुसरा ब्रह्मनिरुपण


Dashak Satava Samas Dusara Brahma Nirupan 
Samas Dusara Brahma Nirupan It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is describing Brahma. What is Brahma? Brahma is beyond name and form and face. It is God. Though it is beyond name some names are given to have an idea about Brahma. There are some qualities of Brahma, are described in here. Brahma is one and same for king or poor person. There are no discrepancies. It is same to a famous person and for ordinary person. We will come to know about Brahma in this samas.
समास दुसरा ब्रह्मनिरुपण 
श्रीराम ॥
ब्रह्म निर्गुण निराकार । ब्रह्म निःसंग निर्विकार ।
ब्रह्मासि नाहीं पारावार । बोलती साधु ॥ १ ॥
१) साधु असें सांगतात कीं, ब्रह्म गुणरहित, आकाररहित, संगरहित, विकाररहित आणि मर्यादासुद्धा नसलेले आहे. 
ब्रह्म सर्वांस व्यापक । ब्रह्म अनेकीं येक ।
ब्रह्म शाश्वत हा विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ २ ॥
२) ब्रह्म सर्वांना व सर्वाला व्यापून आहे. अनेकांमध्यें एकपणानें आहे. तें शाश्वत आहे, असे शास्त्रांत सांगितलें आहे.   
ब्रह्म अच्युत अनंत । ब्रह्म सदोदित संत ।
ब्रह्म कल्पनेरहित । निर्विकल्प ॥ ३ ॥
३) ब्रह्म कधीं न ढळणारें, अंत नसणारे, तें नेहमी स्थिर आहे. त्याची कल्पना करतां येत नाही. तें कल्पनारहित आहे.
ब्रह्म या दृश्यावेगळें । ब्रह्म सुन्यत्वास निराळें ।
ब्रह्म इंद्रियांच्या मेळें । चोजवेना ॥ ४ ॥
४) ब्रह्म दृश्याहून अगदीं वेगळें आहे. दृश्य लय पावल्यावर शून्य उरतें. त्याहूनसुद्धा ब्रह्म वेगळें आहे. सर्व इंद्रियांनी जाणण्याचा प्रयत्न केला तरी तें त्यांना कळत नाही.  
ब्रह्म दृष्टीस दिसेना । ब्रह्म मूर्खासी असेना ।
ब्रह्म साधुविण येना । अनुभवासी ॥ ५ ॥
५) ब्रह्म डोळ्यांना दिसत नाही. म्हणून मूढ लोकांना तें नसल्यासारखेंच, साधूच्या मार्गदर्शनाशिवाय ब्रह्माचा अनुभव येत नाही.  
ब्रह्म सकळांहूनि थोर । ब्रह्म ऐसें नाहीं सार ।
ब्रह्म सूक्ष्म अगोचर । ब्रह्मादिकांसी ॥ ६ ॥
६) ब्रह्म सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. ब्रह्मासारखें दुसरें काहींच चांगलें नाही. ब्रह्म अती सूक्ष्म आहे. ते ब्रह्माआदि देवांनासुद्धा जाणता येत नाही.  
ब्रह्म शब्दीं ऐसें तैसें । बोलिजे त्याहुनि अनारिसें । 
परी तें श्रवणअभ्यासें । पाविजे ब्रह्म ॥ ७ ॥
७) ब्रह्म हें असें आहे, तसें आहे असें वर्णन केले तरी तें त्याहूनही वेगळेंच आहे. श्रवण व साधना अभ्यास करुन ते ब्रह्म जाणणें शक्य आहे.  
ब्रह्मास नामें अनंत । परी तें ब्रह्म नामातीत ।
ब्रह्मास हेतदृष्टांत । देता न शोभती ॥ ८ ॥ 
८) ब्रह्माला पुष्कळ नांवे आहेत. पण ब्रह्म या सर्व नामांच्या पलीकडेच आहे. कोणतेही नाम स्वरुप कसें आहे तें सांगू शकत नाही. दृश्यांतील वस्तुंच्या द्वारे ब्रह्म समजत नाही.  
ब्रह्मासारिखें दुसरें । पाहातां काय आहे खरें ।
ब्रह्म दृष्टांतउत्तरें । कदा न साहे ॥ ९ ॥
९) या ब्रह्मांडामध्यें ब्रह्मासारखें दुसरें कांहीं नाही. त्यामुळें दृष्टांत देऊन ब्रह्माचे वर्णन करता येत नाही. 
श्रुति ॥
यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ॥
जेथें वाचा निवर्तती । मनासी नाहीं ब्रह्मप्राप्ती ।
ऐसी बोलिली श्रुती । सिद्धांतवचन ॥ १० ॥
१०) ब्रह्मापाशी वाणी माघार घेते. मनाला ब्रह्माची प्राप्ती होत नाही. असें अंतिम सत्य श्रुति बोलली आहे.  
कल्पनारुप मन पाहीं । ब्रह्मीं कल्पनाचि नाहीं ।
म्हणौनि वाक्य कांहीं । अन्यथा नव्हे ॥ ११ ॥
११) सारख्या कल्पनाकरीत राहणें हे मनाचे स्वरुप आहे. पण ब्रह्मामध्यें कल्पनेला स्थान नाही. म्हणून श्रुतिनें सांगितलेला सिद्धांत खोटा नाही. 
आतां मनासि जें अप्राप्य । तें कैसें होईल प्राप्त ।
ऐसें म्हणाल तरी कृत्य । सद्गुरुविण नाहीं ॥ १२ ॥
१२) मनाला जें प्राप्त करुन घेता येत नाही. तें कसें प्राप्त करुन घ्यावें असें विचाराल तर सद्गुरुशिवाय तें होणार नाहीं हें समजून घ्यावें.
भांडारगृहें भरलीं । परी असती आडकिलीं ।
हातास न येतां किली । सर्व हि अप्राप्त ॥ १३ ॥ 
१३) कोठारें धान्यादिंनी भरलेली आहेत. पण ती कुलुपें लावून बंद करुन ठेवलीं आहेत तर किल्ली आपल्याजवळ नसेल तर कोठारांतील वस्तु आपल्याला अप्राप्यच आहेत.  
तरी ते किली ते कवण । मज करावी निरुपण ।
ऐसा श्रोता पुसे खूण । वक्तयासी ॥ १४ ॥
१४) तेव्हां श्रोत्यानें वक्त्यास विचारलें कीं, मग (ब्रह्मज्ञान प्राप्त करुन घेण्याची) ती किल्ली कोणती तें मला सांगा.
सद्गुरुकृपा तेचि किली । जेणें बुद्धि प्रकाशली ।
द्वैतकपाटें उघडलीं । येकसरीं ॥ १५ ॥
१५) सद्गुरुची कृपा संपादन करणें हीच ती किल्ली होय. त्यानेच द्वैताची घट्ट कपाटें एकदम उघडली जातात. असे वक्यानें श्रोत्यास सांगितले.
तेथें सुख असे वाड । नाहीं मनास पवाड ।
मनेंविण कैवाड । साधनाचा ॥ १६ ॥
१६) आत्मबुद्धीमध्यें सुखाला कमतरता नाही. तेथें पुष्कळ सुख मिळते. तेथें मनाचा शिरकाव होत नाही. पण साधना चालूंच राहाते. 
त्याची मनेंविण प्राप्ती । किं वासनेविण तृप्ती । 
तेथें न चले वित्पत्ती । कल्पनेची ॥ १७ ॥
१७) स्वस्वरुपाच्या प्राप्तीसाठीं मनाची आवश्यकता नाही. वासना तृप्त न करतां तृप्ती मिळते. अशा त्या अवस्थेची कल्पनानें आकलन होणें शक्य नाही. 
तें परेहूनि पर । मनबुद्धीअगोचर  ।
संग सोडितां सत्वर । पाविजेतें ॥ १८ ॥
१८) ब्रह्मस्वरुप अनुभवाप्रमाणें आपण समजतो त्याच्याही पलीकडे आहे. तें मन व बुद्धीच्या आटोक्याबाहेंरचे आहे. पण जर साधकानें देहाचा संबंध सोडला तर तें लगेच प्राप्त होते.  
संग सोडावा आपुला । मग पाहावें तयाला ।
अनुभवी तो या बोला । सुखावेल गा ॥ १९ ॥
१९) आपण आपल्या देहबुद्धीचा संबंध सोडला तर मग ब्रह्मस्वरुप पाहाता येईल. जे स्वानुभवी आहेत त्यांना माझ्या बोलण्याने बरे वाटेल.
आपण म्हणिजे मीपण । मीपण म्हणिजे जीवपण ।
जीवपण म्हणिजे अज्ञान । संग जडला ॥ २० ॥
२०) ज्याचा संबंध सोडायचा ते आपण म्हणजे आपला मीपणा होय. मीपणा म्हणजेच जीवपणा आणि जीवपणा म्हणजे आपले अज्ञान होय. म्हणजेच देहबुद्धीचा संग सोडणें.  
सोडितां तया संगासी । ऐक्य होये निःसंगासी ।
कल्पनेविण प्राप्तीसी । अधिकार ऐसा ॥ २१ ॥
२१) जीवपणाचा संबंध सोडला कीं, संबंधरहित ब्रह्मस्वरुपाशीं ऐक्य घडून येते. कल्पनेशिवाय स्वस्वरुपाशी तादात्म्य होण्याचा अधिकार प्राप्त होतो.
मी कोण ऐसें नेणिजे । तया नाव अज्ञान बोलिजे ।
अज्ञान गेलियां पाविजे । परब्रह्म तें ॥ २२ ॥
२२) " मी खरा कोण आहे " हे न कळणें म्हणजेच अज्ञान होय. अज्ञान गेल्यावर परब्रह्म प्राप्त होते. 
देहबुद्धीचें थोरपण । परब्रह्मीं न चले जाण ।
तेथें होतसे निर्वाण । अहंभावासी ॥ २३ ॥
२३) देहबुद्धीचा अहंकार परब्रह्मांत चालत नाही. त्याठिकाणी अहंभावाचे पूर्ण निरसन करावयाचे असते.  
उंच नीच नाहीं परी । राया रंका येकिच सरी ।
जाला पुरुष अथवा नारी । येकचि पद ॥ २४ ॥
२४) ब्रह्मस्वरुपामध्यें उच्च नीच असा भेदभाव नाही. तेथें राजा व रंक सारखेच असतात. स्त्री किंवा पुरुष सर्वांना ब्रह्मपद सारखेंच प्राप्त होते.
ब्राह्मणाचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें वोवळें ।
ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचिना ॥ २५ ॥
२५) ब्राह्मणाचे ब्रह्म सोवळें, शूद्राचे ब्रह्म औवळें असे वेगळेपणाचे लहान-मोठे भेद तेथें नसतात. 
उंच ब्रह्म तें रायासी । नीच ब्रह्म तें परिवारासी । 
ऐसा भेद तयापासीं । मुळिंच नाहीं ॥ २६ ॥
२६) राजाला उत्तम ब्रह्म व परिवारांतील लोकांना कनिष्ठ ब्रह्म असा भेदाभेद त्यापाशी मुळींच नसतो.  
सकळांसि मिळोन ब्रह्म येक । तेथें नाहीं हे अनेक ।
रंक अथवा ब्रह्मादिक । तेथेंचि जाती ॥ २७ ॥
२७) अगदीं सगळ्या जीवांना ब्रह्म एकच आहे. रंक किंवा ब्रह्मादिक देव असोत सर्वजण एकाच ब्रह्माला जातात.
स्वर्ग मृत्य आणि पाताळ । तिहीं लोकींचे ज्ञाते सकळ ।
सकळांसि मिळोन येकचि स्थळ । विश्रांतीचें ॥ २८ ॥
२८) स्वर्ग, मृत्यु व पाताळ या तिन्ही लोकांतील आत्मज्ञानी सर्वांना विश्रांतीचे एकच ठिकाण म्हणजे परब्रह्मच. 
गुरुशिष्या येकचि पद । तेथें नाहीम भेदाभेद ।
परी या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ॥ २९ ॥
२९) सद्गुरुला व शिष्याला दोघांनाही एकच ब्रह्मपद तेथें भेदाभेद नाही. देहाशी संबंध मात्र सोडला पाहिजे.  
देहबुद्धीचा अंतीं । सकळांसि येक चि प्राप्ती ।
येक ब्रह्म द्वितीयं नास्ति । हें श्रुतिवचन ॥ ३० ॥
३०) देहबुद्धीचा अभिमान, संबंध सोडल्यावर तीचा अंत घडून आल्यावर एकच ब्रह्म प्राप्त होते. ब्रह्म दुसरे नसते. असे श्रुति वचन आहे.   
साधु दिसती वेगळाले । परी ते स्वरुपीं मिळाले ।
अवघें मिळोन येकचि जाले । देहातीत वस्तु ॥ ३१ ॥
३१) साधु देहानें वेगळें दिसतात. तरी अंरंगाच्या दृष्टीनें तें एकाच आत्मस्वरुपांत मिसळून जातात. आत्मस्वरुपांत मिसळले कीं, सर्व मिळून एकच देहाच्या पलीकडील एकच ब्रह्मवस्तु होऊन जातात. 
ब्रह्म नाहीं नवें जुनें । ब्रह्म नाहीं अदिक उणें ।
उणें भाविल तें सुणें । देहबुद्धीचें ॥ ३२ ॥
३२) ब्रह्म हें नवें अगर जुनें नाही. तें अधिक नाही तसेच उणे नाही. ब्रह्म उणे आहे असे ज्याला वाटते तो माणुस देहबुद्धीचा गुलाम असतो. 
देहबुद्धीचा संशयो । करी समाधानाचा क्षयो ।
चुके समाधानसमयो । देहबुद्धीयोगें ॥ ३३ ॥
३३) देहबुद्धीमध्यें अविद्या, अज्ञान असते. त्यामुळें अनेक संशय निर्माण होतात. संशयांमुळें समाधान नष्ट होते. 
देहाचें जें थोरपण । तेंचि देहबुद्धीचें लक्षण ।
मिथ्या जाणोनि विचक्षण । निंदिती देहो ॥ ३४ ॥   
३४) देहच (मी आहे) मोठा आहे असे वाटणे. हे देहबुद्धीचे मुख्य लक्षण आहे. परंतु शहाणें लोक देहाचा अशाश्वतपणा, खोटेपणा ओळखतात व देहाचे दोष पाहतात.          
देह पावे जंवरी मरण । तंवरी धरी देहाभिमान । 
पुन्हा दाखवी पुनरागमन । देहबुद्धि मागुती ॥ ३५ ॥
३५) देह जीवंत आहे तो पर्यंत जीव देहाचा मीपणाने अभिमान धरतो. मात्र मरणाधीन झाल्यावर हीच देहबुद्धी परत जन्म घ्यावयास लावते.
देहाचेनि थोरपणें । समाधानासी आलें उणें ।
देहो पडेल कोण्या गुणें । हें हि कळेना ॥ ३६ ॥
३६) देहबुद्धीमुळें देहाला महत्व येते. परंतु त्यामुळें समाधानाला कमीपणा येतो. हाच देह कधीं, केव्हां पडेल हें देखिल कळत नाही.
हित आहे देहातीत । म्हणौनि निरोपिती संत ।
देहबुद्धीनें अन्हित । होंचि लागे ॥ ३७ ॥
३७) साधु संत देहाच्या पलीकडे जाण्यांत जीवाचे कल्याण आहे, असेच सांगतात. देहबुद्धी वाढल्यानें आपलेंच नुकसान होते. 
सामर्थ्यबळें देहबुद्धी । योगियांसि तेहि बाधी ।
देहबुद्धीची उपाधी । पैसावों लागे ॥ ३८ ॥
३८) देहबुद्धी फार शक्तीशाली असते. ती योग्यांनासुद्धा त्रास देते. सिद्धीचा उपयोग करुन मोठेपण मिळवणें, व्याप वाढविणें हा देहबुद्धीच प्रभाव आहे.  
म्हणौनि देहबुद्धि हे झडे । तरीच परमार्थ घडे  ।
देहबुद्धीनें विघडे । ऐक्यता ब्रह्मीची ॥ ३९ ॥
३९) म्हणुन देहबुद्धी क्षीण झाली, तरच परमार्थांत पाऊल पडते. अन्यथा देहबुद्धीमुळें ब्रह्माशी ऐक्यता होत नाही. 
विवेक वस्तूकडे वोढी । देहबुद्धि तेथूनि पाडी ।
अहंता लाऊन निवडी । वेगळेपणें ॥ ४० ॥
४०) आत्मानात्मविवेक जीवाला परमार्थाकडे ओढतो. तर देहबुद्धी त्याला मागें ओढते. नंतर देहबुद्धींतून निर्माण झालेल्या अहंकारानें तो सद्वस्तुपासून वेगळा होतो.
विचक्षणें याकारणें । देहबुद्धि त्यजावी श्रवणें ।
सत्यब्रह्मीं साचारपणें । मिळोन जावें ॥ ४१ ॥
४१) म्हणुन शहाण्यानें देहबुद्धी सोडावी. ब्रह्म जे सत्य आहे, त्याच्याशी समरुप व्हावे.  
सत्यब्रह्म तें कवण । ऐसा श्रोता करी प्रश्र्ण ।
प्रत्योत्तर हे आपण । वक्ता श्रोतयासी ॥ ४२ ॥
४२) ती सद्वस्तु कशी आहे? असा श्रोत्यानें प्रश्र्ण केला. त्याला आता वक्ता उत्तर देत आहे.  
म्हणे ब्रह्म येकचि असे । परी तें बहुविध भासे ।
अनुभव देहीं अनारिसें । नाना मतीं ॥ ४३ ॥
४३) ब्रह्म एकच आहे. पण तें अनेक प्रकारांनीं भासते. वेगवेगळ्या माणसांना तें त्यांच्या त्यांच्या मनोरचनेप्रमाणें अनुभवास येते.   
जें जें जया अनुभवलें । तेंचि तयासि मानलें ।
तेथेंचि त्याचें विस्वासलें । अंतःकर्ण ॥ ४४ ॥
४४) माणसाला ज्या प्रकारें अनुभवास येते, तेच तो खरे मानतो. त्या स्वरुपाबाबत त्याच्या मनांत विश्र्वास निर्माण होतो.   
ब्रह्म नामरुपातीत । असोनि नामें बहुत ।
निर्मळा निश्र्चळ निवांत । निजानंद ॥ ४५ ॥
४५) ब्रह्म हें नामारुपाच्या पलीकडे आहे. म्हणजे त्याला नाम व रुप यांची जरुरी नसूनही त्याला (साधकांनी) नावे दिली आहेत. त्याला निर्मळ, निश्र्चळ, निवांत व निजामंदांत असलेले, अशी कांहीं नामें दिली आहेत.
अरुप अलक्ष अगोचर । अच्युत अनंत अपरांपर ।
अदृश्य अतर्के अपार । ऐसीं नामें ॥ ४६ ॥
४६) ब्रह्म अरुप आहे कारण त्यास रुप नाही. अलक्ष आहे कारण त्यास पाहाता येत नाही. अगोचर आहे कारण इंद्रियांना आकलन होत नाही. अच्युत कारण स्थान सोडत नाही. अनंत आहे कारण त्याचा आदि अंत लागत नाही. तें अपरंपार आहे कारण त्यास मर्यादा नाहीत. तें अदृश्य आहे, अतर्क्य आहे. ते अपार आहे. अशी ब्रह्माची नावें आहेत. 
नादरुप ज्योतिरुप । चैतन्यरुप सत्तारुप ।
साक्षरुप सस्वरुप । ऐसीं नामें ॥ ४७ ॥
४७) ब्रह्म नादरुप, ज्योतिरुप, चैतन्यरुप, सत्तारुप,साक्षरुप व स्वसरुप आहे.   
सुन्य आणी सनातन । सर्वेश्र्वर आणी सर्वज्ञ ।
सर्वात्मा जगजीवन । ऐसीं नामें ॥ ४८ ॥
४८) तें शून्य आहे, सनातन आहे, सर्वेश्वर, सर्वात्मा व सर्व जगाचे जीवन आहे. अशी त्याची नावें आहेत. 
सहज आणी सदोदित । शुद्ध बुद्ध सर्वातीत ।
शाश्वत आणी शब्दातीत । ऐसीं नामें ॥ ४९ ॥ 
४९) ब्रह्म सहज आहे. ते नेहमी आहेच आहे. शुद्धबुद्ध आहे. सर्वातीत आहे. शाश्वत आहे. तें शब्दाच्या पलीकडे आहे.            
विशाल विस्तीर्ण विश्र्वंभर । विमळ वस्तु व्योमाकार ।
आत्मा परमात्मा परमेश्र्वर । ऐसीं नामें ॥  ५० ॥
५०) तें विशाळ आहे, विस्तीर्ण आहे, तें विश्र्वाला भरुन आहे, तें मलरहित आहे, तें आत्मा, परमात्मा, व परमेश्र्वर आहे.   
परमात्मा ज्ञानघन । येकरुप पुरातन ।
चिद्रूप चिन्मात्र जाण । नामें अनाम्याचीं ॥ ५१ ॥
५१) तें परमात्मा आहे. तें ज्ञानाने भरलेले आहे. तें एकरुप आहे. पुरातन आहे. तें चिद्रूप, चिन्मात्र आहे. अशी अनाम ब्रह्माची नावें आहेत.  
ऐसी नामें असंख्यात । परी तो परेश नामातीत ।
त्याचा करावा निश्र्चितार्थ । ठेविलीं नामें ॥ ५२ ॥
५२) ब्रह्माला अशी बरीच नावें आहेत. पण तो परमेश्र्वर नामांच्या पलीकडे आहे. त्याच्या स्वरुपाची कांहींशी कल्पना यावी म्हणुन हीं इतकीं नामें ठेवली आहेत.
तो विश्रांतीचा विश्राम । आदिपुरुष आत्माराम ।
तें येकचि परब्रह्म । दुसरें नाहीं ॥ ५३ ॥
५३) जेथें विश्रांतीला विश्रांती मिळते, असा तो आदिपुरुष आत्माराम आहे. नामें जरी भिन्न दिसली तरी तें एकच एक परब्रह्म आहे. तें दुसरें कांही नाहीं.
तेंचि कळायाकारणें । चौदा ब्रह्मांचीं लक्षणें ।
सांगिजेती तेणें श्रवणें । निश्र्चयो बाणे ॥ ५४ ॥
५४) हें समजावें म्हणून आतां चौदा ब्रह्मांची लक्षणें सांगतो. त्यांच्या श्रवणाने ब्रह्म एकच एक आहे हें तत्व मनांत ठसते. 
खोटे निवडितां येकसरें । उरलें तें जाणिजे खरें ।
चौदा ब्रह्में शास्त्राधारें बोलिजेती ॥ ५५ ॥
५५) जेवढें खोटे तेवढें बाजुस सारलें कीं, जें उरतें तें खरें असते. चौदा ब्रह्मांचे वर्णन शास्त्राच्या आधारें करतो.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ब्रह्मनिरुपणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara Brahma Nirupan
समास दुसरा ब्रह्मनिरुपण 


Custom Search