Showing posts with label Dashak Satarava. Show all posts
Showing posts with label Dashak Satarava. Show all posts

Sunday, June 3, 2018

Samas Dahava TonapSiddha Lakshan समास दहावा टोणपसिद्धलक्षण


Dashak Satarava Samas Dahava TonapSiddha Lakshan 
Samas Dahava TonapSiddha Lakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about TonapSiddha Lakshan. Tonap means without Knowledge.
समास दहावा टोणपसिद्धलक्षण
श्रीराम ॥
आवर्णोदकीं हटकेश्र्वर । त्यास घडे नमस्कार ।
महिमा अत्यंतचि थोर । तया पाताळलिंगाचा ॥ १ ॥
१) पृथ्वीच्याभोवतीं सात समुद्रांचे आवरण आहे. त्या आवरणोदकामध्यें हतकेश्र्वर नांवाचे शिवलिंग आहे. त्याला मी नमस्कार करतो. त्या पाताळलिंगाचा महिमा फार थोर आहे.    
परंतु तेथें जाववेना । शरीरें दर्शन घडेना ।
विवेकें आणावें अनुमाना । तया ईश्र्वरासी ॥ २ ॥
२) पण तेथें स्थूलदेहानें जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेतां येत नाहीं. म्हणून त्या ईश्र्वराबद्दल विवेकानेंच कल्पना करावीं लागते.  
सातां समुद्रांचे वेडे । उदंड भूमि पैलिकडे ।
सेवटीं तुटले कडे । भूमंडळाचे ॥ ३ ॥
३) प्रथम सात सागरांचे वेढे आहेत. त्यांच्यापलीकडे विस्तीर्ण भूमी आहे. त्याच्याही पलीकडे भूमंडळाचे कडे तुटलेले आहेत. 
सात समुद्र वोलांडावे । तेथें जाणें कैसें फावे ।
म्हणोन विवेकी असावे । साधुजन ॥ ४ ॥
४) एवढें सात समुद्र ओलांडून जाणें कांहीं शक्य नाहीं.म्हणून साधु पुरुषांनीं विवेकानेंच त्याचे ज्ञान करुन घ्यावें.   
जें आपणांस नव्हे ठावें । तें जाणतयास पुसावें ।
मनोवेगें तनें फिरावें । हें तों घडेना ॥ ५ ॥
५) जी गोष्ट आपल्याला माहित नाहीं, ती जाणत्याकडून समजून घ्यावी. मन ज्या वेगानें फिरुं शकतें त्या वेगानें शरीर कांहीं फिरुं शकत नाहीं. 
जें चर्मदृष्टीस नव्हे ठावें । तें ज्ञाानदृष्टीनें पाहावें ।
ब्रह्मांड विवरोन राहावें । समाधानें ॥ ६ ॥
६) जें डोळ्यांच्या दृष्टीला दिसत नाहीं, तें ज्ञानदृष्टीनें पाहावें. ज्ञानदृष्टीनें सार्‍या ब्रह्मांडाचे विवरण करावें. आणि समाधानानें राहावें.
मध्यें आहे भूमीचे चडळ । म्हणौन आकाश आणी पाताळ ।
तें चडळ नस्तां अंतराळ । चहुंकडे ॥ ७ ॥
७) आपली ही पृथ्वी मध्येंच आहे. म्हणून वर आकाश व खालीं पाताळ असा भेद झाला. या पृथ्वीचा तुकडा जर मध्यें नसतां तर मग चोहोंकडे एकच रिकमें अंतराळ भरलेले दिसलें असतें.
तयास परब्रह्म म्हणावें । जें उपाधीवेगळें स्वभावें ।
जेथें दृश्यमायेच्या नांवें । सुन्याकार ॥ ८ ॥
८) जें स्वभावतःच उपाधीपासून मुक्त आहे आणि ज्याच्या ठिकाणी मिथ्या दृश्याचा मागमूस नाहीं. त्याला परब्रह्म असें नांव द्यावें. परब्रह्म अनंत आहे, अमर्याद आहे आणि दृश्यरहित आहे. 
दृष्टीचें देखणें दृश्य । मनाचें देखणें भास ।
मनातील निराभास । विवेकें जाणावें ॥ ९ ॥
९) जें डोळ्यांना दिसतें तें दृश्य होय. जें मनाला आकलन होतें तो भास होय. मनाच्यापलीकडे असलेले जें निराभास परब्रह्म तें विवेकानें जाणावें. 
दृश्य भास अवघा विघडे । विवेक तेथें पवाडे ।
भूमंडळीं ज्ञाते थोडे । सूक्ष्मदृष्टीचे ॥ १० ॥
१०) दृश्य पदार्थ आणि मनाचा भास हें दोन्ही जेथें मागे पडतात तेथें जो विवेकानें मजल मारतो, तो खरा ज्ञानदृष्टीनें पाहणारा होय. पण जगांत अशा सूक्ष्म दृष्टीचे ज्ञाते फार थोडे असतात. विज्ञान, तत्वज्ञान व आत्मज्ञान यांत ज्याच्या अंगी जितकी अधिक सूक्ष्म ज्ञानदृष्टी तितक्या प्रमाणांत तो मोठा द्रष्टा बनतो. ही सूक्ष्मव  विशाल ज्ञानदृष्टी असणे तर परमार्थाची चित्कलाच होय.     
वाच्यांश वाचेनें बोलावा । न बोलतां लक्ष्यांश जाणावा ।
निर्गुण अनुभवास आणावा । गुणाचेनयोगें ॥ ११ ॥
११) वाच्यंश वाचेनें बोलावा. पण लक्ष्यांश हा न बोलतां जाणावा. त्याचप्रमाणें गुणांच्या योगानें निर्गुणाचा अनुभव घ्यावा.  
नाना गुणास आहे नाश । निर्गुण तें अविनाश ।
ढोबळ्याहून विशेष । सूक्ष्म देखणें ॥ १२ ॥
१२) गुणांचा नाश होतो हें प्रत्यक्ष दिसते. निर्गुण तें अविनाशी असते. ते अविनाशी निर्गुण सूक्ष्म असतें. म्हणून त्याला पाहाण्याची स्थूल, ढोबळ दृष्टी कामास येत नाहीं.  
जें दृष्टीस न पडे ठावें । तें ऐकोन जाणावें ।
श्रवणमननें पडे ठावें । सकळ कांहीं ॥ १३ ॥  
१३) जें आपल्या स्थूल दृष्टीला दिसत नाहीं, त्याच्याबद्दल श्रवण करुन त्याचे ज्ञान करुन घ्यावें. श्रवण आणि मनन यांच्या सहायानें सर्व कांहीं आकलन करतां येते.    
अष्टधेचे जिनस नाना । उदंड पाहातां कळेना ।
अवघें सगट पिटावेना । कोणीयेकें ॥ १४ ॥
१४) पांच भूतें आणि तीन गुण यांच्यापासून अनेक प्रकारचे दृश्य पदार्थ निर्माण झालें. त्या सर्व पदार्थांचें ज्ञान करुन घेणें शक्य नाहीं. हें जरी खरें तरी सर्व पदार्थ कोणी सरसगट सारखेच मानू नयेत.   
सगट सारिखी स्थिती जाली । तेथें परीक्षाच बुडाली ।
चविनटानें कालविलीं । नाना अन्नें ॥ १५ ॥
१५) जर सर्व पदार्थ सरसकट सारखेंच असतें तर तेथें चांगलें वाईट, विनाशी अविनाशी, उत्तम अधम इत्यादि भेद नसल्यानें परीक्षेला कांहीं वावच उरला नसता. समजा एखाद्या माणसाच्या तोंडला चव नाहीं तर तो सर्व अन्न एकेठिकाणी कालवतो. त्यामध्यें प्रत्येक पदर्थाची वेगळी चव उरतच नाहीं. तसा हा प्रकार होतो.    
टोणपा नव्हे गुणग्राहिक । मूर्खास कळेना विवेक ।
विवेक आणी अविवेक । येकची म्हणती ॥ १६ ॥
१६) ज्ञानदृष्टीहीन माणूस गुणग्रहण करुं शकत नाहीं. मूर्ख माणूस विवेक करुं शकत नाहीं. विवेक व अविवेक या दोन्हीला हे लोक एकच समजतात.
उंच नीच कळेना ज्याला । तेथें अभ्यासचि बुडाला ।
नाना अभ्यासें प्राणीयाला । सुटिका कैंची ॥ १७ ॥
१७) श्रेष्ठ कोणतें आणि कनिष्ठ कोणतें हे ज्याला कळत नाहीं, त्याला परमार्थाचा अभ्यास करतां येत नाहीं. सूक्ष्म व श्रेष्ठ, स्थूल व कनिष्ठ, हे कळले पाहिजे, तर परमार्थ साधना होऊं शकते. हें न कळतां स्थूलामधील नाना प्रकारचे अभ्यास केले तर माणसाला बंधनांतून मुक्त होतां येणार नाहीं.   
वेड लागोन जालें वोंगळ । त्यास सारिखेंच वाटे सकळ ।
तें जाणावें बाश्कळ । विवेकी नव्हेती ॥ १८ ॥
१८) ज्या माणसाला वेड लागले तो स्वतः तारतम्यहीन बनतो. घाण काय आणि चांगलें पदार्थ काय दोन्ही त्याला सारखेंच वाटतात. त्याचप्रमाणें स्थूल आणि सूक्ष्म; शाश्वत आणि अशाश्वत यांतील फरक ज्यांना कळत नाहीं तें ज्ञानहीन समजावे. ते कांहीं विवेकी नव्हेत.  
ज्यास अखंड होतो नाश । त्यासीच म्हणती अविनाश ।
बहुचकीच्या लोकांस । काये म्हणावें ॥ १९ ॥
१९) ज्या दृश्य वस्तूंचा सतत नाश चालू आहे त्यानांच हे लोक अविनाश म्हणतात. असल्या अडाणी पण स्वतःला शहाणे समजणार्‍या माणसांना काय म्हणावें?   
ईश्र्वरें नाना भेद केले । भेदें सकळ सृष्टी चाले ।
आंधळे परीक्षवंत मिळाले । तेथें परीक्षा कैंची ॥ २० ॥
२०) ईश्र्वरानें पुष्कळ प्रकारचे भेद केलें आहेत. त्या भेदांच्या पार्श्वभूमीवर जग चालतें. हे प्रत्यक्षच आहे. पण परीक्षा करणारेच जर आंधळें असतील तर या दृश्य जगाची परीक्षा होणार कशी?   
जेथें परीक्षेचा अभाव । तो टोणपा समुदाव ।
गुणचि नाहीं गौरव । येईल कैंचें ॥ २१ ॥
२१) ज्या ठिकाणी परीक्षा करण्यास लागणारी ज्ञानदृष्टी नाहीं, तो टोणप्यांचा समूह असतो. त्यांच्या अंगी जरुर असणारे गुणच नसल्यानें परीक्षक म्हणून त्यांचा गौरव करता येत नाही.
खरें खोटें येकचि जालें । विवेकानें काये केलें ।
असार सांडून सार घेतलें । साधुजनीं ॥ २२ ॥
२२) मानवी जीवनांत खरें व खोटें यांचें मिश्रण झालेलें असतें. मग विवेक काय करणार? तर विवेक करणारे साधुपुरुष त्यांतील असार सोडून सार तेवढें ग्रहण करतात.  
उत्तम वस्तूची परीक्षा । कैसी घडे नतद्रष्टा ।
दीक्षाहीनापासीं दीक्षा । येईल कैंची ॥ २३ ॥
२३) नतद्रष्ट म्हणजे हलक्या प्रतीच्या माणसाला उत्तम वस्तुची परीक्षा करता येत नाही. जो स्वतः दीक्षाहीन आहे त्याच्यापाशीं दीक्षेचे तेज व सामर्थ्य आढळणें शक्य नाही. 
आपलेन वोंगळपणें । दिशा करुन शौच्या नेणे ।
वेद शास्त्रें पुराणें । त्यास काये करिती ॥ २४ ॥
२४) समजा एखादा माणूस शौच्यास गेला आणि ढुंगण न धुताच तसाच घणेरडा राहिला. तर वेद, शास्त्रें, पुराणें त्याच्यापुढें कांहींच करुं शकत नाहीत.
आधीं राखावा आचार । मग पाहावा विचार ।
आचारविचारें पैलपार । पाविजेतो ॥ २५ ॥
२५) प्रथम आचार उत्तम रीतीनें पाळावा. त्याचप्रमाणें उत्तम विचार करायला शिकावें. अशा आचारविचारानें संपन्न माणसाला पैलतीरास जाता येते. 
जें नेमकास न कळे । तें बाश्कळास केवी कळे ।
डोळस ठकती आंधळे । कोण्या कामाचे ॥ २६ ॥
२६) परमार्थाचा नियमानें व व्यवस्थितपणें अभ्यास करणार्‍यांना सुद्धां परमार्थस्वरुप कळणें कठीण पडतें. तें अभ्यास न करणार्‍या टोणप्यांना कळणें शक्य नाहीं. ज्या ठिकाणीं डोळस माणसें फसतात. तेथें आंधळें फसतील यांत नवल नाहीं. आंधळ्याचें कांहीं चालणार नाहीं.
पापपुण्य स्वर्गनर्क । अवघेंच मानिलें येक ।
विवेक आणी अविवेक । काये मानावें ॥ २७ ॥
२७) पापपुण्य, स्वर्गनर्क, हें सगळें जो एकच मानतो, तो विवेक आणि अविवेक यामद्ध्यें फरक मानणारच नाहीं.
अमृत विष येक म्हणती । परी विष घेतां प्राण जाती ।
कुकर्में होते फजिती । सत्कर्में कीर्ति वाढे ॥ २८ ॥
२८) अमृत व वीष एक म्हटलें तर कांहीं हरकत नाहीं. पण वीष घेतलें तर प्राण जातो. त्याचप्रमाणें वाईट कर्में केल्यानें फजिती होतें आणि चांगलीं कर्में केल्यानें प्रसिद्धी होते. कीर्ति वाढते हा प्रत्यक्ष अनुभव आहे.   
इहलोक आणि परलोक । जेथें नाहीं साकल्य विवेक ।
तेथें अवघेंच निरार्थक । सकळ कांहीं ॥ २९ ॥
२९) इहलोक आणि परलोक, प्रपंच आणि परमार्थ, यांबद्दल सर्वांगीण विवेक ज्यांच्यापाशी नाहीं, त्यांच्या जीवनांत कशालाच कांहीं अर्थ राहात नाहीं. सगळेंच निरर्थक होऊन जाते.  
म्हणौन संतसंगेंचि जावें । सत्शास्त्रचि  श्रवण करावें ।
उत्तम गुणास अभ्यासावें । नाना प्रयेत्नें ॥ ३० ॥
३०) म्हणून सत्संगानें जावें. सत्शास्त्राचे श्रवण करावें. आणि नानाप्रकारें प्रयत्न करुन उत्तम गुणांचा अभ्यास करावा. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे टोणपसिद्धालक्षणनाम समास दहावा ॥
Samas Dahava TonapSiddha Lakshan
समास दहावा टोणपसिद्धलक्षण


Custom Search

Friday, June 1, 2018

Samas Navava TanuChatushtaya Nirupan समास नववा तनुचतुष्टय निरुपण


Dashak Satarava Samas Navava TanuChatushtaya Nirupan 
Samas Navava TanuChatushtaya Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Tanu Chatushtaya.
समास नववा तनुचतुष्टय निरुपण 
श्रीराम ॥
स्थूळ सूक्ष्म कारण माहाकारण । ऐसे हे चत्वार देह जाण ।
जागृति स्वप्न सुषुप्ति पूर्ण । तुर्या जाणावी ॥ १ ॥
१) स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण असे चार देह आहेत. जागृति,स्वप्न, सुषुप्ति आणि तुर्या या चार अवस्था आहेत.     
विश्व तैजस प्राज्ञ । प्रत्यगात्मा हे अभिमान ।
नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान । मूर्धनी ते ॥ २ ॥
२) विश्व, तेजस, प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा हे चार देहाचे चार अभिमान आहेत. जागेपणीं  " हा देह मी आहे " असा अभिमान असणारा तो विश्व होय. स्वप्न पडत असतांना वावरणारा " मी " तो तैजस होय. गाढ झोपेंत शांत असणरा " मी " तो प्राज्ञ होय. आणि तुरीय अवस्थेमध्यें जो साक्षीरुप अंतरात्मा असतो     , तो प्रत्यगात्मा होय. विश्र्वाचे स्थान नेत्र, तैजसाचे स्थान कंठ, प्राज्ञाचें स्थान हृदय आणि प्रत्यगात्म्याचे स्थान टाळू होय. 
स्थूळभोग प्रविक्तभोग । आनंदभोग आनंदावभासभोग ।
ऐसे हे चत्वार भोग । चौदेहाचे ॥ ३ ॥  
३) स्थूलभोग स्थूलदेहाचा, प्रविक्र भोग सूक्ष्म देहाचा, अनंदभोग कारण देहाचा आणि आनंदावभासभोग महाकारण देहाचा होय. प्रतिविविक्त म्हणजे निवडून वेगळा केलेला असा. स्वप्नामध्यें भोग असतो पण तो सामान्य स्थू;भोग नसतो. ज्ञात्यानें किंवा भोक्त्यानें एक प्रकारें निवडलेला भोग असतो. म्हणून तो प्रविविक्त भोग होय. सुषुप्तीच्या पलीकडे पण परब्रह्माच्या अलीकडे आनंदमय कोशामध्यें जो आनंदाचा भोग होतो तो महाकारण देहाचा आनंदावभासभोग होय.   
अकार उकार मकार । अर्धमात्रा तो ईश्र्वर ।
ऐस्या मात्रा चत्वार । चौदेहाच्या ॥ ४ ॥
४) अकार स्थूल देहाची मात्रा, उकार सूक्ष्म देहची मात्रा, मकार कारण देहाची मात्रा आणि जिला ईश्र्वर म्हणतात ती महाकारण देहाची अर्धमात्रा होय. ओंकारांतून सर्व विश्र्व निर्माण झालें असा सिद्धान्त आहे. ओंकारावरील जी अर्धमात्रा ती बिंदूनें दर्शवितात. अकार म्हणजेम जड पंचभूतें,  उकार म्हणजे जीवनकला,  मकार म्हणजे अंतःकरण आणि अर्ध मात्रा म्हणजे अंतरात्मा होय. 
तमोगुण रजोगुण । सत्वगुण शुद्धसत्वगुण ।
ऐसे हे चत्वार गुण । चौदेहाचे ॥ ५ ॥
५) तमोगुण स्थूलदेहाचा, रजोगुण सूक्ष्मदेहाचा, सत्त्वगुण कारणदेहाचा आणि शुद्धसत्त्वगुण महाकारण देहाचा होय.
क्रियाशक्ति द्रव्यशक्ती । इच्छाशक्ति ज्ञानशक्ती । 
ऐशा चत्वार शक्ती । चौदेहाच्या ॥ ६ ॥
६) क्रियाशक्ति म्हणजे कर्म करण्याची शक्ति, द्रव्यशक्ति म्हणजे दृश्य पदार्थांतील सुप्तशक्ति होय. इच्छाशक्ति म्हणजे माणसाच्या वासनांना ताजेपणा ठेवावयास लागणारी अविद्या होय. ज्ञानशक्ति म्हणजे '" मी आत्मस्वरुप आहे " या अनुभवांतून निर्माण होणारे सामर्थ्य होय.
ऐसीं हे बत्तिस तत्वें । दोहींचीं पन्नास तत्वें ।
अवघीं मिळोन ब्यासि तत्वें । अज्ञान आणि ज्ञान ॥ ७ ॥
७) अशी ही बत्तीस तत्वें आहेत. त्यांच्यामध्यें पूर्वींची स्थूलदेहाची पंचवीस व सूक्ष्मदेहाची पंचवीस मिळून पन्नास तत्वें मिसळलीं कीं, ब्याऐशीं तत्वें होतात. शिवाय ज्ञान आणि अज्ञान हीं दोन्ही आणखीं घालायची. अशी एकंदर चौर्‍यांशीं तत्वें होतात.  
ऐसीं हे तत्वें जाणावी । जाणोन माइक वोळखावीं ।
आपण साक्षी निरसावीं । येणें रीतीं ॥ ८ ॥
८) तत्त्वें अशी आहेत तें ओळखावें. तीं सारी मायिक आहेत हें जाणावें. आपण साक्षीपणानें राहून त्यांचे निरसन करावें. 
साक्षी म्हणिजे ज्ञान । ज्ञानें वोळखावें अज्ञान ।
ज्ञाानाज्ञानाचें निर्शन । देहासरिसें ॥ ९ ॥
९) साक्षीपणा म्हणजे ज्ञान होय. त्या ज्ञानानें अज्ञान ओळखावें. देहाचा निरास झाला म्हणजे ज्ञान व अज्ञान दोन्हींचा निरास होतो. 
ब्रह्मांडीं देह कल्पिले । विराट हिरण्यगर्भ बोलिले । 
ते हे विवेकें निर्शले । आत्मज्ञानें ॥ १० ॥
१०) पिंडाच्या देहावरुन ब्रह्मांडाच्या देहाची कल्पना केलेली आहे. त्यांना विराट व हिरण्यगर्भ अशीं नांवें आहेत. आत्मज्ञानानें विवेक केला म्हणजे त्यांचेही निरसन होऊन जाते.   
आत्मानात्मविवे करितां । सारासारविचार पाहातां ।
पंचभूतांची माइक वार्ता । प्रचित आली ॥ ११ ॥
११) आत्मानात्मविवेक केला असतां आणि सारासार विचार करुन पाहिलें असतां, पंचभूतें मायिक आहेत अशी प्रचिती येते. 
अस्ति मांष त्वचा नाडी रोम । हे पांचहि पृथ्वीचे गुणधर्म ।
प्रत्यक्ष शरीरीं हें वर्म । शोधून पाहावें ॥ १२ ॥
१२) हाडें, मांस, त्वाचा, नाडी व रोम हे पांचही पृथ्वीचे गुणधर्म आहेत. आपण स्वतःच्या शरीरामध्यें हें वर्म प्रत्यक्ष शोधून पाहावें. 
शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद । हे आपाचे पंचभेद । 
तत्वें समजोन विशद । करुन घ्यावीं ॥ १३ ॥
१३) रेत, रक्त, लाळ, मूत्र, व घाम हें पाण्याचें पंचक आहे. ही तत्त्वें समजून स्पष्ट कल्पना करुन घ्यावी.
क्षुधा त्रुषा आलस्य निद्रा मैथुन । हे पांचहि तेजाचे गुण ।
या तत्वांचें निरुपण । केलेंचि करावें ॥ १४ ॥
१४) भूक, तहान, आळस, निद्रा व मैथुन हे पांच तेजाचे गुण आहेत. या तत्त्वांचे विवेचन पुनः पुनः करावें.    
चळण वळण प्रासारण । निरोध आणि आकोचन ।
हे पांचहि वायोचे गुण । श्रोतीं जाणावे ॥ १५ ॥
१५) चळण, वळण, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हें पांच गुण वायूचे आहेत. हे श्रोत्यांनी ओळखावें.   
काम क्रोध शोक मोहो भये । हा आकाशाचा परियाये ।
हें विवरल्याविण काये । समजों जाणें ॥ १६ ॥
१६) काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे आकाशाशी संबंधित आहेत. याचें विवरण केल्यांवांचून ते समजणार नाहींत.
असो ऐसें हें स्थूळ शरीर । पंचविस तत्वांचा विस्तार ।
आतां सूक्ष्मदेहाचा विचार । बोलिजेल ॥ १७ ॥
१७) असो. असें हें स्थूल शरीर आहे. त्यामध्यें पंचवीस तत्त्वांचा विस्तार आढळतो. आतां सूक्ष्म देहाचा विस्तार सांगतो.  
अंतःकर्ण मन बुद्धि चित्त अहंकार । आकाशपंचकाचा विचार ।
पुढें वायो निरोत्तर । होऊन ऐका ॥ १८ ॥
१८) अंतःकरण, मन, बुद्धि, चित्त व अहंकार हेआकाशपंचक आहे. आतां वायूचा विचार सांगतो.  
व्यान समान उदान । प्राण आणी अपान ।
ऐसे हे पांचहि गुण । वायोतत्वाचे ॥ १९ ॥
१९) व्यान, समान, उदान, अपान आणि प्राण हे पांच वायूचे गुण आहेत.  
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । हें पांचहि तेजाचे गुण ।
आतां आप सावधान । होऊन ऐका ॥ २० ॥   
२०) कान, त्वचा, डोळे, जीभ व नाक हे तेजाचे गुण आहेत. आतां आपगुण ऐका.    
वाचा पाणी पाद शिस्न गुद । हे आपाचे गुण प्रसिद्ध ।
आतां पृथ्वी विशद । निरोपिली ॥ २१ ॥
२१) वाणी, हात, पाय, जननेंद्रिय व गुद हे पाण्याचे प्रसिद्ध गुण आहेत. आतां पृथ्वीचे गुण ऐका. 
शब्द स्पर्श रुप रस गंध । हे पृथ्वीचे गुण विशद ।
ऐसे हे पंचवीस तत्वभेद । सूक्ष्म देहाचे ॥ २२ ॥
२२) शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध हे पृथ्वीचे प्रसिद्ध गुण आहेत. अशीं हीं सूक्ष्मदेहाची पंचवीस तत्त्वें आहेत.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तनुचतुष्टयेनाम समास नववा ॥
Samas Navava TanuChatushtaya Nirupan
समास नववा तनुचतुष्टय निरुपण 


Custom Search

Wednesday, May 30, 2018

Samas Satava JagJivan Nirupan समास सातवा जगजीवन निरुपण


Dashak Satarava Samas Satava JagJivan Nirupan 
Samas Satava JagJivan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Jag Jivan. Jivan means Life. In this Samas Samarth is telling us about Atma is appearing differently in each person.
समास सातवा जगजीवन निरुपण
श्रीराम ॥
मुळीं उदक निवळ असतें । नाना वल्लीमधें जातें ।
संगदोषें तैसें होतें । आंब्ल तिक्षण कडवट ॥ १ ॥
१) पाणी मुळामध्यें स्वच्छ असते. अनेक प्रकारच्या वेली वनस्पतींमध्यें तें शिरते आणि त्यांच्या संगतीचा दोष लागून तें आंबट, तिखट किंवा कडू बनतें.  
आत्मा आत्मपणें असतो । देहसंगें विकारतो ।
साभिमानें भरीं भरतो । भलतिकडे ॥ २ ॥
२) त्याचप्रमाणें आत्मा मुळांत आत्मस्वरुपानें शुद्ध असतो. त्याला देहाची संगत लाभली कीं, त्याचें शुद्धपण लोपते. आणि त्याच्यांत विकार उत्पन्न होतात. अभिमानाच्या भरांत तो भलत्याच भरीला पडतो.
बरी संगती सांपडली । जैसी उंसास गोडी आली ।
विषवल्ली फापांवली । घातकी प्राणी ॥ ३ ॥
३) पाण्याला चांगली संगत लाभली कीं तें चांगलें होतें. जसें की, उसाची संगत लाभली की पाण्याचा गोड रस होतो. परंतु विषारी वेलीची संगत लागली तर त्याच पाण्याचा प्राणघातक रस होतो. 
अठराभार वनस्पती । गुण सांगावे ते किती ।
नाना देहाचे संगती । आत्मयास होये ॥ ४ ॥
४) अठरा प्रकारच्या वनस्पती आहेत. प्रत्येकांत पाण्यास निरनिराळे गुण प्राप्त होतात. ते सगळें सांगणें शक्य नाहीं. अंतरात्म्याचे देखील असेंच घडते. निरनिराळ्या देहांच्या संगतीनें त्याच्यामध्यें निरनिराळे गुण आढळतात. 
त्यामधें कोणी भले । ते संतसंगें निघाले ।
देहाभिमान सांडून गेले । विवेकबळें ॥ ५ ॥  
५) देहांत जें चांगलें असतात तें संतसंगतीनें कालक्रमणा करतात. सत् संगतीमुळें उत्पन्न होणार्‍या विवेकाच्या जोरावर ते देहाभिमान सोडून जातात. विवेकानें त्यांची देहबुद्धि नष्ट होते.       
उदजाचा नाशचि होतो । आत्मा विवेकें निघतो । 
ऐसा आहे प्रत्यय तो । विवेकें पाहा ॥ ६ ॥
६) परंतु पाणी व अंतरात्मा यांच्यात फरक आहे. पाणी पंचभूतांपैकी आहे. म्हणून त्याचा नाश होतो. अंतरात्मा अविनाशी असल्यानें तो आत्मानात्म विवेकानें देहांतून बाहेर पडतो. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. तो विचारानें ओळखावा.
ज्यास स्वहितचि करणें । त्यास किती म्हणौन सांगणें ।
हें ज्याचें त्यानें समजणें । सकळ कांहीं ॥ ७ ॥  
७) ज्याला आपले कल्याण करुन घ्यायचे आहे, त्याला आणखी किती सांगायचें? ज्याचें त्यानेंच हें सर्व कांहीं समजून घेतलें पाहिजे.  
आपला आपण करी कुडावा । तो आपला मित्र जाणावा ।
आपला नाश करी तो समजावा । वैरी ऐसा ॥ ८ ॥
८) जो स्वतःच स्वतःस सांभाळतो तो स्वतःचा मित्र समजावा. जो स्वतःच स्वतःचा नाश करतो, तो स्वतःचा शत्रु समजावा.  
आपलें आपण अन्हित करावें । त्यास आडवें कोणें निघावें ।
येकांतीं जाऊन जीवें । मारी आपणासी ॥ ९ ॥
९) जो स्वतःचे अकल्याण करायला निघाला असेल, त्याला आडवें जाण्यांत अर्थ नाहीं. एकांतामध्यें जाऊन तो स्वतःच आपला जीव देतो.
जो आपला आपण घातकी । तो आत्महत्यारा पातकी ।
याकारणें विवेकी । धन्य साधु ॥ १० ॥
१०) जो स्वतःच आपला घात करुन घेतो तो आत्महत्यारा पातकी समजावा. म्हणून आत्मानात्म विवेक करणारा साधु धन्य होय. 
पुण्यवंतां संत्सगती । पापिष्टां असत्संगती । 
गति आणि अवगती । संगतीयोगें ॥ ११ ॥
११) पुण्यवान पुरुष सत् संगती धरतो. तर पापी वाईट संगति धरतो. त्या संगतीमुळें एकाला उत्तम गति मिळते तर दुसर्‍याला अधोगति मिळते. 
उत्तम संगती धरावी। आपली आपण चिंता करावी ।
अंतरीं बरी विवरावी । बुद्धि जाणत्याची ॥ १२ ॥
१२) म्हणून माणसानें उत्तम संगति धरावी. आपणच आपली काळजी घ्यावी. जाणत्या माणसाचे विचार घेऊन आपल्या अंतर्यामी त्यांचें विवरण करावें. 
इहलोक आणि परलोक । जाणता तो सुखदायेक । 
नेणत्याकरितां अविवेक । प्राप्त होतो ॥ १३ ॥
१३) इहलोक असो किंवा परलोक असो, दोन्हीकडे जो जाणता असेल त्यास सुख लाभते. जो नेणता आहे तो दोन्हीकडे अविवेकानें वागतो. 
जाणता देवाचा अंश । नेणता म्हणिजे तो राक्षस ।
यामधें जें विशेष । तें जाणोन घ्यावें ॥ १४ ॥
१४) जो जाणता आहे तो देवाचा अंश समजावा. तर नेणता आहे तो राक्षसाचा अंश समजावा. या दोन्हींत जें विशेष असेल, योग्य आणि ग्राह्य असेल , ते ओळखून ग्रहण करावें.
जाणतां तो सकळां मान्य । नेणता होतो अमान्य ।
जेणेंकरितां होईजे धन्य । तेंचि घ्यावें ॥ १५ ॥
१५) जो जाणता असेल तो सगळ्यांना मान्य होतो. तर जो नेणता आहे तो सर्वांना अमान्य होतो. ज्याच्या योगानें आपण धन्य होऊन जाऊं, तेच आपण ग्राह्य करावें.  
साक्षपी शाहाण्याची संगती । तेणें साक्षपी शाहाणें होती ।
आळसी मूर्खाची संगती । आळसी मूर्ख ॥ १६ ॥
१६) उद्योगी व शाहाण्या माणसाची संगत आपण धरली तर आपण देखील उद्योगी व शहाणे बनतो. आळशी व मूर्ख माणसाची संगत आपल्यला आळशी व मूर्ख बनवते.  
उत्तम संगतीचें फळ सुख । अद्धम संगतीचें फळ दुःख ।
आनंद सांडुनियां शोक । कैसा घ्यावा ॥ १७ ॥
१७) उत्तम संगतीचे सुख हें फळ आहे. तर अधम संगतीचे दुःख हे फळ आहे.  असें जर आहे तर आनंदाचा अव्हेर करुन मुद्दाम दुःख पत्करणें योग्य नाहीं.  
ऐसें हें प्रगट दिसे । जनामधें उदंड भासे ।
प्राणीमात्र वर्ततसे । उभयेयोगें ॥ १८ ॥
१८) जगांत हें उघड दिसतें. लोकांमध्यें हें पुष्कळ पाहावयास मिळतें. कांहीं लोक सत्संगतीनें वागतात तर लोक असत्संगतीनें वागतात. तर कांहीं त्यामुळें बिघडतात. या दोन्ही गोष्टी पाहावयास मिळतात. 
येका योगें सकळ योग । येका योगें सकळ वियोग ।
विवेकयोगें सकळ प्रयोग । करीत जावे ॥ १९ ॥
१९) सज्जनांशी योग आला तर सगळ्या चांगल्या गोष्टी जुळून येतात. दुर्जनांशी योग आला तर सगळ्या गोष्टींचा विचका होतो. असें असल्यानें आपली सर्व कामें विवेकी पुरुषांच्या मदतीनें करीत जावीत.   
अवचितें सांकडींत पडिलें । तरी तेथून पाहिजे निघालें ।
निघोन जातां जालें । परम समाधान ॥ २० ॥
२०) समजा एखादे अनपेक्षित संकट आपल्यावर आलें तर न घाबरतां विवेकानें आपण त्यांतून बाहेर पडावें. असे केल्यानें मनाला फार मोठे समाधान लाभते.  
नाना दुर्जनांचा संग । क्षणक्षणा मनभंग ।
याकारणें कांहीं रंग । राखोन जावें ॥ २१ ॥
२१) जीवनांत अनेक प्रकारच्या दुर्जनांशी संगत घडते. त्या योगानें पदोपदी आपला मानभंग होतो. आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात. या कराणानें आपलें महत्व राहील असेंच आपण वागावें. 
शाहाणा येत्न त्याच्या गुणें । पाहों जातां काये उणें ।
सुख संतोष भोगणें । नाना श्र्लाघ्यता ॥ २२ ॥  
२२) मनुष्य जर शहाणपणानें प्रयत्न करील, तर त्या गुणानें माणसाला कांहींच कमी पडणार नाहीम. त्याच्या प्रयत्मनानें सुखसंतोष तर लाभेलच पण लोकांमध्यें त्याला महत्व प्राप्त होईल.        
आतां लोकीं ऐसें आहे । सृष्टीमधें वर्तताहे ।
जो कोणी समजोन पाहे । त्यास घडे ॥ २३ ॥
२३) जगामध्यें आणि मानवसमाजामध्यें अशी परिस्थिती आहे त्याला इलाज नाहीं. जो माणूस हें समजून जगतो त्यास सुखसंतोष लाभतो. 
बहुरत्न वसुंधरा । जाणजाणों विचार करा ।
समजल्यां प्रत्ययो अंतरा- । माजीं येतो ॥ २४ ॥
२४) या पृथ्वीवर पुष्कळ नररत्नें आहेत. त्यांना जाणून घ्यावें व आपण विचार करावा. अशा प्रकारें जीवन समजले म्हणजे आपल्या अंतर्यामीं आपल्याला प्रचिती येते. 
दुर्बळ आणि संपन्न । वेडें आणि वित्पन्न । 
हें अखंड दंडायमान । असतचि असे ॥ २५ ॥
२५) एक दरिद्री तर एक श्रीमंत, एक वेडा तर एक विद्वान, अशी जगाची राहाटी पूर्वीपासून चालत आलेली आहे. हा भेद असाच कायम राहाणार.  
येक भाग्यपुरुष मोडती । येक नवे भाग्यवंत होती ।
तैसीच विद्या वित्पत्ती । होत जाते ॥ २६ ॥
२६) एके काळी संपत्तिमान असलेलेम पुरुष कालंतरानें संपत्तिहीन बनतात. आणि नविन संपत्तिमान पुरुष पुढें येतात. विद्येच्या आणि ज्ञानाच्या बाबतींतही असेंच घडतें. 
येक भरे येक रितें । रितें मागुतें भरतें ।
भरतेंहि रितें होतें । काळांतरीं ॥ २७ ॥
२७) एक भरतें, दुसरें रिकामें होते. रिकामें झालेलें पुनः भरते. कालांतरानें जें भरलेलें असरें तें पुनः रिकामें होऊन जाते. 
ऐसी हे सृष्टीची चाली । संपत्ति दुपारची साउली ।
वयेसा तरी निघोन गेली । हळुहळु ॥ २८ ॥
२८) सृष्टीचा व्यवहार हा असा चालतो. दुपारची सावली जशी तात्पुरती तशीच संपत्तिची स्थिती असतें. माणसाचें आयुष्य न कळत हळुहळु कमी होत असते. 
बाळ तारुण्य आपलें । वृधाप्य प्रचितीस आलें ।
ऐसें जाणोन सार्थक केलें । पाहिजे कोणियेकें ॥ २९ ॥
२९) बाळपण जातें, तरुणपण जातें आणि म्हातारपण अनुभवास येते.हें ओळखून प्रत्येकानें आपलें सार्थक करुन घ्यावें. 
देह जैसें केलें तैसें होतें । येत्न केल्यां काये साधतें ।
तरी मग कष्टाचें तें । काये निमित्य ॥ ३० ॥
३०) देहाला जसें वागवावें तसें तो वागायला शिकतो. माणसानें प्रयत्न केला तर त्याला कोणतेही कार्य साध्य करतां येते. असें असल्यानें मग विनाकारण कष्ट करण्याचें कांहींच कारण नाहीं. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे जगजीवननिरुपणनाम समास सातवा ॥    
   Samas Satava JagJivan Nirupan
समास सातवा जगजीवन निरुपण


Custom Search

Tuesday, May 29, 2018

Samas Sahava Dehatma Nirupan समास सहावा देहात्म निरुपण


Dashak Satarava Samas Sahava Dehatma Nirupan 
Samas Sahava Dehatma Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Deha (body) and Aatma. Body and Aatma both are related to each other.
समास सहावा देहात्म निरुपण
श्रीराम ॥
आत्मा देहामध्यें असतो । नाना सुखदुःखें भोगितो ।
सेवटीं शरीर सांडून जातो । येकायेकीं ॥ १ ॥
१) आत्मा देहांत राहतो आणि अनेक प्रकारची सुखदुःखें भोगतो. अखेर तो एकाएकी देह सोडून जातो.     
शरीरीं शक्ति तारुण्यपणीं । नाना सुखें भोगी प्राणी ।
अशक्त होतां वृद्धपणीं । दुःखें भोगी ॥ २ ॥
२) तरुणपणीं शरीरांत शक्ति असते त्या जोरावर माणूस अनेक सुखें भोगतो. म्हातारपणीं शक्ति क्षीण होते व मग अनेक दुःखें भोगावी लागतात. 
मरावेना ऐसी आवडी । हातपाये खोडून प्राण सोडी ।
नाना दुःखें अवघडी । वृद्धपणीं ॥ ३ ॥
३) आपण मरुं नये असें प्रत्येकास मनापासून वाटतें. पण मृत्यु आला कीं, माणूस हातपाय झाडून प्राण सोदतो. म्हातारपणीं अनेक प्रकारच्या दुःखांनीं माणूस अवघडून जातो. 
देहआत्मयांची संगती । कांहींयेक सुख भोगिती ।
चर्फडचर्फडून जाती । देहांतकाळीं ॥ ४ ॥
४) देह व आत्मा यांची संगत झाली म्हणजे कांहीं सुखें भोगायला मिळतात. हें खरें, पण देह सुटायच्यावेळीं जीव अगदी धडपडून मरतो.  
ऐसा आत्मा दुःखदायेक । येकांचे प्राण घेती येक ।
आणी सेवटीं निरार्थक । कांहींच नाहीं ॥ ५ ॥
५) देहात्मयोग अशारीतीनें दुःख देणारा होतो. जगांत स्वार्थानें माणसें एकमेकांचा प्राण घेतात. पण शेवटीं हें सगळें व्यर्थ जातें. त्याचा कांहीं उपयोग होत नाहीं. 
ऐसा दों दिसांचा भ्रम । त्यास म्हणती परब्रह्म ।
नाना दुःखाचा संभ्रम । मानून घेतला ॥ ६ ॥
६) असा हा दोन दिवसांचा दृश्याचा भ्रम आहे. त्यालाच परब्रह्म समजून, सर्वस्व मानून लोक जगतात. या दुःखाच्या पसार्‍याला लोक गोड मानून घेतात. 
दुःखी होऊन चर्फडून गेले । तेथें कोण समाधान जालें ।
कांहींयेक सुख भोगिलें । तों सवेंचि दुःख ॥ ७ ॥
७) दुःख भोगावें लागल्यानें चरफडत जाण्याची पाळी आली तर त्यांत कांहींही समाधान मिळत नाहीं. थोडें कांहीं सुख भोगायला जावें तर त्याच्याबरोबर दुःख भोगावें लागतें. 
जन्मदारभ्य आठवावें । म्हणिजे अवघें पडेल ठावें ।
नाना दुःख मोजावें । काये म्हणोनी ॥ ८ ॥
८) जन्मल्यापासूनचें आपलें जीवन आपण आठवावें, म्हणजे सगळें आपोआप ध्यानांत येईल. आपण इतकीं दुःखें भोगलेलीं असतात कीम त्यांची मोजदाद करतां येणार नाहीं.  
ऐसी आत्मयांची संगती । नाना दुःखें प्राप्त होती ।
दैन्यवाणे होऊन जाती । प्राणीमात्र ॥ ९ ॥
९) देहाशीं आत्म्याची संगत ही अशी आहे. देहात्मयोगानें जीवाला अनेक दुःखें भोगावीं लागतात. आयुष्याच्या शेवटीं सारे प्राणी दीनवाणें होऊन मरतात.   
कांहीं आनंद कांहीं खेद । जन्मवरी पडिला समंध ।
नाना प्रकारीं विरुद्ध । तडातोडी ॥ १० ॥
१०) कांहीं सुख व कांहीं दुःख, असा हा जन्माचा संबंध असतो. त्यामध्यें नाना प्रकारच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात, तसेंच अनेकांची ताटातूट होते.   
निद्राकाळीं ढेकूण पिसा । नाना प्रकारीं वळसा ।
नाना उपायें वळसा । त्यांस होये ॥ ११ ॥
११) झोपेच्या वेळीं ढेकूण आणि पिसवा अनेक प्रकारें माणसाला त्रास देतात. माणूस त्यांचा प्रतिकार करतो. तेव्हां त्यांनाहीं अनेक प्रकारें त्रास होतो. 
भोजनकाळीं माश्या येती । नाना पदार्थ उंदीर नेती ।
पुढें त्यांची हि फजिती । मार्जारें करिती ॥ १२ ॥
१२) जेवायला बसलें कीं माश्या येऊन त्रास देतात. उंदीर कितीतरी पदार्थ घेऊन जातात. नंतर मांजरें त्यांची फजिती करतात. त्यांना त्रास देतात. 
वा चामवा गोंचिड । गांधेलें कानटें उदंड ।
येकास येक चर्फड । दोहिकडे ॥ १३ ॥
१३) उवा, चामवा, कातड्यांत शिरणारे किडे, गोचीड, गांधील माश्या, कानटे नावाचे सर्प, असे नाना प्रकारचे प्राणी आहेत. या प्राण्यांत एकमेकाविषयीं वैर असतें. त्यामुळें सर्वांना दुःख भोगावें लागतें. 
विंचु सर्प वाग रिसें । सुसरी लांडिगे माणसास माणसें ।
परस्परें सुखसंतोषें । येकहि नाहीं ॥ १४ ॥
१४) विंचू, साप, वाघ, अस्वल, सुसरी, लांडगे आणि माणसाला माणसें या सर्व प्राण्यांमध्यें परस्परांबद्दल प्रेम, सुख व संतोष कोठेंहि आढळत नाहीं.
चौर्‍यासि लक्ष उत्पत्ती । येकास येक भक्षिती ।
नाना पीडा दुःखणी किती । म्हणौन सांगावें ॥ १५ ॥
१५) जगांत येवढे चौर्‍यांशी लक्ष प्राणी आहेत, पण ते एकमेकांना खातात. जगांत पीडांचे व दुःखांचे इतके प्रकार आहेत कीं, त्या सर्वांचे वर्णन करणें अशक्य आहे.   
ऐसी अंतरात्म्याची करणी । नाना जीव दाटले धरणी ।
परस्परें संव्हारणी । येकायेकांची ॥ १६ ॥
१६) त्या अंतरात्म्याची करणी अशी विलक्षण आहे. या पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव गर्दी करुन आहेत. ते परस्परांचा संहार करतात. 
अखंड रडती चर्फडिती । विवळोंविवळ प्राण देती ।
मूर्ख प्राणी त्यास म्हणती । परब्रह्म ॥ १७ ॥
१७) जीवनामध्यें माणूस दुःखानें सारखा रडतो., चरफडतो, दुःखानेम विव्हळून प्राण देतो. अशा या दुःखमय जीवात्म्याला लोक परब्रह्म मानतात.
परब्रह्म जाणार नाहीं । कोणास दुःख देणार नाहीं ।
स्तुति निंदा दोनी नाहीं । परब्रह्मीं ॥ १८ ॥
१८) परब्रह्म शाश्वत असल्यानें तें कधीं जात नाहीं. तें कोणास दुःख देणार नाहीं. त्याच्या ठिकाणीं निंदा व स्तुति दोन्ही स्पर्श करुं शकत नाहीं.
उदंड शिव्या दिधल्या । तितुक्या अंतरात्म्यास लागल्या ।
विचार पाहातां प्रत्यया आल्या । येथातथ्य ॥ १९ ॥
१९) एखाद्यानें खूप शिव्या दिल्या तर त्या सगळ्या अंतरात्म्यास लागतात. विचार करुन पाहिलें तर हा अगदी असाच अनुभव येतो. 
धगडीचा बटकीचा लवंडीचा । गधडीचा कुतरीचा वोंगळीचा ।
ऐसा हिशेब सिव्यांचा । किती म्हणोनि सांगावा ॥ २० ॥
२०) धगडीचा, बटकीचा, लवंडीचा, गधडीचा, कुतरीचा, चांडाळणीचा अशा कितीतरी शिव्या आहेत. त्या सर्व सांगता येणार नाहींत. 
इतुकें परब्रह्मीं लागेना । तेथें कल्पनाचि चालेना ।
तडातोडीचें ज्ञान मानेना । कोणीयेकासी ॥ २१ ॥
२१) पण यापैकीं कांहींसुद्धा परब्रह्मास स्पर्श करुं शकत नाहीं. परब्रह्माच्या ठिकाणीं मानवी कल्पना चालूंच शकत नाहीं. असंबद्ध ज्ञान कोणासही मान्य होणार नाहीं.  
सृष्टीमधें सकळ जीव । सकळांस कैचे वैभव ।
याकारणें ठायाठाव । निरमिला देवें ॥ २२ ॥   
२२) सगळे प्राणी या पृथ्वीवर जगतात. पण ते सगळें कांहीं वैभव भोगित नाहीत. सगळ्यांना वैभव भोगावयास मिळत नाहीं याचा अर्थ असा कीं, भगवंतानें प्रत्येकाचें स्थान ठरवून त्यास निर्माण केलें आहे.                 
उदंड लोक बाजारीचे । जें जें आलें तें तें वेंचे ।
उत्तम तितुके भाग्याचे । लोक घेती ॥ २३ ॥
२३) बाजार भरला म्हणजे पुष्कळ लोक बाजारांत येतात. त्यापैंकी बहुतेक माणसें अशीं असतात कीं, जो कांहीं माल विकायला आला असेल तो ते विकत घेतात. परंतु त्यांच्यापैकीं जे भाग्यवान असतात तेच तेवढें उत्तम वस्तु घेऊन जातात. त्याचप्रमाणें या संसाराच्या बाजारांत बहुजनसमाज प्रपंचाच्या मागें धांवतो. थोडीं पुण्यवान माणसें भगवंताच्या नादी लागून भगवंताची प्राप्ती करुन घेतात.  
येणेंचि न्यायें अन्न वसन । येणेंचि न्यायें देवार्चन ।
येणेंचि न्यायें ब्रह्मज्ञान । प्राप्तव्यासारिखें ॥ २४ ॥
२४) अन्नवस्त्र, देवपूजा आणि ब्रह्मज्ञान यांच्या बाबतींत हाच न्याय लागूं पडतो. माणसाचें अन्नवस्त्र, त्याच्या हातून घडणारें देवतार्चन आणि त्यास प्राप्त होणारे ब्रह्मज्ञान या तिन्ही गोष्टी नियतीवर अवलंबून असतात.  
अवघेच लोक सुखी असती । संसार गोड करुन नेती ।
माहाराजे वैभव भोगती । तें करंट्यास कैचें ॥ २५ ॥
२५) जगांत सगळेच लोक सुखी असतात. आपला संसार जसा असेल तसा तें गोड करुन घेतात. परंतु महाराजे जें वैभव भोगतात तें कांहीं करंट्यांच्या वाट्यास येत नाहीं. 
परंतु अंती नाना दुःखें । तेथें होतें सगट सारिखें ।
पूर्वी भोगिलीं नाना सुखें । अंतीं दुःख सोसवेना ॥ २६ ॥
२६) माणसाला शेवटीं अनेक प्रकारची दुःखें भोगावी लागतात. सर्व माणसांना ती सारख्याच स्वरुपांत भोगावी लागतात. अयुष्यांत आधी सुखें भोगलेलीं असल्यामुळें अंतकाळीं होणारीं दुःखें सोसवत नाहींत.    
कठिण दुःख सोसवेना । प्राण शरीर सोडिना ।
मृत्यदुःख सगट जना । कासाविस करी ॥ २७ ॥
२७) कठीण दुःखें सोसवत नाहींत आणि प्राण तर जाता जात नाहीं. अशा रीतीनें मरणकाळचें दुःख सर्व लोकांना सारखेंच कासावीस करुन सोडते. 
नाना अवेवहीन जालें । तैसेंचि पाहिजे वर्तलें ।
प्राणीं अंतःकाळीं गेलें । कासाविस होऊनी ॥ २८ ॥
२८) रोगानें किंवा अपघातानें कोणाचें अवयव निकामी होतात किंवा तोडावें लागतात. पण अशा अवयवहीन अवस्थेंत माणसाला जीवनाचे व्यवहार करावें लागतात. अशी सगळीं माणसें अंतकाळीं कासावीस होऊन मरतात.  
रुप लावण्य अवघें जातें । शरीरसामर्थ्य अवघें राहातें ।
कोणी नस्तां मरतें । आपदआपदों ॥ २९ ॥
२९) माणसाचें रुप किंवा सौंदर्य तें सगळें नष्ट होतें. शरीरांतील सामर्थ्य नाहींसें होतें. जवळ कोणी असत नाहीं. अशा परिस्थितींत यातना भोगीत माणूस मरतो.  
अंतकाळ दैन्य दीन । सकळिकांस तत्समान । 
ऐसें चंचळ अवलक्षण । दुःखकारी ॥ ३० ॥
३०) अंतकाल सर्वंना सारखाच असतो. त्यावेळीं माणसाची फार दीनवाणी अवस्था होतें. अशाश्वताचे दुःखकारक अवलक्षण हें असें आहे. 
भोगून अभोक्ता म्हणती । हे तों अवघीच फजिती ।
लोक उगेच बोलती । पाहिल्याविण ॥ ३१ ॥
३१) भोग भोगून अभोक्तेपणा ठेवावा अशी भाषा लोक बोलतात. पण ही सगळी फजिती आहे. खरें पाहिल्यावाचून लोक उगीच कांहींतरी बोलतात. भोग भोगीत असतांना मनानें त्यापासून अलिप्त राहणें ही कांहीं सामान्य गोष्ट नव्हें. देहदुःख आलें असतां मोठमोठे साधक अनुसंधानापासून खालीं घसरतात. किंबहुना देहदुःख व दारिद्र्य या दोन अवस्थांत भगवंतास यत्किंचित दोष न देतां जो आपलें अनुसंधान यथास्थित सांभाळतो, तोच साधकाच्या पदावर स्थिर झाला असें खात्रीनें समजावें. बाकीचे साधक खरें पण परीक्षा पास झालेले साधक नव्हेत.    
अंतकाळ आहे कठिण । शेरीर सोडिना प्राण ।
बराड्यासारिखें लक्षण । अंतःकाळीं ॥ ३२ ॥ 
३२) अंतकाळ फार कठीण आहे. जीव वासनेंत गुंतल्यानें प्राण शरीराला सोडता सोडीत नाहीं. त्यामुळें सामान्य माणसाची अवस्था एखाद्या भिकार्‍यासारखीं अगदी दीनवाणी बनतें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहात्मनिरुपणनाम समास सहावा ॥
Samas Sahava Dehatma Nirupan
समास सहावा देहात्म निरुपण


Custom Search