Showing posts with label Dashak Barava. Show all posts
Showing posts with label Dashak Barava. Show all posts

Tuesday, February 20, 2018

Samas Dahava UttamPurusha Nirupan समास दहावा उत्तमपुरुष निरुपण


Dashak Barava Samas Dahava UttamPurusha Nirupan 
Samas Dahava UttamPurusha Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Uttam Purusha. How those who are having knowledge should behave. He is required to use his knowledge to impart it with others.
समास दहावा उत्तमपुरुष निरुपण 
श्रीराम ॥
आपण येथेष्ट जेवणें । उरलें तें अन्न वाटणें ।
परंतु वाया दवडणें । हा धर्म नव्हे ॥ १ ॥
१) आपण यथेच्छ जेवावें. आपण जेवल्यावर जें अन्न उरलें असेल तें दुसर्‍यांना वाटावें. उरलेले अन्न वाया दवडणें हा कांहीं धर्म नव्हे. 
तैसें ज्ञाने तृप्त व्हावें । तेंचि ज्ञान जनास सांगावें ।
तरतेन बुडों नेदावें । बुडतयासी ॥ २ ॥
२) हें ज्याप्रमाणें तसेंच आपण स्वतः आत्मज्ञानाने तृप्त व्हावें, समाधान मिळवावें. मग त्या ज्ञानचा उपयोग करुन लोकांना शिकवावे. जो स्वतः उत्तम पोहतो व तरतो त्यानें बुडणार्‍या माणसाला वांचवावे व तारावें हें योग्य आहे.  
उत्तम गुण स्वयें घ्यावे । ते बहुतांस सांगावे ।
वर्तल्याविण बोलावे । ते शब्द मिथ्या ॥ ३ ॥
३) आधीं स्वतः उत्तम गुण अंगीं आणावेत आणि मग तें पुष्कळांना सांगावेत. त्या गुणांचे आचरण स्वतः न करतां जर लोकांना सांगितलें तर सांगणारा खोटे शब्द बोलतो.  
स्नान संध्या देवार्चन । येकाग्र करावें जपध्यान ।
हरिकथा निरुपण । केलें पाहिजे ॥ ४ ॥
४) ज्ञानी माणसानें आचार व उपासना सोडूं नये. स्नान, संध्या, देवाची पूजा, एकाग्र मनानें; जप, ध्यान, हरिकथा आणि निरुपण या सर्व गोष्टीं करणें जरुर आहे.  
शरीर परोपकारीं लावावें । बहुतांच्या कार्यास यावें ।
उणें पडों नेदावें । कोणियेकाचें ॥ ५ ॥
५) आपलें शरीर परोपकारांत झिजवावें. पुष्कळ लोकांची कामें करुन द्यावी. कोणाचेंहि उणे पडूं देऊं नये. 
आडलें जाकसलें जाणावें । यथानशक्ति कामास यावें ।
मृदवचनें बोलत जावें । कोणीयेकासी ॥ ६ ॥
६) ज्यांचें अडलें असेल तें ओळखावें. जो गांजला असेल त्याचे दुःख जाणून, शक्य असेल तितकें त्याचे काम करुन द्यावें. कोणीही माणूस असो त्याच्याशी मृदु शब्दांनी बोलण्याची सवय ठेवावी.   
दुसर्‍याच्या दुःखें दुःखवावें । परसंतोषें सुखी व्हावें ।
प्राणीमात्रास मेळऊन घ्यावें । बर्‍या शब्दें ॥ ७ ॥  
७)  दुसर्‍याच्या दुःखानें दुःखी व्हावें. तसेंच दुसर्‍याच्या संतोषानें सुखी व्हावें. गोड शब्द बोलून माणसांना आपलेसें करुन घ्यावें.    
बहुतांचे अन्याये क्ष्मावे । बहुतांचे कार्यभाग करावे ।
आपल्यापरीस व्हावे । पारखे जन ॥ ८ ॥
८) पुष्कळांना त्यांच्या अन्यायाची क्षमा करावी. पुष्कळ लोकांना त्यांच्या कामांत मदत करावी. परके लोक आपल्या बाजुला वळवून घ्यावेत. 
दुसर्‍यांचें अंतर जाणावें । तदनुसारचि वर्तावें ।
लोकांस परीक्षित जावें । नाना प्रकारें ॥ ९ ॥
९) दुसर्‍याच्या मनांत काय आहें तें ओळखून त्या धोरणानें वागावें. अनेक प्रकारें लोकांची परीक्षा करीत असावें. 
नेमकचि बोलावें । तत्काळचि प्रतिवचन द्यावें ।
कदापी रागास न यावें । क्ष्मारुपें ॥ १० ॥
१०) जरुर तेवढेंच बोलावें. कोणी प्रश्र्ण विचारला तर त्याचे उत्तर चटकन द्यावें. अंगीं क्षमा असावी तिच्या बळावर कधीहीं रागाच्या आधीन होऊं नये. 
आलस्य अवघाच दवडावा । येत्न उदंडचि करावा ।
शब्दमत्सर न करावा । कोणीयेकाचा ॥ ११ ॥ 
११) आळस संपूर्ण नाहींसा करावा. अगदीं खूप प्रयत्न करावा. कोणी एखादा वेडा वाकडा शब्द बोलला तर तेवढ्यावरुन त्याचा द्वेष करुं नये.       
उत्तम पदार्थ दुसर्‍यास द्यावा । शब्द निवडून बोलावा ।
सावधपणें करीत जावा । संसार आपला ॥ १२ ॥
१२) उत्तम पदार्थ आपण न घेतां दुसर्‍यास द्यावा. शब्द बोलतांना अगदी निवडून बोलावा. अगदी सावधपणें आपला संसार करावा. 
मरणाचें स्मरण असावें । हरिभक्तीस सादर व्हावें ।
मरोन कीर्तीस उरवावें । येणें प्रकारें ॥ १३ ॥
१३) आपण एक दिवस मरणार आहोत याची जाणीव विसरुं नये. हरिभक्तीला नेहमी तयार असावें. अशा रीतीनें आयुष्य जगावें व मेल्यावर आपली कीर्ति मागें राहूं द्यावी. 
नेमकपणें वर्तों लागला । तो बहुतांस कळों आला ।
सर्व आर्जवी तयाला । काये उणें ॥ १४ ॥
१४) आपल्या ध्येयाला अनुरुप अशा शिस्तीनें माणूस एकदां कां वागूं लागला म्हणजे तो पुष्कळ लोकांना माहीत होतो. सर्व लोक त्याचे चाहते होतात. मग त्याला कांहीं कमी पडत नाहीं. 
ऐसा उत्तम गुणी विशेष । तयास म्हणावें पुरुष ।
जयाच्या भजनें जगदीश । तृप्त होये ॥ १५ ॥
१५) अशा उत्तम गुणांनी जो संपन्न असतो त्याला उत्तम पुरुष म्हणावें. त्यानें केलेल्या भक्तीनें परमेश्र्वर तृप्त होतो. प्रसन्न होतो. 
उदंड धिःकारुन बोलती । तरी चळों नेदावी शांति ।
दुर्जनास मोळोन जाती । धन्य ते साधु ॥ १६ ॥
१६) कोणी कितीही अवहेलना करुन बोलला तरी उत्तम पुरुषानें आपली शांती भंगू देऊं नये. दुर्जनांशी जे समरस होऊं शकतात ते साधु पुरुष खरोखर धन्य समजावेत.   
उत्तम गुणी श्रृंघारला । ज्ञानवैराग्यें शोभला ।
तोचि येक जाणावा भला । भूमंडळीं ॥ १७ ॥
१७) जो पुरुष उत्तम गुणांचा प्रेमानें अंगीकार करतो, ज्ञानानें व वैराग्यानें जो खरोखर शोभतो, तोच एक पुरुष जगामध्यें खरोखर चांगला असतो.  
स्वयें आपण कष्टावें । बहुतांचें सोसित जावें ।
झिजोन कीर्तीस ञरवावें । नाना प्रकारें ॥ १८ ॥
१८) आपण स्वतः कष्ट करावें. पुष्कळांसाठीं पुष्कळ सोसावें. लोकांसाठीं नाना प्रकारें झिजून आपली कीर्ति मागे ठेवावी. 
कीर्ती पाहों जातां सुख नाहीं । सुख पाहातां कीर्ती नाहीं ।
विचारेंविण कोठेंचि नाहीं । समाधान ॥ १९ ॥
१९) कीर्ति हवी असेल तर देहाला सुख देऊन चालणार नाहीं. देहाला सुख देण्याची लालसा असेल तर कीर्ति मिळणार नाहीं. विचारांवाचून कोणालाही खरें समाधान मिळणार नाहीं. 
परांतरास न लावावा ढका । कदापि पडों नेदावा चुका ।
क्ष्मासीळ तयाच्या तुका । हानी नाहीं ॥ २० ॥
२०) दुसर्‍याचे अंतःकरण दुखवूं नये. आपल्याहातून कधीहिं गैर कृति घडूं नये. जो खरा क्षमाशील असतो त्याच्या मोठेपणास कधीहिं उणेपणा येत नाहीं. 
आपलें अथवा परावें । कार्य अवघेंच करावें ।
प्रसंगीं कामास चुकवावें । हें विहित नव्हे ॥ २१ ॥
२१) एखादे काम आपलें असो कीं दुसर्‍याचे असो तें अगदी मनापासून करावें. काम करण्याचा प्रसंगा आला असतां कामचुकारपणा करणें कांहीं बरोबर नव्हें.     
बरें बोलतां सुख वाटतें । हें तो प्रत्यक्ष कळतें ।
आत्मवत परावें तें । मानीत जावें ॥ २२ ॥
२२) गोड शब्द बोलण्यानें मनाला आनंद होतो. हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. यावरुन आपण दुसर्‍याला आपल्यासारखें मानायला शिकावें.     
कठिण शब्दें वाईट वाटतें । हें तों प्रत्ययास येतें ।
तरी मग वाईट बोलावें तें । काये निमित्य ॥ २३ ॥
२३) कोणी कठोर शब्द बोलला तर मनाला वाईट वाटतें हाहि प्रत्यक्ष अनुभव येतो. तर मग विनाकारण वाईट बोलूं नये हें उत्तम होय.  
आपणास चिमोटा घेतला । तेणें कासाविस जाला ।
आपणावरुन दुसर्‍याला । राखत जावें ॥ २४ ॥
२४) आपल्याला कोणी चिमटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो. हें लक्षांत ठेवून दुसर्‍याला दुःख देऊं नये. 
जे दुसर्‍यास दुःख करी । ते अपवित्र वैखरी । 
आपणास घात करी । कोणियेके प्रसंगीं ॥ २५ ॥
२५) ज्या बोलण्यानें दुसर्‍यास दुःख होतें, जी वाणी दुसर्‍यास दुःखी करते, ती वाणी अपवित्र होय. कोण्या एका प्रसंगी ती आपलादेखील घात करते. 
पेरिलें तें उगवतें । बोलण्यासारिखें उत्तर येतें ।
तरी मग कर्कश बोलावें तें । काये निमित्य ॥ २६ ॥
२६) जें बी पेरावें तेंच उगवते. आपण जसें बोलावें तसें उलट उत्तर येते. असें जर आहे तर मग विनाकारण कठोर व कटू शब्द न बोलणें हें उत्तम होय.   
आपल्या पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें ।
परंतु कष्टी करावें । हे राक्षेसी क्रिया ॥ २७ ॥ 
२७) आपण श्रेष्ठपदास चढून वैभव मिळवावें. त्या वैभवानें पुष्कळांना सुखी करावें. पण त्या वैभवाच्या जोरावर लोकांना दुःखी करणें हें राक्षसी होय.
दंभ दर्प अभिमान । क्रोध आणी कठिण वचन ।
हें अज्ञानाचें लक्षण । भगवद्गीतेंत बोलिलें ॥ २८ ॥
२८) दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर वाणी ही अज्ञानाची लक्षणें आहेत. असें भगवद्गीता सांगते. 
जो उत्तम गुणें शोभला । तोचि पुरुष माहा भला ।
कित्येक लोक तयाला । शोधीत फिरती ॥ २९ ॥
२९) वर सांगितलेल्या उत्तमगुणांनी जो शोभून दिसतो तोच खरा थोर पुरुष होय. अशा पुरुषाला लोक शोधीत येतात.
क्रियेवीण शब्दज्ञान । तेंचि स्वानाचें वमन ।
भले तेथें अवलोकन । कदापी न करिती ॥ ३० ॥
३०) क्रियाहीन नुसतें शब्दज्ञान हें कुत्र्याच्या ओकारीप्रमाणें अति किळसवाणें असते. चांगली माणसें त्याच्याकडे कधीं लक्षही देत नाहीत. 
मनापासून भक्ति करणें । उत्तम गुण अवश्य धरणें ।
तया माहांपुरुषाकारणें । धुंडीत येती ॥ ३१ ॥
३१) जो अगदी मनापासून भगवंताची भक्ति करतो आणि अगत्यानें उत्तमगुणांचा अभ्यास करतो, तो खरा थोर पुरुष असतो. अशा थोर पुरुषाला लोक शोधीत येतात.  
ऐसा जो माहानुभाव । तेणें करावा समुदाव ।
भक्तियोगें देवाधिदेव । आपुला करावा ॥ ३२ ॥
३२) असा जो थोर स्वानुभवी पुरुष असेल त्यानें लोकांना एकत्र आणून त्यांचे पुढारीपण करावें. लोकांना भक्तीच्या मार्गास लावून भगवंत आपलासा करुन घ्यावा. 
आपण आवचितें मरोन जावें । मग भजन कोणें करावें ।
याकारणें भजनास लावावे । बहुत लोक ॥ ३३ ॥
३३) समजा जर आपण असस्मात मरुन गेलेो तर भगवंताची भक्ति करणारा राहाणार नाहीं. म्हणून पुष्कळ लोक भगवंताच्या भजनाला लावावेत. 
आमची प्रतिज्ञा ऐसी । कांहीं न मागावें शिष्यासी ।
आपणामागें जगदीशासी । भजत जावें ॥ ३४ ॥
३४) आपण आपल्या शिष्यांजवळ कांहींहि मागायचे नाहीं अशी त्याची प्रतिज्ञा असते. तरी देखील तो एक गोष्ट मागतो; ती ही कीं आपल्या पश्र्चात शिष्यांनी भगवंताची भक्ति चालूं ठेवावी.
याकारणें समुदाव । जाला  पाहिजे मोहोछाव ।
हातोपातीं देवाधिदेव । वोळेसा करावा ॥ ३५ ॥
३५) हें साध्य होण्यासाठीं लोकसमुदाय तयार व्हायला पाहिजे. आणि मोठे उत्सव घडवून आणले पाहिजेत. मग परमार्थ पाहतां पाहतां आपल्यावर कृपा करील असें करणें शक्य होतें.  
आतां समुदायाकारणें । पाहिजेती दोनी लक्षणें ।
श्रोतीं येथें सावधपणें । मन घालावें ॥ ३६ ॥
३६) अशा प्रकारचा लोकसमुदाय तयार होण्यासाठीं पुढार्‍याच्या अंगीं दोन लक्षणें असावी लागतात. श्रोत्यांनीं मनापासून तीं सावधानतेनें ऐकावी. 
जेणें बहुतांस घडे भक्ति । ते हे रोकडी प्रबोधशक्ति ।
बहुतांचें मनोगत हातीं । घेतलें पाहिजे ॥ ३७ ॥
३७) रोकडी प्रबोधशक्ति हे पहिलें लक्षण तर पुष्कळ लोकांचें मनोगत हातीं घेणें, हें दुसरें लक्षण होय.  महंताच्या अंगीं उत्तम प्रकारचे वकृत्व असावें. आपला विषय उत्तमप्रकारें, सोपा करुन, रसभरित करुन लोकांपुढें मांडता आला पाहिजे. शिवाय माणसांशी संबंध येईल त्यांची निष्ठा आपल्यावर बसेल असें बोलणें, चालणें असलें पाहिजें.  
मागां बोलिले उत्तम गुण । तयास मानिती प्रमाण ।
प्रबोधशक्तीचें लक्षण । पुढें चाले ॥ ३८ ॥
३८) मागें जें उत्तम गुण सांगितलें ते ज्याच्या अंगीं आढळतात त्याला लोक मानूं लागतात. अशा पुरुषाच्या वकृत्वाला वजन येते. व त्यांच्या कार्याचा प्रसार होतो. 
बोलण्यासारिखें चालणें । स्वयें करुन बोलणें ।
तयाचीं  वचनें प्रमाणें । मानिती जनीं ॥ ३९ ॥
३९) जो पुरुष जसें बोलतो तसें वागतो, जो स्वतः आधी आचरण करतो व मग लोकांना तसें वागण्यास सांगतो, अशा पुरुषाच्या शब्दाला लोक प्रमाण मानतात. 
जें जें जनास मानेना । तें तें जनहि मानीना ।
आपण येकला जन नाना । सृष्टिमधें ॥ ४० ॥
४०) जी गोष्ट लोकांच्या मनाला पटत नाहीं ती गोष्ट लोक कधींहि प्रमाण मानीत नाहींत. " माझेंच म्हणणें खरें " असें जगांत चालत नाहीं. आपण एकाकी व जगांत पुष्कळ लोक आहेत. त्यामुळें आपण जगांत एकटे पडूं. 
म्हणोन सांगाती असावे । मानत मानत शिकवावे ।
हळु हळु सेवटा न्यावे । विवेकानें ॥ ४१  ॥   
४१) म्हणून लोकांना बरोबर घेऊन चालावें. क्रमाक्रमानें त्यांना शिकवावें. आणि विवेकानें त्यांना हळुहळु शेवटच्या पायरीपर्यंत न्यावें.  
परंतु हे विवेकाची कामें । विवेकी करील नेमें ।
इतर ते बापुडे भ्रमें । भांडोंच लागले ॥ ४२ ॥
४२) परंतु अशाप्रकारचें पुढारीपणाचे काम हें विवेकाचे आहे. जो खरोखरी विवेकी आहे तो हें बरोबर करतो. इतर बिचारे गैरसमजानें आपापसांत भांडत बसतात. 
बहुतांसीं भांडतां येकला । शैन्यावांचून पुरवला । 
याकारणें बहुतांला । राजी राखावें ॥ ४३ ॥
४३) सैन्यावांचून सेनापती जसा एकटा लढूं शकत नाहीं त्याचप्रमाणें जो पुढारी पुष्कळ लोकांशी भांडतो तो एकटा कार्य करुं शकत नाहीं. म्हणून त्यानें पुष्कळ लोकांना आपलेसे करुन ठेवावें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तमपुरुषनिरुपणनाम समास दहावा ॥
Samas Dahava UttamPurusha Nirupan
समास दहावा उत्तमपुरुष निरुपण 


Custom Search

Sunday, February 18, 2018

Samas Navava Yatna Shikavan समास नववा यत्नशिकवण


Dashak Barava Samas Navava Yatna Shikavan 
Samas Navava Yatna Shikavan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Yatna. Yatna means efforts. The importance of Yatna i.e. taking efforts to do something to achieving it, is nicely told by Samarth Ramdas. It changes our life for betterment.
समास नववा यत्नशिकवण 
श्रीराम ॥
दुर्बल नाचारी वोडगस्त । आळसी खादाड रिणगस्त ।
मूर्खपणें अवघें वेस्त । कांहींच नाहीं ॥ १ ॥
१) कोणाचा आधार नसलेला एक दुर्बळ माणूस होता. त्याची सर्व बाजूंनी ओढाताण होती. तो आळशी, खादाड व कर्जबाजारीही होता. मूर्खपणाच्या वागणूकीनें त्याचे जीवन अस्ताव्यस्त झाले होते. कांहींच व्यवस्थित नव्हते.  
खाया नाहीं जेवाया नाहीं । लेया नाहीं नेसाया नाहीं ।
अंथराया नाहीं पांघराया नाहीं । कोंपट नाहीं अभागी ॥ २ ॥
२) त्या अभागी माणसाला कांहीं खायला नाहीं, जेवायला नाहीं, अंगावर घ्यायला व नेसायला वस्त्र नाहीं. अंथरायला, पांघरायला नाहीं, राहायला झोपडी पण नाहीं अशी त्याची दीनवाणी अवस्था झाली होती. 
सोयेरे नाहीं धायेरे नाहीं । इष्ट नाहीं मित्र नाहीं ।
पाहातां कोठे वोलखी नाहीं । आश्रयेंविण परदेसी ॥ ३ ॥
३) त्याला कोणी सगे सोयरे, मित्र नव्हतें, कोणाचा आश्रय नव्हता त्यामुळें स्वदेशांत असूनही तो परदेशी असल्यासारखा जगत होता. 
तेणें कैसें करावें । काये जीवेंसीं धरावें ।
वाचावें किं मरावें । कोण्या प्रकारें ॥ ४ ॥
४) अशा माणसानें काय करावें? कोणत्या आशेने जगावें? कोणत्या रीतीनें त्यानें जगावें कां मरुन जावें?  
ऐसें कोणीयेकें पुसिलें । कोणीयेके उत्तर दिधलें ।
श्रोतीं सावध ऐकिलें । पाहिजे आतां ॥ ५ ॥
५) असें प्रश्र्ण कोणी एकानें विचारलें. त्यास जी उत्तरें दिली आहेत. ती श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावीत. 
लाहानथोर काम कांहीं । केल्यावेगळें होत नाहीं ।
करंट्या सावध पाहीं । सदैव होसी ॥ ६ ॥
६) मानवी जीवनाचा असा नियम आहे कीं, कोणतेंही काम मग तें लहान असो वा मोठे असो, केल्याशिवाय होत नाहीं. ज्या अभागी माणसाला भाग्यवान व्हायचे असेल त्यानें हें समजून घेतलें पाहिजे.   
अंतरीं नाहीं सावधानता । येत्न ठाकेना पुरता ।
सुखसंतोषाची वार्ता । तेथें कैंची ॥ ७ ॥
७) चांगला प्रयत्न होण्यास मनांत दक्षता पाहिजे. मनुष्याजवळ सावधानता नसेल तर त्याच्या हातून पुरेसे प्रयत्न होत नाहीत. मगत्यांना जीवनांत सुखसंतोषाचा अनुभव येत नाही. 
म्हणोन आळस सोडावा । येत्न साक्षेपें जोडावा ।
दुश्र्चितपणाचा मोडावा । थारा बळें ॥ ८ ॥
८) म्हणून माणसानें आळस झाडून टाकावा. मोठ्या चिवटपणें प्रयत्न करावा. मनांत येणारे संशय वगैरेला थारा देऊं नये. 
प्रातःकाळीं उठत जावें । प्रातःस्मरामि करावें ।
नित्य नेमें स्मरावें । पाठांतर ॥ ९ ॥
९) नेहमी सकाळीं लवकर उठावें. भगवंताचें स्मरण करावें. पूर्वी जो अभ्यास, पाठांतर केले असेल त्याची उजळणी करावी.
मागील उजळणी पुढें पाठ । नेम धरावा निकट ।
बाष्कळपणाची वटवट । करुंच नये ॥ १० ॥
१०) उजळणी व नविन कांहीं पाठ करणें. असा नित्य नेम धरावा. वायफळ बोलणें सोडून द्यावें. 
दिशेकडे दुरी जावें । सुचिस्मंत होऊन यावें ।
येतां कांहीं तरी आणावें । रितें खोटें ॥ ११ ॥
११) मग लांब कोठेतरी शौचास जावें.अणि निर्मळ होऊन यावें. परत येतांना कांहींतरी घेऊन यावे. रिकाम्या हातानें येऊं नये. 
धूतवस्त्रें घालावीं पिळून । करावें चरणक्षाळण । 
देवदर्शन देवार्चन । येथासांग ॥ १२ ॥
१२) पाय धुवावें. आपले धुवून आणलेले कपडे पिळून वाळत घालावेत. नंतर देवपूजा व व्यवस्थित देवदर्शन करावें.  
कांहीं फळाहार घ्यावा । पुढें वेवसाये करावा ।
लोक आपला परावा । म्हणत जावा ॥ १३ ॥
१३) नंतर कांहीं फळाहार घ्यावा. मग आपला व्यवसाय करावा. जनांमध्यें आपला कोण व आपला कोण नाहीं हें ओळखून चालावें.  
सुंदर अक्षर ल्याहावें । पष्ट नेमस्त वाचावें ।
विवरविवरों जाणावें । अर्थांतर ॥ १४ ॥
१४) लिहीणें सुंदर अक्षरांत करावें. वाचतांना स्पष्ट बरोबर वाचावें. पुनः पुनः विचार करुन मनन करुन त्याचा खरा अर्थ समजून घ्यावा. 
नेमस्त नेटकें पुसावें । विशद करुन सांगावें ।
प्रत्ययेंविण बोलावें । तेंचि पाप ॥ १५ ॥
१५) कोणाल कांहीं विचारयाचें तें नेमकें व स्पष्टपणें विचारावें. कोणाला कांहीं सांगावयाचे असल्यास नेमके, नीट उकलून व स्पष्ट करुन सांगावें. स्वतःला अनुभव असल्याशिवाय ज्ञानाच्या गप्पा मारणें म्हणजें पापच होय.  
सावधानता असावी । नीतिमर्यादा राखावी ।
जनास माने ऐसी करावी । क्रियासिद्धि ॥ १६ ॥
१६) नेहमी सावध असावें. नीतीची मर्यादा राखून वागावें. कोणतेंही काम करावयाचे ते लोकांना पसंत पडेल अशारीतीनें करावें. 
आलियाचें समाधान । हरिकथा निरुपण ।
सर्वदा प्रसंग पाहोन । वर्तत जावें ॥ १७ ॥
१७) जो कोणी आपल्याकडे येईल त्याचे समाधान करावें. भगवंताची कथा करतअसावें. अध्यात्माचे निरुपण चालूं ठेवावें. नेहमी प्रसंग पाहून वागावें.  
ताळ धाटी मुद्रा शुद्धा । अर्थ प्रमये अन्वये शुद्ध ।
गद्यपद्यें दृष्टांत शुद्ध । अन्वयाचे ॥ १८ ॥
१८) ताल, धाटी, शुद्ध मुद्रा, अर्थ, प्रमेय, शुद्ध अन्वय, गद्य, पद्य, शुद्ध व उचित दृष्टांत,
गाणें वाजवणें नाचणें । हस्तन्यास दाखवणें ।
सभारंजकें वचनें । आडकथा छंदबंद ॥ १९ ॥
१९) गाणें, बजावणें, नाचणें, हातांचा अभिनय दाखवणें, श्रोत्यांच्या मनाला प्रसन्न करणारी वचनें सांगणें, छंद व बंद या सार्‍या गोष्टी भगवंताची कथा करतांना वापराव्या.   
बहुतांचें समाधान राखावें । बहुतांस मानेल तें बोलावें ।
विलग पडों नेदावें । कथेमधें ॥ २० ॥
२०) पुष्कळांचें समाधान होईल अशी कथा करावीं. पुष्कळांना आवडेल व पसंत पडेल असें बोलावें. आपल्या कथेंत विसंगति येऊं देवू नये. 
लोकांस उदंड वाजी आणूं नये । लोकांचे उकलावें हृदये ।
तरी मग स्वभावें होये । नामघोष ॥ २१ ॥
२१)  श्रोत्यांना फार कंटाळा येईल अशी कथा करुं नये. उलट लोकांचे मनोगत उकलेल असें मार्मिक बोलावे. मग लोक भगवंताचा नामघोष सहजच करतील.
भक्ति ज्ञान वैराग्य योग । नाना साधनाचे प्रयोग ।
जेणें तुटे भवरोग । मननमात्रें ॥ २२ ॥
२२) आपल्या कथेंत, निरुपणांत भक्ति, ज्ञान, वैराग्य, योग आणि अजुनकांहीं गोष्टींचा उपयोग करावा. कीं, ज्यायोगे श्रोत्यांच्या मननाने त्यांचा भवरोग नष्ट होईल. 
जैसें बोलणें बोलावें । तैसेंचि चालणें चालावें ।
मग महंतलीळा स्वभावें । आंगीं बाणे ॥ २३ ॥
२३) आपण जसें बोलतों तसें वागावें. मग महंताला शोभेल असें वागणें सहजच अंगीं बाणते. 
युक्तिवीण साजिरा योग । तो दुराशेचा रोग ।
संगतीच्या लोकांचा भोग । उभा ठेला ॥ २४ ॥
२४) महंतपणाचा योग येणें उत्तम पण महंताच्या अंगीं वागण्याचे कौशल्य नसेल तर तो योग नाहीं तो दुराशेचा रोगच समजावा. अशा महंताची संगत करणार्‍या लोकांचा कांहींतरी भोगच उभा राहिला असें समजावे.  
ऐसें न करावें सर्वथा । जनास पावऊं नये वेथा ।
हृदईं चिंतावें समर्था । रघुनाथजीसी ॥ २५ ॥
२५) महंतानें लोकांना त्रास व दुःख होईल असें कधीहीं वागू नये. त्यानें आपल्या हृदयामध्यें श्रीरघुनाथाचे चिंतन करण्याचा अभ्यास ठेवावा.  
उदासवृत्तीस मानवे जन । विशेष कथानिरुपण ।
रामकथा ब्रह्मांड भेदून । पैलाड न्यावी ॥ २६ ॥
२६) विरागी व अनासक्त वृत्ति लोकांना आवडते. भगवंताची कथा व निरुपण त्यांना आवडते. म्हणून ब्रह्मांडाचा भेद करुन श्रीरामाची कथा त्याच्याहि पलिकडे नेऊन सोडावी. 
सांग महंती संगीत गाणें । तेथें वैभवास काय उणें ।
नभामाजी तारांगणें । तैसे लोक ॥ २७ ॥
२७) अशा सर्व गुणांनी मंडित महंतपणा असून त्यामधें संगीताची, गायनाची जोड असेल तर मग वैभवाला कमी पडणार नाहीं. चंद्राभोवती जशा तारा जनतात, त्याचप्रमाणें अशा महंताभोवती लोक जमतात.    
आकलबंद नाहीं जेथें । अवघेंचि विश्कळित तेथें ।
येकें आकलेविण तें । काये आहे ॥ २८ ॥
२८) जो मनुष्य बुद्धिनें संपन्न नसतो, त्याच्याजवळ सगळी अव्यवस्थाच असते. जगांत एक हुषारी पाहिजे. हुषारीवाचून कशाला महत्व नाहीं.
घालून अकलेचा पवाड । व्हावें ब्रह्मांडाहून जाड ।
तेथें कैंचें आणिलें द्वाड । करंटपण ॥ २९ ॥
२९) आपल्या बुद्धीचे सामर्थ्य खूप वाढवावे. आपण ब्रह्मांडाहून विशाल होऊन जावें, इतका बुद्धिचा विकास करावा. असें झाल्यावर त्या ठिकाणीं नतद्रष्ट करंटेपणा उरणारच नाहीं.  
येथें आशंका फिटली । बुद्धि येत्नीं प्रवेशली ।
कांहींयेक आशा वाढली । अंतःकर्णी ॥ ३० ॥
३०) अशा रीतीनें मूळ शंकेचे येथें निराकरण झालें. प्रयत्न करायला हवा. हें बुद्धीला पटलें. त्यामुळें आपल्याला भाग्याचे दिवस येतील अशी आशा अंतःकरणांत उदय पावली.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे येत्नसिकवणनाम समास नववा ॥
Samas Navava Yatna Shikavan
समास नववा यत्नशिकवण 


Custom Search

Thursday, February 15, 2018

Samas Aathava KalaRup Nirupan समास आठवा काळरुप निरुपण


Dashak Barava Samas Aathava KalaRup Nirupan 
Samas Aathava KalaRup Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Kala or time. How we count Days,Months and Years and so on. How it is started? And how Maya is related to it?
समास आठवा काळरुप निरुपण
श्रीराम ।
मूलमाया जगदेश्र्वर । पुढें अष्टधेचा विस्तार ।
सृष्टिक्रमें आकार । आकारला ॥ १ ॥
१) परब्रह्मामध्यें प्रथम मूळ माया निर्माण झाली.मूळमायेमधील शुद्ध जाणीव तो जगदीश्र्वर होय. यानंतर अष्टधा प्रकृतीचा विस्तार झाला. त्यांत जी सृष्टिरचना झाली, तिच्यांत पुढें आकार निर्माण झाले. 
हें अवघेंच नस्तां निर्मळ । जैसे गगन अंतराळ ।
निराकारीं काळवेळ । कांहींच नाहीं ॥ २ ॥
२) अभ्र नसतांना आकाश जसें निर्मळ अंतराळ असतें त्याचप्रमाणें प्रकृति व तिचा पसारा नसतांना निर्मळ परब्रह्म असतें. निराकार स्वरुपांत काळवेळ कांहीं आढळत नाहीं.  
उपाधीचा विस्तार जाला । तेथें काळ दिसोन आला ।
येरवीं पाहातां काळाला । ठावचि नाहीं ॥ ३ ॥
३) उपाधीचा विस्तार झाला म्हणजे काळ दिसूं लागतो. एरवी काळाला स्थानच नाहीं. उपाधि म्हणजे माया किंवा प्रकृति, सद्वस्तुवर आलेलें पांघरुण होय.
येक चंचळ येक निश्र्चळ । यावेगळा कोठें काळ ।
चंचळ आहे तावत्काळ । काळ म्हणावें ॥ ४ ॥
४) एकंदर दोनच प्रकार अस्तित्वांत आहेत. एक निश्र्चळ ब्रह्म व दुसरी चंचळ माया. या व्यतिरिक्त काळ म्हणून तिसरा प्रकार अस्तित्वांत नाहीं. जोंपर्यंत चंचळ असतें तोपर्यंत काळाचें अस्तित्व जाणवते.  
आकाश म्हणिजे अवकाश । अवकाश बोलिजे विलंबास ।
त्या विलंबरुप काळास । जाणोनि घ्यावें ॥ ५ ॥
५) आकाश म्हणजे अवकाश किंवा विस्तार होय. विलंबाला अवकाश म्हणतात. काळ विलंबरुप आहे. त्याचें स्वरुप समजून घ्यावें. 
सूर्याकरितां विलंब कळे । गणना सकळांची आकळे ।
पळापासून निवळे । युगपरियंत ॥ ६ ॥
६) सूर्याच्या योगानें आपणास विलंब कळतो. विलंब हा मूळ धरुन आपल्याला गणना करतां येते. एका पळापासून युगापर्यंत गणना मोजता येते. 
पळ घटिका प्रहर दिवस । अहोरात्र पक्ष मास ।
शड्मास वरि युगास । ठाव जाला ॥ ७ ॥
७) पळ, घटका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्ष किंवा पंधरवडा, मास किंवा महिना, सहा महिने अशा रीतीनें आपण युगापर्यंत काळ मोजूं शकतो.  
क्रेत त्रेत द्वापार कळी । संख्या चालिली भूमंडळी ।
देवांचीं आयुष्यें आगळीं । शास्त्रीं निरोपिलीं ॥ ८ ॥
८) त्यानंतर कृत, त्रेता, द्वापार,व कलि अशीं चार युगें पृथ्वीवर चालली. त्याचप्रमाणें शास्त्रांत देवांची आयुष्यें देखील खूप सांगितलीं आहेत.  
ते देवत्रयाची खटपट । सूक्ष्मरुपें विलगट ।
दंडक सांडितां चटपट । लोकांस होते ॥ ९ ॥
९) ब्रह्मा, विष्णु व महेश या तीन देवांचे कार्य सूक्ष्मरुपानें वेगवेगळें चालूं आहे.  त्यांचा नियमभंग केला कीं लोकांना काळजी वाटूं लागते. 
मिश्रित त्रिगुण निवडेना । तेणें आद्यंत सृष्टिरचना ।
कोण थोर कोण साना । कैसा म्हणावा ॥ १० ॥
१०) सत्व, रज व तम हे तिन्ही गुण एकमेकांत मिसळलेले असतात. एकमेकांपासून त्यांना वेगळें करतां येत नाहीं. सुरवातीपासून शेवटपर्यंत सारी सृष्टिरचना त्रिगुणांच्या मिश्रणानें बनलेली आहे. त्यांत कोणी मोठा वा कोणी लाहान असें म्हणतां येत नाहीं. तिन्ही देव एकाच योग्यतेचे व महत्वाचे आहेत. 
असो हीं जाणत्याचीं कामें । नेणता उगाच गुंते भ्रमें ।
प्रत्यये जाणजाणों वर्में । ठाईं पाडावीं ॥ ११ ॥
११) असो. या गोष्टी बरोबर समजणें हीं शाहाण्याची कामें आहेत. अज्ञानी माणूस उगाच भ्रमाच्या पायीं गुंतून पडतो. म्हणून सृष्टीमधिल गूढ गोष्टी स्वतः अनुभव घेऊन निश्र्चितपणें समजून घ्याव्यांत. 
उत्पन्नकाळ सृष्टिकाळ । स्थितिकाळ संव्हारकाळ ।
आद्यंत अवघा काळ । विलंबरुपी ॥ १२ ॥
१२) उत्पन्नकाळ, सृष्टिकाळ, स्थितिकाळ, संहारकाळ असा हा सगळा काळ आरंभापासून शेवटपर्यंत विलंबरुप आहे. 
जें जें जये प्रसंगीं जालें । तेथें काळाचें नांव पडिलें ।
बरें नसेल अनुमानलें । तरी पुढें ऐका ॥ १३ ॥
१३) ज्या प्रसंगीं जें घडतें त्याचे नांव काळास देण्यांत येते. हें जर बरोबर ध्यानांत येत नसेल तर पुढें ऐकावें. 
प्रजन्यकाळ शीतकाळ । उष्णकाळ संतोषकाळ ।
सुखदुःखआनंदकाळ । प्रत्यये येतो ॥ १४ ॥
१४) पर्जन्यकाळ, शीतकाळ, उष्णकाळ, संतोषकाळ, सुखदुःख आनंदकाळ, या काळांचा अनुभव येतो. 
प्रातःकाळ माध्यानकाळ । सायंकाळ वसंतकाळ ।
पर्वकाळ कठिणकाळ । जाणिजे लोकीं ॥ १५ ॥
१५) प्रातःकाळ, माध्यान्हकाळ, सायंकाळ, वसंतकाळ, पर्वकाळ कठीणकाळ हे काळ लोक जाणतात.   
जन्मकाळ बाळत्वकाळ । तारुण्यकाळ वृधाप्यकाळ ।
अंतकाळ विषमकाळ । वेळरुपें ॥ १६ ॥
१६) जन्मकाळ, बालपणाचा काळ, तारुण्यकाळ, वृद्धपणाचा काळ, अंतकाळ, विषमकाळ हे सगळे वेळरुप काळ आहेत. 
सुकाळ आणि दुष्काळ । प्रदोषकाळ पुण्यकाळ ।
सकळ वेळा मिळोन काळ । तयास म्हणावें ॥ १७ ॥
१७) सुकाळ व दुःकाळ, प्रदोषकाळ, पुण्यकाळ या सगळ्यां वेळांना मिळून काळ असे म्हणावें.  
असतें येक वाटतें येक । त्याचें नांव हीन विवेक ।
नाना प्रवृत्तीचे लोक । प्रवृत्ति जाणती ॥ १८ ॥
१८)  जेव्हां वस्तु एक असते पण दिसते भलतीच. तेव्हां त्यास हीन विवेक म्हणतात. हीन विवेक म्हणजे अविद्या किंवा अध्यास होय. नाना प्रकारच्या मनोरचनेचे लोक प्रवृत्ति काय आहे तेवढेंच जाणतात.  
प्रकृति चाले अधोमुखें । निवृत्ति धावे ऊर्ध्वमुखें ।
ऊर्ध्वमुखें नाना सुखें । विवेकी जाणती ॥ १९ ॥
१९) प्रवृत्ति अधोमुख चालते. सूक्ष्माकडून स्थूलाकडे धांव घेते. निवृत्ति ऊर्ध्वमुखानें चालते. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाते. सूक्ष्माकडे जाण्यांत अनेक प्रकारची सुखें आढळतात. ही गोष्ट विवेकी माणसें जाणतात.   
ब्रह्मांडरचना जेथून जाली । तेथें विवेकी दृष्टि घाली ।
विवरतां विवरतां लाधली । पूर्वापर स्थिति ॥ २० ॥
२०) या ब्रह्मांडाची रचना ज्या मूळमायेपासून झाली तेथें विवेकी माणूस आपली ज्ञानदृष्टि नेऊन पोचवतो. अशा रीतीनें सूक्ष्म मनन आणि निदिध्यासन करतां करतां त्याला आरंभीची भ्रह्मरुप अवस्था प्राप्त होते.  
प्रपंची असोन परमार्थ पाहे । तोहि ये स्थितीतें लाहे ।
प्रारब्धयोगें करुन राहे । लोकांमधें ॥ २१ ॥
२१)  प्रपंचांत राहून जो परमार्थाची साधना करतो. त्याससुद्धा ही अवस्था प्राप्त होते. प्रारब्धाचा जसा योग असेल त्याप्रमाणें लोकांत राहून तो प्रपंच करतो.  
सकळांचें येकचि मूळ । येक जाणते येक बाष्कळ ।
विवेकें करुन तत्काळ । परलोक साधावा ॥ २२ ॥
२२) सर्वांचे मूळ एकच आहे. विवेकी तें जाणतो तर विवेकहीन ते जाणत नाहीं. म्हणून शाहाण्यानें विवेक वापरुन लवकर परमार्थ साधावा.
तरीच जन्माचें सार्थक । भले पाहाती उभये लोक ।
कारण मुळींचा विवेक । पाहिला पाहिजे ॥ २३ ॥ 
२३) परमार्थ साधला तरच जन्माचे सार्थक होते. यासाठीं भले लोक प्रपंच व परमार्थ दोन्ही साधतात. दोन्ही साधण्यास विवेक करीत मूळापर्यंत गेले पाहिजे.           
विवेकहीन जे जन । ते जाणावे पशुसमान ।
त्यांचें ऐकतां भाषण । परलोक कैंचा ॥ २४ ॥
२४) विवेकहीन माणसें जनावरासारखी जगतात. त्यांचें म्हणणे ऐकून परमार्थ साधणें शक्य नाहीं.
बरें आमचे काये गेलें । जें केलें तें फळास आलें ।
पेरिलें तें उगवलें । भोगिती आतां ॥ २५ ॥
२५) असो. विवेकहीनपणें कोणी जगला तर आमचे कांहीं नुकसान नाहीं. मनुष्य जें करतो त्याचे फळ त्यास मिळते. जें पेरलेले असतें तेंच उगवते. त्याचें फळ माणूस आतां भोगतोच.
पुढेंहि करी तो पावे । भक्तियोगें भगवंत फावे ।
देव भक्त मिळतां दुणावें । समाधान ॥ २६ ॥
२६) यानंतरसुद्धां माणूस जर परमार्थ करील तर तो त्यास साधेल. तो जर भक्ति करेल तर त्यास भगवंताची प्राप्ती होईल. भक्ताचें भगवंताशी ऐक्य घडून आलें कीं भक्ताचे समाधान दुपट्टप्रमाणांत वाढते. भक्त पूर्ण समाधानी बनतो.   
कीर्ति करुन नाहीं मेले । उगेच आले आणि गेले ।
शाहाणे होऊन भुलले । काये सांगावें ॥ २७ ॥
२७) भक्त म्हणून जे नांव कमावून मेले नाहींत ते उगीच जन्मास आले व  तसेंच गेले. शहाण्या माणसांना देखील येथें भुरळ पडतें. याला काय म्हणावें. 
येथील येथें अवघेंचि राहातें । ऐसें प्रत्ययास येतें ।
कोण काये घेऊन जातें । सांगाना कां ॥ २८ ॥
२८) या जगांत सगळें कांहीं येथेंच राहतें, बरोबर कांहीं येत नाहीं. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. कोणी कांहींतरी बरोबर घेऊन जातो कां? तें सांगा.  
पदार्थीं असावें उदास । विवेक पाहावा सावकास ।
येणेंकरितां जगदीश । अलभ्य लाभे ॥ २९ ॥
२९) म्हणून माणसानें दृश्य वस्तूविषयीं अनासक्त वृत्ति ठेवावी. अगदी शांतपणें सूक्ष्म विवेक करावा. असें केल्यानें परमेश्र्वराचा लाभ होतो. हा मोठा अलभ्य लाभ होय.
जगदीशापरता लाभ नाहीं । कार्याकारण सर्व कांहीं । 
संसार करित असतांहि । समाधान ॥ ३० ॥
३०) परमेश्र्वर प्राप्तीसारखा मोठा लाभ या जगांत दुसरा नाहीं. प्रपंचांत जरुर असणारी कर्में योग्य प्रमाणांत करायला हरकत नाहीं. ती परमार्थाच्या आड येत नाहींत. असें वागलें तर संसार करीत असतांना सुद्धा समाधान कायम टिकते.  
मागां होते जनकादिक । राज्य करितांहि अनेक ।
तैसेचि आतां पुण्यश्र्लोक । कित्येक असती ॥ ३१ ॥
३१) पूर्वीं जनकादि अनेक राजे होऊन गेले. राज्य करीत असूनही त्यांनीं आपलें समाधान टिकवले. आत्ता सांप्रतकाळींसुद्धां असें पुण्यश्र्लोक पुरुष हयात आहेत. 
राजा असतां मृत्य आला । लक्ष कोटी कबुल जाला ।
तरि सोडिना तयाला । मृत्य कांहीं ॥ ३२ ॥
३२) समजा एखाद्या राजानें अंतःकाळीं मृत्यु टळावा म्हणून लक्षावधि रुपये देण्याची तयारी दर्शविली तरी कांहीं केल्यासुद्धा मृत्यु त्यास सोडीत नाही.
ऐसें हें पराधेन जिणें । यामधें दुखणें बाहाणें । 
नाना उद्वेग चिंता करणें । किती म्हणोनि ॥ ३३ ॥
३३) माणसाचें जगणें असें हें पराधीन आहे. तसेंच दुखणेंबाहणें, तसेंच अनेक तर्‍हेची दुःखें आणि काळज्या यांनीं तें व्यापलें आहे. सगळें सांगणें शक्य नाहीं.
हाट भरला संसाराचा । नफा पाहावा देवाचा ।
तरीच या कष्टाचा । परियाये होतो ॥ ३४ ॥
३४) संसाराचा बाजार भरला आहे. त्यांत देवाचा नफा पाहावा. तरच संसारांत केलेल्या कष्टाचा खरा मोबदला मिळतो. नाहीं तर केलेले श्रम खरोखरीच वाया गेल्यासारखें होतात.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे काळरुपनाम समास आठवा ॥
Samas Aathava KalaRup Nirupan 
 समास आठवा काळरुप निरुपण


Custom Search

Tuesday, February 13, 2018

Samas Satava VishayaTyyga Nirupan समास सातवा विषयत्याग


Dashak Barava Samas Satava VishayaTyyga Nirupan 
Samas Satava VishayaTyyga Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us Vishaya Tyaga. There is a feeling in the minds of people that For succsess in Parmarth, one needs to make a sacrifice with the bodily pleasures. That is called as Vishaya Tyaga. Samarth is telling us about it.
समास सातवा विषयत्याग 
श्रीराम ।
न्यायें निष्ठुर बोलणें । बहुतांस वाटे कंटाळवाणें ।
मळमळ करितां जेवणें । विहित नव्हे ॥ १ ॥
१) अगदी तर्कशुद्ध असलेले स्पष्ट बोलणें लोकांना आवडत नाहीं. पण ज्याप्रमाणें पोटांत मळमळत असरांना जेऊ नये, त्याप्रमाणें मनांत शंका असतांना श्रवण करणें बरें नव्हें. 
बहुतीं विषय निंदिले । आणि तेचि सेवित गेले ।
विषयत्यागें देह चाले । हें तों घडेना ॥ २ ॥
२) पुष्कळ लोक विषयाची किंवा देहसुखाची निंदा करितात. पण स्वतः मात्र त्याचे सेवन करत जगतात. खरें म्हणजे विषयाचा त्याग केला तर देह चालणार नाहीं.
बोलणें येक चालणें येक । त्याचें नांव हीन विवेक ।
येणें करितां सकळ लोक । हांसों लागती ॥ ३ ॥
३) बोलण्याचालण्याचा मेळ नसतो त्याला हीनविवेक म्हणतात. अशा हीन विवेकी माणसाला सगळें लोक हसतात. 
विषयत्यागेंविण तों कांहीं । परलोक तो प्राप्त नाहीं ।
ऐसें बोलणें ठाईं ठाईं । बरें पाहा ॥ ४ ॥  
४) विषयाचा त्याग केल्याशिवाय परमार्थ साधत नाहीं. असें सगळीकडे सांगितलेले आढळतें.  
प्रपंची खाती जेविती । परमार्थी काये उपवास करिती ।
उभयता सारिखे दिसती । विषयाविषयीं ॥ ५ ॥
५) पण प्रश्र्न असा कीं प्रपंच करणारे तेवढे खातात पितात आणि परमार्थ करणारे काय उपाशी राहतात ? विषय सेवनाच्या बाबतींत दोघेही सारखेंच दिसतात.
देह चालतां विषय त्यागी । ऐसा कोण आहे जगीं ।
याचा निर्वाह मजलागीं । देवें निरोपावा ॥ ६ ॥ 
६) मनुष्य जिवंत असेंपर्यंत विषय सुटणें अशक्य आहे. देह जिवंत आहे पण विषय सोडून दिला आहे असा कोणी या जगांत आहे का ? या प्रश्र्नाचे उत्तर गुरुदेवांनी आम्हाला द्यावें.
विषय अवघा त्यागावा । तरीच परमार्थ करावा ।
ऐसें पाहातां गोवा । दिसतो किं ॥ ७ ॥
७) विषयाचा संपूर्ण त्याग केला तरच परमार्थ करतां येतो, असें म्हटलें तर फारच गोंधळ होतो.  
ऐसा श्रोता अनुवादला । वक्ता उत्तर देता जाला ।
सावध होऊन मन घाला । येतद्विषईं ॥ ८ ॥
८) श्रोत्यानें आपली शंका सविस्तर मांडली. वक्त्यानें तिचे निरसन केलें. वक्त्याचें म्हणणे श्रोत्यांनी एकाग्र मनानें व त्या विषयांत लक्ष घालून ऐकावें. 
वैराग्यें करावा त्याग । तरीच परमार्थयोग ।
प्रपंचत्यागें सर्व सांग । परमार्थ घडे ॥ ९ ॥
९) वैराग्याच्या पार्श्वभूमीवर विषयांचा त्याग केला तरच परमार्थ साधण्याचा योग येतो. प्रपंचाचा त्याग केल्यानेंच  सर्वांगीण परमार्थ घडतो.  
मागें ज्ञानी होऊन गेले । तेंहि बहुत कष्ट केले ।
तरी मग विख्यात जाले । भूमंडळीं ॥ १० ॥
१०) पूर्वीं जें मोठमोठे ज्ञानी होऊन गेले त्यांनी परमार्थासाठीं पुष्कळ कष्ट सोसलें. त्यानंतर तें जगांत महान झाले. 
येर मत्सर करितांच गेलीं । अन्न अन्न म्हणतां मेलीं ।
कित्येक भ्रष्टलीं । पोटासाठीं ॥ ११ ॥
११) बाकींचे प्रापंचिक लोक आपापसांत मत्सर करीत राहीलें. कांहीं अन्नानदशा होऊन मरण पावलें. तर कांहीं पोटासाठीं भ्रष्ट झालें.  
वैराग्य मुळींहून नाहीं । ज्ञान प्रत्ययाचें नाहीं ।
सुचि आचार तोहि नाहीं । भजन कैंचे ॥ १२ ॥ 
१२) ज्या लोकांना अंगचे खरें वैराग्य नाही. स्वतःच्या अनुभवाचे ज्ञान नाहीं. शुद्ध आचार नाहीं, भजनपूजन नाहीं, 
ऐसे प्रकारीचे जन । आपणास म्हणती सज्जन ।
पाहों जाता अनुमान । अवघाच दिसे ॥ १३ ॥
१३) अशा प्रकारची माणसें सज्जन म्हणून मिरवून घेतात. पण खरें पाहिलें तर हा सज्जनपणा काल्पनिकअसतो. वास्तविक नसतो. 
जयास नाहीं अनुताप । हेंचि येक पूर्वपाप ।
क्षणक्ष्णा विक्षेप । पराधीकपणें ॥ १४ ॥
१४) आपलें आजपर्यंतचे आयुष्य वाया गेले असा अनुताप न होणें हें त्या माणसामचे एक महापापच समजावें. दुसर्‍याचा उत्कर्ष पाहून त्यांच्या मनांत विक्षेप उत्पन्न होतो. त्यांचा मत्सर जागा होतो. 
मज नाहीं तुज साजेना । हें तों अवघें ठाउकें आहे जना ।
खात्यास नखातें देखों सकेना । ऐसें आहे ॥ १५ ॥
१५) " जें मला नाहीं तें तुलाही शोभत नाहीं " हा मत्सराचा दृष्टीकोन सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्याला खायला अन्न मिळत नाहीं तो अन्न खाणार्‍याला निर्मळ मनानें पाहूं शकत नाहीं, त्यातलाच हा प्रकार आहे.  
भाग्यपुरुष थोर थोर । त्यास निंदिती डीवाडखोर ।
सावास देखतां चोर । चर्फडी जैसा ॥ १६ ॥
१६) भाग्यवंत अशा निरनिराळ्या थोर पुरुषांची टवाळखोर निंदा करतात. सज्जन माणसाला पाहून चोर चरफडतात. तशांततलाच हा प्रकार आहे. 
वैराग्यापरतें नाहीं भाग्य । वैराग्य नाहीं तें अभाग्य ।
वैराग्य नस्तां योग्य । परमार्थ नव्हे ॥ १७ ॥
१७) वैराग्यासारखें भाग्य नाहीं. वैराग्य नसेल तें दुर्भाग्य होय. कारण वैराग्याच्या अभावी योग्य रीतीनें परमार्थ होत नाहीं.  
प्रत्ययेज्ञानी वीतरागी । विवेकबळें सकळ त्यागी ।
तो जाणीजे माहांयोगी । ईश्र्वरी पुरुष ॥ १८ ॥
१८) ज्याच्यापाशीं अनुभवाचे ज्ञान आहे, ज्याची आसक्ती सुटलेली आहे, विवेकाच्या जोरावर ज्यानें सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, असा पुरुष महायोगी समजावा. तो ईश्र्वरी पुरुष असतो.  
अष्टमा सिद्धीची उपेक्षा । करुन घेतली योगदीक्षा ।
घरोंघरीं मागे भिक्षा । माहादेव ॥ १९ ॥
१९) श्रीशंकर हा वैराग्याचा परम आदर्श आहे. आठ मोठ्या सिद्धिंना बाजूस सारुन श्रीमाहादेवानें योगदिक्षा घेतली आणि तो घरोघर भिक्षा मागत फिरतो.  
ईक्ष्वराची बराबरी । कैसा करील वेषधारी ।
म्हणोनिया सगट सरी । होत नाहीं ॥ २० ॥
२०) महादेवासारखा वेष धारण करणारा त्याची बरोबरी करुं शकणार नाहीं. म्हणून बाहेरुन सारखेपणा दिसला तरी सर्वांची योग्यता सारखीं नसते. 
उदास आणी विवेक । त्यास शोधिती सकळ लोक ।
जैसें लालची मूर्ख रंक । तें दैन्यवाणें ॥ २१ ॥
२१) जो अंतरी वैराग्यसंपन्न व विवेकी असतो अशा  पुरुषाला पुष्कळ लोक शोघीत येतात. याच्या उलट जो लोभी, आसक्त व विचेकहीन असतो असा भाग्यहीन दिनवाणें जीवन जगत असतो.   
जे विचारापासून चेवले । जे आचारापासून भ्रष्टले ।
विवेक करुं विसरले । विषयलोभी ॥ २२ ॥
२२) जी माणसें उच्च विचारांपासून खाली घसरलेली असतात, जी आचारनें भ्रष्ट असतात, ती माणसें विषयांच्या लोभानें आत्मानात्मविचार करुं शकत नाहींत. सारासार विचाराचा त्यांना विसर पडतो.  
भजन तरी आवडेना । पुरश्र्चर्ण कदापि घडेना ।
भल्यांस त्यांस पडेना । येतन्निमित्य ॥ २३ ॥ 
२३) त्यांना भजनपूजन आवडत नाहीं. त्यांच्या हातून पुरश्र्चरण कधीं घडत नाहीं. याच कारणाने त्यांचे संत-सज्जनांशी जमत नाहीं.    
वैराग्यें करुन भ्रष्टेना । ज्ञान भजन सांडिना ।
वित्पन्न आणि वाद घेना । ऐसा थोडा ॥ २४ ॥
२४) वैराग्यसंपन्न असून जो भ्रष्ट होत नाहीं, ज्ञानी असून जो भगवमताचे भजन सोडत नाहीं, स्वतः विद्वान असून जो कधीं वादांत पडत नाहीं, अशीं माणसें फार थोडी आढळतात. 
कष्ट करितां सेत पिके । उंच वस्त तत्काळ विके ।
जाणत्या लोकांच्या कौतुकें । उड्या पडती ॥ २५ ॥
२५) कष्ट केलें तर शेतांत उत्तम पीक येते. भारी वस्तु असेल तर ती बाजारांत लगेच विकली जाते. त्याचप्रमाणें जो विवेक व वैराग्य या दोन्हीनीं संपन्न असतो, त्याच्याकडे जाणत्या लोकांच्या उड्या पडतात.  
येर ते अवघेंचि मदले । दुराशेनें खोटे जाले ।
कानकोंडे ज्ञान केलें । भ्रष्टाकारें ॥ २६ ॥
२६) हें ज्यांच्यापाशीं नसते तें लोक निस्तेजपणें मागें पडतात. मनांत आशा वागवल्यानें तें खोटे पडतात. वैराग्यभ्रष्ट झाल्यानें त्यांचे ज्ञान मिंधें बनते. तें कानकोडे होतें.  
सबळ विषय त्यागणें । शुद्ध कार्याकारण घेणें ।
विषयत्यागाची लक्षणें । वोळखा ऐसीं ॥ २७ ॥
२७) मर्यादा सोडून असणारे, प्रमाणाबाहेर जाणारे देहसुख सोडावें. शरीराचे धारण करण्यास जरुर तेवढेंच देहसुख सेवावें. विषयत्यागाची लक्षणें अशी आहेत हें ओळखून असावें.  
सकळ कांहीं कर्ता देव । नाहीं प्रकृतीचा ठाव ।
विवेकाचा अभिप्राव । विवेकी जाणती ॥ २८ ॥
२८) हें झालें वैराग्य आतां विवेक ऐकावा. जें जेम कांहीं घडतें त्याचा कर्ता ईश्र्वर आहे. प्रकृतिच्या पसार्‍याला खरें अस्तित्व नाहीं. असा निश्र्चय अंतर्यामी 
स्थिर होणें हा विवेक होय. जे खरे विवेकी असतात त्यानांच हा विवेकाचा अर्थ बरोबर कळतो.   
शूरत्वविषईं खडतर । त्यास मानिती लाहानथोर ।
कामगार आणि आंगचोर । येक कैसा ॥ २९ ॥
२९) सर्व प्रसंगीं जो शौर्य दाखवतो त्याला लहान मोठे सर्वजण शूर मानतात. जो खरे कष्ट करणारा आहे तो आणि जो अंगचोर आहे तो, या दोघांची बरोबरी करतां येत नाहीं.  
त्यागात्याग तार्किक जाणे । बोलाऐसें चालों जाणे ।
पिंडब्रह्मांड सकळ जाणे । येथेयोग्य ॥ ३० ॥
३०) कशाचा त्याग करावा व कशाचा करुं नये हें जो शुद्ध तर्कानें जाणतो, आपण जसें बोलतो तसें वागण्याचें जो जाणतो, पिंडब्रह्मांडाची रचना जो यथार्थपणें जाणतो,
ऐसा जो सर्व जाणता । उत्तमलक्षणी पुरुता ।
तयाचेनि सार्थकता । सहजचि होये ॥ ३१ ॥
३१) असें सर्व जाणणारा असून जो उत्तम गुणांनी पूर्ण संपन्न असतो त्याच्या संगतीनें आपल्या आयुष्याचें सार्थक घडतें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विषयत्यागनिरुपणनाम समास सातवा ॥
    Samas Satava VishayaTyyga  Nirupan 
   समास सातवा विषयत्याग 




Custom Search