Showing posts with label Dashak Terava. Show all posts
Showing posts with label Dashak Terava. Show all posts

Thursday, March 15, 2018

Samas Dahava Shikavan Nirupan समास दहावा शिकवण निरुपण


Dashak Terava Samas Dahava Shikavan Nirupan 
Samas Dahava Shikavan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about behavior. How a sadhak is expected to behave with the others.
समास दहावा शिकवण निरुपण
श्रीराम ॥
पालेमाळा सुमनमाळा । फळमाळा बीजमाळा ।
पाषाणमाळा कवडेमाळा । सूत्रें चालती ॥ १ ॥
१) झाडाचा पाला, फुलें, फळें, बीजें, पाषाण, आणि कवड्या यांच्या माळा करतात. पण त्या सगळ्या दोर्‍यामुळें - दोरा ओवल्यामुळें - होतात. 
स्फटिकमाळा मोहरेमाळा । काष्टमाळा गंधमाळा ।
धातुमाळा रत्नमाळा । जाळ्या वोलि चांदोवे ॥ २ ॥
२) त्याचप्रमाणें स्फटिकमणी, मोहोरमणी, काष्ट, गंध, धातु, रत्नें यांच्यादेखील माळा करतात. शिवाय जाळ्या, ओळी आणि चांदवे, या वस्तुदेखील सुतापासून तयार करतात. 
परी हे तंतूनें चालतें । तंतू नस्तां विष्कळित होतें ।
तैसें म्हणों आत्मयाते । तरी साहित्य न पडे ॥ ३ ॥
३) या माळांमध्यें दोरा ओवलेला असतो. दोरा नसेल तर मणी विस्कळीत होतात. त्याचप्रमाणें आत्मा सर्व वस्तुंमध्यें ओवलेला असतोअसें म्हणतात. पण दोर्‍याचा दृष्टांत आत्म्याला संपूर्णपणें लागूं पडत नाहीं.   
तंतूस मणी वोविला । तंतूमध्येंचि राहिला ।
आत्मा सर्वांगी व्यापला । पाहाना कां ॥ ४ ॥
४) दोरा मण्यांतून जातो. मणी दोर्‍याच्या आधारानें राहतो. परंतु दोरा मण्याला व्यापून असत नाहीं. देहांत आत्मा राहातो. तो देहाचे सर्वांग व्यापून असतो. हें लक्षांत घ्यावें. 
आत्मा चपळ सहजगुणें । दोरी काये चळों जाणे ।
म्हणोन दृष्टांत देणें । साहित्य न घडे ॥ ५ ॥
५) आत्म्याच्या ठिकाणी चेतना सहजपणें आहे. ती दोर्‍याच्या ठिकाणी नाहीं. म्हणून दोर्‍याचा दृष्टांत आत्म्याला लागू पडत नाहीं.
नाना वल्लींत जळांश । उसांमध्यें दाटला रस ।
परी तो रस आणी बाकस । येक नव्हे ॥ ६ ॥
६) अनेक प्रकारच्या वेलींत रस असतो, उसांतही रस असतो पण तो रस व रसहीन उसाची चिपाडें सारखी नसतात.  
देही आत्मा देह अनात्मा । त्याहून पर तो परमात्मा ।
निरंजनास उपमा । असेचिना ॥ ७ ॥
७) देह अनात्मा तर देहांत राहणारा तो आत्मा होय. त्याहून परमात्मा, तो श्रेष्ठ आहे. निरंजन परमात्म्याला कशाचीच उपमा देता येत नाहीं.  
रायापासून रंकवरी । अवघ्या मनुष्यांचियां हारी ।
सगट समान सरी । कैसी करावी ॥ ८ ॥
८) राजापासून रंकापर्यंत जिकडे तिकडे  माणसांचे समुदाय आढळतात.पण त्या सगळ्यांना सरसकट सारख्या दर्जाचे किंवा लायकीचे मानतां येत नाहीं.  
देव दानव मानव । नीच योनी हीन जीव । 
पापी  सुकृति अभिप्राव । उदंड आहे ॥ ९ ॥
९) देव, दानव, मानव, नीच योनी, हीन जीव, पापी, पुण्यवान, वगैरे अनेक प्रकारचे भेद आहेत. 
येकांशें जग चाले । परी सामर्थ्य वेगळालें ।
येकासंगे मुक्त केलें । येकासंगे रवरव ॥ १० ॥
१०) ईश्वराच्या एका अंशानें जग चालते. ईश्वराचा कांहीं भाग जग व्यापून आहे. हें अगदी खरें आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीचें व वस्तुचें सामर्थ्य वेगवेगळें आढळतें. एकाच्या संगतीनें मोक्ष मिळतो, तर एकाच्या संगतीनें नरकांत जावें लागते. 
साकर माती पृथ्वी होये । परी तो माती खातां न ये ।
गरळ आप नव्हे काये । परी तें खोटें ॥ ११ ॥
११) साखर व माती दोन्ही पृथ्वीची रुपें आहेत. परंतु माती खाता येत नाहीं. सापाचे वीष व पाणी दोन्ही पाण्याचीच रुपें आहेत. पण तो सारखेपणा खोटा असतो.   
पुण्यात्मा आणी पापात्मा । दोहिंकडे अंतरात्मा ।
साधु भोंदु सीमा । सांडूंच नये ॥ १२ ॥
१२) एखादा  पुण्यवान माणुस व एखादा पापी माणुस या दोघांत अंतरात्मा एकच आहे. पण म्हणुन साधु व भोंदू या दोघांना समान मानता येत नाहीं. याना समान मानून मर्यादा मोडणें योग्य नाहीं.
अंतर येक तों खरें । परी सांगातें घेऊं न येती माहारे ।
पंडित आणि चाटें पोरें । येक कैसीं ॥ १३ ॥
१३) सगळ्यांमध्यें अंतरात्मा एकच आहे खरा, परंतु महार पंगतीस घेऊन जेवणें योग्य नाहीं.विद्वान व वात्रट पोरें ही सारख्या योग्यतेची मानतां येत नाहींत. 
मनुष्य आणी गधडे । राजहंस आणि कोंबडें ।
राजे आणि माकडें । एक कैसीं ॥ १४ ॥
१४) माणूस आणि गाढव, राजहंस आणि कोंबडा, राजा आणि माकड यांची योग्यता एकच होऊं शकत नाहीं.   
भागीरथीचें जळ आप । मोरी संवदणी तेंहि आप ।
कुश्र्चिळ उदक अल्प । सेववेना ॥ १५ ॥
१५) गंगेचे पाणी, मोरींतील पाणी व कपडे धुतलेले पाणी हें सर्व पाणीच असते. परंतु मोरींतील पाणी व कपडे धुतलेले पाणी घाणेरडे असते, ते पिता येत नाही.  
ताकारणें आचारशुद्ध । त्याउपरी विचारशुद्ध ।
वीतरागी आणि सुबुद्ध । ऐसा पाहिजे ॥ १६ ॥
१६) सांगण्याचा मुद्दा असा कीं, शुद्ध आचार असलेला, शुद्ध विचार असलेला, अनासक्त मनाचा आणि शुद्ध बुद्धीचा माणूस इतर माणसांपेक्षां श्रेष्ठ दर्जाचा असतो.  
शूरांहून मानिलें लंडी । तरी युद्धप्रसंगी नरकाडी ।
श्रीमंत सांडून बराडी । सेविला कैसें ॥ १७ ॥
१७) समजा, एखाद्या भित्र्या माणसाला खर्‍या शूर माणसापेक्षां मोठा दर्जा दिला तर युद्ध प्रसंगी फार फजिती होते.  श्रीमंत माणसाऐवजी दरिद्री माणसाची सेवाचाकरी केली तर पदरांत कांहींच पडणार नाहीं. 
येका उदकें सकळ जालें । परी पाहोन पाहिजे सेविलें ।
सगट अवघेंच घेतलें । तरी तें मूर्खपण ॥ १८ ॥
१८) एका पाण्यापासून सर्व निर्माण झालें हें जरी खरें असलें तरी जें खायचे तें नीट पाहूनच खाल्ले पाहिजे. सरसकट सगळें खाल्ले तर तो मूर्खपणाच होईल. 
जीवनाचेंच जालें अन्न । अन्नाचें जालें वमन ।
परी वमनाचें भोजन । करितां न ये ॥ १९ ॥
१९) पाण्यापासून अन्न होते. अन्नाचीच ओकारी बनते. पण ओकारीचें  भोजन करतां येत नाही. 
तैसें निंद्य सोडून द्यावें । वंद्य तें हृदईं धरावें ।
सत्कीर्तीनें भरावें । भूमंडळ ॥ २० ॥
२०) त्याचप्रमाणें जें निंद्य आहे तें सोडून द्यावें , जें योग्य आहे तें अंतःकरणांत वागवावें. आणि अशारीतीनें जगांत आपली कीर्ति भरुन टाकावी.     
उत्तमांसि उत्तम माने । कनिष्ठांस तें न माने ।
म्हणोन करंटे देवानें । करुन ठेवले ॥ २१ ॥ 
२१) उत्तम पुरुषाला जें उत्तम आहें तेंच आवडते. हीन माणसांना तें आवडत नाहीं.म्हणून देवानें तसलें करंटे निर्माण केलें आहेत.
सांडा अवघें करंतपण । धरावें उत्तम लक्षण ।
हरिकथा पुराण श्रवण । नीति न्याये ॥ २२ ॥
२२) शहाण्या माणसानें सारे करंटेपण सोडावें. उत्तम लक्षणें स्वीकारावीत. हरिकथा, निरुपण, नीति, न्याय ही उत्तम लक्षणें आहेत. 
वर्तायाचा विवेक । राजी राखणें सकळ लोक ।
हळुहळु पुण्यश्र्लोक । करीत जावे ॥ २३ ॥
२३) सर्व लोकांना खुष ठेवणें हींच उत्तम विवेकानें वागण्याची किल्ली आहे. लोकांना हळुहळु पुण्यशील करावें.  
मुलाचे चालीने चालावें । मुलाच्या मनोगतें बोलावें ।
तैसें जनास सिकवावें । हळुहळु ॥ २४ ॥
२४) लोकांचें मन व वागणें लहान मुलाप्रमाणें असतें तें ओळखून लोकांशी वागतांना मुलांच्या चालीनें चालावें. मुलांच्या मनाप्रमाणें बोलावें. अशारीतीनें लोकांना हळुहळु शिकवावे.
मुख्य मनोगत राखणें । हेंचि चातुर्याचीं लक्षणें ।
चतुर तो चतुरांगजाणे । इतर तीं वेडीं ॥ २५ ॥  
२५) लोकसंग्रह करणार्‍यानें लोकांचे मनोगत राखलें पाहिजें. हेंच खरें चातुर्याचें लक्षण आहे. असा जो चतुर आहे तो साम, दाम, दंड व भेद यांसारखें सर्व मार्ग जाणतो. इतर सगळे वेडे समजावेत.    
वेड्यास वेडे म्हणों नये । वर्म कदापि बोलों नये ।
तरीच घडे दिग्विजये । निस्पृहासी ॥ २६ ॥
२६) पण ज्याला लोकांचे मनोगत राकहावयाचें आहे त्यानें वेड्याला उघडपणें वेडा म्हणू नये. कुणाचेही वर्म उघडपणें प्रगट करुं नये. लोकांमध्यें वागण्याची अशी रीत ठेवली तरच निःस्पृह महंताला पुढारीपण मिळतें.  
उदंड स्थळीं उदंड प्रसंग । जाणोनि करणें येथासांग ।
प्राणीमात्राचा अंतरंग । होऊन जावें ॥ २७ ॥
२७) वेगवेगळे प्रसंग वेगवेगळ्या ठिकाणी त्याला येतात. प्रसंग ओळखून त्यास योग्य असें वागावें. त्यानें प्राणीमात्रांच्या अंतरंगाशी अगदी एकरुप होऊन जावें.  
मनोगत राखोन जातां । परस्परें होये अवस्ता ।
मनोगत तोडितां वेवस्था । बरी नाहीं ॥ २८ ॥
२८) दुसर्‍यांचे मनोगत ओळखून वागलें तर परस्परांमध्यें एकरुपता वाढते. दुसर्‍याचें मनोगत भंग पावलें तर परस्परांत संघर्ष निर्माण होतो व तो मग वाढतो. 
याकारणें मनोगत । राखेल तो मोठा महंत ।
मनोगत राखतां समस्त । वोढोन येती ॥ २९ ॥
२९) म्हणून दुसर्‍याचे अंतःकरण न दुखवतां वागणारा महंत खरोखर थोर समजावा. मनोगत सांभाळलें तर सारे लोक आपोआप आकर्षिले जातात.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिकवणनिरुपणनाम समास दहावा ॥  
Samas Dahava  Shikavan Nirupan 
समास दहावा शिकवण निरुपण




Custom Search

Tuesday, March 13, 2018

Samas Navava Aatma Vivaran समास नववा आत्माविवरण


Dashak Terava Samas Navava Aatma Vivaran 
Samas Navava Aatma Vivaran, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Aatma. Aatma leaves in the body. Aatma and body both are essential for the life of anybody. Without Aatma body can’t leave nor can Aatma leave without body.
समास नववा आत्माविवरण 
श्रीराम ॥
आत्मयास शेरीरयोगें । उद्वेग चिंता करणे लागे ।
शरीरयोगें आत्मा जगे । हें तो प्रगटचि आहे ॥ १ ॥
१) शरीराशी संबंध आल्यानें जीवात्म्याला दुःख व चिंता करावी लागते. शरीराच्या साहायानें जीवात्मा जगतो. हें तर अगदी प्रत्यक्षच आहे. 
देह अन्नचि खायेना । तरी आत्मा कदापि जगेना ।
आत्म्याविण चेतना । देहास कैंची ॥ २ ॥
२) देहानें अन्न खाल्लें नाहीं तर जीवात्मा कधींच जगूं शकत नाहीं. तसेंच जीवात्मा नसेल तर देहाला जिवंतपणा असत नाहीं. 
हें येकावेगळें येक । करुं जातां निरार्थक ।
उभयेयोगें कोणीयेक । कार्य चाले ॥ ३ ॥
३) देह व जीवात्मा एकमेकांपासून वेगळें करायला जाणें व्यर्थ आहे. कारण दोघांच्या संयोगानेंच माणसाच्या जीवनांत सारी कार्ये घडतात. 
देहाला नाहीं चेतना । आत्म्यास पदार्थ उचलेना ।
स्वप्नभोजनें भरेना । पोट कांहीं ॥ ४ ॥
४) नुसत्या देहाला जीवंतपण नसतें तर नुसत्या जीवात्म्याला पदार्थ उचलता येत नाहीं. एखादा माणूस स्वप्नामधें जेवला तर त्याचे पोट कांहीं भरत नाहीं. 
आत्मा स्वप्नअवस्थेंत जातो । परन्तु देहामध्यें हि असतो ।
निदसुरेपणें खाजवितो । चमत्कार पाहा ॥ ५ ॥
५) जीवात्मा जेव्हा स्वप्नामधें जातो, तेव्हां तो देहामध्येंही असतो. झोपेंत तो शरीर खाजवतो. हें याचें प्रमाण होय. हा एक चमत्कार आहे.   
अन्नरसें वाढें शरीर । शरीरप्रमाणें विचार ।
वृद्धपणीं तदनंतर । दोनी लाहानाळती ॥ ६ ॥
६) अन्नरसानें शरीर वाढतें. जसें जसें शरीर वाढतें तसा तसा विचारही वाढतो. त्यानंतर म्हातारपणीं शरीर व विचार दोन्हींचा संकोच होतो. दोन्ही लहान होतात.     
उत्तम द्रव्य देह खातो । देहयोगें आत्मा भुलतो ।
विस्मरणें शुद्धि सांडितो । सकळ कांहीं ॥ ७ ॥
७) देह मादक पदार्थ सेवन करतो, त्याचा अम्मल जीवात्म्यावर होऊन तो भ्रमतो. त्याचे भान नाहींसें होते. आणि त्याची सगळी शुद्धि लोपते. 
देहानें घेतलें वीष । आत्मा जाये सावकास ।
वाढणें मोडणें आत्मयास । नेमस्तआहे ॥ ८ ॥
८) देहानें विष घेतलें तर त्याचा परीणाम होऊन जीवात्मा देह सोडतो. वाढणें, मोडणें या गोष्टी जीवात्म्यास निश्र्चिपणें भोगाव्या लागतात. 
वाढणें मोडणें जाणें येणें । सुख दुःख देहाचेनि गुणें ।
नाना प्रकारें भोगणें । आत्मयास घडे ॥ ९ ॥
९) वाढणें, मोडणें, जाणें, येणें, सुख आणि दुःख या गोष्टी देहाशी संयोग झाल्यानें जीवात्म्याला अनेक रीतीनें भोगाव्या लागतात.   
वारुळ म्हणिजे पोकळ । मुंग्यांचे मार्गचि सकळ ।
तैसेंचि हें केवळ । शरीर जाणावें ॥ १० ॥
१०) मुंग्यांचें वारुळ आंतमधून पोकळ असतें. त्यांत मुंग्यांना जाण्यायेण्याचे मार्गच असतात. आपला देहसुद्धा वारुळासारखाच आहे. 
शरीरीं नाडीचा खेटा । नाडीमध्यें पोकळ वाटा ।
लाहान थोर सगटा । दाटल्या नाडी ॥ ११ ॥
११) आपल्या शरीरांत नाड्यांचा गुंतडा आहे. नाड्या आंतून पोकळ असतात. अशा लहान व मोठ्या पुष्कळ नाड्या शरीरांत आहेत.  
प्राणी अन्नोदक घेतो । त्याचा अन्नरस होतो ।
त्यास वायो प्रवर्ततो । स्वासोस्वासें ॥ १२ ॥
१२) प्राणी अन्न खातो व पाणी पितो. त्याचा अन्नरस तयार होतो. त्या अन्नरसाला वायु श्वासोच्छ्वासानें प्रवाहित करतो. 
नाडीद्वारां धांवे जीवन । जीवनामधें खेळें पवन ।
त्या पवनासरिसा जाण । आत्मा हि विवरे ॥ १३ ॥
१३) शरीरांतील नाड्यांतून पाणी वाहते. त्या पाण्यामध्यें वायुदेखील वाहतो. त्या वायुबरोबर जीवात्मासुद्धां नाड्यांमधून संचार करतो. नाड्यांमधून जाणीवेचा प्रवाह पण असतो, हें सांगण्याचा हेतु आहे. 
तृषेनें शोकले शरीर । आत्म्यास कळे हा विचार ।
मग उठवून शरीर । चालवी उदकाकडे ॥ १४ ॥
१४) तहान लागून शरीराला शोष पडला कीं, तें जीवात्म्याला समजतें मग तो शरीराला उठवून पाण्याकडे नेतो. 
उदक मागे शब्द बोलवी । मार्ग पाहोन शरीर चालवी ।
शरीर अवघें च हालवी । प्रसंगानुसार ॥ १५ ॥
१५) " मला पाणी पाहिजे " असें शब्द जीवात्मा शरीराकडून बोलवतो. रस्ता नीट बघून तो शरीरास चालवतो. जसाजसा  प्रसंग येईल तशी तशी शरीराकडून हालचाल करवितो.   
क्षुधा लागते ऐसें जाणतो । मग देहास उठवितो ।
आच्यावाच्या बोलवितो । ज्यासी त्यासी ॥ १६ ॥
१६) भूक लागली असें जीवात्मा जाणतो. मग तो देहाला उटवतो. आणि जेवायला उशीर झाला म्हणून तो ज्याला त्याला अद्वातद्वा बोलायला लावतो. 
बायेकांत म्हणे जालें जालें । देह सोवळें करुन आणिलें ।
पायांत भरुन चालविलें । तांतडीं तांतडीं ॥ १७ ॥
१७) बायकोच्या शरीरांतील जीवात्म्याला म्हणतो, " झालें जेवण तयार झालें चला " मग हा देहाला सोवळे नेसवतो. आणि पायांकडून चालवून तातडीनें जेवायला नेतो.   
त्यासी पात्रावरी बैसविलें । नेत्रीं भरोन पात्र पाहिलें ।
हाताकरवीं आरंभिलें । आपोशन ॥ १८ ॥
१८) देहाला तो पानावर बसवतो. मग डोळ्यांत भरुन वाढलेले पान बघतो. आणि हाताला आपोशन करायला लावतो. 
हाताकरवीं ग्रास उचलवी । मुखीं जाऊन मुख पसरवी ।
दातांकरवीं चाववी । नेटें नेटें ॥ १९ ॥
१९) नंतर जीवात्मा हाताला घास उचलावयाला लावतो. तोंडापाशीं नेल्यावर तोंड उघडावयास लावतो. आणि दांतांकडून नीटपणें चाववून घेतो.   
आपण जिव्हेमधें खेळे । पाहतो परिमळसोहळे ।
केंस काडी खडा कळे । तत्काळ थुंकी ॥ २० ॥
२०) हाच जीवात्मा जीभेमध्यें संचार करुन स्वाद आणि सुवास यांचा आनंद भोगतो. अन्नांत केस, काडी किंवा खडा लागला तर जाणतो व लगेच थुंकुन टाकतो.   
आळणी कळतां मीठ मागे । बायलेसि म्हणे आगे कांगे ।
डोळे ताऊन पाहों लागे । रागें रागें ॥ २१ ॥ 
२१) पदार्थ आळणी झाला असेल तर जीवात्मा मीठ मागतो. " असे कां गें " असें ओरडून बायकोकडे डोळे वटारुन रागानें पाहातो.         
गोडी लागतांच आनंदे । गोड नस्तां परम खेदे ।
वांकडी गोष्टी अंतरीं भेदे । आत्मयासी ॥ २२ ॥
२२) गोड पदार्थ खातांना जीवात्म्याला आनंद होतो. पदार्थ गोड नसेल तर त्याला मोठें वाईट वाटते. वाईट गोष्टीनें जीवात्म्याच्या अंतर्यामी क्लेश होतात. 
नाना अन्नाची गोडी । नाना रसें स्वाद निवडी ।
तिखट लागतां मस्तक झाडी । आणी खोंकीं ॥ २३ ॥
२३) हा जीवात्मा अनेक प्रकारच्या अन्नाची गोडी घेतो. अनेक रसांची चव निवडतो. पदार्थ तिखट लागला तर डोकें झाडतो. आणि त्याला ठसका लागतो. 
मिरपुडी घातली फार । कायसें करितों खापर । 
जिव्हेकरवीं कठिणोत्तर । बोलवी रागें ॥ २४ ॥
२४) मग तो रागावून बोलायला लावतो कीं, " मिरपूड फार घातली, खापरासारखा हा काय पदार्थ केला आहे.    
आज्य उदंड जेविला । सवेंच तांब्या उचलिला ।
घळघळां घेऊं लागला । सावकास ॥ २५ ॥
२५) तुपाचे पक्वान्न फार खाल्ल्याने तहान फार लागते. म्हणून तो लगेच तांब्या उचलायला लावतो आणि घटाघटा पाणी प्यायला लावतो.     
देहीं सुखदुःखभोक्ता । तो येक आत्माचि पाहातां ।
आत्म्याविण देह वृथा । मडें होये ॥ २६ ॥
२६) देहामध्यें राहणारा आणि सुखदुःखें भोगणारा एक जीवात्माच होय. जीवात्मा देहांत नसेल तर देह केवळ प्रेत बनतो.   
मनाच्या अनंत वृत्ति । जाणणें तेचि आत्मस्थिती ।
त्रैलोकीं जितुका वेक्ती । तदांतरीं आत्मा ॥ २७ ॥
२७) मनामध्यें अनंत वृत्ति निर्माण होतात. जीवात्मा त्या सर्व जाणतो. सर्व वृत्ति जाणणें, हाच त्याचा खरा धर्म होय. त्रैलोक्यामध्यें जितक्या व्यक्ति आहेत तितक्या सर्वांच्या अंतर्यामी जीवात्मा वास करतो.   
जगामध्यें जगदात्मा । विश्र्वामधें विश्र्वात्मा ।
सर्व चालवी सर्वात्मा । नाना रुपें ॥ २८ ॥
२८) जगाच्या अंतर्यामी असणारा तो जगदात्मा, विश्र्वाच्या अंतर्यामीं असणारा तो विश्र्वात्मा होय. अंतरात्मा अथवा सर्वात्मा अशारीतीनें अनेक रुपें घेऊन सर्वांना चालवितो. 
हुंगे चाखे ऐके देखे । मृद कठिण वोळखे ।
शीत उष्ण ठाउकें । तत्काळ होये ॥ २९ ॥
२९) त्या अंतरात्म्याला सर्व कांहीं ओळखता येतें. तो वास घेतो, स्वाद घेतो, ऐकतो, पाहतो, मऊ आणि कठीण ओळखतो. गरम आणि थंड त्याला तत्काळ समजते.   
सावधपणें लाघवी । बहुत करी उठाठेवी ।
या धूर्ताच्या उगवी । धूर्तचि करी ॥ ३० ॥  
३०) अत्यंत चतुर असणारा असा हा जीवात्मा लक्ष देऊन कितीतरी प्रकारच्या खटपटी करतो. त्या चतुर जीवात्म्याचा उलगडा, खरा चतुर पुरुषच करुं शकतो. 
वायोसरिसा परिमळ येतो । परि तो परिमळ वितळोन जातो ।
वायो धुळी घेउनी येतो । परी ते हि जाये ॥ ३१ ॥
३१) वारा जेव्हां वाहतो तेव्हां त्याच्याबरोबर सुगंध येतो. पण तो सुगंध कांहीं काळानेम विरुन जातो. वाराजेव्हां वाहतो तेव्हां त्याच्याबरोबर धूळ येते. पण ती देखील नाहींशी होते. 
शीत उष्ण वायोसरिसें । सुवासें अथवा कुवासें ।
असिजे परी सावकासें । तगणे न घडे ॥ ३२ ॥
३२) गरम आणी थंड, सुगंध आणी दुर्गंध वगैरे गोष्टी वायुबरोबर वाहात येतात. परंतु त्या हार वेळ टिकत नाहींत. 
वायोसरिसे रोग येती । वायोसरिसी भूतें धांवती ।
धूर आणी धुकटें येती । वायोसवें ॥ ३३ ॥ 
३३) वायुबरोबर रोग येतात. भुतें धांवतात, त्याचप्रमाणें धूर व धूकेंसुद्धां येतात.
वायोसवें कांहींच जगेना । आत्म्यासवें वायो तगेना ।
आत्म्याची चपळता जाणा । अधिक आहे ॥ ३४ ॥ 
३४) पण यापैकी कोणतीही गोष्ट वायुबरोबर कायम टिकत नाहीं. जीवात्म्या बरोबर तुलना केली तर वायु त्याच्यासमोर टिकत नाही. वायूपेक्षां जीवात्मा अधिक सूक्ष्म व चपळ आहे.   
वायो कठिणास आडतो । आत्मा कठिण भेदून जातो ।
कठिण पाहों तरी तो । छेदेहिना ॥ ३५ ॥
३५) कठिण पदार्थांमध्यें वायु अडतो. पण आपल्या आड येणारा कठिण पदार्थ भेदून जीवात्मा पलीकडे जातो. जीवात्म्याचा कठिणपणा इतका आहे कीं, त्याचा छेद करतां येत नाहीं. 
वायो झडझडां वाजे । आत्मा कांहींच न वाजे ।
मोनेंचि अंतरीं समजे । विवरोन पाहातां ॥ ३६ ॥
३६) वार्याचा झडझड असा आवाज येतो, जीवात्म्याचा मुळींच आवाज येत नाहीं. जो कोणीं मौन धरुन त्याचे चिंतन व मनन करील त्याला स्वतःच्या अंतर्यामीच तो कळून येईल. 
शरीरास बरें केलें । तें आत्मयास पावलें ।
शरीरयोगें जालें । समाधान ॥ ३७ ॥ 
३७) शरीराला कांहीं चांगलें उपचार केलें तर ते जीवात्म्याला पावतात. शरीराच्याद्वारे जीवात्म्याला समाधान मिळतें.
देहावेगळे उपाये नाना । करितां आत्मयास पावेना ।
समाधान पावे वासना । देहाचेनि ॥ ३८ ॥
३८) देहा व्यतिरिक्त अनेक उपचार केले तर ते जीवात्म्याला पोचत नाहींत. फक्त देहाच्याद्वारेच जीवात्म्याला वासनेचे समाधान मिळते. 
देहआत्मयाचें कौतुक । पाहों जातां हें अनेक ।
देहावेगळी आडणुक । आत्मयास होये ॥ ३९ ॥
३९) देह व जीवात्मा यांच्या संयोगाचें कौतुक असें अनेक प्रकारचे आहे. देह नसेल तर जीवात्म्याची अनेक प्रकारे अडचण होतें. त्याला अडल्यासारखें होते.  
येक असतां उदंड घडे । वेगळें पाहातां कांहींच न घडे ।
विवेकें त्रैलोकीं पवाडे । देहात्मयोगें ॥ ४० ॥
४०) देह व जीवात्मा एकत्र असतां असंख्य गोष्टी होऊं शकतात. दोघांना वेगळें केल्यास एकेकट्याच्या हातून कांहींच होऊं शकत नाहीं. दोघांचा संयोग असेल तर विवेकाच्या बळावर त्रैलोक्यााचा ठाव घेतां येतो.    
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मविवरणनाम समास नववा ॥
Samas Navava  Aatma Vivaran
समास नववा आत्माविवरण 


Custom Search

Saturday, March 10, 2018

Samas Aathava Karta Nirupan समास आठवा कर्ता निरुपण


Dashak Terava Samas Aathava Karta Nirupan 
Samas Aathava Karta Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Karta. Karta has created this world. We have to find out him by Pratyaya means experience. Parmarth is based on ones’ experience. Sadhak when acquires knowledge, all his doubts are cleared.
समास आठवा कर्ता निरुपण
श्रीराम ॥
श्रोता म्हणे वक्तयासी । कोण कर्ता निश्र्चयेंसीं ।
सकळ सृष्टि ब्रह्मांडासी । कोणें केलें ॥ १ ॥
१) श्रोत्यांनीं वक्त्याला असा प्रश्र्ण केला कीं, " हीं सगळीं सृष्टि आणि ब्रह्मांड कोणी रचले? निश्र्चितपणें याचा कर्ता कोण आहे? "  
तव बोलिले सभानायेक । जे बोलिके येकाहून येक ।
या बोलण्याचें कौतुक । श्रोतीं सादर ऐकावें ॥ २ ॥
२) तेव्हां सभेतून एकाहून एक हुशार असे लोक पुढें आले. आणि आपापल्या मतानें याचे उत्तर देऊं लागले. त्या उत्तराचे कौतुक श्रोत्यांनी सादर होऊन ऐकावे. 
येक म्हणती कर्ता देव । येक म्हणती कोण देव ।
आपुलाला अभिप्राव । बोलते जाले ॥ ३ ॥
३) एक म्हणाला कीं देव कर्ता आहे. त्यावर एकानें म्हटलें कीं हा देव कोण आहे?  प्रत्येकानें आपले आपले मत सांगितलें.  
उत्तम मध्यम कनिष्ठ । भावार्थें बोलती पष्ट ।
आपुलाली उपासना श्रेष्ठ । मानिती जनीं ॥ ४ ॥
४) ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणें ज्यानें त्यानें उत्तम, मध्यम किंवा कनिष्ठ देवांना कर्तेपण बहाल केलें.  प्रत्येकाला आपापला उपास्य देव श्रेष्ठ वाटणें हीं जनरीतच आहे. 
कोणीयेक ऐसें म्हणती । कर्ता देव मंगळमूर्ती ।
येक म्हणती सरस्वती । सर्व करी ॥ ५ ॥
५) कोणी असें म्हणतात कीं मंगलमूर्ती म्हणजे गणपती हा कर्ता आहे. तर कोणी म्हणतात कीं, सरस्वती सर्व करते.   
येक म्हणती कर्ता भैरव । येक म्हणती खंडेराव ।
येक म्हणती वीरेदेव । येक म्हणती भगवती ॥ ६ ॥
६) कोणी म्हणतात कीं, भैरव, किंवा खंडेराव किंवा बीरदेव किंवा भगवती. 
येक म्हणती नरहरी । येक म्हणती बनशंकरी ।
येक म्हणती सर्व करी । नारायेणु ॥ ७ ॥
७) किंवा नरहरी किंवा बनशंकरी किंवा नारायण सर्व कांहीं करतो. 
येक म्हणती श्रीराम कर्ता । येक म्हणती श्रीकृष्ण कर्ता ।
येक म्हणती भगवंत कर्ता । केशवराज ॥ ८ ॥
८) कोणी म्हणतात कीं, श्रीराम किंवा श्रीकृष्ण किंवा केशवराज भगवंत
येक म्हणती पांडुरंग । येक म्हणती श्रीरंग ।
येक म्हणती झोटिंग । सर्व करी ॥ ९ ॥
९) किंवा पांडुरंग किंचा श्रीरंग किंवा झोटिंग सर्व कांहीं करतो. 
येक म्हणती मुंज्या कर्ता । येक म्हणती सूर्य कर्ता ।
येक म्हणती अग्न कर्ता । सकळ कांहीं ॥ १० ॥
१०) कोणी म्हणतात कीं, मुंज्या किंवा सूर्य किंवा अग्नि 
येक म्हणती लक्ष्मी करी । येक म्हणती मारुती करी ।
येक म्हणती धरत्री करी । सर्व कांहीं ॥ ११ ॥
११) किंवा लक्ष्मी किंवा मारुती किंवा पृथ्वी 
येक म्हणती तुकाई । येक म्हणती येमाई ।
येक म्हणती सटवाई । सर्व करी ॥ १२ ॥
१२) किंवा तुकाई किंवा यमाई किंवा सटवाई सर्व कांहीं करते. 
येक म्हणती भार्गव कर्ता । येक म्हणती वामन कर्ता ।
येक म्हणती परमात्मा कर्ता । येकचि आहे ॥ १३ ॥
१३) कोणी म्हणतात कीं, भार्गव किंवा वामन परमात्मा कर्ता एकच आहे. 
येक म्हणती विरणा कर्ता । येक म्हणती बस्वंणा कर्ता ।
येक म्हणती रेवंणा कर्ता । सर्व कांहीं ॥ १४ ॥
१४) कोणी म्हणतात वीरण्णा किंवा बसवण्णा किंवा रेवण्णा 
कोणी म्हणती रवळया कर्ता । येक म्हणती स्वामी कार्तिक कर्ता ।
येक म्हणती वेंकटेश कर्ता । सर्व कांहीं ॥ १५ ॥
१५) किंवा रवळनाथ किंवा कार्तिकस्वामी किंवा व्यंकटेश किंवा
येक म्हणती गुरु कर्ता । येक म्हणती दत्त कर्ता ।
येक म्हणती मुख्य कर्ता । वोढ्या जगन्नाथ ॥ १६ ॥
१६) गुरु किंवा दत्त किंवा वोढ्या जगन्नाथ मुख्य कर्ता आहे.
येक म्हणती ब्रह्मा कर्ता । येक म्हणती विष्णु कर्ता ।
येक म्हणती महेश कर्ता । निश्र्चयेंसीं ॥ १७ ॥
१७) कोणी म्हणतात कीं, ब्रह्मा किंवा विष्णु किंवा महेश निश्र्चयानें कर्ता आहे.
येक म्हणती प्रजन्य कर्ता । येक म्हणती वायो कर्ता ।
येक म्हणती करुन अकर्ता । निर्गुण देव ॥ १८ ॥
१८) कोणी म्हणतात कीं, पर्जन्य किंवा वायु कर्ता आहे. कोणी म्हणतात कीं, निर्गुण देव सर्व करुन अकर्ता आहे. 
येक म्हणती माया करी । येक म्हणती जीव करी ।
येक म्हणती सर्व करी । प्रारब्धयोग ॥ १९ ॥
१९) कोणी म्हणतात कीं, माया किंवा जीव किंवा प्रारब्धयोग सर्व कांहीं करतो.  
येक म्हणती प्रेत्न करी । येक म्हणती स्वभाव करी ।
येक म्हणती कोण करी । कोण जाणे ॥ २० ॥
२०) कोणी म्हणतात कीं, प्रयत्न किंवा स्वभाव सर्व कांहीं करतो. तर कोणी म्हणतात कीं, हे सर्व कोण करतो कोण जाणे.
ऐसा कर्त्याचा विचार । पुसतां भरला बाजार ।
आतां कोणाचें उत्तर । खरें मानावें ॥ २१ ॥
२१) या सृष्टीचा कर्ता कोण? हा प्रश्र्ण विचारल्यावर असा उत्तरांचा बाजार भरला. आतां यांत कोणाचे उत्तर खरें मानायचे सांगा. 
जेहिं जो देव मानिला । कर्ता म्हणती तयाला ।
ऐसा लोकांचा गल्बला । वोसरेना ॥ २२ ॥
२२) जो ज्या देवाला मानतो त्याला तो कर्ता म्हणतो, अनेक देवांना मानणार्‍या अनेक लोकांचा हा गोंधळ कांहीं कमी होत नाहीं. 
आपुलाल्या साभिमानें । निश्र्चयेचि केला मनें ।
याचा विचार पाहाणें । घडेचिना ॥ २३ ॥
२३) प्रत्येक माणूस स्वतःच्या देवतेचा अभिमान धरतो. आणि सर्व कर्तेपण तिथेंच आहे असा आपल्या मनानें निश्र्चय करतो. पण तें खरें कीं खोटे याचा तो विचार करीत नाहीं.   
बहु लोकांचा बहु विचार । अवघा राहों द्या बाजार ।
परंतु याचा विचार । ऐसा आहे ॥ २४ ॥
२४) अशा प्रकारें पुष्कळ लोकांची पुष्कळ मतें आहेत. निरनिराळ्या मतांचा बाजार आपण बाजूस ठेवूं. मूळ प्रश्र्णाचा खरा विचार असा आहे.   
श्रोतीं व्हावें सावधान । निश्र्चयें तोडावा अनुमान ।
प्रत्यये मानावा प्रमाण । जाणते पुरुषीं ॥ २५ ॥
२५) क्षोत्यांनी आतां सावधान व्हावें. कर्त्याचा निश्र्चय करुन कल्पना सोडावी. जाणत्या पुरुषांनीं प्रत्यक्ष अनुभव पाहून कर्त्याचा निश्र्चय करावा.   
जें जें कर्तयानें केलें । तें तें त्याउपरी जालें ।
कर्त्यापूर्वीं आडळलें । न पाहिजे कीं ॥ २६ ॥
२६) कर्ता जें जें कांहीं निर्माण करतो तें तें त्याच्यानंतर निर्माण झालेले असते. कर्त्याच्या आधीं तें अस्तित्वांत नसतें.
केलें तें पंचभूतिक । आणि पंचभूतिक ब्रह्मादिक ।
तरी भूतांशें पंचभूतिक । केलें तें घडेना ॥ २७ ॥
२७) आपल्या अनुभवास येणारें हें दृश्य विश्र्व पंचभूतिक आहे. ब्रह्मादिदेव हे देखील पंचभूतिकच आहेत. म्हणून पंचभूतिक देवांनी पंचभूतिक विश्व निर्माण केलें असें होणार नाहीं. पंचभूतांच्या अंशांनी पंचभूतिक विश्र्व निर्माण करणें शक्य नाहीं.  
पंचभूतांस वेगळें करावें । मग कर्त्यास वोळखावें ।
पंचभूतिक तें स्वभावें । कर्त्यांत आले ॥ २८ ॥
२८) मग कर्ता शोधून काढण्यासाठीं पंचभूतांना बाजूस वेगळें काढावें आणि नंतर कर्ता कोण तें ओळखावें. याचें कारण असें कीं, पंचभूतें स्वतः जड असल्यानें ती स्वतः कांहीं निर्माण करत नाहींत. पण जो कोणी कर्ता आहे त्याच्यामध्यें ती सहजच अंतर्भूत आहेत. 
पंचभूतांवेगळें निर्गुण । तेथें नाहीं कर्तेपण ।
निर्विकारास विकार कोण । लाऊं शके ॥ २९ ॥
२९) पंचभूतांना वेगळें केलें कीं निर्गुण उरते. तेथें कर्तेपण नसतें. कर्तेपण हा विकार आहे. निर्विकार स्वरुपाला विकार लावता येत नाहीं.  
निर्गुणास कर्तव्य न घडे । सगुण जात्यांत सापडे ।
आतां कर्तव्यता कोणकडे । बरें पाहा ॥ ३० ॥
३०) येथें अडचण अशी कीं, निर्गुणाला कर्तेपण लावता येत नाहीं. सगुण हें निर्माण झालेले असल्यानें त्यास कर्तेपण देता येत नाहीं. मग अखेर कर्तेपण कोणाला द्यायचे हा प्रश्र्ण शिल्लक राहतो.  
लटिक्याचा कर्ता कोण । हें पुसणेंचि अप्रमाण ।
म्हणोनि हेंचि प्रमाण । जें स्वभावेंचि जालें ॥ ३१ ॥
३१) याचें उत्तर असें कीं, ब्रह्मवस्तूकडून पाहिलें तर सारें दृश्य विश्र्व लटकें आहे. भ्रम आहे. जें मुळांत नाहींच नाहीं, त्याचा कर्ता कोण हे विचारणे गैर आहे. म्हणून हें विश्र्व स्वभावतःच झालें असें म्हणणे योग्य आहे.   
येक सगुण येक निर्गुण । कोठें लाऊं कर्तेपण ।
या अर्थाचें विवरण । बरें पाहा ॥ ३२ ॥
३२) एक सगुण व दुसरे निर्गुण आहे. या दोन्हीपैकी कोणाकडेही सृष्टिचें कर्तेपण देतां येत नाहीं. या अर्थाचे विवेचन कसें तें पाहा. 
सगुणें सगुण केलें । तरी तें पूर्वींच आहे जालें ।
निर्गुणास कर्तव्य लाविलें । नवचे कीं कदा ॥ ३३ ॥
३३) सगुणानें सगुण निर्माण केलें असें म्हणावें तर सगुण आधीच निर्माण झालेलें आहे. याचा अर्थ असा कीं, सगुणाचा कर्ता सगुणाच्या आधींच असतो. तो सगुण निर्माण करतो. तो सगुणांत अंतर्भूत होत नाहीं. जें निर्गुण आहें तें निर्विकारी असल्यानें त्यास कर्तेपणाचा विकार स्पर्श करीत नाहीं. 
येथें कर्ताचि दिसेना । प्रत्यये आणावा अनुमाना ।
दृश्य सत्यत्वें असेना । म्हणोनियां ॥ ३४ ॥
३४) अशा रीतीनें विचार केला तर सृष्टिचा कोणी कर्ता आढळत नाहीं. या प्रत्ययावरुन असें अनुमान काढावें लागतें कीं, हें दृश्य विश्र्व खरें नाहीं. म्हणून अशी अडचण उत्पन्न होतें.   
केलें तें अवघेंच लटिकें । तरी कर्ता हें बोलणेंचि फिकें ।
वक्ता म्हणे रे विवेकें । बरें पाहा ॥ ३५ ॥
३५) कर्त्यानें जें केलें असें आपण म्हणतो तेंच जर मुळांत लटकें आहे, तर कर्ता कोण याची चौकशी व्यर्थ ठरते. वक्ता सांगतो कीं, याचा नीट विचार करुन तें समजून घ्या. 
बरें पाहातां प्रत्यये आला । तरी कां करावा गल्बला ।
प्रचित आलियां आपणाला । अंतर्यामी ॥ ३६ ॥
३६) नीट विचार करुन ही गोष्ट मनाला एकदां पटली कीं घोटाळा उरणार नाहीं. आपल्या अंतर्यामी याची प्रचीति मात्र आली पाहिजे.  
आतां असो हें बोलणें । विवेकी तोचि हें जाणे ।
पूर्वपक्ष लागे उडवणें । येरवीं अनुर्वाच ॥ ३७ ॥
३७) आतां हें बोलणें पुरें. जो विवेकीं असतो तोच हें जाणतो. पूर्वपक्षानें काढलेलें आक्षेप कसें सदोष आहेत हें दाखवावें लागतें. एरवी हा सिद्धांत शब्दानें वर्णन करतां येण्यासारखा नाहीं.    
तंव श्रोता करी प्रस्न । देहीं सुखदुःखभोक्ता कोण ।          
पुढें हेंचि निरुपण । बोलिलें असे ॥ ३८ ॥
३८) यावर श्रोत्यानें असा प्रश्र्ण केला कीं, " देहामध्यें सुख-दुःखाचा भोक्ता कोण? " पुढील समासांत या विषयाचे विवेचन आहे.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कर्तानिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava  Karta Nirupan
समास आठवा कर्ता निरुपण


Custom Search

Thursday, March 8, 2018

Samas Satava Pratyaya Vivaran समास सातवा प्रत्यय विवरण


Dashak Terava Samas Satava Pratyaya Vivaran 
Samas Satava Pratyaya Vivaran, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Pratyaya means experience. Parmarth is based on ones’ experience. Sadhak when acquires knowledge, all his doubts are cleared.
समास सातवा प्रत्यय विवरण 
श्रीराम ॥
निर्मळ निश्र्चळ निराभास । तयास दृष्टांत आकाश ।
आकाश म्हणिजे अवकाश । पसरला पैस ॥ १ ॥
१) परमात्मवस्तु निर्मळ, निश्र्चळ व निराभास आहे. तिला फक्त आकाशाची उपमा देता येते. पसरलेला अवकाश म्हणजे आकाश होय.  
आधीं पैस मग पदार्थ । प्रत्यये पाहातां यथार्थ ।
प्रत्ययेंविण पाहाता वेर्थ । सकळ कांहीं ॥ २ ॥
२) आधी मोकळीं किंवा रिकामी जागा मग त्यांत पदार्थ उत्पन्न होऊन भरले जातात. असा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो. ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाहीं, ते सर्व व्यर्थच होय.  
ब्रह्म म्हणिजे तें निश्र्चळ । आत्मा म्हणिजे तो चंचळ ।
तयास दृष्टांत केवळ । वायो जाणावा ॥ ३ ॥
३) ब्रह्म निश्र्चळ असते. अंतरात्मा चंचळ असतो. तो समजण्यासाठीं म्हणून त्यास केवळ वायुची उपमा देता येते.  
घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा । घटबिंब दृष्टांत आत्म्याचा ।
विवरतां अर्थ दोहींचा । भिन्न आहे ॥ ४ ॥
४) घटाकाश ही उपमा ब्रह्माला देतात तर घटांतील पाण्यांत पडणार्‍या प्रतिबिंबाला अंतरात्मा म्हणतात. यावर विचार केल्यावर दोन्हीचा अर्थ वेगळा आहे हे समजते. 
भूत म्हणिजे जितुकें जालें । जालें तितुकें निमालें ।
चंचळ आलें आणी गेलें । ऐसें जाणावें ॥ ५ ॥
५) जें जें झाले किंवा निर्माण झाले ते सारे भूत होय. जें उत्पन्न होते तें नाश पावते. यावरुन जें जें येते आणि जातें तें सारें चंचळ होय असें जाणावे.  
अविद्या जड आत्मा चंचळ । जड कर्पूर आत्मा अनळ ।
दोनी जळोन तत्काळ । विझोन जाती ॥ ६ ॥
६) अविद्या जड तर अंतरात्मा चंचळ आहे. अविद्या जणूंकांहीं कापूर तर चंचळ आत्मा जणूं अग्नि आहे. दोन्ही जळून विझून जातात. म्हणून अविद्या नाहींशी झाली किं अंतरात्मा नाहींसा होऊन निश्र्चळ ब्रह्म तेवढें उरते.
ब्रह्म आकाश निश्र्चळ जाती । आत्मा वायो चंचळ जाती ।
परीक्षवंत परीक्षिती । खरें किं खोटें ॥ ७ ॥
७) ब्रह्म व आकाश हे निश्र्चळ आहेत. तर अंतरात्मा व वायु हें चंचळ आहेत. हें खरें कां खोटे याची परीक्षा केवळ परीक्षवंतच करतात. 
जड अनेक आत्मा येक । ऐसा आत्मानात्माविवेक ।
जगा वर्तविता जगन्नायेक । तयास म्हणावें ॥ ८ ॥
८) जड किंवा स्थूल पदार्थ अनेक आहेत. तर सूक्ष्म आत्मा एकच आहे. ही धारणा होणें याला आत्मानात्मविवेक म्हणतात. त्या आत्म्यालाच जगाला चालवणारा जगन्नायक म्हणतात.   
जड अनात्मा चेतवी आत्मा । सर्वीं वर्ते सर्वात्मा ।
अवघा मिळोन चंचळात्मा । निश्र्चळ नव्हे ॥ ९ ॥
९) जड सारें अनात्म समजावें. त्याला अंतरात्मा चेतना देतो. सर्व जडामध्यें राहून त्यास चेतना देतो म्हणून त्यास सर्वात्मा म्हणतात. पण हा सर्व मिळून चंचलात्माच होय. निश्र्चळात्मा नव्हें, निश्र्चळ ब्रह्म नव्हें. 
निश्र्चळ तें परब्रह्म । जेथें नाहीं दृश्यभ्रम ।
विमळ ब्रह्म तें निभ्रम । जैसें तैसें ॥ १० ॥  
१०) ज्याच्या ठिकाणीं थोडाही दृश्याचा भ्रम नाहीं, तें निश्र्चळ परब्रह्म समजावें. विमल ब्रह्म अत्यंत भ्रमरहित असतें. तें अगदीं जसेंच्या तसेंच राहातें. 
आधीं आत्मानात्माविवेक थोर । मग सारासारविचार । 
सारासाविचारें संव्हार । प्रकृतीचा ॥ ११ ॥
११) प्रथम मोठा आत्मानात्मविचार करावा. यानंतर मग सारासार विचार करावा. सारासार विचारानें प्रकृतीचा संव्हार होतो.  
विचारें प्रकृति संव्हारे । दृश्य अस्तांच वोसरे ।
अंतरात्मा निर्गुणी संचरे । अध्यात्मश्रवणें ॥ १२ ॥
१२) सारासार विचारानें प्रकृतीचा निरास झाला म्हणजे विवेकप्रलय साधतो. मग दृश्य विश्र्व असूनही नसल्यासारखें होते. अध्यात्म श्रवणानें अंतरात्मा निर्गुण ब्रह्मस्वरुपामध्यें अंतर्धान होतो.  
चढता अर्थ लागला । तरी अंतरात्मा चढतचि गेला ।
उतरल्या अर्थें उतरला । भूमंडळीं ॥ १३ ॥
१३) सूक्ष्माकडे नेणारा ( वर चढणारा ) अर्थ आंत उदय पावला तर अंतरात्मा सूक्ष्माकडे जातो, स्वतः सूक्ष्म बनतो. सूक्ष्माकडे न जातां स्थूलाकडे ओढणारा अर्थ आंत प्रगट झाला तर अंतरात्मा स्थूलाकडे खालीं येतो, स्वतः अधिकाधिक स्थूल बनतो. मग तो जगांतील स्थूल वस्तूंना चिकटतो.  
अर्थासारिखा आत्मा होतो । जिकडे नेला तिकडे जातो ।
अनुमानें संदेहीं पडतो । कांहींयेक ॥ १४ ॥
१४) अंतरात्म्याचा असा गुण आहे कीं, तो अर्थासारखें रुप घेतो. अर्थ जिकडे नेईल तिकडे तो जातो. कल्पना करीत गेले तर कोणत्या तरी संशयानें घेरला जातो.   
निसंदेह अर्थ चालिला । तरी आत्मा निसंदेहचि जाला ।
अनुमानेअर्थें जाला । अनुमानरुपी ॥ १५ ॥
१५) आंतमधील अर्थ अगदी संशयरहित असेल तर अंतरात्मा देखील अत्यंत निःसंशय बनतो. अर्थ अनिश्र्चित असेल तर अंतरात्मा पण तसाच अनिश्र्चित स्वरुपाचा बनतो. 
नवरसिक अर्थ चाले । श्रोते तद्रूपचि जाले ।
चाटपणें होऊन गेले । चाटचि अवघे ॥ १६ ॥
१६) शृगांर, करुण, भयानक वगैरे नवरसांचे वर्णन चालूं असेल तर श्रोत्यांचा आत्मा त्या त्या रसांशी तद्रूप होतो. चावटपणा चालू असेल तर तो चावटपणाशी तद्रूप होतो.   
जैसा जैसा घडे संग । तैसे गुह्यराचे रंग ।
याकारणें उत्तम मार्ग । पाहोन धरावा ॥ १७ ॥
१७) सरड्याचा गुण असा कीं, ज्या रंगाशीं त्याची संगति होते तो रंग त्याच्यावर चढतो. माणसाच्या अंतरात्म्याचे असेंच आहे. म्हणून माणसानें उत्तम मार्ग शोधावा. व त्या मार्गानें जावें.  
उत्तम अन्नें बोलत गेले । तरी मन अन्नाकारचि जालें ।
लावण्य वनितेचें वर्णिलें । तरी मन तेथेंचि बैसे ॥ १८ ॥
१८) उत्तम अन्नाविषयीं बोलणें निघालें तर मन त्या अन्नाशीं तद्रूप बनते. एखाद्या स्त्रीचें सौंदर्य वर्णन केलें तर मन त्याच्याशी तदाकार होतें.   
पदार्थवर्णन अवघें । किती म्हणोन सांगावें ।
परंतु अंतरीं समजावें । होये किं नव्हे ॥ १९ ॥
१९) अशा रीतीनें ज्या पदार्थाचें वर्णन करावें त्या पदार्थाशीं मन एकाकार होऊन जातें. अशीं कितीतरी उदाहरणें देतां येतील. वर्ण्य वस्तूशीं मन तदाकार होतें का नाहीं हें ज्यानें त्यानें आपल्या अंतरींच्या अनुभवावरुन ओळखावें.  
जें जें देखिलें आणी ऐकिलें । तें अंतरीं सदृढ बैसलें ।
हित अन्हित परीक्षिलें । परीक्षवंतीं ॥ २० ॥
२०) माणूस डोळ्यांनीं जें जें पाहातो आणि कानांनी जें जें ऐकतो तें त्याच्या अंतर्यामी घट्टपणें जाऊन बसते. त्यापैकी आपल्या हिताचे व अनहिताचे कोणते याची परीक्षा परिक्षवंत करतात. 
याकारणें सर्व सांडावें । येक देवास धुंडावें ।
तरीच वर्म पडे ठावें । कांहींयेक ॥ २१ ॥
२१) म्हणून इतर सर्व कांहीं सोडून द्यावें व एका देवाचाच शोध घ्यावा. असें केलें तरच जीवनाचें रहस्य कांहीं प्रमाणांत उलगडेल.  
नाना सुखें देवें केलीं । लोकें तयास चुकलीं ।
ऐसीं चुकतां च गेलीं । जन्मवरी ॥ २२ ॥
२२) देवानें अनेक प्रकारची उत्तम सुखें निर्माण केली आहेत. पण अज्ञानामुळें ती लोकांना मिळत नाहीत. मार्ग चुकल्यानें जन्मभर तीं सुखें त्यांना मिळत नाहीत.   सर्व  सांडून शोधा मजला । ऐसें देवचि बोलिला ।
लोकीं शब्द अमान्य केला । भगवंताचा ॥ २३ ॥
२३) " इतर सारें सोडून माझा शोध करा. " असें भगवंतच बोलून गेला आहे. पण लोक भगवंताच्या शब्दाला मानीत नाहीत. 
म्हणोन नाना दुःखें भोगिती । सर्वकाळ कष्टी होती ।
मनीं सुखचि इच्छिती । परी तें कैचें ॥ २४ ॥
२४) याचा परिणाम असा होतो कीं, लोकांना नाना प्रकारची दुःखें भोगावी लागतात. त्यांना सर्व काळ कष्टांत काढावा लागतो. मनांत सुख मिळावें अशी इच्छा असतें पण तें मिळत नाहीं.   
उदंड सुख जया लागलें । वेडें तयास चुकलें ।
सुख सुख म्हणताच मेलें । दुःख भोगितां ॥ २५ ॥
२५) वास्तविक माणसापाशी फार मोठा सुखाचा वाटा आहे. पण आपल्या अज्ञानानें त्या सुखास तो मुकतो. मला सुख हवें असा त्यास ध्यास असतो. पण जन्मभर तो दुःख भोगीतच मरुन जातो.
शाहाण्यानें ऐसें न करावें । सुख होये तेंचि करावें ।
देवासि धुंडित जावें । ब्रह्मांडापरतें ॥ २६ ॥
२६) तरी शहाण्या माणसानें असें करु नये. या जन्मांत भगवंताचें सुख आपल्याला मिळेल असें त्यानें वागावें. देवाचा शोध करण्यामध्यें ब्रह्मांड पालथे घालावें. ब्रह्मांडाच्या पलीकडे जावे. 
मुख्य देवचि ठाईं पडिला । मग काये उणे तयाला ।
लोक वेडे विवेकाला । सांडून जाती ॥ २७ ॥
२७) मुख्य देव हस्तगत झाल्यानंतर मग कशाला कांहीं कमी पडत नाहीं. लोक वेडेपणा करतात.विवेकाला सोडून अविवेकानें वागतात. 
विवेकाचें फळ तें सुख । अविवेकाचें फळ तें दुःख ।
यांत मानेल तें अवश्यक । केलें पाहिजे ॥ २८ ॥
२८) विवेकानें वागण्याचें फळ सुख तर अविवेकानें वागण्याचें फळ दुःख होय. यापैकीं मनाला जें पटेल तें माणसानें करावें. अगदी अवश्य करावें. 
कर्तयासी वोळखावें । यास विवेक म्हणावें ।
विवेक सांडितां व्हावें । परम दुःखी ॥ २९ ॥
२९) खरा जो कर्ता आहे त्याला ओळखावें याचें नांव विवेक होय. ज्यानें हा विवेक सोडला तो अतिशय दुःखी होतो. 
आतां असो हें बोलणें । कर्त्यास वोळखणें ।
आपलें हित विचक्षणें । चुकों नये ॥ ३० ॥
३०) आतां हें बोलणें पुरें झालें. खर्‍या कर्त्यास ओळखणें यामध्यें आपलें हित किंवा कल्यााण आहे. शाहाण्या माणसानें तें हित साधण्यास चुकूं नये. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रत्ययेविवरणनाम समास सातवा ॥
Samas Satava Pratyaya  Vivaran 
समास सातवा प्रत्यय विवरण 


Custom Search