Thursday, June 25, 2020

Dnyaneshwari Adhyay 2 Part 9 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ९


Dnyaneshwari Adhyay 2 Part 9 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ९  
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या २०१ ते २२५

म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील ।
आणि अपेश तें न वचेल । कल्पांतवरी ॥ २०१ ॥
२०१) म्हणून तूं आपला धर्म टाकशील, तर पापाला पात्र होशील आणि अपकीर्तीचा डाग तर कल्पान्तापर्यंतहि  जाणर नाहीं.
जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे ।
आणि सांग पां केवीं निगावें । एथोनियां ॥ २०२ ॥
२०२) अपकीर्ति जोपर्यंत अंगाला शिवली नाहीं, तोपर्यंतच शहाण्यानें जगावें. आतां सांग बरें; येथून कसें परत फिरावें ? 
तूं निर्मत्सरु सदयता । येथूनि निघसी कीर माघौता ।
परी ते गति समस्तां । न मनेल यया ॥ २०३ ॥
२०३) तूं मला टाकून व दयेनें युक्त होऊन रणांतून परत फिरशील खरा; पण तुझी स्थिति या सर्वांना पटणार नाहीं.
हे चहूंकडूनि वेढितील । बाणवरी घेतील ।
तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणें ॥ २०४ ॥
२०४) म्हणून हे तुला चारी बाजूंनीं घेरतील; तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील; त्या प्रसंगी अर्जुना, कृपाळूपणामुळें तुझी सुटका होणार नाहीं. 
ऐसेनिहि प्राणसंकटें । जरी विपायें पां निघणें घटे ।
तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥ २०५ ॥
२०५) जरी कदाचित त्या प्राणसंकटांतून तुझी कशीबशी सुटका झाली, तरी ( तसें ) तें जगणेंहि मरणाहून वाईटच. 
तूं आणीकही एक न विचारिसी । एथ संभ्रमें झुंजों आलासी ।
आणि सकणवपणें निघालासीं । मागुता जरी ॥ २०६ ॥
२०६) आणखीहिं अर्जुना, एका गोष्टीचा विचार तूं करीत नाहींस; येथें तूं मोठ्या उत्साहानें लढण्याकरितां म्हणून आलास आणि आतां जर दया  उत्पन्न झाल्यामुळें परत फिरलास; 
तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां ।
कां प्रत्यया येईल मना। सांगें मज ॥ २०७ ॥
२०७) तर अर्जुना, तुझें तें करणें या दुष्ट वैर्‍यांच्या मनाला खरें वाटेल का ? सांग बरें मला.
हे म्हणतील गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला ।
हा सांगें बोलु उरला । निका कायी ॥ २०८ ॥
२०८) ते म्हणतील, ‘ हा पळाला रे पळाला !’ , अर्जुन आम्हांला भ्याला ‘; असा दोष तुझ्यावर राहिला, तर तें चांगलें का ? सांग.
लोक सायासें करुनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जिवितें ।
परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥ २०९ ॥
२०९) लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगीं आपलें प्राणहि खर्ची घालतात; पण, धनुर्धरा, कीर्ती वाढवितात.
ते तुज अनायासें । अनकळित जोडिली असे ।
हें अद्वितीय जैसें । गगन आहे ॥ २१० ॥
२१०) ती तुला अनायासें संपूर्ण लाभली आहे. आकाश हें ज्याप्रमाणें अद्वितीय आहे;
तैसी कीर्ती निःसीम । तुझां ठायीं निरुपम ।
तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ॥ २११ ॥
२११) त्याप्रमाणें अनंत व उपमारहित, अशी तुझी कीर्ति आहे. तिन्ही लोकांत तुझे गुण उत्तम ( म्हणून प्रसिद्ध ) आहेत.  
दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती।
जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥ २१२ ॥
२१२) देशोदेशींचे राजे भाट अजून ( तुझी कीर्ति ) वाखाणतात, ती ऐकून यमादिकांनाहि धास्ती पडते.
ऐसा महिमा घनवट । गंगा तैसी चोखट ।
जया देखी जगीं सुभट । वांठ जाहली ॥ २१३ ॥
२१३) अशी ( तुझी ) थोरवी भरीव व गंगेसारखी निर्मल आहे. ती पाहून जगांतील मी मी म्हणणारे वीर चकित होतात.
तें पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त ।
जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥ २१४ ॥
२१४) तो तुझा अपूर्व पराक्रम ऐकून, या सगळ्यांनीं आपल्या जीवाची आशा सोडली आहे. 
जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा ।
तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ॥ २१५ ॥  
२१५) ज्याप्रमाणें सिंहाच्या गर्जनेनें मदोन्मत्त हत्तीला प्रलयकाळ होतों, त्याप्रमाणें या कौरवांना तुझा धाक बसला आहे.
जैसे पर्वत वज्रातें । ना तरी सर्प गरुडाते ।
तैसे अर्जुना हे तूंतें । मानिती सदा ॥ २१६ ॥
२१६) ज्याप्रमाणें पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात, त्याप्रमाणें अर्जुना, हे तुला नेहमीं मानतात.
तें अगाधपण जाईल । मग हिणावो अंगा येईल ।
जरी मागुता निघसील । न झुंजतचि ॥ २१७ ॥
२१७) जर तूं न लढतांच परत निघशील, तर तुझा तो मोठेपणा नाहींसा होईल आणि मग तुला हीनपणा येईल.
आणि हे पळतां पळों नेदिती । धरुनि अवकळा करिती ।
न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ॥ २१८ ॥
२१८) तूं ( जरी ) पळून जाऊं लागलास तरी हे कौरव तुला जाऊं देणार नाहींत; तुला पकडून तुझी फजिती करतील आणि तूं ऐकत असतांना तुझी अमर्याद निंदा करतील.
मग ते वेळी हियें फुटावें । आतां लाठेपणें कां न झुंजावें ।
हें जिंतलें तरी भोगावें । पृथ्वीतल ॥ २१९ ॥
२१९) मग त्या वेळीं तुझें हृदय विदीर्ण होईल. त्यापेक्षां आज शौर्यानें कां लढूं नये ? ह्यांना जिंकलेस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील.  
ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित ।
तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥ २२० ॥
२२०) अथवा समरांगणावर युद्ध करतांना प्राण खर्चीं पडलें, तर स्वर्गांतील सुख ( तुला ) त्रासावांचून प्राप्त होईल.
म्हणोनि ये गोठी । विचारु न करीं किरीटी ।
आतां धनुष्य घेऊनि उठी । झुंजें वेगीं ॥ २२१ ॥
२२१) एवढ्याकरितां अर्जुना, या गोष्टींचा विचार करीत बसूं नकोस. आतां हे धनुष्य घेऊन ऊठ आणि लवकर युद्धाला आरंभ कर.
देखें स्वधर्मु हा आचरतां । दोषु नाशे असता ।
तुज भ्रांति हे कवण चित्ता । एथ पातकाची ॥ २२२ ॥
२२२) पाहा, या स्वधर्माचें आचरण केलें असतां असलेलीं पापें नाहींशीं होतात. ( मग हें युद्ध केल्यानें ) पातक लागेल, ही भ्रांति या ठिकाणीं तुझ्या चित्तांत कशीं आली ? 
सांगें प्लवेंचि काय बुडिजे । कां मार्गीं जातां आडळिजे ।
परी विपायें चालों नेणिजे । तरी तेंही घडे ॥ २२३ ॥
२२३) अर्जुना सांग, नावेनें कोणी बुडेल कां ? किंवा ( चांगल्या ) वाटेनें जातांना ठेंच लागेल कां ? पण कदाचित् नीट चालतां येत नसेल तर तेंहि होईल.
अमृतें तरीचि मरिजे । जरी विखेंसी सेविजे ।
तैसा स्वधर्में दोषु पाविजे । हेतुकपणें ॥ २२४ ॥
२२४) दूधच पण जर विषासह सेवन केलें तरच त्यानें मरण येईल. त्याचप्रमाणें फलाशेनें स्वधर्मापासून दोष लागतो.
म्हणोनि तुज पार्था । हेतु सांडोनि सर्वथा ।
क्षात्रवृत्ती झुंजतां । पाप नाहीं ॥ २२५ ॥

२२५) म्हणून पार्था, सर्व प्रकारें फलाशा सोडून 

क्षत्रियांच्या धर्माप्रमाणें युद्ध 

कर. म्हणजे तुला पाप मुळींच लागणार नाहीं.


Custom Search

No comments: